Saturday, December 29, 2012

ती बट का झुलते गालावरती?


ती बट का झुलते गालावरती? प्रश्न मला पडताना
हृदयाचा चुकलेला ठोका पायाशी घुटमळताना
दिलखेच नजर ती नकळत माझ्या नजरेसोबत भिडली
मी अजून लोकांना दिसतो नजरेला सोडवताना
.

.

माझी ही धडपड शून्यामधली तुला उमगली नाही
अन पुन्हा नव्याने प्रेमासाठी हिंमत उरली नाही
तो चुकला ठोका अजूनही मी शोधत वणवण फिरतो
तू तहान म्हण जी मृगजळवेडी शमता शमली नाही

डोक्यावर तळपे सत्यसूर्य जो रात्रीपुरता विझतो
मी शांत मनाच्या अंधाराच्या तळास जाउन निजतो
तू गंध रातराणीचा लेउन अवचित वेळी यावे
ह्या कल्पनेत मी चकोररूपी पहाटवेळी भिजतो

सारे केशर-केशर होते अन मी बघतो क्षितिजाला
आकाश केशरी बटांस पसरे त्या पहिल्या प्रहराला
तेव्हा कळते की, तुझ्याचसाठी खुद्द निसर्गच सजतो !
मग कशास तूही समजुन घ्यावे मला क्षुद्र वेड्याला ?

....रसप....
२९ डिसेंबर २०१२

Saturday, December 22, 2012

चव अळणी, वास खमंग.... दुसरा दबंग (Movie Review - Dabangg - 2)


सध्या भारत-इंग्लंड सामने चालू आहेत. भारताचे स्टार फलंदाज मोठ्या झोकात खेळपट्टीवर येतात १०-१५ मिनिटं, पाऊण तास, फार तर तास भर चांगल्या फलंदाजीचं दर्शन देतात आणि अचानक हत्तीच्या कानात मुंगीने 'मैं तुम्हारे बच्चे की मां बननेवाली हूं' म्हटल्यावर हत्ती कसा बावचळेल, तसे बावचळतात आणि दांड्या उडतात..... अशी चित्रं मी सिनेमाइतकाच क्रिकेटचाही चाहता असल्याने गेला महिनाभर तरी नियमित पाहात आहे. त्यामुळे असेल, पण जब्बरदस्त स्टाईलमध्ये व दमदारपणे इण्टर्व्हलपर्यंत येणाऱ्या आणि नंतर बावचळल्यागत विकेट फेकणाऱ्या 'दबंग - २' ने, अपेक्षाभंग करूनही, म्हणावं तितकं डोकं फिरवलं नाही.

पहिला दबंग सल्लूपटांतला शिरोमणी होता. त्याचाच हा दुसरा भाग, म्हणजे हाणामाऱ्यांमध्ये (नवराबायकोच्या फिल्मी भांडणां उडणाऱ्या उश्यांप्रमाणे) ठोश्यासरशी उडणारी माणसं आली (इथे ती टप्पे वगैरे पण खातात, हे मूल्यवर्धन), बनियानमध्ये पाल सुरसुरावी तसं वाकडं-तिकडं होऊन हसणं आलं आणि शेवटच्या दृश्यात सल्लूभायच्या शर्टाने लाजणंही आलंच. हे सगळं येणार हे माहित असतानाही हा सिनेमा बघायचा होता म्हणून मी सोबत एक मोठी रिकामी पिशवी घेऊन गेलो होतो.. बायको आणि माझं डोकं काढून ठेवायला !

तर डोकं काढून ठेवेपर्यंत जरासा उशीर झाला आणि सुरुवातीचा काही भाग चुकला.. पण जिथून पाहिला तिथून पुढे असं काहीसं झालं -
पहिल्या दबंग प्रमाणे (प.द.प्र.) एका गोडाऊनमध्ये इन्स्पेक्टर पांडे १५-२० गुंडांना यथेच्छ तुडवतो, उडवतो आणि त्याच्या तावडीतून एका लहान मुलाला सोडवतो. प.द.प्र., गोडाऊनच्या बाहेर त्याचे सहकारी पोलिस उभे असतात आणि प.द.प्र.च इथेही तो गुंडांनी 'कमावलेला' माल हडप करतो. (मुलाच्या बदल्यात देण्यासाठी बापाने आणलेले पैसे) पूर्वी लालगंजमध्ये असणाऱ्या इन्स्पेक्टर पांडेची आता कानपूरला बदली झाली आहे आणि त्याच्या सोबतीने तिवारी-मिश्रा सुद्धा आहेत. त्यांच्याशिवाय सिद्दिकी आणि अजून एक-दोन जण नव्याने आले आहेत. कानपुरातला बाहुबली आहे बच्चा भैया (प्रकाश राज). त्याचे दोन भाऊ - चुन्नी आणि गेंदा. हे तिघे मिळून कानपुरात दहशतीचं साम्राज्य पसरवून असतात. अर्थातच 'रॉबिन हूड' पांडे वि. बच्चा भैया पार्टी असा सामना रंगतो. मध्यंतरापर्यंत दोन्ही खेळाडू आश्वासक खेळ करतात, पण मध्यंतरात हत्तीच्या कानात मुंगी पुटपुटते आणि अचानक खेळ गुंडाळला जातो.. प.द.प्र., इथे पांडे 'एकटा जीव सदाशिव' नसतो, आता भाऊ, बाप व बायकोसोबत राहाणारा जबाबदार कुटुंबकर्ता असतो. साहजिक आहे, त्याच्या पोलिसी दुष्मनीचे चटके त्याच्या कुटुंबाला बसतात. वडिलांना धमकी, भावाला मार आणि गरोदर बायकोच्या मनावर मूल जन्माआधीच मरायचा वार.. हे सगळं झाल्यावर रॉबिन हूड पांडे चवताळतो आणि कपडे काढून (स्वत:चे) सर्व दुर्जनांना यमसदनी धाडतो. हे सगळं करताना तो अनेक अचाट हाणामाऱ्या करतो, मध्ये-मध्ये वेळ मिळाल्यावर कधी भावासोबत, कधी बायकोसोबत, कधी पोलिसांसोबत तर कधी नर्तकींबरोबर रस्त्यावर/ स्टेजवर/ परदेशात वगैरे ठिकाणी नाचतो व गातो. खुसखुशीत संवादही 'फेकतो'. एकंदरीत विद्या बालनला जामच सिरीयसली घेऊन मनोरंजन-मनोरंजन-मनोरंजन करतो.



शीर्षक गीत (पु. लं. च्या भाषेत) 'बिपीशायला जायपीचा डबा' जोडल्यासारखं प.द.प्र.'हूड हूड दबंग..दबंग..दबंग..' करतं. बाकी गाणी ठीक-ठाक. 'दगाबाज नैना' प.द.प्र. 'तेरे मस्त मस्त दो नैन..' ची जादू करतं.
प्रकाश राज सारख्या नटाला पूर्णपणे वाया घालवलं आहे. संपूर्ण चित्रपटात त्याला एकून मिळून १५ वाक्यंही नसावीत. प.द.प्र. सोनू सूदइतका रोल तरी त्याच्यासाठी लिहिला जायला हवा होता.
सोनाक्शी सिन्हा आता जरा तासलेला ओंडका दिसायला लागली आहे. तिचं आकारमान आटोक्यात येण्याच्या मार्गावर असलं तरी कंबर मात्र काही केल्या हलता हलत नाही आणि नाकावरची माशी काही केल्या उडता उडत नाही.
अरबाज व विनोद खन्नालाही काहीही काम नाही.
छायाचित्रणाला विशेष वाव नव्हताच, पण तेवढ्यातही माती खाऊन झालीय.
दिग्दर्शक अरबाज खान, हीरो सलमान असल्याने तरतो, अन्यथा अजून खूप प्रयत्न हवे आहेत नक्कीच. लहान मुलाने, आधीच काढून दिलेली अक्षरं गिरवावीत तसा तो बहुतांश पहिला दबंग जसाच्या तसा गिरवतो.
सलमान खान हा अभिनेता नाही म्हणजे नाहीच. तो फक्त हीरो आहे आणि त्याची हीरोगिरी प.द.प्र. इथेही पैसा वसूल ! नाही म्हणायला त्याने इस्पितळातल्या एका दृश्यात डोळ्यात पाणी वगैरे आणलं आहे, ती त्याच्या अभिनयाची पराकाष्ठा असावी.

एकूणात, प.द.प्र. हा 'दबंग' थ्रूआउट मनोरंजन न करता अर्ध्यावरच बावचळतो.
सिनेमा पाहन बाहेर आल्यावर मला पहिला दबंग पाहाण्याची अतीव इच्छा झाली, पण बाहेर येईपर्यंत खऱ्या पोलिसांनी माझी बाईक उचलून नेली होती, ती सोडवून आणण्यात इच्छा विरली आणि 'खरे पोलिस' कसे असतात ह्याची जाणीव पाकिटाला जबरदस्त फोडणी बसून झाली !
असो... ह्यात पांडेजीचा काय दोष ?

रेटिंग - * *

Wednesday, December 19, 2012

नकोसे वाटते..


स्वत:ला शोधणे नकोसे वाटते
निराशा दाटणे नकोसे वाटते

सरे ना वाट ही किती चालायचे ?
विसावा पाहणे नकोसे वाटते

उधारी दे जरा सुखाची जीवना
भिकेचे भोगणे नकोसे वाटते

नव्याने हारणे मला चालेल पण,
सततचे झुंजणे नकोसे वाटते

खरा ये वा मला 'नसे मी' सांग तू
तुझे आभासणे नकोसे वाटते

जराशी रात्र दे जरासा चंद्र दे
उन्हाने पोळणे नकोसे वाटते

उद्याशी आजचा निरंतर हा लढा
कुणीही हारणे नकोसे वाटते

तुझ्या हातातले बनावे खेळणे
स्वत:शी खेळणे नकोसे वाटते

तुझा होईल रे 'जितू'ही ईश्वरा
तुझे बोलावणे नकोसे वाटते

....रसप....
१८ डिसेंबर २०१२

इथे ओशाळला म्हणे मृत्यू कधी
पुन्हा 'संभा'वणे नकोसे वाटते

....रसप....

Saturday, December 15, 2012

एक उनाड दिवस एकदा तरी यावा....


पापण्यांत लपलेला स्वप्नांचा थवा आभाळात उडावा..
एक उनाड दिवस एकदा तरी यावा....

पावलांनी चालत जावं जिथे नेईल वाट
मनात उफाळून यावी अल्लड खट्याळ लाट
चतूर, टाचणी, फुलपाखरांच्या मागे-मागे धावावं
पाण्यात 'डुबुक्' दगड टाकून तरंगांना पसरावं
सावलीसोबत पाठशिवणीचा खेळ अवचित रंगावा
एक उनाड दिवस एकदा तरी यावा....

पाठीवरचं दप्तर जाऊन हलकी सॅक यावी
कॉलेजची मोकळी हवा श्वासांतून वाहावी
कॅन्टिनच्या निवलेल्या चहाचा घोट घेताना
अनोळखी नजरेला चोरून नजर देताना
'पहला नशा' प्रेमाचा हवाहवासा वाटावा
एक उनाड दिवस एकदा तरी यावा....

पहिल्या नोकरीने नव्याने व्हावी जबाबदारीची जाणीव
कपड्यांच्या कपाटात 'फॉर्मल्स'ची भरून निघावी उणीव
घड्याळ्याच्या काट्याला घट्ट पकडायला शिकणं
खिश्यांमध्ये 'पेरूचा पापा'ला जपणं
पहिल्या पगाराचा आनंद चेहऱ्यावर ओसंडावा  
एक उनाड दिवस एकदा तरी यावा....

बरेच क्षण कळत नकळत हातातून निसटले
रित्या-भरल्या ओंजळीतून बरेच थेंब ओघळले
निसटलं-ओघळलं, हरकत नाही,
पण हिशोब तरी लागावा  
उगाच एक उनाड दिवस एकदा तरी यावा....
पापण्यांत लपलेला स्वप्नांचा थवा आभाळात उडावा..
असाच एक उनाड दिवस एकदा तरी यावा....

....रसप....
१५ डिसेंबर २०१२

Tuesday, December 11, 2012

प्रत्येक वाट माझी जाते तुझ्या घराशी


प्रत्येक वाट माझी जाते तुझ्या घराशी
मी भांडतो स्वत:शी, तू थांब उंबऱ्याशी

बसलो तुझ्या पुढे अन स्मरले तुलाच जेव्हा
कळली गझल मलाही तेव्हा कुठे जराशी

मूर्तीस पत्थराच्या पाझर कधी फुटेना
अन मी तहानलेला ठरलो उगा अधाशी

मी मोगऱ्यास रात्री ओंजळ भरून नेतो
नसतेस तू म्हणूनी ठेवायला उशाशी

इच्छा नसून माझे चालूच श्वास असती
कारण अजूनही मी जपले तुला उराशी

ना पार जायचे वा मागे फिरायचेही
सागर बघून रमतो मी एक तो खलाशी

....रसप....
११ नोव्हेंबर २०१२

Friday, December 07, 2012

विरहोत्सुकता


अर्ध्यात संपतो येथे
प्रत्येक डाव दैवाचा
जो कमी हारतो थोडा
आणतो आव जेत्याचा

नियतीचे प्यादे होउन
माझ्याशी जेव्हा भिडलो
माझ्या डोळ्यांच्या देखत
मी अनेक वेळा हरलो

जखमाही माझ्या साऱ्या
भळभळणे विसरुन गेल्या
एकट्याच वाटा माझ्या
भरकटणे विसरुन गेल्या

तूही जा सोडुन आता
मी थांबवणारा नाही
ह्या अपूर्ण डावासाठी
मी तळमळणारा नाही

स्वप्नांनी मला शिकवली
नात्यांची क्षणभंगुरता
मी जपतो मनात माझ्या
सवयीने विरहोत्सुकता

....रसप....
६ डिसेंबर २०१२

Wednesday, December 05, 2012

तू असतानाच्या आठवणी.. (उधारीचं हसू आणून....भाग - २)


६.
तू असतानाच्या आठवणी..
आठवणीतला एकेक क्षण
डोळ्यात साठवला होता...
त्या एकेक क्षणाने डोळ्यातलं पाणी शोषलं आहे

शेवाळलेल्या हिरवट डबक्यातल्या चिखलात
जसं कमळ उमलतं..
तसं त्या आठवणींतून उमलतात काही शब्दपाकळ्या..
आणि फुलते कविता..

रोज कातरवेळी माझं मन
मीच स्वत: लपवतो
त्या कमळाच्या मिटणाऱ्या पाकळ्यांत
आणि रोज सकाळी
एका प्रसन्न कवितेच्या उमलत्या पाकळ्यांतून
ते बाहेर येतं.... सुगंधित होऊन
अन दिवसभर बागडतं...
.
उधारीचं हसू आणून....

....रसप....
९ ऑक्टोबर २०१२

उधारीचं हसू आणून.... (भाग - २)

Saturday, December 01, 2012

वर्तमानात घेतलेला भविष्याचा शोध (Talaash - Movie Review)


अपनी मर्ज़ी से कहाँ अपने सफ़र के हम हैं
रुख हवाओं का जिधर का है उधर के हम हैं
- निदा फाजली
कमी-अधिक प्रमाणात असंच आपलं आयुष्य असतं. बहुतेक गोष्टी ओघानेच घडत असतात आणि आपण त्यासोबत घडत-बिघडत जातो. स्वबळावर आपली दिशा निवडणारे लोकही अनेकदा ह्या ओघासोबत वाटचाल करतातच. आपला असूनही आपला नसलेल्या किंवा नसूनही असेलल्या ह्या प्रवासात काही जाणीवा आपसूक होत जातात. कुणी त्याला ठाव लागणे म्हणतं तर कुणी शोध घेणे. फरक काही नसतो, काही तरी नवीन उमगलेलं असतं, फारसा प्रयत्न न करता किंवा प्रयत्न काही वेगळ्याच इप्सितासाठी असतो आणि हाताला काही वेगळंच लागतं. गुंतागुंतीचं आहे, पण बहुतेक वेळा सत्य गुंतागुंतीचंच असतं. नसेल पटत तर एकदा रीमा कागती दिग्दर्शित 'तलाश' पाहा, कदाचित पटेल आणि तरीही नाही पटलं तर हरकत नाही. ओघ चालू आहे, कधी ना कधी पटेलच; अशी मला - रणजितला - एक वेडी खात्री आहे.

सुर्जनसिंह शेखावत उर्फ सूरी (आमीर खान) मुंबई पोलीसदलातील एक निरीक्षक असतो. नव्यानेच ह्या शहरात दाखल झालेल्या 'सूरी'कडे केस येते एका विचित्र अपघाताची. हा अपघात साधासुधा नसतो, कारण  तो फिल्म सुपरस्टार अरमान कपूरच्या गाडीला झालेला असतो आणि त्यात अरमान कपूर जागीच ठारही होतो. मध्यरात्रीच्या सुमारास, स्वत:च्या घरापासून बरंच दूर, एका वेश्यावस्तीजवळ असलेल्या समुद्र किनाऱ्यालगतच्या रस्त्यावर, कुठलीही नशा केलेली नसताना, कधीच स्वत: गाडी न चालवणारा अरमान त्याच रात्री भरधाव गाडी का चालवत असतो? अपघाताच्या आदल्या दिवशी संध्याकाळी त्याने त्याच्या अकौंटन्टकडून मोठी रक्कम का घेतलेली असते ? रस्त्यावर कुणीही नसताना अचानक रस्ता सोडून, त्याची गाडी समुद्रात का उडी घेते ? असे अनेक विचित्र प्रश्न ह्या केसला क्लिष्ट बनवत असतात. काहीच विशेष हाती लागत नसल्याने एक अन्सोल्वेबल केस म्हणून ही फाईल बंद करावी, असंही वाटत असतं.
दुसरीकडे, एक कर्तव्यदक्ष पोलीस म्हणून नाव कमावलेला सूरी स्वत:ला एक कर्तव्यशून्य पिता मानत असतो. कारण त्याचा अल्पवयीन मुलगा, त्याच्या अपरोक्ष अपघाती मरण पावलेला असतो. ह्या अकस्मात धक्क्यामुळे सूरी आणि त्याची पत्नी रोशनी (राणी मुखर्जी) खूप अस्थिर असतात. दोघांतला संवाद खुंटलेला असतो. मनातल्या अपराधी भावनेमुळे सूरी अबोल, एकलकोंडा झालेला असतो. ह्या मानसिक अस्वास्थ्यामुळे रात्रीची झोप हरवलेला सूरी बहुतेकवेळा रात्र-रात्र घराबाहेरच राहत असल्याने त्याचे व त्याच्या पत्नीचे नाते अजून बिघडत चाललेले असते.
अश्या विचित्र मानसिक व कौटुंबिक कोंडीत असलेल्या सूरीला एक अनाहूत वेश्या रोझी (करीना कपूर) अपघाताची केस सोडविण्यासाठी काही मदत करते आणि त्याला मानसिक आधारही देते. तो केसच्या मुळापर्यंत जाण्याच्या दिशेने झटू लागतो. हळूहळू गुंते उलगडत जातात आणि उघडकीस आलेले सत्य त्याचा वैयक्तिक आयुष्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोनही बदलते.

'तलाश' म्हणजे केवळ कुठली रहस्यकथा नाही किंवा फक्त एक भावनिक नाट्यही नाही. ही तलाश, हा शोध केवळ एका पोलिसाचा नसून एका पतीचा, पित्याचा आणि एका वेश्येचाही आहे. काही वेळी म्हणूनच आपल्याला असं वाटत राहातं की दिग्दर्शिकेला नक्की काय मांडायचं आहे ? थरारनाट्य की भावनाट्य ? उत्तर आहे - दोन्ही. फलित आहे - अप्रतिम !



सिनेमा आमीर खानचा आहे, म्हटल्यावर सिनेमाभर आमीर असणारच, आहेच ! पण त्याने रंगवलेला सूरी व इन्स्पेक्टर शेखावत लाजवाब.
करीना व राणी, दोघींना मर्यादित वाव असला तरी दोघीही चोख काम करतात. राणी मुखर्जी खूप आकर्षक दिसते.
छोट्याश्या भूमिकेत नवाझुद्दिन सिद्दिकी परत एकदा आपली छाप पाडतो. त्याचा पाठलाग होत असतानाचा संपूर्ण भाग अतिशय थरारक झाला आहे.
पटकथा अजून जराशी आवळता आली असती, पण जशी आहे तशीही छानच !
दिग्दर्शिका रीमा कागती, दुसऱ्याच सिनेमात खूप प्रभावी पकड दाखवते.
बऱ्याच दिवसानंतर एका सिनेमात गाणी कानांवर बलात्कार करत नाहीत. त्यासाठी राम संपत ह्यांचे विशेष आभार !
हीरोच्या अंगावर 'खाकी' आहे म्हणून त्याने काहीही अचाट उड्या माराव्या, ठोसे लगवावे आणि 'माइंड इट' इष्टाईलने दुर्जनांचा नि:पात करावा असल्या दाक्षिणात्य मोहाला बळी न पडल्याबद्दल दिग्दर्शिका व एक्शन दिग्दर्शकाचेही आभार !!

काही ठिकाणी जराशी गती मंदावली असली, शेवट झाल्यानंतरही शेवट चालू ठेवला असला, तरी 'तलाश' नक्कीच ह्या वर्षातील उत्कृष्ट सिनेमांपैकी एक आहेच.

(अवांतर : "जब तक हैं जान" पाहिल्यापासून जर कुणाला बॉलीवूड-अपचनाचा त्रास सुरू झाला असेल, तर 'तलाश'ची एक गोळी हा रामबाण उपाय ! - इति वैद्य रणजित पराडकर !)

रेटिंग - * * * 

Thursday, November 29, 2012

'Jaan at ransom' - Jab Tak Hain Jaan Movie Review

The Marathi review of JTHJ got very huge response and some of my friends insisted that I should try & write in English/ Hindi. Well, I have tried translating my own review into English to start with. Here it goes..

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *


Nothing wrong in considering yourself wise and sometimes even considering other person a fool is also acceptable, but when one starts considering himself an outright wise & ever every other person a fool, then what gets created is Jab Tak Hain Jaan with the so called King Khan SRK in the lead role of a filthy-beard army Major; who & who's team don’t even care to have a Army Hair Cut, they have one task agenda of Bomb Diffusion and come what may they always manage to get a Bomb a Day for daily bread.

To match with such a creation, celebrated AR Rahman steps into the Sajid-Wajid shoes, legendary lyricist Gulzar's words - when understood - seem Sameer-type and Late Yash Chopra - one of the greatest filmmakers in the industry - in his last venture delivers a totally forgettable epic.

Film begins somewhere in a Market area of Leh, where the forces have detected an explosive. A member of the Bomb Squad is trying to diffuse it, but of course he is not going to succeed because the Hero has to enter the scene. In comes Major Samar Anand (Shahrukh Khan), who has thus far done it 97 times successfully! He comes and with an incomparable ease he plucks and cuts wires and disables the explosive and all the SRK worshipers elate! Whoa! That’s not the only greatness, he has done this time & again without a Protection Suit! (You are not supposed to ask how does army allows it Because You Are Fool.) The Major has a poetic habit of spending some time with self somewhere in a quiet place after every Bomb Diffusion. So he goes to a nearby Lake for a night out. In the morning there comes 'Akira' (Anushka Sharma). She doesn’t bother looking right or left and simply removes all her clothes except the very necessary and dives into the cold water for getting drowned and for the hero to save her. He, after she regains consciousness, gives his jacket to her with his private diary - containing his life story - neatly placed in it for her perusal.
Cut. Flashback begins.........

Samar Anand is a poor Young (?) man in London, who sings on the roadside with a guitar, Delivers Fish on a hand-kart and works as a Hotel Waiter in the remaining time. He meets Meer Thapar (Katrina Kaif) - the only child of a Millionaire Indian Businessman (Anupam Kher). She is already engaged, but Samar & Meera fall in love. To control each other & the self, these two Hindus go to a Church and take a 'Keep safe Distance' type oath. (Why in Church? You can't ask. Because You Are Fool.)

But then, as they say "Ishq Roke Rukta Nahin", the twosome do come close to each other, do what SRK never did on screen (Physical Romance - Imran Hashmi type) and then Samar meets with an accident. He comes back from the jaws of death. Here, Meera realises that this is the punishment Jesus Christ gave her for breaching the oath. So, for Samar to live a safe & long life, Meera breaks the relationship & tells Samar to leave London! (LoL!!) In 22nd century, understanding Meera's view-point is the limit of your foolishness, but still you relate with it Because You Are actually Fool!

Now then, accepting Meera's silly superstition as the challenge posted by the almighty, Samar takes a stupidest oath as 'Roz maut se khelunga.. yaa to tumhe muze maarnaa hogaa yaa uske (Meeraa ke) vishvaas ko haraanaa hogaa..!' and leaves for India to join Indian army at the age of 28. Indian Army has already laid a Red Carpet for him so he very easily manages to get in, becomes a Major and the head of Bomb Squad too! (Nonsense! How is this possible? - Don’t ask. B. Y. A. F.)

Hello! This is all happening in Flashback! Did you forget 'Akira' is reading Samar's Diary? Well, that's precisely what happens with the Director too! He gets lost in the Flashback till the Diary ends. Let it be!

Projector of the diary, Akira, works in Discovery Channel as a junior someone. She has a dream of shooting a documentary on Army, Bombs, Wars, etc. She gets clearance for it and straightaway joins the bomb squad with a camera and inner-wares. With a Professional video shooting camera, which has don’t know what power Optical Zoom (I am an camera illiterate.), when she captures Samar's Bomb Diffusion activity from a One Foot Distance; you start relating with her feeling that she is also a Fool. No matter, how stupid you are, you already know that this Tom-Boyish Akira is going to fall for the Major, she does. But that’s not all. She films the Documentary on Samar himself - "A man who cannot die!' Discovery Channel people love it, they cry ! And order Akira to bring Samar to the London H.O. Breaking the promise given to Meera 10 years back, Samar comes to London; again meets with an accident and the 10 years of his life get wiped off. His life is rewinded to 10 year back era ! (This is perfectly possible. B. Y. A. F.) To bring him back in 2012, his doctor, Akira, Meera and his London Based Lahori friend decide to fool around him. (instead of you this time, for a change) After a lot of Melodrama & Shahrukh-ism, your 'Jaan' is spared and the film ends ! hushh !!

Nobody thinks that the Documentary shot on Samar can be shown to him to bring him back, but you have to accept & understand B. Y. A. F.



Unfortunate to say that Late Yash Chopra has given his worst in his last.
Aditya Chopra's Story-Screenplay, he must have written in school days.
Gulzar Saab & Rahman are advised to immediately disown all their JTHJ creations.
IT would be great for his own worshipers, if SRK overcomes his narcissism.
Expecting Katrina to act is in vein.
Anushka Sharma shows spark.
Cinematography is eye-pleasing.

After watching Ra-One, if you were under the impression that there cannot be a worse SRK-Film, then you were fouled.. Why not ? Because.................
B. Y. A. F. !!

Rating - *

- Ranjeet Paradkar

Wednesday, November 28, 2012

मनातल्या मनातच ?


मी बघतो ते स्वप्न आहे..
आणि जगतो ते सत्य आहे
हे कसं ठरवावं?
जे डोळे मिटल्यावरही माझ्यापासून वेगळं होत नाही..
त्याला असत्य कसं समजावं?
खरं असो.. खोटं असो..
मला आवडतंय
सत्य असो.. स्वप्न असो..
मला हसवतंय..

पण एकच विचार येतो -
दिवसभर श्वास-श्वासातून दरवळणाऱ्या..
रात्री निवांत मिटलेल्या पापण्यांवर अलगद पहुडणाऱ्या..
आणि सकाळी अंगणातल्या प्राजक्ताच्या सड्याप्रमाणे  
मनभर पसरणाऱ्या..
माझ्याच गुलाबी स्वप्नांच्याही नकळत..
मी तर रोजच म्हणत असतो..
कधी तूही म्हण की -
'गुड नाईट, स्वीट ड्रीम्स!!'

(की मला ऐकू येणारा आवाज माझा नसतो,
तुझाच असतो
आणि मी फक्त मनातल्या मनातच बोलत असतो..?)

....रसप....
१२ नोव्हेंबर २०१२
गुड नाईट, स्वीट ड्रीम्स !!   

Monday, November 26, 2012

तुलना

जगणे म्हणजे रोजरोजच्या पराभवाची तुलना
माझ्याशी मी करून हरतो रोज स्वत:ची तुलना

जागृत आहे कुणी तर कुणी नवसाचाही आहे
पिढ्या-पिढ्या देवासोबत चाले देवाची तुलना

तू असल्याची खात्री पटते डोळे मिटल्यानंतर
परिस्थितीशी नकळत होते मग स्वप्नाची तुलना

हात पकड, चल तुझ्या मंदिरी आज तुला मी नेतो
होउन जाऊ दे देवासोबत भक्ताची तुलना

ह्या येणाऱ्या क्षणात आहे बरेच जगण्यासाठी
वाया जाइल क्षण करण्याने आज-उद्याची तुलना

....रसप...
५ नोव्हेंबर २०१२

Saturday, November 24, 2012

अज्ञात प्रतीक्षा


'मराठी कविता समूहा'च्या 'कविता-विश्व दिवाळी विशेषांक २०१२' मध्य प्रकाशित कविता -

मी रात्र तुझ्या स्वप्नांची
पसरून रोज ठेवतो
आशेचा दीप सकाळी
डोळ्यांत मंद तेवतो

रात्रीच्या चांदणवेळा
दवबिंदू होउन हसती
पानाच्या राजस वर्खी
मग कथा तुझ्या सांगती

हसतात वेदना माझ्या
हसऱ्या चर्येच्या मागे
जुळतात पुन्हा तुटलेले,
विरलेले रेशिमधागे

प्राजक्त तुझा आवडता
अंगणी सडा सांडतो
निशिगंधाचा दरवळ मग
श्वासांत तुला रंगवतो

हळुवार पावले टाकत
रखरखती दुपार येते
अन रुक्ष वर्तमानाची
जाणीव मनाला देते

डोळ्यांचे तांबुस होणे
नाजुक संध्येला कळते
अस्पष्ट विराणी माझ्या
अस्वस्थ घराला छळते

विरघळणाऱ्या क्षितिजाला
पंखांनी झाकुन घेते
अन पुन्हा रात्र काळोखी
स्वप्नांच्या गावी नेते

ती रात्र तुझ्या स्वप्नांची
मी रोज मला पांघरतो
अज्ञात प्रतीक्षेसाठी
थकलेले मन सावरतो


....रसप....
६ नोव्हेंबर २०१२

Wednesday, November 21, 2012

आता वाली कोण?


रक्त मराठी जपणा-याला आता वाली कोण?
"मी मुंबैकर" आवाजाला आता वाली कोण?

एका झेंड्याखाली जमता लाखोंचा समुदाय
थरथरणा-या व्यासपिठाला आता वाली कोण?

कुठल्या अंगुलिनिर्देशाची समजुन घ्यावी दिशा?
गोंधळलेल्या सैन्यदलाला आता वाली कोण?

कोल्हे, बिबटे आणि लांडगे अवतीभवती इथे
वाघानंतरच्या रानाला आता वाली कोण?

आता त्यांचे सिंहासन ते असेच राहिल रिते
माळेमधल्या रुद्राक्षाला आता वाली कोण?

....रसप....
२० नोव्हेंबर २०१२

Wednesday, November 14, 2012

ताण.. जब तक हैं जान ! (Jab Tak Hain Jaan - Movie Review)


मी शहाणा आहे, असं समजण्यात काही वावगं नाही. समोरचा मूर्ख आहे, असंही कधी कधी समजण्यात काही गैर नाही. पण मी(च) शहाणा(च) आहे आणि समोरचे सगळे(च) मूर्ख(च) आहेत, असा समज करून घेऊन जेव्हा एखादी निर्मिती केली जाते, तेव्हा तिला 'जब तक हैं जान' असं नाव दिलं जातं आणि तिच्या केंद्रस्थानी शाहरुख खान येतो.. तो दाढीचे ओंगळवाणे खुंट वाढवून फिरणारा आर्मी मेजर असतो.. तो आणि त्याचे सहकारी सैनिक, सैनिकाची पहिली ओळख - त्याची केशरचना - सुद्धा पाळत नसतात.. ह्या टीमचं काम फक्त बॉम्ब डिफ्युज करणं असतं आणि रोज त्यांना एक तरी बॉम्ब उदरनिर्वाहाकरता मिळतच असतो.. वगैरे, वगैरे..
मग अश्या निर्मितीसाठी काम करता करता ए. आर. रहमानसुद्धा साजिद-वाजीद भासतो, गुलजारचे शब्द एक तर कळतच नाहीत अन कळले तर ते समीर-छाप वाटतात आणि हिंदी सिनेजगताला वेगवेगळ्या उंचीवर नेणारे यश चोप्रांसारखे दिग्गज दिग्दर्शक स्वत:च्या शेवटच्या चित्रपटात सपशेल जमिनीवर आपटतात.

सिनेमाची सुरुवात होते 'लेह'च्या एका मार्केटमध्ये. तिथे एक 'बॉम्ब' सापडला असतो. एक जण त्याला निकामी करण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते त्याला जमणार नसतंच. कारण हिरोची एन्ट्री करवायची असते. इन कम्स मेजर 'समर आनंद' (शाहरुख), त्याने आजपर्यंत ९७ बॉम्ब्स निकामी केले असतात. तो येतो आणि भाजी निवडल्यासारखा तारा वेचून, तोडून, उपटून बॉम्ब निकामी करतो आणि समस्त शाहरुख भक्त बोंब मारतात! हा राउडी मेजर बॉम्ब प्रोटेक्शन सूट न घालता ह्या करामती करत असतो, हे विशेष. (आर्मीवाले असं कसं काय करू देतात ? - असे प्रश्न विचारायचे नाहीत. कारण आपण मूर्ख आहोत.) तर बॉम्ब निकामी केल्यावर तो नेहमी कुठल्याश्या शांत जागी जाऊन बसत असतो. तसा तो एका तळ्याकाठी बसलेला असताना तिथे येते 'अकीरा' (अनुष्का शर्मा). ती सगळे कपडे काढते, थंडगार पाण्यात उडी मारते आणि बुडते. अर्थातच हिरो तिला वाचवतो आणि स्वत:चं जाकीट तिला देतो. त्या जाकीटात त्याच्या आयुष्याची कहाणी सांगणारी डायरी असते.
कट. फ्लॅशबॅक सुरू..
समर आनंद लंडनमध्ये रस्त्यावर गाणी गाऊन पैसे कमावणारा, हातगाड्या ढकलून माल पोचवणारा, हॉटेलात वेटरचे काम करणारा एक दरिद्री तरूण(??) असतो. तिथे त्याची ओळख एका गडगंज श्रीमंत बापाच्या (अनुपम खेर) एकुलत्या एक मुलीशी - मीरा थापर (कतरिना) - होते. तिचं लग्न ठरलेलं असतं. पण ती व तो प्रेमात पडतात. स्वत:वर बंधन लादून घेण्यासाठी हे दोघं हिंदू, मंदिरात न जाता चर्चमध्ये जाऊन एकमेकांपासून 'सुरक्षित अंतर ठेवा'वाली शप्पथ घेतात. (चर्चमध्ये का? असे प्रश्न विचारायचे नाहीत. कारण आपण मूर्ख आहोत.)
लेकीन इश्क़ रोके रूकता नहीं! ते जवळ येतात.. झोंबाझोंबी करतात.. आणि मग समरचा अपघात होतो. तो मृत्यूच्या जबड्यातून परत येतो. इथे मीराला समजून येतं की तिने तिची येशूसमोर घेतलेली शप्पथ तोडल्याची ही शिक्षा आहे. म्हणून ती समर जिवंत राहावा म्हणून नातं तोडते आणि त्याला लंडन सोडून जायला सांगते. (लॉल!!) २२ व्या शतकात हे समजून घेणे म्हणजे आपल्या मूर्खपणाचा कळस असतो. तरी आपण समजून घेतो कारण आपण खरोखरच मूर्ख आहोत.
बास्स... मीराच्या अंधश्रद्धेला देवाचा चॅलेंज समजून 'रोज मौत से खेलूंगा.. या तो तुम्हे मुझे मारना होगा या उसके (मीरा के) विश्वास को हराना होगा..' असली पोरकटशिरोमणी शप्पथ घेऊन समर वयाच्या २८ व्या वर्षी भारतात परततो. इथे भारतीय सैन्य दलाने त्याच्यासाठी रेड कार्पेटच अंथरलेलं असतं. त्यामुळे तो थेट सैन्यात दाखलही होतो.... मेजरही बनतो आणि 'बॉम्ब स्क्वाड'चा प्रमुखही! (कैच्याकै ! असं कसं शक्य आहे ? - असे प्रश्न विचारायचे नाहीत. का. आ. मू. आ.)
हे सगळं फ्लॅशबॅकमध्ये चालू आहे... विसरलात ना की 'अकीरा' त्याची डायरी वाचतेय ? असंच दिग्दर्शकाचंही होतं. डायरी संपेपर्यंत त्याला आठवतच नाही की हा फ्लॅशबॅक आहे. असो.

अशी सगळी कहाणी वाचणारी अकीरा डिस्कव्हरी वाहिनीत किरकोळ नोकरीला असते. तिचं एक स्वप्न असतं की एक आर्मी, युद्ध, बॉम्ब्स इ. वर डॉक्युमेंटरी बनवायची. ती त्यासाठी मान्यता मिळवते आणि थेट 'बॉम्ब स्क्वाड' सोबत कॅमेरा घेऊन दाखल ! प्रोफेशनल व्हिडिओ कॅमेरा असतानाही ती एका फुटावरून बॉम्ब निकामी करणाऱ्या समरला चित्रित वगैरे करते, तेव्हा मात्र तीसुद्धा आपल्यासारखीच मूर्ख आहे का? अशी शंका येते. आपण कितीही बिनडोक असलो तरी आपल्याला आधीच कळलेलं की आता ही बया ह्या गालावर निवडुंग आणि डोक्यावर खुरटी झुडपं घेऊन फिरणाऱ्या मेजरच्या प्रेमात डुबकी मारणार आहे, मारतेच. पण तमाशा इथे संपत नाही. अकीरा समरवरच डॉक्युमेंटरी बनवते - 'A man who can not die! ती डिस्कव्हरीवाल्यांना आवडते.. ते रडतात ! आणि ते समरला लंडनला घेऊन ये, असं तिला सांगतात. १० वर्षांपूर्वी मीराला वचन दिलेलं असतानाही, ते तोडून समर अकीरासाठी परत लंडनला येतो. पुन्हा त्याचा अपघात होतो आणि तो ही मधली १० वर्षं पूर्णपणे विसरून आयुष्यात रिवाइंड होतो. (हे शक्य आहे, का. आ. मू. आ.) मग त्याला 'नॉर्मल' करण्यासाठी त्याची डॉक्टर, अकीरा, मीरा आणि त्याचा लंडनमधला एक लाहोरी मित्र असे सगळे मिळून नाटक करतात. भरपूर मेलोड्रामा आणि शाहरुखगिरी झाल्यावर शेवटी 'जान छुट'ते आणि सिनेमा संपतो.

त्याची स्मृती परत आणण्यासाठी त्याच्यावर बनवलेली डॉक्युमेंटरी त्याला दाखवावी, इतकी साधी गोष्ट कुणाच्याही डोक्यात येत नाही, पण ते आपण समजून घ्यायचं. का. आ. मू. आ.    



वाईट वाटतं पण बोलायला लागतंय की, यश चोप्रांनी त्यांचं सगळ्यात फालतू काम सगळ्यात शेवटच्या सिनेमात केलं आहे.
आदित्य चोप्राची पटकथा व कथा, त्याने शाळेत लिहिली असावी.
गुलजार साहेब आणि रहमानने ह्या सिनेमातील सर्वच्या सर्व गाणी ताबडतोब 'हक्कसोड पत्रा'वर सही करून विमुक्त करावीत.
शाहरुख खान जितक्या लौकर स्वत:च्या प्रेमातून बाहेर पडेल तितकं त्याच्या भक्तांचं भलं होईल.
कतरिनाकडून अभिनयाची अपेक्षा करणे फोलच.
अनुष्का शर्मा लक्षात राहाते.
छायाचित्रण नेत्रसुखद आहे.

रा-वन पाहिल्यानंतर जर आपल्याला असं वाटलं असेल की ह्याहून वाईट शाहरुखपट असणार नाही, तर आपलं चुकलंच.. कारण..........?
का. आ. मू. आ. !!

रेटिंग - *  

Monday, November 12, 2012

फाईलींमधले क्षणकागद..


केव्हढा हा पसारा तू मागे सोडून गेलीस !
व्यवस्थित लावलेले कप्पे विस्कटून गेलीस..

तुझ्या जन्मापासून तुझ्या लग्नापर्यंत
एकेक क्षण
नंबरिंग केलेल्या वेगवेगळ्या फायलींमध्ये
जपून ठेवला होता...
आणि अनेक वेळा तुम्हां सगळ्यांच्या नकळत
गुपचूप, एकांतात तो प्रत्येक क्षण
पुन्हा पुन्हा पाहिला होता..
पण आज तुझ्या हुंदक्याच्या आवेगाने
अख्खं कपाटच पाडलं...
आणि घरभर पसरलेत क्षणकागद..

लहानपणी तू लपून बसायचीस..
पलंगाखाली, टेबलाखाली... अंगणात
तर कधी शेजारच्या आजोबांकडेही !
मी तुला शोधत राहायचो..
दिसलीस तरी शोधायचो...
तसेच आज हे क्षणकागद शोधतोय.. वेचतोय..

तुझ्या आईला कळायच्या आत
सारं काही परत फाईलून ठेवतो..
आता आधीसारखं नीटनेटकं, पद्धतशीर नाही जमणार
पण जसं जमेल तसं करावंच लागणार..
उगाच तुझ्या आईला त्रास नको !

....रसप....
११ नोव्हेंबर २०१२

Saturday, November 10, 2012

उत्साह.. (गुड नाईट, स्वीट ड्रीम्स !!)


कोपऱ्या-कोपऱ्याला हळूहळू व्यापत.. रंगवत..
सारी धरणी मुठीत घेणारं काळंकुट्ट आभाळ
पहाटेच्या चाहुलीसरशी
दहीवराच्या प्रत्येक थेंबात भरून येतं..
आणि पानापानावर डवरतं
माझ्या डोळ्यातलं समाधान
तू नसतानाची अजून एक रात्र सरून गेल्याचं !

अर्धवट उजळलेल्या आकाशाच्या एका कोपऱ्यात
विरघळत जाणारा झोपाळलेला चंद्र
मला साखरझोपेतल्या जगाच्या नकळत
एक मिश्कील पोचपावती देतो...
काल संध्याकाळी तुला माझ्या वतीने
'गुड नाईट, स्वीट ड्रीम्स'
म्हटल्याची.. !
अन अचानक
अजून एका रात्रीची दिवसभर वाट पाहायचा उत्साह येतो..
विझलेल्या नजरेत..!

....रसप....
१० नोव्हेंबर २०१२

गुड नाईट, स्वीट ड्रीम्स !!   

Friday, November 09, 2012

स्वप्नं.. (उधारीचं हसू आणून....भाग - २)


उसळणाऱ्या लाटांनी
किनारा भिजतो
अन उधाणलेल्या वाऱ्याने
क्षणार्धात सुकतो

मीही चार इंचाच्या पेल्यात
स्वप्नं भिजवून घेतो
आणि सगळ्यांच्या नकळत
पापण्यांना देतो !

स्वप्नं असतात -
कधी तिची
कधी माझी
कधी जे जमलं नाही त्याची
कधी जे उरलं नाही त्याची
कधी हातून निसटलेली
कधी गुपचूप हरवलेली
कधी इतस्तत: विखुरलेली
कधी मुद्दामच उधळलेली

पण सकाळ होते..
आणि मिटलेल्या पापणीतल्या अंधाराला
उजेड देते, वास्तव दाखवते
नकली प्रसन्नतेच्या रखरखीत वाऱ्याने
परत पापणी सुकते

रुजवायला भिजवलेली स्वप्नं
डोळ्यात उरतात रुतून
मी नव्या दिवसाचं स्वागत करतो
उधारीचं हसू आणून....

....रसप....
२९ मार्च २०१२

उधारीचं हसू आणून.... (भाग - २)


Wednesday, November 07, 2012

आज परत एकदा प्रेमात पडावं म्हणतो..! (उधारीचं हसू आणून.... भाग - २)


आज परत एकदा प्रेमात पडावं म्हणतो..!

दु:खाची नशा आणि वेदनेची झिंग
उतरत चालली आहे
जगण्यातली गंमत आणि जळण्यातली मजा
ओसरत चालली आहे

परत एकदा नख लावायचंय
काळजातल्या हळव्या पडद्याला
अन अनुभवायचाय तोच एक शहारा..
पापणीवर तरळून आभाळ हेलावणारा

परत एकदा मनाच्या दगडाला पाझर फुटेल
अन डोळ्यांच्या विहिरी भरतील
हळव्या हवेच्या झुळुकीने
वाळलेली पानं उडतील..

परत एकदा घ्यायचीय
काटेरी उबदार शाल ओढून
अन फुटून ठिकऱ्या उडालेल्या स्वप्नांना
परत एकदा जोडायचंय
उधारीचं हसू आणून....

....रसप....
२२ मार्च २०१२

उधारीचं हसू आणून.... (भाग - २)


Tuesday, November 06, 2012

सहर अफसोस करती है..



प्रथमच उर्दूमिश्रित हिंदीत लिहिण्याचा प्रयत्न करत आहे.. सादर करताना भीती कमी, आनंद जास्त वाटत आहे! 

सहर अफसोस करती है, अंधेरा ढल गया क्यूं ?
मेरा प्यारासा पंछी इस बस़र से उड गया क्यूं ?

किसीको दर्द मैं अपना नहीं चाहूँ बताना
न वो समझें जफ़ा से मैं वफ़ाएं कर गया क्यूँ

बहोत आये गये वाइज़ मुझे वाक़िफ़ कराने
हकीक़त जान जो पाया, दिवाना बन गया क्यूँ ?

तुझे भी आजमानी थी मेरी इकरार-ए-चाहत
तो फिर खूँ देख के मेरा तेरा दिल थम गया क्यूँ ?

नज़र में बाँध के तूफाँ चला हूँ मैं हमेशा
समंदर आँख में मेरे कभी ना भर गया क्यूँ ?

कोई तो आसमाँ होगा नज़र आऊँ जिसे मैं
जहां जाऊं मेरे जानिब विराना बस गया क्यूँ ?

....रसप....
५ नोव्हेंबर २०१२

Friday, November 02, 2012

तरी हर एक अर्जावर लिही जाती-प्रजाती !


तुझ्या प्रत्येक स्वप्नाला दिली मी मूठमाती
रिकामे भाळ घेउन धाय मोकलतात राती

कुणासाठी कुणी मेले तरीही नाव नसते
पतंगाचे दिव्यावर प्रेम, जळती तेल-वाती !

स्वत:चे स्वप्न आवडते मला तुकड्यांत बघणे
म्हणुन आलो तिच्या लग्नात मी वेडा वराती !

कुणी मुलगा, कुणी दासी, कुणी तर प्रेयसीही
तुझ्या सगळ्याच भक्तांची तुझ्याशी भिन्न नाती !

नको तू भेदभावाला 'जितू' मानूस कुठल्या
तरी हर एक अर्जावर लिही जाती-प्रजाती !


....रसप....
१ नोव्हेंबर २०१२

Thursday, November 01, 2012

त्याने विचारलं.. (उधारीचं हसू आणून.... भाग - २)


त्याने विचारलं, "रडत का नाहीस?"
मी म्हटलं, "माहित नाही."
त्याने विचारलं, "चिडत का नाहीस?"
मी म्हटलं, "माहित नाही"
त्याने विचारलं, "का झालास उद्ध्वस्त?"
मी म्हटलं, "माहित नाही!"
त्याने विचारलं, "कसा रे तू इतका आश्वस्त?"
मी म्हटलं..... "माहित नाही!!"
तो कंटाळला.. म्हणाला, "माहित तरी काय आहे?"
मी म्हटलं.. "माहित नाही!"

अखेरीस तो गप्प झाला..
मी छद्मी हसलो.. अन् बोललो,
"अरे नशिबा.. तू तर जन्मजात रडका आहेस..
पिढीजात चिडका आहेस..
म्हणूनच फुटका आहेस!!
पण मी तसा नाही....

तू खरडलंस काही-बाही माझ्या कपाळावर
अगदी दात-ओठ खाऊन..
अन् मी त्याचाही स्वीकार केला..
उधारीचं हसू आणून.....

....रसप....
२२ मार्च २०१२

उधारीचं हसू आणून.... (भाग - २)


Wednesday, October 31, 2012

'साहिर'


उघड्या छातीवर वेदनेच्या झळांना
मुद्दाम, जाणीवपूर्वक झेलून
मी हृदयाला पोळले
आणि स्वत:च चालवल्या त्यावर कट्यारी
उभ्या, आडव्या, तिरक्या.... आरपारही
थबथबलेल्या हृदयातून ओघळणाऱ्या
प्रत्येक थेंबाला
कागदावर पसरवलं
आणि माझ्या उधार वेदनेचं
कृत्रिम भावविश्व मोठ्या आर्ततेने चितारलं
लालेलाल शब्दांनी
पानभर चितारूनही समाधान झालं नाही..
बोळा करून अजून एक पान कोपऱ्यात जमलेल्या ढिगाऱ्यात भिरकावलं..
वहीचं शेवटचं पान उरलं होतं..
माझ्याच नकळत, माझ्याच हातांनी लिहिलं -
'साहिर' !
त्या वेळी डोळ्यांना झालेली जखम खरी होती..
आता रक्ताला डोळ्यांतून टिपून..
कागदावर वेदनेला सजवायचं ठरवलं आहे..
'साम्यवादाने' !!

....रसप....
३१ ऑक्टोबर २०१२  

Tuesday, October 30, 2012

वळणावळणावर दिसणाऱ्या तुझ्या खुणांचे काय करू?


वळणावळणावर दिसणाऱ्या तुझ्या खुणांचे काय करू?
सरूनही पायी घुटमळणाऱ्या रस्त्यांचे काय करू ?
 
दुरून माझ्या प्रश्नाचे उत्तर डोळ्यांनी तुझ्या दिले
आज तुझ्या स्पर्शाने पडलेल्या प्रश्नांचे काय करू ?

एक गुन्हा केला प्रेमाचा, दुसरा हा की सांगितले
तुला भेटलो पुन्हा पुन्हा त्या अपराधांचे काय करू ?

तुझ्या सोबतीने सुचलेल्या कवितांना विसरुन झाले
विरहाच्या दु:खातुन फुलणाऱ्या गझलांचे काय करू ?

स्वप्नामधले अनेक क्षण अवतरले होते खरेखुरे
अजून डोळ्यावर फिरणाऱ्या मोरपिसांचे काय करू ?

खळकन तुटता पापणीमधे पाण्यासोबत स्वप्न झरे
काळजात रुतलेल्या खुपणाऱ्या काचांचे काय करू ?

आजकाल मी महत्प्रयासाने नजरेला आवरतो
मनामधे दाटुन येणाऱ्या उचंबळांचे काय करू ?  

असे एकटे जगणेसुद्धा अशक्य नाही, कठिण जरी
गजबजलेल्या घरात माझ्या, एकांतांचे काय करू ?

....रसप....
२९ ऑक्टोबर २०१२  

Monday, October 22, 2012

अस्मादिक


स्वत:च दु:खाला कुरवाळत जपले आजपर्यंत जरी
दुसऱ्याच्या रडण्याला क्षुल्लक मानत असतो खुद्द तरी
"मित्रा, भरून आलेल्या थेंबाला गिळून हसणे शिक"
असले फुक्कट सल्ले देण्याला अग्रेसर अस्मादिक !

कुठे दूरवर झोपडीतला कंदिल निवांत मिणमिणतो
माळावरच्या घुबडाच्या सोबत रात्रीला जागवतो
मोजत असते घड्याळ त्याची एकटेच टिकटिक टिकटिक
कधी उशीवर वा खिडकीशी हिशेब करती अस्मादिक !

फक्त उद्याच्या काळजीमुळे 'आज' कितीसे कुरतडले
तरी 'उद्या' ना अजून आला रोज नव्याने खुणावले
ठेच लागल्यावरही ना बदले एखादा चिवट पथिक
दूरदृष्टिचा आव आणती खरे आंधळे अस्मादिक  

बरेच असते मनात पण ना कृतीत काही अवतरते
रोजच इमले उंच नवनवे चंचल मन बांधू बघते
शब्द बांधणे शब्द सांडणे होत न काही उणे-अधिक
उगाच गुरगुरती, चरफडती अन घुसमटती अस्मादिक

ओढुन ताणुन गोल लपेटुन बांधुन आवळती नाती
अन डोक्यावर ओझे घेउन प्रेमाचे गाणे गाती
कुंडीमध्ये हसतो चाफा अंगण पडले ओस पडिक
हवे तेव्हढे सारवणारे, सावरणारे अस्मादिक !

'आपल्याच विश्वी रमलेले अप्पलपोटे' म्हणे कुणी
मुखदुर्बळ, निश्चल, निष्प्रभ संभावुन किंमत करे कुणी
जबाबदाऱ्यांना वागवता उडते जी त्रेधा तिरपिट
मुकाट कसरत जीवनभर ती करत राहती अस्मादिक..!


....रसप....
२१ ऑक्टोबर २०१२

Saturday, October 20, 2012

Blunder of the year ! (Student of the Year - Movie Review)


'हसत खेळत शिक्षण' ही संकल्पना मी तरी अनुभवली नाही आणि मला नाही वाटत माझ्या पिढीच्या इतर कुणीही अनुभवली असावी किंवा आजची पिढी अनुभवत असावी. पण करण जोहरने मात्र ती अनुभवली आहे, हे नक्की. तो शिकला आहे हे त्याला इंग्रजी छान येतं ह्यावरून कळतं आणि तो हसत खेळत(च) शिकला आहे हे त्याचा 'स्ट्यूडन्ट ऑफ द इयर' पाहून कळावं. (तसं तर ते 'कुछ कुछ होता हैं' मध्येच दिसलं होतं पण तेव्हा तो लहानही होता!)
असो.

सिनेमा पाहाण्याआधी (किंवा हे परीक्षणही वाचण्याआधी) मला सांगा -
"तुम्ही कुछ कुछ होता है, जो जीता वोही सिकंदर,दिल तो पागल हैं, मोहब्बतें, मैं हूं ना,कल हो ना हो, जाने तू या जाने ना हे सिनेमे पाहिले आहेत का ?"
हो? मग 'स्ट्यूडन्ट ऑफ द इयर' मध्ये आणि ह्या परीक्षणातही तुम्हाला नवीन काही मिळणार नाहीये! सेव्ह युअर मनी. सेव्ह युअर टाईम.

सुरुवात होते अत्यंत बंडल, घरी बनविल्यासारख्या अक्षरातील टायटलल्सनी.
मग सिनेमा सुरू होतो. फर्स्ट टेक - 'जाने तू या जाने ना..' चौघे मित्र मिळून कथाकथन करत आहेत.
पुढे सुरु होतो 'मोहब्बतें'. मस्तपैकी कॉलेज.. (त्याला 'स्कूल' म्हणायचं असतं) इतकं जबरदस्त की, मी त्या कॉलेजात गेलो असतो तर आयुष्यभर पास झालोच नसतो.
मग थोडासा - मैं हूं ना.. थोडा 'दिल तो पागल हैं'..थोडा 'कल हो ना हो..' भरपूर 'कुछ कुछ होता है' आणि ''जो जीता वोही सिकंदर' असा सगळा ढापूगिरीचा प्रवास करत 'कभी अलविदा ना कहना..' चा शेवट कसा 'अंत' पाहातो, तसा अंत पाहून सिनेमा संपतो.
कीर्तनाची नांदी आणि शेवटचा गजर कसा जेव्हढ्यास तेव्हढा असायला हवा ना..? जास्त लांबवूनही किंवा अगदी चटकन उरकूनही चालणारं नसतं. तसंच सिनेमाचंही असावं. पण हे करणला कसं कळणार ? तो प्रॉम्स, डिस्कोज इ. ला गेला आहे, कीर्तन? जीजस क्राईस्ट.. व्हॉट इज इट लाईक?

तुम्ही अजून वाचताय ? स्टोरी ऐकायचीच आहे? ओके!



एक लै भारी, 'आटपाट' कॉलेज (त्याला 'स्कूल म्हणायचं - हे एकदा सांगूनही समजत नाहीये माझं मलाच!) असतं. (इतकं लै भारी असतं की प्रत्येक मुला/ मुलीच्या बाकावर स्वतंत्र असा टेबल लॅम्प, सेव्हन स्टार हॉटेलचा डायनिंग हॉल फिका पडेल असं कॅन्टीन, दिल्लीचा लाल किल्ला + उदयपूरचा एखादा राजवाडा + मुंबईची नॅशनल लायब्ररी + ताज महाल हॉटेल + आजपर्यंत पाहिलेली सगळी कॉलेजं X ४-५ अशी एकंदरीत इमारत) इथे असतो एक श्रीमंत बापाचा पोरगा रोहन (वरुण धवन) आणि त्याची श्रीमंत गर्लफ्रेंड शनया (आलीया भट्ट). हे दोघं मजेत राज्य करत असतात आणि मग येतो एक मध्यमवर्गीय घरातला अभिमन्यू सिंघ (सिद्धार्थ मल्होत्रा). पुढे जे काही होतं ते आजपर्यंत 'क्ष' वेळा झालेलं आहे. ते तसंच होतं आणि जाम पकवतं.

सिनेमा बघताना/ बघितल्यावर तुम्हाला असे काही प्रश्न पडले तर तुमची सारासारविचारशक्ती शाबूत आहे -
१. हे नक्की कुठल्या अभ्यासक्रमाचं कॉलेज आहे? (स्कूल!!) कारण, रोहन-शनया व कं. तिथे आधीपासून Established आहेत आणि अभिमन्यू नंतर येतो पण सगळे एकत्रच!
२. त्यांना एकदाही काहीही शिकवलं जात नाही! फक्त खेळत असतात नाही तर नाचत असतात नाही तर भांडत असतात.. नक्की शैक्षणिक संस्थाच आहे ना?
३. आई बाप नसलेला, काकांकडे उपऱ्यासारखा राहणारा अभिमन्यू असल्या टकाटक कॉलेजची (स्कूल!!) जिथे करोडपती बापांची पोरंही शिकत(?) आहेत, फी कशी जमवतो?
४. नक्की 'स्ट्यूडन्ट ऑफ द इयर' निवडायचा असतो की ' स्पोर्ट्समन ऑफ द इयर'?

नवीन चेहरे वरुण (डेव्हिडचा पोट्टा), आलिया (महेशरावांची कार्टी) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (सेंट परसेंट 'मॉडेल') दिसायला फ्रेश दिसतात. वरुण धवन लक्षात राहातो. 'आलिया' म्हणजे.. 'आलिया भोगासी..' म्हणून सहन करावी लागते. सिद्धार्थ मल्होत्रा एका क्षणासाठीही कुमारवयीन वाटत नाही आणि एखादा मॉडेल जितपत अभिनय करू शकतो, तितपतच करतो.
छोट्याश्या भूमिकेतील 'कायोझ इराणी' (सिनेमात 'कायोझ सोडावॉटरबॉटलओपनरवाला' उर्फ 'सुडो') छाप सोडतो. त्याला अखेरीस एका दृश्यात बराच वाव मिळाला आहे. त्या एका दृश्यात तो सिनेमा खाऊन टाकतो. (शेवटी 'बोमन'चा पोरगा आहे!)  
करण जोहरच्या सिनेमाची पटकथा इतकी ठिगळं जोडलेली पहिल्या प्रथमच !
संगीत, २-३ पंजाबी गाणी काहीही समजत नाहीत, ती बहुतेक स्वानंदासाठी बनवली असावीत. राधा, रट्टा मार ही गाणी बरी जमली आहेत. (म्हणजे विशाल-शेखर अजून 'रीकव्हरेबल' आहेत.)
ऋषी कपूर, रोनित रॉय, राम कपूर व इतर मंडळी आपापलं काम चोख करतात.

खुसखुशीत संवाद काही ठिकाणी चांगली विनोदनिर्मिती व काही ठिकाणी चांगले 'ठोसे' (Punches) देतात.

एकूण विचार केल्यास हा 'स्ट्यूडन्ट ऑफ द इयर' म्हणजे करण जोहरचं 'ब्लंडर ऑफ द इयर' आहे.

रेटिंग - **

Saturday, October 13, 2012

Bhoot Returns for nothing ! (Bhoot Returns - Movie Review)


कधी 'फ्लश' खेळला आहात? जुगार... तीन पत्ती..! ह्या तीन पत्तीमध्ये अफलातून पानं (ट्रायो/ कलर सिक्वेन्स इ.) क्वचितच येतात. बहुतकरून जोड्या किंवा सपाट पानं येत असतात. चांगला खेळणारा असतो ना, तो ह्या जोड्यांच्या किंवा सपाट पानांच्या जोरावर 'ब्लफ' करतो आणि जिंकतोही! पण काही जण - जे एक तर कच्चे खेळाडू असतात किंवा 'मी लै भारी खेळतो' अश्या खोट्या आविर्भावात असतात - ह्या 'ब्लफिंग'मध्ये वाहवत जातात, हरतात आणि मग जेव्हा खरोखर चांगले पत्ते असतात, तेव्हा 'बाजी' लावायला एक तर काही उरलेलंच नसतं किंवा झालेलं नुकसान चांगल्या पत्त्यांच्या जोरावर भरून निघण्याच्या बाहेर असतं! भयपट म्हणजे पण असाच एक जुगार असावा. 'आता काही तरी होणार' असं भासवून काहीच न घडवणं.. हे 'ब्लफ' एका मर्यादेपर्यंत ठीक. पण हे 'ब्लफिंग' अति झालं, की जेव्हा खरोखरच काही 'होतं', तोपर्यंत हवा निघून जाते आणि मोठ्या आवेशात 'शो' करावा, तर बाजी फिक्कीच असते फार काही जिंकलेलं नसतंच, कुणी काही 'लावलेलं' नसतंच !! 'भूत रिटर्न्स' चा जुगार असाच फसला आहे.



एक असतो रामू. हुशार, सुस्वभावी आणि चुणचुणीत मुलगा. वर्गात अगदी पहिला नंबर नसला, तरी पहिल्या पाचात हमखास. शाळेच्या प्रत्येक वर्षी शिक्षकांचा आवडता विद्यार्थी असणारा रामू दहावीत येतो आणि काही तरी बिनसतं. तो सगळ्यांशी फटकून वागू लागतो. गृहपाठ अर्धवटच करू लागतो. शिक्षकांच्या प्रश्नांना असंबद्ध उत्तरं देऊ लागतो. वर्गात असताना लक्ष भलतीकडेच, शून्यात पाहात बसू लागतो.. कसाबसा पास होऊन रामू शाळेतून बाहेर पडतो. पण त्याला अचानक काय झालं होतं हे समजत नाही. काही जण म्हणतात, 'रामूला भुताची लागण झाली!'.
------------------------------------ ही सिनेमाची कहाणी नाही हो! ही आपल्या रामूची कहाणी आहे. रामू... आपला पूर्वीचा रामगोपाल वर्मा. त्यालाही अशीच भुताची लागण झाली आणि त्याचा 'रामसेगोपाल वर्मा' झालाय. म्हणून तर त्याने 'भू.रि.' बनवला!

सर्वपथम, ह्या सिनेमाला 'भू.रि.' म्हटल्यामुळे ह्याचा 'उर्मिला'वाल्या 'भूत'शी काही संबंध आहे, असं जर तुम्हाला वाटलं असेल.. तर तसं काहीही नाहीये ! हाच सर्वात पहिला 'ब्लफ' आहे रामूचा! सिनेमाची कहाणी मी अगदी थोडक्यात सांगतो कारण ती 'अगदी थोडकी'च आहे
एका 'शबू' नामक भूताने झपाटलेल्या घरात एक नवीन कुटुंब राहायला येते. तरुण अवस्थी (चक्रवर्ती), बायको नम्रता अवस्थी (मनीषा कोईराला), मोठा मुलगा 'तमन' आणि लहान मुलगी 'निमी'. सोबत एक नोकर 'लक्ष्मण' आणि ते राहायला आल्यानंतर अचानक सरप्राईज म्हणून आलेली 'तरुण'ची लहान बहिण 'प्रिया' (मधू शालिनी). 'शबू' लहानग्या निमीला पछाडते. पुढे काय घडतं ते सांगण्या-ऐकण्या-लिहिण्या व पाहण्याइतकं महत्वाचं नाहीच ! जे कुठल्याही भुताटकीच्या सिनेमांत होतं तेच आणि तस्संच..!

फक्त दीड तासाचा सिनेमाही रटाळ कसा बनवता येतो, हे अभ्यासण्यासाठी भू.रि. अवश्य पाहावा. नि:शब्दपणे, संथ गतीने कॅमेरा फिरून फिरून आपल्या घाबरण्यासाठीच्या इच्छेचा अंत पाहातो. जे काही घडतं, ते फक्त शेवटच्या १५-२० मिनिटात घडतं आणि ते 'भयावह' पेक्षा 'बीभत्स' प्रकारात मोडतं.

'भू. रि.' चा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्याची पात्रनिवड आहे. एकही पात्र भूमिकेशी न्याय करत नाही. 'चक्रवर्ती' नामक दगड तर निव्वळ असह्य. मनीषा का परत आली आहे, हे तिला किंवा रामूलाच ठाऊक. दोन्हीही मुलं नुसतीच वावरतात. काहीही 'स्पार्क' नाही. बहिणीच्या भूमिकेतील 'मधू शालिनी' तर फक्त उघड्या मांड्या दाखवण्याची सोय असावी.

संदीप चौटाचं आदळआपट करणारं पार्श्वसंगीत 'भो:' करण्याचा केविलवाणा अयशस्वी प्रयत्न पिक्चरभर करत राहतं.

एकंदरीत हा सिनेमा पाहिल्यावर माझी तरी खात्री पटली आहे की रामूला त्याचे जुने मित्र मणीरत्नम, शेखर कपूर ह्यांची सांगत आवश्यक झाली आहे. त्याच्या मानगुटीवर बसलेलं भुताटकीचं भूत त्याने लौकरात लौकर झटकायला हवं नाही तर 'फॅक्टरी' बुडणार हे निश्चित.

टू कन्क्ल्युड, इतकंच म्हणावंसं वाटतं - 'गेट वेल सून, रामू..!'

रेटिंग - १/२*  

Friday, October 12, 2012

विचारू चला !


घराची दिशा चालणारी कुठे वाट आहे जगाला विचारू चला
'मला ठाव नाही' म्हणाले कुणी तर 'विचारू कुणाला?' विचारू चला !

सुगंधी हवा वाहते, पैंजणांचा घुमे नाद वाऱ्यासवे मुग्धसा
'तुझा गंध चोरून गेली कुठे ती?' जुई-मोगऱ्याला विचारू चला

हवेसे-नकोसे, स्वत:चे-दुज्याचे असा भेद दु:खात नसतो कधी
'किती शब्द दु:खात झाले बिलोरी?' कुणा शायराला विचारू चला !

इथे रोजच्या दगदगीतून जगणे स्वत:च्या मनासारखे विसरलो
हसावे कसे अन रडावे कसे गोजिऱ्या बालकाला विचारू चला

कुठे देश आहे असा की जिथे कायदाही नसे, नांदते शांतता
'कुणी आखल्या सांग सीमा इथे?', माजल्या मानवाला विचारू चला !

'जितू'ने नभाएव्हढ्या वेदनेने भिजवला तुझ्या पायरीचा चिरा
'तुला जाग येते कधी अन कशी?' रंगल्या पत्थराला विचारू चला !

....रसप....
११ ऑक्टोबर २०१२

Wednesday, October 10, 2012

द्विधेत कर्तव्याच्या अन प्रेमाच्या


आकाशातुन झाला होता एक वेगळा तारा
पापणीस चुकवून वाहिला जेव्हा चुकार पारा..
आरपार हृदयाच्या गेली एक वेदना हळवी
कुणास ठाउक गदगद झाला कसा कोरडा वारा

ह्याच दिशेला दूरवर तिथे माझे घर थरथरते
छताकडे बघतो बाबा आई केवळ गहिवरते
मी सापडलो द्विधेत कर्तव्याच्या अन प्रेमाच्या
भगवंता रे सावर आता मन माझे भिरभिरते

ह्या जन्मी मी मायभू तुझे सारे ऋण फेडावे
पुढील जन्मी हक्काचे डोक्यावर छत बांधावे
एक क्षण तरी बाप जगावा चिंता सोडुन साऱ्या
एकदाच आईने माझ्या आनंदाश्रू प्यावे

यमदेवा, तू चाल पुढे मी निरोप घेउन येतो
सहकाऱ्यांना विजयासाठी अभिष्टचिंतन देतो
जाता जाता घरी एकदा क्षणभर जावे म्हणतो
त्या म्हाताऱ्या दोन जिवांचे अखेर दर्शन घेतो

....रसप....
९ ऑक्टोबर २०१२

Monday, October 08, 2012

सुरस कथा माझ्या प्रेमाची..


सुरस कथा माझ्या प्रेमाची नका विचारू मला
प्रेमपटावर डाव मनाचा अनेकदा मांडला
हरेक वेळी माझी खेळी पराभूत जाहली
तरी नव्या प्रेमाची आशा पुन्हा पुन्हा बांधली

पहिले होते बालपणीचे चौथ्या वर्गातले
कुणास ठाउक कधी तिनेही होते का जाणले ?
मला पकडले होते बाईंनी बघताना तिला
हातावरती प्रसादही मग यथेच्छ होता दिला !

त्यानंतर मी सुतासारखा झालो होतो सरळ
पण हे मनही जात्या होते पक्के चंचल चपळ
वर्ग दहावीचा होता तो तिच्यात गुंतुन फसलो
'निकाल' पाहुन मार्कशीटवर स्वत:च कुंथत बसलो

कॉलेजाच्या दुसऱ्या वर्षी केले तिसरे प्रेम
जितका चुकला तितक्या वेळा परत लावला नेम
लाल गुलाबाला माझ्या पायाने चुरले तिने
बॉयफ्रेंडला सगळे सांगुन मस्त तुडवले तिने !

नजर फिरवुनी कुणासही मग कधीच ना पाहिले
'हि'ने मला हेरले एकदा अन जाळे टाकले
बेसावध होतो मी फसलो बंधनात अडकलो
लग्नाच्या बेड्यांना माळुन 'श्रीयुत' मी जाहलो

आजच आली मैत्र विनंती फेसबूकवर नवी
कॉलेजच्या तिसऱ्या प्रेमाची तीच हासरी छवी
स्विकार केले विनंतीस मी गप्पाही रंगल्या
'फटके पडलेल्या' दिवसांच्या आठवणी जागल्या !

मी म्हटले की, "सुरस कथा त्या नका विचारू मला
प्रेमपटावर डाव मनाचा अनेकदा हारला
मला आठवे ना कुठलाही आज जुना चेहरा
जे न मिळाले त्यास गमविण्याचा तोटा ना खरा !!"

....रसप....
८ ऑक्टोबर २०१२

Sunday, October 07, 2012

'हवाहवाई'ची अफलातून 'शशी गोडबोले' (English Vinglish - Movie Review)


प्रत्येकाचं जीवन जर एक संवादिनी (harmonium) समजली, तर आई हा तिचा षड्ज (सा) असावा. ह्या षड्जाविना मैफल परिपूर्ण वाटत नाही. असं एक अनन्यसाधारण स्थान असतं, आईचं. पण हे आईपण खूप कठीण असतं. एक स्त्री, जेव्हा फक्त एक स्त्री असते, तेव्हा तिचं जग बरंच व्यापक असतं. पराकोटीची वेदना सोसून जेव्हा तीच स्त्री एका मुलाला जन्म देते, तेव्हा तो तिचा स्वत:चाही पुनर्जन्मच असतो. कारण, सोसलेल्या यातना मरणयातनेहून कमी नसतात आणि तिथून पुढे सगळे आयामही बदलणार असतात, बदलतात. एका 'आई'चं जग, एका 'स्त्री'च्या जगापेक्षा संकुचित असतं. तिच्यासाठी मूल, नवरा आणि घर प्राथमिक असतात आणि बाकी सगळं, अगदी स्वत:ही, त्यानंतर. पावलोपावली स्वत:च्या इच्छा-आकांक्षा, आवडी-निवडीना ती बाजूला ठेवते. त्याग + तडजोड = आयुष्य असं एक सरळसोट समीकरण ती मांडते, मानते आणि पाळते. असं असतानाही वेळोवेळी आपण तिची कळत नकळत अवहेलना, हेटाळणी, अपमान, मस्करी करत असतो. (नीट विचार करा, आपण करत असतोच.)

तर अशीच एक मध्यमवयीन, उच्च मध्यमवर्गीय 'आई' - शशी गोडबोले (श्रीदेवी). मोठी मुलगी व लहान मुलगा कॉन्व्हेन्ट शाळेत. नवरा कुठल्याश्या खाजगी कंपनी मोठ्या हुद्द्यावर. एकंदरीत सुखवस्तू कुटुंब. शशीला कशाचीच कमतरता नाही. प्रेम, पैसा, सुख सारं काही आहे. पण, 'मान' नाही. साध्या सरळ शशीने इतर अनेक आयांप्रमाणे स्वत:चं विश्व स्वत:च्या मुलांत, नवऱ्यात व घरात बंदिस्त केलं असतं. तिचं हे 'गृहिणी'पण, तिचा साधेपणा आणि सर्वात मोठं म्हणजे फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या घरातील (सासू - सुलभा देशपांडे - वगळता) इतरांसमोर तिचं (न येणारं) "Enगlish Vingliश" ! चिमुरडी मुलगीसुद्धा आईचा पाणउतारा करत असते आणि सोशिक शशी जसं नवऱ्याने वारंवार झिडकारणं सहन करत असते तसंच मुलीचं फटकारणंही.
शशीसाठी माहेर म्हणजे फक्त तिची एक अमेरिकास्थित बहिण असते. ह्या बहिणीच्या मोठ्या मुलीचं लग्न ठरतं आणि अमेरिकेला जायचं ठरतं. नवऱ्याची नोकरी, मुलांच्या शाळा.. उरली शशी! तिला एकटीलाच अमेरिकेला लग्नाच्या तयारीसाठी सर्वांच्या आधी जावं लागतं. एकटीने जाण्याची भीती वाटत असतानाही, शशीचं काहीही चालत नाही आणि मर्जीविरुद्ध ती अमेरिकेला जाते. (श्रीदेवीचा अभिनय अ-फ-ला-तू-न.) अमेरिकेला गेल्यावर कमजोर इंग्रजीमुळे तिला एका लहानश्या कॅफेत आलेला अनुभव तिला (आणि आपल्यालाही) हेलावून टाकतो आणि ती ठरवते की "बस्स.. आता हे इंग्लिश विन्ग्लीश शिकायचंच." कुणाला काही कळू न देता, ती एका 'इंग्लिश स्पीकिंग क्लास'मध्ये प्रवेश घेते आणि सुरू होतो एक गमतीशीर, भावनात्मक अध्याय.



पुढे काय होतं, हे सांगायची आवश्यकता नाहीच. कारण ही काही कुठली 'सस्पेन्स' कहाणी नाही. अपेक्षित वळणांनी ही कहाणी एका अपेक्षित शेवटावर संपते. पण हा प्रवास अनुभवण्यासारखा आहे. संपूर्ण प्रवासात एकेक क्षण श्रीदेवीच्या बाजूची 'सीट' आपलीच वाटत राहाते.
हिंदी सिनेसृष्टीतील सगळ्यात मोठ्या शीतयुद्धाचा विचार केल्यास, दुसऱ्या फेरीतील पहिली चाल माधुरी हरली आहे.. अगदी चारीमुंड्या चीत. (संदर्भ - आजा नच ले) श्रीदेवीने तिच्या आजपर्यंतच्या कारकीर्दीतील तिचा सर्वोत्कृष्ट अभिनय 'शशी गोडबोले' म्हणून केला आहे. तिचं चाचरणं, घाबरणं, खूष होणं, 'मायकेल जॅक्सन' स्टेप करणं, रडणं, हसणं, बोलणं, चालणं... सगळं-सगळं एकेक शब्द, एकेक पावलासह लक्षात ठेवावं इतकं अप्रतिम. पुनरागमन जर असं होणार असेल, तर प्रत्येक अभिनेत्रीने वारंवार पुनरागमनच करत राहावं.. असा एक 'इल्लॉजिकल' विचार माझ्या मनात येऊन गेला!
सिनेमातील प्रत्येक लहान-मोठं पात्र आपली एक छाप सोडतं. 'लौरेंट' ह्या फ्रेंच माणसाच्या भूमिकेतील 'मेहदी नेब्बौ' खूप सहज वावरतो आणि मनाला स्पर्श करतो.
अतिशय भावनाप्रधान कथा असतानाही कुठेही अतिभावनिक नाट्य (मेलोड्रामा का काय ते..) न रंगवता अत्यंत संयतपणे आणि तरीही मनाला स्पर्श करत केलेल्या मांडणीसाठी नवोदित दिग्दर्शिका गौरी शिंदेला सलाम !
'नवराई माझी लाडाची..' हे गीत ठेका धरायला लावतं. अमित त्रिवेदीची बाकी गाणीही ठीक आहेत.    
पण अखेरीस... मनात घर करते श्रीदेवीच.
थ्री चिअर्स टू श्रीदेवी..! टेक अ बाउ !
She is back with a BANG..!

रेटिंग - * * * *

Tuesday, October 02, 2012

तिचेच नंतर जगणे 'जीतू'मयही होते


चर्चा करण्यासाठी नविन विषयही होते
त्यांना चर्चा हरण्याचे पण भयही होते

ज्यांना माफी मिळते ज्यांची गयही होते
त्यांच्या दानाची देवास सवयही होते

जखमच होते गेलेल्या प्रत्येक क्षणाची
क्वचितप्रसंगी एक लाघवी सयही होते

अनेक वेळा असेल माझा पाय घसरला
थोडी होती संगत थोडे वयही होते

तिच्या गुंतण्यावरची बंदी गळ्यातले सर..
पण नजरेला होकाराचे भयही होते

सुरुवातीला ती नसल्याचा त्रास वाटतो
हळूहळू त्या नसण्याचीच सवयही होते

तिला पाहिल्यावर हृदयाची साद वाढली
धडधडते ठोके मग चुकले लयही होते

नाक कान डोळे अन होते हात-पायही
प्रेमानंतर कळले एक हृदयही होते

त्या काळी मी विचारले तर 'नको' म्हणाली
तिचेच नंतर जगणे 'जीतू'मयही होते

....रसप....
२७ सप्टेंबर २०१२

Monday, October 01, 2012

सुमार, टुकार उलाढाल! (Kamaal Dhamaal Malamaal - Movie Review)


विंग्रजीतील एक म्हण म्हणते की, 'घोड्याला पाण्यापर्यंत नेता येऊ शकतं, पण त्याला पाणी पाजता येत नाही.' म्हणजे, त्याला तहान असेल तरच तो पाणी पिणार... कितीही काहीही करा..! पण माणसाचं जरा वेगळं असावं.. म्हणजे, जर एखाद्याने ठरवलं की त्याला शेणच खायचं तर तुम्ही त्याला गोठ्यापासून कितीही दूर न्या.... तो काही ना काही करून शेण खाणारच ! 'कमाल धमाल मालामाल' च्या निमित्ताने एक चांगली कहाणी प्रियदर्शनला मिळाली होती पण... आता शेणच खायचं ठरवलं असेल, तर काय करणार ना ? असो.. उगाच कुणाचं खाणं-पिणं काढू नये म्हणतात. आपण शेणेमाबद्दल बोलू... सॉरी, सिनेमाबद्दल बोलू..

'प्रियन'च्या इतर अनेक सिनेमांप्रमाणे ही कथाही बरेच फाटे असणारी आहे.
उत्तर भारतातील कुठल्याश्या भागातील एक खेडेगांव - 'बिजनोर'. [इथे अजून घराघरात वीजही पोहोचली नाहीये पण गावांतल्या समस्त स्त्रीवर्गाने चिकनं-चुपडं दिसण्यासाठी पावडर, लिपस्टिक, हेअर स्ट्रेटनर, चांगले कपडे, ई. जीवनावश्यक गोष्टी मुबलक उपलब्ध असाव्यात. बिच्चारा पुरुषवर्ग मात्र एकदम 'लायकीत'ले कपडे व एकंदर अवतार करून वावरतो, अपवाद - 'जॉनी बेलिंडा (श्रेयस तळपदे).] कोणे एके काळी इथे दोन जिवलग मित्र असतात.. ओम पुरी आणि परेश रावल. प्रेम सोडून इतर सगळं भागीदारीत करणारे...! अर्धे अर्धे पैसे देऊन लॉटरीचं तिकीट घेतात.. जिंकतात आणि पैश्यांवरून एकमेकांशी भांडतात. परेश रावल सगळे पैसे हडपतो आणि ओम पुरी त्याच्या मित्राची गर्लफ्रेंड पळवतो अन लग्न करतो. जिवलग मित्र जानी दुश्मन बनतात.
पुढे श्रीमंत मा. मित्र धटिंगण बनतो... (मा. = माजी. असंस्कृत लोकांनी विकृत अर्थ काढू नये.) दोन-तीन वळू-टाईप मुलगे आणि गरीब मित्राच्या डरपोक पोराच्या प्रेमात पडण्यासाठी एक टकाटक पोरगी पैदा करतो. बायको गचकली असावी कारण ती दिसत नाही. गरीब मित्र ओम पुरी खड्डे खणून कुटुंबाची गुजराण करत असतो. कसले खड्डे ? का ? असले प्रश्न विचारू नका. ते त्यालाही पडले नव्हते म्हणून मलाही पडले नाहीत. पण सुचेल तेव्हा हातात कुदळ-फावडा घेऊन हा खड्डेच खणत असतो. मुलगा श्रेयस तळपदे गावातल्या शेंबड्या पोरांकडूनही मार खात असतो तर गर्लफ्रेंडच्या सांड भावांकडून का नाही खाणार..? एकदम हक्काने ते त्याला येता-जाता ठोकत असतात. पण आळशी पोराला कशाचं काही नसतं. कुत्र्यासारखा मार खाऊनही त्याला मुका मार, जखमा काही होत नसतात. (तो बहुधा अमिबा आणि टर्मिनेटरचं मिक्स ब्रीड असावा. म्हणून जखमा भरून निघत असाव्यात आणि मुके मार, सूज वगैरे बदलत्या आकारात सपाट होत असाव्या.) तो तिन्ही त्रिकाळ घरात एक तर घरात पडून राहात असतो किंवा गावभर हुंडारत असतो. बाप खड्डे खोदतोय आणि पोरगा फक्त लॉटरीची तिकिटं विकत घेतोय.. !
तर हे असं सगळं चालू असताना एक अनोळखी इसम (नाना पाटेकर) गावात येतो आणि थेट ओम पुरीचं घर गाठतो. तो गावात येतो दुपारच्याला आणि घरी येतो रात्री.. का ? कारण अंधारातून येताना रस्त्यात येणाऱ्या विहिरीत पडणं आवश्यक असतं. हा अनोळखी इसमही एक धटिंगण असतो आणि त्याच्या येण्याने मरतुकड्या जॉनीला 'बॉडीगार्ड' मिळतो आणि तो त्याला स्वत:च्याच घरात 'वाइल्ड कार्ड एन्ट्री' मिळवून देतो.
अनेक भरीचे सीन झाल्यावर, एक दोन चोरलेल्या गाण्यांवर हिरो-हिरोईनची अंगविक्षेप करायची हौस फिटवून झाल्यावर सिनेमा अपेक्षित वळणावर येतो. हिरोईनचा बाप, हिरोसमोर 'टार्गेट' ठेवतो. नाताळच्या सुटीत दिवसभर उलटा लटक किंवा काय हवं ते कर. गावाच्या चर्चला पूर्वी एक सोन्याचा क्रूस होता, जो चोरीला गेला आहे; तसा एक सोन्याचा क्रूस चर्चसाठी आण आणि पोरीला ने ! (च्या मारी ! पोरगी चर्चच्या पायरीवर मिळाली होती की काय ?) आत्तापर्यंत चाणाक्ष प्रेक्षकाला कळलेलं असतं की तो क्रूस कोणे एके काळी कुणी चोरलेला असतो आणि तोच क्रूस मरतुकड्या जॉनीला येनकेन प्रकारेण मिळणार आहे. मिळतो. त्यात अर्थातच धटिंगण नाना मदत करतो. शेवटच्या १५ मिनिटात सर्व पात्रं अचानकच सभ्य, समजूतदार, मोठ्या मनाची वगैरे होतात आणि सिनेमा आपटतो... सॉरी आटोपतो.



'नाना नक्की कोण आहे?' ह्या एकाच प्लॉटवर अख्खा सिनेमा लै भारी उत्कंठावर्धक बनवता आला असता. पण आधी म्हटल्याप्रमाणे शेण खायचंच ठरवलं असेल, तर कोण काय करणार ?

श्रेयस तळपदे जीव तोडून जॉनीच्या व्यक्तिरेखेत जीव ओतायचा प्रयत्न करतो, पण पटकथा आणि दिग्दर्शनातील भगदाडं, ओम पुरी व नंतर नानाने खोदलेल्या सर्व खड्ड्यांपेक्षा मोठी आहेत. नाना, परेश रावल आणि ओम पुरी ह्यांनी विडी-काडीचा खर्च भागविण्यासाठी हा सिनेमा केला असावा.

कुठल्याश्या दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक आहे, हे माहित होतं पण माहित नसतं तरी जाणवावं इतका काही ठिकाणी सिनेमा विचित्र उचंबळ दाखवतो.

आताशा मला असं वाटायला लागलं आहे की, प्रियदर्शन आणि शाहीद आफ्रिदी बहुतेक 'एकही चक्की का पिसा आटा' खात असावेत. एक तर ३७ चेंडून १०० किंवा एकदम 'सुमार, टुकार उलाढाल' !

रेटिंग - *

Sunday, September 30, 2012

जेव्हा 'देव' 'जमिनी'वर येतो.. (Oh My God - Movie Review)


विचार करण्याची क्षमता असणे, बुद्धीचा अधिक परिणामकारक उपयोग करणे, ह्या वैशिष्ट्यांमुळे मानव हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा व श्रेष्ठ समजला जातो. जे बरोबरही आहे. पण ह्या मानावाच्याही हातात अनेक गोष्टी नाहीत. अनेक ठिकाणी हा हतबल होतो, लाचार होतो. तेव्हा 'हे देवाच्या हातात आहे', असं म्हणून तो स्वत:ची लाचारी मान्य करतो व ते मान्य करत असतानाही इतर प्रन्यांहून श्रेष्ठत्व सांभाळतोच. इतपत ठीक आहे. पण आजच्या घडीस देव-धर्माने दांभिक रूप घेऊन गावोगावी धंदा मांडला आहे, २१ व्या शतकात पाउल ठेवलेलं असतानाही अनेक अंधश्रद्धांच्या जोरावर (भीतीवर) सुशिक्षित व सुसंस्कृत लोकांनाही फसवलं जात आहे किंवा असं म्हणू की सुजाण लोकही त्याच्या आहारी गेले आहेत... (अशिक्षितांचं तर सोडाच..!) त्याचं काय ? देवाला नवस बोलून, सोन्या-चांदी-पैश्यांची एक प्रकारे लाच देऊन आपली श्रद्धा दाखवणं योग्य आहे  ? तो तर जागोजागी आहे ना ? मग मंदिरं का ? बरं, मंदिरं असावीत... प्रार्थनेच्या, साधनेच्या जागेसाठी म्हणून पण मग अमुक देव जागृत वगैरे काय आहे ?
- असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. पण आपण ते स्वत:च नाकारतो किंवा क्वचितच हे प्रश्न विचारण्याची हिंमत करतो. आणि जो माणूस हे प्रश्न वारंवार विचारतो, त्याला - जरी आपल्यालाही ते प्रश्न पडत असले तरी त्यांच्यापासून स्वत:च पळून - त्याला 'नास्तिक' म्हणवतो/ म्हणतो. 'ओह माय गॉड' हेच प्रश्न पडद्यावर विचारतो, बिनधास्त !


कानजी मेहता (परेश रावल) मुंबईत राहाणारा एक गुजराती व्यापारी असतो. त्याचं देवाच्या मूर्ती, फोटो विकण्याचं चांगलंसं दुकान असतं. धंदा जोरदार असतो. देवाच्या मूर्ती विकत असला, तरी कानजी स्वत: देवाला मानत नसतो. टिपिकल धंदेवाईक बुद्धीने तो लोकांना फसवतही असतो. त्यांच्या भाबड्या श्रद्धांचा गैरफायदा घेऊन लुबाडतही असतो. कानजीचा लहान मुलगा दहीहंडी उत्सवात गोविंदा बनतो. तो हंडी फोडणार इतक्यात कानजी 'श्रीकृष्ण दही खातो आहे' अशी खोटी वावडी पसरवून लोकांना पांगवतो आणि हंडी न फोडताच मुलाला खाली उतरवतो. तत्क्षणी हलकासा भूकंपाचा धक्का बसून मुंबई हादरते. काहीही नुकसान होत नाही पण संपूर्ण मुंबईत फक्त एक दुकान जमीनदोस्त होतं, ते असतं कानजीचं. लाखो रुपयांचं नुकसान होतं. घर गहाण ठेवून दुकानासाठी कर्ज काढलेलं असतं.. आणि विमा कंपनी कुठलीही भरपाई देण्यास नकार देते कारण विम्याच्या अटींत 'Act of God' ला संरक्षण नसतं. अर्थात, ज्या दुर्घटनांवर मनुष्याचा जोर नाही अश्या त्सुनामी, भूकंप, ई. घटना. जमीनदोस्त झालेल्या दुकानाची जमीनही कुणी अपशकुनी जमीन असल्याच्या समजुतीपायी विकत घेण्यास तयार होत नाही. आता काय करायचं ? ह्या विवंचनेत असलेल्या कानजीला एक वेगळीच कल्पना सुचते. 'माझं नुकसान देवाने केलं आहे ना? ठीक आहे. मग देवाने मला भरपाई द्यावी!' असा दावा घेऊन तो न्यायालयाचे दरवाजे ठोठावतो. कुठलाही वकील त्याची केस घेण्यास तयार होत नसतो म्हणून स्वत:च स्वत:ची केस मांडून चतुर युक्तिवाद करतो व खटला दाखल करून घेण्यास भाग पाडतो. प्रतिवादी म्हणून विविध खंडापीठांचे गुरू, मशिदींचे इमाम व चर्चेसचे फादर आणि विमा कंपनी ह्यांना नोटीसा बजावल्या जातात आणि सुरू होतो एक अभूतपूर्व न्यायालयीन लढा - मानव वि. देव !!
खटल्याची बातमी देशभर पसरते आणि देशाच्या कोपऱ्या-कोपऱ्यातून लोक आपापल्या फिर्यादी घेऊन येतात व 'आम्हालाही भरपाई हवी आहे' अशी मागणी ठेवतात. कानजी व इतर सर्व फिर्यादींची मिळून भरपाई रक्कम ४०० कोटींच्या घरात पोहोचते आणि विमा कंपनी व धर्मगुरू बेचैन होतात.
खटला दाखल झाल्यावर कानजीला जीवे मारायचा प्रयत्न होतो तेव्हा त्याच्या मदतीला साक्षात भगवान श्रीकृष्ण मनुष्यरुपात (अक्षय कुमार) धावून येतात आणि नंतर खटला चालू असतानाही त्याची मदत करत राहातात.

पुढे काय होतं ? कानजी खटला जिंकतो का ? देवावर त्याचा विश्वास बसतो का ? धर्माचे दांभिक स्वरूप लोकांना समजते का ? असे अनेक प्रश्न सिनेमा पाहिल्यावर सुटतील. किंबहुना, ते तसे सुटण्याचे अनुभवण्यातच खरी मजा आहे. तेव्हा सिनेमा अवश्य पाहाच !

सिनेमात, इतर धर्मांपेक्षा हिंदू धर्मावर अधिक टीकात्मक भाष्य केले आहे. कारण सरळ आहे - स्वत: 'कानजी' हिंदू आहे ! पण असं होत असताना त्याच्या सोबतीला स्वत: देवानेच उभे राहाणे, ही कल्पना धर्माचा अपमानही होऊ देत नाही. किंबहुना, मनुष्यासाठी त्याचा धर्म किती महत्त्वाचा आहे हे सिद्ध करते. एक फार सुंदर वाक्य ह्या सिनेमात आहे. 'लोगों से उनका धरम मत छिनना, वरना वोह तुम्हे अपना धरम बना लेंगे !' ह्या व्यतिरिक्त असे अनेक दमदार संवाद तितक्याच दमदार फेकीने दाद घेऊन जातात. जसं की - 'These are not Loving people, these are fearing people' असं जेव्हा धर्मगुरू (मिथुन चक्रवर्ती) कानजीला सांगतो तेव्हा खरोखर पटतं की खरंच देवाला मानण्यात, त्याची प्रार्थना करण्यात आपली श्रद्धा नसते तर भीती असते.

संगीताला फार वाव नाही पण जे आहे ते श्रवणीय आहे. अक्षय कुमार, महेश मांजरेकर, मिथुन चक्रवर्ती, गोविंद नामदेव सगळे आपापली कामं चोख निभावतात. पण सिनेमा खिश्यात घालतो अर्थातच 'कानजी भाई' परेश रावल. अगदी सहजसुंदर अभिनयाने परेश रावल कानजीचे विचार आपल्याला आपल्याच नकळत पटवून देतो. आणि मनोमन आपण हाच विचार करतो की देव हरावा व कानजी जिंकावा.

हा सिनेमा एका गुजराती नाटकाचे सिनेरुपांतर आहे. मूळ नाटक सिनेमाचे दिग्दर्शक 'उमेश शुक्ला' ह्यांचेच आहे. विषयाला धरून, थोडीशी 'फिल्मी लिबर्टी' (न्यायालयीन कामकाजाबाबत) घेऊन मार्मिक भाष्य करणारा, विनाकारण फाफट पसारा न मांडता व्यक्त होणारा हा सिनेमा निश्चितच पाहण्याजोगा वाटला.

रेटिंग  - * * *

Saturday, September 29, 2012

मनात येते हेच मला तू दिसल्यानंतर..


मनात येते हेच मला तू दिसल्यानंतर
तुझ्याचसाठी शब्द जन्मला 'नितांतसुंदर'!

क्षितीज म्हणजे भास असावा, मला न वाटे
तुला पाहण्यासाठी झुकते खाली अंबर

प्रचंड दुखते हृदयामध्ये तुला पाहता
पण आवडतो उरामधे शिरलेला खंजर !

सारी दुनिया त्याची जिंकुन झाली होती
तुला भेटला नव्हता कारण कधी सिकंदर

तुझ्यात हरवुन 'जीतू' लिहितो कविता - गझला
वेडी दुनिया म्हणते त्याला 'मस्त कलंदर' !

....रसप....
२८ सप्टेंबर २०१२

Saturday, September 22, 2012

हलकट जवानी - बोरिंग कहाणी - (Heroine Movie Review)

आजची तुमची जी स्वाक्षरी आहे, ती पूर्वी कशी होती ? आठवतं ? माझ्या बाबतीत सांगतो. माझ्या स्वाक्षरीत माझ्या नावाचं संक्षिप्त स्वरूप होतंच, पण ते प्रत्येक अक्षर अगदी सुस्पष्ट नाही, तरी हलक्यानेच पण असायचं. नंतर, रोज रोज तीच स्वाक्षरी करता करता काही अक्षरं आपोआपच पुसट-पुसट होत जाऊन, आज तर त्यांची जागा सरळ रेषेनेही घेतली आहे !
एखादा पार्श्वगायक, त्याचं एखादं अत्यंत गाजलेलं गाणं त्याच्या प्रत्येक कार्यक्रमात गात असतो. वारंवार तेच ते गाणं गाता गाता त्या गाण्यातील काही जागा तो जरा 'हलक्यानेच' गायला लागतो. हे तुम्हाला कधी जाणवलं आहे का ?
थोडक्यात काय... तर एकच कृती तुम्ही वारंवार करत असाल तर त्या कृतीत एक सफाई येते आणि सफाईदारपणे तीच कृती वारंवार करता करता त्यात शॉर्ट-कट्स येतात.. परिपूर्णता ओलांडल्यानंतर परिपूर्णतेचा आभास येऊ लागतो.
'हिरोईन' पाहिल्यावर दिग्दर्शक मधुर भांडारकर ह्याच आभासापर्यंत पोहोचला आहे, असं जाणवलं. पेज थ्री, कॉर्पोरेट, सत्ता, चांदनी बार, फॅशन सारख्या सिनेमांतून त्या-त्या आयुष्याची, समाजाची गडद बाजू(च) रंगवणारा हा दिग्दर्शक 'हिरोईन'मध्येही चंदेरी दुनियेची गडद बाजू(च) रंगवायचा एक प्रयत्न करतो, जो सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याच्याच आधीच्या काही सिनेमांची प्रेरणा आणि 'डर्टी पिक्चर'चा प्रभाव दाखवत राहतो.  

'माही अरोरा' (करीना) एक प्रस्थापित 'हिरोईन' - अभिनेत्री नव्हे, 'हिरोईन'च. चेन स्मोकर, दारुडी आणि मानसिकरीत्या अस्थिर. माहीच्या सिनेक्षेत्रातील कारकीर्दीमधील उच्चपदापासून उतरणीच्या काळाला चित्रित करणारा हा सिनेमा. अगदी अपेक्षित घटनाक्रमांच्या कमजोर कुबड्यांचा आधार घेत हा प्रवास आपल्यासमोर मांडला जातो. विवाहित, पण घटस्फोट होऊ घातलेल्या एका सुपरस्टारसोबत (आर्यन - अर्जुन रामपाल) प्रेमप्रकरण, त्यांचे शारीरिक संबंध, मग पार्टीतील विक्षिप्त वर्तणूक, नशेतील तमाशे, मग 'ब्रेक-ऑफ', मग आघाडीच्या क्रिकेटपटूशी लफडं, नंतर त्याच्याशी ब्रेक ऑफ, कारकीर्दीची घसरण, इतर सहकलाकारांशी रस्सीखेच आणि एकमेकांवर कुघोडी करण्यासाठी कुठल्याही पातळीपर्यंत खाली उतरणं असं सगळं होत होत अखेरीस हा सिनेमा एका अत्यंत अस्वीकारार्ह शेवटाला पोहोचतो, तेव्हा प्रेक्षकाला पावणे तीन तास वाया गेल्याची पक्की पावती मिळते.

सलीम- सुलेमान ह्यापेक्षा वाईट संगीत देऊ शकतील, असं मला तरी वाटत नाही. शीर्षक गीत तर इतकं बंडल आहे की सुरुवातीलाच डोकं फिरावं ! 'धूम'च्या चोरलेल्या धूनवर बेतलेल्या धूनचं बहुचर्चित 'हलकट जवानी' सुद्धा अगदीच पिचकवणी. 'सांईया रे..' हे एकच गाणं त्यातल्या त्यात सुसह्य वाटलं आणि कानांवर अत्याचार झाला नाही.

'दिल तो बच्चा हैं..' डब्ब्यात गेल्यावर कदाचित मुद्दाम आपल्या 'होम पीच'वर येण्याचा मधुर भांडारकरचा हा प्रयत्न त्याच्या दरज्याला अनुरूप वाटतच नाही.

राहता राहिला प्रश्न खुद्द 'हिरोईन'चा. तिच्यावर सारी मदार येते. ह्या व्यक्तिरेखेत मूलभूत असलेल्या हळवेपणामुळे ती बऱ्यापैकी छाप सोडते. पण अधिक विचार केल्यास, करीनाच्या अभिनयात तिच्या धूम्रपान आणि मद्यपानाचा महत्त्वाचा 'रोल' आहे. ते वगळल्यास ती काही विशेष चमक दाखवत नाही. जो काही परिणाम साधला जातो, तो त्या व्यक्तिरेखेमुळे व गेट-अपमुळे, असं मला वाटलं.

कधी कधी अतिविचार केल्यानेसुद्धा काम फिसकटतं, अति-प्रयत्न केल्यानेही नेमका उलट परिणाम साधला जातो, कदाचित तसं काहीसं ह्या 'हिरोईन' चं झालं असावं. ह्यात कुठलाही Casual दृष्टीकोन नसावा असं म्हणून मी माझ्या मनाची समजूत घालून मधुर भांडारकरला क्षमा करतो आणि लौकरात लौकर सावरण्याची शुभेच्छा देतो. 

रेटिंग  - *१/२ 


Friday, September 21, 2012

जिंदगी ना मिलेगी दोबारा.. (Zindagi Na Milegi Dobara)

'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हे नाव सिनेमाचं सार स्वत:च सांगतं.

रोजच्या धावपळीने आपल्यातील काही जण जगण्यापुरती 'सोय' करू शकतात, काही 'आज'सोबत 'उद्या'साठीही तजवीज करतात तर काही आज-उद्या-परवा सगळ्याची सोय लागलेली असतानाही अजून सुखकर व सुरक्षित आयुष्यासाठी - ज्याला काहीच निश्चित मर्यादा नाही - झिजत राहातात. (काही असेही असतात जे काहीच करत नाहीत, ते जिवंत आहेत ह्यावर माझा विश्वास नाही) ह्या धकाधकीत खरोखरच मला, स्वत:ला नक्की काय हवं आहे? माझ्यासाठी एक मनस्वी आनंद मिळण्याची/ मिळवण्याची गोष्ट काय आहे ? आज मी जे काही करतोय, तेच मला हवं होतं का ? हवं आहे का ? उद्या मी जे काही करणार आहे, त्याचा 'आज' हा पाया असेल तर तो माझ्या मनात भक्कम आहे का ? असे अनेक प्रश्न हा सिनेमा कुठलंही अतिरंजन न करता एका चंचल मनात निर्माण करतो आणि अखेरच्या दृष्यात निर्भेळपणे हसणाऱ्या तीन तरुणांच्या डोळ्यांत 'आता मी जगणार आहे..' ह्या भावनेने जी चमक दिसून येते, तिचा हेवा वाटतो !

इम्रान (फरहान अख्तर), कबीर (अभय देओल) आणि अर्जुन (हृतिक रोशन) ह्या तीन मित्रांची ही कहाणी. तीन वेगवेगळ्या ठिकाणी राहाणारे हे तिघे मित्र, कबीरचं लग्न ठरलं असल्याने Bachelor's Trip च्या निमित्ताने स्पेनला भेटतात. ट्रीप ही असते की तिघांनी आपापल्या मर्जीचे तीन वेगवेगळे Adventure Sports निवडायचे आणि तिघांनी एकत्र ते करायचे. बाकी कहाणी सांगण्याची, सिनेमा जुना असल्याने व बहुतेक जणांनी पाहिला असायची शक्यता असल्याने आवश्यकता वाटत नाही. पण ह्या सहलीत टप्प्याटप्प्यावर येणाऱ्या अनुभवांतून, भेटणाऱ्या व्यक्तींकडून हे तिघं मित्र स्वत:च स्वत:ला हळूहळू ओळखू लागतात आणि सहलीच्या शेवटापर्यंत त्यांच्यात आमुलाग्र बदल घडतो.


आयुष्याचं तत्वज्ञान सांगणारे 'आनंद - बावर्ची - मिली' पासून 'आशायें - बर्फी' पर्यंत अनेक सिनेमे झाले. त्यातील बहुतेक सिनेमे असे होते की कुठल्याही पिढीच्या व्यक्तीला 'पटतील'. 'ज़िंदगी ना मिलेगी दोबारा' तसा नाही. कदाचित माझ्या वडिलांची पिढी ह्या सिनेमाशी नातं नाही जोडू शकणार. कारण ह्यातील बहुतेक संज्ञा (Concepts) आजच्या पिढीच्या आहेत. सिनेमातील पात्रांचे विचार, संवाद कुठेच कुठलं कालजयी तत्वज्ञान सांगत नाहीत. संपूर्ण 'फोकस' 'आज'वर आहे.

अभय देओल, फरहान अख्तर आणि ह्रितिक रोशन - तिघांनीही आपापल्या भूमिका जीव ओतून वठवल्या आहेत. मला हे तिघेही आजच्या पिढीतले 'विचारी कलाकार' वाटतात. आजच्या घडीला सृजनातून मिळणाऱ्या अतुलनीय आनंदाची जागा, निर्मितीला मिळणाऱ्या पैश्यातील किमतीने घेतली असल्याने वर्षानुवर्षं त्याच त्याच भूमिका करून आपले स्थान भक्कम करून झाल्यावरही बहुतेक सुपरस्टार प्रयोगशीलतेला फाटा देतात. पण खरा कलाकार नाविन्याचा भुकेला असतो. प्रयोगशीलतेची कास धरणारा असतो. फार थोड्याच अवधीत हे तिघेही नट 'कलाकार' बनू पाहत आहेत, ह्यासाठी मनापासून दाद.

अगदी छोट्या भूमिकेत नसिरुद्दीन शाह आपला 'क्लास' दाखवून देतो.
'सच.. होता क्या हैं ? हर एक का अपना अपना Version हैं सच का !' - इतक्या सहजतेने बोलतो की पटवून देण्या-घेण्याची आवश्यकताच नाही ! हा अभिनेता तुमचे दोन्ही हात पकडून तुमच्याकडून टाळी वसूल करतो, 'वसूल' !

'शंकर-एहसान-लॉय'चं संगीत हलकं फुलकं आहे. उडे खुले आसमानों में, देर लगी लेकिन आणि सेनोरिटा ही गाणी मस्त जमून आली आहेत.  

जावेद अख्तर ह्यांच्या कविता ह्या सिनेमात खूप महत्वाचं स्थान घेतात.

हवा के झोकों के जैसे आज़ाद रहना सीखो,
तुम एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो,
हर एक लम्हे से तुम मिलो खोले अपनी बाहें,
हर एक पल, एक नया समां देखें ये निगाहें..

अश्या शब्दांतून जावेद साहेब आजच्या पिढीशी थेट संवाद साधतात. मी वर उल्लेख केलेली Generation Gap जावेद साहेबांना लागू होत नाही, तेव्हा समजतं की 'जे न देखे रवी..' का म्हटलं जातं.

'कार्लोस कॅटलन' ची छायाचित्रण सुंदर आहे. सगळीच दृश्यं अगदी नेत्रसुखद आहेत.
त्याव्यतिरिक्त स्काय डायव्हिंग व समुद्रातील दृश्यं अप्रतिम सुंदर चित्रित केली गेली आहेत.

छोट्या छोट्या प्रसंगांतून, कृतींतून व्यक्तिरेखा उलगडत जातात. ट्रीपसाठी निघतानाचं इम्रान व अर्जुनचं सामान घेणं, Bag भरणं आलटून पालटून दाखवताना दोघांमधला फरक लगेच दिसून येतो. दिग्दर्शक झोया अख्तरने प्रत्येक फ्रेमकडे काळजीपूर्वक लक्ष पुरवल्याचं समजून येतं.
एक चित्रकार त्याच्या कॅनव्हासवर व्यक्त होतो, एक गायक त्याच्या मैफलीत व्यक्त होतो आणि एक कवी त्याच्या शब्दांतून.. प्रत्येक कलाकार त्याच्या सृजनातून व्यक्त होत असतो. तसाच एक दिग्दर्शक त्याच्या सिनेमातून व्यक्त होतो. सिनेमा संपल्यावर जेव्हा एक चित्र - एक मैफल - काव्य पूर्ण झाल्याची अनुभूती येते, तेव्हा तो सिनेमा खऱ्या अर्थाने यशस्वी झाला असं मी मानतो.

'जिंदगी'ला 'जिंदगी'ने दिलेली 'जिंदगी'ची भेट अनुभवायची असेल तर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' अवश्य पाहावा. आजची पिढी नक्की काय आहे ? हे समजण्यासाठी 'ज़िंदगी ना मिलेगी दोबारा' पाहावा.

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहें हो तो ज़िन्दा हो तुम,
नज़र में ख्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो तो ज़िन्दा हो तुम..

....रसप....

Thursday, September 20, 2012

तुला दुरून पाहणे प्रशस्त वाटते मला (तरही गझल)


अशक्य शक्य मानण्यात मस्त वाटते मला
(तुला दुरून पाहणे प्रशस्त वाटते मला)

'मला नसे फरक' असे म्हणून तोडलेस तू
तुझी नजर तरी विचारग्रस्त वाटते मला

असेल उंच बंगला तुझ्यासमोर बांधला
तुला गमावले म्हणून ध्वस्त वाटते मला

सरे अशीच रात रोज पाहतो छतास मी
पहाटवेळ रोजचीच अस्त वाटते मला

सुखे कुलूप लावुनी 'उघड कवाड' सांगती
विचित्र मस्करीमुळेच त्रस्त वाटते मला

तुझ्या सजावटीत तू स्वत:च लुप्त ईश्वरा
विनायका, तुझी कृपाच स्वस्त वाटते मला

उदंड आठवांत एकटाच रंगतो 'जितू'
रितेपणात आजकाल व्यस्त वाटते मला

....रसप....
१९ सप्टेंबर २०१२

Wednesday, September 19, 2012

धुक्याच्या वाटेवर.....


अर्धवट मिटल्या डोळ्यांनी
सगळं धूसर धूसर दिसतंय..
त्यातही स्पष्ट दिसतोय
तुझा शांत चेहरा..
मी हात पुढे केला,
पण तू धरला नाहीस !
मी अजून पुढे झालो..
तशी तू मागे सरलीस..
खोलवर आतून अगदी आतड्यापासून
जोर काढून मी तुला बोलावलं..
पण माझी हाक
माझ्यातल्याच निर्वात पोकळीत विरली..
पराकोटीच्या हताशेने ग्रासलेले
अर्धवट मिटलेले डोळे
अजून थोडे मिटले..
अजून थोडे... अजून थोडे..
धूसरपणा वाढत वाढत गेला..
आणि कधीच न अनुभवलेला
एक मिट्ट काळोख पसरला..
पण निमिषार्धापुरताच..
नंतर स्वच्छ उजेड !!
आणि तू समोर..
हात पुढे करून....!
मीसुद्धा मघाशी तुझ्या मागे सरण्याला विसरून
हातात हात दिला....
आणि सुरू झाला एक नवीनच प्रवास..
धुक्याच्या वाटेवर.....

....रसप....
१९ सप्टेंबर २०१२

Tuesday, September 18, 2012

साधा सोपा 'फंडा' !

एकदाच मरणे मंजुर की रोजच थोडे थोडे ?
असले काही असले-तसले मला न पडते कोडे
हसून माझ्या दु:खावर मी दु:खाला हासवतो
माझ्याशी मित्रत्वाचे मग दु:खच नाते जोडे !

लादुन घ्यावे स्वत: स्वत:वर बळजबरीने काही
हेच नेमके कधीच माझे मलाच जमले नाही
कुणी कुणी तर जीवनभरही मनास मारुन जगतो
आपलेच ना झेपत असते पण दुसऱ्याचे वाही !

नकोस तूही उगाच कुठल्या भोगाला कुरवाळू..
झाले-गेले पुन्हा आठवुन नकोस अश्रू ढाळू
हा क्षण जग जो समोर आहे तुझ्याच हातावरती
क्षणैक आनंदासाठी तू नकोस वेड्या भाळू

माझा तर जगण्याचा आहे साधा सोपा 'फंडा' !
मिळेल तेव्हा जसा जमावा तसा करावा 'कंडा' !
उद्या न असतो, परवा नसतो, 'आज' खरा मानावा
भरून वाहू दे भोगांचा भरेल तेव्हा हंडा !

चूकच असेल माझे पण मी म्हणुनच सुखात जगतो
क्षणाक्षणाचे क्षणाक्षणाला ऋण मी फेडत असतो
रंगछटा ना मला समजती, रंग तेव्हढा कळतो
मी रंगांनी रंगुन घेउन फक्त सोहळा करतो..
........................... मी रंगांनी रंगुन घेउन फक्त सोहळा करतो.. !

....रसप....
१७ सप्टेंबर २०१२

Monday, September 17, 2012

शिवी चालेल, पण ती तूच द्यावी !


तुझ्या रंगात मैफल रंगवावी
मला माझ्या मनातुन दाद यावी

असे दे दु:ख देवा तू नशीले
सुखाची वासना माझी सुटावी !

कुणी थांबत कुणासाठीच नसते
तुला का वाटले की साद द्यावी ?

नभावर मालकी नाही कुणाची
जमीनीवर तरी रेषा असावी

मला म्हण मूर्ख वा वेडाखुळाही
शिवी चालेल, पण ती तूच द्यावी !

असावा बंगला मोठा तिचाही
'जितू'च्या पातळीची ती दिसावी !

....रसप....
१६ सप्टेंबर २०१२

Sunday, September 16, 2012

माझ्या वाटेवर माझे नाव होते उमटले..


'मराठी कविता समूहा'च्या 'लिहा ओळीवर कविता' ह्या उपक्रमाच्या शतकोत्सवी भागात माझा एक सहभाग -

मागे पाहता वळून
मला बरेच दिसले
काही राती रेंगाळल्या
काही दिवस थांबले

एका एका क्षणावर
होते काही कोरलेले
आता कळेना दुरून
होते मीच लिहिलेले

आठवते एव्हढे की
ढसाढसा रडलो मी
आणि कधी मोकळ्याने
खदाखदा हसलो मी

कमावले खूप काही
काही आणले खेचून
उपभोगले थोडेसे
बाकी राहिले पडून

किती जोडली माणसं
ऋण ठेवून, फेडून
काही सोबत चालली
काही सावलीमागून

कधी ठेचकाळलो मी
कधी भरकटलोही
कधी तोल सावरला
कधी धडपडलोही

आज प्रवास हा माझा
इथे येऊन संपला
क्षण हिशेबात एक
नकळतच गुंतला

जसे घडायचे होते
सारे तसेच घडले
हीच होती माझी वाट
आज कळून चुकले

मागे पाहता वळून
मला बरेच दिसले
माझ्या वाटेवर माझे
नाव होते उमटले

....रसप....
१५ सप्टेंबर २०१२

Saturday, September 15, 2012

चविष्ट 'बर्फी' (Barfi - Review)


एक सरदारजीचा विनोद ऐकला होता.
युद्धात सरदारजीच्या युनिटला शत्रू चहूबाजूंनी घेरतो. हे समजल्यावर सरदारजी म्हणतो.. 'मस्तच की! आता आपण कुठल्याही दिशेने हल्ला करू शकतो!'
खरं तर हा मला कधीच विनोद वाटला नव्हता. प्रतिकूल परिस्थितीतही आपली विनोदबुद्धी जागृत ठेवणे, काही तरी सकारात्मक शोधणे/ बोलणे; हे ज्याला जमलं तो खरा जिंकला, असंच मला नेहमी वाटत आलं आहे. आणि अश्या हारकर जितनेवाले को बाजीगर-फिजीगर म्हणत नसतात, त्याला 'बर्फी' म्हणत असतात..!

'बर्फी' चं कथानक साधारणत: तीन कालखंडात विभागलेलं आहे. १९७२, १९७८ व आसपासचा काही काळ आणि मग थेट आज.
१९७२. 'श्रुती घोष' (इलिएना डि'क्रुझ), तीन महिन्यांवर लग्न ठरलेलं असताना दार्जीलिंगला येते आणि इथे तिची ओळख होते 'बर्फी' (रणबीर कपूर) शी. नेहमीच हसतमुख असणारा चुलबुला बर्फी मूक-बधीर असतो. ह्या मैत्रीचं रुपांतर नकळतच प्रेमात होतं. श्रुतीचं ठरलेलं लग्नही 'प्रेमविवाह'च असतो पण तरीही 'बर्फी'कडे आकर्षित होण्यापासून ती स्वत:ला रोखू शकत नाही. दार्जिलिंगमधील एक प्रतिष्ठित श्रीमंत चटर्जी (आशिष विद्यार्थी) ह्यांच्या वाहनचालकाचा एकुलता मुलगा बर्फी अर्थातच आर्थिकदृष्ट्या हलाखीत असतो. श्रुती आणि स्वत:मधील हा जमीन-अस्मानाचा फरक ओळखून तो स्वत:च तिला तिचं ठरलेलं लग्न करून सुखी राहाण्याचे पटवतो आणि तिच्या आयुष्यातून दूर जातो.
दुसरीकडे, चटर्जीची ऑटिस्टिक मुलगी झिलमिल (प्रियांका चोप्रा) - जिला तिच्या घरजावई वडील व व्यसनाधीन आईच्या जाचापासून दूर एका रेस्टहोममध्ये तिच्यावर भरपूर माया करणाऱ्या तिच्या गर्भश्रीमंत आजोबांनी ठेवलेलं असतं - परत दार्जिलिंगला येते कारण आजोबा शेवटच्या घटका मोजत असतात. झिलमिल आणि बर्फी लहानपणापासून एकमेकांना ओळखत असतात आणि सगळ्यांना हवाहवासा वाटणारा बर्फी झिलमिललाही बाकी दुनियेपेक्षा जास्त 'विश्वासू' वाटत असतो. आजोबा मरण्यापूर्वी सर्व मालमत्ता झिलमिलच्या नावाने एका ट्रस्टमध्ये ठेवून, झिलमिलच्या वडिलांना पगारदार नोकर म्हणून नियुक्त करतात. चवताळून उठलेला चटर्जी सासऱ्याच्या मृत्यूनंतर सर्व नोकरांना हाकलून देतो. बर्फीच्या वडिलांचीही नोकरी जाते आणि परिस्थिती अजूनच हलाखीची होते. दुष्काळात तेरावा महिना यावा तसं ते गंभीर आजारी पडतात आणि उपचारासाठी बऱ्याच पैश्यांची ताबडतोब गरज निर्माण होते.
ह्यानंतर बर्फी जे काही करतो, त्यामुळे तो एका विचित्र कोंडीत फसतो. एकीकडे कायदा आणि दुसरीकडे एक भावनिक बंध.. अश्या द्विधेत तो असताना परत एकदा श्रुतीशी त्याची भेट होते. पुढे काय होतं, कसं होतं हे 'बरंच काही' आहे. त्यासाठी सिनेमाच पाहायला हवा.

ही कथा मांडताना अनेक आव्हानं होती, असं मला जाणवलं -
१. गुंतागुंतीचं कथानक.
२. बऱ्याच मोठ्या कालखंडातील घटनाक्रम
आणि सगळ्यात महत्त्वाचं -
३. दोन्ही प्रमुख व्यक्तिरेखा संवादरहित.
पैकी आठवणींतून उलगडत जाणाऱ्या (Flashback) मांडणीमुळे पहिल्या दोन आव्हानांना दिग्दर्शक अनुराग बसूने आणि अप्रतिम अभिनयाच्या जोरावर तिसरं आव्हान अनुराग, रणबीर आणि प्रियांकाने मिळून व्यवस्थित पेललं.
ऑटिस्टिक व्यक्तीचं काम म्हणजे फक्त चेहरा मख्ख ठेवून, कबुतरासारखी मान हलवून आणि लाकडासारखं कडक होऊन चालून वावरणं नाही हे प्रियांकाचा अभिनय पाहिल्यावर शाहरुखला कळावं. (संदर्भ - माय नेम इज खान)
आत्तापर्यंतच्या मोजक्याच सिनेमांतून रणबीरने जी परिपक्वता दाखवली आहे, त्याला तोड नाही. एकाही, अगदी एकाही दृश्यात तो 'रणबीर' वाटत नाही. तो फक्त आणि फक्त 'बर्फी'च वाटतो. दु:ख, हताशा, विनोद, निरागसता अश्या वेगवेगळ्या छटांनी सजवून तो बर्फी असा काही आकर्षक रंगवतो की शारीरिक अपंगत्व, आर्थिक डबघाई, गुन्हेगारी बट्टा असं सगळं असतानाही एखाद्या सुशिक्षित सुसंस्कृत लग्न ठरलेल्या/ झालेल्या स्त्रीने त्याच्यात गुंतणं अजिबातच आश्चर्यकारक वाटत नाही.
नवा चेहरा 'इलिएना डि'क्रुझ', खूपच आशादायक आहे. तिचाही वावर अगदी सहज आहे आणि चेहऱ्यात एक मिश्कील गोडवा आहे.
इतर अभिनेत्यांमध्ये सौरभ शुक्लाचा पोलीस उपनिरीक्षक 'दत्ता' खूप प्रभावशाली. त्याची आणि बर्फीची काही दृष्यं खसखस पिकवतात, काही खळखळून हसवतात आणि उरलेली मनाला स्पर्श करून जातात. अनेक ठिकाणी चार्ली चाप्लीन व मि. बीन छाप धमाल आहे.
'प्रीतम'चं संगीत अतिशय म्हणजे अतिशय कर्णमधूर आहे. 'इतनीसी हसी, इतनीसी खुशी..' हे गाणं तर मनात घर करतं.

जराशी धीमी गती, जी बहुतकरून भारतीय सिनेमांची असतेच, वगळता 'बर्फी' अगदी बरोब्बर गोडीचा आहे. दातात कळ येईल इतकी जास्त गोडही नाही आणि प्युवर साजूक तुपातली जिभेवर ठेवताच विरघळणारी बर्फी जर तुम्हाला आवडत असेल, तर 'बर्फी'ही आवडेलच.

रेटिंग - * * * *

Thursday, September 13, 2012

नक्की होते हरणे माझे तरी खेळलो डाव..


नक्की होते हरणे माझे तरी खेळलो डाव
नकोस आणू बहादुरीचा उगाच आविर्भाव

होते घर माझेच तरीही होतो उपरा मीच
माझ्या नावाच्या पाटीवर तू चिकटवले नाव

ज्याच्या त्याच्या लेखी झालो मीच खरा बदनाम
म्हणून आलो परक्या देशी सोडुन माझा गाव

जे जे माझे होते ते ते सारे केले दान
अंगावरच्या कपड्यांची पण भिकाऱ्यास त्या हाव

ही दुनिया माझ्या शब्दाला पाळत होती चोख
मलाच कळले नाही माझा कधी उतरला भाव

प्रवास माझा चालू आहे, किती लोटला काळ
अजूनही पण मलाच माझा गवसेना का ठाव ?

मेलो मी, पण चालुन ये तू नव्या दमाने चाल
छातीवरती घावांसाठी अजून आहे वाव

बांधण्यास स्वप्नांची थडगी बरेच होते हात
'जितू', ह्याच हातांनी केले होते वर्मी घाव


....रसप....
१३ सप्टेंबर २०१२

Monday, September 10, 2012

चोरीलाही म्हणता येते उधार हल्ली

इथे-तिथे पडतात गझल बेसुमार हल्ली
फुटकळ लिहिणाराही झाला हुशार हल्ली

अनुभूती अन् अभिव्यक्तीचा पत्ता नाही
सांभाळुन वृत्तास लिहावे टुकार हल्ली

शेपुट म्हणून जोडुन द्यावे रदिफ-कवाफी
मिसरे सरपटणारे झाले चिकार हल्ली

चुलीवरी दुसऱ्याच कुणाच्या शिजवा खिचडी
चोरीलाही म्हणता येते उधार हल्ली

आविर्भाव असा आणा की 'गझलदेव मी'
खरे काय? हा कुणी करेना विचार हल्ली

'जितू' तुझा तू तुझ्याचपुरता होय शहाणा
ज्याला त्याला अभिमानाचा विकार हल्ली !

....रसप....
१० सप्टेंबर २०१२

Sunday, September 09, 2012

म्हातारा

नाक्यावरच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरचे घर
तिथे राहतो म्हातारा वय त्याचे अंदाजे सत्तर
सारी गल्ली त्याला म्हणते खडूस अन माणुसघाणा
खुरटी दाढी वाढवून तो दिसतोही ओंगळवाणा

रोज सकाळी लौकर उठतो विविधभारती वाजवतो
खोकुन-खोकुन मोठ्याने तो शेजाऱ्यांना जागवतो
चहा ठेवताना हातातुन रोज निसटते पातेली
'ठठम् ठठम्' ऐकून वाहते कुणी तरी मग लाखोली !

मंद पावले टाकत टाकत पहाट जेव्हा ओसरते..
उजेड झाल्यावर मग स्वारी फिरून येण्याला निघते
नित्यक्रमाने चार वेगळ्या कोड्यांचे पेपर घेई
लाल-पांढऱ्या फुलांस वेचुन परतुन म्हातारा येई

शुचिर्भूत झाल्यावर होई देवपुजा, घंटा खणखण
खिडकीपाशी खुर्ची नेउन डोळा लागे क्षणैक पण
मग सोडवतो पेपरातली एक-एक सारी कोडी
करता करता सकाळमागुन दुपारही सरते थोडी

असेच सरले जीवनसुद्धा संध्याकाळच उरलेली
अशीच सुटली सारी कोडी सुटूनही ना कळलेली
लौकर उगवे दिवस रोजचा सरून जाई, सांज उरे
एकांकी मरण्याची भीती म्हाताऱ्याला पिसे करे

खिडकीपाशी बसल्या बसल्या म्हातारा बडबड करतो
नाक्यावरचा कुणी टपोरी हसून वेड्याला बघतो
असाच म्हाताऱ्याचा मुलगा त्याच्यावर हसला होता
जेव्हा परदेशातुन त्याला परतुन बोलवला होता

म्हातारी तर मरून गेली मुलास त्या हाका मारुन
म्हाताऱ्याच्या डोळ्यामधले पाणीही गेले वाळुन
दिसायला दिसतो म्हातारा खडूस अन माणुसघाणा
पण त्याच्या चर्येवरती का भाव दिसे केविलवाणा ?

....रसप....
८ सप्टेंबर २०१२

Friday, September 07, 2012

सुखास माझ्या कधीच नव्हता दु:खाचाही धाक


सुखास माझ्या कधीच नव्हता दु:खाचाही धाक
मी हसताना पाहुन माझे दु:ख मुरडते नाक !

जबाबदाऱ्या वाढत गेल्या जसे वाढले वय
ओझे वाहुन पाठीला ना कधीच आला बाक

संसाराच्या रहाटगाड्याची अडखळती चाल
परंतु वंगण सरल्यावरही पुढेच जाते चाक

लळा जिव्हाळा नको वाटतो, करून झाले प्रेम
तोंड पोळल्याचे कळल्यावर फुंकुन प्यावे ताक

एकच होता तुझ्या स्मृतीचा मनात जपला क्षण
स्वर्गाच्या दारावर लिहिले होते 'झटकुन टाक!'

मनात म्हटले बघुन मंदिराचे छोटेसे दार
'जितू, जबरदस्तीने आता दगडासमोर वाक !'


....रसप....
६ सप्टेंबर २०१२

Thursday, September 06, 2012

आरसा नेहमी खरं बोलतो.. (उधारीचं हसू आणून.... भाग - २)


२.
आरसा नेहमी खरं बोलतो
जे आहे.. जसं आहे..
तसंच्या तसं दाखवतो
पण.. तोही मला फसतो !
कारण, त्याला फक्त माझा चेहराच दिसतो
त्याला तेच दिसतं,
जे मी दाखवतो..

मी त्याला दाखवतो...
माझ्या खिश्यातले पैसे
तो खूष होतो... म्हणतो "मी श्रीमंत आहे!"

मी त्याला दाखवतो...
माझे नीटनेटके कपडे
तो चमकतो.. म्हणतो "मी राजबिंडा आहे !"

मग मी त्याला दाखवतो
तुझी छबी.. माझ्या डोळ्यात असलेली
तो हबकतो.. म्हणतो, "मी नशीबवान आहे!"

त्याच्या निरागस भोळेपणाचं
मला कौतुक वाटतं
मला बघून नेहमी आनंदण्याचं
मला कौतुक वाटतं

मग मीही त्याच्यासोबत खूष होतो
त्याला थोडं अजून फसवून..
मी नशीबवान असल्याचं मान्य करतो
उधारीचं हसू आणून...

....रसप....
२० मार्च २०१२


उधारीचं हसू आणून.... (भाग - २)


घरी जाणं रोजच जीवावर येतं.. (उधारीचं हसू आणून....भाग - २)

१.

घरी जाणं रोजच जीवावर येतं
डोळ्यात खुपतं ते घर, रितं-रितं
त्या भिंतींना सुरकुत्या पडल्या आहेत
दारं-खिडक्या केविलवाणे आवाज करून रडतात

माझी आवडती आरामखुर्ची
हिरमुसून कोपऱ्यात जाऊन बसली आहे
आणि छत...
सताड, कोरड्या, निस्तेज डोळ्यांनी
माझ्याकडे रात्र रात्रभर टक लावून पाहात असतं..
की कधी मी तुझं नाव उच्चारीन
कधी भावनांच्या पायात घातलेल्या
उदासीनतेच्या बेड्यांना तोडीन
कधी बांध फुटेल मनाचा
आणि घरासारखाच रिता-रिता होईन एकदाचा

रोजच्या वळणांची पावलांना सवय झाली आहे
आपोआप घरापर्यंत येतात..
आणि मग मीही येतोच त्यांच्या मागून
जीवावर आलेलं असतानाही
उधारीचं हसू आणून....

....रसप....
१९ मार्च २०१२


उधारीचं हसू आणून.... (भाग - २)



उधारीचं हसू आणून.... (भाग - २)

१.

घरी जाणं रोजच जीवावर येतं
डोळ्यात खुपतं ते घर, रितं-रितं
त्या भिंतींना सुरकुत्या पडल्या आहेत
दारं-खिडक्या केविलवाणे आवाज करून रडतात

माझी आवडती आरामखुर्ची
हिरमुसून कोपऱ्यात जाऊन बसली आहे
आणि छत...
सताड, कोरड्या, निस्तेज डोळ्यांनी
माझ्याकडे रात्र रात्रभर टक लावून पाहात असतं..
की कधी मी तुझं नाव उच्चारीन
कधी भावनांच्या पायात घातलेल्या
उदासीनतेच्या बेड्यांना तोडीन
कधी बांध फुटेल मनाचा
आणि घरासारखाच रिता-रिता होईन एकदाचा

रोजच्या वळणांची पावलांना सवय झाली आहे
आपोआप घरापर्यंत येतात..
आणि मग मीही येतोच त्यांच्या मागून
जीवावर आलेलं असतानाही
उधारीचं हसू आणून....

....रसप....
१९ मार्च २०१२

====================

२.
आरसा नेहमी खरं बोलतो
जे आहे.. जसं आहे..
तसंच्या तसं दाखवतो
पण.. तोही मला फसतो !
कारण, त्याला फक्त माझा चेहराच दिसतो
त्याला तेच दिसतं,
जे मी दाखवतो..

मी त्याला दाखवतो...
माझ्या खिश्यातले पैसे
तो खूष होतो... म्हणतो "मी श्रीमंत आहे!"

मी त्याला दाखवतो...
माझे नीटनेटके कपडे
तो चमकतो.. म्हणतो "मी राजबिंडा आहे !"

मग मी त्याला दाखवतो
तुझी छबी.. माझ्या डोळ्यात असलेली
तो हबकतो.. म्हणतो, "मी नशीबवान आहे!"

त्याच्या निरागस भोळेपणाचं
मला कौतुक वाटतं
मला बघून नेहमी आनंदण्याचं
मला कौतुक वाटतं

मग मीही त्याच्यासोबत खूष होतो
त्याला थोडं अजून फसवून..
मी नशीबवान असल्याचं मान्य करतो
उधारीचं हसू आणून...

....रसप....
२० मार्च २०१२

====================

३.
त्याने विचारलं, "रडत का नाहीस?"
मी म्हटलं, "माहित नाही."
त्याने विचारलं, "चिडत का नाहीस?"
मी म्हटलं, "माहित नाही"
त्याने विचारलं, "का झालास उद्ध्वस्त?"
मी म्हटलं, "माहित नाही!"
त्याने विचारलं, "कसा रे तू इतका आश्वस्त?"
मी म्हटलं..... "माहित नाही!!"
तो कंटाळला.. म्हणाला, "माहित तरी काय आहे?"
मी म्हटलं.. "माहित नाही!"

अखेरीस तो गप्प झाला..
मी छद्मी हसलो.. अन् बोललो,
"अरे नशिबा.. तू तर जन्मजात रडका आहेस..
पिढीजात चिडका आहेस..
म्हणूनच फुटका आहेस!!
पण मी तसा नाही....

तू खरडलंस काही-बाही माझ्या कपाळावर
अगदी दात-ओठ खाऊन..
अन् मी त्याचाही स्वीकार केला..
उधारीचं हसू आणून.....

....रसप....
२२ मार्च २०१२
====================

४.
आज परत एकदा प्रेमात पडावं म्हणतो..!

दु:खाची नशा आणि वेदनेची झिंग
उतरत चालली आहे
जगण्यातली गंमत आणि जळण्यातली मजा
ओसरत चालली आहे

परत एकदा नख लावायचंय
काळजातल्या हळव्या पडद्याला
अन अनुभवायचाय तोच एक शहारा..
पापणीवर तरळून आभाळ हेलावणारा

परत एकदा मनाच्या दगडाला पाझर फुटेल
अन डोळ्यांच्या विहिरी भरतील
हळव्या हवेच्या झुळुकीने
वाळलेली पानं उडतील..

परत एकदा घ्यायचीय
काटेरी उबदार शाल ओढून
अन फुटून ठिकऱ्या उडालेल्या स्वप्नांना
परत एकदा जोडायचंय
उधारीचं हसू आणून....

....रसप....
२२ मार्च २०१२

====================

५.


उसळणाऱ्या लाटांनी
किनारा भिजतो
अन उधाणलेल्या वाऱ्याने
क्षणार्धात सुकतो

मीही चार इंचाच्या पेल्यात
स्वप्नं भिजवून घेतो
आणि सगळ्यांच्या नकळत
पापण्यांना देतो !

स्वप्नं असतात -
कधी तिची
कधी माझी
कधी जे जमलं नाही त्याची
कधी जे उरलं नाही त्याची
कधी हातून निसटलेली
कधी गुपचूप हरवलेली
कधी इतस्तत: विखुरलेली
कधी मुद्दामच उधळलेली

पण सकाळ होते..
आणि मिटलेल्या पापणीतल्या अंधाराला
उजेड देते, वास्तव दाखवते
नकली प्रसन्नतेच्या रखरखीत वाऱ्याने
परत पापणी सुकते

रुजवायला भिजवलेली स्वप्नं
डोळ्यात उरतात रुतून
मी नव्या दिवसाचं स्वागत करतो
उधारीचं हसू आणून....

....रसप....
२९ मार्च २०१२

====================


६.
तू असतानाच्या आठवणी..
आठवणीतला एकेक क्षण
डोळ्यात साठवला होता...
त्या एकेक क्षणाने डोळ्यातलं पाणी शोषलं आहे

शेवाळलेल्या हिरवट डबक्यातल्या चिखलात
जसं कमळ उमलतं..
तसं त्या आठवणींतून उमलतात काही शब्दपाकळ्या..
आणि फुलते कविता..

रोज कातरवेळी माझं मन
मीच स्वत: लपवतो
त्या कमळाच्या मिटणाऱ्या पाकळ्यांत
आणि रोज सकाळी
एका प्रसन्न कवितेच्या उमलत्या पाकळ्यांतून
ते बाहेर येतं.... सुगंधित होऊन
अन दिवसभर बागडतं...
.
उधारीचं हसू आणून....

....रसप....
९ ऑक्टोबर २०१२

====================

७.

दु:ख फुलपाखरासारखं..!
मी अनेकदा अलगद चिमटीत पकडलंय
अगदी निरागस शांतपणे
ते दोन बोटांना शरण आलंय
त्याचा तो मलमली स्पर्श..
मोहवणारे रंग..
पण तो निष्पाप चेहरा..
मन भरून न्याहाळल्यावर
मी जेव्हा पुन्हा त्याला सोडून देतो..
इथे तिथे बागडायला..
तेव्हा बोटांवर राहतो
एक करडा रंग
त्याच्या पंखांचाच रंग मागे राहिलेला असतो
पण पंखांवर बोटांचा ठसा मात्र नसतो

असंख्य फुलपाखरं अवतीभवती असतात
मी पुन्हा पुन्हा
चिमटीत पकडण्याचा प्रयत्न करत असतो
एकावर तरी माझा ठसा उमटेल म्हणून
अन् दरवेळी फक्त बोटांवरचा करडा
रंग पाहात राहातो -
उधारीचं हसू आणून....

....रसप....
०३ मार्च २०१३

====================

८.
उबदार काळी शाल ओढून घेतल्यावर
माझी माझ्याशीच
एक अस्वस्थ कुजबुज सुरु होते
स्वत:कडे पाठ फिरवण्यासाठी
मी कूस बदलतो
मिटलेले डोळे गच्च आवळतो
थोडा वेळच, मग टक्क उघडतो
भिंतीवरच्या घड्याळ्याच्या टिकटिकीतून
एक क्षण निसटल्याचं जाणवतं
आणि छातीत काही तरी हेलावतं
पुन्हा एकदा एक कुजबुजणारी रात्र
डोळ्यांतून मनात झिरपणार असते

बाजूच्या निश्चल उशीच्या
कोरड्या अनभिज्ञतेतून
छळणारा तिचा आणि माझा एकटेपणा
काळोखाला छेदत दूरवर पसरतो

आणि एका बेसावध क्षणी
रात्र गुपचूप निघून जाते
मला जागं ठेवून
अनभिज्ञ उशी बघत असते सगळं
उधारीचं हसू आणून..

....रसप....
३ सप्टेंबर २०१३ 

उधारीचं हसू आणून.. भाग - १
Related Posts Plugin for WordPress, Blogger...