Saturday, July 29, 2017

कंटाळवाणी फसवणूक - इंदू सरकार (Movie Review - Indu Sarkar)

नुकताच 'डंकर्क' बघितला. दुसरे महायुद्ध आणि त्याच्याशी संबंधित पात्रं व घटना ह्यांच्यावर आधारित कित्येक परदेशी सिनेमे बनत असतात. अगदी कृष्ण-धवल कालापासून ते आत्ताच्या अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाच्या काळापर्यंत ह्या एका विषयाने अनेक लोकांना प्रेरित केलं आहे. राहून राहून मला नेहमी वाटायचं की फाळणी, १९७५ साली लादली गेलेली आणीबाणी, ईशान्येकडील राज्यांचे प्रश्न, भारताचं श्रीलंकेमधलं ऑपरेशन पवन, चीन आणि पाकिस्तानसोबत झालेली अनेक युद्धं व कित्येक लहान-मोठ्या मोहिमा, इंदिरा गांधींची हत्या, राजीव गांधींची हत्या, बाबरी मशीद, गोधरा वगैरे महत्वाच्या शेकडो स्वातंत्र्योत्तर घटनांना हिंदी सिनेमा कधी सशक्त परिपक्वतेने हाताळणार ? ह्या अनेक घटनांपैकी काहींना हात घालायचे काही बरे-वाईट प्रयत्न झाले आहेत. पण पुरेसं नाहीच. त्यातही १९७५ साली लादलेली आणीबाणी तर एक प्रकारचा 'टॅबू' च !
त्यामुळे 'इंदू सरकार' विषयी ऐकल्याबरोबर उत्सुकता वाटत होती. आणीबाणीविषयीचा सिनेमा फक्त आजच्या काळातच बनू शकतो. उद्या सरकार बदललं, तर हा विषय पुन्हा एकदा दाबून ठेवला जाणार. त्यामुळे सिनेमाचं उत्तम टायमिंगसुद्धा दाद घेऊन गेलं.

पण बहुतेक अपेक्षांच्या फुग्यात आपण जितका जीव फुंकावा तेव्हढा त्याचा धमाका मोठा होत असावा !
एका स्फोटक, जोरदार, वेगवान, थरारक आणि हादरवणाऱ्या सिनेमाच्या अपेक्षेने मी गेलो आणि एक मिळमिळीत, रटाळ, विस्कळीत, मरतुकडा आणि कंटाळवणारा सिनेमा पाहून आलो.

सगळ्यात मोठा आणि घोर अपेक्षाभंग म्हणजे 'इंदू सरकार' ह्या नावाशी इंदिरा गांधींचा काही एक संबंध नाही ! 'सरकार' हे त्या व्यक्तिरेखेचं आडनाव आहे, त्याचा अर्थ 'गव्हर्न्मेंट, शासन' वगैरे नाही. अर्थात, हे मला आधीच समजलेलं होतं. तरी, कुठे तरी काही तरी रिलेट होईल असं वाटलं होतं. इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी आणि त्याचे परिणाम भोगणारे काही लोक, अशी ही कहाणी आहेच. तेव्हढा सूचक संबंध आहे. पण 'इंदिरा गांधी' ही व्यक्तिरेखा (सुप्रिया विनोद) केवळ काही सेकंदांपुरती पडद्यावर झळकते, त्यातही एक शब्दही बोलत नाही. फक्त दिसते. त्याव्यतिरिक्त संपूर्ण सिनेमात १-२ वेळा संजय गांधींचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 'चीफ'च्या (नील नितीन मुकेश) 'मम्मी' म्हणून उल्लेख होतो. बस्स् !

ही कहाणी मुख्यत्वेकरून आहे 'इंदू सरकार' (कीर्ती कुल्हारी) ची. इंदू एका अनाथालयात वाढलेली असते. एक उच्चपदस्थ सरकारी अधिकारी 'नवीन सरकार' (तोता रॉय चौधरी) तिचा पत्नी म्हणून स्वीकार करतो. आणीबाणीच्या काळात एक उच्चपदस्थ अधिकारी म्हणून 'नवीन'ची जबाबदारीतून आलेली निष्ठा आणि इंदूला अनुभवातून झालेली माणुसकीची जाणीव ह्यांचा संघर्ष आणि मग त्यांचा स्वतंत्रपणे विरुद्ध मार्गांवर प्रवास हा ह्या कथानकाचा गाभा.



आणीबाणीच्या काळात विविध कारवायांच्या वरवंट्याखाली भरडल्या गेलेल्या जनतेचे हाल अत्यंत फिल्मी उथळपणे दाखवले आहेत, हा अजून एक अपेक्षाभंग. व्यथित मनांचा आणि शोषित जनांचा आकांत दाखवताना 'आक्रोश' दाखवणं आवश्यक नसतं, हे आपण का समजू शकत नाही कुणास ठाऊक ! आरडाओरडा, पळापळ, गोंधळ, कल्लोळ वगैरे अंदाधुंदी दाखवली म्हणजे ते अंगावर येतच असतं असं नक्कीच नाही. योग्य सूर वाजण्यासाठी योग्य तार छेडली जायला हवी. त्यासाठी संयम आणि ठहराव हवा, तो कधी अंगी बाणणार आहे ? पोलीस कमिशनर मिश्रा (झाकीर हुसेन) प्रसंगी भडक आणि प्रसंगी फिल्मी का असायला हवा होता ? त्याचं निर्दयीपण फक्त त्याच्या कृतींतून दिसलं असतंच की !

'चार आने की मुर्गी को बारा आने का मसाला' हे सूत्रही आपण कधी टाळणार आहोत ? आणीबाणीच्या काळातला एका स्त्रीचा संघर्ष दाखवण्यासाठी ती अनाथ असणं, तिने तोतरं असणं का आवश्यक आहे ? तिचा तोतरेपणा तर एक सपशेल मूर्खपणे जोडलेलं अनावश्यक ठिगळच आहे. ह्या असल्या फालतू पसाऱ्यामुळे मुख्य विषयापासून भरकटायला तर होतंच आणि अनावश्यक लांबी वाढते ते वेगळंच ! जेव्हा इंदू कोर्टात सरकारी वकिलाला 'जनता भी 'इनफ' कह रही हैं' असं म्हणते, तेव्हा आपणही मधुर भांडारकरला मनातल्या मनात 'इनफ' म्हणतो.

'फॅशन' नंतर आलेल्या एकेका फिल्मनिशी मधुर भांडारकरचा आलेख उतरत चालला आहे. रामू आणि भांडारकर ह्यांच्यातला हा एक दुर्दैवी समान दुवा आहे. एखाद्या दमदार विषयावर सिनेमा बनवून तो विषय वाया घालवण्याचं कर्तृत्व गेल्या काही महिन्यांत बेगम जान, मोहेंजोदडो, सरबजीत, मेरी कोम अश्या काही सिनेमांनी गाजवलं होतं. 'इंदू सरकार' ह्या सगळ्यांचा शिरोमणी आहे. उल्लेखलेले सर्व सिनेमे 'सुसह्य' ते 'चांगला' ह्या पट्ट्यात होते. 'इंदू सरकार' मात्र ह्या पट्ट्याच्या बाहेर नकारात्मक बाजूला असावा.
निर्बुद्ध पटकथा आणि दिग्दर्शकाची पकडही बऱ्यापैकी ढिली पडलेली असतानाही प्रमुख कलाकारांची कामं मात्र चांगली झाली आहेत, हा एक दिलासा ! कीर्ती कुल्हारीने 'पिंक'मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता. 'इंदू'च्या व्यक्तिरेखेचं अडखळत बोलणं अनावश्यक असल्यामुळे कंटाळा जरी आणत असलं, तरी कीर्तीचा प्रयत्न कुठेच कमी पडलेला नाही. तोता रॉय चौधरीसुद्धा छाप सोडतो. एक रुथलेस सरकारी प्रशासक आणि कधी समंजस तर कधी वर्चस्व गाजवणारा पती, असे त्याच्या व्यक्तिरेखेचे कोन आहेत, जे त्याने उत्तम प्रकारे सादर केले. अनुपम खेर, शिबा चढ्ढा, अंकुर विकल सहाय्यक भूमिका चोखपणे करतात.
'नील नितीन मुकेश' मात्र जबरदस्त प्रभाव सोडतो. त्याचा गेटअपही उत्तम जमून आला आहे. लेखकाचं बॅकिंग न मिळाल्यामुळे त्याचा 'चीफ' हा अक्षरश: वाया गेला आहे. सिनेमातील एकमेव दृश्य नकारात्मकता म्हणजे 'चीफ' आहे. तो पुरेसा व्यक्त न झाल्यामुळे सिनेमातला संघर्ष पुरेसा वाटत नाही.

हे वर्ष अनु मलिकसाठी नक्कीच चांगलं ठरत आहे.
गाण्यांना फारसा वाव नसला, तरी 'यह पल..' आणि 'यह आवाज हैं..' ही गाणी खूप सुंदर जमली आहेत. 'यह आवाज हैं..' त्याच्या ओळखीच्या चालीमुळे मनात रुंजी घालत राहतं. ज्यांनी अजीझ नाझानच्या ओरिजिनल 'चढता सूरज..' पारायणं केलीयत, त्यांना मात्र त्याचं नावं वर्जन अंमळ सपकच वाटेल. तरी, एकंदरीत संगीत आणि पार्श्वसंगीतही एक दिलास्याचाच भाग आहे.

सरतेशेवटी एक शे'र आठवतो आहे.

किस से उम्मीद करें कोई इलाज-ए-दिल की
चारागर भी तो बहुत दर्द का मारा निकला
-  लुत्फ़-उर-रहमान

मधुर भांडारकर, अगदी गेल्या काही सिनेमांतल्या सुमारपणानंतरही, एक दमदार नाव आहे आजच्या जमान्यातलं. पण त्याच्या सिनेमांमुळे पुन्हा पुन्हा होणाऱ्या अपेक्षाभंगानंतर आव्हानात्मक किंवा 'टॅबू' बनलेले विषय आपल्याकडे हाताळणार कोण ? असा प्रश्नच पडतो आहे.

रेटिंग - * *

- रणजित पराडकर

Tuesday, July 18, 2017

जग्गा जासूस आणि 'पण..'! (Jagga Jasoos - Hindi Movie)


खरं तर, 'जग्गा जासूस' पाहून ३-४ दिवस झाले. नक्की काय लिहावं, हा विचारच संपत नव्हता. किंवा माझं नक्की मत काय आहे, सिनेमा किती आवडला, किती नाही, हे ठरवताना माझाच गोंधळ उडत होता बहुतेक. Let's see.
मुळात, मी सिनेमा फक्त एका आणि एकाच कारणासाठी पाहिला होता.
'रणबीर कपूर'.
कुणी काहीही म्हणा, आपल्याला हा माणूस भारी आवडतो. Acting Skills, Looks, Screen Presence, Dancing Skills अश्या सगळ्याचं इतकं उत्तम मिश्रण सध्या तरी इतर कुणातच मला दिसत नाही. तसं म्हणायला, 'शाहीद कपूर'सुद्धा एक जबरदस्त पॅकेज आहे. म्हणून हे दोघे माझे सगळ्यात आवडते अ‍ॅक्टर्स किंवा स्टार्स - काय हवं ते म्हणा - आहेत.
तर, रणबीरचं काम अप्रतिम झालं आहे. बराचसा 'बर्फी'सारखा रोल आहे. त्याने तो त्याच ताकदीने केलाय. त्यामुळे मी ज्यासाठी सिनेमा पाहिला, ते मला नक्कीच मिळालं.
पण, रणबीरला कंसाच्या बाहेर काढलं तर कंसाच्या आत काय उरतं?

'जग्गा जासूस' हा अख्खा सिनेमा यमकायमकी आणि गाण्यांतून उलगडत जातो. This is really something different. सिनेमातून गाणी, संगीत पूर्णपणे हद्दपार करण्यात कलात्मकता मानणाऱ्या दिग्दर्शकांचा हा जमाना आहे. ह्या प्रवाहाच्या विरुद्ध कुणी एखादी संगीतिका बनवणं, हे एक खरोखर धाडसाचं काम आहे. ह्या धाडसाला मनापासून दाद द्यायला हवीच. दिलीच.
पण 'धाडस करायचं' म्हणून कुणी हत्तीला चड्डी घालत असतं का ?
आणि घालायचीच असेल तर काही तरी प्लानिंग तर करा, राव !
I mean, संगीतिका बनवायची होती ? उत्तम आयडिया ! पण त्यासाठी 'प्रीतम'च सापडतो ? फुकट काम करतो का तो ?
बरं, ठीक आहे, हरकत नाही. घेतला प्रीतम. पण मग त्याच्याकडून काम तरी करून घ्याल की नाही ? प्रेक्षकाच्या डोक्यावर तब्बल पावणे तीन तास बादल्या-बादल्या भरून म्युझिक ओतायचा प्लान आहे तुमचा. भिजला पाहिजे की थिजला पाहिजे ? की बधीर झाला पाहिजे ?
बेसिकली, स्वत:च्या एकसुऱ्या शैलीतून बाहेर पडून एकाच सिनेमासाठी २०-२२ गाणी देण्याची कुवत, तेव्हढा वेळ, पेशन्स आज कुणाकडे आहे, हा प्रश्न तरी तुम्हाला पडला का ?
आणि संगीतकाराकडून काम काढून घेईल असा चोखंदळ डायरेक्टर तरी कोण आहे आज ? एका गाण्यासाठी १०-१०, १२-१२ चाली नाकारणाऱ्या राज कपूरसारखा कुणी तरी आहे का सध्या ?

ही झाली नाण्याची एक बाजू. दुसरी बाजू, म्हणजे समजा जमवलंच एखाद्याने. खरोखर 'सुश्राव्य' म्हणता येईल असं म्युझिक कुणी दिलंच, तर ?
देणारा देईलही, पण....
ऐकणाऱ्या लोकांसाठी आत्ताच्या काळात 'म्युझिक' म्हणजे 'नॉईस' असं एक समीकरण झालं आहे. त्यात दणदणीत 'बीट्स' असले पाहिजेत. गाणारा/री तार सप्तकात उधळले पाहिजेत. गाणं ऐकताना लोकांचं हृदय तोंडात आलं पाहिजे आणि दोन कान सर्वांगाला व्यापून उरले पाहिजेत.
लोकांना 'खाना खा के दारू पी के चले गये' मध्ये 'बीट्स' आवडणार आहेत, 'गलती से मिस्टेक' मध्ये एनर्जी दिसणार आहे. हे सगळं गाणी बनवणाऱ्यालाही माहित आहेच ! त्यामुळे लोकांना जे आवडतं, तेच 'जग्गा जासूस' मध्ये दिलंय. पण लोकांना जे आवडतं, त्यालाच आता काही दर्जा राहिलेला नाही, तर जे दिलंय ते न आवडल्यास त्यात आश्चर्य काय ?

फार जुनी नावं नकोच. जरा नवीन-नवीनच घेऊ. म्हणजे नदीम-श्रवण, जतीन-ललित, आनंद-मिलिंद वगैरे. ह्यांचा काळ म्हणजे 'नॉस्टॅल्जिक नाईन्टीज'. अर्थात, तोसुद्धा फार काही सांगीतिक श्रीमंतीचा वगैरे नव्हता. पण तरी, तेव्हासुद्धा खूप मेलडी बेस्ड गाणी बनायची. 'साजन'सारख्या अस्सल व्यावसायिक टुकारपटाचं टायटलसुद्धा प्रचंड 'ठहराव'वालं कंपोजिशन होतं. आज सिनेमाचं टायटल किंवा मुख्य गाणं कोण असं बनवेल ? आणि बनवलं, तरी 'रटाळ' ठेक्यातला तो 'रडीयल'पणा कुणाला पचणार आहे ?
शाहरुखचे सिनेमे नेहमीच म्युझिकली श्रीमंत असायचे. पण अलीकडच्या काळात त्याला 'लुंगी डान्स' करताना पाहून आणि नंतर 'हॅप्पी न्यु इयर' वगैरेतल्या भंकस गाण्यांसोबत पाहून मी मनातल्या मनात सिनेसंगीताच्या फोटोला हार घातला होता. संपलं होतं ते माझ्यासाठी.

कडवट सत्य हे आहे की, चांगलं संगीत बनवायची नियत, कुवत आणि हिंमत आजच्या जमान्यातल्या कुठल्याही संगीतकारात किंवा दिग्दर्शक-निर्मात्यात नाहीय आणि चांगलं संगीत स्वीकारायची आवड, जाण आणि किंमत आजच्या प्रेक्षकालाही नाहीय !
'जग्गा जासूस' ने कंटाळा आणला नाही, त्याच्यातल्या 'उणे ड' दर्ज्याच्या सुमार संगीताने वात आणला.
एरव्ही मला रणबीरही आवडला, कतरिनाही जितकी जास्तीत जास्त आवडू शकते तितकी आवडली आणि प्रेझेन्टेशनही आवडलंच. व्हीएफएक्स मेजर गंडले असले, तरी बाकी सगळं टेक्निकली चांगलं वाटलं होतं.

पण म्युझिक ! तुमसे ना हो पायेगा !

हिंदी सिनेमात इथून पुढे बायोपिक, स्पोर्ट्सड्रामा, डॉक्यु-ड्रामा, थ्रिलर, कॉमेडी, सस्पेन्स, हॉरर, नॉयर-फॉयर काय म्हणाल ते सगळं काही बनेल एक वेळ, पण उत्तम 'म्युझिकल' ? तो मात्र कधीही बनू शकणार नाही. सिनेमाच्या शेवटी 'सीक्वल'चा संकेत दिला आहे. तोसुद्धा 'म्युझिकल'च असणार असेल तर अजून एक 'डिबॅकल' नक्कीच. कारण आपल्याकडे आता 'म्युझिकल' बनूच शकत नाही.
किसी माय के लाल में वोह दम नहीं रहा.

टॉपिक इज ओव्हर.

- रणजित पराडकर

Monday, July 10, 2017

शब्दाचे शब्दासोबत नातेच जाणवत नाही

शब्दाचे शब्दासोबत नातेच जाणवत नाही
हृदयाचे स्पंदन आता गाण्यातुन वाजत नाही

डोहामध्ये उतरावे, अर्थाचा तळ शोधावा
एखाद्या शिखरासाठी गगनाचा आशय द्यावा
प्रतिभेला काय हवे ते लिहिताना समजत नाही
....... शब्दाचे शब्दासोबत नातेच जाणवत नाही

मेघांच्या गडगडण्याचा धरतो न कुणीही ठेका
खळखळता सूर प्रवाही झाला केव्हाचा परका
मी बरेच ऐकुनदेखिल काहीही ऐकत नाही
....... शब्दाचे शब्दासोबत नातेच जाणवत नाही

हे शब्दठोकळे सगळे एका साच्यातुन आले
कल्लोळ रोजचे ह्यांचे आता सवयीचे झाले
मी कंटाळतही नाही अन् मी वैतागत नाही
....... शब्दाचे शब्दासोबत नातेच जाणवत नाही

....रसप....
३० जून २०१७

Saturday, July 08, 2017

मॉम - श्रीदेवीचा ओव्हरडोस (Movie Review - Mom)

'आई' हा प्रत्येकासाठीच एक हळवा कोपरा असतो. इतका हळवा की केवळ आईसाठी लिहिलेल्या आहेत म्हणून 'आई म्हणजे एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं' असल्या यमकायमकीसुद्धा खूप भारी वाटत असतात किंवा केवळ आईविषयी आहे म्हणून अनेक सिनेमातली बाष्कळ गाणी आणि सपक संवादही टाळ्या घेऊन जातात. उदा. - 'कुछ कुछ होता हैं' मध्ये आईविना असलेल्या लहान मुलीला शाळेत 'आई'वर बोलायला सांगितल्यावर बाबा शाहरुखने केलेली ओव्हर अ‍ॅक्टिंग.
हा हळवा कोपरा हेरून असेल किंवा नकळतही असेल, पण श्रीदेवीसारख्या सामान्य वकुबाच्या अभिनेत्रीने तिच्या करियरच्या सेकंड इनिंगची सुरुवात करताना पहिल्या सिनेमात एका आईची भूमिका केली होती. अर्थात, त्या भूमिकेला इतरही काही कंगोरे होते आणि as the say, the movie had its heart at the right place.
पण 'मॉम'......
Well, I doubt !

'मॉम' मध्ये अख्ख्या सिनेमाभर श्रीदेवी, श्रीदेवी आणि श्रीदेवीच आहे. तिचा रोल फक्त 'ऑथर बॅक्ड'च नाही तर 'ऑथर सॅक्ड' (हे असं-असं लिही, नाही तर सॅक करू, असं धमकावल्यासारखा) आहे. तुम्ही जर तिचे मनस्वी चाहते असाल, तर ठीक. अदरवाईज, हे असह्य आहे ! कारण वर्षानुवर्षं हिंदी सिनेमात काम करूनही श्रीदेवीला हेमा मालिनीप्रमाणेच अजूनही नीट हिंदी बोलता येतच नाही. 'घर' ऐवजी 'गर' वगैरे गलिच्छ उच्चार आणि जोडीला अति-अभिनयाचा डोस मिळतो !
नवाझुद्दिन सिद्दिकीसारखा सध्याच्या सिनेजगतातला 'डार्क हॉर्स' सिनेमात उगाच आहे. त्याचा बदललेला गेट-अपसुद्धा उगाच आहे. कदाचित त्या रोलमध्ये काही दम नसल्याने थोडा तरी हायलाईट व्हावा ह्यासाठीचा तो केविलवाणा प्रयत्न असावा. त्याने तो जसा आहे त्याच गेटअप मध्ये रंगवलेले पोलिस ऑफिसर्स 'कहानी' आणि 'रईस'मध्ये दाद घेऊन गेले होते. इथला त्याचा रोल एका खाजगी 'डिटेक्टिव्ह'चा आहे. ज्या एनर्जीने त्याने खान आणि मजमुदार साकारले होते, तीच एनर्जी इथेही दिसू शकली असती, पण दाखवायचीच नव्हती. सिनेमाभर फक्त श्रीदेवीला दाखवायचं होतं, म्हणून घालवला वाया !
तीच कथा अक्षय खन्नाची.
त्याचा पोलीस ऑफिसरसुद्धा एक दमदार कॅरेक्टर होऊ शकलं असतं.
नकारात्मक भूमिकेत 'अभिमन्यू सिंग' हा अजून एक तगडा अभिनेता आहे. त्याला तर समोर येऊच दिलं नाहीय !
अदनान सिद्दिकी आणि सजल अली, ह्या दोन पाकिस्तानी कलाकारांना सिनेमात घेतल्याबद्दल निर्मात्यांनी 'सैनिक फंडा'ला देणगी दिली असावीच. त्यांच्यावर इतका खर्च झाल्यावर तरी त्यांच्यात जाणवलेल्या अभिनय क्षमतेचा पूर्ण वापर करून घ्यायला हवा होता ! त्यांचे तर रोल्सही दमदार होते. पण नाही..
ह्या सगळ्या चांगल्या अभिनेत्यांना जर थोडं जरी फुटेज मिळालं, तर ते श्रीदेवीला पूर्णपणे झाकोळूनच टाकतील ह्याची पूर्ण जाणीव बोनी कपूरला असणारच.  हा सिनेमा 'श्रीदेवी'चा, 'श्रीदेवी'साठी, 'श्रीदेवी'नेच (नवऱ्याने) बनवलेला आहे, मग बाकी कुणाला वरचढ होण्याची संधीच कशी देणार ? घालवलं सगळ्यांना वाया !

बरं..
ए.आर. रहमानचं संगीत आहे. निदान ते तरी वाजवून घ्यावं ! तेही नाही ! 'ओ सोना तेरे लिये..' अगदी लक्षात राहणारं गाणं आहे. बाकी कुठेही काहीच स्कोप नाही.


मग सिनेमा आहे तरी काय ?
ट्रेलरवरून हे स्पष्ट समजून येतं की ही एका आईने घेतलेल्या सूडनाट्याची कहाणी आहे. तर श्रीदेवीच्या मुलीवर बलात्कार होतो. श्रीदेवीच्या मुलीला कायद्याने न्याय मिळत नाही. श्रीदेवी त्याचा बदला घेते.
काय ? असंच एक सूडनाट्य वर्षाच्या सुरुवातीला आपण 'काबिल'मध्ये पाहिलं होतं ? ही ! आणि त्याच्या बाष्कळपणावर बऱ्याच जणांनी भरपूर तोंडसुखही घेऊन झालं होतं. पण 'मॉम' आईविषयी आहे. बाष्कळपणात कुठेही कमी नसला, तरी काय झालं ! हं... जे काही दाखवलं आहे, तेच सगळं जर सिनेमातल्या बापाने केलं असतं, तर वेगळा विचार करता आला असता ! कारण बाप हे फक्त एक नाव असतं आणि ते कुठलंही गजबजलेलं गाव नसतं ! :D

अर्थात, काही बाबी उल्लेखनीय नक्कीच आहेत. त्या सगळ्या पूर्वार्धातच मात्र.
सामुहिक बलात्कार, हिंसा दाखवताना कुठलाही भडकपणा टाळला आहे, हे विशेष. गाडीत बलात्कार होत असताना गाडीचं नुसतं एका संथ गतीने फिरत राहताना दाखवणं, प्रचंड बोलकं आहे. सर्व जन एकानंतर एक राउंड घेत आहेत, हे त्या गाडीच्या राउंड्सवरून दाखवलं आहे. तसंच सहनशक्तीचा कडेलोट होतो आहे हे दाखवण्यासाठी पाण्याच्या फिल्टर खाली भरणारी बाटली ओव्हरफ्लो होताना दाखवणंही खूप सूचक ! पूर्वार्धात, एका शिक्षिकेचा तिच्या विद्यार्थ्यांसोबतचं नातं, मुलीसोबतचे ताणलेले संबंध अश्या सगळ्या बाबीसुद्धा खूप छान दाखवल्या आहेत. त्यासाठी दिग्दर्शक 'रवी उड्यावर'ना दाद देऊच ! खरं तर हा पूर्वार्ध, अपेक्षा खूप वाढवतो. असं वाटतं की, पुढचा भाग नेहमीचा मालमसाला नसेल. पण तसं होत नाही. सगळं काही अगदीच अपेक्षित वळणांनी जातं.

संवाद, थरार, परफॉर्मन्स, अ‍ॅक्शन, संगीत सगळ्याच बाबतींत 'अजून भरपूर काही तरी हवं होतं', ही भावना सिनेमाभर वाटत राहते. अगदीच फुसका व फसका क्लायमॅक्स तर तिला अजून तीव्र करतो.
मला स्वत:ला श्रीदेवी फारशी आवडतही नाही आणि नावडतही नाही, त्यामुळे तिचं काम फसलं तर फसेना का ! पण वाईट वाटलं नवाझुद्दीन आणि अक्षय खन्नासाठी. नवाझुद्दिनला असे फुटकळ रोल आता तरी करायला लागू नये. आज त्याची मार्केट व्हॅल्यू श्रीदेवीपेक्षा तरी किती तरी पट जास्त आहे. अक्षय खन्नाचं करियर कधी पुनरुज्जीवित होणार आहे कुणास ठाऊक ! एका चांगल्या अभिनेत्याची उमेदीची वर्षं निरर्थक सहाय्यक भूमिकांत वाया जात आहेत. होपफुली, त्यालाही हे जाणवत असावं.

अखेरीस, बऱ्यापैकी दमदार पूर्वार्ध ह्या एका जमेच्या बाजूवर श्रीदेवीचा भडक अभिनय, फुसका बार नाट्य, वाया घालवलेले इतर अनेक चांगले कलाकार, अळणी संवाद वगैरे अनेक कमजोर बाजूंना पेलता येणार असेल, तर 'मॉम' एकदा पाहू शकता !

रेटिंग - * * १/२

- रणजित पराडकर 

Wednesday, July 05, 2017

एक कविता अर्धवट होती

भाळलो पण थांबलो नाही
मुंबईला समजलो नाही

एक कविता अर्धवट होती
रात्रभर मी झोपलो नाही

शांत हो तू, मग पुन्हा बोलू
मी पुरेसा भांडलो नाही

जागतो आहेच म्हणजे, मी
खूप काही प्यायलो नाही

ती मनापासून आवडली
पण तिला मी भावलो नाही

पाठ दुखते फार कारण की
आजवर मी वाकलो नाही

ती कधी कवितेत ना आली
आणि मी गझलाळलो नाही

....रसप....
५ जुलै २०१७
Related Posts Plugin for WordPress, Blogger...