Monday, December 15, 2008

जाग


बेधुंद होऊनी जे चालून चाल गेले
आई तुझ्या मुलांनी मृत्युस हासविले

त्या क्रूर श्वापदांचा हैदोस शांत केला
हातांस ओढूनी त्यां नरकात पोचविले

शूरांस वंदितो मी जोडून हात दोन्ही
मेले जरी तरीही राष्ट्रास जागविले

ही जाग येथ राहो, वाती मशाल होवो
अमुच्याच साहण्याने शत्रूस माजविले..


....रसप....
१५ डिसेंबर २००८

Sunday, November 30, 2008

शपथ घे


आग शमली,
धुराचे लोटही विरले
आता पुन्हा गायले जातील
मुंबापुरीचे पोवाडे
स्तुतीसुमनं उधळणारे..
पण मला सांग,
ही सहिष्णुता की हतबलता?
ही शांतता की उदासीनता?
ही सहनशक्ती की कचखाऊ वृत्ती?
ही चिकाटी की लाचारी?

आग स्फोटांची विझली असेल
पण चितांची..??
ती नेहमीच धगधगत राहील.
चल, एक कोलीत उचल
अन् लाव चटका स्वत:ला
आत.... खोल.. स्वत:च्या मनाला..
हा चटका झोंबू दे
अश्वत्थाम्याच्या जखमेसारखा चिघळू दे..भळभळू दे
इथून पुढे तुलाही लढायचंय, कारण..
देशांना सीमा असतील
पण युद्धांना राहिल्या नाहीयेत
शस्त्र घ्यायचं तेव्हा घ्यावंच लागेल..
अन् घेच.. पण आज..
आज शपथ घे..
त्या हुतात्म्यांची
त्या वीर बहद्दुरांची
डौलदार तिरंग्याची
अन् लाडक्या मुंबापुरीची
आठव ते माधव ज्युलियनांचे शब्द --
"लेखणी बंदूक घ्या वा तागडी वा नांगर
हिंदवी व्हा चाकर
एक रक्ताचेच आहो साक्ष देई आतडे..
भ्रांत तुम्हां का पडे?


....रसप....
३० नोव्हेंबर २००८

Tuesday, November 25, 2008

तू भिड बिनधास्त


जातीचा तू लढवय्या लढवून एकटा किल्ला
उलट परतला हरेक हल्ला शत्रूही भिरभिरला
...................तू भिड बिनधास्त....

कितीक पडले धारातीर्थी कितीक अन् शरणार्थी
नतमस्तक जाहले चालले कितीक गुडघ्यावरती
...................तू भिड बिनधास्त....

मैदानीच्या रणांगणी तव अनेक विजयी गाथा
तोडू न शकल्या तटबंदीला सहस्त्र सागर लाटा
...................तू भिड बिनधास्त....

काय तुझा लौकीक अन् तुझी किती गावी महती
अद्वितीय तू अभेद्य असशी "WALL" म्हणूनचि म्हणती
...................तू भिड बिनधास्त....


....रसप....
२५ नोव्हेंबर २००८

Thursday, November 20, 2008

मैत्री.. (लघु कविता)

ओळख असली नवी
तरी जुनी वाटते
शब्द तुझे तरी
भावना माझी भासते

दोन शब्दांत तुझ्या
एक जग लपते
दिसत नाहीस तरी
नजर मला भिडते

कळत नकळत म्हणे
असेच बंध जुळतात
मैत्रीच्या बीजाला
कोवळे अंकुर फुटतात....

....रसप....
२० नोव्हेंबर २००८

Sunday, November 16, 2008

पुन्हा रांगच पावली....


मेल्यानंतर यमदूताने
माझा खोळंबा केला
एअरपोर्टला उतरून
बावळा टॅक्सीने आला..
पाच मिनिटांच्या प्रवासाला
दोन तास लागले
जीवंतपणी प्राण गेले
मेल्यानंतर थांबले!!

घरापासून एअरपोर्टला
पुन्हा दोन तास लागले
क्षणभर मला ऑफीसचेच
दिवस येऊ भासले

विमानात पण त्याच्या
गर्दी 'लोकल'सारखीच
लटकायला दारापाशी
जागा माझ्यापुरतीच !

प्राण घेऊन हातावर
आयुष्यभर लटकलो
मेल्यानंतर भीती कसली
छपरावरतीच विसावलो

स्वच्छ मोकळी शुद्ध हवा
मनमुराद चाखली
चित्रगुप्तासमोर पटकन
उडी पहिली मारली

पाप-पुण्य हिशोब माझा
मांडला जात होता
छोट्या-छोट्या घटना सा-या
बराच व्याप होता

कसेबसे जुळून शेवटी
गणित मांडले गेले
स्वर्गात कमी, नरकामधले
दिवस जास्त ठरले

स्वर्गद्वारी गेलो तिथे
अनपेक्षित घडले!
पाय ठेवायला जागा नाही
बाहेरुनच कळले !

पाप-घडे उतू चालले
पृथ्वीवरती किती
कुठून केले ह्यांनी इतके
पुण्यकर्मी भरती??

विचारपूस करता थोडी
खरं काय ते कळलं
आरक्षणाचं लोण म्हणे
'वर'पर्यंत पसरलं..!!

पृथ्वीवरती जागा भरपूर
स्वर्गामध्ये इवली
इवल्यामधली अगदी थोडी
अनारक्षित राहिली

शाळेनंतर कॉलेजसाठी
बस-ट्रेन-रेशन साठी
लग्नाकरता मुलीसाठी
मेल्यानंतर जळण्यासाठी
छोट्या-मोठ्या सगळ्यासाठी
नेहमीच रांग लावली
सवयीचा गुलाम होतो
पुन्हा रांगच पावली....


....रसप....
१६ नोव्हेंबर २००८

Friday, November 14, 2008

शाळा..२


माझी पाचवी पूर्ण झाल्यावर आम्ही मुंबईला स्थायिक झालो.. इथली माझी शाळा म्हणजे एक अतिशय गरीब, छोटीशी संस्था.. एका छोट्याशा भाड्याच्या जागेतली.. जागा पालिकेची.. लागूनच पालिकेची पण शाळा होती, जी कालांतराने बंद झाली अन् तिची जागा एका "प्रतिष्ठित" स्पोर्ट्स क्लबने त्याच्या मैदानात "सामावून" घेतली.. आमच्या शाळेवरही गंडांतर आले होते, परंतु टळले.. असो.
शाळेची सर्वात मोठी आठवण.. नव्हे, साठवण म्हणजे 'चव्हाण सर.' आमचे मुख्याध्यापक.
आठवण म्हणजे त्यांचे शिकवणं पाऊण वर्गाला समजायचं नाही आणि त्यांचा चापटी/ धपाटा वजा फटका झणझणीत झोंबायचा.. अन् साठवण म्हणजे.. त्यांनी लिहिलेली पत्रं.. त्यांचा आजही दर वाढदिवशी मलाच नव्हे, त्यांच्या शेकडो विद्यार्थ्यांना जाणारा फोन.. त्यांचं शाळेला वाहून घेतलेलं आयुष्य.. बरंच काही..


शाळेला जाण्याच्या रस्त्यावर एक बार लागायचा.. believe it or not.. पण का कुणास ठाऊक तो बार मला नेहमी मंदिर असल्याचा भास व्हायचा.. अनेकदा मी तिथे हात सुद्धा जोडले..!!


एक 'चिकन शॉप' पण लागायचं.. अनेकदा मान कापून टाकलेल्या कोंबडीचं प्लास्टिकच्या पिंपातलं तडफडणं काळीज पिळवटायचं..


ह्या शाळेत आल्यावर मी अचानक पुढच्या बाकावर बसू लागलो.. वर्गात पहिला मी कधीच नव्हतो पण पहिल्या 'काहीं'मध्ये येऊ लागलो. माझ्यातल्या बाथरूम सिंगरला एक स्टेज मिळालं.. अनेक बदल घडले..
पण..
शाळा आजही बदलली नाही.. स्थिती बदलली नाही.. परिस्थितीही बदलली नाही..
आजही चव्हाण सर रात्री ९.३०-१०.०० पर्यंत शाळेत असतात..
आजही अनेक आजी-माजी, दुस-या शाळान्चे विद्यार्थी संध्याकाळी शाळेत येतात.. कुणी सहज सरांना, मित्र-मैत्रिणीना भेटायला.. कुणी अभ्यास करायला.. एखाद्या माजी विद्यार्थ्याकडून काही शिकायला..


आज ही मी मुंबईला आल्यावर शाळेत जरूर जातो..
पण आजही डोळ्यात खुपतं ते मोडकं फाटक.. अन् ते सरांचं एकटेपण..

शाळा..१


बदलापूरची माझी शाळा प्रचंड मोठी... नावाजलेली.. आम्ही थोडे गावाबाहेर राहात होतो. त्यामुळे तशी दूरच होती, परंतु एक "short-cut" होता. डोंगरातून.. मी, ताई आणि अजून १-२ मुलं त्याच रस्त्याने जात असू. शाळेत जाणं-येणं मला शाळेपेक्षा जास्त आवडायचं.
ह्या शाळेतली एक आठवण मी कधीच विसरणार नाही..

दुपारची वेळ होती, मधल्या सुट्टीनंतरची..खामकर सर. गणिताचा तास. आदल्या दिवशी मी गैरहजर होतो व त्याच दिवशी इंग्रजीचे पेपर मिळाले होते.
बाई आल्या आणि त्यांनी सरांना काल गैरहजर असलेल्या साऱ्यांना एकेक करून वर्गाबाहेर पाठवायला सांगितले.. पेपर देण्यासाठी. परेड सुरु झाली. ७-८ मुलं होती एकूण.
पेपर घेऊन परत वर्गात आलेल्या प्रत्येकाला खामकर सर "किती..?" विचारत.
माझी धडधड माझा नंबर जसजसा जवळ येऊ लागला तसतशी वाढतच होती. अखेरीस माझाही नंबर आला. गेलो. बाईंकडून पेपर घेऊन मी आधी चमकलेले तारे विझवले आणि वर्गात शिरलो.
सर फळ्यावर काहीतरी खरडत होते. अर्जुनाला जसा पक्ष्याचा डोळा दिसत होता, तसा मला फक्त माझा बाक दिसत होता. मी जवळजवळ धावतच जागेवर जायला सुटलो. पण इतक्यात सर वळलेच अन् मला हाक मारली, "पराडकर.. किती..??"
मला काहीच सुचेना. मी ढीम्म. सर जवळ आले.. धडधड अजून वाढली..
"किती मिळाले?"
"सर, कमी आहेत."
"सर कमी नाहीत, एकच आहेत.. मार्क किती मिळाले.."
सगळा वर्ग हसला..
"सर.... कमी आहेत..."
"अरे, पण किती..??"
मी हळूच चोरून 'ती'ला पाहिलं.. ती सुद्धा हसत होती.. मला शरमेने मेल्यासारखं झालं....
"सर, कमी आहेत.." माझा आवाज अचानक कमी झाला आणि सरांचा मात्र वाढला.
"आता सांगतोस.. की देऊ एक...??"
त्यांनी हातात पट्टी घेतली होती. काय करावं कळेना.. साऱ्या वर्गासमोर मार्क सांगितले तर काही इज्जतच राहणार नाही. त्यात 'ती' किती हुशार होती ! 'ती' तर माझी 'छी: थू'च करेल आणि नाही सांगितलं तर पट्टी..!
"सांग लौकर..!!"
मी नकारार्थी मान हलवली..
"हात पुढे.."
मी केला..
सट्ट.. कळवळलो..
"जो पर्यंत सांगणार नाहीस, पट्टी खावी लागेल..
मनात म्हटलं,"ह्यांना काय करायच्यात चांभार चौकश्या..उगाच त्रास देतायत मला.."
अजून चार-पाच पट्ट्या खाल्ल्यावर मात्र मी रडू लागलो.. शेवटी क्षीण आवाजात माझे एक आकडी (अव)गुण सागितले.. कुणाही कडे न बघता तडक बाक गाठला आणि आडव्या हाताच्या घडीत तोंड खुपसलं..(त्या वयात येत असणा-या सा-या शिव्या देऊन झाल्या.. हे सांगायलाच नको..)

त्या दिवशी पासून 'ती'च्या नजरेला नजर देण्याची उरली-सुरली हिंमतसुद्धा विरली-जिरली.

आज खामकर सर भेटले तर त्यांना माझी इंग्रजी जरूर ऐकवीन, पण त्यांनी अजून कुठल्या विषयाबद्दल विचारलं, तर मात्र पुन्हा पट्टी खावी लागेल..!!

Sunday, November 09, 2008

मरण प्रेमवीराचे..

ह्या कंठाच्या घोटासाठी
तू आसुसलेला होतास
कितीक वेळा घाला
तू भ्याड घातला होतास

मी घाव तुझे असंख्य
सहजीच पचवले होते
घायाळ हृदयासाठी
घायाळ शरीरही होते

आशेचा दीप तो विझला
अन् जगणे मरणचि झाले
हे प्राण घेऊनी हाती
तुज हाती ठेवले होते

मी मिटूच शकलो नाही
डोळे, ती दिसली होती
मेल्यावरही हृदयी
धडधड ही चालूच होती

जळण्याही उरलो नाही
आधीच जाहलो खाक
डोळे अन् हृदयाची बघ
लोकांनी रचली राख..


....रसप....
०९ नोव्हेंबर २००८

Wednesday, October 29, 2008

रब यार मेरे

रब यार मेरे बता दे यह कैसा सिलसिला हैं
क़दमों ने उठना सीखा या रस्ता बह रहा हैं..

बस थोडा फासला था मंजिल मेरी जहां हैं
और देखा मकाम मेरा तिनकों पे तैर रहा हैं

चुनचुनके गिनने तिनके अब कारवाँ जुटा हैं
बरपाया तूने कहर यह बता दे गलती क्या हैं..

....रसप....
२९ ऑक्टोबर २००८

Saturday, October 11, 2008

जाळुन अहंकाराला....

तोडून टाकले मी ते बंध भावनांचे
डोळ्यांत मोतियांचे सर सांडले तू होते

जाणीव जाहली जी निरपेक्ष तुझ्या प्रेमाची
परतीचे रस्ते सारे लाथाडत मजला होते

केलेल्या पापांना मी चूकभूल जाणत होतो
तू माझ्या पापांनाही भोगून फेडले होते

जाळुन अहंकाराला भेटाया आलो तुजला
शेवटचे माझ्यासाठी तू श्वास राखले होते....


....रसप....
११ ऑक्टोबर २००८

Friday, October 10, 2008

गुंतून अहंकारी....

आकाश वितळुन जातां क्षितिजावर थिजले होते
धरतीचे गोठून जाणे कुणा ना दिसले होते

ओतून चांदणे सारे कमजोर जाहला होता
आधार चंद्रीकांनी चंद्राला दिधले होते

जन्मून पर्वतराशीं सागरा शोधत होती
सावरण्या सरितेला निशब्द किनारे होते

गुंतून अहंकारी मी माझाच राहिलो होतो
निष्ठुर वार तू माझे हासून झेलले होते....



....रसप....
१० ऑक्टोबर २००८

Saturday, October 04, 2008

स्वर्गसुख भोगीता....

मिठीत माझ्या मिठी घेऊनी विरघळुन गेलीस
दुग्ध-शर्करा शरीर माझे रुधिरातुनी भिनलीस

अजून माझ्या श्वासांमधुनी श्वास तुझा दरवळतो
स्पर्श हवेचा कोमल मजला केस तुझे भासतो

क्षणैक वाटे मनात मजला कुबेर मी बनलो का..?
असेल कुठले मौलिक रत्न तुझ्यापरि दुसरे का..?

आज भोगिले स्वर्गसुख मी धन्य धन्य पावलो
तव ओठिचे अमृत प्राशून अजरामर जाहलो



....रसप....
०४ ऑक्टोबर २००८

Sunday, September 28, 2008

थेंबभर जमीन....

थेंबभर जमीन
इंचभर हवा
कणभर पाण्यावर
मला हक्क हवा

तो गंध पाहिलेला
आवाज शोषलेला
चेहरा ऐकलेला
माझ्यासमोर असावा

पाउस वाहलेला
मृदगंध बरसलेला
दरवळुन चंद्र माझ्या-
-सोबती असावा

क्षण एक थांबलेला
अंधार उजळलेला
मी धुंद जाहलेला
एकदा तरी असावा



....रसप....
२८ सप्टेंबर २००८ 

Friday, September 26, 2008

शेवटचा डाव.....जिंकायचाय.

 

आता कुठे मला क्षितिज दिसतंय
आता कुठे आकाश मला खुणावतंय

रात्री चंद्र दिवसा रवि
एकटक मला पाहतात
अन् भरारी भरण्यासाठी
माझे बाहू शिवशिवतात

पण नाही...

ताकद असेल माझ्यात
तरी शिदोरी अपुरी
पल्ला मोठा आहे
केवळ हिंमत नसे पुरी

कणकण अन् क्षणक्षण
साठवून मला ठेवायचाय
आणि सारे काही पणाला लावून
एकच डाव खेळायचाय

आरंभशूर मी नेहमीच होतो
आता वेग राखायचाय
एकच लक्ष्य एकच ध्येय
शेवटचा डाव जिंकायचाय....
..शेवटचा डाव.....जिंकायचाय.



....रसप....
२६ सप्टेंबर २००८

Tuesday, September 02, 2008

स्पर्श मलमली भासत राही ---- (भाग २ )


दिवस उजाडे सांज मावळे स्तब्धपणे मी पाहत राही
त्या किरणांच्या लालीतुनही  रूप निरागस भुलवू पाही

समजावुनही समजत नाही मृगजळ प्याया धावत राही
पोळुन भाजुन जाळुन झाले मार्ग तरी मन बदलत नाही

शून्यातुन मी आलो उदयी शून्याकडेच वाटचाल ही
ठाउक नाही कोण शक्ति ही पुन्हा खेचुनी मागे नेई

महत्प्रयासी विझलो आहे नको पुन्हा ती लाही लाही
जळून गेले अणु-रेणुही भस्म कराया काहीच नाही

उधळुन टाकुन मखमाली ह्या संचित माझे डाचत राही
सुट्या मोकळ्या धाग्यांतुनही स्पर्श मलमली भासत राही



....रसप....
०२ सप्टेम्बर २००८

Thursday, August 21, 2008

मुंबईकर..!

गती आमच्या नसांत भिनली
श्वासा-श्वासांत
सेकंदाच्या काट्यासंगे
पळतो तालात

कितीक येवो महापूर वा
असंख्य हो विस्फोट
नमणे नाही शमणे नाही
कुठल्या आपत्तीत

अजिंक्य आम्ही रोजच लढतो
नवीन संग्राम
आकाशाच्या विराटतेचे
अम्हांस वरदान

अम्ही जाणतो सत्य एकचि
"विश्वचि अमुचे घर"
अम्हां रोखणे अशक्य केवळ
आम्ही मुंबईकर

थकून-भागून रवी मावळे
रोज सागरात
अन् मग हसतो सलाम करतो
सागर आम्हांस -

"कुठून मिळते तुम्हांस ऊर्जा, पुरे न सूर्यास
नतमस्तक मी तुम्हांपुढे धुतो पदकमलास..!!



....रसप....

Tuesday, August 19, 2008

रिता नसे हा प्याला मित्रा


रिता नसे हा प्याला मित्रा
काठोकाठ भरला रे
पुन्हा एकदा पहा जरासा
कसा छलकतो आहे रे

शब्द नाचती मला खुणवती
गुंफुनी माला करण्या रे
पडता बाहेर विखरून जातील
कुठून आणू लिहिण्या रे

अमृत ओठांचे त्या प्यालो
अंश सोडला आहे रे
काठावरती पेल्याच्या बघ
रंग गुलाबी चढला रे

गोड लाजरा रम्य साजिरा
तिचा झळकतो मुखडा रे
चोरून तिरके पाहून मजला
पेल्यामधुनी हसला रे

कंठ न ओला झाला हा परी
पिऊन सागर तरलो रे
सारे आहे भोगाया तरी
तिच्याविना मी झुरलो रे

कोण जन्मीचे पाप भोगतो
पुण्य की कोणा जन्मीचे
चार घडीचा डाव मांडला
तिने सोडला अर्धा रे

रिता नसे हा प्याला मित्रा
मीच जाहलो रिता रे
पोकळ उरले शरीर केवळ
मन आत्म्याची चिता रे


....रसप....
१९ ऑगस्ट २००८

Sunday, August 17, 2008

विचार..

खत नसो पाणी नसो
ही भूछत्रं
कुठे ही उगवतात 
कशीही वाढतात अन्
स्वच्छंदी जगतात

कन्नी नसो मांजा नसो
हे पतंग
उंच उंच उडतात
नभाला भिडतात अन्
गुंततात गळपटतात

गती नसो दिशा नसो
हे प्रवाह
खळखळा वाहतात
कधी साचतात कधी
नुसतेच वाया जातात

फूल नसो फळ नसो
ह्या बागा
सुंदर सजतात
क्षणात बहरतात अन्
क्षणातच कोमेजतात

इच्छा नसो वासना नसो
ही विचारांची  भूतं.. मानगुटीवर बसतात
पछाडतात.... झपाटतात..
अन् शेवटी...
बाटलीत बंद होतात ..!!


....रसप....
१७ ऑगस्ट २००८

Wednesday, August 13, 2008

स्पर्श मलमली भासत राही

एकदाच जो पडलो प्रेमी अद्यापी मी उठलो नाही
तो जो सुटलो शिखरावरुनी घसरण माझी थांबत नाही

जीव ओतला तुझ्याच दारी ठेवलेस तू मला किनारी
अंतरीतल्या कोंदणात ह्या नाव तुझे तरी कोरीव राही

कीतीक राती तारे मोजले दीवस दीवस मी कसे कंठले
ठाउक आहे मजला माझे व्यर्थ कुणा मी सांगत नाही

कणाकणाला माहीत झाले प्रेम हे माझे कीती थोरले
दगडान्नाही फुटला पाझर तुला तेवढे उमजत नाही

आज पाहता वळुन मागे तूटून बंध राहीलेत धागे
सुट्या मोकळ्या धाग्यांतुनही स्पर्श मलमली भासत राही

....रसप....
१३ ऑगस्ट २००८

Monday, August 04, 2008

व्यस्त तुझे शेह्जादे!

अम्हां न देणे-घेणे काही
तमा न भवितव्याची
काय जन्म हा फुका घालवू
लढून मरण्यासाठी ?

सुखे आमुची वैषयिक
ही उपभोगाया जगतो
अपुले घरटे अपुले विश्व
अपुल्या पुरते जपतो

कसला खुळचट भगतसिंग
अन् वेडा बाबू गेनू
कसली करिता क्रांती आम्ही
सगळे खुशालचेंडू

व्यर्थ रिकाम्या बाता सगळ्या
स्फुरण न कोणाला ते
पाहुन जाणून काणा डॊळा
शरम न कुणास वाटे

आक्रंदन हे कोण ऐकतो
तुझे ग धरती माते
आपण अपुल्या जगात सगळे
व्यस्त तुझे शेह्जादे


....रसप....

Friday, August 01, 2008

मन हीरवे हीरवे गार....

मन हीरवे हीरवे गार....

मन हीरवे हीरवे गार जाहले,
हीरवे हीरवे गार
बहरून आल्या दीशा दीशा,
मन हीरवे हीरवे गार

रीमझीम रीमझीम खळखळ खळखळ
नसानसांतून जोमची सळसळ
भारून गेलो नादांनी अन्
गंधांनी मृद्गंधाने
तांडवरूपी वरूण अवतरे धोधो संततधार
मन हीरवे हीरवे गार....

कुणास ठाउक कुठे लपवला
तळतळणारा गोल हरपला
करपूनी गेल्या चराचरांना
तृप्त करवीण्या वखवखल्यांना
प्रसन्नरूपी वरूण अवतरे एकमेव आधार
मन हीरवे हीरवे गार....


....रसप....
०१ ऑगस्ट २००८

Wednesday, July 30, 2008

माझी philosophy..

 

वाटून वाटून संपत नाही
कुणाशी न वाटता उमगत ही नाही
छोट्या छोट्या गोष्टींतही ही अगदी ओतप्रोत असतं,
'सुख' तर प्रत्येकाच्या उपभोगात असतं....

घरामध्ये, बँकेमध्ये
पाकीटामध्ये मावत नाही,
खोऱ्याने ओढला
तरी पुरेसा होत नाही
माणूस फक्त साठवण्यात समाधानी दीसतो,
पण 'पैसा' तर प्रत्येकाच्या खर्चामध्ये असतो..

आयुष्य सरतं पण क्वचितच मिळतं
मृगजळासारखं मागे मागे पळवतं
शब्दांमध्ये असतं
स्पर्शामध्ये असतं
खरंखुरं 'प्रेम' तर
एका कटाक्षात ही असतं..

कोमेजलेल्या फुलात असतं
उजाड वाळवंटात असतं
आटलेल्या पात्रात असतं
मोडक्या झोपड्यातही असतं
उघड्या डोळ्यांना दिसत नाही कारण..
'सौंदर्य' बघणाऱ्याच्या नजरेत असतं....

....रसप....

मैत्रीण माझी न्यारी

वेगळ्यांमध्ये मध्ये आगळी
मैत्रीण माझी न्यारी
सर नाही कुणा तिची
सुरूप सुंदर स्वारी

पावलोपावली माझं
अनेकदा धडपडणं
प्रत्येक वेळी तिचं
समर्थ सावरणं

तोंड काळं केलं तर
थोतरीत एक "ठेवणं"
शुद्धीत मी आल्यावर
डाग स्वच्छ करणं

भरकटलेलं तारू माझं
किना-याला लावणं
उधळलेलं वारू माझं
आटोक्यात आणणं

लटपटताना पाय माझे
स्थिर मला करणं
सरभरलेल्या मनाला ते
धीर तिचं देणं

ती म्हणेल तीच दिशा
माझ्यासाठी पूर्व
विश्वास अती दृढ़ माझा
मला तिचा गर्व

शब्दाशब्दाला तिच्या
मोत्याहून मूल्य
तेजापूढे फीके तिच्या
चंद्र आणि सूर्य


....रसप....
१९ जुलै २००८

हृदय : घरचा भेदी

प्रेम प्रेम म्हणतात ते
हेच असतं बहुतेक
दीवस तास मीनीट क्षण
मोजत राहा एकेक

खोलवर कुठून तरी
एक कळ येते
दुखरी जागा कळेपर्यंत
दूसरी सुद्धा येते

काहीच करू शकत नाही
करण्याशीवाय गणती
दीवसांची मीनीटान्ची
कळांची क्षणांची

तळमळ तडफड
जळजळ फडफड
क्षण क्षण भीरभीर
धाकधुक धडधड

प्रत्येकाचं हृदय फीतुर
असतं भेदी घरचा
वार्यावरती देतं सोडून
पडतोच ह्याचा फडशा


....रसप....
१७ जुलै २००८

माणसं

खोक्यांसारखी माणसं
एकावर एक रचलेली
गंज चढलेले मेंदू
आणि अक्कल पुसलेली

मेंढरांसारखी माणसं
मागे-मागे चालणारी
कंटाळवाणी मंदगती
पडणाऱ्यावर पडणारी..

बगळयांसारखी माणसं
ध्यान लावून बसलेली
दिसतात स्थितप्रज्ञ
मोडता घालण्या टपलेली

गेंड़यांसारखी माणसं
निगरगट्ट बनलेली
सोयर ना सूतक काही
मस्तवाल फुललेली

माणसासारखी माणसं
नावापुरती उरलेली
चिमणीच्या जातीसारखी
दुर्मीळ होत चाललेली.....


....रसप...
१३ जुलै २००८

दे मला संजीवनी

दे मला संजीवनी
तुकड्यात मी
श्वास कोंडले मनी
तुकड्यात मी ||धऋ.||

आसवांचे कुंभ प्यालो
भोगीले दू:शाप मी
काय माझे पाप होते
....... तुटलो मनी,
तुकड्यात मी ||१||

रात येई रात जाई
चंद्र जाळतो मला
तांबडी पहाट होते
....... वीझलो मनी,
तुकड्यात मी ||२||

शब्द खूंटतात जेथे
गाठले वळण मी
इथूनची मागे फीरावे..
...... दुवीधेत मी,
तुकड्यात मी ||३||




....रसप....
२६ जुलै २००८

व्यथा

खर सांगू , आज काल मी काहीच लिहित नाही
भावनांचा शब्दांशी मेळच जुळत नाही

काहूर आहे मनात अनेक प्रश्नांचे
एकाही प्रश्नाला माझ्या
उत्तरच मिळत नाही

परिस्थिती बदललीय ,
मलाही कळतंय
पण कळलेले सगळेच
अंगी वळत नाही .

आठवांच्या सरींनी
अंग चिंब भिजते
तरीही वास्तव भोवताली जळते
कधी वेळे आधी कधी वेळे नंतर
सगळेच पळून जातात
काही केल्या माझी
हूरहूर पळत नाही

उमलत्या कळ्या, फुललेली फुले
कुणाला आवडत नाहीत ?
खुडून टाकलेल्या फुलांना मात्र
कुणीच माळत नाही

म्हणूनच आज काल मी काहीच लिहित नाही
म्हणूनच आज काल मी काहीच बोलत नाही

....रसप....
६ फेब्रु. २००८

अथांग आहे....

मन - कलह
तन - विरह
धन - संग्रह
अजाणताही

कर्म - फलन
धर्म - पालन
जन्म - मरण
मनुष्यासी

बंध - मुक्ती
भोग - वीरक्ती
भक्ती - शक्ती
ये उदयासी

हात जयाचे
हाकीती गाडा
भक्तीभाववेडा
सर्वांतरी

जाण तयासी
मान तयासी
दयासागरासी
अथांग आहे....

....रसप....

Monday, June 16, 2008

"वेळ"

कधीही थांबत नाही ती "वेळ" म्हणतात
पण स्तब्ध, निश्चल क्षणांचा
मी साक्षीदार आहे..

अगणित क्षण अनुभवले आहेत
ज्यांना हाताने पुढे ढकलले मी
काहींना तर तसेही
करता आले नाही..
आहेत अजून तसेच
रुतलेले... खुपलेले..
मधूनच अडवू पाहतात
पुन्हा माझी वाट
कारण त्यांना गाडूही शकलो नाही..

ह्या पेल्याचे अन् त्या आठवणींचे
नाते तरी काय आहे,
खरंच कळत नाही
जणू काही सावलीच असाव्यात
तशा आज्ञाधारक..
खोलवर मनात अर्धवट गाडलेले
ते क्षण... त्या आठवणी
मुंग्यांसारख्या येतात बाहेर..
.. घोटा-घोटाला..
आणि चावत बसतात अंगभर
अन् मी.. दुबळा लाचार..
पुन्हा केविलवाणा प्रयत्न करतो
वेळेला धक्का देऊन पुढे ढकलण्याचा..

कुणास ठाउक कधीपर्यंत
चालू राहणार हा खेळ
अन् म्हणे..
..थांबत नाही कुणासाठी
त्यालाच म्हणतात "वेळ"..!!


....रसप....
१६ जून २००८
Related Posts Plugin for WordPress, Blogger...