Showing posts with label गीत. Show all posts
Showing posts with label गीत. Show all posts

Monday, July 22, 2013

ह्या घरात शीतल वारा वाहत नाही मित्रा..

ह्या घरात शीतल वारा वाहत नाही मित्रा
मन माझे माझ्या घरात लागत नाही मित्रा

शेजार कधी पक्ष्यांचा होता किलबिल किलबिल
रात्रीस सोबती तारे होते झिलमिल झिलमिल
खिडकीत डहाळी आता वाकत नाही मित्रा
................ ह्या घरात शीतल वारा वाहत नाही मित्रा

प्राजक्त अंगणी गंध प्रितीचे सांडत होता
तो चाफा राजस रंग उषेचे माळत होता
आता दगडांतुन अंकुर हासत नाही मित्रा
................ ह्या घरात शीतल वारा वाहत नाही मित्रा

मी दूर दूरच्या नवीन देशी जावे म्हणतो
आवडते गाणे विसरुन दुसरे गावे म्हणतो
ह्या सुरांत आता रंगत वाटत नाही मित्रा
................ ह्या घरात शीतल वारा वाहत नाही मित्रा

येशील कधी तू भेटण्यास हे वाटत होते
पण एक अनामिक मळभ मनाशी दाटत होते
तू गेल्यावर मी माझ्यासोबत नाही मित्रा
................ मन माझे माझ्या घरात लागत नाही मित्रा 

....रसप....
२१ जुलै २०१३
(संपादित - ५ जानेवारी २०१९)

Sunday, July 14, 2013

मला ओढ नाही तुला भेटण्याची..

'मराठी कविता समूहा'च्या 'प्रसंगावरून गीत - भाग क्र. २७' ह्या उपक्रमात माझा सहभाग -

मला ओढ नाही तुला भेटण्याची
तुला भेटतो रोज स्वप्नातुनी
मला फक्त सांगायचे हेच आहे
तुला चोरले मी तुझ्यापासुनी

पुन्हा एकदा रंग आला ऋतूला
तुझी फक्त चाहूलही लागता
तुझ्या आवडीची फुले हासती अन्
सुगंधी हवेचा सुरू राबता
दिसे आज प्रत्येक रस्ता नव्याने
जणू चालला घेत वळणे जुनी
मला ओढ नाही तुला भेटण्याची
तुला भेटतो रोज स्वप्नातुनी

कशाला कुणाला मनातील सांगू
तुझ्यावर इथे सर्व असती फिदा
तुझे नाव ऐकून गुंगीत सारे
तुझी धुंद मदमस्त ऐसी अदा
मला ना नशा ही, तुझी सावली मी
कुठे जायचे मी तुला टाळुनी
मला फक्त सांगायचे हेच आहे
तुला चोरले मी तुझ्यापासुनी

....रसप....
१४ जुलै २०१३  

Wednesday, March 28, 2012

रे मना गीत गा


"मराठी कविता समूहा"च्या "सुरात शब्द गुंफुया (भाग - १)" साठी लिहिलेलं अंबरीश देशपांडे ह्यांच्या चालीवरील गीत..

रे मना गीत गा तू आगळे वेगळे
सुखाचा ठिकाणा रडूनी ना मिळे!

धावतो तू असा मृगजळा पाहुनी 
भाळतो नेहमी गवसले हारुनी
हे तुझे दंगणे का कधी ना टळे ?
.......... रे मना गीत गा तू आगळे वेगळे

मी तुझ्या संगती भटकलो, धावलो
पाहुनी सावली थबकलो, थांबलो
थांब तूही जरा ओढतो का बळे ?
.......... रे मना गीत गा तू आगळे वेगळे

....रसप....
२७ मार्च २०१२ 

Saturday, March 17, 2012

दिवसा फुलुनी दरवळ करती.. (लावणी)


"मराठी कविता समूहा"च्या "काव्य छंद" साठी लावणी लिहिण्याचा माझा प्रयत्न -

दिवसा फुलुनी दरवळ करती किती फुले हो गोजिरवाणी
सांज सावळी धुंदवणाऱ्या रातराणिची ऐक लावणी
{कोरस} -
अहो,
जपून उडवा फेटा जाइल चोरीला
टपून बघती चोर किती ह्या पोरीला !!
काय पाहता दाजीबा भुंग्यावाणी
धाप लागली आज्याला त्या द्या पाणी !!

बागेमध्ये गुलाब फुलतो डौलाने तो कसा डोलतो
गुंफुन त्याला कधी कुणीही देवाला ना वाहत असतो
तशीच मीही गंधबावरी दरवळते तोऱ्यात दिवाणी
सांज सावळी धुंदवणाऱ्या रातराणिची ऐक लावणी
{कोरस} -
अहो,
जपून उडवा.........

कळ्या मोगऱ्याला त्या येता खुशाल माळी साऱ्या खुडतो
अन वेणीच्या सुगंधामधे कारभारणीला दंगवतो
मी दंगवते त्या माळ्याला दावुन ठुमका गाउन गाणी
सांज सावळी धुंदवणाऱ्या रातराणिची ऐक लावणी
{कोरस} -
अहो,
जपून उडवा.........

मला नको तू शोधत येऊ मी इवलीशी लपून बसते
मला तोडणे नकोस ठरवू गंध हरवुनी मी मरगळते
ऐक दुरूनी तू माझी ही दरवळणारी मंजुळ वाणी
सांज सावळी धुंदवणाऱ्या रातराणिची ऐक लावणी
{कोरस} -
अहो,
जपून उडवा.........


....रसप....
(रणजित पराडकर)
१७ मार्च २०१२

Sunday, March 04, 2012

प्रतिपश्चंद्रलेखेव..


प्राक्कथन:

२७ फेब्रुवारी; अर्थात 'मराठी भाषा दिन', म्हणजेच मराठी सारस्वताच्या उत्तुंग अस्मिताभिमानाचा सुदिन.
हा सुवर्ण-दिवस 'मराठी कविता समूह' काहीतरी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करतो. मागील वर्षी ह्याच दिवशी सतत २४ तास ऑर्कुटवरील 'मराठी कविता समूहा'वर काव्यसमिधा अर्पण करून साजरा केला होता. ह्या 'काव्य महायज्ञा'त प्रथितयश कवींच्या १८४ आणि आंतरजालावरील कवींच्या २०४ नवीन कविता; अशा एकूण ३८८ कविता लिहिल्या गेल्या.
या अशा अभिनव उपक्रमाची परंपरा पुढे घेऊन जाताना ह्या वर्षीच्या 'मराठी भाषा दिना'च्या निमित्ताने 'मराठी कविता समूह' आपला नित्याचा 'प्रसंगावर गीत' हा उपक्रम, मराठी माणसाच्या हृदयाशी अत्यंत निकट असणारा आणि महाराष्ट्राच्या भूमीच्या ज्ञात इतिहासातील सर्वोच्च मानबिंदू असलेला एक प्रसंग घेऊन साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहे. या उपक्रमात प्रत्येक मराठी कवीने आपली कविता लिहून या प्रसंगावरील आपले विचार 'गीत स्वरुपात' मांडणे अपेक्षित आहे आणि त्याच बरोबरीने 'मराठी भाषा दिन' आजपासून पुढील पंधरा दिवस साजरा करणे अपेक्षित आहे.
चला तर मग मराठी काव्यमित्रांनो, तुमच्या लेखण्यांना लावा संगीनीची धार, तुमच्या धमन्यांमधले रक्त तुमच्या लेखणीच्या वाटे झिरपू द्या आणि तुमच्या अद्वितीय प्रतिभेतून उमटलेल्या मराठी काव्यगीतांचा अर्घ्य मराठी साहित्य-रत्नाकरामध्ये अर्पण करू या!!!
  

"मराठी कविता प्रोडक्शन्स"चा अत्यंत महत्वाकांक्षी आगामी चित्रपट - "शिवराज्याभिषेक" तयार होत आहे !

पार्श्वभूमी-

महाराष्ट्राचे दैवत असलेला शिवशंभूराजा, आदिलशाहीमध्ये गाढवाचे नांगर फिरवलेल्या पुण्याच्या पुण्यभूमीवर त्यांच्या लाल महालात मातोश्री जिजाबाई यांच्या समवेत राहायला आले. तेथे त्यांचे शारीरिक, बौद्धिक, सामरिक आणि राजकीय शिक्षण संस्कारांच्या बरोबरीनेच सुरु झाले. अल्पावधीतच शिवबा युद्धपारंगत तर झालाच; परंतु त्याच बरोबरीने आपल्या चाणाक्ष बुद्धिमत्तेने त्याने तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा सखोल अभ्यासही केला. हळूहळू या शिवबाने बारा मावळातील अठरापगड जातींमधल्या गरिबीत खितपत पडलेल्या मराठी मावळ्यांशी नाते जमवले आणि त्यांना त्यांच्या अस्तित्वाची; अस्मितेची जाणीव निर्माण करायला सुरुवात केली.
हळूहळू हा शिवबा आदिलशाही, निझामशाही यांच्या कडील एकेक प्रदेश काबीज करत सुटला. प्रत्येक वेळी नवनवीन युक्तीने आणि क्लृप्तीने त्याने सा-या शाह्यांना चकित आणि चारी मुंड्या चीत करून टाकले.
केवळ एक जुजबी वाटणारे बंड हळूहळू एका स्वतंत्र साम्राज्याचे स्वरूप घेऊ लागले. मग हे बंड मोडून काढण्यासाठी या शहांनी एकेक मोठमोठी संकटे या छोटुकल्या स्वराज्यावर धाडली. परंतु अफजलखान, शाहिस्तेखान, दिलेरखान यासारख्या बलाढ्य सरदारांशी झालेली भयंकर युद्धे असोत की सिंहगड, पावनखिंड-पन्हाळा, पुरंदर सारख्या किल्ल्यांवर मावळ्यांनी दिलेली झुंज असो, हरेक दिन मराठी स्वराज्य विस्तारत गेले आणि एक स्वतंत्र साम्राज्य म्हणून वाढत गेले.
आणि अशा त-हेने स्वतंत्र साम्राज्य निर्माण करणा-या शिवाजीराजांवर राज्याभिषेक होऊन त्यांनी छात्रचामरे धारण केली पाहिजेत हा आग्रह घेऊन प्रत्यक्ष काशीवरून प्रकांड पंडित विश्वनाथ भट्ट उर्फ गागाभट्ट थेट शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचले आणि त्यांनी महाराजांना राज्याभिषेक करवून घेण्याची आग्रही विनंती केली. शिवाजी महाराजांनी ती मान्य केली आणि महाराष्ट्रभूमीचे भाग्य खुलले.
अनेक युद्धे आणि नाट्यमय प्रसंग दाखवून चित्रपटाचा अखेरचा प्रसंग दाखवण्यात येत आहे तो "शिवराज्याभिषेका"चा!!!

चित्रपटातील प्रसंग -

एक दवंडीवाला एका गावामध्ये दवंडी देतो - 'ऐका हो ऐकाSSS! आजपातूर अर्ध्या मासानं आपल्या शिवाजीराजाला अभिषेक होनार हाये होSSS!
आणि चित्रपटातील गीताला सुरुवात होते...........................
ही वार्ता ऐकताच गावातील प्रत्येक माणूस आनंदानं फुलून निघतो. सारे अबालवृद्ध आनंदानं गावाच्या रस्त्यांवर अक्षरश: नाचू लागतात.
चहूकडे आनंद आणि उत्साहाला उधाण आलेलं आहे. सारा मावळ परिसर आनंदानं न्हाऊन निघाला आहे. महाराष्ट्राच्या मातीमाधली हिरवाई नवचैतन्यानं डोलू लागली आहे.
रायगडावर राज्याभिषेकाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. गडावर महाराजांच्या दरबाराचे बांधकाम जोरात सुरु झाले आहे. महाराजांचा राजमहाल, अश्वशाळा, गोशाला, मंदिरे, कार्यालये ई. सर्व ईमारतींची डागडुजी, रंगरंगोटीचे काम सुरु झाले आहे.
महाराजांचे रत्नजडीत सिंहासन, हिरे-माणिकमंडित राजमुकुट, रेशमी उंची पेहराव ई. ची तयारी सुरु आहे.
शास्त्रशुद्ध राज्याभिषेकासाठी काशीवरून वेदविद्याविभूषित अनेक महापंडित ब्राह्मण आले आहेत आणि राज्याभिषेकाच्या विविध विधींसाठी पंचनद्यांच्या पवित्र जलापासून ते चंदन-अष्टगंधादी नाना परिमळ द्रव्यांपर्यंत प्रत्येक बारीक सारीक तपशीलाकडे जातीने लक्ष देत आहेत.
स्वराज्याचं सैन्यदेखील जोरदार तयारीत आहे. विविध पथके आपापल्या विशिष्ट गणवेशात संचालनाची तयारी करत आहेत. राज्याभिषेक समारोहाच्या वेळी कुठलीही आगळीक होऊन नये याची दक्षता घेण्यासाठीची सज्जता चालू आहे.
आणि अखेरीस महाराष्ट्राची भाग्यरेखा बदलणारा; मराठी मातीला तिच्या अस्तित्वाची ओळख करून देणारा, मराठी माणसाच्या अस्मितेचा मानबिंदू असलेला तो दिवस; तो क्षण आला आहे.
रायगडावर पहाटेच्या मंगलप्रसंगी होम-हवनादी अनेकविध विधी संपन्न झाल्यानंतर महाराजांवर पंचनद्यांच्या पवित्र जलाचा अभिषेक करण्यात आला आहे. त्यानंतर महाराष्ट्राची भाग्यदेवता शिवाजी महाराज हे राजसिंहासनावर अधिष्ठित झालेले आहेत. वेदमंत्रघोषात शिवाजी महाराजांवर छत्र-चामर धरली गेली आहेत आणि गागाभट्ट आपल्या खड्या आवाजात छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा वाचून दाखवत आहेत "प्रतीपश्चंद्रलेखेव.............."

आणि चित्रपट येथेच संपतो!

(लेखन - सारंग भणगे)

* * * * * * * * * * * * * *

"मराठी कविता समूहा"च्या "लिहा प्रसंगावर गीत - भाग क्र. २२ ("मराठी भाषा दिन" विशेष)"मध्ये अफाट वर्णन केलेल्या ह्या ऐतिहासिक प्रसंगासाठी गीत लिहिण्याचा माझा प्रयत्न - 


कोरस -

{उजळेल नवा रवि आज नभी 
तव नाम असे शिवछत्रपती 
गगनासम हा अभिमान उरी 
जयघोष करा शिवछत्रपती
शिवछत्रपती !! शिवछत्रपती !! शिवछत्रपती !! शिवछत्रपती !!}

राजाधिराज मावळचा भाग्यास बदलण्या आला
स्वप्नील स्वराज्याला हा सत्यात आणण्या आला 

सरणार दूर तो आता अंधार पारतंत्र्याचा
येथे फुटणार नव्याने ह्या मातीलाही वाचा
छातीत एक शौर्याचा अंगार फुलवण्या आला 
स्वप्नील स्वराज्याला हा सत्यात आणण्या आला  

जे पीडित शोषित होते जे वंचित शोणित होते
जे गाडा अन्यायाचा पाठीवर ओढित होते
त्यांच्या हाती बंडाचे औजार सोपण्या आला 
स्वप्नील स्वराज्याला हा सत्यात आणण्या आला 

लगबग खटपट जिकडे तिकडे सजावटीची चाले 
तासुन लखलख चमचमती साऱ्या तरवारी-भाले 
गनिमांचा नाश कराया शस्त्रांस उपसण्या आला 
राजाधिराज मावळचा भाग्यास बदलण्या आला
स्वप्नील स्वराज्याला हा सत्यात आणण्या आला 

कोरस -

{उजळेल नवा रवि आज नभी 
तव नाम असे शिवछत्रपती 
गगनासम हा अभिमान उरी 
जयघोष करा शिवछत्रपती
शिवछत्रपती !! शिवछत्रपती !! शिवछत्रपती !! शिवछत्रपती !!

पंच*नद्यांचे आशीर्वच तव अभिषेकरुप लाभते 
राजमुकुट अन हे सिंहासन तुला खरे शोभते 
**प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता 
शाहसूनो: शिवस्यैषामुद्राभद्रायराजते**| }


....रसप....
३ मार्च २०१२ 


*एक असाही समज आहे की पाच नव्हे, सात नद्यांचे पाणी होते. तसे असल्यास 'पंच' ऐवजी 'सप्त' करावे.

**शिवाजी महाराजांची राजमुद्रा - 
"प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसूनो: शिवस्यैषामुद्राभद्रायराजते|"

Tuesday, December 27, 2011

ऐक तुला छोटीशी गोष्ट सांगतो



ऐक तुला छोटीशी गोष्ट सांगतो
आज तुझा बाबा अंगाई म्हणतो

एक होता राजू, भलताच गोड
पण त्याला चिडायची वाईट होती खोड
आईवरती चिडे कधी बाबावरती चिडे
कोपऱ्यात तोंड लपवून मुसूमुसू रडे
नेहमी त्याची समजूत काढून थकून जाई आई
त्याला हसवताना बाबा घामाघूम होई!
शहाणा मुलगा आहे तरी असा का वागतो?
आई-बाबांना नेहमी हाच प्रश्न पडतो
............ऐक तुला छोटीशी गोष्ट सांगतो
............ आज तुझा बाबा अंगाई म्हणतो

एके दिवशी काय झालं, राजू खूप चिडला
"शाळेत जायचं नाही" म्हणून कोपऱ्यात रुसून बसला
त्याने आईचं ऐकलंच नाही
शाळेत काही गेलाच नाही
संध्याकाळी बाबाला आईने सांगितलं,
"आज माझं राजूने काहीच नाही ऐकलं
आजपासून आपणही त्याचं ऐकायचं नाही
रुसला तर त्याच्याशी बोलायला जायचं नाही"
असं ऐकून राजूला अजून राग येतो
आतल्या खोलीत पलंगावर, एकटाच जाऊन झोपतो
............ऐक तुला छोटीशी गोष्ट सांगतो
............ आज तुझा बाबा अंगाई म्हणतो

स्वप्नामध्ये येतो बाप्पा, राजूला म्हणतो -
"तुझे आई-बाबा आता चिंटूला देतो.."
राजू म्हणतो "नको, नको... असं नको करूस!
माझी आई, माझे बाबा त्याला नको देऊस!
माझी आई कित्ती गोड, बाबा सुद्धा छान
आता त्रास देणार नाही, पकडतो मी कान!"
राजू आईबाबांकडे धावत धावत जातो
आई असते चिडलेली, बाबासुद्धा चिडतो!
"आई बाबा, माझ्यावरती चिडू नका तुम्ही
मला सोडून चिंटूकडे जाऊ नका तुम्ही!"
असं म्हणून छोटा राजू आईजवळ जातो
गच्च मिठी मारून तिच्या कुशीमध्ये शिरतो
आतापासून चिडका राजू अगदी शांत होतो
आकाशातून बघून बाप्पा गालामध्ये हसतो
............ऐक तुला छोटीशी गोष्ट सांगतो
............ आज तुझा बाबा अंगाई म्हणतो


....रसप....
२६ डिसेंबर २०११


पार्श्वभूमी -

रोज 'ऑफिसहून लौकर येईन' असं म्हणून रोज उशीर करणारा आणि धावत पळत घरी पोहोचणारा एक टिपिकल नवरा - "श्रीकांत".

'लौकर येतो' म्हणाला असला तरी उशीराच येणार आहे, हे व्यवस्थित माहित असलेली एक टिपिकल बायको - "गीतांजली".

रोजच बाबांची वाट पाहून जेवायचा थांबणारा आणि नंतर आईची बोलणी खाऊन एव्हढंसं तोंड करून आईकडून भरवून घेणारा टिपिकल चार वर्षांचा चिमुरडा - "वरद".

बाबांने रोज उशीर करणं आता वरदच्या 'सहनशक्ती'च्या बाहेर गेलंय. आज तो निक्षून सांगतो की मी बाबा आल्याशिवाय जेवणार नाही म्हणजे नाssssssssही! गीतांजलीचे सगळे उपाय थकतात, ओरडून - 'वा' करूनही - काही उपयोग होत नाही. कुठे तरी आत तिलाही त्याचं वागणं पटतही असतं!

अखेरीस लेटलतीफ बाबाला आई फोन करते आणि 'कमीत कमी' उशीरा यायला सांगते. श्रीकांत घरी येतो.. खिडकीत तोंड फुगवून बसलेल्या वरदला बघतो आणि खिश्यातून लाच म्हणून आणलेलं चॉकलेट त्याच्यासमोर धरतो.. लगेच त्याची कळी खुलते.

पण ही माफी इतकी सहज मिळणार नसते. जेवण होतं.. वरद झोपायला तयार नसतो. गीतांजलीसुद्धा 'लाचार' नवऱ्याला चांगली अद्दल घडवायच्या मूडमध्ये येते.. आणि "आज त्याला तुम्हीच झोपवा" म्हणते.

श्रीकांत वरदसाठी अंगाई गातो. 

("मराठी कविता समूहा"च्या "लिहा प्रसंगावर गीत - भाग क्र. २१" साठी लिहिलेलं गीत.)

Friday, December 23, 2011

ह्या जगण्यावर जीव जडावा..


नव्या पहाटे नव्या दिशेने नवीन वाटा चालुन पाहिन
ह्या जगण्यावर जीव जडावा जगास 'जगणे' असे दाखविन

उरात आशा स्वप्नं उशाशी
हिंमत भिडेल आकाशाशी
वाटेवरती पाउल माझे
वाट दावण्या छापुन ठेविन
ह्या जगण्यावर जीव जडावा जगास 'जगणे' असे दाखविन

सावट दु:खाचे आल्यावर
हताश माझे मन झाल्यावर
झटकुन साऱ्या नैराश्याला
स्वत: आपली पाठ थोपटिन
ह्या जगण्यावर जीव जडावा जगास 'जगणे' असे दाखविन

प्रवास माझा क्षितिजापुढचा
असेल रस्ताही खडतरसा
क्षणोक्षणी आनंद वेचुनी
शब्दफुलांना उधळुन जाइन
ह्या जगण्यावर जीव जडावा जगास 'जगणे' असे दाखविन


....रसप....
२३ डिसेंबर २०११

Monday, December 19, 2011

तुम्ही रस्ते मागू नका..


तुम्ही रस्ते मागू नका
तुम्ही पाणी मागू नका
तुम्ही वीजही मागू नका
तुम्ही फक्त मताला विका || धृ. ||

बाजार मांडला आहे हा चढणाऱ्या भावाने
विकण्यास मांडल्या खुर्च्या त्या मावळत्या राजाने
लावेल चोख जो बोली त्यानेच बूड टेकले
आपल्या भाकरीसाठी सारेच इथे जुंपले
तुम्ही गप्प बसाया शिका
तुम्ही फक्त मताला विका
....................... तुम्ही रस्ते मागू नका || १ ||

ओशाळला न कोणीही बेधुंद मस्त होताना
ना लाज वाटली आम्हा बेताल गुन्हे करताना
ह्या उडदामाजी सारे आहेतच काळे-गोरे
सारेच हात रंगले देताना अन् घेताना
तुम्ही मूग गिळाया शिका
तुम्ही फक्त मताला विका
....................... तुम्ही रस्ते मागू नका || २ ||

ह्या सफेद टोपीखाली रंगेल चेहरा आहे
कुडत्यात ह्या साध्याश्या शौकीन दांडगा आहे
करण्यास ऐश आम्हाला जन्मास घातले आहे
"चारित्र्य" शब्दही आता आम्हा अजाणता आहे
तुम्ही विसरुन जाया शिका
तुम्ही फक्त मताला विका
....................... तुम्ही रस्ते मागू नका || ३ ||


....रसप....
१९ डिसेंबर २०११

Sunday, October 23, 2011

प्रवासी


लेउनी रंगांस तिन्हीसांज झाली
आज माझी वाट प्रकाशात न्हाली

मी मनाशी दु:ख जपावे कशाला
पाहिले येथेच सुखाच्या उद्याला
वेदना आनंद मला देत गेली
आज माझी वाट प्रकाशात न्हाली

बंधने तोडून असा व्यक्त झालो
त्या पतंगाच्या सम मी मुक्त झालो
झुळुक आली तीच खरा जोर झाली
आज माझी वाट प्रकाशात न्हाली

जोखले वाटांस नव्या आवडीने
अन् प्रवासी मी बनलो आवडीने
पावले माझी इथली खूण झाली
आज माझी वाट प्रकाशात न्हाली

....रसप....
२३ ऑक्टोबर २०११
(गालगागा गाल लगा गालगागा)

(मला अनुभव नाही... पण सन्यासाश्रमाकडची वाटचाल काहीशी अशीच असावी..) 

Wednesday, September 28, 2011

बिजली (आयटम साँग)

पार्श्वभूमी -

डि'मेलो गँग चा वाढता उपद्व्याप सुरक्षा यंत्रणेसाठी एक मोठी डोकेदुखी ठरू लागला आहे. मुंबईचे पोलीस कमिशनर अरविंद मोहिते गृहखात्याला आश्वासन देतात की लौकरात लौकर ह्या गँगच्या मुसक्या बांधण्यात येतील. एसीपी जयराज शिर्के, मोहितेंच्या टीममधील एक तडफदार ऑफिसर. त्याच्याकडे ही जबाबदारी सोपवली जाते. एका स्पेशल टास्क फोर्स ची स्थापना होते. ह्या एसटीएफ ला काही विशेष अधिकार, खास शस्त्रास्त्रं दिली जातात. मोहीम कशी राबवायची हे सर्वस्वी जयराज ठरवणार.
जयराज डि'मेलो गँगबाबत खडान् खडा माहिती गोळा करतो.
डि'मेलो, अंमली पदार्थ आणि हत्यारांच्या स्मगलिंग मध्ये मुरलेला एक 'मुरब्बी' डॉन. ह्याचे तीन एक्के आहेत. पुष्कर, अश्विन आणि जेम्स. तसं पाहता डि'मेलो गँगचे सगळे धंदे हेच तिघं सांभाळतात. सर्व निर्णयसुद्धा हेच घेतात. आतली खबर ही असते की हे तिघेही डि'मेलो चा काटा काढायचं ठरवून असतात. "सगळा कारभार आपण सांभाळायचा आणि डि'मेलोने थायलंड मध्ये बसून ऐश करायची? चालायचं नाही." प्लान ठरवला जातो. पुष्कर एका महत्त्वाच्या डीलिंगबाबतच्या चर्चेसाठी थायलंडला जाणार असतो. तिथेच एक खोटं गँगवॉर घडवून डि'मेलोचा काटा काढायचा. दाखवायचं असं की, प्रतिस्पर्धी अक्रम गँगने हे सगळं घडवून आणलं. पुष्कर रवाना होतो.
पण ह्या प्लान मध्ये एक छुपा प्लानही असतो.. डि'मेलो सोबत पुष्करलाही उडवायचा!
आपल्या जबरदस्त 'खबरी नेटवर्क' साठी प्रसिद्ध असलेला जयराज, ही सगळी माहिती मिळवतो आणि एक तिसराच प्लान शिजवतो! ह्या गँगमध्ये अंतर्गत बंडाळी माजवायची.. आपसांत लढवायचं, एकमेकांना मारू द्यायचं आणि उरलेल्यांना आपण टिपायचं! अश्विन आणि जेम्स च्या 'छुप्या प्लान'बाबत पुष्करपर्यंत माहिती पोचवली जाते. डि'मेलो मारला जातो आणि शातीर दिमाग पुष्कर मरायचं ढोंग करतो. जयराज, अश्विन आणि जेम्स सकट साऱ्या जगासाठी पुष्कर मरतो. डि'मेलो गँगची सर्व सूत्रे आता अश्विन आणि जेम्स कडे येतात.
जयराज आणि त्याची टीम एक एक करून डि'मेलो गँगच्या महत्त्वाच्या लोकांना टिपायला सुरू करतात. त्यांच्या काही महत्त्वाच्या सौद्यांनाही मोडून काढतात.
आणि एक दिवस जयराजला समजतं की 'तारांगण' बारमध्ये एक खूप मोठा सौदा होणार आहे, त्यासाठी स्वत: अश्विन व जेम्स येणार आहेत.
बस्स.. धिस इस द डि-डे!


प्रसंग -

साध्या वेषातील पोलीस 'तारांगण' मध्ये फिल्डिंग लावतात. पण ही बातमी खुद्द अशीन-जेम्सनेच पाठवली असते. जेणेकरून अजून एक खोटी चकमक घडवून ह्या 'जयराज शिर्के'चाही काटा काढावा.
अश्विन-जेम्स च्या ह्या प्लान बाबत पुष्करला समजतं आणि तो ठरवतो की एसटीएफ वि. अश्विन-जेम्स गँगच्या ह्या चकमकीत बाजी आपण मारायची!

अश्याप्रकारे, 'तारांगण' मध्ये सगळे जण एकमेकाला 'टिपायला' जमतात.. आणि सुरू होते एका थराराच्या अंताची सुरुवात!!


ह्या ठिकाणी सिनेमात एक आयटम साँग हवं आहे.




आली आली आली आली बिजली आली!!
मी झटका देते, मी फटका देते
हात नको लावु मला, धक्का देते
छन छनना छनक छनक
चाल तुझी ठुमक ठुमक
आज कशी रात अशी 'आयटम' झाली
ए..... बिजली आली, ए..... बिजली आली
आली आली आली आली बिजली आली !!


असा केला शृंगार, डोळ्यामधे अंगार
चमचमते मीच खास, बाकी इथे अंधार
दूर दूर राहूनी एक नजर फेकूनी
उभ्या उभ्या किती किती टाकलेत जाळूनी!
छन छनना छनक छनक
चाल तुझी ठुमक ठुमक
आज कशी रात अशी 'आयटम' झाली
ए..... बिजली आली, ए..... बिजली आली
आली आली आली आली बिजली आली !!


दबा धरुन बसणार, तोच आज फसणार
खेळतो कुणी आणि कोण इथे हरणार
आज रोखठोक सारे होऊ दे
फैसला इथेच आज होऊ दे
अरे नजर फिरवूनी पहा इथे तिथे
तुझा राहिला नसे कुणीच रे इथे
छन छनना छनक छनक
चाल तुझी ठुमक ठुमक
आज कशी रात अशी 'आयटम' झाली
ए..... बिजली आली, ए..... बिजली आली
आली आली आली आली बिजली आली !!



....रसप....
२८ सप्टेंबर २०११

Saturday, August 06, 2011

हे जीवन म्हणजे खेळ वेगळा....

हे जीवन म्हणजे खेळ वेगळा 
बाजी खेळत जाणे 
"हार-जीत" चा नसे फैसला
नवे डाव मांडणे
गीत मनाचे गात रहावे
सूर जरी ना जुळले
शब्दपाकळ्या उधळित जावे
रंग जरी ना दिसले
सुख दु:खाला कुणी बांधले 
मिळे त्यास भोगणे
............. हे जीवन म्हणजे खेळ वेगळा.... बाजी खेळत जाणे 
स्वप्न भंगता ठिकऱ्या ठिकऱ्या
मोजुन वेचुन घे तू
तुकडे सारे पुन्हा जोडुनी
भरून नयनी घे तू
कधी कुणाला सर्व लाभले
तडजोडी पोसणे  

............. हे जीवन म्हणजे खेळ वेगळा.... बाजी खेळत जाणे 
पोळुन लाही लाही होते
असे ऊनही सरते
फुटून अंबर धो-धो बरसे
ते पाणी ओझरते
ऋतू-ऋतूचा घाव निराळा
सोसुन झेलुन घेणे

............. हे जीवन म्हणजे खेळ वेगळा.... बाजी खेळत जाणे 
....रसप....
४ ऑगस्ट २०११

Sunday, July 03, 2011

जगायला हवे तसे..

जगायला हवे तसे विमुक्त आज मी असे
सुखात मी असूनही उदास खास वाटते


शिकायतें नसीब से करें न तो किसे करें
मकाम पे विरानियाँ बहाल क्यूँ करीं हमें
कभी न रास आयेगी नुकीली हैं यह शोहरतें
.......... सुखात मी असूनही उदास खास वाटते


जगायला हवे तसे विमुक्त आज मी असे
नशेत मी असूनही उदास खास वाटते


बुडून जायचे मला तुझ्यात लाल सागरा
नकोच शुद्ध बोचरी, विषासमान वेदना
विषण्ण सुन्न सावली मनात दूर सांडते
.......... नशेत मी असूनही उदास खास वाटते


इसीको गर कहें खुशी किसे कहें चुभन यहाँ
हताश वाट थांबली भकासल्या दिशा दहा
कुणास एकटेपणा मनातला कधी दिसे?
.......... जगायला हवे तसे विमुक्त आज मी असे




....रसप....
२ जुलै २०११

हे गीत एका विशिष्ट प्रसंगासाठी लिहिले आहे. त्यामुळे तो प्रसंगसुद्धा वाचावाच.

Wednesday, June 29, 2011

फज़ा भी है जवाँ जवाँ.. - भावानुवाद

सुवासल्या दिशा दिशा, हवेत कुंद गारवा
सुरेल आसमंत हा, पुन्हा स्मरे जुनी कथा
खुणावती दुरून ते, थवे सुगंध ल्यायले
कुणास आठवून हे मनात रंग सांडले
कणाकणास ठाव प्रीत आपली असे पहा

शमूनही शमे न ही, कशी तहान आगळी
निवांतता जशी मनी, असूनही नसे खरी
मिलाफणे-दुरावणे  चटोर ऊन सावल्या

मधेच काळ थांबला, स्वत:त साधण्या दुवा
क्षणात येथ यातना, क्षणात हर्ष जाहला!
मनावरी किती किती क्षणोक्षणी बनी खुणा


मूळ गीत - "फज़ा भी है जवाँ जवाँ...."
मूळ कवी - हसन कमाल
भावानुवाद - ....रसप....
२८ जून २०११


मूळ गीत -

फज़ा भी है जवाँ जवाँ, हवा भी है रवाँ रवाँ
सुना रहा है ये समा, सुनी सुनी सी दास्ताँ ॥धृ॥

पुकारते हैं दूर से, वो काफ़िले बहार के
बिखर गए हैं रंग से किसी के इंतज़ार के
लहर-लहर के होँठ पर वफ़ा की हैं कहानीयाँ ॥१॥

बुझी मगर बुझी नहीं, न जाने कैसी प्यास है ?
करार दिल से आज भी, न दूर है न पास है
ये खेल धूप-छाँव का, ये कुरबतें, ये दुरीयाँ ॥२॥

हर एक पल को ढूँढता, हर एक पल चला गया
हर एक पल फ़िराक़ का, हर एक पल विसाल का
हरेक पल गुज़र गया बना के दिल पे इक निशाँ ॥३



- हसन कमाल  

Saturday, June 11, 2011

पाऊस प्रेमवेडा....

  
.
श्वासांत गंध ओला दाटून मेघ येता
माझ्या मनामध्येही पाऊस प्रेमवेडा


गा तू सुरेल गाणे रे कोकिळा मनाच्या
दे छेद अंतराला ओथंबल्या घनाच्या
करण्यास चिंब आला    ...      पाऊस प्रेमवेडा


होणार सत्य आता जे स्वप्न पाहिले मी
माझ्या मनातला तू, आहे तुझीच मीही
बरसे मनांत दोन्ही    ...      पाऊस प्रेमवेडा


मृद्गंध साजणा तू केलेस धुंद मजला
सीमा नसेच माझ्या तृप्तीस अन् सुखाला
सांभाळला कधीचा    ...      पाऊस प्रेमवेडा



....रसप....
११ जून २०११ 


"मराठी कविता समूहा"च्या "लिहा प्रसंगावर गीत (भाग क्र.१५)" ह्या उपक्रमासाठी लिहिलेलं गीत.

Tuesday, May 31, 2011

प्रेमवरुणा.. (पद)


प्रेमवरुणा बरस मजवरी
मम तृषा दाटली अधरी

दरवळेल मृदा तव अमृते
डवरवेल हे सुमन-ताटवे
ऐक ना, तुज गूज सांगते बावरी

प्रेमवरुणा बरस मजवरी..


....रसप....
३१ मे २०११


"मराठी कविता समुहा"च्या "लिहा प्रसंगावर गीत" ह्या उपक्रमासाठी एक पद लिहायचा प्रयत्न केला आहे.

Wednesday, May 18, 2011

आई तुझ्याचसाठी....


"मराठी कविता समूहा"च्या "लिहा प्रसंगावर गीत" ह्या उपक्रमासाठी लिहिलेलं गीत..


आई तुझ्याचसाठी बेभान झुंजलो मी
नाही पुरे परंतु, श्वासांत श्वास नाही
आई तुझ्यामुळे ह्या बाहूंत जोर होता
विझतोय प्राण माझा, पण तू समोर नाही


छातीवरी तुझ्या तो रोवून पाय होता
खवळून रक्त आले आवेश कोण होता
डोळ्यामध्ये तिरंगा, रक्तात तूच आई
बेहोष होऊनी मी केली अशी चढाई
शत्रूस ध्वस्त केले, ना मागमूस काही
नाही पुरे परंतु, श्वासांत श्वास नाही



तू सांग नातवाला माझीच वीरगाथा
संसार सोडला मी, तू सांध त्यास आता
होती अनेक स्वप्ने, ती राहिली मनाशी
चुकला हिशोब माझा विरल्या हवेत गाठी
मी चाललो, निघालो.. परतून येत नाही
नाही पुरे परंतु, श्वासांत श्वास नाही



भेदून ऊर माझा गेला न वार मागे
लढलो, अजिंक्य झालो, अभिमान आज वाटे
क्षण एक थांब काळा, आईस पाहू दे ना
पुत्रास आपल्या तू आई कुशीत घे ना
कर्जास फेडले मी, बाकी अजून काही
नाही पुरे परंतु, श्वासांत श्वास नाही




....रसप....
१८ मे २०११

Tuesday, February 22, 2011

आता पुरे अबोला... (तो - ती)

"मराठी कविता" समुहाच्या "प्रसंगावरून गीत" ह्या उपक्रमासाठी लिहिलेली रचना॥


(तो)
.

तू काळ जीवना तो का आणला पुन्हा रे
आकाश आठवांनी झाकोळले पुन्हा रे

ह्या दूर दूर देशी संसार थाटला मी
विसरून जाहले जे का आठवे पुन्हा रे

माझ्या मनास नाही सद्सद्विवेकबुद्धी
तू जाणतोस सारे का छेडले पुन्हा रे

लोकांस सांग आता नव्हते खरेच काही
डोळ्यांत हासताहे बघ ती छबी पुन्हा रे


(ती)

तुला माझी गरज होती..
मला माहीत होतं
मलाही तुझी गरज होती
तुला माहीत होतं
तरी का ही ताटातूट..?
मैत्रीचाही त्याग..!
पुन्हा एकदा माझ्याशी तू
पूर्वीसारखा वाग..
. .
पुन्हा एकदा माझ्याशी तू
पूर्वीसारखा वाग..


नाही गुन्हा कुणाचा, झाले अजाणता जे
त्याची सजा दिली तू, आता नको पुन्हा रे

नाते विशुद्ध वाटे मजला हवेहवेसे
आता पुरे अबोला, तोडू नको पुन्हा रे



....रसप....
२२ फेब्रुवारी २०११
Related Posts Plugin for WordPress, Blogger...