Thursday, October 29, 2015

आठवणींची तुडुंब गर्दी कधीच नव्हती

आठवणींची तुडुंब गर्दी कधीच नव्हती
कुणास माझी इतकी किंमत मुळीच नव्हती

आयुष्या, मी तुझ्या मनाचे केले असते
प्रामाणिक, आग्रही भूमिका तुझीच नव्हती

दर वर्षी सांगतो कहाणी दुष्काळाची
तरी तुला वाटते कधी ऐकलीच नव्हती

पुढच्या जन्मी दगड बनव गंगेघाटीचा
ह्या जन्मी राखेसाठीही नदीच नव्हती

पायाखाली जितके गाडू तितकी उंची
अस्मानी कळसाची शोभा अशीच नव्हती

रस्त्यावरती, लोकलमध्ये, बाजारांतुन
त्याला जी शांतता मिळे, ती घरीच नव्हती

दिवा नि वातीसमान नाते तिचे नि माझे
भोवतालची हवा तापली उगीच नव्हती

अर्ज लिहा अन् प्रती पाठवा मागितल्यावर
पुरस्कार मिळणेही का चाकरीच नव्हती ?

....रसप....
२८ ऑक्टोबर २०१५

ध्यास गझल मुशायरा - औरंगाबाद

Sunday, October 25, 2015

शानदार झोपेची गॅरण्टी (Movie Review - Shaandaar)

नासलेल्या दुधाचा चहा होत नाही. खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांवर गाडी पळत नाही. बॅलन्स नसलेल्या मोबाईलवरुन कॉल जात नाही. पैसे नसलेल्या बँक अकाऊण्टचा चेक वटत नाही. गळक्या मडक्यामध्ये पाणी राहत नाही. नसलेल्या केसांचा भांग पडत नाही.
तसंच, गाढ झोपेच्या अधीन करणाऱ्या चित्रपटाला 'शानदार' मानलं जात नाही.
'हम आपके है कौन' मुळे लग्नाची कॅसेट चित्रपट म्हणून दाखवता येते, असा एक अत्याचारी गैरसमज काही लोकांचा झाला आहे. त्यात त्यांचीही चूक नसावीच. कारण हा अत्याचार काही लोकांवरच होतो. बहुतेक लोकांना सेट्स, घरं, हॉटेलं वगैरेंची भव्यता, कपड्यांची, दागिन्यांची व एकूणच 'वॉर्डरोब'ची श्रीमंती, कौटुंबिक मेलोड्रामा इत्यादी मोठ्या पडद्यावर पाहताना मजाही येते. पण काही नतद्रष्ट आमच्यासारखे असतात, ज्यांना स्वत:च्या घरातल्या किरकोळ मेलोड्रामाचीसुद्धा अ‍ॅलर्जी असते, त्यामुळे असा सगळा फाफटपसारा सहन होत नाही.

अश्याच कुठल्याश्या 'हम-आपके-है-कौनी' लग्न कॅसेटीला, अजून काही नव्या-जुन्या सिनेमांच्या जोडीने एकत्र वाजवून त्या ग्लासातले घटक एकमेकात कधीच न मिसळणाऱ्या फालुद्यासारखं काही तरी रेकॉर्ड करून आपणच त्याला 'शानदार' म्हणायचं, की लोकही म्हणतील, असा गैरसमज विकास बहल व कंपनीचा झालेला दिसतो. लहानग्या 'आलिया' (आलिया भट) ला बिपीन अरोरा (पंकज कपूर) हा एक गडगंज श्रीमंत उद्योगपती आपल्या घरी घेऊन येतो. ती कोण आहे, कुठे सापडली वगैरे तो सगळ्यांपासून लपवून ठेवतो. त्यात लपवण्यासारखं काय असणार असतं, देव जाणे ! कारण ती त्याचीच अनौरस औलाद आहे, हे तर नियमित हिंदी चित्रपट पाहणाऱ्या कुणालाही सहज समजू शकतं. पण त्याची खाष्ट बायको व खडूस आई आणि घरातील इतर सदस्य हिंदी चित्रपट पाहत नसावेत. त्यामुळे ते तिला 'फक्त अनाथ'च समजत असतात. बिपीनची एक औरस मुलगीही असते. 'इशा' (सना कपूर). बऱ्यापैकी लठ्ठ सना कपूरच्या लग्नाची कॅसेट म्हणजे हा चित्रपट 'शानदार'. ह्यात पांचट विनोदनिर्मिती करण्याची जबाबदारी ज्याच्याशी लग्न ठरलं आहे, तो मुलगा रॉबिन (जलाफ हुनी) आणि त्याचा मोठा भाऊ हॅरी फंडवानी (संजय कपूर) ह्यांच्यावर आहे. तर 'आलिया'ची लव्ह स्टोरी पूर्ण होण्यासाठी तिचा आयडियल मॅच जगजिंदर जोगिंदर (शाहीद कपूर) ह्या लग्नाचा व्यवस्थापक अर्थात 'इव्हेंट मॅनेजर' म्हणून आहे.
इतर काही सांगण्यासारखंही नाही आणि जाणून घेण्यासारखंही नाही. तरी, सगळं काही जाणून घेण्याची 'लाल सिग्नल किंवा 'नो एन्ट्री'ची पाटी दिसत असतानाही गाडी घुसवण्यासारखी' आत्मघाती इच्छा असेलच, तर अवश्य जवळच्या चित्रपटगृहातच शानदार पाहावा. जवळचेच चित्रपटगृह निवडावे. कारण पूर्ण चित्रपट, न झोपता पाहिला गेल्यास बाहेर पडताना पराकोटीच्या मानसिक अत्याचारामुळे काही काळाकरिता आपले संतुलन बिघडू शकते. त्या बिथरलेल्या मनस्थितीत समोर येणाऱ्या कुणाही व्यक्तीशी आपला अकारण वाद किंवा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.



'शानदार' हा 'नॉनसेन्स कॉमेडी' म्हणून जे एक नवीनच चित्रपटपिल्लू जन्माला आलं आहे, त्याचा भाऊ आहे का ? तसंही वाटत नाही. कारण लहानपणापासून निद्रानाशाचा विकार जडलेल्या आपल्या मुलीला झोप लागावी म्हणून तिला रोज एक स्वप्न कागदावर चितारून देणारा एक हळवा बापही इथे दाखवला आहे. (ते स्वप्न पाहायला तरी ती झोपेल, असा विचार करणे म्हणजेसुद्धा एक पांचटपणाच. पण असो !) इथे एका लठ्ठ व्यक्तीच्या त्रस्त मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्नही अधूनमधून केला गेला आहे. त्यामुळे त्याला 'नॉनसेन्स' तर म्हणता येणार नाहीच आणि 'कॉमेडी'ही नाही. हा फक्त एक समुद्राच्या लाटांप्रमाणे अविरतपणे येतच जाणारा कंटाळा आहे. ज्यामुळे एक तर प्रेक्षक मध्यंतरालाच बाहेर पडतो किंवा न पडल्यास एखादी मस्तपैकी झोप काढतो आणि दोन्ही शक्य न झाल्यास, बिथरतो.

पंकज कपूर, शाहीद कपूर आणि आलिया भट, हे कास्टिंग खरं तर चांगलं आहे. पंकज कपूर, आजपर्यंतच्या दिग्गज अभिनेत्यांपैकी एक. शाहीद कपूर, आजच्या घडीचा एक उत्तम अभिनेता ज्याने आपले कसब 'हैदर', 'जब वुई मेट', 'कमीने' सारख्या चित्रपटांतून सिद्ध केलेले आहे. तर आलिया भटकडूनही 'हाय वे' नंतर बऱ्याच अपेक्षा आहेत. तिघेही आपापल्या भूमिका 'शानदार' करतात. शाहीद-आलियाची जोडीही मस्त वाटते. दोघे खूप फ्रेशही दिसतात आणि लव्हेबलही. पण सगळं वायाच जातं.

इतर कलाकारांमध्ये संजय कपूर, इंडस्ट्रीमधून स्वत:च्या अचानक गायब होण्याला योग्य सिद्ध करत अक्षरश: वीट आणतो. गंभीर भूमिकेत विनोदी वाटणारा हा अभिनेता, विनोदी भूमिकेत हास्यास्पद वाटतो, ह्याचं नवल वाटू नये.
'इशा'च्या भूमिकेत पंकज कपूरची मुलगी आणि शाहीद कपूरची सावत्र बहिण 'सना कपूर' आश्वासक वाटते. तिचा चेहरा थेट आईसारखा (सुप्रिया पाठक) आहेच, अभिनयगुणही तसेच असावेत अशी आशा वाटते.

कथा व पटकथा खरं तर अनुल्लेखाने मारायला हव्या. पण तो शिरस्ता नाही. म्हणून फक्त उल्लेख. सुमार कथा व टुकार पटकथा विकास बहलसोबत चैताली परमार व अन्विता दत्त ह्यांनी लिहिली आहे. अन्विता दत्त ह्यांनी एका हाताने पटकथा लिहित असताना दुसऱ्या हाताने संवादही लिहिले आहेत. दोन्ही नक्कीच एकाच वेळी लिहिलं गेलं असावं कारण दोन्ही साधारण एकाच पातळी व पठडीचं आहे.

'विकास बहल' ह्या नावाखातर चित्रपट बघायला गेलेल्या माझ्यासारख्यांची प्रचंड निराशा होते. 'करायला गेलो गणपती आणि झाला मारुती' असं काही विकास बहल ह्यांचं झालं असावं. 'एक वाईट चित्रपट करू', अश्या विचाराने कुणी काम करत नसावंच. पण तरी सत्य बदलत नाहीच. चित्रपटाच्या शेवटी, एका पात्राने कुरियरने मागवलेलं काही सामान पोहोचवायला कुरियर सर्विसची गाडी येते. तिचं नाव FedUp (FedEx चं विडंबन) दाखवलं आहे. अगदी अचूक वेळेस ती गाडी येते. कारण तोपर्यंत प्रेक्षकही 'FedUp' च झालेला असतो.

अमित त्रिवेदींचं संगीत लक्षात राहण्यासारखं नसलं तरी लक्ष विचलित करणारंही नाही. म्हणजे समजा जर एका विशिष्ट समयी ब्रम्हानंदी टाळी लागून कुणी चित्रपटगृहाच्या आरामदायी खुर्चीत मागे रेलून, पाय ताणून डोळे मिटले असतील आणि तेव्हढ्यात एखादं गाणं सुरु झालं तर तंद्री मोडत नाही. अन्यथा विचित्र अवस्थेत एकदम दचकल्याने स्नायू दुखावणे वगैरे शारीरिक दुखापतही, बाकी चित्रपटामुळे होणाऱ्या मानसिक दुखापतीसोबत वागवणे भाग पडले असते. ह्यासाठी अमित त्रिवेदींचे मनापासून आभार मानायला हवे.

बिपीन आपल्या मुलीला झोप लागावी म्हणून रोज एक स्वप्न देत असतो. प्रत्यक्षात असा कुणी 'बिपीन' असेल तर त्याने आपल्या मुलीला 'शानदार' दाखवावा. तिला कंटाळून तरी झोप येईल किंवा पुन्हा पाहायला लागेल ह्या भीतीने तरी.

चित्रपट पाहून आलेल्यांसाठी सहानुभूती, तिकीट आधीच बुक केलेल्यांसाठी शांत झोपेच्या शुभेच्छा आणि हा लेख वाचल्यावर जे 'शानदार' पाहणार नाहीत किंवा एरव्हीही जे बघणार नव्हतेच, त्यांना सहानुभूतीसाठी धन्यवाद !

रेटिंग - *


- रणजित पराडकर

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज २५ ऑक्टोबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-


Saturday, October 24, 2015

ढिम्म

सभोवताली सगळं वाहतं आहे
वेळ, हवा, रस्ता, माणसं..
हो, माणसंसुद्धा वाहतीच आहेत
त्यांना प्रवाहपतितही म्हणता येऊ शकेल
सगळं सगळं वाहतं.. आणि मी स्थिर.
'ढिम्म'ही म्हणता येऊ शकेल
मी ह्या सगळ्या प्रवाहाच्या मध्येच.. एखाद्या बेटाप्रमाणे
बहुतेक अशी अनेक बेटं आहेत
माझ्याच आजूबाजूला.. समोर..
आणि हे जमिनीचे तुकडेही वाहतेच आहेत, हा माझ्या नजरेला होणारा आभास

मी उभ्या जागूनच जरा निरखून पाहतो

बेटं...
बहुतांश निर्जन वाटत आहेत
कारण त्यांच्या अस्तित्वात काही हालचालच दिसत नाही
एखाद्या निपचित शून्यासारखी दिसत आहेत

मीही असाच निर्जन आहे का ?
नक्कीच नाही !
कारण मला व्यवस्थित जाणवत आहे
माझ्यामधल्या रहिवासी श्वापदांच्या झुंडींचं अस्तित्व
नेमकं कोणत्या श्वापदाने नेता व्हावं
हा निर्णय होण्यासाठी बराच काळ एक तुंबळ हाणामारी चालली आहे
माझ्या आत

ह्या एका अनिर्णितावस्थेत म्हणूनच मी निश्चल आहे
'ढिम्म'ही म्हणता येऊ शकेल
..... आणि सभोवताली सगळं वाहतं आहे
वेळ, हवा, रस्ता, माणसं..
हो, माणसंसुद्धा वाहतीच आहेत त्यांना प्रवाहपतितही म्हणता येऊ शकेल

....रसप....
२४ ऑक्टोबर २०१५

Tuesday, October 20, 2015

जायचे नव्हते मला पण चाललो मी

जायचे नव्हते मला पण चाललो मी
ओढ ना वाटायची जर थांबलो मी

पाहणे आहे तुझ्या हातात केवळ
सांगुनी माझी व्यथा ओशाळलो मी

समजले ना ती कधी येऊन गेली
पाहण्यातच वाट इतका दंगलो मी

जेव्हढ्या वेळा तिच्या नजरेत वसलो
सांडलो, वाहून गेलो, बरसलो मी

ज्या क्षणी सुरुवात केली मी नव्याने
त्या क्षणी प्रत्येक वेळी संपलो मी

शोधती सारे मला मी संपल्यावर
संपल्यानंतर स्वत:ला लाभलो मी

उंबऱ्याबाहेरचे अस्तित्व माझे
ओसरीच्या कंदिलासम तेवलो मी

ने मला किंवा स्वत:ला सोड येथे
जन्मभर माझ्यासवे कंटाळलो मी

सर्व जखमांना दिली आहेत नावे
रोज एकीवर नव्याने भाळलो मी

ना मिळे परिणामकारक वीषसुद्धा
राग, मत्सर, दु:ख पुष्कळ प्यायलो मी

....रसप....
०२ सप्टेंबर २०१५ ते २० ऑक्टोबर २०१५

Monday, October 19, 2015

राजवाडे म्हणजे आम्हीच (Movie Review - Rajwade and Sons)

मी एक पक्षीण आकाशवेडी, दुज्याचे मला भान नाही मुळी
डोळ्यात माझ्या असे एक आकाश, श्वासात आकाश प्राणातळी

कवयित्री पद्मा गोळे ह्यांच्या एका नितांतसुंदर कवितेतल्या ह्या सुरुवातीच्या ओळी. ही पक्षीण म्हणजे कोण असेल ? कवितेतली वक्रोक्ती किंवा रूपक समजल्याशिवाय खऱ्या काव्यरसिकाला चैन पडत नाही. ही पक्षीण म्हणजे 'तरुणाई' असेल का ? असू शकते. उत्साहाने सळसळणारी, स्वत:च्या पंखांवर, कुवतीवर पुरेपूर विश्वास असणारी, डोळ्यांत आभाळाची स्वप्नं जपणारी, फक्त स्वप्नं जपणारीच नव्हे, तर ती स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी उसळून उठणारी, भिडणारी, झगडणारी तरुणाई. अश्या तरुणाईला कुणीही अडवू शकत नाही, बांधून ठेवू शकत नाही. राष्ट्रबांधणीची, क्रांति घडवण्याची, समस्त मानवजातीचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकण्याची क्षमता व हिंमत असलेलं हे एक अद्वितीय बल असतं. ह्या तरुणाईने कविमनाला वारंवार भुरळ घातली आहे. कविमन हे फक्त कविताच करत नसतं. ते कधी हातात छिन्नी घेतं, कधी कुंचला, कधी एखादं वाद्य तर कधी कॅमेरा !

तरुणाईने भारलेल्या कविमनाच्या व्यक्तीने हातात कॅमेरा घेतला की दिल चाहता हैं, ज़िन्दगी ना मिलेगी दोबारा, दिल धड़कने दो सारखे चित्रपट बनतात. तर कधी 'राजवाडे अ‍ॅण्ड सन्स' सुद्धा बनतात.
तरुणाईचे चित्रपट आजकाल मराठीत वरचेवर बनत आहेत. ही लाट 'बिनधास्त' ने आणली. त्यानंतर आजपर्यंत ती पुन्हा पुन्हा उसळून येतेच आहे. 'दुनियादारी' ने तिचं व्यावसायिक मूल्य व्यवस्थित दाखवून दिलं. 'राजवाडे अ‍ॅण्ड सन्स' म्हणजे अगदी पूर्णपणे तरुणाईचा चित्रपट नाही. ही कहाणी आहे आपल्या परंपरा, मूल्यं, संस्कार, सामाजिक व व्यावसायिक स्थान, व्यवसायाचा डोलारा वगैरे बाबींचं जतन करणाऱ्या एका मराठी कुटुंबाची. 'मराठी' म्हटलं की सहसा 'मध्यमवर्गीय' हा शब्द अध्याहृतच असतो. 'राजवाडे'सुद्धा मध्यमवर्गीय आहेत, मात्र आर्थिकदृष्ट्या नव्हे. वैचारिकदृष्ट्या. पुण्यातलं एक भलंमोठं प्रस्थ, ज्यांचे अनेकविध व्यवसाय यशस्वीरीत्या चाललेले आहेत आणि समाजात ज्यांचं नाव अतिशय विश्वास व आदराने घेतलं जातं असे 'राजवाडे' कुटुंब. एकत्र कुटुंब व कौटुंबिक व्यवसायाची जबाबदारी असलेल्या राजवाडे कुटुंबाची तिसरी पिढी, त्यांच्या आई-वडील, आजोबांनी लादलेल्या बंधनांत स्वत:ला बांधून घेताना धुसफुसते आहे. सळसळत्या तरुणाईला अडवलं, बांधलं जात आहे आणि तिला मुक्तपणे विहरायचं आहे, आभाळाचा ठाव घ्यायचा आहे. बंड करून उठलेल्या, क्रांतिकारी तरुणाईसमोर भल्याभल्यांचा टिकाव लागलेला नाही, हा तर इतिहासच आहे. पण हे होतं कसं आणि नेमकं काय होतं हे 'राजवाडे अ‍ॅण्ड सन्स' मध्ये पाहणं, हा एक जबरदस्त अनुभव आहे.


अनुभव दृश्यरुपात होत असताना ठळकपणे जाणवतो, तो चित्रपटाचा अत्यंत 'फ्रेश लुक'. त्यासाठी कला दिग्दर्शक नितीन बोरकर ह्यांचा विशेष उल्लेख आवश्यकच. प्रेत्येक फ्रेम विचारपूर्वक सजवलेली समजून येते. रंगसंगती, नेपथ्य, प्रकाशयोजना (मी एखाद्या नाटकाबद्दल बोलतो आहे, असं वाटेल कदाचित. पण हे चित्रपटातही जाणवतंच !) सारं काही आपापला उद्गार ऐकवतात.

चित्रपट एकाच वेळी तीन पिढ्यांना दाखवतो आहे. तरुण मुलांना दाखवतानाही नवतरुण (अलोक राजवाडे, सिद्धार्थ मेनन, मृण्मयी गोडबोले, कृतिका देव) आणि थोडेसे परिपक्व तरुण (अतुल कुलकर्णी, अमित्रियान पाटील) असे दोन वर्ग पडतात. त्यामुळे पात्रांची वेशभूषाही इथे खूप महत्वाची असावी.

चित्रपटाचा 'फ्रेश लुक' आपल्याला 'प्रेमाची गोष्ट'मध्ये पाहायला मिळाला होता. 'प्रेमाची गोष्ट' मध्ये सगळा भर त्या 'लुक'वरच राहिला होता, तसं सुदैवाने इथे घडत नाही. पूर्वार्ध होतो तेव्हा क्षणभर आपल्या मनात विचार येतोच की, 'Rajwade and sons, where nothing happens' आहे की काय, पण उत्तरार्धात कथानक रंग बदलत जातं. ह्यात काही ठिकाणी थोडी गडबड वाटते, पण ते किरकोळ मानता येऊ शकेल. एरव्ही सचिन कुंडलकरांची कथा-पटकथा वास्तवदर्शी आहेच. हृषिकेश मुखर्जींच्या क्लासिक 'खुबसूरत'शी हे कथानक साधर्म्य सांगत नसलं, तरी आठवणी जाग्या होतात. 'खुबसूरत'मध्ये सर्वांवर अधिकार गाजवणारी व्यक्ती घरातली स्त्री (दीना पाठक) होती, इथे पुरुष (सतीश आळेकर) आहे. तिथे सर्वांना खुलं जगायला शिकवणारी व्यक्तीही एक स्त्रीच (रेखा) असते, जी नात्यातलीही असते. इथे ती व्यक्तीही एक पुरुष (अमित्रियान पाटील) आहे, नात्यातलाच आहे. घरातली तिसरी पिढी म्हणजे तरुण मुलं मुक्त होऊ पाहत आहेत. तर वडीलधारी मंडळी, त्यांना स्वत:च्या मर्जीनुसार जगण्यासाठी भाग पाडायचा प्रयत्न करत आहेत. ही संकल्पना नुकतीच आपण 'दिल धडकने दो' मध्ये पाहिली होती. हाताळणी दोन्हीकडे वेगळी आहेच. राजवाडे साहजिकच भरपूर 'मराठाळलेला' आहे, तर 'दिल धडकने दो' पंजाबाळलेला. ह्या मूलभूत फरकाव्यतिरिक्तही अनेक फरक आहेत. त्यामुळे 'कशावर तरी बेतलेलं कथानक' असा आरोप इथे होऊ शकत नाही. मात्र, आधीच म्हटल्याप्रमाणे, 'आठवणी तर जाग्या होतातच !'

मात्र, 'खुबसूरत'मध्ये कथानकावरची हृषिदांची पकड शेवटपर्यंत ढिली होत नाही. इथे मात्र ती अधूनमधून होत राहते. काही प्रसंग अधिक चांगल्याप्रकारे रंगायला हवे होते. घरी पोलीस येणे, मुलाचे परत येणे, पात्रांचं एकमेकांवर धावून जाणे, मारणे अश्या ठिकाणी पकड ढिली होते. एका प्रणयदृश्याची, हाफ फ्राय खाण्यासोबत सांगड घातलेली आहे. ते अक्षरश: चावट विनोदी वाटतं.

संगीत आजच्या पिढीचं वाटावं म्हणून भिकार असावं, असा एक 'बेनेफिट ऑफ डाऊट' देता येऊ शकेल. कारण ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देत असताना, मधल्या भागात तो गोंधळ वैताग आणतो.

चित्रपटाचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे, एकजात सर्वच्या सर्व पात्रांचा अप्रतिम अभिनय. कुणाही एकाचा स्वतंत्र उल्लेख करणंही अवघड वाटावं, इतका प्रत्येक जण आपापल्या व्यक्तिरेखेशी समरस झालेला आहे. मराठी चित्रपट चांगला असेल वा वाईट, आवडेल किंवा नावडेल, पण सर्व कलाकारांचे अभिनय नेहमीच लक्षात राहण्याजोगे असतात. हीच मराठी चित्रपटाची खरी श्रीमंती आहे. उत्तम निर्मितीमूल्यं, सफाईदार तंत्रज्ञान आणि कल्पक कलादिग्दर्शन ह्या सगळ्या बाबी चित्रपटाला एक टवटवीत व सुंदर चेहरा देत असतील आणि देतातच. मात्र तो चेहरा आपलासा वाटतो, तो कलाकारांच्या सहज वावरामुळे. सतीश आळेकर, सचिन खेडेकर, अतुल कुलकर्णी, राहुल मेहेंदळे, ज्योती सुभाष, मृणाल कुलकर्णी, वर उल्लेखलेले तरुण चेहरे (आणि काही राहिलेली नावं!) सर्वांनाच मनापासून दाद द्यायला हवी !
उत्तरार्धाच्या उत्तरार्धात एका दृश्यात सचिन खेडेकर एक मुलगा, बाप व भाऊ म्हणून स्वत:ची बाजू मांडतो. त्याची ती तिहेरी कोंडी सांगणारा तो प्रसंग मात्र चित्रपटाचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. कसलाही मेलोड्रामा न करता संयतपणे आपली भिडस्त हतबलता सांगणाऱ्या त्याच्या विद्याधर राजवाडेने त्या एका प्रसंगात आपली स्वाक्षरी कॅमेऱ्यावर सोडली आहे, हे निश्चित.



अनेक दिवसांनी मराठीत पुन्हा एकदा असा एक चित्रपट आला आहे, जो आवर्जून पाहावा. त्यातल्या काही अंमळ फसलेल्या जागांसह तो आवडावा, थोडासा आपणही जगावा आणि थोडासा दुसऱ्याला जगवावा.
लहान मोठे 'राजवाडे' आपल्या आजूबाजूला किंवा कदाचित आपल्यातही आहेत. म्हणूनच 'राजवाडे अ‍ॅण्ड सन्स' आपल्यास नकळत ''राजवाडे अ‍ॅण्ड अस' किंवा 'राजवाडे अ‍ॅण्ड मी' होतो. 'राजवाडे म्हणजे आम्हीच' असं वाटणं, हेच चित्रपटाचं खरं यश आहे.

रेटिंग - * * *



हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये १८ ऑक्टोबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-


Monday, October 12, 2015

एव्हढी बदनाम माझी माहिरी

एव्हढी बदनाम माझी माहिरी
वेदनाही वाटते कारागिरी

पाहिल्यावर पाहणे मी टाळतो
तेव्हढी जमतेच करचुकवेगिरी

जीवनाला जीवही देईन मी
फक्त संपावी जरा हाराकिरी

आठवांचा दिवसभर शिमगा असे
रोज दु:खांची असे कोजागिरी

पायरीवर थांबलेला पोळला
चालला अभिषेक होता मंदिरी

मी तुझ्यावाचून आहे शून्यवत
स्पर्श तू आहेस अन् मी शिरशिरी

....रसप....
३ नोव्हेंबर २०१४ ते १२ ऑक्टोबर २०१५

Sunday, October 11, 2015

दोन दशकं उशीराचा 'जज़बा' (Movie Review - Jazbaa)

हताशा आणि संताप ह्यांचा संमिश्र परिणाम म्हणून एका प्रसंगात मातीत जोरजोराने हात आपटून धूळ उडवून झाल्यावर तिथेच जवळजवळ साष्टांग लोटांगण घेऊन ऐश्वर्या बाई बच्चन हमसाहमशी रडतात. गर्द काळे कपडे. बारीक लालसर माती. (संजय गुप्ताचे आवडते रंग!)

लगेच पुढच्याच प्रसंगात रडण्याचा सिक्वल ऐ.बा.ब. स्वत:च्या गाडीत ड्रायव्हिंग सीटवर बसून सुरु करतात. तेव्हा कपड्यांवर धूळ, मातीचा लवलेशही दिसत नाही. इतक्यात अचानक अवतरलेला इरफान खान बाजूच्या सीटवर येऊन बसतो आणि त्यांचा सिक्वल अपूर्णावस्थेत थांबवतो. मग दोघे गाडीबाहेर येऊन 'सत्य' समजून घेतात. ते ऐकून इरफानसुद्धा हताशा आणि संताप ह्यांचा संमिश्र परिणाम अनुभवतो. आजूबाजूला असलेल्या जुन्या लोखंडी मोठमोठ्या पिंपांना लाथा मारतो, उचलून फेकतो, पुन्हा लाथा मारतो, पुन्हा फेकतो ! ऐ.बा.ब. चं एक वेळ ठीक आहे, पण नेहमी संयत असणाऱ्या इरफान खानला अचानक काय झालं काही कळत नाही !
विशेष काही नाही. त्याला संजय गुप्ता भेटलेला असतो.

अजून एका प्रसंगात शाळेत एक धावण्याची शर्यत असते. ही एक अशी अभिनव शर्यत आहे, की तमाम 'ब्रॅण्डेड' आंतरराष्ट्रीय शाळांना, सॉरी 'स्कूल्स'ना, न्यूनगंड यावा. ह्यात प्रत्येक मुलीबरोबर तिच्या आईनेही भाग घ्यायचा असतो. सुरुवातीला मुलगी धावणार आणि नंतर 'बॅटन' आईकडे सोपवणार. मग आईने धावून शर्यत पूर्ण करायची ! ह्या शर्यतीसाठी समस्त माउलींनी त्यांचा नेहमीचाच पेहराव करणे, बंधनकारक होते की नाही, हे माहित नाही. पण आपल्या 'ऐ.बा.ब.' त्यांच्या रोजच्या 'काळा सूट आणि काळी पॅण्ट' ह्या गणवेशातच उतरतात. कुणाचीही आई साडी नेसत नसावी कारण इतर सर्व स्पर्धक माउल्या पंजाबी ड्रेसमध्ये असतात.

ही विचित्र शर्यत संपूर्ण चित्रपटाचं प्रतीकात्मक सार आहे. अशीच एक विचित्र शर्यत नंतर वकीलीण अनुराधा वर्मा (ऐ.बा.ब.) धावते. आपल्या मुलीचं - 'सनाया'चं - पालनपोषण एकटीनेच करणारी अनुराधा शहरातल्या सर्वोत्तम वकीलांपैकी एक असते. आजपर्यंत आपल्या कारकिर्दीतील एकूण एक केसेस जिंकलेल्या अनुराधाच्या एकुलत्या एक मुलीचं अपहरण केलं जातं आणि तिच्या सुटकेच्या बदल्यात अट ठेवली जाते ती बलात्कार व खूनाचा आरोप सिद्ध होऊन फाशीची शिक्षा सुनावली गेलेल्या 'नियाझ' नामक एका गुन्हेगाराचा खटला हाय कोर्टात लढवून त्याला सोडवण्याची. मुलीच्या विरहाने कानठळ्या फोडणारा आरडाओरडा करणारी अनुराधा ह्या विचित्र द्विधेत अडकल्यावर जरासुद्धा मेलोड्रामा न करता ताबडतोब कामाला लागते. ह्या कामात तिला मदत करतो, शाळेपासून तिचा मित्र असलेला निलंबित पोलीस निरीक्षक 'योहान' (इरफान खान). तो अनुराधावरील आपल्या एकतर्फी प्रेमाला कोंदणातल्या हिऱ्याप्रमाणे मनात जपून असतो. दोघे मिळून ह्या प्रकरणाला कसं फिरवता येईल आणि 'सनाया'ला कसं वाचवता येईल, ह्यासाठी झटतात.

सरकारी वकिलाच्या भूमिकेत अतुल कुलकर्णीला अगदीच थोडंसं काम आहे, तर एका राजकीय नेत्याची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या जॅकी श्रॉफला त्याहूनही कमी !
शबाना आझमींनी रंगवलेली व्यक्तिरेखा आहे 'गरिमा चौधरी'. ज्या मुलीवर पाशवी बलात्कार करून तिचा खून केल्याच्या आरोपाखाली 'नियाझ'ला फाशीची शिक्षा झालेली असते, तिची आई. ऐश्वर्या बच्चन आणि शबाना आझमी जेव्हा जेव्हा एकमेकांसमोर येतात, तेव्हा तेव्हा एका आईची घुसमट कशी असते, हे शबाना आझमी ऐ.बा.ब. ना प्रत्यक्ष दाखवतात. पण सुनबाई काही केल्या बोध घेत नाहीत. त्या फक्त थयथयाट, आकांडतांडव, आरडाओरडा वगैरे धसमुसळेपणा करण्यात धन्यता मानतात. त्यामुळे जितकी 'गरिमा चौधरी' आश्वासक वाटते, तितकीच 'अनुराधा वर्मा' भंपक.

कमलेश पांडे ह्यांनी लिहिलेले संवाद खुसखुशीत आहेत. मात्र त्या खुसखुशीत पणातला ९०% भाग इरफान खानसाठी राखीव आहे. Needless to say, त्याने त्याचं सोनंही केलंच आहे !
'इरफान'चा जबरदस्तीने 'इरफानिताभ' करण्याचा प्रयत्न स्वत: इरफाननेच हाणून पाडला आहे. त्याला स्टाईल मारायला लावलेली आहे. खुसखुशीत डायलॉग्ज दिले आहेत. तो हे सगळं करतो, पण तरी स्वत:चं वेगळेपण जपतोच. 'तलवार'नंतर पुन्हा एकदा तो साधारण तश्याच भूमिकेत दिसला आहे. मात्र 'तलवार'मधला त्याचा 'अश्विन कुमार' किती तरी पटींनी इथल्या 'योहान'पेक्षा जास्त परिणामकारक आहे, ह्याबद्दल शंकाच नसावी.

संजय गुप्ता हे दिग्दर्शकांमधले 'प्रीतम चक्रवर्ती' असावेत. चित्रपट जिथे जिथे चांगला वाटतो, तिथे तिथे त्यांचं अभिनंदन करताना उगाच 'नक्की ह्यांचंच अभिनंदन करायला हवं ना ?' असा विचार छळतो. सगळ्या मेलोड्रामा व उचक्या, ठेचांनंतरही 'जज़बा' सुमार नक्कीच नाही. ऐ.बा.ब.च्या अतिअभिनयाला इरफान खान आणि शबाना आझमी सांभाळून घेतात आणि चित्रपट 'बघणेबल' बनतो. तर कधी नव्हेतो संगीतही छळवाद मांडत नाही. 'जाने तेरे शहर का क्या इरादा है..' हे गाणं तर मनात घरही करतं. त्यासाठी 'अर्को' ह्या नाव न वाटणाऱ्या नावाने संगीत देणाऱ्या व्यक्तीचे आभार !

२००७ साली नामवंत दिग्दर्शक सुधीर मिश्रा ह्यांचा 'खोया खोया चांद' म्हणून एक चित्रपट येऊन, आपटून गेला. तो चित्रपट ज्यांनी पाहिला, त्यांना तो कळलाच नाही, त्यामुळे आवडला की नावडला, हे ठरवताच आलं नाही. मात्र त्यात अप्रतिम अशी एक कव्वाली होती. 'क्यूँ खोए खोए चाँद की फ़िराक में तलाश में उदास हैं दिल..' जर चार दशकांपूर्वी एखाद्या चित्रपटात ती कव्वाली असती, तर केवळ तिच्या जोरावर तो चित्रपट भरपूर चालला असता. 'खोया खोया चांद' चार दशकं उशीरा आला होता. असे अनेक चित्रपट काही दशकं उशीरा आलेले असावेत. 'जज़बा'सुद्धा साधारणपणे दोन दशकं उशीरा आलेला चित्रपट आहे. हा चित्रपट अश्या काळात आला आहे, जेव्हा चित्रपटाची गणितं बदलली आहेत. आताशा, इतर कथानकांमध्ये एक वेळ चालून जाईल, पण 'थ्रिलर'मध्ये 'थिल्लर'पणा चालत नाही. 'जज़बा'तला अनावश्यक मेलोड्रामा आणि काही अक्षम्य पोरकटपणा व चित्रीकरणातील ठसठशीत उणीवा, त्याच्या नाट्यनिर्मिती व उत्कंठावर्धकतेला मारक ठरतात. वीस वर्षांपूर्वी ह्या उणीवांसहही 'जज़बा' कदाचित, 'Edge of the seat' ड्रामा म्हणवला जाऊ शकला असता. पण गुप्ताजी, तुम्ही किमान वीस वर्षं उशीर केलात !

रेटिंग - * *


हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये ११ ऑक्टोबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-


Monday, October 05, 2015

अवस्थपणे म्यान (Movie Review - Talvar)

नुकतेच चैतन्य ताम्हाणे ह्यांच्या 'कोर्ट' ह्या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन देण्यात आले. 'कोर्ट' हा चित्रपट एका सर्वसामान्य माणसाच्या न्यायव्यवस्थेतील ससेहोलपटीविषयी होता. एखाद्या साध्याश्या प्रकरणालाही कोर्टात किती काळ लागू शकतो, ह्याचा आपल्यापैकी प्रत्येकालाच अनुभव नसला, तरी अंदाज नक्कीच आहे. म्हणूनच आपण म्हणतोही की, 'शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये.'
मात्र कोर्टाच्या पायरीपर्यंत पोहोचण्याआधीही काही वेळेस अनेक पायऱ्या असतात. न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचायच्या आधी अनेक प्रकरणांना तपासयंत्रणा चिवडतात. संबंधित व्यक्ती त्यात भरडल्याही जातात. कोर्टाच्या संथगतीला अधोरेखित करणारा चित्रपट 'कोर्ट'सारखा दुसरा नसला, तरी तपासयंत्रणेच्या वरवंट्याखाली भरडल्या जाणाऱ्या सामान्य व्यक्तीला दाखवणारे अनेक चित्रपट आपण पाहिले आहेत. त्यांतले बहुतांश अतिरंजित, तर काही खरोखर अंगावर येणारे होते. 'अंगावर येणे', ह्याचेही दोन प्रकार होऊ शकतात. एक म्हणजे भडकपणामुळे आणि दुसरे म्हणजे उत्कटतेमुळे. 'तलवार'सुद्धा अंगावर येतो. पण त्यातल्या भडकपणामुळे नाही, तर उत्कटपणामुळे. काही चित्रपट एखाद्या धबधब्याप्रमाणे कोसळतात. तो आवाज, ते दृश्य स्तिमित करणारं असतं. 'तलवार' सारखे चित्रपट हे एखाद्या शांत ओहोळासारखे वाहत राहतात. तो संयतपणे वाहणारा प्रवाह करत असलेली संयमित नादनिर्मिती, नीरव शांततेत मनात चलबिचल करते. ही चलबिचल धबधबा पाहताना काही क्षण स्तिमित होण्यासारखी नसते. ती एक बेचैनी असते, जी अंतर्मनाला ढवळून काढते. आपल्याच नकळत आपण पडद्यावर चाललेल्या नाट्याचा एक भाग होऊन जातो. कुठल्या तरी एका पात्रात आपण स्वत:ला पाहायला लागतो. चित्रपट संपतो. ते पात्र नाहीसं होतं. मागे उरते बेचैनी. ढवळून काढणारी. पोखरणारी. पण निरुपाय. आपल्या क्षुल्लकतेचा, हतबलतेचा, असहाय्यतेचा आपल्यालाच एक वांझोटा संतापही येतो. टॅक्सी नं. ९२११ मधला 'जय' ज्या तिरस्काराने 'राघव'ला सांगतो की, 'दारु पी और अपने घर पे जा', त्याच तिरस्काराने आपणच आपल्याला सांगतो, 'गाडी काढ आणि घरी चल.'

नॉएडामध्ये काही वर्षांपूर्वी झालेल्या आरुषी तलवार व हेमराज बंजाडे ह्यांच्या दुहेरी खून प्रकरणावर 'तलवार' आधारित आहे. पण ह्या 'तलवार' शब्दाचा संदर्भ वेगळा आहे. न्यायदेवतेची डोळ्यांवर पट्टी आणि हातात तराजू घेतलेली मूर्तीच आपण आजतागायत पाहत आलो आहोत. पण तिच्याच दुसऱ्या हातात तलवारही आहे. 'ही तलवार म्हणजे आपण. पोलीस', असं चित्रपटात एके ठिकाणी एक पात्र म्हणतं. 'तलवार' हा त्या 'तलवार'बद्दल आहे.

स्वत:ची मुलगी 'श्रुती' आणि घरचा नोकर 'खेमपाल' ह्यांच्या खुनाचा आरोप असलेला डॉ. रमेश टंडन (नीरज कबी) पोलिसांच्या ताब्यात आहे. पण ह्या धक्कादायक प्रकरणाने खळबळ माजवली आहे. एक डॉक्टर बाप आपल्या मुलीचा खून करतो, पोलीस त्याला अटक करतात आणि डॉक्टर व त्याचे इतर नातेवाईक आरोपांना अमान्य करतात. हे सगळं नक्की काय आहे ? तपासयंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उठतात आणि प्रकरण 'सीडीआय'कडे दिलं जातं. ऑफिसर अश्विन कुमार (इरफान खान) ह्या अत्यंत कुशल अधिकाऱ्याकडे तपास सोपवला जातो. चीफ अश्विन कुमार आणि त्याचा एक ज्युनिअर (सोहम शाह) मिळून पाळंमुळं खणून काढतात आणि तपासातून काही वेगळीच कहाणी समोर येते.
पण सिस्टम आपला खेळ खेळते. मोहरे बदलतात. पट बदलतो. सगळ्या खेळाचा रंगच पालटतो. प्रत्येक जण आपापली चाल खेळतो. कुणीच जिंकत नाही, प्रेक्षकसुद्धा बुद्धिबळातल्या अनिर्णीत अवस्थेप्रमाणे 'स्टेलमेट' होतो.

'तलवार' सपासप वार करत नाही. मात्र तळपतो. त्रिफळा उडवणारे संवाद इथे नाहीत. मात्र नि:शब्द करणारा परिणाम साधला जातोच.
'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी' मध्ये आपल्या नजरेत आलेला 'नीरज कबी' हा अभिनेता पुन्हा एकदा ताकदीचं सादरीकरण करतो. त्याने साकारलेला डॉ. रमेश टंडन एकेक क्षणात सच्चा वाटतो. नैराश्य, अनिश्चितता, असहाय्यता असं सगळं व्याकुळ मिश्रण त्याच्या नजरेतून दिसतं.
त्याच्या पत्नीच्या भूमिकेत कोंकना सेन-शर्माला विशेष वाव नाही आहे. आजच्या काळातल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्र्यांमधली एक कोंकना, तिला जितका वाव मिळतो, तेव्हढ्यातही स्वत:ला सिद्ध करतेच !
चित्रपट इरफान खानच्या अश्विन कुमारचा आहे. अश्विन कुमार जो स्वत: वैयक्तिक आयुष्यात रीमा कुमार (तब्बू) घटस्फोटाला सामोरा जातो आहे, तो व्यावसायिक आयुष्यात ही एक अशी केस स्वीकारतो, जी त्याला सुरुवातीला 'किरकोळ मर्डर-बिर्डर केस' वाटत असल्याने त्याला स्वीकारायची नसते. मात्र वरवर शांत दिसणाऱ्या डोहात खाली भोवरा असावा, त्याप्रमाणे तो ह्या केसमध्ये कसा गुरफटतो, हे पाहणे रंजक आहे. कर्तव्यकुशल अश्विन कुमार त्याने जबरदस्त उर्जेने साकारला आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या उलट तपासणीचा, स्वत:च्या फसगतीबद्दल कळतं तेव्हाचा आणि शेवटाकडे जातानाचे अनेक असे काही प्रसंग केवळ जबरदस्त झाले आहेत.
तब्बूला पाहुण्या कलाकाराचंच काम आहे. तेव्हढ्या वेळात ती तिचा नेहमीचा विझलेला चेहरा घेऊन वावरते.

चित्रपटाचं लेखन विशाल भारद्वाजनी केलं आहे. पटकथेत बारीक-सारीक तपशील उत्तम प्रकारे सांभाळले आणि पेरलेही आहेत. चित्रात जे चक्र पूर्ण करतो, त्यात ह्या कथा-पटकथेचा वाटा अनन्यसाधारण आहे. गाण्यांना इथे काही वाव नव्हताच. एक गाणं वाजतं, जे गुलजार साहेबांनी लिहिलं आहे. त्याला संगीतही विशाल भारद्वाजांचंच आहे. ते गाणं पूर्णपणे विस्मरणीय आहे.

ए. श्रीकर प्रसाद, हे नाव अनेक उत्तमोत्तम चित्रपटांशी एडिटर म्हणून जोडलेले आहे. कॉकटेल, फाईण्डिंग फॅनी, देढ ईश्कीया, डेव्हिड अश्या अनेक चित्रपटांशिवाय मणीरत्नमच्या रावण, गुरु, युवा वगैरेचंही त्यांनी काम केलं आहे. त्यांच्या कामाच्या ह्या यादीवरून त्यांचं इथलं काम कसं असेल, हे सांगायची आवश्यकताच नाही !

ह्यापूर्वी चांगलं, पण विशेष व्यावसायिक यश न मिळवणारं काम केलेल्या दिग्दर्शिका मेघना गुलजारने पुन्हा एकदा उत्तम काम केलंच आहे. व्यावसायिक यश मिळवणे, हा त्यामागचा उद्देश नक्कीच नसावा. पण 'तलवार' मुळे यशाची चव त्यांना चाखायला मिळेलच, असं वाटतं. कहाणीवर दिग्दर्शिकेचे घट्ट पकड जाणवत राहते. एकच प्रसंग जेव्हा वेगवेगळ्या लोकांच्या अवलोकनातून दाखवला गेला आहे, तेव्हा सांभाळलेला साधर्म्य व तफावत ह्यांतला समतोल साधण्यासाठी पटकथेतल्या बारकाव्यांची मदत झाली असेलच, मात्र 'सफाई' तर दिग्दर्शिकेचीच !

'तलवार' ही एक सत्यकथेवर आधारित असल्याने 'Real life crime thriller' म्हणवला जाऊ शकतो. आधीच म्हटल्याप्रमाणे ही तलवार अंगावर येईल. बेचैन करेल. ही तलवार स्वत:ही अस्वस्थपणे म्यान होईल आणि तुम्हालाही अस्वस्थ करून सोडेल.
हा चित्रपट न पाहण्याचं एकच कारण असू शकतं. ते म्हणजे, 'मला डिस्टर्ब व्हायला आवडत नाही.'

रेटिंग - * * * *


हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये ०४ ऑक्टोबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-


Related Posts Plugin for WordPress, Blogger...