Wednesday, September 25, 2013

राधा ही बावरी (झी मराठी) - १० सप्टेंबर २०१३

मित्रांनो,

'झी मराठी'वरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका 'राधा ही बावरी' मध्ये माझा एक सहभाग होता.
दि. १० सप्टेंबर २०१३ चा गणपती विशेष भाग 'राधा..'च्या टीमने खूप वेगळ्याप्रकारे केला. कथानक असं होतं की, मालिकेतील कुटुंबाच्या घरी गणपती आहे आणि त्या निमित्त त्यांच्या काही कविमित्रांचा कविता सादरीकरणाचा एक कार्यक्रम त्यांनी घरीच आयोजित केला आहे. ज्येष्ठ कवी अरूण म्हात्रे, निसर्गकवी नलेश पाटील आणि आजच्या पिढीच्या कवींचा प्रतिनिधी म्हणून मी असे तिघे त्या भागात आमंत्रित होतो. मी पुढील दोन कविता सादर केल्या -

ती बघते तेव्हा 

ती बघते तेव्हा राधा बनुनी चित्त चोरते माझे
अंतरात माझ्या श्याम बोलतो "राधे... राधे.. राधे...!"

ती बघते तेव्हा गंध प्यायले रंग उधळती वारे
मज वाटे रंगित, गंधित, धुंदित भवतालीचे सारे

ती बघते तेव्हा असे वाटते बघून बघतच राहो
क्षण एक आज हा इथेच ऐसा क्षणभर थांबुन राहो

ती बघते तेव्हा विशाल अंबर पायी लोळण घेते
प्राशून सागराला मी उरतो मुठीत धरणी येते

ती बघते तेव्हा लाजलाजरे गाल गुलाबी होती
मधुशाला सारी जणू मांडली लाल रसील्या ओठी 

ती बघते तेव्हा हृदयामधुनी तीर पार तो जातो
मी 'हाय' बोलुनी पुन्हा पुन्हा तो छातीवरती घेतो

ती बघते तेव्हा शब्दांचाही गोंधळ थोडा उडतो
अर्थास शोधणे व्यर्थच होते, फक्त पसारा उरतो !

....रसप.... 


तुमची बायकोसुद्धा अगदी अशीच आहे ना हो?

तुमची बायकोसुद्धा अगदी अशीच आहे ना हो?
रोज जरी भांडली तरी तुम्हाला आवडते ना हो?

ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी जाता 
चकाचक हॉटेलात डीलक्स रूम घेता 
नाश्त्यापासून डिनर पर्यंत हाण-हाण हाणता 
तरीसुद्धा पोट काही भरत नाही ना हो?
तिच्या स्वयंपाकाची चव येतच नाही ना हो?

काही दिवसांसाठी जेव्हा ती माहेरी जाते 
जमेल तेव्हढी तुमची व्यवस्था लावून ठेवते 
चार वेळा फोन करून हालहवाल विचारते 
रिकाम्या घरात काही केल्या करमत नाही ना हो?
ऑफिस संपल्यावरती घरी जाववत नाही ना हो?

समारंभाला जाण्यासाठी ती भरपूर नटते 
तुम्ही तयार होऊन बसता, ती तासभर लावते 
पुन्हा पुन्हा विचारते, “मी कशी दिसते?”
कशीसुद्धा असली तरी, सुंदर दिसते ना हो?
तुम्ही “सुंदर” म्हटल्यावरती, गोड लाजते ना हो?

अनेक महिने-दिवसांनंतर तुम्ही मित्रांना भेटता 
जुने दिवस आठवून आठवून गप्पांमध्ये रमता 
थोड्याच वेळासाठी तुम्ही बायकोला विसरता 
तितक्यात येतो फोन आणि तुम्ही पळता ना हो?
मित्र तुम्हाला बायकोचा गुलाम म्हणतात ना हो?

तुमचं पहिलं प्रेम तुम्ही बायकोत पाहता का हो?
तिच्या दोन डोळ्यांमध्ये आरसा दिसतो का हो?
तिचा हात हातात घेताच निवांत होता का हो?
“तिच्याशिवाय तुम्ही नाहीच” असं समजता का हो..??
.
.
तुमची बायकोसुद्धा अगदी अशीच आहे ना हो?
.
तुमची बायकोसुद्धा अगदी अशीच आहे ना हो?

....रसप....

कार्यक्रम खूपच छान झाला आणि असा वेगळा विचार करून तो अंमलात आणल्याबद्दल झी-मराठी व 'राधा..'च्या टीमचे मन:पूर्वक अभिनंदन !

ह्या भागाचा यू-ट्यूब दुवा खालीलप्रमाणे -




धन्यवाद !

Monday, September 23, 2013

पिच्चर बघू काय ? "होय महाराजा !" - (Narbachi Wadi - Marathi Movie Review - नारबाची वाडी)

नारळाचं झाड जरासं नाठाळ असतं. ते सुरुवातीला अगदी हळूहळू वाढतं.. बहुतेकदा तर मालकाचा अगदी अंत पाहतं. वाटतं हे झाड काही उपयोगाचं नाही. पण मग, एकदा ही सुरुवातीची वर्षं सरली की फणा काढलेल्या नागासारखं डौलात उभं राहातं... उंचच उंच ! मग त्याच्या नाठाळपणाचा अनुभव हवेला येतो. कितीही जोरदार वारं वाहिलं तरी काहीही फरक पडत नाही. बरं कित्येक फूट वाढलं, तरी झाडाचा बहुतेक भाग खोडच! नारळ काढायचे म्हणजे झाडावर चढण्या-उतरण्याची कसरत!
असाच काहीसा नाठाळपणा माणसातही असतो. आयुष्याचे बारकावे उमगण्यात किती तरी वर्षं निघून जातात, पण जेव्हा ते उमगतात तेव्हा माणूस हाताला लागत नाही. तो नारळासारखा उंच होतो. वादळवार्‍यांना बधत नाही आणि त्याच्याकडून फायदा करून घेण्यासाठी जाम मेहनत करावी लागते !
काही माणसं तर इतकी नारळ बनतात की ती असतातही बाहेरून रुक्ष, कोरडी, कडक आणि आतून शीतल, निर्मळ..!!

असाच एक नारळ म्हणजे 'नारोबा'. कोकणातल्या कुठल्याश्या लहानग्या गावात राहणारा एक म्हातारा. ह्या नारबाची एक अत्यंत सुंदर वाडी असते, वडिलोपार्जित. ह्या बागेवर, इथल्या झाडांवर नारबा पोटच्या पोरांप्रमाणे माया करत असतो, त्यांची निगा राखत असतो. प्रामाणिक माया केली तर झाडंसुद्धा आपल्या रंध्रा-रंध्रांतून ममता पाझरतात. नारबाची वाडीसुद्धा अशीच झाडा-झाडातून ममता पाझरणारी शांत स्वर्गभूमी! नारबाची बायको, मुलं कुणीच नसतात. फक्त एक नातू असतो - पंढरी. छोट्या नातवासह सुखात नांदणार्‍या नारबाच्या ह्या सुंदर वाडीवर गावच्या खोताची - रंगराव खोताची - वक्रदृष्टी पडते आणि सुरू होते एक वेगळेच गंमतशीर नाट्य! ते काय, कसं हे कळण्यासाठी एकदा 'नारबाच्या वाडी'ला भेट देऊन यायलाच हवं !


दिलीप प्रभावळकरांचा 'नारोबा' निव्वळ भन्नाट झाला आहे. व्यक्तिरेखेच्या आवश्यकतेनुसार त्यांनी आपल्या अंगकाठीचा अप्रतिम वापर करून घेतला आहे. डोळे बारीक करून बोलण्याची लकब खूपच खास ! आणि कोकणी हेल काढून बोलणेही एकदम अस्सल झाले आहे. त्यांच्या चतुरस्र प्रतिभेचं दर्शन पहिल्यांदा झालेलं नाहीच, त्यामुळे खरं तर चित्रपट सुरु होण्याआधीच आपल्याला माहित असतं की ते आपली छाप सोडणारच आहेत.

मनोज जोशींनी रंगराव व त्याचा मुलगा मल्हारराव अशी दुहेरी भूमिका अफलातून साकारली आहे. लंपट बेवडा रंगराव आणि कंजूष धूर्त मल्हारराव फार सहज उतरले आहेत. काही दृष्यांत तर त्यांचा खलपुरुषसुद्धा काळजाला हात घालतो.
दिलीप प्रभावळकर आणि मनोज जोशी - ह्या 'कास्टिंग'मध्येच चित्रपट अर्धी बाजी जिंकतो, असं मला वाटतं. ह्या भूमिकांसाठी हे दोन नट इतके अचूक हेरले आहेत की ह्या भूमिका त्यांच्याचसाठी जन्माला आल्या असाव्यात.

निखिल रत्नपारखी, किशोरी शहाणे, विकास कदम, अतुल परचुरे आपापलं काम चोख करतात.  

कोकण, तिथे राहणारा एक बेरकी म्हातारा, त्याची नारळी-पोफळीची बाग ह्या सगळ्यावरून अपरिहार्यपणे पु.लं. चा अंतू बर्वा आठवतोच आणि मनातल्या मनात जराशी तुलनाही होते. मग वाटतं की, 'रत्नांग्रीच्या समस्त म्हयशी तूर्तास गाभण होय रे झंप्या?' असं म्हणणार्‍या अंतूचा तिरकस, खडूसपणा नारोबात अगदी जसाच्या तसा नसता तरी थोडाफार गुंफता आला असता का ? असंही जाणवतं की बागेतलं एखादं झाड कसं इतर सगळ्या झाडांच्या वर डोकं काढून असतं, तसं गावातली इतर पिकली पानं हळूहळू गळत जात असल्याने नारबाचा एकटेपणा कसा वाढत चालला आहे, हे 'अंतू बर्व्या'च्या व्यथेप्रमाणेही दाखवता आलं असतं का? त्याऐवजी इतर काही दृष्यं गाळताही आली असती का ? पण अश्या जर-तरच्या समीकरणांना काही अंत नसतो. सर्वोत्कृष्टतासुद्धा अजून उत्कृष्ट करता येऊ शकते, कदाचित 'सर्वोत्कृष्ट' हे फक्त आभासी अस्तित्व असावं.

मनोज मित्रा ह्यांच्या बंगाली 'शाज्जानो बागान' ह्या नाटकावर आधारित हा चित्रपट मराठीत करताना ही कहाणी कोकणात घडवणं खूप परिणामकारक ठरलं आहे. नारबाच्या मुखी अधूनमधून येणारे 'नारो म्हणे' अभंग चित्रपटाला एक काव्यात्मक सौंदर्य व उंची देणार्‍या विविध सौंदर्यस्थानांत नक्कीच सगळ्यात महत्वाचे आहेत. गुरु ठाकूर ह्यांची पटकथा, संवाद एकदम 'फिट्ट' झाले आहेत !
 
दोनच गाणी आहेत आणि दोन्ही श्रवणीय आहेत. 'ही गजाल खरी काय?' तर बेफाट गाणं आहे..!!

वैचारिक उंची गाठण्यासाठी चित्रपट गंभीरच असायला हवा, असं नाही. हलका-फुलका चित्रपटही 'सेन्सिबल' असू शकतो. हे 'ना.वा.' दाखवून देतो. बासू चटर्जींची निर्मिती आहे, हे मला चित्रपट नामावली पाहताना कळलं आणि तिथेच चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या होत्या, ज्या माझ्या तरी पूर्ण झाल्या.

'पिच्चर फर्मास आसां', ही गजाल खरी काय?
'होय महाराजा !!'

रेटिंग - * * * *

Friday, September 20, 2013

तुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..

तुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा

घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा
तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा
हरेक फांदीस पापणी, किती आसवांस माळते
उदासवाणी किती फुले, गळून पडली बघून जा

तुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा

अनेक थेंबांस थोपवुन, पन्हाळ खिडकीत रांगते
तुला पाहण्या पुन्हा पुन्हा, मुजोर वाऱ्यास सांगते
झुळूक येते घरात अन्, सुन्या मनाने परत फिरे
समोर त्यांच्याच एकदा, झुळूक होउन निघून जा

तुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा

बराच अवधी सरूनही, अजून संध्या न मावळे
किती बरसले मेघ तरी, अजून आकाश ओघळे
भिजून पाऊलवाट ही, सुकेल ऐसे न वाटते
कवेत माझ्या अखेरचे, भिजून तू विरघळून जा

तुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा

नकोच येऊस तू पुन्हा, नकोच दावूस आसही
उधाणलेला समुद्र मी, नको किनारा भकासही
अथांग डोळ्यांतुनी तुझ्या, खळाळुनी हासलो कधी
जुनी तरलता तुझीच तू, पुन्हा जरा आठवून जा

तुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा

....रसप….
२० सप्टेंबर २०१३

Saturday, September 07, 2013

खपवता दु:खही येते..

खपवता दु:खही येते पहा जाऊन बाजारी
स्वत:चे दु:ख विकणारे इथे कित्येक व्यापारी

तुझ्याशी बोलणे म्हणजे विसावा शर्यतीमधला
फिरे आयुष्यही माझे मला पाहून माघारी

कुणाचे भोग थोडेसे कुणी भोगून फेडावे
असे ना कोणते नाते, अशी ना कोणती यारी

तुझ्या स्मरणांमुळे दाटून येते खूप व्याकुळता
तुला शोधत हरवतो मी जरी बसलीस शेजारी

तुझ्या रंगाविना मजला न भावे रंगही कुठला
म्हणूनच आवडे बहुधा मला ही रात्र अंधारी

कधी अळणी, तिखट किंवा कधी आयुष्य चव देते
'जितू' समजून घे थोडे, शिजवतो एक आचारी

....रसप....
७ सप्टेंबर २०१३ 

Friday, September 06, 2013

फिर मुझे कल रात नींद नहीं आयी..

इक पल भी तेरी याद भुले न भुलायी
फिर मुझे कल रात नींद नहीं आयी

बिस्तर पे लेटे हुए पंखे के चक्कर गिनता रहा
बीते दिनों की कडीयों को आपस में बुनता रहा
अपनीही धुंद में बारिश चुपचाप बरस रही थी
जैसे मेरी आंखो की बात उसने अनजाने में पढी थी
खुलकर कोई दास्ताँ न सुनी न सुनायी
............. फिर मुझे कल रात नींद नहीं आयी

चांद भी बहका हुआसा खिडकीसे झाँकता रहा
एक बादल रुका रुका मुझसे नमीं माँगता रहा
तुम होती तो उस चाँद को हथेली में छुपा लेती
और उस सहमेसे बादल को यादों की नमी देती
सरसराती दहलियों ने तुम्हारे लिए दस्तक लगायी
............. फिर मुझे कल रात नींद नहीं आयी

इक और अकेली रात यूँही खयालों में उलझी रही
जाने किस पल मुरझा गयी, अब तो याद भी नहीं
चादर की सिरवटों में कई बार लिखा था नाम तेरा
ओस संभाले हुए अपनी पलकों पर बताता हैं सवेरा
रोशनी की झूठी किरनें सारे घर में समायी
............. फिर मुझे कल रात नींद नहीं आयी

....रसप....
४ सप्टेंबर २०१३ 

Wednesday, September 04, 2013

अस्वस्थ कुजबुज आणि अनभिज्ञ उशी.. (उधारीचं हसू आणून.... भाग - २)

८.

उबदार काळी शाल ओढून घेतल्यावर
माझी माझ्याशीच
एक अस्वस्थ कुजबुज सुरु होते
स्वत:कडे पाठ फिरवण्यासाठी
मी कूस बदलतो
मिटलेले डोळे गच्च आवळतो
थोडा वेळच, मग टक्क उघडतो
भिंतीवरच्या घड्याळ्याच्या टिकटिकीतून
एक क्षण निसटल्याचं जाणवतं
आणि छातीत काही तरी हेलावतं
पुन्हा एकदा एक कुजबुजणारी रात्र
डोळ्यांतून मनात झिरपणार असते

बाजूच्या निश्चल उशीच्या
कोरड्या अनभिज्ञतेतून
छळणारा तिचा आणि माझा एकटेपणा
काळोखाला छेदत दूरवर पसरतो

आणि एका बेसावध क्षणी
रात्र गुपचूप निघून जाते
मला जागं ठेवून
अनभिज्ञ उशी बघत असते सगळं
उधारीचं हसू आणून..

....रसप....
३ सप्टेंबर २०१३

उधारीचं हसू आणून.... (भाग - २)

Monday, September 02, 2013

पहा लक्ष देऊन हसण्याकडे..

पहा लक्ष देऊन हसण्याकडे
तिच्या कोरड्या पापणीला तडे

मला दु:ख दे पारिजाता तुझे
टिपे गाळताना पडावे सडे

समांतर तुला चाललो जीवना
तुझी वाट घेते वळण वाकडे

जळावे असे वाटलेही तरी
कधी आग नव्हती, कधी लाकडे

'जितू' धर्म झाल्यावरी आंधळा
दिसावे कसे सारखे आतडे ?

-------------------------------------------------------

नको वाटते हे तिचे पाहणे
उतरली नसे अन् नव्याने चढे

....रसप....
२ सप्टेंबर २०१३
Related Posts Plugin for WordPress, Blogger...