Thursday, January 31, 2013

सांग तुला हे जमेल का ?


कधी मिळावे तुझे तुलाही
तुझ्याकडुन जे मला मिळाले
मनात वादळ, उरात कातळ
पाझरणारे अबोल छाले..

सांग तरीही माझ्यासम तू
उधार हासू आणशील का ?
एकच मोती गुपचुप माळुन
'सडा सांडला' मानशील का ?

फसफसणाऱ्या लाटांनाही
खळखळणाऱ्या सरिता बनवुन
अवघड असते हसू आणणे
डोळ्यांमध्ये समुद्र झाकुन

समजा जर हे तुला मिळाले -
'कातळ, छाले, वादळ-वारे'
कविता, स्वप्ने, हळवे गाणे
परत मला दे माझे सारे

सांग तुला हे जमेल का ?
सांग तुला हे कळेल का ?
व्याकुळलेली शून्यनजर ही
तुला जराशी छळेल का ?
........सांग तुला हे जमेल का ?
........सांग तुला हे कळेल का ?

....रसप....
३० जानेवारी २०१३

Monday, January 21, 2013

पुणे - ५२ : तुम्ही नक्कीच 'नाही' म्हणू शकता !! (Movie Review - Pune 52)


दुपारी १.००-१.३० चा सुमार... सकाळपासून तुम्हाला चहाशिवाय काहीही मिळू शकले नाहीये.. पोटात कावळे कोकलत आहेत.. आणि तुमच्या सभोवताली हर तऱ्हेची होटेल्स आहेत. उडिपी, पंजाबी, चायनीज, पिझ्झा, व्हेज-नॉन व्हेज... सारं काही.  काय कराल ? उडिप्याकडे जाऊन डोसा/ इडली/ वडा सांगाल की पंजाब्याकडे जाऊन कोफ्ता/ मख्खनवाला? की चायनीजमध्ये जाऊन चॉप्सी/ हक्का की पिझ्झा की अजून काही ? वेल... हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे पण उडिप्याकडे जाऊन चॉप्सी/ हक्का किंवा पंजाब्याकडे जाऊन डोसा/ इडली/ वडा मागवलंत तर ? तर..... गडबड होते ना ? तसंच काहीसं झालंय 'पुणे ५२' चं.. सिनेमाच्या केंद्रस्थानी त्यांनी ठेवला एक गुप्तहेर आणि कथा गुंफली भावनिक ओढाताणीची.. डोश्याला तंदूरमध्ये थापून रोटी आणि डोसा दोन्हीची चव घालवल्यासारखं, ह्या भावनिक ओढाताणीला उगाचच वरवरच्या थराराची जोड दिल्याने भावनिक नाट्यही गंडलं आणि थरारही !
च्यायला !! कैच्याकै लिहिलं ना ? 'बादरायण' का काय ते..? पण काय करणार 'पुणे ५२' हे नावही तसंच आहे ! कहाणीशी काहीही बादरायण संबंध नाही. म्हणजे पुणे ५२ ऐवजी, मुबई ५७ असतं.. ठाणे ५०२ असतं किंवा अगदी कोल्हापूर ११ असतं किंवा अगदी आकाशवाणी फेम झुमरीतलैया १ ते ९९ असतं, तरी काहीही फरक पडला नसता.

अमर आपटे (गिरीश कुलकर्णी) हा 'कैवल्य' बंगला, पुणे ५२ स्थित एक अयशस्वी गुप्तहेर असतो. घराच्याच, एका जरा बाहेरील खोलीत त्याचं 'सर्चलाईट ईन्व्हेस्टिगेशन' नामक नोंदणीकृत ऑफिसही असतं. अमर हेरगिरीच्या व्यवसायात असला तरी जरासा तत्वनिष्ठ असतो. कधीच फालतू धंदे करून बक्कळ पैसा कमवावा असं त्याला वाटलेलं नसतं. काकांकडे वाढलेल्या, काकांना त्यांच्या वकिलीच्या कामासाठी किरकोळ हेरगिरी करून माहिती पुरवण्याची मदत करत त्याचीच सवय लागलेल्या अमरची आर्थिक परिस्थिती 'सो-सो'च असते. थकलेल्या बिलांवरून, रात्री-अपरात्री घरी येण्यावरून, घरातल्या कामात काडीचीही मदत न करण्यावरून आणि लग्नाला अनेक वर्षं उलटूनही अजूनही अपत्य होत नसण्यावरून अमर आणि त्याची बायको 'प्राची' (सोनाली कुलकर्णी) मध्ये संवाद कमी आणि वाद जास्त असतात. एकंदरीत, एक नैराश्यमय जीवन जगणारा गुप्तहेर अमर आतल्या आत घुसमटत असतो.
दुष्काळात तेरावा महिना यावा, तसं तो त्याचा अशील 'पारेख' (स्वानंद किरकिरे) साठी पारेखची बायको (अबक) आणि एक सुप्रसिद्ध बिल्डर प्रसाद साठे (किरण करमरकर) चे फोटो काढताना फसतो. त्याला साठे पाहातो आणि अमरच्या घरी पोलिस येतात. कटकट करणाऱ्या आईसमोर (भारती आचरेकर) दारात पोलिस आल्याने वैतागलेली प्राची, पारेखने फी म्हणून अमरला दिलेले पैसे पोलिसांना देऊन मामला निस्तरायचा प्रयत्न करते. दोघांत अजून वाद होतात.. दुसऱ्या दिवशी दोघांत भांडण चालू असतानाच 'नेहा' (सई ताम्हणकर) येते. ती अमरकडे तिचा नवरा - बिल्डर साठे - वर लक्ष ठेवायचे, फोटो काढायचे काम घेऊन आलेली असते. पैश्याची चणचण असणारा अमर काम स्वीकारतो. पण त्याला तपासादरम्यान समजतं की साठे अणि नेहा नवरा-बायको नसून त्यांच्यात फक्त 'संबंध' आहेत. काहीही न बोलता, 'तुझा नवरा स्वच्छ आहे' अशी क्लीन चीट देऊन तो नेहाचं काम सोडतो खरा, पण घरी आल्यावर बायको असं काही डोकं खाते की तो अपरात्री घरातून निघून नेहाच्या घरी येतो. दोघं एकमेकांकडे आकर्षित होतात.. घडू नये, ते घडतं.. (इतके दिवस चुकत असलेला नेम, नेम न लावताच लागतो आणि) दुसऱ्या दिवशी घरी आल्यावर त्याला समजतं की बायको प्रेग्नंट आहे !
तत्पूर्वी, पारेखच्या बायकोबरोबर काढलेले साठेचे फोटो घेऊन अमर, थेट साठेला भेटतो आणि फोटोंच्या बदल्यात साठेने पाठवलेल्या पोलिसांमुळे गेलेले त्याचे मेहनतीचे पैसे भरून द्यायची मागणी करतो. पण साठेही 'मुरलेला' खेळाडू असतो. तो अमरला एक वेगळीच 'ऑफर'ही देतो. (ती ऑफर काय आहे, हे न दाखवूनही जाणकार प्रेक्षकाला कळतं, हे बहुतेक दिग्दर्शकाला माहित नसावं.)
एकाच वेळी दोन स्त्रियांकडे आकर्षित झालेला अमर, त्याच्या हातून एक मोठं 'कांड' झाल्यामुळे साठेच्या जाळ्यात फसतो.. घरात भरपूर पैसा येतो, पण अमरची घुसमट आणखी वाढत जाते. ती लेखक-दिग्दर्शकांनाही व्यापते.. सगळेच गोंधळतात.. आणि आधीच गोंधळलेल्या प्रेक्षकाला कहाणी अर्धवटच सोडून अजून बुचकळ्यात टाकतात ! सिनेमाचा शेवट जवळ आल्यावर चित्रपटगृहाचा 'एक्झिट'चा दरवाजा उघडला जातो आणि आपल्याला कळतच नाही ? आत्ता ? ह्या जागेवर शेवट ? म्हणजे हे त्या 'वासेपूर' सारखं 'क्रमश:' वगैरे आहे की काय ? पण तेही नाही !



सिनेमागृहाच्या बुचकळ्यातून बाहेर येऊन प्रेक्षक सिनेमावर अजून विचार करतो आणि काही प्रश्न पडतात -
१. तो गुप्तहेर नसता, महानगरपालिकेतला सफाई कामगार असता तरी काय फरक पडला असता ?
२. पुणे(च) ५२(च) का ?
३. एखादा गुप्तहेर इतका बिनडोकासारखा फोटो काढतो ? आय मीन, बंगल्याच्या दारासमोर स्कूटर उभी करून तिचाही आडोसा न घेता ताठ उभं राहून समोरासमोर फोटो घेणं म्हणजे काय फॅशन फोटोग्राफी आहे का ही ?
४. ('वळू' पाहिल्यावर पडला होता तसाच....) हे हे असं असं झालं... बरं मग ?

भिजलेल्या कुत्र्यासारखं अंग थरथरवून/ फडफडवून असल्या निरुत्तर प्रश्नांना झटकून टाकून तो फक्त 'चिंतन' करतो आणि जाणवतं -
१. 'सो कूल' (सोनाली कुलकर्णी) ची बडबड अजिबात भुणभुण वाटत नाही ! इतक्या गोड आवाजात ती बोलते ! हा तिच्या एकंदरीत प्रसन्न व्यक्तिमत्वाचा 'प्रॉब्लेम' असावा, पण वैतागवाडी बायको उभी राहात नाही.
२. तोंदू अमर कुणीही वाटतो, पण 'हीरो' वाटत नाही आणि गुप्तहेर तर नाहीच नाही. जेव्हा नेहा त्याला 'तू हीरो आहेस' म्हणते तेव्हा तो हसतो, खरं तर तेव्हा आपल्यालाही हसू येतं.
३. स्पष्टपणे सांगायचे झाल्यास, सई ताम्हणकरची गरम दृश्यं गिरीश कुलकर्णीमुळे अजिबात 'प्रेक्षणीय' वाटत नाहीत.

सिनेमा पहिल्यापासून शेवटपर्यंत (आणि शेवट झाल्यानंतरही !!) असा भास देत राहातो की काही तरी होणार आहे... काही तरी होणार आहे... पण होत काहीच नाही ! शेवटाजवळच्या दृश्यांत अमर ज्याप्रकारे झटकन खुर्चीतून उभा राहून चार-पाच जणांना हाणतो... धावतो... लाथा मारतो... तिथे सिनेमात 'फिल्मीगिरी'ही येतेच.
दळवी काकांचे पात्र, हॉटेलात असताना अमरचं अचानक कुठे तरी शोध घेत जाणं, नेहा-अमर फोनवर बोलताना प्राचीच्या आईने कानोसा घेणं, ते त्याचं दहा पैश्याचं जुनं नाणं, खिडकीतलं पक्ष्याचं घरटं, अमरला नंतर नंतर होऊ लागलेली ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसॉर्डर सारखी मानसिक दुरवस्था अश्या अनेक घटना/ गोष्टी एक तर उगाचच आहेत किंवा त्यातून आवश्यक ती नाट्यनिर्मिती करण्याची संधी गमावली गेली आहे.

कॅमेरा वर्क सुद्धा खूप गोंधळलेलं आणि गोंधळात टाकणारं वाटतं. उदाहरणार्थ - नेहा जेव्हा पहिल्यांदा अमरला भेटण्यास येते तेव्हा तिचा चेहरा सुरुवातीच्या काही अँगल्स मध्ये दाखवलेला नाहीये. त्यावर अंधार तरी दाखवला आहे किंवा तिला पाठमोरी दाखवली आहे. अश्या प्रकारचे कॅमेरा अँगल्स चालू असताना अचानक एका संवादापासून तिचा चेहरा दाखविण्यास सुरुवात केलीय. ह्यात कुठलाही धक्का बसत नाही... ना पाहाणार्‍याला ना अमर आपटेला... ना तसं काही पार्श्वसंगीत आहे... ना ती चेह्रा दिसतो त्या वेळी असं काही बोलते, जेव्हा तिचा चेहरा एकदम अंगावर यावा... ना त्या आधी ती असे काही बोलत असते ज्यामुळे तो झाकून ठेवावा.
केंद्रस्थानी असलेली व्यक्तिरेखा एक 'गुप्तहेर' आहे, त्याच्याकडे दोन स्त्रिया आकर्षित होणार आहेत ह्या दोनच कारणास्तव अमरच्या जागी एखादा आधी 'हीरो' आणि नंतर 'अभिनेता' असणारा कुणी तरी असता, तर बरं झालं असतं; असं वाटलं.


एकंदरीत, तंदूरवर लावलेल्या डोश्यासारखं 'पुणे ५२' हे एक ना धड भावनिक ना धड थरार नाट्य आहे - असं मला वाटतं.

रेटिंग - २

....रसप....

Sunday, January 20, 2013

पप्पूला राजकारणी व्हायचंय !!


पप्पूला राजकारणी व्हायचंय
मागच्या-पुढच्या सात पिढ्यांचं
एकाच जन्मात खायचंय..
आमच्या पप्पूला राजकारणी व्हायचंय !

कसाबसा पप्पू १२ वी शिकला
पास-नापासच्या छापा-काट्यात तितपतच टिकला
पुढच्या पुस्तकांचा गठ्ठा मात्र रद्दीमध्ये विकला
१२ वीत पास होण्यासाठी एक क्लास लावला होता
तसंच आता एखादं 'पक्ष कार्यालय' लावायचंय
कारण पप्पूला राजकारणी व्हायचंय !

त्याने ठरवलंय, नोकरी करायची नाही
कारण माहितेय, मेहनत झेपायची नाही !
पण शौक पुरे करण्यासाठी बाप कमाईही पुरायची नाही !
ढुंगण न हलवताही पैसा यायला पाहिजे
म्हणूनच त्याला एकदाच 'मीटर डाऊन' करायचंय
एव्हढ्यासाठीच पप्पूला राजकारणी व्हायचंय !

'सामाजिक जाणीव' त्याला बालपणापासून होती
शाळेतल्या दिवसात त्याला पोरं बिचकून होती
ह्याच्या बालहट्टांपुढे आईसुद्धा मान तुकवून होती
आता बाळ मोठा होऊन माजोरडा सांड झालाय
माजलेल्या सांडाला आता सारं गाव उजवायचंय
मस्तवाल पप्पूला राजकारणी व्हायचंय

उद्या पप्पू उभा राहील तिकीट विकत घेऊन
मतं मागेल, मतं मिळवेल दारोदार फिरून
मीच आणीन निवडून त्याला सगळं माहित असून
कारण 'हा' पप्पू आला नाही, तरी फरक काय पडतो ?
दुसऱ्या कुठल्या पप्पूला डोक्यावर घ्यायचंय !
ह्या देशात प्रत्येक पप्पूला राजकारणी व्हायचंय

प्रत्येक लोकशाहीचं 'अराजक'च बनत असतं
पाहावं तिथे आजकाल अघटित घडत असतं
लोकहिताच्या राज्यघटनेचं बाड कुजत असतं
सुशिक्षित समाजावर राज्य करायला -
अर्धशिक्षित नालायकांनीच सरसावायचंय
वर्षानुवर्षं 'पप्पूं'ना राजकारणी व्हायचंय !
मागच्या-पुढच्या सात पिढ्यांचं एकाच जन्मात खायचंय..
इथे प्रत्येक पप्पूला राजकारणी व्हायचंय !!

....रसप....
२० जानेवारी २०१३

Saturday, January 19, 2013

कातरवेळ (गुड नाईट, स्वीट ड्रीम्स !!)


केशरी, तांबड्या रंगांच्या वेगवेगळ्या गडद छटा दाखवत
एका नाजूक क्षणी लुप्त होणारा सूर्य
हळूहळू करत...एकेका रेषेसरशी जिवंत होत जाणाऱ्या
आणि नकळत बोलू लागणाऱ्या एखाद्या चित्रासारखा..
लाल, निळ्या, काळ्या रंगांत हरवलेलं आकाश
झाडं, वेली, पक्ष्यांनाही लागलेली गुलाबी चाहूल..
पण माझ्या मनात मात्र एक अनाहूत काहूर..
ह्याच वेळेला 'कातरवेळ' म्हणत असावेत
इथून पुढे मनाच्या कातरपणाला सुरुवात होते
अश्या वेळी मला काहीच नको असतं..
मी, मी आणि फक्त मीच..
मग सभोवती असणारी
प्रत्येक अंधुक सजीव-निर्जीव वस्तू
वेगवेगळे मुखवटे चढवते...
मला हवे असलेले..
हसणारे.. रडणारे..
रुसलेले.. चिडणारे..
ओळखीचे.. अनोळखी
आणि काही माझ्यासारखेच..
हळवे हळवे, कातर कातर !
अचानक लक्ष जातं...
खिडकीत रुणझुणणाऱ्या 'विंड चाईम्स' कडे
तो तुझाच आवाज असतो...
पन्हाळीवर एक थेंब रेंगाळलेला दिसतो
तो तुझाच चेहरा वाटतो
'गुड नाईट, स्वीट ड्रीम्स'
म्हणणारा.. !

रोज..
ह्यानंतर पुढे काय होतं,
मला आठवत नाही
कारण डोळे उघडेपर्यंत
कातरवेळ थांबत नाही..

....रसप....
१९ जानेवारी २०१३
गुड नाईट, स्वीट ड्रीम्स !!   

Wednesday, January 16, 2013

प्रकाशओझे

ही रोज सावळी रात्र मला मोहवते
सागर तमसाचा पापणकाठी बनते
हातांवर माझ्या अनेकरंगी पखरण
निर्व्याजपणे ही एकच रंगी सजते

खिडकीतुन झिरपे रोज नवा अंधार
आकाश उद्याचे घरात घे आकार
पटलावर कोऱ्या मी लिहितो मन माझे
संतप्त वेदना पडते निपचित गार

दिसतात सावल्या वठलेल्या झाडांच्या
ओघळतो अश्रू गालांवर रस्त्यांच्या
मन पाचोळ्यासम इथे-तिथे भरकटते
उरतात जाणिवा चुकलेल्या ठोक्यांच्या

जो काळ हवासा वाटे, थांबत नाही
रात्रीचा अथक प्रवासी चालत राही
स्वप्नांस असावा शाप कटू सत्याचा
हे प्रकाशओझे मिळे दिशांना दाही

....रसप....
१४ जानेवारी २०१३
(संपादित - १५ एप्रिल २०१७)

Saturday, January 12, 2013

मटरुच्या बिजलीच्या आयचा घो ! (Matru Ki Bijlee Ka Mandola - Movie Review)


आपल्या लहान मुलाला घेऊन तुम्ही आणि तुमची बायको बाहेर फिरायला जाता.. समजा, बाजारात जाता.. (किंवा कुठेही, त्याने काही फरक पडत नाही म्हणा!) आणि तिथे एक फुगेवाला दिसतो. वेगवेगळ्या आकारांचे, रंगांचे सुंदर फुगे ! साहजिकच लहानगा/गी फुग्याचा हट्ट करतो/ते.. किंवा न करताही तुम्ही एक छानपैकी वेगवेगळ्या रंगांचा मोठा फुगा घेता. फुगा घेऊन घरी येता आणि खेळता खेळता 'फट्ट'दिशी फुगा फुटतो ! का फुटतो ? कळतच नाही ! तुमचं मूल, तुम्ही आणि तुमची बायको एकमेकांकडे बुचकळ्यात पडल्यागत पाहाता, क्षणभरच.. आणि मग भोकाड..............! फुगा फुटला कसा ? हा प्रश्न बाजूला राहातो आणि आता मुलाला/ मुलीला आवरू कसा ? हा प्रश्न पडतो..! रामबाण उपाय..... 'आपण उद्या अजून एक फुगा आणू या, ठीकेय ?' कसंबसं मूल शांत.
असंच काहीसं मी, माझी बायको आणि माझ्यातलाच 'मी' बाळ ह्यांचं झालं.. 'मटरू...' बघितल्यावर. फुगा रंगीत होता... मोठ्ठा होता... छान होता... पण तिच्या मारी.. फुटला ! आणि का फुटला, तेही कळलं नाही.. आता मीच मला समजावतोय, 'पुढच्या आठवड्यात अजून एक सिनेमा पाहू या, ठीकेय ?' कसाबसा 'मी' शांत !

तर हा फुगा असा आहे/ होता..
हरियाणातील एक शेतकरीबहुल गाव... 'मंडोला'. गावाचं नाव, गावातला पिढीजात अब्जाधीश/ खर्वाधीश 'हरी मंडोला' (पंकज कपूर) च्या आडनावावरून असतं. हा मंडोला म्हणजे एक नंबरचा पक्का 'पेताड' असतो. म्हणजे त्याला पिणं सुरू करणं माहित असतं, थांबणं माहित नसतं. शुद्धीत असताना मिस्टर मंडोला किंवा हरी (harry) असणारा हा पीवट प्यायल्यावर 'हरिया'  बनत असतो. शुद्धीतला मंडोला पक्का बिझिनेसमन असतो. त्याला फायदा, पैसा, सत्ता, धंदा, ई. पुढे आणि शिवाय काही दिसत नसतं आणि टुन्न 'हरिया' कधी काय करेल ह्याचा नेम नसतो.. स्वत:च्याच विरोधात मोर्चा काढतो.. दारूचे दुकान लिमोझिन घुसवून फोडतो.. काहीही, अगदी काहीही ! गावातलाच एक तरुण 'मटरू' (इम्रान खान) मंडोलाकडे कामाला असतो. मटरु दिल्लीला शिकलेला असतो, शिक्षणासाठी त्याने मंडोलाकडूनच कर्ज घेतलं असतं पण शिक्षण झाल्यावर त्याचं शहरात मन रमत नाही म्हणून तो गावात परततो आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी मंडोलाकडे काम करायला लागतो. त्याचा ड्रायव्हर आणि केअर टेकर म्हणून. मंडोलाची बिनधास्त मुलगी बिजली (अनुष्का शर्मा) आणि मटरु लहानपणापासूनचे मित्र असतात. व्यावसायिक फायद्यासाठी बिजलीचं लग्न, स्थानिक राजकारणी चौधरी देवी (शबाना आझमी)चा बावळा मुलगा बादल (आर्य बब्बर) शी नक्की केलेलं असतं. गावातल्या शेतकऱ्यांच्या जमीनी हडप करून तिथे एक मोठा मोटार कारखाना करायचं मंडोलाचं स्वप्न, त्यात चौधरी देवीचं सशर्त सहकार्य, मटरुचा मंडोलावरील राग व त्याचं खरं 'माओ'वादी रूप, बिजली-बादलचं नकली प्रेम, अश्या सर्व प्रवासांतून ही कहाणी एका 'प्रेडिक्टेबल' सुखाच्या शेवटाला पोहोचते आणि सगळे कलाकार फेर धरून नाचतात.



चित्रपटाच्या काही भागांत पथनाट्याची झाक दिसते. एका गंभीर विषयाची जराशी वेगळी हाताळणी असल्याने सिनेमा बऱ्यापैकी आवडतो. पण मांडणी काही वेळा जराशी विस्कळीत वाटते.
गुलजारच्या शब्दांपेक्षा विशाल भारद्वाजचं संगीत खूपच उजवं आणि संवादही खुसखुशीत वाटतात.
पंकज कपूरने तोंडातल्या तोंडात हरयाणवीत पुटपुटलेले बरेच संवाद कळत नाहीत.
अनुष्का शर्मा पुन्हा एकदा छाप सोडते. तिचा पडद्यावरील वावर खूप सहज आहे.
इम्रान खान 'मटरु' दिसण्यासाठी त्याला भरगच्च दाढी असणं आवश्यक होतंच. पण त्या दाढीवरून जेव्हा अनुष्का शर्मा त्याला 'कीस' करते, तेव्हा तिची केवळ दया येते.. इंडस्ट्रीत स्थान बनवण्यासाठी काय काय करावं लागतं !
शबाना आझमी लौकिकास साजेसं काम करते आणि आर्य बब्बर बाप-लैकिकास.
'गुलाबो' ब्रांड ची दारू पिणाऱ्या मंडोलाला, दारू एकदम बंद केल्यानंतर दिसणारी गुलाबी म्हैस गंमतीदार आहे.

- पण फुगा का फुटला, ह्याचं कारण मला अजूनही मिळालं नाहीये. असो.. फुटला, तर फुटला.. पण जितका वेळ खेळलो, तितका वेळ मजा आली, एव्हढं मात्र नक्कीच !

रेटिंग - * * १/२

Monday, January 07, 2013

थोडक्यात महत्वाचे !


मित्रांनो,

माझा पहिला कवितासंग्रह - 'राजहंस मी' - नुकताच, २५ डिसेंबर २०१२ रोजी औरंगाबादला प्रकाशित झाला आहे. प्रकाशक आहेत, नागपूरचे 'विजय प्रकाशन'. ह्या पुस्तकात विविध प्रकारच्या, विषयांच्या एकूण ८१ कविता आहेत. पुस्तकाला सुप्रसिद्ध कवी ('उंच माझा झोका' फेम) श्री अरुण म्हात्रे ह्यांची प्रस्तावना लाभली आहे.

तसेच वर्षाच्या पहिल्या दिवशीच, १ जानेवारी २०१३ येथे, मी व माझ्या ९ कविमित्रांचा मिळून एक प्रातिनिधिक काव्य संग्रह - 'काव्य मकरंद' - सुद्धा पुण्याला प्रकाशित झाला. ह्या पुस्तकात माझ्या १० कविता समाविष्ट आहेत. प्रत्येकाच्या १०, ह्याप्रमाणे ह्या पुस्तकात एकूण १०० कविता आहेत. ह्याही पुस्तकाचे प्रकाशक विजय प्रकाशन, नागपूर हेच आहेत.

ही दोन्ही पुस्तकं महाराष्ट्रातील पुस्तक सर्व प्रमुख शहरांतील महत्वाच्या पुस्तकालयांत उपलब्ध आहेत.

पुस्तकांच्या किंमती:

राजहंस मी = रु. १२०/-  
काव्य मकरंद = रु. १७५/- 

आपण आपली खालीलप्रमाणे माहिती मला ransap@gmail.com इथे मेल केल्यास किंवा ह्याच नोंदीवर 'प्रतिक्रिया' स्वरूपात नोंदविल्यास किंवा मला +९१ ९५५२० ०९४९९ ह्यावर संपर्क केल्यास, मी पुस्तक आपल्यापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करू शकेन.

नाव:
पूर्ण पत्ता:
संपर्क क्रमांक:
कोणते पुस्तक?:
किती प्रती हव्या आहेत:

पोस्टाचा खर्च किती येतो ? ह्यावर मी तो सहन करू शकेन की नाही, अवलंबून असेल.. इतपत समजून घ्या मात्र !




Sunday, January 06, 2013

पाणी..


चालताना पाउले भिजवायचे पाणी
तू किनारा सोडता खवळायचे पाणी

फाटले काळीज पण ना वाहतो अश्रू
पापणीवर नेहमी साठायचे पाणी

खेळ माझा अन तुझा झाला जुना, दैवा
मी लिहावे स्वप्न, तू फिरवायचे पाणी

खुर्द आणिक बुद्रुकाच्या आखल्या सीमा
पण नदीला कोठुनी आणायचे पाणी

घाव सारे झेल छातीवर तुझ्या 'जीतू'
वार तू करता न ते मागायचे पाणी !

....रसप....
५ जानेवारी २०१३
Related Posts Plugin for WordPress, Blogger...