Tuesday, December 17, 2019

एका शेराची कविता

नवा रंग माझ्या घराला दिला 
नसे आवडीचा, तरी का दिला?
कुणाला विचारायचा जाब मी ?
घरातील सगळेच माझेच की !
नवा गंध छातीत मी ओढला 
अनावर उसळला जुना खोकला 
जरा थांबलो, शांत झालो जरा 
जपूनच पुन्हा श्वास मी घेतला 
सवय लागली हीच नकळत मला 
हळू अन् जपुन श्वास घेतो अता 
घराच्या पुढे एक चाफा असे 
सवे डोलणारा कडूनिंबही 
हसू रानफूलातले गोडसे 
मधूनच दिसे अन् मधूनच लपे 
धडाडून बुलडोझराला तिथे 
कुणी निर्दयाने फिरवले असे 
न चाफा तिथे ना कडूनिंबही 
फुलांची चिरडली मुकी आसवे 
इथे वास येतो विचित्रच अता 
नवा रंग अन् झाडप्रेतांतला  

इथे ह्या घरी मी जरी जन्मलो
उद्या ह्याच मातीत संपीनही
तरीही मला वेगळे वाटते 
कसे वाटते, काय सांगायचे ?


....रसप... 
१७ डिसेंबर २०१९

Tuesday, June 25, 2019

प्रचारकी 'लैला' - Series Review 'Leila' (Netflix)

'नेटफ्लिक्स'वरील बहुचर्चित 'लैला' ह्या मालिकेचा पहिला सिझन पाहिला. दुसरा अजून आलेला नाहीय. एकूण सहा भागांच्या ह्या पहिल्या सिझनमधून कहाणी एका उत्कंठा वाढवणाऱ्या टप्प्यापर्यंत येऊन थांबलेली आहे.

'लैला' ही एक लहान मुलगी आहे. साधारण ५-६ वर्षांची. जरी मालिकेचं शीर्षक तिच्यावर बेतलेलं असलं, तरी मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे 'शालिनी' (हुमा कुरेशी). ही कहाणी भविष्यातली आहे. कथानक सुरु होतं २०४७ सालात. स्वातंत्र्योत्तर १०० वर्षांत भारत अश्या एका स्थितीत पोहोचलेला आहे, जिथे जाती, धर्म ह्यांचा राजकीय वापर करून त्याच्या जोरावर समाजाला विभाजित केले गेले आहे. वेगवेगळे समुदाय वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये वास्तव्य करून आहेत आणि भिंती बांधून प्रत्येक सेक्टर इतरांपासून वेगळं केलं गेलं आहे. प्रत्येक भिंतीच्या प्रवेशद्वारावर कडेकोट बंदोबस्त असून तपासणी केल्याशिवाय कुणीही आत जाऊ शकत नाही. सुखवस्तू कुटुंबं एक सर्व सोयी-सुविधांचं सुखाचं जीवन जगत आहेत आणि गरीब लोकांना पाण्यासाठीसुद्धा झगडा करावा लागतो आहे. पाणी ही एक महागडी चीजवस्तू झालेली आहे. प्रदूषित हवा इतकी भयानक आहे की क्वचित काळा पाऊसही पडतो आहे. गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकावर पाळत आहे. सगळ्यांचे सगळे रेकॉर्ड्स सरकारकडे आहे. त्यामुळे एकंदरीतच परस्परविश्वास कधीच संपलेला आहे.
अश्या ह्या विषण्ण देशाचं नावही आता बदललेलं आहे. 'आर्यवर्त' असं त्याचं नाव आहे आणि त्याचा प्रमुख नेता आहेत 'डॉ. जोशी' (संजय सुरी).
'आर्यवर्त' देशाच्या एका सुखवस्तू सेक्टरमध्ये, मोठ्या घरात शालिनी चौधरी (हुमा कुरेशी), पती रिझवान चौधरी (स्राहूल खन्ना) आणि तिच्या लहान मुलीसोबत राहते आहे. एक दिवस त्यांच्या घरावर काही कट्टरपंथी हल्ला करून रिझवानला ठार मारून शालिनीला सोबत घेऊन जातात. आंतरधर्मीय विवाह आणि त्यातून एका मिश्रित (दूषित) रक्ताची मुलीला दिलेला जन्म ही शालिनीची दोन पापं मानली जाऊन तिची रवानगी 'शुद्धी केंद्र' नावाखाली उभारल्या गेलेल्या छळछावणीत होते. आपल्या पतीला गमावलेल्या शालिनीला काहीही करून स्वत:च्या मुलीपर्यंत पोहोचायचं असतंच. त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करते. 'लैला' ही एका आईची आपल्या मुलीला शोधून तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठीच्या संघर्षाची कहाणी आहे. 



हुमा कुरेशी, सिद्धार्थ, आरिफ झकारिया, सीमा बिस्वास, आकाश खुराना अशी सगळी ह्या मालिकेची स्टारकास्ट आहे. हुमा कुरेशी आणि सिद्धार्थच्या व्यक्तिरेखा मुख्य आहेत. दोघांचंही काम दमदार आहे. 
सिद्धार्थ हा गुणी अभिनेता 'रंग दे बसंती'च्या जबरदस्त यशानंतरही हिंदीत फार काही दिसला नाही. त्याला इथे पाहून खूप आनंद वाटला. गेल्या काही वर्षांत हिंदीत वेगळे आणि चांगले सिनेमे बनायला लागले आहेत. ह्या चांगल्या बदलाच्या लाटेवर सिद्धार्थसारख्या कलाकारांनी स्वार व्हायला हवं.
हुमा कुरेशी अगदीच मर्यादित वकूबाची अभिनेत्री नसली, तरी 'तबू'च्या जवळपासची आहे. हे तिने एक थी डायन, बदलापूर, देढ इश्क़िया अश्या काही सिनेमांतून दाखवून दिलं होतं. 'शालिनी'ची धडपड, तडफड, घुसमट हे सगळं तिने खूप छान सादर केलं आहे. पण तिच्या व्यक्तिरेखेला विविध कंगोरे नाहीत. साधारण एकाच एका मूडमध्ये ती असते. 

पार्श्वसंगीत धीरगंभीर आहे आणि अनेक ठिकाणी जिथे प्रसंगाचं चित्रण फुसकं आहे, तिथे नाट्यमयता, तीव्रता फक्त त्याच्याच जोरावर टिकते. त्यासाठी आलोकनंदा दासगुप्ता विशेष उल्लेखनीय आहेत. ह्यापूर्वी 'ट्रॅप्ड', 'ब्रीद' आणि 'सेक्रेड गेम्स' मध्ये त्यांनी उत्तम काम दाखवलं आहेच.
कॅमेरावर्क आणि व्हीएफएक्ससुद्धा उत्तम जमले आहेत.

ज्येष्ठ दिग्दर्शिका दीपा मेहतांच्या ह्यापूर्वीच्या बहुतांश चित्रकृती वादोत्पादक ठरलेल्या आहेत. 'लैला'ही त्याला अपवाद नाहीच. पण वादाचे मुद्दे बाजूला ठेवून विचार केला तरी अनेक ठिकाणी 'लैला' कमकुवत ठरते.
कथानक मुळात 'एका आईने तिच्या मुलीचा घेतलेला शोध' ह्यावर केंद्रित आहे. ते कुठल्याही जगात घडू शकलं असतं. आजच्याही. भारतातही, अमेरिकेतही, पाकीस्तानातही आणि आर्यवर्तातही. त्यामुळे २०४७ चा काल्पनिक कालखंड, आर्यवर्त वगैरे सगळं अनावश्यक वाटत राहतं. किमान पहिल्या सिझनमध्ये तरी त्यामुळे काही वेगळा प्रभाव मूळ कथानकावर पडलेला नाहीय.
अजून ३० वर्षांनंतरच्या भारतात आमुलाग्र बदल झालेले दाखवलं आहे खरं, पण ते सगळं सोयीस्करपणे. ३० वर्षांनंतरही ह्या विकसित देशात रस्त्यावर चालणाऱ्या गाड्या आजच्याच आणि आजच्यासारख्याच आहेत. आज विकसित देशांत स्वयंचलित आणि बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या आलेल्या आहेत. ३० वर्षांनंतरच्या 'आर्यवर्त'मध्ये त्यांचा मागमूसही नाही. तांत्रिक प्रगती फक्त हवेत प्रोजेक्शन करू शकणाऱ्या मोबाईल्स व इतर डिव्हाइसेस पर्यंतच मर्यादित दाखवली आहे. सुरक्षा रक्षक, पोलीस वगैरेंकडे असलेली शस्त्रंसुद्धा पुढारलेली दिसत नाहीत. गुलामांच्या हातांवर 'टॅटू'सदृश्य कोडींग केलेलं दाखवलं आहे. पण त्याद्वारे प्रत्येक गुलामाचं ट्रॅकिंग करता येणं सहज शक्य असतानाही ते टाळलं आहे, कारण मग शालिनीच्या हालचाली व डावपेचांना कदाचित खूप विचारपूर्वक मांडावं लागलं असतं. अश्या अनेक गोष्टी आहेत, जिथे ही तथाकथित प्रगती व आधुनिकता सोयीस्करपणे बाजूला ठेवली आहे. तिचा कथानकातला उपयोग फक्त अत्याचारी राजवट दाखवण्यापुरताच आहे. त्यामुळे ह्या सगळ्या पसाऱ्यातला प्रचारकी नाटकीपणा उघडा पडतो.
शालिनीला शिक्षा म्हणून 'शिद्धी केंद्रा'तून ज्या 'श्रम केंद्रा'त पाठवले जाते, प्रत्यक्षात तिथलं आयुष्य आधीपेक्षा किती तरी पट सुसह्य असल्याचं दिसून येतं. असं वाटत राहतं की आता हिला काही त्रास होईल, पण रोज २०-२१ मजले चढून जाण्याव्यतिरिक्त तिलाच काय, कुणालाही कुठलाही त्रास दिला जात नाही. ही काय गंमत आहे, कुणाच्या लक्षात कशी आली नाही की ह्यातली कलात्मकता मलाच लक्षात आली नाही, कुणास ठाऊक ! 
पहिला सिझन जरी सहाच एपिसोड्सचा असला, तरी प्रत्यक्षात त्यात दाखवलेलं कथानक कदाचित २-३ एपिसोड्समध्येच संपू शकलं असतं. अतिशय रटाळपणे आणि झाकोळलेल्या निराशामयतेत हे सहा भाग सरकतात. खूप संयम ठेवून आणि अंमळ जबरदस्तीनेच मला सहा पूर्ण पाहता आले आहेत. 'शोधकथा' म्हटल्यावर ती थरारक असते, ह्या प्राथमिक समजाला तडा देणारा अनुभव हे एपिसोड देतात आणि इतकं करूनही कथानक पूर्णत्वास जात नाही. अगदीच विचित्र आणि अर्धवटपणे ते सोडून देण्यात आलं आहे. जिथे सहावा भाग संपतो, सिझन संपतो, तिथे चालू असलेला प्रसंगही पूर्ण संपलेला नाही. नाट्यमयता जपण्यासाठी, लोकांनी पुढचा सिझन पाहावा ह्यासाठी असा प्रसंगाचा तुकडा पाडावासा वाटणं, हा माझ्या मते तरी कलात्मक पराभव आहे.

राजकीय परिस्थितीवर जराही भाष्य करणाऱ्या कलाकृतींना, खासकरून जर ते भाष्य बंडखोरी, विद्रोही, विरोधी असेल तर भारी मानलं जातं. 'लैला'बाबतही थोडंफार तसंच आहे. सिरीज बरी आहे, पण विशेष दखल घ्यावी असं काहीच मला तरी जाणवलं नाही, तरी तिची चर्चा तर होणारच आणि होतेही आहे ! त्यामुळे मेकर्सचा हेतू साध्य झाला आहे, हे नक्कीच.

रेटिंग - * * १/२

- रणजित पराडकर

Wednesday, May 29, 2019

हंड्रेड पर्सेंट इमोशन ! (म्युझिक टीचर - Music Teacher - Review)


विचारशक्ती आणि भावनिकता ह्यांच्यातला संघर्ष, हे माणसाच्या व्यथांचं खरं मूळ असावं. 
फार सहजपणे आपण म्हणत असतो 'दिल की सुन' किंवा 'विचारपूर्वक निर्णय घे' वगैरे. पण मनाचं किंवा डोक्याचं, कुणाचंही ऐकून जो कोणता निर्णय आपण घेऊ तो चूक की बरोबर हे कालांतरानेच ठरणार असतं आणि घेतलेला निर्णय चुकीचा ठरला की पश्चात्तापाचा वेताळ मानगुटीवर बसून उलटसुलट प्रश्नांनी हैराण करून सोडत असतो. ज्या परिस्थितीत एखादा निर्णय घेतला तो तेव्हा क्रमप्राप्तच होता आणि म्हणून बरोबरच होता, हे आपण स्वत:ला समजावू शकत नसलो की नेटफ्लिक्सच्या 'म्युझिक टीचर'मधल्या गायकासारखी आपली अवस्था होत असते.

'बेनी माधव सिंग' (मानव कौल) हा ह्या कहाणीतला म्युझिक टीचर. त्याची एक शिष्या 'ज्योत्स्ना रॉय' (अमृता बागची) आणि शेजारी राहणारी एक गृहिणी 'गीता' (दिव्या दत्ता) असा हा त्रिकोण आहे. ज्योत्स्ना मुंबईला जाऊन बॉलीवूडमध्ये एक सुपरस्टार झालेली असते आणि तिला संगीताचे धडे देणारा बेनी ज्याच्यावर ज्योत्स्नाचं प्रेमही असतं, तो शिमल्यातच लहान-सहान ट्युशन्स करण्यात गुरफटलेला. ज्योत्स्ना शिमला सोडून गेल्यानंतरच्या ८ वर्षांत 'मी जे केलं ते बरोबर केलं की चूक', 'माझं तिच्यावर प्रेम होतं की नाही', 'मला आता नक्की काय हवं आहे' ह्या आणि अश्या काही प्रश्नांच्या गुंत्यात बेनी अधिकाधिक गुंतत जात असतानाच 'शिमला कल्चरल क्लब' तर्फे ज्योत्स्नाचा एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि पुन्हा एकदा एक ओढाताण सुरु होते. बेनी, त्याची आई (नीना गुप्ता) आणि लहान बहिण (निहारिका दत्त) सगळ्यांच्या जुन्या आठवणी जाग्या होतात. 
शेजारी राहणारी 'गीता' कळत नकळत बेनीच्या द्विधा मनस्थितीत त्याला सहारा देते आणि एका निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करते. ह्यात तिची स्वत:चीही होलपट होते. पण तिच्यात असलेली स्त्रीसुलभ खंबीरता बेनीचा पुरुषसुलभ वैचारिक गोंधळ सोडवते. 

सिनेमाची सुरुवात 'इक मोड तू मिली जिंदगी..' ह्या गाण्याने होते. हिमाचलचा रमणीय परिसर, 'पॅपोन'चा वजनदार आवाज आणि गाण्याची गोडवा असलेली चाल, ह्यांमुळे सिनेमा लगेच पकड घेतो, ती शेवटपर्यंत सोडत नाही. मात्र एकंदरीत सिनेमाला नावाला साजेसं संगीत काही 'रोचक कोहली'ला बनवता आलेलं नाही. ओरिजिनलिटीवर भर देऊन श्रवणीय गाणी देण्यापेक्षा 'फिर वोही रात है..', 'रिमझिम गिरे सावन..' अशी जुनीच गाणी नव्याने बनवली आहेत. आजकाल ह्या पाट्या टाकण्याच्या प्रकाराला 'रिक्रीएट करणं' असं एक गोंडस नाव दिलं जातं. 
संगीतशिक्षण, तालीम म्हणजे सिनेमातली गाणी घोकून घेणे आणि तेव्हढ्यावरच एखाद्याची जणू काही लॉटरी लागून त्याने/ तिने सुपरस्टार बनणे; हा एक सोयीस्कर शॉर्ट कट मारला असल्याचं काही लपत नाही. ह्या सगळ्या भागासाठी अजून खूप मेहनत घेणे आवश्यक होतं. पण दुर्दैवाने परिपूर्णतेसाठी तेव्हढं आग्रही राहणं अजूनही आपल्याकडे व्यावासायिक गणितांत बसत नसावं आणि सर्जनशीलतेच्या परिघाला ओलांडायची हिंमत त्यामुळेच होत नसावी. जे असेल ते असो, पण ह्या एका कमजोर भागामुळे हा सिनेमा एका वेगळ्याच उंचीवर जाता जाता राहिल्याची हुरहूर लागते.

मानव कौल आणि दिव्या दत्ता अतिशय आवडते असल्याने 'म्युझिक टीचर' आवर्जून पाहिला. दोघांनी अजिबात निराश केलं नाही. फार सहजपणे आपलं काम उत्तम निभावणाऱ्या आजच्या अभिनेत्यांपैकी हे दोघे, इथेही आपापल्या भूमिका सुंदर निभावतात. बराच काळ आणि चांगलं काम करूनही हे दोघेही फार 'साईडलाईन्ड' राहिले आहेत.
घरच्या जबाबदाऱ्या आणि घेतलेल्या निर्णयांचे परिणाम ह्यांच्या ओझ्याखाली दबलेला 'बेनी माधव' मानव कौलने जिवंत केला आहे. शिमल्याच्या थंड हवेत स्वत:च्या मनातला विस्तव विझवण्याचा अयशस्वी प्रयत्न तो अनेक वर्षं करतो आहे. अपयश पचवण्यातही आलेलं अपयश त्याने फार प्रभावीपणे मांडलं आहे. त्याची व्यक्तिरेखा अनेक हिंदोळे घेते. कधी ताबा सुटणं, कधी उद्रेक होणं, कधी मूकपणे सहन करणं, कधी अव्यक्त राहणं अश्या अनेक उंचींवर ही व्यक्तिरेखा ये-जा करते आणि कुठेही मानव कौल कमी पडत नाही.
नवऱ्याने नाकारल्यावर एकटीवर आलेली जबाबदारी खंबीरपणे सांभाळणारी आणि एकटेपणातून आलेलं रितेपण डोळ्यांत न लपवू शकणारी 'गीता' साकारणारी दिव्या दत्तासुद्धा जबरदस्त आहे. तिच्याबाबतीत मला नेहमीच असं वाटत आलं आहे की तिच्या अफाट क्षमतेला आव्हान देणारी भूमिका तिला कधी तरी मिळावी. ही भूमिका अगदी तशीच आहे, असं नाही म्हणता येणार, पण तरी तिला बऱ्यापैकी वाव तरी मिळाला असल्यामुळे आनंद झाला.
अमृता बागचीला फार काम नाहीय. जितकं आहे, त्यात ती जबाबदारी पार पाडते. तिने 'सिटी ऑफ ड्रीम्स'मध्ये फार कंटाळा आणला आणला होता, त्यामुळे इथला तिचा मर्यादित पण चांगला वावर सुखद वाटला.

'कौशिक मंडल' ह्यांनी टिपलेलं डोंगराळ सौंदर्य डोळ्यांना प्रचंड सुखावतं. आणि हवेतला गारवा तर पडद्यातून बाहेर येऊन आपल्याला जाणवावा ! (सध्याच्या ४३-४४ अंश तापमानाच्या रखरखत्या हवेत हा गारवा फारच हवाहवासा वाटला !)

लेखक-दिग्दर्शक सार्थक दासगुप्तांचा बहुतेक हा पहिलाच हिंदी सिनेमा आहे, जो कुठलाच अनावश्यक पसारा नसलेला आणि 'टू-द-पॉइन्ट' आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे सांगीतिक तालीमेचा भाग अजून खूप प्रभावी करता आला असता, पण तो खरं तर कहाणीतला दुय्यम भाग आहे. नाव जरी 'म्युझिक टीचर' असलं तरी गाभा 'भावनिकता'च आहे. सिनेमात एक संवाद आहे - 'म्युझिक पहले हंड्रेड पर्सेंट थिओरी होता है, फिर वो हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल होता है और उसके बाद हंड्रेड पर्सेंट इमोशन !' तसंच ही कहाणी थिओरी/ प्रॅक्टिकल नसून फक्त 'इमोशनल' आहे असं पाहिलं, तर दासगुप्ता खूप कन्व्हीन्सिंग वाटतात.

फक्त पावणे दोन तासांचा हा सिनेमा त्यातल्या काही कमकुवत बाजूंसह एकदा तरी नक्कीच पाहण्यासारखा आहे. आपल्याही मनात काही 'विचार वि. भावना' अशी द्वंद्वं चालू असतात. अश्या कहाण्यांच्या निमित्ताने त्यांच्याकडे आपण त्रयस्थपणे पाहू शकतो.

रेटिंग - * * * १/२

- रणजित पराडकर

Thursday, May 16, 2019

गेम ऑफ थ्रोन्स - सीजन ८ - Game of Thrones - Season 8 - (With Spoilers!) - (भाग १/२)

'गेम ऑफ थ्रोन्स' ह्या महामालिकेचा आठवा आणि शेवटचा सीजन सुरु झाला आहे. २०११ मध्ये सुरु झालेल्या ह्या मालिकेचे प्रत्येकी १० भागांचे सहा आणि ७ भागांचा एक असे आत्तापर्यंत सात सीजन्स झाले आहेत. आठवा सीजन ह्या सातही सीजन्सपेक्षा वेगळा ठरतो आहे. कारण आत्तापर्यंत ह्या मालिकेने प्रेक्षकांना निराश अनेकदा केलं, त्यांचे अंदाज अनेकदा चुकवले. मात्र तरी अपेक्षाभंग मात्र कधी केला नव्हता. आणि ह्या शेवटच्या सीजनचे आत्तापर्यंतचे भाग त्यांचा अपेक्षाभंग करणारे ठरले आहेत. 


माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर, हो.. माझाही थोडासा अपेक्षाभंग झाला आहे. मात्र तरी मला हा आठवा सीजन इतकाही टाकाऊ वगैरे वाटलेला नाही. असे अनेक लोक असतील ज्यांनी GoT बद्दल ऐकून ऐकून अखेरीस ही मालिका पाहायला सुरुवात केली असेल. त्यांना सोशल मीडियावर लोकांचा वैफल्यग्रस्त आणि चिडचिडा उत्सर्ग पाहून असं वाटत असेल की पुढे पाहावं की नाही ! मी त्यांना सांगू इच्छितो की, लोकांचा अपेक्षाभंग फक्त गेल्या काही एपिसोड्समुळे झाला आहे. त्याआधी एकूण ६७ एपिसोड्स आहेत, जे अख्ख्या जगाला आवडलेले आहेत. शेवटच्या सीजनच्या सहा एपिसोड्समुळे हे ६७ एपिसोड्स मी तरी विसरू शकत नाही. आणि दुसरं म्हणजे, अपेक्षाभंग काही लोकांचा झाला आहे म्हणजे तुमचाही होईलच असं नक्कीच नाही. त्यामुळे ज्यांनी GoT पाहिलेलं नाहीय आणि पाहायची इच्छा आहे त्यांनी ते नक्कीच पाहावं. रु. १९९/- महिन्याचे भरून हॉटस्टारवर ते पाहता येऊ शकेल. क्रिकेट वर्ल्ड कप जवळ येतो आहे.तोसुद्धा हॉटस्टारवर दिसेलच. ही वेळ १९९/- अगदी पूर्णपणे वसूल होण्याची आहे.

आता आठव्या सीजनबाबत बोलू.
तत्पूर्वी ज्यांनी GoT पाहिलेलं नाहीय, त्यांच्यासाठी पटकन कथानक सांगतो. 'Throne' म्हणजे 'सिंहासन'. 'गेम ऑफ थ्रोन्स' म्हणजे अर्थ सुस्पष्ट आहेच. ही कहाणी मूलत: सत्तासंघर्षाची आहे. ह्या संघर्षात अनेक घराणी उतरली आहेत. GoT च्या भाषेत घराण्यांना 'House' म्हणतात. टार्गेरियन, स्टार्क, लॅनिस्टर आणि बरॅथिअन ही चार प्रमुख हाऊसेस ह्या संघर्षात आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त ग्रेजॉय, टायरेल, मार्टेल, बोल्टन आणि अशी अनेक लहान-मोठी घराणीही आहेत. ह्या कथानकाचा पसारा प्रचंड मोठा आहे. उत्तरेकडे जिथे कायम शून्याखाली तापमान असतं, अश्या बर्फाच्छादित भागापासून दक्षिणेकडे समुद्र आणि साधारण आग्नेय दिशेला रखरखीत वाळवंटापर्यंत हा भौगोलिक पसारा आहे आणि त्यासोबतच त्या त्या जागांच्या स्वत:च्या लहान-मोठ्या कहाण्या आहेत. पण अनेक उपकथानकांना एकत्र आणणारं एक मुख्य कथानक म्हणजे 'सत्तासंघर्ष'. जवळजवळ सात सीजन्सपर्यंत हा पसारा असाच दूर दूरपर्यंत होता आणि अनेक कथानकं एकाच वेळी सुरु होती. हळूहळू करत सगळी कथानकं आणि सगळी पात्रं - काही संपली, काही उरली - आठव्या सीजनला फक्त दोन जागी एकत्र आली आहेत. ह्यावरून लक्षात यावं की आता साहजिकच उरकाउरकी होणार आहे. तीच ह्या सीजनमध्ये चालू आहे.

पहिल्या दोन भागांत 'पात्रांचा एकमेकांमधला संवाद' हाच मुख्य अजेंडा आहे. 'हा ह्याला भेटला, तो त्याला भेटला' ह्यामध्ये दोन भाग खर्च केले गेले, इथून प्रेक्षकांच्या अपेक्षाभंगाची सुरुवात झाली. मात्र मला असं वाटतं की, भेटीगाठी आणि गप्पांत दोन भाग खर्च होणे आवश्यकच होतं. कारण अनेक पात्रं पहिल्यांदाच एकमेकांसमोर आली होती आणि अनेक पात्रं बऱ्याच वर्षांनंतर एकमेकांना भेटत होती. त्यामुळे त्यांच्यात संवाद साधला जाणं साहजिक होतं. प्रॉब्लेम हा होता की हे संवाद GoT च्या स्वत:च्याच पातळीचा विचार करता फारच सपक होते. सात सीजन्समध्ये एकापेक्षा एक वनलायनर्स आणि मोनोलॉग देणाऱ्या लेखकांनी इथले संवाद त्या मानाने फारच उथळ लिहिल्यासारखे वाटले.

तिसरा भाग म्हणजे Most Awaited युद्धाचा भाग होता. नाईट किंग, त्याची आर्मी ऑफ डेड विरुद्ध सगळे सजीव. ह्या युद्धासाठी अवेक जाती, जमातीचे लोक, वेगवेगळ्या भागांतले लोक आपापले मतभेद, इतिहास विसरून जीवितासाठी एकत्र आले होते. प्रेक्षक ह्या महासंग्रामाची वाट गेले अनेक सीजन्स पाहत होते. Winter is coming and the Dead are coming with it अशी भीती घालून, गूढगम्य चेहरा करून कायम चिंतीत चेहऱ्याने वावरणारा जॉन स्नो ह्या एका कारणासाठी ग्रेट वाटत होता कारण त्याला एकट्याला जाणीव होती की भविष्यात काय आव्हान आपल्यासमोर असणार आहे.
मात्र ह्या युद्धाने प्रेक्षकांच्या अपेक्षाभंगाचा कडेलोट केला ! 
एक तर रात्री झालेलं युद्ध असल्याने सगळीकडे अंधार अंधार ! त्यात मारामारी आणि कापाकापीची गती इतकी भयंकर की त्या अंधारात, त्या गतीने नेमकं चाललं काय आहे ह्याची टोटल लागतच नव्हती.अनेकांनी स्क्रीन रिजोल्युशनही बदलून पाहिलं. कुणी 'मोबाईलवर कळत नसेल' म्हणून मोठ्या स्क्रीनवर पाहायचा प्रयत्न केला, पण तरी अंधार काही उजळेना ! मोस्ट अवेटेड युद्ध अश्याप्रकारे झाकोळलेलं पाहावं लागल्याने वैताग येणं स्वाभाविकच होतं. मलाही आलाच. 
GoT मध्ये ह्याआधी अनेक लहान-मोठी युद्धं, मारामाऱ्या, कापकाप्या झाल्या आहेत. ती सगळीच रोमांचक, उत्कंठावर्धक होती. मृतात्मे विरुद्ध सजीव, हे युद्ध सगळ्या युद्धांचा बाप ठरणारं असायला हवं होतं. ते तसं झालं नाही. ह्याचं कारण फक्त अंधारातलं चित्रीकरण इतकंच नाही. त्याहून महत्वाचं आणि जरासं विचित्र कारण म्हणजे ह्या युद्धात अपेक्षेपेक्षा कमी पात्रं मेली ! आमची अशी अपेक्षा होती की जिंकणाऱ्या सैन्यालाही ह्या युद्धाचा एखादा मेजर सेटबॅक बसेल. त्या मानाने तेव्हढा मोठा सेटबॅक बसला नाही. 

प्रेक्षकांसाठी हा एपिसोड अपेक्षाभंग करणारा ठरला तरी मला त्यात काही गोष्टी फार आवडल्या.
त्यांत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 'आर्या स्टार्क'. तिचे सगळे प्रसंग केवळ जबरदस्त झाले आहेत. ह्या ग्रेसफुली ती लढते ते केवळ पाहत राहण्यासारखं आहे. सिरिओ फॉरेल, जॅकन हेगार, द हाउंड ह्या सगळ्यांकडून आणि स्वत:ची स्वत:च ती जे जे शिकली आहे, ते तिने ह्या भागात दाखवलं आहे. एका विशिष्ट प्रसंगी जेव्हा तिचं मनोधैर्य खचायला लागतं, तेव्हा 'रेड वूमन' तिला सिरिओचे शब्द आठवून देते. 'What do we say to the God of Death? 'Not Today!' हा प्रसंग फार महत्वाचा आहे. (Will come back to this)**


दुसरी आवडलेली गोष्ट म्हणजे जोराह मॉरमोन्ट. ह्या युद्धात अतुलनीय पराक्रम गाजवणारा कुणी असेल तर तो जोराह. शत्रूवर सगळ्यात आधी तो चाल करून जातो. त्याच्यासोबतची सैन्याची भलीमोठी तुकडी ठार मारली जाते, तेव्हा तो योग्य वेळी माघार घेऊन मागे उरलेल्या सैन्यासोबत जखमी अवस्थेत पुन्हा लढायला उभा राहतो. आपल्या राणीसाठी जीवाची बाजी लावतो. शिवाजी महाराजांच्या मुरारबाजी, तानाजी, बाजीप्रभू, प्रतापराव अश्या अनेक सरदारांनी जसं शौर्य गाजवलं, तसा हा जोराह मॉरमोन्ट शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या राणीच्या जीवाचं रक्षण करतो आणि अनेक वार झेलूनही तो प्राण तेव्हाच सोडतो, जेव्हा ती सुरक्षित झाल्याचं त्याला समजतं. एकतर्फी प्रेमी जोराहचा असा अंत खूप भावनिक होता. जिच्यासाठी त्याने अनेकदा आयुष्य पणाला लावलं, त्या त्याच्या प्रेमासाठी, राणीसाठीच तो धारातीर्थीही पडला. 'मेरी ख़तम कहानी बस तुम तक' असं त्याचं आयुष्य संपतं. इयान ग्लेन ह्या स्कॉटीश अभिनेत्याने 'जोराह मॉरमोन्ट' अविस्मरणीय करून ठेवला आहे.


तिसरी आवडलेली गोष्ट म्हणजे जोराहची पुतणी 'लिआना मॉरमोन्ट'. अंदाजे १२-१४ वर्षांची ही चिमुरडी खतरनाक असते. तिच्या घराण्याला शोभेल असा बाणेदारपणा आणि निडरपणा तिच्यात पुरेपूर भरलेला दाखवला आहे. 'आर्मी ऑफ डेड'मधला डेड जायंट विंटरफेलच्या किल्ल्यात येऊन सगळं उद्ध्वस्त करत असताना तिला जाणवतं की ह्याला संपवणं किती आवश्यक आहे ! जखमी अवस्थेत लंगडत लंगडत ही चिमुरडी तिच्यापेक्षा अनेक पट महाकाय दानवावर धावत जाते. तो तिला एका हातात उचलून अक्षरश: चुरडतो आणि तोंडासमोर आणतो. तिला तेच हवं असतं. हातातून सुटू न दिलेलं ड्रॅगनग्लासचं शस्त्र ती त्याच्या डोळ्यात खुपसते आणि स्वत:च्या जीवाचा सौदा करून आलेलं संकट परतवते. 


आता coming back to आर्या.
**'What do we say to the God of Death? 'Not Today!' ह्यातला 'गॉड ऑफ डेथ' म्हणजे आत्ताच्या प्रसंगी 'नाईट किंग' आहे. तो किल्ल्यात शिरतो आहे आणि ब्रानकडे पोहोचणार आहे. 'Not Today' हे मी त्याला सांगायला हवं. आर्मी ऑफ डेड तर मरणार नाहीच, संपणारही नाही. त्याला संपवणं हाच एकमेव उपाय आहे. - हे सगळं आर्याला त्या प्रसंगी समजतं आणि मग ती उडी..
ह्या उडीबाबतही प्रेक्षकांनी अनेक प्रश्न केले. कुठून उडी मारली, हे कळायला काहीच मार्ग नाही. शक्य आहे की 'विअरवूड'मधल्या एखाद्या झाडावरून तिने उडी मारलेली असावी. पण हे सगळीकडे पसरलेल्या वाईट्सना कळत नाही, नाईट किंग आणि त्याच्या सरदारांनीही कळत नाही, हे अचाट आहे. पण मला तेव्हढी सिनेमॅटिक लिबर्टी द्यायला हरकत नसावी. 
मागे एका एपिसोडमध्ये आर्या जेव्हा ब्रियानसोबत तलवारबाजीचा सराव करत असते, तेव्हा अगदी अखेरच्या क्षणी ती दुसऱ्या हाताचा वापर करून ब्रियानला चित आणि चकित करते. तेव्हा ब्रियान तिला कौतुकाने विचारते, 'Who taught you this?' त्यावर आर्या 'Noone!' असं उत्तर देते. आर्याकडे असे युद्धकौशल्य आहे, जे इतर कुणाकडेही कदाचित नाहीय. ती निडर आणि शूर तर आहेच, पण चलाख आणि कुशलही आहे. तिच्या कौशल्याची चुणूक आणि एक प्रकारे हिंट त्या भागात दिली होती. जे कौशल्य वापरून ती ब्रियानसारख्या एका ताकदवान, यशस्वी आणि शूर तलवारबाजाला शरण आणते, तेच कौशल्य वापरून ती नाईट किंगला संपवते.


अनेकांची अशी अपेक्षा होती आणि ती गैरही नव्हती कारण बिल्ट अपही तसा केला गेला होता की कुठे तरी, केव्हा तरी नाईट किंग आणि जॉन स्नोमध्ये वन-ऑन-वन युध्द होईल. पण तसं काही न होता अचानक आर्याच 'हिरो' बनते ! एका प्रसंगी ते जोन आणि नाईट किंग समोरासमोर येतातही. मात्र स्वत: नाईट किंग तेव्हा जॉनशी लढण्यापेक्षा मृतांना जिवंत करून त्याच्यावर पाठवायची चाल खेळतो. नेहमीप्रमाणे बावळट जॉन जे करायचं ते सोडून दुसरीकडेच गुंतून राहतो आणि नाईट किंग ब्रानपर्यंत पोहोचतो. 
जॉन आणि नाईट किंगमध्ये आमनासामना न होणं, हा मला अपेक्षाभंग वाटला नाही. जे आपल्याला वाटतं ते होणार नाहीच, सयाची सवय मला GoT ने ६७ भागांतून लावली आहेच ! ध्यानीमनी नसताना अचानक आर्याने नाईट किंगला संपवणं हेही मला आचरट वाटलं नाही. कारण धक्कातंत्र वापरून कधीही काहीही घडवणं, हेही GoT ने अनेकदा केलं आहे. 

माझा अपेक्षाभंग दोन बाबतींत झाला.
एक म्हणजे नाईट किंगचं मुख्य लक्ष्य 'ब्रान' आहे. तो त्यालाच संपवायला येणार आहे, हे सगळ्यांना माहित असतं. त्याच्या संरक्षणाची जबाबदारी थिऑन ग्रेजॉय स्वत:कडे घेतो. पण ह्यासाठीचं नियोजन ? थिऑन आणि त्याचे साथीदार धनुष्य-बाण घेऊन अविरतपणे येतच राहणाऱ्या वाईट्सचा सामना करणार होते ? धनुष्यातून सुटलेला बाण परत येत नसतो. त्यांना हत्यार असं हवं, जे शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहील, इतकी साधी गोष्ट  लक्षात येऊ नये, हे हास्यास्पद नव्हे तर मूर्खपणाचं वाटलं. शेवटी बाण संपल्यावर थिऑन भालाच घेतो. तलवारी आणि भाले बाकीच्यांकडे का नव्हते ? 
दुसरी अपेक्षाभंग करणारी गोष्ट म्हणजे 'नाईट किंग' चा काही आगापिछा शेवटपर्यंत कळतच नाही. त्याला लॉंग नाईट आणायची आहे, त्यासाठी अख्ख्या जगाच्या मेमरीजचं मोर्र्तीमंत क्लाउड स्टोरेज बनलेल्या 'थ्री आय्ड रेव्हन' 'ब्रान'ला मारणं आवश्यक आहे, हे सगळं समजलं. पण मुळात तो कोण आहे/ होता ? लॉंग नाईट आणायची अफलातून आयडीया त्याला सुचली कशी ? मृतांना जिवंत करणारी ताकद त्याच्यात कुठून आली ? हे सगळं अनुत्तरीतच राहिलं. पहिल्या दोन भागांत अनेकविध पात्रांचं जे हळदी-कुंकू सुरु होतं, त्यातच कुठे तरी ह्याचीही कहाणी उलगडता आली असती. ते काही न होणं, एक महत्वाचा धागा मोकळाच सोडून देणं प्रचंड खटकलं.
  
ह्या भागाचा शेवट नाईट किंगच्या शेवटाने होतो. पण तत्पूर्वी थिऑनचाही शेवट होतो. अतिशय विचित्र, गुंतागुंतीचं आणि मरणप्राय यातना सहन करणारं, अनेक अप्स-डाऊन्स असणारं थिऑन ग्रेजॉय हे पात्र आहे. त्याच्याकडे कुठलंही अतुलनीय कसब नाही. एका मोठ्या घराण्यात जन्माला आला खरा, पण जवळजवळ सगळा जन्म दुसऱ्या एका मोठ्या घराण्यात - जरी घरच्यासारखाच होता तरी - बंदी म्हणून घालवलेला थिऑन. त्याचा मनावरचा ताबा अनेकदा सुटतो. कारण तो माणूस असतो. स्वत:ची शरम वाटत असतानाही तो स्वत:विरुद्धही लढतो आणि केलेल्या चुकांची भरपाई करण्यासाठी झटतो. त्याच प्रयत्नात जीवही देतो. अखेरच्या क्षणी 'ब्रान' निर्विकार चेहऱ्याने का होईना त्याच्या प्रामाणिकपणाची दखल घेऊन 'Theon, you are a good man. Thank you!' असं म्हणतो, तेव्हा फक्त थिऑनच्याच डोळ्यात पाणी येत नाही, आपल्याही पापण्या अंमळ ओलावतात. 


भागाचा शेवट अतिशय आवडलेल्या ह्या दोन गोष्टींनी होतो. 'नाईट किंगवर उडी घेणारी आर्या' हे चित्र तर कधीच विसरता येणार नाही आणि आपला शेवट समोर दिसत असतानाही नाईट किंगवर जीवाच्या आकांताने भाला घेऊन धावत जाणारा थिऑनसुद्धा कधी विसरता येणार नाही. 

एकूणात पहिले तीन भाग अपेक्षेपेक्षा जरा कमी वाटले, हे जरी खरं असलं तरी there were a few moments of brilliance too. ह्या लेखात बरेचसे लिहायचे राहून गेले आहे. उदाहरणार्थ - सर्सी, सान्सा, टिरीयन आणि जेमी अश्या महत्वाच्या पात्रांचा उल्लेखही आला नाही, जॉन आणि डॅनीने केलेला ड्रॅगन्सचा केलेला बावळट वापर, बेरिक डँडेरियनचा मृत्यू, दोथ्राकी आर्मीचा जवळजवळ विनाश, स्पेशल इफेक्ट्स, तिसऱ्या भागाच्या शेवटच्या दृश्याचं अफलातून पार्श्वसंगीत (The Night King) असं सगळं आत्ता हा शेवटचा परिच्छेद लिहिताना आठवत आहे. पण अतिविस्तार टाळणं आवश्यक असल्याने लिहित नाही.


पुढील तीन भागांबाबत काही दिवसांनी लिहीनच.

- रणजित पराडकर

Saturday, March 23, 2019

'नॉस्टॅल्जिया' - बधीर करणारं एक ड्रग !

प्रत्येक सिनेमामध्ये किमान एक तरी गाणं रिमिक्स करून टाकण्याचा ट्रेंड सध्या दिसून येतो आहे. 
ह्या मागचं व्यावसायिक गणित समजण्यासारखं आहे. पैसा रोटेशनमध्ये राहिला तर त्यातून जास्त फायदा. म्हणजे कमी मिळाले तरी चालेल, पण ताबडतोब रिटर्न्स मिळाले पाहिजेत. ह्यासाठी पैसा गुंतवण्याची आणि त्यानंतर वाट पाहण्याची जी प्रोसेस असेल, ती अधिकाधिक लौकर उरकली पाहिजे. जेणेकरून लौकरात लौकर 'मीटर डाऊन' होऊन रोटेशन सुरु होईल. 
मग साहजिकच - 'संगीत' ज्याबाबतची लोकांची एकंदरीतच जाण आजकाल कमी कमी होत चालली आहे, त्याच्या निर्मितीसाठी जास्त वेळ का दिला जावा ? - असा प्रश्न येतोच. कालच्या उरलेल्या भात किंवा पोळ्यांना फोडणी देऊन झटपट फोडणीचा भात किंवा पोळी करून नाश्ता उरकल्यासारखं पूर्वीच्या एखाद्या गाण्याला फोडणी देणं चटकन उरकणारं आहे. कुठे माथापच्ची करून नवीन धून बनवा, त्यावर शब्द लिहा. मग कच्च्या गाण्यात अजून बदल करा. मग त्याचं संयोजन, मिक्सिंग वगैरे वगैरे करा ! त्यापेक्षा उचला कुठून तरी, कोंबा काही तरी आणि मिक्स केल्यासारखं करून व्हा मोकळे ! काही तासांत एक गाणं तयार. मीटर डाऊन, रोटेशन सुरु ! दिलेल्या फोडणीत जर चिमुटभर 'नॉस्टॅल्जिया'सुद्धा असला, तर मग सुटणारा घमघमाट दूरवर पोहोचू शकतो !

करोडो रुपये टाकणाऱ्या लोकांनी त्याच्यावर मिळणाऱ्या फायद्याचा असा विचार केला तर त्यात नैतिकदृष्ट्या काहीच गैर नाही. मात्र, विकत घेणाऱ्यांनीच जर आपली आवड विकणाऱ्या लोकांच्या फायद्याशी जुळवून घेतली असेल, तर त्यात चूक कुणाची असणार ? खरं तर उलट व्हायला पाहिजे. लोकांना काय आवडतं ते विकायला ठेवलं गेलं पाहिजे. मगर आजकल गंगा उलटी बह रही हैं ! 
दुसरं काही विकत घ्यायला नाहीच त्यामुळे त्यातल्या त्यात 'कमी भुक्कड' जे असेल, ते विकत घेतलं जातं. हे फक्त देशाच्या राजकीय क्षेत्रातच घडत आहे, हा एक मोठा गैरसमज किंवा अज्ञान असावं. कारण जेव्हा अभिजातपणा, दर्जा अश्या मूलभूत संकल्पनांनाच आव्हान देण्याइतका उथळपणा 'बंडखोरी'च्या नावाखाली बळावतो, तेव्हा सगळ्याच क्षेत्रांमध्ये दुय्यम-तिय्यम दर्ज्याचे लोक उच्च पदावर पोहोचतात. दर्जात्मक अधोगती कुठल्या एका विशिष्ट क्षेत्राशीच मर्यादित नसावीच. एकाच वेळी अनेक, किंबहुना प्रत्येक पातळीवर समांतरपणे कमी-अधिक प्रमाणात (गतीने) ती सुरु असते. मग ते कलेचं क्षेत्र असो वा विज्ञानाचं, व्यावसायिक क्षेत्र असो वा राजकीय. एकदा आपला स्वत:कडूनच काही विशिष्ट दर्ज्याच्या निर्मिती व आस्वादाचा आग्रह संपुष्टात आला की आपण काहीही विकू शकतो आणि काहीही खरेदीही करू शकतो.

कलेचे बहुतांश पैलू हे शास्त्राने सिद्ध होत असतात. त्यामुळे 'दर्जा सापेक्ष असतो', हा युक्तिवाद जर कुणी करणार असेल, तर तो अगदीच तकलादू आहे. कारण अनुभूतीला मोजमाप नसलं, तरी अनुभवाला असतं. कलाकृतीचा आस्वाद घेणं आणि कलाकृतीने प्रभावित होणं, ह्यात फरक आहे. हा फरक अनुभवातून कळतो आणि अनुभव माहिती, ज्ञान, अभ्यास व काही प्रमाणात साधनेतून येतो. 
उदाहरणार्थ - लहान मुलाला थोडं सुरात कमी-जास्त असलेलं एखादं बालगीत अद्वितीय आनंद देत असतं. ती त्या लहान मुलाची अनुभूती. मात्र तेच मूल मोठं झाल्यावर त्या बालगीताचा आस्वाद घेताना भूतकाळात, आठवणींत रमतं, तो त्याचा अनुभव असतो; कलाकृतीचा दर्जा नाही. दर्जा हा शास्त्रसिद्धच असतो आणि कलाकृतीची महानता अश्या सिद्धतेनेच ठरते. अनुभूतीच्या पातळीवर ती ठरत नाही कारण अनुभूती वैश्विक असत नाही, व्यक्तीपरत्वे बदलत जाते.

म्हणूनच चित्रपट आणि चित्रपटसंगीताच्या बाबतीत भुक्कड, सुमार 'नव्वदी'च्या दशकाचं उदात्तीकरण आता पुरे करायला पाहिजे. 
मला जाणीव आहे की, सोशल मिडियावर सक्रीय असणाऱ्यांत मोठ्या संख्येने एक अशी पिढी आहे, जिच्या लहानपणाची किंवा तारुण्याची जोडी नव्वदीतल्या चित्रपट व चित्रपटसंगीताशी जोडलेली आहे. (माझीही आहे !) त्यामुळे त्या सगळ्याशी असलेली भावनिक जवळीक समजून येण्यासारखी आहे. मात्र केवळ नॉस्टॅल्जियाच्या नशेपायी लोक फार वाहवत चालले आहेत. आंख मारे लडकी आंख मारे.., ये खबर छपवा दो अखबार मे.., इ. टुकार ओरिजिनल्सची महाटुकार रिमिक्स, ती भिकार आहेत हे समजत असतानाही केलीही जात आहेत आणि स्वीकारलीही जात आहेत. ह्या सगळ्यात कुठे तरी आपला सारासारविवेक आपण स्वखुशीने गहाण ठेवतो आहोत.

नव्वदीच्या दशकाच्या उजळणीने मिळणाऱ्या नॉस्टॅल्जिक किकसाठी सामान्यत्वाचा असामान्य गौरव करण्याची एक प्रकारची अहमहमिका चालू असलेली दिसून येते. हे असंच जितकं सुरु राहिल, तितकं आपल्या माथी अजूनाजून सामान्यत्व मारलं जाणंही सुरुच राहिल. 'नॉस्टॅल्जिया' नावाचं 'ड्रग' आपल्याला बधीर करतंय आणि हे एखाद्याच्या बाबतीत नाही, तर एका मोठ्या समूहाच्या बाबतीत होत आहे. जिथे तिथे सामान्यत्वाचा 'उदो उदो' आपण करतो आहोत कारण काही असामान्य करण्याची कुवत आपल्यात नाहीय आणि ह्याचाच अभिमान मिरवण्यात आपण धन्यता मानतो आहोत. 
'चांगलं काय आहे, हे माहित नसणं आणि त्यामुळे एखादं सुमारपण, सुमार असल्याचं न समजून येणं', हा अज्ञानातला एक आनंद आणि त्या आनंदात हुरळून जाऊन एखाद्या टुकारकीतही असामान्यत्व दिसणे, हा न्यूनगंडाचा एक भाग असतो. 
हा न्यूनगंड झटकायला हवा, प्रयत्नपूर्वक. 
नाही तर अजून काहीच वर्षांनी लोक रोहित शेट्टीच्या 'गोलमाल' सिरिजची किंवा even worse, इंद्रकुमारच्या 'मस्ती' सिरीजची आठवण काढून व्याकुळ होतील आणि त्या काळात रिमिक्स होऊन येणारी गाणी कोणती असतील, ह्याचा तर विचारही करवत नाही.

- रणजित पराडकर

Friday, March 08, 2019

रुटीनात आहेस तू रोज माझ्या

इथे रोजचा ओढणे तोच गाडा
जरी कुरकुरे वंगणाच्या विना
दिवस आजचा कालची फक्त कॉपी
उजाडून येतो नव्याने जुना

परीघातली धाव कंटाळवाणी
तरी त्यातही एक आहे मजा
रुटीनात आहेस तू रोज माझ्या
तुला पाहणे, स्पर्श मलमल तुझा

तुला ओढ लावायचा छंद आहे
मला धावणे रोज आहे अटळ
तुझ्या क्यूट हातात मी बोट देता
स्वत:चे दिसे रुक्षपणही निखळ

तुझा कोवळा स्पर्श भासांत असतो
तुझा गंध श्वासांत रेंगाळतो
दिवसभर जरी दूर असलो तरीही
तुझ्या पास बाबा तुझा राहतो

व्यथांचा निखारा क्षणार्धात शमतो
लपेटून घेताक्षणी मी तुला
तुझ्या बोळक्या हासण्याने फुलवतो
सुखाच्या कळ्या मुग्ध, माझ्या मुला

....रसप....
७ मार्च २०१९

Tuesday, February 12, 2019

अंधाराच्या कुशीत शिरल्या भिंती

ह्या वाटेचे पाउल थकले आहे
वळणापाशी निवांत बसले आहे
पळून गेलेल्या दिवसाच्या मागे
धाव घेतली पण हिरमुसले आहे

क्षितिज विझवते एकेका रंगाला
झाड निजवते एकेका पक्ष्याला
गूढ शांततेचा कातरसा पुरिया
कुणी मुठीने मिटले आकाशाला

बंद घराच्या मूक उदासिन दारी
आगंतुक वाऱ्याची रोज हजेरी
हताश खिडकी कुरकुरते थोडीशी
अंगणातला वृक्ष सुन्न आजारी

थेंब थेंब ओघळते आहे रात्र
नीरवता ही यत्र तत्र सर्वत्र
मिणमिण करती विषण्णतेच्या वाती
अंधाराच्या कुशीत शिरल्या भिंती

....रसप....
१२ फेब्रुवारी २०१९

Saturday, February 02, 2019

स्वागतार्ह प्रयोग - एक लडकी तो देखा तो ऐसा लगा - (Movie Review - Ek Ladki Ko Dekha To Aisa Laga)

मुख्य धारेतला भारतीय चित्रपट हा नेहमीच पलायनवादी राहिला आहे. लोकांना त्यांच्या रोजच्या आयुष्यातून दोन घटिका मनोरंजन मिळावं, हाच त्याचा मुख्य हेतू राहिला आहे. चित्रपट बनवणारे आणि पाहणारे, दोघेही मुख्य धारेतल्या चित्रपटाकडे ह्याच विचाराने पाहात आले आहेत. ह्या मनोरंजनात नाट्याची बाजू सांभाळण्यासाठी सगळ्यात आवडता विषय 'प्रेम' आणि मग त्याच्या जोडीने देशभक्ती, कर्तव्यभावना, कौटुंबिक कलह वगैरे कथानकं असतात. 
मात्र चित्रपटाचा हा पारंपारिक चेहरा हळूहळू बदलत चालला आहे. (खरं तर, मुखवटाच. पण पिढ्यांनंतर पिढ्या जपलेला मुखवटा एक चेहराच बनल्यासारखा झाला असल्याने, 'चेहरा'.) आजचा मुख्य धारेतला चित्रपट वेगळे विषय हाताळायला पाहतो आहे. गेल्या काही वर्षांतले चित्रपट पाहिले, तर 'चित्रपटात उपकथानक म्हणून का होईना एक प्रेमकहाणी असलीच पाहिजे', ह्या आत्यंतिक उथळ, तरी प्राथमिक मताला अनेक चित्रपट सर्रास छेद देत आहेत. अनावश्यक गाण्यांना चित्रपटात स्थान राहिलेलं नाहीय आणि कथानकाची मांडणी मुख्य विषयाला अधिकाधिक धरून होताना दिसते आहे. 

'समांतर चित्रपट' ही धारा कधीच लुप्त झाली असली, तरी अजूनही काही चित्रपट वेगळ्या विषयांची मांडणी करताना दिसतात किंवा वेगळ्या मांडणीने कथा सांगताना दिसतात. ते अगदी ठळकपणे मुख्य धारेला सोडूनच असतात. व्यावसायिक गणितं त्यांनी गृहीत धरलेली नसतात, हेही जाणवतं. 
एखादा चित्रपट मधूनच येतो, जो व्यावसायिक गणितं सांभाळण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतच वेगळं कथानक किंवा वेगळी मांडणी समोर आणतो. गेल्या काही वर्षांत चांगले/ वाईट, जमलेले/ फसलेले असे अनेक व्यावसायिक प्रयोगही झाले आहेत, ही एक खूप चांगली बाब आहे. 'एक लडकी तो देखा तो ऐसा लगा' असाच एक प्रयोग करतो. तो चांगला आहे की वाईट, जमला आहे की फसला आहे; हा भाग निराळा. मात्र एक व्यावसायिक चित्रपट काही तरी वेगळेपणा समोर घेऊन येण्याचं धाडस करतो आहे, हीच बाब मुळात खूप स्तुत्य वाटते. एक असा विषय ज्याला अगदी खाजगी गप्पांतही पद्धतशीरपणे फाटा दिला जातो, झटकलं जातं; त्याला एक व्यावसायिक चित्रपट लोकांसमोर खुलेआम घेऊन येतो, इतकीच गोष्ट 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' आवर्जून पाहण्यासाठी पुरेशी आहे, असं मला वाटतं.

चित्रपटाची कथा 'गजल धालीवाल' हिने लिहिली आहे. 'गजल' भारतातील मोजक्या ट्रान्स-वूमन्सपैकी एक आहे. स्वत:च्या लैंगिकतेच्या शारीरिक व मानसिक घडणीतली असमानता समजून घेऊन, स्वीकारून आणि मग प्रयत्नपूर्वक त्यांत समतोल साधून घेण्याचा मोठा संघर्ष तिने स्वत:शीही केला आहे आणि उर्वरित जगाशीही. चित्रपटातील 'एक लडकी' म्हणजेच 'स्वीटी' (सोनम कपूर) हाच संघर्ष अनुभवते आहे. तिचा हा संघर्ष चित्रपटाचा बहुतांश भाग खूप समर्थपणे मांडतो. हा विषय मांडणं म्हणजे एक कसरत होती. जर तो अगदी गंभीरपणे मांडला असता, तर पचायला अवघड होता. कडवट औषध शुगरकोट करून घ्यायचं असतं म्हणून हा विषय हलक्या-फुलक्या शैलीत मांडला आहे. पण असं करतानाही त्यातलं गांभीर्य जपणं अनिवार्य होतं, कुठलाही थिल्लरपणा येऊ न देणं महत्वाचं होतं. ही कसरत उत्तम निभावली गेली आहे. कथानकाची मांडणी, पात्रं, घटना, चित्रण खूप वास्तववादी वाटतं. अनेक प्रसंग पाहताना, हे आपण प्रत्यक्षातही पाहिलं असल्याचं जाणवत राहतं. अश्या मुलांचं वेगळं वागणं, एकटं पडणं, त्यांनी स्वत:च्या कोशात शिरणं, त्यांच्या आवडी-निवडी हे सगळं छोट्या छोट्या प्रसंगांतून प्रभावीपणे मांडलं आहे. स्वीटीच्या कपड्यांच्या रंगसंगतीतही हा विचार केलेला दिसतो.
शेवटच्या भागात मात्र कथानकातला हा वास्तववाद मागे पडत जातो आणि नेहमीचा फिल्मी उथळपणा त्याची जागा घेतो. आधी घेतलेल्या मेहनतीवर, जसजसं आपण शेवटाकडे सरकत जातो, तसतसा बोळा फिरायला लागतो, ही 'एक लडकी को..' ची मोठी उणीव आहे.


मात्र ही एकच उणीव नाही. ह्यापेक्षा मोठी उणीव आहे 'सोनम कपूर'. एका अतिशय प्रभावी व्यक्तिरेखेला साकारण्यासाठी आवश्यक ठहराव तिच्या क्षमतेबाहेरचा असावा, असं 'नीरजा'मध्ये वाटलं होतं, इथे त्यावर शिक्कामोर्तबच होतं. जिथे जिथे कथेची तिच्याकडून लक्षणीय सादरीकरणाची अपेक्षा होती, तिथे तिथे तिच्या मर्यादा उघड्या पडल्या आहेत. पण जिथे जिथे सोनम कपूर कमी पडते, तिथे तिथे सहाय्यक कलाकार सांभाळून घेतात असं चित्र पुन्हा पुन्हा दिसून येतं. तिचा एकटीचा असा कुठलाही प्रसंग चित्रपटात नाही किंवा तिला लांबलचक मोनोलॉगसुद्धा नाही. मुख्य व्यक्तिरेखा इतकी फुसकी झाल्यामुळे बाकीच्यांच्या मेहनतीचं चीज फक्त सांभाळून घेण्यातच होतं.

'राजकुमार राव सुंदर काम करतो', हे म्हणून (लिहून) आता कंटाळा यायला हवा ! पण त्याने साकारलेला स्ट्रगलिंग लेखक, निरपेक्ष प्रेमी, मित्र खूप कन्व्हीन्सिंग आहे. त्याला भावनिक उद्रेकाचे असे कुठले प्रसंग नाहीत. मात्र दारू पिऊन स्वीटीच्या खोलीत जाणं, किचनच्या खिडकीतून पत्र देणं व अजून काही साध्याश्या प्रसंगांतही तो मजा आणतो. स्वीटीचं सत्य ऐकतानाच्या प्रसंगात स्वत: स्वीटी (सोनम) जितकी उथळ वाटते तेव्हढाच साहिल (राजकुमार) मनाला पटतो. तो एक अतिशय महत्वाचा प्रसंग केवळ राजकुमारमुळे तरला तरी आहे.

अनिल कपूरने कॅरेक्टर रोल्स करायला सुरु करण्याचं कारकिर्दीतलं एक महत्वाचं वळण अगदी बेमालूमपणे घेतलं आहे. त्याचा भावनिक संघर्ष दाखवण्यासाठी कथानकात फारसा वाव त्याला मिळाला नाहीय, तरी जितका आहे त्यात त्याने छाप सोडली आहे. खरं तर अनिल कपूरने वाईट काम केलंय, असा एकही चित्रपट माझ्या तरी पाहण्यात आलेलाच नाही. त्या दृष्टीने तो खरोखरच (क्रिटीकल अक्लेमच्या बाबत) खूप अंडररेटेडही असावा.

जुही चावला चित्रपटात नसती, तरी चाललं असतं. मूळ कथानकाला तिचा काही फारसा हातभार नाहीय. मात्र तिच्या असण्याने अनेक हलके-फुलके प्रसंग दिले आहेत. खासकरून अनिल कपूर आणि ती एकत्र जेव्हा पडद्यावर येतात तेव्हा ते धमाल करतात !

तमिळ, तेलुगु चित्रपटातला लोकप्रिय चेहरा 'रेजिना कॅसेन्ड्रा' प्रथमच हिंदीत दिसला आहे. तिचा टवटवीत मिश्कीलपणा आणि सहजाभिनय मुख्य व्यक्तिरेखेसाठी साजेसा होता. येत्या काळात तिला चांगल्या भूमिका नक्कीच मिळायला हव्या.

'रोचक कोहली'च्या संगीताची बाजूही कमजोर वाटते. आरडीचं '१९४२ अ लव्ह स्टोरी'मधलं 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा..' रिक्रिएट केलं आहे. ते कम्पोजिशन आवडलं. मूळ मेलडीला हात लावलेला नाहीय आणि ओरिजिनलमध्ये जे म्युझिक पीसेस होते त्यांनाही शब्दांत बांधलंय. एरव्ही रिमेक/ रिक्रिएट करताना ऱ्हिदम आणि कम्पोजिशनमध्ये गोंधळ घातला जातो, तसं तरी नाहीय. पण कॉन्स्टीपेटेड आवाजात गायची फॅशन गलिच्छ आहे. असो. त्याबाबत बोलण्यात अर्थ नाही कारण सगळेच आजकाल कुंथत कुंथत गाताना दिसतात !

दिग्दर्शिका 'शेली चोप्रा' ह्यांचा (बहुतेक) हा पहिलाच चित्रपट आहे. त्यांच्या कामात अनुभवी सफाईदारपणा ठळकपणे जाणवतो. कथानकाने शेवटच्या भागात खाल्लेल्या गटांगळ्या आणि सोनम कपूरने टाकलेल्या पाट्या वगळल्या तर दिग्दर्शिकेचा एक पहिला प्रयत्न आणि वेगळ्या विषयाची हाताळणी म्हणून 'एक लडकी को..' आवडायला हरकत नसावी. 

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर
Related Posts Plugin for WordPress, Blogger...