Thursday, September 29, 2016

पिंक - काही मतं (Pink - Not a Review !)


'पिंक'विषयी लिहायला बराच उशीर झालाय, पण लिहावंसं वाटतंय म्हणून लिहितोय. बहुतांश लोकांनी पाहून झाला आहे, भरपूर परीक्षणंही आलेली आहेतच. त्यामुळे मी कहाणी वगैरे न लिहिता फक्त काही मतं मांडतो. हे परीक्षण नव्हेच. फक्त मतप्रदर्शन !

१. 'पिंक' हे नाव आणि पोस्टरवरील त्याचं लेटरिंग/ डिझाईन मला खूप आवडलं. तेव्हढ्यातूनच एक संदेश पाहणाऱ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचतो आहे, असं मला वाटलं.
# 'पिंक' हा रंग 'स्त्रीत्वा'चं प्रतिनिधित्व करतो. मुलगी असेल तर 'गुलाबी' रंग आणि मुलगा असेल तर 'निळा' रंग, असा एक सर्वमान्य समज जगभरात दिसून येतो.
# पोस्टरवर 'PINK' मोठ्या अक्षरांत (Capital Letters) आहे.
# 'PINK' मधल्या 'I' आणि 'K' च्या समोर हाताच्या दोन मुठी दिसून येतात. कुणी तरी बंदिस्त असल्याचं त्यातून दिसतं आणि बंड करून उठत आहे, असंही.
सिनेमाचं हे नाव व त्याचं हे डिझाईन विचारपूर्वक बनवलेलं आहे नक्कीच.

२. पूर्वार्ध काही जणांना लांबलेला वाटला. पण मला तर तो खूपच आवडला. पहिल्या प्रसंगापासून सिनेमा कहाणीला हात घालतो, हे खूप आवडलं. जी घटना घडली आहे, त्या घटनेचा पडसाद (aftermath) ह्या भागात दिसून येतो. मात्र घडलेल्या घटनेबाबतच तपशील अजिबात दाखवला जात नाही. महत्वाचं हे की, हा तपशील दाखवला न गेल्याने काहीच बिघडत नाही. कारण सर्व मुख्य व्यक्तिरेखा (अपवाद - बच्चन) इतक्या व्यवस्थित मांडल्या जातात की त्यावरुन 'काय घडलं असावं' ह्याचा साधारण अंदाज आपल्याला येतोच आणि संदर्भासाठी तो पुरे असतो. ह्या भागातलं बच्चनचं तोंडातल्या तोंडात बोलणं मात्र फारच वैताग आणणारं वाटलं. त्याच्या बोलण्याला त्या व्यक्तिरेखेची जराशी बिघडलेली मानसिक स्थिती कारणीभूत आहे, हे पुढे समजून येतं. मात्र ती तशी असण्याची कहाणीला काही एक गरज नसताना, ही जबरदस्तीची जुळवाजुळव कशासाठी ? तर बच्चनच्या व्यक्तिरेखेला एक वलय मिळावं म्हणून ? तसं असेल, तर हा डाव उलटलाच आहे.

३. नाट्यमय, कल्पक, वेगवान व संयतपणे हाताळलेल्या पूर्वार्धानंतर मात्र गाडी घसरतेच. मुलींनी समाजात कसं वागावं ह्याबाबतचं एक मॅन्युअल बच्चन कोर्ट रूममध्ये मांडतो. वेगवेगळ्या प्रसंगांत एक एक करून तो ह्यातले मुद्दे मांडतो आणि ते सगळं उपरोधिकपणे. हा सगळा भाग खरं तर त्याच्या 'क्लोजिंग स्पीच'मध्ये यायला हवा होता. पण 'क्लोजिंग'च्या प्रसंगाच्या अगदी आधीच त्याची आजारी पत्नी (की मैत्रीण?) मृत्यू पावते. त्याच्या 'क्लोजिंग स्पीच'मध्ये 'No means NO' वाला खूप मस्त भाग आहे. त्याच्या जोडीला हे मॅन्युअल असतं, तर विजोड वाटलं असतंच आणि लांबलचकही झालं असतं. एका धक्कादायी घटनेनंतर त्याचं भलंमोठं स्पीच विचित्रही वाटलं असतं, म्हणून ते असं तुकड्या तुकड्यांत पूर्ण केसभर घेतलं असावं कदाचित. पण असं आणि इतकं अवांतर बोलणंसुद्धा कोर्टातल्या वातावरणाला शोभलं नाहीच. एकूणच कोर्ट रूम ड्रामा जरासा अजून कंट्रोल करायला हवा होता. तो 'तारीख पे तारीख' पर्यंत गेला नाही, हेच नशीब. कारण पियुष मिश्राचा वकील तापसीला प्रश्न विचारत असताना एका प्रसंगात इतका आक्रस्ताळा आणि आवेशात येतो की हा दुसराच कुठला सिनेमा मध्येच लागला की काय, असंच वाटतं. त्यानंतर बच्चनही एका प्रसंगात आरोपीला प्रश्न करताना असाच भरकटत जातो. सुरुवातीच्या संयत हाताळणीनंतर कोर्टातला हा सगळा रंजित भाग मला तरी खटकलाच.

३. बऱ्याच काळानंतर बच्चनचं काम कृत्रिम वाटलं. ८० च्या आसपासचे त्याचे अनेक सिनेमे, खासकरून त्यांतले विनोदी प्रसंग बघवत नाहीत. पण अधिक 'ठहराव'वाल्या भूमिकांत तो नेहमीच आवडत आला आहे. पहिल्यांदाच 'ठहराव'वाल्या व्यक्तिरेखेत तो कृत्रिम वाटला, हे विशेष. बऱ्याचदा आपण लोक सिनेमाच्या विषयाला पाहून अपाल्म मत बनवत असतो. उदा. - 'प्रकाश बाबा आमटे' चित्रपट. लोकांना आवडला त्याचं कारण त्यातल्या व्यक्तिरेखा. पण सिनेमा म्हणून त्यावर विचार केला का ? तसंच इथेही होतं जरासं. बच्चनची व्यक्तिरेखा स्त्रीत्वाच्या समर्थनार्थ ठाम उभी राहिलेली आहे, त्यामुळे ती आवडते. भिडते. पण पडद्यावर 'सहगल' न दिसता सतत 'बच्चन'च दिसत राहतो, त्याचं काय ?

४. बच्चनच्या इमेजपुढे सिनेमातल्या तीन अभिनेत्र्या झाकोळल्या गेल्या आहेत. खरं तर 'तापसी पन्नू'च मुख्य भूमिकेत आहे आणि तिचं काम खूपच जबरदस्त झालेलं आहे. तिच्या जोडीला इतर दोघी - कीर्ती कुल्हारी आणि अ‍ॅण्ड्रिआ तरिआंग - ह्यांनीसुद्धा तोडीस तोड काम केलं आहे. मात्र त्यांना पुरेशी दाद दिली जात नाहीय. स्त्रीत्वाचा पुरस्कार करणारा विषय आहे इथेही पुरुषप्रधानता अशी डोकावते. हे विधान कुणाला अतिरंजित वाटेल, पण खरं आहे, ह्या विषयी मला स्वत:ला तरी अजिबात संशय नाही. टेलिव्हिजनवरील एका कार्यक्रमात ('झलक दिखला जा' बहुतेक) तापसी आणि बच्चन आले होते, 'पिंक'च्या प्रमोशनसाठी. संपूर्ण कार्यक्रमात तापसीला फक्त एकदा बोलायला मिळालं. बाकी अख्खा एपिसोड बच्चन, बच्चन आणि बच्चनच होतं.आपल्याला काय मेसेज द्यायचा आहे आणि आपण तो कसा द्यायला हवा, ह्याचं भान ह्या इतक्या मोठमोठ्या लोकांना का असू नये ? खरोखर एखादा खमक्या असता, तर त्याने स्वत:हून म्हटलं असतं की 'चित्रपट माझा नाही, ह्या मुलींचा आहे, स्त्रीत्वाचा आहे. तापसीला बोलू द्या.' पण स्वत:ला ओवाळून घेण्याची संधी सोडवता सोडवत नाही बहुतेक. चित्रपटाच्या सगळ्याच प्रसिद्धीत हेच सूत्र दिसून येतं. युएसपी बच्चनच आहे. पोस्टरवर बच्चनचा चेहरा मोठा दिसतो, बाकीच्यांचा लहान किंवा नाहीच ! ज्या लोकांनी सिनेमाच्या नावावर व त्याच्या लेटरिंग/ डिझायनिंगवर विचार केला, त्यांना पब्लिसिटीसाठी असं स्टारलाचार व्हायला लागणं पटलं नाही.

५. मुख्य घटना संपूर्ण चित्रपटात दाखवलीच जात नाही. हे खूप आवडलं, असं म्हणत असतानाच अखेरीस श्रेयनामावलीसोबत सगळी घटना दाखवली जाते. ह्याची गरज काय होती ? ह्यामुळे तर सगळं कथन एकदम बाळबोध होऊन गेलं, असंही वाटलं.

६. एकंदरीत सिनेमा आवडला का ? - हो.
टीव्हीवर लागल्यावर मी पुन्हा पाहीन का ? - अर्थातच हो.
पण जितका उदो उदो चित्रपटाचा होतो आहे, तितकाही काही भारी मला वाटला नाही. पूर्वार्ध खरोखरच दमदार आहे. पण नंतर त्यावर बोळा फिरतो. बंगाली दिग्दर्शक 'अनिरुद्ध रॉय चौधरी' चा हा पहिलाच हिंदी चित्रपट (बहुतेक). पूर्वार्ध अप्रतिम आणि उत्तरार्ध कमजोर असं असलं, तरी हे काम त्यांच्या पुढील चित्रपटांबद्दल औत्सुक्य वाटेल, असं नक्कीच आहे. सुरुवातीला जो ताण त्यांनी कहाणीत आणला आहे, तो केवळ अनुभवावा असाच आहे. टिपिकल भडकपणा दाखवून वास्तवदर्शनाचा सोयीस्कर मुखवटा त्यांना ओढता आला असता, मात्र तसं न करता, त्याहीपेक्षा परिणामकारक मार्ग ते निवडतात आणि अस्वस्थ करतात. त्यासाठी मनापासून दाद !

एकदा तरी पाहावाच असा 'पिंक' आहेच. फक्त तो पाहताना बच्चनसाठी पाहण्यापेक्षा त्या तीन मुलींसाठी पाहायला हवा. त्यांतही तापसी पन्नूसाठी.
सरतेशेवटी तन्वीर ग़ाज़ी ह्यांनी लिहिलेली आणि सध्या प्रचंड गाजत असलेली 'पिंक' कविता -

तू खुद की खोज में निकल, तू किस लिये हताश है ?
तू चल तेरे वजूद की समय को भी  तलाश है !

जो तुझसे लिपटी बेड़ियाँ समझ न इन को वस्त्र तू
यह बेड़ियाँ पिघाल के बना ले इन को शस्त्र तू

चरित्र जब पवित्र है तो क्यूँ है यह दशा तेरी
यह पापियों को हक़ नहीं की ले परीक्षा तेरी

जला के भस्म कर उसे जो क्रूरता का जाल है
तू आरती की लौ नहीं तू क्रोध की मशाल है

चूनर उड़ा के ध्वज बना गगन भी कपकपाऐगा
अगर तेरी चुनर गिरी तो एक भूकंप आएगा

ही कविता बच्चनच्या दमदार आवाजात ऐकताना अंगावर काटा येतो !
बहौत बढ़िया !!

- रणजित पराडकर

Monday, September 26, 2016

रसास्वाद सिनेमाचा - एक नोंद

'रसास्वाद सिनेमाचा' ह्या National Film Archive of India' इथे झालेल्या शिबिराच्या निमित्ताने आठवडाभर चित्रपट, त्याविषयक व्याख्यानं, मुक्त चर्चा आणि खाजगी चर्चा/ गप्पा ह्या सगळ्यात गेला. 'गेला' असं खरं तर नाही म्हणता येणार. २४ तास चालू असलेलं हे ब्रेनस्टॉर्मिंग विचारप्रक्रियेत नक्कीच काही तरी बदल घडवून आणेल. त्यामुळे 'गेला' हा शब्द शब्दश: न लागू करता, त्यातून अपेक्षित असलेला रचनात्मक अर्थ समजून घ्यावा.
ह्या आठवड्याभरात मी काय नवीन शिकलो, हे शिबीर किती उपयोगी होतं, ह्याचा आढावा आत्ताच घेता येणार नाही. कारण मला खूप 'इनपुट्स' तर मिळाली आहेतच, त्यातून 'इनसाईट्स' किती मिळतात हे समजायला काही काळ जाईल. मात्र, हा आठवडा खूप महत्वाचा आणि अविस्मरणीय होता, ह्याविषयी तर मला अजिबातच संशय नाही.

इनसाईट्स जेव्हा मिळतील, तेव्हा मिळतीलच. पण जे दोन मुद्दे प्रकर्षाने खटकले, ते मात्र नेहमीच खटकत राहणार आहेत. त्यामुळे तेव्हढे मांडतो.

१. संगीत :

'भारतीय चित्रपटातील संगीत' (पार्श्वसंगीत नव्हे.) हा एक प्रचंड मोठा विषय शिबिरात पूर्णपणे दुर्लक्षित राहिला. मला मान्य आहे की हे शिबीर 'जागतिक चित्रपट' ह्या एका व्यापक विषयावर विचार करायला लावणारं होतं. जागतिक चित्रपट हा एक मोठ्ठा हत्ती असेल, तर त्याच्यासमोर भारतीय चित्रपट म्हणजे एक छोटंसं उंदराचं पिल्लू असेल. पण 'उंदराचं पिल्लू' म्हणूनही त्याचं स्वत:चं एक अस्तित्व आहे. भले ते कुणाला आवडो वा नावडो. ते अस्तित्व हीच भारतीय चित्रपटाची व पर्यायाने एक भारतीय म्हणून माझी व इतर सर्वांची ओळख आहे. ह्या अस्तित्वात एक अनन्यसाधारण महत्व सिनेसंगीताचं आहे. अख्ख्या जगात एक भारतीय चित्रपटच असा आहे, ज्यात 'गाणी' असतात. भारतीय चित्रपटाचं वेगळेपण म्हणजे 'त्यातली गाणी' हेच आहे. शिबिरातच एक इस्रायली चित्रपट दाखवला होता. 'डेस्पराडो स्क्वेअर' नावाचा. तो सिनेमा म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून राज कपूरच्या 'संगम'ला दिलेली एक दादच होता. त्यांतल्या व्यक्तिरेखा भारतीय चित्रपटांनी भारावलेल्या दाखवल्या आहेत. एका बंद पडलेल्या चित्रपटगृहाला पुन्हा सुरु केलं जातं आणि पहिला चित्रपट म्हणून 'संगम' लावला जातो कारण गावातले लोक त्या चित्रपटाच्या प्रेमात असतात. 'संगम'मधली गाणी ते लोक एकत्र गातात, नाचतात, रडतातही. ह्यातून काय दिसतं ? जागतिक स्तरावर भारतीय चित्रपटाची एक ओळख त्याच्या संगीतामुळे आहे. राज कपूरच्या 'आवारा'मुळे रशियात धूम मचवली होती आणि गल्लोगल्ली 'आवारा हूं..' वाजायचं, ते गाणं तिथल्या लोकांच्या ओठांवर बराच काळ रेंगाळत होतं.
दुसरं म्हणजे, खूप मोठमोठ्या लोकांनी भारतीय सिनेसंगीतात आपलं भरीव योगदान दिलं आहे. मला फार काही ज्ञान नाही, पण काही नावंच घ्यायची झाली तर सज्जाद हुसेनपासून ए आर रहमानपर्यंत, राजा मेहंदी अली खानपासून स्वानंद किरकिरेपर्यंत, नूर जहांपासून श्रेया घोशालपर्यंत, के एल सैगलपासून सोनू निगमपर्यंत असंख्य लोकांनी खूप अप्रतिम काम केलेलं आहे व करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर, स्वत:च्या कलेच्या जोरावर भारताचं नाव उज्वल करणाऱ्या पं. हरिप्रसाद चौरासिया, पं.रविशंकर, पं. शिवकुमार शर्मा, उस्ताद अला रखा सारख्या मोठमोठ्या कलाकारांनी आपापल्या कारकिर्दीची सुरुवात हिंदी चित्रपटसृष्टीत केलेली आहे किंवा सिनेसंगीतात प्रचंड काम केलेलं आहे. हे सगळं पूर्णपणे विसरुन चालणार नाही.
तिसरं असं की, आपण आपली ओळख, आपलं वेगळेपण जपायला कधी शिकणार आहोत ? स्वतंत्र झालो तरीही बौद्धिक गुलामगिरी कधी सोडणार आहोत ? जागतिक चित्रपट जे काही करतो, त्याचं अंधानुकरण आपण का करावं ? त्यांच्या चित्रपटांत संगीत नसतं, म्हणून आपण आपली एक संपन्न परंपरा सोडायची का ?
शिबिरादरम्यान मी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर ह्यांना एक प्रश्न विचारला होता की, 'तुमच्या चित्रपटांतील संगीताविषयी तुम्ही किती आणि कसे आग्रही असता ?' खरं तर मला हा प्रश्न गाण्यांच्या दर्ज्याच्या बाबतीत विचारायचा होता कारण गोवारीकर आजच्या काळातले एक असे दिग्दर्शक आहेत, ज्यांच्या चित्रपटांतील गाणी एका विशिष्ट दर्जा सांभाळणारी असतातच असतात. मात्र माझ्या विचारण्यात जराशी चूक झाली असावी आणि गोवारीकरांनी 'चित्रपटात गाणी असावीत की नाही' अश्या अनुषंगाने उत्तर दिलं. Nevertheless, ते उत्तरही मला खूप महत्वाचं वाटतं. त्यांचे शब्द होते की, 'कुठलीही कहाणी अशी नसते जिला संगीताची आवश्यकता नाही. एक चांगलं गाणं एखाद्या प्रसंगापेक्षा जास्त परिणामकारक असतं. ते भावनेचं extension असतं.' मला हे उत्तर खूप आवडलं आणि पटलंही. आपण आपली ओळख, वेगळेपण जपायला हवं. सिनेसंगीताचा एक अथांग ठेवा आपल्याकडे आहे, त्याची आपल्याला किंमत वाटेनाशी झाली आहे. हे खूप विदारक आहे.
'गाण्यांचं चित्रीकरण' हेसुद्धा एक वेगळं कसब आहे, असंही मला वाटतं. अगदी ताबडतोब डोळ्यांसमोर येणारं गाणं म्हणजे विजय आनंदच्या 'तेरे घर के सामने' मधलं 'दिल का भंवर करे पुकार..' ! कुतुब मिनारमध्ये चित्रित केलं गेलेलं हे गाणं जितकं श्रवणीय आहे तितकंच प्रेक्षणीयही ! गुरु दत्तनी तर किती तरी गाण्यांची अप्रतिम चित्रीकरणं केलेली आहेत. हीसुद्धा एक वेगळ्या प्रकारची कलात्मकता आहे. चित्रपट ही जर एक कला आहे, तर त्या कलेच्या अंतर्गत असलेल्या अश्या कलात्मकतेला आपण कसे विसरू किंवा नाकारू शकतो ?

२. इतिहास :

चित्रपटक्षेत्रातील किंवा असं म्हणू की चित्रपट रसास्वादक्षेत्रातील जाणकार लोकांचं घड्याळ एका विशिष्ट कालखंडानंतर बंद पडलेलं आहे, असं मला वाटलं. अनेक व्याख्यानांमधून चित्रपट इतिहासातील तीच ती पानं पुन्हा पुन्हा उलगडून दाखवली जाणं म्हणजे हे सगळे जण वर्षानुवर्षं त्याच त्या सहाणेवर तेच ते ते चंदन उगाळत आहेत की काय, असं वाटलं. भारतीय चित्रपटाचा इतिहास तर म्हणे 'सत्यजित राय' ह्या एकाच नावाभोवती घुटमळत राहतो ! मला मान्य आहे की सत्यजित राय महान होते. नव्हे, ते महत्तम होते ! त्यांना आपण भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह म्हणू. आपल्या देशाला एक राष्ट्रपिता आहेत, तसे हे 'चित्रपिता' मानू. पण देशाला स्वातंत्र मिळालं, ते काही फक्त राष्ट्रपित्यामुळे नाही ना ? जो काही आपला स्वातंत्र्यलढा होता त्यात इतर अनेक लोकांचं असलेलं योगदान आपण विसरतो का ? मग भारतीय चित्रपटाच्या प्रवासातील इतर महान नावं आपण का विसरता ?
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय चित्रपटाला सत्यजित राय ह्यांच्या 'पथेर पांचाली'ने ओळख मिळवून दिली हे जरी खरं असलं, तरी खऱ्याखुऱ्या भारतीय चित्रपटाचं चांगलं प्रतिनिधित्व तो चित्रपट करतो ? माझ्या मते तरी नाही. मला विचाराल, तर खऱ्याखुऱ्या भारतीय चित्रपटाचं प्रतिनिधित्व बिमल रॉयचा 'दो बिघा जमीन', व्ही. शांतारामांचा 'दो आंखें बारा हाथ', राज कपूरचा 'आवारा', हृषीकेश मुखर्जीचा 'आनंद', गुलजारचा 'इजाजत', रामगोपाल वर्माचा 'सत्या' असे काही चित्रपट करतात. असे चित्रपट ज्यांत संगीत आणि मेलोड्रामा ह्या दोन्हीचं परफेक्ट मिश्रण आलं आहे आणि ज्याला वास्तवाची बऱ्यापैकी जोडही आहे. 'पथेर पांचाली' हा काही भारतीय चित्रपटाचा चेहरा, त्याची ओळख होत नाही. पण वर उल्लेखलेल्या सगळ्या चित्रपटांची 'चांगले' चित्रपट म्हणून नोंद घेतली जात नाही व जाणार नाही कारण ते तथाकथित 'समांतर चित्रपट' म्हणवले जाऊ शकत नाहीत.
माझ्यासाठी चित्रपट म्हटला की, 'हृषीकेश मुखर्जी' आणि 'गुलजार' ह्या दोन नावांशिवाय तो पूर्ण होतच नाही. माझ्यासाठी ही दोन दैवतंच आहेत. संपूर्ण आठवड्याभराच्या शिबिरात एकाही सेशनमध्ये ह्या दोन नावांचा साधा उल्लेखसुद्धा होऊ नये, ही बाब मला खूप दु:खी करणारी वाटली. शिबारार्थी लोकांना 'भुवन सोम' हा एक अतिसामान्य चित्रपट दर्जेदार, आयडियल म्हणून दाखवला जाणं, म्हणजे धक्कादायक होतं ! एका अनोळखी शहरी इसमास स्वत:च्या घरी बोलवून त्याचा पाहुणचार करणं, इतपत ठीक आहे. पण त्यानंतर घरी आपल्या मुलीला एकटं सोडून स्वत: बापाने कामासाठी बाहेर निघून जाणं, नंतर त्या मुलीने त्या अनोळखी इसमासोबत बिनधास्तपणे गावभर हुंदडणं आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवणं वगैरे शुद्ध आचरटपणा ह्या चित्रपटात आहे. हे कथानक १९६० वगैरेच्या काळातलं आहे. त्या काळात सोडा, आजच्याही काळात ग्रामीण भारतात असं कुठलीही स्त्री व तिचा बाप वागणं केवळ अशक्य आहे. ह्याशिवायही अनेक बाष्कळ गोष्टी ह्या चित्रपटात आहेत.
बिमल रॉय, व्ही शांताराम, राज कपूर, हृषीकेश मुखर्जी, गुलजार, बासू चटर्जी, विजय आनंद, सई परांजपे, शेखर कपूर अश्या लोकांना तथाकथित जाणकार लोकांनी पूर्णपणे दुर्लक्षित करावं, इतकंही त्यांचं काम सुमार दर्ज्याचं नाहीच. शिबिरात उल्लेख केलेल्या व दाखवलेल्या काही चित्रपटांपेक्षा किंवा त्या चित्रपटांइतकंच ह्या लोकांनीही दर्जेदार काम केलेलं आहे. मात्र 'घर की मुर्गी दाल बराबर' असते, असंच दिसून आलं.
आजकालचे चित्रपट तर अदखलपात्रच असावेत. I am sure, व्याख्यानं देणाऱ्या बहुतांश लोकांनी इम्तियाझ अलीचे चित्रपट पाहिलेले नसतीलच. इम्तियाझ अली हा एक असा दिग्दर्शक आहे, जो त्याच्या चित्रपटांत, कथाकथनात गाण्यांचा अप्रतिम खुबीने वापर करत असतो. आजच्या चित्रपटांचा विचार केला तर माझ्या मते मणी रत्नम, रामगोपाल वर्मा, अनुराग कश्यप, इम्तियाझ अली असे अनेक लोक सांगता येतील, जे खूप चांगलं काम करत आहेत. केवळ ते आजच्या काळात आहेत, म्हणजे ते दखलपात्र नाहीत की काय ?
'समांतर सिनेमा' असं काहीही सध्या राहिलेलं नाही आहे. एकंदरीतच सिनेमा परिपक्व होत आहे. आजच्या बहुतांश सिनेमांत (चांगल्या) व्यावसायिक व समांतर ह्यांचा समन्वय साधलेला मला तरी जाणवतो. एक उदाहरण द्यायचं तर 'नीरज घायवान'चा 'मसान' पाहू शकता.

पण कुठे तरी संपूर्ण शिबिरातून असं एक जाणवलं की जाणकार लोकांना सरसकट परदेशी चित्रपटच जास्त सरस वाटतो. 'डेस्पराडो स्क्वेअर' जर भारतात बनला असता, तर त्याला १००% खात्रीने सांगतो, त्याला रीडीक्युल केलं गेलं असतं, पण तो इस्रायली असल्याने त्याचं गुणगान होतं. (मला तो आवडला आहेच.) 'आपल्या मनात आपल्या परंपरेविषयी, संस्कृतीविषयी एक प्रकारची अढी आहे', असं मी म्हटलं की मला 'अंध राष्ट्रवादी' वगैरे संबोधलं जाईल. पण त्यामुळे सत्य बदलणार नाही. 'काय चांगलं, काय वाईट', हे जरी व्यक्तीसापेक्ष असलं, तरी हा निवाडा आपणच आपला करत असताना पूर्वग्रहविरहीत असणं आवश्यक आहे. 'आनंद'चं गुणगान केलं की कुणी तरी म्हणतं, हा तर 'इकिरू' वरून उचलला आहे ! असं बिनधास्त ठोकून देण्यापूर्वी दोन्ही चित्रपट कोऱ्या मनाने पाहिले पाहिजेत. ते आपण पाहत नाही.

अर्थात, असं सगळं खटकूनही मी शेवटी हेच म्हणीन की हा आठवडा खूप महत्वाचा होताच. ह्या सात दिवसांत १०-१२ चांगले चित्रपट (एक अपवाद) आणि किमान २०-२२ चांगल्या शॉर्ट फिल्म्स मी पाहिल्या. उमेश कुलकर्णी, गणेश मतकरी, अनिल झणकर, विकास देसाई ह्यांच्या सेशन्समधून बरंच काही नवीन व नव्याने समजलं, उमगलं.
हेही नसे थोडके !

टीप -
१. ही माझी मतं मी आयोजकांसमोर व शिबिरात सहभागी सर्व व्यक्तींसमोर व्यासपीठावरूनही मांडली आहेतच. पण ते संक्षिप्त व उत्स्फूर्त होतं, हे जरा अधिक विस्ताराने व विचारपूर्वक आहे.
२. मला अन्यभाषीय चित्रपटांची फारशी माहिती नसल्याने सगळा फोकस 'हिंदी'वर आहे, ते प्रातिनिधिक समजावं.

- रणजित पराडकर

Thursday, September 08, 2016

'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'

~ ~ 'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल' ~ ~

स. न. वि. वि.
फोनवर एकमेकांशी थेट बोलणं, व्हिडीओ चॅटिंग करणं आताशा इतकं सहज शक्य आणि स्वस्त झालं आहे की गेल्या दोन पिढ्या कुणी एकमेकांना कधी पत्र वगैरे लिहिलं असेल असं मला तरी वाटत नाही. ई-मेल, मेसेंजर, चॅटिंग वगैरेचा जमाना आहे हा. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, हाईक वगैरेचा काळ आहे. जिथे आपण एकमेकांशी मराठीतून बोलतानाही रोमन लिपीत लिहितो, तिथे 'स. न. वि. वि.' माहित असणं अशक्यच ! इंग्राठलेल्या, हिंद्राठलेल्या व इंद्राठलेल्या लोकांना 'स.न.वि.वि.' म्हणजे 'सप्रेम नमस्कार विनंती विशेष' आणि हे पत्राच्या सुरुवातीला लिहिलं जात असे, हे विशेषत्वाने सांगावं लागायची वेळ सध्या आलेली आहे !

ह्या छोट्याश्या प्रास्ताविकातून हा अंदाज यावा की 'स. न. वि. वि.' हा कार्यक्रम म्हणजे नक्की काय असेल ? एखाद्या पत्राप्रमाणे तो संवादी असणार. तो जुन्या काळात नेणाराही असणार. काही ठिकाणी आवश्यक तितका औपचारिक, तर बहुतकरून अनौपचारिकच असणार. हा कार्यक्रम आठवणी सांगणारा असणार, अनुभवकथन करणारा असणार. तो तुम्हाला विचारात टाकणारा असणार, गुदगुल्या करणारा असणार आणि काही माहित नसलेल्या गोष्टीही सांगणारा असणार. तो बातम्या सांगेल, काही गुपितंही उघडेल, काही गूढांना उकलेल आणि तो तुम्हाला अंतर्मुखही करेल. एक सफर घडवेल अश्या विश्वाची, जे आपल्याला माहित आहे पण समजलेलं नाही.
ज्यांनी आयुष्यात कधी पत्रं लिहिलेली आहेत किंवा ज्यांना कधी पत्रं आलेली आहेत, ते लोक नक्कीच समजू शकतील की 'पत्र लिहिणं किंवा आपल्याला आलेलं पत्र वाचणं', हा एक आगळावेगळा सोहळाच असतो. ते एक खूपच वेगळं मनोरंजन असतं. 'स. न. वि. वि.' हा कार्यक्रमसुद्धा असाच एक आगळावेगळा अनुभव आहे, सोहळा आहे आणि जरा वेगळ्या प्रकारचं मनोरंजन आहे. कारण हा कार्यक्रम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे 'कौशल इनामदार' आणि 'स्पृहा जोशी' लिखित एक पत्र आहे. हे पत्र ते दोघे मिळून, मंचावरूनच रसिकांना लिहितात.
जे त्यांच्यासमोर बसलेले असतात आणि जे त्यांच्यासमोर त्या वेळी नसतात, अश्या सगळ्याच रसिकांसाठीचं हे एक सांगीतिक, काव्यात्मक, संवादी, उद्बोधक पत्र आहे.
ही कवितांची, गाण्याची, गप्पांची मैफल हस्तलिखित पत्रासारखीच जराशी अनौपचारिक आहे. पण हे हस्ताक्षर सुंदर, सुवाच्य आहे. त्यात खाडाखोड, गिचमिड नाही. हे पत्र टापटीप, नीटनेटकं आहे आणि उत्स्फूर्त असलं तरी मुद्देसूदही आहे.

काल 'स. न. वि. वि.' चा शुभारंभाचा प्रयोग होता. पडदा उघडला आणि समोर एका छोट्याश्या मंचावर फक्त तीन जण. पुढ्यात हार्मोनियम घेऊन कौशल इनामदार, त्यांच्या एका बाजूला स्पृहा जोशी आणि दुसऱ्या बाजूला तबल्याच्या साथीसाठी मंदार गोगटे. वाद्यांचा ताफा नाही की देखाव्यांचा पसारा नाही. एकदम सरळ, साधं, एखाद्या घरगुती मैफलीसारखं मित्रत्वाचं वातावरण. मला का कुणास ठाऊक चटदिशी तलत मेहमूदच्या गाण्यांचीच आठवण झाली. तलतची गाणी ऐकताना मला असंच वाटतं की तो असा समोर बसून कुठलाही अभिनिवेश न आणता 'हे हे असं असं आहे' अश्या पद्धतीचं सरळ साधं कथन करत असतो. त्याला काही अपेक्षा नसते कुठल्या उत्तराची किंवा मदतीचीही. तो एका निरपेक्ष वृत्तीने आणि अतीव हळवेपणाने सांगतो -
'प्यार पर बस तो नहीं हैं मेरा लेकिन फिर भी
तू बता दे के तुझे प्यार करूँ या न करूँ'
'स. न. वि. वि.' मधल्या कौशल इनामदार आणि स्पृहा जोशी ह्यांची भूमिकाही मला अशीच वाटली.
अनौपचारिक व उत्स्फूर्त संवादी कार्यक्रम असल्याने तात्कालिक स्थिती व घटनांना अनुसरून पुढे जाणं साहजिकच आहे. पावसाळी वातावरणानुरूप कार्यक्रमाची सुरुवात कवी अशोक बागवेंच्या 'वासाच्या पयला पाऊस अयला' ने झाली आणि पाठोपाठ पहिल्या पावसावरची स्पृहा जोशींची एक कविता -

रिमझिमत्या सरी आठवणी होऊन वाहायला लागतात..
जरा कुठे त्याची चाहूल काय लागते, लगेच कविताच सुचायला लागतात !

कविता, गाणी, आठवणी, गंमती जंमती ह्या सर्वांची पखरण पुढील दीड तास चालू राहिली. ऑस्कर वाईल्ड, मार्क ट्वेन आदींची वचनं, तर दुष्यंतकुमार, बालकवी, कुसुमाग्रज, गदिमा, सुरेश भट, शांता शेळके, मंगेश पाडगांवकर, नारायण सुर्वे, अशोक नायगांवकर, नलेश पाटील ह्यांच्या कविता ह्या दीड तासात भेटून गेल्या. अनेक कवितांच्या, गाण्यांच्या व चालींच्या जन्माच्या कथा सांगितल्या गेल्या.
उदाहरणार्थ -

मुंबईच्या लोकल ट्रेनमधून रात्री उशीरा कविवर्य शंकर वैद्यांसोबत प्रवास करत असताना, पौर्णिमेच्या चंद्राला पाहून वैद्य सरांना आठवलेल्या -

या शुभ्र विरल अभ्रांचे शशीभवती नर्तन चाले
गंभीर धवळली रजनी बेभान पवनही डोले

- ह्या बालकवींच्या ओळी आणि त्यांनी कौशल इनामदारांना ह्या कवितेला चाल लावण्यासाठी उद्युक्त करणं. नंतर ती चार पानी अपूर्ण कविता समजावून देणं, मग ती कविता कौशल इनामदारांमधल्या संगीतकाराला उमगणं आणि तिची चाल बनणं

किंवा

'उंच माझा झोका' ह्या रमाबाई रानडेंच्या आयुष्यावर आधारित मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान आलेले काही अनुभव व मालिकेच्या कथानकाचा, तसेच व्यक्तिरेखांचा स्वत:वर पडलेला प्रभाव ह्यातून स्पृहा जोशींना सुचलेली 'पर्व' ही कविता, ज्यात आपण नेहमीच 'दुसरे' असल्याची एक बोचरी जाणीव मन पोखरत जाते

किंवा

सुरेश भटांच्या -
'सूर मागू तुला मी कसा
जीवना, तू तसा मी असा'
- ह्या कवितेस कौशल इनामदारांनी दिलेली एक नवीन चाल त्यांना कशी सुचली, का द्यावीशी वाटली.

असं बरंच काही.

ह्या कार्यक्रमाला निश्चित अशी संहिता नाही. रूपरेषा आहे. बाकी सगळं उत्स्फूर्त - Extempore. अश्या स्वरूपाचा कार्यक्रम सादर करताना भरकटत जाण्याची शक्यता खूप असते. मात्र दोन्ही कलाकारांना कुठे थांबायचं ह्याचं एक भान नेहमीच असल्याने, त्यांचं उत्स्फूर्त बोलणं रसभरीत व अर्थपूर्ण तर होतंच, पण नेमकं असल्याने योग्य परिणामकारकही होतं. अनेकविध कवींच्या कविता, तत्ववेत्त्यांची भाष्यं कौशल इनामदारांना मुखोद्गत असणं निव्वळ थक्क करणारं होतं. 'संगीतकाराकडून त्याची स्वत:ची चाल ऐकणं, ह्याची बातच वेगळी असते कारण त्याला त्या चालीतल्या 'गल्ल्या' माहित असतात', 'गाणारा समाज हा सुखी समाज असतो', 'भाषा प्रवाही राहिली पाहिजेच पण त्यासाठी आधी ती 'राहिली' पाहिजे' अशी कौशल इनामदारांची अनेक वक्तव्यं लक्षात राहणारी होती.
तर, 'किती रोखा वेडं मन एकटंच गात राहतं' म्हणणाऱ्या स्पृहा जोशींच्या

रुणझुणले अनुबंध जरासे सरून उरला जरा पूरिया
नको नको म्हणता बिलगे तुझ्या मिठीची साखरमाया

आणि

हळवे तनमन, सरले 'मी'पण गर्दनिळीही भूल
निळसर मोहन, राधा झाली निशिगंधाचे फूल

अश्या कधी लयबद्ध, कधी मुक्त कविताही मनात रेंगाळल्या. कवितांवर लिहायचं म्हणजे तो एक स्वतंत्र लेखाचा विषय असतो. त्यामुळे इथे जास्त लिहित नाही.
सांगायचं इतकंच आहे की एक संगीतकार, लेखक आणि एक अभिनेत्री, कवयित्री ह्यांच्या गप्पांतून उलगडत जाणारा त्यांचा सृजनशील प्रवास जाणून घेणं आणि त्यांचे चिंतनशील विचार ऐकणं, हा एक अविस्मरणीय अनुभव 'स.न.वि.वि.' ने दिला. पहिलाच प्रयोग असल्याने इथून पुढे त्यात आणखी बदल होत जातीलच. कदाचित त्यात अजून एका 'आवाजा'ची गरज आहे. सध्या गाण्याची सगळीच जबाबदारी एकाच गळ्यावर आहे. असा जर दुसरा आवाज त्यांनी भविष्यात घेतलाच, तर तो कुणा गायक/ गायिकेचा नसावाच. कौशल इनामदारांच्याच शब्दांत 'गाता गळा' नसावा तर 'गातं नरडं'च असावं, जेणेकरून कार्यक्रमाचा सध्याचा जो अनौपचारिक चेहरा आहे, तो तसाच राहील, असं मात्र वाटलं ! येणाऱ्या काळात साथसंगतीसाठीही अजून १-२ जण नक्कीच वाढवता येतीलच.
अर्थात, आत्ताच्या स्वरुपातही जो कार्यक्रम झाला तो सुंदरच झालेला आहे ! त्यांच्या पुढील प्रयोगांना मनापासून शुभेच्छा !



सरतेशेवटी, एक उल्लेख करणं अत्यावश्यक आहे.

कार्यक्रमात चित्रकार, कवी नलेश पाटील ह्यांच्या अप्रतिम सुंदर अश्या अनेक कविता सादर झाल्या. पैकी 'माझ्या चातक मैतरा..' आणि 'हिंदकळलं आभाळ..' तर कौशल इनामदारांनी गाऊन सादर केल्या. नलेश पाटील ह्यांचा प्रभाव दाखवणारी स्पृहा जोशींनी स्वत:ची एक कविताही पेश केली आणि हे सगळं मंचावर घडत असताना खुद्द नलेश पाटील मात्र आपल्या अखेरच्या प्रवासासाठी निघून गेले होते ! कार्यक्रमादरम्यानच ही बातमी येऊन धडकली, जिला कार्यक्रमानंतर जाहीर केलं गेलं. तोपर्यंत ना सादरकर्त्यांना हे माहित होतं ना उपस्थितांना. एखाद्या कवीच्या आयुष्याच्या शेवटच्या घटिकांत त्याच्याच काही सुंदर कविता कुणी ताकदीचे सादरकर्ते उत्स्फूर्तपणे एका मोठ्या श्रोतृवर्गासमोर सादर करत असणं, त्या शब्दांना व सादरीकरणाला भरभरून दाद मिळत असणं हा योगायोग जरी दुर्दैवी वाटत असला तरी विलक्षण काव्यात्मक आहे. एकाहून एक सुंदर कविता व गीतं सादर झाल्यावरही मी घरी येत असताना माझ्या मनात, कार्यक्रमाच्या पूर्वार्धात सादर झालेली 'माझ्या चातक मैतरा शिव फाटलेल्या जागा' ही कविताच घुमत राहावी आणि आतल्या आतच काही तरी उसवत राहावी, ह्याहून मोठी श्रद्धांजली एका कवीसाठी काय असू शकेल ?

कळावे.
लोभ असावा.

- रणजित पराडकर

हा लेखाला महाराष्ट्र टाईम्सने प्रसिद्धी दिली आहे - http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31836&articlexml=11092016006013


Monday, September 05, 2016

सोबत

डोळ्यांत थांबली रात, अभोगी गात, ओल काळोखी
पसरून सर्व संचिता, चालला रिता, रोजचा जोगी
मोजून टाक पाउले, पान ओघळे, वाट अज्ञात
येशील पुन्हा परतून, दु:ख घेऊन, ह्याच दारात

डोहास प्यायला थेंब, अंतरी चिंब, सुन्न थिजलेला
स्पर्शात जराशी आग, तरी ना जाग, उंबरा ओला
अंगणी ठसे उन्मुक्त, कुणी अव्यक्त, झिरपला आत
येईल पुन्हा परतून, दु:ख घेऊन, ह्याच दारात

भिंतींस पुसटसे तडे, आणि पोपडे, एकटे सारे
झोपेत हासती फुले, भास सोवळे, कोरडे सारे
उद्विग्न शांततेतून, वाजते धून, मंद तालात
गाईल पुन्हा परतून, दु:ख येऊन, ह्याच दारात

हळुवार पेटल्या दिशा, ओत कवडसा, गूढ अंधार
ओसाड नभाला दाव, कालचा घाव, कालचा वार
हृदयात थंड शांतता, प्राण ओढता, उजळली वात
आलास पुन्हा परतून, दु:ख घेऊन, ह्याच दारात

....रसप....
५ सप्टेंबर २०१६
(वृत्त - भवानी)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...