Friday, December 05, 2014

ओढ

तुझे फोटो न्याहाळतो,
तुझे व्हिडीओ पाहतो,
तुझा आवाजसुद्धा ऐकतो,
आणि काही क्षण हरवलेला असतो
आपण दूर असतो तरी
त्या वेळी सर्वांना वाटतं
की काही क्षणांसाठी का होईना
आपल्यातलं अंतर मिटतं..

पण सत्य वेगळं आहे
जे माझं मलाच कळलं आहे

एक थकलेलं मन
फक्त कल्पना करत असतं
क्षणार्धात सगळा शीण घालवणाऱ्या,
सहस्त्ररश्मी तेज चेतवणाऱ्या,
रणरणत्या उन्हात फुललेल्या गुलमोहरासारखं हसवणाऱ्या,
कभिन्न कातळातून उगवलेल्या कोंबासारखं जगवणाऱ्या,
आजवर कधीच न अनुभवलेल्या
आजवर कधीच न दरवळलेल्या
एका कोवळ्या गंधाची
तुझ्या सोवळ्या गंधाची..

पण कल्पनाविलासाने वास्तवाचा रखरखाट शमत नसतोच..

म्हणून रोज तुझा गंध मी भरभरून घेतो
एकेका क्षणात
आणि भरून भरून घेतो,
एकेका श्वासात
अन् मग पुढच्या भेटीपर्यंत
श्वास घेत असतो,
पुरवून पुरवून
मोजून मापून..

समजेल तुलाही
हे माझं कुणालाच न दिसणारं वेडेपण
कधी तरी तूसुद्धा अनुभवशीलच की
एका बापाचं हळवेपण !

....रसप....
४ डिसेंबर २०१४
(संपादन - २१ जून २०१५)

Wednesday, November 19, 2014

मी केवळ माझ्यासाठी

मी दिले कधी जे काही
देण्याच्या आनंदाला भरभरून घेण्यासाठी
मी केवळ माझ्यासाठी

मी जेव्हा जेव्हा झिजलो
नवनिर्मित झालो कारण मी झिजलो घडण्यासाठी
मी केवळ माझ्यासाठी

दु:खाला सोसत होतो
ती आस सुखाची होती, मी रडलो हसण्यासाठी
मी केवळ माझ्यासाठी

मी माझा, केवळ माझा
ना संत कुणी ना साधू, मी झटतो जगण्यासाठी
मी केवळ माझ्यासाठी

मी केवळ माझ्यासाठी.

....रसप....
१९ नोव्हेंबर २०१४ 

Tuesday, October 28, 2014

अल्ताफ चाचा - मंदिर वोही बनायेगा !


मिचमिचे डोळे. गालांपासून हनुवटीवर येऊन एखाद इंच लोंबणारी काळी-पांढरी दाढी. मिशी स्वच्छ. डोक्यावर दाढीच्या केसांपेक्षा जरा जास्त पांढरे बारिक केस. त्यांच्या मधोमध टक्कल होतं, हे मला एकदाच दिसलं. आजी गेली, त्या वेळी तो स्मशानापर्यंत गेला होता आणि परत आल्यावर त्याने अंघोळ केली तेव्हा डोक्यावरची गोल टोपी काढली होती, तेव्हा. 
साधारण ६५ ते ७० वयाचा असेल अल्ताफ चाचा. उज्जैनहून आत्या त्याला घेऊन आली होती, आमच्या नवीन घरात साधारण पाच बाय सहाचं देवघर बांधण्यासाठी. 

आत्याने जेव्हा उज्जैनच्या तिच्या घराचं काम काढलं होतं, तेव्हा सलीम म्हणून कंत्राटदार होता. 'यहाँ मुझे एक छोटा मंदिर जैसा बाँधना हैं' असं ती सलीमला म्हणाली आणि तो क्षणभर विचार करून उत्तरला,'फ़िक्र मत करो माँजी, मैं कारागीर ले आता हूँ.' दुसऱ्या दिवशी सलीमसोबत अल्ताफ चाचा हजर. त्याला जरा कमी दिसत असे म्हणून डोळे बारिक करत बोलायचा. बारिक डोळे, बारिक अंगकाठी आणि बारिकच आवाज. शांतपणे तो त्याचं काम करत राही. नमाजाच्या वेळेस नमाज पढे, जेवणाच्या वेळेस जेवे आणि चहाच्या वेळेस चहा घेई. कुठलाही अनावश्यक वेळकाढूपणा नाही. वेळच्या वेळी येणं, वेळच्या वेळी जाणं. ह्या शिस्तीत त्याचं काम चाले. 
घराची एक भिंत तोडावी लागली होती. ती तोडल्याच्या दिवशी काम पूर्ण होऊ शकलं नाही. उरलेलं भगदाड अल्ताफ चाचाने त्याच्या सोबतच्या माणसाच्या मदतीने विटा गच्च कोंबून घट्ट बंद केलं आणि आत्याला म्हणाला, 'बहनजी, यह अच्छे से बंद किया हैं. डरने की बात नहीं हैं. आप बिलकुल फ़िक्र मत करना. यह लड़का आज रात इधर ही सोयेगा.' 
देवघराचं काम पूर्ण झाल्यावर त्याने स्वत:च जाऊन एक फुलांची माळ आणली आणि ती तिथे दरवाज्याच्या वर लावली. त्याच्या चेहऱ्यावर ख्वाजा मोइनुद्दिन चिश्तीचं दर्शन झाल्याचा आनंद आत्याला दिसला होता. 

अल्ताफ चाचाचं कसब, त्याची शिस्त व अतिशय अदबशीर वागणं ह्या सगळ्याने आत्या प्रभावित झाली होती, त्यामुळे जेव्हा आम्ही बदलापूरला घर बांधायचं ठरवलं तेव्हा 'देवघर बांधायचं आणि ते अल्ताफ भाईकडूनच बांधून घ्यायचं' असं तिने जाहीर करून टाकलं ! तिने अल्ताफ चाचाला विचारलं, तो तयार झाला खरा; पण दुसऱ्या दिवशी चाचा आणि त्याचा मुलगा पुन्हा आले. मुलगा म्हणाला, 'माँजी, अब्बू को ठीक से दिखाई देता नहीं. और तबियत भी ठीक नहीं होती. दो-एक रोज़ की बात होती तो मैं उनके साथ चलता. लेकिन अब काम के लिए जाना मतलब काफी दिन लगेंगे. वो कैसे रह पायेंगे. हमें फ़िक्र हो रही हैं..'
आत्याने त्याला कसंबसं समजावलं आणि अल्ताफ चाचालासुद्धा मुंबईला यायची प्रचंड इच्छा होती म्हणून त्याने होकार दिला. निघायच्या दिवशी तो चाचाला गाडीत बसवायला आला तेव्हा पुन्हा आत्याला हात जोडून म्हणाला, 'माँजी, आप साथ में हो, बस इसी लिए मैं अब्बू को भेज रहा हूँ. वरना नहीं जाने देता.'

मग बदलापूरला आल्यावर उज्जैनच्या शिस्तीतच त्याचं काम सुरु झालं. आमच्या राहत्या घरून, डबा घेउन तो सकाळी 'साईट'वर जात असे, तो थेट संध्याकाळी अंधार झाला की मगच परतत असे. काम जवळजवळ पूर्ण झालं आणि तो बाबांना हळुच म्हणाला, 'हाजी अली दर्गाह पास में ही हैं क्या ?'
बाबाही हसून म्हणाले, 'हाँ. बहुत दूर नहीं हैं. मैं आपको कल ले जाऊँगा'

दुसऱ्या दिवशी सकाळी अल्ताफ चाचा लहान मुलासारखा तयार होऊन बाबांची वाट पाहत बसला. त्या वेळी आमच्याकडे 'साईड कार' लावलेली स्कूटर होती. बाबांनी त्याला साईड कारमध्ये बसवलं आणि दोघं हाजी अलीच्या दर्शनासाठी बदलापूरहून मुंबईला निघाले. रस्त्यात चाचाने पुन्हा पुन्हा विचारलं, 'और कितना दूर हैं.. और कितना दूर हैं ?' 
बाबा म्हणत, 'बस.. थोडासाही!'
शेवटी एकदाचे ते पोहोचले. हाजी अलीच्या दर्शनाने चाचा कृतकृत्य झाल्याचं पाहुन बाबाही कृतकृत्य झाले. चाचाच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. त्याने हाजी अलीच्या भोवतीचं पाणी चाखलं आणि म्हणाला 'यह तो खारा है !' त्याच्या अज्ञानातला निरागसपणा त्याच्या डोळ्यांत ओथंबला होता. त्याच्या मुलाच्या वयाच्या माझ्या बाबांच्या पाया पडावं की मिठी मारावी की काय हे त्याला आनंदातिशयाने कळतच नव्हतं. संध्याकाळी दोघे जेव्हा परत आले तोपर्यंत त्याचे डोळे पाणावलेलेच होते. तो पुन्हा पुन्हा बाबांचे 'शुक्रिया अता' करत होता. 

दोन दिवसांनी आत्या चाचाला घेऊन उज्जैनला परत गेली. आम्ही महिनाभराने नवीन घरात राहायला आलो. चाचाने बांधलेल्या देवघरात आमचे देव स्थानापन्न झाले. नियमितपणे त्याची आठवण यायची. आत्याशी पत्रव्यवहारात त्याची ख्यालीखुशाली विचारली, कळवली जायची. 

कालांतराने आत्याने उज्जैन सोडलं. अल्ताफ चाचाशी संपर्कही तुटला. 
बऱ्याच वर्षांनी, बहुतेक २००८/०९ मध्ये तिचं उज्जैनला जाणं झालं. महांकाळाचं दर्शन घेतलं. तिथे जवळच अल्ताफ चाचाचं घर आहे, हे तिला माहित होतं. शोधून काढलं. घरी मुलगा, सून होते. त्यांनी आत्याला बघता क्षणी ओळखलं. खूप खूष झाले. जुजबी विचारपूस झाल्याबरोबर आत्याने मुख्य मुद्द्याला हात घातला. 'अल्ताफ भाई किधर हैं ?' मुलगा व सून एकमेकांकडे बघत असतानाच आतल्या खोलीतून जमिनीवर स्वत:ला ओढत, खुरडत अल्ताफ चाचा आला. पंचेऐंशीच्या पुढचा चाचा आता हिंडू, फिरू तर शकत नव्हताच, बोलणंही बंद झालं होतं. भरल्या डोळ्यांनी त्याने दुवा दिली, खुशाली सांगितली. आत्याला त्याच्या डोळ्यांत बाबा हाजी अलीचा दर्गाह तरळल्यासारखं वाटलं. 
निरोप घेऊन आत्या तिथून निघाली. तिच्या डोळ्यांसमोर चाचाने मोठ्या मेहनतीने उभारलेली दोन्ही देवघरं पुन्हा पुन्हा येत होती. 

आता तर आम्हीही बदलापूर सोडलं आहे. आता ते घरही नाही आणि ते देवघरही नाही. पाच सहा वर्षांपूर्वी ज्या अवस्थेत अल्ताफ चाचा दिसला होता, त्यावरून कुणास ठाऊक तो तरी आहे की नाही...

अल्ताफ चाचा... मंदिर वोही बनायेगा.

....रसप....

प्रसिद्धी - मासिक 'श्री. व सौ.' - जुलै २०१५

Sunday, October 26, 2014

क्रॅपी न्यू इअर - (Movie review - Happy New Year)

घराजवळ एक हॉटेल आहे. साधंसंच. तिथले कटलेट मला जाम आवडतात. परवा मी माझे आवडते 'कटलेट' खात असताना एक मित्र आला. मी त्याला म्हटलं की 'तूही घे, मस्त असतात.' पण त्याने नाही म्हटलं.
नंतर माझं खाऊन झाल्यावर म्हणाला की, 'तुला माहित आहे का हॉटेलात कटलेट कसे बनवतात ?'
मी म्हटलं, 'नाही !'
'इतर भाज्या वगैरे बनवताना गॅस शेगडीजवळ जे सांडलेलं असतं ना ? ते गोळा करतात अन् देतात 'कटलेट' म्हणून शिजवून. आणि तुझ्यासारखे मूर्ख मस्त मिटक्या मारत खातात !'
हे खरं की खोटं, माहित नाही. पण आता मी आयुष्यात कधी 'कटलेट' हा प्रकार खाऊ शकणार नाही. काय सांगावं ! भटारखान्याच्या बंद दरवाज्याआड काय काय चालत असेल ! आपण शुद्धतेची खात्री मानून जे खातो, त्याच्याकडून किमान स्वच्छतेची अपेक्षा करावी, इतपत तरी त्याची योग्यता असेल का ?
अपेक्षा ! खरं तर अपेक्षा करणंच कधी कधी चूक असतं. इतकेच चोचले असतील तर जावंच कशाला थेटरात ? सॉरी.. हॉटेलात !
Actually थेटरात पण. हो ना ! 'मैं हूँ ना' आवडला म्हणून 'ओम शांती ओम' पाहिला. ठीक वाटला. तरी 'तीस मार खान' पाहिला. भंकस वाटला. त्या नंतरही मी अपेक्षा ठेवली की फराह खान भावापेक्षा बरी असेल आणि 'हॅपी न्यू इअर' पाहिला.
तर काही इंग्रजी सिनेमांच्या भटारखान्यात जमिनीवर सांडलेलं, पाय पडलेलं खरकटं कथानक आणि 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'मैं हूँ ना', 'चक दे इंडिया' वगैरे बनवताना शेगडीबाहेर जे सांडलं होतं ते गोळा करून संवादाचे कटलेट्स माझ्यासमोर आले. गेल्या कित्येक सिनेमांत निव्वळ धांगडधिंगा शिजवताना विशाल-शेखरकडून जे ओघळ उतरून खरपुड्या झाल्या होत्या, त्यांची गाणी बनवलीत.
खरं तर गेल्या काही काळापासून, खास करून धूम -३ नंतर आमीर खान जाम डोक्यात जायला लागला आहे. सलमान खान तर इतका दाक्षिणात्य झाला आहे की आता त्याच्या तोंडी हिंदी डायलॉग (जे त्याला असंही येतच नाही) अजिबातच शोभेनासे झालेत. त्यामुळे आत्ता कुठे मला खानांतला शाहरुखच त्यातल्या त्यात बरा आहे असं वाटायला लागलं होतं. म्हणून हा 'क्रॅपी न्यू इअर' बघायला गेलो, तर 'जतहैंजा'चा ओंगळवाणा गेट-अप शिजवून झाल्यावर जी बरबट भांड्यांना राहिली होती, ती थापलेला अगदी रोगट दिसणारा शाहरुख समोर आला.
बरं हे सगळं तब्बल तीन तास सहन करावं लागलं. कटलेटवर कटलेट, कटलेटवर कटलेट डोक्यावर थापत जाऊन डोक्याचं भलं मोठं भजं झालं आणि पायाच्या करंगळीच्या नखापर्यंत तेलकट ओघळ घेऊन मी जेव्हा घरी परतलो, तेव्हा मी परत आल्यासारखा परतलेला नव्हे तर कढईत परतल्यासारखा परतलेला दिसत होतो.

मित्राने कटलेटची रेसिपी माझं खाऊन झाल्यावर सांगितली, पण मी ती चूक करणार नाही. म्हणून मी फराह खानच्या कटलेटची रेसिपी आधीच सांगून ठेवतो.

उदरनिर्वाहासाठी 'स्ट्रीट फाईट्स' करणारा 'चार्ली' (शाहरुख) वडिलांना - मनोहरला - (अनुपम खेर) त्यांच्या हाय एंड तिजोऱ्या बनवण्याच्या धंद्यात फसवणाऱ्या चरण ग्रोव्हर (जॅकी श्रॉफ) चा वचपा काढण्यासाठी आसुसलेला असतो. वडिलांचे मित्र टॅमी (बोमन इराणी) आणि जॅग (सोनू सूद) सुद्धा त्याच बदल्याच्या आगीत होरपळत असतात. ती संधी त्यांना मिळते. ग्रोव्हरने ३०० कोटीचे हीरे, मनोहरकडून घेतलेल्या 'शालीमार' तिजोरीत ठेवले असतात. ही तिजोरी लुटायचा प्लान बनवला जातो. पण तिजोरी लुटण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात.
१. तिथपर्यंत जाणे फक्त ग्रोव्हर व त्याचा मुलगा विकी( अभिषेक बच्चन)लाच शक्य असते. म्हणून विकीचा डुप्लिकेट नंदूला उचललं जातं.
२. तिजोरीभोवती असलेलं लेजर किरणांचे संरक्षक कडं भेदायला एक हॅकरही हवा असतो म्हणून अजून एक मेंबर 'रोहन' (विवान शाह) हा (बहुतेक) जॅगचा पुतण्या (की भाचा) टीममध्ये घेतला जातो.
जिथे हीरे ठेवलेले असतात तिथे 'वर्ल्ड डान्स चॅम्पियनशिप' होणार असते. मग डान्स शिकवण्यासाठी मोहिनी (दीपिका) हेरली जाते.
अशी ही सहा जणांची टीम बनते. ती आचरट चाळे करून वात आणते.

फक्त हा आचरटपणाच जर त्यांनी ग्रोव्हरसोबत केला असता, तरी त्याने त्यांना स्वत: होऊन ३०० कोटीचे हीरे दिले असते आणि माफीही मागितली असती. पण त्यांना त्याला वात आणायचा नसतो, तर त्याची वाट लावायची असते म्हणून ते तसं न करता चोरीच करायचं ठरवतात. त्या चोरीचं पुढे काय होणार, 'वर्ल्ड डान्स चॅम्पियनशिप'चं काय होणार, हे सगळं आपल्याकडे बॉलीवूडी कटलेट्सचा तगडा अनुभव असल्याने कुठलाही आश्चर्याचा धक्का वगैरे देत नाही.



विनोद म्हणून नंदूला हुकमी उलटी करणारा दाखवणं, हा विनोदाचा ओकारी आणणारा किळसवाणा प्रकार आणि 'वर्ल्ड डान्स चॅम्पियनशिप' बोलताना तोंडावर हात फिरवणं, तोंडात ब्रश केल्यासारखं बोट फिरवणं वगैरे तर पांचटपणाचा कळसच होता ! एकंदरीतच विनोदाचे सगळेच प्रयत्न एक तर केविलवाणे किंवा हिणकस आहेत.
झगमगाट आणि भडक रंगांची उधळण काही जणांचे डोळे सुखावते, दीपवते. मला तर ते पैश्याचं विकृत प्रदर्शन वाटलं. सौंदर्याला मेक अप आणि दागदागिन्यांनी मढवल्यासारखं मला वाटलं नाही, तर त्याच्या बोज्याखाली दबल्यासारखं वाटलं.

ओरिजिनल असलं, नसलं तरी एक बरं कथानक होतं. पण केवळ ढिसाळ हाताळणी आणि प्रदर्शनाच्या आहारी गेलेली कल्पकता ह्यामुळे तीन तासाचं वाटोळं होतं.
'मनवा लागे..' आणि 'इंडियावाले' ही दोन गाणी फक्त मुखड्यात छान आहेत. त्यानंतर विशाल-शेखर 'ये रे माझ्या मागल्या' करत नेहमीचीच ओढाताण किंवा धिंगाणा करतात.

कोरड्या दुपारच्या रखरखाटात अचानक कुठूनशी एखादी थंड हवेची झुळूक यावी, तशी अधूनमधून दीपिका दिसते आणि क्षणभराचा दिलासा मिळतो.
बोमन इराणी शेवटी 'बोमन इराणी' आहे, त्यामुळे सगळ्या हाराकीरीतही तो तग धरतोच.
अभिषेक बच्चन कबड्डी आणि फुटबॉलच्या मैदानावरच चांगला अभिनय करत असतो का ?
शाहरुखने सलमान किंवा आमीर बनायचा प्रयत्न न करता शाहरुखच राहावं, असं माझं प्रांजळ मत आहे. पोटावर अठ्ठावीस पॅक्स आणले तरी आधी 'हेल्दी' दिसणं महत्वाचं असतं. सोनू सूद आणि शाहरुख दोघेही ह्या सिनेमात भरपूर अंगप्रदर्शन करतात. पण ते फक्त एकालाच 'शोभतं'.

असो.
थेटरमध्ये उसळलेली गर्दी, हॉलमध्ये शिट्ट्या आणि हाळ्यांचा पाऊस ह्यावरून हे तर निश्चित की कितीही भिकार असलं तरी हे कटलेट 'कोटीचं उड्डाण' करेलच, पण म्हणून त्याला चविष्ट म्हटलंच पाहिजे असं थोडीच आहे ?

रेटिंग - धूम -३ पेक्षा जरासा बरा

Monday, October 20, 2014

अस्वस्थ

खिडकीत अवेळी रात्र थबकली आहे
क्षणभरास अविरतता व्याकुळली आहे
हा दूर सांडला निर्जन काळा रस्ता
उद्विग्न दिव्यांची रांग लागली आहे

फुटपाथावर खुरट्या गवताची पाती
अन् इमारतींतुन मिणमिणणाऱ्या वाती
जगण्याची आवड कधी न सुटली आहे
लाचार जिवांची रांग लागली आहे

दगडांसम इकडे-तिकडे मनुष्य केवळ
मानवतेचा सर्वत्र कोरडा ओघळ
झोपड्या, घरांची रेल चालली आहे
भरगच्च डब्यांची रांग लागली आहे

प्रत्येक मनाची केली लाही लाही
आयुष्याची ना कळे अपेक्षा काही
ना धूर दिसे पण आग पेटली आहे
बस् अवशेषांची रांग लागली आहे

कुणि नजर एकटी स्तब्ध गोठली आहे
पडद्यामागे अगतिकता अडली आहे
कित्येक 'आज' डोळ्यांच्या देखत गेले
कित्येक उद्यांची रांग लागली आहे

....रसप....
२० ऑक्टोबर २०१४

Thursday, October 16, 2014

क्षणैक कवडसा (डॉ. प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो)

कुठलाही चित्रपट, जर प्रदर्शित झाल्यापासून पहिल्या २-३ दिवसांत वेळ मिळाला, तरच मी थियेटरमध्ये जाऊन बघत असतो. त्यातही मराठी चित्रपटांच्या खेळांच्या वेळा अक्कलहुशारीने निवडलेल्या असल्याने (जर तो बहुचर्चित नसेल तर) अनेकदा जुळून येत नाहीत. त्यामुळे ते पाहिले जात नाहीत. 'डॉ. प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो' हा चित्रपट पहिल्या दोन दिवसांत बघता आला नाही. पण नंतरच्या दोन दिवसांत अत्यंत टोकाचे दोन रिव्ह्यू, दोन विश्वासार्ह मित्रांकडून ऐकण्यास आले आणि मग चित्रपट बघायचं ठरवलं. मतदानाच्या सुट्टीचा योगही जुळून आला आणि प्लान आखला गेला.

चित्रपटगृहाच्या आवारात असलेल्या पार्किंगमध्ये गाडी नेत असताना प्रचंड गर्दी दिसून आली. प्रथम मला असं वाटलं की बाजूलाच एका पक्षाच्या नेत्याचे संपर्क कार्यालय असल्याने ही गर्दी असावी. पण गाडी लावेपर्यंत समजुन आलं की ही चित्रपटासाठीचीच गर्दी आहे. दुसरा अंदाज असा होता की कदाचित ही गर्दी 'हैदर'साठी असेल. पण तिकीट खिडकीवर गेल्यावर कळलं की 'डॉ. प्रकाश आमटे'चीच ही गर्दी आहे आणि शो हाउसफुल आहे ! माझं तिकीट आधीच काढलं असल्याने मला चिंतेचं कारण नव्हतं, पण अनेक जण तिकीट न मिळाल्याने परत फिरत होते.

एखाद्या वनराईतून डोकं वर काढणारं एखादं उंच झाड असतं किंवा लांबच लांब पसरलेल्या खडकाळ, ओसाड भूभागावर एखादंच झाड निर्धाराने उभं असतं, त्या प्रमाणे लाखो करोडो लोकांच्या भाऊगर्दीतून एखादीच व्यक्ती असते जी स्वत:चं वेगळं अस्तित्व सिद्ध करते, वेगळा ठसा उमटवते आणि स्वत:च्या मानुषतेचं सार्थक करते. प्रसिद्धीच्या अत्युच्च शिखरावर पोहोचलेले खेळाडू असोत किंवा रसिकांच्या हृदयात वास करणारे कलाकार असोत किंवा लाखो लोकांचे पोशिंदे बनलेले कुणी उद्योजक असोत किंवा पराकोटीचा संघर्ष करून परिस्थितीशी झगडा करत तिला झुकण्यास भाग पाडणारे कुणी समाजसेवक. असे सगळेच लोक स्वकर्तृत्वाच्या जोरावर असं स्थान प्राप्त करतात की खुद्द ह्या सृष्टीच्या निर्मात्यालाही स्वत:च्या ह्या सृजनाचा गर्व व्हावा. अशीच दोन नावं म्हणजे' डॉ. प्रकाश आमटे' आणि 'डॉ. मंदाकिनी आमटे'.

ज्या काळात वैद्यकीय सेवा, ही सेवा न होता मेवा खाण्याचा एक बाजार झाला आहे, त्या काळात एक डॉक्टर जोडपं भयानकतेची पातळी गाठलेल्या प्रतिकूल परिस्थितीशी, ती परिस्थिती ओढवलेली नसताना लढा देतं, ही बाब जितकी वाटते, त्यापेक्षा किती तरी अधिक पटींनी कठीण आहे. 'पाण्यात पडलं की पोहता येतं', 'आली अंगावर, घेतली शिंगावर', 'आलिया भोगासी असावे सादर' वगैरे वचनं आपण ऐकतो, वाचतो आणि ऐकवतही असतो. कठीण परिस्थितीवर मात करण्याचं बळ ती परिस्थिती स्वत:च देते. पण, जेव्हा हे भोग आपल्या वाट्याचे असतात, तेव्हा ह्या सगळ्या वचनांचं मोल आहे. लष्करच्या भाकऱ्या भाजणाऱ्यांना प्रतिकूल परिस्थितीबद्दल निराशा व्यक्त करण्याचासुद्धा अधिकार नसतो कारण त्यांनी ती आपण होऊन स्वीकारलेली असते. म्हणूनच कुठल्याही लहान मोठ्या शहरात स्वत:ची वैद्यकी सुरु करता येत असतानाही आणि एक सुरक्षित सुखकर आयुष्य मिळण्याची शाश्वती असतानाही त्याचा त्याग करून स्वत:चे आयुष्य दुर्गम भागातील आदिवासींच्या उत्कर्षासाठी वाहून घेणारे डॉ. आमटे पती-पत्नी सृष्टीच्या असामान्य सृजनाचे जिवंत रूप आहेत. अशी असामान्य कहाणी ऐकताना, पाहताना जर काळीज हेलावलं नाही, तरच नवल ! सर्वसभवती एकाहून एक भ्रष्ट, नतद्रष्ट व दुष्ट प्रवृत्तींचेच दर्शन होत असताना, त्याच वेळी त्याच भागाच्या कुठल्याश्या एका कोपऱ्यात एक प्रवृत्ती सर्वसमर्पण भावाने कार्य करते आहे; ह्याची जाणीव जेव्हा होते, तेव्हा समजुन येतं की हजारो वाईटांना पुरून उरेल इतकं काम एकेक चांगली व्यक्ती करत असते म्हणूनच सृष्टीचा समतोल ढळून अजून तरी विनाश ओढवलेला नसावा.


'द रियल हीरो' बघताना अनेक प्रसंग अंतर्मुख करतात, अंगावर काटा आणतात, नि:शब्द करतात, विस्मयचकित करतात, कारण हा चित्रपट डॉ. आमटे पती-पत्नीची कहाणी सांगतो. पूर्ण नाही, तरी बहुतांश सांगतो. त्यापुढे तो जात नाही.
सर्व कलाकारांचा सशक्त अभिनय ही ह्या चित्रपटाची एक अविभाज्य जमेची बाजू आहे. डॉ. आमटेंची भूमिका नाना पाटेकर जगला आहे. एरव्ही अत्यंत आक्रमक अभिनय करणारा नाना इथे मात्र कुठल्याच प्रसंगात अंगावर येत नाही. एका आदिवासी महिलेची प्रसूती शस्त्रक्रिया केल्यानंतरच्या एका दृश्यात दिसलेल्या नानाला बघताना आपल्या नकळतच आपण मनातल्या मनात एक सलाम ठोकतो किंवा दंडवत करतो.

तीच कथा सोनाली कुलकर्णीची. (वैयक्तिक मत सांगायचे झाल्यास मला सोनाली कुलकर्णी अतिप्रचंड आवडते. ती नुसती पडद्यावर दिसली तरी तिने माझ्यासाठी अर्धी बाजी मारलेली असते.) डॉ. मंदाकिनी आमटेंनी ज्या समर्थपणे डॉ. प्रकाश आमटेंची साथ त्यांच्या आयुष्यात दिली असावी, त्याच समर्थपणे सो-कुल नानाची साथ पडद्यावर करते. कहाणीत साहजिकच डॉ. आमटेंच्या भूमिकेतील नानाला अधिक वाव आहे, पण तरी तिची भूमिका सहकलाकाराची न राहता, प्रत्येक प्रसंगात तीसुद्धा जान आणतेच.

इतर सहकलाकारांची नावं मला माहित नाहीत. पण प्रत्येक लहान-मोठ्या व्यक्तिरेखेला साकारणारा प्रत्येक कलाकार स्वत:चं काम अत्यंत चोखपणे वठवतो. आदिवासींच्याच भूमिकेत वावरणारे आदिवासीही खूपच सहज वाटले.

संगीत व गीतांना मर्यादित वाव आहे. पण प्रार्थना अप्रतिम जुळून आली आहे.

पटकथा, दिग्दर्शन व चित्रणात मला पूर्णपणे समाधान मिळालं नाही. आधीच सांगितल्याप्रमाणे ही कहाणीच एका महान व्यक्तिमत्वाची आहे, त्यामुळे त्या कहाणीत जात्याच दम आहे. पण तिला अजूनही खूप चांगल्याप्रकारे सादर करता आलंच असतं. उदाहरणार्थ - आदिवासींना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी झगडणारे डॉ. आमटे पती-पत्नी दोन वर्षांच्या अथक प्रतीक्षा व परिश्रमांनंतर विश्वास निर्माण करण्यात यशस्वी होतात आणि नंतर त्यांना वैद्यकीय सुविधा पुरवण्याचं काम करतात. ही कहाणी सुरु असताना अचानक त्यांनी अनेक पशुंचे पालन, संवर्धन केलं असल्याचं समोर येतं. हे प्राणी कसे आले, कुठून आले ह्याचं काहीही चित्रण चित्रपटात नाही. सुरुवातीस, 'जखमी प्राण्यांना घेउन आलो' वगैरे किरकोळ उल्लेख आहे, पण प्रत्यक्ष कथनात मात्र एकदम अनेक मोठे मोठे पिंजरे, त्यात चित्ते, वाघ, हरणं, माकडं अचानकपणे येतात. तसंच, वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी सरकारकडून पैसे मिळाले असावेत, मात्र ह्या पशूसंवर्धनासाठी लागणारा प्रचंड मोठा निधी उभारणेही एक खूप मोठा संघर्ष असला असणार आहे. ह्या संघर्षाला कहाणीमध्ये पूर्णपणे फाटा देण्यात आला आहे.

चित्रणाच्या बाबतीतही खूप कमतरता वाटल्या. अगदी सुरुवातीला नानासोबत चालणारा वाघ दाखवला आहे. त्या दृश्याचा खोटेपणा ठळकपणे जाणवतो. डॉ. आमटे अमेरिकेत जातात, तेव्हा तिथल्या उंच इमारती व रस्त्यांवर फिरवलेला कॅमेरा तर अक्षरश: चुकून फिरल्यासारखा वाटला ! अश्याच प्रकारे अजूनही काही जागी चित्रणातील उणीवा खटकतात. हे कदाचित उपलब्ध आर्थिक निधीच्या मर्यादांमुळे असलं, तरी 'आहे' हे नाकारता येत नाही आणि खटकणेही दुर्लक्षता येत नाही.

दोन टोकाच्या प्रतिक्रिया ऐकल्यावर माझी स्वत:ची प्रतिक्रिया दोन्हींच्या मधली असणं, हे कदाचित संयुक्तिकही आहे आणि तसंच झालं आहे. मला हा चित्रपट एक शिकवण म्हणून एकदा पाहावा, आपल्या लहानग्यांना दाखवावा असा वाटला. पण मी माझ्या संग्रहात हा ठेवणार नाही, मला तो अप्रतिम, अद्वितीय असा वाटला नाही. डॉ. आमटेंचं जीवन एक प्रकाशवाट असेल, तर हा चित्रपट केवळ एक कवडसा आहे आणि तोही क्षणैक.

रेटिंग - * * १/२

....#रसप....

Sunday, October 12, 2014

ती माझ्याशी बोलत नाही

ती माझ्याशी बोलत नाही
मी माझ्याशी बोलत नाही

तिची छबी दाखवा मलाही
जी माझ्याशी बोलत नाही

देव मुका अन् बहिरा आहे
की माझ्याशी बोलत नाही ?

छत्रपती मावळ्यांस म्हणतो
श्री माझ्याशी बोलत नाही

स्वप्न एव्हढे रोज पाहतो
'ही' माझ्याशी बोलत नाही ! :P

....रसप....
११ ऑक्टोबर २०१४

Sunday, October 05, 2014

हैदर - एक अश्वत्थामा ? (Movie Review - Haider)

बर्फाचा रंग कोणता ?
पांढरा ?
असेल. पण काश्मीरच्या बर्फाचा रंग लाल आहे. रक्ताचा लाल. १५-२० वर्षांपूर्वीपर्यंत तर काश्मीरचे रस्ते, झाडं, घरं सगळंच लाल होतं. वर्षानुवर्षं, पिढ्यान् पिढ्या धुमसत राहिलेला हा भाग. त्याला नंदनवन म्हणून अभिमानाने शिरपेचातल्या तुऱ्याप्रमाणे मिरवतो आपण, पण ह्या नंदनवनात शांतता व सुरक्षित वातावरण अभावानेच नांदलं. असुरक्षिततेच्या झाडाला असंतोषाची विषारी फळं येत असतात आणि हिंसेच्या उष्ण हवेने बदल्याच्या भयंकर आगी भडकत असतात. हा इतिहास आहे आणि एक वैश्विक सत्यही. पाचही इंद्रियांच्या जाणिवांतून एका निष्पाप मनांत जेव्हा असंतोषाचं विष झिरपतं आणि डोक्यात बदल्याची आग पेट घेते, तेव्हा एक 'हैदर' बनत असतो.

हैदर.
शेक्सपियरच्या सुप्रसिद्ध 'हॅम्लेट'वर आधारलेला आहे, हे आपल्याला माहित असतंच. पण बहुतेकांनी फक्त 'हॅम्लेट' हे नाव ऐकलेलं असतं, त्याचं कथानक काय आहे, हे खरं तर बऱ्याच जणांना माहित नसतं. त्यामुळे 'हैदर' बघत असताना आपण पूर्वतयारीनिशी नसतो. 'हॅम्लेट' ही सत्तेच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर झालेली एक भावनिक व नात्यांची ओढाताण होती. दोन शत्रूराष्ट्रे, त्यातील एकाच्या राजाचा त्याच्याच भावाकडून खून, मग राणीशी त्याने लग्न करणं आणि मग खून झालेल्या राजाच्या मुलाचं परतणं, अश्या वळणांनी 'हॅम्लेट' एका शेक्सपियरियन शोकांतापर्यंत जातं. विशाल भारद्वाजने ह्या कहाणीचे भारतीयीकरण करताना निवडलेली काश्मीरची पार्श्वभूमी 'काश्मीर, १९९५' ह्या इतक्याच शब्दांतून अर्धी कहाणी सांगते. उरतो तो फक्त भारतीय हॅम्लेटचा - 'हैदर'चा - सिस्टीमशी, कुटुंबाशी, मित्रत्वाशी, प्रेमाशी आणि स्वत:शी संघर्ष.

तो नेमका काय व कसा ? हे पडद्यावर बघत असताना काश्मीरचे बर्फाळ पर्वत, झुळझुळ वाहणारी झेलम, लाकडी घरं प्रत्येक फ्रेममध्ये सौंदर्याची भीषणता ठळकपणे दाखवत राहतात. चित्रपट जरासा रेंगाळतो, पण तिथल्या आयुष्याच्या एका मंद तणावपूर्ण गतीशी त्याचं नातं तुटत नाही. तरी एक गाणं व काही दृश्यं वगळता आली असती; हे मात्र नक्कीच.



सुरुवातीच्या काही चित्रपटांत शाहरुख खानची सही सही नक्कल करणारा शाहीद कपूर हळूहळू एक अभिनेता म्हणून परिपक्व होत जातो आहे. 'हैदर' ही त्याची आजवरची सगळ्यात आव्हानात्मक भूमिका, आणि ती त्याने जीव ओतून साकारली आहे. वेडेपण, संताप, निराशा वगैरे भावना त्याच्या डोळ्यांत पाण्याने रंग बदलावा त्या सहजतेने येतात. हरणारा हैदर साकारणारा शाहीद जिंकला आहे.
श्रद्धा कपूरला फारसा वाव नसला, तरी तिचा वावर आश्वासक आहे. 'एक व्हिलन'मधली तिची छोटीशी भूमिका तिने महत्प्रयासाने मोठी इरिटेटिंग केली होती. पण इथे मात्र विशाल भारद्वाजने तिच्यातली अभिनेत्री हुडकून वर आणली आहे.
इरफान खानची भूमिकाही लहानशी आहे, पण कितीही लहान असला तरी खरा हीरा लक्ष वेधून घेतोच. त्याची भूमिका जरा जास्त हवी होती, अशी चुटपूट मनाला लागते.
के के मेनन हा मला का कुणास ठाऊक पण ह्या काळातला बलराज साहनी वाटत आला आहे. उत्कटतासुद्धा संयतपणे सादर करता येऊ शकते, हे मेननचा अभिनय वारंवार सिद्ध करत आला आहे. हा एक असा अभिनेता आहे, जो कुठल्याही भूमिकेत अगदी सहज फिट्ट बसतो आणि कोणतीही व्यक्तिरेखा ताकदीने उभी करू शकतो. खरं तर, मी 'हैदर' बघण्याचं मुख्य कारण मेनन होता.
तब्बूला बऱ्याच दिवसांनी पडद्यावर पाहिलं आणि क्षणार्धात तिच्यात शबाना आझमीच दिसली. तिची अर्धवट विझलेली नजर चित्रपटभर छळते. तिची व्यक्तिरेखा एका गोंधळलेल्या असुरक्षित व्यक्तीची आहे. जिला नेमकं काय हवं आहे, हेच समजत नसावं आणि हवेवर उडणाऱ्या वाळलेल्या पानाप्रमाणे आयुष्य नेईल तशी स्वत:ची फरफट ती निर्विकारपणे सहन करत असते. हे अतिशय गुंतागुंतीचं भावविश्व तिने समर्थपणे आपलंसं करून प्रेक्षकापर्यंत पोहोचवलं आहे.

प्रत्येक चांगल्या कहाणीत एक अव्यक्त, अदृश्य उद्गार असतो. गंगा, यमुनेच्या संगमात सरस्वतीचाही प्रवाह मिसळत असतो, पण तो दिसत नाही. ही सरस्वती ओळखणं आणि तिच्या अदृश्यतेला हात न लावता तिचं अस्तित्व जपणं, कुठल्याही चांगल्या कहाणीला सादर करताना दिग्दर्शकासाठी खूप महत्वाचं असावं. 'हॅम्लेट'मधला अव्यक्त उद्गार विशाल भारद्वाजने ऐकला, समजुन घेतला आणि म्हणूनच 'हैदर' बनला आहे. मध्यंतरानंतरची धीमी गती व काही अनावश्यक दृश्यं हे जर गालबोट मानलं तर This is a monumental effort by Vishal Bhardwaj.

अखेरीस, हैदरच्या वडिलांना असलेलं गझल व शायरीचं वेड, हा भाग एका वेगळ्या अंगाने मस्त फुलवता आला असता. चित्रपटात 'हैदर'च्या तोंडी शायरी मिसिंग वाटली. 'हैदर' ही एक जखम आहे. न भरलेली, न भरणारी. अनेक हैदर अश्वत्थाम्यासारखे अशी एक जखम जपून आहेत आणि ठसठसत असूनही जपलेल्या जखमेतून मूकपणे कविता जन्म घेत असते. हैदरचीही एक कविता असणार, असायला हवी होती.

Having said this, 'हैदर' कदाचित बॉक्स ऑफिसवर कमाल करणार नाही पण चोखंदळ प्रेक्षकासाठी नक्कीच कमाल करेल. सर्वांनी बघावा, असं मी म्हणणार नाही; पण 'सर्वांनी' मध्ये जे स्वत:ला समजत नाहीत, त्यांनी मात्र नक्कीच बघायला हवा.

रेटिंग - * * * *

Tuesday, September 30, 2014

प्रिय ऑर्कुट..

प्रिय ऑर्कुट,

आज हा आपला अखेरचा संवाद.
मला आठवतंय, माझी तुझी ओळख ताईमुळे झाली आणि तुझ्यामुळे मला एक नवीन ओळख मिळाली. नवी कसली, जी काही आहे ती ओळख तुझ्यामुळेच मिळाली.
कुठे मालवाहतुकीचा नीरस, रुक्ष आणि खोटा किरकोळ धंदा करणारा मी एक व्यावसायिक, जो ड्रायव्हर, क्लीनर, हमाल, भंगारवाले वगैरे अभिरुचीहीन लोकांच्यात स्वत:चे परग्रहवासीपण समजुनही मन रमवायचा आटोकाट प्रयत्न करत होता आणि कुठे तुझ्यामुळे मला लाभलेल्या असंख्य कविमित्र-मैत्रिणींच्या सहवासात स्वत:च स्वत:ला नकळत गवसलेला आजचा मी !

मित्रा,

काळासोबत मी बदलत गेलो. आज जेव्हा मागे वळून पाहतो, तेव्हा माझ्यातला बदल मलाच अवाक करतो. मात्र तू बदलला नाहीस. किंवा असं म्हणू योग्य वेळी योग्य तितका बदलला नाहीस. मी लोंढ्यासोबत वाहत फेसबुकवर आलो. तुझ्यापासून दूर आलो ही तुला माझी कृतघ्नता वाटली का रे ? असेल तर त्यात काही गैरही नाही म्हणा. मी खूप प्रयत्न केला होता तुझी साथ न सोडण्याचा. पण शेवटी तुझ्यापुढेच मला हार मानायला लागली. तुझा रागही आला. जाम अडेलतट्टूपणा केलास, नाहीच बदलायचं म्हणालास. मी खूप सांगितलं तुला की वाहत्या प्रवाहासोबत कधी कधी वाहायलाच लागतं. एका जागी रुतून बसलं, तर झीज होऊन अस्तित्वाच्या खुणाही पुसल्या जातात. पण तुला वाटत होतं की तू बांध आहेस आणि ह्या प्रवाहाला थोपवणार आहेस. अखेरीस मला तुझा हात आणि तुझी साथ सोडावीच लागली.

असो.
मला कारणं द्यायची नाहीत आणि हा आता वाद करणेही निरर्थकच आहे. पण काय करणार ! आपलं नातंच तसं होतं. आजकाल मला असं वाटायला लागलंय की प्रत्येक नातं हे शेवटी एका जखमेतच रुपांतरीत होऊन संपत असतं बहुतेक. फरक इतकाच की काही जखमा हव्याहव्याश्या असतात तर काही बोचऱ्या. तुझी जखम आज बोचते आहे म्हणून बोलतो आहे. नसीर काजमी म्हणतात -

कुछ तो नाज़ुक मिज़ाज हैं हम भी
और ये चोट भी नई है अभी

पण मग जरा अजून विचार केल्यावर असंही जाणवतंय की तू चालला आहेस खरा, पण जाताना भरभरून देऊन जातो आहेस. किंबहुना, आधीच दिलेलं आहेस. त्यामुळे अशीसुद्धा खात्री वाटतेय की ह्या संपलेल्या नात्याची जखम हवीहवीशी असणार आहे. तुझी आठवण सुखदच असणार आहे. त्या जखमेच्या ठसठसण्यातही एक नशा असणार आहे.

तुझी आठवण येईल तेव्हा मला आठवेल -
माझी पहिली कविता..
माझी पहिली गझल..
माझं पाहिलं रसग्रहण..
माझी पहिली शिकवण..
माझे अनेक प्रयोग..
एकूणच तू म्हणजे माझ्या लेखनप्रवासाचा हमरस्ताच. आता रस्ता बदलला आहे, पण सुरुवात तूच करवली होतीस. कुठल्याही प्रवासाची दिशा, लक्ष्य, समाप्ती बदलू शकेल पण सुरुवात बदलणार नाहीच ना ? कारण शेवटी तो भूतकाळाचा भाग.

ऑर्कुट,
मी तर इथेच आहे. पण तू नसणार आहेस. मनात गैरसमज ठेवून गेलास तर बदलणार कसं ?
तुला एक सांगू का ? पटलं तर बघ. आयुष्य हे एक वर्तुळ आहे. ते पूर्ण होतंच. जिथून निघालो होतो, तिथेच परत पोहोचणार असतोच. माझी सुरुवात तुझ्यापासून झाली आणि कुणास ठाऊक शेवटही तुझ्यापाशीच होणार असेल. मी अखेरचा थांबीन, ती ओसरी तुझीच असेल कदाचित. एक नवा चेहरा घेउन येशील आणि आज मी जसा तुला निरोप देतो आहे, तसा तू तेव्हा मला देशील !

Lets see. Till then goodbye, mate !

चलते रहते हैं कि चलना है मुसाफिर का नसीब,
सोचते रहते हैं किस राह गुज़र के हम हैं;
अपनी मर्जी से कहाँ अपनी सफर के हम हैं
रुख हवाओं का जिधर का है उधर के हम हैं
(निदा फाजली)

Thanks a lot for everything you gave me.

तुझाच,

....रसप....





Tuesday, September 23, 2014

जाऊ विठू चल घरी..

बोलावते पंढरी
जाऊ विठू चल घरी

डोळे तुझी आरती
ओंजळ बनो कोयरी

चित्तास व्याधी तुझी
अन् तूच धन्वंतरी

जगतो मनापासुनी
मज्जाव आहे तरी

सोबत इथे फक्त मी
का यायचे ह्या घरी ?

आवळ स्वत:चा गळा
घे फास काळेसरी

तू बोल, थांबीन मी
मृत्यू मिळाला तरी

बोटावरी मोजल्या
मी पावसाच्या सरी

पाषाण काळा 'जितू'
अन् रेघ तू पांढरी

----------------------------------

जहरी नजर दे मला
बघशील तर तू खरी !

....रसप....
२३ सप्टेंबर २०१४

Saturday, September 13, 2014

गुदगुदुल्यांचा शोध पूर्ण (Movie Review - Finding Fanny)

'बीइंग सायरस', 'कॉकटेल' सारखे सिनेमे देणाऱ्या होमी अदजानियाचा आहे, त्यामुळे 'फाईण्डिंग फॅनी' बघणारच, असं काही दिवसांपूर्वीच ठरवलं होतं.

चित्रपटाची कथा काय आहे, हे मी सांगणार नाही कारण ती अगदी थोडीशीच आहे. त्यामुळे एक तर पूर्णच सांगायला लागेल किंवा थोड्यातली थोडीशी सांगितली तर अगदीच थोडी वाटेल. दोन्ही पटत नाही, त्यामुळे टाळतोच. फक्त तोंडओळख म्हणून इतकंच सांगतो की अँजेलिना (दीपिका पदुकोन), फर्डिनंट (नसीरुद्दीन शाह), डॉन पेद्रो (पंकज कपूर), रोझी (डिम्पल कापडिया) आणि सावियो द गामा (अर्जुन कपूर) ह्यांची ही कहाणी. हे पाच लोक 'फॅनी'च्या शोधात निघतात.... बस्स्. इतकंच. ह्यातलं कोण काय आहे? कसा आहे ? 'फॅनी' कोण आहे ? ती मिळते का ? वगैरे प्रश्न पडत असतील, तर पडू द्यावेत. त्याची उत्तरं तुम्हाला चित्रपट पाहुन मिळावीत अशी माझी इच्छा आहे !
निसर्गरम्य गोव्यात घडणारं हे कथानक. गोव्याला 'भूतलावरील स्वर्ग' किंवा 'God's own land' का म्हणतात, हे हा चित्रपट पाहुन कळेल. गोव्याचं इतकं सुंदर दर्शन घडतं की आत्ताच्या आत्ता उठावं आणि निघावं आठवडाभराच्या सुट्टीवर असंच वाटतं. मुख्य म्हणजे, हे सौंदर्य दाखवताना गोव्यातला समुद्र दाखवलेला नाही किंवा अगदीच जर कुठल्या फ्रेममध्ये दिसलाही असेल तरी माझ्या लक्षात राहिला नाही, इतकं किरकोळ. गोव्याचं समुद्ररहित दर्शन हे म्हणजे औरंगाबादच्या रस्त्यावर एकाही खड्ड्यात न जाता गाडी घरपर्यंत पोहोचणं इतकं अशक्यप्राय वाटत असेल, तर मात्र तुम्ही हा चित्रपट ज्या किंमतीत तिकीट मिळेल, त्या किंमतीत काढून बघायला हवा.

दीपिका पदुकोन ह्या चित्रपटाचं मुख्य 'व्यावसायिक' आकर्षण आहे, निर्विवाद. 'फाईण्डिंग फॅनी' मध्ये दिसलेल्या दीपिकाचं वर्णन अगदी अचूकपणे एका शब्दात होतं. 'सेक्सी'. तिचं बोलणं, चालणं, हसणं, बसणं, अगदी काहीही करणं निव्वळ दिलखेचक आहे. गालावरच्या खळीत तर मी किमान अडुसष्ट वेळा जीव दिला. पण पुन्हा पुन्हा जिवंत झालो कारण पुन्हा जीव द्यायचा होता.

रसिक प्रेक्षकांसाठी चित्रपटाचं अजून एक आकर्षण म्हणजे नसीरुद्दीन शाह व पंकज कपूर ह्या दोन तगड्या अभिनेत्यांना एकत्र पडद्यावर बघणं. लडाखला गेलो असताना हिमालयाच्या उत्तुंग पर्वतरांगांतली अनेक उंच उंच शिखरे पाहिली, अर्थातच दुरूनच. प्रत्येक शिखर दुसऱ्याला मान देऊन उभं असल्यासारखं वाटत होतं. नसीर व पंकज कपूर ही दोन शिखरंही अशीच जेव्हा जेव्हा समोरासमोर आली आहेत, एकमेकांना मान देऊन उंच उभी राहिली आहेत. तसंच काहीसं इथेही होतं. दोघांच्यातले जे काही संवाद आहेत, त्यात कुणीही दुसऱ्यावर कुरघोडी करायला पाहत नाही. दोघेही आपापल्या जागेवरून धमाल करतात.

डिम्पल कापडिया हा रोल तिच्याचसाठी असावा इतकी रोझी'च्या भूमिकेत फिट्ट बसली आहे. एका दृश्यात अपेक्षाभंगाचं व अपमानाचं दु:ख तिने अतिशय सुंदर दाखवलं आहे.  

दुसरीकडे अर्जुन कपूर त्याला कुठलाही रोल दिला तरी काहीही फरक पडणार नाही, हे दाखवून देतो. चविष्ट जेवणाचा मनापासून आस्वाद घेत असताना अचानक दाताखाली खडा येऊन होणारा रसभंग अर्जुन कपूर पडद्यावर येऊन वारंवार करतो. त्याच्याकडे पाहुन हा अजून 'टू स्टेट्स'मध्ये आहे की 'गुंडे'मध्ये आहे की 'इशक़जादे'मध्ये की अजून कुठला आलेला असल्यास त्यात आहे हे कळत नाही. त्याच्यासाठी सगळी पात्रं सारखीच आहेत.

निखळ विनोदांची पेरणी करतानासुद्धा हास्याचा खळखळाट घडवला जाऊ शकतो, हे जर तुम्ही विसरला असाल तर तुम्ही 'फाईण्डिंग फॅनी' बघायलाच हवा. बऱ्याच दिवसांनी असा खळखळून हसवणारा हलका-फुलका चित्रपट आला आहे. विनोदाची पातळी कंबरेखाली गेलेली असताना किंवा विनोदाच्या नावाने नुसता पाचकळपणा चालत असताना किंवा एखाद्याच्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगल्याशिवाय विनोदनिर्मिती होत नसताना आलेला 'फाईण्डिंग फॅनी' मला तरी काही काळासाठी का होईना बासुदा, हृषिदांच्या जमान्यात घेउन गेला. मध्यंतरापर्यंत तर मी हा चित्रपट आजपर्यंत मी पाहिलेला सर्वोत्तम विनोदी चित्रपट ठरवला होता. पण मध्यंतरानंतर जराशी लांबण लागली आणि काही दृश्यं व विनोद वरिष्ठांसाठीचे असल्याने मी गोल्ड मेडलऐवजी 'सिल्व्हर' दिले आणि असं म्हटलं की,' हा आजपर्यंत पाहिलेल्या सर्वोत्तम विनोदी चित्रपटांपैकी एक आहे.'

आजकाल चित्रपटाचं संगीत मेलडीपासून दूर गेलं आहे. ह्या निखळ विनोदाला जर तरल, गोड चालींच्या संगीताची जोड मिळाली असती तर कदाचित मी हा चित्रपट पाठोपाठचे शोसुद्धा पाहिला असता, असा एक अतिशयोक्तीपूर्ण विचार मनाला स्पर्श करतो आहे. गोव्यातल्या कहाणीत 'माही वे' वगैरे शब्दांची गाणी का हवी? असा विचार करायला हवा होता. पण ते किरकोळ.

होमी अदजानियाने ह्या चित्रपटापासून माझ्या मनात तरी अशी 'इमेज' तयार केली आहे की केवळ त्याच्या नावावर चित्रपट बघायला जावा. 'बीइंग सायरस'मध्ये सायकोलॉजिकल थ्रिलर एका वेगळ्या पद्धतीने हाताळल्यावर, 'कॉकटेल'सारखा व्यावसायिक विषयही त्याने खूप संयतपणे हाताळला आणि एक निखळ विनोदी चित्रपट केला आहे. भीती एकच. 'सायरस'मध्ये असलेल्या सैफबरोबर त्याने 'कॉकटेल' केला आणि 'कॉकटेल'मधल्या दीपिकाबरोबर 'फाईण्डिंग फॅनी' केला. आता समीकरण पुढे नेण्यासाठी पुढील चित्रपट अर्जुन कपूरबरोबर करू नये !



हा चित्रपट मुळात इंग्रजीमध्ये बनला आहे. हिंदीतला चित्रपट डब केलेला असेल हे माहित नव्हतं त्यामुळे जुळवून घेईपर्यंत जरासा वेळ गेला. पण जर इंग्रजीत पाहिला तर जास्त मजा येईल, असंही वाटलं.

'फाईण्डिंग फॅनी' हा कुठला आत्मशोध नाही. पडद्यावर कुणाला काय मिळतं, काय नाही ह्यापेक्षा प्रेक्षकाला दोन घटका निर्भेळ आनंद मिळतो, हे जास्त महत्वाचं आहे. कामाच्या व्यापात गुरफटल्यावर आपल्याला अधूनमधून एक बेचैनी जाणवत असते. काही तरी हवं असतं, पण काय ते कळत नसतं. अश्यातच ३-४ दिवस लागून सुट्ट्या येतात आणि मित्रांसह एका सहलीचा प्लान बनतो. सहलीहून परतल्यावर आपल्याला समजतं की इतके दिवस आपल्याला काय हवं होतं.
गेले अनेक दिवस मीसुद्धा चित्रपटात काही तरी शोधत होतो. काय ते कळत नव्हतं. मी एक 'फाईण्डिंग फॅनी' शोधत होतो. काल तो शोध पूर्ण झाला. आता मी पुन्हा एकदा मसालेदार खाण्याला पचवायला तयार आहे.

रेटिंग - * * * *

Saturday, September 06, 2014

नो गोल्ड फॉर 'मेरी कोम' (Mary Kom - Movie Review)

'चक दे इंडिया' मध्ये एक दृश्य आहे. मिझोरमहून दिल्लीला भारतीय महिला हॉकी संघाच्या निवड चाचणीसाठी दोन हॉकीपटू येतात. आधी रस्त्यावरची मुलं, त्यांना चीनी समजून छेड काढतात आणि नंतर असोसिएशनचा अधिकारी त्यांना 'पाहुण्या' म्हणतो. ईशान्येकडील राज्यांतल्या भारतीयांची मूळ व्यथा हीच आहे. भारताच्या इतर प्रांतातील लोक त्यांना स्वत:सारखे मानत नाहीत आणि नकाश्यानुसार तर ते भारतात आहेतच ! एक प्रकारचा आयडेन्टीटी क्रायसिस. ह्याच्या जोडीला भौगोलिक मर्यादा आणि सततचे राजकीय व सामाजिक अस्थैर्य, असुरक्षितता. नुकतीच सुटका होऊन पुन्हा अटक झालेल्या इरोम शर्मिलांना पहा. गेल्या एका तपाहून अधिक काळ शर्मिला उपोषण करत आहेत. 'मणिपूर'मध्ये लष्कराकडून होणाऱ्या जाचाविरुद्ध, तिथे शांती नांदावी म्हणून.
असुरक्षित वातावरणात रोजगार, दळणवळण सुविधा सगळ्याचीच उणीव. त्यामुळे नजीकचे भविष्यच काय, हातावरचा आजसुद्धा अनिश्चित ! म्हणूनच राजकीय व सामाजिक अस्थैर्य असलेल्या प्रांतात सगळ्यात आधी भरडला व भरकटत जातो तो तिथला तरुण वर्ग.
अश्या एका अस्थिर वातावरणातून वर आली एम. सी. मेरी कोम. 'मेरी कोम' मधून तिच्या ह्या संघर्षावर व एकूणच बऱ्याच लोकांना बऱ्याच अंशी अनभिज्ञ असलेल्या ईशान्येकडील राज्यांतल्या विचित्र परिस्थितीवर भाष्य होईल, अशी एक माफक अपेक्षा घेऊन मी चित्रपट पाहायला गेलो आणि लक्षात आलं की कदाचित ही अपेक्षा माफक नव्हती, खूपच जास्त होती.

धावपटू मिल्खा सिंगवरील 'भाग मिल्ख भाग'मध्ये भारत-पाकिस्तान फाळणीच्या रक्तपातात, संहारात बालपण उद्ध्वस्त झाल्यावरही अथक मेहनतीच्या जोरावर परिस्थितीवर मात करून देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या एका खेळाडूची कहाणी होती. 'मेरी कोम'ची सुरुवातही एक प्रखर संघर्षमय वाटचाल दाखविली जाणार आहे, असा एक आभास निर्माण करते. दुर्दैवाने, शेवटपर्यंत तो आभास, आभासच राहतो आणि ही कहाणी एका महिला क्रीडापटूच्या कौटुंबिक संघर्ष व फेडरेशनच्या अधिकाऱ्यांशी होणाऱ्या संघर्षापुढे जातच नाही. मध्यंतरापर्यंत चित्रपट सतत अशी आशा दाखवत राहतो की १०० वर्षांत ज्या विषयाला, ज्या संघर्षाला हिंदी चित्रपटात कुणी स्पर्शही केला नाही, तो इथे दाखवला जाईल, पण तसं होत नाही आणि चित्रपटाचा पूर्वार्ध केवळ एक डॉक्युमेंटरी वाटतो.
उत्तरार्धात कहाणीत जरा 'कहाणी' येते. पण कथानकाची सगळी वळणं नेहमीचीच असतात आणि अपेक्षाभंगाची पूर्तता होते.

व्यावसायिक जीवन व कौटुंबिक जीवन ह्यातला संघर्ष कमी अधिक प्रमाणात आपण सगळेच करत असतो. व्यावसायिक आयुष्य जितकं विशाल होतं, तितकाच हा संघर्षही प्रखर होतो आणि तो प्रत्येकालाच करावा लागतो. एक उदाहरण अगदी लगेच आठवलं. १९९९ च्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान सचिन तेंडूलकरच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी सचिन इंग्लंडहून मुंबईला आला आणि अंत्यविधी पूर्ण झाल्यावर लगेच परतलासुद्धा ! तो परत आल्यावर दुसऱ्या दिवशी भारताचा झिम्बाब्वेशी सामना होता. त्या सामन्यात त्याने शतक झळकावले. सतत फिरतीवर असणाऱ्या खेळाडूंना 'वर्क-लाईफ' बॅंलन्स जुळवणं नेहमीच कठीण असतं. मेरी कोम ह्यांच्या लग्नामुळे त्यांच्या बॉक्सिंग कारकीर्दीत आलेला एक स्वल्पविराम, नंतर त्यांच्या जुळ्या मुलांच्या संगोपानामुळे होणारी ओढाताण, त्यावेळी पतीने दिलेला आधार, मुलाच्या आजारपणामुळे जीवाला लागलेला घोर ह्या बाबींवर चित्रपट केंद्रित केल्याने, चित्रपटाच्या विषयामुळे एका अत्यंत संवेदनशील समस्येला वाचा फोडण्याची संधी माझ्या मते वाया गेली आहे.


प्रियांका चोप्राने एक सुजाण अभिनेत्री म्हणून गेल्या काही वर्षांत स्वत:ला वारंवार सिद्ध केले आहे. ह्या भूमिकेतही ती जीव ओतते. तिची मेहनत खांदे, दंड व हाताच्या टरटरलेल्या स्नायूंतून रसरसून दिसते. भाषेचा लहेजाही तिने चांगलाच आत्मसात केला आहे (असावा). एका आव्हानात्मक भूमिकेला तिने पूर्णपणे न्याय दिला आहे आणि पटकथेत, संवादांत असलेल्या काही उणीवांना एक प्रकारे भरून काढलं आहे.

मेरी कोमच्या पतीच्या भूमिकेत 'दर्शन कुमार' आणि प्रशिक्षकाच्या भूमिकेत 'सुनील थापा' लक्षात राहतात.
भाजणीचं थालीपीठ तव्यावर असताना त्याचा एक मस्त खमंग सुवास घरभर पसरतो, पण पहिला घास घेतल्याबरोबर ती चव वासाच्या खमंगपणासमोर कमी पडते आणि माझा तरी अपेक्षाभंग होतो. आवडत नाही, असं नाही. पण अजून खूप काही तरी हवं असतं. 'मेरी कोम' हा विषय व चित्रपटाचे ट्रेलर ह्यांमुळे एक वेगळी अपेक्षा मनात घेऊन गेलो होतो आणि असाच एक अपेक्षाभंग वाट्यास आला. ईशान्येकडील भागाचं सुंदर दर्शन (तिथेच चित्रीकरण झाले असावे, असे गृहीत धरून) घडतं, पण त्या सौंदर्याच्याआड असलेलं एक अप्रिय वास्तव समोर येत नाही. आपण चित्रपटगृहातून एम. सी. मेरी कोम ह्या स्त्रीच्या 'स्त्री' म्हणून वैयक्तिक संघर्षाला बघून हळहळत बाहेर येतो आणि पुन्हा एकदा सेव्हन सिस्टर्सबद्दल औदासिन्यच मनात रुजवतो.

एक वेगळा विषय, त्याला पूर्णपणे न्याय दिला गेला नसला तरी, हाताळल्याबद्दल बहुतेकांना हा चित्रपट आवडेल. त्याला समीक्षकांकडून चांगले शेरेही मिळतील, पण माझ्या डोळ्यांसमोर मात्र असह्य प्रसववेदना सुरु झालेल्या असताना, बाहेरील अशांत वातावरणात लपतछपत हॉस्पिटलला जाण्याचा प्रयत्न करणारे सुरुवातीच्या दृश्यातील नवरा-बायकोच आत्तासुद्धा येत आहेत. त्यांना न्याय मिळाला नाही.

रेटिंग - * * *

Monday, September 01, 2014

गलिच्छ

फुटपाथावर,
रस्त्यावरती
ठेले लावुन
भाजीवाले
कपडेवाले
गॉगलवाले
कुलूप-किल्ल्या
खेळ-खेळणी
चप्पल-बॅगा
अजून काही
विकणारे अन्
त्यांच्या पुढ्यात
चिकचिकलेली
थबथबलेली
गलिच्छ गर्दी

जरा थांबुनी
नीट पाहिले
त्या ठेल्यांच्या
अवतीभवती
भडक चेहरे
चोपडलेले
गच्च शरीरे
ताठरलेली
निर्जल डोळे
खुणावणारे
काही लंपट
घुटमळणारे
एकच बरबट
ओशट ओंगळ
गजबजलेली
बजबजलेली
कळकटलेली
गलिच्छ गल्ली

बाजाराचा
माल कोणता
समजुन आले
शहार दाबुन
इकडे तिकडे
हळुच पाहिले
गाड्या होत्या
माड्या होत्या
काही बारिक
जाड्या होत्या
एक पाहिली
अल्पवयाची
नजर चोरटी
खमकी झाली
पायापासून
वरती नेली
थांबत थांबत
अन् आस्वादत

सात्विक सदरा
पाहुन माझा
ती हसली पण,
तिच्या खुणेने
एकच म्हटले,
'गलिच्छ मी तर
गलिच्छ तूही..'
क्षणात आलो
मी भानावर
घाणीमध्ये
भरली चप्पल
तसाच ओढत
निघून आलो

आजही मला
पाउल माझे
डगमग करता
समोर दिसतो
माझी वखवख
जागवणारा
शुष्क, कोवळा
शून्य चेहरा
अजून छळते
अवतीभवती
गच्च शरीरे
वागवणारी
बरबटलेली
गलिच्छ गल्ली .

....रसप....
३० ऑगस्ट २०१४

Sunday, August 31, 2014

शुभ्र आभाळाचा एक तुकडा....

आदरपूर्वक, प्रेमपूर्वक एकेरी उल्लेख आपण सहसा मित्र, आई आणि देव ह्यांचा करत असतो. पण काही लोक असे असतात की त्यांच्यात कधी आपल्याला मित्राच्या खांद्याप्रमाणे आधार मिळतो. कधी आईच्या मायेचा ओलावा लाभतो. तर कधी एखाद्या दैवी अनुभूतीने प्रचंड बळही मिळतं. ह्या लोकांशी आपला वैयक्तिक परिचय नसतो. ते असतात कुणी खेळाडू, कलाकार, लेखक, नेते वगैरे. कदाचित, वैयक्तिक परिचय नसल्यामुळेच आपण त्यांना आपल्या नकळतच आपल्या मनात एक असं स्थान देऊन मोकळे होतो, जे आकाशातील ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ असतं. कोंदणातील हिऱ्याप्रमाणे खास, सुरक्षित असतं. असे काही लोक माझ्यासाठीही आहेत. त्यांतील प्रत्येक जण अनोखा हीरा आहे. ज्याच्या तेजाने मी पुन्हा पुन्हा दिपून जातो आणि कधी त्या जादुई प्रभेपुढे अभावितपणे नतमस्तक होतो, हात जोडतो, तर कधी त्यांच्या इतक्या जवळ ओढला जातो की त्यांना स्वत:चा किंवा स्वत:ला त्यांचा एक भागही समजू लागतो. ह्या सर्वांचा उल्लेख मी नेहमी एकेरीच करत असतो. त्यात मला त्यांचा अवमान केल्यासारखं वाटत नाही आणि इतका विश्वासही वाटतो की त्यांनाही त्यात गैर असं काही वाटणार नाही. कारण मित्र मित्राचा, मूल आईचा आणि भक्त देवाचा उल्लेख एकेरीच करत असतो.

'चित्रपट' हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. मला त्यातलं तांत्रिक व ऐतिहासिक ज्ञान फारसं नाही. पण मला चित्रपट व्हिस्की प्यायल्याप्रमाणे बघता येतो आणि आवडतंही. व्हिस्कीप्रमाणे म्हणजे घोट-घोट. पानांपानांवरून दवाचे थेंब जसे ओघळतात तशी चांगली व्हिस्की जिभेवर क्षणभर रेंगाळून गळ्यातून पोटात उतरते आणि तसाच चांगला चित्रपट कान व डोळ्यांद्वारे एकेका दृश्यातून माझ्या मनात झिरपतो.
ह्या चित्रपटाच्या आभाळाचा एक तुकडा असा आहे की त्याने शिंपडलेल्या दवाने माझ्या अंतरांगणाचा एक मोठा भाग ओथंबलेला आहे.
हा आभाळाचा तुकडा कधी 'मुसाफिर' बनतो अन् माझा हात पकडून 'मुझे चलते जाना है..' म्हणून अश्या दुनियेत फिरवून आणतो, जिथे -
दिन ने हाथ थाम कर इधर बिठा लिया
रात ने इशारे से उधर बुला लिया
- अश्याप्रकारे त्याला दिवस-रात्र खुणावतात. तर कधी 'यादों पे बसर' करणारा तो मला 'बस्तियों तक आते आते रस्ते मुड़ गयें' म्हणत 'उजडे हुये आशियाने' दाखवतो. कधी 'इक पल रातभर नहीं गुजरा'च्या भयाण व्यथेसोबतच तो 'तुम अकेलेही नहीं हो, सभी अकेले है' असा 'हाल मिल गया तुम्हारा अपने हाल से'चा दिलासा देतो, तर कधी 'सुस्तक़दम' रस्त्यांवरून 'पत्थर की हवेली से तिनको के नशेमन तक़' घेउन जातो. कधी तो एक मूक-बधीर अव्यक्त भावना कॅमेऱ्यात बांधतो, तर कधी रेल्वे स्टेशनच्या एका वेटिंग रूममध्ये भूतकाळाला उजळणी देतो. कधी रोगराईपुढे गुडघे टेकणाऱ्या मानव्याला हात देऊन उभं करणाऱ्या डॉक्टरची घुसमट दाखवतो, तर कधी राजकारण व सामाजिक आयुष्यामुळे वैयक्तिक आयुष्याची वाताहत करणारं वादळ दाखवतो.

कवी, गीतकार, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथालेखक अशी त्याची अनेक रूपं आहेत. मला मात्र 'कवी'पेक्षा त्याची इतर रूपं अधिक भावली. एक दिग्दर्शक म्हणून सत्तरच्या दशकापासून जवळजवळ ३० वर्षांत त्याने केलेल्या चित्रपटांना कधीच गल्लाभरू रूप नव्हतं. He was always ahead of his time. इजाजत, आंधी, कोशिश, मौसम, खुशबू सारख्या चित्रपटांद्वारे त्याने स्पर्श केलेले विषय कुणाही साध्या-सुध्याच्या कुवतीचे नव्हते. त्याच्यातला कवी त्याच्या दिग्दर्शनातून मला जास्त उत्कटतेने भेटला आहे.

शुभ्र, स्वच्छ कुडता-पायजमा आणि निर्विकार चेहऱ्यावर एक निर्मळ स्मितरेषा. एखाद्या योगी पुरुषाप्रमाणे वाटणारा 'गुलजार'. हाच तो आभाळाचा मूर्त तुकडा.
ती मूर्ती डोळ्यांसमोर आल्यावर असंच वाटतं की हा माणूस सुख-दु:खाच्या पुढे गेला असावा. कुठलंच दु:ख ह्याला तोडू, मोडू शकत नाही आणि कुठलंच सुख त्याला भुरळ पाडू शकत नाही. त्याची कविताही त्याच्या ह्या व्यक्तिमत्वासारखीच ! तटस्थ. भावनेच्या गुंत्यात शब्द गुरफटत नाहीत आणि शब्दांच्या विळख्यात भावना गुदमरत नाहीत. एखाद्या राजहंसाच्या नीर-क्षीर विवेकाप्रमाणे गुलजारसुद्धा स्वत:च्या कवितेतून शब्द आणि भावना वेगळ्या करू शकत असेल, इतकं ते लिखाण मला सुटसुटीत वाटतं. इथे 'कविता' म्हणजे, त्याच्या गीतांमधली कविता. पुस्तकांतला गुलजार मला -

=> इन उम्र से लम्बी सड़कों को मंज़िल पे पहुँचते देखा नहीं
=> रात की बात हैं और ज़िन्दगी, बाकी तो नहीं..
=> होठों पे लिए हुए दिल की बातें हम, जागतें रहेंगे और कितनी रातें हम
=> पास नहीं तो दूर ही होता, लेकिन कोई मेरा अपना
=> अपना किनारा नदिया की धारा हैं
=> नाम गुम जाएगा, चेहरा यह बदल जाएगा, मेरी आवाज़ ही पहचान हैं
=> आपसे भी खूबसूरत आपके अंदाज़ हैं..
=> इक बार वक़्त से लम्हा गिरा कहीं, वहाँ दास्ताँ मिली लम्हा कहीं नहीं
=> मुस्कुराऊँ कभी तो लगता हैं, जैसे होठों पे क़र्ज़ रखा हैं
=> तुम्हारी पलकों से गिरके शबनम हमारी आँखों में रुक गयी है
=> गीला मन शायद बिस्तर के पास पडा हो, वो भिजवा दो मेरा वो सामान लौटा दो
=> दिन का जो भी पहर गुजरता हैं, कोई एहसान सा उतरता हैं
=> आसमां के पार शायद और कोई आसमां होगा !

- ह्या गुलजारइतका भिडत नाही.

आज गुलजारचा वाढदिवस नाही. त्याला कुठला पुरस्कार जाहीर झाल्याची बातमीही नाही. पण, कधी कधी रात्री, अर्धवट झोपेत असतानाही एखादं गाणं आपल्याला आठवतं, कधी कधी काही कारण नसतानाही एखाद्या जुन्या मित्राची आठवण येते, अचानक कधी एखाद्या विचित्र वेळी चहा पिण्याची लहर येते किंवा एकदम हुक्की येते आणि बाईक काढून रिमझिम पावसात एक लांब फेरफटका मारावासा वाटतो, तसंच काहीसं झालं आणि झिरपलेला गुलजार पेरलेल्या बीने अंकुरावं, तसा मनातून उमलून येतो आहे असं वाटलं. आणि मग हळूहळू बरंच काही आठवलं. काहीच कारण नसताना 'आनंद, बावर्ची, चुपके चुपके, अंगूर, चाची ४२०' चे डायलॉग्स आठवले. 'मेरे अपने'मधले विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, 'परिचय'मधला जितेंद्र, 'मौसम'मधली शर्मिला, 'खुशबू'मधली हेमा मालिनी, 'आंधी'मधली सुचित्रा सेन, 'नमकीन', 'अंगूर'मधला संजीवकुमार, 'कोशिश'मधली जया भादुरी, 'इजाजत'मधले नसीर-रेखा सगळे आठवले. खास गुलजारसाठी चाली राखून ठेवणारा 'पंचम' आठवला आणि मग पुन्हा 'मैं अकेला हूँ धुंद में पंचम' म्हणणारा 'गुलजार' आठवला.

पावसाळ्यातल्या एका भल्या सकाळी घराबाहेर झाडं, घरं, रस्ते, माती, दगड सगळं काही पावसाने चिंब झालं होतं आणि मी माझ्यातच फार पूर्वीपासून साठवून ठेवलेल्या दवात....

छोटासा साया था, आँखों में आया था
हमने दो बूंदो से मन भर लिया
हमको किनारा मिल गया है ज़िंदगी



__/\__

- रणजित पराडकर 

Thursday, August 28, 2014

आनंद - कभी तो हसाएँ, कभी यह रुलाएँ

कविता करणं सोपंय. 'कवी' असणं अवघड. गाणं सोपंय, 'गायक' बनणं अवघड. चित्र काढणं सोपंय, 'चित्रकार' होणं अवघड.
ऑन अ लार्जर कॅनव्हास, जर 'जगणं' म्हणजे 'जिवंत राहणं'च असेल, तर 'जगणं' खूप सोपंय, हृषिदांचा, गुलजारचा, राजेश खन्नाचा, सलील चौधरीचा 'आनंद' जगणं............?


खरं सांगायचं तर 'आनंद'बद्दल सविस्तर लिहिण्याचा हा माझा पहिला प्रयत्न नाही. ह्या लेखाची अनेकदा सुरुवात झाली आहे. पण लिहिता लिहिताच एक विचित्र दडपण येऊन मी प्रत्येक वेळी लिखाण अर्धवट सोडून दिलं आहे. लिहिलेलं खोडून टाकलं आहे. कारण माझ्या मते ही एक सर्वोत्कृष्ट कलाकृती, निर्मिती होती. 'हिंदी चित्रपटाचा सर्वोच्च बिंदू कोणता होता ?' असे कुणी विचारलं तर माझं तरी उत्तर 'आनंद' हेच असेल. इतक्या अप्रतिम कलाकृतीबद्दल लिहिताना, मी तिच्यासोबत न्याय करू शकेन असं मला वाटत नाही. त्यामुळे लेख पूर्ण करण्याची हिंमत अनेकदा झालीच नाही. आजही हे लिहितो आहे ते जरी पूर्ण करू शकलो, तरी ते 'पुरेसं' नसेलच. 'आनंद'बद्दल पुरेसं लिहिणं कुणाच्याही आवाक्यातील गोष्ट नसावीच. माझ्या तर नाहीच नाही.

आजवर अगणित वेळा 'आनंद' बघून झाला असेल. ही कहाणी जरी 'आनंद सेहगल'ची असली, तरी तिला 'डॉ. भास्कर बॅनर्जी'च्याच नजरेतून पाहणे अतिशय आवश्यक आहे असं मला वाटतं. खरं तर ही ह्या दोघांची कहाणी आहे.

कविमनाचा पण नैराश्याच्या गर्तेत रुतत चाललेला एक डॉक्टर. डॉ. भास्कर बॅनर्जी. नावाजलेला कर्करोग तज्ञ. लहानपणापासूनच तसा एकालकोंडा असलेल्या भास्करचे डॉ. प्रकाश कुलकर्णीशिवाय फार कुणी मित्र नाहीत. त्याच्या सगळ्यात जवळ आहे त्याची डायरी आणि त्याची कविता. कॉलेजच्या गुलाबी दिवसांतसुद्धा भास्कर -

मौत तू एक कविता है,
मुझसे एक कविता का वादा है, मिलेगी मुझको

- अश्या तत्ववेत्त्याच्या ओळी लिहितो, ह्यावरून त्याचा अंतर्मुख स्वभाव समजून येतो. त्याच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा पैलू म्हणजे त्याचा नास्तिकतेकडे झुकणारा मनुष्याच्या कुवतीवरचा, विज्ञानावरचा विश्वास. परंतु, भोवताली पसरलेल्या रोगराई, गरिबीच्या बीभत्स ओंगळवाण्या वास्तवात गुदमरलेले हताश मानव्य त्याच्या ह्या विश्वासाला रोजच्या रोज हादरवत असतं.
'कॉलेज से डिग्री लेते वक़्त ज़िन्दगी को बचाने की कसम खायी थी, अब ऐसा लग रहा हैं की जैसे कदम कदम पर मौत को ज़िंदा रख रहा हूँ......'
असं म्हणणारा सधन, बुद्धिमान, संवेदनशील व अंतर्मुख भास्कर वास्तविकत: मानसिकदृष्ट्या अगदी व्हल्नरेबल असतो. अळवाच्या पानावरच्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे हळवा. आणि अश्या मनस्थितीत असताना त्याच्या आयुष्यात एक वादळ येतं. 'आनंद सेहगल'. एक जिवंत वादळ. किंबहुना, रोज थोडं थोडं मरत असलेलं एक जिवंत वादळ. असाध्य कर्करोगाने अक्षरश: पोखरलेला आनंद मुंबईत येतो, ते आयुष्याचे शेवटचे ३-४ महिनेच मुठीत घेऊन. ह्या शेवटच्या मोजक्या दिवसांत भास्करवर त्याचा होणारा परिणाम, त्याच्या व्यक्तिमत्वात घडणारा बदल म्हणजे हे कथानक.
आनंद मरतो आहे, तो मरणार आहे, हे आपल्याला आधीपासूनच माहित असतं. पण तराजूचं एक पारडं खाली जाताना दुसरं जसं अपरिहार्यपणे वर येत राहतं, तसं आनंदचं एकेका दिवसाने कमी होत जाणारं आयुष्य भास्करला नैराश्याच्या गर्तेतून वर खेचत आयुष्याशी गळाभेट घडवण्यापर्यंत नेत असतं.

कहीं तो ये, दिल कभी, मिल नहीं पाते
कहीं से निकल आए, जनमों के नाते

अश्याप्रकारचं एक वेगळंच नातं, ह्या दोघांत निर्माण होऊन दृढ होत असतं. 'मृत्यू'ला कविता संबोधणाऱ्या बाबू मोशाय भास्करला जगण्याला कविता मानणारा आनंद एक वेगळाच प्रवास घडवतो. स्वत:पासून स्वत:पर्यंतचा. ह्या प्रवासात त्याचे काही सहप्रवासी असतात. त्याचा जिवलग मित्र डॉ. प्रकाश व त्याची पत्नी सुमन, मेट्रन डिसा, रघू काका, ईसाभाई सुरतवाला आणि रेणू.

पहिल्याच भेटीत शाब्दिक कोट्या व शब्दांच्या फिरवाफिरवीतून आनंद त्याच्या आयुष्याविषयीच्या तत्वज्ञानाचा एक ठसा भास्करच्या व पर्यायाने आपल्याही मनावर उमटवतो.
ज़िन्दगी बड़ी होनी चाहिए, लम्बी नहीं.
मौत के डर से अगर जीना छोड़ दिया तो फिर मौत किसे कहतें हैं ?
जब तक जिंदा हूँ, मरा नहीं; जब मर गया तो साला मैं ही नहीं !
हम आनेवाले गम को खिंच तानकर आज की ख़ुशी में ले आते हैं और उसमे ज़हर घोल देतें हैं !
असे संवाद अधून मधून पेरले जात असतातच आणि हा ठसा अधिकाधिक ठळक होत जातो.

आनंद मोजक्या काही दिवसांच्या सहवासातच प्रत्येकाशी एकेक नाते जोडतो आणि आपला स्वत:चा एक छोटासा परिवार बनवतो. भास्कर - भाऊ, रेणू - वहिनी, सुमन - बहिण, मेट्रन - मम्मी, ईसाभाई - गुरु आणि दोस्त तर सगळेच. अनोळखी व्यक्तीलाही 'मुरारीलाल' म्हणून मित्र बनवण्याचा छंद!

किनारा पार करणे अशक्य असतानाही सागराच्या लाटा जश्या अविरत उसळत असतात, तसंच स्वत:च्या निश्चित अंताच्या अनिश्चिततेचं सावट सतत डोक्यावर असतानाही 'आनंद' अविरतपणे उत्साह व हास्यविनोदाच्या लहरींवर स्वार होऊन पुन्हा पुन्हा जीवनाच्या निश्चल किनाऱ्यावर जणू धडका देत -
'मौत तो इक पल हैं, आनेवाले दिनों में जो लाखो पल मैं जीनेवाला हूँ उनका क्या ?'
- असा एक रोखीचा सवाल शेवटपर्यंत करत राहतो.
'अगले जनम में मैं तुम्हारा बेटा बन के आ जाऊँगा' - ह्या मेट्रन डीसा (ललिता पवार) ला दिलेल्या त्याच्या आश्वासनपर शब्दांच्या मागे, हा जन्म संपत चालल्याची खंत म्हणूनच जाणवत नाही.
'फिर मिलेंगे' म्हणणाऱ्या 'इसाभाई'ला (जॉनी वॉकर) म्हणूनच तो श्वास अडकला असतानाही दिलखुलास हसून 'कहाँ ?' असा प्रश्न करू शकतो. ह्या दोन दृश्यांत कधीच न दिसलेले ललिता पवार व जॉनी वॉकर आपल्याला भेटतात. खडूस मेट्रन डीसाच्या डोळ्यांतील अश्रू आपल्या मनात जशी कालवाकालव करतात, तसंच बेरक्या इसाभाईचं हमसून हमसून रडणं काळीज पिळवटून जातं.

एक प्रकारची 'उदासी' कहाणीतील प्रत्येक पात्रासह आपलेही मन व्यापत असताना त्याच क्षणी आपल्याला 'आनंद'ने 'भास्कर'ला केलेला एक पारिजातकासारखा सुगंधी प्रश्न आठवतो - 'उदासी खूबसूरत नहीं होती, बाबू मोशाय?'


The woods are lovely dark and deep
But I have promises to keep
And miles to go before I sleep
And miles to go before I sleep

शाळेत असताना 'रॉबर्ट फ्रॉस्ट'च्या ह्या ओळी मोरपिसाच्या हळवेपणाने मनावर अलगद लिहिल्या गेल्या होत्या. अनेक कविता अश्याच हळवेपणाने मनात उतरल्या, झिरपल्या आहेत. प्रत्येकीची एक वेगळी जागा आहे. ह्या अनेक कवितांमध्ये एक जागा 'आनंद'चीही आहे. 'आनंद'ची बलस्थानं, प्रत्येक कलाकाराचं अप्रतिम काम, संगीत, संवाद, गीतं, लेखन, दिग्दर्शन, तांत्रिक बाजू वगैरेवर मी बोलणं टाळतोच. कारण माझ्या मते ही कलाकृती 'चित्रपट'पणाच्या पुढे गेली आहे. ती फक्त चित्रपट किंवा एक कहाणी नसून एक 'कविता' आहे. जिचं एकेक कडवं एकेकाने लिहिलं. हृषीकेश मुखर्जी, गुलजार, सलील चौधरी ह्यांनी पडद्यामागे आणि लहान-मोठ्या व्यक्तिरेखा साकारलेल्या राजेश खन्ना, अमिताभ, रमेश देव, जॉनी वॉकर, ललिता पवार, सीमा देव अश्या प्रत्येकाने ती कविता पडद्यावर पूर्ण केली. माझ्यासारख्या लाखोंनी ती पुन्हा पुन्हा ऐकली, वाचली अन् पाहिली आणि कदाचित जगाच्या अथांग पसाऱ्यात अनेकांनी अनुभवलीही असावी व अनुभवतही असावेत, कारण -

"आनंद मरा नहीं, आनंद मरतें नहीं."

....रसप....

Tuesday, August 26, 2014

नॉक आउट पंच - मर्दानी (Movie Review - Mardaani)

खरं तर ही कहाणी आजपर्यंत अनेक सिनेमांत मूळ कथानक किंवा उपकथानक म्हणून येऊन गेली आहे. टीव्हीवर, गुन्हेगारी सत्यघटनांवरील डॉक्युमेंटरी सिरियल्समध्येही अश्या प्रकरणांना पाहून झाले आहे. पण तरी डोळ्यांचं पातं लवू न देता पाहावंसं वाटतं, इथेच 'मर्दानी' जिंकतो.

सेन्सॉर सर्टिफिकेट दाखवणाऱ्या फ्रेमपासून, ते अगदी शेवटच्या दृश्यापर्यंत 'मर्दानी'त लेखक-दिग्दर्शकाने एक सूत्र १००% पाळलं आहे. 'नो नॉनसेन्स'. अनावश्यक दृश्यं, संवाद, गाणी, पात्रं, कॅमेरावर्क काही म्हणता काही नाही. फक्त तेच जे कथानकाला पुढे नेणार आहे, हातभार लावणार आहे. म्हणून साहजिकच चित्रपट दोन तासांपेक्षाही कमी लांबीचा आहे.

शिवानी रॉय (राणी मुखर्जी) निरीक्षक, मुंबई क्राईम ब्रांच. पती डॉ. बिक्रम रॉय व लहानग्या भाचीसह राहत असते. अनाथालयात राहणाऱ्या व फुलं विकणाऱ्या कुमारवयीन 'प्यारी'वर तिचा फार जीव असतो. मुलीसारखीच असते. इतकं कथानक पाहून झाल्यावरच पुढे काय घडणार आहे, ह्याची पुसटशी कल्पना आपल्याला येते.
एके दिवशी अचानक 'प्यारी' गायब होते आणि तिचा शोध घेताना शिवानीला अल्पवयीन मुलींची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचाच शोध लागतो. एका मोठ्या रॅकेटला उघड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यास ज्या किंमती मोजायला लागतात, त्या ती मोजते. धक्के पचवते, पुन्हा उभारी घेते, लढते, भिडते, हार मानत नाही.


रोहित शेट्टी, साजिद खानसारख्यांच्या अक्कलशून्य चित्रपटांमुळे बॉलीवूडला बौद्धिक दिवाळखोरीचं चालतं-बोलतं उदाहरण समजलं जात असताना 'प्रदीप सरकार'सारखा दिग्दर्शक समोर येतो. ज्या ताकदीने तो 'परिणीता'ची हळवी कहाणी सादर करतो, त्याच ताकदीने तो 'मर्दानी'ची लढत साकार करतो आणि मग शुजीत सरकार, विशाल भारद्वाज, नीरज पांडे, राजकुमार हिरानी, अभिषेक कपूर, झोया अख्तर सारखी काही गुणी नावं आठवून अवस्था इतकीही सुमार नसल्याची हमी मिळते. प्रत्येक छोट्या व्यक्तिरेखेकडूनही उत्कृष्ट कामगिरी करवून घेण्यात प्रदीप सरकार पूर्ण यशस्वी ठरले आहेत.

राणी मुखर्जीने दाखवलेली उर्जा 'मर्दानी'ची जान आहे. खरं तर ह्या भूमिकेला साकार करताना तिची देहयष्टी आड येऊ शकली असती, पण केवळ जबरदस्त उर्जेच्या जोरावर तिने ही उणीव भरून काढली आहे. आक्रमक देहबोली व अचूक संवादफेक, जोडीला खमकी नजर व जबरदस्त आत्मविश्वास अशी ही 'मर्दानी' राणीची आजवरची सर्वोत्कृष्ट भूमिका नक्कीच आहे.


राणीइतकंच लक्षात राहण्यासारखं काम केलंय नवोदित 'ताहीर भसीन'ने. सेक्स रॅकेटच्या मास्टर माइंडच्या भूमिकेतला भसीन अत्यंत संयतपणे अंगावर येणारा खलनायक साकार करतो. त्याच्या जवळजवळ प्रत्येक दृश्यात तो छाप सोडतो. इतक्या शांतपणे क्वचितच कुणी थरकाप उडवला असेल किंवा संताप आणला असेल.

आजच्या हिंदी चित्रपटावर आसूड ओढण्याच्या अहमहमिकेत उत्साहाने सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाने 'मर्दानी'सारखे चित्रपटसुद्धा पाहायला पाहिजेत. असे काही चित्रपट बघितले की हिंदी चित्रपटांचे काही अक्षम्य गुन्हे माफ करावेसे वाटतात.

रेटिंग - * * * * 

Wednesday, August 13, 2014

तुझी सावली होऊन..

'लिहा ओळीवर कविता - भाग ११६' मध्ये माझा सहभाग -

तुला रोज पाहतो मी
तुला रोज ऐकतो मी
आणि तुला भेटण्याची
रोज वाट बघतो मी

दिस हळूहळू जातो
रात वाढतच जाई
वारी चालली क्षणांची
नाही कुणालाच घाई

अनुभव पहिलाच
अशी ओढ लागण्याचा
जणू अनेक दिसांनी
आरश्यास बघण्याचा

कुणी म्हणे आदिशक्ती
कुणी म्हणे तुज काळा
माझा-तुझा अंश एक
पुरे इतकाच चाळा

तुझ्या मागून फिरावे
तुझी सावली होऊन
वीट सरकली वाटो
तुझे पाऊल पाहून

....रसप....
१३ ऑगस्ट २०१४

Thursday, July 31, 2014

निनावी दु:ख लाभावे..

मनाचा ठाव घेताना निनावी दु:ख लाभावे
जसे पाहून गायीला भुकेले वासरू यावे

किती हा दूरचा रस्ता तुझ्यापासून येणारा
कितीदा वाटते, 'आता पुरे, येथेच थांबावे'

असे ही रोजची कसरत तुला समजून घेण्याची
तुला हे काय समजावे, तुला समजून का घ्यावे ?

स्वत:पुरती नशा घेऊन फिरतो सोबतीला मी
कुणाला पुण्य ना द्यावे, कुणाचे पाप ना घ्यावे

तुला दाटून आल्यावर असू दे भान इतके की
कधी हुलकावणी द्यावी, कधी बरसून झोडावे

जरासे पापण्यांना किलकिले करता क्षणी काही
उडाले दूर स्मरणांचे निरागस भाबडे रावे

पहाटेची बघितली वाट सारी रात्र डोळ्यांनी
नव्याने प्रश्न मग पडला, उजेडाने कुठे जावे ?

....रसप....
३१ जुलै २०१४

Monday, July 28, 2014

एक्स्ट्रा टाईमची पेनल्टी किक (Movie Review - Kick)

'माझं पोरगं कसलं व्रात्य आहे, उपद्व्यापी आहे ! जराही शांत बसत नाही आणि बसूही देत नाही.
प्रवासात तर डब्यातल्या प्रत्येकाला जाऊन छळायचं असतं ! एका जागी थांबत नाही.
शाळेतून रोजच तक्रार असते !
मनासारखं झालं नाही तर सगळं घर डोक्यावर घेतं.
हातात काहीही आलं की आधी ते फेकणारच !
आयटम सॉंग्स भारी आवडतात.. 'झंडू बाम'वर तर कसलं नाचतंय !'

- कशाचंही कौतुक असतं लोकांना. ज्यासाठी एक धपाटा द्यायला हवा, त्यासाठी एक गालगुच्चा घेतला जातो आजकाल. ह्या लाडोबांनी काहीही केलेलं चालतं आई-बापाला. ह्यांचा आनंद आणि बाकीच्यांना वैताग !
असंच काहीसं आपल्या फॅन मंडळींचं आहे. त्यांच्या लाडोबांनी काहीही केलं तरी चालतं. चालतं कसलं, ते 'लै भारी' असतं. मग तो 'किक'च्या सुरुवातीचा जवळजवळ तासभराचा वात आणणारा अस्सल मूर्खपणा का असेना !

मागे एकदा मोठ्या अपेक्षेने पंकज कपूर दिग्दर्शित 'मौसम' बघायला गेलो होतो. असह्य होऊन मध्यंतराला बाहेर पडलो. 'किक'च्या मध्यंतरापर्यंत तश्याच निर्णयाला पोहोचत होतो. एक तर 'टायटल्स'मध्ये 'म्युझिक - हिमेश रेशमिया' दिसलं होतं, तेव्हापासून पाचावर धारण बसली होती की त्याची काही तरी भूमिका असणारच. मी सश्याच्या बावरलेपणाने बरोबरच्या मित्राला माझी भीती कुठलाही आडपडदा न ठेवता बोलून दाखवली. तेव्हा समजलं की हिमेश दिसणार नाहीये. मध्यंतरानंतर तग धरण्याचं बळ त्या तीन-चार शब्दांत होतं आणि मी बाहेर न पडता तिथेच बसून राहिलो.

तर कहाणी अशी आहे की.....
'देवी लाल सिंग' (सलमान) हा एक सटकलेल्या डोक्याचा चाळीशीचा तरुण असतो. (चाळीशीचा तरुण म्हणजे 'गरमागरम बियर' म्हटल्यासारखं वाटत असेल. पण ते तसंच आहे.) हुशार व सुशिक्षित असूनही त्याच्या सतत काही तरी 'थ्रिलिंग' करण्याच्या चसक्यामुळे त्याने आत्तापर्यंत ३२ नोकऱ्या सोडलेल्या असतात. गावात देवाच्या नावाने जसा एखादा वळू सोडलेला असतो, तसा हा स्वत:च्या 'किक'साठी गावभर उधळत फिरत असतो. त्याला काय केल्याने 'किक' मिळेल, हे सांगता येत नसतं. एकीकडे मैत्रिणीच्या घरच्यांच्या मर्जीविरुद्ध तिचं लग्न करवून देत असतानाच दुसरीकडे त्याच लग्नाबद्दलचे अपडेट्ससुद्धा त्याच घरच्यांना देऊन, त्यांना लग्नाच्या ठिकाणी आणून, त्यांच्यासमोर लग्न लावून देतो, कारण त्यातून 'किक' मिळते !
एक बथ्थड चेहऱ्याची मानसोपचार तज्ञ 'शायना' (जॅकलिन फर्नांडीस) त्याला भेटते आणि त्याला एक वेगळीच 'किक' बसते. प्रेमाची. त्या प्रेमाखातर तो पुन्हा एकदा नोकरी करण्याचा प्रयत्न करतो. तो न जमल्याने नाराज झालेल्या शायनावर नाराज होऊन 'आजसे 'पैसा कमाना' यही मेरी नयी 'किक' है' असं ऐकवून देवी अंतर्धान पावतो. वर्षभर त्याची वाट पाहून अजून थोराड होत चाललेली शायना कदाचित गाल भरून येतील ह्या आशेने असेल, थेट पोलंडची राजधानी 'वॉर्सो'ला आई-वडील, बहिणीसह शिफ्ट होते ! (च्यायला ! मी ३ ब्रेक अप्स केले. कधी वर्सोव्यालाही जाऊ शकलो नाही. माझ्या प्रेमात 'किक'च नव्हती बहुतेक!)

इथपर्यंत थेटरात बसलेले सगळे पकलेले असतात. थेटरात जांभयांची साथ आलेली असते. पण कोमात गेलेला पेशंट शुद्धीत यावा, तसे अचानक लेखक, दिग्दर्शक शुद्धीत आल्याची लक्षणं दाखवायला लागतात.

कुठल्याही कर्तव्यदक्ष पालकांना असते, तशी शायनाच्या घरच्यांनाही तिच्या लग्नाची काळजी असतेच. त्यामुळे वडिलांच्या मित्राचा मुलगा 'हिमांशु' (रणदीप हुडा) कहाणीत येतो. सुपरकॉप हिमांशु एका 'डेव्हिल' नावाच्या चोराच्या करामतींनी बेजार झालेला असतो. पुढची चोरी 'वॉर्सो'मध्ये होणार असा एक खत्तरनाक डोकेबाज शोध लावून तो इथे आलेला असतो. 'डेव्हिल' म्हणजे पूर्वीचा 'देवी' असणारच असतो. अश्याप्रकारे कहाणीची 'त्रिकोणीय' गरज पूर्ण होते.
ह्यानंतर नेहमीची थरारनाट्यं यथासांग पार पडतात. कहाणी आणखी पुढेही उलगडत जाते. 'नवाझुद्दिन सिद्दिकी'ने जबरदस्त साकारलेला खलनायक 'शिव' येतो. आणि इतर कुठल्याही सलमानपटाच्या ठराविक वळणावर चित्रपट 'इतिश्री' करतो.


चित्रण, छायाचित्रण तर आजकाल सुंदर असतंच. इथेही ते सफाईदार आहे. मध्यंतराच्या जरा आधीपासून कहाणी चांगला वेगही पकडते. पण हिमेश रेशमियाची गाणी वेगाला बाधा आणायचं काम सतत करत राहतात. खासकरून 'नर्गिस फाक्री' असलेलं एक गाणं तर पराकोटीचा अत्याचार करतं.

'जॅकलिन फर्नांडीस' खप्पड चेहरा आणि विझलेल्या डोळ्यांनी अख्ख्या चित्रपटभर अभिनयाचा अत्यंत केविलवाणा अयशस्वी प्रयत्न करते.

सौरभ शुक्ला, रजित कपूर व मिथुन चक्रवर्ती ह्यांना फारसं काही काम नसल्याने ते वायाच गेले आहेत. नवाझुद्दिनच्या भूमिकेचीही लांबी तशी कमीच आहे. पण महत्वाची तरी आहे. त्याचं ते 'ट्टॉक्' करून विकृत हसणं जबराट आहे. पण म्हणून 'मै १५ मिनिट तक अपनी सांस रोक सकता हूँ' हे काही पटत नाही.

रणदीप हुडा हा मला नेहमी एक गुणी अभिनेता वाटतो. त्याचा वावर अगदी सहज आहे. कोणत्याही खानपटात दुसऱ्या कुठल्या नटाने छाप सोडणे म्हणजे दुसऱ्याच्या बगीच्यात शिरून तिथलं गुलाबाचं फूल डोळ्यांदेखत तोडून आणण्यासारखं आहे.

खरं तर तेलुगु सिनेमाचा रिमेक असल्याने सगळा मसाला मिला-मिलाया आणि बना-बनायाच होता. फक्त चकाचक भांड्यांत सजवून समोर ठेवायचं होतं. ते ठेवलंच आहे. त्यामुळे एकदा बघायला हरकत नसावी.
असं करा.... खणखणीत एसी असलेल्या चित्रपटगृहात, पोट मस्तपैकी टम्म फुगेस्तोवर खादाडी करून जा आणि पहिला एक तास झक्कपैकी झोप काढा. मग मध्यंतरात गरमागरम चहा-कॉफी घेऊन पॉपकॉर्न चिवडत उर्वरित अर्धा भागच पहा. मज्जा नि लाईफ !

रेटिंग - * *

Tuesday, July 22, 2014

कौन जीता, कौन हारा ?

२ एप्रिल २०११. भारताने विश्वचषक जिंकला. २८ वर्षांनंतर. त्याआधी तो चषक त्यांनी उंचावला होता लॉर्ड्सवर.
२१ जुलै २०१४. काल त्याच लॉर्ड्सवर भारताने कसोटी सामना जिंकला. पुन्हा एकदा, २८ वर्षांनतर मिळालेलं एक यश.
२०११ च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने २७५ चं लक्ष्य समोर ठेवलं होतं आणि झटपट दोन महत्वाचे बळीही मिळवले होते. तेव्हा विश्वविजय मुंबईहून लॉर्ड्सइतकाच दूर वाटत होता. पण धोनीने कमाल केली.
कालच्या सामन्यात 'जो रूट' खेळपट्टीवर खोलवर रूट्स (मुळं) रोवल्यासारखा ठाण मांडून बसला होता आणि मोईन अलीही हाताला येत नव्हता, तेव्हाही विजय लॉर्ड्सहून मुंबईइतकाच दूर वाटत होता. पण पुन्हा एकदा धोनीने कमाल केली. सुंदर चेहऱ्याला झाकणाऱ्या केसांना बाजूला करावं, त्याप्रमाणे त्याने केशसंभाराखाली दबलेल्या इशांत शर्माच्या बुद्धीला चालना दिली आणि त्याला आखूड मारा करण्यास भाग पाडलं. ह्या अनपेक्षित हल्ल्याने बावचळलेला मोईन अली लंचपूर्वीच्या अखेरच्या चेंडूवर शॉर्ट लेगच्या हाती हळुवार पिसासारखा अलगद विसावला आणि सकाळचे सत्र भारतासाठी अगदीच विफल ठरले नाही.
अचानक इशांतच्या चेंडूची गती १३५ कि.मी. च्या पुढे गेली. अधून मधून १४० की.मी.लाही तो पोहोचला. लंचनंतर इशांतच्या आखूड माऱ्यावर प्रायर व रूट फावड्याने माती ओढल्यासारखे धावा वसूल करायला लागल्यावर पुन्हा एकदा पराभवाचं सावट आलं. पण धोनी ठाम होता. आखूड मारा चालूच राहिला आणि मग एकामागून एक आणखी ४ विकेट्स मिळाल्या आणि पुन्हा एकदा क्रिकेटची पंढरी भारताच्या जयजयकाराने दुमदुमली.


चित्रपट जसं दिग्दर्शकाचं माध्यम आहे, तसं क्रिकेट हा कर्णधाराचा खेळ आहे. एक उत्कृष्ट कर्णधार साधारण खेळाडूंकडूनही सर्वोत्कृष्ट कामगिरी करवून घेऊ शकतो आणि एक निकृष्ट कर्णधार सर्वोत्कृष्ट खेळाडूंनाही साधारण भासवू शकतो. सगळं काही केवळ 'नीती' आणि 'नीयत'च्या जोरावर.
ब्रिटीश, ऑस्ट्रेलियन, विंडीज, आफ्रिकन वगैरे जलदगती गोलंदाजांपुढे भारतीय जलदगती गोलंदाज (इशांत वगळल्यास) म्हणजे काय हे स्ट्युअर्ट ब्रॉड आणि भुवनेश्वर कुमारला बाजू-बाजूला उभं केल्यावर समजेल. पण खेळपट्टीवर हिरवळ असतानाही तिचा तितका लाभ इंग्लंडचे गोलंदाज उठवू शकले नाहीत, जितका ती हिरवळ वाळल्यावर भारतीयांनी उठवला. ह्याला कारण कूक व धोनी ह्यांच्या कप्तानीतील धोरणात्मक फरक. आक्रमक क्षेत्ररचना, जेव्हढी धोनीने लावली, तेव्हढी कूकने का लावली नसावी, हे कळत नाही. कदाचित फलंदाजीतील सुमार फॉर्ममुळे त्याच्यातील कर्णधारही बचावात्मक झाला असावा.

सामन्यानंतरच्या समारंभात इशांत, धोनीच्या मुलाखतींतून पुन्हा एकदा हे प्रतीत झालं की धोनी हा एक अतिशय चलाख, धोरणी व धूर्त खेळाडू आहे. त्याची विचार करण्याची पद्धती, कुठल्याही परिस्थितीचे वेगळ्याच प्रकारे पण अचूक मूल्यमापन करत असावी. सामन्याच्या पहिल्या दिवसअखेरीस त्याने आपल्या संघसहकाऱ्यांना म्हटलं की, गेल्या पाच कसोटी सामन्यांच्या तोडीचा खेळ आपण ह्याही कसोटीत केला, तर आपण नक्कीच जिंकू. अजून एक खूप साधीशी गोष्ट तो त्याच्या मुलाखतीत म्हणाला. 'कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेरपर्यंत समाधानकारक परिस्थितीत असणे, आमच्यासाठी महत्वाचं आहे कारण तिथून पुढे आमचे फिरकीपटू प्रभाव टाकू शकणार असतात.' अत्यंत सोप्या पद्धतीने मांडलेल्या अतिशय कठीण गोष्टी. एका चांगल्या नेतृत्वासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. कठीण आव्हानं अश्या पद्धतीने समोर मांडणं, की ती सोपी वाटली पाहिजेत.

एक चिंतेची गोष्ट हीच आहे की ह्या विजयानंतर इशांत शर्माचा आत्मशोध संपू नये. अजूनही रिकी पाँटिंगला ऑफ स्टंपबाहेरच्या तिखट जलद माऱ्याने अस्वस्थ करणाऱ्या सुरुवातीच्या इशांत शर्मापासून हा आजचा इशांत शर्मा खूप दूर आहे. पर्थपासून मुंबईइतका दूर. आपल्या उंचीचा उपयोग आपण करून घेऊ शकतो, हे त्याला कर्णधाराने सांगायला लागतं हे बरोबर नाही. पंचविशीचाच असला तरी ७-८ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव थोडाथोडका नाही. आपली बलस्थानं आपल्याला उमजावीत, इतक्यासाठी तरी हा अनुभव नक्कीच पुरेसा आहे. आशा आहे की विकेट मिळवणं आणि विकेट मिळणं ह्यातील फरक त्याला कळत असेल.

अजून एक महत्वाची बाब ही की मालिकेतील अजून ३ सामने खेळायचे बाकी आहेत. शांतपणे विचार केल्यास भारताने हा सामना जिंकला, ह्यापेक्षा इंग्लंडने तो हरला असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल. कारण जितके चेंडू एकट्या मुरली विजयने यष्टीरक्षकासाठी सोडले त्याच्या एक चतुर्थांश चेंडू जरी इंग्लंडने लंचनंतर सोडले असते तर निकाल वेगळा लागू शकला असता. किंवा जितके आखूड चेंडू एकट्या इशांत शर्माने अखेरच्या दिवशी टाकले, तितके चेंडू जर स्ट्युअर्ट ब्रॉडने गुड लेंग्थवर टाकले असते, तरी सामन्याचे पारडे दुसऱ्या बाजूला सहज झुकू शकले असते. त्यामुळे इंग्लंडसाठी मालिकेत पुनरागमन करणे फार अवघड नाही. त्यांना फक्त त्यांच्या चुका सुधारायच्या आहेत.

सामन्यानंतर माईक आथरटनने अ‍ॅलिस्टर कूकची मुलाखत पोलीस चौकशी करावी, इतक्या आक्रमकपणे घेतली. काही अतिशय अवघड प्रश्न विचारले. पण धोनीशी मात्र शेजाऱ्याच्या मुलाला समजवावं अश्या पवित्र्यात संवाद साधला. बिन्नीला एकही षटक द्यावेसे का वाटले नाही, असा अवघड प्रश्न त्याने टाकला नाही. त्यामुळे मुलाखतीसाठी पडलेल्या चेहऱ्याने आलेला कूक चढलेल्या आठ्यांसह परतला आणि शांत चेहऱ्याने आलेला धोनी हसऱ्या चेहऱ्याने परतला.

कुणाच्या का कोंबड्याने असो, सूर्योदय झाला आहे; ह्यावर आपण जितका काळ समाधानी राहू शकतो तितकाच काळ ह्या विजयाने आनंदी राहावं, असं वाटतं.

उर्वरित मालिकेसाठी धोनी ब्रिगेडला मन:पूर्वक शुभेच्छा !

- रणजित पराडकर 

Tuesday, July 15, 2014

लय सॉरी ! (Movie Review - Lai Bhari लय भारी)

माणसाच्या अनेक जातींपैकी एक जात आहे. 'आरंभशूर'.
ह्या जातीत अनेक खेळाडू येतात. उदा. शिखर धवन. सुरुवातीला दोन-चार फटके असे मारेल की डोळ्यांचं पारणं फिटावं आणि जरा नजर बसली की गोलंदाजाला वाढदिवसाचं प्रेझेंट द्यावं इतक्या प्रेमाने स्वत:ची विकेट बहाल करून मोकळा होईल. चित्रपट आणि माणसाची नाळ तेव्हाच जुळते जेव्हा चित्रपट माणसाशी थेट संबंध जोडतात. जसं, ह्या 'आरंभशूर' जातीत अनेक चित्रपटही मोडतात. Or lets say, बहुतांश चित्रपट ह्याच जातीत येत असावेत.

हे सांगायचं कारण इतकंच की, 'लय भारी' अपेक्षेने 'निशिकांत कामत' ह्यांचा 'लय भारी' बघायला गेलो आणि 'लय सॉरी' झालो !
चित्रपटाच्या सुरुवातीला एक सुंदर गाणं, त्याचं तितकंच छान चित्रीकरण, एकंदरीतच अपेक्षा उंचावणारी निर्मितीमुल्याची झलक ह्या सगळ्यांतून जरा माहोल बनल्यासारखं वाटतं. पण नजर बसल्यावर जसा शिखर धवन विकेट फेकून देतो, तसं मध्यंतरापर्यंत 'लय भारी'ची लेव्हल 'भारी'पासून 'बरी' पर्यंत येते आणि मध्यंतरानंतर तर हाराकिरी होते. मग जाग आलेला प्रेक्षक सगळाच ठोकताळा मांडतो. अगदी सुरुवातीपासून.


गावातलं एक मोठं प्रस्थ. प्रतापसिंह निंबाळकर (उदय टिकेकर). सामाजिक कार्याचा ध्यास घेतलेल्या निंबाळकर व त्यांच्या घराण्याला सगळेच जण खूप मानत असतात. पण त्यांना मूल होत नसतं आणि ह्याचं शल्य पत्नी सुमित्रा देवींना (तन्वी आझमी) कायम बोचत असतं. मग एकदा वारीला जाऊन त्या विठ्ठलाला साकडं घालतात आणि विठ्ठल पावतो ! (निंबाळकर-दाभोळकर हे कमजोर यमक असल्याने वृथा संबंध जोडू नये.)
इतक्या वर्षांनी होणारं मूल आणि त्या पहिल्या मुलाला विठ्ठलाला अर्पण करायचं ? पत्नीचं हे म्हणणं न पटल्याने, गावातल्या गोरगरिबांच्या दु:खाने व्यथित होणारे प्रतापसिंह निंबाळकर स्वत:च्या पत्नीच्या आयुष्यातील महत्कठीण टप्प्यात तिला एकटं सोडून, चिडून थेट लंडनला निघून जातात आणि पुत्रजन्मानंतरच परततात ! आता देवाला वचन दिलं आहे आणि नवऱ्यालाही नाराज करायचं नाहीये. मग ह्यावर उपाय काय ? तो देव देणारच असतो. काय दिला असेल, हे समजण्याइतके चित्रपट आपले पाहून झाले असल्याने आपल्याला पहिल्या अर्ध्या तासात पुढचा अख्खा चित्रपट कळतो आणि तो प्रत्यक्षात घडत असताना बघण्यासारखं बहुतेक वेळेस काही नसल्याने आपण आपल्या मनात पुढचा चित्रपट बघत राहतो.
अपेक्षेनुसार सगळा घटनाक्रम तसाच असणे जर 'लय भारी' असेल तर आपण 'लय सॉरी' आहोत राव ! अहो, अश्या ष्टोऱ्या तर पोटातल्या पोरालाही माहित असतात आजकाल !


खरं तर रितेश देशमुख मला एक बरा अभिनेता वाटतो. पण इथे अनेक ठिकाणी तो थेट 'बिग बी'ची कॉपी मारायला बघतो. अरे लेकीन उसके पास जो ष्टाईल है, जो आवाज है वो तुम्हारे पास किधर है ? हांय ?
अभ्यासक्रमातून व्याकरणेत्यादी जसं बाद झालंय तसं मराठीचे उच्चार ही बाब आता माध्यमांतूनही बाद झाली आहे, त्यामुळे त्याबद्दल 'लय सॉरी' होण्यात काही अर्थ नाही.

'गुड्डी'मध्ये 'प्राण' साहेबांनी मरतुकड्या लोकांकडून केवळ ते 'हीरो' होते म्हणून मार खावा लागल्याची व्यथा बोलून दाखवली होती. साला... एखाद्याने आयुष्यभर 'जिम' लावून, खुराक घेऊन बॉडी बनवावी आणि ज्याच्या मांड्यांएव्हढे त्याचे दंड असतील अश्या एका चॉकलेटी चेहऱ्याने त्याला बुकलून काढावं; असं अशक्यप्राय हीरोपण आणखी कितीदा दैवी कृपेच्या नावावर आमच्या माथी फोडलं जाणार आहे, हे त्या विठ्ठलाला विचारलं तर तोही बहुतेक 'लय सॉरी'च म्हणेल ! त्यामुळे हे सगळं शरद केळकरने स्वीकार केलं असेलच. आपणही करू. पण तरी तो आपली छाप सोडून जातोच.

संगीतकार अजय-अतुल आणि महाराष्ट्रातली धरणं, दोघांची सद्यस्थिती एकसारखीच वाटते मला. मोजकाच साठा उरला आहे. आता कपात मावेल इतकंच उरलं असेल, तर कपात होणं तर क्रमप्राप्तच आहे ! त्यामुळे आठवड्यातून मोजून एक तास नळाने धो-धो बरसावं तसं अजय-अतुल सुरुवातीच्या 'माउली माउली' मध्ये मनसोक्त बरसतात आणि नंतर लय म्हंजे लयच सॉरी होतात !

कुणी सई ताम्हणकरचीही कॉपी मारू शकतं, असा एक झटका मला 'आदिती पोहनकर'ला पाहून मिळाला.
एका सुमार गाण्याच्या टुकार कडव्याच्या भिकार नाचापुरती जेव्हा जेनेलिया पडद्यावर झळकते, तो क्षण तिच्या आजवरच्या कारकीर्दीतला एकमेव असा क्षण असावा जेव्हा तिला पब्लिककडून शिट्ट्या मिळाल्या असाव्यात.

तन्वी आझमी ही एक माझी आवडती अभिनेत्री आहे. तिने आजच्या काळातली निरुपा रॉय व्यवस्थित रंगवली आहे.

संवादलेखनाने काही उल्लेखनीय मजा आणली, असं वाटलं नाही.

सर्वात मोठा अपेक्षाभंग दिग्दर्शक निशिकांत कामतकडून होतो. एका दृश्यापुरता सलमान खान झळकतो. त्या दृश्यात तो अभिनयशून्यतेच्या सर्व मर्यादा पार करतो. तरी ते ठीक आहे कारण त्याच्याकडून कुणालाच अभिनय करवून घेता आलाच नाहीये आजपर्यंत. पण बाकीचे ? त्याच दृश्यातल्या रितेशला पाहून असं वाटलं की दिग्दर्शक म्हणून रिकामी खुर्ची ठेवली असावी की काय ?

आवर्जून 'लय भारी' म्हणावं, अशी एकच गोष्ट जाणवली ती म्हणजे 'माउली माउली' हे गाणं. सुंदर शब्द, तितकीच सुंदर चाल व वारीचं त्याच तोडीचं चित्रीकरण. अगदी सुरुवातीला असलं तरी, चित्रपटगृहातून बाहेर आल्यावरही हेच गीत आपल्या ओठांवर असतं. पण ते तेव्हढंच !

एकुणात काय ?
तर आपली कहाणी सॉरी, गाणी सॉरी, हीरो-हीरवणी सॉरी.. च्या मायला सगळंच लय सॉरी !

रेटिंग - * १/२

Monday, July 14, 2014

पाऊस कधीचा पडतो

पानांची सळसळ दु:खे ऐकून मूक ओघळतो
ह्या निरभ्र डोळ्यांमधुनी पाऊस कधीचा पडतो

सुरकुतली ओली स्वप्ने
उरलीत उशाशी काही
बकुळांगी आठवसुमने
जपण्याची इच्छा नाही
पाउले मोजतो ज्याची तो श्वास नेहमी अडतो
मनअंगण चिंबवणारा पाऊस कधीचा पडतो

अश्रूंची ओघळओढ
रोखून थांबली नाही
शब्दांची तांडवखोड
हरवून संपली नाही
हा दाह विझवता, विझता, झुळझुळता नाद विसरतो
हुरहूर फुलवण्यासाठी पाऊस कधीचा पडतो

--------------------------------------------------------------

ओठांनी आवळलेला
आक्रोश सांडला जेथे
जमिनीने छाती फाडुन
रेखांश आखला तेथे
जडशीळ नेत्र क्षितिजाला पाहून कुणी कळवळतो
संपृक्त वेदना होउन पाऊस कधीचा पडतो

....रसप....
१३ जुलै २०१४

Wednesday, July 02, 2014

कोणता आरोप बाकी राहिला माझ्यावरी ?

कोणता आरोप बाकी राहिला माझ्यावरी ?
कोर तोही भोग माझ्या रंगल्या भाळावरी

जेव्हढी झाली उधारी फिटव आता पावसा
कर तुझ्या शेतीस माझ्या आज तू नावावरी

कोरडी तर कोरडी पण भाकरी तर दे मला
पोट भरल्यावर सुचू दे ओळ दुष्काळावरी

भोवताली फक्त विक्रय चालतो बहुधा इथे
फूल कोमेजून जावे उमलल्या देठावरी

वेळ कातर, हृदय हळवे, जीवघेणी शांतता
सांजवेळी बांध फुटतो 'खुट्ट'ही झाल्यावरी

चांदणे ओतून सगळे फिकटलेला चंद्र मी
भाळली ना शर्वरी ना लाभली आसावरी

संपले आयुष्य पण ना समजले माझे मला
धावलो होतो कुणाच्या जन्मभर मागावरी ?

लपवताना आसवे आईस होते पाहिले
पाहिली नाही कधी मग वाहती गोदावरी

वाटले आयुष्य होते रुंद रस्त्यासारखे
आज कळले चालणे आहे जणू धाग्यावरी 

....रसप....
२ जुलै २०१४

Saturday, June 28, 2014

मुझे चलते जाना हैं, पंचम !

जुन्या जीन्सच्या खिश्यातुनी, जशी मिळावी नोट जुनी
तसाच आनंद लाभतो, तुझा शोध पण खरा हवा

अनपेक्षितपणे मिळालेली एखादी दहाची नोटही आनंदाच्या उकळ्या आणते. असाच एक काल अनुभव आला.
एके ठिकाणी बरेच दिवस पैसे अडकून राहिले होते. एखादा मध्यमवर्गीय सुशिक्षित माणूस जितक्या तीव्रतेने भांडू शकतो, तितकं भांडून झाल्यावरही काही परिणाम झाला नव्हता. शेवटी अक्कलखाती नुकसान जमा करून मी नाद सोडून दिला होता.
अचानक काल ते पैसे मिळाले. तो काही हजारांचा चेक मला काही करोडोंचा वाटत होता !
आता शुक्रवारच्या दिवशी असं काही अनपेक्षित आनंददायी घडणं म्हणजे अपरिहार्यपणे सेलिब्रेशन करावंच लागतं ! आरक्षण मिळाल्यावर आपल्यासाठी आपणच राखून ठेवलेल्या रंगाचा झेंडा फडकवावा, तसा घरी आल्याबरोब्बर मी तो चेक घरच्यांसमोर फडकवला आणि 'झिंदाबाद'च्या आविर्भावात एक घोषणाही करून टाकली की.. 'आज पार्टी करायची!' सहसा झेंडा आणि त्याखाली आवाज असेल, तर मध्यमवर्गीय माणूस जास्त डोकं लावत नाही. घरच्यांनीही तेच केलं आणि मी परवानगी गृहीत धरून तयारीला लागलो.
पण बायकोच्या कपाळावर एक अस्पष्टशी आठी दिसत होती आणि बारीक पंक्चर असलेल्या टायरमधून जशी थोडी थोडी हवा कमी होत जात असते, तसंच काहीसं मला जाणवू लागलं. माझं पंक्चर मी शोधत होतो, पण मिळत नव्हतं. उत्साहाची हवा उतरत होती आणि माझ्याच दोन मनांचं आपसांत होकार-नकाराचं एक द्वंद्व जुंपलं होतं.
इतक्यात फोन वाजला. ताई होती.
'आज आरडीचा प्रोग्राम आहे, लक्षात आहे नं ?'

आह्ह !
एक ठोका चुकला. त्या चुकलेल्या ठोक्याचा हिशोब जुळवण्यात दोन मनं गुंतली आणि त्याच बेसावधपणी मी टीव्ही लावला. प्रोग्राम सुरु होत होता.
'ब्रम्हानंद सिंग' ह्यांनी 'राहुलदेव बर्मन'वर बनवलेली एक फिल्म - "पंचम - मुझे चलते जाना हैं".



अमीन सयानी बोलत होता.
'घर आजा घिर आये' मधला लताबाईंचा आवाज.. रखरखाटात पोळलेल्या अंगावर पावसाचे थेंब पडावे, तसं मला मोहरल्यासारखं वाटलं, अंकुरल्यासारखं वाटलं.
मग शम्मी कपूर आला. आशाताई मस्टच होत्या. मन्ना डे आले. मनोहारी सिंग, भूपिंदर, पंचमचे सहाय्यक, मित्र, अनेक जण आले. आजच्या पिढीचे काही संगीतकार आले. विशाल भारद्वाजने जेव्हा म्हटलं की, 'माझी अर्धी उर्जा माझ्या संगीतातून पंचमदांना वेगळं करण्यात जाते'; तेव्हा त्याच्या डोळ्यातली कृतज्ञता तीच होती जी शांतनू मोइत्राच्या डोळ्यात 'पियू बोले'वर पंचमची छाप कशी आहे, हे सांगताना होती. शंकर महादेवनने अगदी मनातलं वाक्य म्हटलं.. 'He was ahead of time.'

गाण्यांच्या जन्मकथा उलगडल्या जात होत्या. किस्से सांगितले जात होते. काही ऐकलेले, माहित असलेले; तर काही नवीन होते. सगळेच भरभरून बोलत होते. त्या त्या काळात, त्या त्या दिवसांत प्रत्येक जण घेऊन जात होता आणि परत आणत होता. मी झोके घेत होतो. शब्द वेचत होतो.
गुलजार आणि जावेद अख्तरचे शब्द मात्र वेचावे लागले नाहीत. ते रुतलेच काळजात.
'आयुष्यातल्या सर्वोत्तम सृजनात्मक दिवसांत जेव्हा एक कलाकार स्वत:च्या शोधात असतो तेव्हा तो मला भेटला होता.' हे म्हणणारा गुलजार स्वत:च एक कविता झाला होता. ती त्याची कविता त्याच्या नकळत, त्याच्या डोळ्यांतून, त्याच्या राखाडी मिशीपर्यंत वाहिली. कॅमेरा फार क्रूर असतो. त्याने ती टिपलीच.
कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात, पंचमला इंडस्ट्रीने कसं नाकारलं हे ऐकताना - 'सच कहता हूँ सारी दुनिया दुश्मन हो जाती हैं' - आठवलं.
पंचम गेल्यावर लोकांना पंचम दुप्पट, चौपट, किती तरी पट आवडायला लागला. त्याची उणीव जाणवायला लागली. एक पोकळी कायमस्वरूपी निर्वात झाल्याचं कळायला लागलं. जावेद अख्तरने त्याच्या काव्याच्या 'थेट'पणाप्रमाणेच अगदी सरलतेने म्हटलं, 'Time is kind with great people.' आणि क्षणभर मला सचिनदांनी सजवलेले नीरजचे अप्रतिम शब्द आठवले -

हमसे है ज़िंदा वफ़ा और हम ही से है तेरी महफ़िल जवाँ
जब हम न होंगे तो रो रो के दुनिया ढूँढेगी मेरे निशाँ

रडले. सगळे रडले.
तो गेला. वयाच्या ५५ व्या वर्षी.
आपल्या आजूबाजूला देशाला, समाजाला जळू किंवा वाळवीसारखे लागलेले अत्यंत नालायक लोक मरता मरत नसताना आयुष्यभर लोकांना फक्त आनंदच देणारा एक कलाकार मात्र फुंकर मारून पणती विझवावी, तसा संपला ?
तो एकटाच नाही, तो गेल्यानंतरच्या ह्या काळातली किती तरी गाणी न जन्मता मेलीत. अस्वस्थ विचार भंडावून सोडत होते.

गुलजार साहेब,
तुमचा हात अचानक सोडून निघून गेलेल्या मित्रासाठी तुम्ही म्हणता 'मैं अकेला हूँ धुंद में पंचम'. तुम्ही म्हणाल हो ! अगदी सहज म्हणाल. कारण म्हणायची, लिहायची आणि त्या शब्दांनी इतरांना झपाटायची तुम्हाला सवयच आहे. पण आम्ही ? आम्ही ज्या पोकळीत दिशाहीन झालो आहोत, त्यातून बाहेर कसे येणार ? आमची व्यथा आम्हाला सांगताच येत नाही. बस्स, फक्त पिळवटलेलं काळीज घेऊन, अनाहूत आसवं गिळून आम्ही पुन्हा आमचा गाडा ढकलत जात राहतो. Because this life just moves on and on and on..

ह्या सगळ्या वैचारिक आवर्तांत हेलकावत सोडून ती फिल्म संपली.

घर, आंधी, गोलमाल, आप की कसम, किनारा, हम किसीसे कम नहीं, यादों की बारात, दीवार वगैरे सुटलेले धागे मी विणत बसलो. इक दिन बिक जायेगा, मेरा कुछ सामान, तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी वगैरे राहिलेले सूर आळवत राहिलो.
पंचम उलगडायला दोन अडीच तास खूपच कमी आहेत. आभाळ पसरायला अंतराळाचा पट हवा. जमीन फक्त आभास देते. क्षितिजाचे कुंपण जसे फसवे असते, तसेच वेळेच्या बंधनामुळे येणारे 'The End' हे शब्दही खोटारडे असतात विषयांच्या बाबतीत. विषय अर्धाच ठेवून फिल्म संपली.
पार्टीही संपली होती. डोळ्यांतच ग्लास भरले, रिचवले आणि रितेही झाले होते. पण तहान शमली नव्हती. ही तहान कदाचित शमणारही नाही, आयुष्यभर किंवा तो परत आल्याशिवाय.

कालचा दिवस नेहमीसारखाच सुरु झाला होता. संध्याकाळ अनपेक्षित धनलाभाने झाली होती. रात्र 'फिर वोही रात हैं' पासून सुरु झाली आणि पहाट 'बीती ना बिताई रैना' ला झाली. सकाळी नेहमीच्या कोरडेपणाने मी 'रोजमर्रा'चं ओझं पाठीवर घेतलं.

क्यूँ की, मुझे भी चलते जाना हैं...........

....रसप....

Tuesday, June 24, 2014

एकतर्फी प्रेम - मुंबई

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्समधलं काम दुपारीच संपलं. मित्राला फोन केला. त्याला संध्याकाळशिवाय ऑफिसातून निघणं शक्य नव्हतं. जवळजवळ ३ तास होते. लगेच बस पकडली आणि चर्चगेटला आलो. 'सुखसागर' मधला 'नीर डोसा' हादडला आणि जवळच असलेल्या मरीन ड्राईव्हला आलो. कट्ट्यावर चढून ओबेरॉय हॉटेलपर्यंत चालत गेलो आणि परत आलो. मोकळी जागा बघून बसलो.
त्या अनंत जलाशयाच्या लाटा फेसाळत समोरच्या उभट, गोलसर, त्रिकोण वगैरे आकाराच्या सिमेंटच्या दगडांवर फुटत होत्या.
मुंबईला येऊन, मरीन ड्राईव्हला बसून स्वत:शी, हवेशी, समुद्राशी गप्पा मारायची आजकाल अनेकांची एक काव्यात्म इच्छा असते. पण खरं तर इथे बसल्यावर मला काहीच सुचत नाही. कदाचित तो भन्नाट वारा सगळे विचार उडवून नेत असावा. औरंगाबादला राहून ह्याच समुद्रासाठी मी लिहिलं होतं -

तूच घे माझ्या प्रियेची काळजी आता
सागरा, मी मुंबईचा राहिलो नाही

आता काही सुचत नव्हतं. सुचावं, असं वाटतच नव्हतं.
जून महिन्याचा उत्तरार्ध होता. आत्तापर्यंत पाऊस मुंबईला दोन-तीनदा तरी स्वच्छ धुवून काढतो. पण ह्यावेळी पाऊस नव्हता. हवा मात्र ढगाळ होती, त्यामुळे उन्हाचा त्रास नव्हताच. त्यामुळे माझ्यासारखे बरेच जण दुपारच्या वेळीही शांतपणे बसून होते.
ह्या मुंबईची अनन्वित घाण पोटात घेऊनही खिदळणारा तो समुद्र रोज काय काय बघत असेल ?
त्याच्या मर्जीविरुद्ध त्याचा वापर करून बधवार पार्कच्या किनाऱ्यावर कसाब आणि त्याचे साथीदार आले होते.
कफ परेड, मरीन ड्राईव्ह, नेपियन सी सारखे उच्चभ्रू भाग आणि वरळी कोळीवाडा, माहीमची खाडी सारखे निम्नमध्यमवर्गीयांची खुराडी असलेले भाग हा समुद्र एकाच वेळी बघतो.

'माहीम' म्हटल्यावर मित्र आठवला. तो चर्चगेटला भेटणार होता, तिथून आम्ही माहीमपर्यंत एकत्र जाणार होतो. चर्चगेट स्टेशनला आलो. एक नंबरच्या फलाटावर एका चौथऱ्यावर बसून मी येणाऱ्या, जाणाऱ्या, गाडीतून उतरणाऱ्या, गाडीत शिरणाऱ्या लोकांना न्याहाळत बसलो. पुरुष, बायका, मुलं, मुली, म्हातारे, अपंग, भिकारी, मालवाहक, तिकीट असलेले, विनातिकीट पकडलेले, पोलीस, नोकरदार, व्यापारी, विद्यार्थी, रिकामटेकडे, मवाली, तृतीयपंथी, सुंदर, कुरूप वगैरे हजारो चेहरे. हजारो ते, जे मी पाहिले. त्यापेक्षा किती तरी पट माझ्या नजरेतून सुटलेही असावेत. माणसांची एक फळी जात होती, दुसरी येत होती. समुद्राच्या एकामागून एक लाटा याव्यात तश्या. अविरत.
मनात क्षणाक्षणाला वेगवेगळे विचार येत होते.
ह्या प्रत्येक चेहऱ्याची किमान एक वेगळी समस्या असेल. प्रत्येकाची एक कहाणी असेल. एक विचारसरणी असेल. ह्या जागेवर कुणाचा प्रवास संपला असेल, कुणाचा सुरु होत असेल, तर कुणाचा अजून बराच बाकी असेल. कुणी आज प्रचंड आनंदी असेल, कुणी अतिशय दु:खी असेल.. पण तरी वेळ थांबत नाहीये. आयुष्य पुढे जातच आहे. जिथे नेईल तिथे हे सगळे मुकाटपणे जात असावेत.

अपनी मर्जी से कहाँ अपने सफ़र के हम हैं
रुख हवाओं का जिधर है उधर के हम है

निदा फाजलींनी हे शब्द ह्या चाकरमान्यांसाठीच लिहिले असणार, नक्कीच.

'शहर' असलेले काही शेर उगाच आठवले. इतर काही गाणी आठवली. कविता आठवल्या. मनात सगळ्यांनी एकत्र येऊन एक कल्लोळ केला. मनात हा कल्लोळ आणि बाहेर माझ्या भोवताली नुसती धावपळ. उद्घोषणा, धाडधाड गाड्या, त्यांचे भोंगे.
कर्कश्श्य !
अनेक अस्वस्थ चेहऱ्यांमध्ये माझाही एक भेदरलेला चेहरा त्या क्षणी मिसळला असावा. कुणी उशीर होतोय म्हणून बेचैन होता, तर कुणी अंगातल्या घामाच्या धारांनी बेचैन होता, कुणी अजून कशाने, पण मी विचारांच्या थैमानाने अस्वस्थ होतो.

लोक म्हणतात, मुंबई थकत नाही, हरत नाही. बरोबर आहे, हे शहर थकत नाहीच. पण लोक मात्र थकतात. अश्याच एखाद्या ट्रेनमध्ये स्फोट झाला असेल. अश्याच एका स्टेशनवर गोळीबार झाला असेल. प्रत्येक आघाताने लोकांची एक फळी बाद होत असते. काही गडप्प होतात तर काही गप्प होतात. गेलेल्या फळीच्या जागी दुसरी फळी मोर्चा सांभाळते. शहर थकत नाही, थांबत नाही, हरत नाही. कारण लोक बदललेले असतात.

मित्राची गाडी आली. मित्रही आला. समोरच्याच गाडीत शिरून दरवाजा पकडला. गाडी सुरु झाली. गप्पा सुरु होत्याच. चालत्या लोकलच्या दरवाज्यात लागणारी हवा आणि मघाची मरीन ड्राईव्हची हवा ह्यातला फरक मी शोधत होतो.
माहीम स्टेशनच्या बाहेरील टपरीवर आम्ही एकेक कटिंग प्यायलो आणि गप्पा मारत चालत निघालो. माहीम टी-जंक्शनपर्यंत आलो. इथून तो त्याच्या घरी आणि मी चेंबुरला. समोर कलानगरहून येणारा सहा पदरी रस्ता आणि पुढ्यात आडवा सायनहून माहीमकडे जाणारा दुसरा सहा पदरी रस्ता. दोन्ही रस्ते एखाद्या कोसळत्या धबधब्याप्रमाणे अंगावर येत होते. ह्या 'T' च्या दोन्ही कोनांत माहीमच्या खाडीला जाऊन मिळणारी गलिच्छ 'मिठी' नदी आणि माझ्या पाठीमागच्या बाजूस एक मोठा कत्तलखाना अन् दुतर्फा विस्तारलेली धारावी. ही मिठी नदी तीच, जिचं एक भलंमोठं गटार केलं जाऊन कागदोपत्री तिचा उल्लेख 'नाला' करून तिला हिणवलं गेलं आणि २००५ साली जिने त्याचा बदला घेतला.
दोन्हीकडून येणारे घाणेरडे वास नाकातले केस जाळत होते. रस्ता क्रॉस करून मी त्या गटाराच्या जवळजवळ मिठीत असलेल्या बस थांब्यावर गेलो. बस लगेच आली. सायनपर्यंत जाऊ शकत होतो. तिथून रिक्षा केली आणि घरी पोहोचलो.

दिवसभराच्या पळापळीने अंगाचा चिकचिकाट झाला होता. भूक लागावी, तशी अंघोळ 'लागली' होती. स्वच्छ झालो आणि त्या सातव्या मजल्यावरील घराच्या मोठ्या ७ फुटी खिडकीत येऊन उभा राहिलो.
पूर्व द्रुतगती महामार्ग अजगरासारखा पसरला होता. त्या विशाल अजगराच्या सुस्त शरीरावरून निरनिराळ्या रंगांच्या लहान-मोठ्या मुंग्या एका शिस्तीत पुढे पुढे जात होत्या. रस्त्याच्या पलीकडे एक १७ मजली आणि एक अजून किती तरी मजली टॉवर अत्यंत माजोरड्या नजरेने सभोवताल पाहत होते. मघाची 'धारावी' कुठल्या कुठे होती. पण ह्या माजोरड्यांच्या मागे, डावी-उजवीकडेही एक बकाल वस्ती सांडलेली होती. रस्त्यावरच्या झगमगाटाच्या अर्धवट उजेडात मला त्या झोपड्यांच्या डोक्यांवर लागलेल्या केबल टीव्हीच्या छत्र्या दिसत होत्या. धारावी, बेहरामपाडा ह्या व अश्या भागात मी अनेकदा फिरलेलो असल्याने मला समोरच्या वरवर बकाल दिसणाऱ्या वस्तीतही काही घरांत एसी लावलेले असावेत, हे जाणवत होतं.
असो.

मी डोक्यावर घरघरणारा पंखा बंद केला आणि बाहेरच्या खोलीत येऊन तिथल्या पंख्याखाली डोळे मिटून सोफ्यावर बसलो. मिटलेल्या डोळ्यांसमोरून 'टी-जंक्शन' चे दोन विस्तीर्ण रस्ते आणि आत्ताही कानांना मरीन ड्राईव्हच्या समुद्राच्या गाजेप्रमाणे जाणवणारा पूर्व द्रुतगती महामार्ग हलत नव्हता.
आता गुलजारनी छेडलं..

इन उम्रसे लम्बी सड़कों को मंजिल पे पहुँचते देखा नहीं
बस दौड़ती फिरती रहती हैं हमने तो ठहरतें देखा नहीं
इस अजनबी से शहर में जाना-पहचाना ढूँढता हैं......

चार-सहा महिन्यांतून जेव्हा कधी मुंबईची वारी होते, कमी-अधिक फरकाने हा अनुभव येतोच येतो. मी मुंबईचा असलो, तरी मुंबई माझी नाही झाली. माझीच काय ? ती कधीच कुणाचीच नाही झाली. नामदेव ढसाळ तिला 'रांड' म्हणतात, तेव्हा मला आवडत नाही. पण तिला फार तर 'प्रेयसी'च म्हटलं जाऊ शकेल. अर्धांगिनी नाही. आई, बहिण नाही. आणि मैत्रीणही नाहीच. हिचं रोजचं रूप वेगळं असलं तरी नखरा तोच. ही नादाला लावते. ही बोलावते, पण स्वत: येत नाही. ही भेटली, तरी समाधान होत नाही.

रात्रीच्या बसने मी परत औरंगाबादला जाणार. ह्याही वेळी अर्धवट समाधान आणि बाकी हुरहूर उरात घेऊन. पुढच्या भेटीपर्यंत मी पुन्हा व्याकुळ होईन. असे माझ्यासारखे लाखो असतील. पण मुंबईला फरक पडत नाही. ती वाहतच राहील, धावतच राहील, थकणार नाही, हरणार नाही आणि थांबणारही नाही. ती साद देईल आणि मी पुन्हा एकदा मूर्ख प्रेमिकासारखा ओढला जाईन.
पुढच्या वेळेसही हे समोरचे माजोरडे टॉवर असेच छद्मी हसतील. कदाचित त्यांच्या जोडीने अजून दोन उभे राहिलेले असतील.

....रसप....
२४ जून २०१४

Wednesday, June 18, 2014

माझे विस्मृतीत गेलेले निकाल

परीक्षा म्हणजे माझ्यासाठी नेहमीच एक सोहळाच असायचा. माझी प्रत्येक परीक्षा अत्युत्कृष्ट व आनंददायीच गेली. गडबड फक्त निकालात व्हायची. पण अतीव क्लेश दिलेल्या घटना लक्षात न ठेवता पुढे जात राहावे, ह्या विचारावर माझा दृढ विश्वास असल्याने आता मला माझ्या कुठल्याही परीक्षेतले गुण आठवत नाहीत. एव्हढे नक्की की, प्रत्येक वेळी ते नेत्रदीपकच होते.

घटना लक्षात नसल्या तरी काही क्षण मात्र आपल्या नकळतच आपल्या मन:पटलावर कोरले जातात. दहावीच्या निकालाचा क्षणही असाच काहीसा होता.
परीक्षा संपल्यापासून मला एकच आनंद होता की, 'परीक्षा संपली !'
दहावीची परीक्षा होऊन, निकाल लागून, मिळेल त्या मार्कांसह, मिळेल त्या कॉलेजात प्रवेश घेणेच मला जास्त महत्वाचे वाटत होते. कारण वर्गातल्या प्रत्येक मुलीकडून जबरदस्तीने राखी बांधून घ्यायला लागणाऱ्या काळात माझे शालेय शिक्षण झाले. माझ्या मनात मी एक वैश्विक भाऊ त्याच्या मर्जीविरुद्ध मारून मुटकून कोंबला होता. निकालपत्र हाती पडताच त्यातील आकड्यांपेक्षा Passed ह्या शेऱ्याचे मला कौतुक होते. आता घुसमट होणार नाही, हाच एक मोठा आनंद माझ्या मनातून वाकड्या झालेल्या टिफिनमधून बाहेर येणाऱ्या भाजीच्या रश्श्याप्रमाणे हळूहळू ओघळत होता. मिळालेल्या गुणांचं मला सुतक वगैरे अजिबात नव्हतं.

माझे गुण मला नेमके आठवत नसले तरी त्यांचं एक चांगलं होतं. ते अश्या टप्प्यातले होते की माझ्यासमोर शाखा व कॉलेज ह्यांचे फार मोजकेच पर्याय होते. इतर अनेक मुलांना विशिष्ट शाखा व विशिष्ट कॉलेज निवडण्यासाठी करावा लागलेला संघर्ष मला अजिबात करावा लागला नव्हता. मी जी शाखा व जे कॉलेज निवडले, तिथे माझा नंबर शेवटच्या यादीत अगदी सहज लागला. 'कॉलेजला जाणार' ह्याच आनंदात हुरळून गेलेल्या आपल्या निरतिशय निरागस मुलाच्या चेहऱ्यावरचे निष्पाप हसू माझ्या आई, वडील व ताईला मी सदासुखी होणार असल्याची ग्वाही देत होते.

हिरवट मिसरूड फुटलेला पंधरा-सोळा वर्षांचा मी पहिल्या दिवशी कॉलेजला मोठ्या टेचात गेलो होतो. नवा कोरा शर्ट आणि जीन्स, हँगरला लटकवलेल्या कपड्यांसारखे दिसत असले तरी माझा तोरा मात्र मी स्कीनफिट्ट टी-शर्ट घातल्यासारखाच होता. तेल थापून चापून बसवलेले आणि कोंबडा काढलेले केस मला जॉय मुखर्जीसारखा लुक देत असले तरी माझ्या नजरेत मात्र मी तुरा काढलेला आमीर खानच होतो.
लौकरच मी माझ्या भोवतालच्या माधुरी दीक्षित्स, काजल्स, राणी मुखर्जीज चाणाक्ष नजरेने हेरल्या. पण मी जिथे जिथे नेम लावायचो, ते ते लक्ष्य माझा बाण सुटायच्या आतच दुसऱ्याच एखाद्या बाणाने उडवले जात असे. मग हळूहळू मी नेम धरणंच सोडून दिलं. तरी अंदाधुंद तिरंदाजी चालूच ठेवली.
स्वभावत:च खोलाकडे वाहत जाणाऱ्या पाण्याप्रमाणे मीही दुसऱ्या मजल्यावरील अकरावीच्या वर्गाकडून कॉलेजबाहेरच्या रस्त्याकडेच्या कट्ट्यावर लौकरच वाहत पोहोचलो. देशासमोर असलेल्या खेळ, राजकारण, सुरक्षा, सामाजिक व्यवस्था, आर्थिक परिस्थिती ई. आणि इतर मुलांसमोर असलेल्या प्रेम, शिक्षण, तात्विक मतभेद, घरच्यांचा त्रास, आर्थिक चणचण ई. गहन प्रश्नांवर मी रोज, माझ्यासारख्याच इतर काही हौशी स्वयंसेवकांसह चर्चा, मार्गदर्शन करत असे. आमच्या चर्चांतून मौलिक ते शिकून बरेच जण पुढे गेले पण आम्हाला कधी त्याचायत्किंचितही मत्सर वगैरे वाटला नाही. परंतु, ह्या सगळ्या व्यापात माझी कनिष्ठ महाविद्यालयातली दोन वर्षं विदर्भ, मराठवाड्याच्या आकाशातल्या ढगांप्रमाणे चुटकीसरशी निघून गेली आणि समोर बारावीची परीक्षा रुक्ष दुष्काळासारखी 'आ' वासून उभी राहिली. वर्षातले बहुतेक दिवस कॉलेजबाहेरील कट्ट्यावर मीच इतरांचा क्लास घेत असल्याने मला स्वत:ला अभ्यासासाठी वेळ मिळणं कठीण होतं. पण माझी ही प्रामाणिक अडचण बोर्ड समजून घेणार नव्हतंच आणि ज्याप्रकारे मला पाचवीत असताना नृत्यकौशल्याच्या नावाने बोंब असतानाही केवळ उंची कमी असल्याने पुढच्या ओळीत राहून ग्रुप डान्स करावा लागला होता, त्याच प्रकारे ह्या परीक्षेलाही बसावंच लागलं.
अखेरच्या षटकात ४० धावा हव्या असताना, अखेरचा खेळाडू प्रत्येक चेंडूला ज्या तावातावाने टोलवत अशक्यप्राय आव्हानाचाही पाठलाग करतो, त्याच लढाऊ बाण्याने मी प्रत्येक पेपर टोलवला होता, इतकंच मला लक्षात आहे. आधीच म्हटल्याप्रमाणे प्रत्यक्ष निकाल मी कधीच विसरून गेलो आहे.

आजकालच्या मुलांना, एक डोळा बंद करून पेपर लिहिला तरी नव्वद-बिव्वद टक्के मिळतात. मला त्यांची एकच काळजी वाटते की इतके मार्क्स मिळाल्यावर पुढे नक्की काय करायचं ह्या विचाराने ते किती गोंधळत असतील. Thank god, मला असा प्रश्न कधी पडलाच नाही. कारण हा प्रश्न माझ्यासाठी माझ्या निकालानेच निकालात काढलेला असायचा.

जाता जाता एक विचार मनात आला. गुण लक्षात न राहण्यामागे अजून एक कारण असावं. गेल्या कित्येक वर्षांत मला कुणीही त्यांबद्दल विचारलंच नाहीये ! असं का बरं ?

....रसप....
१८ जून २०१४

Monday, June 16, 2014

माझी-तिची संभाषणे..

तू बालमन आहेस अन् हातातले मी खेळणे*
मर्जीप्रमाणे खेळलो तर ठीक, अथवा तोडणे

माझी-तिची संभाषणे बस्स् भांडणाची कारणे
ती टाळल्याचे बोलता मी बोलण्याचे टाळणे

असतात काही सांडलेले शब्द माझ्याभोवती
ज्यांना कधी ओळींमधे जमलेच नाही मावणे

ह्या जीवघेण्या शांततेला तोड जाताना तरी
जपण्यास दे जखमा उरी, इतकेच आहे मागणे

ओथंबल्या डोळ्यांत पाणी अडवणे सोपे नसे
ढगही जिथे भरतो तिथे नक्कीच असते सांडणे

भडिमार वेळेचा तुझा थोडाच थांबव, जीवना
जगलो कधी जे दोन क्षण राहून गेले वेचणे

'टेरेसवाले घर हवे' शहरात आहे मागणी
गावात त्यांच्या पसरली ओसाडलेली अंगणे

....रसप....
१४ जून २०१४

(* - हा शेर/ मतला वैभव कुलकर्णी (वैवकु)च्या 'खेळणे' कवितेसाठी. :-) )

Tuesday, June 10, 2014

खुशनुमा सहर !!

सकाळी ९:४२ ते ९:४७ च्या दरम्यानची वेळ.
ठाण्याहून दादर अन् दादरहून महालक्ष्मी ट्रेनने आणि महालक्ष्मीहून वरळी बसने, अश्या उड्या मारत आणि नेहरू सेंटरच्या स्टॉपवर उतरून रस्ता क्रॉस करून पलीकडच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावरील ऑफिसकडे, लिफ्टचा नाद सोडून, धाव घेत कसं-बसं ९:४५ चं 'पंचिंग' गाठायचं किंवा एखाद्या मिनिटाने चुकल्याने चुकचुकत ऑफिसमध्ये, आपल्या डिपार्टमेंटमध्ये शिरायचं, की उजवीकडच्या कोपऱ्यातून आवाज यायचा -

"खुशनुमा सहर, रणजित भाई !"

व्होराजी.
साधारण माझ्या वडिलांच्या वयाचे असतील. पण गुजराती परंपरेप्रमाणे ते सगळ्यांना 'भाई'च म्हणत, अगदी आमच्या 'हेड'लाही.

प्रचंड धावपळ करून, कावलेल्या चेहऱ्याने आम्ही ऑफिसला पोहोचायचो आणि व्होराजींचा प्रसन्न चेहरा एका क्षणात आमचा सगळा वैताग दूर करायचा.
'खुशनुमा सहर' हे ते फक्त मलाच म्हणत. बाकी सर्वांना 'गुड मॉर्निंग'. मी किंचित कवी आणि गायक आहे, हेच त्यांना मला जराशी स्पेशल ट्रीटमेंट देण्यासाठी पुरेसं होतं.
व्होराजी खरं तर निवृत्तीचं वय गाठलेले होते. त्यांना निवृत्तही व्हायचं होतं. पण कंपनीतील एक सर्वात जुना माणूस होता तो. त्यांना मालकांनी फक्त येत जा, जितकं जमेल तितकं काम करा, अशी मुभा दिली होती. व्होराजींचं म्हणणं एकच होतं. 'सर, अब मुझे म्युझिक सुनना है. जी भर के मुकेश सुनुंगा और गाऊँगा. यहाँ आऊंगा तो वक़्त नहीं मिलेगा !' सरांनी आयटीला ताबडतोब आदेश सोडला की, व्होराजींना फुल्ल इंटरनेट, साउंड कार्ड वगैरे जे काही लागेल सगळं देणे.
बस्स. काम उरकल्यावर उरलेल्या वेळात इतर लोक टवाळक्या करत, व्होराजी युट्युबवर मुकेश ऐकत. ऐकता ऐकता गुणगुणत...

'संग तुम्हारे दो घडी बीत गयें जो पल
जल भर के मेरे नैन में आज हुएँ ओझल
सुख लेके दुःख दे गयी दो अँखियाँ चंचल'

सुंदर गात. एकदम 'व्हॉइस ऑफ मुकेश'च. त्यांचं गाणं, गाणी ऐकणं सर्वांना मान्य होतं. मालकाने अप्रूव्ह केलं होतं म्हणून नाही. मनापासून. आमचा हेड ऑफ द डिपार्टमेंट त्यांच्या अर्ध्या वयाचा असेल. त्याने मुकेशच काय, कुमार सानुच्या आधीचं काही ऐकलेलंच नव्हतं आणि इतर बहुतेक जणांनीही. पण तरी, व्होराजींचा 'चार्म' असा काही होता की लोक त्यांचा आवाज कानात साठवून घ्यायचे.

खरं तर मला मुकेश कधीच आवडला नाही. पण मुकेश गाणारे व्होराजी आवडायचे. जीवापाड प्रेम होतं त्यांचं मुकेशवर. आणि मग कधी जरा फुरसत मिळाली, मीही मोकळा असलो की लगेच एखादा नग्मा मलाही ऐकवायचे. अधूनमधून बाबूजीही ऐकत असत ते. 'सखी मंद झाल्या तारका..' त्यांनी गुजराती उच्चारांत मला ऐकवलं आहे. 'बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे..' नंतरचं त्यांचं 'वाह, क्या बात है' नेहमी लक्षात राहील.

कुणाचा वाढदिवस वगैरे असेल, तर आम्ही केक आणायचो. तेव्हा व्होराजींचं गाणं ठरलेलंच असायचं. अश्या कुठल्या छोटेखानी फंक्शन, पार्टीमध्ये, केक कापण्यात त्यांना काही रस नसायचा. त्यांना नंतर एखादं गाणं ऐकवायचं असायचं आणि माझ्याकडून ऐकायचं असायचं, बस्स. मग मीही एखादा किशोर कुमार गाऊन घ्यायचो !

'ऐसे उजड़े आशियाने तिनके उड़ गयें
बस्तियों तक आते आते रस्ते मुड़ गयें'

व्होराजी खुश ! जागेवर परत आल्यावर लगेच मला त्यांनी गायलेलं आणि मी गायलेलं, अशी दोन्ही गाणी युट्युबवर ऐकवत. उरलेला अख्खा दिवस त्या गाण्यांतच जगत, जगवत.

पावणे दोन वर्षं तिथे काम केल्यावर मी नोकरी बदलली. औरंगाबादला आलो. पण तरी व्होराजी आठवत राहिले. कुणी 'गुड मॉर्निंग' म्हटलं की ते आठवत. कुठे मुकेश कानावर पडला की, व्होराजी आठवत.
त्यांचा नंबर मिळवला आणि परवाच, जवळजवळ साडे चार वर्षांनी त्यांना फोन केला. त्यांनीच उचलला. त्यांच्या 'हलो'ला मी 'खुशनुमा सहर, व्होराजी' इतकंच म्हटलं.
समोरून आवाज आला.. 'अरे कैसे हो रणजित भाई !!'
व्वाह ! मस्त वाटलं. तीन शब्दांत कुणी आपला आवाज इतक्या वर्षांनंतरही ओळखतंय. पुढची काही मिनिटं दिलखुलास गप्पांत गेली. त्यांनीही कंपनी सोडली आहे, हे मागेच एकदा कळलं होतं. आता त्यांचं 'रुटीन' त्यांच्या मनासारखं आहे. म्हणाले - 'अब सारा दिन सिस्टम पे गाने सुनता हूँ. वाईफ कभी कभी परेशान हो जाती हैं. मगर सह लेती हैं ! हाहाहाहा!'

काही वेळेस आपसांत काही नातं नसतं. मैत्रीही नसते. कुठलीही ओढ नसते. पण दोन व्यक्तींमध्ये एखादा असा बारीकसा धागा असतो, जो त्यांना जोडत असतो. पण हा बारीकसा धागा इतका मजबूत असतो की काळाचा ताण कितीही वाढला तरी तो जसाच्या तसाच राहतो. 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावक:' अश्या आत्म्याचाच तो धागा असावा बहुधा.
माझ्यात आणि व्होराजींत असाच एक धागा आहे. जो कधीच तुटणार नाही.
त्यांनी मला आग्रहाची विनंती किंवा विनंती वजा आज्ञा केली आहे की, 'रणजित भाई, अगली बार मुंबई आओ, तो एक पूरा दिन कांदिवली आना हैं, मेरे घर. पूरा दिन गायेंगे. महफ़िल जमायेंगे.'

ज़रूर व्होराजी.. मैं ज़रूर आउंगा. मुझे मुकेश पसंद नहीं मगर फिर भी सुनूंगा और हो सके तो एक-दो मुकेशी नग्मे मैं भी सुनाऊंगा !

- रणजित पराडकर
Related Posts Plugin for WordPress, Blogger...