Friday, September 21, 2012

जिंदगी ना मिलेगी दोबारा.. (Zindagi Na Milegi Dobara)

'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हे नाव सिनेमाचं सार स्वत:च सांगतं.

रोजच्या धावपळीने आपल्यातील काही जण जगण्यापुरती 'सोय' करू शकतात, काही 'आज'सोबत 'उद्या'साठीही तजवीज करतात तर काही आज-उद्या-परवा सगळ्याची सोय लागलेली असतानाही अजून सुखकर व सुरक्षित आयुष्यासाठी - ज्याला काहीच निश्चित मर्यादा नाही - झिजत राहातात. (काही असेही असतात जे काहीच करत नाहीत, ते जिवंत आहेत ह्यावर माझा विश्वास नाही) ह्या धकाधकीत खरोखरच मला, स्वत:ला नक्की काय हवं आहे? माझ्यासाठी एक मनस्वी आनंद मिळण्याची/ मिळवण्याची गोष्ट काय आहे ? आज मी जे काही करतोय, तेच मला हवं होतं का ? हवं आहे का ? उद्या मी जे काही करणार आहे, त्याचा 'आज' हा पाया असेल तर तो माझ्या मनात भक्कम आहे का ? असे अनेक प्रश्न हा सिनेमा कुठलंही अतिरंजन न करता एका चंचल मनात निर्माण करतो आणि अखेरच्या दृष्यात निर्भेळपणे हसणाऱ्या तीन तरुणांच्या डोळ्यांत 'आता मी जगणार आहे..' ह्या भावनेने जी चमक दिसून येते, तिचा हेवा वाटतो !

इम्रान (फरहान अख्तर), कबीर (अभय देओल) आणि अर्जुन (हृतिक रोशन) ह्या तीन मित्रांची ही कहाणी. तीन वेगवेगळ्या ठिकाणी राहाणारे हे तिघे मित्र, कबीरचं लग्न ठरलं असल्याने Bachelor's Trip च्या निमित्ताने स्पेनला भेटतात. ट्रीप ही असते की तिघांनी आपापल्या मर्जीचे तीन वेगवेगळे Adventure Sports निवडायचे आणि तिघांनी एकत्र ते करायचे. बाकी कहाणी सांगण्याची, सिनेमा जुना असल्याने व बहुतेक जणांनी पाहिला असायची शक्यता असल्याने आवश्यकता वाटत नाही. पण ह्या सहलीत टप्प्याटप्प्यावर येणाऱ्या अनुभवांतून, भेटणाऱ्या व्यक्तींकडून हे तिघं मित्र स्वत:च स्वत:ला हळूहळू ओळखू लागतात आणि सहलीच्या शेवटापर्यंत त्यांच्यात आमुलाग्र बदल घडतो.


आयुष्याचं तत्वज्ञान सांगणारे 'आनंद - बावर्ची - मिली' पासून 'आशायें - बर्फी' पर्यंत अनेक सिनेमे झाले. त्यातील बहुतेक सिनेमे असे होते की कुठल्याही पिढीच्या व्यक्तीला 'पटतील'. 'ज़िंदगी ना मिलेगी दोबारा' तसा नाही. कदाचित माझ्या वडिलांची पिढी ह्या सिनेमाशी नातं नाही जोडू शकणार. कारण ह्यातील बहुतेक संज्ञा (Concepts) आजच्या पिढीच्या आहेत. सिनेमातील पात्रांचे विचार, संवाद कुठेच कुठलं कालजयी तत्वज्ञान सांगत नाहीत. संपूर्ण 'फोकस' 'आज'वर आहे.

अभय देओल, फरहान अख्तर आणि ह्रितिक रोशन - तिघांनीही आपापल्या भूमिका जीव ओतून वठवल्या आहेत. मला हे तिघेही आजच्या पिढीतले 'विचारी कलाकार' वाटतात. आजच्या घडीला सृजनातून मिळणाऱ्या अतुलनीय आनंदाची जागा, निर्मितीला मिळणाऱ्या पैश्यातील किमतीने घेतली असल्याने वर्षानुवर्षं त्याच त्याच भूमिका करून आपले स्थान भक्कम करून झाल्यावरही बहुतेक सुपरस्टार प्रयोगशीलतेला फाटा देतात. पण खरा कलाकार नाविन्याचा भुकेला असतो. प्रयोगशीलतेची कास धरणारा असतो. फार थोड्याच अवधीत हे तिघेही नट 'कलाकार' बनू पाहत आहेत, ह्यासाठी मनापासून दाद.

अगदी छोट्या भूमिकेत नसिरुद्दीन शाह आपला 'क्लास' दाखवून देतो.
'सच.. होता क्या हैं ? हर एक का अपना अपना Version हैं सच का !' - इतक्या सहजतेने बोलतो की पटवून देण्या-घेण्याची आवश्यकताच नाही ! हा अभिनेता तुमचे दोन्ही हात पकडून तुमच्याकडून टाळी वसूल करतो, 'वसूल' !

'शंकर-एहसान-लॉय'चं संगीत हलकं फुलकं आहे. उडे खुले आसमानों में, देर लगी लेकिन आणि सेनोरिटा ही गाणी मस्त जमून आली आहेत.  

जावेद अख्तर ह्यांच्या कविता ह्या सिनेमात खूप महत्वाचं स्थान घेतात.

हवा के झोकों के जैसे आज़ाद रहना सीखो,
तुम एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो,
हर एक लम्हे से तुम मिलो खोले अपनी बाहें,
हर एक पल, एक नया समां देखें ये निगाहें..

अश्या शब्दांतून जावेद साहेब आजच्या पिढीशी थेट संवाद साधतात. मी वर उल्लेख केलेली Generation Gap जावेद साहेबांना लागू होत नाही, तेव्हा समजतं की 'जे न देखे रवी..' का म्हटलं जातं.

'कार्लोस कॅटलन' ची छायाचित्रण सुंदर आहे. सगळीच दृश्यं अगदी नेत्रसुखद आहेत.
त्याव्यतिरिक्त स्काय डायव्हिंग व समुद्रातील दृश्यं अप्रतिम सुंदर चित्रित केली गेली आहेत.

छोट्या छोट्या प्रसंगांतून, कृतींतून व्यक्तिरेखा उलगडत जातात. ट्रीपसाठी निघतानाचं इम्रान व अर्जुनचं सामान घेणं, Bag भरणं आलटून पालटून दाखवताना दोघांमधला फरक लगेच दिसून येतो. दिग्दर्शक झोया अख्तरने प्रत्येक फ्रेमकडे काळजीपूर्वक लक्ष पुरवल्याचं समजून येतं.
एक चित्रकार त्याच्या कॅनव्हासवर व्यक्त होतो, एक गायक त्याच्या मैफलीत व्यक्त होतो आणि एक कवी त्याच्या शब्दांतून.. प्रत्येक कलाकार त्याच्या सृजनातून व्यक्त होत असतो. तसाच एक दिग्दर्शक त्याच्या सिनेमातून व्यक्त होतो. सिनेमा संपल्यावर जेव्हा एक चित्र - एक मैफल - काव्य पूर्ण झाल्याची अनुभूती येते, तेव्हा तो सिनेमा खऱ्या अर्थाने यशस्वी झाला असं मी मानतो.

'जिंदगी'ला 'जिंदगी'ने दिलेली 'जिंदगी'ची भेट अनुभवायची असेल तर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' अवश्य पाहावा. आजची पिढी नक्की काय आहे ? हे समजण्यासाठी 'ज़िंदगी ना मिलेगी दोबारा' पाहावा.

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहें हो तो ज़िन्दा हो तुम,
नज़र में ख्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो तो ज़िन्दा हो तुम..

....रसप....

1 comment:

  1. arrrr .... mala jar asa lihita aal asat tar ....

    mast lihilay... picture baghun jitka anand milala, titkach he parikshan vaachun ... keep it up.

    Vijay Deshmukh

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...