Friday, September 20, 2013

तुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..

तुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा

घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा
तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा
हरेक फांदीस पापणी, किती आसवांस माळते
उदासवाणी किती फुले, गळून पडली बघून जा

तुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा

अनेक थेंबांस थोपवुन, पन्हाळ खिडकीत रांगते
तुला पाहण्या पुन्हा पुन्हा, मुजोर वाऱ्यास सांगते
झुळूक येते घरात अन्, सुन्या मनाने परत फिरे
समोर त्यांच्याच एकदा, झुळूक होउन निघून जा

तुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा

बराच अवधी सरूनही, अजून संध्या न मावळे
किती बरसले मेघ तरी, अजून आकाश ओघळे
भिजून पाऊलवाट ही, सुकेल ऐसे न वाटते
कवेत माझ्या अखेरचे, भिजून तू विरघळून जा

तुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा

नकोच येऊस तू पुन्हा, नकोच दावूस आसही
उधाणलेला समुद्र मी, नको किनारा भकासही
अथांग डोळ्यांतुनी तुझ्या, खळाळुनी हासलो कधी
जुनी तरलता तुझीच तू, पुन्हा जरा आठवून जा

तुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा

....रसप….
२० सप्टेंबर २०१३

2 comments:

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...