Wednesday, December 28, 2016

शब्द शोधत थबकली कविता जशी

चल मना, ये, बस इथे माझ्याजवळ
आज माझ्याशी जरा संवाद कर
सांगतो ख्यालीखुशाली मी तुला
हात मित्रासारखा हातात धर

एकटेपण दाटते, अंधारते
पसरतो काळोख माझ्या आतला
भोवताली फक्त मी माझ्याविना
जाणिवांचा खेळ फसवा चालला

एक रस्ता मूक होउन धावतो
एक गोंधळतो हरवल्यासारखा
गुरफटे पायांत रस्ता जो कुणी
तो स्वत:पासून दिसतो पारखा

अक्षरे विरलीत एकांतात अन्
शब्द गोंगाटात भरकटले कधी
भावनेचा वेध घेउन नेमका
खूप आहे लोटला कालावधी

ही व्यथा, ही वेदना, घुसमट अशी
सांग सांगावी कुणाला मी कशी
जायचे आहे कुठे नाही कळत
शब्द शोधत थबकली कविता जशी

....रसप....
१२ जून २०१५ ते २८ डिसेंबर २०१६

Saturday, December 10, 2016

एकशे त्रेपन्न मिनिटांची 'राख' - (Raakh (1989))

'राख' म्हणून एक सिनेमा १९८९ ला येऊन गेला. बासुदांचे (बासू भट्टाचार्य) पुत्र आदित्य भट्टाचार्य दिग्दर्शक आहेत. आमीर खानचा हा दुसराच सिनेमा. बहुतेक मर्यादित रिलीज झाला होता कारण काही दिवसांपूर्वी एका मित्राने त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये उल्लेख केला तोपर्यंत मला असा कुठला सिनेमा आहे, हेसुद्धा माहित नव्हतं !
युट्युबवर ह्याची प्रिंट आहे म्हणून आवर्जून पाहिला.

जर तंदुरी चिकनला साखरेच्या पाकात घोळवलं किंवा गुलाब जामसोबत हिरवी चटणी घेतली किंवा टीव्हीवर येणाऱ्या कुठल्याश्या सुमार जाहिरातीत दाखवतात तसं ब्लेझर, टाय वगैरेखाली लुंगी नेसली किंवा सायकलला ट्रकचं टायर लावलं किंवा... अशी अजून बरीच उदाहरणं देता येतील, तर ते किती विजोड वाटेल, तसंच काहीसं ह्या 'राख'चं झालं आहे. कथानक फुल्टू व्यावसायिक आणि बळंच त्याला समांतर सिनेमाच्या वाटेवर ओढलंय.

एकंदरीत हा सिनेमा तुकड्या तुकड्यांत हास्यास्पद, रटाळ आणि फुसका झाला आहे.
{मी अख्खी स्टोरी सांगणार आहे. काहीही न लपवता. स्पॉयलर वाटत असेल तर पुढे वाचू नका !}

तर काय असतं की, आमीरचं एकीवर प्रेम असतं. त्यांचं बहुतेक अफेअर असतंही, पण ब्रेक ऑफ होतो. सिनेमात ते दाखवलेलं नाहीय. डायरेक्ट ब्रेक ऑफ नंतर पुढे सुरु होतो सिनेमा. एका पार्टीत तिला पार्टीबाहेरचा एक जण छेडतो. न राहवून आमीर त्याला एक ठोसा मारतो. त्या गुंडासोबत त्याचे ४-५ पंटर असतात. पण तो काही करत नाही. गपगुमान निघून जातो ! (का ? विचारायचं नसतं, कारण हा समांतर सिनेमा आहे. सगळं कलात्मक असतंय !) पार्टी संपल्यावर आमीर तिला घरी सोडायला जात असताना त्याची गाडी ते गुंड लोक रस्त्यात अडवतात, रस्त्यावरच त्याला बदडतात आणि तिचा बलात्कार करतात. ह्या प्रकारानंतर आमीर डिस्टर्ब होतो. डिप्रेस होतो. स्वत:ला अपराधी समजायला लागतो. तो पोलिसांत जातो, पण तिथे त्याला कुणी विशेष दाद देत नाही. In fact, पोलीस इन्स्पेक्टर झालेला पंकज कपूर त्या रात्री रस्त्यावर बलात्कार होत असताना तिथूनच आपल्या बाईकवर गेलेला असतो आणि आमीरने त्याला मदतीसाठी हाका मारलेल्या असतात. तो आमीरचं ऐकून घेतो आणि त्याला मदत करायचं आश्वासन वगैरे देतो. दुसरीकडे डिप्रेस्ड आमीरला त्याचा बाप झापून काढतो. मग हा थेट घर सोडून रस्त्यावर राहायला लागतो. (का ? विचारायचं नसतं, कारण हा समांतर सिनेमा आहे. सगळं कलात्मक असतंय !) एकदा पंकज कपूर त्याला झापत असताना अचानक आमीरला बोलायला सुचतं की, 'अरेच्या लबाडा... त्या रात्री तूच तर होतास बाईकवर ! मी तुला 'हेल्प.. हेल्प' बोललो, तर तू पळून गेलास की !' ही गोष्ट त्याला इतके दिवस बोलावीशी वाटत नाही. (का ? विचारायचं नसतं, कारण हा समांतर सिनेमा आहे. सगळं कलात्मक असतंय !) हा पंकज कपूर म्हणे अनेक दिवस त्या गुंडाच्या मागावर असतोच पण त्याला पुरेसा पुरावा वगैरे मिळत नसतो ! असेल बुवा.. पण एकदाच आमीर त्याला इमोशनल डोस देतो तर त्यावरून ह्याला काय सुरसुरी येते की, हा डायरेक्ट एका पार्टीत त्या गुंडावर शाब्दिक चढतो आणि बंदूकही दाखवतो, हवेत फायरही करतो ! मग काय ? सस्पेंड...!! हे सोयीचं व्हावं म्हणून कमिशनरही त्या पार्टीत असतोच. मग सस्पेंड झाल्यावर हा आमीरला हुडकून काढतो आणि त्याला बदल्यासाठी ट्रेन करतो. त्याच्याकडून व्यायाम वगैरे करवून घेतो. लैच फिल्मी. पण ह्या सगळ्याला अजिबात फिल्मी मानायचं नाही. का ? कारण हा समांतर सिनेमा आहे. सगळं कलात्मक असतंय ! बराच व्यायाम केल्यावरही आमीरचे स्नायू टरटरत वगैरे नाहीत. पण ट्रेनिंग पुरेसं झालेलं असतं. मग पंकज कपूर त्याला एक पिस्तुल आणून देतो. ह्या प्रसंगी आमीर जी प्रतिक्रिया देतो ती म्हणजे लेखक-दिग्दर्शकांच्या खुळचट आणि बिनडोकपणाचा कडेलोट आहे. त्यांच्या कल्पनाशक्तीला मनापासून दाद द्यायला हवी असं हास्यास्पद वर्तन, एक सूडाला पेटलेला, कठोर शारीरिक प्रशिक्षण घेत असलेला मनुष्य ते पिस्तुल पाहून करतो. पिस्तुल समोर पाहून, आमीर ते हातात घेतो आणि अक्षरश: लहान मुलाप्रमाणे ते इथे, तिथे रोखून तोंडाने 'ढिश्क्यांssव.. ढिश्क्यांssव' असे आवाज करतो.
हे दृश्य पाहून मी तत्क्षणी सिनेमा बंद केला. कारण तो एक मानसिक धक्का होता. धक्का पचवला आणि मग तमाशा पूर्ण करावा म्हटलं.
ह्यानंतर आमीर बाजारात जाऊन भाजी घेऊन यावी त्या सहजपणे वेगवेगळ्या जागी जाऊन गुंडाच्या डाव्या, उजव्या हातांना मारत सुटतो. हे मारणं, त्याचं चित्रण म्हणजे बाष्कळपणाचा अजून एक नमुना. कुठेही त्यातली तीव्रता जाणवतही नाही.
ह्या फुसकेपणामागे महत्वाचा हात पार्श्वसंगीतकार रणजित बारोटचा आहे. पडद्यावर चाललेल्या प्रसंगाशी अधिकाधिक विसंगत पार्श्वसंगीत कसं देता येईल, ह्याचा एक प्रामाणिक प्रयत्न ते सिनेमाभर करतात. (असं खरं तर बोलायचं नसतं. कारण हा समांतर सिनेमा आहे. सगळं कलात्मक असतंय !) सिनेमात एकही गाणं नाही, ह्यासाठी मात्र मनापासून आभार मानायला हवे. कारण तेव्हढ्या मिनिटांनी ही रटाळ लांबी थोडीशी कमी झाली ना !

सिनेमा आमीरच्या आत्मकथनातून उलगडत जातो. त्याचा दुसराच सिनेमा आहे, त्यामुळे त्याचं ते बोलणं सराईत नाही. एकसुरी, अभिनिवेशशून्य आणि (जसं आजही त्याचं बोलणं बऱ्याचदा असतं तसंच) सपाट कथन सिनेमाभर कंटाळा समसमान राहील, ह्याची दक्षता घेतं.
सिनेमाच्या शेवटी आमीर म्हणतो, 'यह मेरी ज़िन्दगी की राख हैं'
सिनेमाच्या शेवटी आपण म्हणतो, 'यह मेरे १५३ मिनिटों की राख हैं'

युट्युबवरची प्रिंट खराब असावी कदाचित पण संपूर्ण सिनेमा अतिशय काळोखा आहे. त्याचा कंटाळा स्वतंत्रपणे येतो.
छायाचित्रक संतोष सिवन आणि संकलक ए. श्रीकर प्रसाद ह्या दोन दिग्गजांचा हा पहिला सिनेमा होता. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, असं म्हणतात. बहुतेक सिवन व प्रसाद साहेबांनी ह्या सिनेमानंतर नवीन पाळणे घेतले असावेत.

सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेता (पंकज कपूर), विशेष पुरस्कार (आमीर खान) आणि सर्वोत्कृष्ट संकलन (ए. श्रीकर प्रसाद) असे तीन राष्ट्रीय पुरस्कार ह्या सिनेमाला मिळाले आहेत. (इथे आपण कुत्सितपणे हसू शकतो.)



खरं तर सुरुवातीला येणाऱ्या नामावलीत 'Dialogue' ऐवजी 'Dialog' पाहिल्यावर मला जे आश्चर्य वाटलं होतं, त्यावरुनच हे समजायला पाहिजे होतं की सिनेमा किती काळजीपूर्वक बनवला असेल. पण आपलं पण - 'वोह नहीं सुनता उसको जल जाना होता हैं' - असंच आहे ना ! आणि थोडा डाऊट येऊनही मीच माझ्याकडे दुर्लक्ष केलं. कारण हा समांतर सिनेमा आहे. सगळं कलात्मक असतंय !

- रणजित पराडकर

Sunday, December 04, 2016

हव्याश्या वेदनेवर काळ अडला

परीटाच्या घडीची कापडे झाली नकोशी
हवासा वाटतो बेबंद वारा
व्यथांच्या फेनलाटा तुंबल्या माझ्या उश्याशी
मला माझीच सीमा, मी किनारा

सुखाची वाढली आहे उधारी फार आता
हिशोबाची वही जाळून टाका
खुणावू देत काट्यांच्या मला पाऊलवाटा
फुलांचे चेहरे चुरडून टाका

कफल्लक होत जाणे पाहतो आहे स्वत:चे
कुणाला वाटते हे आत्मघाती
मुठीतुन सांडते वाळू तसे ऐश्वर्य माझे
इथे राहीन मी होऊन माती

तसे काहीच नाही पण तरी भरपूर वाटे
रित्या संपन्नतेवर जीव जडला
मनाच्या किलकिल्या दारातुनी हुरहूर दाटे
हव्याश्या वेदनेवर काळ अडला

....रसप....
०४ डिसेंबर २०१६
(संपादित - ३१ जानेवारी २०२४) 

Saturday, December 03, 2016

एका ब्रॅण्डची हानी - कहानी २ (Movie Review - Kahaani 2)

सुजॉय घोषचा 'कहानी' आजपर्यंतच्या सर्वोत्कृष्ट थरारक भारतीय सिनेमांपैकी एक असावा. त्याच्या नुसत्या आठवणींनीही रोमांच उठतात. त्यात विद्याने साकारलेली विद्या बागची असो की नवाझुद्दिन सिद्दीकीचा सीबीआय अधिकारी खान असो की परमब्रत चटर्जीचा 'सात्योकी', चार वर्षांनंतरसुद्धा अगदी आत्ताच पाहिल्यासारखे वाटावेत इतके प्रभावी होते. 'कहानी'त दाखवलेलं कोलकाता शहरही अगदी जसंच्या तसं आत्ताही डोळ्यांसमोर उभं राहतं. त्या सिनेमातली प्रत्येक गोष्ट अगदी हवी तशी जुळून आलेली होती.
ह्या सगळ्यामुळे 'कहानी' हा एक ब्रॅण्ड बनला, एक 'बेंचमार्क' ठरला आहे. हे 'ब्रॅण्ड नेम' वापरून काही नवीन बनवायचं तर रिस्क ही आहे की तो 'बेंचमार्क'ही विसरला जाणार नाहीय. सुजॉय घोषसारखी व्यक्ती हा विचार करणार नाही, असं वाटत नाही. But, you never know ! सोन्याचं अंड देणारी कोंबडी सुज्ञ मनुष्याला सारासार विचार करण्यापासून परावृत्त करते, ही गोष्ट सर्वश्रुत आहेच. 'कहानी २' चा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम हा की त्याचा 'कहानी १' शी काही एक संबंध नाही ! एक स्वतंत्र सिनेमा म्हणूनही हा बनवता आला असता. पण तरीही घोष साहेबांनी सोन्याची अंडी देणारी कोंबडी असलेल्या मनुष्याचाच कित्ता गिरवला आणि कोंबडीचा हकनाक बळी गेला !
वाईट वाटलं ?
मला तरी वाटलं. कारण मनाच्या अगदी जवळ असलेल्या काही सिनेमांपैकी एक 'कहानी' आहे. ह्या तथाकथित 'सीक्वल'ची मी आतुरपणे वाट पाहिली होती. पण महागड्या हॉटेलच्या मेन्यू कार्डवर एखाद्या डिशचं अलंकृत शब्दांनी अत्यंत रोचक वर्णन असावं आणि म्हणून ती मागवावी तर ते पिठलं असावं आणि तेही बिना-मिरचीचं, असं काहीसं झालं.

डायरी वाचून उलगडणाऱ्या सिनेमाची ह्यापूर्वीची आठवण भयानक होती, मात्र इथे 'सुजॉय घोष' आणि 'कहानी' ब्रॅण्ड असल्याने ट्रेलरमध्ये डायरी असूनही मला तिकीट काढताना कुठलाही किंतु-परंतु वाटला नाही. सिनेमा सुरु होतो पश्चिम बंगालमधील चंदननगर ह्या छोट्या शहरात. विद्या सिन्हा (विद्या बालन) आणि तिची अपंग मुलगी मिनी (तुनिशा शर्मा) एक मध्यमवर्गीय आयुष्य जगत आहेत. मिनीच्या वैद्यकीय उपचाराकरिता अमेरिकेस जाण्यासाठी विद्या तयारी करते आहे. मात्र अश्यातच राहत्या घरातून मिनीचं अपहरण होतं आणि तिच्या सुटका करवण्यासाठी जाताना विद्याचा अपघात होतो. एक नेहमीची 'हिट अ‍ॅण्ड रन केस' समजून इंदरजित सिंग (अर्जुन रामपाल) औपचारिकता पूर्ण करत असताना वेगळीच कहाणी उलगडते आणि विद्या, मिनी व इंदरजितचा भूतकाळ समोर येतो.
इथे सगळ्यात मोठा अपेक्षाभंग होतो तो हा की आपण एखादा सस्पेन्स ड्रामा अपेक्षित करून पाहायला आलो असतो आणि तसं काहीही न होता केवळ एका पेचातून सुटका कशी होईल, हाच एक सस्पेन्स विरहित ड्रामा घडतो. पात्रांचं सुरेख डिटेलिंग, एखाद्या प्रमुख वाटणाऱ्या पात्राची धक्कादायक एक्झिट (सास्वत चटर्जीने साकारलेला कॉण्ट्रॅक्ट किलर बॉब बिस्वास), अकल्पित क्ल्यू (हॉटेलातल्या लहान मुलाच्या शाळेच्या युनिफॉर्मवरील नाव) असं बरंच काही 'कहानी'त होतं. किंबहुना, थरारपटात हे असलंच पाहिजे. ह्यातलं काहीही नसून अनावश्यक जुळवाजुळव, ठिगळं जोडल्यासारखे योगायोग आणि उपरी पात्रं मिळमिळीतपणा आणतात. इंदरजित सिंग आणि विद्या सिन्हाची पूर्वीची काही ओळख, नातं वगैरे असण्याची काही एक आवश्यकता नसताना कथानकात ते बळंच घुसडलं आहे. ह्याचा परिणाम असा झाला आहे की पुढे काय घडणार आहे, खरं काय घडलेलं असणार आहे, अश्या सगळ्याचाच अंदाज आधीपासूनच येतो आणि 'सरप्राईज एलिमेंट' नामक फुग्याला बेमालूमपणे टाचणी लागते.

विद्या बालन आवडली नाही, असं आजपर्यंत तरी झालेलं नाही. अगदी टुकार 'हमारी अधुरी कहानी'मध्येही तिचं पात्र कितीही बंडल असलं तरी तिने काम चांगलंच केलं होतं. ती मुळातच एक 'नो नॉनसेन्स प्रोडक्ट' आहे. त्यामुळे तिला पाहत असताना कितीही ठिसूळ असलं, तरी 'विद्या सिन्हा'चं पात्रही पटत राहतं. विद्या सिन्हाचं एकटेपण, मुलीसाठीची तिची ममता, परिस्थितीपुढे असलेली असहाय्यता ती खूप सहजपणे साकार करते.
अर्जुन रामपालने एक इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर म्हणून फक्त फिट्ट दिसण्याव्यतिरिक्त बाकी काही विशेष केलेलं नाही. त्याला स्कोप अगदीच नव्हता, असं काही नाही. बऱ्यापैकी होता, पण 'एफर्ट' जाणवला नाही.
नकारात्मक भूमिकेत जुगल हंसराज शोभला आहे. पण त्याला तर खूपच कमी काम आहे. त्याच्या भूमिकेची लांबी जराशी अजून असायला हवी होती, असंही वाटलं. त्याचे लुक्स नाकारात्मक भूमिकांसाठीच सुयोग्य आहेत, ही बाब इतरांना खूप आधीच कळली होती. त्याने हे स्वीकारायला खूप उशीर लावला. वेळीच स्वीकारलं असतं, तर कदाचित काही महत्वाच्या भूमिका त्याने स्वत:च्या नावावर करून घेतल्या असत्या. असो. देर आये, दुरुस्त आये !
सहाय्यक भूमिकांत विशेष उल्लेखनीय मानिनी चढ्ढा आहे. इंदरजितच्या बायकोची महत्वशून्य भूमिका साकारताना थोड्या वेळातही तिने बऱ्यापैकी कंटाळा आणला आहे. तिची बोलण्याची ढब विचित्र आहे, इतकी विचित्र की दुर्लक्ष करता येत नाही.
संवाद, छायाचित्रण, संगीत. तिन्हीतही प्रकर्षाने खटकावं असंही काही नाही आणि लक्षात ठेवावं असंही काही नाही.
समजले ना ती कधी येऊन गेली
पाहण्यातच वाट इतका दंगलो मी
अश्या बेमालूमपणे सगळं घडून जातं आणि सिनेमा संपल्यावर लक्षात येतं की काहीच लक्षात राहिलेलं नाहीय !


कदाचित 'कहानी' ह्या 'ब्रॅण्ड' अंतर्गत काही स्त्री-प्रधान सिनेमे करायचा घोष आणि कंपनीचा विचार असावा म्हणून ते वापरलं असावं. अन्यथा लेखामध्ये आधीच म्हटल्याप्रमाणे एक स्वतंत्र सिनेमा म्हणूनही हा बनवता आला असता आणि खरं तर, तसंच असायला हवं होतं. ह्या सिनेमापासून 'कहानी' आणि 'सुजॉय घोष' ही दोन नावं जर वेगळी केली, तर तो नक्कीच सामान्य आणि असामान्य ह्या दोन्हींच्या मधला म्हणता आला असता. एकदाही असं अजिबात वाटत नाही की, 'आवरा आता !' मात्र जी काही रहस्यमयता आहे ती बाळबोध वाटते, धक्कातंत्र फसलेलं असल्यामुळे थरारातली हवाही निघून जाते.

जर सिनेमा वाईट नाही तर मग इतकी नाराजी का बरं ?
अरे ! तुम्ही जर मटन बिर्यानी सांगून कौआ बिर्यानी (कुछ याद आया ?) खायला देणार असाल, तर आम्हीसुद्धा ढेकर न देता काव-कावच करणार ना ?

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर

Monday, November 28, 2016

आत्मशोधाचा काव्यात्मक प्रवास - 'डिअर जिंदगी' (Movie Review - Dear Zindagi)

एक यह दिन जब सारी सड़कें रूठी-रूठी लगती हैं
एक वोह दिन जब आओ खेलें सारी गलियाँ कहती थी

एक यह दिन जब जागी रातें दीवारों को तकती हैं
एक वोह दिन जब शामों की भी पलकें बोझल रहती थी

असं बालपण अनेकांचं असतं. 'बालपणीचा काळ सुखाचा' वगैरे वचनंही आपण अगदी सहजपणे आपल्या मनात जपली आहेत. भले ते बालपण जगत असताना मात्र, आपल्याला नेहमीच मोठं होण्याची आणि मोठ्या माणसांसाखं आपल्या मर्जीनुसार वागण्याची ओढ लागलेली असायची, पण प्रत्यक्षात मोठं झाल्यावर मात्र हे मोठेपण नकोसं होत असतं. वर उल्लेख केलेल्या जावेद अख्तर साहेबांच्या शेरांसोबतच अजून एक शेरही आहे, तो असा -

एक यह घर जिस घर में मेरा साज़-ओ-सामाँ रहता है
एक वोह घर जिस घर में मेरी बूढ़ी नानी रहती थी

मोठे झालो, स्वत:च्या मर्जीने वागतो आहोत, स्वत:चं घर आहे. पण तरी कुठे तरी आत एक अशी पोकळी राहतेच, जी कधीच भरून निघत नाही. सतत मन भूतकाळात जाऊन एखादी खपली उघडत राहतं किंवा हेच दाखवत राहतं की हे आत्ताचं सुखासीन आयुष्य म्हणजे सगळं झूठ आहे. खरं सुख तर काही तरी औरच होतं, जे आजीच्या गोष्टींत होतं किंवा अजून कुठे. लहानपण जर एखाद्या जराश्या डिस्टर्ब्ड कुटुंबातलं असेल, तर ह्या स्मृती तर पुसता पुसल्या जात नाहीत. मग तयार झालेली मानसिकता बंडखोर नसली, तरच नवल. ही बंडखोरी स्वत:खेरीज प्रत्येकाविरुद्ध असते आणि काही वेळेस तर अगदी स्वत:विरुद्धही ! कुठल्याही 'कम्फर्ट झोन' मध्ये टिकून राहावंसं वाटतच नाही. सतत पळत राहायचं. निरुद्देश. अखेरीस ह्या पळण्याचा थकवा येणार असतोच, येतोच. मग पडणारे प्रश्न मात्र आत्तापर्यंतच्या सगळ्या ओढाताणीहून जास्त तणावपूर्ण वाटतात. कारण आपलाच प्रश्न, आपणच उत्तर द्यायचंय आणि आपल्यालाच समजत नसतं की नेमका प्रश्न आहे तरी काय ?

संपले आयुष्य पण ना समजले माझे मला
धावलो होतो कुणाच्या जन्मभर मागावरी ?
वाटले आयुष्य होते रुंद रस्त्यासारखे
आज कळले चालणे आहे जणू धाग्यावरी

हे सगळं प्रचंड गुंतागुंतीचं आहे. हा गुंता शांतपणे, सावकाश, विचारपूर्वक उलगडायला हवा. गौरी शिंदेंचा 'डिअर जिंदगी' हेच करतो. ही धीमी गती ह्या विषयासाठी आवश्यकच आहे. पण जर हा गुंता ओळखीचा नसेल किंवा समजून घेता आला नाही, तर ही गती रटाळ वाटते. शाहरुख आहे म्हणून काही विशिष्ट अपेक्षांनी जर सिनेमा पाहायला जाल, तर त्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीतच. कारण मुळात हा सिनेमा त्याचा नाहीच. तो आहे आलिया भट्टचा.


एक अतिशय कुशल कॅमेरावूमन, जी तिच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करते आहे आणि एकंदरीत तिचं तसं बरं चाललं आहे. तरी 'सब कुछ हैं, पर कुछ भी नहीं' अशी अवस्था असलेल्या कायरा (आलिया) ची ही कहाणी आहे. गोव्यासारख्या नयनरम्य भागात लहानाची मोठी झालेली कायरा, फक्त तिच्या करियरसाठी गोव्यातून बाहेर पडून मुंबईला आलेली नसून, तिच्या मनात तिचं लहानपण, तिचं कुटुंब आणि ह्या दोन्हीमुळे गोवा, ह्या सगळ्याविषयी एक अढी आहे. ती ह्या सगळ्यांपासून दूर जाऊ पाहते आहे. मेहनत व कौशल्याच्या जोरावर मिळवलेल्या यशातही तिला समाधान वाटतच नाहीय. ह्या सगळ्या नैराश्यामुळे सतत नवनवी अफेअर्सही सुरु आहेत. कुठल्याच नात्यात मन रमत नाहीय. ती आत्ममग्न आणि नैराश्यग्रस्त आहे. 'डिअर जिंदगी' हा 'कायरा'चा 'प्रेमात न पडण्यापासून प्रेमात पडण्यापर्यंत', 'एकटेपणापासून कुटुंबापर्यंत', 'गोवा नावडण्यापासून गोवा आवडण्यापर्यंत' आणि 'एका जिंदगीपासून दुसऱ्या जिंदगीपर्यंत'चा प्रवास आहे. हा तिचा प्रवास डॉ. जहांगीर खान (शाहरुख खान) घडवतो. अनेक दिवसांनी शाहरुखमधला चार्म त्याने कुठल्याही प्रकारचा बाष्कळपणा न करता दिसला आहे. ह्यापूर्वी तो दिसला होता 'चक दे इंडिया' मध्ये. वेगळ्या धाटणीची, स्वत:ला अधिक साजेशी भूमिका निवडणारा हा शाहरुख अतिशय आवडतो. भूमिका दुय्यम, सहाय्यक असली तरी त्याने ती स्वीकारली आहे, ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. आपल्या स्टारपणापुढे कहाणीवर जास्त अधिकार असलेली इतर पात्रं गुदमरणार नाहीत, ह्याची खबरदारी जी 'पिंक'मध्ये बच्चन साहेबांना घ्यावीशी वाटली नाही, ती शाहरुखने इथे घेतली आहे, हे विशेष. ह्यासाठी दिग्दर्शिकेचं जास्त अभिनंदन !
गौरी शिंदेंचे 'इंग्लिश विंग्लिश' आणि 'डिअर जिंदगी' हे दोन अत्यंत भिन्न प्रकारचे सिनेमे आहेत. पण दोन्हींत दिग्दर्शिका स्वत:चं एक बेअरिंग पकडून ठेवते आणि ते कुठेही सुटत नाही. मनोरंजनात्मक मूल्य पाहिल्यास 'डिअर जिंदगी' अनेकांना नकोसा होईल, झालाही. माझ्यासमोरच किती तरी लोक अर्ध्यातून उठून बाहेर निघून गेले. ते शाहरुखचे नेहमीचे चाळे पाहायला आले असावेत. लोक स्वाभाविकपणे शाहरुखला पाहायला येतीलच म्हणून स्वत:ला जे आणि जसं सांगायचं आहे त्यावर जराही परिणाम दिग्दर्शिकेने होऊ दिला नाहीय. हा मोह आपल्याकडे फार क्वचितच कुणाला टाळता आला आहे.

अमित त्रिवेदीचं संगीत सध्याच्या बहुतांश थिल्लर लोकांपेक्षा खूप वेगळं असतं. जी काही मोजकी नावं आश्वासक आहेत, त्यांपैकी एक अमित त्रिवेदी. कहाणीला साजेसं संगीत त्याने दिलं आहे. अगदी लक्षात राहील, असं हे संगीत नाही. रात्रीपुरतं भुंग्याला कैद करून सकाळी त्याला सोडून देणाऱ्या कमळाप्रमाणे हे संगीत आहे. भुंगा जसा आनंदाने कमळात कैद होतो, तसेच आपणही त्या त्या गाण्यात रमतो. आणि दल उघडल्यावर भुंगा जसा लगेच पुढे निघून जातो, तसेच आपणही पुढे निघतो.

गोवा सुंदर दिसणार नाही, असं दाखवायचं असेल तरच काही विशेष कसब लागेल. त्यामुळे नेत्रसुखद छायाचित्रण हे 'साहजिक' ह्या प्रकारात येतं. तरीही दाद !

'फोबिया'मध्ये सहाय्यक भूमिकेत दिसलेली 'यशस्विनी दायमा' इथेही कायराची जिवलग मैत्रीण म्हणून सहाय्यक भूमिकेत दिसते. अफाट चार्मिंग मुलगी आहे ही ! तिला एखाद्या मुख्य भूमिकेत पाहायची उत्कंठा आहे. सर्व सहाय्यक व्यक्तिरेखांत ती उठून दिसते. सळसळता उत्साह, चमकदार डोळे आणि अचूक टायमिंग. तिची 'जॅकी' लक्षात राहतेच.

आणि सरतेशेवटी, आलिया भट्ट.
केवळ मोजक्या ८-१० सिनेमांतच तिने जी परिपक्वता साधली आहे, ती अविश्वसनीय आहे. तिचा पहिला सिनेमा पाहताना असं अजिबातच वाटलं नव्हतं की ही इतकी छाप सोडेल. त्या सिनेमात तर ती 'आलिया भोगासी..' म्हणून सहन करावी लागली होती ! पण 'टू स्टेट्स', 'हायवे', 'कपूर अ‍ॅण्ड सन्स', 'उडता पंजाब' आणि आता 'डिअर जिंदगी' मुळे आलिया 'नॉट टू मिस' यादीत आली आहे. एका प्रसंगात नकाराचं दु:ख होत असतानाही, आयुष्य गवसल्याचा आनंदही तिला झालेलं असतो. एकाच वेळी रडू येत असतं आणि हसूही ! त्या वेळी आलियाने जे काम केलं आहे, त्यासाठी तिला त्रिवार सलाम ! एक असं एक्स्प्रेशन जे शब्दात सांगतानाही कठीण जाईल, ते ती प्रत्यक्षात दाखवते, हे केवळ अचाट आहे. त्या क्षणी, तिथेच सिनेमा संपायला हवा होता. तो संपला नाही, ही माझी 'डिअर जिंदगी'बाबत एकमेव तक्रार आहे. नजर लागू नये म्हणून लावलेलं गालबोट असावं बहुतेक.


'डिअर जिंदगी' हा तुमचं मनोरंजन करण्यासाठी नाही. तो तुमचा छळ मांडणारा 'कोर्ट' सारखा अनावश्यक कूर्मगतीही नाही. तो जिंदगीसारखाच आहे. 'जिंदगी' हा ज्यांचा आवडता पास-टाईम आहे, त्यांच्यासाठी हा सिनेमा आहे. 'पाहा किंवा नका पाहू, पण मी आहे हा असाच आहे', असं एक बाणेदार स्टेटमेंट हा सिनेमाच स्वत:विषयी देतो, कायरा आणि आलियासारखंच !

लव्ह यू, जिंदगी !

रेटिंग - * * * *

- रणजित पराडकर

Friday, November 18, 2016

थरार (वजा) तर्क (बरोबर) फोर्स-२ (Movie Review - Force -2)

'तो येतो, एकेकाला बदडतो किंवा ठोकतो आणि जिंकतो', हे एकमेव सूत्र 'फोर्स-२' पहिल्यापासून शेवटपर्यंत पाळतो. मग तो त्याच्या एन्ट्रीचा टिपिकल फिल्मी प्रसंग असो की सिनेमाच्या शेवटची एक नॉन-फिल्मी नोट असो. अर्थात तो हे सगळं करू शकतो, ह्याविषयी बघणाऱ्याला तिळमात्र शंका वाटत नाही. घायल, घातक वगैरे राजकुमार संतोषीच्या सिनेमांत सनी देओल जेव्हा एका हाताने ६-७ आणि दुसऱ्या हाताने ६-७ लोकांना एकटाच झुलवताना दिसतो, तेव्हाही ते आपल्याला पटतं. कारण त्याचा आवेश आणि आवाज ! इथे हे सगळं एरव्ही अशक्यप्राय वाटणारं पटतं कारण जॉन अब्राहमची एकंदरच पर्सनालिटी. त्याचे टरटरलेले स्नायू कुठल्याही कपड्यात मावत नाहीत. जे काही दणकट शरीर त्याने कमावलं आहे, ते अगदी 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि..' च वाटतं ! असं घट्ट, बळकट शरीर कमवूनही त्याची हालचाल आखडलेली नसते. त्याचं चालणं, धावणं, उठणं, बसणं सगळं काही गतिमान आहे, हे विशेष. त्याच्या अभिनयाला असलेल्या मर्यादांवर त्याने आपल्या 'अंग'मेहनतीच्या जोरावर मात केली आहे, हे मान्य करावं लागेल.

'फोर्स-१' मध्ये भारतीय माफियाविरुद्धचा संघर्ष दाखवला होता. इथे एसीपी यशवर्धन (जॉन) आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. 'रॉ'च्या चीनमधील एजंट्सना एक-एक करून मारलं जात आहे. यशचा जिगरी मित्र ह्या षडयंत्राचा एक बळी ठरतो. मरण्यापूर्वी तो यशला ह्या सगळ्या षडयंत्राबद्दल कळवतो आणि एक स्पेशल केस म्हणून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी 'रॉ'तर्फे यशला बुडापेस्टला पाठवण्यात येतं. मात्र हे ऑपरेशन लीड करण्यासाठी रॉ एजंट केके (सोनाक्षी सिन्हा) ला सोबत पाठवलं जातं. दोघं अर्थातच केस सोडवतात. तोपर्यंत अजून काही नुकसान होतं, पण पुढचं बरंचसं नुकसान वाचतं.



हा सगळा प्लॉट मुळातच खूप थरारक आहे आणि पडद्यावरही हा थरार बऱ्यापैकी उतरला आहे. मात्र काही गोष्टी खटकत राहतातच.
'अतिशय बालिश संवाद', ही पहिली बाब. 'रॉ'च्या एजंट्सना ठार करण्याचं कारस्थान केलं जात आहे, हे जेव्हा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजतं, तेव्हा ते एक बैठक बोलावतात. ह्या बैठकीत 'यह हमारे रॉ को कमजोर करने की साजीश हैं' वगैरे अगदीच बेसिक लेव्हलचे बाष्कळ संवाद जबरदस्त आव आणलेल्या त्या ऐटबाज व्यक्तिरेखांच्या तोंडी विडी असल्यासारखे विजोड वाटतात. गद्दार एजंटला पकडल्यावर त्याची जी बडबड आहे, तीसुद्धा ह्याच पठडीतली आहे. इथे दुसरी खटकणारी गोष्ट अशी की, गद्दाराला पकडल्यानंतर त्याची कसून चौकशी करून त्याच्याकडून माहिती काढून घेण्याऐवजी त्याला भारतात घेऊन येण्याचा प्लान करणं ! हा बालिशपणा तर फक्त थराराला जागा करून देण्यासाठीचं कहाणीतलं मोठं भगदाडच आहे. तिसरी अतिशय न पटणारी गोष्ट म्हणजे 'केके' ही व्यक्तिरेखा. ही व्यक्ती एक गुप्तहेर आहे. तिला भावनिक कसं दाखवता तुम्ही ? 'We lost him' वालं एक्स्प्रेशन देताना ती रडवेली कशी होऊ शकते ? आजूबाजूला गोळीबार चालू असताना ती जखमी व्यक्तीच्या बाजूला मठ्ठपणे बसून राहूच कशी शकते ? ह्याशिवाय हिरोला आपले ५७२ पॅक्स दाखवता यावेत म्हणून कपडे काढता येतील अश्या सोयी पाहणं, गोळ्यांची बरसात होत असताना एकही गोळी हिरोला वगैरे न लागणं, जिथून पुढे कहाणी जाऊ शकत नाहीय तिथे बळंच एखादं पात्र घुसडणं आणि काम झालं की त्याला दुधातल्या माशीसारखं बाजूला टाकणं वगैरे बाष्कळपणा आहेच. मात्र तरीही हा थरार पाहावासा आहे कारण प्रत्येक व्यक्तिरेखेचा आवेशपूर्ण वावर आणि कथानकाची जराही कमी न होणारी गती.

ज्याप्रमाणे हृतिकचा 'क्रिश' इंडियन सुपरहिरो आहे, तसाच हा जॉन इंडियन जेम्स बॉण्ड आहे. 'धूम' असो की 'मद्रास कॅफे', 'रॉकी हॅण्डसम' असो की 'ढिशुम' अ‍ॅक्शनपॅक्ड भूमिकांत तो चांगलाच शोभतो. इथे त्याच्याकडून अभिनयाच्या फारश्या अपेक्षा नसतात, हेही एक कारण असेल. पण त्याने स्वत:ला ओळखून खूप सेन्सिबली भूमिका निवडायला सुरुवात नक्कीच केलेली आहे.
सोनाक्षी सिन्हासुद्धा खरं तर अ‍ॅक्शन भूमिकांतच शोभते. ती 'अकीरा'त बरी वाटली होती आणि इथेही वाटते. कारण तेच ! अभिनयाच्या फारश्या अपेक्षा नाहीत. ह्या भूमिकेचीही वाट लावायची कुवत तिच्या न-अभिनयात आहे, मात्र ती तसं करत नाही, हेही नसे थोडके !
'ताहीर राज भसीन' ची भूमिका 'मर्दानी'तल्या त्याच्या भूमिकेसारखीच नकारात्मक आहे. अत्यंत ताकदीने तो ती साकारतो. सगळ्यांमध्ये तो खूपच उजवा ठरतो. मात्र वर उल्लेखलेली वायफळ बडबड वगैरे त्याच्या वाट्याला दिल्यामुळे कंटाळा येतो. दर थोड्या वेळाने त्याच्यावर यशने धावून जाणं आणि केकेने त्याला थांबवणं, ह्या सगळ्या प्रकारात त्याची इंटेन्सिटी दुर्लक्षित होत राहते.

संवाद लेखन खरं तर अनुल्लेखनीय आहे, पण 'अनुल्लेखनीय आहे' हे उल्लेख तरी करावा कारण शेवटी थोडी तरी मेहनत घेतलेली असणारच ना !
पार्श्वसंगीत दणदणाटी नाहीय, ही किती मोठी निश्वासाची बाब आहे ! व्हिलनलाच माउथ ऑर्गनची आवड असलेलं दाखवलं असल्याने पार्श्वसंगीतासाठी माउथ ऑर्गन बराच वापरला आहे. हे नाजूक वाद्य स्वत:च हळुवार असल्याने संगीत दणदणाटी होऊ शकलं नाहीय. त्याव्यतिरिक्तचं संगीत मात्र आजच्या काळाला साजेसं टाकाऊ आहे. 'कांटे नहीं कटते..' ची यथेच्छ माती केलेली आहे.

जबरदस्त छायाचित्रण हीसुद्धा एक जमेची बाजू. बुडापेस्ट, शांघाय, ग्वांगझाउ, बीजिंग वगैरेचं चित्रण मस्त जमून आलं आहे. पण मला विशेष आवडलं ते अखेरच्या हाणामारीतलं कॅमेरावर्क. इथला कॅमेराचा कोन व्हिडीओगेमसारखा आहे. म्हणजे स्वत: त्या व्यक्तिरेखेचा व्ह्यू दाखवणारा. हा प्रयोग मी तरी ह्याआधी पाहिलेला नाही. ह्या प्रयोगासाठी विशेष दाद द्यायला हवी !

२४ चा सीजन-२ आम्ही पूर्ण पाहिला होता. त्यामुळे दिग्दर्शक अभिनय देवकडून आम्हाला प्रचंड अपेक्षा होत्या. एरव्ही 'फोर्स-२' हा चांगला थरारपट म्हणता येईलही, मात्र 'अभिनय देव' हे नाव मध्ये येतं आणि मग थोडं निराशच व्हायला होतं. छोट्या छोट्या बाबतींत भारतीय दिग्दर्शकांनी (किमान अभिनय देव वगैरे लोकांनी तरी ! बडजात्या, चोप्रा, वगैरे तर ओवाळून टाकलेले आहेत) सजग राहायला हवं आहे. नक्कीच गेल्या काही वर्षांत हिंदी सिनेमाने खूप चांगली मजल मारलेली आहे, पण अजूनही लहानलहान बाबतींत टाळाटाळ केलेली जाणवत राहते. फुसके संवाद आणि अनावश्यक पात्रं व योगायोग ह्यावर आधारलेलं कथानक अधिक सफाई न केल्याचं द्योतक नाही का ? शेवटी सारं काही दिग्दर्शकाचं आहे आणि तो त्या बाबतींत पुरेसा आग्रही नाही आपल्याकडे, हेच दु:ख आहे.

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर 

Wednesday, November 16, 2016

मराठी कविताविश्वातलं एक लक्षणीय नाव - संतोष वाटपाडे

रविबिंब सरकले खाली
अवनीवर संध्या आली
कुंकुम भाळावर छोटे
नववस्त्र तनावर ल्याली
रांगोळी पाण्यावरही
किरणांची अवचित झाली 
क्षितिजावर लुकलुकणारी
फुलवात कुणाची आहे... ही बाग कुणाची आहे ?

ह्या प्रश्नाचं उत्तर मला केशवसुतांच्या कवितेत सापडतं. 'देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया!'
ही बाग कवीची आहे ! ह्या कवितेत कवी संतोष वाटपाडे​ प्रत्येक कडव्यात दिवसाचे विविध प्रहर रंगवत नेतात आणि सगळ्यात शेवटी -

दररोज तरी धरतीला
का ओढ तमाची आहे....ही बाग कुणाची आहे ?

- असा व्याकुळ करणारा प्रश्न करतात.

फार क्वचित असा अनुभव येतो की एखादी कविता वाचल्यावर प्रचंड अस्वस्थ वाटतं, गहिवरून आल्यासारखं वाटतं, दोन चार ठोके चुकल्यासारखं वाटतं.
पहाटेच्याही जरासं आधी अचानक जाग यावी. झोप पूर्ण झालेली असावी. घराबाहेर एकाच वेळी स्वच्छ चांदणं सांडलेलं असावं आणि पूर्वेकडे रंगांच्या पखरणीला अजून सुरुवात झालेली नसली तरी तशी तयारी कुणी तरी करत असल्याची एक अव्यक्तापलिकडची चाहूल असावी. विविध फुलांचा एकत्र सुवास दरवळत असावा आणि सर्वदूर पसरलेली नीरव शांतता देवघरात मंदपणे तेवणाऱ्या समईच्या हसतमुख स्थितप्रज्ञतेसारखी भासावी.
वेळ काही क्षण थांबली आहे, असंच वाटावं. बहुतेक ती थांबतही असावी.
कारण हे असं नेहमीच वाटत नाही.
हा असा चलचित्रपट डोळ्यांसमोरून झरझर सरत तेव्हा जातो, जेव्हा एखादी उत्कट कविता मनाच्या आतपर्यंत झिरपत जाते. संतोष भाऊंच्या अनेक कविता अश्याच आत झिरपत जातात. कधी, प्रचंड चलबिचल चालू असलेल्या अंतरंगात त्यांची एखादी कविता मंद शांतपणे तेवते. तर कधी आपण आपल्याच विश्वात मश्गुल असताना एखादी कविता म्हणते -

जाळ पेटला उंच उसळला
पोटामाजी विझली आग
डोक्याखाली हात ठेवला
डोईवरती काळा नाग...

अश्या त्यांच्या ओळी खडबडून जागं करतात आणि आपल्याला एका अटळ शून्याची खोली चाचपडायला लावतात.

कधी एखादी मूक व्यथा ते बोलकी करतात. इतरांना दिसणारा दगड-मातीचा साज त्यांच्याकरवी आपली भावना सांगतो की -

अंगणी उंबरा आला आहे सरकुन
चौकटी किड्यांनी पोकळ केल्या आतुन
ह्या भग्न घरी वावर कोणाचा आहे
जे पाय धुळीवर नकळत गेले टाकुन...

कविमनाला हीच तर मोठी देणगी असते. ते कुणालाही बोलकं करू शकतं. मग ते एखादं भकास पडलेलं घर असो वा ओसाड पडलेला माळ. एखादी सुंदर डवरलेली वेल असो की वठलेलं झाड. कुणाच्याही लक्षात न येता गालावरच वाळून गेलेला एखादा अश्रू असो की दिलखुलास हास्यामागे जाणीवपूर्वक लपवलेली वेदना आणि विरहाचं दु:ख असो वा प्रियेची आराधना !

सुगंधीत फाया नशा केवड्याची
कळी मोगर्‍याची असावीस तू
नवी कोवळी पालवी पिंपळाची
जणू हंसिणीचे मऊ पीस तू

खुले देवघर दरवळावे पहाटे
निखारा धुमारे खडी धूप तू
कपाळी टिळा लावुनी चंदनाचा
उभे विठ्ठलाचे दिसे रूप तू

संतोष भाऊंची कविता जितक्या प्रभावीपणे व्यथांची मांडणी करते तितक्याच हळुवारपणे ती कोमल, नाजूक भावनांनाही उलगडते. ते प्रियेला केवड्याचा, मोगऱ्याचा सुगंध म्हणतात, कोवळी हसरी पालवीही म्हणतात आणि हंसिणीचे पीसही ! त्यांच्या बऱ्याच कवितांमध्ये नेहमी एक धागा ईश्वराशी जोडायचा प्रामाणिक प्रयत्न करतोच. ज्या प्रियेला ते विविध अलंकृत उपमा देतात, तिलाच ते 'विठ्ठलाचे रूप'ही म्हणतात !

जेव्हा त्यांची ही स्तुती संभोग शृंगार रसाला लेऊन येते, तेव्हाही ते अगदी थेटपणे म्हणतात -

रात्रभर चांदण्याचा जसा तू सडा
पौर्णिमेच्या दुधी चांदव्यासारखी
चुंबनांच्या खुणा तू मिठी तू नशा
तू उरी झोंबत्या गारव्यासारखी..

जाळतो स्पर्श ओठास जेव्हा तुझा
वाटते तू मला विस्तवासारखी
चिंब ओलावले वस्त्र तू भास तू
श्रावणातील तू पावसासारखी..

सुमंदारमाला ह्या वृत्ताची अंगभूत नशा त्यांनी ह्या कवितेत बेमालूमपणे वापरली आहे.
प्रेमाचं हळुवार नातं अलगदपणे उलगडताना एका साधेसेच स्वप्न ते भुजंगप्रयातात कसे मांडतात पहा -

परसबाग छोटी घरे पाखरांची
उघडताच ताटी फ़ुले कर्दळीची
कधी झोपलो जर तुझ्या पायथ्याशी
मला छत मिळावे तुझ्या ओढणीचे ...

नको चांदण्याचे नको सागराचे
नको उंच माडी सुशोभित घराचे
प्रिये स्वप्न पाहू तुझ्या आवडीचे
नदीकाठच्या एकट्या झोपडीचे

एक अंदाज म्हणा किंवा निरीक्षण म्हणा, पण मला त्यांच्या कविता वाचत असतेवेळी नेहमी जाणवत आलं आहे की, सहसा कविता हातावेगळी करत असताना त्यांना स्वत:लाही निश्चित माहित नसतं की ते नक्की काय लिहिणार आहेत आणि कुठून कुठे जाणार आहेत. लयबद्ध कविता लिहिणाऱ्या बहुतेक कवीमनांचं असंच होत असावं, असाही माझा कयास आहे. कारण असा अनुभव मला अजूनही काही कवी व कवयित्रींच्या कविता वाचत असताना येतो. प्रत्येक वृत्ताची एक ताकद असते. त्या त्या वृत्ताचा ताल एकदा हृदयाच्या ठोक्यांनी पकडला की शब्द स्वत:च सम पकडण्यासाठी आतुर होऊन समोर येत राहतात. ती एक अशी तंद्री असते जेव्हा कविता स्वत:च स्वत:ला कवीच्या हातून लिहून घेत असते. मात्र ही स्थिती नेहमीच येते असं नाही. कधी त्या मागे कुठलीशी अनाम शक्ती असते, जिला आपण 'ईश्वरी'ही म्हणतो, तर कधी छंद-वृत्ताचा अभ्यास आणि त्यांवरचं निरलस प्रेम ! 'वृत्ता'वरचं हे प्रेम इतकं फुलतं की 'वृत्ती' बनून अंतरंगात उतरतं आणि मग जेव्हा जेव्हा एखादा तरंग ह्या डोहात उमटतो, तेव्हा तेव्हा उत्स्फूर्तपणे भावना स्वत:च आपली लय शोधून कवीला खुणावते. तो एक क्षण असतो, जेव्हा कवी तिला वाट करून देतो आणि त्यापुढचा प्रवास आपोआप घडतो.

ही उत्स्फूर्तता संतोष भाऊंच्या अनेक कवितांत जाणवते.
त्यांचा आजपर्यंतचा काव्यप्रवास तब्बल दोन तपांचा आहे ! ह्या काळात त्यांनी हजारांहून अधिक कविता व गझला लिहिल्या आहेत. पण ही सांख्यिकी त्यांना माझा एक आवडता कवी बनवत नाही. तर वर उल्लेख केलेली उत्स्फूर्तता मला त्यांच्यात दिसून येते आणि तीच त्यांना माझा एक आवडता कवी बनवते. ते जितक्या सहजपणे अक्षरछंदांचा वापर करतात, तितक्याच सहजतेने गणवृत्तही हाताळतात. मात्रा वृत्ताचं वजनही ते पेलतात. 'सुमंदारमाला' आणि 'मंदारमाला' ह्यांबाबत माझा असा अनुभव आहे की दोन्हींपैकी एकात कवी अधिक रमतो. मग दुसरं वृत्त हाताळताना नकळतपणेच लय बदललीही जाते. दोन्ही वृत्तांची चाल खूपच एकसारखी असल्याने असेल. पण हे सगळे विकार शिकाऊंचे असावेत. संतोषभाऊ लीलया ह्या दोन्हींना हाताळतात.
मंदारमालेतल्या त्यांच्या जरा वेगळ्या मूडच्या ह्या ओळी पहा -

मी राबतो रोज मातीत माझ्या हरीनाम श्वासात आहे तरी,
डोक्यावरी भार सार्‍या घराचा कधी जाणवू ना दिले मी घरी
गेल्या पिढ्या कैक कष्टात राया तुझा दास व्याकूळ दारावरी,
सांगून झाली व्यथा सर्व माझी अता न्याय द्यावा मला श्रीहरी

निसर्गाच्या अवकृपेने हताश झालेला मनुष्य श्रीहरीला शरण जातो आहे. आपले कष्ट त्याने घराला जाणवू दिलेले नाहीत, असं त्याला वाटतंय पण त्याचाच तान्हुला अगदी लहान वयातही ही परिस्थिती बहुतेक समजून घेतो आहे की काय ? हा अक्षरछंद तरी तेच सांगतो -

जाड साबराला माझी झुले लुगड्याची झोळी
दिसे दुरुन आईची मला फ़ाटलेली चोळी
माझे रडणे ऐकून नाही येणार कुणीही
आलो घेऊन कपाळी देवा गरीबीचा शाप..

नांगराचा बैल मुका त्याला लागलेली धाप
घाम डोळ्यात भरुन ढेकळात उभा बाप..

असे शब्द वाचत असताना आपल्याच नकळत आपणच आपल्याला दोषी ठरवतो. हे असे दु:ख ह्या जगात अस्तित्वात आहे, ह्यासाठी आपण स्वत:ला जबाबदार समजतो. कारण हे दु:ख आपल्याला एखाद्या देणेकऱ्यासारखा जाब विचारते, प्रश्न करते. उत्तर आपल्याकडे नसतं आणि आपण आरोप मान्य करतो.
'लवंगलता' वृत्तातल्या एका कवितेत, पुन्हा एकदा अश्याच एका रंजल्या गांजल्या बापाबद्दल ते लिहितात -

मिचमिच डोळे ओठ कोरडे बोलत होता काही
यंदासुद्धा शेताची का झाली लाही लाही
गुरे लेकरे घरच्या बाया करती रोजंदारी
विहिरीमध्ये घागर भरण्याइतके पाणी नाही

परसामध्ये उरला सुरला कांदा वाळत होता
उदास झाडांखाली सारा शिवार लोळत होता
सोसाट्याचे वादळ मनात रिचवत माझा बाबा
खांद्यावरच्या पागोट्याने वारा घालत होता

त्यांची कविता आपल्याला गावच्या मातीत नेते. मातीतली कविता म्हणजे ती ओल्या मातीतलीही आणि कोरड्याही. ओल्या मातीतली कविता कोरड्या मनाला भिजवते, तर कोरड्या मातीतली कविता वाचताना डोळ्यांच्या कडा ओलावतात. मनात सोसाट्याचं वादळ रिचवणारा हा बाबा वाचताना असह्य होऊन स्वत:पासूनच पाठ फिरवावीशी वाटते.

ही एक व्यथा ते अनेक कवितांमधून वेगवेगळ्या रंगांत दाखवतात. सगळ्यांना एक राखाडी रंगाची चौकट मात्र असतेच. 'भवानी' वृत्त हे सहसा लोकगीतांसाठी (लावणी, पोवाडा, इ.) वापरले जात असावे. पण त्याचा सुरेख वापर करून ते म्हणतात -

हंबरे वासरू गाय, करावे काय ,कळेना काही
ठेवले जरी राखून, गवत झाकून, द्यायचे नाही
टोचते घशाला भूक, जाळते थूक, जिभेची ग्वाही
थांबले थेंब डोळ्यात, कधी घामात, प्यायचे नाही...

एक सुन्न करणारी अस्वस्थता मनाला व्यापते. पळ काढावासा वाटतो ह्या वास्तवापासून पण..
पण कवी हा कधी कधी निर्दयी असतो, क्रूर असतो. तो वाचकाला इतक्या सहजासहजी पाठ फिरवू देत नाही. तो पुन्हा पुन्हा आदळत राहतो, एखाद्या सागराप्रमाणे.

निष्पर्ण तरूच्या खाली विस्कटली विधवा रडते
एकेक पान सुकलेले ओघळते पायी पडते
जे जमले होते गेले, डोळे ना पुसले त्यांनी
खरवडले भाळावरचे हिरवे कुंकू हातांनी

आकाशी हुंगत आहे घारीचा व्याकूळ डोळा
पदराखाली फुललेल्या नवतरुणीचे वय सोळा
बेवारस आभाळाच्या ठिकर्‍या पायात विखुरल्या
विझताना चांदणवाती डोळे मिटण्यास विसरल्या

संतोष भाऊंच्या कविता जश्या डोळ्यांत जळजळीत वास्तवाचं अंजन घालतात तश्याच त्या उद्ध्वस्त स्वप्नांच्या ठिकऱ्यासुद्धा डोळ्यांत रुतवतात. जखमा होतात. त्या भळाभळा वाहतात. विस्कटलेली विधवा अंतरंग उसवते, विषण्ण करते !

एक अबल आणि अबोल व्यथा ते पुढील ओळींत अशी मांडतात की एक बलात्कार संवेदनेवरही होईल आणि मनावर ओरखडे उमटतील !

मानेखाली हात.. बांगडी सोबत उरली नाही
डोळ्यांतिल स्वप्नांची पणती अजून विझली नाही
झाकावा डोळा तर विस्तव डोळ्यातुन घळघळतो
भेदरलेली रात्र त्यामुळे निवांत निजली नाही...

कूस बदलल्यावरती रडते मूल उपाशी आहे
ओठांच्या दगडात राहिली ओल जराशी आहे
आक्रोशाच्या ठिणग्या दिसती चुलीमधे पुरलेल्या
पोटाच्या खड्ड्यात पेटला जाळ अधाशी आहे...

अश्या अंगावर येणाऱ्या अनेक कविता संतोष भाऊ लिहितात. प्रभावित होऊन एखाद दोनदा लिहिले जाऊ शकते. मात्र वारंवार लिहित राहण्यासाठी एक त्रयस्थ संवेदनशीलता असावी लागते. जळजळीत वास्तवाचं एक बीभत्स दर्शन करताना त्या रबरबाटात किती उतरायचं, ह्याचं भान असायला लागतं. ते राहिलं नाही, तर बीभत्स रसात व्यक्त होत असताना विकृतीचा भास होऊ शकतो. ही एक अतिशय कठीण कसरत असते, पण पुढील ओळी ती पार पाडतात -

अवलाद कलीची हासत फिरते रानी
आताच कापुनी नाळ
त्या तेजोमय गोलाच्या ठिकर्‍या झाल्या
पेटला कधीचा जाळ

सांगाडे कवट्या माळावरती पडल्या
देतात कुणाला हाक
वार्‍यावर उडते भिरभिर वावटळागत
का हतबलतेची राख

कविता लयबद्ध असली की ती गेय असतेच असं नाही. त्यासाठी कठोर, रांगडे शब्द मारक ठरतात. रांगड्या शैलीत जळजळीत लिहिणारे संतोष भाऊ गेयता सांभाळतानाही विखारी व्यथा मांडतात !

भुकेल्या घराला सहारा मिळाला
चुलीची व्यथा जाणली ना कुणी
रिकाम्या घराची खुली सर्व दारे
झुरावी तुळस रोज का अंगणी
मला लेकरू ना दिले सोबतीला कसे गीत मी बोबडे गायचे

निवारा नसे ज्या मुक्या पाखरांना अशा पाखरांनी कुठे जायचे
कपाळावरीच्या व्यथा सोसवेना तुझे नाव देवा किती घ्यायचे

ह्या त्यांच्या कवितेचे गीतही झाले आहे. त्यांच्या अनेक कविता संगीतबद्ध झालेल्या आहेत.
संगीतबद्ध झालेली त्यांची अशीच अजून एक अंगावर कविता म्हणजे -

सारी भेगाडली भूई अंघुळीला वारा नाई,
प्वाट खपाटीला गेलं कुरणात चारा नाई ॥

माझी उपाशी लेकरं
तरी देत्यात ढेकरं
ढेकळात लोळताना
गेली घासून ढोपरं
उन्हामंधी तापलेली सारी जिमीन वांझुटी,
माजा नागडा संसार आडुशाला काई नाई

इथले शब्द खूप रांगडे आहेत. पण आशयाशी समरूप होऊन असल्याने त्यांची चालही तशीच रांगडी आहे.

मी ह्या लेखाच्या निमित्ताने त्यांच्या अगदी सुरुवातीच्या काळातल्याही काही कविता वाचल्या. सुरुवात करणाऱ्या कुणाही कवीप्रमाणे त्यांच्या ह्या काळातल्या कविता गुंताविरहित व मुक्त आहेत. मात्र -

खेळण्यास मी आलो होतो हिरव्या गवता येथ भुलुनी
मान पकडली या लोकांनी हिरवा पाला मज दावुनी
आण कुणा मज सोडविण्या ओरड्तोय मी फ़ार फ़ार गं
बुभुक्षित हे मानव जमले करण्या मजला ठार गं
आई गं...आई गं......बछड्यासाठी धाव गं

----------------------

संपले आकाश जेथे त्या ठिकाणी राहतो हा,
जे असूनी ना दिसे ते रुप आहे देव माझा

---------------------

चालताना हात हाती रोज घ्यावा साजणे,
थांबतांना मी तूझे थोडे बघावे लाजणे

रोज व्हावे भेटणे अन रोज व्हावे बोलणे,
तूच स्वप्नातील माझा चंद्र व्हावे साजणे

- अश्या त्यांच्या ओळी वाचत असताना त्यांतली उत्कटता समजून येते. अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे लयीची ओढ. कविता मुक्त असली तरी तिच्यात एक प्रकारची लय ही असतेच. मुक्ततेच्या नावाखाली पसरट लिहित जाणं आजची 'Fashion' आहे, पण जेव्हा ही 'Fashion' सुरु होत होती, त्या काळातही संतोष भाऊंच्या कवितेत एक अंगभूत लय आपसूकच येत होती.

आजचं त्यांचं कवीपण मला वेगळं वाटायचं अजून एक कारण म्हणजे वृत्ताची जाण व लयीवर पकड असूनही आजच्या 'Fashion' प्रमाणे ते गझलच्या प्रभावाखाली दबले गेलेले नाहीत. ते गझल व कविता, दोन्हींत रमतात. मात्र ठळकपणे त्यांची ओढ कवितेकडे अधिक असल्याचं माझं निरीक्षण आहे. हा त्यांच्या अभिव्यक्तीचा प्रामाणिकपणा आहे हे नक्कीच.
हा प्रामाणिकपणा असल्यामुळेच त्यांची कविता वाचकाच्या संवेदनशीलतेच्या चंचल लोलकाला अस्थिर करून जाते.

लयीवर असलेली पकड आणि वृत्ताची जाण संतोष भाऊंना एक प्रयोगशील कवी बनवते. ते लयीसोबत, यमकरचनेसोबतही निरनिराळे प्रयोग करताना दिसतात.

चोळीत तंग चोरून अंग नाहून सावली ओली
कस्तुरीगंध पसरून मंद पावले उन्हाची आली

हा पदर खुला नाजूक झुला वेलींचा फांदीवरुनी
पाहून पवन झाकून नयन थरथरते अल्लड तरुणी

पालवी खुले पळसास फुले केशरी सांडला रंग
कोवळे तुरे गवतात हिरे पाखरू वेचते दंग

इथली त्यांनी केलेली यमकपेरणी ठेका धरायला भाग पाडणारी आहे.
वर मी 'भवानी' वृत्तातल्या एका कवितेचा उल्लेख केला आहे. ह्या वृत्तात त्यांनी अनेक कविता लिहिल्या आहेत. मात्र एक कविता उल्लेखिल्याशिवाय त्यांची ओळखच पूर्ण होत नाही. 'वासुदेव' ! 'वासुदेव' ही कविता इतकी अस्सल आणि चपखल आहे की पारंपारिकच वाटावी !

छम्माक वाजला टाळ धावले बाळ अंगणी आले
घरधनी उचलुनी फाळ तुडवण्या गाळ पहाटे गेले
वासरे लाडकी घेत पहा रांगेत निघाल्या गाई
वासुदेव आला घरी भाज भाकरी तव्यावर आई !

शेतात उभी बाजरी कडाला तुरी टप्पुरं दानं
झोपडीमधी अंधार तरी भरणार उद्याला सोनं
संसार तुझा पंढरी इठोबा घरी तूच रखुमाई
वासुदेव आला घरी एक भाकरी वाढ ना आई
भारूड म्हणत नाचला थकुन थांबला जायचा न्हाई !

हे वाचत असताना साक्षात एक वासुदेव आपल्या समोरच येऊन उभा ठाकतो ! And why not ? जीवनाचं तत्वज्ञान सांगणारा, वास्तवाचं भान देणारा, सुखाची ओळख करून देणारा, दु:खाची जाणीव जागी करणारा, आपलाच चेहरा आपल्याला दाखवणारा 'संतोष वाटपाडे' हा कवीही एक वासुदेवच की ! तो आपल्यासमोर येतो आणि धुंद, बेभान होऊन त्याची कला सादर करतो. आपल्याला तल्लीन करवतो ! हे त्याचे सादरीकरण पराकोटीचं उत्कट आणि प्रामाणिक असतं म्हणूनच स्वत:च्या कवितेचं वर्णनही ते अप्रतिम सुंदर प्रकारे करतात -

तू वनराईचे नाजुक हळवे हसणे
निद्रिस्त खगांची आभाळाची स्वप्ने
तू नभातल्या लखलखत्या चांदणवाती
तू चंद्राची थरथर रजगंध झिरपणे

तू क्षितिजाच्या थरथरत्या केशरमाळा
नवतरुणीच्या पदराचा चंचल चाळा
तू आरशातले रूप स्वतःचे फसवे
तू चुकलेल्या हुरहुरत्या कातरवेळा

तू हिरव्या फांदीवरचा मनमथ रावा
तू गोकुळातला खट्याळ मंजुळ पावा
तू किर्तन अभंगवाणी आर्त भुपाळी
तू मंदिरात भक्तांचे आर्जव.. धावा...!

'संतोष वाटपाडे' हे माझ्या मते आजच्या कविता विश्वातील एक अत्यंत महत्वाचे नाव आहे. वृत्तबद्ध कवितेसाठी त्यांच्यात एक तळमळ आहे आणि त्या कवितेलाही त्यांच्यासाठी तितकीच तळमळ आहे !
मराठी कवितेचा सामान्य माणसाला दिसणारा चेहरा हा नीरस, बेचव व नकोसा वाटणारा आहे, हे कडवट सत्य आहे. भरकटत चाललेला मुक्तपणा, ज्यामुळे बहुतेकदा काव्येतरच वाटणारं लिखाणसुद्धा कविता म्हणून माथी मारलं जातं, हे वास्तव मराठी कवितेचा चेहरा असा होण्यामागे आहे. कविता तिच्या सौंदर्यस्थळांना मुकत असताना संतोष वाटपाडेंसारखा एक अनुभवसिद्ध कवी परखड, जळजळीत, कठोर, हळुवार, कोमल असे विविध भावाविष्कार एकापेक्षा एक प्रभावीपणे वृत्तबद्ध लिखाणाद्वारे मांडतो, हे दृश्य दिलासादायी आहे. त्यांच्या जोडीने काही मोजकीच नावं घेता येतील, जे असाच दिलासा देतात.

संतोष भाऊंचा गेल्या काही वर्षांचा काव्यप्रवास मी पाहू शकलो आहे. माझ्यासाठी हा एक ऐतिहासिक ठेवा आहे. ह्या लेखात मी त्यांच्या अनेक कविता घेऊ शकलेलो नाही. जे काही इथे दिसलं आहे, ती केवळ एक झलकच ! त्यांच्या विविधांगी कवितांमध्ये मला काही काव्यप्रकार मात्र दिसलेले नाहीत किंवा अभावानेच दिसले. ते म्हणजे सुनीत आणि ओवी छंद (अभंग). पारंपारिक वृत्तं आणि त्यातही श्रावणाभरण, पृथ्वी सारखी विस्मृतीत जात असलेली वृत्तं त्यांच्यासारखे प्रतिभावान कवी पुन्हा एकदा लोकांसमोर आणू शकतात. त्यांच्या इथून पुढच्या कवितांतून मला ह्या काही अविष्कारांची अपेक्षा आहे. तसेच, मराठी कवितेशी सामान्य माणसाची नाळ जोडली राहण्यासाठी सध्याचा जो एक महत्वपूर्ण दुवा आहे, तो म्हणजे गझल. त्यांनी अनेक उत्तम गझला लिहिलेल्या आहेत. (मी जाणीवपूर्वक ह्या लेखात त्यांच्या गझलांचा उल्लेख टाळला आहे कारण तो जरा वेगळ्या दृष्टीने पाहायचा विषय आहे, असं मला वाटतं.) ह्या 'गझल' प्रकारातही त्यांनी विपुल लेखन करावे.
त्यांनी हर तऱ्हेच्या कवितेस आपले म्हणावे, असेच मला वाटते.

त्यांची कविता मला नेहमीच प्रेरणा देत आली आहे. इथून पुढेही देत राहीलच, ही खात्री आहे ! त्यांच्या काव्यप्रवासासाठी मनापासून शुभेच्छा !

....रसप....

Saturday, November 05, 2016

डोक्यावर थयथय नाचे भारतियत्व

'उद्याचा मराठवाडा' च्या दिवाळी २०१६ अंकात प्रकाशित कविता :-

विस्तीर्ण कधी होता हा रस्तासुद्धा
केव्हढी तत्वनिष्ठांची गर्दी झाली
जायचे पुढे वेगाने प्रत्येकाला
जो पडला त्याला तुडवा पायांखाली

आसमंत जयजयकारांनी दुमदुमतो
आरोळ्या, हाळ्यांचाही गोंधळ चाले
उन्मत्त प्रदर्शन झेंड्यांचे, शक्तींचे
तलवारी हातांच्या, नजरांचे भाले

ही जमीन, अंबर, पाणी सगळे तुमचे
माझ्यासाठी ना येथे जागा उरली
मज माझी भाषा समजेना आताशा
शांततेत माझ्या किती वादळे विरली

मी सजीव आहे, नंतर माणुस आहे
माणुसकीनंतर माझे नागरिकत्व
अनुक्रमात झाला कसा बदल आता की -
डोक्यावर थयथय नाचे भारतियत्व

हो, उगाच आलो होतो तुमच्यामध्ये
पण परत जायचाही रस्ता गजबजला
बस् एक कोपरा धरून निपचित पडणे
इतकाच तोडगा आहे आता उरला

....रसप....
९ जुलै २०१६

Thursday, November 03, 2016

असं एखादं पाखरू वाह्यात - शिवाय (Movie Review - Shivaay)

प्रास्ताविक वगैरे काही नाही. डायरेक्ट सुरूच करतो, कारण बिनडोकपणाचं वर्णन करायला कसलं प्रास्ताविक वगैरे करणार !

तर सिनेमा सुरु होतो जोरजोराच्या उच्छ्वासांनी. दम लागलेला नरपुंगव आहे आपला एक 'A' वगळलेला अजय देवग्न. इतस्तत: विखुरलेल्या बर्फात निपचित पडलेल्या माणसांकडे एक कटाक्ष टाकून तो नजर सर्वत्र फिरवतो, त्याला एक लोकरीची छोटीशी बाहुली दिसते. तिला हातात घेऊन तो जमिनीवर बद्दकन् सांडतो.
उच्छ्वास कंटिन्यूड..
विखुरलेलं बर्फ पडद्यावर उडतं आणि कहाणी ९ वर्षं मागे जाते आणि हजारो फूट उंचावरच्या अजून एका बर्फाळ भागात पोहोचते. जाडजूड जाकीटं, हातमोजे, कानटोप्या घातलेली मिलिटरीची ३-४ माणसं. पैकी एक जण जोरात हाक मारतो... 'शिवाssssय!'
कॅमेरा झरझर वर जात उंच, अतिशय उंच शिखरावर पोहोचतो. सर्वदूर पसरलेला अमर्याद बर्फ, त्या उंचीवरून दिसत असलेल्या बर्फाच्छादित शिखरांच्या अगणित रांगा वगैरे पडद्यावर पाहून आपल्याला कुडकुडायला लागतं. पण पाठीवर त्रिशूळ गोंदवलेला कुणी भोलेनाथाचा अवतार उघड्यानेच त्या बर्फावर पालथा निजलेला दिसतो. बहुतेक त्याचं हृदय लाकडी असावं. हजारो फूट खालून दिलेली हाक त्याच्यापर्यंत पोहोचते आणि गांजा मारुन भिर्र झालेला असतानाही तो जागा होतो आणि उघड्या शरीरावर एक जाकीट चढवतो, त्याची चेनही अर्धी उघडीच ठेवतो आणि कड्यावरून स्वत:ला झोकून देतो ! 'असं एखादं पाखरू वेल्हाळ ज्याला सामोरं येतया आभाळ' म्हणजे काय, तर हे. हातात दोन मोठे हूक आणि अर्धउघड्या जाकीटच्या मागे असलेला एक दोरखंड ह्यांच्या जोरावर तो नजर पोहोचणार नाही, अश्या उंचीवरून खाली टप्पे खात, स्लाईड करत, लटकत, उड्या मारत काही क्षणांतच खालपर्यंत पोहोचतो, तोपर्यंत त्याला हाक मारणाऱ्याने हाक मारताना तोंडापाशी नेलेला हातही खाली आलेला नसतो ! (च्यायला.. इथे दिवाळीचा कंदील लावून खाली उतरताना शिडीचा घोडा डुगडुगला तरी आमच्या छातीतले दोन-चार ठोके जमिनीवर पडतात. मीसुद्धा पाठीवर त्रिशूळ, दंडावर नागोबा, छातीवर केसांच्या जटा वगैरे गोंदवून घ्यायचं ठरवतो आहे. मग डायरेक्ट उंच उडी मारुन एका हाताने छताच्या हुकाला धरीन आणि दुसऱ्या हातातला कंदील लटकवून लगेच खाली उडी मारीन.) खाली पोहोचल्यावर मिलिटरीवाले त्या आईसप्रूफ वीराला, त्याने पुरवलेल्या अत्यंत महत्वाच्या बातमीसाठी धन्यवाद आणि कामाचा मोबदला म्हणून एक पाकिट देतात. 'ह्याचं नाव 'शिवाय' आहे आणि तो अचाट साहसी व शक्तिमान आहे', हे लोकांना समजावं इतकंच ह्या पहिल्या दोन-पाच मिनिटांचं महत्व आहे. पण प्रत्यक्षांत, 'पुढचा सिनेमा म्हणजे आचरटपणाचा पोटाला तडस लागेस्तोवर मिळणारा डोस आहे', हे त्यातून समजून येतं.
आचरटपणा कंटिन्यूड..
'शिवाय' (अजय देवग्न) हा उत्तराखंडातल्या कुठल्याश्या दुर्गम गावांत राहणारा एक साहसी गिर्यारोहक आणि धाडसी टूरीस्ट गाईड असतो. त्याने 'अपने आपको पाला हैं' असतं आणि अंगभर गोंदवलेलं असतं. गिर्यारोहणासाठी आलेली एक गोरी गोरी पान, फुलासारखी छान बल्गेरियन सुंदरी 'ओल्गा' (एरिका कार) आणि गावरान काटेरी वांग्यासारखा दिसणारा 'शिवाय' प्रेमात पडतात. ओल्गाला स्वगृही अनेक जबाबदाऱ्या असतात आणि आगा-पिच्छा काहीही नसतानाही 'शिवाय'ची स्वत:च्या प्रेमाखातर परदेशात स्थायिक होण्याची तयारी नसते (ब्लडी मेल शॉविनीस्ट!), त्यामुळे ते लग्न करत नाहीत. मात्र प्रेमापत्य होण्याची वेळ येतेच. 'मी ह्या बाळाची जबाबदारी घेईन' असं विनवून विनवून 'शिवाय' ओल्गाला बाळाला जन्म देण्यासाठी भाग पाडतो आणि 'गौरा' (एबिगेल इम्स) चा जन्म होतो. इंटरवलपर्यंत बाप आणि लेक, मुलीच्या जन्मानंतर लगेच बल्गेरियाला निघून गेलेल्या ओल्गाला भेटण्यासाठी बल्गेरियाला पोहोचतात आणि तिथे गौरा एका संकटात सापडते.

ह्याच्या पुढचा भाग फडतूस योगायोग, भंपक साहसदृश्यं, फुसकी रहस्यमयता, बोगस भावनिक नाट्ये वगैरेंनी माखलेला आहे. तर एकूणच चित्रपट बकवास अभिनय, फुटकळ संवाद, भंकस कथालेखन, फुळकट संगीत वगैरेंनी लडबडलेला आहे.



आपण लग्न करू शकत नाही, हे माहित असतानाही मूल होईल अशी परिस्थिती येऊ देणं व त्यानंतर तिची तयारी नसतानाही 'मी जबाबदारी घेईन' वगैरे बाता मारुन तिला मूल जन्माला घालायला भाग पाडणं आणि नंतर तिला खल-स्त्री ठरवणं की जणू तिला तिच्या बाळाविषयी कधी काही प्रेमच नव्हतं, हा सगळा दांभिकपणा असह्य आहे. पदोपदी, 'शिवाय'ला सिंगल पेरेंट म्हणून सहानुभूती देत झुकतं माप देणारी एककल्ली कथा म्हणूनच अजिबात पटत नाही.
९ वर्षांनंतर जेव्हा शिवाय-ओल्गा समोरासमोर येतात, तेव्हाचा त्यांचा ब्लेम-गेम आणि नंतरचा भावनिक आवेग इतका पोकळ आहे की ग्रेस मार्क देऊन पासही करावंसं वाटू नये. असे अनेक प्रसंग अतिशय ढिसाळ पद्धतीने चित्रित केल्याने वैतागाचा कडेलोट होऊन आपणही एखादा हूक आणि दोरखंड घेऊन कुठल्याश्या बर्फाळ शिखरावरून उडी मारावी की काय, असं वाटतं.

सहसा सिनेमातील बालकलाकार भाव खाऊन जात असतात. त्यांच्या अभिनयात आणि एकंदर वावरात बरंच काही कमी-जास्त असलं, तरी त्यांचा निरागसपणा सगळ्यावर मात करतो आणि ते आवडतातच. 'एबिगेल इम्स' आपला हा समज खोटा ठरवते. एक तर तिला मुकी दाखवण्यामागे 'हिंदी बोलायची गरजच पडणार नाही' ही सोय असण्याशिवाय इतर काहीही कारण नाही आणि तिला ते मुकेपण वेडेपण वाटलं असावं की काय, अशी ती काम करते. ती जशी मुकी न वाटता वेडीच वाटते, तशीच निरागस न वाटता नतद्रष्टच वाटते. खोडकर न वाटता, कार्टी वाटते आणि लोभस न वाटता असह्य वाटते.

सर्व भूमिका एकसारख्याच ढिसाळपणे लिहिलेल्या आहेत, ह्या कन्सिस्टन्सीबद्दल मात्र 'रॉबिन भट्ट' आणि 'संदीप श्रीवास्तव' ह्या लेखकाचं मनापासून अभिनंदन. ह्यांची आडनावं 'मठ्ठ' आणि 'अवास्तव' सुद्धा शोभतील, पण सध्या जी आहेत त्यातूनही उपरोधिक विनोदनिर्मिती चांगली होते आहे, त्यामुळे असोत.

१०५ कोटी खर्चून हा सिनेमा बनवला आहे. त्यापैकी काही कोटी तर बल्गेरियातल्या रस्त्यावरच्या गाड्या तोडण्या-फोडण्यातच लागले असावेत. गरीब बिच्चारा रोहित शेट्टी मोजक्या गाड्या उडवतो, तोडतो, फोडतो. इथे तर 'दिसली गाडी की फुटलीच पाहिजे' असा प्रकार चालू असतो. बोनेटवर बसून एका हातात गाडीचं स्टिअरिंग पकडून दुसऱ्या हाताने बाजूच्या गाडीमधल्याशी झटापट करतानाचं दृश्य पाहून तर डोळ्यांचं पारणं फिटावं !
अचाट साहसदृश्यांना जर तर्कसंगत कथा-पटकथा व तुल्यबळ अभिनयाची जोड असली, तर तितकीशी खटकत नाहीत. 'मिशन इम्पॉसिबल'सुद्धा पचवतोच की आम्ही ! पण त्यासाठी आवश्यक 'बॅलेन्सिंग अ‍ॅक्ट' कोण करणार ? नुसतंच 'टॉम क्रूझ'चं करपलेलं भारतीय व्हर्जन म्हणून एरव्ही कितीही आवडत असला तरी त्या देवग्नाला कसं सहन करायचं ? वांगं आवडतं म्हणून काय नुसतं खायचं होय ?

सणासुदीच्या दिवसांत एक अशक्य वाह्यात चित्रपट पाहिला आणि मनातल्या मनात त्याचं शीर्षक बदलून 'शिवाय' ऐवजी 'शिव्याय' केलं आहे. फॅन मंडळींना तर सगळंच आवडत असतं. त्यामुळे जर देवग्नफॅन असलात आणि ऑलरेडी पाहून झाला नसेल, तर नक्की पाहा. देव जसा 'यत्र तत्र सर्वत्र' आहे, तसाच 'देवग्न'ही चित्रपटात ठायी ठायी आहे. इथून पुढे 'खानावळी'ला स्वप्रेमाबद्दल नावं ठेवत असताना ह्या साळसूदपणाचा आव आणून दिवाळी खराब करणाऱ्या भरताच्या वांग्यालाही लक्षात ठेवा, म्हणजे झालं.

रेटिंग - *

- रणजित पराडकर

Saturday, October 29, 2016

यह दिल है कन्फ्युज्ड ! (Ae Dil Hain Mushkil - Movie Review)

'मला काय हवं आहे' ह्याचा थांग बहुतेकांना मर्यादित स्वरुपातच लागत असतो. ह्या 'बहुतेकां'पैकीही बहुतेकांची मजल व्यावसायिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या काय हवं आहे, अश्या विशिष्ट क्षेत्रांपुरतीच मर्यादित असते. स्वत:ची भावनिक गरज नेमकी काय आहे, हे समजून येण्यात उभं आयुष्य निघून जातं. अनेकदा अगदी शेवटपर्यंतसुद्धा हे समजून नाही तर नाहीच येत.
संपले आयुष्य पण ना समजले माझे मला 
धावलो होतो कुणाच्या जन्मभर मागावरी ?
असा हा जटील प्रश्न फार कमी लोकांना सुटत असतो. त्यामुळे साहजिकच आपण सगळेच कमी अधिक प्रमाणात एक गोंधळलेले - कन्फ्युज्ड - आयुष्य जगत असतो. भारतीय चित्रपट वास्तववादाकडे जसजसा अधिकाधिक सरकत चालला आहे, तसतश्या चित्रपटाच्या कथानकात अश्या 'गोंधळलेल्या' व्यक्तिरेखा वारंवार येत आहेत. इम्तियाझ अली तर अजूनही हा एकच विषय स्वत:चं पूर्णपणे समाधान होईल इतपत मांडून मोकळा होऊ शकलेला नाहीय बहुतेक. 'जब वी मेट', 'रॉकस्टार', 'तमाशा' असे त्याने विविध प्रयोग ह्या एका शोधाला सादर करण्यासाठी केलेले आहेत. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' आणि 'दिल धडकने दो' मधून झोया अख्तरनीही अश्याच व्यक्तिरेखांना सादर केलं आहे आणि तनू वेड्स मनू, कट्टी-बट्टीसुद्धा ह्याच पंगतीत बसवता येतील.
सुरुवातीला बाष्कळ प्रेम कहाण्या दाखवणाऱ्या करण जोहरने नंतर हळूहळू जरासे परिपक्व भावनिक द्वंद्व 'कभी अलविदा ना कहना' आणि 'बॉम्बे टॉकीज' मधून दाखवले होते, पैकी 'बॉम्बे टॉकीज' तर खूपच धाडसी आणि चांगला प्रयोग होता. 'ऐ दिल हैं मुश्कील' द्वारे जोहरने 'आपली भावनिक गरज काय आहे', हे समजण्या, न समजण्यामधल्या द्वंद्वात गुंतलेल्या काही मनांचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्रयत्न जमला की फसला, हा पुढचा भाग. तो प्रामाणिक होता का, हा पहिला. तर हो. प्रयत्न प्रामाणिक आहे. पण 'मुल्ला की दौड मस्जिद तक़' ह्याचाही प्रत्यय दिला आहेच !

ह्या कथानकातल्या सपशेल कन्फ्युज्ड व्यक्तिरेखा आहेत, अयान (रणबीर कपूर) आणि सबा (ऐश्वर्या राय बच्चन). पैकी बच्चनसूनेला सहाय्यक विभागात मोडेल अशी, दुय्यम किंवा तिय्यम भूमिका असल्याने ती काही महत्वाची नाही. मुख्य भूमिका रणबीर आणि अनुष्का शर्माच्याच आहेत. अनुष्काने साकारलेली 'अलीझेह' त्यातल्या त्यात 'सुज्ञ' वगैरे म्हणता येईल अशी आणि अयान मात्र अगदीच सुदूरबुदूर ! ह्या सगळ्या ओढाताणीच्या धाग्याचं एक टोक 'अली' (फवाद खान) च्या हातीही आहे. मात्र त्याला जराही पकड वगैरे घेण्यासाठी वावच ठेवलेला नाहीय.


हे कथानक लंडन, पॅरीस, व्हिएन्ना अश्या परदेशी लोकेशन्सना घडतं. का, ते विचारायचं नसतं, कारण चोप्रा, जोहर वगैरेंकडे अमाप पैसा आहे. हा पैसा सिनेमात ओतताना त्याचा विनियोग तांत्रिक बाजू सुधारणे, पटकथेला धार आणणे, चांगलं संगीत बनवणे वगैरे फुटकळ गोष्टींसाठी खर्च करणे, अजून तरी पूर्णपणे आपल्या मुख्य धारेतल्या सिनेमाकर्त्यांना पटत नसावेच. नाही म्हणायला, काही काळासाठी कथानक थोडंसं लखनऊमध्ये सांडतं. पण पुन्हा एकदा 'तिथेच का' ह्या प्रश्नाला काहीही उत्तर नाही. म्हणजे अमुक कथानक अमुक शहरातच का घडावे किंवा कथानकाचा विशिष्ट भाग तमुक ठिकाणीच का घडावा, ह्याचा तर्कसंगत विचार करणे हा वेळेचा अपव्यय आहे, हे समजून घ्यायला हवं !

'अयान'च्या भूमिकेत रणबीरने पुन्हा एकदा जबरदस्त काम केलं आहे. पण गोंधळलेल्या प्रेमिकाची व्यक्तिरेखा साकारून आता त्याला कंटाळा येण्यास हरकत नसावी. ऋषी कपूर स्वत:च्या एका विशिष्ट छबीत अडकल्याने त्याच्यातल्या सक्षम अभिनेत्याला फार क्वचित बाहेर येता आलं आहे. बापासारखं पोराचं होऊ नये. यह जवानी है दिवानी, तमाशा, रॉकस्टार, बचना ऐ हसीनो ह्या सगळ्यातून रणबीरने आधीच कन्फ्युज्ड तरुण साकार केला आहे. 'ऐदिहैंमु' त्याच सगळ्याला उजाळा मिळत जातो.
एकेका सिनेमागणिक अनुष्का शर्मा मला अधिकाधिक आवडायला लागली आहे. तिची 'अलीझेह' इतकी मस्त झाली आहे की तिच्या प्रेमात का पडू नये', हाच प्रश्न पडावा ! अगदी सहज वावर, बोलके डोळे व चेहरा आणि जबरदस्त आत्मविश्वास, ह्याचं एक परफेक्ट मिश्रण मला अनुष्कात जाणवतं. 'आत्मविश्वासाने वावरणारी स्त्री' ही सौंदर्याची सर्वश्रेष्ठ मूर्ती असावी. ती झलक अनुष्कात ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन नेहमीच दिसत असते. तिची 'अलीझेह' इतकी सुंदर दिसते की एका प्रसंगात जेव्हा ती 'सबा'च्या (ऐश्वर्याच्या) सौंदर्याची भरभरून स्तुती करत असते, तेव्हा 'हा उपरोध आहे की काय' असा संशय येतो !
ऐश्वर्या आजपर्यंत जितकी चांगली दिसत आली आहे, तशीच दिसते. ना जास्त, ना कमी. खरं तर, तिच्या भूमिकेच्या दृष्टीने पाहिलं, तर तिने मध्यमवयीन दिसणं अपेक्षित होतं, पण ती पुरेशी वयस्कर दिसत नाही. तिची एन्ट्री झाल्यावर सिनेमाच्या गाडीचा ट्रॅक काही वेळासाठी बदलतोच. तेव्हाचे बोजड डायलॉग्स तिच्यासोबतच्या अयानला करतात, त्यापेक्षा जास्त आपल्याला बोअर करतात. 'सबा' कवयित्री का दाखवली आहे, ह्यालाही काही सबळ कारणमीमांसा नाहीय. किंबहुना, ती कवयित्री नसती दाखवली, तर जे कमाल पकाऊ डायलॉग इच्छा नसतानाही पाहाव्या लागणाऱ्या जाहिरातींप्रमाणे आपल्यावर आदळत राहतात, ते तरी टळले असते.

मी सिनेमा पाहण्याची दोन प्रमुख कारणं होती. ट्रेलरमध्ये ऐकवलेला 'एकतर्फा प्यार..' वाला डायलॉग आणि 'चन्ना मेरेया' हे गाणं. तो डायलॉग कुठल्या प्रसंगी आहे आणि ते गाणं कसं चित्रित केलं आहे, ह्या दोन गोष्टींची मला खूप उत्सुकता होती. दोन्हींनी मला निराश केलं. धक्कादायक गोष्ट अशी की, 'एकतर्फा प्यार..' वाला तो डायलॉग मुख्य व्यक्तिरेखेच्या तोंडी नाहीच ! (कुणाच्या तोंडी आहे, हे सांगणार नाही. स्वत:च जाणून घ्यावे !) आणि 'चन्ना मेरेया' हे गाणं 'क्युटीपाय' ह्या भिकार धांगडधिंग्याला लागूनच सुरु होतं. दोन्ही गाण्यांच्या मेलडीचा, पट्टीचा एकमेकांशी दुरान्वयानेही संबंध नसल्याने हा बिनडोकपणा सहनच होत नाही. मुळात, ती 'क्युटीपाय' नामक टुकारकी अकारणच घुसडलेली आहे. एकंदरीत संगीताबद्दल बोलायचं झालं तर 'चन्ना मेरेया' आवडलंच आहे. शीर्षकगीतही चांगलं जमलं आहे. पण बाकी सगळा आनंदीआनंद आहे. पार्श्वसंगीत तर निरर्थक कल्लोळ माजवतं, बाकी काहीच नाही.

व्यक्तिरेखांच्या मनांतले भावनिक गोंधळ मांडण्यात करण जोहर दोन-तीन भाग वगळले, तर बऱ्यापैकी प्रभावी ठरला आहे. सगळ्यात जास्त माती खाल्ली आहे शेवटाकडे. शेवटचा मेलोड्रामॅटिक ट्विस्ट 'सगळं मुसळ केरात'वाला आहे. त्या सगळ्या फिल्मीगिरीनंतर शेवटी सिनेमा त्याच वळणावर संपतो, जिथे तो साधारण अर्ध्या तासापूर्वी पोहोचलेला असतो. 'बॉम्बे टॉकीज'मधल्या कहाणीच्या हाताळणीतली परिपक्वता इथे असती, तर सिनेमा 'जोहरचा सर्वोत्तम' म्हणता आला असता. शेवट वगळता, इतर सादरीकरणातही 'तेच ते'पण जाणवत राहतं.
जोहरच्या सिनेमांत श्रीमंतीचं प्रदर्शन असतं. ते झोया अख्तरच्याही सिनेमांत दिसतं, पण दोन्हींत फरक आहे. जोहरच्या प्रदर्शनात क्रिएटिव्हिटी जरा कमीच वाटते. मोजकीच पात्रं असलेलं कथानक असल्याने, ते आटोपशीर असायला हवं होतं. 'तेच ते'पण आल्यामुळे ते जरासं लांबलंच आहे. बट अगेन, अडीच, पावणे तीन तासाचा पसारा मांडल्याशिवाय चोप्रा, जोहर प्रभूतींना पोटभरीचं झाल्यासारखं वाटत नसावंच बहुतेक !

कुणी काहीही म्हणो, करण जोहरचंही एक फॅन फॉलोईंग आहे. त्यांना 'ऐदिहैंमु' नक्कीच आवडेल.
रणबीरच्या चाहत्यांनाही 'ऐदिहैंमु' आनंद देईल. अनुष्कासाठी पाहायचा असेल, तर नक्कीच पाहावा.
रणबीर-अनुष्कामध्ये ती 'सिझलिंग केमिस्ट्री' का काय म्हणतात, ती पुरेपूर जाणवते.
ऐश्वर्यासाठी जर कुणी पाहणार असेल किंवा तिच्या व रणबीरच्या तथाकथित गरम दृश्यांबद्दल उत्कंठा असेल, तर नक्की निराशा होईल.
आणि सिनेमाला होणाऱ्या विरोधाचा विरोध म्हणून जर कुणी मुद्दाम पाहणार असेल, तर त्यांनाही अगदीच वेठीस धरल्यासारखं वाटणार नाही, असं मला वाटतंय. त्यांनी फक्त 'ऐ दिल, यह हैं बॉलीवूड' इतकं लक्षात ठेवावं म्हणजे झालं !

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर

Monday, October 24, 2016

शब्द काही थांबती ओठातही

शब्द काही थांबती ओठातही
श्वास काही हातचे उरतातही

मुश्किलीने जोडली जातात पण
फार लौकर माणसे तुटतातही

उमगलो आहे स्वत:ला जेव्हढा
तेव्हढा मी गूढ अन् अज्ञातही

गवसले आयुष्य ना आयुष्यभर
शोध घे आता जरा माझ्यातही

साचले नाते इथे डबके बनुन
कोरडेपण वाटते पाण्यातही

हे लिहू की ते लिहू की ते लिहू
चालले वादंग दु:खांच्यातही

तूच तू अन् तूच तू सगळीकडे
वेढते गर्दीच एकांतातही

मी, नशा, कविता, व्यथा, दु:खे, जखम
राहतो सगळेच आनंदातही

नीज माझ्याही कुशीमध्ये कधी
एक आई राहते बाबातही

....रसप....
२३ ऑक्टोबर २०१६

Thursday, October 13, 2016

गुजरते वक़्त की मौज - 'बाजार' - Bazaar (Hindi Movie - 1982)

प्रस्तुत लेखात सिनेमाच्या शेवटाचा उल्लेख टाळायचा अजिबात प्रयत्न केलेला नाही. जुनाच सिनेमा असल्याने तशी आवश्यकता वाटली नाही. तरी, जर कुणाला सिनेमाचा शेवट आत्ता जाणून घ्यायचा नसेल, तर आधी सिनेमा पाहावा आणि मगच लेख वाचावा, ही विनंती !



गली के मोड़ पे सूना सा कोई दरवाज़ा
तरसती आँखों से रस्ता किसी का देखेगा
निगाह दूर तलक जा के लौट आएगी

- बशर नवाज़

अशी एक अबोल, घुसमटलेली व्यथा. एका घराची, एका कुटुंबाची नव्हे, तर एका समाजाची, एका शहराचीच ! 'बाजार' ह्या व्यथेला वाचा देण्याचा प्रयत्न करतो.

हैदराबाद संस्थान भारतीय प्रजासत्ताकात विलीन झालं. निजामी गेली, नवाबी गेली. निजामाने कुचकामी करून अजगरासारखं सुस्त बनवून ठेवलेल्या कामचुकार लोकांनी आपल्याकडे असलेली संपत्ती आळसात राहून, ऐशारामात बेजबाबदार खर्च करून संपवली आणि मग उरलेल्या पुंजीत दोन वेळच्या खाण्याचीही भ्रांत ह्यांना पडली. हाता-पायाला अन् स्वभावाला कामाची सवय नाही आणि त्याच वेळी पोटालाही भुकेची सवय नाही; अशी एक कधी विचार न केलेली समस्या ह्या लोकांसमोर 'आ' वासून उभी राहिली.
हे नव-गरीब जरा वेगळ्या प्रकारचे होते. ह्यांच्याकडे राहण्यासाठी बऱ्यापैकी मोठी घरं तर होती, पण त्यांच्या डागडुजी, दुरुस्तीसाठी पैसा नव्हता. ह्यांच्या आवडी-निवडी, अभिरुची उच्च दर्ज्याच्या होत्या, पण त्या पुरवणे त्यांच्या खिश्यासाठी महाग होते. ह्यांचे कपडे कळकट, फाटके नव्हते, पण मोजकेच होते. ह्यांच्या खिश्यात मुखशुद्धीसाठी पान, विडा होतं, पण पोटाची खळगी एक तर रिकामी होती किंवा अर्धीच भरलेली.
असं म्हणता येईल की, आपल्या ह्या वाताहतीस ते स्वत:च जबाबदार होते.
मात्र, पुरुषांच्या नाकर्तेपणामुळे ओढवलेल्या ह्या दुर्दशेच्या गाड्याखाली भरडली गेली ती 'स्त्री'. हे कोणे एके काळचे सुखवस्तू लोक नोकरी वगैरेची लाचारी करण्यापेक्षा घरच्या स्त्रीची विक्री करणे, योग्य समजू लागले. काही वेळी तर स्वत: स्त्रियासुद्धा 'हाच एक तरणोपाय आहे', असं समजू लागल्या आणि स्त्री-शरीराचा एक मोठा बाजार 'निकाह, शादी' ह्या प्रतिष्ठित, गोंडस नावांच्या आड सुरु झाला.

विलीनीकरण झाल्यानंतरची काही वर्षं हैदराबादची अवस्था कशी होती, हे मला निश्चित माहित नाही. ती खरोखरच इतकी भयंकर होती का ? की 'बाजार' मधून दाखवलेली परिस्थिती अतिशयोक्तीपूर्ण आहे, कुणास ठाऊक ! पण एरव्ही, इतर चित्रपटांत केलं गेलेलं गरिबीचं उदात्तीकरण इथे दिसून येत नाही. इथला गरीब आपली भूक भागवण्यासाठी व स्वत:चे आयुष्य सुखी करण्यासाठी नाती, माणुसकी, तत्वमूल्यं ह्या सगळ्या श्रीमंत आभूषणांना चक्क अडगळीत फेकून देतो. तो आपली बहिण, मुलगी, बायको कुणाचाही सौदा करायला तयार होतो. हे सगळं अतिरंजित वाटू शकतं. पण तरी, अगदीच अविश्वासार्ह नाही. आजही ग्रामीण भागांत मुली विकत मिळतातच. किंबहुना, ज्या प्रकारे उत्तर भारतातील काही भागांतला स्त्री-पुरुष संख्येचा समतोल बिघडत चालला आहे, त्याचा विचार करता भविष्यात असे 'बाजार' भरणं आणखी खुलेआम सुरु होऊ शकेल ! (ह्यावरुन २००३ सालचा 'मातृभूमी' हा एक जबरदस्त सिनेमा मला आठवला. युट्युबवर आहे. पाहू शकता.)

हे एकंदर चित्र फार भीषण आहे. पण ह्या सगळ्याची मांडणी मात्र त्या भीषणतेला प्रभावी करत नाही. कारण 'बाजार' मधली कुठलीच व्यक्तिरेखा पूर्णपणे पटतच नाही. प्रसंगांची वीण आणि संवादांची पेरणी कथानकातलं वजन खूप हलकं करून टाकते.
कथानकाच्या केंद्रस्थानी स्मिता पाटीलची 'नजमा' आहे. ही प्रमुख व्यक्तिरेखा प्रचंड गोंधळलेली आहे. तिचं बहुतांश वागणं तर्कविसंगत आहे. एका 'अख्तर' नामक (भरत कपूर) तद्दन भुक्कड मनुष्यासाठी ती आपलं घर सोडून मुंबईला पळून जाते. एका अर्थी ते बरोबरच असतं, कारण घरच्यांनी तर असाही तिचा बाजार मांडलेलाच असतो. मात्र ह्या मनुष्याकडे स्वत:चं काही एक कर्तृत्व नाही, तो तिला त्याच्या एका मित्राच्या रिकाम्या घरी आश्रितासारखं ठेवतो आहे आणि लग्न न करता रोज रात्री शय्यासोबत करून जातो आहे. त्याच्याकडे ना धड नोकरी, ना धड व्यवसाय. तो स्वत: इतका तत्वशून्य व लाचार आहे की त्या अमीरजाद्या वयस्कर मित्राच्या हातातलं खेळणं बनला आहे. आणि दुसरीकडे हैद्राबादला असतानापासून तिच्यावर मनापासून प्रेम करणारा सलीम (नसीरुद्दीन शाह) आहे. जो कमावता, जबाबदार आहेच, पण कवी, लेखकही आहे. जो तिला वारंवार हे समजावतो आहे की अख्तर तिला फसवतो आहे. पण तिला ते पटत नाही ! अश्यातच त्या म्हाताऱ्या मित्राच्या मनात स्वत:च्या शरीरसुखाच्या सोयीसाठी एक मादी लग्न करून करून विकत घेण्याचं डोक्यात येतं. ह्यासाठी त्याला मदत करायला लाचार अख्तर तयार होतोच, त्यात काही आश्चर्य नाही. पण तो नजमालाही ह्यासाठी तयार करतो, तेव्हा मात्र ते पटतच नाही.
मग तो वयस्कर मित्र, अख्तर, नजमा, सलीम, नजमाची एक मैत्रीण असं सगळं लटांबर मुंबईहून हैद्राबादला मुलगी विकत घेण्यासाठी येतं. एका फालतू मनुष्याच्या त्याहून फालतू दोस्तासाठी नजमा, जी स्वत:सुद्धा कधी तरी विकली गेलेली आहे, माद्यांचा बाजार भरवते आणि अजून दोन आयुष्यांना बरबादीच्या रस्त्यावर ओढते. तिला जशी आहे तशी स्वीकारायला सदैव तयार असलेलं एक खरं प्रेम २४ तास डोळ्यांसमोर असताना ही बाई असं का वागते आहे, ह्याचं तर्कसंगत स्पष्टीकरण मिळता मिळत नाही. कारण अख्तरमध्ये त्याच्यावर जीवापाड प्रेम करावं, असं काहीच नाही आणि नजमा त्यात असं काय पाहत असते, तेही स्पष्ट होत नाही. ह्या सगळ्या ठिसूळपणामुळे कथानकात प्रचंड ताकद असूनही 'बाजार' हवा तितका प्रभावी होत नाही.

कहाणीतला दर्द जसा स्मिता पाटीलच्या 'नजमा'मध्ये आहे, तसाच तो सुप्रिया पाठकच्या 'शबनम' आणि फारुख शेखच्या 'सज्जो'च्या प्रेमात आहे. हे प्रेम -

नज़रें मिलती हैं जाम मिलते हैं
मिल रही है हयात फूलों की

- असं गोडगोजिरं राहत नाही. तर ते ह्या गोंडसपणापासून -

बहुत आरजू थी गली की तेरी
सो यास-ए-लहू में नहा कर चले

- अश्या शोकांतिकेपर्यंत पोहोचतं. खरं तर हा प्रवास मन चुरगाळणारा आहे. कुठे तरी आपल्याला आधीच जाणवलेलंही असतं की 'हा स्वच्छ, गुळगुळीत कागद आणि त्यावरचं टापटीप, मोत्यांसारखं अक्षर' हे काही शाश्वत ठरणार नाही. ह्याची नासाडी अटळ आहे. ते तसंच होतं.

देख लो आज हमको जी भरके
कोई आता नहीं है फिर मरके

हे म्हणणारी सुप्रिया पाठक खूप गोड दिसते, कामही मस्तच करते. तिच्यासोबत फारुख शेखही नेहमीप्रमाणेच सहजाभिनय करतो. मात्र ठिगळं-ठिगळं जोडलेलं कथानक एकसंधपणे समोर येत नाही. काही न काही कमी राहतेच राहते.

नसीरुद्दीन शाहचा सलीम मात्र सगळ्यांत जास्त लक्षात राहतो. अजून एक बाजार भरवला जातो आहे, हे जेव्हा त्याला समजतं त्या वेळचा त्याचा मोनोलॉग तर पुन्हा पुन्हा पाहावा असा आहे. ही एक व्यक्तिरेखाच मला तरी मनापासून पटली. तरी त्याचा उद्रेक होतच नाही, हेही जरासं अविश्वसनीय वाटतं.
'निशा सिंग'चाही एक लहानसा रोल आहे. जो तिने मनापासून निभावला आहे. एकाच वेळी तिच्या डोळ्यांत समंजसपणा आणि खट्याळपणा जाणवतात.

'बाजार' हा 'सागर सरहदी' दिग्दर्शित (बहुतेक) एकमेव चित्रपट. 'सागर सरहदी' हे खरं तर लघुकथालेखक. त्यांनी यश चोप्रांच्या काही सिनेमांचे पटकथा, संवाद लेखनही केलं होतं. 'बाजार'ची कथा, पटकथा, संवादही त्यांचेच. पण स्वत: लिहिलेली ही कथा त्यांना स्वत:लाच दिग्दर्शक म्हणून पेलताना कसरत करावी लागली आहे. खूप विचित्र प्रकारे चित्रित केलेले अनेक प्रसंग जाणवतात.
उदाहरणार्थ -
१. 'शबनम'च्या आईकडे (सुलभा देशपांडे) शबनमच्या लग्नासाठी स्थळं घेऊन येणारी एक वृद्ध बाई व्हरांडा/ ओसरीत बसून स्थळ सांगत असताना बाजूला एका अर्धपारदर्शक पडद्याआड शबनम आणि तिची बहिण/ मैत्रीण उभ्या राहून सगळं ऐकत आहेत. त्यांचं तिथे उभं राहणं, एकमेकांशी कुजबुजणं खूपच कृत्रिम, अवघडलेलं वाटतं.
२. नजमा 'सज्जो'ला (फारुख शेख) घरी पार्टीसाठी आमंत्रण देते, तेव्हा ती म्हणते की, 'आज शाम को दावत हैं.' त्या 'दावत'साठी सज्जो आणि शबनम जातात. तिथे शबनम गाणं गाते. ती गात असताना मागे काळाकुट्ट अंधार आहे. म्हणजे रात्र झालेली दाखवली आहे. तर पुढच्याच दृश्यात सज्जो आणि शबनम जेव्हा रस्त्यावर बाहेर पडतात, तेव्हा बाहेर उजेडही असतो आणि मशिदीतली 'अजान'ही ऐकू येते ! इथे वेळेचं गणित गडबडलंय बहुतेक.

अश्या अजूनही काही गोष्टी खटकतात. ह्या फक्त वानगीदाखल.
शेवट तर अगदीच अतर्क्य आहे. जर शबनमला जीवच द्यायचा होता, तर ती लग्न करतेच का ? इतकी पराकोटीची कृती करण्यापेक्षा पळून जाण्याचा प्रयत्न का करत नाही किंवा लग्नाआधीच जीव का देत नाही किंवा तसा प्रयत्न तरी का करत नाही ? केवळ एक शोकांतिका लांबवण्यासाठी, जेणेकरून ती अधिकाधिक बोचावी, लग्न होऊ दिलं आहे असं वाटतं.
शबनमच्या मृत्युनंतर सज्जो एक किंकाळी फोडतो. त्याचं ते किंकाळी फोडण्याचं दृश्य म्हणजे नुसतंच एक ठिगळ जोडल्यासारखं झालं आहे. म्हणजे, >ती मरते + सज्जोच्या आजूबाजूला चार-पाच माणसं आहेत, तो किंचाळतो + पुढचं ठिगळ< असा सगळा प्रकार आहे.

'बाजार'ची सगळ्यात मोठी ताकद आहे 'खय्याम'चं संगीत. ह्या संगीताची आणि 'उमराव जान'च्या संगीताची जातकूळ एकच. ह्या सर्व गाण्यांसाठीही लता मंगेशकरांपेक्षा आशा भोसले हव्या होत्या, असं माझं आधीपासूनचंच मत आहे. गाणी पडद्यावर पाहत असताना ते अजून ठाम झालं. 'तलत अजीझ'चा 'फिर छिडी रात..' मधला आवाज मला तरी आवडत नाही. त्यांचा हा विशिष्ट आवाज, जो अनेक गाण्यांत आहे, तो मला एका कपात १० चमचे साखर घातलेल्या चहासारखा वाटतो. सुरेश वाडकरांशी मिळताजुळता. (वाडकरांचा जो दमदार आवाज 'हुजूर इस कदर भी..', 'साँझ ढ़ले गगन तले..' सारख्या काही गाण्यांत आहे, तसा नाही, इतर काही गाण्यांत आहे तसा.) हा आवाज गुळगुळीत, मिळमिळीत वाटतो.  'दिखाई दिए यूँ..' हे माझं अत्यंत आवडतं गाणं. पडद्यावर पाहताना ते अंमळ अजून आवडलं, कारण सुप्रिया पाठक !
'उमराव जान' ची गाणी 'शहरयार'नी लिहिली होती, तर इथे बशर नवाज, मीर तकी मीर, मिर्झा शौक़, मखदूम मोहीउद्दीन असे वेगवेगळे शायर आहेत. सगळ्यांनी वजनदार लिहिलं आहे आणि म्हणूनच आजही ही गाणी आपल्या ओठांवर आहेत, उद्याही असणार आहेत.

'बाजार' खूप अपेक्षा ठेवून पाहिला. चांगला आहे, पण महान वगैरे वाटला नाही. एक अप्रतिम काव्य बनता बनता राहून गेलं, ह्याची हुरहूर मनाला लागली आहे. अर्थात, काव्याची अनुभूती ही व्यक्तीसापेक्ष असते. एकाला जे आवडेल, ते सगळ्यांना आवडेलच असं नाहीच आणि जे एकाला आवडणार नाही, ते सर्वांना आवडलेलं असूही शकतं. त्यामुळे ही 'बाजार' नावाची चित्रपट कविता मला जरी खूप आवडली नसली, तरी इतरांना आवडू शकेलच.

- रणजित पराडकर

Thursday, September 29, 2016

पिंक - काही मतं (Pink - Not a Review !)


'पिंक'विषयी लिहायला बराच उशीर झालाय, पण लिहावंसं वाटतंय म्हणून लिहितोय. बहुतांश लोकांनी पाहून झाला आहे, भरपूर परीक्षणंही आलेली आहेतच. त्यामुळे मी कहाणी वगैरे न लिहिता फक्त काही मतं मांडतो. हे परीक्षण नव्हेच. फक्त मतप्रदर्शन !

१. 'पिंक' हे नाव आणि पोस्टरवरील त्याचं लेटरिंग/ डिझाईन मला खूप आवडलं. तेव्हढ्यातूनच एक संदेश पाहणाऱ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचतो आहे, असं मला वाटलं.
# 'पिंक' हा रंग 'स्त्रीत्वा'चं प्रतिनिधित्व करतो. मुलगी असेल तर 'गुलाबी' रंग आणि मुलगा असेल तर 'निळा' रंग, असा एक सर्वमान्य समज जगभरात दिसून येतो.
# पोस्टरवर 'PINK' मोठ्या अक्षरांत (Capital Letters) आहे.
# 'PINK' मधल्या 'I' आणि 'K' च्या समोर हाताच्या दोन मुठी दिसून येतात. कुणी तरी बंदिस्त असल्याचं त्यातून दिसतं आणि बंड करून उठत आहे, असंही.
सिनेमाचं हे नाव व त्याचं हे डिझाईन विचारपूर्वक बनवलेलं आहे नक्कीच.

२. पूर्वार्ध काही जणांना लांबलेला वाटला. पण मला तर तो खूपच आवडला. पहिल्या प्रसंगापासून सिनेमा कहाणीला हात घालतो, हे खूप आवडलं. जी घटना घडली आहे, त्या घटनेचा पडसाद (aftermath) ह्या भागात दिसून येतो. मात्र घडलेल्या घटनेबाबतच तपशील अजिबात दाखवला जात नाही. महत्वाचं हे की, हा तपशील दाखवला न गेल्याने काहीच बिघडत नाही. कारण सर्व मुख्य व्यक्तिरेखा (अपवाद - बच्चन) इतक्या व्यवस्थित मांडल्या जातात की त्यावरुन 'काय घडलं असावं' ह्याचा साधारण अंदाज आपल्याला येतोच आणि संदर्भासाठी तो पुरे असतो. ह्या भागातलं बच्चनचं तोंडातल्या तोंडात बोलणं मात्र फारच वैताग आणणारं वाटलं. त्याच्या बोलण्याला त्या व्यक्तिरेखेची जराशी बिघडलेली मानसिक स्थिती कारणीभूत आहे, हे पुढे समजून येतं. मात्र ती तशी असण्याची कहाणीला काही एक गरज नसताना, ही जबरदस्तीची जुळवाजुळव कशासाठी ? तर बच्चनच्या व्यक्तिरेखेला एक वलय मिळावं म्हणून ? तसं असेल, तर हा डाव उलटलाच आहे.

३. नाट्यमय, कल्पक, वेगवान व संयतपणे हाताळलेल्या पूर्वार्धानंतर मात्र गाडी घसरतेच. मुलींनी समाजात कसं वागावं ह्याबाबतचं एक मॅन्युअल बच्चन कोर्ट रूममध्ये मांडतो. वेगवेगळ्या प्रसंगांत एक एक करून तो ह्यातले मुद्दे मांडतो आणि ते सगळं उपरोधिकपणे. हा सगळा भाग खरं तर त्याच्या 'क्लोजिंग स्पीच'मध्ये यायला हवा होता. पण 'क्लोजिंग'च्या प्रसंगाच्या अगदी आधीच त्याची आजारी पत्नी (की मैत्रीण?) मृत्यू पावते. त्याच्या 'क्लोजिंग स्पीच'मध्ये 'No means NO' वाला खूप मस्त भाग आहे. त्याच्या जोडीला हे मॅन्युअल असतं, तर विजोड वाटलं असतंच आणि लांबलचकही झालं असतं. एका धक्कादायी घटनेनंतर त्याचं भलंमोठं स्पीच विचित्रही वाटलं असतं, म्हणून ते असं तुकड्या तुकड्यांत पूर्ण केसभर घेतलं असावं कदाचित. पण असं आणि इतकं अवांतर बोलणंसुद्धा कोर्टातल्या वातावरणाला शोभलं नाहीच. एकूणच कोर्ट रूम ड्रामा जरासा अजून कंट्रोल करायला हवा होता. तो 'तारीख पे तारीख' पर्यंत गेला नाही, हेच नशीब. कारण पियुष मिश्राचा वकील तापसीला प्रश्न विचारत असताना एका प्रसंगात इतका आक्रस्ताळा आणि आवेशात येतो की हा दुसराच कुठला सिनेमा मध्येच लागला की काय, असंच वाटतं. त्यानंतर बच्चनही एका प्रसंगात आरोपीला प्रश्न करताना असाच भरकटत जातो. सुरुवातीच्या संयत हाताळणीनंतर कोर्टातला हा सगळा रंजित भाग मला तरी खटकलाच.

३. बऱ्याच काळानंतर बच्चनचं काम कृत्रिम वाटलं. ८० च्या आसपासचे त्याचे अनेक सिनेमे, खासकरून त्यांतले विनोदी प्रसंग बघवत नाहीत. पण अधिक 'ठहराव'वाल्या भूमिकांत तो नेहमीच आवडत आला आहे. पहिल्यांदाच 'ठहराव'वाल्या व्यक्तिरेखेत तो कृत्रिम वाटला, हे विशेष. बऱ्याचदा आपण लोक सिनेमाच्या विषयाला पाहून अपाल्म मत बनवत असतो. उदा. - 'प्रकाश बाबा आमटे' चित्रपट. लोकांना आवडला त्याचं कारण त्यातल्या व्यक्तिरेखा. पण सिनेमा म्हणून त्यावर विचार केला का ? तसंच इथेही होतं जरासं. बच्चनची व्यक्तिरेखा स्त्रीत्वाच्या समर्थनार्थ ठाम उभी राहिलेली आहे, त्यामुळे ती आवडते. भिडते. पण पडद्यावर 'सहगल' न दिसता सतत 'बच्चन'च दिसत राहतो, त्याचं काय ?

४. बच्चनच्या इमेजपुढे सिनेमातल्या तीन अभिनेत्र्या झाकोळल्या गेल्या आहेत. खरं तर 'तापसी पन्नू'च मुख्य भूमिकेत आहे आणि तिचं काम खूपच जबरदस्त झालेलं आहे. तिच्या जोडीला इतर दोघी - कीर्ती कुल्हारी आणि अ‍ॅण्ड्रिआ तरिआंग - ह्यांनीसुद्धा तोडीस तोड काम केलं आहे. मात्र त्यांना पुरेशी दाद दिली जात नाहीय. स्त्रीत्वाचा पुरस्कार करणारा विषय आहे इथेही पुरुषप्रधानता अशी डोकावते. हे विधान कुणाला अतिरंजित वाटेल, पण खरं आहे, ह्या विषयी मला स्वत:ला तरी अजिबात संशय नाही. टेलिव्हिजनवरील एका कार्यक्रमात ('झलक दिखला जा' बहुतेक) तापसी आणि बच्चन आले होते, 'पिंक'च्या प्रमोशनसाठी. संपूर्ण कार्यक्रमात तापसीला फक्त एकदा बोलायला मिळालं. बाकी अख्खा एपिसोड बच्चन, बच्चन आणि बच्चनच होतं.आपल्याला काय मेसेज द्यायचा आहे आणि आपण तो कसा द्यायला हवा, ह्याचं भान ह्या इतक्या मोठमोठ्या लोकांना का असू नये ? खरोखर एखादा खमक्या असता, तर त्याने स्वत:हून म्हटलं असतं की 'चित्रपट माझा नाही, ह्या मुलींचा आहे, स्त्रीत्वाचा आहे. तापसीला बोलू द्या.' पण स्वत:ला ओवाळून घेण्याची संधी सोडवता सोडवत नाही बहुतेक. चित्रपटाच्या सगळ्याच प्रसिद्धीत हेच सूत्र दिसून येतं. युएसपी बच्चनच आहे. पोस्टरवर बच्चनचा चेहरा मोठा दिसतो, बाकीच्यांचा लहान किंवा नाहीच ! ज्या लोकांनी सिनेमाच्या नावावर व त्याच्या लेटरिंग/ डिझायनिंगवर विचार केला, त्यांना पब्लिसिटीसाठी असं स्टारलाचार व्हायला लागणं पटलं नाही.

५. मुख्य घटना संपूर्ण चित्रपटात दाखवलीच जात नाही. हे खूप आवडलं, असं म्हणत असतानाच अखेरीस श्रेयनामावलीसोबत सगळी घटना दाखवली जाते. ह्याची गरज काय होती ? ह्यामुळे तर सगळं कथन एकदम बाळबोध होऊन गेलं, असंही वाटलं.

६. एकंदरीत सिनेमा आवडला का ? - हो.
टीव्हीवर लागल्यावर मी पुन्हा पाहीन का ? - अर्थातच हो.
पण जितका उदो उदो चित्रपटाचा होतो आहे, तितकाही काही भारी मला वाटला नाही. पूर्वार्ध खरोखरच दमदार आहे. पण नंतर त्यावर बोळा फिरतो. बंगाली दिग्दर्शक 'अनिरुद्ध रॉय चौधरी' चा हा पहिलाच हिंदी चित्रपट (बहुतेक). पूर्वार्ध अप्रतिम आणि उत्तरार्ध कमजोर असं असलं, तरी हे काम त्यांच्या पुढील चित्रपटांबद्दल औत्सुक्य वाटेल, असं नक्कीच आहे. सुरुवातीला जो ताण त्यांनी कहाणीत आणला आहे, तो केवळ अनुभवावा असाच आहे. टिपिकल भडकपणा दाखवून वास्तवदर्शनाचा सोयीस्कर मुखवटा त्यांना ओढता आला असता, मात्र तसं न करता, त्याहीपेक्षा परिणामकारक मार्ग ते निवडतात आणि अस्वस्थ करतात. त्यासाठी मनापासून दाद !

एकदा तरी पाहावाच असा 'पिंक' आहेच. फक्त तो पाहताना बच्चनसाठी पाहण्यापेक्षा त्या तीन मुलींसाठी पाहायला हवा. त्यांतही तापसी पन्नूसाठी.
सरतेशेवटी तन्वीर ग़ाज़ी ह्यांनी लिहिलेली आणि सध्या प्रचंड गाजत असलेली 'पिंक' कविता -

तू खुद की खोज में निकल, तू किस लिये हताश है ?
तू चल तेरे वजूद की समय को भी  तलाश है !

जो तुझसे लिपटी बेड़ियाँ समझ न इन को वस्त्र तू
यह बेड़ियाँ पिघाल के बना ले इन को शस्त्र तू

चरित्र जब पवित्र है तो क्यूँ है यह दशा तेरी
यह पापियों को हक़ नहीं की ले परीक्षा तेरी

जला के भस्म कर उसे जो क्रूरता का जाल है
तू आरती की लौ नहीं तू क्रोध की मशाल है

चूनर उड़ा के ध्वज बना गगन भी कपकपाऐगा
अगर तेरी चुनर गिरी तो एक भूकंप आएगा

ही कविता बच्चनच्या दमदार आवाजात ऐकताना अंगावर काटा येतो !
बहौत बढ़िया !!

- रणजित पराडकर

Monday, September 26, 2016

रसास्वाद सिनेमाचा - एक नोंद

'रसास्वाद सिनेमाचा' ह्या National Film Archive of India' इथे झालेल्या शिबिराच्या निमित्ताने आठवडाभर चित्रपट, त्याविषयक व्याख्यानं, मुक्त चर्चा आणि खाजगी चर्चा/ गप्पा ह्या सगळ्यात गेला. 'गेला' असं खरं तर नाही म्हणता येणार. २४ तास चालू असलेलं हे ब्रेनस्टॉर्मिंग विचारप्रक्रियेत नक्कीच काही तरी बदल घडवून आणेल. त्यामुळे 'गेला' हा शब्द शब्दश: न लागू करता, त्यातून अपेक्षित असलेला रचनात्मक अर्थ समजून घ्यावा.
ह्या आठवड्याभरात मी काय नवीन शिकलो, हे शिबीर किती उपयोगी होतं, ह्याचा आढावा आत्ताच घेता येणार नाही. कारण मला खूप 'इनपुट्स' तर मिळाली आहेतच, त्यातून 'इनसाईट्स' किती मिळतात हे समजायला काही काळ जाईल. मात्र, हा आठवडा खूप महत्वाचा आणि अविस्मरणीय होता, ह्याविषयी तर मला अजिबातच संशय नाही.

इनसाईट्स जेव्हा मिळतील, तेव्हा मिळतीलच. पण जे दोन मुद्दे प्रकर्षाने खटकले, ते मात्र नेहमीच खटकत राहणार आहेत. त्यामुळे तेव्हढे मांडतो.

१. संगीत :

'भारतीय चित्रपटातील संगीत' (पार्श्वसंगीत नव्हे.) हा एक प्रचंड मोठा विषय शिबिरात पूर्णपणे दुर्लक्षित राहिला. मला मान्य आहे की हे शिबीर 'जागतिक चित्रपट' ह्या एका व्यापक विषयावर विचार करायला लावणारं होतं. जागतिक चित्रपट हा एक मोठ्ठा हत्ती असेल, तर त्याच्यासमोर भारतीय चित्रपट म्हणजे एक छोटंसं उंदराचं पिल्लू असेल. पण 'उंदराचं पिल्लू' म्हणूनही त्याचं स्वत:चं एक अस्तित्व आहे. भले ते कुणाला आवडो वा नावडो. ते अस्तित्व हीच भारतीय चित्रपटाची व पर्यायाने एक भारतीय म्हणून माझी व इतर सर्वांची ओळख आहे. ह्या अस्तित्वात एक अनन्यसाधारण महत्व सिनेसंगीताचं आहे. अख्ख्या जगात एक भारतीय चित्रपटच असा आहे, ज्यात 'गाणी' असतात. भारतीय चित्रपटाचं वेगळेपण म्हणजे 'त्यातली गाणी' हेच आहे. शिबिरातच एक इस्रायली चित्रपट दाखवला होता. 'डेस्पराडो स्क्वेअर' नावाचा. तो सिनेमा म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून राज कपूरच्या 'संगम'ला दिलेली एक दादच होता. त्यांतल्या व्यक्तिरेखा भारतीय चित्रपटांनी भारावलेल्या दाखवल्या आहेत. एका बंद पडलेल्या चित्रपटगृहाला पुन्हा सुरु केलं जातं आणि पहिला चित्रपट म्हणून 'संगम' लावला जातो कारण गावातले लोक त्या चित्रपटाच्या प्रेमात असतात. 'संगम'मधली गाणी ते लोक एकत्र गातात, नाचतात, रडतातही. ह्यातून काय दिसतं ? जागतिक स्तरावर भारतीय चित्रपटाची एक ओळख त्याच्या संगीतामुळे आहे. राज कपूरच्या 'आवारा'मुळे रशियात धूम मचवली होती आणि गल्लोगल्ली 'आवारा हूं..' वाजायचं, ते गाणं तिथल्या लोकांच्या ओठांवर बराच काळ रेंगाळत होतं.
दुसरं म्हणजे, खूप मोठमोठ्या लोकांनी भारतीय सिनेसंगीतात आपलं भरीव योगदान दिलं आहे. मला फार काही ज्ञान नाही, पण काही नावंच घ्यायची झाली तर सज्जाद हुसेनपासून ए आर रहमानपर्यंत, राजा मेहंदी अली खानपासून स्वानंद किरकिरेपर्यंत, नूर जहांपासून श्रेया घोशालपर्यंत, के एल सैगलपासून सोनू निगमपर्यंत असंख्य लोकांनी खूप अप्रतिम काम केलेलं आहे व करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर, स्वत:च्या कलेच्या जोरावर भारताचं नाव उज्वल करणाऱ्या पं. हरिप्रसाद चौरासिया, पं.रविशंकर, पं. शिवकुमार शर्मा, उस्ताद अला रखा सारख्या मोठमोठ्या कलाकारांनी आपापल्या कारकिर्दीची सुरुवात हिंदी चित्रपटसृष्टीत केलेली आहे किंवा सिनेसंगीतात प्रचंड काम केलेलं आहे. हे सगळं पूर्णपणे विसरुन चालणार नाही.
तिसरं असं की, आपण आपली ओळख, आपलं वेगळेपण जपायला कधी शिकणार आहोत ? स्वतंत्र झालो तरीही बौद्धिक गुलामगिरी कधी सोडणार आहोत ? जागतिक चित्रपट जे काही करतो, त्याचं अंधानुकरण आपण का करावं ? त्यांच्या चित्रपटांत संगीत नसतं, म्हणून आपण आपली एक संपन्न परंपरा सोडायची का ?
शिबिरादरम्यान मी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर ह्यांना एक प्रश्न विचारला होता की, 'तुमच्या चित्रपटांतील संगीताविषयी तुम्ही किती आणि कसे आग्रही असता ?' खरं तर मला हा प्रश्न गाण्यांच्या दर्ज्याच्या बाबतीत विचारायचा होता कारण गोवारीकर आजच्या काळातले एक असे दिग्दर्शक आहेत, ज्यांच्या चित्रपटांतील गाणी एका विशिष्ट दर्जा सांभाळणारी असतातच असतात. मात्र माझ्या विचारण्यात जराशी चूक झाली असावी आणि गोवारीकरांनी 'चित्रपटात गाणी असावीत की नाही' अश्या अनुषंगाने उत्तर दिलं. Nevertheless, ते उत्तरही मला खूप महत्वाचं वाटतं. त्यांचे शब्द होते की, 'कुठलीही कहाणी अशी नसते जिला संगीताची आवश्यकता नाही. एक चांगलं गाणं एखाद्या प्रसंगापेक्षा जास्त परिणामकारक असतं. ते भावनेचं extension असतं.' मला हे उत्तर खूप आवडलं आणि पटलंही. आपण आपली ओळख, वेगळेपण जपायला हवं. सिनेसंगीताचा एक अथांग ठेवा आपल्याकडे आहे, त्याची आपल्याला किंमत वाटेनाशी झाली आहे. हे खूप विदारक आहे.
'गाण्यांचं चित्रीकरण' हेसुद्धा एक वेगळं कसब आहे, असंही मला वाटतं. अगदी ताबडतोब डोळ्यांसमोर येणारं गाणं म्हणजे विजय आनंदच्या 'तेरे घर के सामने' मधलं 'दिल का भंवर करे पुकार..' ! कुतुब मिनारमध्ये चित्रित केलं गेलेलं हे गाणं जितकं श्रवणीय आहे तितकंच प्रेक्षणीयही ! गुरु दत्तनी तर किती तरी गाण्यांची अप्रतिम चित्रीकरणं केलेली आहेत. हीसुद्धा एक वेगळ्या प्रकारची कलात्मकता आहे. चित्रपट ही जर एक कला आहे, तर त्या कलेच्या अंतर्गत असलेल्या अश्या कलात्मकतेला आपण कसे विसरू किंवा नाकारू शकतो ?

२. इतिहास :

चित्रपटक्षेत्रातील किंवा असं म्हणू की चित्रपट रसास्वादक्षेत्रातील जाणकार लोकांचं घड्याळ एका विशिष्ट कालखंडानंतर बंद पडलेलं आहे, असं मला वाटलं. अनेक व्याख्यानांमधून चित्रपट इतिहासातील तीच ती पानं पुन्हा पुन्हा उलगडून दाखवली जाणं म्हणजे हे सगळे जण वर्षानुवर्षं त्याच त्या सहाणेवर तेच ते ते चंदन उगाळत आहेत की काय, असं वाटलं. भारतीय चित्रपटाचा इतिहास तर म्हणे 'सत्यजित राय' ह्या एकाच नावाभोवती घुटमळत राहतो ! मला मान्य आहे की सत्यजित राय महान होते. नव्हे, ते महत्तम होते ! त्यांना आपण भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह म्हणू. आपल्या देशाला एक राष्ट्रपिता आहेत, तसे हे 'चित्रपिता' मानू. पण देशाला स्वातंत्र मिळालं, ते काही फक्त राष्ट्रपित्यामुळे नाही ना ? जो काही आपला स्वातंत्र्यलढा होता त्यात इतर अनेक लोकांचं असलेलं योगदान आपण विसरतो का ? मग भारतीय चित्रपटाच्या प्रवासातील इतर महान नावं आपण का विसरता ?
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय चित्रपटाला सत्यजित राय ह्यांच्या 'पथेर पांचाली'ने ओळख मिळवून दिली हे जरी खरं असलं, तरी खऱ्याखुऱ्या भारतीय चित्रपटाचं चांगलं प्रतिनिधित्व तो चित्रपट करतो ? माझ्या मते तरी नाही. मला विचाराल, तर खऱ्याखुऱ्या भारतीय चित्रपटाचं प्रतिनिधित्व बिमल रॉयचा 'दो बिघा जमीन', व्ही. शांतारामांचा 'दो आंखें बारा हाथ', राज कपूरचा 'आवारा', हृषीकेश मुखर्जीचा 'आनंद', गुलजारचा 'इजाजत', रामगोपाल वर्माचा 'सत्या' असे काही चित्रपट करतात. असे चित्रपट ज्यांत संगीत आणि मेलोड्रामा ह्या दोन्हीचं परफेक्ट मिश्रण आलं आहे आणि ज्याला वास्तवाची बऱ्यापैकी जोडही आहे. 'पथेर पांचाली' हा काही भारतीय चित्रपटाचा चेहरा, त्याची ओळख होत नाही. पण वर उल्लेखलेल्या सगळ्या चित्रपटांची 'चांगले' चित्रपट म्हणून नोंद घेतली जात नाही व जाणार नाही कारण ते तथाकथित 'समांतर चित्रपट' म्हणवले जाऊ शकत नाहीत.
माझ्यासाठी चित्रपट म्हटला की, 'हृषीकेश मुखर्जी' आणि 'गुलजार' ह्या दोन नावांशिवाय तो पूर्ण होतच नाही. माझ्यासाठी ही दोन दैवतंच आहेत. संपूर्ण आठवड्याभराच्या शिबिरात एकाही सेशनमध्ये ह्या दोन नावांचा साधा उल्लेखसुद्धा होऊ नये, ही बाब मला खूप दु:खी करणारी वाटली. शिबारार्थी लोकांना 'भुवन सोम' हा एक अतिसामान्य चित्रपट दर्जेदार, आयडियल म्हणून दाखवला जाणं, म्हणजे धक्कादायक होतं ! एका अनोळखी शहरी इसमास स्वत:च्या घरी बोलवून त्याचा पाहुणचार करणं, इतपत ठीक आहे. पण त्यानंतर घरी आपल्या मुलीला एकटं सोडून स्वत: बापाने कामासाठी बाहेर निघून जाणं, नंतर त्या मुलीने त्या अनोळखी इसमासोबत बिनधास्तपणे गावभर हुंदडणं आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवणं वगैरे शुद्ध आचरटपणा ह्या चित्रपटात आहे. हे कथानक १९६० वगैरेच्या काळातलं आहे. त्या काळात सोडा, आजच्याही काळात ग्रामीण भारतात असं कुठलीही स्त्री व तिचा बाप वागणं केवळ अशक्य आहे. ह्याशिवायही अनेक बाष्कळ गोष्टी ह्या चित्रपटात आहेत.
बिमल रॉय, व्ही शांताराम, राज कपूर, हृषीकेश मुखर्जी, गुलजार, बासू चटर्जी, विजय आनंद, सई परांजपे, शेखर कपूर अश्या लोकांना तथाकथित जाणकार लोकांनी पूर्णपणे दुर्लक्षित करावं, इतकंही त्यांचं काम सुमार दर्ज्याचं नाहीच. शिबिरात उल्लेख केलेल्या व दाखवलेल्या काही चित्रपटांपेक्षा किंवा त्या चित्रपटांइतकंच ह्या लोकांनीही दर्जेदार काम केलेलं आहे. मात्र 'घर की मुर्गी दाल बराबर' असते, असंच दिसून आलं.
आजकालचे चित्रपट तर अदखलपात्रच असावेत. I am sure, व्याख्यानं देणाऱ्या बहुतांश लोकांनी इम्तियाझ अलीचे चित्रपट पाहिलेले नसतीलच. इम्तियाझ अली हा एक असा दिग्दर्शक आहे, जो त्याच्या चित्रपटांत, कथाकथनात गाण्यांचा अप्रतिम खुबीने वापर करत असतो. आजच्या चित्रपटांचा विचार केला तर माझ्या मते मणी रत्नम, रामगोपाल वर्मा, अनुराग कश्यप, इम्तियाझ अली असे अनेक लोक सांगता येतील, जे खूप चांगलं काम करत आहेत. केवळ ते आजच्या काळात आहेत, म्हणजे ते दखलपात्र नाहीत की काय ?
'समांतर सिनेमा' असं काहीही सध्या राहिलेलं नाही आहे. एकंदरीतच सिनेमा परिपक्व होत आहे. आजच्या बहुतांश सिनेमांत (चांगल्या) व्यावसायिक व समांतर ह्यांचा समन्वय साधलेला मला तरी जाणवतो. एक उदाहरण द्यायचं तर 'नीरज घायवान'चा 'मसान' पाहू शकता.

पण कुठे तरी संपूर्ण शिबिरातून असं एक जाणवलं की जाणकार लोकांना सरसकट परदेशी चित्रपटच जास्त सरस वाटतो. 'डेस्पराडो स्क्वेअर' जर भारतात बनला असता, तर त्याला १००% खात्रीने सांगतो, त्याला रीडीक्युल केलं गेलं असतं, पण तो इस्रायली असल्याने त्याचं गुणगान होतं. (मला तो आवडला आहेच.) 'आपल्या मनात आपल्या परंपरेविषयी, संस्कृतीविषयी एक प्रकारची अढी आहे', असं मी म्हटलं की मला 'अंध राष्ट्रवादी' वगैरे संबोधलं जाईल. पण त्यामुळे सत्य बदलणार नाही. 'काय चांगलं, काय वाईट', हे जरी व्यक्तीसापेक्ष असलं, तरी हा निवाडा आपणच आपला करत असताना पूर्वग्रहविरहीत असणं आवश्यक आहे. 'आनंद'चं गुणगान केलं की कुणी तरी म्हणतं, हा तर 'इकिरू' वरून उचलला आहे ! असं बिनधास्त ठोकून देण्यापूर्वी दोन्ही चित्रपट कोऱ्या मनाने पाहिले पाहिजेत. ते आपण पाहत नाही.

अर्थात, असं सगळं खटकूनही मी शेवटी हेच म्हणीन की हा आठवडा खूप महत्वाचा होताच. ह्या सात दिवसांत १०-१२ चांगले चित्रपट (एक अपवाद) आणि किमान २०-२२ चांगल्या शॉर्ट फिल्म्स मी पाहिल्या. उमेश कुलकर्णी, गणेश मतकरी, अनिल झणकर, विकास देसाई ह्यांच्या सेशन्समधून बरंच काही नवीन व नव्याने समजलं, उमगलं.
हेही नसे थोडके !

टीप -
१. ही माझी मतं मी आयोजकांसमोर व शिबिरात सहभागी सर्व व्यक्तींसमोर व्यासपीठावरूनही मांडली आहेतच. पण ते संक्षिप्त व उत्स्फूर्त होतं, हे जरा अधिक विस्ताराने व विचारपूर्वक आहे.
२. मला अन्यभाषीय चित्रपटांची फारशी माहिती नसल्याने सगळा फोकस 'हिंदी'वर आहे, ते प्रातिनिधिक समजावं.

- रणजित पराडकर

Thursday, September 08, 2016

'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'

~ ~ 'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल' ~ ~

स. न. वि. वि.
फोनवर एकमेकांशी थेट बोलणं, व्हिडीओ चॅटिंग करणं आताशा इतकं सहज शक्य आणि स्वस्त झालं आहे की गेल्या दोन पिढ्या कुणी एकमेकांना कधी पत्र वगैरे लिहिलं असेल असं मला तरी वाटत नाही. ई-मेल, मेसेंजर, चॅटिंग वगैरेचा जमाना आहे हा. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, हाईक वगैरेचा काळ आहे. जिथे आपण एकमेकांशी मराठीतून बोलतानाही रोमन लिपीत लिहितो, तिथे 'स. न. वि. वि.' माहित असणं अशक्यच ! इंग्राठलेल्या, हिंद्राठलेल्या व इंद्राठलेल्या लोकांना 'स.न.वि.वि.' म्हणजे 'सप्रेम नमस्कार विनंती विशेष' आणि हे पत्राच्या सुरुवातीला लिहिलं जात असे, हे विशेषत्वाने सांगावं लागायची वेळ सध्या आलेली आहे !

ह्या छोट्याश्या प्रास्ताविकातून हा अंदाज यावा की 'स. न. वि. वि.' हा कार्यक्रम म्हणजे नक्की काय असेल ? एखाद्या पत्राप्रमाणे तो संवादी असणार. तो जुन्या काळात नेणाराही असणार. काही ठिकाणी आवश्यक तितका औपचारिक, तर बहुतकरून अनौपचारिकच असणार. हा कार्यक्रम आठवणी सांगणारा असणार, अनुभवकथन करणारा असणार. तो तुम्हाला विचारात टाकणारा असणार, गुदगुल्या करणारा असणार आणि काही माहित नसलेल्या गोष्टीही सांगणारा असणार. तो बातम्या सांगेल, काही गुपितंही उघडेल, काही गूढांना उकलेल आणि तो तुम्हाला अंतर्मुखही करेल. एक सफर घडवेल अश्या विश्वाची, जे आपल्याला माहित आहे पण समजलेलं नाही.
ज्यांनी आयुष्यात कधी पत्रं लिहिलेली आहेत किंवा ज्यांना कधी पत्रं आलेली आहेत, ते लोक नक्कीच समजू शकतील की 'पत्र लिहिणं किंवा आपल्याला आलेलं पत्र वाचणं', हा एक आगळावेगळा सोहळाच असतो. ते एक खूपच वेगळं मनोरंजन असतं. 'स. न. वि. वि.' हा कार्यक्रमसुद्धा असाच एक आगळावेगळा अनुभव आहे, सोहळा आहे आणि जरा वेगळ्या प्रकारचं मनोरंजन आहे. कारण हा कार्यक्रम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे 'कौशल इनामदार' आणि 'स्पृहा जोशी' लिखित एक पत्र आहे. हे पत्र ते दोघे मिळून, मंचावरूनच रसिकांना लिहितात.
जे त्यांच्यासमोर बसलेले असतात आणि जे त्यांच्यासमोर त्या वेळी नसतात, अश्या सगळ्याच रसिकांसाठीचं हे एक सांगीतिक, काव्यात्मक, संवादी, उद्बोधक पत्र आहे.
ही कवितांची, गाण्याची, गप्पांची मैफल हस्तलिखित पत्रासारखीच जराशी अनौपचारिक आहे. पण हे हस्ताक्षर सुंदर, सुवाच्य आहे. त्यात खाडाखोड, गिचमिड नाही. हे पत्र टापटीप, नीटनेटकं आहे आणि उत्स्फूर्त असलं तरी मुद्देसूदही आहे.

काल 'स. न. वि. वि.' चा शुभारंभाचा प्रयोग होता. पडदा उघडला आणि समोर एका छोट्याश्या मंचावर फक्त तीन जण. पुढ्यात हार्मोनियम घेऊन कौशल इनामदार, त्यांच्या एका बाजूला स्पृहा जोशी आणि दुसऱ्या बाजूला तबल्याच्या साथीसाठी मंदार गोगटे. वाद्यांचा ताफा नाही की देखाव्यांचा पसारा नाही. एकदम सरळ, साधं, एखाद्या घरगुती मैफलीसारखं मित्रत्वाचं वातावरण. मला का कुणास ठाऊक चटदिशी तलत मेहमूदच्या गाण्यांचीच आठवण झाली. तलतची गाणी ऐकताना मला असंच वाटतं की तो असा समोर बसून कुठलाही अभिनिवेश न आणता 'हे हे असं असं आहे' अश्या पद्धतीचं सरळ साधं कथन करत असतो. त्याला काही अपेक्षा नसते कुठल्या उत्तराची किंवा मदतीचीही. तो एका निरपेक्ष वृत्तीने आणि अतीव हळवेपणाने सांगतो -
'प्यार पर बस तो नहीं हैं मेरा लेकिन फिर भी
तू बता दे के तुझे प्यार करूँ या न करूँ'
'स. न. वि. वि.' मधल्या कौशल इनामदार आणि स्पृहा जोशी ह्यांची भूमिकाही मला अशीच वाटली.
अनौपचारिक व उत्स्फूर्त संवादी कार्यक्रम असल्याने तात्कालिक स्थिती व घटनांना अनुसरून पुढे जाणं साहजिकच आहे. पावसाळी वातावरणानुरूप कार्यक्रमाची सुरुवात कवी अशोक बागवेंच्या 'वासाच्या पयला पाऊस अयला' ने झाली आणि पाठोपाठ पहिल्या पावसावरची स्पृहा जोशींची एक कविता -

रिमझिमत्या सरी आठवणी होऊन वाहायला लागतात..
जरा कुठे त्याची चाहूल काय लागते, लगेच कविताच सुचायला लागतात !

कविता, गाणी, आठवणी, गंमती जंमती ह्या सर्वांची पखरण पुढील दीड तास चालू राहिली. ऑस्कर वाईल्ड, मार्क ट्वेन आदींची वचनं, तर दुष्यंतकुमार, बालकवी, कुसुमाग्रज, गदिमा, सुरेश भट, शांता शेळके, मंगेश पाडगांवकर, नारायण सुर्वे, अशोक नायगांवकर, नलेश पाटील ह्यांच्या कविता ह्या दीड तासात भेटून गेल्या. अनेक कवितांच्या, गाण्यांच्या व चालींच्या जन्माच्या कथा सांगितल्या गेल्या.
उदाहरणार्थ -

मुंबईच्या लोकल ट्रेनमधून रात्री उशीरा कविवर्य शंकर वैद्यांसोबत प्रवास करत असताना, पौर्णिमेच्या चंद्राला पाहून वैद्य सरांना आठवलेल्या -

या शुभ्र विरल अभ्रांचे शशीभवती नर्तन चाले
गंभीर धवळली रजनी बेभान पवनही डोले

- ह्या बालकवींच्या ओळी आणि त्यांनी कौशल इनामदारांना ह्या कवितेला चाल लावण्यासाठी उद्युक्त करणं. नंतर ती चार पानी अपूर्ण कविता समजावून देणं, मग ती कविता कौशल इनामदारांमधल्या संगीतकाराला उमगणं आणि तिची चाल बनणं

किंवा

'उंच माझा झोका' ह्या रमाबाई रानडेंच्या आयुष्यावर आधारित मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान आलेले काही अनुभव व मालिकेच्या कथानकाचा, तसेच व्यक्तिरेखांचा स्वत:वर पडलेला प्रभाव ह्यातून स्पृहा जोशींना सुचलेली 'पर्व' ही कविता, ज्यात आपण नेहमीच 'दुसरे' असल्याची एक बोचरी जाणीव मन पोखरत जाते

किंवा

सुरेश भटांच्या -
'सूर मागू तुला मी कसा
जीवना, तू तसा मी असा'
- ह्या कवितेस कौशल इनामदारांनी दिलेली एक नवीन चाल त्यांना कशी सुचली, का द्यावीशी वाटली.

असं बरंच काही.

ह्या कार्यक्रमाला निश्चित अशी संहिता नाही. रूपरेषा आहे. बाकी सगळं उत्स्फूर्त - Extempore. अश्या स्वरूपाचा कार्यक्रम सादर करताना भरकटत जाण्याची शक्यता खूप असते. मात्र दोन्ही कलाकारांना कुठे थांबायचं ह्याचं एक भान नेहमीच असल्याने, त्यांचं उत्स्फूर्त बोलणं रसभरीत व अर्थपूर्ण तर होतंच, पण नेमकं असल्याने योग्य परिणामकारकही होतं. अनेकविध कवींच्या कविता, तत्ववेत्त्यांची भाष्यं कौशल इनामदारांना मुखोद्गत असणं निव्वळ थक्क करणारं होतं. 'संगीतकाराकडून त्याची स्वत:ची चाल ऐकणं, ह्याची बातच वेगळी असते कारण त्याला त्या चालीतल्या 'गल्ल्या' माहित असतात', 'गाणारा समाज हा सुखी समाज असतो', 'भाषा प्रवाही राहिली पाहिजेच पण त्यासाठी आधी ती 'राहिली' पाहिजे' अशी कौशल इनामदारांची अनेक वक्तव्यं लक्षात राहणारी होती.
तर, 'किती रोखा वेडं मन एकटंच गात राहतं' म्हणणाऱ्या स्पृहा जोशींच्या

रुणझुणले अनुबंध जरासे सरून उरला जरा पूरिया
नको नको म्हणता बिलगे तुझ्या मिठीची साखरमाया

आणि

हळवे तनमन, सरले 'मी'पण गर्दनिळीही भूल
निळसर मोहन, राधा झाली निशिगंधाचे फूल

अश्या कधी लयबद्ध, कधी मुक्त कविताही मनात रेंगाळल्या. कवितांवर लिहायचं म्हणजे तो एक स्वतंत्र लेखाचा विषय असतो. त्यामुळे इथे जास्त लिहित नाही.
सांगायचं इतकंच आहे की एक संगीतकार, लेखक आणि एक अभिनेत्री, कवयित्री ह्यांच्या गप्पांतून उलगडत जाणारा त्यांचा सृजनशील प्रवास जाणून घेणं आणि त्यांचे चिंतनशील विचार ऐकणं, हा एक अविस्मरणीय अनुभव 'स.न.वि.वि.' ने दिला. पहिलाच प्रयोग असल्याने इथून पुढे त्यात आणखी बदल होत जातीलच. कदाचित त्यात अजून एका 'आवाजा'ची गरज आहे. सध्या गाण्याची सगळीच जबाबदारी एकाच गळ्यावर आहे. असा जर दुसरा आवाज त्यांनी भविष्यात घेतलाच, तर तो कुणा गायक/ गायिकेचा नसावाच. कौशल इनामदारांच्याच शब्दांत 'गाता गळा' नसावा तर 'गातं नरडं'च असावं, जेणेकरून कार्यक्रमाचा सध्याचा जो अनौपचारिक चेहरा आहे, तो तसाच राहील, असं मात्र वाटलं ! येणाऱ्या काळात साथसंगतीसाठीही अजून १-२ जण नक्कीच वाढवता येतीलच.
अर्थात, आत्ताच्या स्वरुपातही जो कार्यक्रम झाला तो सुंदरच झालेला आहे ! त्यांच्या पुढील प्रयोगांना मनापासून शुभेच्छा !



सरतेशेवटी, एक उल्लेख करणं अत्यावश्यक आहे.

कार्यक्रमात चित्रकार, कवी नलेश पाटील ह्यांच्या अप्रतिम सुंदर अश्या अनेक कविता सादर झाल्या. पैकी 'माझ्या चातक मैतरा..' आणि 'हिंदकळलं आभाळ..' तर कौशल इनामदारांनी गाऊन सादर केल्या. नलेश पाटील ह्यांचा प्रभाव दाखवणारी स्पृहा जोशींनी स्वत:ची एक कविताही पेश केली आणि हे सगळं मंचावर घडत असताना खुद्द नलेश पाटील मात्र आपल्या अखेरच्या प्रवासासाठी निघून गेले होते ! कार्यक्रमादरम्यानच ही बातमी येऊन धडकली, जिला कार्यक्रमानंतर जाहीर केलं गेलं. तोपर्यंत ना सादरकर्त्यांना हे माहित होतं ना उपस्थितांना. एखाद्या कवीच्या आयुष्याच्या शेवटच्या घटिकांत त्याच्याच काही सुंदर कविता कुणी ताकदीचे सादरकर्ते उत्स्फूर्तपणे एका मोठ्या श्रोतृवर्गासमोर सादर करत असणं, त्या शब्दांना व सादरीकरणाला भरभरून दाद मिळत असणं हा योगायोग जरी दुर्दैवी वाटत असला तरी विलक्षण काव्यात्मक आहे. एकाहून एक सुंदर कविता व गीतं सादर झाल्यावरही मी घरी येत असताना माझ्या मनात, कार्यक्रमाच्या पूर्वार्धात सादर झालेली 'माझ्या चातक मैतरा शिव फाटलेल्या जागा' ही कविताच घुमत राहावी आणि आतल्या आतच काही तरी उसवत राहावी, ह्याहून मोठी श्रद्धांजली एका कवीसाठी काय असू शकेल ?

कळावे.
लोभ असावा.

- रणजित पराडकर

हा लेखाला महाराष्ट्र टाईम्सने प्रसिद्धी दिली आहे - http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31836&articlexml=11092016006013


Related Posts Plugin for WordPress, Blogger...