Showing posts with label ललित. Show all posts
Showing posts with label ललित. Show all posts

Thursday, January 02, 2020

पंचम - बस नाम ही काफी हैं !

३१ डिसेंबर १९९३. सरत्या वर्षातली अखेरची संध्याकाळ. एका चित्रपटाचा मोठा सेट. सेटवरच निर्मात्याने आयोजित केलेली नवीन वर्षानिमित्ताची मोठी पार्टी. एक उत्साहाचं, आनंदाचं वातावरण. इतक्यात 'त्या'चं आगमन झालं. पार्टीतल्या त्या त्याच्या एन्ट्रीच्या वेळी त्याच चित्रपटातलं त्यानेच बनवलेलं एक अवीट गोडीचं गाणं पार्श्वसंगीतासारखं वाजवलं गेलं - 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा..' ! त्याच्या चेहऱ्यावर उमटलेलं समाधानाचं हसू हेच सांगत होतं की आता येणाऱ्या काळात तो पुन्हा एकदा चित्रपट संगीताच्या दुनियेवर अधिराज्य गाजवणार आहे. बरोबर ! सेट होता '1942 अ लव्ह स्टोरी' चित्रपटाचा, पार्टी होती विधू विनोद चोप्राची आणि 'तो' होता अर्थातच 'पंचम', म्हणजे 'राहुलदेव बर्मन'. 



ऐंशीच्या दशकाच्या शेवटाकडे लागोपाठ अनेक चित्रपट फ्लॉप होत जाऊन पंचम चित्रपटाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकला गेला होता. कोणे एके काळी लोकांना वेड लावणाऱ्या एका अफलातून संगीतकाराकडे कामही येईनासं झालं होतं. म्युझिक कंपन्यांनी त्याला नाकारलं होतं. चित्रपट निर्मात्यांनी त्याला अव्हेरलं होतं. रसिकांनी त्याला दुर्लक्षित केलं होतं. अमाप यश व प्रसिद्धीचे दिवस उपभोगलेल्या पंचमसाठी हा काळ खडतर होता. तो अपयशाने खचला नव्हता, पण जगाच्या पाठ फिरवण्यामुळे नक्कीच निराश झाला होता. त्याच्यात अजून खूप काम करायची उर्मी बाकी होती, अजून खूप नवनवीन कल्पना स्फुरत होत्या. पण त्या कल्पनांना मूर्त स्वरूपात आणण्यासाठी आवश्यक संधी मिळत नव्हत्या आणि कुणासमोर जाऊन काम मागायचा स्वभावही नव्हता ! कारण कितीही झालं तरी, त्रिपुरातल्या एका राजघराण्याचा तो एक वंशज ! भले, त्याच्या वडिलांनी घरदार सोडून वेगळ्या क्षेत्रात टाकलेल्या पावलावर पाउल टाकूनच तोसुद्धा कधी राजाचं आयुष्य न जगता २४ तास, ३६५ दिवस एक संगीतकार म्हणूनच जगला होता, तरी ते जन्माने राजा होता आणि मनाने तर होताच होता ! पंचमयुग संपल्यात जमा होतं. सिनेसंगीत संपल्यात जमा होतं ! रॉक अ‍ॅण्ड रोल, डिस्को वगैरेच्या नावाखाली थिल्लरपणा बोकाळत चालला होता. ऱ्हिदमच्या नावाने टीनचे डब्बे बडवल्यासारखे बीट्स ऐकवले जात होते. पिचक्या आवाजात कणसुरे लोक स्वस्तात आणि चटकन विकली जाणारी गाणी चकल्यांप्रमाणे पाडत होते.आणि अश्या वेळी विधू विनोद चोप्राने 'परिंदा'नंतर '1942 अ लव्ह स्टोरी' साठी पुन्हा एकदा पंचमला साईन केलं होतं. 

'1942 अ लव्ह स्टोरी' साठी पंचम स्वत:च्या बेसिक्सकडे गेला. सिम्पल मेलोडीज्, साधं अरेंजिंग आणि उत्तम साउंड ह्यांचा त्रिवेणी संगम साधत पंचमने असं काही संगीत दिलं की जणू एका प्रकारे 'मी अजून संपलो नाहीय' असं सगळ्या जगाला सांगायचं असावं. ह्या चित्रपटासाठी पंचमने दिलेलं संगीत सगळ्यात साध्यासोप्या गाण्यांचं होतं. त्या नवीन वर्षाच्या पार्टीत त्याच्या एन्ट्रीला वाजवलं गेलेलं 'एक लडकी को..' आणि ते ऐकून तल्लीन झालेले लोक, म्हणजे दुसरं तिसरं काही नव्हतं, तर जे त्याला सांगायचं होतं ते जगाला ऐकू जातंय अशी एक पोचपावती होती. ती त्याला मिळाली आणि समाधानाचं हसू मनात ठेवून अवघ्या ४ दिवसांनी त्याने जगाचा निरोप घेतला. त्यानंतर ४ महिन्यांनी '1942 अ लव्ह स्टोरी' रिलीज झाला. चित्रपटाला अपेक्षित यश मिळालं नाही, पण संगीत सुपरहिट ठरलं. उभ्या हयातीत फक्त दोनदा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेल्या पंचमला '1942..' साठी तिसरा फिल्मफेअर तर मिळाला. पंचम गेला. पण जाता जाता आपल्या पाउलखुणा कायमस्वरूपी उमटवून गेला. भले तो जिवंत असताना त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं गेलं, पण नंतर फिल्मफेअर पंचमच्या नावाने इतर संगीतकारांना पुरस्कार द्यायला लागलं. आज कुणीही चांगलं संगीत देणारा दिसला की लोक त्याला 'नेक्स्ट आर डी बर्मन' म्हणतात. रिमिक्सच्या जमान्यात सर्वाधिक गाणी पंचमचीच रिमिक्स केली जातायत. ही सगळी लक्षणं आहेत, पंचम जाऊनही न संपल्याची ! त्याने जाता जाता हेच सांगितलं होतं की, 'मी अजून संपलो नाहीय', तो संपणारही नाही.



केवळ ५४ वर्षांच्या आयुर्मानात, ३३ वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत पंचमने विविध भाषांत मिळून तब्बल ३३१ चित्रपटांना संगीत दिलं. १९६१ साली आलेल्या मेहमूदच्या 'छोटे नवाब'मधून त्याने पदार्पण केलं. मात्र पंचमने त्याच्या खूप आधीपासून वडिलांसोबत काम करायला सुरु केलं होतं. सचिनदांच्या १९५८ च्या 'सोलवा साल' मधल्या 'है अपना दिल तो आवारा..' मधला प्रसिद्ध माउथ ऑर्गन त्यानेच वाजवला होता. इतकंच नव्हे तर १९५६ च्या 'फंटूष' चं शीर्षक गीत 'ऐ मेरी टोपी पलट के आ..' ची चाल पंचमला वयाच्या नवव्या वर्षी सुचली होती. पन्नासच्या दशकात अधूनमधून (शिक्षण सांभाळून) आणि साठच्या दशकात पूर्ण वेळ (शिक्षण सोडून देऊन!) पंचम सचिनदांचा सहाय्यक होता. तेरे घर के सामने, गाईड. ज्युल थीफ, प्रेम पुजारी, आराधना, गॅम्बलर, अभिमान, शर्मिली सारख्या अनेक सिनेमांमधल्या गाण्यांवर पंचमची छाप जाणवतेही ! वडिलांनी जाणीवपूर्वक कोवळ्या पंचमकडून मेहनत करवून घेऊन त्याला घडवलं. 'नवकेतन' सारख्या बॅनर्स आणि 'शक्ती सामंता', 'नसीर हुसेन'सारख्या यशस्वी चित्रपटकर्त्यांकडे पंचमची वर्णी लागणं सोपं होतं, पण तिथे टिकून राहण्यासाठी सतत दर्जेदार काम करायला हवं. त्याची तयारी सचिनदा करून घेत होते.

पंचमचं पदार्पण १९६१ साली जरी झालं, तरी त्याचं नाव खऱ्या अर्थाने चर्चेत आलं ते १९६६ साली. चित्रपट होता 'तीसरी मंजील'. एरव्ही शंकर जयकिशन, ओ पी नय्यर सारख्या दिग्गजांसोबत जोडी जमवलेल्या नसीर हुसेन, शम्मी कपूर ह्या मोठमोठ्या नावांसह पंचमला काम करायची संधी सहज मिळाली नाही. शम्मी कपूरने सुरुवातीला पंचमच्या नावाला चक्क नकार दिला होता ! पण दस्तुरखुद्द जयकिशननेच पंचमच्या नावाची जोरदार शिफारस केल्यावर शम्मीने पंचमची गाणी ऐकून घेण्याची तयारी दाखवली. पंचमने 'दीवाना मुझसा नहीं...' ची पहिली ओळ ऐकवल्यावर शम्मीने ताबडतोब मूळ नेपाळी लोकगीतातली पुढची ओळ (ए कान्छा मलाइ सुनको..') स्वत:च गाऊन मुखडा पूर्ण केला आणि म्हटलं, 'हे गाणं मी जयकिशनला देईन. पुढचं ऐकव !' पण पंचमने नेटाने बाकीची गाणी ऐकवली आणि काही वेळातच, जो शम्मी पंचमच्या नावाला पूर्ण विरोध करत होता तो ती गाणी ऐकून प्रचंड खूष झाला होता ! 



'तीसरी मंजील' हा खूप मोठा ब्रेक होता, पण तरीही पंचमकडे कामाचा ओघ सुरु झाला नाही. कारण त्याची स्पर्धा तगड्या लोकांशी होती. स्वत: वडील सचिनदेव बर्मन, शंकर-जयकिशन, मदनमोहन, नौशाद, रवी, लक्ष्मी-प्यारे अशी मोठमोठी नावं तेव्हा आजूबाजूला होती. तो 'तीसरी मंजील'च्या यशानंतरही वडिलांकडे सहाय्यक म्हणून काम करण्यातच अधिक व्यस्त राहिला. पुढील चार वर्षांत त्याने फक्त सहा चित्रपट केले. त्यांतही पडोसन, प्यार का मौसम सारखे बॉक्स ऑफिसवर चांगले चाललेले चित्रपट होते आणि  बहारों के सपने, अभिलाषासारख्या चित्रपटांतून त्याने लक्षवेधक काम केलं होतं. 
त्यानंतर मात्र, १९७० पासून चित्रपट संगीतात 'आर डी बर्मन' नावाचं एक वादळच आलं. पुढील १० वर्षांत पंचमने तब्बल ११० चित्रपट केले ! 

बॉक्स ऑफिसवर राजेश खन्नाला सुपरस्टार करण्यात पंचमच्या संगीताचा मुख्य हातभार होता. राजेश खन्नाची सद्दी संपून अमिताभची गादी आली. ते अमिताभयुगही पंचमच्या संगीतानेच गाजवलं. ऋषी कपूरचा जम बसवण्यातही पंचमच्याच संगीताचा हात होता. पंचमच्या संगीताची जादू अशी होती की त्याने मुख्यत्वे कॉलेजवयीन प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित केलं. रणधीर कपूर (जवानी दीवानी, रामपूर का लक्षमण - १९७२), संजय दत्त (रॉकी - १९८१), कुमार गौरव (लव्ह स्टोरी - १९८१), सनी देओल (बेताब - १९८३) इ. स्टारपुत्रांचं पडद्यावरील पदार्पण म्हणूनच पंचमचं संगीत असलेल्या चित्रपटांतूनच झालं. 'पंचमचं संगीत' हा त्यांच्यासाठी 'सेफ गेम' ठरेल इतकी पंचमची लोकप्रियता शिगेला पोहोचलेली होती. नवीन अभिनेतेच नव्हे, तर नवीन निर्माते-दिग्दर्शकही स्वत:ची जागा सहज बनावी म्हणून पंचमला साईन करत होते. 

पण खऱ्या अर्थाने पंचमची गट्टी जमली ती गुलजारसोबत. ही गट्टी, ही दोस्ती फक्त कामापुरतीच नव्हती. वैयक्तिक आयुष्यातही दोघे जवळचे मित्र बनले. गुलजारच्या शब्दांना पंचांच्या सुरांनी सर्वतोपरी न्याय दिला आणि गुलजारच्या शब्दांनी एक वेगळाच पंचम बाहेर आणला. अर्थात, पंचमने प्रत्येकासाठी आपली वेगवेगळी शैली जपली होतीच. सिप्पींच्या चित्रपटांच्या संगीताचा लहेजा वेगळा होता, नसीर हुसेनसाठीच्या संगीताचा बाज वेगळा होता, तसाच गुलजारसाठीच्या गाण्यांची बांधणी वेगळीच असायची. सिनेसंगीतातल्या सगळ्यात महत्वाच्या आणि महान गीतकार-संगीतकार जोड्यांमध्ये आरडी-गुलजार ही जोडी अग्रणी राहील, इतकं त्यांचं काम अतुलनीय आहे. 

पंचमने कुणासोबत कधीपासून किती आणि कसं काम केलं, हे इंटरनेटवर सहज मिळेल. ते इथे लिहिणं म्हणजे केवळ भाषांतर होईल. पण पंचमचं वेगळेपण काय होतं, हे तिथे मिळणार नाही. ती अनुभवायची, आस्वादायची गोष्ट आहे. 
त्याबाबत पुढच्या भागात..

(क्रमश:)

- रणजित पराडकर



Sunday, January 15, 2017

'गझलांमधील वाढ केवळ संख्यात्मक' - श्री. अक्षयकुमार काळे

'गझलांमधील वाढ केवळ संख्यात्मक'

सध्याच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. अक्षयकुमार काळे ह्यांचे हे वक्तव्य. ह्यावरुन सोशल नेटवर्कवर खूप गदारोळ चालू आहे. ह्या गदारोळात हा थोडासा आवाज माझाही !! :D

माझ्या मते, संख्यात्मक वाढ गझलेपेक्षा खूप जास्त पसरट कवितांत झालेली असून त्यांत दर्जाही वाढलेला नाहीच. कवितेतला जो 'तेच-ते'पणा आहे, त्यामुळे झालं असं आहे की वेगवेगळ्या गावांतले आघाडीचे सगळे कवी एकसारखेच लिहितात. त्यांचे विषय व व्यक्त होण्याची पद्धत इतकी तीच ती असते की एका रचनेतल्या दोन-चार ओळी दुसऱ्या रचनेत टाकल्या किंवा अगदी गाळूनही टाकल्या तरी चालून जावं !

अक्षयकुमार काळे साहेबांचं उपरोक्त विधान कदाचित अगदीच गैरलागू नसेलही. गझल क्षेत्रात दर्जात्मक वाढीपेक्षा जास्त वाढ संख्यात्मक होते असेलही. पण हे निरीक्षण तर कुठल्याही क्षेत्रात असंच असेल ना ?
आणि जर मराठी साहित्याबाबत बोलायचं झालं तर हे गझलेपेक्षा कवितेबाबत जास्त लागू नाही का ? नक्कीच आहे. पण ते छातीठोकपणे बोलायचा दम कुणाच्याही फेफड्यांत नाही !

बोला की कुणी तरी की, 'उथळ विद्रोहाचा भडकपणा आणि अट्टाहासी मुक्ततेचा भोंगळेपणा ह्यामुळे अधिकाधिक विद्रूप होत जात असलेल्या मराठी कवितेची फक्त संख्यात्मक वाढ होते आहे!'
हे कुणी बोलणार नाही. कारण त्यामुळे बहुसंख्यांचा रोष ओढवला जाईल ना !
कुणाच्या तरी छाताडात दम आहे का बोलायचा की, जोपर्यंत कविता ओढून ताणून आंबेडकरांपर्यंत आणली जात नाही, तोपर्यंत कवी 'पुरोगामी' आणि म्हणूनच पुरस्कारयोग्य मानला जात नाही?
कुणाला तरी हे खटकतंय का की, 'वृत्तात लिहिणं' ही गोष्ट सपशेल त्याज्य मानली गेली असून आजच्या काळात अक्षरश: हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके (तथाकथित 'मुख्य धारेतले') लोकही वृत्तात लिहित नाहीत?

पूर्वी एखाद्या सामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या घरातही कवितांची पुस्तकं असत. त्याच्या तोंडी कवितेच्या ओळी असत. आज 'कविता' हा शब्द जरी उच्चारला तरी दूर पळतात लोक ! आजच्या पिढीचे कवी कोण आहेत, कुणाला माहितही नसतं आणि त्यांच्या तथाकथित कविता तर त्यांच्या व त्यांच्या काही चेल्या-चपाट्यांशिवाय कुणाला ठाऊकही नसतात. एक काळ असा होता की इंजिनिअरिंग, मेडिकल, अकौंटन्सी वगैरे साहित्याशी संबंध नसलेली क्षेत्रं निवडणाऱ्या लोकांनाही कित्येक कविता मुखोद्गत असत. कवितेवर त्यांचं मनापासून प्रेम असे. आज असे किती लोक आहेत ?

अनियतकालिक व नियतकालिक आणि दिवाळी अंकांतून छापून येणाऱ्या कविता तर कुणी वाचतही नाही, ही शोकांतिका माहित आहे का ? एक तर त्या कविता आहेत, हेच अर्ध्याहून जास्त लोकांना पटत नसतं. त्यात त्यांच्यातला दुर्बोधपणा व पसरटपणा अजून दूर लोटतो.
सामान्य माणसाला 'कविता' श्या शब्दाची अक्षरश: एलर्जी व्हायला लागली आहे.

Why is this apathy ? ह्यामागची कारणमीमांसा कोण करणार आणि कधी ?
कविता सामान्य लोकांना इतकी नकोशी का झाली आहे ? का ती सामान्य लोकांच्या ओठांवर जराही रुळत नाही ? का त्यांच्या मनात अजिबात वसत नाही ?
ह्या मागचं कारण तिच्यातला रसाळपणा हरवला असण्यात नाहीय का ? कवितेची जी काही वाढ झाली व होते आहे, ती संख्यात्मक नाहीय का ?

ह्या उलट, जे काही 'काव्य' सामान्य माणसाला आकर्षित करून घेत आहे, ते सामावलं आहे 'गझल' ह्या प्रकारात. लोक गझलेचे शेर आपलेसे मानतात, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. आवडलेले शेर नोंद करून ठेवतात. सामान्य माणूस आणि कविता (गझल हीसुद्धा एक कविताच) ह्यांना जोडणारा जो एक अगदी शेवटचा धागा सद्यस्थितीत आपले अस्तित्व टिकवून आहे, तो म्हणजे 'गझल'.

साहित्य संमेलनात जो 'कवी कट्टा' म्हणून बैलबाजार भरतो, त्यांत मीही एकदा मिरवून आलो आहे. त्या शेकडो लोकांच्या गर्दीत श्रोता एकही नव्हता. सगळे आपापली बाडं घेऊन आलेले कवीच होते. ह्यांच्या कविता कुणीही ऐकत नाही.

एक असं करून पाहावं.
एखाद्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दोन सभागृहांत एकाच वेळी दोन कार्यक्रम ठेवावे. एकीकडे, आजच्या मान्यवर, प्रथितयश कवी/ कवयित्रींचे 'कवी संमेलन' आणि दुसऱ्या सभागृहात एक 'केवळ संख्यात्मक वाढ झालेल्या लोकांचा' 'गझल मुशायरा'. मी ग्यारंटीने सांगतो, सेलेब्रेटेड कवींकडे न जाता तमाम आम जनता, ह्या अ-प्रसिद्ध गझलकारांना ऐकायला जाईल.
ही परिस्थिती आहे सध्याच्या कवितेची. तिला नागवलं आहे तिच्या ठेकेदारांनी आणि समीक्षकांनी. तिला इतकं भ्रष्ट केलं आहे की ती त्यांच्याशिवाय कुणालाही हवीहवीशी वाटत नाही.

हे सगळं चित्र विदारक वाटत नसेल आणि गझलेतर काव्यक्षेत्राची वाढ अगदी योग्य प्रकारे चालली आहे, असं जर वाटत असेल, तर मग बोलायलाच नको !

साहित्य संमेलनवाल्यांनी गझल व गझलकारांना नेहमीच दूर ठेवलं आहे, हा तर उघड इतिहास व वास्तव आहे. मराठी गझलेचे सम्राट सुरेश भटांना ह्यांनी कधी अध्यक्षपद दिलं नाही आणि आता गझलेच्या उत्कर्ष व वाढीबद्दल टिपं गाळायला पाहतायत !
वाह रे वाह !

तुम्ही गझल नाकारणार, वृत्तबद्धता नाकारणार, आंतरजालीय साहित्य नाकारणार आणि संख्यात्मक वाढ प्रत्यक्षात तुमच्याच कंपूत होत असताना दुसरीकडे बोट दाखवून दिशाभूल करायला पाहणार?

साहित्य संमेलनाध्यक्ष असलेल्या व्यक्तीने केलेलं विधान अभ्यासपूर्ण तर असायला हवंच. पण ते नाही तर नाही, पण किमान जबाबदार तरी असावं !
मी फेसबुकवर ज्या अनेक गझलकार मंडळींशी कनेक्टेड आहे, ज्यांना मी वाचत असतो, त्यांच्यापर्यंत काळे साहेब बहुतेक पोहोचलेले नसावेतच. कारण त्यांतल्या ९९% लोकांनी आपली गझल पुस्तकरूपी प्रकाशित केलेली नाहीय. ते लोक ब्लॉगवर, फेसबुकवर लिहितात, मुशायऱ्यात सादर करतात आणि त्यांना स्वत:ला जितकी अपेक्षा आहे, त्यापेक्षा खूप जास्त लोकांपर्यंत लीलया पोहोचतात. पुस्तक छपाईच्या बाजारात उतरण्याची त्यांच्या गझलेला गरज नाही आणि म्हणून ते उतरतही नाहीत. मागच्या पिढीतल्या आउटडेटेड अभ्यासूंनी स्वत:ला उशिरा का होईना, अपग्रेड करायची गरज आहे. मुख्य धारेत जी काही साहित्य निर्मिती होते आहे, त्याच्या कैक पटींनी चांगल्या दर्ज्याचं लिखाण आंतरजालावर (इंटरनेटवर) होत आहे, हे कडवट सत्य स्वीकारण्याची गरज आहे. आजच्या काळाचा उद्गार 'इंटरनेट' आहे. तुम्ही जर त्याला ऐकत नसाल, तर ती तुमची चूक आहे आणि त्यामुळे तुमची माहिती (ज्याला काही लोक 'ज्ञान' म्हणतात) अपूर्णही आहे. ह्या लोकांनी आंतरजाल सरसकट टाकाऊ मानला असल्याने तिथे पूर्णपणे दुर्लक्ष करून एका प्रचंड मोठ्या संकलानाकडे सपशेल कानाडोळा केला आहे आणि आपल्या अर्धवट माहितीआधारे आपली काहीच्या काही मतं बनवलेली आहेत.

अक्षयकुमार काळे साहेबांचं वक्तव्य हे आंतरजालिय साहित्याबद्दल असलेल्या उदासिनतेचं एक उदाहरण तर आहेच पण कवितेच्या विद्रुपीकरणाकडे सोयीस्कर (कातडी बचाव) दुर्लक्ष करण्याचा प्रयत्नही आहे.

- रणजित पराडकर

Sunday, February 28, 2016

समथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग ! (India vs Pakistan - Asia Cup T20 - 2016)


भारत व पाकिस्तानची मॅच म्हणजे 'भारतीय फलंदाजी' वि. 'पाकिस्तानी गोलंदाजी'. कालची ट्वेंट२० ही तशीच. त्यात भारत जिंकला नसता तरच आश्चर्य वाटलं असतं कारण दोन्ही संघांच्या कमजोर बाजूंची तुलना केल्यास त्या गरिबांतला भाग्यवान श्रीमंत भारतच ठरतो. I mean, पाकिस्तानची फलंदाजी जितकी दरिद्री आहे, त्याहून भारताची गोलंदाजी निश्चितच बरी आहे. ट्वेंटी२० क्रिकेट हा काही अस्सल तंत्रशुद्ध फलंदाजीसाठीचा खेळ नाहीच. पण गोलंदाजीला मदत करणाऱ्या पीचवर खेळत असताना फलंदाजाकडे आवश्यक असलेल्या किमान तंत्रशुद्धतेचाही सपशेल अभाव पाकिस्तानच्या फलंदाजीत असावा, इथेच तो संघ पराभूत ठरतो. एकही भेदक गोलंदाज नसलेल्या गोलंदाजीने माफक ८३ धावांत एखाद्या संघाला उखडावं, ही त्या संघाची फलंदाजदारिद्र्य दाखवणारी कामगिरीच. भारताच्या ठीकठाक गोलंदाजीसमोरही जर हे फलंदाज अश्या प्रकारे नांगी टाकत असतील, तर दर्जेदार गोलंदाजीसमोर त्यांची काय दाणादाण उडू शकते, सांगता येत नाही !

कालच्या मॅचचे हायलाईट्स माझ्या मते तीन होते -
१. भारताची फिल्डिंग
२. मोहम्मद आमीरची बोलिंग
३. विराट कोहलीची फलंदाजी

भारतीय फिल्डर्स एक-एक रन जीव तोडून वाचवत होते आणि आधीच उसळत्या पीचवर खेळताना भंबेरी उडत असलेल्या पाकिस्तानी फलंदाजांनी दिलेल्या छोट्यातल्या छोट्या संधीचाही पुरेपूर फायदा भारतीयांनी उठवला. त्यामुळेच पाकिस्तानी खूप दबावाखाली आले आणि त्या मानाने सामान्य गोलंदाजीही जबरदस्त ठरली. विराट कोहलीने कव्हर्समधून धावत येत चेंडू उचलून बोलरच्या बाजूला मारलेली डायरेक्ट हिट आणि रवींद्र जडेजाने स्क्वेअर लेगकडून मारलेला सपाट थ्रो ज्यावर धोनीने अक्षरश: प्रकाशाच्या गतीने उडवलेले स्टंप्स ही चित्रं तर डोळ्यांसमोरून जाणार नाहीत. ह्याच संधी जर पाकिस्तानी फिल्डर्सना मिळाल्या असत्या तर त्यांनी तिथे दोन विकेट्स सोडल्या आहेत, हे कुणाला जाणवलंसुद्धा नसतं ! तीस यार्डांच्या वर्तुळाच्या आत आणि बाऊंड्री लाईनजवळ वाचवलेले रन्ससुद्धा खूप महत्वाचे. आशियाई संघांना फिल्डिंगचं महत्व जरा उशीराच कळलं आहे. पण पाकिस्तानला तर अजूनही कळलेलं दिसत नाही. कारण अशी चपळाई त्यांच्या फिल्डर्समध्ये अजिबातच दिसली नाही. ते कसेबसे कॅचेस पकडत होते, कसेबसे चेंडू अडवत होते. एकूणच आपल्याला काहीही जमत नसतानाही सगळं येत असल्याचा नाटकी आविर्भाव त्यांच्या देहबोलीत स्पष्टपणे जाणवत होता.

फिल्डिंगकडून 'बेसिक मिनिमम'पेक्षा जास्त अपेक्षा नसताना आणि स्कोअर बोर्डवर धावांचं 'कुशन'ही नसताना बोलर्सचं मनोबल खच्ची होतं. पण इथेच पाकिस्तानी बोलर्स वेगळे ठरतात. अश्याच वेळी त्यांच्यात एक विजीगिषु वृत्ती संचारते. पहिल्या ओव्हरपासून ते असे काही आक्रमक होतात की जणू त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला असावा !
मोहम्मद आमीरची झणझणीत बोलिंग पाहणं, हा एक रोमांचित करणारा अनुभव होता ! 'मॅच फिक्सिंग करून देशाचं नाव खराब करणारा खेळाडू' हीच मोहम्मद आमीरची ओळख. तत्पूर्वी, तो खरोखरच एक अत्यंत गुणी वेगवान डावखुरा गोलंदाज होता. पण खेळातल्या गैरव्यवहारांची सोबत नेहमीच पाकिस्तानी क्रिकेटशी राहिली आहे. त्यात हा गुणी तरुण खेळाडू ओढला गेला. थोडक्यात वाचला कारण त्याने गुन्हा केला तेव्हा त्याचे वय 'सुजाण' नव्हते ! तर शिक्षा भोगून परत आलेला हा मोहम्मद आमीर आजही त्यात तिखटपणे बोलिंग करतो आहे, हे पाहून कुणाही सच्च्या क्रिकेटरसिकाला आनंदच झाला असेल. फलंदाजांना आंदण दिलेल्या आजच्या क्रिकेटमध्ये आमीरसारखे गोलंदाज मोजकेच बनतात. त्याने आपली चुणूक पहिल्याच चेंडूपासून दाखवली. रोहित शर्माला बेनिफिट ऑफ डाऊट मिळाला. पण दुसऱ्या चेंडूवर मात्र तो वाचला नाही आणि इनिंगच्या तिसऱ्या चेंडूपासून कोहली मैदानात आला. मोहम्मद आमीरच्या चार ओव्हर्सपैकी प्रत्येक चेंडू फलंदाजांची परीक्षा पाहणारा होता. तो चेंडूला 'कट' करत होता, 'स्विंग' करत होता, उसळीसुद्धा देत होता. जनरली डाव्या-उजव्या हाताचे फलंदाज एकत्र असले की गोलंदाजाला लाईन पकडताना जरा त्रास होतो. पण दोन उजव्या हाताचे फलंदाज आउट केल्यावर समोर आलेल्या डावखुऱ्या सुरेश रैनाला आमीरने टाकलेला पहिला चेंडू रैनाला दिसला तरी होता का, कुणास ठाउक !
दुसरीकडूनही मोहम्मद इरफान नावाचा साडेसात फूट उंचीचा पहाड धावत अंगावर येत होता आणि त्याचीही लाईन-लेंग्थ impeccable च होती. तेव्हाही समोर युवराज सिंग - विराट कोहली अशी फलंदाजांची डावी-उजवी जोडी होती. तरी आमीर आणि इरफान आग ओकत होते.

हे एक अग्निदिव्य होते आणि ते कोहलीने पार पाडले. कोहलीची खेळी रेकॉर्ड्समध्ये 'जस्ट अनदर इनिंग' म्हणूनच नोंदवली जाईल. कारण तो ४९ वर बाद झाला. तसं झालं नसतं तर तिची एक 'फिफ्टी' म्हणून स्वतंत्र नोंद झाली असती. दुर्दैवाने तसं होणार नाही. अम्पायर लोकांनी काही वेळेस जराशी माणुसकी ठेवावी. इतकं सुंदर खेळल्यानंतर एखाद्याला १ रनसुद्धा नाकारावा, असा विघ्नसंतोषीपणा करू नये. बरं, आउट दिला तोसुद्धा डाउटफुल होताच. मग द्यायचा होता की बेनिफिट ऑफ डाऊट ! ह्या न मिळालेल्या एका रनमुळे कोहलीची ही इनिंग रेकॉर्ड्समध्ये लपून जाईल, पण लोकांच्या आठवणींतून पुसली जाणार नाही. सापासारखे फुत्कार सोडणाऱ्या चेंडूंचा त्याने ज्या आत्मविश्वासाने सामना केला, त्याला तोडच नाही ! असं वाटत होतं की युवराज वेगळ्या पीचवर खेळतोय आणि कोहली वेगळ्या ! जर कोहलीने आपला सर्वोत्कृष्ट खेळ काल केला नसता, तर ८३ धावा भारतालाही झेपल्या नसत्याच कदाचित ! गोलंदाजांना मदत करणाऱ्या पीचवरच्या मॅचमध्ये एक फलंदाज कोहली म्हणूनच 'मॅन ऑफ द मॅच' ठरला.

कालची मॅच खरं तर अपेक्षाभंग करणारी होती. पाकिस्तानच्या बोलिंगच्या पहिल्या ८-९ ओव्हर्स वगळल्या तर पूर्णपणे एकतर्फी मॅच ! भारत-पाकिस्तानकडून क्रिकेटच्या फॅन्सना अजून काही तरी हवं असतं. ठस्सन, खुन्नस तर दिसली नाहीच, पण 'फाईट'ही फारशी पाहायला मिळाली नाही. लोक अगदीच निराश होणार नाहीत, ह्याची काळजी मोहम्मद आमीरने घेतली. 'भारत जिंकला, पाकिस्तान हरलं' हा आनंद असला, तरी तेजतर्रार बोलिंगवर मनापासून प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्याला ह्या निकालापेक्षा जास्त आनंद मोहम्मद आमीरच्या चार ओव्हर्सनी आणि त्या तोफखान्याचा निडरपणे यशस्वी सामना करणाऱ्या कोहलीच्या ४९ धावांनी दिला ! पुरेसं नव्हतं, पण समथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग !

ह्या निमित्ताने एक प्रश्न पडतो. जसे तेज गोलंदाज पाकिस्तानकडे बनतात, तसे भारताकडे का बनत नाहीत ? ही काही आजची कहाणी नाही. वर्षानुवर्षं हेच चित्र का आहे ? बहुतेक हा फरक आपल्या दृष्टीकोनातच आहे, 'कल्चर'मध्येच आहे. आपल्याकडे लहान लहान मुलांना सिक्सर मारण्यातच आनंद मिळतो. सेंच्युरी मारुन, शेवटच्या चेंडूवर सिक्स मारुन आपल्या संघाला विजयी करणारा 'भुवन' च 'लगान' ला सुपरहिट सिनेमा बनवू शकतो. पण चक्रव्यूह, सापळा रचून फलंदाजांना बाद करणाऱ्या जलदगती 'इक़्बाल' चा चित्रपट मात्र येतो आणि जातो. आपल्याकडे 'हीरो' हा नेहमी फलंदाजच राहिला आहे आणि गोलंदाज साईड हीरो. ह्या साईड हीरोच्या 'ब्रेक ऑफ' वर चित्रपटात विनोद केले जातात आणि क्रिकेटमध्ये ह्याच साईड हीरोला बळीचा बकरा बनवून पाटा पीचेसवर डावांचे मनोरे रचले जातात. म्हणूनच गेल्या काही वर्षांत आपल्याकडे जलदगतीच काय, फिरकी गोलंदाजही फारसे पुढे आलेले नाहीत. तीच ती २-४ नावं आहेत आणि त्यांच्यातही नियमितता नाही. अश्विन आपला सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाज. पण स्पष्टपणे जाणवतंय की त्याला जर थोडं उशीराने बोलिंगला आणलं, तर तो हमखास मार खातो. बरं, त्याच्या जोडीला कोण ? रवींद्र जडेजा. ही काही गोलंदाजीतली श्रीमंती नक्कीच नाही.

थोडक्यात आपल्याकडे ना धड तेज गोलंदाज आहेत, ना फिरकी. आपण फक्त काम चालवून घेतो आहे आणि हाच जो दृष्टीकोन आहे तो बदलणं गरजेचं आहे. आपल्या क्रिकेटमधला भेदभाव जेव्हा आपण संपवू, तेव्हाच आपल्याकडेही तेज तिखट बोलर्स बनतील. तोपर्यंत इशांत शर्मा, उमेश यादव आणि आशिष नेहराशिवाय पर्याय नसेल.

- रणजित पराडकर

Monday, February 15, 2016

बल्लीमाराँसे दरिबेतलक

दिल्ली

चोरों की दिल्ली, हीरों की दिल्ली
बाजारों की दिल्ली, दीवारों की दिल्ली
बेचनेवाली दिल्ली, खरीदनेवाली दिल्ली
छोले कुलचों की दिल्ली, चीला पराठों की दिल्ली
बड़ी बड़ी सडकों की दिल्ली, भरी भरी गलियों की दिल्ली
सरकारों की दिल्ली, बेकारों की दिल्ली
खानेवालों की दिल्ली, पीनेवालों की दिल्ली
दिलवालों की दिल्ली, बवालों की दिल्ली
बेगानों की दिल्ली, दीवानों की दिल्ली
बल्लीमारान की दिल्ली, झंडे वालान की दिल्ली
ग़ालिब की गज़लों की दिल्ली, साहिर की नज्मों की दिल्ली
ज़फर की दिल्ली, जवाहर की दिल्ली
झांसीवालीयों की दिल्ली, निर्भयाओं की दिल्ली
साइकल रिक्शों की दिल्ली, रोल्स रॉईसों की दिल्ली
इतिहास की दिल्ली, आज की दिल्ली
खूबसूरत दिल्ली, बदसूरत दिल्ली
इस की दिल्ली, उस की दिल्ली
तब की दिल्ली, सब की दिल्ली
अब की दिल्ली, कब की दिल्ली
दिल्ली

- अशी सगळी दिल्ली तर मी अजून पाहिलेली नाही. पण दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईला एका माळेत का गुंफतात हे मला समजलंय. ह्यांच्याबद्दल तुम्ही उदासीन (Neutral) असू शकत नाही. ही शहरं तुमच्या अंगावर येतात, डोळ्यांत भरतात, उर दडपवतात, तुम्हाला हादरवतात, मोहवतात, बरंच काही करतात. त्यांचा प्रभाव तुम्ही टाळू शकत नाही. ही शहरं भाग पाडतात तुम्हाला, त्यांच्याबद्दल एक मत बनवण्यासाठी. कोणतंही. प्रिय किंवा अप्रिय. पण तुम्ही उदासीन राहू शकत नाही.

दिल्लीची तुलना मुंबईशी करणं, माझ्यासाठी अपरिहार्य आहे. ही तुलना करताना मला जाणवतं की दोन्ही शहरं काही बाबतींत एकमेकांपेक्षा सरस आहेत. दिल्लीची हवा 'थंड व कोरडी' ते 'उष्ण व कोरडी'पर्यंत बदलते. तर मुंबईची हवा 'उष्ण व दमट'पासून 'उष्ण व दमट'पर्यंत(च) बदलते, हा सगळ्यात महत्वाचा व झटक्यात जाणवणारा फरक ! रस्त्यांचं म्हणायचं तर दिल्लीचे रस्ते म्हणजे डेल स्टेनचा रन अप आणि मुंबईचे रस्ते म्हणजे आशिष नेहराचा, इतका फरक आहे. दिल्लीकडे भरपूर जमीन आहे, मुंबईकडे असलेली जमीनही समुद्र बुजवून बनवलेली आहे. कदाचित मोठमोठे रस्ते असणं म्हणूनच दिल्लीला परवडणारं आहे आणि टोलेजंग इमारती असणं हे मुंबईसाठी आवश्यक.

अर्थात ही सगळी तुलना नव्या दिल्लीशी. पुरानी दिल्ली हे सगळं प्रकरणच वेगळं असावं. मी फक्त चांदनी चौक, क़ुतुब मिनार वगैरे भाग पाहिला. त्यावरून तरी असंच वाटतं. मी मुंबईतल्या बैठ्या चाळी, झोपडपट्ट्यांतून, बाजारांतून खूप फिरलोय. पण लाल किल्ला ते चांदनी चौक आणि मग तिथून दरीबा कलान, बल्लीमारान, जामा मशीद वगैरे भाग फिरताना जे जाणवलं ते फार वेगळंच काही तरी होतं. हा सगळा भाग मुस्लीम बहुल. इथल्या छोट्या छोट्या गल्ल्यांत शहरांतल्या जुन्या बाजारांत असते तशीच प्रचंड गर्दी, कचरा, दाटीवाटी आणि गोंधळ ! गच्च भरलेली कपडे, दागिने व हर तऱ्हेच्या चीजवस्तूंची दुकानं. त्यांच्या मधल्या चिंचोळ्या बोळांतून तोबा गर्दी आणि अशक्य वाटत असतानाही प्रत्येक ठिकाणाहून पुढे शिरणाऱ्या सायकल रिक्शा ! आम्हीही एका सायकल रिक्शातच होतो. त्यामुळे 'खरेदी' नामक बायकांच्या अत्यंत कंटाळवाण्या व खर्चिक टाईमपासपासून माझी सुटका झाली. आम्ही दोघंही, खरं तर आम्ही अडीच, कारण सव्वा वर्षांचा मुलगाही होता, तर आम्ही अडीचही जण डोळे फाडून चोहो बाजूंना न्याहाळत होतो. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या एकमेकांना गर्दीत माणसांचे माणसांना धक्के लागावेत, तश्या निर्विकारपणे एकमेकांना खेटत, घासत होत्या. डोक्यावर वायरींचे इतके दाट जाळं होतं, की त्यांतून एखादी माशीसुद्धा पार होऊ शकणार नाही. प्रत्येक साईजच्या वायरी इथून तिथे आणि तिथून इथे झुलत होत्या. माझा एक हात कॅमेरा पकडून होता, दुसरा हात मुलाला आणि बारीक लक्ष सगळीकडे होतं. हे वेगळ्या प्रकारचं लक्ष होतं. कोण कुठून कसा येईल आणि आमच्या पाकीट, पर्स, कॅमेरा, गळ्यातल्यावर हात टाकेल किंवा आमच्याच नकळत लंपास करेल, ह्याचा नेम नव्हता. खासकरून 'गली परांठेवाली' नामक अत्यंत ओव्हररेटेड खाऊगल्लीत पायी फिरत असताना तर मी खूपच लक्ष ठेवून होतो. 'गली परांठेवाली'मध्ये आम्ही दोन ठीकठाक पराठे खाल्ले आणि एक अक्षरश: थुकरट लस्सी प्यायलो. ह्यापेक्षा उत्तम पराठा आणि लस्सी करोल बागेत मिळते आणि ती शांतपणे खाता/पिताही येते, असं आपलं माझं वैयक्तिक मत.

एकंदरीतच हा सगळा भाग निश्चिंतपणे फिरावं असा वाटलाच नाही. डोक्यावर लटकणाऱ्या वायरींच्या धोक्याप्रमाणे सतत एक अनिश्चितता तुमच्या मागावर आहे असंच वाटत राहतं. बल्ली मारान भागातच गालिबची हवेली आहे. ती बाहेरून किंवा दुरून का होईना पाहावी अशी इच्छा होती. पण त्या चिंचोळ्या गल्ल्यांतून नेमका त्याच दिवशी कसलासा मोर्चा होता त्यामुळे ना गालिबच्या हवेलीकडे जाता आलं ना जामा मशीदीपर्यंत. (त्या मोर्च्याचीसुद्धा एक वेगळीच गंमत होती. मोर्च्याचा बॅनर घेऊन आघाडीला दोघे जण चालत होते. तो रस्ता (गल्ली) इतका लहान होता की तो बॅनर त्यांना सरळ उघडणेही शक्य नव्हते. त्यामुळे ते दोघे एकामागे एक 'Sideways' चालत होते. म्हणजे मोर्च्याला समांतर त्यांचा बॅनर होता !) एका अर्थी बरंही झालं की आम्ही अजून फिरलो नाही. कारण परत लाल किल्ल्याकडे आणून सोडल्यावर रिक्शावाल्याने पैश्यांसाठी हुज्जत घालायला सुरुवात केली. Lesson learnt. एक तर सायकल रिक्शा करूच नका किंवा केलीच तर कुठे कुठे जायचंय ते आधीच सांगून 'वेळेची बोली नाही' हे स्पष्ट करून घेऊन भाडं ठरवा. Well.. तरीही हे चोट्टे काही न काही करून गंडवतीलच ! नकोच. सायकल रिक्शा करूच नका ! पायी फिरा. कुणी तरी ओळखीचा लोकल माहितगार माणूस शोधा आणि त्याला बरोबर घ्या, तेच बेस्ट !

पुरानी दिल्ली हा गजबजाट आवडण्यासारखा नाहीच. गुलजार म्हणतो 'तुझसे मिलना पुरानी दिल्ली में..' पण परिस्थिती अशी आहे की इथे 'किसी से मिलना..' म्हणजे फक्त 'देखना'च शक्य आहे ! 'बल्लीमाराँसे दरिबेतलक' इथे आहे फक्त गजबजलेली अनिश्चितता, तीही मुबलक कचऱ्यासह. 'स्वच्छ भारत अभियान' मुळे असेल, पण हा कचरा दर काही अंतरावर गोळा करून एक ढिगारा केलेला असतो, इतकीच काय ती सोय !

माझ्यासाठी धारावी, क्रॉफर्ड मार्केट, रानडे रोड, फॅशन स्ट्रीटच बरी ! तिथल्या कचऱ्यासह !

- रणजित पराडकर

Saturday, January 09, 2016

२०१५ ची एक विना-शीर्षक आठवण

खरं तर, त्या दिवसाचा अनुभव मी दुसऱ्याच दिवशी लिहायला घेतला होता. पण जमलं नाही. मग अधूनमधून ३-४ वेळा मी प्रयत्न केला, तरी मला नेमके शब्द सुचलेच नाहीत. कदाचित मला काय सांगायचं आहे, हे आत्ताही माझं मलाच नीटसं उमगलेलं नाही. पण आता हे मनात अजून दाबून ठेवता येत नाहीय. लहान मुलाला एखादं खेळणं किंवा नवीन कपडा दिला किंवा मिळाला तर ते लहान मूल कमालीचं बेचैन होतं. ह्या विचाराने की 'कधी एकदा ते खेळणं किंवा तो कपडा मी सगळ्यांना दाखवीन !' ही बेचैनी माझ्यातल्या लहान मुलाने गेला महिनाभर अनुभवली आहे. आज त्या दिवसाला बरोबर एक महिना पूर्ण झाला आहे. आज मी हे हातावेगळं करणारच आहे. माझी कमाई मी सर्वांना दाखवणारच आहे.

२०१६ सुरु होऊन नऊ दिवस होऊन गेलेत. आत्तापर्यंत नव्याची नवलाई ओसरली असेलच. काही लोकांची रिझोल्युशन्ससुद्धा गुंडाळून झालेली असतील. ह्या नऊ दिवसांत अनेकांनी 'त्यांच्यासाठी २०१५ कसं गेलं' हे सांगणाऱ्या पोस्ट्स टाकल्या. काय कमावलं, काय गमावलं, असा सगळा ताळेबंदही मांडून झाला.
पण मी माझा ताळेबंद मांडला नाही. ['लेकिन मैंने अपने लिए कुछ नहीं सोचा' (पापा कहतें हैं बड़ा नाम करेगा..) सारखं !]
Honestly, ताळेबंद मांडलाच जाऊ शकत नाही. कारण माझ्या बाबतीत आत्तापर्यंतच्या सगळ्या वर्षांची कमाई ह्या सरलेल्या वर्षातल्या एका दिवसातच झालेली आहे. एरव्ही 'बाईकने किती मायलेज दिलं' इथपासून ते 'मुलगा झाला' इथपर्यंत प्रत्येक लहान-मोठी बातमी मी फेसबुकवर जाहीर करत आलो आहे. ही गोष्ट मात्र मी आत्तापर्यंत फार कमी लोकांना सांगितली. This was differently special, specially special and differently different. जे घडलं, ते काही माझं स्वप्न वगैरे नव्हतं. मात्र ते घडून गेल्यावर कळलं की झालं ते स्वप्नवतच होतं !

३ डिसेंबर २०१५.
फेसबुक मेसेज बॉक्समध्ये कौस्तुभ दादाचा मेसेज आला. '९ तारखेला मी मुंबईत येतोय. आलास तर 'किशोर'च्या बंगल्यावर घेऊन जाईन!'
'किशोरच्या घरी जायला मिळणार ?' मी कसलाही विचार न करता ठरवून टाकलं की जायचंच !
९ ला सकाळी मुंबईला पोहोचलो. बरोबर एक किशोरभक्त मित्र तुषार ढेरे. कौस्तुभदाला दुपारी भेटून, जेवून आम्ही 'जुहू तारा'ला गेलो.



'किशोर कुमार गांगुली मार्ग', 'Kishore Kumar Bungalow' अश्या पाट्या दिसल्या आणि दोन-चार ठोके गडबडलेच छातीत !
गेटमधून आत पाउल टाकलं आणि मला एकाच वेळी पिसासारखं हलकंही वाटायला लागलं आणि पायांत काही किलोंचं वजन बांधल्यागत जड-जडही ! लाल रंगाचं ते टुमदार घर. इथल्याही झाडांशी किशोरदाने गप्पा मारल्या असतील का ? हा समोर जो झोपाळा आहे, तो त्याच्या काळीही असेल का ? त्यावर तो बसला असेल का ? त्याच्या गाडीची जागा कोणती असेल ? एकेक पाउल अतिशय शांतपणे टाकत आणि असे अनेक प्रश्न मनातच रुजवत गेटपासून मुख्य घरापर्यंत गेलो. दार उघडंच होतं. (Yes. You read it right. दार उघडंच होतं.) मंदिरात शिरताना किंवा स्टेजवर जाताना किंवा सामन्यापूर्वी मैदानावर पाउल ठेवताना जसा नमस्कार करतो, तसा नमस्कार तो उंबरा ओलांडून आत शिरण्याआधी अभावितपणेच केला गेला. मंद उजेड असलेल्या त्या वास्तूत समोर असलेल्या प्रशस्त जिन्यावरुन आम्ही तिघे एकेक पायरी चढत वर जात होतो. डावीकडच्या भिंतीवर किशोरदा आणि अमित कुमारचे स्वतंत्र व एकत्र असे लहान-मोठे खूप फोटो होते. दीड जिना चढून पुन्हा डावीकडे वळल्यावर एका दिवाणखान्यात आम्ही शिरलो. तिथे एक वयोवृद्ध माउली एका छोट्याश्या सोफ्यावर बसली होती. रुमा गुहा. किशोरदाच्या पहिल्या पत्नी. त्यांच्या पाया पडलो. त्या साध्याश्या दिवाणखान्यात मोजक्याच वस्तू होत्या. समोर असलेलं केनवूडचं सेंटर टेबलही इतकं साधंसं होतं की त्याच्या काचांवर चरेसुद्धा दिसत होते. काही वेळानंतर चहा आला. तो एरव्ही आपण चित्रपटांत पाहतो तसा पाणी, दूध, साखर, वगैरे सगळं वेगवेगळं असलेला नव्हता. माझ्या घरी जसा पाहुण्यांना दिला जातो, तसा सगळं एकत्र केलेला बदामी रंगाचा चहा.




'किशोरदाच्या घरात बसून मी चहा प्यायलेला एक कप चहा' ही होती ह्या वर्षाची कमाई. ही कमाई आजवरच्या सगळ्याला पुरून उरलीय. तिथे अर्धा-पाउण तास आम्ही रुमाजींशी काय गप्पा मारल्या, माझ्या लक्षात नाही. कारण माझी नजर फक्त हेच टिपत होती की कुठे कुठे किशोरदा दिसतोय.. तो मला खिडकीत उभा असलेला दिसला. आजूबाजूच्या खोल्यांतून ये-जा करताना दिसला. समोर असलेल्या अगदी छोट्याश्या खोलीत हार्मोनियम घेऊन बंगाली गाणं गातानाही दिसला. मध्येच तो समोरच्या सोफ्यावरसुद्धा दिसला आणि विक्षिप्तपणे म्हणाला, 'हो गया मुझे देखकर ? अभी आप जा सकतें हो, आपसे मिलकर बड़ी ख़ुशी हुई !'

जरा वेळाने लीना चंदावरकरसुद्धा भेटल्या.
बरेच फोटो झाले. पण जे डोळ्यांनी टिपलं, ते कॅमेरा टिपू शकणार नव्हताच. जे कानांनी ऐकलं, ते ह्या शब्दांत मी कथन करू शकणार नाहीच. मी आजही एकच कल्पना करून शहारतोय की घर व सभोवतालच्या त्या संपूर्ण परिसरात एखाद्या ठिकाणी तरी असं झालं असेलच ना की जिथे कधीकाळी किशोरदाचं पाउल पडलं असेल अगदी तिथेच बरोब्बर माझंही पडलं असेल ?



I am sure, तुषारचा अनुभवही असाच काही असणार आहे. ह्यासाठी कौस्तुभदाचे आभार वगैरे मानणं, म्हणजे शुद्ध करंटेपणा ठरेल. त्याने आम्हाला तिथे का नेलं, हे मी समजू शकतो. त्याने आम्हाला श्रीमंत केलं आणि आम्हाला श्रीमंत केल्याचा आनंद त्याला संपन्न करून गेला. असे अनेक आनंद त्याने आजपर्यंत वेचले आहेत आणि त्या प्रत्येक आनंदक्षणाने तो संपन्नांतलाही संपन्न होत गेला आहे अन् जाणार आहे.

- आपला (नवश्रीमंत)
रणजित पराडकर 

Saturday, December 26, 2015

मी आदिशक्ती

भविष्यात कुठल्याही परिस्थितीत परत न करण्याच्या अटीवर एका कवी महोदयांना एक मानाचा पुरस्कार प्रदान केला गेला ! माझा त्यांच्याशी थोडासा परिचय असल्याने मला त्यांना पुरस्कार मिळणार असल्याचं आधीपासून माहीतच होतं. (हो. पुरस्कार मिळणार आहे, हे पुरस्कार जाहीर होण्याआधी माहित असतंच बहुतेकदा !) अभिनंदन करणं औपचारिक आणि आवश्यक होतं. त्यामुळे मी त्यांच्या घरी जाऊन त्यांचं अभिनंदन केलं. पुरस्कार मिळालेला कविता संग्रह मुख्यत्वेकरून स्त्रीवादी कवितांचा होता. कवी महोदय अल्पावधीतच एक आश्वासक स्त्रीवादी कवी म्हणून नावारूपास आलेले होते. औपचारिक अभिनंदन केल्यावर दिवाणखान्यातल्या सोफ्यावर मी विसावलो, गप्पा सुरु झाल्या आणि कवी महोदयांनी फर्मान सोडलं. 'चहा आण गं !' काही मिनिटांनी त्यांच्या पत्नी दोन कप चहा, बिस्किटं वगैरे घेऊन आल्या. तो चहा आम्ही प्यायलो. माझा कप मी ट्रेमध्ये ठेवला. कवी महोदयांनी त्यांचा कप त्यांच्या बाजूच्या छोट्या कॉर्नर टेबलवर ठेवला. त्यांच्या पत्नी आल्या आणि तो कप उचलून ट्रेमध्ये ठेवून घेऊन गेल्या. जाता जाता त्यांना 'अमुक अमुक पुस्तक आण' म्हणून सांगितलं गेलं, त्यांनी ते आणून दिलं आणि कवी महोदयांनी त्यांच्या दुसऱ्या एका पुस्तकाची प्रत मला स्वाक्षरीसह दिली.
स्त्रीवादी कवी. त्यांच्या वास्तववादी कविता समाजात स्त्रीला मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीबद्दल ताशेरे ओढणाऱ्या, डोळ्यांत जळजळीत अंजन टाकणाऱ्या, कधी हळहळणाऱ्या, कधी निराश होणाऱ्या होत्या. ज्या वाचून महनीय समीक्षक वाहवा करत होते. आणि स्वत:च्या घरात मात्र, जिला 'लक्ष्मी' म्हटलं जात होतं, ती समोर चहाचा ट्रे आणत होती. आज्ञा स्वीकारत होती.

ह्या विरोधाभासाने मी मनाशीच खजील झालो.
घरी परत निघालो. माझ्या डोळ्यांसमोर माझ्या माहितीतल्या शेकडो स्त्रिया भन्साळीच्या सिनेमात दाखवतात तसं काही एक संबंध नसतानाही एकत्र येऊन हसत, रडत, नाचत, बोलत होत्या. त्या सगळ्यांच्या प्रत्येक कृतीतून मला त्या डिवचत असल्याचा भास होत होता. त्यात अशिक्षित, सुशिक्षित, गृहिणी, नोकरदार, विवाहित, अविवाहित, यशस्वी, अयशस्वी, प्रसिद्ध, अप्रसिद्ध, परिचित, अपरिचित अश्या सगळ्या होत्या. 'घराकडे लक्ष देणे, मुलांना सांभाळणे, वडिलधाऱ्यांची सेवा करणे, स्वयंपाक अश्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या सगळ्या पेलत होत्या. भारतीय स्त्री घराला जे हवं ते करत असते. राहुल द्रविड कसा संघाला हवं तर विकेटकीपिंग, नेतृत्व, सलामीचा फलंदाज, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज, शॉर्ट लेगचा फिल्डर, स्लीपमधला फिल्डर अश्या सगळ्या भूमिका निभवायचा, तश्याच ह्या स्त्रिया. ह्या स्त्रिया व्यावसायिक आयुष्यात अत्युच्च शिखर गाठतात, तरी त्यांच्या मुलाखतीत त्यांना एक प्रश्न हमखास विचारला जातो, 'घराची जबाबदारी कशी निभावली ?'

मला आठवलं. कसं आजही किती तरी लोकांना 'मुलगी' नकोच असते. 'मुलगी शिकली, प्रगती झाली' वगैरे गोंडस घोषणा आठवल्या. त्या किती पोकळ आहेत, हे जाणवलं. माझं लग्न ठरलं, तेव्हा एका ड्रायव्हरने बाबांना विचारलं होतं, 'किती हुंडा ठरला ?' बाबांनी 'हुंडा वगैरे काही नाही' म्हटल्यावर त्याला विश्वास बसेना ! त्याला एक मुलगा आणि एक मुलगी. जर मुलासाठी हुंडा घेतला नाही, तर मुलीसाठी हुंडा कसा देणार ? अशी त्याची भाबडी समस्या होती. हुंडा देणे आणि घेणे, हा आजही लोकांना अधिकार वाटत असताना नुसत्या घोषणा करून काय उपयोग होणार आहे ?

ह्या सगळ्या विचारात घरी आलो. समोर टेबलवर वर्तमानपत्र होतं. त्यात बातमी दिसत होती. त्यात लिहिलं होतं की, 'UN'च्या एका सर्वेक्षणात असं आढळून आलंय की स्त्री-पुरुष असमानतेत भारत पाकिस्तान आणि बांगलादेशच्याही पुढे आहे ! त्या बातमीत दिलेली आकडेवारी एक भारतीय म्हणून शरमेने मान खाली घालायला लावणारी होती. अर्थात, अशी सर्वेक्षणं कितपत विश्वासार्ह असतात, ह्यावरही वाद होऊ शकतो. मात्र महासत्ता होण्याचं, औद्योगिक केंद्र बनण्याचं स्वप्न पाहणारा भारत आजही स्वत:ची तुलना पाकिस्तानशी करण्यातच धन्यता मानतो आहे आणि त्यांच्यापेक्षा आपण सरस आहोत, ह्याचाच आनंद मानतोय हे विदारक आहे. पाकिस्तानचं जाऊ देऊ, पण जे पुढारलेले देश आहेत त्यांच्या तुलनेत आपण कुठे आहोत ? ह्या आकडेवारीचा तर उल्लेखही कुठेच नव्हता. म्हणजे ती तुलनासुद्धा होऊ शकत नव्हती.

बरोबर आहे. कशी होईल तुलना ? आजही, एका स्त्रीने देवाचं दर्शन घेतलं म्हणून आपण देवाचं शुद्धीकरण करतोय. देवाचं ? तेही मनुष्याने शुद्धीकरण करणं, ही कल्पनाच मुळात नारळाच्या झाडाला सादाफुलीने सावली देण्याचा प्रयत्न करण्यासारखी निरर्थक आहे. पण असो. मला सांगा, त्या शुद्धीकरणासाठी आणलेलं दूध बैलाचं होतं का ? की प्राण्यांमधली स्त्री वंदनीय आणि माणसातली मात्र अस्पृश्य ? पुरोगामी महाराष्ट्राची जर ही अवस्था असेल, तर उर्वरित भारताची आणि त्यातही ग्रामीण भागातल्या परिस्थितीची कल्पनाच न केलेली बरी !

मुळात 'समानता' म्हणजे काय, हेही समजून घ्यायला हवं. 'मी इतरांना समान वागणूक देतो', असं म्हणणंही चूक आहे. कारण तुम्ही समानता देत आहात, अशी जाणीवही व्हायला नको. ती अंगभूतच असायला हवी. हवं तर उलट म्हणा की, 'मी स्वत:ला इतरांसमान वागणूक देतो' !
'मी माझ्या बायको/ मुली/ बहिणीला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे!' असं लोक मोठ्या अभिमानाने सांगतात.
पण 'अरे तू कोण देणारा ? कुणालाही स्वातंत्र्य देण्याचा अधिकार मिळाला कुठून तुला ? त्यांचं स्वातंत्र्य जन्मसिद्धच होतं की !' असा विचार त्यांच्या मनाला स्पर्शही करत नाही.

माझ्या एका मित्राचं काही वर्षांपूर्वी लग्न झालं. मी लग्नाला जाऊ शकलो नव्हतो. पण नंतर त्याच्या घरी गेलो. त्याची बायको त्याला 'अहो-जाहो' करताना पाहून मला फार गंमत वाटली ! मी त्याला म्हटलं, 'अहो' काय अरे ! किती विचित्र वाटतं !'
त्यावर त्याने शांतपणे हसून उत्तर दिलं, 'अरे कुणी मान देत असेल, तर देऊ द्यावा की ! काय फरक पडतो !'
आपण भारतीय इतके चाकरीलोलुप आहोत, की जर कुणी आपल्याला त्याची जाणीव करून दिली तर ते आपल्याला पटतही नाही.

डोकं बधीर झालं. पेपर खाली ठेवला आणि कवी महोदयांचं पुस्तक उघडलं. पहिलीच कविता होती.. 'मी आदिशक्ती !'
कुत्सित हसलो आणि पुढची कविता मी वाचलीच नाही. मनातल्या मनात पुढच्या ओळींची मीच कल्पना केली -

'मी आदिशक्ती
माझ्या ह्यांच्या घरात धुणी-भांडी करते
चहा-पाणी बघते
स्वयंपाक करते
आणि माझ्यावरच्या कवितांमुळे
पुरस्कारही मिळवून देते'

- रणजित पराडकर

शुक्रवार, दि. २५ डिसेंबर २०१५ रोजी 'दै. दिव्य मराठी'च्या 'मधुरिमा' पुरवणीत प्रकाशित लेख -


Monday, November 16, 2015

दिल बहल जाएगा आखिर को तो सौदाई हैं !


तलत आणि किशोर मला प्रचंड जवळचे वाटतात. रफी, मन्नाही खूप आवडतात, पण अगदी स्पष्ट शब्दांत सांगायचं तर जेव्हा मी स्वत:ला पडद्यावर इमॅजिन करतो तेव्हा मला तलत किंवा किशोर हेच माझे आवाज वाटतात. हे बोलणं आगाऊ आहे, पण खरं तेच. 
किशोरशी माझी ओळख खूपच पूर्वीपासूनची. 'ओडलाई युडलाई' करत तो मला भेटला. नंतर त्याच्या गायकीतला ठहराव मला अनेकदा स्तिमित करत राहिला आणि आजही तो अधूनमधून नव्याने भेटत राहतो 'चेएची जा रे आमी..' सारख्या गाण्यांतून. तर तलतशी ओळख मात्र गेल्या काही वर्षांतलीच. तलतचं पहिलं ऐकलेलं गाणं होतं 'जिंदगी देनेवाले सुन..' आणि मग इतरही काही. पण ज्या गाण्याने अगदी आतपासून हलवलं ते 'फिर वोही शाम..' कॉलेजच्या दिवसांत पुरेसे पैसे साठले की एचएमव्हीच्या रिवायवल सिरिजमधल्या कॅसेट्स मी जेव्हा चर्चगेटच्या 'ग्रूव्ह'मध्ये जाऊन रँडम सिलेक्शन करुन घेऊन यायचो, तेव्हा एका कॅसेटमध्ये हे गाणं होतं. तो हळवा कापरा आवाज व्याकुळ करुन गेला. पहिल्यांदा ऐकताना हे तालाशी खेळणारं गाणं मला गायला जमणं तर सोडाच, गुणगुणायलाही जमेल असं अजिबात वाटलं नव्हतं. पोर्शेच्या शोरुममधली चकाचक लाल रंगाची जबरांडुस कार आपण रस्त्यावरुनच डोळे भरुन पाहून घ्यावी, तसं मी हे गाणं निरपेक्ष हव्यासाने ऐकत असे. (निरपेक्ष हव्यास - ही कन्सेप्ट मी एक्स्प्लेन करु शकणार नाही.) मला हे गाणं ऐकताना एका पलंगावर पाय खाली सोडून शांत बसलेला मीच दिसत असे आणि मी ते संपूर्ण गाणं त्याच पोझिशनमध्ये, मानही न हलवता गातोय असं वाटे. (शेकडो वेळा ऐकल्यावर आता कुठे गुणगुणण्याचा कॉन्फिडन्स आलाय.)
तलत ह्या गाण्यातून मला कडकडून भेटला, भेटायला लागला. मग त्याची सगळीच गाणी अशीच अतिशय संयतपणे आपली आर्तता मांडणारी वाटायला लागली. नव्हे. ती आहेतच तशी. कुठलाही आक्रोश, आक्रस्ताळेपणा, चडफडाट करणं त्या आवाजाच्या स्वभावातच नव्हतं. त्यात होती ती फक्त एक प्रकारची स्थितप्रज्ञता. त्या व्याकूळतेतही एक आत्मभान होतं. त्या उत्कटतेतही एक संयम होता. 

एकीकडे हे सगळं घडत असताना दुसरीकडे साहिर आणि राजेन्द्र क्रिशन अनेक गाण्यांद्वारे मला झपाटत होते. हे गाणं राजेन्द्र क्रिशनचं.

जाने अब तुझसे मुलाक़ात कभी हो के न हो
जो अधूरी रही वो बात कभी हो के न हो
मेरी मंज़िल तेरी मंज़िल से बिछड़ आयी हैं

हे असं कुणी लिहावं आजच्या जगात? कुणातच ही सफाई आणि साधेपणा राहिलेला नाही. जो उठतो तो गुलज़ार बनायला पाहतोय आणि बस्स मोकाट सुटतोय. पण असे शब्द उतरायला प्रतिभेवरही एक संस्कार असायला हवा तो क्वचितच जाणवतो. साधेपणा आणि शिस्तीचा संस्कार. स्वत:च स्वत:वर केलेला. ह्या शिस्तबद्ध साधेपणामुळेच लिहिलं जातं की -

फिर वोही शाम, वोही ग़म, वोही तनहाई हैं 
दिल को समझाने तेरी याद चली आयी हैं

इथल्या 'फिर' ला किती महत्व आहे, हे त्या शब्दावर रेंगाळल्यावर समजेल. 
ही कहाणी आजची नाही. रोजची आहे, कित्येक दिवसांपासूनची आहे. रोज असंच सगळं अंगावर येतं आणि रोज तुझी आठवण दिलासा द्यायला येते ! इथे तलतच्या 'फिर वोही' म्हणण्यामध्ये एक हळवी तक्रार आहे. तो हे 'फिर वोही' एक प्रकारच्या उद्गारवाचक सुरात म्हणतो. दोन शब्दांत हे तक्रारयुक्त आर्जव तलत करतोय. हे दोन शब्द जर जसेच्या तसे जमले नाहीत, तर बाकीचं गाणं गाऊच नये. कारण सगळी 'जान' इथे आहे.

फिर तसव्वुर तेरे पहलू में बिठा जाएगा
फिर गया वक़्त घड़ीभर को पलट आएगा
दिल बहल जाएगा आखिर को तो सौदाई हैं 

आता परत एकदा माझं भावविश्व तुझ्या जवळ येऊन बसेल अन् जुन्या दिवसांना उजाळा मिळेल आणि ह्या सगळ्या स्वप्नरंजनातच भोळसट मन खूष होईल ! 
- हे सगळं फक्त कथन आहे. पण त्यातलं जे चित्रण आहे ते पुन्हा एकदा एक तटस्थ, आर्जवी तक्रार करतंय. ही व्यथा जितक्या साधेपणाने एक कवी मांडतोय, तितक्याच साधेपणाने एक गायक गातोय आणि दोघांमधला पूल आहे अजून एक अफलातून माणूस. 'मदन मोहन'. हा तर सगळ्यांचा बाप होता, बाप. 

मदन मोहनला 'गझल किंग' म्हटलं जातं. हे गाणं 'गझल' नाही. मात्र त्याचा बाज तसाच आहे. स्वत: मदन मोहन किती आर्त आवाजाचा धनी होता, हे जाणण्यासाठी यूट्यूबवर त्याच्या आवाजातलं 'नैना बरसे रिमझिम रिमझिम..' ऐका किंवा 'दस्तक' चित्रपटातलं 'माई री, मैं कासे कहूँ..' ऐका. 
मदन मोहनची गाणी ऐकताना मी त्या त्या गाण्याच्या फ्लॅशबॅकमध्ये जातो. हार्मोनियम घेऊन बसलेला मदन मोहन, अधूनमधून सिगरेटचे झुरके मारत लता बाई, तलत, रफी ह्यांना गाण्याची चाल सांगतोय. मग त्यावर बहुतेक काम ते लोक स्वत:चं स्वत: करत असतील. ते लोक गात असताना मध्येच एखादी जागा 'अंहं.. यह सुनो..' म्हणून तो स्वत: गाऊन दाखवत असेल. मग एक 'वाहवा' ची देवाणघेवाण ! सोबत राजेंद्र क्रिशनसुद्धा असेल. तो सांगत असेल, 'अमुक शब्दाचा, अक्षराचा उच्चार असा असा हवा'. हे गाणंही मदन मोहनने आधी स्वत: गायलं असेल.. 'फिर वोही शाम..' हात वरुन खाली गोलाकार आणत. सगळंच अफाट. इथे माझा 'तसव्वुर' त्यांच्या 'पहलू'त जाऊन बसतो आणि 'दिल बहल जाता हैं आखिर को तो सौदाई हैं' !

यथावकाश जसजसं हे गाणं खूप भिनलं तसतसा मी ते गुणगुणायला लागलो आणि एक दिवस एका लाईव्ह कार्यक्रमात एका गायकाने हे गाणं सादर करताना सांगितलं की, 'हे तलतचं शेवटचं गाणं होतं. 'जहाँ आरा' नंतर, 'फिर वोही शाम..' नंतर तलत कुठल्याच सिनेमासाठी गायलाच नाही !' 
शिखरावर पोहोचून निवृत्ती घेणं, आजपर्यंत सचिनपासून लता बाईंपर्यंत कुणाला जमलेलं नाही. प्रत्येकाने घसरगुंडी झाल्यावरच विश्राम घेतलाय. एक तलतच जो जितक्या शांतपणे काळीज चिरणारी व्यथा गायचा, तितक्याच शांतपणे 'आपलं काम संपलं आहे' हे मान्य करणारा ! खरा स्थितप्रज्ञ !

जाता जाता, ह्या गाण्याचं तिसरं कडवं. जे सहसा ऐकायला मिळत नाही -

फिर तेरे ज़ुल्फ़ की, रुखसार की बातें होंगी
हिज्र की रात हैं मगर प्यार की बातें होंगी
फिर मुहब्बत में तड़पने की क़सम खायी हैं !

__/\__


- रणजित 

Thursday, November 05, 2015

प्रेम - तुमचं, आमचं आणि त्यांचं



सदर लेख 'श्री. व सौ.' च्या दिवाळी अंक २०१५ साठी लिहिला आहे.
हा लेख लिहिण्यासाठी माझा मित्र अमोल उदगीरकरशी झालेली चर्चा लाख मोलाची होती. 
संपादक श्री. संदीप खाडिलकर ह्यांचे आभार ! त्यांनी तर लिहूनच घेतलं आहे माझ्याकडून !

काही दिवसांपूर्वी 'कट्टी-बट्टी' पाहिला. त्यातली ती बेदरकार कंगना राणावत आणि तिला तशीच स्वीकारणारा इम्रान खान पाहून बाहेर पडलो. चित्रपट तसा टुकारच होता. बहुतेक जण विचार करत होते की, 'चित्रपट जास्त बंडल होता की इम्रान खान?', पण माझ्या मनात मात्र  वेगळाच झगडा चालू होता. ह्या दोन व्यक्तिरेखांना
मान्य करतानाच माझी ओढाताण होत होती. म्हणजे एखाद्या मुलाने 'प्रपोज' केल्यावर स्वत:च 'अभी सिरियस का मूड नहीं हैं. टाईमपास चलेगा, तो बोल !' असं उत्तर देणारी कंगना आणि अश्या पूर्णपणे बेभरवश्याच्या मुलीसोबत 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहून त्या नात्याबाबत गंभीरही असणारा इम्रान काही केल्या माझ्या जराश्या प्रतिगामी बुद्धीला पचतच नव्हते. विक्रमादित्याच्या पाठुंगळीवरचा वेताळ बडबड करून, प्रश्न विचारून त्याला भंडावून सोडत असे. माझं आणि माझ्या मनाचंही असंच काहीसं सुरु झालं होतं. काही वेळाने मनातल्या मनात एका चित्रपटापुरताच चाललेला हा संवाद द्वितीयपुरुषी झाला. माझं मन माझ्याच समोर आलं आणि म्हणालं -

"मित्रा,

तू आणि मी बऱ्याच पूर्वी 'मागल्या पिढीचे' झालो आहोत, हे मला तरी आत्ता आत्ता समजायला लागलंय. आता 'मागल्या पिढीचे' म्हणून लगेच स्वत:ला म्हातारा समजू नकोस ! तरुणाईतसुद्धा 'नवतरुण' आणि 'फक्त तरुण' असे दोन प्रकार असावेत. तू आणि मी 'फक्त तरुण' आहोत. नवतरुणाईशी बऱ्याच बाबतींत आपली आवड-निवड जुळत नाही किंवा जुळवून घेताना त्रासच होतो. राजकारण, क्रीडा, विज्ञान, धर्म, कला आणि एकंदरीतच आयुष्याकडे पाहण्याचा 'आजचा' दृष्टीकोन आणि 'आपला' दृष्टीकोन एकच आहे का रे ? पहा जरासा विचार करून.
मला तर असंही वाटतं की पिढ्यांतसुद्धा उप-पिढ्या पडायला लागल्या आहेत, आपल्या बहुपदरी जातिव्यवस्थेप्रमाणे ! तुझी आणि माझी अशीच एक उपपिढी. आजचीच, तरी वेगळी.  म्हणजे आपण स्वत:ला आजच्या पिढीचे समजावं, तर तिथे नाळ जुळत नाही आणि मागच्या पिढीचे समजावं, तर तेव्हढं वय झालेलं नाही ! काळ बदलतोय, मित्रा, Time is changing. आणि महत्वाचं म्हणजे, ही जी बदलाची गती आहे, तीसुद्धा सतत बदलते आहे, वाढते आहे. आज सर्वमान्य, सर्वप्रिय असलेली कोणती संकल्पना उद्या मोडीत निघेल सांगता येत नाही ! ही गती इतकी प्रचंड आहे की आनंद बक्षी साहेबांच्या शब्दांत सांगायचं तर -

आदमी ठीक से देख पाता नहीं
और परदे से मंज़र बदल जाता हैं !

ह्या ओळींवरून आठवलं. हे गाणं तू कॅन्टीनच्या टेबलावर ठेका धरून गायचास कॉलेजात असताना. आज कुणी गात असेल का रे ? कुमार सानू, उदित नारायण वगैरेंच्या काळातही तू तरी किशोर, रफीमध्येच रमला होतास. 'ओ हंसिनी, मेरी हंसिनी, कहाँ उड़ चली..' हे गाणं तू २ वर्षं कॅन्टीनमध्ये 'तिच्या'साठी गात होतास. शेवटपर्यंत मनातली गोष्ट सांगू शकला नाहीसच आणि 'ती' हंसिनी खरंच 'कहाँ उड़ चली' गयी ते तुझं तुलाच कळलं नाही. अशी प्रेमं तरी होत असतील का रे आजकाल ? कुणास ठाऊक !
माझा एक ठाम विश्वास आहे. चित्रपट आणि आजचा समाज ह्यांचं एक घनिष्ट नातं असतं. आता चित्रपटामुळे समाजात बदल होतात, समाजानुसार चित्रपट बदलतो की दोन्ही थोड्याफार प्रमाणात होतच असतं, हा विषय वेगळ्या मंथनाचा आहे. पण ते परस्परपूरक तर नक्कीच आहेत. मी काही फार पूर्वीचं बोलत नाही. २०-२२ वर्षांपूर्वीचे, १०-१२ वर्षांपूर्वीचे आणि आजचे चित्रपट पाहा. प्रेमाकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा बदलत गेला, बदलला आणि बदलतोही आहे.

'क़यामत से क़यामत तक़', 'मैने प्यार किया' वगैरेचा जमाना आठव. अरे प्रत्येक चित्रपटात 'प्रेम, प्रेम आणि प्रेम'च असायचं ! म्हणजे नाही म्हटलं तरी ९९% चित्रपट हे 'प्रेम' ह्या विषयावरच आधारित असत आणि उर्वरित १% चित्रपटांत 'प्रेम' हे उप-कथानक असे. आमटीत कढीपत्ता टाकतात. तो खालला जात नाही. पण त्याचा स्वाद असतोच. तसंच, प्रत्येक चित्रपटाच्या कहाणीतली कढीपत्त्याची पानं म्हणजे 'प्रेम' असे. पुढे हे प्रमाण जरा बदललं. १% चं ६-७% वगैरे झालं असावं आणि आज तर अस्सल प्रेमकहाणी १% चित्रपटांत असेल. ९९% चित्रपटांत 'प्रेम' हे उपकथानक झालंय ! बरं, फक्त 'वेटेज' बदललंय असंही नाही. सादरीकरणही बदललंय.

प्रेमकहाणीतला खलनायक ही संज्ञा कालबाह्य होत चालली आहे बहुतेक. पूर्वी प्रेमातले अडथळे असायचे धर्म,
गरिबी-श्रीमंती, खानदानी दुष्मनी वगैरे. त्यामुळे ओघानेच खलव्यक्ती यायच्याच. आताच्या प्रेमातले अडथळे वेगळ्या प्रकारचे आहेत. हे अडथळे नायक-नायिकेच्या मनातच असतात. त्यांना 'खल' ठरवता येत नाही. आजचे प्रेमी करियरकडेही लक्ष देतात. आर्थिक बदलांनंतर उघडलेल्या अनेक दरवाज्यांमुळे विविध स्वप्नं आजकाल खुणावतात. आयुष्य बदललं, तसं 'प्रेम'ही आणि त्यावर आधारित चित्रपटही.
'कभी हां कभी ना' मधला कुचकामी शाहरुख खान, त्याचं प्रेम असलेल्या 'सुचित्रा कृष्णमुर्ती'चं लग्न 'दीपक तिजोरी'शी होत असतानाही आनंदाने त्यात सहभागी असतो. त्याच्या पराभवात आपल्याला त्याचा विजय वाटला होता. पण त्या काळातल्या चित्रपटांच्या प्रकृतीचा विचार करता, तो शेवट 'अहेड ऑफ द टाईम' म्हणता येऊ शकेल. असा शेवट आजचे चित्रपट करतात, कारण असा विचारही आजची पिढी करते.
घरचं सारं काही सोडून देऊन स्वत:च्या प्रेमाखातर कुठल्याश्या दूरच्या गावी येऊन एखाद्या खाणीत अंगमेहनतीचं काम करणारा 'मैने प्यार किया' मधला सलमान आता दिसणार नाही. आता दिसेल, 'मला माझं स्वप्न साकार करायचं आहे', असं ठामपणे सांगून स्वत:चं प्रेमही मागे सोडून जाणारा 'यह जवानी है दीवानी' मधला रणबीर कपूर आणि त्याच्या त्या निर्णयाला 'त्याचा निर्णय' म्हणून स्वीकारणारी व स्वत:च्या आयुष्याकडे समंजसपणे पाहून पुढे जाणारी दीपिका पदुकोण. 'खानदान की दुष्मनी' मुळे घरून पळून जाणारे 'क़यामत से क़यामत तक' वाले आमीर खान आणि जुही चावला आता दिसणार नाहीत. आता मुलाने लग्नाला आयत्या वेळी नकार दिल्याने हट्टाने एकटीच हनिमूनला जाणारी 'क्वीन' कंगना राणावत दिसते आणि तिच्यात इतकी धमकही असते की नंतर परत आलेल्या त्या मुलाला ती झिडकारूनही लावेल !
फार पूर्वी, म्हणजे कृष्ण-धवल काळात, नायकाने नायिकेचा हात हातात घेणं म्हणजे 'अंगावर शहारा' असायचा. नंतर गळ्यात गळे पडू लागले आणि आता लग्नपूर्व संबंध किंवा किमान चुंबनदृश्यंही अगदी किरकोळीत चालतात ! 'कॉकटेल' सारख्या चित्रपटात बिनधास्त आयुष्य जगणारे सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण
दिसतात. दीपिकाची 'व्हेरॉनीका' तर 'ओपन सेक्स' चा खुलेआम पुरस्कार करते. तिथेच तिच्यासमोर असते 'डायना पेंटी'ने सादर केलेली एक व्यक्तिरेखा जी तिच्या पळून आलेल्या नवऱ्याला शोधण्यासाठी सैफ-दीपिकाच्या दुनियेत आलेली असते. संपूर्ण चित्रपटभर डायना पेंटीची 'मीरा' आपल्याला पटत नाही आणि उच्छ्रुंखल 'व्हेरॉनीका' मात्र चालून जाते. त्यांच्या कात्रीत अडकलेल्या सैफच्या 'गौतम'शी आपण नातं सांगतो. मात्र खऱ्या आयुष्यात हे संबंध आपण स्वीकारू शकणार नाहीच. कारण तू आणि मी वेगळ्या उप-पिढीचे आहोत ना रे !

गरीब-श्रीमंत ही तफावत दाखवण्यात तर आजकाल कुणी वेळ घालवतच नाही ! 'जब वी मेट' आणि 'वेक अप सिड' मधल्या नायक-नायिकांमधली आर्थिक परिस्थितीची तफावत सुस्पष्ट असली, तरी चित्रपट त्यावर भाष्य करत बसत नाही. कारण व्यक्तिरेखांना इतर अधिक महत्वाच्या समस्या आहेत. त्यांचा स्वत:शीच झगडा सुरु
आहे. आजच्या चित्रपटातील तरुण नायक-नायिका आपल्याच मनातला गोंधळ स्वीकारतायत आणि आपल्यालाच पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतायत. भटिंड्याहून मुंबईला शिकण्यासाठी आलेली खमकी करीना कपूर, अपयशी प्रेम व निराशाजनक आयुष्याला कंटाळून जीव देण्याच्या विचारापर्यंत पोहोचलेल्या अतिश्रीमंत शाहीद कपूरला फक्त एक मित्र म्हणून स्वीकारते, तेव्हा त्या नात्याबाबत तिच्या मनात कुठलेच संभ्रम नसतात. त्यामुळेच पुढे जेव्हा ती स्वत: प्रेमातल्या धक्कादायक अपयशाला सामोरी जाते, तेव्हा ती एकटीच उभी राहण्याची धडपड करत राहते. 'वेक अप सिड' मधला अमीरजादा बेजबाबदार रणबीर कपूर परिपक्व विचारांच्या, वयाने थोडी मोठी असलेल्या आणि दिसायलाही साधीच असणाऱ्या कोंकणा सेन शर्मावर प्रेम करायला लागतो. तो आयुष्यात इतका भरकटलेला व गोंधळलेला असतो की त्याचं प्रेमही त्याला स्वत:ला समजत नाही. ह्या व अश्या चित्रपटांत नायक व नायिकेत गरिबी व श्रीमंतीची एक मोठी दरी असतानाही, प्रेमकहाणीचा सगळा 'फोकस' व्यक्तिरेखांच्या वैयक्तिक समस्यांवरच ठेवलेला आहे.

'ठरलेलं लग्न करावं की नाही ?' ह्या द्विधेत असलेल्या अभय देओलला, लग्नाच्या पत्रिकाही वाटून झालेल्या असतानाही, त्याचा मित्र हृतिक रोशन 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मध्ये म्हणतो, 'Dude, its YOUR life !' तिथेच फरहान अख्तरचा एका स्पॅनिश मुलीसोबतचा 'वन नाईट स्टॅण्ड' दाखवताना त्या नात्याला 'व्यभिचार' म्हणून दाखवलं जात नाही.
इतर कुणाहीपेक्षा माझ्या आयुष्यावर माझा हक्क सगळ्यात जास्त आहे, हा विचार आताशा मनांत रुजायला लागला आहे. स्वबळावर नितांत विश्वास असणाऱ्या ह्या मनाला आता देव, धर्म, आई-वडिलांचा आधार वगैरे अनन्यसाधारण वाटत नाहीत. ह्याच मनाला 'प्रेम' ही गोष्टही दुय्यम किंवा तिय्यम झाली आहे. 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' मधला प्रियकर, आपल्या त्या प्रेमाखातर ज्याच्या परस्परमान्यतेची खातरजमाही
निश्चित झालेली नसते, लंडनहून थेट भारतात येतो, पंजाबमधील आपल्या प्रेयसीच्या गावीही पोहोचतो आणि अखेरीस तो दिलवाला शाहरुख आपल्या दुल्हनिया काजोलला प्राप्तही करतो. आजचा 'कभी अलविदा ना कहना' मधला शाहरुख प्राप्त केलेल्या प्रेमाशी लग्नोत्तर मतभेद झाल्यावर नव्याने प्रेमात पडतो आणि त्या प्रेमामुळे संसार संपवतो.
'कभी अलविदा ना कहना' वरून आठवलं. नातीही ठिसूळ झाली आहेत रे मित्रा आजकाल. माझ्या परिचयातल्या कित्येक जणांनी परस्पर सामंजस्याने कायदेशीर घटस्फोट घेतले आहेत आणि कित्येक जण त्याचा विचारही करत आहेत. तडजोड करणे, हेसुद्धा आताशा कालबाह्य होत चाललं आहे. कारण ? 'माझ्या आयुष्यावर माझा हक्क सगळ्यात जास्त आहे'. म्हणूनच व्यावसायिक चित्रपटकर्तेही 'कभी अलविदा ना कहना', 'चलते चलते', 'साथिया' सारखे चित्रपट बनवतात. ते तिकीट खिडकीवरसुद्धा चांगले आकडे दाखवतात.
एकूणच चित्रपटकर्त्यांची 'प्रेम' ह्या विषयाकडे पाहण्याची दृष्टी अधिक व्यापक झाली आहे. नव्हे चित्रपटाकडेच पाहण्याची दृष्टी व्यापक झाली आहे. 'प्रेम' हा विषय टाळून, गाळून कहाणी सादर होते. चित्रपटातील पात्रं प्रेमाच्या पुढचा विचार करणारी दाखवली जात आहेत. 'मैं हूँ ना', 'रंग दे बसंती', 'अब तक छप्पन्न', 'चक दे इंडिया', 'थ्री इडियट्स', 'तारे जमीं पर', 'पा', 'बजरंगी भाईजान' सारखे अनेक चित्रपट जे लोकांनी खूप डोक्यावर घेतले, ते काही प्रेमकहाणी सांगणारे नव्हतेच. करायचंच असतं तर ह्या व अश्या इतर सगळ्या चित्रपटांत प्रेमकहाणीला घुसडता आलंच असतं. पण ते केलं गेलं नाही. चरित्रपटांची जी एक लाट सध्या आली आहे तीसुद्धा म्हणूनच. चित्रपटात प्रेमकहाणी नसली, तरीही तो व्यावसायिक यश मिळवू शकतो, हा विश्वास आल्यामुळेच उत्तमोत्तम तसेच नवोदित दिग्दर्शकही चरित्रपट बनवत आहेत आणि ते यशस्वीही ठरत आहेत. नाही म्हणता, मध्येच एखादा 'रांझणा' येतो, जो एक अस्सल प्रेमकहाणीच असतो. पण तो अपवादच. किंवा एखादा 'लंच बॉक्स' येतो. पण तोही वेगळेपणामुळेच लक्षात राहतो.
हे सगळं कशाचं द्योतक आहे ?
ह्याचंच की, 'प्रेम' ही गोष्ट आताशा Just another thing झालेली आहे. आजच्या पिढीसाठीही. किंवा असं म्हणू की आजच्या त्या उप-पिढीसाठी, जिचा तू आणि मी कदाचित भाग नाही आहोत ! दिसतील. आजही कुणाच्या प्रेमासाठी वेड्यासारखे वागणारे प्रेमवीर दिसतील. ही जमात नामशेष होणार नाहीच. पण तिची संख्या कमी झाली आहे.

मला असं वाटतं, साधारणत: 'दिल चाहता है' ह्या २००१ सालच्या चित्रपटानंतर चित्रपटांत बराच बदल घडला आहे. ती कहाणी तीन मित्रांची होती. आमीर खान एक फ्लर्ट, जो दर वीकेंडला गर्लफ्रेंड बदलत असावा. सैफ अली खान एक गोंधळलेला नवतरुण, जो दर काही महिन्यांनी कुणा न कुणाच्या प्रेमात मनापासून पडत असावा. आणि अक्षय खन्ना, कलाकार असलेला, हळव्या मनाचा, सभोवतालच्या प्रत्येक चीजवस्तूकडे, व्यक्तीकडे संवेदनशीलपणे पाहणारा. अक्षय खन्नाचं त्याच्या जवळजवळ दुप्पट वयाच्या डिम्पल कपाडियाच्या प्रेमात पडणं, जे ह्या चित्रपटात दाखवलं आहे, तो हिंदी चित्रपटासाठी एक 'कल्चरल शॉक'च होता. पण ज्या विश्वासाने आपल्या पहिल्याच चित्रपटात दिग्दर्शक फरहान अख्तरने ही कहाणी सादर केली, त्यामुळे ती लोकांपर्यंत तर पोहोचलीच; पण इतर चित्रपटकर्त्यांनाही एक दृष्टी मिळाली की असा वेगळा विचार करूनही व्यावसायिक चित्रपट बनू शकतो. त्यानंतर पुढे 'प्रेम' ह्या संकल्पनेला सर्वांनीच एक तर उंच आकाशात बिनधास्त विहार करणाऱ्या पतंगाप्रमाणे मोकळं सोडलं किंवा चित्रपटाच्या दुचाकीच्या 'बॅक सीट'वर बसवलं. रायडींग सीटवर इतर राजकीय, सामाजिक, आर्थिक, मानसिक, वैयक्तिक समस्या आल्या, त्यांच्या कहाण्या आल्या. 'रायडर'चं लक्ष रस्त्यावर राहिलं आणि 'बॅक सीट'वर बसलेलं प्रेम एक तर पूर्णपणे शांत राहिलं किंवा परत खुल्या हवेचा आनंद बिनधास्तपणे घेऊ लागलं. पूर्वी शहरातल्या मुलीही स्वत:च्या अफेअर्सची खुलेआम चर्चा करत नसत. सामान्य मुलींचं सोड रे. सिनेतारकाच पहा की ! ऐश्वर्या आणि सलमानचं नातं जगजाहीर असतानाही कधी ऐश्वर्याने त्याची बिनधास्त कबुली दिली ? ते नातं दोघांकडून होतं की नाही, हे माहित नाही. पण नक्कीच काही तरी शिजतच होतं, ह्याची खात्री झाली जेव्हा सलमानने दारुच्या नशेत धिंगाणा केला. इंटरनेटवर जरासा शोध घेतला तर जुन्या जुन्या तारे-तारकांच्या प्रेमसंबंधांच्या अनेक कहाण्या वाचायला मिळतील. पण हे सगळं नेहमीच गुलदस्त्यात ठेवण्यात येत असे. मात्र आजची दीपिका पदुकोण 'My choice' चा नारा लावून स्वत:चे आयुष्य स्वत:च्या मर्जीने जगते. ती रणबीरशी अफेअर असताना शरीरावर त्याचं नाव गोंदवून घेते. ते नातं संपवल्यानंतर रणवीर सिंगसोबत जोडलेल्या नव्या नात्यालाही लपवून ठेवत नाही. कतरिना कैफ आणि रणबीर कपूर तर एकत्र राहतात. अनुष्का शर्माही विराट कोहलीसोबतचे आपले संबंध सर्वांसमोर येऊ देते.
'हे काय वय आहे का लग्नाचा निर्णय घेण्याचं ?' असं आजची मुलं स्वत:च म्हणतात. पूर्वी हा डायलॉग आई-बाप मारायचे. ही मुलं प्रेम करतात पण पुढचा निर्णय मात्र विचारपूर्वक घेतात. हाच बदल चित्रपटांत परिवर्तीत होतो आहे. पुन्हा एकदा सांगतो, कुणामध्ये कुणामुळे बदल झाला हे विचारमंथन स्वतंत्र करू. पण दोघांतही बदल झाला आहे, हे नक्कीच !

लगेच इतका चिंताक्रांत होऊ नकोस, मित्रा. पण बदलत्या काळासोबत बदलायला हवं. कारण कालबदल हा उतारावरून गडगडत येणारा एक मोठा धोंडा आहे. तू आणि मी फक्त त्याच्या रस्त्यातून बाजूला होऊ शकतो.
'प्रेम' ही काही नामशेष होणारी बाब नाही. ते शाश्वत आहे. इतर बाबी येतील आणि जातील, पण जोपर्यंत माणसाच्या भावना शाबूत आहेत, जोपर्यंत त्याचा 'रोबो' होत नाही तोपर्यंत तो प्रेम करतच राहील. त्याचं महत्व कमी होईल इतकंच. स्त्री आणि पुरुष दोघांना एकमेकांची मानसिक व शारीरिक गरज असणे, हा निसर्गनियम आहे. तो पिढ्यांच्या उप-पिढ्या पडल्याने बदलणार नाही. तो नियम पाळायचा की नाही, हा व्यक्तिगत निर्णय असला, तरी समुदायाचा कल हा नियम पाळण्याकडेच असणार आहे. त्याच्या तऱ्हा, वेळा बदलतील. प्रेम प्रत्यक्ष आयुष्यातही केलं जाईल आणि चित्रपटांतही दाखवलं जाईल. फक्त ते तू केलंस, त्यापेक्षा जरा वेगळं असेल. आजची 'नवतरुणाई' करतेय, त्यापेक्षा उद्याची वेगळ्या प्रकारे करेल. कारण आज सर्वमान्य, सर्वप्रिय असलेली कोणती संकल्पना उद्या मोडीत निघेल सांगता येत नाही ! ही गती इतकी प्रचंड आहे की आनंद बक्षी साहेबांच्या शब्दांत सांगायचं तर -

आदमी ठीक से देख पाता नहीं
और परदे से मंज़र बदल जाता हैं !"

घरी पोहोचलो. मन-मित्राचा घसा अखंड बडबडीने कोरडा पडला असावा. आता ताबा डोक्याने घेतला. 'हम दिल दे चुके सनम' पासून ते अगदी काल-परवा आलेल्या 'तनू वेड्स मनू - रिटर्न्स' पर्यंतचे चित्रपट आठवले, त्यातली पात्रं आठवली. खोलवर समुद्रात उठलेल्या उंच लाटेने किनाऱ्यावर येईपर्यंत रेतीत मिसळून जावं, तसं काहीसं वाटलं. डोळ्यांसमोरून झरझर करत अनेक चित्रपट सरकले. 'सोचा ना था', 'लाईफ इन अ मेट्रो', 'रॉक स्टार', 'दम लगा के हैश्या' अश्या काही वेगळ्या धाटणीच्या प्रेमकहाण्या आठवल्या. ह्या सगळ्या पात्रांचे प्रॉब्लेम्स वेगळे होते. पण होत्या प्रेमकहाण्याच. हाताळणी वेगळी होती. पण होतं सगळं 'सच्चं'च.
माझ्या जन्माच्याही आधी एक चित्रपट आला होता. 'एक दुजे के लिये'. त्यातले कमल हसन आणि रती अग्निहोत्री अखेरीस आत्महत्या करतात. मला इतकंच माहित आहे की त्या नंतर लोकांमध्ये अश्याप्रकारे एकत्र आत्महत्या करण्याचंही वेड पसरलं होतं. ते त्या वेळीही वेडच मानलं गेलं असेल आणि आजही तसंच मानलं जाईल. पण आज कुणी असला फिल्मी बाष्कळपणा करेल असं वाटत नाही. एरव्ही आयपीएल क्रिकेटपासून यो यो हनी सिंगपर्यंत सामान्य व अतिसामान्य दर्ज्याच्या कलागुणांत रमणारी आजची पिढी ही मागल्या कैक पिढ्यांपेक्षा स्वत:च्या आयुष्याबाबत, भविष्याबाबत खूप जागरूक आहे. ती 'तेरे नाम' मधल्या सलमानमुळे प्रभावित होईल, त्याची नक्कल म्हणून 'पोमेरीयन'सारखी हेअर स्टाईल करतील, पण अपयशी प्रेमाच्या दु:खात जीव देणार नाहीत.

तसं पाहिलं, तर आजही जेव्हा एखादा स्टारपुत्र किंवा एखादी स्टारकन्या पदार्पण करते किंवा त्याचं वा तिचं पदार्पण करवलं जातं तेव्हा 'लव्ह स्टोरी' च निवडली जाते. कारण आजही 'लव्ह स्टोरी' हा बॉक्स ऑफिसवर 'सेफ गेम'च आहे. पण ती करताना वाहवत गेलेला दिग्दर्शक 'लाफिंग स्टॉक' होण्याचीच शक्यता जास्त. कुतूहलापोटी त्या नव्या चेहऱ्यांना लोक पहिल्यांदा पाहतीलही, पण जर त्यांनी अजून एखादा चित्रपटही हाच बाष्कळपणा केला, तर हृतिकच्या 'कहो ना प्यार है' नंतर त्याच 'हृतिक-अमिषा'च्या 'आप मुझे अच्छे लगने लगे' चं जे झालं, तेच होईल. कारण जमाना 'गर्ल नेक्स्ट डोअर'चा असला तरी, 'चॉकलेट बॉय' इमेजचा राहिलेला नाही.
'रोमिओ-ज्युलियेट' सारखं प्रेम दाखवणारा संजय लीला भन्साळीचा 'राम-लीला' मी जेव्हा पाहिला होता, तेव्हा हादरलोच होतो. हा कसला थिल्लरपणा आहे, हे माझं तेव्हाचं मत आजही कायम आहे. ते प्रेम मला प्रेम न वाटता वासनाच वाटली होती. पहिल्याच भेटीत, ओळख-पाळख तर सोडाच, नावही माहित नसताना शारीरिक जवळीक, नंतरचे सगळे संवादही अश्लीलतेकडे झुकणारे, हे सगळं मला भन्साळीकडून, ज्याने 'हम दिल दे चुके सनम' सारखी 'शालीन' प्रेमकहाणी दाखवली होती, अपेक्षित नव्हतं. पण कदाचित भन्साळीची दृष्टी बरोबरच असेल. कारण आजचा लोकप्रिय प्रियकर आहे 'इम्रान हाशमी'. त्याचं प्रेम जितकं 'उत्कट' आहे, तितकंच सापेक्षही. त्यात शारीर संबंधांना आडकाठी नाही. 'प्रेमात वासनेलाही जागा असते' असा विचार करणारा, प्रत्येकाने मनात स्वत:च्याच नकळत जपलेला प्रियकर आजकाल पडद्यावर येऊ लागला आहे कारण तो मनातून बाहेर प्रत्यक्ष आयुष्यातही येऊ लागला आहे. 'प्रेमानंतरची पुढची अपरिहार्य पायरी 'लग्न' असते', ही समजूत आता उरलेलीच नाही. 'रील' आणि 'रियल' दोन्ही 'लाईव्स'मध्ये !

आता मला चित्रपट आणि समाजात एक वेगळंच नातं जाणवायला लागलं. 'गुन्हेगार' आणि 'कायदा' हे ते नातं. गुन्हा करायच्या पद्धती जसजश्या प्रगत होत गेल्या, तसतसा कायदाही शहाणा होत गेला आहे. विशिष्ट प्रकारच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी खास कायदे जन्माला येतात किंवा अस्तित्वात असलेल्या कायद्यात बदल केले जातात. कधी हे बदल, गुन्ह्याच्या एक पाउल पुढचे असतात तर कधी त्याच्या मागोमाग, त्याच्या जोडीने असतात. 'चित्रपट' हा तो 'कायदा' आहे, जो 'समाज' कुठे चालला आहे, हे पाहून आपलं पाउल टाकतो. कधी समाजाच्या एका पाउलासोबत चित्रपट दोन पाउलं टाकतो, कधी त्याच्या जोडीने एकच. कायद्यातील पळवाटा शोधून नवनवे गुन्हे करण्याच्या क्लृप्त्या काढल्या जातात, तद्वतच चित्रपटातून 'योग्य' तो बोध घेऊन समाज आपली दिशाही ठरवत असतो.
'समाज' आणि 'चित्रपट' = 'गुन्हेगार' आणि 'कायदा'
ह्या जोड्या परस्परांकडून खूप काही शिकतात. चित्रपटाने समाजाला आणि समाजाने चित्रपटाला 'प्रेम' शिकवलं आहे. एकमेकांनी, एकमेकांची घेतलेली ही शिकवणी नेहमीच चालू राहणार आहे.
मित्र बरोबर बोलत होता. 'बदल' झाला आहे, 'अस्त' किंवा 'अंत' नाही. कारण आजचा तरुण जेव्हा जावेद अख्तर साहेबांच्या शब्दात बोलतो तेव्हा तो बोलतो -

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम
नजर में ख्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम


आजही इथे 'दिलो में' आहे, 'दिमागों में' नाही. म्हणजे आजही 'दिल'ला महत्व आहेच. पूर्वीपेक्षा कमी असलं तरी काय झालं ?

- रणजित पराडकर

Tuesday, September 01, 2015

थेंब

रात्रभर पडलेल्या पावसानंतरची ओलीचिंब सकाळ किंवा रंगात आलेल्या हिवाळ्यातली दवभिजली सकाळ म्हटल्यावर मला माझ्या लहानपणीचं बदलापूर आठवतं. नागमोडी रस्ते, लहान-मोठी घरं, छोट्या टेकड्या, पायवाटा, धुकं, शिवारं, फुलपाखरं, पक्षी आणि 'थेंब'. पावसाचे किंवा दवाचे.

पावसाच्या ३-४ महिन्यांत जमिनीचा एक चौरस मीटर तुकडासुद्धा कोरडा दिसत नसे त्या काळी. दररोज किमान एक सर आणि दर २-३ दिवसांत एकदा मुसळधार, हा तर पावसाचा ठरलेला रतीबच होता.
आमचं घर तसं गावाबाहेर होतं. छोटंसं, टुमदार, स्वतंत्र. तुरळक वस्ती आणि आजूबाजूला पसरलेला विस्तीर्ण मोकळा माळ. जिथे पावसाच्या पहिल्या थेंबाबरोब्बर इवले इवले पोपटी अंकुर जमिनीतून डोकं वर काढायचे आणि ३-४ चार जोरदार सरी झाल्या की सर्वदूर हिरवागार गालिचा पसरायचा. दूरवर असलेल्या डोंगरावरून ओघळणाऱ्या छोट्या-मोठ्या झऱ्यांच्या बारीक रेषा मला तेव्हा बाबांच्या काळ्याभोर केसांमध्ये असलेल्या काही पांढऱ्या शुभ्र केसांसारख्या वाटत असत, का कुणास ठाऊक ! शाळेला जाताना पाऊस आला की मला प्रचंड आनंद होत असे. पायांत गमबूट आणि डोक्यापासून पोटरीपर्यंत येणारा एक सलग रेनकोट घालून मी आणि ताई चालत चालत शाळेत जायचो. तेव्हा काही स्कूल बस वगैरे नव्हत्या आणि रिक्शाही. घरापासून आमची शाळा ३-४ किमी. तरी असावी. चिखल, पाणी, तुडवत फताड फताड करत जायला जाम मजा यायची. भिजूनही कोरडं राहण्याचा आनंद मला तेव्हापासून माहित आहे.
पावसाळ्यानंतर 'ऑक्टोबर हीट' असते हा आजकालचा शिरस्ता असावा किंवा कदाचित त्या काळीही असेल, पण मला तरी कधी ती 'हीट' जाणवली नाही. पावसाची एक कुठली तरी सर जाता जाता मागे स्वत:चा गारवा शिडकावून जायची. तो गारवा पुढचे तीन-चार महिने कमी होत नसे असंच मला आठवतंय. मग माळ्यावरच्या बॅगेत, कपाटाच्या सगळ्यात वरच्या कप्प्यात, दिवाणाच्या पोटात ठेवलेले गोधड्या, शाली, स्वेटर बाहेर यायचे. जोडीला आत्याने विणलेला एखादा नवीन स्वेटरही असे.
रात्रीचं जेवण झाल्यावर नळाच्या थंड पाण्याखाली हात धुण्यासाठी कसेबसे धरवत असत. ते पाणी थंड म्हणजे बर्फाचंच वाटायचं ! त्याने गारठलेले हात कोरडे करून मी २-३ मिनिटं कुल्ल्याखाली ठेवून दिवाणावर बसत असे, गरम व्हावेत म्हणून ! मग पाठीवरच्या कवचाच्या आत कासव किंवा गोगलगाय जशी शिरते तसा माझ्या आवडत्या पांढरट गुलाबी शालीला बाहेरून एक गोधडी किंवा ब्लँकेट जोडून मी शिरत असे.
पावसाळी पहाट असली तर बाहेर थेंबांची टपटप असे आणि हिवाळी पहाट असली तर धुक्याचा कापूस आणि दवाची रांगोळी. ह्या सगळ्यांच्या जोडीला पक्ष्यांची किलबिल, हवाहवासा गारवा आणि शालीची ऊब ! (तेव्हा चिमण्या असायच्या. एखादी तर घरातही शिरायची. पण ते बहुतकरुन दुपारी वगैरे.) मग कानाला जाणवायचा आईचा आवाज. आई रियाझाला बसलेली असायची. मी तडक शाल घेऊन तिच्याकडे जात असे आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून माझी झोपेची दुसरी इनिंग सुरु करत असे. अर्धवट झोपेत मी आईचा रियाझ ऐकत ऐकत खिडकीबाहेरच्या पन्हाळीवर रांगणारे किंवा झाडाच्या फांदीवरून पाऊस पडून गेल्यानंतर ओघळणारे किंवा त्याच डहाळीच्या पानांवर तरळणारे दवाचे थेंब पाहत असे. पावसाचं पाणी असेल तर ते टप्पकन् पडे. दवाचा थेंब मात्र मला आजीने सांगितलेल्या बेडकीण आणि बैलाच्या गोष्टीतल्या बेडकीणीसारखा टम्म फुगलेला वाटे. पण तो फुटतच नसे. मग मी उठून तो थेंब फोडायला जायचो, तर तिथे थेंबांची एक मोठ्ठी कॉलनी दिसे, अनेक पानांवर पसरलेली ! 'माझा' थेंब कोणता होता, हेच कळत नसे. मग खिडकीबाहेर हात टाकून ती फांदी हलवून किंवा सर्रकन् हात फिरवून सगळे थेंब फर्रकन् उडवून टाकायचे !
थेंबांचं, मग ते पावसाचे असोत वा दवाचे, माझ्याशी काही तरी खास नातं होतं. पण ते नक्की काय होतं, हे मला समजायचं नाही. त्यातलं सौंदर्य नेमकं काय आहे किंवा 'हे सौंदर्य आहे' हेच मला जाणवत नसावं.
लुडलुड हलून मंद गतीने एक एक करून टपकणारे थेंब, मोत्यांच्या तुटलेल्या सरीतून सुर्रकन् सुटणाऱ्या मोत्यांसारखे थेंब, पानांवर निवांत पडून एक टक बघत बसणारे संयमी थेंब, व्हरांड्याच्या किंवा बाल्कनीच्या कठड्यावर थिजणारे, जिरणारे, ओघळणारे थेंब, हात गारठवणारे, नजरेला गोठवणारे थेंब, अंगावरून निथळणारे थेंब. ह्या थेंबांची भाषा मला खूप नंतर कळली. अगदी आत्ता आत्ता.

मध्यंतरी ऑफिसमध्ये क्रिकेट स्पर्धांची घोषणा झाली. ऑगस्टचा महिना होता. स्पर्धा जानेवारीत होती. वेगवेगळ्या 'युनिट्स'ने स्वतंत्र किंवा एकत्र येऊन आपापले संघ ठरवले. वेगवेगळ्या वेळी, निरनिराळ्या जागांवर सर्वांचा सराव सुरु झाला. नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत सरावाने चांगलाच जोर धरला होता. मी रोज सकाळी सहा ते साडे सात क्रिकेट खेळत होतो. दीड तासापैकी साधारण अर्धा-पाउण तास तरी मी रोज बोलिंग करत असे. घरी येईपर्यंत एक हवाहवासा थकवा जाणवत असे. पाच मिनिटं पंख्याखाली बसून, बाटलीभर थंड पाणी पिऊन मग गरमागरम पाण्याने अंघोळ.
थकलेल्या अंगावर गरम पाण्याचे तांबे म्हणजे एक स्वर्गीय आनंदच ! बादलीत शेवटच्या ३-४ तांब्यांचं पाणी उरलं की ती बादलीच डोक्यावर उलटी करायची आणि मान खाली घालून दोन मिनिटं शांत बसून राहायचं.
तेव्हा कळलं की प्रत्येक थेंब काही तरी कुजबुजत असतो. काहींची कुजबुज ऐकू येते, काहींची नाही. ऐकू आलेली कुजबुज एकाक्षरी किंवा फार तर एका वाक्याची असते. त्याचा अन्वयार्थ लावेपर्यंत दुसरा थेंब कुजबुजतो. मुंग्यांची रांग पाहिलीय ? प्रत्येक मुंगी समोरून येणाऱ्या मुंगीच्या तोंडाला तोंड किंवा कानाला तोंड लावुन काही तरी कुजबुजते आणि दोघी आपापल्या दिशेला क्षणार्धात पुढे रवाना होतात. मुंग्यांचं गुपित मुंग्यांना ठाऊक आणि थेंबांचं गुपित थेंबांना !

हृषीकेश मुखर्जींच्या 'आनंद' मध्ये राजेश खन्ना म्हणतो की, 'प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर असतो आणि रिसीवरही. एकमेकांकडून एकमेकांकडे सतत काही अदृश्य लहरी जात असतात !'
निसर्गाकडून माणसाकडे येणाऱ्या दृश्य लहरी म्हणजे हे थेंब असावेत बहुतेक ! झाडावरून ओघळणारे, पन्हाळीवरून रांगणारे, पानांवर, कौलांवर, कठड्यांवर खिदळणारे थंडगार थेंब आणि अंगावरून निथळणारे, गालांवरून ओघळणारे कोमट थेंब सगळे सगळे साठवता आले पाहिजेत. त्यांच्या कुजबुजीचा कल्लोळ करवता आला पाहिजे. त्या कल्लोळातून काही हाती लागेल, काही नाही लागणार. पण जे लागेल त्यात कवितेसाठी आयुष्यभर पुरेल इतका ऐवज असेल.

थेंबाचा व्हावा शब्द
शब्दाला ओघळछंद
थेंबांची कुजबुज व्हावी
शब्दांनी अक्षरबद्ध

- असं वाटत राहतं. पण कुणास ठाऊक हे शक्य आहे की नाही ! बहुतेक नाहीच.
ओंजळीच्या बाहेरचे थेंब आणि ओळींच्या बाहेरचे शब्द टिपणारा टीपकागद होण्यासाठी बहुतेक तरी परत लहान व्हावं लागेल आणि आईचा रियाझ सुरु असताना तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपेची दुसरी इनिंग खेळायला लागेल.

तोपर्यंत सभोवताली विखुरलेले, थिजलेले, वाहून जाणारे, घरंगळणारे शब्द फक्त पाहत बसायचे. कारण पन्हाळ असलेली खिडकी, खिडकीतून डोकावणारी झाडं, धुक्याच्या चादरी, दवाची शिंपण वगैरे गोष्टी आता 'कोणे एके काळी' ह्या सदरात मोडतात. पाऊस आणि थंडी तर समतोल बिघडल्याशिवाय येत नाहीत आणि नळाला २४ तास सोलर हीटरचं गरम पाणी असल्याने हातही गारठत नाहीत.

मला एक टाईम मशीन हवंय..! ट्रान्समीटर आणि रिसीवर माझ्यात आहेतच, बहुतेक !
कारण -

असतात काही सांडलेले शब्द माझ्याभोवती
ज्यांना कधी ओळींमधे जमलेच नाही मावणे

....रसप....

(पूर्वप्रसिद्धी - मासिक 'श्री. व सौ.' -ऑगस्ट २०१५)

Thursday, June 18, 2015

'अ‍ॅक्टिंग'चा कीडा

काल संध्याकाळी धो-धो पाऊस पडत असताना मला इस्त्रीला दिलेले कपडे आणायला दुकानात जावं लागलं, तेव्हा अचानकच त्याची आठवण आली.

'तो' रोज संध्याकाळी सहा ते आठच्या दरम्यान यायचा. कॉलनीतल्या आसपासच्या पन्नास एक बिल्डींग्सपैकी किमान पंचवीस बिल्डींग्समध्ये तरी तिसऱ्या मजल्यापर्यंत जाऊन इस्त्रीचे कपडे घ्यायचा किंवा परत द्यायचा. सोबत एक सायकल तिला एक कपड्यांचं मोठं बोचकं. येताना एकच असायचं. जाताना ते बोचकं जितकं कमी होईल तितकंच एक अजून तयार होत असे. घेउन आलेलं बोचकं अर्थातच इस्त्री केलेल्या कपड्यांचं आणि वाढलेलं, नव्याने इस्त्रीसाठी घेतलेल्या कपड्यांचं. आज नेलेले कपडे उद्या परत, घरपोच.

साधारण विशीच्या आसपास असेल तो. आमच्यापेक्षा ४-५ वर्षं मोठाच. पण आम्ही खूप खेचायचो त्याची.
त्याला 'अ‍ॅक्टिंग'चा जाम कीडा होता. तो कपडे घेउन येताना दिसला की आमचा प्लान शिजायचा. मग कधी त्याच्या हेअरकटची, कधी कपड्यांची, कधी 'स्टाईल'ची तारीफ करायची, कधी त्याला अजून काही तरी किल्ली मारायची की तो लगेच एखादा अमिताभ, शाहरुख, संजय दत्त, अनिल कपूर दाखवायचा. पंधरा-वीस मिनिटं, अर्धा तास आमच्यात वेळ घालवल्यावर त्याला धंद्याची आठवण व्हायची, की तो लगबगीने समोरच्या बिल्डींगमध्ये जायचा. लॉबीतल्या खिडकीतून आमच्याकडे बघून तिथूनही केसांतून हात फिरवून, हवेत हातवारे करून अदाकारी दाखवायचा. तो मनापासून करत असलेल्या सादरीकरणाची तितक्याच मनापासून खिल्ली उडवण्याइतपत नालायकपणा आमच्यात होताच, पण तो त्याला समजूही न देण्याचा लबाडपणाही आम्ही अंगी बाणवला होता.

नितीश भारद्वाजसारखा दिसायचा जरासा. चेहऱ्यावर तसंच 'कृष्णा'सारखं स्मितही हसायचं. फरक एकच होता. नितीश भारद्वाजच्या कृष्णाच्या चेहऱ्यावरचं स्मित सर्वज्ञाची झळाळी दाखवायचं, तर ह्याच्या चेहऱ्यावरचं स्मित अज्ञानातील आनंदाची. त्याची खेचुन झाल्यावर आम्ही त्याला 'बिचारा' म्हणायचो, पण त्या अपराधी भावनेचा फोलपणा आमच्या तेव्हा लक्षात येत नव्हताच. एकट्या अभ्याला येत असावा बहुतेक. कारण तो कधीच त्याची मस्करी करायचा नाही. अभ्या स्वत:सुद्धा चांगला नक्कलाकार असल्याने असेल कदाचित. कित्येकदा तो त्याला आमच्यातून ओढून बाहेरही काढायचा आणि त्याच्या कामावर जायला लावायचा.

अभ्याला त्याने त्याची कहाणीसुद्धा सांगितली होती.
उत्तर प्रदेशातून आला होता तो. घरची परिस्थिती विशेष काही नव्हती. घरची परिस्थिती चांगली नसलेले उत्तर प्रदेशातील बहुतांश लोक जे करतात, तेच त्याच्या आई-वडिलांनी केलं. त्याला शहरात पाठवायचं ठरवलं. 'कानपूर, अलाहाबाद, लखनऊ, दिल्ली, कोलकाता कुठेही जाणार नाही, गेलो तर मुंबलाच जाईन', असं त्याने ठणकावून सांगितलं. कारण ? 'अ‍ॅक्टिंग'चा चसका ! 'मुंबईला आलो की पिक्चरमध्ये गेलोच' ह्या फिल्मी विचाराने पछाडलेला तो कुठल्या तरी दूरच्या नातेवाईकाकडे मुंबईला आला आणि त्या नातेवाईकाने त्याला स्वत:च्या कामावर जुंपला.
सुरुवातीला तो अभ्याला विचारायचा, जुहूला कसं जायचं ? बॅण्ड स्टॅण्डला कसं जायचं ? पाली हील कुठे आहे ? ताज महाल, ओबरॉय हॉटेलला जाता येतं का ? (त्याला मुंबईत येतानाच 'ताज महाल हॉटेल' हे नाव माहित होतं आणि तिथे झाडून सगळे फिल्म स्टार्स रोज रात्री येत असतात, असंही वाटत होतं. पण कुठून तरी त्याला असं कळलं होतं की त्याच्या आसपासच्या भागात जाण्यासाठी 'स्पेशल पोलीस परमिशन' घ्यायला लागते !) एकदा अभ्या त्याला 'प्रतीक्षा'ला घेऊन गेला. तिथे गेल्यावर हा पठ्ठ्या परत यायला तयारच होईना ! अमिताभला बघितल्याशिवाय जायचंच नाही म्हणे. कसंबसं परत आल्यावर मात्र अभ्याने कानाला खडा लावला, पुन्हा कुठे घेउन जाणार नाही. फार तर सांगीन कसं जायचं ते, बस् !
मग हळूहळू कामाच्या रगाड्यात आणि बहुतेक नातेवाईकाने टाकलेल्या प्रेशरमुळे त्याची हौस कमी कमी होत संपून गेली. 'अ‍ॅक्टिंग'चा कीडा आम्ही फरमायीश करण्याची वाट पाहत वळवळत असायचा. तो आणि त्याचा कीडा दोघेही बिचारेच होते.

त्याच्या घरोघर जाऊन कपडे घेण्या-पोहोचवण्यामुळे कॉलनीतल्या आळशी पिअक्कड इस्त्रीवाल्याचा धंदा मात्र बसला.
एक दिवस संध्याकाळी धो-धो पाऊस पडत असताना, दाराची बेल वाजली. मी दार उघडलं. 'तो' होता.
रडवेल्या सुरात तो म्हणाला, 'रणजित भाय, ज़रा देखो ना.. यह मुझे परेशान कर रहें हैं. बोलते हैं इधर वापस आना नहीं. मैं अभिजित भाय के घर पे गया, ताला हैं. मेरी मदद करो. इनको बोलो ना ज़रा..!!'
मी. वय १५-१६. उंची जेमतेम ५ फुट. पडवळासारखे दंड. आणि तो माझ्याकडे मदत मागत होता.
तरी मी बाहेर येऊन पाहिलं. कॉलनीतला इस्त्रीवाला तारवटलेल्या डोळ्यांनी माझ्यावर धावून आला. इतक्यात त्याच्याबरोबरच्या एकाने त्याला थांबवलं. मला खूण केली की 'मी पाहून घेतो.' आणि त्याला गळ्यात हात टाकून घेउन गेला.
पाऊसही पडत होता. मी काही करूही शकत नव्हतोच. मी त्याला टिपिकल मध्यमवर्गीय डरपोक सल्ला दिला.
'अभी वोह गया हैं. तुम्हारा कुछ और काम हो, तो रहने दो उसे. पहले यहाँ से निकलो और अपने मामाजी को जा के बता दो.'
बुडत्याला काडीचा आधार वाटतो. त्याला माझ्या पुचाट सल्ल्यातून आधार मिळाला आणि तो मला हात जोडून thank you म्हणून निघून गेला.
त्या रात्रीच मामाजी आणि ४-५ जण कॉलनीतल्या इस्त्रीवाल्याची 'भेट' घेउन गेले. चार दिवसांनी 'तो' परत आला. पुन्हा आधीसारखा धंदा सुरु झाला होता. पण नंतर आम्ही घर बदललं. गव्हर्न्मेंट क्वार्टर होतं ते. मोठं क्वार्टर अलॉट झालंच होतं. आणखी काही दिवसांनी पुन्हा घर बदललं आणि नंतर शहरच बदललं.
अभ्यानेही खरं तर कॉलनी सोडली. पण त्याला बरीच 'खबरबात' असते म्हणून मध्यंतरी एकदा त्याला विचारलं होतं की, 'तो' काय करतो ?
फिल्म सिटीत कुठल्या तरी स्टुडीओत हेल्परचं काम करतो म्हणाला.
आधी वाईट वाटलं. पण मी 'तो' जितका ओळखला, त्यावरून तरी हे चांगलंच झालं होतं. कधी तरी अमिताभ त्याला नक्की दिसेल किंवा आत्तापर्यंत दिसलाही असेल !

त्याचं नाव ? काय करायचंय नाव ?
त्याच्यासारखे किती तरी जण ह्या मुंबईने ओढून घेतले आहेत. कोळ्याच्या जाळ्यात कीडा अडकतो, तसे हे 'अ‍ॅक्टिंग'चे कीडे मुंबईत अडकतात. कोळी कीडा गिळतो, मुंबई असे अनेक 'तो'.

इस्त्रीच्या दुकानात पोहोचलो. कपडे घेईपर्यंत पाऊस थांबला होता. थांबणारच ! तो मुंबईचा थोडीच होता ?

- रणजित पराडकर

प्रसिद्धी - मासिक 'श्री. व सौ.' 

Tuesday, April 28, 2015

ह्या लेखाला शीर्षक नाही

बराच विचार करून व जबाबदारीने काही लिहितो आहे. ह्यात कुणाला दुखावण्याचा हेतू नाही. काही चुकल्यास सांगावे. कमी-जास्त झाल्यास समजुन घ्यावे आणि हे काही न करता जर डोक्यात राख घालूनच घ्यायची असेल तर तसंही करावे. कारण मी माझं मत मांडणारच !

गेल्या काही महिन्यांत असं दिसून आलं आहे की खूप मोठ्या प्रमाणात 'गझल' हा काव्यप्रकार हाताळला जातो आहे. ही तसं पाहिलं तर चांगली गोष्ट आहे. कारण ultimately एका अत्यंत सुंदर काव्यप्रकाराचा प्रसार होतो आहे. तो सर्वदूर पोहोचतो आहे. त्याची वाढ होते आहे.
पण ही खरोखर 'वाढ' आहे की 'सूज' आहे, ह्याचा विचार करायला हवा, असं मला वाटतं.

माझ्या लक्षात आलेल्या किंवा असं म्हणू की मला संशय येतो आहे, अश्या काही गोष्टी मी इथे लिहितो :-

१. सोय - शेर लिहिणे, गझल लिहिणे हे अभिव्यक्तीची गरज म्हणून नाही तर शुद्ध 'सोय' म्हणून लिहिले जाणे. दोन ओळींत एखादा विचार मांडून झटक्यात मोकळं होता येतं. तीच जमीन पाळून पुढील दोन ओळींत दुसराच कुठला विचारही मांडला जाऊ शकतो. त्यामुळे माथापच्ची करत बसावी लागत नाही. एक कवी म्हणून स्वत:च्या मनाची झीज करावी लागत नाही किंवा कमी झिजावं लागतं. ह्यामध्ये प्रामाणिक नाईलाजही असतो काहींचा. धावपळीचं जग आहे. लोकांना घड्याळ्याच्या काट्यावर पळावं लागतं. ह्या ओढाताणीत, वाहतं पाणी ज्याप्रमाणे आपला उतार आपणच शोधून घेतं, तसंच त्यांची अभिव्यक्ती दोन ओळींची ही सोय हुडकून काढत असावी. इथवर ठीक आहे. पण असं सगळ्यांच्याच बाबतीत निश्चितच नाही. स्पष्टपणे सांगायचं झाल्यास, एरव्ही हा आळसाचा भाग झाला असावा. म्हणूनच मुसलसल गझला फारच कमी लिहिल्या जात आहेत.

२. लोकप्रियता - गझल हा अनेकविध कार्यक्रमांतून व जनमानसात त्याविषयी असलेल्या एक प्रकारच्या उदात्त व उच्च प्रतिमेमुळे लोकप्रिय काव्यप्रकार आहे. परखडपणे सांगायचं झाल्यास 'टाळ्या कमावणारी अभिव्यक्ती' आहे. शेराला मिळणारी दाद व कवितेला मिळणारी दाद ह्यांतला फरक सांगायची आवश्यकता नाही. ही दाद कवींना भुरळ पाडते आहे. त्यामुळे 'गझल' समजुनही न घेता गझल लिहिणारे लोक झालेले आहेत. अर्थात बहुतेकांची सुरुवात साधारण लिखाणापासूनच होते. आज जे कुणी श्रेष्ठ व अनुकरणीय गझलकार आहेत, त्यांनीही सुरुवातीला लिहिलेल्या गझला सामान्य असू शकतील किंवा आजही त्यांच्याकडून होणारं सगळंच लिखाण अत्युच्च प्रतीचंच असेल असंही नाही. पण झालं असं आहे की सामान्य लिहूनही, केवळ त्या संरचनेच्या आकर्षकतेमुळे त्या सामान्यत्वावर पांघरूण ओढलं जात आहे. काही लोक तर असल्या तोडक्या मोडक्या गझला घेउन मंचावर विराजमान होत आहेत आणि त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवलेलंही दिसतंय. उदा. - काही दिवसांपूर्वी मी एका व्यक्तीचा कुठल्याश्या राज्यस्तरीय मुशायऱ्यात सहभागी होऊन सन्मानचिन्ह घेतानाचा फोटो पाहिला. ही व्यक्ती अगदी काल-परवापर्यंत अत्यंत सदोष भाषेत सुमार कविता व चारोळ्या लिहित असे. मला आश्चर्यमिश्रित आनंद झाला म्हणून मी त्या व्यक्तीच्या गझला वाचण्यासाठी शोध घेतला. जे काही मला मिळालं, ते पाहून मला केवळ कीव आली.

३. गुरु-शिष्य - स्वयंघोषित गुरू (उस्ताद) ही कमी नाहीत ! काही वर्षांपूर्वी एका काव्यमेळाव्यात एका 'नामवंत' गझलकार व्यक्तीने, एका गुरुतुल्य व्यक्तीला 'माझा इस्लाह घ्या' अशी अप्रत्यक्ष सुचवणी माझ्यासमोर केली होती. त्यावेळी ती गुरुतुल्य व्यक्ती, मी व इतर काही स्नेही ह्या संभ्रमात पडलो की हसावं की चिडावं ! परंतु, आज असं दिसतंय की अनेक गुरुकुलं चाललेली आहेत. जरा कुणी 'गझल म्हणजे काय' असा विचार करणाराही दिसला की त्याला पंखाखाली घेण्यासाठी लोक तयार आहेत. हे उतावीळ उस्ताद त्या धडपडणाऱ्या कवी/ कवयित्रीला घाई-घाईने गझलेच्या डोहात उतरवत आहेत, ढकलत आहेत. आणि तो निरागस भाबडा जीवही जीवावर उदार होऊन गटांगळ्या खातो आहे. लोकांना इस्लाह देण्याची व घेण्याचीही खूप घाई झालेली आहे.

४. श्रेष्ठत्व - कुठे तरी अशी एक भावना आहे की 'गझल लिहिणे हे कविता लिहिण्यापेक्षा श्रेष्ठ आहे.' गझल लिहिणारा आणि ती वाचणारा दोघेही ही भावना मनात घेउन असतात. अनेक (जवळजवळ सगळ्याच) कवी/ कवयित्रींचा प्रवास 'कविता ते गझल' असाच सुरु आहे किंवा झालेला दिसतो. बहुसंख्य लोक एकदा गझल लिहायला लागले की कविता लिहित नाहीत. ह्या श्रेष्ठत्वाच्या आभासामुळेही अनेक जण गझलेकडे ओढले जात आहेत. तंत्रात बसवलेल्या १० ओळी लिहिल्या की त्यांना आपण खूप भारी काही केलं आहे, असं वाटायला लागतं. बढती मिळाल्याचा आनंद होतो. Ideally कविता व गझल हे दोन्ही समांतरपणे विकसित होणं, हे एका कवीमनासाठी आवश्यक आहे. दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही.

५. अनभिज्ञता - 'वृत्तात लिहिणं म्हणजे गझल लिहिणं', असा एक समज पसरला आहे किंवा असा एक संस्कार नकळतच अनेकांच्या मनावर झालेला आहे किंवा इथे पुन्हा आधी लिहिलेला 'सोय' हा मुद्दा आहेच. 'दोन ओळी वृत्तात लिहिणे आणि त्यांवर आशय-विषयाचे बंधन नसणे', ही चौकट खूपच सोयीची आहे. ह्या अनभिज्ञतेमुळे किंवा सोयीमुळे लोक कविता लिखाणाला सुरुवात केल्यावर काही काळानंतर गझलकडे वळतात. कविताही वृत्तात लिहिलेली असू शकते किंवा वृत्तात कविताही लिहिली जाते, हे त्यांना कदाचित लक्षातच येत नसते किंवा ते कालबाह्य आहे, असा समज असतो किंवा असं काही समोर सहसा येतच नसल्यामुळे 'हेही करता येईल का' असा विचार मनात येत नसावा किंवा सोय पाहिली जात आहे.
(काही गझलकार जेव्हा क्वचित कधी तरी कविता लिहितात तेव्हा ते मुक्त लिहितात ही कदाचित अभिव्यक्तीला पडलेली खीळ असावी कारण 'तिसरी ओळ' सुचतच नाही.)

६. कुरूप कविता - हे एक कडवट सत्य आहे की कविता कुरूप, अनाकर्षक झाली आहे. विषय व आशयाची विशिष्ट बंधनं कवितेवर लादली गेली आहेत. कविता सामाजिकतेच्या भल्यामोठ्या आभाळाचा एक छोटासा तुकडा तोडून, त्याला अंथरून तेच आपलं विश्व समजते आहे. ह्याच्या बाहेर विचार करणारे लोक साहजिकच स्वत:ला परग्रहवासी समजत आहेत आणि दुसरीकडे वळत आहेत. 'कविता' त्यांना रमवू शकत नाही आहे. प्रयोगशीलतेचा दुराग्रह नसावाच, पण प्रयोग करूच नये असाही दुराग्रह कसा बरोबर ? जाणून बुजून चौकटी झुगारल्या जात आहेत. ओठांवर रुळणारी, हृदयात घर करणारी कविता फार क्वचित लिहिली जाते. त्यामुळे तिचा चाहतावर्ग कमी झाला आहे.

------------
हे व असे अजूनही काही विचार आहेत. आत्ता इतकेच सुचले. ह्याव्यतिरिक्त काही विचार तुमच्याकडेही असतील. पण ह्या सगळ्यातून काही काळजीचे मुद्दे मला वाटतात :-

१. अति तेथे माती - ह्या घडीला माझ्या फेसबुक न्यूज फीडची स्थिती अशी आहे की जर माझ्यासमोर (चारोळ्या लिहिणाऱ्या बहुतेकांना मी अनफॉलो केलेलं असतं) १० वेगवेगळ्या कवी/ कवयित्री मित्रमंडळींच्या १० पोस्ट्स असतील तर त्यातील ४-५ तरी शेर किंवा गझला असतात. हे प्रमाण खूप जास्त आहे. स्पष्टपणे हेच दिसून येतंय की कवितेचे इतरही काही प्रकार असतात ते कुणाला माहितही नाहीत किंवा ते हाताळायचेच नसावेत. ज्या प्रमाणे अति संख्येने लोक कविता लिहायला लागल्याने सुमार कवितांचं पीक आलं आहे, त्याच प्रमाणे खूप जास्त प्रमाणात गझलही लिहिली जाऊ लागल्याने दर्जा साहजिकच खालावला आहे.

२. नीर-क्षीर विवेक - कवी/ कवयित्री त्यांच्या परीने त्यांचे विचार गझलेतून, शेरातून मांडतात. त्यात गझलेचा उद्गार कधी असतो, कधी नसतो. कधी तर त्यात तांत्रिक चुकाही असतात. पण मायेने पंखाखाली घेणारे उस्ताद लोक जबाबदारीने चुका दाखवत नाहीत की काय ? जिथे गुरुच्या अधिकाराने खडसावायची आवश्यकता असते, तिथे ते कुणी करत नसावेत की काय ? काही जाणकार व अधिकारी लोकांना वाईटपणा घ्यायचा नसतो. त्यामुळे चुकीचे, वाईट असे काही असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याकडे कल असतो. परिणामत: चुकीचं किंवा वाईट लिहिणारी व्यक्ती पुन्हा पुन्हा तेच लिहित राहते. कालांतराने तिच्यात सुधारणा होतही असेल, पण ती वेळीच होत नाही आणि ती होईपर्यंत अश्या लिखाणाची लागण इतरही काहींना होते.

३. चौफेर वाढ खुंटली - बहुतांश लोक 'कविता ते गझल' असाच प्रवास करत आहेत. ह्यांतले ९९% लोक तरी असे असावेत ज्यांनी फक्त मुक्त छंद कविता व गझल हेच दोन काव्यप्रकार हाताळलेले असतील. ("हाताळणे" म्हणजे ८-१० वेळा प्रयत्न केले, असं नसतं हे मी मानतो.) कवितेतील अनेकविध प्रकार त्यांना आकर्षित करत नाहीत. गझल लिहिणारे बहुतेक जण कविता लिहित नाहीत. स्पष्ट चित्र असं आहे की, 'कविता लिहिणे म्हणजे मुक्त लिहिणे किंवा फार तर अक्षरछंदात लिहिणे आणि वृत्तात लिहिणे म्हणजे गझल लिहिणे.' कवी एक तर कवितेत अडकला आहे किंवा गझलेत गुरफटला आहे. सर्व काव्यप्रकार हाताळणारे, आवड असणारे एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच लोक असतील. ह्यामध्ये असं दिसतंय की प्रचंड प्रतिभा असूनही काही जण एकाच कुठल्या तरी चौकटीत स्वत:च स्वत:ला बांधून/ कोंडून घेत आहेत.

४. दर्जा घसरणे - ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून असेल, पण कविता व गझल ह्या दोन्हीचा दर्जा इतका खालावला आहे की काही वाचावंसंही वाटत नाही आणि वाचावंसं वाटत नसतानाही वाचलं जातच असल्याने लिहावंसंही वाटत नाही ! वृत्तपूर्तीसाठी काहीही कवाफी जुळवले जाताना दिसतात, कुठल्याही रदीफांच्या शेपट्या लावलेल्या आढळतात आणि कसलीही जमीन कसली जाताना पाहण्यात येते.

-----------

माझ्या ह्या वाक्यावर सर्वांनी नीट विचार करावा अशी माझी विनंती आहे.
"गझल चारोळीच्या वाटेने चालली आहे."

चारोळीमुळे कवितेची अपरिमित हानी कशी झाली आहे, हे सगळ्यांच्या डोळ्यांसमोर आहे. गझलेमुळेही असंच काहीसं होणार आहे किंवा कदाचित होतही आहे. कारण 'गझल'च्या नावाखाली अकाव्यात्मक लिहिले जाण्याचे असंख्य नमुने सर्रास दिसत असतात. वाचल्यावर किळस वाटावी असं लिखाण 'गझल' ह्या गोंडस नावाने लिहिलेलं मी सहन केलं आहे. एक काव्यरसिक म्हणून मला हे चित्र खूप विदारक वाटत आहे. कविता विद्रूप झालीच आहे. गझलही विवस्त्र होते आहे. 'सत्य नग्न असतं' हे मला मान्य आहे. पण म्हणून नग्नतेचा आग्रह धरणं मात्र पटत नाही.

कविता म्हणजे 'पसरट लिखाण' आणि 'साचेबद्ध मिसरे' अश्या दोन बाजू असलेलं एक खोटं नाणं बनत चाललं आहे किंवा कदाचित बनलंच आहे. माझ्यासाठी कविता एक दोन बाजू असलेलं एखादं खरं/ खोटं नाणं नसून एक हीरा आहे. त्याला अगणित पैलू पडायला व पाडायला हवे.

------------

माझ्या ह्या विचारांशी सगळेच सहमत नसतील. काहींना ह्यात आक्षेपार्ह वाटेल. काहींना अपमानास्पद वाटेल. कुणी दुखावले गेल्यास मी क्षमा मागतो. मात्र जे लिहिलं आहे ते मनातलं लिहिलं आहे. हे माझं अवलोकन आहे. माझ्या जागेवरून जे दृश्य दिसत आहे त्याचंच हे वर्णन आहे.

असंही होईल की काही लोकांना माझं बोलणं पटेलही. त्यांनी ह्याला असंतोषाची ठिणगी समजुन रान पेटवू नये. बोंब मारत सुटू नये. विचार करावा. हातभार लावावा. परिस्थिती कशी सुधरेल हे पाहावं. प्रत्येकाने आपापलं योगदान दिलं, आत्मभान बाळगलं तरी ते खूप मोठं असेल.
कवितेच्या पालखीला सर्वांनी वाहायचं आहे, हे नक्कीच.

धन्यवाद !
- ....रसप....
- रणजित पराडकर

Tuesday, April 14, 2015

याद नहीं क्या क्या देखा था....

खूब गयें परदेस के अपने दीवार-ओ-दर भूल गयें
शीशमहल ने ऐसा घेरा मिट्टी के घर भूल गयें

एक आर्त आवाज मला माझ्याच आतून, दरवाज्यातून कुणा अनोळखी व्यक्तीला बाहेर लोटावं, तसा बाहेर लोटत होता. मी झगडत होतो, परत स्वत:त शिरण्यासाठी आणि तो आवाज मला माझ्या ताकदीच्या दुप्पट, चौप्पट ताकदीने पुन्हा पुन्हा लोटत होता. अखेरीस मी उंबऱ्याबाहेर पडलो. जमिनीवर आपटलो. पण दार बंद होण्याआत मी सर्व ताकदीनिशी पुन्हा उठलो आणि भिडलो. तरी दार बंद झालंच. विचित्र घुसमट जाणवत होती. मी... माझ्याबाहेर !मला आत जायचंय. पण हा कोण आवाज आहे, जो मला माझ्याचपासून वेगळा करतोय ? कुणाला सांगू ? कुणाशी भांडू ?
गच्च डोळे मिटावे म्हटलं, तर डोळे मिटलेलेच होते ! उघडले.. क्षणभर अंदाज घेतला. मला दिसलं, मी माझ्या खोलीत होतो. बाजूला मोबाईल होता. त्यात पाहिलं, रात्रीचा एक वाजला होता.
आज पुन्हा एकदा जगजीतच्या त्या गझलेने पछाडलं होतं.

याद नहीं क्या क्या देखा था सारे मंज़र भूल गयें
उसकी गलियों से जो लौटे अपना ही घर भूल गयें

आजसुद्धा रात्री निजण्यापूर्वी मी सिंगापूरच्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग ऐकलं होतं. व्हायोलीनवर साथ करायला दीपक पंडित. व्हायोलीनच्या 'बो'प्रमाणेच मागे पुढे करत हिंदोळे देणारी हळुवार चाल, नज़ीर बाक्रीचे तरल शब्द आणि जगजीतचा मलमली आवाज. असा माहोल की मंचावर बसलेले ७-८ जण मंचावर नसून हृदयाच्या आत बसले असावेत. सुरांची अशी बरसात जी अंतर्बाह्य चिंब करत असावी. पहिल्या पावसात चिंब होणारी मृदा आणि तिचा तो जगावेगळी नशा देणारा गंध.
मी त्या गाण्यात होतो की ते गाणं माझ्यात होतं ?
मी त्या मंचावर होतो की तो मंच माझ्यात ? एकरूप होणं, म्हणजे हेच असावं.

मग विचार केला की, ह्या चालीत विशेष असं काय आहे ? ह्यापेक्षा सुंदर गाणी नाहीत का ? खरं तर ह्याच चालीच्या जवळ जाणाऱ्या जगजीतच्याच किती तरी गझला, गाणी आहेत ! तरी तिच्यात का गुरफटतो आहे ?

तुमको भी जब अपनी कसमें, अपने वादें याद नहीं
हम भी अपने ख़्वाब तेरी आँखों में रखकर भूल गयें

ह्या साध्या सरळ शब्दांत 'आग का दरिया और डूब के जाना' सारखा वजनदार आशयसुद्धा नाही. तरी मी त्यांत का भोवऱ्यात अडकल्यासारखा का ओढला जातो आहे ?
काही प्रश्नांना उत्तरं नसतात किंवा उत्तरं असली तरी ती शब्दांत नसतात.
काही गाणीही अशीच निरुत्तर करत असावीत, काही शब्दही असेच निश्चल करत असावेत. एका अस्पर्श्य जागेत लोटतात अशी गाणी, असे शब्द. ती जागा आपल्यातली नसते. आपल्याबाहेरची असते. ही गाणी आपल्याला आपल्यापासून वेगळं करतात. बस्स्, एक कुठलासा आवाज येत असतो. तो कधी जगजीत असतो, कधी तलत, कधी रफी, कधी किशोर, कधी आशा तर कधी इतर कुणी. पण ते बाहेर लोटणं त्याच क्रूर थंडपणे.

असो.
माझ्यातून वेगळा झालो तरी प्रत्येक येणाऱ्या 'उद्या'ला ऑफिसला जायचंच असतं. 'रोजमर्रा'चा गाडा कितीही कुरकुरला तरी ओढायचा असतोच. खरी गोष्ट ही आहे की त्यासाठी लागणारी उर्जासुद्धा आपल्यातून बाहेर पडल्यावरच मिळते. ती मला मिळावी म्हणूनच एक जगजीत जन्मला म्हणूनच हा थंड क्रूरपणा वारंवार हवाहवासा वाटला. जीव जातो आणि आपल्यालाच माहित असतं की कुणी जीव घेतलाय. फक्त आपल्यालाच. ते कुणाला सांगायचं असतंही आणि नसतंही.
सगळंच गुंतागुंतीचं, पण हवंहवंसं.

मुझको जिन्होंने क़त्ल किया हैं कोई उन्हें बतलाये 'नज़ीर'
मेरी लाश के पहलू में वो अपना खंजर भूल गयें

उसकी गलियों से जो लौटे अपना ही घर.........................

- रणजित पराडकर

Related Posts Plugin for WordPress, Blogger...