Friday, November 29, 2013

अभिनिवेश

क्षितिजावर अडला आहे
उत्तुंग नभाचा पूर
वा सहनशीलतेअंती
उधळले कुणी चौखूर

की पायदळाच्या तुकड्या
ह्या दबा धरुन बसलेल्या
घेरून, गराडा घालुन
हल्ल्यासाठी टपलेल्या

रंजला कुणी विद्रोही
बांधून मनाशी गाठ
देणार कदाचित आता
तो उद्रेकाला वाट

हे सगळे सगळे दिसते
मी तरी उदासिन, निश्चल
राखतो चेहरा माझा
पण आतुन अस्थिर, चंचल

हृदयाच्या पटलावरती
शब्दांनी खरवडतो मी
डोळ्यांच्या लालीने मग
कवितेला पेटवतो मी

मी षंढ, थंड रक्ताचा
मी कुणी न क्रांतीकारक
अभिनिवेश दाखवणारा
मी हताश कवितासाधक

....रसप....
२९ नोव्हेंबर २०१३ 

Tuesday, November 26, 2013

अनुभूती

कितीदा मनाला उभारी दिली मी
कितीदा नवी जिद्द मी बाणली
तरी सांज प्रत्येक घेऊन येते
निशेची निराशामयी सावली

इथे एकदा काळजाने झरावे*
जशी पाझरे पश्चिमा सावळी
निळाई मुक्याने जरा सावळावी
भरावी जरा लोचनांची तळी

तळातून गहिऱ्या उफाळून यावे
जुने साचलेले तरी सोवळे
मनातून माझ्या कुणी व्यक्त व्हावे
जरा मुक्त व्हावीत ही वादळे

कुणी हारले सर्व काही तरीही
मला जिंकवाया पडावे कमी
दिसे फक्त आनंद ओसंडता पण
स्वतःशीच आहे पराभूत मी

....रसप....
१६ नोव्हेंबर २०१३
*ओळ 'श्री. प्रसाद जोशी' ह्यांची. 

Monday, November 25, 2013

गाण्यांची वही हरवली आहे..

आजकाल मी मोजकीच गाणी गात असतो,
जी मला पाठ आहेत,
कारण माझी गाण्यांची वही हरवली आहे

अनेक शब्द माझ्याभोवती पिंगा घालतात
अर्ध्या-मुर्ध्या ओळी डिवचत राहतात
गाऊ शकणार नसताना अचानक काही गाणी आठवतात
शब्द, ओळी आणि सूर चकवा देऊन जातात
काहीच हातात उरत नाही
आणि मी गात राहतो तीच गाणी,
जी मला पाठ आहेत
कारण माझी गाण्यांची वही हरवली आहे

पूर्वी माझ्याकडे खूप वेळ होता
प्रत्येक गाण्याचा एक असा एकसष्टावा क्षण होता
आता प्रत्येक विसरलेलं गाणं एकेक क्षण घेऊन गेलंय
माझ्या मिनिटा-मिनिटाचं सगळं गणितच बिघडलंय
चुकलेल्या मात्रांवरचे हुकलेले क्षण मी सतत शोधत असतो
दिवसाच्या चोवीस तासांचा हिशोब रोज जुळवत असतो
मात्र वेळेची जुळवाजुळव नेहमीच जमत नाही
आणि मी गात राहतो तीच गाणी,
जी मला पाठ आहेत
कारण माझी गाण्यांची वही हरवली आहे

रंगलेल्या मैफलीत अनेक आवाज मला सांगतात, 'तू गा'
पण माझ्या आतून एक एकटा आवाज येतच नसतो
काय गावं तेच उमगत नसतं
मनातलं आणि डोक्यातलं गाणं नेहमीच वेगळं असतं
दोन्हींपैकी कुठलंच गाणं ओठांवर येत नाही
मैफल सरत राहते पण मला अनावर होत नाही
मी शून्य नजरेने काही निरक्षर भावना वाचत राहतो
अन् भवतालीच्या प्रत्येकाचा हेवा करत राहतो
आपल्याला हवं ते प्रत्येक जण गात असतो,
फक्त मलाच सुचत नाही
आणि मी गात राहतो तीच गाणी,
जी मला पाठ आहेत
कारण माझी गाण्यांची वही हरवली आहे

एक थिजलेलं गाणं
माझ्या डोळ्यांत कुणाला तरी दिसतं
मला हवं ते गाणं
दुसरंच कुणी गायला लागतं
त्या सुरांत नकळतच मी माझा सूर मिसळतो
काही क्षणांसाठी स्वत:लाच गवसतो
पण गाणाऱ्यापेक्षा पेक्षा मीच जास्त खूश असतो
कदाचित त्यालाही काही दुसरंच गायचं असतं
मला दिसतो त्या शून्य चेहऱ्यात माझाच विषण्ण चेहरा
अन् कळतं की मी एकटाच नाही
जो गात राहतो तीच गाणी,
जी पाठ आहेत
इथे तर प्रत्येकाची गाण्यांची वही हरवली आहे..!!

....रसप....
२४ नोव्हेंबर २०१३ 

Thursday, November 21, 2013

तू आवडण्याला नव्हते काही कारण..

तू आवडण्याला नव्हते काही कारण
तू नावडण्याला देखिल नाही कारण

मी झुरलो प्रेमाच्या ह्या नजरेसाठी
उपकारालाही असेल काही कारण

साचला बर्फ भवताली आयुष्याचा
दे सुटकेसाठी एक प्रवाही कारण

जो योग्य ठिकाणी पोचवायचा रस्ता
आता चकवा देण्याला पाही कारण

लागावा पैसा तिला पाहण्यासाठी
बरबादीला मग मिळेल शाही कारण

तू कितीकदा येण्याचे टाळुन झाले
बघ सुचेल जाण्याचे आताही कारण

....रसप....
२१ नोव्हेंबर २०१३  

Monday, November 11, 2013

अनाहत

हा नितळ शांतसा डोह
भवताल मूक अन् मुग्ध
मी नजर स्थिरावुन बसतो
दिसते धूसर संदिग्ध

ही चंचलतेची जाणिव
ही नगण्य क्षणभंगुरता
अद्याप न जिंकू शकलो
ही पराभवी हतबलता

जगण्याला लय देताना
झिजलो मी कणाकणाने
घे सामावून मला तू
वाहिन मी मुक्तपणाने

इतक्यात कुणाचा नाद
माझ्याच मनातुन येई
"मी काल कुणाचा नव्हतो
मी उद्या कुणाचा नाही -
हा क्षण जो हाती आहे, मी तुझाच आहे केवळ
आकाश तुझे, पाणीही, पर्वत अन् निर्झर खळखळ!"

भावूक झुळुक हलकीशी
जळि तरंग बनुनी हसली
जगण्याची कविता झाली
मनपटलावर मोहरली

....रसप....
०८ नोव्हेंबर २०१३


Saturday, November 09, 2013

'सत्या'चार - (Movie Review - Satya -2)

कलाकाराने आयुष्यभर विद्यार्थी राहायचं असतं. किंबहुना, जो आयुष्यभर विद्यार्जन करत राहातो, तोच चांगला कलाकार असतो. ज्या क्षणी, 'मला आता हे येत आहे' अशी भावना मनात उत्पन्न होते, त्याच क्षणी कलेचा व कलाकाराचा ऱ्हास सुरु होतो. कधी मिळालेला पैसा, लाभलेली प्रसिद्धी डोक्यात शिरते आणि काही अश्या निर्मिती खपून जातात ज्या प्रत्यक्षात साधारण असतात, हे त्या कलाकाराला माहित असतं. पण 'मी काहीही केलेलं आवडून जातंय' अशी एक 'ग'ची बाधा होते आणि मग निर्मितीमागे पूर्वीसारखी मेहनत घेतली जात नाही, वैचारिक बैठक कमजोर होते किंवा नष्टही होते. इथपर्यंत येईतो लोकांचं प्रेम आटलेलं असतं आणि अचानक त्या कोणे एके काळच्या उत्कृष्ट कलाकाराला, त्याचे कोणे एके काळचे चाहते झिडकारतात, नाकारतात, जागा दाखवतात. झोपेत बरळणाऱ्याला खणखणीत कानाखाली बसावी आणि तो खाडकन् जागा व्हावा, तसं सर्वज्ञानाच्या फसव्या नशेच्या अंमलाखाली असलेल्या त्या कलाकाराला सत्यस्थितीचे भान येते आणि तो धाडकन् जमिनीवर आपटतो.
रामगोपाल वर्मा कधी जमिनीवर आपटणार आहे, ह्याची माझ्यासारखे त्याचे कोणे एके काळचे चाहते वाट बघत असावेत. रामूने 'शोले'चा रिमेक बनवला तेव्हाच त्याच्यावर सर्वच स्तरांतून झालेली टीका खरं तर जाग येण्यासाठी पुरेशी होती, पण नाही आली. एकेका सिनेमागणिक रामू स्वत:च स्वत:चं तोंड काळं करत राहिला आणि आता त्याने 'सत्या-२' बनवला. शोलेचा रिमेक पाहिल्यावर अनेकांनी म्हटलं होतं की, 'वाटच लावायची असेल, तर दुसऱ्या कुणाच्या निर्मितीची का लावायची. स्वत:च्याच एखाद्या निर्मितीची लावावी की !' त्या लोकांची ही इच्छा 'सत्या - २' मधून पूर्ण झाली आहे.

'सत्या' - हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मैलाचा दगड. 'गँगवॉर मूव्हीज' प्रकारात हिंदी चित्रपटाला एका वेगळ्या पातळीवर ह्या चित्रपटाने नेलं. अण्डरवर्ल्डकडे बघण्याचा दृष्टीकोन, तो विषय हाताळण्याची विचारधारा ह्या चित्रपटाने पूर्णपणे बदलून टाकली. बराच काळ झाकोळलेला मनोज वाजपेयीसारखा एक तगडा अभिनेता झोतात आणला. 'सत्या' हा रामूचाच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतील आजपर्यंतच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांतला एक असावा. अश्या चित्रपटाला 'सत्या - २' उजळणी देणार होता.

ह्या उजळणीची सुरुवात संमिश्र होते. कॅमेरा अप्रतिम फिरतो, फिरवतो आणि निवेदक सदोष हिंदी बोलतो. तो आवाज ओळखीचा आहे, पण कोण आहे ते विचार करण्यात वेळ दवडावासा वाटला नाही. कुठल्याश्या गावातून 'सत्या' (पुनीत सिंग रत्न) मुंबईत येतो, त्याच्या प्राणप्रिय प्रेयसीला - 'प्रिया' (अनाइका सोती)ला - न सांगता. का ? माहित नाही. विचारलं तर म्हणतो, 'विचारायचं नाही!'. बरं ज्या मुंबईत ४ संपर्क दिल्याशिवाय कुणी चपराश्याची नोकरी देत नाही, तिथे ह्याला एक करोडपती बिल्डर (महेश ठाकूर) सहाय्यक म्हणून ठेवतो. त्याचं पूर्ण नावही न विचारता ! ह्या बिल्डरच्या मदतीने इतर काही बड्या धेंडांशी ओळख वाढवून, त्यांची मोठमोठे डॉन व त्यांचा वारेमाप पैसासुद्धा करू शकत नसलेली कामं चुटकीसरशी करून सत्या आपलं बस्तान बसवतो. त्याला बनवायची असते एक 'कंपनी'. बोले तो - 'गँग' ! अशी गँग जिचे मेंबर्स कोण आहेत, हे त्यांना स्वत:लाही माहित नसेल. पैसा कुठून येतो, कसा येतो हे कुणालाही कळू नये म्हणून तो एक 'फायनान्शियल कन्स्लटन्ट'सुद्धा नेमतो ! (तो नेमकं काय करणार असतो हे कथालेखकाच्या डोक्याबाहेरचं असल्याने ते दाखवलेलं नाही. पण तो काही तरी करतो आणि ते व्यवस्थित करतो ह्यावर अंधविश्वास ठेवणे, हे इथे प्रेक्षकांकडून अपेक्षित आहे.) ह्या कंपनीत सगळे सिस्टिममुळे दुखावलेले लोक असतात. सिस्टिमने दुखावलेला कुणीही माणूस गँगस्टर बनू शकतो, देशद्रोह करू शकतो, गद्दारी/ नमक-हरामी करू शकतो आणि तेही एका पूर्ण नावही न सांगणाऱ्या छपरी झिपऱ्याच्या शब्दांत येऊन, इतका दुधखुळेपणाही प्रेक्षकांत असायलाच हवा, म्हणजे हे पटतं.

पुढे ही अत्यंत फडतूस कथा, त्याहून फुटकळ सादरीकरणाने पुढे सरकते. अनेक निष्पाप मरतात आणि सगळ्यांचा तथाकथित बाप 'सत्या' कोठडीत जातो. पण तरीही ही स्टोरी संपत नाही. निवेदक धमकी देतो की बाकीची कहाणी पुन्हा कधी तरी सांगीन ! समोरचा पडदा काचेचा नसतो आणि प्रोजेक्टर लगेच झाकला जातो त्यामुळे चप्पल फेकून काही फुटणार नसतं. म्हणून ती धमकी ऐकून क्षणभर संतापलेलं पब्लिक 'खड्ड्यांतून रस्ता शोधतो, फुरफुरणारे नळ बघतो, सडकछाप लोकप्रतिनिधींना मत देतो तर एक गंडलेला पिच्चर पण सहन करू आता !' अशी काहीशी मनाची समजूत घालून मुकाटपणे बाहेर पडतं.


पुनीत सिंग रत्न हे एक असं रत्न रामूने निवडलं आहे की सांगावं ! हा दिसतो 'चंद्रचूड सिंग'सारखा, बोलतो 'चक्रवर्ती'सारखा आणि अभिनय म्हणजे 'सुनील शेट्टी' झक मारेल असा ! इंटरव्ह्यू दिल्यासारखे सपाट डायलॉग मारणं आणि 'ठिक्कर पाणी' खेळल्यासारखं चालणं हे दोन नियम सगळीच पात्रं इमाने इतबारे पाळतात. कदाचित त्याच अटीवर त्यांना काम दिलं असावं. एक व्यक्तिरेखा तर सहजता यावी म्हणून कंबरडं मोडलेलीही दाखवली आहे.

'पुनीत'चं रत्न शोभेल अशीच त्याची जोडीदार आहे. 'अनाइका सोती' हे  नाव जितकं अनाकलनीय आहे, तितकीच व्यक्ती अनाकर्षक. आणि पुनीत रत्न जितका ठोकळा आहे तितकीच ही थडथडा उडणारं पॉपकॉर्न. एक जोक ऐकला होता. बसचे तिकीट काढताना प्रवासी म्हणतो, 'दीड तिकीट द्या. कारण माझा हा मित्र डोक्याने अर्धवट आहे.' कंडक्टर म्हणतो, 'तरी दोन घ्यावीच लागतील. त्यांचं अर्धं आणि तुमचं दीड!' रामूने हिरो + हिरवीण = २ होण्यासाठी असाच काहीसा हिशेब केला असावा.

गाणी का आहेत ? हा प्रश्न त्या गाण्यांपेक्षाही जास्त अत्याचार करतो. तो जो कुणी पुरुष गायक आहे तो फिक्का चहा भुरके आणि झुरके मारून प्यायल्यासारखा भंकस गाणी आळवून आळवून गातो. डोक्याला शॉट !!

एक मात्र खरंय; मी 'सत्या - १' पाहिल्यावर जितका भयसाटलो होतो, तितकाच 'सत्या - २' पाहून भयसाटलो. पिच्चरचं प्रत्येक अंग वाईटात वाईट कसं करता येईल, ह्याकडे रामूने अगदी जातीने लक्ष पुरवले आहे. आणि हा त्याचा प्रयत्न अगदी १००% यशस्वी झालेला असल्याने, ही सर्टनली डिझर्व्ज अ‍ॅन अप्प्लॉज !

वेल डन रामू ! वे टू गो.............................................................................................. टू गेट लॉस्ट.

रेटिंग - घंटा 

Friday, November 08, 2013

तुझ्या पावलांचेच ठसे

'मायबोली' च्या 'हितगुज दिवाळी अंक २०१३' मध्ये समाविष्ट कविता -

पारिजात तू दरवळणारा
अंगणात अव्यक्तपणे
निरलस हसरा सडा सांडशी
रोज किती आश्वस्तपणे
जितके तू उधळून दिले ते
मला न वेचाया जमले
तरुण व्यथांच्या करुण फुलांना
मी माझ्या नयनी टिपले  

रोम रोम फुलतो, बागडतो,
तुझा स्पर्श मज आठवतो
रसरशीत नवतारुण्याचा
बहर मनाला धुंदवतो
अवचित चाहुल तुझी जाणवे
आतुरता दाटे नयनी
हव्याहव्याश्या बेचैनीची
चंचल मी व्याकुळ हरिणी

झुळझुळणाऱ्या वाऱ्यामधुनी
जाणवतो रे श्वास तुझा
उधाणलेल्या देहवसंती
मिरवत मी मधुमास तुझा
किती शोधते कुठे विसरले
धडधडणारे हृदय कसे
सर्वदूर माझ्या भवताली
तुझ्या पावलांचेच ठसे

....रसप....
२६ फेब्रुवारी २०१३ 

Thursday, November 07, 2013

अबोला

'मराठी कविता समूहा'च्या 'कविता विश्व - दिवाळी अंक २०१३' मध्ये समाविष्ट कविता -

तू अशी सवय जी शक्य सोडणे नाही
मी शब्द अबोल्याचा माघारी घेतो
तू नसल्याची कल्पनाच करणे नाही
तू सांग स्वत:ला कोण यातना देतो ?

हा नाराजीचा सूर नकोसा वाटे
मी पंखाविन पक्ष्यासम तडफड करतो
श्वासांची सरिता क्षणाक्षणाला आटे
मी जगण्याचे हे नीरसपण अनुभवतो
............. मी शब्द अबोल्याचा माघारी घेतो

तव नयनसुमांवर दहिवर डबडबताना
मी दु:खाचे आकाश त्यातुनी बघतो
कटु शब्दांना मी माझ्या आठवताना
माझ्या प्रतिबिंबालाही परका ठरतो
............. मी शब्द अबोल्याचा माघारी घेतो

हातातुन माझ्या तुझा हात सुटल्यावर
हाताला माझ्या हलका दरवळ असतो
जाशील निघुन तू जाण्याचे ठरल्यावर
हे जाणुनदेखिल तुला मनाशी जपतो
............. तू सांग स्वत:ला कोण यातना देतो ?

....रसप....
३ ऑक्टोबर २०१३

Saturday, November 02, 2013

भविष्यातला देसी सुपरहिरो (Krrish 3 - Movie Review)

मागे एकदा माझा एक मुंबईकर मित्र औरंगाबादला आला होता. ऐन उन्हाळ्यात. म्हणजे नेमके उन्हाळ्याचेच दिवस होते का ते आठवत नाही, पण हवा मात्र होती. त्याच्या येण्याच्या २ दिवस आधी ४३ अंशाच्या आसपास तापमान होतं. त्याने मला विचारलं, 'कसं करावं ?' मीही त्याला म्हटलं की, 'बघ बाबा ! आपण मुंबईकर ह्युमिडिटी सहन करू शकतो, पण हा कोरडा उन्हाळा म्हणजे बिनपाण्याची हजामत केल्यासारखा बिनघामाचं 'डिहायड्रेशन' करवतो. अगदीच आवश्यक असेल तर ये, नाही तर टाळ !' पण त्याचं काम अत्यावश्यक होतं. तो आला. आणि गंमत अशी की पाऊस पडला ! अन् तापमान बऱ्यापैकी सुसह्य झालं ! दोन दिवस मजेत गेले आणि जाताना म्हणाला, 'मुंबईपेक्षा इथेच छान आहे रे !'
त्याला तसं का वाटलं असेल हे मला काल समजलं. 'क्रिश - ३' पाहिल्यावर. तिकिट घाबरत घाबरत काढलं होतं. हृतिकसाठी पाहायचा होता आणि सुपरहिरो व विवेक ओबेरॉय मुळे टाळावासा वाटत होता. पण काढलं तिकीट, घेतली रिस्क, केली हिंमत आणि झाली गंमत ! कारण बऱ्यापैकी सुसह्य होता की ! अडीच तासांच्या स्टंटबाज नाट्यानंतर हा स्पायडरमॅन + एक्स-मेन + सुपरमॅन + मिशन इम्पॉसिबल + वगैरे + देसी शक्तिमान चांगलाच मनोरंजक वाटला.

'कोई मिल गया' मधला अर्धवटराव रोहित 'जादू'च्या मदतीने स्वत: स्वत:ला गवसतो, नंतर 'क्रिश' मध्ये त्याला डॉ. आर्या डांबून ठेवतो व त्याचा मुलगा 'क्रिश' स्वत: स्वत:ला गवसतो. 'क्रिश-३'मध्ये रोहित आणि क्रिश दोघेही आपापल्या क्षेत्रात व्यवस्थित एस्टॅब्लिश झालेले आहेत. बाप एक नावाजलेला शास्त्रज्ञ आणि मुलगा एक नावाजलेला सुपरहिरो !
दुसरीकडे 'काल' (विवेक ओबेरॉय) हा एक महत्वाकांक्षी माथेफिरू अख्ख्या जगावर राज्य करायचं स्वप्न बघत असतो. त्यासाठी तो एक 'मानवर' (मानव + जानवर) फौज तयार करत असतो. जन्मजात अपंग असलेल्या 'काल'ने आपल्या दुर्दम्य आत्मविश्वास, बुद्धी आणि पैश्याच्या जोरावर आपल्या अपंगत्वावर एका मर्यादेपर्यंत मात केलेली असते. पण पूर्णपणे सुदृढ होण्यासाठी तो जंग जंग पछाडत असतो. ह्या सगळ्या संशोधन, निर्मितीसाठी हवा असलेला पैसा कमवायची क्लृप्ती असते, विषाणू आणि त्याच्यावर 'अ‍ॅण्टीडोट' (प्रतिबंधक औषध) तयार करणे. आधी स्वत:च तयार केलेल्या विषाणूचा संसर्ग घडवून आणून हाहाकार माजवणे आणि मग त्यावरचं औषध स्वत:च पुरवून अव्वाच्या सव्वा कमावणे !
एक संहार नामिबियात यशस्वीरित्या घडवून आणल्यावर काल व कं. आपला मोर्चा 'बिग्गर मार्केट' भारताकडे वळवते आणि मुंबईत घातपात घडवला जातो.
ओव्हर टू शास्त्रज्ञ व सुपरहिरो.
ते काय करतात ?
अर्थातच शहराला वाचवतात, पण कसं ?
त्यानंतर काय होतं ?
'काल'च्या महाशक्तीस तोंड देताना 'क्रिश'ला कशाकशाला तोंड द्यावं लागतं ?

ह्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी चित्रपट बघा.



काही वर्षांपूर्वी काही सुपरहिरो किंवा चमत्कारी पुरुष हिंदीत आणायचे हास्यास्पद प्रयत्न केले गेले होते. 'क्रिश'सुद्धा मी घरी, टीव्हीवर तुकड्या-तुकड्यांत पाहिला होता. थेटरात जायची हिंमत झाली नव्हती. सुपरहिरो किंवा काहीही सुपरह्युमन दाखवण्यात बॉलीवूड मार खातं किंवा हॉलीवूड मात देतं ते मुख्यत्वेकरून 'स्पेशल इफेक्ट्स' मधल्या तफावतीमुळे. क्रिश-३ ही तरी उणीव भरून काढतो. (थ्री चिअर्स फॉर 'रेड चिलीज'!) पण फुटकळ प्रेमकहाणी अन् फडतूस गाणी मात्र कोंबतोच आणि बॉलीवूडपण राखतो.

प्रियांका चोप्राला स्वत:कडून नेमक्या काय अपेक्षा आहेत ? असा प्रश्न 'जंजीर' आणि 'क्रिश-३' मुळे पडतो. जिथे 'नटी की केवळ शोभेची बाहुली असते' हा पूर्वीचा बहुमान्य समज हळूहळू मोडीत निघत आहे, तिथे प्रियांका एकानंतर एक कमजोर भूमिका करते आहे. स्वत:ची अधोगती स्वत:च करवते आहे. कदाचित आधीच्या भागात तीच 'प्रिया' होती म्हणून कंटिन्यू केलं असेल, पण तरी डझ नॉट मेक सेन्स.

गाणी म्हणजे तर कोपरापासून दंडवत आहेत ! राजेश रोशन साहेबांचं घणाघाती संगीत त्यांच्या वयाच्या इतर कुठल्या सामान्य माणसास ऐकवलं तर त्याचा रक्तदाब निश्चित वाढेल, कदाचित गचकेलही ! 'छू कर...', थोडा हैं थोडे की जरूरत हैं', 'बातो बातो में' सारखं तरल संगीत आत्ताच्या काळात अपेक्षित नाही. पण हे ? असं ?
बरं, गाणी भंकस आहेतच. त्यांची पेरणी ? म्हणजे कसंय.... कहाणी आपली पुढे जात असते. मध्येच 'कट' ! --------- गाणं ---------- गाणं संपलं. कहाणी पुढे………. अरे काय लावलंय काय ? गणेशोत्सवाचा मंडप आहे का हा ?
समीर अनजान कोण आहे माहित नाही. तो 'अनजान'च राहिलेला बरा. 'समीर'कडून काहीच अपेक्षा कधीच नव्हती. त्यामुळे गाण्यांच्या शब्दांबद्दल तक्रार नाही. चालू द्या दळण.

हृतिक हा एक अत्यंत प्रामाणिक कलाकार आहे. तो प्रत्येक भूमिकेत जीव ओततो. त्याने साकारलेला म्हातारा रोहित अप्रतिम ! सुपरहिरोच्या भूमिकेतही तो अगदी फिट्ट. आजच्या हिरोंपैकी तो एकटाच आहे जो 'सुपर' वाटू शकतो. दोन्ही भूमिका करताना त्याने लाजवाब अदाकारी केली आहे, नि:संशय ! इतकं की, हे दोन नट नसून एकच आहे ह्याचाही विसर पडावा !

'काल'ची हुकमाची राणी मानवर 'काया' उभी करणारी 'कंगना राणावत' एक आश्वासक अभिनेत्री वाटते बऱ्याचदा. प्रियांकापेक्षा कंगना लक्षात राहावी, ह्यातच सर्व काही यावं, नाही का ?

पण, द सर्प्राईज इज 'विवेक ओबेरॉय' ! हातापायाची हालचाल करण्याला काही वावच नसताना, केवळ मुद्राभिनयातून त्याने 'काल' सुंदर साकारला आहे. ह्यापूर्वी अत्युत्साही अभिनयाने काही बऱ्या भूमिकांची माती करणारा वि. ओ. इथे समजूतदार, संयत अभिनयाचं दर्शन घडवून सुखद धक्का देतो. आत्तापर्यंतचे हे त्याचे नक्कीच सर्वोत्कृष्ट काम आहे.

अ‍ॅक्शन, स्टण्ट्स आणि स्पेशल इफेक्ट्स अनन्यसाधारण महत्वाचे असणार होते, आहेतही. काही ठिकाणी इंग्रजी चित्रपटांची आठवण येते, नाही असं नाही. पण चालसे. एकूणच हाणामाऱ्या, उड्या, फेकाफेकी, तोडफोड, चिरफाड चांगली रंगली आहे.

शंभर वर्षानंतर हिंदी चित्रपटाला एक सुपरहिरो मिळाला आहे का ?
ह्याचं उत्तर 'हो' द्यावंसं वाटतंय. पण होल्ड ऑन. चित्रपटाच्या अखेरीस पुढील भागाची सोय केलेली आहेच, तोही पाहू या, मग ठरवू ! घाई काय आहे ? १०० वर्षं थांबलो अजून ३-४ थांबू !!

रेटिंग - * * १/२
Related Posts Plugin for WordPress, Blogger...