Tuesday, April 26, 2016

पाजीराव भन्साळी (Bajirao Mastani Movie - Not a Review !)

बहुचर्चित, बहुपुरस्कृत 'बाजीराव मस्तानी' परवा कुठल्याश्या वाहिनीवर लागला होता.
'बाजीराव मस्तानी' आणि 'दिलवाले' एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. त्यामुळे दोनपैकी एकच पाहायला जमणार होतं. प्रदर्शनाच्या एक आठवडाआधीच मी त्यावेळी 'दै. मी मराठी लाईव्ह'साठी लिहित असलेलं काम स्थगित करायचा निर्णय घेतला होता आणि तसं संबंधितांना कळवलंही होतं. पण मग त्यांनी मला एक शेवटचा चित्रपट 'कव्हर' करायला सांगितलं. मी 'दिलवाले' निवडला. कारण त्या काळात जितका रणवीर डोक्यात जात होता तितका शाहरुख जात नव्हता ! Eventually, 'मी मराठी लाईव्ह'ने मला 'राहू द्या' सांगितल्याने, 'दिलवाले'सुद्धा उगाच पाहिला गेला.

तर सांगायचा उद्देश हा की 'बाजीराव मस्तानी' तेव्हा टाळला नव्हता, त्यामुळे आत्ता जर फुकट पाहायला मिळणार होता तर का न पाहावा ? वेळ होता, पाहिला.
'दिलवाले' हा एक गरीब चित्रपट असेल, तर 'बाजीराव मस्तानी' दळभद्री म्हणावा, ह्या मताला मी आलो आणि शेवटचा अर्धा तास उरलेला असताना माझा संयम संपला. मी टीव्ही बंद केला.


'बाजीराव मस्तानी'ची अनेक परीक्षणं येऊन गेली आहेत. आता इतक्या दिवसांनंतर मी परीक्षण लिहिणं तसं निरर्थकच. त्यामुळे काही टिपिकल लिहित नाही. थोडेसे, जसे आठवताहेत तसे मुद्दे मांडतो. हे लहान-मोठे किस्से समजा. जे मला जाणवलं ते सांगतो.

१. भन्साळीचा चित्रपट म्हणजे भव्यतेची साक्षात व्याख्या असते. हम दिल दे चुके सनम, देवदास आणि अगदी गुजारीशमध्येही त्याने दाखवलेली भव्यता लक्षात राहणारी होती. त्यातून 'बा.म.' ऐतिहासिक चित्रपट. मग तर मोठमोठे सेट्स, भव्यता, श्रीमंती वगैरे दाखवायला आयतंच निमित्त होतं. पण सावरिया आणि राम-लीला मधले पूर्णपणे खोटे समजून येणारे सुमार सेट्स आठवले. सेट्समधली कृत्रिमता, खोटेपणा ठळकपणे जाणवत होता. गड, किल्ले, महाल, खोल्या, झाडं, पाणी, नदी, पाऊस काही म्हणता काहीही थोडंसुद्धा खरं वाटत नाही, इतकं गंडलं आहे. अत्यंत वाईट प्रकारे केलेली प्रकाशयोजना ह्यासाठी जबाबदार आहे की अजून काही, मला माहित नाही. पण जो काही End result आहे, तो शुद्ध बकवास आहे.

२. ऐतिहासिक चित्रपट म्हणजे वजनदार संवाद आले पाहिजेत. त्यांची तितकीच जबरदस्त फेकही आली पाहिजे. कसलं काय ! इथे तर सगळंच 'फेक' (Fake) ! 'बाजीराव ने मस्तानी से प्यार किया है, अय्याशी नही' हा सुमार डायलॉग संवादलेखनाची सर्वोच्च पातळी आहे. अत्यंत बाष्कळ, पोकळ, निरर्थक, सपक संवादांची तितकीच अभिनिवेशशून्य फेक 'अथ'पासून 'इति'पर्यंत ('इति' मी पाहिला नाही, पण बहुतांश पाहिला) आहे. 'पेशवीण पद म्हणजे आमराई' असे अनेक अत्यंत हास्यास्पद डायलॉग्स आपल्यावर आदळत राहतात. एका प्रसंगात काशीबाई उखाणा घेतात. त्यात 'कोहिनूर - हैं नूर' अशी यमकायमकी आहे. ह्यातला तांत्रिक दोष आज कुणालाही कळणार नाही आणि कळला तरी तो किरकोळच वाटेल. पण त्या काळात लोकांची काव्याची जाण इतकी भिकारडी नव्हती. असं सगळं ऐकता, पाहताना हसताही येत नाही. कीव येते लिहिणाऱ्याची.

३. त्याहून जास्त कीव येते गाणी लिहिणाऱ्याची. 'कडक तडक भडक झाली, चटक मटक वटक झाली, दुश्मन की देखो जो वाट लावली' (इथे 'झाली' आहे की 'साली'?) हे बाजीरावाचं शौर्यगान आहे. ह्यात वीररस असणं अपेक्षित होतं. ह्या निरर्थक आणि मवाली छाप शब्दांत कोणता रस आहे, माहित नाही. पण वीररसपूर्ण लिखाणाची ही जर सीमा असेल, तर त्या सीमेवरून गीतकाराने परत फिरूच नये. तसंच पुढे जात राहावं आणि आयुष्यात इतर सर्वांना क्षमा करावं.

४. बाजीराव, काशीबाई आणि मस्तानी. ह्या तिन्ही मुख्य व्यक्तिरेखा समस्त चित्रपट युनिटमधील कुणाला तरी समजल्या असाव्यात का, अशी शंका येते.

  • बाजीराव हा एक हाडाचा योद्धा होता. महावीर होता तो. भारताच्याच काय, जगाच्या इतिहासातील सर्वोत्तम योद्ध्यांपैकी एक बाजीराव होता. त्याचं मस्तानीसोबतचं प्रकरण हा एक वेगळा भाग आहे. पण त्यापायी तो वेडगळ झालेला दाखवायचं ? एक कर्तव्यदक्ष राजा (प्रधान) असलेला तो शेवटी शेवटी अगदी बिथरलेला दाखवला आहे. त्याची ती मनस्थिती सादर करतानाचा रणवीर सिंगचा अभिनय तर हास्यास्पदच वाटला. तो सतत दारूच्या नशेत बरळल्यासारखा बोलताना दिसतो. (की तसंच दाखवलंय, कळलं नाही.) 
  • काशीबाई एक घरंदाज स्त्री होती की पोरगेलेशी, हाही मुद्दा बाजूला ठेवू. पण बाजीरावाच्या निजामाशी वाटाघाटी सफल ठरल्या, ही बातमी जेव्हा चिमाजी घेऊन येतो, तेव्हा ती ऐकून अत्यानंदाने ती टुण्णकन् उडी मारुन सासूबाईंच्या मांडीत जाऊन बसते, हे दृश्य पाहून तर माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले. तसंच बाजीरावाचा शिरटोप वगैरे घालून 'हर हर महादेव' ओरडून त्याच्याभोवती नाचणं बागडणं म्हणजे थिल्लरपणा होता. 
  • दुसरीकडे मस्तानी. दीपिकाच्या चेहऱ्यावर मस्तानी सादर करताना कायमस्वरूपी बारा वाजलेले आहेत. ती गोरी वगैरे न दिसता चक्क 'पांढरी' दिसते. रोगट वाटते. मस्तानी जर अशी हाडाडलेली, कुपोषित, निस्तेज होती तर आम्ही इतकी वर्षं तिचं भलतंच काही तरी वर्णन वाचत आलो आहोत. 'बाजीराव म्हणून रणवीर' आणि 'काशीबाई म्हणून प्रियांका' ह्यापेक्षा 'मस्तानी म्हणून दीपिका' हे कास्टिंग सपशेल फसलेलं आहे. दीपिका सुंदर आहे. पण तिच्या सौंदर्यात दैवीपणाची झाक नाही. मस्तानीसाठी तीच अत्यावश्यक होती. 

५. भन्साळीचा अभ्यास (केला असल्यास) अगदीच अपुरा पडला आहे. ना त्याला पेशवे, मराठाकालीन, महाराष्ट्रीयन, मराठी संस्कृती समजली आहे ना व्यक्तिरेखा. महालांचे सेट्स मुघलांचेच वाटतात. कुठे तरी एक गणेश वंदना असणं अत्यंत गरजेचं होतं, इतकी साधी बाब लक्षात आलेली नाही. 'कट्यार' मध्ये 'सूर निरागस हो'नेच एक माहोल बनवला जातो. तो 'बा.म.' मध्ये बनतच नाही.
'बा.म.' ही कुठली शौर्यगाथा किंवा कुणा व्यक्तीवर आधारित चित्रपट (Not exactly Biopic) नाही. ही प्रेमकहाणी आहे आणि आपल्या कुवतीवर अचूक विश्वास ठेवत भन्साळीने ही कहाणी 'प्रेम कहाणी'च्या पुढे जाऊ दिलेली नाही. त्यामुळे अत्यंत फालतू युद्धदृश्यं माफ करून टाकावीत म्हणतो. मात्र प्रेमकहाणी तरी कुठे व्यवस्थित मांडली आहे ? कुठल्याही क्षणी बाजीराव आणि मस्तानी, राम आणि लीला बनून 'लहू मूंह लग गया..' करत तोंडात तोंडं घालतायत की काय अशी एक विचित्र अनामिक भीती सतत वाटत राहते, इतकं सगळं वरवरचं झालं आहे.

६. सरसकट सगळे लोक, अगदी मराठी नट-नट्याही 'राऊ' न म्हणता 'राव' म्हणतात ! निवेदक इरफान खान 'बाजीराव बल्लाड' असा अगदी सुस्पष्ट उच्चार करतो. तेव्हा मात्र 'च' आणि 'भ' चे पाढे मनातल्या मनात सुरु झाले. इतकं सगळं उथळ करायचं होतं, तर काही शतकं मागे जायची गरज काय होती ? आजच्याच काळातली एखादी कहाणी गुंफायची होती ना ! अभ्यास करायचाच नव्हता, मेहनत घ्यायचीच नव्हती तर एक प्लॉट ज्याचं इतर कुणी तरी कदाचित सोनं केलं असतं, तो वाया का घालवला ? असा एक वैफल्यग्रस्त प्रश्न मला पडला.

७. हिमेश रेशमियाची अभिनयाची हौस आणि भन्साळीची संगीत देण्याची हौस एकसारखीच वाटते आहे. सगळ्या गाण्यांच्या चाली एक तर एकसारख्याच किंवा इतर कुठल्या तरी गाण्यासारख्या किंवा थेट इस्माईल दरबारची नक्कल करणाऱ्या आहेत. 'अलबेला सजन आयो..' ची चाल मस्तच आहे. पण आयो' मधल्या 'आ' वरच्या जबरदस्त समेची अक्षरश: माती झाली आहे. वाद्यांचा इतका गोंगाट आहे की ती समेची जागा खरंच वाया जाते. इथे पुन्हा एकदा 'कट्यार'चा संदर्भ देतो. 'दिल की तपिश आज हैं आफताब..' मधल्या 'ता' (आफ'ता'ब) वर येणारी समेची जागाही अशीच दिलखेच आहे. पण सुरेख व अचूक प्रमाणातला वाद्यमेळ ही सम व्यवस्थित ठळक करतो. भन्साळी भसाभस वाद्यांचे आवाज ओततो आणि फक्त गोंगाट करतो.

एकंदरीत, अत्यंत रटाळ आणि सपशेल फसलेला चित्रपट म्हणूनच 'बाजीराव मस्तानी' ओळखला जाईल. मी 'दिलवाले' पाहिला ह्याचा तुलनात्मक का होईना मला आनंद होईल, असं मला कधीही वाटलं नव्हतं. आता वाटतंय.

- रणजित पराडकर

15 comments:

  1. Dear Mr Paradkar,
    I read your article and not the 'review' about Bajirao Mastani movie.
    I don't agree with your opinion about this movie being the worst. I had bought the ticket of 300 bucks and watched the movie in theatre unlike you. I loved the movie.
    I have read original Marathi book Rau by shri N S Inamdar. And though first half of the movie is somewhat out of context but 2nd half was mostly according to the book. I don't know about their reference books they might have gone through while making this movie but let's assume Rau as the base of it.
    I agree with few points of yours about songs of Bajirao saying 'vat lavli'. It's true that this song is absolutely out of context. Especially lyrics. They were stupid. (I mean this particular song)
    I have listed a few points which I found important after watching this movie.
    1. No non Marathi person even in Maharashtra knew who and what Bajirao was. How brave he was. Due to this movie now whole India and maybe whole world (audiences including Pakistan, shrilanka, Nepal, Singapore, Mauritius and all those countries wherein Hindi knowing people live) for sure knows about Bajirao peshwa.
    2. If you people are so concerned about our culture and correct depiction of the same, then who stopped you from creating such a saga yourself? No one, but nobody bothered so far about creating anything near to it.
    3. It's somehow shameful for Marathi people that someone from Himachal Pradesh comes and portrays legend like Bajirao who is so much core Marathi. Is there no one (proper hero material) eligible from Marathi janata? If yes, where are they?
    4. Deepika may not be Devine beauty but then who is? I can't seem to recollect anyone. Pls don't take Madhuri Dixit's name. She is past tense.
    5. Priyanka chopra has done a tremendous job according to me. (I think she has proved enough about her acting abilities n that's why she is in Hollywood)
    6. I didn't find any fault in set designing.
    They did not look Mughal sets to me.
    And last point is that Bhansali tried something let's say which may be out of his league or maybe according to you he failed completely (which I strongly doubt) but he at least tried. And trying is something, isn't it?
    At the end of the day every attempt is commercial, no one is in market for only sake of art but we have to see the bright side of things.
    Not to offend you or anyone but I feel this way and when I saw 'comment' box in your blog, I could not stop myself.

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार !

      एकेका मुद्द्यावर उत्तर देतो आहे.

      1. No non Marathi person even in Maharashtra knew who and what Bajirao was. How brave he was. Due to this movie now whole India and maybe whole world (audiences including Pakistan, shrilanka, Nepal, Singapore, Mauritius and all those countries wherein Hindi knowing people live) for sure knows about Bajirao peshwa.

      >> चित्रपटाच्या समर्थनार्थ हाच एक मुद्दा वारंवार आणि सर्वत्र मांडला जातो आहे. बाजीराव लोकांपर्यंत पोहोचला नाही, ह्यासाठी लोक जबाबदार नसून सिस्टीम जबाबदार आहे. आपली इतिहासाची पुस्तकं जबाबदार आहेत. बाजीराव जितका पोहोचला आहे, तोसुद्धा 'बाजीराव-मस्तानी' असाच पोहोचला आहे, इतकी बदनामी आपल्या सिस्टीमने केलेली आहे. हा चित्रपट पुन्हा एकदा तेच करतो आणि अधिक मोठ्या प्रमाणावर करतो. अर्धवट ज्ञानापेक्षा संपूर्ण अज्ञान बरं, असं मला तरी वाटतं. त्यामुळे अश्या प्रकारे बाजीराव लोकांपर्यंत पोहोचवून काही भलं झालेलं नाही.
      आणि बाजीराव लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या महान उद्देशाने काही चित्रपट बनवलेला नाही. तो पैसा कमवण्यासाठी बनवला आहे, त्यामुळे हा मुद्दा असंबद्ध ठरतो. <<

      2. If you people are so concerned about our culture and correct depiction of the same, then who stopped you from creating such a saga yourself? No one, but nobody bothered so far about creating anything near to it.

      >> Whoa ! I am not at all one of those जे फुटकळ अस्मितेचे झेंडे फडकावत फिरतात. मी मूव्ही थेटरात पाहिला नाही, ह्याचं कारण काही वेगळं होतं. एक तर त्याच्या शोचं टायमिंग मला साजेसं नव्हतं आणि दुसरं म्हणजे बायकोला शारक्या आवडतो ! अजून एक कारण लेखातच लिहिलं आहे.
      फर्दर, मला एखाद्या हॉटेलातलं जेवण जर आवडलं नाही, तर मी 'ते हॉटेल वाईट आहे' मानतो आणि पुढच्या वेळेस दुसऱ्या हॉटेलात जातो. ह्या एका कारणासाठी मी कधीही माझं स्वत:चंच हॉटेल उघडणार नाही किंवा भटारखान्यात शिरून खानसाम्याला रेसिपी सांगणार नाही. सिम्पल ! <<

      3. It's somehow shameful for Marathi people that someone from Himachal Pradesh comes and portrays legend like Bajirao who is so much core Marathi. Is there no one (proper hero material) eligible from Marathi janata? If yes, where are they?

      >> हा मुद्दा out of context आहे. मी चित्रपटाबद्दल लिहिताना, त्यावर टीका करताना कुठल्याही पोकळ अस्मितेपोटी लिहिलेलं नाही. तसं असतं, तर चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी व नंतर सोशल मिडियावर हजारो पोस्ट्स पडल्या होत्या, ज्यात बाजीरावाने नाचवलेली शेंडी, काशी-मस्तानीच्या बेंबीखाली गेलेल्या साड्या वगैरे किरकोळ बाबींवर बोंबाबोंब केली होती. (एक पेजही होतं बहुतेक 'Ban Bajirao Mastani' का कायसं!) मी वस्तुनिष्ठ लिहिलं आहे. साधार लिहिलं आहे. त्यात अभिनिवेश नसून विचारपूर्वक लिहिलं आहे. जर तो विचार तुमच्यापर्यंत पोहोचला नसेल, तर मी ती माझ्या लिखाणाची उणीव मानतो आणि इथून पुढे अधिकाधिक स्पष्ट लिहिण्याचा प्रयत्न करीन, इतकंच. <<

      4. Deepika may not be Devine beauty but then who is? I can't seem to recollect anyone. Pls don't take Madhuri Dixit's name. She is past tense.

      >> 'ती दीपिका नाही' हेच पुरेसं आहे. भन्साळी गेली कित्येक वर्षं ह्या सिनेमासाठी थांबला होता. अजून थोडं थांबायचं होतं की ! किंवा एखादा पूर्णपणे नवा चेहरा आणायचा. <<

      5. Priyanka chopra has done a tremendous job according to me. (I think she has proved enough about her acting abilities n that's why she is in Hollywood)

      >> हॉलीवूडला पोहोचणं ही काही गुणवत्तेची पावती होत नाही. गुलशन ग्रोव्हरसुद्धा तिथे पोहोचला आहे आणि नवाझुद्दिन (अजून तरी) पोहोचू शकला नाहीय. प्रियांकाने ह्यापेक्षा चांगली कामं केली आहेत. ती जबरदस्त अभिनेत्री आहे, ह्याबद्दल वादच नाही. पण मला ती 'काशीबाई' म्हणून फिट्ट वाटली नाही. Hope I can have that opinion and say that too ! <<

      6. I didn't find any fault in set designing.
      They did not look Mughal sets to me.

      >> असेल. I may be wrong. <<

      .. 1/2 ..

      Delete
    2. .. 2/2 ..

      And last point is that Bhansali tried something let's say which may be out of his league or maybe according to you he failed completely (which I strongly doubt) but he at least tried. And trying is something, isn't it?

      >> No. It was not out of his league. He has always portrayed Love Stories and thats precisely what he has kept this 'saga' limited to. बाजीरावाचं किंवा मस्तानीचं किंवा इतर कुणाचंही व्यक्तिमत्व उभं केलेलं नाही. पेशव्यांच्या राज्याची झलक दाखवलेली नाही. हा काही War movie ही नाही. ही प्रेमकहाणी आहे आणि भन्साळी बालपणापासून प्रेम कहाण्याच सांगतो आहे. आणि प्रयत्न तर सगळेच करत असतात. कुणीही मला भिकार चित्रपट बनवायचा आहे, असा विचार करून सहसा चित्रपट बनवत नाही. (ह्यालाही अपवाद आहेत.) पण म्हणून टीका करूच नये, असं नक्कीच नाही. एक शेर मी मागे लिहिला होता -

      'जितू' चेहरे हरलेले तू नकोस पाहू
      हरलेलाही हरण्याआधी लढला होता

      <<

      At the end of the day every attempt is commercial, no one is in market for only sake of art but we have to see the bright side of things.

      >> नक्कीच. <<

      Not to offend you or anyone but I feel this way and when I saw 'comment' box in your blog, I could not stop myself.

      >> स्वागतच आहे. अजिबात आक्षेप किंवा राग वगैरे नाही. अश्याप्रकारची वैचारिक देवाणघेवाण होत राहिलीच पाहिजे.<<

      धन्यवाद !

      - रणजित

      Delete
    3. Dilwale was better than Bajirao Mastani???No way man.
      Didnt you see the efforts of Priyanka and Ranveer for the Marathi accents?
      May be it wasn't a masterpiece but 200% better than Dilwale.

      Delete
    4. @निलेश,

      तुलनात्मक चांगला आहे. ही दोन गरीबीमधली भाग्यवान तुलना आहे.
      मला 'दिलवाले' बरा वाटला कारण त्यांनी स्वत: एक स्टोरी लिहिली आणि तिची वाट लावली. 'बा.म.' ने इतिहासाची वाट लावली.

      Delete
  2. सुंदर लिहलं आहे तुम्ही. तुमच not a review आवडला

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  5. रणजीत,
    Review अगदी तंतोतंत लिहिलंय. हा चित्रपट पाहताना अनेकदा TV फोडून टाकावासा वाटला.
    स्वतःचे खिसे भरायला हि लोक किती खालच्या थराला जाऊ शकतात याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बा. म.
    आजकाल बॉलीवूड मध्ये चांगली बॉडी एवढच काय ते हिरोच प्रमाण मानला जात, त्याला अभिनयातला अ सुधा माहित नसतो. तशीच काय ती
    गत त्या रणवीर ची झालीये.
    तुमच्या review मध्ये नसलेला एक मुद्दा मला इथे सांगावसा वाटतो तो असा
    कि जेंव्हा एखादा खरा कलाकार अशी ऐतिहासिक भूमिका करतो तेंव्हा त्या कलाकारावर त्या भूमिकेचा परिणाम होतो याची उदाहरणं आपणास माहिती आहेतच
    तरी एक सांगतो, अमोल कोल्हे. ऐतिहासिक भूमिका हि बर्याच लोकांच्या आयुष्यातला turning point ठरतो. पण हा रणवीर घाणेरड्या deo च्या add करत फिरतो, मिशा काढल्याचा video काय टाकतो,अनेक ठिकाणी माकड चाळे करताना काय दिसतो. मुळात अश्या मुर्ख माणसाला आपण बाजीराव म्हणून स्वीकारुच कस शकतो?
    शेवटी मला असं वाटत कि bollywood मध्ये आता कुठल्याही प्रकारचा दर्जा राहिला नाही… प्रेक्षकांची दिशाभूल केली जातेय…. आणि समाजाला एखादी दर्जाहीन गोष्टच कशी दर्जेदार आहे हे marketing च्या माध्यमातून रीतसर पटवून देण्याचा हा यशस्वी प्रयत्न आहे.
    काळजी वाटते ती येणाऱ्या नव्या पिढ्याणचीच…

    ReplyDelete
    Replies
    1. To certain extent तुमचं म्हणणं पटतंय. एखाद्या व्यक्तिरेखेला सादर करताना तिच्याशी समरस झालो, तर नक्कीच त्याचा आपल्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडत असावा. पण असं म्हटल्यावर ज्या लोकांनी नकारात्मक भूमिका अजरामर होतील इतक्या उत्कृष्ट रीतीने वठवल्या, त्यांच्यावरही परिणाम व्हायला हवा होता. त्यामुळे मला असं वाटतं की ultimately आपल्याला जे आपलं वाटतं, ते आपण उचलतो.
      रणवीर सिंग सामान्यच वाटला मलाही. पण त्याने त्याच्या व्यावसायिक आयुष्यात काय करावे, ह्यावर मी बोलणार नाही.

      Delete
  6. Hi Ranjit,

    I watched the movie in the theater and for long time I was thinking how come I am the only one who has this feeling about the movie. After reading this blog, I felt good that someone else also had similar problems with the overall narrative.

    I certainly could not bear the thought of great Bajirao dancing on "Vaat Lavali" song.

    One more thing - How come Kashibai sings Alabela Sajan Ayo? Marathi has such rich music culture to have marathi song there. Or Bhansali wanted to "reuse" some of his earlier work.

    I 100% agree with your review.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks !
      भन्साळीने इतका विचार केला असता, तर अजून काय हवं होतं !!

      Delete
  7. मला हे परीक्षण अतिशय आवडले आहे. धन्यवाद सगळे स्पष्ट व उलगडून लिहिल्या बद्दल.

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...