Saturday, November 24, 2018

नाविन्यशून्य अतिरंजित भडकपणाचा कडेलोट - मिर्झापूर (Mirzapur - Amazon Prime Web Series)

चालून आलेलं ऐश्वर्य, सत्ता असतानाही केवळ स्वत:च्या नाकर्तेपणाने त्यावर बोळा फिरवण्याची अनेक उदाहरणं इतिहासातही आहेत आणि आपल्या अवतीभवतीही. 
सर्व तऱ्हेची मोकळीक, मुभा असताना, चांगले रिटर्न्स मिळत असताना आणि बजेटचीही विशेष चिंता नसतानाही भारतीय सिनेमेकर्स वेब सिरीजच्या क्षेत्रात कशी चवीचवीने माती खात आहेत, ह्याचं अगदी ताजं ताजं उदाहरण म्हणजे 'अ‍ॅमेझॉन प्राईम'वरची 'मिर्झापूर' ही सिरीज. 
'मिर्झापूर'च्या पहिल्या सीजनचे ९ भाग प्राईमवर एकत्रच प्रदर्शित झाले आहेत.

उत्तर प्रदेशातील 'मिर्झापूर' शहर. ह्या शहरावर वर्षानुवर्षं 'त्रिपाठी' ह्या बाहुबलींचं राज्य आहे. आधी सत्यानंद त्रिपाठी (कुलभूषण खरबंदा) आणि आता अखंडानंद त्रिपाठी उर्फ 'कालीन भैया' (पंकज त्रिपाठी). गालिच्यांच्या निर्मितीआड अफीम आणि देशी कट्ट्यांचा व्यापार करणाऱ्या कालीन भैयाचा बिगडेदिल शहजादा मुलगा म्हणजे 'फुलचंद उर्फ मुन्ना त्रिपाठी' (दिव्येंदू शर्मा) हा ह्या साम्राज्याचा पुढचा वारसदार. मुन्नावर एका खूनाचा गुन्हा दाखल होतो आणि एक इमानदार सरकारी वकील रमाकांत पंडित (राजेश तैलंग) त्याच्याविरुद्ध वकिली करायला उभा राहतो. पंडितजींचे दोन मुलगे गुड्डू (अली फझल) आणि बबलू (विक्रांत मासी) आणि एक मुलगी असते. गुड्डू वर्चस्व आणि सत्तालोलुप असतोच आणि बबलूकडे थोडा सारासारविचार असतो. मुन्नाविरुद्धची केस ह्या दोघा मुलांना वर्चस्वाच्या, इर्ष्येच्या संघर्षात ओढते आणि सगळ्या मिर्झापूरचा चेहरामोहरा बदलतो.


ही सगळी कहाणी आजकालच्या टिपिकल गँगवॉर फिल्म्ससारखीच पुढे पुढे सरकत, पसरत जाते. अनावश्यक भडक चित्रिकरणामध्ये मात्र 'मिर्झापूर' आजपर्यंतच्या सगळ्या भारतीय सिनेमा व सिरीजच्या अनेक पाउलं पुढे आहे. अतिरक्तरंजितपणा जागोजाग भरलेला आहे. एखाद्याला गोळी घातली आणि तो मेला, इतकं सरळसोट तर काहीच नाही. त्याची लिबलिबणारी आतडी पोटातून बाहेर लोंबली पाहिजेत, फुटलेला डोळा बाहेर लटकला पाहिजे, रक्ताचे फवारे तर उडलेच पाहिजेत पण सोबत मांसाचे तुकडेही आलेच पाहिजेत, गळा चिरतानाच्या चिळकांड्या साक्षोपाने दिसल्या नाहीत तर माणूस मेल्यासारखा वाटणारच नाही अश्या अत्यंत कल्पक डिटेलिंगवर भरपूर वेळ घालवला आहे. 
जोडीला अनावश्यक आणि अगदी हास्यास्पद सेक्सची दृश्यंसुद्धा आहेत. मग लायब्ररीत बसून मुलीने केलेलं हस्तमैथुन असो किंवा कुणाचे अनैतिक संबंध, एकाही प्रसंगाचा मूळ कथेशी काही एक संबंध नाही आणि ते केवळ धाडसीपणा, बिनधास्तपणा म्हणून चित्रित केलेले असावेत, असंच जाणवतं, कारण झाडून सगळी दृश्यं फसलेलीही आहेत ! 
इतकी भडक हिंसा आणि उथळ सेक्स दृश्यं असल्यावर शिव्यांनीच काय पाप केलंय ? त्यामुळे त्यामुळे प्रत्येक वाक्यात विरामचिन्हं वापरावीत इतक्या सढळपणे परस्परांच्या माता-भगिनींचं आदरपूर्वक स्मरण केलं जातं. हे तर इतकं अति आहे की ह्या व्यक्तिरेखा सकाळी झोपेतून जाग आल्यावर मनातल्या मनात स्वत:लाही 'उठ की आता मायघाल्या' असं म्हणत असाव्यात. त्याशिवाय त्यांची सकाळच होत नसावी किंवा त्यांना प्रेशरच येत नसावं कदाचित. संवादांतले बहुतांश 'पंचेस' आणि विनोद हे केवळ शिव्यांमुळे आहेत. सर्जनशीलतेच्या दिवाळखोरीचं ह्याहून मोठं दुसरं उदाहरण बहुतेक तरी नसावंच. 
['ब्रिजमोहन अमर रहे' नावाचा 'नेटफ्लिक्स' ओरिजिनल सिनेमाही ह्याच पंथातला असावा. मी तो पूर्वी पाहायला घेतला होता आणि पहिल्या काही मिनीटांतच ह्याच सगळ्या दिवाळखोरीचा उबग येऊन बंद केला होता.]

ह्या सगळ्यावरून एक स्पष्टपणे लक्षात येतं की स्वातंत्र, मोकळीक मिळून काही उपयोग नसतोच. उलट ती एक अजून मोठी जबाबदारी असते. पिसाळल्यासारखं, वखवखल्यासारखं अनावश्यक चित्रण करत सुटणं म्हणजे त्या स्वातंत्र्याला ओरबाडणं झालं. ह्याच्या आधी हा अनुभव 'सेक्रेड गेम्स'मध्ये आला होता. अनुराग कश्यपच्या बहुतांश सिनेमांमध्ये येतच असतो. मोकळीक मिळाली की भडक हिंसा आणि सेक्स दाखवणं, हा अगदी सोपा मार्ग आहे. ह्या मोकळीकीचा वापर करून काही नाविन्यपूर्ण किंवा वादग्रस्त विषय, जे एरव्ही हाताळता येणार नाहीत, ते कुणी हाताळत नाही कारण ते अवघड असेल. सोपं हेच आहे की फाडा पोटं, उडवा मुंडकी, काढा कपडे, झवा मागून पुढून ! हिंसा आणि सेक्स अगदी सहज विकले जातील म्हणून दाखवायचे, इतका सरळसाधा व्यावसायिकपणा ह्या मागे असून, त्यावर उद्या सेन्सॉरची गदा आली की मात्र ह्याच व्यावसायिकपणाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवणार. 

'मिर्झापूर' हा ह्या हलक्या विकृत व्यावसायिकतेचा अजून एक किळसवाणा, तिरस्करणीय चेहरा आहे. हा चेहरा सर्जनशील वगैरे अजिबात नसून मिळालेलं स्वातंत्र्य ओरबाडून उपभोग घेण्यासाठी वखवखलेला आहे. 

अली फझल, विक्रांत मासी, पंकज त्रिपाठी आणि दिव्येंदू शर्मा हे चौघे मुख्य भूमिकांत आहेत. तर श्वेता त्रिपाठी, श्रिया पिळगांवकर, कुलभूषण खरबंदा अशी सगळी मंडळी सहाय्यक भूमिकांत. सगळ्यांचीच कामं जबरदस्त झाली आहेत. त्यांच्या प्रभावी कामांमुळे सिरीज पाहात राहावीशी वाटते, हे मात्र नक्कीच. कुणाही एकाचा पॉवरहाऊस पर्फोर्मंस असा इथे नसून सगळे एकाच पातळीवर दमदार आहेत, हे विशेष. 'अमित सियाल' ह्या गुणी अभिनेत्यांच्या एन्ट्रीला आपल्या भुवया अपेक्षांसोबत उंचावतात. मात्र तो सिरीजमध्ये कशासाठी आहे, हे शेवटपर्यंत समजतच नाही. त्याला पूर्णपणे वाया घालवला आहे. 
कथानकात अनेक ठिकाणी तर्क वगैरे वास्तववादी पाखरांना भुर्रकन उडवून लावलं आहे. विशिष्ट प्रसंगी विशिष्ट पात्र अमुक एक कृती का करतो, त्या मागे त्याचा विचार काय आहे, हे अनेकदा समजत नाही. किंबहुना, हे त्या त्या वेळी अगदी स्वाभाविक घडायला हवं असतं, ते घडलं असतं तर कहाणी कधीच संपली असती त्यामुळे हा सगळा पाणी ओतून ओतून वाढवत नेण्याचा प्रकार आहे, दुसरं काही नाही. 

एकंदरीत प्रभावी अभिनय आणि हिंसक दृश्यांमुळे साहजिकपणे निर्माण होणारा थरार ह्या जोरावर 'मिर्झापूर' उभी आहे. ह्यात कुठल्याही प्रकारची कल्पकता शोधू नका आणि ती शोधणं हा जर तुमचा स्वभावधर्म असेल, तर हिच्या वाटेलाच जाऊ नका !

मिर्झापूर (An Amazon Prime Original Series)
निर्मिती - एक्सेल एन्टरटेनमेंट (फरहान अख्तर, रितेश सिधवानी)
दिग्दर्शक - करण अंशुमन, गुरमीत सिंग, मिहीर देसाई, निशा चंद्रा 
लेखक - करण अंशुमन, पुनीत कृष्ण, विनीत कृष्णन,
कलाकार - अली फझल, विक्रांत मासी, पंकज त्रिपाठी, दिव्येंदू शर्मा, श्वेता त्रिपाठी, श्रिया पिळगांवकर, कुलभूषण खरबंदा, रसिका दुग्गल, शीबा चढ्ढा, अमित सियाल 
छायाचित्रण - संजय कपूर
पार्श्वसंगीत - जोएल क्रेस्टो

- रणजित पराडकर
Related Posts Plugin for WordPress, Blogger...