Showing posts with label चित्रपट परीक्षण. Show all posts
Showing posts with label चित्रपट परीक्षण. Show all posts

Saturday, March 12, 2022

वास्तवाचा विस्तव - द काश्मीर फाईल्स (The Kashmir Files - Movie Review)

सत्याला स्वत:ची वेगळी चमक असते. जसं कितीही धूळ बसली तरी सोनं चमकल्याशिवाय राहत नाही, तशी ही चमक लपू शकत नाही. आपण म्हणतो, 'कोंबडं झाकलं तरी तांबडं फ़ुटायचं राहत नाही'. म्हणजे हेच की जे २४ कॅरेट सोन्यासारखं शुद्ध सत्य आहे ते कुणी कितीही आटापिटा करून झाकायचा, दडवायचा आणि दडपायचाही प्रयत्न केला तरी त्याला कायमस्वरूपी संपवता येत नाही. कारण मुळात सत्य अदृश्य नसतं, आपण त्याच्याकडे पाठ फिरवलेली असते किंवा डोळे मिटून घेतलेले असतात. मग कधी ना कधी एक वेळ अशी येतेच की ते सत्य आरश्यासारखं ढळढळीतपणे समोर येतं आणि मग ते स्वीकारावं लागतंच. 

काश्मिरच्या हजारो वर्षांच्या इतिहासाचं एक असंच सत्य आता स्वीकारण्याची वेळ आलेली आहे. गेली अनेक वर्षं ज्याच्याकडे समाजाने, देशाने, अख्ख्या जगानेच पाठ फिरवली होती, हे ते सत्य आहे. 
ज्या भयाण वास्तवाच्या विस्तवाची झळ फार क्वचित कुणा कवी, साहित्यिक मनाला जाणवली असेल, हे ते सत्य आहे. 
ज्या मुळातून हादरवून टाकू शकेल अश्या विषयाकडे पलायनवादी व चंगळवादी सिनेमासृष्टीने सोयीस्करपणे डोळेझाक केली होती, हे ते सत्य आहे. 
काश्मिरी पंडितांच्या सामुहिक हत्याकांडांचं सत्य. त्यांच्यावरील अघोरी अत्याचाराचं सत्य. त्यांच्या देशोधडीला लागण्याचं, त्यांच्यावरच्या लज्जास्पद अन्यायाचं सत्य. 

गिनतियों में ही गिने जातें हैं हर दौर में हम 
हर कलमकार की बेनाम ख़बर के हम हैं  (निदा फाजली)
 
अश्याप्रकारे आपल्याच देशबांधवांकडे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचा करंटेपणा केला होता. परिणामी, आज अशी परिस्थिती आली आहे की धर्मांध अमानवीपणाचा वरवंटा यशस्वीपणे फिरवला जाऊन पंडितच नाही तर बहुतांश मुस्लिमेतर काश्मिरी देशाच्या इतर भागांत गेले, आश्रित बनले. 'द काश्मीर फाईल्स' च्या निमित्ताने प्रथमच हिंदी सिनेसृष्टीने ह्या विषयाकडे डोळसपणे पाहायची हिंमत केली आहे. 


ही कहाणी एका पंडित कुटुंबाची आहे. १९८८-८९ च्या काळात 'पुष्कर पंडित' हा एक शिक्षक पेश्याचा काश्मिरी पंडित मुलगा, सून आणि दोन नावांसह काश्मिरात राहतो आहे. हे ते काश्मीर आहे जे धगधगत आहे.. इस्लामी धर्मांधतेने लोकांच्या मनात द्वेषाचे वणवे पेटत आहेत. सीमेपलिकडून ह्या कट्टरतेच्या विषारी पिकाच्या वाढीसाठी आवश्यक खतपाणी पुरवलं जात आहेच, पण देश व राज्यातील सरकारी व्यवस्थाही मनात ही वाढ रोखण्याबाबत बऱ्यापैकी उदासिन आहे. हा तो काळ आहे, जेव्हा सत्ताधारी लोक ३७० कलमाच्या आड आणि काश्मीरच्या स्वतंत्र संविधानाच्या जोरावर आपला फायदा करून घेण्यासाठी सगळा काश्मिर पेटू द्यायला तयार आहेत. मुस्लिमेतर काश्मिरींवर अत्याचार वाढत चालले आहेत. 'रलीव, गलीव, सलीव' च्या घोषणा मशिदींतूनच नाही, तर रस्त्या-रस्त्यावर घुमतायत. 
हे पहिल्यांदा होत नाहीय, ह्याआधीही अनेकदा झालंय. २-४ दिवस जरा ताणतणाव राहील, मग सगळं पुन्हा शांत होईल, अश्या भाबड्या गैरसमजात पंडित व बाकी जनता आहे. पण त्यांचा हा गैरसमज गोळीबार, बॉम्बस्फोट, हत्या, खून, दंगली, जाळपोळ, बलात्कार अश्या सगळ्या अत्याचारांच्या वादळात पाचोळ्यासारखा उडून जातो. 
पुष्कर पंडित आणि त्याच्यासारखे लाखो लोक, जे ह्या नरसंहारातून वाचतात, ते देशाच्या इतर भागात पोहोचले आहेत. पुष्करचा नातू दिल्लीच्या युनिव्हर्सिटीत उच्चशिक्षण घेतोय. 
काय आहे, नेमकी ह्या पुष्करची व्यथा आणि कशी झाली त्याची वाताहात. त्याचा काय परिणाम त्याच्या नावावर झाला आहे, ह्याची नोंदणी म्हणजे 'काश्मिर फाईल्स'. 

एक सिनेमा म्हणून हा किती जमला, किती नाही; हा वेगळा भाग आहे. कारण ही धारणा व्यक्तिपरत्वे वेगळी असेल. मात्र ह्या विषयाला हात घालायच्या हिंमतीसाठी मात्र मनापासून दाद द्यायला हवी. हे पहिलं पाऊल आहे, असं नक्कीच समजू शकता येईल. मोठे आव्हान पेलण्यासाठी हिंमतीने टाकलेलं पहिलं पाऊल खूप महत्वाचं असतं. 'काश्मीर फाईल्स'ने फक्त हिंमतीनेच नाही तर पूर्ण आत्मविश्वासाने हे पहिलं पाऊल टाकलं आहे. आता इतर लोकांसाठी हा विषय खुला झाला आहे, जो आत्तापर्यंत एक 'टॅबू' बनलेला होता.

मला असं वाटलं, काश्मीर फाईल्स दोन टोकांवरचा चित्रपट आहे. काही प्रसंग, काही संवाद जबरदस्त जमून आलेले आहेत, तर काही जागी जरा अजून परिपक्वता दाखवता आली असती. असं असूनही एकूणात चित्रपटाचा परिणाम मात्र असा आहे की एकदा तो सुरु झाला की तो संपल्यानंतर चित्रपटगृहातून बाहेर पडेपर्यंतही तोंडून एक शब्दसुद्धा निघणार नाही. हा नक्कीच एक कमालीचा ताकदवान चित्रपट झाला आहे. का ?

१. विषय - ही विषयच इतका प्रभावी आहे की किमान संवेदनशीलतेनेही कुणी त्याला पाहिलं तरी परिणाम होईलच. 
२. नो नॉनसेन्स - बॉलिवूडच्या तिरस्करणीय सवयीनुसार इथे कुठलीही लव्हस्टोरी वगैरे नाहीय. कुठलाही अनावश्यक टाईमपास नाही. चित्रपट विषयाला धरून, विषयाचंच फक्त बोलतो; बाकी कचऱ्याला इथे कचराकुंडीतही जागा नाही. 
३. प्रामाणिकपणा - हाताळणीत, मांडणीत एक प्रकारचा प्रामाणिकपणा सतत जाणवत राहतो. हा चित्रपट विधू विनोद चोप्राच्या पुचाट 'शिकारा'सारखा बुळचटपणा करत नाही. स्वत:च्या भ्याडपणापोटी प्रेक्षकांच्या आणि मुख्य म्हणजे ही ज्यांची कहाणी आहे त्यांच्या भावनांशी खेळ करायचा निर्लज्जपणा इथे तसूभरही नाही. हा चित्रपट अथ:पासून इतिपर्यंत सत्याधारित घटनांचं एक प्रकारचं डॉक्युमेंटेशन मांडत जातो, नाट्यमयपणे. विवेक अग्निहोत्री विषयावरची पकड ढिली होऊ देत नाही.  
४. कलाकार - सर्वच कलाकारांनी जीव ओतून कामं केली आहेत. अनुपम खेरचा पंडित जितका सुन्न करतो, तितकाच चिन्मय मांडलेकरचा बिट्टा अंगावर येतो. दर्शन कुमारचा कृष्णा जितका बेचैन करतो, तितकीच त्याच्या आईचं काम केलेली भाषा सुंबली मन विषण्ण करते. मिथुन चक्रवर्तीच्या ब्रह्म दत्त जितका हताश वाटतो, तितकीच पल्लवी जोशींची राधिका मेमन आतल्या गाठीची. छोट्या भूमिकेत दिसलेले प्रकाश बेलवडी, पुनीत इस्सर, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव सारखे लोकही कुठेच कमी पडत नाहीत. काही प्रसंगांत नुसत्याच दिसलेल्या चेहऱ्यांना जरा अजून व्यक्त होता आलं असतं, पण असो.
५. लेखन - कुठल्याही राजकीय प्रपोगंडाला थारा न देता सत्याधारित मांडणी केल्याबद्दल विवेक अग्निहोत्री आणि सौरभ पांडे ह्या लेखकद्वयीचं अभिनंदन ! १-२ प्रसंग मला फारसे पटले नाहीत, मात्र त्याशिवाय सगळंच आटोपशीरच नाही तर मर्मावर बोट ठेवणारं आहे. काही संवाद सूचक, बोचरे आहेत. 


संवेदनांची जडणघडण होण्याच्या वयात वर्तमानपत्रात रोजच्या रोज ज्यांच्या अमानुष शिरकाणाच्या बातम्या मी वाचत होतो, थोडीफार संवेदनशीलता मूळ धरलेल्या वयात आल्यावर त्यांच्या आक्रोशाला पडद्यावर आलेलं पाहतो आहे. हा प्रवास खरं तर खूप मोठा आहे. इतका वेळ लागायला नको होता. युक्रेन-रशिया युद्ध सुरूही झालेलं नसताना त्या प्रकरणाचं सिनेमॅटिक डॉक्युमेंटेशन करण्याचं काम चित्रपटकर्त्यांनी सुरूही केलं होतं. आपल्याकडे मात्र हिंसाचाराचा नंगानाच सुरु असताना लोक गिळगिळीत प्रेमकहाण्या रंगवण्यात रममाण होते. अनेक दशकांनंतर का होईना, कुणाला तरी जाग आली आहे. आता तरी आपण ह्या विचारपूर्वक विस्मृतीत ढकलण्याचा बऱ्यापैकी यशस्वी प्रयत्न केलेल्या विषयाला वाचा फोडू. 'काश्मिर फाईल्स' च्या निमित्ताने लोक लिहिते, बोलते होतील. येणाऱ्या पिढीला áआपला एक इतिहास असासुद्धा आहे' ह्याची कदाचित जाणीव होईल. 
अगदीच काही नाही तर ह्या विषयाच्या नावाखाली दुसरा 'शिकारा' बनणार नाही, ही आशा आहे. 

- रणजित पराडकर 

Thursday, June 11, 2020

परिणीता - एका कवितेची १५ वर्षं - (15 Years of Parineeta)

शरदचंद्र चट्टोपाध्याय ह्यांच्या दोन व्यक्तिरेखांनी भारतीय चित्रपटाला वारंवार भुरळ घातली आहे. एक म्हणजे 'देवदास' आणि दुसरी 'परिणीता'. 

२००५ ला विधू विनोद चोप्रा आणि प्रदीप सरकार ह्यांनी हिंदीत 'परिणीता' बनवला, त्याआधी हिंदीत ही कहाणी दोनदा बनवून झाली होती. 'देवदास' आणि 'परिणीता' ह्या दोन्ही प्रेमकहाण्या, किंबहुना प्रेमत्रिकोण. आणि बहुतेक तरी वारंवार आकर्षित होण्याचं कारणही हेच असावं. 'प्रेम त्रिकोण' हे बॉक्स ऑफिसवर हमखास चांगल्या भावात विकलं जाऊ शकणारं कथानक आहेच. 
मला जुन्या (आणि इतर भाषांमध्ये बनलेल्या काही) 'परिणितां'बद्दल फारशी माहिती नाही, पण २००५ चा 'परिणीता' बॉक्स ऑफिसवर खूप मोठा हिट नव्हता. २००५ च्या सर्वाधिक गल्ला जमवणाऱ्या चित्रपटांच्या यादीत पहिल्या दहांतसुद्धा तो आला नाही आणि ट्रेड ऍनालिस्ट्सनी बहुतेक तरी त्याच्यावर 'सरासरी'चाच शिक्का मारला असावा.
दुसरी गोष्ट ही की, एक चित्रपट म्हणूनही 'परिणीता' फार उत्तम वगैरे नक्कीच नव्हता. खरं तर त्यात बरेचसे दोषही होते आणि चुकासुद्धा होत्याच. उदाहरणार्थ - एका गाण्याचं रेकॉर्डिंग करतानाच्या दृश्यात शब्द तयार नसताना गाण्याचं रेकॉर्डिंग सुरु होणं आणि गायकांनी चक्क 'ट्रॅक'वर, तेसुद्धा री-टेक्स घेत गाणं दाखवलं आहे. जे १९६२ च्या काळी अगदीच प्रचलित नव्हतं. ही एक सिनेमॅटिक लिबर्टी समजून घेता येईल. मात्र असे इतरही काही तर्काच्या चौकटीत न बसणारे प्रसंग ह्यात आहेत. शेवटचा प्रसंग तर भावनिक ताणतणावाचा कमी आणि अंमळ विनोदीच वाटावा इतका फसलेला आहे. 
अनेक दोष असले, कहाणी नावीन्यशून्य असली तरीही 'परिणीता' मनात घर करून का बसला आहे ? काही कारणं आहेत. 


'परिणीता' म्हणून 'विद्या बालन'ला पाहणं हे अगदी नेत्रसुखद होतं. सोबत सैफ अली खान आणि संजय दत्तसारखे प्रस्थापित असतानाही  तिचा पडद्यावरचा वावर इतका सहज होता की हा तिचा पहिला चित्रपट असावा, असा संशयही येऊ नये ! 'ललिता' च्या व्यक्तिरेखेसाठी आवश्यक परिपक्वता विद्या बालनच्या एकंदरीतच व्यक्तिमत्वात आहेच आणि ती तिथे उतरली असावी. तिच्या सौंदर्यातला गोडवा आणि साधेपणा असा काही होता की पाहणारा प्रत्येक जण शेखर किंवा गिरीश बनावा ! ह्या मधाळ चेहऱ्याच्या आश्वासक वावर व समंजस, संयत अभिनयाने 'परिणीता' जिवंत केली. विद्याची परिणीता कुठल्याच प्रसंगात तिचा संयतपणा सोडत नाही. शेखरसोबतचे हळवे क्षण असोत किंवा कुटुंबीयांसोबतचे मजा-मस्करीचे, प्रेमभंगाचा आघात असो किंवा अपमानाचे घाव असोत, सुख-दु:खाचे सगळे प्रसंग स्वतःचा तोल यत्किंचितही न ढळू देता स्वीकारणारी सर्वगुणसंपन्न नायिका अनेक वर्षांनी पडद्यावर आली होती आणि म्हणूनच तिच्यावर प्रेम जडलं. 
शेखर आणि ललिताचं नातं खूप नाजूक आहे. ललिताला शेखरच काय, इतरही सगळे अगदी गृहीतच धरत असतात. स्वतः: त्या दोघांनाही आपल्या मनात एकमेकांविषयी नक्की काय भावना आहे, हा प्रश्नही पडत नसतो, इतके ते एकमेकांसाठी गृहीत असतात. शेखरची आई ललितामध्ये एक आदर्श सून पाहत असते, त्या दोघांची घनिष्ट मैत्री तिला माहीतच असते, तरीही 'शेखरला लग्नासाठी मुलगी पाहायला जाण्यासाठी राजी कर' असं ललिताला बिनदिक्कत सांगते. आणि ललिताच्या चेहऱ्यावर क्षणार्धासाठीच गोंधळाची भावना तरळते. 'तू नाही म्हणालास म्हणून मी नाईटक्लबला गेले नव्हते', असं सांगताना मुसुमुसु रडणारी ललिता तर आपलीच एखादी हवीहवीशी गोंडस मैत्रीण वाटते. शेखरशी गैरसमजातून वाद झाल्यावर तो तिला अद्वातद्वा बोलतो, डोळ्यांत पाणी आणून ते सगळं ऐकून घेणारी ललिता तेव्हाही आपला तोल ढळू देत नाही. हे सगळी घुसमट आणि हे सगळे चढ-उतार विद्या बालनने अतिशय सहजतेने सादर केले आहेत. 



अर्थात, त्यात प्रदीप सरकारचेही क्रेडिट आहेच. अनेक प्रसंगात 'डिरेक्टर्स टच' स्पष्टपणे जाणवतो.
संतापलेला शेखर ललिताच्या थोबाडीत लगावून तणतणत दासबाबूंच्या हवेलीतून शेजारी स्वत:च्या घरी येतो. तो रस्ता क्रॉस करतो आणि तिथे बसलेला एक हमाल/ गाडीवाला बिडी शिलगावतो. माचिसचा उजेड पडदाभर वगैरे पसरत नाही. तिथे कंदील लावलेला असतोच. पण ती माचीस हे दाखवते की 'ठिणगी पडलेली आहे'. 'बॅकग्राऊंड'ला 'रतियां कारी कारी रतियां...' हे गाणं सुरु होतं. हा सगळा प्रसंग काव्यात्मक आहे. किंबहुना, 'परिणीता'चा ही आणि अशी काव्यात्मकता अनेकदा जाणवते. 
शेखर आणि ललिता एकमेकांना प्रेमाची कबुली देतात, त्यानंतर दार्जिलिंगला कामासाठी जाणारा शेखर ट्रेनमध्ये 'यह हवायें गुनगुनायें..' हे अवीट गोडीचं उडतं गाणं गातो. गाणं ट्रेनमध्ये आहे, तिच्याच तालावर आहे कारण प्रेमाची गाडी रुळावर आल्याची भावना मनात आहे. शेवटी ते गाणं 'झुकझुक झुकझुक' धीमी व कमी होत संपतं कारण शेखरच्या अपरोक्ष त्याच्या प्रेमाच्या गाडीला ब्रेक लागला आहे. हे सगळं खूप प्रतीकात्मक आहे. ह्या गाण्याच्या आधी नवीनबाबूच्या केबिनमधून चारित्र्यहनन करणारे अपमानास्पद बोल ऐकून ललिता रडत बाहेर पडते आणि त्यानंतर लगेच गाडीत बसून गिटार वाजवत गाणारा शेखर दिसतो. That's how he is. तो उथळ नसला, तरी अनभिज्ञ आहे. इतका की त्याला त्याच्या वडिलांचे दुष्ट हेतू ओळखता येतच नाहीत. म्हणून जेव्हा प्रत्यक्षात ललिताच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे, तेव्हा तो मात्र 'धरती सजी अंबर सजा, जैसे कोई सपना...' गाऊ शकतो आहे. ही गाण्यांची पेरणी आणि त्यांचं सुंदर चित्रण 'परिणीता'चं वेगळेपण आहे. 
एका प्रसंगात शेखर ललिताला म्हणतो, 'हिसाब.. और मैं ?', जोडून पुढच्याच प्रसंगात शेखरच्या बाप - नवीन बाबू - त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या ललितालाच म्हणतो, 'सारा खेल ही हिसाब-किताब का हैं !' लगेच पुढे असंही म्हणतो 'जहाँ मुनाफा ना हो वहाँ बिलकुल भी वक़्त बरबाद नहीं करना चाहिये'! 
अजून एका प्रसंगात गायत्री स्वतःच्या वाढदिवसाचा भला मोठा महागडा केक कापतेय आणि त्याच वेळी दुसरीकडे ललिता घरातच केकपात्रात केक करायला ठेवून ओव्हनचं बटन ऑन करते अन् फ्युज उडतो ! असे अनेक प्रसंग आहेत ज्यातले अंडरकरंट्स पाहणाऱ्याला समजून येतात. 

'परिणीता' काही पल्लेदार संवाद, पंचलाईन्सचा चित्रपट नाही. तो अश्याच अंडरकरंट्स आणि काव्यात्मकतेचा चित्रपट आहे. 
ह्या काव्यात्मकतेला महत्वाचा हातभार शंतनू मोईत्राचा आहे. एका मुलाखतीत शंतनू मोईत्राने असं कबूल केलं आहे की, परिणीताचं संगीत बनवताना त्याने आरडी बर्मनच्या विचारप्रक्रियेचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला होता. चित्रपट रिलीज झाल्यावर त्याला 'फिल्मफेअर'चा 'आरडी बर्मन अवॉर्ड फॉर न्यू म्यूझीक टॅलेंट' मिळाला, हा योगायोगही काव्यात्मकच ! ह्या सिनेमातून अनेक वर्षांनी अशी गाणी ऐकायला मिळाली की ती ऐकताना असं वाटलं की बनवणाऱ्याने आपल्या मनाचा एक तुकडा ह्यात घोळवून घोळवून विरघळवला आहे. सगळी गाणी मधुर (मेलोडिअस) आहेत. ती १९६२ च्या काळाला साजेशी आहेत. त्यात कुठलाही टेक्नो कलकलाट नाही किंवा शब्दांची ओढाताण नाही. 
'परिणीता' हा एक 'कम्प्लिट अल्बम' होता. त्यात 'पियू बोले....' आणि 'यह हवायें...' सारखी प्रेम गीतं आहेत, तर 'सूना सूना मन का आंगन..' आणि 'रात हमारी तो..' सारखी विरहगीतंही आहेत. 'कैसी पहेली जिंदगानी...' हा डान्स नंबर आणि 'धिनक धिनक धा..' हे लोकगीत सदृश विनोदी अंगाचंही गाणं आहे. प्रत्येक गाण्यासाठी स्वानंद किरकिरेचे अर्थपूर्ण शब्द होतेच, पण प्रत्येक गाण्यात शंतनू मोईत्राची मेहनतही आहे. कुठलंच गाणं पाटी टाकलेलं नाही. श्रवणीय गाण्यांची अचूक पेरणी आणि त्यांचं उत्तम चित्रीकरण ही विधू विनोद चोप्राची खासियत 'परिणीता'चं अजून एक वेगळेपण आहे. 

संजय दत्त आणि सलमान खान ह्या दोन अतिशय ओंगळवाण्या इसमांना काही चांगल्या कलाकृतींचा हिस्सा होण्याची संधी मिळाली. 'परिणीता' ही संजय दत्तसाठीची ती एक संधी होती. तो वाईट दिसलाय, त्याने नेहमीप्रमाणेच सुमार काम केलंय, पण तरी तो खटकला नाहीय कारण त्याच्याशिवाय इतर सगळं बऱ्यापैकी जमून आलं आहे. 


सैफ अली खान, हा एक अंडररेटेड अभिनेता आहे. त्याने साकारलेला शेखर, हा त्याच्या करियरमधल्या अनेक उत्तम कामांपैकी एक आहे. गाण्यांच्या चित्रीकरणांत सैफची सांगीतिक समज कळून येते. आशिक आवारा, ओले ओले... वगैरे थिल्लरपणापासून सुरुवात केलेला सैफ अली खान 'दिल चाहता है' नंतर जणू काही आमूलाग्र बदलला. मानेवरचे केस बावळटासारखे उडवत पोरकट नाचणारा भिक्कार नाईंटीजमधला सैफ ते 'पियू बोले...' मध्ये तालावर गिटारचे स्ट्रोक्स देणारा, पियानोसमोर सराईतासारखा बसणारा सैफ हा प्रवास खूप मोठा आहे. एके ठिकाणी वाचण्यात आलं होतं की, शेखरच्या भूमिकेसाठी सैफ 'फर्स्ट चॉईस' नव्हता. सुदैवाने का होईना, सैफच शेखर बनला आणि त्यात तो अगदी चपखल वाटला आहे. 'पडद्यावरची केमिस्ट्री' हा योग्य कास्टिंग आणि अभिनेत्यांमधली योग्य समज ह्याचा मिलाफ असतो, असं मला वाटतं. सैफ आणि विद्यामधली इथली केमिस्ट्री मस्त जमून आलेली आहे. मुख्य व्यक्तिरेखांचं असं एकमेकांशी घट्ट मिसळून येणं, ही 'परिणीता'ची अजून एक खासियत आहे.     


'परिणीता' हा केवळ एक चित्रपट नसून ती एक श्रवणीय सुरेल कविता आहे. विद्या बालन, शंतनू मोईत्रा आणि प्रदीप सरकार ह्यांची. त्यातलं काव्य अगदी सुदृढ सशक्त नसेल, पण अगदीच कमजोर अशक्तही नाही. महत्वाचं हे की त्यात 'काव्य आहे' आणि काव्य हे नेहमी सुंदरच असतं. म्हणून अनेक दोष, उणिवा असूनही 'परिणीता' ला मनात विशेष स्थान आहे. प्रत्येक सुंदर आविष्काराला असतं, तसंच. हक्काचं. 

- रणजित पराडकर 

Tuesday, May 19, 2020

एका 'नोबडी'चं पाताळदर्शन ! - पाताळ लोक (Web Series Review - Paatal Lok - Amazon Original)


ह्या जगाच्या अतिप्रचंड पसाऱ्यात असंख्य लोक आपापली थोडीथोडकी जागा पकडून आहेत. हे लोक कधी आले, कुणाला समजलं नाही. हे कधी जातील, कुणाला कळणारही नाही. ह्यांची कुणीही कधीच नोंद घेतलेली नाही, घेणारही नाही. ह्यांच्यासाठी रोजचा दिवस हळूहळू करत मावळण्यासाठीच उगवत असतो. ह्या उगवतीपासून मावळतीपर्यंत दरम्यानच्या काळात हे लोक एकच एक दिवस पुन्हा पुन्हा जगतात. मालकाने पाठीवर लादलेल्या ओझ्याला गपगुमान मान खाली घालून वाहून नेणाऱ्या गाढवाप्रमाणे हे लोक परिस्थितीने पाठीवर लादलेल्या जबाबदाऱ्यांना आयुष्यभर मान खाली घालून गपगुमान वाहून नेत राहतात. फरक इतकाच की ह्यांचा प्रवास वर्तुळाकार असतो. गोल गोल फिरत राहतात. आयुष्यभर मरमर, वणवण करूनही ते कुठेही पोहोचत नाहीत. जिथून सुरुवात झालेली असते, तिथेच पुन्हा पुन्हा येत राहतात. बहुतेकदा ही व्यवस्था त्यांनी स्वीकारलेली असते आणि ह्या सत्याशी मनापासून जुळवून घेऊन ते समाधानीही असतात. 
पण एखादा 'हाथी राम चौधरी' असतो, ज्याला एक संधी मिळते, नेहमीची वाट बदलून स्वतःचा परीघ बदलायची. ही बदललेली वाट बिकट असते, तिथून जाण्यासाठी, चालत राहण्यासाठी खूप किंमत मोजायला लागणार असते. पण किती, हे त्याला सुरुवातीला माहीत नसतं. मात्र हळूहळू त्याच्या मनाची तयारी होते आणि तो आव्हान स्वीकारतो. एखाद्या मुंगीचं निरर्थक आयुष्य जगणारा 'हाथी राम' हत्ती बनतो आणि निबिड जंगलात बिनधास्त घुसतो. पुढे जे व्हायचं ते होतंच. 

दिल्लीच्या एका किरकोळ पोलीस ठाण्यातला फुटकळ केसेस करण्यात करियर गेलेला एक किरकोळ इन्स्पेक्टर हाथीराम चौधरी (जयदीप अहलावत). त्याच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक घटना घडते. नावाजलेला आणि वादप्रिय टीव्ही पत्रकार संजीव मेहरा ह्याच्या हत्येच्या कट उधळला जाऊन चार मारेकऱ्यांना हत्यारांसह पकडलं जातं. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमकडून हा कट उधळला जातो आणि ही एक 'ओपन अँड शट' केस त्याच पद्धतीने हाताळण्यासाठी वरिष्ठांसमोर हाथीरामसारखा कर्तृत्वशून्य अधिकारी अनायसेच येतो. मोठी नावं जोडलेली एक 'हाय प्रोफाईल' केस प्रथमच हाथीरामला मिळते आणि तोही मोठ्या उत्साहाने ही केस 'ओपन अँड शट' करण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम सुरु करतो. मात्र लौकरच त्याला ह्या केसला अजून काही कंगोरे असल्याचं जाणवतं आणि तो अजून खोलात शिरायचा प्रयत्न करतो. खोलात जाणारा हाथीराम कुठे कुठे पोहोचतो, त्याच्या हाताला काय काय लागतं, त्याला काय काय किंमत मोजायला लागते आणि सरतेशेवटी हा सगळा प्रकार त्याला कुठे पोहोचवतो, ह्या केसचं खरं रूप काय असतं, अश्या अनेक उत्कंठा ताणणारी 'पाताल लोक' सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं देते. 

'जयदीप अहलावत'ला मी सगळ्यात पहिल्यांदा 'कमांडो' मध्ये पाहिला. 'विद्युत जमवाल नावाचा नवा ऍक्टर आलाय आणि तो खतरनाक स्टंट्स, फाईट्स करतो', केवळ ह्या एका कारणासाठी मी तो सिनेमा पाहिला होता आणि त्यातला क्रूरकर्मा व्हिलन जो जयदीप अहलावतने साकार केला होता, हादरवून गेला होता. चेहऱ्यावर असलेले देवीसारखे व्रण ओम पुरींची आठवण करून देणारे, पण हा अभिनेता वेगळ्या पठडीतला. खरं तर कमांडोच्या आधी 'गँग्स ऑफ वासेपूर'मध्ये तो दिसला होता, पण सिनेमातला त्याचा छोटा, पण महत्वाचा रोल संपल्यावर मनोज वाजपेयी येतो आणि सिनेमा खिश्यात घालतो, त्यामुळे त्यातला अहलावत फारसा लक्षात राहणार नव्हताच. नंतर 'रईस'सारख्या सिनेमांतुनही त्याच्या दुय्यम भूमिका लक्षात राहिल्या नाहीत. पण 'राज़ी'मधला रॉ अधिकारी मात्र चांगलाच लक्षात राहिला. ह्या गुणी अभिनेत्याला प्रथमच अशी मध्यवर्ती व्यक्तिरेखा साकारायला मिळाली असावी. 'पाताल लोक' ही कहाणी अनेकांच्या असली तरी मुख्य व्यक्तिरेखा 'हाथीराम'चीच आहे आणि इतक्या महत्वाच्या व्यक्तिरेखेचं 'जयदीप अहलावत'ने सोनं केलं आहे. त्याच्या देहबोलीत होणारे अनेक बदल स्पष्ट जाणवत राहतात. हाथीराम हा एक सामान्य माणूस आहे. कुणी 'लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर' नाहीय. त्याचा सामान्यपणा त्याच्यातल्या चांगल्या-वाईटासह अहलावतने आपलासा केला आहे आणि म्हणूनच तो खराखुरा उतरलाही आहे. ह्याचं क्रेडिट लेखकांनाही जाईलच कारण नक्कीच ही एक 'ऑथर बॅक्ड' रोल आहे. 

ह्याच लेखकांना मात्र एक छोटंसं 'डेबिट'ही जायला हवं. फक्त आपलं स्वतः:चं सेक्युलर, न्यूट्रल वगैरे असण्यासाठी अनावश्यक 'ब्राह्मण आणि इतर' असा अँगल कहाणीत घुसडणे, ह्या हास्यास्पद मूर्खपणातून सर्जनशील लोकांनी बाहेर पडायला हवं. I mean, भारताच्या कोणत्या कोपऱ्यात दलितांचा नेता ब्राह्मण आहे, हे मला तरी माहीत नाही. दलितांच्या मतांसाठी त्यांना वापरून घेणं, जवळ घेणं हा भाग वेगळा आणि 'दलितांचा नेता' हीच इमेज असणं, हे वेगळं असं मी मानतो. दलितांचा नेता दलितच दाखवला असता, तरी कहाणीत तसूभरसुद्धा फरक पडला नसता. तरी ही ओढाताण कशासाठी आणि का, हा प्रश्न लेखक-दिग्दर्शकांनी स्वत:लाच विचारायला हवा. हे प्रपोगंडा आता लोकांना समजून येत असतात, आताचा सोशल मीडिया साक्षर प्रेक्षक खूप बारकाईने सगळीकडे लक्ष ठेवून असतो आणि मोकळेपणाने व्यक्तही होत असतो, हे आता लक्षात घ्यायला हवं.

अर्थात, हा एक प्रपोगंडाचा छोटासा भाग वगळता 'पाताल लोक' अगदी बांधीव आहे, असंही नाही. नऊ भागांच्या वेब सीरिजमध्ये कहाणी सांगण्यासाठी आणि तरीही तिला उत्कंठावर्धक ठेवण्यासाठी काही अनावश्यक भागसुद्धा ह्यात आहेच. उदाहरणार्थ, हाथीरामच्या मुलाचं उपकथानक. तसेच अटक केलेल्या चार आरोपींचे पुर्वायुष्य वगैरे भागही. मला असं वाटलं की मूळ कथा ही एका चित्रपटापुरतीच आहे. तिला प्रत्येकी ४०-४२ मिनिटांच्या नऊ भागांमध्ये मांडण्यासाठी पसारा वाढवत नेला आहे. चांगली बाब इतकीच की पसारा वाढवल्यावर तो आवरण्यासाठी अनेक मालिकांच्या अखेरच्या भागांमध्ये जी उरकाउरकी केली जाते, तशी घिसाडघाई इथे केलेली नाही. काही भाग आहे तसाच सोडून दिला आहे. प्रत्येकच उपकथानक त्याच्या पूर्णत्वाला आलंच पाहिजे असं काही आवश्यक तर नाहीच. 

'अहलावत'व्यतिरिक्त अजून एका महत्वाच्या भूमिकेत - पत्रकार 'संजीव मेहरा'च्या भूमिकेत - 'नीरज कबी' हा एक तगडा ऍक्टर पुन्हा एकदा आहे. संजीव मेहराला पाहताना टीव्हीवर झळकणाऱ्या एका पुरस्कारप्राप्त वरिष्ठ पत्रकार महोदयांची आठवण सतत येत राहते. पत्रकारांच्या ढोंगीपणा उघड करणारी ही व्यक्तिरेखा आहे. आणि कबी पुन्हा एकदा त्याची कुवत दाखवून देतो. इतर सहाय्यक भूमिकांत हाथीरामचा सहकारी 'इम्रान अन्सारी'च्या भूमिकेतला 'ईश्वक सिंग' लक्षणीय आहे. 
'अभिषेक बॅनर्जी'ने साकारलेल्या 'हथोडा त्यागी'चा प्रभाव इतका जबरदस्त आहे की त्याची पूर्णकहाणी सविस्तर दाखवणारा एक स्पिन-ऑफ करायला हवा, असं वाटतं. थंड डोक्याने थरकाप उडवू शकेल असे खून पाडणारा 'हथोडा' अंगावर येणारा आहे. 
'गुल पनाग'ने एक अतिशय क्षुल्लक भूमिका केली आहे. ह्या लोकांना घर चालवावं लागतं, बिलं भरायची असतात, असं समजून घ्यायला हवं बहुतेक. राजेश शर्मा, स्वस्तिका मुखर्जी, विपीन शर्मा वगैरे माहितीतले चेहरे, नावं आपापली कामं करून जातात. त्यांना फार विशेष असा काही वाव नाहीय.  

'किल्ला' चे दिग्दर्शक अविनाश अरुण आणि 'परी'चे दिग्दर्शक प्रेषित रॉय ह्या द्वयीने कहाणीवरची पकड कुठेही ढिली पडू दिली नाहीय. थ्रिलर पाहताना ही पकड माझ्यासारख्या सामान्य प्रेक्षकांसाठी - ज्याचा फार पटकन रसभंग होऊ शकतो - फार महत्वाची असते. गेल्या काही दिवसांत अनेक थ्रिलर्स पाहत असताना दिग्दर्शकाची एक छोटीशी डुलकी सगळा खेळ बिघडवून गेल्याचे अनेक अनुभव मला आले आहेत. 'पाताल लोक' मात्र इथेच वेगळी ठरली. 
एक निर्माती म्हणून आपलं वेगळं पण अनुष्का शर्माने ह्यापूर्वीही दाखवलं आहे. खरं तर सीरिज पाहण्याचं प्राथमिक कारण हेच होतं की, अनुष्का शर्माने प्रोड्युस केली आहे. हा कन्टेन्ट वेगळा असणार, चांगला असणार असा विश्वास आधीच निर्माण झाला होता. हे एका निर्मात्याचं यशच म्हणायला हवं !  

एकूणात गेल्या काही महिन्यांत आलेल्या काही उल्लेखनीय वेब सीरिजच्या ओळीत 'पाताल लोक'ही नक्कीच आहे. आवर्जून पाहावी, असा हा कन्टेन्ट आहे. 

टीप - सबटायटल्स चालू करून पाहायला लागू शकते कारण बऱ्याचदा लोक तोंडातल्या तोंडात बोलल्यामुळे संवाद नीट समजतच नाहीत. 'चांगलं काम करणं म्हणजे तोंडातल्या तोंडात बडबडणं' हा सध्याचा एक विचित्र पायंडा आहे, अशीही एक समजूत होत चालली आहे. असो.  

- रणजित पराडकर 

Monday, February 10, 2020

सफरचंदात शिजवलेली गिळगिळीत मिसळ - शिकारा - (Movie Review -Shikara)

एकोणीसशेे नव्वदच्या आसपास मी वर्तमानपत्र वाचायला सुरु केलं असावं. त्या काळात एक बातमी कुठल्याश्या कोपऱ्यात रोज वाचायचो. 'काश्मिरमधला हिंसाचार'. पंडितांचा संहार त्या काळात नियमितपणे चालू होता. काश्मिरात अत्याचार बोकाळला होता. वर्तमानपत्रांनी त्या बातम्यांना क्वचितच मथळ्याची जागा दिली. अपवादानेच अग्रलेखातून कुणी जळजळीत अंजन ओतलं. असंख्य लोक काश्मिरातून हाकलले जात होते. बेघर होत होते. मला त्या वयात कळतच नव्हतं की हे चाललंय तरी काय ? हे कोण लोक आहेत आणि त्यांच्याच देशातल्या लोकांना ते का त्रास देत आहेत? राहतं घर, जमीन, मित्र, नातीगोती सोडून, गाव सोडून असे लोक का निघून येत आहेत? सरकार काहीच का करत नाहीय? हे देशोधडीला लागलेले लोक कसे जगत असतील? रिफ्युजी कँप म्हणजे काय? ह्यांतले काही प्रश्न मला पडत असत आणि तितकी समजच नसल्यामुळे काही पडतही नसत.

आज ३० वर्षांनंतर काश्मिरी पंडीतांचा विषय घेऊन विधु विनोद चोप्रा 'शिकारा' घेऊन आले आणि मला गंमत ही वाटली की वरच्या प्रश्नांपैकी बहुतांश प्रश्न त्यांनाही पडले असावेत, असं वाटत नाहीय. हा त्यांचा निरागस भोळसटपणा आहे की पुचाट व्यावसायिकपणा की ज्या पंडित समुदायातून आले असल्याचं ते छातीठोकपणे सांगतात त्यांच्याविषयी त्यांना स्वत:लाच असलेली निर्लज्ज अनास्था आहे की अजून काही, हे सांगता येणार नाही. किंबहुना, त्यावर सत्यशोधन करायची गरजच नाहीय कारण 'आजवर न सांगितली गेलेली काश्मिरी पंडितांची कथा' म्हणून जे ह्या सिनेमाबद्दल बोस्टिंग चाललंय, त्याचा विचार करता, हे कथाकथन निव्वळ खोटारडं, अप्रामाणिक व दांभिक आणि म्हणूनच उथळ, निष्प्रभ व सुमारही आहे, ह्याबद्दल वादच नाही.

'काश्मिर प्रश्न फार गुंतागुंतीचा आहे', असं एक अतिशय गोंडस विधान अनेकदा केेेेलं जातं आणि त्याच्या मागे आपलं अपूर्ण ज्ञान किंवा सपशेल हताशा किंवा धर्मनिरपेक्षतेतला बेगडीपण सोयीस्करपणे लपवताही येते. मात्र हे विधान खरंही आहेच. प्रश्न गुंतागुंतीचा आहेच. पण खरं हेही आहे की माथेफिरु काश्मिरी फुटिरतावद्यांनी ऐंशीच्या दशकात काश्मिरचं इस्लामीकरण करायच्या हेतूने हिंदू काश्मिरी पंडितांवर क्रूर अत्याचार केले आहेत. जगातल्या विविध 'एथनिक क्लिन्सिंग'च्या घटनांपैकी ही एक महत्वाची मोठी घडामोड होती, ज्यात लाखो काश्मिरी हिंदू विस्थापित झाले, हजारो मारले गेले. स्त्रियांवर अत्याचार झाले. बळजबरी धर्मांतरं केली गेली. बर्फाचा रंग पांढरा असतो. पण काश्मीरच्या बर्फाचा रंग लाल आहे. रक्ताचा 'लाल'. कदाचित काहींना हा रंग भगवा वाटत असेल. पण रक्त कुणाचंही असलं तरी लालच असतं. वर्षानुवर्षं, पिढ्यान् पिढ्या काश्मिर खोरं धुमसत राहिलं आहे. तसं त्याला ठेवलं गेलं आहे. ज्याला 'नंदनवन' म्हणून अभिमानाने शिरपेचातल्या तुऱ्याप्रमाणे आपण मिरवतो, त्या नंदनवनात पंडितांच्या हत्यांनी अशांतता व असुरक्षिततेची बीजं रुजवली आहेत. असुरक्षिततेच्या झाडाला असंतोषाची विषारी फळं येत असतात आणि हिंसेच्या उष्ण हवेने बदल्याच्या भयंकर आगी भडकत असतात. हा इतिहास आहे आणि एक वैश्विक सत्यही. पाचही इंद्रियांच्या जाणिवांतून एका निष्पाप मनांत जेव्हा असंतोषाचं विष झिरपतं तेव्हा डोक्यात बदल्याची आग पेट घेते. पंडितांच्या डोक्यांत अशी आग कधी पेटली असेल का ? की हा समुदाय मुळातच शांतताप्रिय आहे व त्याने ह्या भयानक संहाराकडेही सबुरीच्या नजरेने पाहिलं? की त्यांच्यासोबत जे झालं ते बरोबरच होतं ? त्यांच्यावर झालेल्या अनन्वित अत्याचारांना व्यवस्थेने तर कधी थारा दिला नाहीच, पण कलात्मक पुरोगामी अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा सिलेक्टिव्ह पुळका अधूनमधून येणाऱ्या चित्रपटजगतानेही ह्या स्फोटक विषयाला कधी हात का घातला नाही ? 'हैदर'सारखे प्रभावी चित्रपट इथे बनतायत, पण त्यांत औषधापुरताही पंडितांचा उल्लेख असतच का नाही ? का असे एकांगी चित्रपट प्रभावीपणे बनवले जातात ? अश्या अनेक भेडसावणाऱ्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न 'शिकारा' करेल असं वाटत होतं.

प्रत्यक्षात मात्र 'शिकारा' एक बुळबुळीत प्रेमकथाच आहे. तिच्यासोबत काश्मिरी पंडितांचं विस्थापन दाखवलं गेलं आहे. जे खूपच सौम्यपणे चित्रित केलं गेलेलं आहे आणि जो हिंसाचार झाला त्याचं खापर अगदी सहजपणे अमेरिकेच्या माथी फोडलं गेलं आहे. इथे दाखवलेले मुसलमान केवळ पंडितांच्या मालमत्तेवर डोळा ठेवण्याइतपतच खलवृत्तीचे दाखवले आहेत. ते गोड गोड बोलून हे विस्थापन घडवून आणतात. कुठेही कुणी माथी भडकावणारी भाषणं देताना दिसत नाही. कुठेही कुणी 'अल्लाहू अकबर' च्या घोषणा देताना दाखवला जात नाही. कुठल्याही मशिदीतून खुलेआम 'हाकला, मारा, बाटवा' सारखे फतवे सोडले जात नाहीत. 'ह्या लोकांच्या हातात अमेरिकेने पाकिस्तानच्या मार्फत हत्यारं ठेवली आणि त्यांच्या हातून एक आगळीक घडली', अशी एक पळपुटी थिओरी इथे मांडली जाते. इथे पंडितांना जिवंत जाळले जात नाही. स्त्रियांवर बलात्कार होत नाहीत. इथे फक्त त्यांना हाकललं जातं. त्यातही त्यांचे काही समंजस मुसलमान स्नेही त्यांना सुरक्षितपणे बाहेर पडण्यास मदत करतात. जणू काही जे काही घडतंय त्यासमोर ते स्वत:ही हतबल आहेत. ही जणू काही एखादी नैसर्गिक आपत्तीच असावी !
पंडितांच्या देशोधडीच्या रक्तरंजित इतिहासात काळीकुट्ट नोंद असलेला १९ जानेवारी १९९० चा दिवस तर 'शिकारा' इतका पुचाटपणे दाखवतो की संतापाचा कडेलोट व्हावा. १९ आणि २० रोजी सगळ्या काश्मिरात वीज बंद केली जाऊन मशिदींमधून भडकावू घोषणा दिल्या जात होत्या. पंडितांवरील अत्याचाराने अरीसिमा गाठली होती. सामुहिक हत्याकांडं घडली होती. रस्त्यांवर रक्ताच्या नद्या वाहिल्या होत्या. 
पण विधु विनोद चोप्रांच्या भंपक व डरपोक अभिव्यक्तीला हेे दोन दिवसही प्रेमळ 'रोगन जोश' सारखे चविष्ट वाटले आहेत. ह्या दिवसाचं 'शिकारा'मधलं महत्व इतकंच आहे की ह्याच दिवशी चित्रपटातल्या मध्यवर्ती व्यक्तिरेखा अखेरीस आपलं गाव, घर-दार सोडून काश्मिरातून बाहेर पडल्या, बाकी काही नाही.


नवोदित कलाकार आदिल खान आणि सादिया हे लेखक, दिग्दर्शकाच्या हाराकिरीवर कळस चढवतात. त्यांच्या प्रत्येक हालचालीत नवोदितपणा जाणवत राहतो, बोलण्यात नकलीपणा दिसून येतो. किंबहुना, पडद्यावर दिसणारा कुणीच स्वत:च्या भूमिकेत पूर्णपणे शिरलेला वाटतच नाही. कदाचित ह्या पटकथेतला अप्रामाणिकपणा त्यांनाही जाणवला असावा.सिनेमॅटोग्राफीही अगदी सपक आहे. एकही दृष्य डोळ्यांत भरत नाही. कॅमेरावर्क कुठलीही चमत्कृती करत नाही.संगीताची बाजूही, जी आजपर्यंत चोप्रांच्या चित्रपटात कधीच नव्हती, अतिशय मरतुकडी आहे. एखादी 'शिकारा थीम' वगैरे बनवता आली असती, पण सुचलंच नसावं बहुतेक. सपक संवाद पटकथेच्या भंपकपणाला साजेसे आहेत आणि एडिटर विधु विनोद चोप्रा तर कायमच निद्राधीन वाटत राहताात.

एकंदरीत, हा चित्रपट चोप्रांंनी हा चित्रपट बनवलाच तरी का असंं वाटतं. जर त्यांना पंडितांच्या हृदयद्रावक वास्तवाची खिल्ली उडवायची होती, तर ती ते ह्या विषयाकडे - जसा चित्रपटविश्वातील त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी कायमच केलाय तसा - कानाडोळा करुन प्रेमकथा विकण्यासाठी दुसरा एखादा मसाला बनवू शकले असते. लोकांना जळजळीत मिसळ देण्याची बतावणी करुन प्रत्यक्षात फोडणीपासून सजावटीपर्यंत रवाळ, मिळमिळीत सफरचंद टाकायचा नतद्रष्टपणा करायची काही एक गरजच नव्हती. 
ह्यावर थुकरट ऐतिहासिक चित्रपटांकडे 'ह्या निमित्ताने लोक त्याच्याबद्दल शोधून वाचतील तरी' असला भिकार दृष्टीकोन ठेवून पाहणारे तसंच काहीसं विधान करतील. पण हा दांभिकपणा आहे, हे लक्षात घ्यायला हवं. 'जय श्रीराम'च्या घोषणा देत, भगवे फडकवत वातावरण तापवणं, माथी भडकावणं हा जसा नालायकपणा आहे, तसाच 'अल्लाहू अकबर' च्या घोषणा देत, हिरवे झेंडे फडकावत अत्याचाराचा नंगानाच घडवणंही. हे दोन्ही घडत असतं आणि हे सत्य कितीही अप्रिय असलं तरी ते आधी स्वीकारायला हवं. आपण जर 'डिनायल मोड' मध्येच राहणार असू, तर ह्यात बदलही कधी होणार नाही. जर एका बाजूच्या कट्टरवादावर आपण उघड भाष्य करत असू, तर दुसऱ्याही बाजूला दुर्लक्षाचं सुरक्षाकवच देऊन चालणार नाही. 
जर दुसरी बाजू समोर आणायचीही आपल्याला भीती वाटत असेल, तर उलट ह्यावरूनच हे समजावं की कुठली बाजू जास्त भडक आहे.

- रणजित पराडकर

Tuesday, June 25, 2019

प्रचारकी 'लैला' - Series Review 'Leila' (Netflix)

'नेटफ्लिक्स'वरील बहुचर्चित 'लैला' ह्या मालिकेचा पहिला सिझन पाहिला. दुसरा अजून आलेला नाहीय. एकूण सहा भागांच्या ह्या पहिल्या सिझनमधून कहाणी एका उत्कंठा वाढवणाऱ्या टप्प्यापर्यंत येऊन थांबलेली आहे.

'लैला' ही एक लहान मुलगी आहे. साधारण ५-६ वर्षांची. जरी मालिकेचं शीर्षक तिच्यावर बेतलेलं असलं, तरी मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे 'शालिनी' (हुमा कुरेशी). ही कहाणी भविष्यातली आहे. कथानक सुरु होतं २०४७ सालात. स्वातंत्र्योत्तर १०० वर्षांत भारत अश्या एका स्थितीत पोहोचलेला आहे, जिथे जाती, धर्म ह्यांचा राजकीय वापर करून त्याच्या जोरावर समाजाला विभाजित केले गेले आहे. वेगवेगळे समुदाय वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये वास्तव्य करून आहेत आणि भिंती बांधून प्रत्येक सेक्टर इतरांपासून वेगळं केलं गेलं आहे. प्रत्येक भिंतीच्या प्रवेशद्वारावर कडेकोट बंदोबस्त असून तपासणी केल्याशिवाय कुणीही आत जाऊ शकत नाही. सुखवस्तू कुटुंबं एक सर्व सोयी-सुविधांचं सुखाचं जीवन जगत आहेत आणि गरीब लोकांना पाण्यासाठीसुद्धा झगडा करावा लागतो आहे. पाणी ही एक महागडी चीजवस्तू झालेली आहे. प्रदूषित हवा इतकी भयानक आहे की क्वचित काळा पाऊसही पडतो आहे. गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकावर पाळत आहे. सगळ्यांचे सगळे रेकॉर्ड्स सरकारकडे आहे. त्यामुळे एकंदरीतच परस्परविश्वास कधीच संपलेला आहे.
अश्या ह्या विषण्ण देशाचं नावही आता बदललेलं आहे. 'आर्यवर्त' असं त्याचं नाव आहे आणि त्याचा प्रमुख नेता आहेत 'डॉ. जोशी' (संजय सुरी).
'आर्यवर्त' देशाच्या एका सुखवस्तू सेक्टरमध्ये, मोठ्या घरात शालिनी चौधरी (हुमा कुरेशी), पती रिझवान चौधरी (स्राहूल खन्ना) आणि तिच्या लहान मुलीसोबत राहते आहे. एक दिवस त्यांच्या घरावर काही कट्टरपंथी हल्ला करून रिझवानला ठार मारून शालिनीला सोबत घेऊन जातात. आंतरधर्मीय विवाह आणि त्यातून एका मिश्रित (दूषित) रक्ताची मुलीला दिलेला जन्म ही शालिनीची दोन पापं मानली जाऊन तिची रवानगी 'शुद्धी केंद्र' नावाखाली उभारल्या गेलेल्या छळछावणीत होते. आपल्या पतीला गमावलेल्या शालिनीला काहीही करून स्वत:च्या मुलीपर्यंत पोहोचायचं असतंच. त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करते. 'लैला' ही एका आईची आपल्या मुलीला शोधून तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठीच्या संघर्षाची कहाणी आहे. 



हुमा कुरेशी, सिद्धार्थ, आरिफ झकारिया, सीमा बिस्वास, आकाश खुराना अशी सगळी ह्या मालिकेची स्टारकास्ट आहे. हुमा कुरेशी आणि सिद्धार्थच्या व्यक्तिरेखा मुख्य आहेत. दोघांचंही काम दमदार आहे. 
सिद्धार्थ हा गुणी अभिनेता 'रंग दे बसंती'च्या जबरदस्त यशानंतरही हिंदीत फार काही दिसला नाही. त्याला इथे पाहून खूप आनंद वाटला. गेल्या काही वर्षांत हिंदीत वेगळे आणि चांगले सिनेमे बनायला लागले आहेत. ह्या चांगल्या बदलाच्या लाटेवर सिद्धार्थसारख्या कलाकारांनी स्वार व्हायला हवं.
हुमा कुरेशी अगदीच मर्यादित वकूबाची अभिनेत्री नसली, तरी 'तबू'च्या जवळपासची आहे. हे तिने एक थी डायन, बदलापूर, देढ इश्क़िया अश्या काही सिनेमांतून दाखवून दिलं होतं. 'शालिनी'ची धडपड, तडफड, घुसमट हे सगळं तिने खूप छान सादर केलं आहे. पण तिच्या व्यक्तिरेखेला विविध कंगोरे नाहीत. साधारण एकाच एका मूडमध्ये ती असते. 

पार्श्वसंगीत धीरगंभीर आहे आणि अनेक ठिकाणी जिथे प्रसंगाचं चित्रण फुसकं आहे, तिथे नाट्यमयता, तीव्रता फक्त त्याच्याच जोरावर टिकते. त्यासाठी आलोकनंदा दासगुप्ता विशेष उल्लेखनीय आहेत. ह्यापूर्वी 'ट्रॅप्ड', 'ब्रीद' आणि 'सेक्रेड गेम्स' मध्ये त्यांनी उत्तम काम दाखवलं आहेच.
कॅमेरावर्क आणि व्हीएफएक्ससुद्धा उत्तम जमले आहेत.

ज्येष्ठ दिग्दर्शिका दीपा मेहतांच्या ह्यापूर्वीच्या बहुतांश चित्रकृती वादोत्पादक ठरलेल्या आहेत. 'लैला'ही त्याला अपवाद नाहीच. पण वादाचे मुद्दे बाजूला ठेवून विचार केला तरी अनेक ठिकाणी 'लैला' कमकुवत ठरते.
कथानक मुळात 'एका आईने तिच्या मुलीचा घेतलेला शोध' ह्यावर केंद्रित आहे. ते कुठल्याही जगात घडू शकलं असतं. आजच्याही. भारतातही, अमेरिकेतही, पाकीस्तानातही आणि आर्यवर्तातही. त्यामुळे २०४७ चा काल्पनिक कालखंड, आर्यवर्त वगैरे सगळं अनावश्यक वाटत राहतं. किमान पहिल्या सिझनमध्ये तरी त्यामुळे काही वेगळा प्रभाव मूळ कथानकावर पडलेला नाहीय.
अजून ३० वर्षांनंतरच्या भारतात आमुलाग्र बदल झालेले दाखवलं आहे खरं, पण ते सगळं सोयीस्करपणे. ३० वर्षांनंतरही ह्या विकसित देशात रस्त्यावर चालणाऱ्या गाड्या आजच्याच आणि आजच्यासारख्याच आहेत. आज विकसित देशांत स्वयंचलित आणि बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या आलेल्या आहेत. ३० वर्षांनंतरच्या 'आर्यवर्त'मध्ये त्यांचा मागमूसही नाही. तांत्रिक प्रगती फक्त हवेत प्रोजेक्शन करू शकणाऱ्या मोबाईल्स व इतर डिव्हाइसेस पर्यंतच मर्यादित दाखवली आहे. सुरक्षा रक्षक, पोलीस वगैरेंकडे असलेली शस्त्रंसुद्धा पुढारलेली दिसत नाहीत. गुलामांच्या हातांवर 'टॅटू'सदृश्य कोडींग केलेलं दाखवलं आहे. पण त्याद्वारे प्रत्येक गुलामाचं ट्रॅकिंग करता येणं सहज शक्य असतानाही ते टाळलं आहे, कारण मग शालिनीच्या हालचाली व डावपेचांना कदाचित खूप विचारपूर्वक मांडावं लागलं असतं. अश्या अनेक गोष्टी आहेत, जिथे ही तथाकथित प्रगती व आधुनिकता सोयीस्करपणे बाजूला ठेवली आहे. तिचा कथानकातला उपयोग फक्त अत्याचारी राजवट दाखवण्यापुरताच आहे. त्यामुळे ह्या सगळ्या पसाऱ्यातला प्रचारकी नाटकीपणा उघडा पडतो.
शालिनीला शिक्षा म्हणून 'शिद्धी केंद्रा'तून ज्या 'श्रम केंद्रा'त पाठवले जाते, प्रत्यक्षात तिथलं आयुष्य आधीपेक्षा किती तरी पट सुसह्य असल्याचं दिसून येतं. असं वाटत राहतं की आता हिला काही त्रास होईल, पण रोज २०-२१ मजले चढून जाण्याव्यतिरिक्त तिलाच काय, कुणालाही कुठलाही त्रास दिला जात नाही. ही काय गंमत आहे, कुणाच्या लक्षात कशी आली नाही की ह्यातली कलात्मकता मलाच लक्षात आली नाही, कुणास ठाऊक ! 
पहिला सिझन जरी सहाच एपिसोड्सचा असला, तरी प्रत्यक्षात त्यात दाखवलेलं कथानक कदाचित २-३ एपिसोड्समध्येच संपू शकलं असतं. अतिशय रटाळपणे आणि झाकोळलेल्या निराशामयतेत हे सहा भाग सरकतात. खूप संयम ठेवून आणि अंमळ जबरदस्तीनेच मला सहा पूर्ण पाहता आले आहेत. 'शोधकथा' म्हटल्यावर ती थरारक असते, ह्या प्राथमिक समजाला तडा देणारा अनुभव हे एपिसोड देतात आणि इतकं करूनही कथानक पूर्णत्वास जात नाही. अगदीच विचित्र आणि अर्धवटपणे ते सोडून देण्यात आलं आहे. जिथे सहावा भाग संपतो, सिझन संपतो, तिथे चालू असलेला प्रसंगही पूर्ण संपलेला नाही. नाट्यमयता जपण्यासाठी, लोकांनी पुढचा सिझन पाहावा ह्यासाठी असा प्रसंगाचा तुकडा पाडावासा वाटणं, हा माझ्या मते तरी कलात्मक पराभव आहे.

राजकीय परिस्थितीवर जराही भाष्य करणाऱ्या कलाकृतींना, खासकरून जर ते भाष्य बंडखोरी, विद्रोही, विरोधी असेल तर भारी मानलं जातं. 'लैला'बाबतही थोडंफार तसंच आहे. सिरीज बरी आहे, पण विशेष दखल घ्यावी असं काहीच मला तरी जाणवलं नाही, तरी तिची चर्चा तर होणारच आणि होतेही आहे ! त्यामुळे मेकर्सचा हेतू साध्य झाला आहे, हे नक्कीच.

रेटिंग - * * १/२

- रणजित पराडकर

Wednesday, May 29, 2019

हंड्रेड पर्सेंट इमोशन ! (म्युझिक टीचर - Music Teacher - Review)


विचारशक्ती आणि भावनिकता ह्यांच्यातला संघर्ष, हे माणसाच्या व्यथांचं खरं मूळ असावं. 
फार सहजपणे आपण म्हणत असतो 'दिल की सुन' किंवा 'विचारपूर्वक निर्णय घे' वगैरे. पण मनाचं किंवा डोक्याचं, कुणाचंही ऐकून जो कोणता निर्णय आपण घेऊ तो चूक की बरोबर हे कालांतरानेच ठरणार असतं आणि घेतलेला निर्णय चुकीचा ठरला की पश्चात्तापाचा वेताळ मानगुटीवर बसून उलटसुलट प्रश्नांनी हैराण करून सोडत असतो. ज्या परिस्थितीत एखादा निर्णय घेतला तो तेव्हा क्रमप्राप्तच होता आणि म्हणून बरोबरच होता, हे आपण स्वत:ला समजावू शकत नसलो की नेटफ्लिक्सच्या 'म्युझिक टीचर'मधल्या गायकासारखी आपली अवस्था होत असते.

'बेनी माधव सिंग' (मानव कौल) हा ह्या कहाणीतला म्युझिक टीचर. त्याची एक शिष्या 'ज्योत्स्ना रॉय' (अमृता बागची) आणि शेजारी राहणारी एक गृहिणी 'गीता' (दिव्या दत्ता) असा हा त्रिकोण आहे. ज्योत्स्ना मुंबईला जाऊन बॉलीवूडमध्ये एक सुपरस्टार झालेली असते आणि तिला संगीताचे धडे देणारा बेनी ज्याच्यावर ज्योत्स्नाचं प्रेमही असतं, तो शिमल्यातच लहान-सहान ट्युशन्स करण्यात गुरफटलेला. ज्योत्स्ना शिमला सोडून गेल्यानंतरच्या ८ वर्षांत 'मी जे केलं ते बरोबर केलं की चूक', 'माझं तिच्यावर प्रेम होतं की नाही', 'मला आता नक्की काय हवं आहे' ह्या आणि अश्या काही प्रश्नांच्या गुंत्यात बेनी अधिकाधिक गुंतत जात असतानाच 'शिमला कल्चरल क्लब' तर्फे ज्योत्स्नाचा एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि पुन्हा एकदा एक ओढाताण सुरु होते. बेनी, त्याची आई (नीना गुप्ता) आणि लहान बहिण (निहारिका दत्त) सगळ्यांच्या जुन्या आठवणी जाग्या होतात. 
शेजारी राहणारी 'गीता' कळत नकळत बेनीच्या द्विधा मनस्थितीत त्याला सहारा देते आणि एका निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करते. ह्यात तिची स्वत:चीही होलपट होते. पण तिच्यात असलेली स्त्रीसुलभ खंबीरता बेनीचा पुरुषसुलभ वैचारिक गोंधळ सोडवते. 

सिनेमाची सुरुवात 'इक मोड तू मिली जिंदगी..' ह्या गाण्याने होते. हिमाचलचा रमणीय परिसर, 'पॅपोन'चा वजनदार आवाज आणि गाण्याची गोडवा असलेली चाल, ह्यांमुळे सिनेमा लगेच पकड घेतो, ती शेवटपर्यंत सोडत नाही. मात्र एकंदरीत सिनेमाला नावाला साजेसं संगीत काही 'रोचक कोहली'ला बनवता आलेलं नाही. ओरिजिनलिटीवर भर देऊन श्रवणीय गाणी देण्यापेक्षा 'फिर वोही रात है..', 'रिमझिम गिरे सावन..' अशी जुनीच गाणी नव्याने बनवली आहेत. आजकाल ह्या पाट्या टाकण्याच्या प्रकाराला 'रिक्रीएट करणं' असं एक गोंडस नाव दिलं जातं. 
संगीतशिक्षण, तालीम म्हणजे सिनेमातली गाणी घोकून घेणे आणि तेव्हढ्यावरच एखाद्याची जणू काही लॉटरी लागून त्याने/ तिने सुपरस्टार बनणे; हा एक सोयीस्कर शॉर्ट कट मारला असल्याचं काही लपत नाही. ह्या सगळ्या भागासाठी अजून खूप मेहनत घेणे आवश्यक होतं. पण दुर्दैवाने परिपूर्णतेसाठी तेव्हढं आग्रही राहणं अजूनही आपल्याकडे व्यावासायिक गणितांत बसत नसावं आणि सर्जनशीलतेच्या परिघाला ओलांडायची हिंमत त्यामुळेच होत नसावी. जे असेल ते असो, पण ह्या एका कमजोर भागामुळे हा सिनेमा एका वेगळ्याच उंचीवर जाता जाता राहिल्याची हुरहूर लागते.

मानव कौल आणि दिव्या दत्ता अतिशय आवडते असल्याने 'म्युझिक टीचर' आवर्जून पाहिला. दोघांनी अजिबात निराश केलं नाही. फार सहजपणे आपलं काम उत्तम निभावणाऱ्या आजच्या अभिनेत्यांपैकी हे दोघे, इथेही आपापल्या भूमिका सुंदर निभावतात. बराच काळ आणि चांगलं काम करूनही हे दोघेही फार 'साईडलाईन्ड' राहिले आहेत.
घरच्या जबाबदाऱ्या आणि घेतलेल्या निर्णयांचे परिणाम ह्यांच्या ओझ्याखाली दबलेला 'बेनी माधव' मानव कौलने जिवंत केला आहे. शिमल्याच्या थंड हवेत स्वत:च्या मनातला विस्तव विझवण्याचा अयशस्वी प्रयत्न तो अनेक वर्षं करतो आहे. अपयश पचवण्यातही आलेलं अपयश त्याने फार प्रभावीपणे मांडलं आहे. त्याची व्यक्तिरेखा अनेक हिंदोळे घेते. कधी ताबा सुटणं, कधी उद्रेक होणं, कधी मूकपणे सहन करणं, कधी अव्यक्त राहणं अश्या अनेक उंचींवर ही व्यक्तिरेखा ये-जा करते आणि कुठेही मानव कौल कमी पडत नाही.
नवऱ्याने नाकारल्यावर एकटीवर आलेली जबाबदारी खंबीरपणे सांभाळणारी आणि एकटेपणातून आलेलं रितेपण डोळ्यांत न लपवू शकणारी 'गीता' साकारणारी दिव्या दत्तासुद्धा जबरदस्त आहे. तिच्याबाबतीत मला नेहमीच असं वाटत आलं आहे की तिच्या अफाट क्षमतेला आव्हान देणारी भूमिका तिला कधी तरी मिळावी. ही भूमिका अगदी तशीच आहे, असं नाही म्हणता येणार, पण तरी तिला बऱ्यापैकी वाव तरी मिळाला असल्यामुळे आनंद झाला.
अमृता बागचीला फार काम नाहीय. जितकं आहे, त्यात ती जबाबदारी पार पाडते. तिने 'सिटी ऑफ ड्रीम्स'मध्ये फार कंटाळा आणला आणला होता, त्यामुळे इथला तिचा मर्यादित पण चांगला वावर सुखद वाटला.

'कौशिक मंडल' ह्यांनी टिपलेलं डोंगराळ सौंदर्य डोळ्यांना प्रचंड सुखावतं. आणि हवेतला गारवा तर पडद्यातून बाहेर येऊन आपल्याला जाणवावा ! (सध्याच्या ४३-४४ अंश तापमानाच्या रखरखत्या हवेत हा गारवा फारच हवाहवासा वाटला !)

लेखक-दिग्दर्शक सार्थक दासगुप्तांचा बहुतेक हा पहिलाच हिंदी सिनेमा आहे, जो कुठलाच अनावश्यक पसारा नसलेला आणि 'टू-द-पॉइन्ट' आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे सांगीतिक तालीमेचा भाग अजून खूप प्रभावी करता आला असता, पण तो खरं तर कहाणीतला दुय्यम भाग आहे. नाव जरी 'म्युझिक टीचर' असलं तरी गाभा 'भावनिकता'च आहे. सिनेमात एक संवाद आहे - 'म्युझिक पहले हंड्रेड पर्सेंट थिओरी होता है, फिर वो हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल होता है और उसके बाद हंड्रेड पर्सेंट इमोशन !' तसंच ही कहाणी थिओरी/ प्रॅक्टिकल नसून फक्त 'इमोशनल' आहे असं पाहिलं, तर दासगुप्ता खूप कन्व्हीन्सिंग वाटतात.

फक्त पावणे दोन तासांचा हा सिनेमा त्यातल्या काही कमकुवत बाजूंसह एकदा तरी नक्कीच पाहण्यासारखा आहे. आपल्याही मनात काही 'विचार वि. भावना' अशी द्वंद्वं चालू असतात. अश्या कहाण्यांच्या निमित्ताने त्यांच्याकडे आपण त्रयस्थपणे पाहू शकतो.

रेटिंग - * * * १/२

- रणजित पराडकर

Saturday, February 02, 2019

स्वागतार्ह प्रयोग - एक लडकी तो देखा तो ऐसा लगा - (Movie Review - Ek Ladki Ko Dekha To Aisa Laga)

मुख्य धारेतला भारतीय चित्रपट हा नेहमीच पलायनवादी राहिला आहे. लोकांना त्यांच्या रोजच्या आयुष्यातून दोन घटिका मनोरंजन मिळावं, हाच त्याचा मुख्य हेतू राहिला आहे. चित्रपट बनवणारे आणि पाहणारे, दोघेही मुख्य धारेतल्या चित्रपटाकडे ह्याच विचाराने पाहात आले आहेत. ह्या मनोरंजनात नाट्याची बाजू सांभाळण्यासाठी सगळ्यात आवडता विषय 'प्रेम' आणि मग त्याच्या जोडीने देशभक्ती, कर्तव्यभावना, कौटुंबिक कलह वगैरे कथानकं असतात. 
मात्र चित्रपटाचा हा पारंपारिक चेहरा हळूहळू बदलत चालला आहे. (खरं तर, मुखवटाच. पण पिढ्यांनंतर पिढ्या जपलेला मुखवटा एक चेहराच बनल्यासारखा झाला असल्याने, 'चेहरा'.) आजचा मुख्य धारेतला चित्रपट वेगळे विषय हाताळायला पाहतो आहे. गेल्या काही वर्षांतले चित्रपट पाहिले, तर 'चित्रपटात उपकथानक म्हणून का होईना एक प्रेमकहाणी असलीच पाहिजे', ह्या आत्यंतिक उथळ, तरी प्राथमिक मताला अनेक चित्रपट सर्रास छेद देत आहेत. अनावश्यक गाण्यांना चित्रपटात स्थान राहिलेलं नाहीय आणि कथानकाची मांडणी मुख्य विषयाला अधिकाधिक धरून होताना दिसते आहे. 

'समांतर चित्रपट' ही धारा कधीच लुप्त झाली असली, तरी अजूनही काही चित्रपट वेगळ्या विषयांची मांडणी करताना दिसतात किंवा वेगळ्या मांडणीने कथा सांगताना दिसतात. ते अगदी ठळकपणे मुख्य धारेला सोडूनच असतात. व्यावसायिक गणितं त्यांनी गृहीत धरलेली नसतात, हेही जाणवतं. 
एखादा चित्रपट मधूनच येतो, जो व्यावसायिक गणितं सांभाळण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतच वेगळं कथानक किंवा वेगळी मांडणी समोर आणतो. गेल्या काही वर्षांत चांगले/ वाईट, जमलेले/ फसलेले असे अनेक व्यावसायिक प्रयोगही झाले आहेत, ही एक खूप चांगली बाब आहे. 'एक लडकी तो देखा तो ऐसा लगा' असाच एक प्रयोग करतो. तो चांगला आहे की वाईट, जमला आहे की फसला आहे; हा भाग निराळा. मात्र एक व्यावसायिक चित्रपट काही तरी वेगळेपणा समोर घेऊन येण्याचं धाडस करतो आहे, हीच बाब मुळात खूप स्तुत्य वाटते. एक असा विषय ज्याला अगदी खाजगी गप्पांतही पद्धतशीरपणे फाटा दिला जातो, झटकलं जातं; त्याला एक व्यावसायिक चित्रपट लोकांसमोर खुलेआम घेऊन येतो, इतकीच गोष्ट 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' आवर्जून पाहण्यासाठी पुरेशी आहे, असं मला वाटतं.

चित्रपटाची कथा 'गजल धालीवाल' हिने लिहिली आहे. 'गजल' भारतातील मोजक्या ट्रान्स-वूमन्सपैकी एक आहे. स्वत:च्या लैंगिकतेच्या शारीरिक व मानसिक घडणीतली असमानता समजून घेऊन, स्वीकारून आणि मग प्रयत्नपूर्वक त्यांत समतोल साधून घेण्याचा मोठा संघर्ष तिने स्वत:शीही केला आहे आणि उर्वरित जगाशीही. चित्रपटातील 'एक लडकी' म्हणजेच 'स्वीटी' (सोनम कपूर) हाच संघर्ष अनुभवते आहे. तिचा हा संघर्ष चित्रपटाचा बहुतांश भाग खूप समर्थपणे मांडतो. हा विषय मांडणं म्हणजे एक कसरत होती. जर तो अगदी गंभीरपणे मांडला असता, तर पचायला अवघड होता. कडवट औषध शुगरकोट करून घ्यायचं असतं म्हणून हा विषय हलक्या-फुलक्या शैलीत मांडला आहे. पण असं करतानाही त्यातलं गांभीर्य जपणं अनिवार्य होतं, कुठलाही थिल्लरपणा येऊ न देणं महत्वाचं होतं. ही कसरत उत्तम निभावली गेली आहे. कथानकाची मांडणी, पात्रं, घटना, चित्रण खूप वास्तववादी वाटतं. अनेक प्रसंग पाहताना, हे आपण प्रत्यक्षातही पाहिलं असल्याचं जाणवत राहतं. अश्या मुलांचं वेगळं वागणं, एकटं पडणं, त्यांनी स्वत:च्या कोशात शिरणं, त्यांच्या आवडी-निवडी हे सगळं छोट्या छोट्या प्रसंगांतून प्रभावीपणे मांडलं आहे. स्वीटीच्या कपड्यांच्या रंगसंगतीतही हा विचार केलेला दिसतो.
शेवटच्या भागात मात्र कथानकातला हा वास्तववाद मागे पडत जातो आणि नेहमीचा फिल्मी उथळपणा त्याची जागा घेतो. आधी घेतलेल्या मेहनतीवर, जसजसं आपण शेवटाकडे सरकत जातो, तसतसा बोळा फिरायला लागतो, ही 'एक लडकी को..' ची मोठी उणीव आहे.


मात्र ही एकच उणीव नाही. ह्यापेक्षा मोठी उणीव आहे 'सोनम कपूर'. एका अतिशय प्रभावी व्यक्तिरेखेला साकारण्यासाठी आवश्यक ठहराव तिच्या क्षमतेबाहेरचा असावा, असं 'नीरजा'मध्ये वाटलं होतं, इथे त्यावर शिक्कामोर्तबच होतं. जिथे जिथे कथेची तिच्याकडून लक्षणीय सादरीकरणाची अपेक्षा होती, तिथे तिथे तिच्या मर्यादा उघड्या पडल्या आहेत. पण जिथे जिथे सोनम कपूर कमी पडते, तिथे तिथे सहाय्यक कलाकार सांभाळून घेतात असं चित्र पुन्हा पुन्हा दिसून येतं. तिचा एकटीचा असा कुठलाही प्रसंग चित्रपटात नाही किंवा तिला लांबलचक मोनोलॉगसुद्धा नाही. मुख्य व्यक्तिरेखा इतकी फुसकी झाल्यामुळे बाकीच्यांच्या मेहनतीचं चीज फक्त सांभाळून घेण्यातच होतं.

'राजकुमार राव सुंदर काम करतो', हे म्हणून (लिहून) आता कंटाळा यायला हवा ! पण त्याने साकारलेला स्ट्रगलिंग लेखक, निरपेक्ष प्रेमी, मित्र खूप कन्व्हीन्सिंग आहे. त्याला भावनिक उद्रेकाचे असे कुठले प्रसंग नाहीत. मात्र दारू पिऊन स्वीटीच्या खोलीत जाणं, किचनच्या खिडकीतून पत्र देणं व अजून काही साध्याश्या प्रसंगांतही तो मजा आणतो. स्वीटीचं सत्य ऐकतानाच्या प्रसंगात स्वत: स्वीटी (सोनम) जितकी उथळ वाटते तेव्हढाच साहिल (राजकुमार) मनाला पटतो. तो एक अतिशय महत्वाचा प्रसंग केवळ राजकुमारमुळे तरला तरी आहे.

अनिल कपूरने कॅरेक्टर रोल्स करायला सुरु करण्याचं कारकिर्दीतलं एक महत्वाचं वळण अगदी बेमालूमपणे घेतलं आहे. त्याचा भावनिक संघर्ष दाखवण्यासाठी कथानकात फारसा वाव त्याला मिळाला नाहीय, तरी जितका आहे त्यात त्याने छाप सोडली आहे. खरं तर अनिल कपूरने वाईट काम केलंय, असा एकही चित्रपट माझ्या तरी पाहण्यात आलेलाच नाही. त्या दृष्टीने तो खरोखरच (क्रिटीकल अक्लेमच्या बाबत) खूप अंडररेटेडही असावा.

जुही चावला चित्रपटात नसती, तरी चाललं असतं. मूळ कथानकाला तिचा काही फारसा हातभार नाहीय. मात्र तिच्या असण्याने अनेक हलके-फुलके प्रसंग दिले आहेत. खासकरून अनिल कपूर आणि ती एकत्र जेव्हा पडद्यावर येतात तेव्हा ते धमाल करतात !

तमिळ, तेलुगु चित्रपटातला लोकप्रिय चेहरा 'रेजिना कॅसेन्ड्रा' प्रथमच हिंदीत दिसला आहे. तिचा टवटवीत मिश्कीलपणा आणि सहजाभिनय मुख्य व्यक्तिरेखेसाठी साजेसा होता. येत्या काळात तिला चांगल्या भूमिका नक्कीच मिळायला हव्या.

'रोचक कोहली'च्या संगीताची बाजूही कमजोर वाटते. आरडीचं '१९४२ अ लव्ह स्टोरी'मधलं 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा..' रिक्रिएट केलं आहे. ते कम्पोजिशन आवडलं. मूळ मेलडीला हात लावलेला नाहीय आणि ओरिजिनलमध्ये जे म्युझिक पीसेस होते त्यांनाही शब्दांत बांधलंय. एरव्ही रिमेक/ रिक्रिएट करताना ऱ्हिदम आणि कम्पोजिशनमध्ये गोंधळ घातला जातो, तसं तरी नाहीय. पण कॉन्स्टीपेटेड आवाजात गायची फॅशन गलिच्छ आहे. असो. त्याबाबत बोलण्यात अर्थ नाही कारण सगळेच आजकाल कुंथत कुंथत गाताना दिसतात !

दिग्दर्शिका 'शेली चोप्रा' ह्यांचा (बहुतेक) हा पहिलाच चित्रपट आहे. त्यांच्या कामात अनुभवी सफाईदारपणा ठळकपणे जाणवतो. कथानकाने शेवटच्या भागात खाल्लेल्या गटांगळ्या आणि सोनम कपूरने टाकलेल्या पाट्या वगळल्या तर दिग्दर्शिकेचा एक पहिला प्रयत्न आणि वेगळ्या विषयाची हाताळणी म्हणून 'एक लडकी को..' आवडायला हरकत नसावी. 

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर

Friday, December 28, 2018

असामान्य माणसाची अविश्वसनीय कहाणी - झीरो (Zero - Movie Review)

२०१८ संपल्यात जमा आहे. ह्या वर्षीच्या यशस्वी-अयशस्वी सिनेमांचा विचार केला तर दोन ठळक बदल अगदी स्पष्टपणे जाणवतात. एक म्हणजे सिनेमा बनवणारे अधिकाधिक प्रयोगशील झाले आहेत आणि दुसरा म्हणजे प्रेक्षक ह्या प्रयोगशीलतेकडे पाहताना स्टारव्हॅल्यूचा विचार कमी करायला लागले आहेत. सामान्य माणूस - Layman - आणि त्याची कहाणी दाखवणारे सिनेमे प्रेक्षकांच्या जास्त पसंतीस पडले आहेत आणि असामान्य कहाण्या सांगणारे सिनेमे पाहताना प्रेक्षकांनी आपली सारासारविचारशक्ती परंपरागत सवयीनुसार थिएटरात येण्यापूर्वी मंदिराबाहेर चप्पल काढून ठेवल्यासारखी काढून ठेवायचं बऱ्याच अंशी बंद केलं आहे. त्यामुळेच रेस-३, ठग्स ऑफ हिंदोस्तान सारख्या मोठ्या स्टार्सच्या, बॅनर्सच्या सिनेमांना नेहमीप्रमाणे मिळणारं हमखास यश मिळालं नाही, तर बधाई हो, अंधाधून, स्त्रीसारखे 'लो प्रोफाईल' सिनेमे यशस्वी ठरले. 

सुपरस्टार्सच्या बाबतीत आजकाल बहुतांश प्रेक्षकांचा एक तक्रारीचा सूर ऐकू येतो की, इतकं नाव, पैसा कमवून झाल्यावर तरी हे लोक वेगळ्या वाटेचे प्रयोगशील सिनेमे का करत नाहीत. पण मला वाटतं, सलमान खान वगळता इतर स्टार लोक थोडेफार प्रयोग आताशा करायला नक्कीच लागले आहेत, असं मला वाटतं. सलमान खाननेही केले असते, पण त्याचा प्रॉब्लेम समज आणि कुवतीशी निगडीत असल्याने त्याच्याविषयीही एव्हढ्या बाबतीत सहानुभूती वाटायला हरकत नसावी. काही उदाहरणांचा विचार करायचा झाल्यास, अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' हा एक खूप मोठा आणि वेगळ्याच वाटेवरचा यशस्वी प्रयोग होता. आमीरचा 'दंगल'ही तसाच खूप वेगळा आणि शाहरुखचा 'डिअर जिंदगी' एक हटके प्रयोग होता. हृतिकचे आशुतोष गोवारीकरसोबतचे दोन्ही सिनेमे प्रयोगशीलच मानायला हवे. शाहरुखच्या बाबतीत बोलायचं झालं तर 'रा-वन' आणि 'फॅन' हेसुद्धा प्रयोगच होते. 
मात्र ह्या सगळ्यांच्या बाबतीत एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते. हे लोक प्रयोग करतात पण त्यातही त्यांनी निवडलेलं पात्र हे 'लार्जर दॅन लाईफ'च असते. सामान्य माणसाच्या जवळ जाणारं पात्र साकारण्याचा प्रयत्न अजून तरी होताना दिसत नाही. प्रयोगशीलतेच्या नावाखाली अजूनही स्टार लोक असामान्य माणसांची सामान्य कहाणी किंवा सामान्य माणसाची असामान्य कहाणीच सादर करताना दिसतात आणि नेमकं असंच काहीसं 'झीरो'बाबतीतही आहे. किंबहुना, 'झीरो' अजून एक पाउल पुढे जाऊन 'असामान्य माणसाची असामान्य, नव्हे अविश्वसनीय कहाणी' सांगण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो. प्रेक्षक पुन्हा एकदा एका कुठूनही कुठेही पोहोचणाऱ्या सिनेमाबद्दल शाहरुखवर टीकेची झोड उठवू शकतात, उठवत आहेतही. मात्र, गंडला असला तरी प्रयोग करण्याचा प्रयत्न तर केला आहे, ह्याचा विसर पडायला नको. कारण हीच भूमिका शाहरुखऐवजी कुणा दुसऱ्या नटाने साकारली असती, तर फसलेला असला तरी प्रयोग केल्याबद्दल त्याला दाद, शाबासकी सगळं नक्कीच मिळालं असतं. असा विचार मनात आल्यावर, प्रस्थापितांवर टीका करत असताना बहुतेक वेळा आपण अभावितपणे वाहवत जात असतो, असा एक संशयही स्वत:विषयी निर्माण होतो. 
असो.



मेरठच्या 'बौआ सिंग'ची ही कहाणी आहे. 'बौआ' ची शारीरिक रचना ठेंगणी आहे. घरच्या श्रीमंतीमुळे आणि (बहुतेक) शारीरक व्यंगामुळे लहानपणापासून मनात रुजलेल्या बंडखोर वृत्तीमुळे 'बौआ सिंग' एक बेदरकार, बेजबाबदार इसम आहे. 'झीरो' ही कहाणी 'बौआ सिंग'च्या 'मेरठ'च्या लहान-मोठ्या गल्ल्या, बाजारांपासून मुंबईच्या उच्चभ्रू सोसायटीपर्यंत, रस्त्यावरच्या टपोरीगिरीपासून बॉलीवूडमधल्या प्रसिद्ध व्यक्तींसोबत उठ-बस करण्यापर्यंत आणि जमिनीपासून ते अंतराळापर्यंतच्या प्रवासाची आहे. 
हा प्रवास 'तर्क' नावाच्या सिद्धांताचं बासन गुंडाळून पार अगदी मंगळ ग्रहापर्यंत भिरकावून देतो. 'बोटाने स्मार्टफोनला स्वाईप केल्यासारखं आकाशाच्या दिशेने हवेत स्वाईप करून आकाशातले तारे पाडणं', ही हिंदी सिनेमाच्या इतिहासात तर्काने मारलेल्या सर्वात खोल डुबक्यांपैकी एक डुबकी असावी. एका प्रसंगी तर आकाशातले तारे इतके सुदुरबुदूर होतात की त्या काळ्याभोर प्लॅटफॉर्मवर मुंबईतल्या ऐन ऑफिस अवर्सच्या वेळेची एखादी लोकल ट्रेन येऊन थांबली असावी आणि चहूदिशांनी सगळ्यांची धावपळ सुरु व्हावी, तसं काहीसं वाटतं.

मात्र असं असलं, तरी ही सगळी अतर्क्यता बऱ्यापैकी आत्मविश्वासाने सादर झालेली आहे.
शाहरुखचा चित्रपट म्हटला की चित्रपटभर शाहरुख आणि शाहरुखच असणं अपेक्षितच असतं. तसंच इथेही आहे. त्याचा वावर नेहमीप्रमाणे प्रचंड उत्साही आहे. मात्र ठेंगण्या व्यक्तींची देहबोली काही त्याला फारशी जमलेली नाही. नुसतीच वेगळी भूमिका करणं म्हणजे प्रयोगशीलता मानल्याप्रमाणे तो नेहमीच्याच देहबोलीने वावरला आहे. त्याचं ठेंगणेपण हे सर्वस्वी कॅमेऱ्याच्या करामती आणि स्पेशल इफेक्ट्सवर अवलंबून आहे. 'अप्पू-राजा'मध्ये कमल हसनने घेतलेली मेहनत (गुडघ्यावर चालणे, इ.) त्याने घेतल्याचे अजिबात जाणवत नाही. एरव्ही संवादफेक, मौखिक अभिनय, ऊर्जा इ. मध्ये शाहरुख नेहमीच दमदार असतोच. पण देहबोली अजिबातच न जमल्याने बौआ सिंग हा एक ठेंगणा आहे, ह्याचा आपल्यालाही काही वेळाने विसर पडतो. इथेच प्रयोग सपशेल फसतो.
अनुष्का शर्माने कमाल केली आहे. प्रत्येक चित्रपटात काही तरी वेगळं करण्यात अनुष्का शर्माचा हात कुणी धरू शकेल असं मला तरी वाटत नाही. चित्रपटभर शाहरुखच शाहरुख असला, चर्चासुद्धा त्याच्याविषयीच होत असली तरी प्रत्यक्षात हा चित्रपट अनुष्का शर्माने जिंकलेला आहे. तिने साकारलेली निग्रही 'आफिया' तिच्या आजवरच्या सर्वोत्तम कामांपैकी एक आहे.
'रईस'नंतर पुन्हा एकदा शाहरुखच्या पात्राचा 'साईड किक' म्हणून मोहम्मद झीशान अयुब सहाय्यक भूमिकेत जान ओततो. हा गुणी अभिनेता असल्या दुय्यम भूमिका करण्यातच गुंतत जातो आहे, ही हळहळ पुन्हा एकदा वाटते.
कतरिनाच्या भूमिकेची लांबी तिला जितका वेळ सहन केलं जाऊ शकतं, त्याच्याआत आहे. 
तिगमांशु धुलियासह बाकी सर्वांना अगदीच कमी काम आहे. त्यामुळे काही दखलपात्र असं जाणवत नाही.

'अजय-अतुल'कडे सध्या काही मोठ्या बॅनर्सचे सिनेमे आलेले आहेत. पैकी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' फुसका बार ठरला. 'झीरो' त्या मानाने खूपच उजवा आहे. 'मेरे नाम तू..' हे गाणं तर मनाचं ठाव घेणारं आहे. त ऐकत असताना एक वेगळाच विचार मनात आला. प्रसिद्धीमध्ये ह्या गाण्याच्या तुकड्याला 'थीम'प्रमाणे वापरलं असतं तर ? एकंदरीतच संगीताच्या बाजूला अजून जास्त आक्रमकतेने सादर करायला हरकत नव्हती. त्यात तितकी कुवत आहे, असं वाटलं. 

'आनंद राय' हे काही दिग्दर्शकांपैकी खूप मोठं क्रिटीकली अक्लेम्ड नाव आहे, असं मला वाटत नाही. आनंद रायचे चित्रपट व्यावसायिक गणितं डोळ्यांसमोर ठेवूनच केलेले असतात, हे त्यांच्या फिल्मोग्राफीला पाहून लगेच लक्षात येतंच. त्यांनी इथेही दुसरं कुठलं गणित मांडलेलं नाही. मात्र आव मात्र तसा आणला असल्याने 'करायला गेले गणपती आणि झाला मारुती' अशीच गत झाली आहे ! 

शाहरुखच्या सुजाण चाहत्यांसाठी 'झीरो' म्हणजे पुन्हा एकदा एक अपेक्षाभंग आहे. मला मात्र ह्या अपेक्षाभंगाच्या दु:खापेक्षा त्याने प्रयोगशीलतेची कास सोडून पुन्हा एकदा 'हॅप्पी न्यू ईयर' किंवा 'दिलवाले' वगैरे टाईप आचरटपणा सुरु केला तर? - ही भीती जास्त सतावते आहे.

रेटिंग - * * १/२

- रणजित पराडकर

Saturday, October 13, 2018

अभूतपूर्व भयाविष्कार -तुंबाड' - (Movie Review - Tumbbad)

पाऊस, अंधार आणि एकटेपण, ह्या तिन्हींत एक समान धागा आहे. अजूनही असतील, पण एक नक्कीच आहे. तो म्हणजे 'भय'. अंधार आणि एकटेपणातल्या भयाचा अंश चित्रपटांतून व कथांतून अनेकदा समोर येतो, आला आहे. 'पाऊस' मात्र फार क्वचित अश्या रुपात समोर आला आहे.
'सत्या' मध्ये पावसाची एक मुख्य भूमिकाच होती. तो पाऊस 'सत्या'मध्ये मुंबईची ओळख देत होता. कथानकातल्या जवळजवळ प्रत्येक महत्वाच्या प्रसंगात त्याची उपस्थिती, त्याची साक्ष होतीच. चित्रपटात पावसाचा इतका प्रभावी वापर 'सत्या'नंतर आत्ता वीस वर्षांनंतर 'तुंबाड' मध्ये दिसतो. अर्थात पावसाच्या ह्या दोन्ही भूमिका पूर्णपणे भिन्न आहेत. 'तुंबाड'चा पाऊस अनिश्चिततेचं गूढ भयप्रद सावट आणणारा आहे. त्याच्या सततच्या कोसळण्यातून एक उद्गार ऐकू येत राहतो. तो उद्गार हृदयाचा स्पंदनं वाढवतो, मन अस्थिर करतो. त्याचं कोसळणं नेहमीच अशुभ वाटतं आणि तरीही त्यात एक प्रकारची विचित्र अपरिहार्यताही अटळपणे जाणवत राहते. 'तुंबाड'च्या कथेचा अनन्यसाधारण महत्वाचा भाग - भय - हा ह्या पावसाने 'अंधार' आणि 'एकटेपणा'च्या जोडीने समर्थपणे पेलला आहे.
हे भय, ही भीती वेगळ्या प्रकारची आहे. तिचा जन्म लोभ, लालसेतून झाला आहे. इथली अमानवी शक्ती भुताची नसून देवाची आहे. इथला मनुष्य फक्त स्वत:च घाबरत नाही, तो त्या अमानव्यालाही घाबरवतो. किंबहुना, भय विरुद्ध भय असा हा सामना आहे, ज्यात अर्थातच भयाचाच विजय होणार असतो आणि होतोही.

ही कहाणी तीन कालखंडांत घडते. सुरुवात १९१८ मध्ये होते.
'तुंबाड' हे साताऱ्यापासून थोडं दूर असलेलं एक गाव. तिथला एक भयाण, गूढ वाडा. त्याचा मालक एक म्हातारा 'सरकार'. ह्या वाड्यात अमर्याद किंमतीचा खजिना लपलेला असल्याची निश्चित माहिती 'सरकार' कडे असते. पण अख्खं आयुष्य खर्ची पडूनही त्याला काही तिचा शोध घेता येत नाही.
मात्र त्याचा अनौरस पुत्र 'विनायक' ह्या संपत्तीच्या शोधाचा ध्यास घेतो. त्याच्या बालपणापासून ह्या कथानकाची सुरुवात होते. म्हाताऱ्या 'सरकार'च्या मृत्युनंतर आईच्या हट्टामुळे त्याला 'तुंबाड' सोडावं लागतं. मात्र पंधरा वर्षांनंतर त्याचा ध्यास त्याला पुन्हा तिथे यायला भाग पाडतो.
कहाणीचा तिसऱ्या भागात लोभ आणि स्वैराचारात गुरफटलेला विनायक त्याच्या मुलाला ह्या शोधाचा लोभी वारसा सोपवतो. आत्तापर्यंत भारत स्वतंत्र होऊन संस्थानं आणि राजांच्या मालमत्तांचं विलिनीकरण सुरु झालं असतं. 'मग त्या खजिन्याचं, वाड्याचं काय होतं?' हा प्रश्न चित्रपट पाहूनच सुटेल.

नारायण धारप ह्यांच्या एका कथेवर बेतलेला हा चित्रपट लेखक-दिग्दर्शक राही अनिल बर्वे ह्यांचं एक 'ड्रीम प्रोजेक्ट' आहे. हे स्वप्न सत्यात उतरायला अनेक पावसाळे जावे लागले आहेत. बऱ्याच संघर्षानंतर त्यांच्या ह्या स्वप्नाचं जे सत्यस्वरुप समोर आलं आहे, ते पाहता 'the wait was worth it' असंच म्हणावं लागेल ! पटकथेवर अनेक वर्षांचे संस्कार झाल्याने खूप विचारपूर्वक तिची अगदी घट्ट अशी बांधणी झाली आहे. अनावश्यक रेंगाळणं वगैरेला इथे बिलकुल स्थान नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षक अनिश्चित भयाच्या सावटाखाली राहतो, त्याला अजिबात उसंत मिळत नाही. हे कथानक काही action packed किंवा सतत हेलकावे आणि वळणं घेणारं थरारनाट्य नाहीय. ह्यात धक्कातंत्र नाहीय. मात्र तरीही गूढ आणि भयाचा ताण मनावरून कुठेच हलका होता होत नाही.

प्रेक्षकाच्या मनावरची ही पकड ढिली न होऊ देण्याचं श्रेय कमालीच्या साउंड डिझाईनिंगचंही वाटलं. आधीच म्हटल्याप्रमाणे पावसाचा आवाज हा ह्या साउंड डिझाईनिंगमधला एक महत्वाचा भाग आहेच. मात्र त्याशिवायही अनेक ठिकाणी बारकाईने काम केलं आहे.
जोडीला प्रभावी पार्श्वसंगीत सगळी तीव्रता अजून वाढवतं. एरव्ही भयपटांमध्ये पार्श्वसंगीताचं एक महत्वाचं काम 'भो:' करून घाबरवण्याचं असतं. इथे असला कुठलाच ढणढणाट नाही. घाबरवण्यासाठी, अस्सल भयनिर्मिती करण्यासाठी असल्या उसनेपणाची गरज 'तुंबाड'ला भासतच नाही.

संपूर्ण कथानक महाराष्ट्रात आणि मराठी पात्रांचंच असल्याने साहजिकच पडद्यावरील कलाकारांचे हिंदी उच्चार मराठाळलेले असणं आवश्यक होतं. इथे अनिता दाते, दीपक दामले सारखे मराठी सहकलाकार आहेतच मात्र प्रमुख भूमिकेत असलेला सोहम शाह आणि इतर काही सहकलाकार अमराठी आहेत. तरीही त्यांचे हिंदी उच्चार सफाईदार वाटणार नाहीत ह्याची खबरदारी घेतली गेली आहे, हे खूप वाखाणण्याजोगं वाटलं. बालकलाकार मोहम्मद समादकडूनही ह्यासाठी मेहनत करवून घेतली असल्याचं अगदी स्पष्टपणे जाणवतं.

'तुंबाड' हे शंभर वर्षांपूर्वीच्या काळात घडणारं कथानक आहे. तेव्हाचा भूभाग, राहणी, घरं हे सगळं खूप अस्सल वाटेल अश्या प्रकारे चित्रित करण्यात आलं आहे. वारंवार हा उल्लेख होतो आहे, पण 'पाऊस' वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या रूपांत अप्रतिम सादर केला आहे. वाडा, त्याच्या आतला भाग आणि गुहा व इतर गूढगम्य जागा ह्यांचं चित्रण अंगावर येतं. ह्या अंगावर येण्यामागे 'किळस' किंवा 'बीभत्सपणा' नसून त्यातून सतत डोकावणारं 'भय' आहे.

सर्वच्या सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय, घट्ट बांधलेली व वेगळेपण असलेली कथा-पटकथा, पकड घेणारं ध्वनीदिग्दर्शन व पार्श्वसंगीत, भेदक नजर असलेलं कॅमेरावर्क, लोभ व लालसेने बरबटलेला मानवी चेहरा, दैवी शक्तीचं दानवी रूप अश्या सगळ्यांतून 'तुंबाड' नावाचा एक अभूतपूर्व भयाविष्कार दृश्य स्वरूप घेतो. मोठ्या पडद्यावर आणि दमदार आवाजासह हा अनुभव घेणं केवळ चित्तथरारक आहे. चित्रपटाची लांबी फक्त पावणे दोन तासांची आहे, हेही विशेष उल्लेखनीय आहे.
सहज विकल्या जाऊ शकणाऱ्या इतर काही चित्रपटांसमोर हे वेगळं प्रोडक्ट बाजारात फार काळ टिकेलच, ह्याची दुर्दैवाने खात्री देता येत नाही. मात्र चित्रपट पाहताना पाहणाऱ्याच्या पाहण्याची धैर्यपरीक्षा 'तुंबाड'च्या भयाकडून घेतली जाईल, ह्याची खात्री नक्कीच देता येईल.

रेटिंग - * * * * *

- रणजित पराडकर

--------------------------------

"तुंबाड"

दिग्दर्शन : राही अनिल बर्वे, आनंद गांधी
निर्मिती : सोहम शाह, आनंद एल. राय, मुकेश शाह, अमिता शाह
पटकथा : मितेश शाह, आदेश प्रसाद, राही अनिल बर्वे, आनंद गांधी
कलाकार : सोहम शाह, अनिता दाते, मोहम्मद समाद, दीपक दामले
संगीत : अजय-अतुल, जेस्पर किड
छायाचित्रण : पंकज कुमार
संकलन : संयुक्ता कज़ा
ध्वनी : ध्रुव पारेख, कुणाल शर्मा

Saturday, July 21, 2018

संक्षिप्त पुनरानुभूती - धडक - (Movie Review - Dhadak)

क़यामत से क़यामत तक़, इशक़जादे, साथिया अश्या काही सिनेमांचं 'सुधारित मिश्रण' असलेल्या 'सैराट'चं सुधारित मिश्रण 'धडक' नावाने सिनेमागृहांत धडकलं आहे. मात्र आचरट प्रादेशिक अस्मिता आणि भयाण जातवास्तवाच्या सत्यकथनाबाबत असलेला एक अनाठायी आग्रह, 'धडक'ला मारक ठरणार, ही रिमेकची घोषणा झाली तेव्हापासून वाटत असलेली भीती अगदी सेंट-पर्सेंट खरी ठरत आहे. प्रत्यक्षात जातीभेदाने पोखरलेल्या ग्रामीण भागातलं अत्यंत वास्तववादी चित्रण वगळता बाकी काहीही विशेष नसलेल्या 'सैराट'च्या तब्बल तीन तासांच्या पसरट आणि रटाळ मांडणीसमोर 'धडक'चं अडीच तासांचं कथन खूप नेमकं आणि संक्षिप्त वाटतं. जातविस्तवाचे चटके 'धडक' देत नाही, हे मात्र खरं. तरी, 'धर्मा'चा चित्रपट आहे म्हटल्यावर त्याला जरासा 'टोन डाऊन' केलं जाणार, हे अपेक्षित ठेवायलाच हवं होतं म्हणून नंतरच्या नाकं मुरडण्यालाही अर्थ उरत नाही. 'धडक'चा खरा लेट डाऊन आहे, तो म्हणजे 'त्या'च्या मित्रांचा एकंदर भाग. सल्या-लंगड्या हे 'सैराट'च्या पूर्वार्धाची जान होते. सहाय्यक भूमिकांत सहाय्यक भूमिकेत असूनही 'तानाजी गालगुंडे'ने साकारलेला लंगड्या प्रदीप आजही सगळ्यांच्याच लक्षात आहे. 'श्रीधर वत्सर' आणि 'अंकित बिश्त' ह्यांची कामं उत्तम झाली असली, तरी त्या मानाने लक्षात राहण्यासारखी नाहीत. कारण एकूणच त्यांच्या 'ट्रॅक'मध्ये 'सैराट'वाली मजाही नाही आणि वावही नाही.

मराठीतून हिंदीत आणताना हे कथानक महाराष्ट्रातून राजस्थानमध्ये गेलेलं आहे. उदयपूरमधील एक मोठ्या खानदानातली मुलगी 'पार्थवी सिंग' (जान्हवी कपूर) आणि उदयपूरमधल्याच एक हॉटेलव्यावसायिकाचा मुलगा मधुकर बागला (इशान खट्टर) ह्यांचं हे प्रकरण आहे. चित्रपटात २-३ वेळा 'वो लोग ऊँची जात के हैं' असा उल्लेख येत असला, तरी संघर्षाचं मुख्य कारण निवडणूक, राजकीय स्थानाला लागलेला धक्का असं सगळं आहे. 'सैराट'चं कथानक महाराष्ट्रातून हैद्राबादपर्यंत पोहोचतं, तर 'धडक'चं कथानक उदयपूरहून मुंबई व नागपूर व्हाया कोलकात्यात स्थिरावतं. ह्या संपूर्ण कथानकात 'धडक'ची कथा कुठेही अनावश्यक रेंगाळत, घुटमळत नाही. हा वाढवलेला वेग 'धडक'चं मुख्य आणि पहिलं बलस्थान आहे. 

दुसरं बलस्थान पात्रांची निवड आणि त्यांची कामं.
इशान खट्टर आणि जान्हवी कपूर, हे वशिल्याचे घोडे जरी असले तरी ठोकळे अजिबातच नाहीत. इशान खट्टर तर खूपच सहजाभिनय करणारा वाटला. मोठ्या भावाने सुरुवातीच्या सिनेमात जी चमक दाखवली होती, त्याची तुलना केली तर 'छोटे मियां भी सुभानअल्लाह' निघू शकतात, असा विश्वास वाटतो. चित्रपटातील बरेचसे प्रसंग मूळ चित्रपटातूनच घेतले असल्यामुळे त्या त्या जागी दोन कलाकारांची थेट तुलना नकळतच केली जाते. तिथे इशान आणि जान्हवी, आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरूपेक्षा खूप सरस ठरतात. (रिंकू राजगुरूला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार आश्चर्यकारकच वाटला होता.) तरी, जान्हवी कपूरचा नवखेपणा जाणवत राहतो. खासकरून शेवटच्या प्रसंगात तिच्या मर्यादा स्पष्टपणे दिसून येतात. एरव्ही, दोघांची जोडी खूप टवटवीत आणि प्रभावीही वाटते.
आशुतोष राणाला ट्रेलर्समध्ये पाहताना खूप अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. दुर्दैवाने, त्याच्या वाट्याला फारशी भूमिकाच नाही. मात्र वाट्याला आलेल्या काही मोजक्या प्रसंगांतही आतल्या गाठीचा, बेरक्या राजकारणी त्याने जबरदस्त वठवला आहेच. 
कहानी - १, कहानी - २, स्पेशल छब्बीस सारख्या चित्रपटांत सहाय्यक भूमिकांत दिसलेला 'खराज मुखर्जी' इथेही सहाय्यक भूमिकेत जान ओततो. 'सैराट'मध्ये छाया कदमनी साकारलेल्या कर्कश्य आक्काच्या जागी बंगाली बाबू 'सचिनदा' म्हणून खराज मुखर्जी आणणं, दोन चित्रपटांच्या उत्तरार्धांच्या तुलनेत 'धडक'चं पारडं जड करतं.
मधुकरचे मित्र म्हणून 'अंकित बिश्त' आणि 'श्रीधर वत्सर' विशेष लक्षात राहणार नाहीत, अशी काळजी बहुतेक लेखकाने घेतली आहे. कारण 'धडक' हा ठळकपणे दोन स्टारपुत्र व कन्येच्या लाँचिंगसाठीचाच चित्रपट आहे. (इशानचा ह्यापूर्वी येऊन गेलेला माजीद माजिदी दिग्दर्शित 'बिहाईंड द क्लाऊड्स' म्हणजे त्याचं व्यावसायिक हिंदी चित्रपटातलं 'लाँचिंग' नाहीच म्हणता येणार.) 



गाण्यांच्या पुनर्निर्मितीवरून खूप उलटसुलट मतप्रवाह आहेत. 'झिंगाट' आणि 'याड लागलं' ची नवीन वर्जन्स कानाला मराठी शब्दांची सवयच झालेली असल्यामुळे खटकत राहतात. मात्र विचार केल्यास, ही दोन्ही गाणी त्यांच्या गरजेनुसार अमिताभ भट्टाचार्यनी उत्तम लिहिलेली आहेत. 'ढूँढ गूगल पे जा के मेरे जैसा कोई मिलेगा कहाँ..' सारख्या ओळी कथानकाच्या ग्रामीण ते निमशहरी भागाकडे येण्याला साजेश्या आहेत. शीर्षक गीत 'धडक'ही उत्तम जमून आलं आहे. अजय-अतुलकडे असलेल्या येणाऱ्या चित्रपटांची यादी वजनदार आहे. ठग्स ऑफ हिंदोस्तान, झीरो, सुपर 30, पानिपत आणि शमशेरा हे सगळे आगामी चित्रपट मोठ्या बॅनर्सचे आहेत. आत्तापर्यंतचं त्यांचं हिंदीतलं कामही दखलपात्र आहेच. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षाही जास्त आहेत.

'धडक'मध्ये ओरिजिनल जर काही असेल तर तो फक्त शेवट. 'सैराट'चाही तोच उच्चबिंदू होता. तो बिंदू बदलण्याची, तरी उंची कायम ठेवण्याची करामत शशांक खेताननी केली आहे. त्यांचे ह्या आधीचे चित्रपट काही विशेष दखलपात्र वाटले नव्हते आणि हाही चित्रपट जवळजवळ जसाच्या तसाच बनवलेला असल्याने फार काही प्रभाव मान्य करता येणार नाही. 

एकंदरीत, मूळ चित्रपटातील पसरटपणा वगळणारा, तसेच त्याला बऱ्यापैकी मवाळ करणारा 'धडक', एक स्वतंत्र चित्रपट म्हणून ठरवलं तरी पाहता येत नाही. 'सैराट'च्या प्रेमात पडलेल्या लोकांना प्रत्यक्षाहून उत्कट प्रतिमा जरी दाखवली, तरी ते आवडणार नाहीच, त्यामुळे उत्कटतेत नव्हे तर तीव्रतेत कमी असणारी ही प्रतिमा पसंतीस उतरणं कठीण आहे. मात्र, जर तुम्ही (माझ्याप्रमाणे) 'सैराट'ला 'एक बरा चित्रपट'हून जास्त काही मानत नसाल, तर 'धडक' नक्कीच पसंतीस उतरू शकतो. कारण जवळजवळ २० टक्क्यांनी कमी केलेली लांबी, हे 'धडक'चं बलस्थान खूप महत्वाचं आहे. 'धर्मा'चा असल्यामुळे निर्मितीमूल्यही वाढीव आहे. ते छायाचित्रणातून स्पष्ट जाणवतं. 

'सैराट' एकदा पाहून विसरून गेलेल्यांनी 'धडक'ही एकदा पाहून विसरून जाण्यास हरकत नसावी.

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर

Tuesday, July 03, 2018

सिम्प्लीफाईड संजू - (Movie Review - Sanju)

लिहायला उशीर झाला आहे, तरी 'संजू'बाबत लिहिणं खूप आवश्यक आहे कारण हा एक मोठी आर्थिक उलाढाल करणारा चित्रपट असणार आहे आणि वैचारिक उलाढाल तर आधीच सुरु झालेली आहे. 

संजय दत्तचं आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलेलं आहे. त्याची शेकडो अफेअर्स असोत, ड्रग्स आणि दारूच्या आहारी जाणं असो किंवा १९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातला त्याचा सहभाग असो, हे सगळं टपऱ्या आणि नाक्यांपासून न्यायालयांपर्यंत, कमाल मर्यादेपर्यंत चर्चिले गेले आहे.  
पण मुन्नाभाई १ व २, थ्री इडियट्स, पीके सारखे चाकोरीबाहेरचे विषय हाताळूनही हेवा वाटेल असं व्यावसायिक यश मिळवत असतानाच जाणकारांकडूनही पसंतीची पावती मिळवणाऱ्या राजकुमार हिरानींना, इतर काही समकालीन दिग्दर्शकांप्रमाणे एक 'सेफ बेट' म्हणूनदेखिल कुठलाही चरित्रपट करायची काहीच गरज नाही. असं असूनही हिरानी हा विषय का हाताळतात ? 
कारण मुळात संजय दत्तच्या आयुष्याची कहाणी 'असामान्य' आहे. असं, इतकं पराकोटीचं आयुष्य आपल्याकडे इतर कुणीही जगलेलं नसावंच. लोकांना वाटतं की असल्या माणसावर फक्त भारतातच चित्रपट बनू शकतो. माझं मत विरुद्ध आहे. ह्या आयुष्यावर भारताबाहेरील एखाद्या चित्रपटकर्त्याने कदाचित एखादी चित्रपटमालिकाच बनवली असती. एका आदर्श व्यावसायिक चित्रपटासाठी आवश्यक असलेला सगळा मसाला - उदाहरणार्थ, रोमान्स, क्राईम, अॅक्शन, देशभक्ती, थरार, दोस्ती, कौटुंबिक ओढाताण, इ. जे म्हणाल ते - ह्या कहाणीमध्ये 'रेडी मिक्स' स्वरुपात उपलब्ध आहे! ह्या सगळ्या मसाल्याचा पुरेपूर आणि चविष्ट उपयोग हिरानी करतील, ह्याची व्यावसायिक खात्री चित्रपट पाहण्याआधीपासूनच वाटत होती आणि तसंच झालंही आहे!

'संजू'ची ही कहाणी सांगणं म्हणजे खरं तर खूप धोक्याचं काम आहे. कुठल्याही एका बाजूला आपला तोल झुकला तर ते कथन कोलमडून पडेल इतकं हे आयुष्य व्यामिश्र आहे. Living on the edge म्हणता येईल, असं हे आयुष्य. ही कहाणी सांगताना काही भाग मात्र सोयीस्करपणे गाळला आहे. माधुरी दीक्षितसोबची जवळीक, बाळासाहेब ठाकरेंची सुनील दत्तनी घेतलेली भेट व नंतर हललेली पानं, संजय दत्तच्या मान्यता दत्तव्यतिरिक्तच्या इतर दोन पत्नी, तसेच कुमार गौरव आणि त्याचे वडील राजेंद्र कुमार ह्यांचं दत्त बाप-लेकांच्या आयुष्यातलं स्थान, लहानपणी हॉस्टेलमध्ये राहणं, शिक्षा भोगत असताना कायद्यातील 'फर्लो' आणि 'पॅरोल'सारख्या पळवाटांचा खुबीने उपयोग करून, बाहेर येऊन चित्रपटांचं चित्रीकरण व इतर कामं उरकणं ह्या सगळ्या काही महत्वाच्या घटना, पात्रं व भागांना चित्रपटात स्थान नसल्याने कहाणी खूप सरळ सोपी केलेली आहे. हे आयुष्य खूप गुंतागुंतीचं आहे, इतकं सरळसाधं नक्कीच नाही की झाल्या घटनांचं खापर सरसकटपणे वृत्तपत्रांच्या आणि माध्यमांच्या माथ्यावर फोडता येईल. 
अर्थात चित्रपट माध्यमाची मर्यादा लक्षात घेता संजय दत्तच्या आयुष्याचा गुंता थोडासा सोडवून ठेवून मगच ते मांडणं एका प्रकारे नाईलाजाचंही असू शकतं. त्यामुळे हे 'सिम्प्लिफिकेशन' करण्यामागे 'ग्लोरिफिकेशन' करण्याचा हेतू नसावा. कारण, संपूर्ण चित्रपटात असं कुठेही दाखवलं नाही की ड्रग्स, मुलींची प्रकरणं किंवा बॉम्बस्फोटाचा कट ह्यांपैकी कशातही अडकलेला संजय दत्त स्वत: प्रत्यक्षात अगदी सुतासारखा सरळ वगैरे होता. लाडावलेला, दुर्लक्षही झालेला एक बिघडलेला रईसजादा, एक कलाकार आणि माणूस म्हणूनही अत्यंत सामान्य असलेली एक व्यक्ती जिने गैरकृत्यं करण्यासाठी स्वत:च लहान-मोठी निमित्ते शोधली आणि ती कृत्यं केली, अशी संजय दत्तची छबी हा चित्रपट तयार करतो. सार्वजनिक आयुष्यातील संजय दत्तने प्रत्यक्षातही कधी स्वत:ला 'निष्पाप, निरागस, साधा, सरळ' म्हणून प्रेझेंट केलेलं नाहीच, त्यामुळे चित्रपटातूनही त्याची तशीच इमेज बनणं स्वाभाविकच.


मात्र, 'संजू' ही कहाणी फक्त संजय दत्तची नाही. ती एका अश्या असामीचीही आहे जिला उच्चभ्रूंपासून गरीबांपर्यंत, फिल्म इंडस्ट्रीपासून राजकारणापर्यंत, घरच्यांपासून बाहेरच्यांपर्यंत सगळ्याच प्रकारच्या लोकांमध्ये नेहमीच एक आदराचं, मानाचं स्थान होतं. एक अशी व्यक्ती जिच्याविषयी जेव्हा कुणी काही बोललं आहे, चांगलंच बोललं आहे कारण त्यांनी कधी कुणाचं वाईट कधी केलंच नसावं. ही व्यक्ती म्हणजे 'सुनील दत्त.' 
वाया गेलेल्या मुलाला पुन्हा माणसांत, योग्य रस्त्यावर आणण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न करणारा एक बाप जे जे काही करेल ते सगळं सुनील दत्त साहेबांनी केलं होतं. कायदेपंडितांची मदत घेणं, स्वत:च्या राजकीय वजनाचा वापर करून पाहणं, त्यासाठी विरोधी पक्षातील बड्या नेत्यांसमोरही जाणं हे सगळं तर सर्वश्रुत आहेच. त्याशिवायही मुलाला पुनर्वसन, व्यसनमुक्ती केंद्रात पाठवणं, त्याला इमोशनल ब्लॅकमेल करायचा प्रयत्नही एक प्रकारे करणं असं सगळं दत्तसाहेबांनी केलं आहे (असावं). हे बाप-मुलाचं नातं चित्रपटात खूप प्रभावीपणे सादर झाले आहे. 

'परेश घेलानी' नावाचा संजय दत्तचा अतिशय जवळचा मित्र चित्रपटात 'कमलेश कपासी' नावाने आहे. हे पात्र 'विकी कौशल'ने साकारलं आहे. संजय आणि कमलेश ह्या दोघांची मैत्री चांगली रंगली आहे. विकी कौशलने ह्यापूर्वीच स्वत:ची कुवत मसान, रमन राघव 2.0 मधून दाखवली आहेच. सहाय्यक भूमिकेत असूनही त्याने साकारलेला कमलेश खूप भाव खाऊन जातो. माझा मित्र व्यसनांत वाया चालला आहे, मरतो आहे; हे त्या मित्राच्या वडिलांना सांगतानाचा प्रसंग भावनिक करणारा आहे. विकी कौशलने पकडलेला गुजराती अ‍ॅक्सेन्टही खूप सहज आहे. 

प्रेक्षकाला भावनिक करून डोळे पाणावणं, हे हिरानींना अचूक जमतं. दत्त बाप-लेकांचे काही प्रसंगही असेच भावनिक करतात. सुनील दत्तंच्या भूमिकेत 'परेश रावल' कुठल्याही गेट अपशिवाय कमाल करतात. बहुतांश भागात त्यांना बापाची घुसमटच दाखवायची होती, त्यामुळे ह्या भूमिकेला अनेक पैलू होते, असं नाही म्हणता येणार. ज्या तोडीच्या भूमिका त्यांनी ह्यापूर्वी केल्या आहेत, त्यांच्या तुलनेत this was an easy job for him. पण निराशा दाखवतानाही हताश दिसणार नाही, मदत मागत असला तरी लाचार वाटणार नाही; खमकाच वाटेल, असा सुनील दत्त त्यांनी खूप संयतपणे उभा केला आहे.

'संजय दत्त'च्या भूमिकेत 'रणबीर कपूर' आहे, हे फक्त श्रेयनामावलीपुरतं. एरव्ही चित्रपटात स्वत: संजय दत्तच आहे, ज्याने रणबीर कपूरसारखं दिसायचा प्रयत्न केला आहे, असं वाटतं. ह्याहून वेगळं आणि जास्त मी रणबीरच्या कामाविषयी बोलूच शकत नाही.

अनुष्का शर्मा, मनीषा कोईराला, सोनम कपूर, बोमन इराणी, सयाजी शिंदे ह्यांच्या भूमिका छोट्या छोट्या आहेत. पण सगळ्यांनीच आपापली कामगिरी चोख बजावली आहे. चक्क सोनम कपूरनेसुद्धा !

थोडासा मेलोड्रामा कमी केला असता ('कर हर मैदान फतेह..' गाण्याचं चित्रीकरण), थोडंसं कमी सिम्प्लीफिकेशन केलं असतं (अनेक पात्रं, घटना पूर्णपणे गाळणं, सगळं खापर माध्यमांच्या माथ्यावर फोडणं) तर 'संजू' व्यावसायिक चरित्रपट म्हणून मापदंड ठरू शकला असता. तसा तो दुर्दैवाने ठरत नाही. कारण हा चत्रपट, 'संजय दत्त कुणी निष्पाप, निरागस नव्हता; तो एक नालायकच होता, ज्याने व्यसनाधीनतेपायी स्वत:चं आयुष्य बरबाद तर केलंच आणि इतरही आयुष्यं नासवली', हे भडकपणे नसलं, तरी संयत प्रभावीपणे दाखवत असला तरी, 'याकुब मेननसोबत जर तुलना केली, तर पैसा, सत्ता आणि कायद्यातील पळवाटा ह्यांचा फायदा घेऊन संजय दत्त काहीच्या काही स्वस्तात सुटलेला एक गुन्हेगार होता', हे सत्य म्हणावं तितक्या ठळकपणे चित्रपटातून समोर येत नाही. 
असं असलं तरी एक सुंदर चित्रपट म्हणून 'संजू' पुरेपूर जमला आहे. पडद्यावर असणाऱ्या सर्वांचं काम अप्रतिम झालं आहे. जोडीला अभिजात जोशींचे खुसखुशीत, खुमासदार व अर्थपूर्ण संवाद आहेत आणि सगळ्यावर हिरानींची मजबूत पकडही आहे.

रेटिंग - * * * १/२

- रणजित पराडकर 

Monday, April 30, 2018

'चित्रा'तली यमुना - [Nude (Chitraa) - Marathi Movie - न्यूड (चित्रा)]

आपण आपल्या स्वत:समोर नेहमी नागडे असतो. स्वत:पासून काहीही लपवणं शक्य नसतं. दुनियेच्या, जवळच्या लोकांच्या, अगदी जिवलगांच्यापासूनही आपण लपवाछपवी करू शकतो. पण शेवटी स्वत:समोर नागडेच.
एम एफ हुसेनवरून प्रेरित वाटणारं 'न्यूड' मधलं नसिरुद्दीन शाहने साकारलेलं 'मलिक' हे पात्रसुद्धा साधारण ह्याच अंगाने जाणारं भाष्य करतं. 'कपडे हे शरीराला झाकण्यासाठी असतात. आत्म्याला नाही. मी माझ्या चित्रांद्वारे आत्म्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत असतो म्हणून मी नग्न चित्रं काढतो.'

स्वत:ला स्वत:ची माहित असलेली नग्नता अनेक प्रकारची असते. आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक, वैचारिक इ.
'न्यूड'च्या कथानकात प्रेक्षकाला स्वत:ची वैचारिक नग्नता आठवून देण्याची कुवत आहे. पण सिनेमात ती ताकद जाणवत नाही. हा सिनेमा 'यमुना'ची कहाणी म्हणूनच दिसतो आणि तेव्हढाच राहतो. अनेक प्रसंगात अपेक्षित तीव्रता येत नाही आणि प्रभाव कमी पडतो, असं वाटलं.

'यमुना' (कल्याणी मुळे) बाहेरख्याली पतीच्या जाचाला कंटाळून घर आणि गाव सोडून मुलासह मुंबईत तिच्या मावशीकडे (आक्का - छाया कदम) कडे येते. परिस्थितीच्या रेट्यामुळे आक्का 'जे जे स्कूल ऑफ आर्ट्स'मध्ये सफाई कर्मचारी असल्याच्या नोकरीआड प्रत्यक्षात तिथेच चित्रकला, शिल्पकला वर्गांसाठीची 'न्यूड मॉडेल' म्हणून काम करत असते. परिस्थितीच्याच रेट्यामुळे यमुनासुद्धा तिथे तेच काम करायला लागते. आपल्या मुलाने शिकून सवरून कुणी तरी मोठं माणूस बनावं, ह्या एकमेव आकांक्षेपोटी यमुना मनापासून स्वत:चं काम करत असते.

ही व्यावसायिक पातळीवर एक खूप वेगळी आणि आव्हानात्मक कहाणी आहे. असा चित्रपट झी आणि रवी जाधव हे अस्सल व्यावसायिक समीकरण जुळवणारी दोन नावं करतात, हे खूपच आनंदाचं आहे. अर्धशिक्षित किंवा अशिक्षित असली, तरी नवऱ्याच्या आधाराला लाथ मारून निघून जाणारी आणि 'मुलाला शिकवीन, मोठं करीन' ह्या जिद्दीने झगडणारी यमुना नुसती डोळ्यांसमोर आणून पाहा. अंगावर रोमांच उभे राहतात ! 
मात्र, 'यमुना'ची ही कहाणी कोणत्या वळणावर संपणार ह्याचा आपल्याला आधीच साधारण अंदाज येतो. ती तिथेच संपते.
यमुनाच्या आयुष्याचा सहा-सात वर्षांचा प्रवास 'न्यूड'मधून दिसतो. प्रत्येक प्रवासातले काही महत्वाचे मुक्काम ठराविक असतात. इथे ते मुक्काम रंजकतेत नव्हे, तर परिणामकारकतेत कमी पडतात. उदाहरणार्थ (स्पॉयलर अलर्ट) -

१. यमुना नवऱ्याचं लफडं पकडते तो प्रसंग. पहाटे उठून घाटावर कपडे धुवायला जाणं आणि एकदम मिश्कील भाव चेहऱ्यावर आणून पाण्यात सूर मारणं, त्यावर आजूबाजूच्या बायकांनी शून्य प्रतिक्रिया - जणू काही घडलेलंच नाहीय - देणं. पुढे पोहत पोहत जाताना दुसऱ्या किनाऱ्याच्या फांदीवर माणिक (नेहा जोशी) पाण्यात पाय सोडून बसलेली असणं आणि पाण्यातून यमुनेचा नवरा (श्रीकांत यादव) बाहेर येऊन तिच्याशी लगट करणं. हे सगळं चित्रण स्वप्नातलं वाटतं. प्रत्यक्षात ते वास्तवच असतं !
२.  आक्का न्यूड मॉडेलचं काम करते आहे. हे समजल्यावर यमुना तिला उलटसुलट बोलते. त्यानंतर आक्काची प्रतिक्रिया आणि अखेरीस स्वत: यमुनालाच तिने ह्या कामासाठी तयार करणं, हा सगळा प्रसंग अपेक्षित तीव्रता साधत नाही.
३. कट्टरवाद्यांनी कॉलेजवर 'नग्न चित्रांवर बंदी आणा' चे फलक घेऊन हल्ला चढवणं. त्यांना प्रोफेसर आणि विद्यार्थ्यांनी सामोरं जाणं, हा सगळा प्रसंग नाट्यमयतेत फारच कमी पडला. त्यांचं आपसातलं झगडणं लुटुपुटूचं दिसतं.
४. धो धो कोसळणाऱ्या पावसात समुद्रकिनाऱ्यावर चहा घेऊन येणं. कसं शक्य आहे हे ? चहा फ्लेवरचं पावसाचं पाणी प्यायचं असतं का ?
५. शेवट खूप सुंदर लिहिला आहे. पण चित्रीकरण पुन्हा एकदा सपक वाटतं. नंतरचा आक्रोश वगैरे अगदीच वरवरचं दिसतं.
६. आर्ट गॅलरीतल्या चित्रासमोर तो पच्चकन् थुंकतो. आजूबाजूला असलेले १५-२० लोक चित्रं पाहण्यात दंग असतील त्यामुळे कुणाला कळलं नसेल, असं मानू. पण पुढच्याच फ्रेममध्ये त्याच चित्रासमोर तो तिथेच उभा असताना त्याच्या आजूबाजूला लोक फिरतायत, पण कुणाला पायाखाली घाण दिसत नाही. नक्की थुंकला होता की नाही ? असा प्रश्न पडतो.
७. शेवटानंतरचा अजून एक शेवट असला की सिनेमा ३-४ पायऱ्या खाली उतरूनच थांबतो, असं एक वैयक्तिक मत.



लोकगीतं, अभंगांचा खूप सुंदर वापर सिनेमात केला आहे. 'दिस येती' मनात रेंगाळणारं आहे. पार्श्वसंगीतही प्रभावी आहे. शेवटाच्या वेळचं पार्श्वसंगीत कल्पक आहे.

झाडून सगळ्यांची कामं ताकदीची झाली आहेत. कल्याणी मुळेचं काम सुरुवातीला जरा काही तरी कमी किंवा जास्त झाल्यासारखं वाटलं. पण नंतर मात्र कमालच आहे. छाया कदमनी साकारलेली खमकी आक्कासुद्धा जबरदस्तच ! सहाय्यक कलाकारांत ओम भूतकर आणि मदन देवधर खरोखर दोघा मुख्य अभिनेत्रींना ताकदीचं सहाय्य करतात. श्रीकांत यादव, नेहा जोशी, किशोर कदम आणि नसिरुद्दीन शाह अगदीच छोट्या भूमिकांत आहेत. एकूणच अख्खा सिनेमा उत्कृष्ट अभिनयाचं एक अप्रतिम दर्शन आहे.

सारांश सांगायचा झाल्यास, नाविन्यपूर्ण प्रभावी कथानक जोडीला सशक्त अभिनय आहे पण अनेक जागी सिनेमाची पकड काही न काही कारणाने ढिली पडते. असं असलं तरी 'न्यूड' एकदा तरी पाहावाच असा सिनेमा नक्कीच आहे.

जाता जाता - सिनेमाचं शीर्षक 'न्यूड' ऐवजी काही दुसरं असतं तर ? 'न्यूड' हे खूपच सरळसोट वाटतं आणि त्या नावातून काही विशेष वेगळं पोहोचवायचं आहे, असंही वाटलं नाही. 'चित्रा'सुद्धा चाललं असतं की ! पण मग कदाचित सिनेमा वरून वादंग झालं नसतं. सगळीकडे सहज प्रवेश मिळाला असता आणि प्रदर्शनही कुणाही इतर सिनेमाप्रमाणे नेहमीसारखं झालं असतं.

रेटिंग - * * * १/२

- रणजित पराडकर

Tuesday, April 24, 2018

ओघळता अव्यक्त प्राजक्त - ऑक्टोबर (Movie Review - October)

पत्नी सत्यभामेच्या आग्रहाखातर भगवान श्रीकृष्णाने पारिजातक स्वत:च्या महालात लावला होता. पण त्याच्या फुलांचा सडा मात्र श्रीकृष्णाची लाडकी पत्नी रुक्मिणीच्या महालात, जो शेजारीच होता तिथे सांडत असे. प्रेमाचं प्रतिक म्हणून असं एक गंमतीशीर महत्व पारिजातकाला आहे.
कवींच्या आवडीच्या पाऊस, चंद्र, मोगरा अश्या विषयांपैकी एक 'पारिजातक'सुद्धा आहेच. 

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातहि बघता भामारोष मनीचा मावळला
(बालकवी)

मैं टहनी हूँ पारिजात की
प्रथम-प्रथम मुझको ही चूमे अरुण किरण स्वर्णिम प्रभात की
मैं टहनी हूँ पारिजात की
(विमल राजस्थानी)

झाडावरून प्राजक्त ओघळतो
त्याचा आवाज होत नाही
ह्याचा अर्थ असा नाही
की त्याला इजा होत नाही
(चंद्रशेखर गोखले)

अश्या वेगवेगळ्या आशयरूपांनी पारिजातक कवितेत ओघळला आहे. त्याचं कवितेत येणं मात्र त्याच्या स्वत:सारखंच हळुवार असतं. ज्याप्रमाणे पहाटेच्या नीरव शांत वेळी पारिजातकाची फुलं मूकपणे ओघळतात आणि इतर घमघमाटी, बटबटीत फुलांच्या आक्रमणाच्या आतच त्याच शांतपणे कोमेजतातही, तसंच ह्या पारिजातकाचं कवितांमधून प्रकट होणं आहे, असं जाणवतं.
फारच कमी काळासाठी उमलणारं हे अत्यंत नाजूक, गोंडस फूल त्याच्या सुगंधाची मोहिनी घालतं. हा सुगंध ओढ लावणारा असतो. फार लगेच कोमेजण्यामुळे चुटपूट लावून जाणाराही असतो. असफल प्रेमासारखा. असफलता लक्षात येईपर्यंत ती प्रेमभावना मोरपिसासारखी मनावर फिरत असते आणि नंतर उरणारी पोकळी दु:खाची असली, तरी ते दु:ख आपण आवडीने मनात जपतच असतो, त्याची एक विचित्र अशी ओढच असते.
हे पारिजातक आणि प्रेम ह्यांच्यातलं असं एक वेगळंच नातं आहे.

ऑक्टोबर महिन्यात बहरणाऱ्या पारिजातकाच्या फुलांवर प्रेम करणाऱ्या 'शिउली' (बनिता संधू) ची कहाणीसुद्धा ह्या फुलांसारखीच चुटपूट लावणारी आहे. स्वत:च्या टवटवीतपणाने सगळ्यांत उठून दिसणारी शिउली. एक हॉटेल मॅनेजमेन्ट ट्रेनींच्या एका बॅचमधली ज्युनियर, तरीही खूप हुशार मुलगी. त्याच बॅचमध्ये असलेला तिला सिनियर असलेला 'डॅन' (वरुण धवन). डॅनला झटपट यश हवं आहे. मेहनत करायची नाहीय. त्याला ज्युनियर असूनही मेहनत आणि हुशारीच्या जोरावर शिउली ह्या बॅचची सगळ्यांची आवडती आहे, तर डॅन म्हणजे एक 'ब्लॅक शीप' आहे.
हे दोघे एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न. पण दोघांमध्ये एक हळुवार नातं निर्माण होतं. पारिजातकाच्या मूक ओघळण्यासारखंच एक अव्यक्त नातं. एकमेकांशी कधी चार वाक्यंसुद्धा धड न बोलेलेले हे दोघे जण एका अपघातामुळे आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत बांधले जातात. बेमुर्वत, बेजबाबदार, असंवेदनशील डॅन स्वत:च्याही नकळत आमुलाग्र बदलत जातो. ह्या बदलाला सकारात्मकही म्हणता येणार नाही कारण स्वत:लाच न समजणाऱ्या आणि त्यामुळे न रोखता येणाऱ्या ओढीमुळे तो विक्षिप्त वागत जाऊन स्वत:च्या करियरला बरबाद करून घेतो.
पण हा काही कुणी मूर्ख आत्मघातकी देवदास नाहीय. तो 'डॅन' आहे. तुमच्या-आमच्यासारखा. अधूनमधून सावरतो आणि भानावरही येत राहतो. डॅन आणि शिउलीची हे कहाणी कुठलाही फिल्मीपणा करत नाही.


'ऑक्टोबर' जमिनीवरचा सिनेमा आहे. तो उगाच मोठमोठ्या बाता मारत नाही की आभाळाशी गप्पा हाणत नाही. तो आपल्याला त्या कहाणीचा एक भाग बनवत जातो. कुणी 'डॅन' चा जिवलग यार 'मनजीत' बनतो, कुणी 'आदी'; तर कुणी 'शिउली' ची जवळची मैत्रीण बनते तर कुणी तिची आई. कुणी 'डॅन'सुद्धा बनतात. कुठल्या न कुठल्या कोनातून ही कहाणी आपल्याला येऊन भिडते.
तिचा वेग धीमा आहे, नव्हे खूपच धीमा आहे. पण ती लांबवलेली नाहीय. कारण एकेक फ्रेम, एकेक प्रसंग खूप विचारपूर्वक आखलेला, बांधलेला आहे. विषय गंभीर असला, तरी सिनेमा त्या गंभीरपणाचं ओझं सतत खांद्यावर वागवत नाही. मांडणीत नेमका समतोल साधला गेला आहे. एक भयंकर घटना घडली आहे, मान्य. पण आयुष्य पुढे चालूच राहणार आहे. ते तसं चालू राहतं. मैत्री, प्रेम, ममता अशी कुठलीही उत्कट नाती अंगावर येणाऱ्या प्रसंगांतून किंवा काळीज पिळवटणाऱ्या संवादांतून मांडली जात नाहीत. ती ओघानेच व्यक्त आणि विकसित होत जातात. शिउलीच्या घरच्यांसाठी पूर्णपणे अनोळखी असणारा डॅन त्यांच्या कुटुंबाचा एक भाग कधी बनतो, ते आपल्यालाही समजत नाही. तर दुसरीकडे, डॅनला शेअर्ड रूम सोडायला लावल्यानंतरसुद्धा मैत्रीत जरासुद्धा फूट पडत नाही, हेदेखील आश्चर्याचं वाटत नाही. बेशिस्त डॅनला अनेकदा शिक्षा करूनही अखेरीस त्याच्याविषयी मनात सहानुभूती असणारा आणि त्याला मदत करणारा हॉटेल मॅनेजरही असाच सहजपणे आपल्यासमोर मांडला जातो. 'देख यार..' म्हणून त्याचं  डॅनला समजावणं खूप ओळखीचं वाटतं. कधी तरी आपल्यालाही कुणी तरी असं सांगितलं होतं, असं जाणवतं.

'ऑक्टोबर' मनाला भावतो कारण सिनेमाने स्वत:चंच मन ओळखलेलं आहे. सुजित सरकार, जुही चतुर्वेदी आणि वरुण धवन ह्या तिघांना ह्या कहाणीचा आत्मा गवसला असावा, असं वाटतं. सरकार आणि चतुर्वेदींबद्दल इतकं आश्चर्य वाटत नाही कारण त्यांनी ह्यापूर्वी अनेकदा (पिकू, विकी डोनर, मद्रास कॅफे इ.) स्वत:ला सिद्ध केलंच आहे. पण वरुण धवन हे एक सरप्राईज पॅकेज आहे. 'बदलापूर'नंतर पुन्हा एकदा त्याने त्याच्यातला ठहराव दाखवला आहे. 'डॅन' ही व्यक्तिरेखा वेगळ्याच गुंत्यातली आहे. 'डॅन' एकीकडे उथळ, अपरिपक्व आहे आणि दुसरीकडे हळवा, इतरांना आधार देण्याइतका खंबीरसुद्धा. तो मॅनेजरला खोटं कारण सांगून सुट्टीसुद्धा मागणारा आहे आणि निराशाजनक परिस्थितीतही सकारात्मकता बाळगणारा आहे. त्याच्या संतापाचा उद्रेक होतो पण त्याच्या भावनिकतेचा कडेलोट कधी होत नाही. तो त्याच्या सध्याच्या आयुष्याने नाखूष जरी असला तरी नंतर आलेल्या अपयशातून शिकवणीही घेतो. हे सगळे काही वरुण धवन खूप समजूतदारपणे साकार करतो.

एकंदरीत 'ऑक्टोबर' एकदा अनुभवण्यासारखा आहेच. 'मीही प्रेम केलं होतं..', 'ते खरंच प्रेम होतं का..?', 'मी उगाच प्रेम केलं होतं..' अश्या अनेक हळव्या आठवणी ज्यांनी खपलीआड जपल्या आहेत, त्या सगळ्यांना 'ऑक्टोबर' स्वत:चा नाही, तरी आपलासा वाटेल. कारण सगळेच 'डॅन' किंवा 'शिउली' नसले, तरी सगळ्यांनी पारिजातक पाहिला आहे. त्याचा चुटपूट लावणारा सुगंध श्वासांत भरला आहे.

रेटिंग - * * * *

- रणजित पराडकर
Related Posts Plugin for WordPress, Blogger...