Wednesday, September 09, 2020

लेणी नैराश्याची

आभाळावर लेणी नैराश्याची
दमट कुंद अंधार दिवसभर गळतो
निरर्थकाचे चक्रव्यूह भवताली
उदासवाणा सुन्नपणा सळसळतो

उच्छ्वासांनी घट्ट बांधले श्वास
घनराखाडी सावट  अनिश्चिताचे
प्राणाशी घुटमळतो आहे काळ
अंतरात शिंतोडे अंधाराचे

उलटे पाउल पडते क्षणा-क्षणाचे
पुन्हा पुन्हा एकच हतबलता जगतो
तिरस्कृताची नजर कुणाला द्यावी
आरश्यातला डोळे मिटून असतो

मर्त्य जिवाची अविरत कुत्तरओढ
आयुष्याला शिक्षा आयुष्याची
उगाच छातीमध्ये रटाळ घरघर
आभाळावर लेणी नैराश्याची

....रसप....

१७ ऑगस्ट २०२० ते ०९ सप्टेंबर २०२० 

Wednesday, August 05, 2020

एकटा असतो

झुंडीत एकटा असतो, वस्तीत एकटा असतो
मी सरकारी नोंदीच्या यादीत एकटा असतो

एखादा शेर तुझ्यावर लिहिल्याचे वाटत असते
पण शब्द तुझ्या नावाचा ओळीत एकटा असतो

खिडकीतुन पाहत बसतो बाहेर रिमझिमे कोणी
पाऊस रोजचा येथे गच्चीत एकटा असतो

औरंगाबादमधे मी एकटाच गर्दी करतो
मुंबईत येतो तेव्हा गर्दीत एकटा असतो

सांगीन तुला मी माझी एखादी प्रेमकहाणी
सांगीन तुला मी कुठल्या धुंदीत एकटा असतो

मिणमिणत्या निरांजनाची देवळास सोबत असते 
कंदील ओसरीवरचा वाडीत एकटा असतो 

....रसप....
५ ऑगस्ट २०२०

Thursday, June 11, 2020

परिणीता - एका कवितेची १५ वर्षं - (15 Years of Parineeta)

शरदचंद्र चट्टोपाध्याय ह्यांच्या दोन व्यक्तिरेखांनी भारतीय चित्रपटाला वारंवार भुरळ घातली आहे. एक म्हणजे 'देवदास' आणि दुसरी 'परिणीता'. 

२००५ ला विधू विनोद चोप्रा आणि प्रदीप सरकार ह्यांनी हिंदीत 'परिणीता' बनवला, त्याआधी हिंदीत ही कहाणी दोनदा बनवून झाली होती. 'देवदास' आणि 'परिणीता' ह्या दोन्ही प्रेमकहाण्या, किंबहुना प्रेमत्रिकोण. आणि बहुतेक तरी वारंवार आकर्षित होण्याचं कारणही हेच असावं. 'प्रेम त्रिकोण' हे बॉक्स ऑफिसवर हमखास चांगल्या भावात विकलं जाऊ शकणारं कथानक आहेच. 
मला जुन्या (आणि इतर भाषांमध्ये बनलेल्या काही) 'परिणितां'बद्दल फारशी माहिती नाही, पण २००५ चा 'परिणीता' बॉक्स ऑफिसवर खूप मोठा हिट नव्हता. २००५ च्या सर्वाधिक गल्ला जमवणाऱ्या चित्रपटांच्या यादीत पहिल्या दहांतसुद्धा तो आला नाही आणि ट्रेड ऍनालिस्ट्सनी बहुतेक तरी त्याच्यावर 'सरासरी'चाच शिक्का मारला असावा.
दुसरी गोष्ट ही की, एक चित्रपट म्हणूनही 'परिणीता' फार उत्तम वगैरे नक्कीच नव्हता. खरं तर त्यात बरेचसे दोषही होते आणि चुकासुद्धा होत्याच. उदाहरणार्थ - एका गाण्याचं रेकॉर्डिंग करतानाच्या दृश्यात शब्द तयार नसताना गाण्याचं रेकॉर्डिंग सुरु होणं आणि गायकांनी चक्क 'ट्रॅक'वर, तेसुद्धा री-टेक्स घेत गाणं दाखवलं आहे. जे १९६२ च्या काळी अगदीच प्रचलित नव्हतं. ही एक सिनेमॅटिक लिबर्टी समजून घेता येईल. मात्र असे इतरही काही तर्काच्या चौकटीत न बसणारे प्रसंग ह्यात आहेत. शेवटचा प्रसंग तर भावनिक ताणतणावाचा कमी आणि अंमळ विनोदीच वाटावा इतका फसलेला आहे. 
अनेक दोष असले, कहाणी नावीन्यशून्य असली तरीही 'परिणीता' मनात घर करून का बसला आहे ? काही कारणं आहेत. 


'परिणीता' म्हणून 'विद्या बालन'ला पाहणं हे अगदी नेत्रसुखद होतं. सोबत सैफ अली खान आणि संजय दत्तसारखे प्रस्थापित असतानाही  तिचा पडद्यावरचा वावर इतका सहज होता की हा तिचा पहिला चित्रपट असावा, असा संशयही येऊ नये ! 'ललिता' च्या व्यक्तिरेखेसाठी आवश्यक परिपक्वता विद्या बालनच्या एकंदरीतच व्यक्तिमत्वात आहेच आणि ती तिथे उतरली असावी. तिच्या सौंदर्यातला गोडवा आणि साधेपणा असा काही होता की पाहणारा प्रत्येक जण शेखर किंवा गिरीश बनावा ! ह्या मधाळ चेहऱ्याच्या आश्वासक वावर व समंजस, संयत अभिनयाने 'परिणीता' जिवंत केली. विद्याची परिणीता कुठल्याच प्रसंगात तिचा संयतपणा सोडत नाही. शेखरसोबतचे हळवे क्षण असोत किंवा कुटुंबीयांसोबतचे मजा-मस्करीचे, प्रेमभंगाचा आघात असो किंवा अपमानाचे घाव असोत, सुख-दु:खाचे सगळे प्रसंग स्वतःचा तोल यत्किंचितही न ढळू देता स्वीकारणारी सर्वगुणसंपन्न नायिका अनेक वर्षांनी पडद्यावर आली होती आणि म्हणूनच तिच्यावर प्रेम जडलं. 
शेखर आणि ललिताचं नातं खूप नाजूक आहे. ललिताला शेखरच काय, इतरही सगळे अगदी गृहीतच धरत असतात. स्वतः: त्या दोघांनाही आपल्या मनात एकमेकांविषयी नक्की काय भावना आहे, हा प्रश्नही पडत नसतो, इतके ते एकमेकांसाठी गृहीत असतात. शेखरची आई ललितामध्ये एक आदर्श सून पाहत असते, त्या दोघांची घनिष्ट मैत्री तिला माहीतच असते, तरीही 'शेखरला लग्नासाठी मुलगी पाहायला जाण्यासाठी राजी कर' असं ललिताला बिनदिक्कत सांगते. आणि ललिताच्या चेहऱ्यावर क्षणार्धासाठीच गोंधळाची भावना तरळते. 'तू नाही म्हणालास म्हणून मी नाईटक्लबला गेले नव्हते', असं सांगताना मुसुमुसु रडणारी ललिता तर आपलीच एखादी हवीहवीशी गोंडस मैत्रीण वाटते. शेखरशी गैरसमजातून वाद झाल्यावर तो तिला अद्वातद्वा बोलतो, डोळ्यांत पाणी आणून ते सगळं ऐकून घेणारी ललिता तेव्हाही आपला तोल ढळू देत नाही. हे सगळी घुसमट आणि हे सगळे चढ-उतार विद्या बालनने अतिशय सहजतेने सादर केले आहेत. 



अर्थात, त्यात प्रदीप सरकारचेही क्रेडिट आहेच. अनेक प्रसंगात 'डिरेक्टर्स टच' स्पष्टपणे जाणवतो.
संतापलेला शेखर ललिताच्या थोबाडीत लगावून तणतणत दासबाबूंच्या हवेलीतून शेजारी स्वत:च्या घरी येतो. तो रस्ता क्रॉस करतो आणि तिथे बसलेला एक हमाल/ गाडीवाला बिडी शिलगावतो. माचिसचा उजेड पडदाभर वगैरे पसरत नाही. तिथे कंदील लावलेला असतोच. पण ती माचीस हे दाखवते की 'ठिणगी पडलेली आहे'. 'बॅकग्राऊंड'ला 'रतियां कारी कारी रतियां...' हे गाणं सुरु होतं. हा सगळा प्रसंग काव्यात्मक आहे. किंबहुना, 'परिणीता'चा ही आणि अशी काव्यात्मकता अनेकदा जाणवते. 
शेखर आणि ललिता एकमेकांना प्रेमाची कबुली देतात, त्यानंतर दार्जिलिंगला कामासाठी जाणारा शेखर ट्रेनमध्ये 'यह हवायें गुनगुनायें..' हे अवीट गोडीचं उडतं गाणं गातो. गाणं ट्रेनमध्ये आहे, तिच्याच तालावर आहे कारण प्रेमाची गाडी रुळावर आल्याची भावना मनात आहे. शेवटी ते गाणं 'झुकझुक झुकझुक' धीमी व कमी होत संपतं कारण शेखरच्या अपरोक्ष त्याच्या प्रेमाच्या गाडीला ब्रेक लागला आहे. हे सगळं खूप प्रतीकात्मक आहे. ह्या गाण्याच्या आधी नवीनबाबूच्या केबिनमधून चारित्र्यहनन करणारे अपमानास्पद बोल ऐकून ललिता रडत बाहेर पडते आणि त्यानंतर लगेच गाडीत बसून गिटार वाजवत गाणारा शेखर दिसतो. That's how he is. तो उथळ नसला, तरी अनभिज्ञ आहे. इतका की त्याला त्याच्या वडिलांचे दुष्ट हेतू ओळखता येतच नाहीत. म्हणून जेव्हा प्रत्यक्षात ललिताच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे, तेव्हा तो मात्र 'धरती सजी अंबर सजा, जैसे कोई सपना...' गाऊ शकतो आहे. ही गाण्यांची पेरणी आणि त्यांचं सुंदर चित्रण 'परिणीता'चं वेगळेपण आहे. 
एका प्रसंगात शेखर ललिताला म्हणतो, 'हिसाब.. और मैं ?', जोडून पुढच्याच प्रसंगात शेखरच्या बाप - नवीन बाबू - त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या ललितालाच म्हणतो, 'सारा खेल ही हिसाब-किताब का हैं !' लगेच पुढे असंही म्हणतो 'जहाँ मुनाफा ना हो वहाँ बिलकुल भी वक़्त बरबाद नहीं करना चाहिये'! 
अजून एका प्रसंगात गायत्री स्वतःच्या वाढदिवसाचा भला मोठा महागडा केक कापतेय आणि त्याच वेळी दुसरीकडे ललिता घरातच केकपात्रात केक करायला ठेवून ओव्हनचं बटन ऑन करते अन् फ्युज उडतो ! असे अनेक प्रसंग आहेत ज्यातले अंडरकरंट्स पाहणाऱ्याला समजून येतात. 

'परिणीता' काही पल्लेदार संवाद, पंचलाईन्सचा चित्रपट नाही. तो अश्याच अंडरकरंट्स आणि काव्यात्मकतेचा चित्रपट आहे. 
ह्या काव्यात्मकतेला महत्वाचा हातभार शंतनू मोईत्राचा आहे. एका मुलाखतीत शंतनू मोईत्राने असं कबूल केलं आहे की, परिणीताचं संगीत बनवताना त्याने आरडी बर्मनच्या विचारप्रक्रियेचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला होता. चित्रपट रिलीज झाल्यावर त्याला 'फिल्मफेअर'चा 'आरडी बर्मन अवॉर्ड फॉर न्यू म्यूझीक टॅलेंट' मिळाला, हा योगायोगही काव्यात्मकच ! ह्या सिनेमातून अनेक वर्षांनी अशी गाणी ऐकायला मिळाली की ती ऐकताना असं वाटलं की बनवणाऱ्याने आपल्या मनाचा एक तुकडा ह्यात घोळवून घोळवून विरघळवला आहे. सगळी गाणी मधुर (मेलोडिअस) आहेत. ती १९६२ च्या काळाला साजेशी आहेत. त्यात कुठलाही टेक्नो कलकलाट नाही किंवा शब्दांची ओढाताण नाही. 
'परिणीता' हा एक 'कम्प्लिट अल्बम' होता. त्यात 'पियू बोले....' आणि 'यह हवायें...' सारखी प्रेम गीतं आहेत, तर 'सूना सूना मन का आंगन..' आणि 'रात हमारी तो..' सारखी विरहगीतंही आहेत. 'कैसी पहेली जिंदगानी...' हा डान्स नंबर आणि 'धिनक धिनक धा..' हे लोकगीत सदृश विनोदी अंगाचंही गाणं आहे. प्रत्येक गाण्यासाठी स्वानंद किरकिरेचे अर्थपूर्ण शब्द होतेच, पण प्रत्येक गाण्यात शंतनू मोईत्राची मेहनतही आहे. कुठलंच गाणं पाटी टाकलेलं नाही. श्रवणीय गाण्यांची अचूक पेरणी आणि त्यांचं उत्तम चित्रीकरण ही विधू विनोद चोप्राची खासियत 'परिणीता'चं अजून एक वेगळेपण आहे. 

संजय दत्त आणि सलमान खान ह्या दोन अतिशय ओंगळवाण्या इसमांना काही चांगल्या कलाकृतींचा हिस्सा होण्याची संधी मिळाली. 'परिणीता' ही संजय दत्तसाठीची ती एक संधी होती. तो वाईट दिसलाय, त्याने नेहमीप्रमाणेच सुमार काम केलंय, पण तरी तो खटकला नाहीय कारण त्याच्याशिवाय इतर सगळं बऱ्यापैकी जमून आलं आहे. 


सैफ अली खान, हा एक अंडररेटेड अभिनेता आहे. त्याने साकारलेला शेखर, हा त्याच्या करियरमधल्या अनेक उत्तम कामांपैकी एक आहे. गाण्यांच्या चित्रीकरणांत सैफची सांगीतिक समज कळून येते. आशिक आवारा, ओले ओले... वगैरे थिल्लरपणापासून सुरुवात केलेला सैफ अली खान 'दिल चाहता है' नंतर जणू काही आमूलाग्र बदलला. मानेवरचे केस बावळटासारखे उडवत पोरकट नाचणारा भिक्कार नाईंटीजमधला सैफ ते 'पियू बोले...' मध्ये तालावर गिटारचे स्ट्रोक्स देणारा, पियानोसमोर सराईतासारखा बसणारा सैफ हा प्रवास खूप मोठा आहे. एके ठिकाणी वाचण्यात आलं होतं की, शेखरच्या भूमिकेसाठी सैफ 'फर्स्ट चॉईस' नव्हता. सुदैवाने का होईना, सैफच शेखर बनला आणि त्यात तो अगदी चपखल वाटला आहे. 'पडद्यावरची केमिस्ट्री' हा योग्य कास्टिंग आणि अभिनेत्यांमधली योग्य समज ह्याचा मिलाफ असतो, असं मला वाटतं. सैफ आणि विद्यामधली इथली केमिस्ट्री मस्त जमून आलेली आहे. मुख्य व्यक्तिरेखांचं असं एकमेकांशी घट्ट मिसळून येणं, ही 'परिणीता'ची अजून एक खासियत आहे.     


'परिणीता' हा केवळ एक चित्रपट नसून ती एक श्रवणीय सुरेल कविता आहे. विद्या बालन, शंतनू मोईत्रा आणि प्रदीप सरकार ह्यांची. त्यातलं काव्य अगदी सुदृढ सशक्त नसेल, पण अगदीच कमजोर अशक्तही नाही. महत्वाचं हे की त्यात 'काव्य आहे' आणि काव्य हे नेहमी सुंदरच असतं. म्हणून अनेक दोष, उणिवा असूनही 'परिणीता' ला मनात विशेष स्थान आहे. प्रत्येक सुंदर आविष्काराला असतं, तसंच. हक्काचं. 

- रणजित पराडकर 

Tuesday, June 02, 2020

निद्रिस्त

श्वासाला कुठली निश्चित लयही नाही
टिकटिकतो आहे घड्याळातला काटा
निद्रिस्तपणाला जाग निरर्थक आहे
निर्जन भवताली निर्जिव पडल्या वाटा

वाऱ्याचा हलका स्पर्श नसे झाडांना
आंधळी शांतता दूर दूर भरकटते 
पापणीस नाही ओलावा स्वप्नाचा
ह्या रात्रीचे पाऊल इथे अडखळते

पिंजरा मनाचा सताड उघडा केला
पण पक्षी काही केल्या उडतच नाही
अंधार कोणता कुणास भीती देतो
शिवशिवत्या पंखांनाही कळतच नाही

भिंतींची उंची कमी वाटते आता
खिडकीची चौकट अजून गहिरी होते
उद्गार पुसटसा कानी ऐकू येता
जाणीव कोरडी ठारच बहिरी होते

दुर्लक्षित झालो आहे की अज्ञात?
एकटेपणा आहे की हा एकांत?
छळवाद मनाचा मनात चालू आहे
माझ्यात कोणते तिसरेपण विश्रांत?

....रसप....
२० एप्रिल ते २ जून २०२०

Tuesday, May 19, 2020

एका 'नोबडी'चं पाताळदर्शन ! - पाताळ लोक (Web Series Review - Paatal Lok - Amazon Original)


ह्या जगाच्या अतिप्रचंड पसाऱ्यात असंख्य लोक आपापली थोडीथोडकी जागा पकडून आहेत. हे लोक कधी आले, कुणाला समजलं नाही. हे कधी जातील, कुणाला कळणारही नाही. ह्यांची कुणीही कधीच नोंद घेतलेली नाही, घेणारही नाही. ह्यांच्यासाठी रोजचा दिवस हळूहळू करत मावळण्यासाठीच उगवत असतो. ह्या उगवतीपासून मावळतीपर्यंत दरम्यानच्या काळात हे लोक एकच एक दिवस पुन्हा पुन्हा जगतात. मालकाने पाठीवर लादलेल्या ओझ्याला गपगुमान मान खाली घालून वाहून नेणाऱ्या गाढवाप्रमाणे हे लोक परिस्थितीने पाठीवर लादलेल्या जबाबदाऱ्यांना आयुष्यभर मान खाली घालून गपगुमान वाहून नेत राहतात. फरक इतकाच की ह्यांचा प्रवास वर्तुळाकार असतो. गोल गोल फिरत राहतात. आयुष्यभर मरमर, वणवण करूनही ते कुठेही पोहोचत नाहीत. जिथून सुरुवात झालेली असते, तिथेच पुन्हा पुन्हा येत राहतात. बहुतेकदा ही व्यवस्था त्यांनी स्वीकारलेली असते आणि ह्या सत्याशी मनापासून जुळवून घेऊन ते समाधानीही असतात. 
पण एखादा 'हाथी राम चौधरी' असतो, ज्याला एक संधी मिळते, नेहमीची वाट बदलून स्वतःचा परीघ बदलायची. ही बदललेली वाट बिकट असते, तिथून जाण्यासाठी, चालत राहण्यासाठी खूप किंमत मोजायला लागणार असते. पण किती, हे त्याला सुरुवातीला माहीत नसतं. मात्र हळूहळू त्याच्या मनाची तयारी होते आणि तो आव्हान स्वीकारतो. एखाद्या मुंगीचं निरर्थक आयुष्य जगणारा 'हाथी राम' हत्ती बनतो आणि निबिड जंगलात बिनधास्त घुसतो. पुढे जे व्हायचं ते होतंच. 

दिल्लीच्या एका किरकोळ पोलीस ठाण्यातला फुटकळ केसेस करण्यात करियर गेलेला एक किरकोळ इन्स्पेक्टर हाथीराम चौधरी (जयदीप अहलावत). त्याच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक घटना घडते. नावाजलेला आणि वादप्रिय टीव्ही पत्रकार संजीव मेहरा ह्याच्या हत्येच्या कट उधळला जाऊन चार मारेकऱ्यांना हत्यारांसह पकडलं जातं. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमकडून हा कट उधळला जातो आणि ही एक 'ओपन अँड शट' केस त्याच पद्धतीने हाताळण्यासाठी वरिष्ठांसमोर हाथीरामसारखा कर्तृत्वशून्य अधिकारी अनायसेच येतो. मोठी नावं जोडलेली एक 'हाय प्रोफाईल' केस प्रथमच हाथीरामला मिळते आणि तोही मोठ्या उत्साहाने ही केस 'ओपन अँड शट' करण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम सुरु करतो. मात्र लौकरच त्याला ह्या केसला अजून काही कंगोरे असल्याचं जाणवतं आणि तो अजून खोलात शिरायचा प्रयत्न करतो. खोलात जाणारा हाथीराम कुठे कुठे पोहोचतो, त्याच्या हाताला काय काय लागतं, त्याला काय काय किंमत मोजायला लागते आणि सरतेशेवटी हा सगळा प्रकार त्याला कुठे पोहोचवतो, ह्या केसचं खरं रूप काय असतं, अश्या अनेक उत्कंठा ताणणारी 'पाताल लोक' सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं देते. 

'जयदीप अहलावत'ला मी सगळ्यात पहिल्यांदा 'कमांडो' मध्ये पाहिला. 'विद्युत जमवाल नावाचा नवा ऍक्टर आलाय आणि तो खतरनाक स्टंट्स, फाईट्स करतो', केवळ ह्या एका कारणासाठी मी तो सिनेमा पाहिला होता आणि त्यातला क्रूरकर्मा व्हिलन जो जयदीप अहलावतने साकार केला होता, हादरवून गेला होता. चेहऱ्यावर असलेले देवीसारखे व्रण ओम पुरींची आठवण करून देणारे, पण हा अभिनेता वेगळ्या पठडीतला. खरं तर कमांडोच्या आधी 'गँग्स ऑफ वासेपूर'मध्ये तो दिसला होता, पण सिनेमातला त्याचा छोटा, पण महत्वाचा रोल संपल्यावर मनोज वाजपेयी येतो आणि सिनेमा खिश्यात घालतो, त्यामुळे त्यातला अहलावत फारसा लक्षात राहणार नव्हताच. नंतर 'रईस'सारख्या सिनेमांतुनही त्याच्या दुय्यम भूमिका लक्षात राहिल्या नाहीत. पण 'राज़ी'मधला रॉ अधिकारी मात्र चांगलाच लक्षात राहिला. ह्या गुणी अभिनेत्याला प्रथमच अशी मध्यवर्ती व्यक्तिरेखा साकारायला मिळाली असावी. 'पाताल लोक' ही कहाणी अनेकांच्या असली तरी मुख्य व्यक्तिरेखा 'हाथीराम'चीच आहे आणि इतक्या महत्वाच्या व्यक्तिरेखेचं 'जयदीप अहलावत'ने सोनं केलं आहे. त्याच्या देहबोलीत होणारे अनेक बदल स्पष्ट जाणवत राहतात. हाथीराम हा एक सामान्य माणूस आहे. कुणी 'लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर' नाहीय. त्याचा सामान्यपणा त्याच्यातल्या चांगल्या-वाईटासह अहलावतने आपलासा केला आहे आणि म्हणूनच तो खराखुरा उतरलाही आहे. ह्याचं क्रेडिट लेखकांनाही जाईलच कारण नक्कीच ही एक 'ऑथर बॅक्ड' रोल आहे. 

ह्याच लेखकांना मात्र एक छोटंसं 'डेबिट'ही जायला हवं. फक्त आपलं स्वतः:चं सेक्युलर, न्यूट्रल वगैरे असण्यासाठी अनावश्यक 'ब्राह्मण आणि इतर' असा अँगल कहाणीत घुसडणे, ह्या हास्यास्पद मूर्खपणातून सर्जनशील लोकांनी बाहेर पडायला हवं. I mean, भारताच्या कोणत्या कोपऱ्यात दलितांचा नेता ब्राह्मण आहे, हे मला तरी माहीत नाही. दलितांच्या मतांसाठी त्यांना वापरून घेणं, जवळ घेणं हा भाग वेगळा आणि 'दलितांचा नेता' हीच इमेज असणं, हे वेगळं असं मी मानतो. दलितांचा नेता दलितच दाखवला असता, तरी कहाणीत तसूभरसुद्धा फरक पडला नसता. तरी ही ओढाताण कशासाठी आणि का, हा प्रश्न लेखक-दिग्दर्शकांनी स्वत:लाच विचारायला हवा. हे प्रपोगंडा आता लोकांना समजून येत असतात, आताचा सोशल मीडिया साक्षर प्रेक्षक खूप बारकाईने सगळीकडे लक्ष ठेवून असतो आणि मोकळेपणाने व्यक्तही होत असतो, हे आता लक्षात घ्यायला हवं.

अर्थात, हा एक प्रपोगंडाचा छोटासा भाग वगळता 'पाताल लोक' अगदी बांधीव आहे, असंही नाही. नऊ भागांच्या वेब सीरिजमध्ये कहाणी सांगण्यासाठी आणि तरीही तिला उत्कंठावर्धक ठेवण्यासाठी काही अनावश्यक भागसुद्धा ह्यात आहेच. उदाहरणार्थ, हाथीरामच्या मुलाचं उपकथानक. तसेच अटक केलेल्या चार आरोपींचे पुर्वायुष्य वगैरे भागही. मला असं वाटलं की मूळ कथा ही एका चित्रपटापुरतीच आहे. तिला प्रत्येकी ४०-४२ मिनिटांच्या नऊ भागांमध्ये मांडण्यासाठी पसारा वाढवत नेला आहे. चांगली बाब इतकीच की पसारा वाढवल्यावर तो आवरण्यासाठी अनेक मालिकांच्या अखेरच्या भागांमध्ये जी उरकाउरकी केली जाते, तशी घिसाडघाई इथे केलेली नाही. काही भाग आहे तसाच सोडून दिला आहे. प्रत्येकच उपकथानक त्याच्या पूर्णत्वाला आलंच पाहिजे असं काही आवश्यक तर नाहीच. 

'अहलावत'व्यतिरिक्त अजून एका महत्वाच्या भूमिकेत - पत्रकार 'संजीव मेहरा'च्या भूमिकेत - 'नीरज कबी' हा एक तगडा ऍक्टर पुन्हा एकदा आहे. संजीव मेहराला पाहताना टीव्हीवर झळकणाऱ्या एका पुरस्कारप्राप्त वरिष्ठ पत्रकार महोदयांची आठवण सतत येत राहते. पत्रकारांच्या ढोंगीपणा उघड करणारी ही व्यक्तिरेखा आहे. आणि कबी पुन्हा एकदा त्याची कुवत दाखवून देतो. इतर सहाय्यक भूमिकांत हाथीरामचा सहकारी 'इम्रान अन्सारी'च्या भूमिकेतला 'ईश्वक सिंग' लक्षणीय आहे. 
'अभिषेक बॅनर्जी'ने साकारलेल्या 'हथोडा त्यागी'चा प्रभाव इतका जबरदस्त आहे की त्याची पूर्णकहाणी सविस्तर दाखवणारा एक स्पिन-ऑफ करायला हवा, असं वाटतं. थंड डोक्याने थरकाप उडवू शकेल असे खून पाडणारा 'हथोडा' अंगावर येणारा आहे. 
'गुल पनाग'ने एक अतिशय क्षुल्लक भूमिका केली आहे. ह्या लोकांना घर चालवावं लागतं, बिलं भरायची असतात, असं समजून घ्यायला हवं बहुतेक. राजेश शर्मा, स्वस्तिका मुखर्जी, विपीन शर्मा वगैरे माहितीतले चेहरे, नावं आपापली कामं करून जातात. त्यांना फार विशेष असा काही वाव नाहीय.  

'किल्ला' चे दिग्दर्शक अविनाश अरुण आणि 'परी'चे दिग्दर्शक प्रेषित रॉय ह्या द्वयीने कहाणीवरची पकड कुठेही ढिली पडू दिली नाहीय. थ्रिलर पाहताना ही पकड माझ्यासारख्या सामान्य प्रेक्षकांसाठी - ज्याचा फार पटकन रसभंग होऊ शकतो - फार महत्वाची असते. गेल्या काही दिवसांत अनेक थ्रिलर्स पाहत असताना दिग्दर्शकाची एक छोटीशी डुलकी सगळा खेळ बिघडवून गेल्याचे अनेक अनुभव मला आले आहेत. 'पाताल लोक' मात्र इथेच वेगळी ठरली. 
एक निर्माती म्हणून आपलं वेगळं पण अनुष्का शर्माने ह्यापूर्वीही दाखवलं आहे. खरं तर सीरिज पाहण्याचं प्राथमिक कारण हेच होतं की, अनुष्का शर्माने प्रोड्युस केली आहे. हा कन्टेन्ट वेगळा असणार, चांगला असणार असा विश्वास आधीच निर्माण झाला होता. हे एका निर्मात्याचं यशच म्हणायला हवं !  

एकूणात गेल्या काही महिन्यांत आलेल्या काही उल्लेखनीय वेब सीरिजच्या ओळीत 'पाताल लोक'ही नक्कीच आहे. आवर्जून पाहावी, असा हा कन्टेन्ट आहे. 

टीप - सबटायटल्स चालू करून पाहायला लागू शकते कारण बऱ्याचदा लोक तोंडातल्या तोंडात बोलल्यामुळे संवाद नीट समजतच नाहीत. 'चांगलं काम करणं म्हणजे तोंडातल्या तोंडात बडबडणं' हा सध्याचा एक विचित्र पायंडा आहे, अशीही एक समजूत होत चालली आहे. असो.  

- रणजित पराडकर 

Monday, February 10, 2020

सफरचंदात शिजवलेली गिळगिळीत मिसळ - शिकारा - (Movie Review -Shikara)

एकोणीसशेे नव्वदच्या आसपास मी वर्तमानपत्र वाचायला सुरु केलं असावं. त्या काळात एक बातमी कुठल्याश्या कोपऱ्यात रोज वाचायचो. 'काश्मिरमधला हिंसाचार'. पंडितांचा संहार त्या काळात नियमितपणे चालू होता. काश्मिरात अत्याचार बोकाळला होता. वर्तमानपत्रांनी त्या बातम्यांना क्वचितच मथळ्याची जागा दिली. अपवादानेच अग्रलेखातून कुणी जळजळीत अंजन ओतलं. असंख्य लोक काश्मिरातून हाकलले जात होते. बेघर होत होते. मला त्या वयात कळतच नव्हतं की हे चाललंय तरी काय ? हे कोण लोक आहेत आणि त्यांच्याच देशातल्या लोकांना ते का त्रास देत आहेत? राहतं घर, जमीन, मित्र, नातीगोती सोडून, गाव सोडून असे लोक का निघून येत आहेत? सरकार काहीच का करत नाहीय? हे देशोधडीला लागलेले लोक कसे जगत असतील? रिफ्युजी कँप म्हणजे काय? ह्यांतले काही प्रश्न मला पडत असत आणि तितकी समजच नसल्यामुळे काही पडतही नसत.

आज ३० वर्षांनंतर काश्मिरी पंडीतांचा विषय घेऊन विधु विनोद चोप्रा 'शिकारा' घेऊन आले आणि मला गंमत ही वाटली की वरच्या प्रश्नांपैकी बहुतांश प्रश्न त्यांनाही पडले असावेत, असं वाटत नाहीय. हा त्यांचा निरागस भोळसटपणा आहे की पुचाट व्यावसायिकपणा की ज्या पंडित समुदायातून आले असल्याचं ते छातीठोकपणे सांगतात त्यांच्याविषयी त्यांना स्वत:लाच असलेली निर्लज्ज अनास्था आहे की अजून काही, हे सांगता येणार नाही. किंबहुना, त्यावर सत्यशोधन करायची गरजच नाहीय कारण 'आजवर न सांगितली गेलेली काश्मिरी पंडितांची कथा' म्हणून जे ह्या सिनेमाबद्दल बोस्टिंग चाललंय, त्याचा विचार करता, हे कथाकथन निव्वळ खोटारडं, अप्रामाणिक व दांभिक आणि म्हणूनच उथळ, निष्प्रभ व सुमारही आहे, ह्याबद्दल वादच नाही.

'काश्मिर प्रश्न फार गुंतागुंतीचा आहे', असं एक अतिशय गोंडस विधान अनेकदा केेेेलं जातं आणि त्याच्या मागे आपलं अपूर्ण ज्ञान किंवा सपशेल हताशा किंवा धर्मनिरपेक्षतेतला बेगडीपण सोयीस्करपणे लपवताही येते. मात्र हे विधान खरंही आहेच. प्रश्न गुंतागुंतीचा आहेच. पण खरं हेही आहे की माथेफिरु काश्मिरी फुटिरतावद्यांनी ऐंशीच्या दशकात काश्मिरचं इस्लामीकरण करायच्या हेतूने हिंदू काश्मिरी पंडितांवर क्रूर अत्याचार केले आहेत. जगातल्या विविध 'एथनिक क्लिन्सिंग'च्या घटनांपैकी ही एक महत्वाची मोठी घडामोड होती, ज्यात लाखो काश्मिरी हिंदू विस्थापित झाले, हजारो मारले गेले. स्त्रियांवर अत्याचार झाले. बळजबरी धर्मांतरं केली गेली. बर्फाचा रंग पांढरा असतो. पण काश्मीरच्या बर्फाचा रंग लाल आहे. रक्ताचा 'लाल'. कदाचित काहींना हा रंग भगवा वाटत असेल. पण रक्त कुणाचंही असलं तरी लालच असतं. वर्षानुवर्षं, पिढ्यान् पिढ्या काश्मिर खोरं धुमसत राहिलं आहे. तसं त्याला ठेवलं गेलं आहे. ज्याला 'नंदनवन' म्हणून अभिमानाने शिरपेचातल्या तुऱ्याप्रमाणे आपण मिरवतो, त्या नंदनवनात पंडितांच्या हत्यांनी अशांतता व असुरक्षिततेची बीजं रुजवली आहेत. असुरक्षिततेच्या झाडाला असंतोषाची विषारी फळं येत असतात आणि हिंसेच्या उष्ण हवेने बदल्याच्या भयंकर आगी भडकत असतात. हा इतिहास आहे आणि एक वैश्विक सत्यही. पाचही इंद्रियांच्या जाणिवांतून एका निष्पाप मनांत जेव्हा असंतोषाचं विष झिरपतं तेव्हा डोक्यात बदल्याची आग पेट घेते. पंडितांच्या डोक्यांत अशी आग कधी पेटली असेल का ? की हा समुदाय मुळातच शांतताप्रिय आहे व त्याने ह्या भयानक संहाराकडेही सबुरीच्या नजरेने पाहिलं? की त्यांच्यासोबत जे झालं ते बरोबरच होतं ? त्यांच्यावर झालेल्या अनन्वित अत्याचारांना व्यवस्थेने तर कधी थारा दिला नाहीच, पण कलात्मक पुरोगामी अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा सिलेक्टिव्ह पुळका अधूनमधून येणाऱ्या चित्रपटजगतानेही ह्या स्फोटक विषयाला कधी हात का घातला नाही ? 'हैदर'सारखे प्रभावी चित्रपट इथे बनतायत, पण त्यांत औषधापुरताही पंडितांचा उल्लेख असतच का नाही ? का असे एकांगी चित्रपट प्रभावीपणे बनवले जातात ? अश्या अनेक भेडसावणाऱ्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न 'शिकारा' करेल असं वाटत होतं.

प्रत्यक्षात मात्र 'शिकारा' एक बुळबुळीत प्रेमकथाच आहे. तिच्यासोबत काश्मिरी पंडितांचं विस्थापन दाखवलं गेलं आहे. जे खूपच सौम्यपणे चित्रित केलं गेलेलं आहे आणि जो हिंसाचार झाला त्याचं खापर अगदी सहजपणे अमेरिकेच्या माथी फोडलं गेलं आहे. इथे दाखवलेले मुसलमान केवळ पंडितांच्या मालमत्तेवर डोळा ठेवण्याइतपतच खलवृत्तीचे दाखवले आहेत. ते गोड गोड बोलून हे विस्थापन घडवून आणतात. कुठेही कुणी माथी भडकावणारी भाषणं देताना दिसत नाही. कुठेही कुणी 'अल्लाहू अकबर' च्या घोषणा देताना दाखवला जात नाही. कुठल्याही मशिदीतून खुलेआम 'हाकला, मारा, बाटवा' सारखे फतवे सोडले जात नाहीत. 'ह्या लोकांच्या हातात अमेरिकेने पाकिस्तानच्या मार्फत हत्यारं ठेवली आणि त्यांच्या हातून एक आगळीक घडली', अशी एक पळपुटी थिओरी इथे मांडली जाते. इथे पंडितांना जिवंत जाळले जात नाही. स्त्रियांवर बलात्कार होत नाहीत. इथे फक्त त्यांना हाकललं जातं. त्यातही त्यांचे काही समंजस मुसलमान स्नेही त्यांना सुरक्षितपणे बाहेर पडण्यास मदत करतात. जणू काही जे काही घडतंय त्यासमोर ते स्वत:ही हतबल आहेत. ही जणू काही एखादी नैसर्गिक आपत्तीच असावी !
पंडितांच्या देशोधडीच्या रक्तरंजित इतिहासात काळीकुट्ट नोंद असलेला १९ जानेवारी १९९० चा दिवस तर 'शिकारा' इतका पुचाटपणे दाखवतो की संतापाचा कडेलोट व्हावा. १९ आणि २० रोजी सगळ्या काश्मिरात वीज बंद केली जाऊन मशिदींमधून भडकावू घोषणा दिल्या जात होत्या. पंडितांवरील अत्याचाराने अरीसिमा गाठली होती. सामुहिक हत्याकांडं घडली होती. रस्त्यांवर रक्ताच्या नद्या वाहिल्या होत्या. 
पण विधु विनोद चोप्रांच्या भंपक व डरपोक अभिव्यक्तीला हेे दोन दिवसही प्रेमळ 'रोगन जोश' सारखे चविष्ट वाटले आहेत. ह्या दिवसाचं 'शिकारा'मधलं महत्व इतकंच आहे की ह्याच दिवशी चित्रपटातल्या मध्यवर्ती व्यक्तिरेखा अखेरीस आपलं गाव, घर-दार सोडून काश्मिरातून बाहेर पडल्या, बाकी काही नाही.


नवोदित कलाकार आदिल खान आणि सादिया हे लेखक, दिग्दर्शकाच्या हाराकिरीवर कळस चढवतात. त्यांच्या प्रत्येक हालचालीत नवोदितपणा जाणवत राहतो, बोलण्यात नकलीपणा दिसून येतो. किंबहुना, पडद्यावर दिसणारा कुणीच स्वत:च्या भूमिकेत पूर्णपणे शिरलेला वाटतच नाही. कदाचित ह्या पटकथेतला अप्रामाणिकपणा त्यांनाही जाणवला असावा.सिनेमॅटोग्राफीही अगदी सपक आहे. एकही दृष्य डोळ्यांत भरत नाही. कॅमेरावर्क कुठलीही चमत्कृती करत नाही.संगीताची बाजूही, जी आजपर्यंत चोप्रांच्या चित्रपटात कधीच नव्हती, अतिशय मरतुकडी आहे. एखादी 'शिकारा थीम' वगैरे बनवता आली असती, पण सुचलंच नसावं बहुतेक. सपक संवाद पटकथेच्या भंपकपणाला साजेसे आहेत आणि एडिटर विधु विनोद चोप्रा तर कायमच निद्राधीन वाटत राहताात.

एकंदरीत, हा चित्रपट चोप्रांंनी हा चित्रपट बनवलाच तरी का असंं वाटतं. जर त्यांना पंडितांच्या हृदयद्रावक वास्तवाची खिल्ली उडवायची होती, तर ती ते ह्या विषयाकडे - जसा चित्रपटविश्वातील त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी कायमच केलाय तसा - कानाडोळा करुन प्रेमकथा विकण्यासाठी दुसरा एखादा मसाला बनवू शकले असते. लोकांना जळजळीत मिसळ देण्याची बतावणी करुन प्रत्यक्षात फोडणीपासून सजावटीपर्यंत रवाळ, मिळमिळीत सफरचंद टाकायचा नतद्रष्टपणा करायची काही एक गरजच नव्हती. 
ह्यावर थुकरट ऐतिहासिक चित्रपटांकडे 'ह्या निमित्ताने लोक त्याच्याबद्दल शोधून वाचतील तरी' असला भिकार दृष्टीकोन ठेवून पाहणारे तसंच काहीसं विधान करतील. पण हा दांभिकपणा आहे, हे लक्षात घ्यायला हवं. 'जय श्रीराम'च्या घोषणा देत, भगवे फडकवत वातावरण तापवणं, माथी भडकावणं हा जसा नालायकपणा आहे, तसाच 'अल्लाहू अकबर' च्या घोषणा देत, हिरवे झेंडे फडकावत अत्याचाराचा नंगानाच घडवणंही. हे दोन्ही घडत असतं आणि हे सत्य कितीही अप्रिय असलं तरी ते आधी स्वीकारायला हवं. आपण जर 'डिनायल मोड' मध्येच राहणार असू, तर ह्यात बदलही कधी होणार नाही. जर एका बाजूच्या कट्टरवादावर आपण उघड भाष्य करत असू, तर दुसऱ्याही बाजूला दुर्लक्षाचं सुरक्षाकवच देऊन चालणार नाही. 
जर दुसरी बाजू समोर आणायचीही आपल्याला भीती वाटत असेल, तर उलट ह्यावरूनच हे समजावं की कुठली बाजू जास्त भडक आहे.

- रणजित पराडकर

Thursday, January 02, 2020

पंचम - बस नाम ही काफी हैं !

३१ डिसेंबर १९९३. सरत्या वर्षातली अखेरची संध्याकाळ. एका चित्रपटाचा मोठा सेट. सेटवरच निर्मात्याने आयोजित केलेली नवीन वर्षानिमित्ताची मोठी पार्टी. एक उत्साहाचं, आनंदाचं वातावरण. इतक्यात 'त्या'चं आगमन झालं. पार्टीतल्या त्या त्याच्या एन्ट्रीच्या वेळी त्याच चित्रपटातलं त्यानेच बनवलेलं एक अवीट गोडीचं गाणं पार्श्वसंगीतासारखं वाजवलं गेलं - 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा..' ! त्याच्या चेहऱ्यावर उमटलेलं समाधानाचं हसू हेच सांगत होतं की आता येणाऱ्या काळात तो पुन्हा एकदा चित्रपट संगीताच्या दुनियेवर अधिराज्य गाजवणार आहे. बरोबर ! सेट होता '1942 अ लव्ह स्टोरी' चित्रपटाचा, पार्टी होती विधू विनोद चोप्राची आणि 'तो' होता अर्थातच 'पंचम', म्हणजे 'राहुलदेव बर्मन'. 



ऐंशीच्या दशकाच्या शेवटाकडे लागोपाठ अनेक चित्रपट फ्लॉप होत जाऊन पंचम चित्रपटाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकला गेला होता. कोणे एके काळी लोकांना वेड लावणाऱ्या एका अफलातून संगीतकाराकडे कामही येईनासं झालं होतं. म्युझिक कंपन्यांनी त्याला नाकारलं होतं. चित्रपट निर्मात्यांनी त्याला अव्हेरलं होतं. रसिकांनी त्याला दुर्लक्षित केलं होतं. अमाप यश व प्रसिद्धीचे दिवस उपभोगलेल्या पंचमसाठी हा काळ खडतर होता. तो अपयशाने खचला नव्हता, पण जगाच्या पाठ फिरवण्यामुळे नक्कीच निराश झाला होता. त्याच्यात अजून खूप काम करायची उर्मी बाकी होती, अजून खूप नवनवीन कल्पना स्फुरत होत्या. पण त्या कल्पनांना मूर्त स्वरूपात आणण्यासाठी आवश्यक संधी मिळत नव्हत्या आणि कुणासमोर जाऊन काम मागायचा स्वभावही नव्हता ! कारण कितीही झालं तरी, त्रिपुरातल्या एका राजघराण्याचा तो एक वंशज ! भले, त्याच्या वडिलांनी घरदार सोडून वेगळ्या क्षेत्रात टाकलेल्या पावलावर पाउल टाकूनच तोसुद्धा कधी राजाचं आयुष्य न जगता २४ तास, ३६५ दिवस एक संगीतकार म्हणूनच जगला होता, तरी ते जन्माने राजा होता आणि मनाने तर होताच होता ! पंचमयुग संपल्यात जमा होतं. सिनेसंगीत संपल्यात जमा होतं ! रॉक अ‍ॅण्ड रोल, डिस्को वगैरेच्या नावाखाली थिल्लरपणा बोकाळत चालला होता. ऱ्हिदमच्या नावाने टीनचे डब्बे बडवल्यासारखे बीट्स ऐकवले जात होते. पिचक्या आवाजात कणसुरे लोक स्वस्तात आणि चटकन विकली जाणारी गाणी चकल्यांप्रमाणे पाडत होते.आणि अश्या वेळी विधू विनोद चोप्राने 'परिंदा'नंतर '1942 अ लव्ह स्टोरी' साठी पुन्हा एकदा पंचमला साईन केलं होतं. 

'1942 अ लव्ह स्टोरी' साठी पंचम स्वत:च्या बेसिक्सकडे गेला. सिम्पल मेलोडीज्, साधं अरेंजिंग आणि उत्तम साउंड ह्यांचा त्रिवेणी संगम साधत पंचमने असं काही संगीत दिलं की जणू एका प्रकारे 'मी अजून संपलो नाहीय' असं सगळ्या जगाला सांगायचं असावं. ह्या चित्रपटासाठी पंचमने दिलेलं संगीत सगळ्यात साध्यासोप्या गाण्यांचं होतं. त्या नवीन वर्षाच्या पार्टीत त्याच्या एन्ट्रीला वाजवलं गेलेलं 'एक लडकी को..' आणि ते ऐकून तल्लीन झालेले लोक, म्हणजे दुसरं तिसरं काही नव्हतं, तर जे त्याला सांगायचं होतं ते जगाला ऐकू जातंय अशी एक पोचपावती होती. ती त्याला मिळाली आणि समाधानाचं हसू मनात ठेवून अवघ्या ४ दिवसांनी त्याने जगाचा निरोप घेतला. त्यानंतर ४ महिन्यांनी '1942 अ लव्ह स्टोरी' रिलीज झाला. चित्रपटाला अपेक्षित यश मिळालं नाही, पण संगीत सुपरहिट ठरलं. उभ्या हयातीत फक्त दोनदा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेल्या पंचमला '1942..' साठी तिसरा फिल्मफेअर तर मिळाला. पंचम गेला. पण जाता जाता आपल्या पाउलखुणा कायमस्वरूपी उमटवून गेला. भले तो जिवंत असताना त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं गेलं, पण नंतर फिल्मफेअर पंचमच्या नावाने इतर संगीतकारांना पुरस्कार द्यायला लागलं. आज कुणीही चांगलं संगीत देणारा दिसला की लोक त्याला 'नेक्स्ट आर डी बर्मन' म्हणतात. रिमिक्सच्या जमान्यात सर्वाधिक गाणी पंचमचीच रिमिक्स केली जातायत. ही सगळी लक्षणं आहेत, पंचम जाऊनही न संपल्याची ! त्याने जाता जाता हेच सांगितलं होतं की, 'मी अजून संपलो नाहीय', तो संपणारही नाही.



केवळ ५४ वर्षांच्या आयुर्मानात, ३३ वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत पंचमने विविध भाषांत मिळून तब्बल ३३१ चित्रपटांना संगीत दिलं. १९६१ साली आलेल्या मेहमूदच्या 'छोटे नवाब'मधून त्याने पदार्पण केलं. मात्र पंचमने त्याच्या खूप आधीपासून वडिलांसोबत काम करायला सुरु केलं होतं. सचिनदांच्या १९५८ च्या 'सोलवा साल' मधल्या 'है अपना दिल तो आवारा..' मधला प्रसिद्ध माउथ ऑर्गन त्यानेच वाजवला होता. इतकंच नव्हे तर १९५६ च्या 'फंटूष' चं शीर्षक गीत 'ऐ मेरी टोपी पलट के आ..' ची चाल पंचमला वयाच्या नवव्या वर्षी सुचली होती. पन्नासच्या दशकात अधूनमधून (शिक्षण सांभाळून) आणि साठच्या दशकात पूर्ण वेळ (शिक्षण सोडून देऊन!) पंचम सचिनदांचा सहाय्यक होता. तेरे घर के सामने, गाईड. ज्युल थीफ, प्रेम पुजारी, आराधना, गॅम्बलर, अभिमान, शर्मिली सारख्या अनेक सिनेमांमधल्या गाण्यांवर पंचमची छाप जाणवतेही ! वडिलांनी जाणीवपूर्वक कोवळ्या पंचमकडून मेहनत करवून घेऊन त्याला घडवलं. 'नवकेतन' सारख्या बॅनर्स आणि 'शक्ती सामंता', 'नसीर हुसेन'सारख्या यशस्वी चित्रपटकर्त्यांकडे पंचमची वर्णी लागणं सोपं होतं, पण तिथे टिकून राहण्यासाठी सतत दर्जेदार काम करायला हवं. त्याची तयारी सचिनदा करून घेत होते.

पंचमचं पदार्पण १९६१ साली जरी झालं, तरी त्याचं नाव खऱ्या अर्थाने चर्चेत आलं ते १९६६ साली. चित्रपट होता 'तीसरी मंजील'. एरव्ही शंकर जयकिशन, ओ पी नय्यर सारख्या दिग्गजांसोबत जोडी जमवलेल्या नसीर हुसेन, शम्मी कपूर ह्या मोठमोठ्या नावांसह पंचमला काम करायची संधी सहज मिळाली नाही. शम्मी कपूरने सुरुवातीला पंचमच्या नावाला चक्क नकार दिला होता ! पण दस्तुरखुद्द जयकिशननेच पंचमच्या नावाची जोरदार शिफारस केल्यावर शम्मीने पंचमची गाणी ऐकून घेण्याची तयारी दाखवली. पंचमने 'दीवाना मुझसा नहीं...' ची पहिली ओळ ऐकवल्यावर शम्मीने ताबडतोब मूळ नेपाळी लोकगीतातली पुढची ओळ (ए कान्छा मलाइ सुनको..') स्वत:च गाऊन मुखडा पूर्ण केला आणि म्हटलं, 'हे गाणं मी जयकिशनला देईन. पुढचं ऐकव !' पण पंचमने नेटाने बाकीची गाणी ऐकवली आणि काही वेळातच, जो शम्मी पंचमच्या नावाला पूर्ण विरोध करत होता तो ती गाणी ऐकून प्रचंड खूष झाला होता ! 



'तीसरी मंजील' हा खूप मोठा ब्रेक होता, पण तरीही पंचमकडे कामाचा ओघ सुरु झाला नाही. कारण त्याची स्पर्धा तगड्या लोकांशी होती. स्वत: वडील सचिनदेव बर्मन, शंकर-जयकिशन, मदनमोहन, नौशाद, रवी, लक्ष्मी-प्यारे अशी मोठमोठी नावं तेव्हा आजूबाजूला होती. तो 'तीसरी मंजील'च्या यशानंतरही वडिलांकडे सहाय्यक म्हणून काम करण्यातच अधिक व्यस्त राहिला. पुढील चार वर्षांत त्याने फक्त सहा चित्रपट केले. त्यांतही पडोसन, प्यार का मौसम सारखे बॉक्स ऑफिसवर चांगले चाललेले चित्रपट होते आणि  बहारों के सपने, अभिलाषासारख्या चित्रपटांतून त्याने लक्षवेधक काम केलं होतं. 
त्यानंतर मात्र, १९७० पासून चित्रपट संगीतात 'आर डी बर्मन' नावाचं एक वादळच आलं. पुढील १० वर्षांत पंचमने तब्बल ११० चित्रपट केले ! 

बॉक्स ऑफिसवर राजेश खन्नाला सुपरस्टार करण्यात पंचमच्या संगीताचा मुख्य हातभार होता. राजेश खन्नाची सद्दी संपून अमिताभची गादी आली. ते अमिताभयुगही पंचमच्या संगीतानेच गाजवलं. ऋषी कपूरचा जम बसवण्यातही पंचमच्याच संगीताचा हात होता. पंचमच्या संगीताची जादू अशी होती की त्याने मुख्यत्वे कॉलेजवयीन प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित केलं. रणधीर कपूर (जवानी दीवानी, रामपूर का लक्षमण - १९७२), संजय दत्त (रॉकी - १९८१), कुमार गौरव (लव्ह स्टोरी - १९८१), सनी देओल (बेताब - १९८३) इ. स्टारपुत्रांचं पडद्यावरील पदार्पण म्हणूनच पंचमचं संगीत असलेल्या चित्रपटांतूनच झालं. 'पंचमचं संगीत' हा त्यांच्यासाठी 'सेफ गेम' ठरेल इतकी पंचमची लोकप्रियता शिगेला पोहोचलेली होती. नवीन अभिनेतेच नव्हे, तर नवीन निर्माते-दिग्दर्शकही स्वत:ची जागा सहज बनावी म्हणून पंचमला साईन करत होते. 

पण खऱ्या अर्थाने पंचमची गट्टी जमली ती गुलजारसोबत. ही गट्टी, ही दोस्ती फक्त कामापुरतीच नव्हती. वैयक्तिक आयुष्यातही दोघे जवळचे मित्र बनले. गुलजारच्या शब्दांना पंचांच्या सुरांनी सर्वतोपरी न्याय दिला आणि गुलजारच्या शब्दांनी एक वेगळाच पंचम बाहेर आणला. अर्थात, पंचमने प्रत्येकासाठी आपली वेगवेगळी शैली जपली होतीच. सिप्पींच्या चित्रपटांच्या संगीताचा लहेजा वेगळा होता, नसीर हुसेनसाठीच्या संगीताचा बाज वेगळा होता, तसाच गुलजारसाठीच्या गाण्यांची बांधणी वेगळीच असायची. सिनेसंगीतातल्या सगळ्यात महत्वाच्या आणि महान गीतकार-संगीतकार जोड्यांमध्ये आरडी-गुलजार ही जोडी अग्रणी राहील, इतकं त्यांचं काम अतुलनीय आहे. 

पंचमने कुणासोबत कधीपासून किती आणि कसं काम केलं, हे इंटरनेटवर सहज मिळेल. ते इथे लिहिणं म्हणजे केवळ भाषांतर होईल. पण पंचमचं वेगळेपण काय होतं, हे तिथे मिळणार नाही. ती अनुभवायची, आस्वादायची गोष्ट आहे. 
त्याबाबत पुढच्या भागात..

(क्रमश:)

- रणजित पराडकर



Related Posts Plugin for WordPress, Blogger...