Monday, November 28, 2016

आत्मशोधाचा काव्यात्मक प्रवास - 'डिअर जिंदगी' (Movie Review - Dear Zindagi)

एक यह दिन जब सारी सड़कें रूठी-रूठी लगती हैं
एक वोह दिन जब आओ खेलें सारी गलियाँ कहती थी

एक यह दिन जब जागी रातें दीवारों को तकती हैं
एक वोह दिन जब शामों की भी पलकें बोझल रहती थी

असं बालपण अनेकांचं असतं. 'बालपणीचा काळ सुखाचा' वगैरे वचनंही आपण अगदी सहजपणे आपल्या मनात जपली आहेत. भले ते बालपण जगत असताना मात्र, आपल्याला नेहमीच मोठं होण्याची आणि मोठ्या माणसांसाखं आपल्या मर्जीनुसार वागण्याची ओढ लागलेली असायची, पण प्रत्यक्षात मोठं झाल्यावर मात्र हे मोठेपण नकोसं होत असतं. वर उल्लेख केलेल्या जावेद अख्तर साहेबांच्या शेरांसोबतच अजून एक शेरही आहे, तो असा -

एक यह घर जिस घर में मेरा साज़-ओ-सामाँ रहता है
एक वोह घर जिस घर में मेरी बूढ़ी नानी रहती थी

मोठे झालो, स्वत:च्या मर्जीने वागतो आहोत, स्वत:चं घर आहे. पण तरी कुठे तरी आत एक अशी पोकळी राहतेच, जी कधीच भरून निघत नाही. सतत मन भूतकाळात जाऊन एखादी खपली उघडत राहतं किंवा हेच दाखवत राहतं की हे आत्ताचं सुखासीन आयुष्य म्हणजे सगळं झूठ आहे. खरं सुख तर काही तरी औरच होतं, जे आजीच्या गोष्टींत होतं किंवा अजून कुठे. लहानपण जर एखाद्या जराश्या डिस्टर्ब्ड कुटुंबातलं असेल, तर ह्या स्मृती तर पुसता पुसल्या जात नाहीत. मग तयार झालेली मानसिकता बंडखोर नसली, तरच नवल. ही बंडखोरी स्वत:खेरीज प्रत्येकाविरुद्ध असते आणि काही वेळेस तर अगदी स्वत:विरुद्धही ! कुठल्याही 'कम्फर्ट झोन' मध्ये टिकून राहावंसं वाटतच नाही. सतत पळत राहायचं. निरुद्देश. अखेरीस ह्या पळण्याचा थकवा येणार असतोच, येतोच. मग पडणारे प्रश्न मात्र आत्तापर्यंतच्या सगळ्या ओढाताणीहून जास्त तणावपूर्ण वाटतात. कारण आपलाच प्रश्न, आपणच उत्तर द्यायचंय आणि आपल्यालाच समजत नसतं की नेमका प्रश्न आहे तरी काय ?

संपले आयुष्य पण ना समजले माझे मला
धावलो होतो कुणाच्या जन्मभर मागावरी ?
वाटले आयुष्य होते रुंद रस्त्यासारखे
आज कळले चालणे आहे जणू धाग्यावरी

हे सगळं प्रचंड गुंतागुंतीचं आहे. हा गुंता शांतपणे, सावकाश, विचारपूर्वक उलगडायला हवा. गौरी शिंदेंचा 'डिअर जिंदगी' हेच करतो. ही धीमी गती ह्या विषयासाठी आवश्यकच आहे. पण जर हा गुंता ओळखीचा नसेल किंवा समजून घेता आला नाही, तर ही गती रटाळ वाटते. शाहरुख आहे म्हणून काही विशिष्ट अपेक्षांनी जर सिनेमा पाहायला जाल, तर त्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीतच. कारण मुळात हा सिनेमा त्याचा नाहीच. तो आहे आलिया भट्टचा.


एक अतिशय कुशल कॅमेरावूमन, जी तिच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करते आहे आणि एकंदरीत तिचं तसं बरं चाललं आहे. तरी 'सब कुछ हैं, पर कुछ भी नहीं' अशी अवस्था असलेल्या कायरा (आलिया) ची ही कहाणी आहे. गोव्यासारख्या नयनरम्य भागात लहानाची मोठी झालेली कायरा, फक्त तिच्या करियरसाठी गोव्यातून बाहेर पडून मुंबईला आलेली नसून, तिच्या मनात तिचं लहानपण, तिचं कुटुंब आणि ह्या दोन्हीमुळे गोवा, ह्या सगळ्याविषयी एक अढी आहे. ती ह्या सगळ्यांपासून दूर जाऊ पाहते आहे. मेहनत व कौशल्याच्या जोरावर मिळवलेल्या यशातही तिला समाधान वाटतच नाहीय. ह्या सगळ्या नैराश्यामुळे सतत नवनवी अफेअर्सही सुरु आहेत. कुठल्याच नात्यात मन रमत नाहीय. ती आत्ममग्न आणि नैराश्यग्रस्त आहे. 'डिअर जिंदगी' हा 'कायरा'चा 'प्रेमात न पडण्यापासून प्रेमात पडण्यापर्यंत', 'एकटेपणापासून कुटुंबापर्यंत', 'गोवा नावडण्यापासून गोवा आवडण्यापर्यंत' आणि 'एका जिंदगीपासून दुसऱ्या जिंदगीपर्यंत'चा प्रवास आहे. हा तिचा प्रवास डॉ. जहांगीर खान (शाहरुख खान) घडवतो. अनेक दिवसांनी शाहरुखमधला चार्म त्याने कुठल्याही प्रकारचा बाष्कळपणा न करता दिसला आहे. ह्यापूर्वी तो दिसला होता 'चक दे इंडिया' मध्ये. वेगळ्या धाटणीची, स्वत:ला अधिक साजेशी भूमिका निवडणारा हा शाहरुख अतिशय आवडतो. भूमिका दुय्यम, सहाय्यक असली तरी त्याने ती स्वीकारली आहे, ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. आपल्या स्टारपणापुढे कहाणीवर जास्त अधिकार असलेली इतर पात्रं गुदमरणार नाहीत, ह्याची खबरदारी जी 'पिंक'मध्ये बच्चन साहेबांना घ्यावीशी वाटली नाही, ती शाहरुखने इथे घेतली आहे, हे विशेष. ह्यासाठी दिग्दर्शिकेचं जास्त अभिनंदन !
गौरी शिंदेंचे 'इंग्लिश विंग्लिश' आणि 'डिअर जिंदगी' हे दोन अत्यंत भिन्न प्रकारचे सिनेमे आहेत. पण दोन्हींत दिग्दर्शिका स्वत:चं एक बेअरिंग पकडून ठेवते आणि ते कुठेही सुटत नाही. मनोरंजनात्मक मूल्य पाहिल्यास 'डिअर जिंदगी' अनेकांना नकोसा होईल, झालाही. माझ्यासमोरच किती तरी लोक अर्ध्यातून उठून बाहेर निघून गेले. ते शाहरुखचे नेहमीचे चाळे पाहायला आले असावेत. लोक स्वाभाविकपणे शाहरुखला पाहायला येतीलच म्हणून स्वत:ला जे आणि जसं सांगायचं आहे त्यावर जराही परिणाम दिग्दर्शिकेने होऊ दिला नाहीय. हा मोह आपल्याकडे फार क्वचितच कुणाला टाळता आला आहे.

अमित त्रिवेदीचं संगीत सध्याच्या बहुतांश थिल्लर लोकांपेक्षा खूप वेगळं असतं. जी काही मोजकी नावं आश्वासक आहेत, त्यांपैकी एक अमित त्रिवेदी. कहाणीला साजेसं संगीत त्याने दिलं आहे. अगदी लक्षात राहील, असं हे संगीत नाही. रात्रीपुरतं भुंग्याला कैद करून सकाळी त्याला सोडून देणाऱ्या कमळाप्रमाणे हे संगीत आहे. भुंगा जसा आनंदाने कमळात कैद होतो, तसेच आपणही त्या त्या गाण्यात रमतो. आणि दल उघडल्यावर भुंगा जसा लगेच पुढे निघून जातो, तसेच आपणही पुढे निघतो.

गोवा सुंदर दिसणार नाही, असं दाखवायचं असेल तरच काही विशेष कसब लागेल. त्यामुळे नेत्रसुखद छायाचित्रण हे 'साहजिक' ह्या प्रकारात येतं. तरीही दाद !

'फोबिया'मध्ये सहाय्यक भूमिकेत दिसलेली 'यशस्विनी दायमा' इथेही कायराची जिवलग मैत्रीण म्हणून सहाय्यक भूमिकेत दिसते. अफाट चार्मिंग मुलगी आहे ही ! तिला एखाद्या मुख्य भूमिकेत पाहायची उत्कंठा आहे. सर्व सहाय्यक व्यक्तिरेखांत ती उठून दिसते. सळसळता उत्साह, चमकदार डोळे आणि अचूक टायमिंग. तिची 'जॅकी' लक्षात राहतेच.

आणि सरतेशेवटी, आलिया भट्ट.
केवळ मोजक्या ८-१० सिनेमांतच तिने जी परिपक्वता साधली आहे, ती अविश्वसनीय आहे. तिचा पहिला सिनेमा पाहताना असं अजिबातच वाटलं नव्हतं की ही इतकी छाप सोडेल. त्या सिनेमात तर ती 'आलिया भोगासी..' म्हणून सहन करावी लागली होती ! पण 'टू स्टेट्स', 'हायवे', 'कपूर अ‍ॅण्ड सन्स', 'उडता पंजाब' आणि आता 'डिअर जिंदगी' मुळे आलिया 'नॉट टू मिस' यादीत आली आहे. एका प्रसंगात नकाराचं दु:ख होत असतानाही, आयुष्य गवसल्याचा आनंदही तिला झालेलं असतो. एकाच वेळी रडू येत असतं आणि हसूही ! त्या वेळी आलियाने जे काम केलं आहे, त्यासाठी तिला त्रिवार सलाम ! एक असं एक्स्प्रेशन जे शब्दात सांगतानाही कठीण जाईल, ते ती प्रत्यक्षात दाखवते, हे केवळ अचाट आहे. त्या क्षणी, तिथेच सिनेमा संपायला हवा होता. तो संपला नाही, ही माझी 'डिअर जिंदगी'बाबत एकमेव तक्रार आहे. नजर लागू नये म्हणून लावलेलं गालबोट असावं बहुतेक.


'डिअर जिंदगी' हा तुमचं मनोरंजन करण्यासाठी नाही. तो तुमचा छळ मांडणारा 'कोर्ट' सारखा अनावश्यक कूर्मगतीही नाही. तो जिंदगीसारखाच आहे. 'जिंदगी' हा ज्यांचा आवडता पास-टाईम आहे, त्यांच्यासाठी हा सिनेमा आहे. 'पाहा किंवा नका पाहू, पण मी आहे हा असाच आहे', असं एक बाणेदार स्टेटमेंट हा सिनेमाच स्वत:विषयी देतो, कायरा आणि आलियासारखंच !

लव्ह यू, जिंदगी !

रेटिंग - * * * *

- रणजित पराडकर

Friday, November 18, 2016

थरार (वजा) तर्क (बरोबर) फोर्स-२ (Movie Review - Force -2)

'तो येतो, एकेकाला बदडतो किंवा ठोकतो आणि जिंकतो', हे एकमेव सूत्र 'फोर्स-२' पहिल्यापासून शेवटपर्यंत पाळतो. मग तो त्याच्या एन्ट्रीचा टिपिकल फिल्मी प्रसंग असो की सिनेमाच्या शेवटची एक नॉन-फिल्मी नोट असो. अर्थात तो हे सगळं करू शकतो, ह्याविषयी बघणाऱ्याला तिळमात्र शंका वाटत नाही. घायल, घातक वगैरे राजकुमार संतोषीच्या सिनेमांत सनी देओल जेव्हा एका हाताने ६-७ आणि दुसऱ्या हाताने ६-७ लोकांना एकटाच झुलवताना दिसतो, तेव्हाही ते आपल्याला पटतं. कारण त्याचा आवेश आणि आवाज ! इथे हे सगळं एरव्ही अशक्यप्राय वाटणारं पटतं कारण जॉन अब्राहमची एकंदरच पर्सनालिटी. त्याचे टरटरलेले स्नायू कुठल्याही कपड्यात मावत नाहीत. जे काही दणकट शरीर त्याने कमावलं आहे, ते अगदी 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि..' च वाटतं ! असं घट्ट, बळकट शरीर कमवूनही त्याची हालचाल आखडलेली नसते. त्याचं चालणं, धावणं, उठणं, बसणं सगळं काही गतिमान आहे, हे विशेष. त्याच्या अभिनयाला असलेल्या मर्यादांवर त्याने आपल्या 'अंग'मेहनतीच्या जोरावर मात केली आहे, हे मान्य करावं लागेल.

'फोर्स-१' मध्ये भारतीय माफियाविरुद्धचा संघर्ष दाखवला होता. इथे एसीपी यशवर्धन (जॉन) आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. 'रॉ'च्या चीनमधील एजंट्सना एक-एक करून मारलं जात आहे. यशचा जिगरी मित्र ह्या षडयंत्राचा एक बळी ठरतो. मरण्यापूर्वी तो यशला ह्या सगळ्या षडयंत्राबद्दल कळवतो आणि एक स्पेशल केस म्हणून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी 'रॉ'तर्फे यशला बुडापेस्टला पाठवण्यात येतं. मात्र हे ऑपरेशन लीड करण्यासाठी रॉ एजंट केके (सोनाक्षी सिन्हा) ला सोबत पाठवलं जातं. दोघं अर्थातच केस सोडवतात. तोपर्यंत अजून काही नुकसान होतं, पण पुढचं बरंचसं नुकसान वाचतं.



हा सगळा प्लॉट मुळातच खूप थरारक आहे आणि पडद्यावरही हा थरार बऱ्यापैकी उतरला आहे. मात्र काही गोष्टी खटकत राहतातच.
'अतिशय बालिश संवाद', ही पहिली बाब. 'रॉ'च्या एजंट्सना ठार करण्याचं कारस्थान केलं जात आहे, हे जेव्हा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजतं, तेव्हा ते एक बैठक बोलावतात. ह्या बैठकीत 'यह हमारे रॉ को कमजोर करने की साजीश हैं' वगैरे अगदीच बेसिक लेव्हलचे बाष्कळ संवाद जबरदस्त आव आणलेल्या त्या ऐटबाज व्यक्तिरेखांच्या तोंडी विडी असल्यासारखे विजोड वाटतात. गद्दार एजंटला पकडल्यावर त्याची जी बडबड आहे, तीसुद्धा ह्याच पठडीतली आहे. इथे दुसरी खटकणारी गोष्ट अशी की, गद्दाराला पकडल्यानंतर त्याची कसून चौकशी करून त्याच्याकडून माहिती काढून घेण्याऐवजी त्याला भारतात घेऊन येण्याचा प्लान करणं ! हा बालिशपणा तर फक्त थराराला जागा करून देण्यासाठीचं कहाणीतलं मोठं भगदाडच आहे. तिसरी अतिशय न पटणारी गोष्ट म्हणजे 'केके' ही व्यक्तिरेखा. ही व्यक्ती एक गुप्तहेर आहे. तिला भावनिक कसं दाखवता तुम्ही ? 'We lost him' वालं एक्स्प्रेशन देताना ती रडवेली कशी होऊ शकते ? आजूबाजूला गोळीबार चालू असताना ती जखमी व्यक्तीच्या बाजूला मठ्ठपणे बसून राहूच कशी शकते ? ह्याशिवाय हिरोला आपले ५७२ पॅक्स दाखवता यावेत म्हणून कपडे काढता येतील अश्या सोयी पाहणं, गोळ्यांची बरसात होत असताना एकही गोळी हिरोला वगैरे न लागणं, जिथून पुढे कहाणी जाऊ शकत नाहीय तिथे बळंच एखादं पात्र घुसडणं आणि काम झालं की त्याला दुधातल्या माशीसारखं बाजूला टाकणं वगैरे बाष्कळपणा आहेच. मात्र तरीही हा थरार पाहावासा आहे कारण प्रत्येक व्यक्तिरेखेचा आवेशपूर्ण वावर आणि कथानकाची जराही कमी न होणारी गती.

ज्याप्रमाणे हृतिकचा 'क्रिश' इंडियन सुपरहिरो आहे, तसाच हा जॉन इंडियन जेम्स बॉण्ड आहे. 'धूम' असो की 'मद्रास कॅफे', 'रॉकी हॅण्डसम' असो की 'ढिशुम' अ‍ॅक्शनपॅक्ड भूमिकांत तो चांगलाच शोभतो. इथे त्याच्याकडून अभिनयाच्या फारश्या अपेक्षा नसतात, हेही एक कारण असेल. पण त्याने स्वत:ला ओळखून खूप सेन्सिबली भूमिका निवडायला सुरुवात नक्कीच केलेली आहे.
सोनाक्षी सिन्हासुद्धा खरं तर अ‍ॅक्शन भूमिकांतच शोभते. ती 'अकीरा'त बरी वाटली होती आणि इथेही वाटते. कारण तेच ! अभिनयाच्या फारश्या अपेक्षा नाहीत. ह्या भूमिकेचीही वाट लावायची कुवत तिच्या न-अभिनयात आहे, मात्र ती तसं करत नाही, हेही नसे थोडके !
'ताहीर राज भसीन' ची भूमिका 'मर्दानी'तल्या त्याच्या भूमिकेसारखीच नकारात्मक आहे. अत्यंत ताकदीने तो ती साकारतो. सगळ्यांमध्ये तो खूपच उजवा ठरतो. मात्र वर उल्लेखलेली वायफळ बडबड वगैरे त्याच्या वाट्याला दिल्यामुळे कंटाळा येतो. दर थोड्या वेळाने त्याच्यावर यशने धावून जाणं आणि केकेने त्याला थांबवणं, ह्या सगळ्या प्रकारात त्याची इंटेन्सिटी दुर्लक्षित होत राहते.

संवाद लेखन खरं तर अनुल्लेखनीय आहे, पण 'अनुल्लेखनीय आहे' हे उल्लेख तरी करावा कारण शेवटी थोडी तरी मेहनत घेतलेली असणारच ना !
पार्श्वसंगीत दणदणाटी नाहीय, ही किती मोठी निश्वासाची बाब आहे ! व्हिलनलाच माउथ ऑर्गनची आवड असलेलं दाखवलं असल्याने पार्श्वसंगीतासाठी माउथ ऑर्गन बराच वापरला आहे. हे नाजूक वाद्य स्वत:च हळुवार असल्याने संगीत दणदणाटी होऊ शकलं नाहीय. त्याव्यतिरिक्तचं संगीत मात्र आजच्या काळाला साजेसं टाकाऊ आहे. 'कांटे नहीं कटते..' ची यथेच्छ माती केलेली आहे.

जबरदस्त छायाचित्रण हीसुद्धा एक जमेची बाजू. बुडापेस्ट, शांघाय, ग्वांगझाउ, बीजिंग वगैरेचं चित्रण मस्त जमून आलं आहे. पण मला विशेष आवडलं ते अखेरच्या हाणामारीतलं कॅमेरावर्क. इथला कॅमेराचा कोन व्हिडीओगेमसारखा आहे. म्हणजे स्वत: त्या व्यक्तिरेखेचा व्ह्यू दाखवणारा. हा प्रयोग मी तरी ह्याआधी पाहिलेला नाही. ह्या प्रयोगासाठी विशेष दाद द्यायला हवी !

२४ चा सीजन-२ आम्ही पूर्ण पाहिला होता. त्यामुळे दिग्दर्शक अभिनय देवकडून आम्हाला प्रचंड अपेक्षा होत्या. एरव्ही 'फोर्स-२' हा चांगला थरारपट म्हणता येईलही, मात्र 'अभिनय देव' हे नाव मध्ये येतं आणि मग थोडं निराशच व्हायला होतं. छोट्या छोट्या बाबतींत भारतीय दिग्दर्शकांनी (किमान अभिनय देव वगैरे लोकांनी तरी ! बडजात्या, चोप्रा, वगैरे तर ओवाळून टाकलेले आहेत) सजग राहायला हवं आहे. नक्कीच गेल्या काही वर्षांत हिंदी सिनेमाने खूप चांगली मजल मारलेली आहे, पण अजूनही लहानलहान बाबतींत टाळाटाळ केलेली जाणवत राहते. फुसके संवाद आणि अनावश्यक पात्रं व योगायोग ह्यावर आधारलेलं कथानक अधिक सफाई न केल्याचं द्योतक नाही का ? शेवटी सारं काही दिग्दर्शकाचं आहे आणि तो त्या बाबतींत पुरेसा आग्रही नाही आपल्याकडे, हेच दु:ख आहे.

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर 

Wednesday, November 16, 2016

मराठी कविताविश्वातलं एक लक्षणीय नाव - संतोष वाटपाडे

रविबिंब सरकले खाली
अवनीवर संध्या आली
कुंकुम भाळावर छोटे
नववस्त्र तनावर ल्याली
रांगोळी पाण्यावरही
किरणांची अवचित झाली 
क्षितिजावर लुकलुकणारी
फुलवात कुणाची आहे... ही बाग कुणाची आहे ?

ह्या प्रश्नाचं उत्तर मला केशवसुतांच्या कवितेत सापडतं. 'देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया!'
ही बाग कवीची आहे ! ह्या कवितेत कवी संतोष वाटपाडे​ प्रत्येक कडव्यात दिवसाचे विविध प्रहर रंगवत नेतात आणि सगळ्यात शेवटी -

दररोज तरी धरतीला
का ओढ तमाची आहे....ही बाग कुणाची आहे ?

- असा व्याकुळ करणारा प्रश्न करतात.

फार क्वचित असा अनुभव येतो की एखादी कविता वाचल्यावर प्रचंड अस्वस्थ वाटतं, गहिवरून आल्यासारखं वाटतं, दोन चार ठोके चुकल्यासारखं वाटतं.
पहाटेच्याही जरासं आधी अचानक जाग यावी. झोप पूर्ण झालेली असावी. घराबाहेर एकाच वेळी स्वच्छ चांदणं सांडलेलं असावं आणि पूर्वेकडे रंगांच्या पखरणीला अजून सुरुवात झालेली नसली तरी तशी तयारी कुणी तरी करत असल्याची एक अव्यक्तापलिकडची चाहूल असावी. विविध फुलांचा एकत्र सुवास दरवळत असावा आणि सर्वदूर पसरलेली नीरव शांतता देवघरात मंदपणे तेवणाऱ्या समईच्या हसतमुख स्थितप्रज्ञतेसारखी भासावी.
वेळ काही क्षण थांबली आहे, असंच वाटावं. बहुतेक ती थांबतही असावी.
कारण हे असं नेहमीच वाटत नाही.
हा असा चलचित्रपट डोळ्यांसमोरून झरझर सरत तेव्हा जातो, जेव्हा एखादी उत्कट कविता मनाच्या आतपर्यंत झिरपत जाते. संतोष भाऊंच्या अनेक कविता अश्याच आत झिरपत जातात. कधी, प्रचंड चलबिचल चालू असलेल्या अंतरंगात त्यांची एखादी कविता मंद शांतपणे तेवते. तर कधी आपण आपल्याच विश्वात मश्गुल असताना एखादी कविता म्हणते -

जाळ पेटला उंच उसळला
पोटामाजी विझली आग
डोक्याखाली हात ठेवला
डोईवरती काळा नाग...

अश्या त्यांच्या ओळी खडबडून जागं करतात आणि आपल्याला एका अटळ शून्याची खोली चाचपडायला लावतात.

कधी एखादी मूक व्यथा ते बोलकी करतात. इतरांना दिसणारा दगड-मातीचा साज त्यांच्याकरवी आपली भावना सांगतो की -

अंगणी उंबरा आला आहे सरकुन
चौकटी किड्यांनी पोकळ केल्या आतुन
ह्या भग्न घरी वावर कोणाचा आहे
जे पाय धुळीवर नकळत गेले टाकुन...

कविमनाला हीच तर मोठी देणगी असते. ते कुणालाही बोलकं करू शकतं. मग ते एखादं भकास पडलेलं घर असो वा ओसाड पडलेला माळ. एखादी सुंदर डवरलेली वेल असो की वठलेलं झाड. कुणाच्याही लक्षात न येता गालावरच वाळून गेलेला एखादा अश्रू असो की दिलखुलास हास्यामागे जाणीवपूर्वक लपवलेली वेदना आणि विरहाचं दु:ख असो वा प्रियेची आराधना !

सुगंधीत फाया नशा केवड्याची
कळी मोगर्‍याची असावीस तू
नवी कोवळी पालवी पिंपळाची
जणू हंसिणीचे मऊ पीस तू

खुले देवघर दरवळावे पहाटे
निखारा धुमारे खडी धूप तू
कपाळी टिळा लावुनी चंदनाचा
उभे विठ्ठलाचे दिसे रूप तू

संतोष भाऊंची कविता जितक्या प्रभावीपणे व्यथांची मांडणी करते तितक्याच हळुवारपणे ती कोमल, नाजूक भावनांनाही उलगडते. ते प्रियेला केवड्याचा, मोगऱ्याचा सुगंध म्हणतात, कोवळी हसरी पालवीही म्हणतात आणि हंसिणीचे पीसही ! त्यांच्या बऱ्याच कवितांमध्ये नेहमी एक धागा ईश्वराशी जोडायचा प्रामाणिक प्रयत्न करतोच. ज्या प्रियेला ते विविध अलंकृत उपमा देतात, तिलाच ते 'विठ्ठलाचे रूप'ही म्हणतात !

जेव्हा त्यांची ही स्तुती संभोग शृंगार रसाला लेऊन येते, तेव्हाही ते अगदी थेटपणे म्हणतात -

रात्रभर चांदण्याचा जसा तू सडा
पौर्णिमेच्या दुधी चांदव्यासारखी
चुंबनांच्या खुणा तू मिठी तू नशा
तू उरी झोंबत्या गारव्यासारखी..

जाळतो स्पर्श ओठास जेव्हा तुझा
वाटते तू मला विस्तवासारखी
चिंब ओलावले वस्त्र तू भास तू
श्रावणातील तू पावसासारखी..

सुमंदारमाला ह्या वृत्ताची अंगभूत नशा त्यांनी ह्या कवितेत बेमालूमपणे वापरली आहे.
प्रेमाचं हळुवार नातं अलगदपणे उलगडताना एका साधेसेच स्वप्न ते भुजंगप्रयातात कसे मांडतात पहा -

परसबाग छोटी घरे पाखरांची
उघडताच ताटी फ़ुले कर्दळीची
कधी झोपलो जर तुझ्या पायथ्याशी
मला छत मिळावे तुझ्या ओढणीचे ...

नको चांदण्याचे नको सागराचे
नको उंच माडी सुशोभित घराचे
प्रिये स्वप्न पाहू तुझ्या आवडीचे
नदीकाठच्या एकट्या झोपडीचे

एक अंदाज म्हणा किंवा निरीक्षण म्हणा, पण मला त्यांच्या कविता वाचत असतेवेळी नेहमी जाणवत आलं आहे की, सहसा कविता हातावेगळी करत असताना त्यांना स्वत:लाही निश्चित माहित नसतं की ते नक्की काय लिहिणार आहेत आणि कुठून कुठे जाणार आहेत. लयबद्ध कविता लिहिणाऱ्या बहुतेक कवीमनांचं असंच होत असावं, असाही माझा कयास आहे. कारण असा अनुभव मला अजूनही काही कवी व कवयित्रींच्या कविता वाचत असताना येतो. प्रत्येक वृत्ताची एक ताकद असते. त्या त्या वृत्ताचा ताल एकदा हृदयाच्या ठोक्यांनी पकडला की शब्द स्वत:च सम पकडण्यासाठी आतुर होऊन समोर येत राहतात. ती एक अशी तंद्री असते जेव्हा कविता स्वत:च स्वत:ला कवीच्या हातून लिहून घेत असते. मात्र ही स्थिती नेहमीच येते असं नाही. कधी त्या मागे कुठलीशी अनाम शक्ती असते, जिला आपण 'ईश्वरी'ही म्हणतो, तर कधी छंद-वृत्ताचा अभ्यास आणि त्यांवरचं निरलस प्रेम ! 'वृत्ता'वरचं हे प्रेम इतकं फुलतं की 'वृत्ती' बनून अंतरंगात उतरतं आणि मग जेव्हा जेव्हा एखादा तरंग ह्या डोहात उमटतो, तेव्हा तेव्हा उत्स्फूर्तपणे भावना स्वत:च आपली लय शोधून कवीला खुणावते. तो एक क्षण असतो, जेव्हा कवी तिला वाट करून देतो आणि त्यापुढचा प्रवास आपोआप घडतो.

ही उत्स्फूर्तता संतोष भाऊंच्या अनेक कवितांत जाणवते.
त्यांचा आजपर्यंतचा काव्यप्रवास तब्बल दोन तपांचा आहे ! ह्या काळात त्यांनी हजारांहून अधिक कविता व गझला लिहिल्या आहेत. पण ही सांख्यिकी त्यांना माझा एक आवडता कवी बनवत नाही. तर वर उल्लेख केलेली उत्स्फूर्तता मला त्यांच्यात दिसून येते आणि तीच त्यांना माझा एक आवडता कवी बनवते. ते जितक्या सहजपणे अक्षरछंदांचा वापर करतात, तितक्याच सहजतेने गणवृत्तही हाताळतात. मात्रा वृत्ताचं वजनही ते पेलतात. 'सुमंदारमाला' आणि 'मंदारमाला' ह्यांबाबत माझा असा अनुभव आहे की दोन्हींपैकी एकात कवी अधिक रमतो. मग दुसरं वृत्त हाताळताना नकळतपणेच लय बदललीही जाते. दोन्ही वृत्तांची चाल खूपच एकसारखी असल्याने असेल. पण हे सगळे विकार शिकाऊंचे असावेत. संतोषभाऊ लीलया ह्या दोन्हींना हाताळतात.
मंदारमालेतल्या त्यांच्या जरा वेगळ्या मूडच्या ह्या ओळी पहा -

मी राबतो रोज मातीत माझ्या हरीनाम श्वासात आहे तरी,
डोक्यावरी भार सार्‍या घराचा कधी जाणवू ना दिले मी घरी
गेल्या पिढ्या कैक कष्टात राया तुझा दास व्याकूळ दारावरी,
सांगून झाली व्यथा सर्व माझी अता न्याय द्यावा मला श्रीहरी

निसर्गाच्या अवकृपेने हताश झालेला मनुष्य श्रीहरीला शरण जातो आहे. आपले कष्ट त्याने घराला जाणवू दिलेले नाहीत, असं त्याला वाटतंय पण त्याचाच तान्हुला अगदी लहान वयातही ही परिस्थिती बहुतेक समजून घेतो आहे की काय ? हा अक्षरछंद तरी तेच सांगतो -

जाड साबराला माझी झुले लुगड्याची झोळी
दिसे दुरुन आईची मला फ़ाटलेली चोळी
माझे रडणे ऐकून नाही येणार कुणीही
आलो घेऊन कपाळी देवा गरीबीचा शाप..

नांगराचा बैल मुका त्याला लागलेली धाप
घाम डोळ्यात भरुन ढेकळात उभा बाप..

असे शब्द वाचत असताना आपल्याच नकळत आपणच आपल्याला दोषी ठरवतो. हे असे दु:ख ह्या जगात अस्तित्वात आहे, ह्यासाठी आपण स्वत:ला जबाबदार समजतो. कारण हे दु:ख आपल्याला एखाद्या देणेकऱ्यासारखा जाब विचारते, प्रश्न करते. उत्तर आपल्याकडे नसतं आणि आपण आरोप मान्य करतो.
'लवंगलता' वृत्तातल्या एका कवितेत, पुन्हा एकदा अश्याच एका रंजल्या गांजल्या बापाबद्दल ते लिहितात -

मिचमिच डोळे ओठ कोरडे बोलत होता काही
यंदासुद्धा शेताची का झाली लाही लाही
गुरे लेकरे घरच्या बाया करती रोजंदारी
विहिरीमध्ये घागर भरण्याइतके पाणी नाही

परसामध्ये उरला सुरला कांदा वाळत होता
उदास झाडांखाली सारा शिवार लोळत होता
सोसाट्याचे वादळ मनात रिचवत माझा बाबा
खांद्यावरच्या पागोट्याने वारा घालत होता

त्यांची कविता आपल्याला गावच्या मातीत नेते. मातीतली कविता म्हणजे ती ओल्या मातीतलीही आणि कोरड्याही. ओल्या मातीतली कविता कोरड्या मनाला भिजवते, तर कोरड्या मातीतली कविता वाचताना डोळ्यांच्या कडा ओलावतात. मनात सोसाट्याचं वादळ रिचवणारा हा बाबा वाचताना असह्य होऊन स्वत:पासूनच पाठ फिरवावीशी वाटते.

ही एक व्यथा ते अनेक कवितांमधून वेगवेगळ्या रंगांत दाखवतात. सगळ्यांना एक राखाडी रंगाची चौकट मात्र असतेच. 'भवानी' वृत्त हे सहसा लोकगीतांसाठी (लावणी, पोवाडा, इ.) वापरले जात असावे. पण त्याचा सुरेख वापर करून ते म्हणतात -

हंबरे वासरू गाय, करावे काय ,कळेना काही
ठेवले जरी राखून, गवत झाकून, द्यायचे नाही
टोचते घशाला भूक, जाळते थूक, जिभेची ग्वाही
थांबले थेंब डोळ्यात, कधी घामात, प्यायचे नाही...

एक सुन्न करणारी अस्वस्थता मनाला व्यापते. पळ काढावासा वाटतो ह्या वास्तवापासून पण..
पण कवी हा कधी कधी निर्दयी असतो, क्रूर असतो. तो वाचकाला इतक्या सहजासहजी पाठ फिरवू देत नाही. तो पुन्हा पुन्हा आदळत राहतो, एखाद्या सागराप्रमाणे.

निष्पर्ण तरूच्या खाली विस्कटली विधवा रडते
एकेक पान सुकलेले ओघळते पायी पडते
जे जमले होते गेले, डोळे ना पुसले त्यांनी
खरवडले भाळावरचे हिरवे कुंकू हातांनी

आकाशी हुंगत आहे घारीचा व्याकूळ डोळा
पदराखाली फुललेल्या नवतरुणीचे वय सोळा
बेवारस आभाळाच्या ठिकर्‍या पायात विखुरल्या
विझताना चांदणवाती डोळे मिटण्यास विसरल्या

संतोष भाऊंच्या कविता जश्या डोळ्यांत जळजळीत वास्तवाचं अंजन घालतात तश्याच त्या उद्ध्वस्त स्वप्नांच्या ठिकऱ्यासुद्धा डोळ्यांत रुतवतात. जखमा होतात. त्या भळाभळा वाहतात. विस्कटलेली विधवा अंतरंग उसवते, विषण्ण करते !

एक अबल आणि अबोल व्यथा ते पुढील ओळींत अशी मांडतात की एक बलात्कार संवेदनेवरही होईल आणि मनावर ओरखडे उमटतील !

मानेखाली हात.. बांगडी सोबत उरली नाही
डोळ्यांतिल स्वप्नांची पणती अजून विझली नाही
झाकावा डोळा तर विस्तव डोळ्यातुन घळघळतो
भेदरलेली रात्र त्यामुळे निवांत निजली नाही...

कूस बदलल्यावरती रडते मूल उपाशी आहे
ओठांच्या दगडात राहिली ओल जराशी आहे
आक्रोशाच्या ठिणग्या दिसती चुलीमधे पुरलेल्या
पोटाच्या खड्ड्यात पेटला जाळ अधाशी आहे...

अश्या अंगावर येणाऱ्या अनेक कविता संतोष भाऊ लिहितात. प्रभावित होऊन एखाद दोनदा लिहिले जाऊ शकते. मात्र वारंवार लिहित राहण्यासाठी एक त्रयस्थ संवेदनशीलता असावी लागते. जळजळीत वास्तवाचं एक बीभत्स दर्शन करताना त्या रबरबाटात किती उतरायचं, ह्याचं भान असायला लागतं. ते राहिलं नाही, तर बीभत्स रसात व्यक्त होत असताना विकृतीचा भास होऊ शकतो. ही एक अतिशय कठीण कसरत असते, पण पुढील ओळी ती पार पाडतात -

अवलाद कलीची हासत फिरते रानी
आताच कापुनी नाळ
त्या तेजोमय गोलाच्या ठिकर्‍या झाल्या
पेटला कधीचा जाळ

सांगाडे कवट्या माळावरती पडल्या
देतात कुणाला हाक
वार्‍यावर उडते भिरभिर वावटळागत
का हतबलतेची राख

कविता लयबद्ध असली की ती गेय असतेच असं नाही. त्यासाठी कठोर, रांगडे शब्द मारक ठरतात. रांगड्या शैलीत जळजळीत लिहिणारे संतोष भाऊ गेयता सांभाळतानाही विखारी व्यथा मांडतात !

भुकेल्या घराला सहारा मिळाला
चुलीची व्यथा जाणली ना कुणी
रिकाम्या घराची खुली सर्व दारे
झुरावी तुळस रोज का अंगणी
मला लेकरू ना दिले सोबतीला कसे गीत मी बोबडे गायचे

निवारा नसे ज्या मुक्या पाखरांना अशा पाखरांनी कुठे जायचे
कपाळावरीच्या व्यथा सोसवेना तुझे नाव देवा किती घ्यायचे

ह्या त्यांच्या कवितेचे गीतही झाले आहे. त्यांच्या अनेक कविता संगीतबद्ध झालेल्या आहेत.
संगीतबद्ध झालेली त्यांची अशीच अजून एक अंगावर कविता म्हणजे -

सारी भेगाडली भूई अंघुळीला वारा नाई,
प्वाट खपाटीला गेलं कुरणात चारा नाई ॥

माझी उपाशी लेकरं
तरी देत्यात ढेकरं
ढेकळात लोळताना
गेली घासून ढोपरं
उन्हामंधी तापलेली सारी जिमीन वांझुटी,
माजा नागडा संसार आडुशाला काई नाई

इथले शब्द खूप रांगडे आहेत. पण आशयाशी समरूप होऊन असल्याने त्यांची चालही तशीच रांगडी आहे.

मी ह्या लेखाच्या निमित्ताने त्यांच्या अगदी सुरुवातीच्या काळातल्याही काही कविता वाचल्या. सुरुवात करणाऱ्या कुणाही कवीप्रमाणे त्यांच्या ह्या काळातल्या कविता गुंताविरहित व मुक्त आहेत. मात्र -

खेळण्यास मी आलो होतो हिरव्या गवता येथ भुलुनी
मान पकडली या लोकांनी हिरवा पाला मज दावुनी
आण कुणा मज सोडविण्या ओरड्तोय मी फ़ार फ़ार गं
बुभुक्षित हे मानव जमले करण्या मजला ठार गं
आई गं...आई गं......बछड्यासाठी धाव गं

----------------------

संपले आकाश जेथे त्या ठिकाणी राहतो हा,
जे असूनी ना दिसे ते रुप आहे देव माझा

---------------------

चालताना हात हाती रोज घ्यावा साजणे,
थांबतांना मी तूझे थोडे बघावे लाजणे

रोज व्हावे भेटणे अन रोज व्हावे बोलणे,
तूच स्वप्नातील माझा चंद्र व्हावे साजणे

- अश्या त्यांच्या ओळी वाचत असताना त्यांतली उत्कटता समजून येते. अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे लयीची ओढ. कविता मुक्त असली तरी तिच्यात एक प्रकारची लय ही असतेच. मुक्ततेच्या नावाखाली पसरट लिहित जाणं आजची 'Fashion' आहे, पण जेव्हा ही 'Fashion' सुरु होत होती, त्या काळातही संतोष भाऊंच्या कवितेत एक अंगभूत लय आपसूकच येत होती.

आजचं त्यांचं कवीपण मला वेगळं वाटायचं अजून एक कारण म्हणजे वृत्ताची जाण व लयीवर पकड असूनही आजच्या 'Fashion' प्रमाणे ते गझलच्या प्रभावाखाली दबले गेलेले नाहीत. ते गझल व कविता, दोन्हींत रमतात. मात्र ठळकपणे त्यांची ओढ कवितेकडे अधिक असल्याचं माझं निरीक्षण आहे. हा त्यांच्या अभिव्यक्तीचा प्रामाणिकपणा आहे हे नक्कीच.
हा प्रामाणिकपणा असल्यामुळेच त्यांची कविता वाचकाच्या संवेदनशीलतेच्या चंचल लोलकाला अस्थिर करून जाते.

लयीवर असलेली पकड आणि वृत्ताची जाण संतोष भाऊंना एक प्रयोगशील कवी बनवते. ते लयीसोबत, यमकरचनेसोबतही निरनिराळे प्रयोग करताना दिसतात.

चोळीत तंग चोरून अंग नाहून सावली ओली
कस्तुरीगंध पसरून मंद पावले उन्हाची आली

हा पदर खुला नाजूक झुला वेलींचा फांदीवरुनी
पाहून पवन झाकून नयन थरथरते अल्लड तरुणी

पालवी खुले पळसास फुले केशरी सांडला रंग
कोवळे तुरे गवतात हिरे पाखरू वेचते दंग

इथली त्यांनी केलेली यमकपेरणी ठेका धरायला भाग पाडणारी आहे.
वर मी 'भवानी' वृत्तातल्या एका कवितेचा उल्लेख केला आहे. ह्या वृत्तात त्यांनी अनेक कविता लिहिल्या आहेत. मात्र एक कविता उल्लेखिल्याशिवाय त्यांची ओळखच पूर्ण होत नाही. 'वासुदेव' ! 'वासुदेव' ही कविता इतकी अस्सल आणि चपखल आहे की पारंपारिकच वाटावी !

छम्माक वाजला टाळ धावले बाळ अंगणी आले
घरधनी उचलुनी फाळ तुडवण्या गाळ पहाटे गेले
वासरे लाडकी घेत पहा रांगेत निघाल्या गाई
वासुदेव आला घरी भाज भाकरी तव्यावर आई !

शेतात उभी बाजरी कडाला तुरी टप्पुरं दानं
झोपडीमधी अंधार तरी भरणार उद्याला सोनं
संसार तुझा पंढरी इठोबा घरी तूच रखुमाई
वासुदेव आला घरी एक भाकरी वाढ ना आई
भारूड म्हणत नाचला थकुन थांबला जायचा न्हाई !

हे वाचत असताना साक्षात एक वासुदेव आपल्या समोरच येऊन उभा ठाकतो ! And why not ? जीवनाचं तत्वज्ञान सांगणारा, वास्तवाचं भान देणारा, सुखाची ओळख करून देणारा, दु:खाची जाणीव जागी करणारा, आपलाच चेहरा आपल्याला दाखवणारा 'संतोष वाटपाडे' हा कवीही एक वासुदेवच की ! तो आपल्यासमोर येतो आणि धुंद, बेभान होऊन त्याची कला सादर करतो. आपल्याला तल्लीन करवतो ! हे त्याचे सादरीकरण पराकोटीचं उत्कट आणि प्रामाणिक असतं म्हणूनच स्वत:च्या कवितेचं वर्णनही ते अप्रतिम सुंदर प्रकारे करतात -

तू वनराईचे नाजुक हळवे हसणे
निद्रिस्त खगांची आभाळाची स्वप्ने
तू नभातल्या लखलखत्या चांदणवाती
तू चंद्राची थरथर रजगंध झिरपणे

तू क्षितिजाच्या थरथरत्या केशरमाळा
नवतरुणीच्या पदराचा चंचल चाळा
तू आरशातले रूप स्वतःचे फसवे
तू चुकलेल्या हुरहुरत्या कातरवेळा

तू हिरव्या फांदीवरचा मनमथ रावा
तू गोकुळातला खट्याळ मंजुळ पावा
तू किर्तन अभंगवाणी आर्त भुपाळी
तू मंदिरात भक्तांचे आर्जव.. धावा...!

'संतोष वाटपाडे' हे माझ्या मते आजच्या कविता विश्वातील एक अत्यंत महत्वाचे नाव आहे. वृत्तबद्ध कवितेसाठी त्यांच्यात एक तळमळ आहे आणि त्या कवितेलाही त्यांच्यासाठी तितकीच तळमळ आहे !
मराठी कवितेचा सामान्य माणसाला दिसणारा चेहरा हा नीरस, बेचव व नकोसा वाटणारा आहे, हे कडवट सत्य आहे. भरकटत चाललेला मुक्तपणा, ज्यामुळे बहुतेकदा काव्येतरच वाटणारं लिखाणसुद्धा कविता म्हणून माथी मारलं जातं, हे वास्तव मराठी कवितेचा चेहरा असा होण्यामागे आहे. कविता तिच्या सौंदर्यस्थळांना मुकत असताना संतोष वाटपाडेंसारखा एक अनुभवसिद्ध कवी परखड, जळजळीत, कठोर, हळुवार, कोमल असे विविध भावाविष्कार एकापेक्षा एक प्रभावीपणे वृत्तबद्ध लिखाणाद्वारे मांडतो, हे दृश्य दिलासादायी आहे. त्यांच्या जोडीने काही मोजकीच नावं घेता येतील, जे असाच दिलासा देतात.

संतोष भाऊंचा गेल्या काही वर्षांचा काव्यप्रवास मी पाहू शकलो आहे. माझ्यासाठी हा एक ऐतिहासिक ठेवा आहे. ह्या लेखात मी त्यांच्या अनेक कविता घेऊ शकलेलो नाही. जे काही इथे दिसलं आहे, ती केवळ एक झलकच ! त्यांच्या विविधांगी कवितांमध्ये मला काही काव्यप्रकार मात्र दिसलेले नाहीत किंवा अभावानेच दिसले. ते म्हणजे सुनीत आणि ओवी छंद (अभंग). पारंपारिक वृत्तं आणि त्यातही श्रावणाभरण, पृथ्वी सारखी विस्मृतीत जात असलेली वृत्तं त्यांच्यासारखे प्रतिभावान कवी पुन्हा एकदा लोकांसमोर आणू शकतात. त्यांच्या इथून पुढच्या कवितांतून मला ह्या काही अविष्कारांची अपेक्षा आहे. तसेच, मराठी कवितेशी सामान्य माणसाची नाळ जोडली राहण्यासाठी सध्याचा जो एक महत्वपूर्ण दुवा आहे, तो म्हणजे गझल. त्यांनी अनेक उत्तम गझला लिहिलेल्या आहेत. (मी जाणीवपूर्वक ह्या लेखात त्यांच्या गझलांचा उल्लेख टाळला आहे कारण तो जरा वेगळ्या दृष्टीने पाहायचा विषय आहे, असं मला वाटतं.) ह्या 'गझल' प्रकारातही त्यांनी विपुल लेखन करावे.
त्यांनी हर तऱ्हेच्या कवितेस आपले म्हणावे, असेच मला वाटते.

त्यांची कविता मला नेहमीच प्रेरणा देत आली आहे. इथून पुढेही देत राहीलच, ही खात्री आहे ! त्यांच्या काव्यप्रवासासाठी मनापासून शुभेच्छा !

....रसप....

Saturday, November 05, 2016

डोक्यावर थयथय नाचे भारतियत्व

'उद्याचा मराठवाडा' च्या दिवाळी २०१६ अंकात प्रकाशित कविता :-

विस्तीर्ण कधी होता हा रस्तासुद्धा
केव्हढी तत्वनिष्ठांची गर्दी झाली
जायचे पुढे वेगाने प्रत्येकाला
जो पडला त्याला तुडवा पायांखाली

आसमंत जयजयकारांनी दुमदुमतो
आरोळ्या, हाळ्यांचाही गोंधळ चाले
उन्मत्त प्रदर्शन झेंड्यांचे, शक्तींचे
तलवारी हातांच्या, नजरांचे भाले

ही जमीन, अंबर, पाणी सगळे तुमचे
माझ्यासाठी ना येथे जागा उरली
मज माझी भाषा समजेना आताशा
शांततेत माझ्या किती वादळे विरली

मी सजीव आहे, नंतर माणुस आहे
माणुसकीनंतर माझे नागरिकत्व
अनुक्रमात झाला कसा बदल आता की -
डोक्यावर थयथय नाचे भारतियत्व

हो, उगाच आलो होतो तुमच्यामध्ये
पण परत जायचाही रस्ता गजबजला
बस् एक कोपरा धरून निपचित पडणे
इतकाच तोडगा आहे आता उरला

....रसप....
९ जुलै २०१६

Thursday, November 03, 2016

असं एखादं पाखरू वाह्यात - शिवाय (Movie Review - Shivaay)

प्रास्ताविक वगैरे काही नाही. डायरेक्ट सुरूच करतो, कारण बिनडोकपणाचं वर्णन करायला कसलं प्रास्ताविक वगैरे करणार !

तर सिनेमा सुरु होतो जोरजोराच्या उच्छ्वासांनी. दम लागलेला नरपुंगव आहे आपला एक 'A' वगळलेला अजय देवग्न. इतस्तत: विखुरलेल्या बर्फात निपचित पडलेल्या माणसांकडे एक कटाक्ष टाकून तो नजर सर्वत्र फिरवतो, त्याला एक लोकरीची छोटीशी बाहुली दिसते. तिला हातात घेऊन तो जमिनीवर बद्दकन् सांडतो.
उच्छ्वास कंटिन्यूड..
विखुरलेलं बर्फ पडद्यावर उडतं आणि कहाणी ९ वर्षं मागे जाते आणि हजारो फूट उंचावरच्या अजून एका बर्फाळ भागात पोहोचते. जाडजूड जाकीटं, हातमोजे, कानटोप्या घातलेली मिलिटरीची ३-४ माणसं. पैकी एक जण जोरात हाक मारतो... 'शिवाssssय!'
कॅमेरा झरझर वर जात उंच, अतिशय उंच शिखरावर पोहोचतो. सर्वदूर पसरलेला अमर्याद बर्फ, त्या उंचीवरून दिसत असलेल्या बर्फाच्छादित शिखरांच्या अगणित रांगा वगैरे पडद्यावर पाहून आपल्याला कुडकुडायला लागतं. पण पाठीवर त्रिशूळ गोंदवलेला कुणी भोलेनाथाचा अवतार उघड्यानेच त्या बर्फावर पालथा निजलेला दिसतो. बहुतेक त्याचं हृदय लाकडी असावं. हजारो फूट खालून दिलेली हाक त्याच्यापर्यंत पोहोचते आणि गांजा मारुन भिर्र झालेला असतानाही तो जागा होतो आणि उघड्या शरीरावर एक जाकीट चढवतो, त्याची चेनही अर्धी उघडीच ठेवतो आणि कड्यावरून स्वत:ला झोकून देतो ! 'असं एखादं पाखरू वेल्हाळ ज्याला सामोरं येतया आभाळ' म्हणजे काय, तर हे. हातात दोन मोठे हूक आणि अर्धउघड्या जाकीटच्या मागे असलेला एक दोरखंड ह्यांच्या जोरावर तो नजर पोहोचणार नाही, अश्या उंचीवरून खाली टप्पे खात, स्लाईड करत, लटकत, उड्या मारत काही क्षणांतच खालपर्यंत पोहोचतो, तोपर्यंत त्याला हाक मारणाऱ्याने हाक मारताना तोंडापाशी नेलेला हातही खाली आलेला नसतो ! (च्यायला.. इथे दिवाळीचा कंदील लावून खाली उतरताना शिडीचा घोडा डुगडुगला तरी आमच्या छातीतले दोन-चार ठोके जमिनीवर पडतात. मीसुद्धा पाठीवर त्रिशूळ, दंडावर नागोबा, छातीवर केसांच्या जटा वगैरे गोंदवून घ्यायचं ठरवतो आहे. मग डायरेक्ट उंच उडी मारुन एका हाताने छताच्या हुकाला धरीन आणि दुसऱ्या हातातला कंदील लटकवून लगेच खाली उडी मारीन.) खाली पोहोचल्यावर मिलिटरीवाले त्या आईसप्रूफ वीराला, त्याने पुरवलेल्या अत्यंत महत्वाच्या बातमीसाठी धन्यवाद आणि कामाचा मोबदला म्हणून एक पाकिट देतात. 'ह्याचं नाव 'शिवाय' आहे आणि तो अचाट साहसी व शक्तिमान आहे', हे लोकांना समजावं इतकंच ह्या पहिल्या दोन-पाच मिनिटांचं महत्व आहे. पण प्रत्यक्षांत, 'पुढचा सिनेमा म्हणजे आचरटपणाचा पोटाला तडस लागेस्तोवर मिळणारा डोस आहे', हे त्यातून समजून येतं.
आचरटपणा कंटिन्यूड..
'शिवाय' (अजय देवग्न) हा उत्तराखंडातल्या कुठल्याश्या दुर्गम गावांत राहणारा एक साहसी गिर्यारोहक आणि धाडसी टूरीस्ट गाईड असतो. त्याने 'अपने आपको पाला हैं' असतं आणि अंगभर गोंदवलेलं असतं. गिर्यारोहणासाठी आलेली एक गोरी गोरी पान, फुलासारखी छान बल्गेरियन सुंदरी 'ओल्गा' (एरिका कार) आणि गावरान काटेरी वांग्यासारखा दिसणारा 'शिवाय' प्रेमात पडतात. ओल्गाला स्वगृही अनेक जबाबदाऱ्या असतात आणि आगा-पिच्छा काहीही नसतानाही 'शिवाय'ची स्वत:च्या प्रेमाखातर परदेशात स्थायिक होण्याची तयारी नसते (ब्लडी मेल शॉविनीस्ट!), त्यामुळे ते लग्न करत नाहीत. मात्र प्रेमापत्य होण्याची वेळ येतेच. 'मी ह्या बाळाची जबाबदारी घेईन' असं विनवून विनवून 'शिवाय' ओल्गाला बाळाला जन्म देण्यासाठी भाग पाडतो आणि 'गौरा' (एबिगेल इम्स) चा जन्म होतो. इंटरवलपर्यंत बाप आणि लेक, मुलीच्या जन्मानंतर लगेच बल्गेरियाला निघून गेलेल्या ओल्गाला भेटण्यासाठी बल्गेरियाला पोहोचतात आणि तिथे गौरा एका संकटात सापडते.

ह्याच्या पुढचा भाग फडतूस योगायोग, भंपक साहसदृश्यं, फुसकी रहस्यमयता, बोगस भावनिक नाट्ये वगैरेंनी माखलेला आहे. तर एकूणच चित्रपट बकवास अभिनय, फुटकळ संवाद, भंकस कथालेखन, फुळकट संगीत वगैरेंनी लडबडलेला आहे.



आपण लग्न करू शकत नाही, हे माहित असतानाही मूल होईल अशी परिस्थिती येऊ देणं व त्यानंतर तिची तयारी नसतानाही 'मी जबाबदारी घेईन' वगैरे बाता मारुन तिला मूल जन्माला घालायला भाग पाडणं आणि नंतर तिला खल-स्त्री ठरवणं की जणू तिला तिच्या बाळाविषयी कधी काही प्रेमच नव्हतं, हा सगळा दांभिकपणा असह्य आहे. पदोपदी, 'शिवाय'ला सिंगल पेरेंट म्हणून सहानुभूती देत झुकतं माप देणारी एककल्ली कथा म्हणूनच अजिबात पटत नाही.
९ वर्षांनंतर जेव्हा शिवाय-ओल्गा समोरासमोर येतात, तेव्हाचा त्यांचा ब्लेम-गेम आणि नंतरचा भावनिक आवेग इतका पोकळ आहे की ग्रेस मार्क देऊन पासही करावंसं वाटू नये. असे अनेक प्रसंग अतिशय ढिसाळ पद्धतीने चित्रित केल्याने वैतागाचा कडेलोट होऊन आपणही एखादा हूक आणि दोरखंड घेऊन कुठल्याश्या बर्फाळ शिखरावरून उडी मारावी की काय, असं वाटतं.

सहसा सिनेमातील बालकलाकार भाव खाऊन जात असतात. त्यांच्या अभिनयात आणि एकंदर वावरात बरंच काही कमी-जास्त असलं, तरी त्यांचा निरागसपणा सगळ्यावर मात करतो आणि ते आवडतातच. 'एबिगेल इम्स' आपला हा समज खोटा ठरवते. एक तर तिला मुकी दाखवण्यामागे 'हिंदी बोलायची गरजच पडणार नाही' ही सोय असण्याशिवाय इतर काहीही कारण नाही आणि तिला ते मुकेपण वेडेपण वाटलं असावं की काय, अशी ती काम करते. ती जशी मुकी न वाटता वेडीच वाटते, तशीच निरागस न वाटता नतद्रष्टच वाटते. खोडकर न वाटता, कार्टी वाटते आणि लोभस न वाटता असह्य वाटते.

सर्व भूमिका एकसारख्याच ढिसाळपणे लिहिलेल्या आहेत, ह्या कन्सिस्टन्सीबद्दल मात्र 'रॉबिन भट्ट' आणि 'संदीप श्रीवास्तव' ह्या लेखकाचं मनापासून अभिनंदन. ह्यांची आडनावं 'मठ्ठ' आणि 'अवास्तव' सुद्धा शोभतील, पण सध्या जी आहेत त्यातूनही उपरोधिक विनोदनिर्मिती चांगली होते आहे, त्यामुळे असोत.

१०५ कोटी खर्चून हा सिनेमा बनवला आहे. त्यापैकी काही कोटी तर बल्गेरियातल्या रस्त्यावरच्या गाड्या तोडण्या-फोडण्यातच लागले असावेत. गरीब बिच्चारा रोहित शेट्टी मोजक्या गाड्या उडवतो, तोडतो, फोडतो. इथे तर 'दिसली गाडी की फुटलीच पाहिजे' असा प्रकार चालू असतो. बोनेटवर बसून एका हातात गाडीचं स्टिअरिंग पकडून दुसऱ्या हाताने बाजूच्या गाडीमधल्याशी झटापट करतानाचं दृश्य पाहून तर डोळ्यांचं पारणं फिटावं !
अचाट साहसदृश्यांना जर तर्कसंगत कथा-पटकथा व तुल्यबळ अभिनयाची जोड असली, तर तितकीशी खटकत नाहीत. 'मिशन इम्पॉसिबल'सुद्धा पचवतोच की आम्ही ! पण त्यासाठी आवश्यक 'बॅलेन्सिंग अ‍ॅक्ट' कोण करणार ? नुसतंच 'टॉम क्रूझ'चं करपलेलं भारतीय व्हर्जन म्हणून एरव्ही कितीही आवडत असला तरी त्या देवग्नाला कसं सहन करायचं ? वांगं आवडतं म्हणून काय नुसतं खायचं होय ?

सणासुदीच्या दिवसांत एक अशक्य वाह्यात चित्रपट पाहिला आणि मनातल्या मनात त्याचं शीर्षक बदलून 'शिवाय' ऐवजी 'शिव्याय' केलं आहे. फॅन मंडळींना तर सगळंच आवडत असतं. त्यामुळे जर देवग्नफॅन असलात आणि ऑलरेडी पाहून झाला नसेल, तर नक्की पाहा. देव जसा 'यत्र तत्र सर्वत्र' आहे, तसाच 'देवग्न'ही चित्रपटात ठायी ठायी आहे. इथून पुढे 'खानावळी'ला स्वप्रेमाबद्दल नावं ठेवत असताना ह्या साळसूदपणाचा आव आणून दिवाळी खराब करणाऱ्या भरताच्या वांग्यालाही लक्षात ठेवा, म्हणजे झालं.

रेटिंग - *

- रणजित पराडकर
Related Posts Plugin for WordPress, Blogger...