Thursday, July 31, 2014

निनावी दु:ख लाभावे..

मनाचा ठाव घेताना निनावी दु:ख लाभावे
जसे पाहून गायीला भुकेले वासरू यावे

किती हा दूरचा रस्ता तुझ्यापासून येणारा
कितीदा वाटते, 'आता पुरे, येथेच थांबावे'

असे ही रोजची कसरत तुला समजून घेण्याची
तुला हे काय समजावे, तुला समजून का घ्यावे ?

स्वत:पुरती नशा घेऊन फिरतो सोबतीला मी
कुणाला पुण्य ना द्यावे, कुणाचे पाप ना घ्यावे

तुला दाटून आल्यावर असू दे भान इतके की
कधी हुलकावणी द्यावी, कधी बरसून झोडावे

जरासे पापण्यांना किलकिले करता क्षणी काही
उडाले दूर स्मरणांचे निरागस भाबडे रावे

पहाटेची बघितली वाट सारी रात्र डोळ्यांनी
नव्याने प्रश्न मग पडला, उजेडाने कुठे जावे ?

....रसप....
३१ जुलै २०१४

Monday, July 28, 2014

एक्स्ट्रा टाईमची पेनल्टी किक (Movie Review - Kick)

'माझं पोरगं कसलं व्रात्य आहे, उपद्व्यापी आहे ! जराही शांत बसत नाही आणि बसूही देत नाही.
प्रवासात तर डब्यातल्या प्रत्येकाला जाऊन छळायचं असतं ! एका जागी थांबत नाही.
शाळेतून रोजच तक्रार असते !
मनासारखं झालं नाही तर सगळं घर डोक्यावर घेतं.
हातात काहीही आलं की आधी ते फेकणारच !
आयटम सॉंग्स भारी आवडतात.. 'झंडू बाम'वर तर कसलं नाचतंय !'

- कशाचंही कौतुक असतं लोकांना. ज्यासाठी एक धपाटा द्यायला हवा, त्यासाठी एक गालगुच्चा घेतला जातो आजकाल. ह्या लाडोबांनी काहीही केलेलं चालतं आई-बापाला. ह्यांचा आनंद आणि बाकीच्यांना वैताग !
असंच काहीसं आपल्या फॅन मंडळींचं आहे. त्यांच्या लाडोबांनी काहीही केलं तरी चालतं. चालतं कसलं, ते 'लै भारी' असतं. मग तो 'किक'च्या सुरुवातीचा जवळजवळ तासभराचा वात आणणारा अस्सल मूर्खपणा का असेना !

मागे एकदा मोठ्या अपेक्षेने पंकज कपूर दिग्दर्शित 'मौसम' बघायला गेलो होतो. असह्य होऊन मध्यंतराला बाहेर पडलो. 'किक'च्या मध्यंतरापर्यंत तश्याच निर्णयाला पोहोचत होतो. एक तर 'टायटल्स'मध्ये 'म्युझिक - हिमेश रेशमिया' दिसलं होतं, तेव्हापासून पाचावर धारण बसली होती की त्याची काही तरी भूमिका असणारच. मी सश्याच्या बावरलेपणाने बरोबरच्या मित्राला माझी भीती कुठलाही आडपडदा न ठेवता बोलून दाखवली. तेव्हा समजलं की हिमेश दिसणार नाहीये. मध्यंतरानंतर तग धरण्याचं बळ त्या तीन-चार शब्दांत होतं आणि मी बाहेर न पडता तिथेच बसून राहिलो.

तर कहाणी अशी आहे की.....
'देवी लाल सिंग' (सलमान) हा एक सटकलेल्या डोक्याचा चाळीशीचा तरुण असतो. (चाळीशीचा तरुण म्हणजे 'गरमागरम बियर' म्हटल्यासारखं वाटत असेल. पण ते तसंच आहे.) हुशार व सुशिक्षित असूनही त्याच्या सतत काही तरी 'थ्रिलिंग' करण्याच्या चसक्यामुळे त्याने आत्तापर्यंत ३२ नोकऱ्या सोडलेल्या असतात. गावात देवाच्या नावाने जसा एखादा वळू सोडलेला असतो, तसा हा स्वत:च्या 'किक'साठी गावभर उधळत फिरत असतो. त्याला काय केल्याने 'किक' मिळेल, हे सांगता येत नसतं. एकीकडे मैत्रिणीच्या घरच्यांच्या मर्जीविरुद्ध तिचं लग्न करवून देत असतानाच दुसरीकडे त्याच लग्नाबद्दलचे अपडेट्ससुद्धा त्याच घरच्यांना देऊन, त्यांना लग्नाच्या ठिकाणी आणून, त्यांच्यासमोर लग्न लावून देतो, कारण त्यातून 'किक' मिळते !
एक बथ्थड चेहऱ्याची मानसोपचार तज्ञ 'शायना' (जॅकलिन फर्नांडीस) त्याला भेटते आणि त्याला एक वेगळीच 'किक' बसते. प्रेमाची. त्या प्रेमाखातर तो पुन्हा एकदा नोकरी करण्याचा प्रयत्न करतो. तो न जमल्याने नाराज झालेल्या शायनावर नाराज होऊन 'आजसे 'पैसा कमाना' यही मेरी नयी 'किक' है' असं ऐकवून देवी अंतर्धान पावतो. वर्षभर त्याची वाट पाहून अजून थोराड होत चाललेली शायना कदाचित गाल भरून येतील ह्या आशेने असेल, थेट पोलंडची राजधानी 'वॉर्सो'ला आई-वडील, बहिणीसह शिफ्ट होते ! (च्यायला ! मी ३ ब्रेक अप्स केले. कधी वर्सोव्यालाही जाऊ शकलो नाही. माझ्या प्रेमात 'किक'च नव्हती बहुतेक!)

इथपर्यंत थेटरात बसलेले सगळे पकलेले असतात. थेटरात जांभयांची साथ आलेली असते. पण कोमात गेलेला पेशंट शुद्धीत यावा, तसे अचानक लेखक, दिग्दर्शक शुद्धीत आल्याची लक्षणं दाखवायला लागतात.

कुठल्याही कर्तव्यदक्ष पालकांना असते, तशी शायनाच्या घरच्यांनाही तिच्या लग्नाची काळजी असतेच. त्यामुळे वडिलांच्या मित्राचा मुलगा 'हिमांशु' (रणदीप हुडा) कहाणीत येतो. सुपरकॉप हिमांशु एका 'डेव्हिल' नावाच्या चोराच्या करामतींनी बेजार झालेला असतो. पुढची चोरी 'वॉर्सो'मध्ये होणार असा एक खत्तरनाक डोकेबाज शोध लावून तो इथे आलेला असतो. 'डेव्हिल' म्हणजे पूर्वीचा 'देवी' असणारच असतो. अश्याप्रकारे कहाणीची 'त्रिकोणीय' गरज पूर्ण होते.
ह्यानंतर नेहमीची थरारनाट्यं यथासांग पार पडतात. कहाणी आणखी पुढेही उलगडत जाते. 'नवाझुद्दिन सिद्दिकी'ने जबरदस्त साकारलेला खलनायक 'शिव' येतो. आणि इतर कुठल्याही सलमानपटाच्या ठराविक वळणावर चित्रपट 'इतिश्री' करतो.


चित्रण, छायाचित्रण तर आजकाल सुंदर असतंच. इथेही ते सफाईदार आहे. मध्यंतराच्या जरा आधीपासून कहाणी चांगला वेगही पकडते. पण हिमेश रेशमियाची गाणी वेगाला बाधा आणायचं काम सतत करत राहतात. खासकरून 'नर्गिस फाक्री' असलेलं एक गाणं तर पराकोटीचा अत्याचार करतं.

'जॅकलिन फर्नांडीस' खप्पड चेहरा आणि विझलेल्या डोळ्यांनी अख्ख्या चित्रपटभर अभिनयाचा अत्यंत केविलवाणा अयशस्वी प्रयत्न करते.

सौरभ शुक्ला, रजित कपूर व मिथुन चक्रवर्ती ह्यांना फारसं काही काम नसल्याने ते वायाच गेले आहेत. नवाझुद्दिनच्या भूमिकेचीही लांबी तशी कमीच आहे. पण महत्वाची तरी आहे. त्याचं ते 'ट्टॉक्' करून विकृत हसणं जबराट आहे. पण म्हणून 'मै १५ मिनिट तक अपनी सांस रोक सकता हूँ' हे काही पटत नाही.

रणदीप हुडा हा मला नेहमी एक गुणी अभिनेता वाटतो. त्याचा वावर अगदी सहज आहे. कोणत्याही खानपटात दुसऱ्या कुठल्या नटाने छाप सोडणे म्हणजे दुसऱ्याच्या बगीच्यात शिरून तिथलं गुलाबाचं फूल डोळ्यांदेखत तोडून आणण्यासारखं आहे.

खरं तर तेलुगु सिनेमाचा रिमेक असल्याने सगळा मसाला मिला-मिलाया आणि बना-बनायाच होता. फक्त चकाचक भांड्यांत सजवून समोर ठेवायचं होतं. ते ठेवलंच आहे. त्यामुळे एकदा बघायला हरकत नसावी.
असं करा.... खणखणीत एसी असलेल्या चित्रपटगृहात, पोट मस्तपैकी टम्म फुगेस्तोवर खादाडी करून जा आणि पहिला एक तास झक्कपैकी झोप काढा. मग मध्यंतरात गरमागरम चहा-कॉफी घेऊन पॉपकॉर्न चिवडत उर्वरित अर्धा भागच पहा. मज्जा नि लाईफ !

रेटिंग - * *

Tuesday, July 22, 2014

कौन जीता, कौन हारा ?

२ एप्रिल २०११. भारताने विश्वचषक जिंकला. २८ वर्षांनंतर. त्याआधी तो चषक त्यांनी उंचावला होता लॉर्ड्सवर.
२१ जुलै २०१४. काल त्याच लॉर्ड्सवर भारताने कसोटी सामना जिंकला. पुन्हा एकदा, २८ वर्षांनतर मिळालेलं एक यश.
२०११ च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने २७५ चं लक्ष्य समोर ठेवलं होतं आणि झटपट दोन महत्वाचे बळीही मिळवले होते. तेव्हा विश्वविजय मुंबईहून लॉर्ड्सइतकाच दूर वाटत होता. पण धोनीने कमाल केली.
कालच्या सामन्यात 'जो रूट' खेळपट्टीवर खोलवर रूट्स (मुळं) रोवल्यासारखा ठाण मांडून बसला होता आणि मोईन अलीही हाताला येत नव्हता, तेव्हाही विजय लॉर्ड्सहून मुंबईइतकाच दूर वाटत होता. पण पुन्हा एकदा धोनीने कमाल केली. सुंदर चेहऱ्याला झाकणाऱ्या केसांना बाजूला करावं, त्याप्रमाणे त्याने केशसंभाराखाली दबलेल्या इशांत शर्माच्या बुद्धीला चालना दिली आणि त्याला आखूड मारा करण्यास भाग पाडलं. ह्या अनपेक्षित हल्ल्याने बावचळलेला मोईन अली लंचपूर्वीच्या अखेरच्या चेंडूवर शॉर्ट लेगच्या हाती हळुवार पिसासारखा अलगद विसावला आणि सकाळचे सत्र भारतासाठी अगदीच विफल ठरले नाही.
अचानक इशांतच्या चेंडूची गती १३५ कि.मी. च्या पुढे गेली. अधून मधून १४० की.मी.लाही तो पोहोचला. लंचनंतर इशांतच्या आखूड माऱ्यावर प्रायर व रूट फावड्याने माती ओढल्यासारखे धावा वसूल करायला लागल्यावर पुन्हा एकदा पराभवाचं सावट आलं. पण धोनी ठाम होता. आखूड मारा चालूच राहिला आणि मग एकामागून एक आणखी ४ विकेट्स मिळाल्या आणि पुन्हा एकदा क्रिकेटची पंढरी भारताच्या जयजयकाराने दुमदुमली.


चित्रपट जसं दिग्दर्शकाचं माध्यम आहे, तसं क्रिकेट हा कर्णधाराचा खेळ आहे. एक उत्कृष्ट कर्णधार साधारण खेळाडूंकडूनही सर्वोत्कृष्ट कामगिरी करवून घेऊ शकतो आणि एक निकृष्ट कर्णधार सर्वोत्कृष्ट खेळाडूंनाही साधारण भासवू शकतो. सगळं काही केवळ 'नीती' आणि 'नीयत'च्या जोरावर.
ब्रिटीश, ऑस्ट्रेलियन, विंडीज, आफ्रिकन वगैरे जलदगती गोलंदाजांपुढे भारतीय जलदगती गोलंदाज (इशांत वगळल्यास) म्हणजे काय हे स्ट्युअर्ट ब्रॉड आणि भुवनेश्वर कुमारला बाजू-बाजूला उभं केल्यावर समजेल. पण खेळपट्टीवर हिरवळ असतानाही तिचा तितका लाभ इंग्लंडचे गोलंदाज उठवू शकले नाहीत, जितका ती हिरवळ वाळल्यावर भारतीयांनी उठवला. ह्याला कारण कूक व धोनी ह्यांच्या कप्तानीतील धोरणात्मक फरक. आक्रमक क्षेत्ररचना, जेव्हढी धोनीने लावली, तेव्हढी कूकने का लावली नसावी, हे कळत नाही. कदाचित फलंदाजीतील सुमार फॉर्ममुळे त्याच्यातील कर्णधारही बचावात्मक झाला असावा.

सामन्यानंतरच्या समारंभात इशांत, धोनीच्या मुलाखतींतून पुन्हा एकदा हे प्रतीत झालं की धोनी हा एक अतिशय चलाख, धोरणी व धूर्त खेळाडू आहे. त्याची विचार करण्याची पद्धती, कुठल्याही परिस्थितीचे वेगळ्याच प्रकारे पण अचूक मूल्यमापन करत असावी. सामन्याच्या पहिल्या दिवसअखेरीस त्याने आपल्या संघसहकाऱ्यांना म्हटलं की, गेल्या पाच कसोटी सामन्यांच्या तोडीचा खेळ आपण ह्याही कसोटीत केला, तर आपण नक्कीच जिंकू. अजून एक खूप साधीशी गोष्ट तो त्याच्या मुलाखतीत म्हणाला. 'कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेरपर्यंत समाधानकारक परिस्थितीत असणे, आमच्यासाठी महत्वाचं आहे कारण तिथून पुढे आमचे फिरकीपटू प्रभाव टाकू शकणार असतात.' अत्यंत सोप्या पद्धतीने मांडलेल्या अतिशय कठीण गोष्टी. एका चांगल्या नेतृत्वासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. कठीण आव्हानं अश्या पद्धतीने समोर मांडणं, की ती सोपी वाटली पाहिजेत.

एक चिंतेची गोष्ट हीच आहे की ह्या विजयानंतर इशांत शर्माचा आत्मशोध संपू नये. अजूनही रिकी पाँटिंगला ऑफ स्टंपबाहेरच्या तिखट जलद माऱ्याने अस्वस्थ करणाऱ्या सुरुवातीच्या इशांत शर्मापासून हा आजचा इशांत शर्मा खूप दूर आहे. पर्थपासून मुंबईइतका दूर. आपल्या उंचीचा उपयोग आपण करून घेऊ शकतो, हे त्याला कर्णधाराने सांगायला लागतं हे बरोबर नाही. पंचविशीचाच असला तरी ७-८ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव थोडाथोडका नाही. आपली बलस्थानं आपल्याला उमजावीत, इतक्यासाठी तरी हा अनुभव नक्कीच पुरेसा आहे. आशा आहे की विकेट मिळवणं आणि विकेट मिळणं ह्यातील फरक त्याला कळत असेल.

अजून एक महत्वाची बाब ही की मालिकेतील अजून ३ सामने खेळायचे बाकी आहेत. शांतपणे विचार केल्यास भारताने हा सामना जिंकला, ह्यापेक्षा इंग्लंडने तो हरला असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल. कारण जितके चेंडू एकट्या मुरली विजयने यष्टीरक्षकासाठी सोडले त्याच्या एक चतुर्थांश चेंडू जरी इंग्लंडने लंचनंतर सोडले असते तर निकाल वेगळा लागू शकला असता. किंवा जितके आखूड चेंडू एकट्या इशांत शर्माने अखेरच्या दिवशी टाकले, तितके चेंडू जर स्ट्युअर्ट ब्रॉडने गुड लेंग्थवर टाकले असते, तरी सामन्याचे पारडे दुसऱ्या बाजूला सहज झुकू शकले असते. त्यामुळे इंग्लंडसाठी मालिकेत पुनरागमन करणे फार अवघड नाही. त्यांना फक्त त्यांच्या चुका सुधारायच्या आहेत.

सामन्यानंतर माईक आथरटनने अ‍ॅलिस्टर कूकची मुलाखत पोलीस चौकशी करावी, इतक्या आक्रमकपणे घेतली. काही अतिशय अवघड प्रश्न विचारले. पण धोनीशी मात्र शेजाऱ्याच्या मुलाला समजवावं अश्या पवित्र्यात संवाद साधला. बिन्नीला एकही षटक द्यावेसे का वाटले नाही, असा अवघड प्रश्न त्याने टाकला नाही. त्यामुळे मुलाखतीसाठी पडलेल्या चेहऱ्याने आलेला कूक चढलेल्या आठ्यांसह परतला आणि शांत चेहऱ्याने आलेला धोनी हसऱ्या चेहऱ्याने परतला.

कुणाच्या का कोंबड्याने असो, सूर्योदय झाला आहे; ह्यावर आपण जितका काळ समाधानी राहू शकतो तितकाच काळ ह्या विजयाने आनंदी राहावं, असं वाटतं.

उर्वरित मालिकेसाठी धोनी ब्रिगेडला मन:पूर्वक शुभेच्छा !

- रणजित पराडकर 

Tuesday, July 15, 2014

लय सॉरी ! (Movie Review - Lai Bhari लय भारी)

माणसाच्या अनेक जातींपैकी एक जात आहे. 'आरंभशूर'.
ह्या जातीत अनेक खेळाडू येतात. उदा. शिखर धवन. सुरुवातीला दोन-चार फटके असे मारेल की डोळ्यांचं पारणं फिटावं आणि जरा नजर बसली की गोलंदाजाला वाढदिवसाचं प्रेझेंट द्यावं इतक्या प्रेमाने स्वत:ची विकेट बहाल करून मोकळा होईल. चित्रपट आणि माणसाची नाळ तेव्हाच जुळते जेव्हा चित्रपट माणसाशी थेट संबंध जोडतात. जसं, ह्या 'आरंभशूर' जातीत अनेक चित्रपटही मोडतात. Or lets say, बहुतांश चित्रपट ह्याच जातीत येत असावेत.

हे सांगायचं कारण इतकंच की, 'लय भारी' अपेक्षेने 'निशिकांत कामत' ह्यांचा 'लय भारी' बघायला गेलो आणि 'लय सॉरी' झालो !
चित्रपटाच्या सुरुवातीला एक सुंदर गाणं, त्याचं तितकंच छान चित्रीकरण, एकंदरीतच अपेक्षा उंचावणारी निर्मितीमुल्याची झलक ह्या सगळ्यांतून जरा माहोल बनल्यासारखं वाटतं. पण नजर बसल्यावर जसा शिखर धवन विकेट फेकून देतो, तसं मध्यंतरापर्यंत 'लय भारी'ची लेव्हल 'भारी'पासून 'बरी' पर्यंत येते आणि मध्यंतरानंतर तर हाराकिरी होते. मग जाग आलेला प्रेक्षक सगळाच ठोकताळा मांडतो. अगदी सुरुवातीपासून.


गावातलं एक मोठं प्रस्थ. प्रतापसिंह निंबाळकर (उदय टिकेकर). सामाजिक कार्याचा ध्यास घेतलेल्या निंबाळकर व त्यांच्या घराण्याला सगळेच जण खूप मानत असतात. पण त्यांना मूल होत नसतं आणि ह्याचं शल्य पत्नी सुमित्रा देवींना (तन्वी आझमी) कायम बोचत असतं. मग एकदा वारीला जाऊन त्या विठ्ठलाला साकडं घालतात आणि विठ्ठल पावतो ! (निंबाळकर-दाभोळकर हे कमजोर यमक असल्याने वृथा संबंध जोडू नये.)
इतक्या वर्षांनी होणारं मूल आणि त्या पहिल्या मुलाला विठ्ठलाला अर्पण करायचं ? पत्नीचं हे म्हणणं न पटल्याने, गावातल्या गोरगरिबांच्या दु:खाने व्यथित होणारे प्रतापसिंह निंबाळकर स्वत:च्या पत्नीच्या आयुष्यातील महत्कठीण टप्प्यात तिला एकटं सोडून, चिडून थेट लंडनला निघून जातात आणि पुत्रजन्मानंतरच परततात ! आता देवाला वचन दिलं आहे आणि नवऱ्यालाही नाराज करायचं नाहीये. मग ह्यावर उपाय काय ? तो देव देणारच असतो. काय दिला असेल, हे समजण्याइतके चित्रपट आपले पाहून झाले असल्याने आपल्याला पहिल्या अर्ध्या तासात पुढचा अख्खा चित्रपट कळतो आणि तो प्रत्यक्षात घडत असताना बघण्यासारखं बहुतेक वेळेस काही नसल्याने आपण आपल्या मनात पुढचा चित्रपट बघत राहतो.
अपेक्षेनुसार सगळा घटनाक्रम तसाच असणे जर 'लय भारी' असेल तर आपण 'लय सॉरी' आहोत राव ! अहो, अश्या ष्टोऱ्या तर पोटातल्या पोरालाही माहित असतात आजकाल !


खरं तर रितेश देशमुख मला एक बरा अभिनेता वाटतो. पण इथे अनेक ठिकाणी तो थेट 'बिग बी'ची कॉपी मारायला बघतो. अरे लेकीन उसके पास जो ष्टाईल है, जो आवाज है वो तुम्हारे पास किधर है ? हांय ?
अभ्यासक्रमातून व्याकरणेत्यादी जसं बाद झालंय तसं मराठीचे उच्चार ही बाब आता माध्यमांतूनही बाद झाली आहे, त्यामुळे त्याबद्दल 'लय सॉरी' होण्यात काही अर्थ नाही.

'गुड्डी'मध्ये 'प्राण' साहेबांनी मरतुकड्या लोकांकडून केवळ ते 'हीरो' होते म्हणून मार खावा लागल्याची व्यथा बोलून दाखवली होती. साला... एखाद्याने आयुष्यभर 'जिम' लावून, खुराक घेऊन बॉडी बनवावी आणि ज्याच्या मांड्यांएव्हढे त्याचे दंड असतील अश्या एका चॉकलेटी चेहऱ्याने त्याला बुकलून काढावं; असं अशक्यप्राय हीरोपण आणखी कितीदा दैवी कृपेच्या नावावर आमच्या माथी फोडलं जाणार आहे, हे त्या विठ्ठलाला विचारलं तर तोही बहुतेक 'लय सॉरी'च म्हणेल ! त्यामुळे हे सगळं शरद केळकरने स्वीकार केलं असेलच. आपणही करू. पण तरी तो आपली छाप सोडून जातोच.

संगीतकार अजय-अतुल आणि महाराष्ट्रातली धरणं, दोघांची सद्यस्थिती एकसारखीच वाटते मला. मोजकाच साठा उरला आहे. आता कपात मावेल इतकंच उरलं असेल, तर कपात होणं तर क्रमप्राप्तच आहे ! त्यामुळे आठवड्यातून मोजून एक तास नळाने धो-धो बरसावं तसं अजय-अतुल सुरुवातीच्या 'माउली माउली' मध्ये मनसोक्त बरसतात आणि नंतर लय म्हंजे लयच सॉरी होतात !

कुणी सई ताम्हणकरचीही कॉपी मारू शकतं, असा एक झटका मला 'आदिती पोहनकर'ला पाहून मिळाला.
एका सुमार गाण्याच्या टुकार कडव्याच्या भिकार नाचापुरती जेव्हा जेनेलिया पडद्यावर झळकते, तो क्षण तिच्या आजवरच्या कारकीर्दीतला एकमेव असा क्षण असावा जेव्हा तिला पब्लिककडून शिट्ट्या मिळाल्या असाव्यात.

तन्वी आझमी ही एक माझी आवडती अभिनेत्री आहे. तिने आजच्या काळातली निरुपा रॉय व्यवस्थित रंगवली आहे.

संवादलेखनाने काही उल्लेखनीय मजा आणली, असं वाटलं नाही.

सर्वात मोठा अपेक्षाभंग दिग्दर्शक निशिकांत कामतकडून होतो. एका दृश्यापुरता सलमान खान झळकतो. त्या दृश्यात तो अभिनयशून्यतेच्या सर्व मर्यादा पार करतो. तरी ते ठीक आहे कारण त्याच्याकडून कुणालाच अभिनय करवून घेता आलाच नाहीये आजपर्यंत. पण बाकीचे ? त्याच दृश्यातल्या रितेशला पाहून असं वाटलं की दिग्दर्शक म्हणून रिकामी खुर्ची ठेवली असावी की काय ?

आवर्जून 'लय भारी' म्हणावं, अशी एकच गोष्ट जाणवली ती म्हणजे 'माउली माउली' हे गाणं. सुंदर शब्द, तितकीच सुंदर चाल व वारीचं त्याच तोडीचं चित्रीकरण. अगदी सुरुवातीला असलं तरी, चित्रपटगृहातून बाहेर आल्यावरही हेच गीत आपल्या ओठांवर असतं. पण ते तेव्हढंच !

एकुणात काय ?
तर आपली कहाणी सॉरी, गाणी सॉरी, हीरो-हीरवणी सॉरी.. च्या मायला सगळंच लय सॉरी !

रेटिंग - * १/२

Monday, July 14, 2014

पाऊस कधीचा पडतो

पानांची सळसळ दु:खे ऐकून मूक ओघळतो
ह्या निरभ्र डोळ्यांमधुनी पाऊस कधीचा पडतो

सुरकुतली ओली स्वप्ने
उरलीत उशाशी काही
बकुळांगी आठवसुमने
जपण्याची इच्छा नाही
पाउले मोजतो ज्याची तो श्वास नेहमी अडतो
मनअंगण चिंबवणारा पाऊस कधीचा पडतो

अश्रूंची ओघळओढ
रोखून थांबली नाही
शब्दांची तांडवखोड
हरवून संपली नाही
हा दाह विझवता, विझता, झुळझुळता नाद विसरतो
हुरहूर फुलवण्यासाठी पाऊस कधीचा पडतो

--------------------------------------------------------------

ओठांनी आवळलेला
आक्रोश सांडला जेथे
जमिनीने छाती फाडुन
रेखांश आखला तेथे
जडशीळ नेत्र क्षितिजाला पाहून कुणी कळवळतो
संपृक्त वेदना होउन पाऊस कधीचा पडतो

....रसप....
१३ जुलै २०१४

Wednesday, July 02, 2014

कोणता आरोप बाकी राहिला माझ्यावरी ?

कोणता आरोप बाकी राहिला माझ्यावरी ?
कोर तोही भोग माझ्या रंगल्या भाळावरी

जेव्हढी झाली उधारी फिटव आता पावसा
कर तुझ्या शेतीस माझ्या आज तू नावावरी

कोरडी तर कोरडी पण भाकरी तर दे मला
पोट भरल्यावर सुचू दे ओळ दुष्काळावरी

भोवताली फक्त विक्रय चालतो बहुधा इथे
फूल कोमेजून जावे उमलल्या देठावरी

वेळ कातर, हृदय हळवे, जीवघेणी शांतता
सांजवेळी बांध फुटतो 'खुट्ट'ही झाल्यावरी

चांदणे ओतून सगळे फिकटलेला चंद्र मी
भाळली ना शर्वरी ना लाभली आसावरी

संपले आयुष्य पण ना समजले माझे मला
धावलो होतो कुणाच्या जन्मभर मागावरी ?

लपवताना आसवे आईस होते पाहिले
पाहिली नाही कधी मग वाहती गोदावरी

वाटले आयुष्य होते रुंद रस्त्यासारखे
आज कळले चालणे आहे जणू धाग्यावरी 

....रसप....
२ जुलै २०१४
Related Posts Plugin for WordPress, Blogger...