Saturday, June 29, 2013

'घनचक्कर' - A perfect Stress buster (Ghanchakkar - Movie Review)

सोमवार ते शुक्रवार (शनिवार), सकाळ ते संध्याकाळ (रात्र) तेच ते रूटीन असतं. अमुक वाजता उठा, तमुक वाजता ऑफिससाठी निघा, पोहोचा, मग पुन्हा अमुक वाजता निघा, तमुक वाजता घरी या आणि सकाळी पुन्हा अमुक वाजता उठायचं असतं म्हणून ढमुक वाजता डोळ्यांवर झोप ओढून घ्या. काही जण, किंबहुना बहुतेक जण ह्या त्याच त्या दिनक्रमाला जरा कंटाळतात आणि मग त्यातील काही चित्रपटप्रेमी सुटीच्या दिवशी मित्र-मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबासोबत किंवा एकट्यानेही 'स्ट्रेसबस्टर' साठी एखादा चित्रपट पाहातात. ह्या 'स्ट्रेसबस्टर'ची प्रत्येकाची व्याख्या निराळी. कुणाला 'डोक्याला शॉट' नको असतो, कुणाला काही तरी लॉजिकल हवं असतं, कुणाला 'आंबट' हवं असतं, कुणाला सेन्सिबल.. कुणाला गाणी, तर कुणाला कहाणी हवी असते.. कुणाला विशिष्ट नट/ नटी, तर कुणाला चांगला दिग्दर्शक, पटकथाकार..... वगैरे वगैरे. समजा असं सगळं सगळं एकाच चित्रपटात असेल तर ? Here is a flick, which has got the trick ! 'घनचक्कर; इज अ परफेक्ट 'स्ट्रेसबस्टर' !

थोडक्यात ष्टोरी अशी -
संजू (इम्रान हाश्मी) एक प्रतिष्ठित चोर असतो. प्रतिष्ठित म्हणजे किरकोळ हात न मारणारा. पुरेसा 'माल' कमवून झाल्यानंतर संजू आणि त्याची पत्नी नीतू (विद्या बालन) ठरवतात की, 'आता बस्स ! नो मोअर चोरी-चमारी, नो मोअर छक्के-पंजे.' But destiny has a different plan. पंडित (राजेश शर्मा - 'इश्क़िया' मधला 'कुक्कू') आणि इद्रिस (नमित दास - 'वेक अप सिड' मधला 'ऋषी') कडे एक प्लान असतो. बँक लुटायचा. त्यात त्यांना संजूची मदत हवी असते. हिस्सा असतो १० कोटी रु.!! '१० कोटी' ऐकल्यावर बायको म्हणते नवऱ्याला, 'मार एक आखिरी हाथ' आणि नवरा म्हणतो बायकोला, 'यह हुई ना दिल की बात !' संजू 'आखिरी हाथ' मारतो. प्लान यशस्वी होतो. भरपूर पैसा मिळतो. पण पैश्याची वाटणी, वातावरण थंडावल्यानंतर, म्हणजे साधारण ३ महिन्यांनतर करण्याचं ठरतं. पैसे सुरक्षित जागी लपवण्यासाठी संजूकडे दिले जातात. तो सुरक्षित, गुप्त जागी पैसे लपवतो. 
तीन महिन्यांनी पंडित आणि इद्रिस परततात, तोपर्यंत 'झोल' होतो. ('विजय' वाला नाही, 'गडबड'वाला.) एका अपघातात संजूला स्मृतिभ्रंश होतो. हा स्मृतिभ्रंश गजनीसारखा नसतो. जास्त विश्वसनीय असतो. त्याला काही गोष्टी आठवत असतात आणि काही नसतात. लक्षात असलेल्या गोष्टीही तो अधून-मधून, हळूहळू विसरत चालला असतो. आणि त्याने अंगावर गोंदवूनही ठेवलेलं नसतं. कारण आधी गोंदवायचं लक्षात राहिलं पाहिजे, मग गोंदवेपर्यंत लक्षात राहिलं पाहिजे आणि मग गोंदवलेलं पाहण्याचं लक्षात राहिलं पाहिजे ! 

पुढे काय होतं ?
पंडित-इद्रिस काय करतात ?
पैश्याचा छडा लागतो का ?
खरोखर 'झोल' झालेला असतो की ह्यातही काही 'गेम' असतो ? 
इत्यादीसाठी चित्रपट पाहा ! मी पैसे खर्च केले, तुम्हीही करा. इतकी ग्यारंटी देतो की पैसे वाया नक्कीच जाणार नाहीत. 



'आमिर', 'नो वन किल्ड जेसिका' मुळे राजकुमार गुप्ताकडून अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. 'घनचक्कर'मध्ये तो अपेक्षापूर्ती करतो. कहाणीवरील पकड कुठेच ढिली पडत नाही. संजूचा अपघात कसा झाला, त्याला कसं हॉस्पिटलमध्ये नेलं, डॉक्टरने ओढलेला चेहरा करून 'डोक्यावर आपटलाय' हे कसं सांगितलं, वगैरे अनावश्यक गोष्टी दाखवण्यात वेळ घालवला नाहीये. बिनकामाची गाणी घुसडलेली नाहीत. पात्रांचा फापटपसारा करून ठेवलेला नाही. बांडगुळासारखी उपकथानकं तर नाहीतच. मुद्द्याची गोष्ट, तीसुद्धा मस्त ! एकूणच कहाणीला त्याने हलकी फुलकी ट्रिटमेण्ट दिली आहे. प्रासंगिक आणि संवादातील अनेक विनोद थेटरात हशा पिकवतात. संजूचं हळूहळू अधिकाधिक विसरभोळं होत जाणं अतिशय सहज दाखवलं आहे. 

राजेश शर्मा हा एक ओम पुरी टाईप वाईट चेहऱ्याचा उत्कृष्ट अभिनेता आहे. त्याच्याकडे जबरदस्त टायमिंग आणि संवादफेक आहे, हे तो पुन्हा पुन्हा दाखवत राहातो. 

नमित दास सुरुवातीला 'टपोरी' म्हणून पटत नाही. कारण त्याच्या डोळ्यांत एक निरागसपणा जाणवतो, पण कहाणीच्या विनोदी हाताळणीमुळे तो हळूहळू 'इद्रिस' म्हणून फिट्ट होतो. तरी काही ठिकाणी त्याचं टायमिंग जरासं हुकतंच. ट्रेनमधील मिटींग्सच्या वेळी नेहमी भेटणाऱ्या एका माणसाच्या सोबतच्या त्याच्या ३-४ छोट्याश्या प्रसंगात विनोदनिर्मिती तशी फसलीच आहे.            

पंजाबी उच्चार आणि भक्कम अंगकाठीतून विद्या बालनने पंजाबी नीतू जबरदस्त उभी केली आहे. तिचं 'अतरंगी' फॅशन करणं लै भारी आहे ! खूप जाडी दिसत असली, तरी खूप सुंदरही दिसते आणि भूमिकेत घुसते. 

इम्रान हाश्मी 'डायन'नंतर पुन्हा एकदा अभिनय दाखवतो. त्याला फक्त तोंडच नसून, चेहराही आहे आणि त्यावर 'इतर'ही अनेक भाव तो सहजी उमटवू शकतो, हे त्याने स्वत:लाच अधूनमधून आठवून देत राहायला हवं. संजूची हताशा, निराशा तो ज्या सहजपणे रंगवतो, तितक्याच सहजतेने त्याच हताशे-निराशेतून विनोदनिर्मितीही करतो !

अमित त्रिवेदीचं संगीत श्रवणीय आहे. लेझी लॅड, घनचक्कर बाबू आणि अल्लाह मेहरबान ही तिन्ही गाणी ठेका धरायला लावतात आणि दिलखेचक आहेत. 

अनेक चक्करा मारून, वळणं घेणारा हा घनचक्कर वेगळ्याच शेवटामुळे मनाला अधिक पटतो. ३५ कोटींइतकी मोठी रक्कम पंडित-इद्रिस संजूकडे कसे काय देतात ? त्याचा अपघात झालेला त्यांना कळत कसं नाही ? ते त्याच्यावर नजर ठेवून नसतात की काय ? असे काही प्रश्न चित्रपट पाहाताना पडतात पण शेवटी सुटतात. 

बऱ्याच दिवसांनी एक उत्कंठावर्धक विनोदी चित्रपट आला का ? कुणास ठाऊक ! आपल्याला तर स्ट्रेसबस्टर हवा होता.... मिळाला !! 

रेटिंग - * * *१/२ 

Saturday, June 22, 2013

मार्केटमधला नवा 'मजनू' - रांझणा (Raanjhnaa - Movie Review)

एक असतो बनारसी पंडित. त्याचा मुलगा एका मुस्लिम मुलीच्या प्रेमात वेडा होतो. त्या मुलाच्या कहाणीवर एक होतकरू दिग्दर्शक चित्रपट काढायचं ठरवतो. त्या चित्रपटातून एक तमिळ सुपरस्टार हिंदीत आगमन करणार असतो. त्याच्या हिंदी उच्चारांवर मेहनत घेऊन त्याचा आणि स्वत:चा अजून एखाद्या चित्रपटासाठीचा वेळ वाया घालविण्यापेक्षा रोलच जरासा 'अ‍ॅडजस्ट' करू या की, असं ठरवलं जातं आणि कहाणी अशी बनते की - 'एक असतो 'तमिळ' पंडित. तो बनारसला 'प्रॅक्टिस' करत असतो. त्याचा मुलगा एका मुस्लिम मुलीच्या प्रेमात वेडा होतो आणि वगैरे वगैरे'

'बऱ्याच दिवसात मार्केटमध्ये नवा देव आला नाहीये', असा काहीसा संवाद 'OMG' मध्ये आहे. तो ऐकून दिग्दर्शकाची ट्युब पेटली असावी आणि जाणवलं असावं की बऱ्याच दिवसात मार्केटमध्ये नवा 'मजनू' आला नाहीये ! दोन-तीन चांगल्या दर्जाची ठिगळं जोडून एक कहाणी विणली गेली असावी. ही कहाणी ठिगळ बाय ठिगळ उलगडत जाते. सुरुवात होते बनारसमध्ये. तमिळनाडूतून येऊन बनारसमध्ये स्थिरस्थावर झालेल्या एका पंडिताचा द्वाड मुलगा 'कुंदन' (धनुष), बालपणापासूनच 'झोया' (सोनम कपूर)च्या प्रेमात असतो. बालवयातल्या ह्या प्रेमाला स्वत: कुंदन आणि झोयाच्या घरचे फारच सिरिअसली घेतात आणि शोप्याची रवानगी बनारसहून अलिगढ आणि नंतर पुढिल शिक्षणासाठी तिथून दिल्लीला होते.
८-९ वर्षांनी परतलेली झोया बदललेली असते. ती 'अक्रम' (अभय देओल) ची दीवानी झालेली असते. पण कुंदन बदललेला नसतो. तो अजूनही तिच्याच प्रेमात असतोच. मस्त प्रेमत्रिकोण बनतो. पण इतकी कहाणी उलगडते तरी अजून मध्यंतरसुद्धा झालेलं नसतं. आजपर्यंत किती प्रेमत्रिकोण आपण पाहिलेत, ह्याची गणतीसुद्धा अशक्य आहे. पण ही कहाणी केवळ प्रेमत्रिकोण नाहीये. पुढचं एक ठिगळ ह्या कहाणीला एक अनपेक्षित वळण देतं आणि चित्रपटाच्या शेवटापर्यंत ती 'कुठच्या कुठे' जाऊन पोहोचते !

पुढची दोन ठिगळं काय आहेत, हे चित्रपट बघूनच समजून घ्यावं. त्यासाठी फक्त सोनम कपूरला आणि मध्यंतरानंतरच्या धीम्या गतीने भरकटण्याला सहन करावं लागतं. बाकी तसं ह्या चित्रपटात काहीच 'असह्य' नक्कीच नाही.



कुंदनचा मित्र 'मुरारी' (अभिनेत्याचं नाव माहित नाही) जबरदस्त आहे. त्याचे वन लायनर्स हुकमी टाळ्या घेतात, हशा पिकवतात. त्याव्यतिरिक्तही संवाद बऱ्यापैकी खुसखुशीत आहेत. सगळ्याच सपोर्ट कास्टचं काम चोख झालं आहे. अभय देओलला तसं कमी काम असलं तरी त्याचा पडद्यावरचा वावर छाप सोडतोच आणि मुळात मुख्य भूमिकेतील 'धनुष' अगदीच पाप्याचं पितर असल्याने अभय लक्षात राहतो.
धनुषला पाहिल्यावर सुपरस्टार बनण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात, हे समजतं -
१. एखाद्या लार्जर दॅन लाईफ सुपरस्टारला मुलगी असली पाहिजे.
२. तिच्याशी तुमचं लग्न झालं पाहिजे.
बास्स ! झालात तुम्ही सुपरस्टार आणि त्यात हे प्रकरण दाक्षिणात्य असेल तर तुमचं येत्या काही दिवसांत सासऱ्याच्या बाजूला, रामासोबत हनुमानाचं असावं तसं मंदिरही बनू शकेल.
कारण, बाकी कुठलंही, सुपरस्टारच काय पडद्यावर झळकायच्या लायकीचंही लक्षण 'धनुष'मध्ये नाही. त्याची अंगकाठी इतकी बारकी आहे की राजपाल यादवची पर्सनालिटी भारी वाटावी. पंधरा थपडा मारणारी सोनम कपूरच होती म्हणून ठीक, बिपाशासारख्या भक्कम हिरविणीची एक थप्पडही ह्याचा डावा गाल उजवीकडे नेऊ शकेल, असं त्याला पाहून वाटतं. अभिनय म्हणावा, तर 'कुंदन'च्या व्यक्तीरेखेतच दम आहे. त्यात त्याने काही विशेष जीव ओतलाय, अश्यातला भागच नाही. त्याच्याकडे स्टाईल नाही, चेहरा नाही, अंगकाठी नाही, नृत्यकौशल्य नाही; तरी तो हीरो बनला आहे, ही गोष्ट अनेक सडकछाप रोमिओंचं मनोबल निश्चितच उंचावू शकेल.

शोसाठी घरून निघताना, जरासा वेळ होता म्हणून सहज टीव्ही लावला होता तर एका वाहिनीवर दिग्दर्शक आनंद रायची छोटीशी मुलाखत चालू होती. तो सतत 'धनुष सर, धनुष सर' म्हणत होता. दया आली.

'जब तक हैं जान' नंतर नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या रहमानच्या चाहत्यांना रहमान जरासा(च) दिलासा 'रांझणा'तून देतो. 'तुम तक' ही कव्वाली तर मस्तच बनली आहे.

एकंदरीत एकदा(च) पाहण्यास हरकत नसावी, असा हा चित्रपट मी आजपर्यंत पाहिलेल्या सगळ्यात मरतुकड्या सुपरस्टारला हिंदीत आणतो आहे. इथल्या बलदंड बैलांच्या गर्दीत, हे कुपोषित कोकरू टिकेल का हे काळच सांगेल !!

रेटिंग - * * १/२          

Wednesday, June 19, 2013

कंटाळ्याचाही कंटाळा !

कधी तरी दु:खांनो माझेही घर टाळा
आता आला कंटाळ्याचाही कंटाळा

जळी स्थळी काष्ठी पाषाणी तुलाच बघणे
खिन्न मनाला सुन्न क्षणी हा सुचतो चाळा

एक दिवस नोकरी अचानक जेव्हा सुटली
छोट्या शिक्षा करणारी आठवली शाळा

जे म्हटले ना कळले, जे कळले ना म्हटले
नजर भिडवली नजरेला अन् हा घोटाळा ?

एकाही शेरातुन जेव्हा निघेल ज्वाला
तेव्हा माझ्या अवशेषांना खुशाल जाळा..

अर्धे खेळुन झाल्यावरती नियम बदलता
खेळातून मला ह्या देवा कृपया गाळा

एकदाच मी हवे तसे रस्त्यास वळवले
पुन्हा पुन्हा वळण्याला त्याच्या बसला आळा

शेर विठ्ठलाबद्दल होता, त्याचा नव्हता
तरी 'जितू' लोकांस दिसे माझ्यातच 'काळा'

....रसप....
१९ जून २०१३

-----------------------------------------------

अर्धे खेळुन झाल्यावरती नियम बदलता
देवा, तुमचा डाव रडीचा तुम्हीच खेळा

....रसप....

Saturday, June 15, 2013

पाऊस आवडत नाही

पाऊस आवडत नाही
तो मनास भिजवत नाही

सगळ्यांनी रस्ता धरला
दु:खाचे उरकत नाही

ती स्पष्टच 'नाही' म्हणते
पण मलाच समजत नाही !

मैफल रंगत नसताना
अर्ध्यातुन उठवत नाही

मी शेर मांडला नव्हता
टाळ्यांना समजत नाही

ती अशी पाहते मजला
की स्वत:स पाहत नाही

बन देव, दगड वा श्वापद
माणुसपण सोसत नाही

....रसप....
१४ जून २०१३

Thursday, June 13, 2013

आठवणींची साठवण (अक्षरांचा अक्षर मेळावा, पुणे - ९ जून २०१३ - 'वृत्तांत')

'म. क. स.'च्या 'अक्षरांचा अक्षर मेळावा, पुणे' च्या रंगण्याला फार आधीपासून सुरुवात झाली होती. मेळाव्याची घोषणा झाल्यापासूनच ! समूहावर '९ जून' जाहीर झालं आणि अनेक लोकांनी कॅलेण्डरवर फुल्या मारून ठेवल्या. रोज त्या घोषणेच्या धाग्यावर कुणी ना कुणी तरी स्वत:च्या ओसंडणाऱ्या उत्साहास वाट करून देत होतं आणि अजून काही जणांच्या उत्साहात भर घालत होतं.
माझ्या बाबतीत म्हणाल, तर आठवड्याभरापूर्वीच 'लडाख'वारीसाठी ८ दिवस सुट्टी झालेली असल्याने आणि आम्ही निजामाच्या राज्यात असल्याने (शुक्रवार सुट्टी, शनि-रवि चालू !) कॅलेण्डरवर फुली मारणं खरं तर नकोसं वाटत होतं. पण रोज, अक्षरश: रोज, किमान एक जण तरी फोन करून किंवा चॅटवर विचारणा करत होतं - 'येणार आहेस ना ?' अनेक नवीन नावं धाग्यावर वाचली होती त्यामुळे सर्वांना भेटण्याचं एक वेगळंच औत्सुक्य होतं. एक मन म्हणत होतं, 'नको !!' आणि दुसरं मन म्हणत होतं, 'आत्ता नाही तर कधी ?'
शेवटी दुसऱ्या मनाला झुकतं माप मिळालं आणि अगदी आदल्या दिवशी सुट्टी टाकून कार्यक्रमाला जायचा निर्णय घेतला आणि रात्री उशीरा पुण्यात पोहोचलो.
सकाळी सभागृहात पोहोचलो. कार्यक्रम सुरु होईपर्यंत अनेक लोकांची पहिली भेट घडली. सगळे चेहरे ताजे आणि टवटवीत दिसत होते. मेळावा सुरु होण्याआधीच वाढती गर्दी यशाची हमी देत होती. 'विशाल सह्याद्री'च्या प्रवेशद्वारापासून उत्साहाचे पाट वाहात स्वारगेटपर्यंत एव्हाना पोहोचले असावेत. अत्यंत समर्पकपणे, सोहळ्याची सुरुवात 'ट्वेंटी फोर सेव्हन' उत्साहाने फसफसणाऱ्या मुंबापुरीने केली.

आम्ही मुंबईकर :

'मुंबई टीम' - शिवाजी सावंत, उमेश वैद्य, वैशाली शेंबेकर, बागेश्री देशमुख आणि मनीषा सिलम - ने व्यासपिठाचा ताबा घेतला. मुंबईचा पाऊस छत्र्या, रेनकोट आणि छपरांनाही भेदून तुम्हाला कसा भिजवतो, ह्याचा एक प्रत्यय त्यांनी पावसाच्या विविधरंगी, विविधढंगी कविता, कधी सादर करून, तर कधी गाऊन; उपस्थितांना मोबाईल, लॅपटॉप, मित्र आणि अगदी बायका-पोरांतूनही बाहेर काढून, काव्यसरींत चिंब भिजवून दिला. वैशाली शेंबेकर ह्यांनी अत्यंत व्यावसायिक सफाईने आणि ओघवते सूत्रसंचालन केले. सगळ्यांचा आपसांतला समन्वय वाखाणण्याजोगा होता. एकामागून एक कविता, मुंबईच्या सागराच्या लाटांप्रमाणे एका विशिष्ट लयीत येत होत्या. कुठेही घाई-गडबड नव्हती. शिवाजी सावंत ह्यांचं काव्यगायन, उमेश वैद्य ह्यांचं संयत भावपूर्ण सादरीकरण, वैशाली शेंबेकर ह्यांचे स्पष्ट उच्चार व खणखणीत आवाज, बागेश्रीचा हळुवार व 'जरासा 'हस्की' आवाज आणि मनीषा सिलम ह्यांचा एखाद्या सुरेल गायिकेसारखा गोड आवाज; अशी प्रत्येकाची एक वेगळी शैली मला जाणवली. शिवाजी सावंत ह्यांनी गाऊन सादर केलेलं आणि सहकाऱ्यांनी 'कोरस' दिलेलं एक बालगीत, उमेश वैद्य आणि बागेश्रीने जोडीने सादर केलेल्या दोन कविता आणि बागेश्रीची 'सुख दरवाज्यावर आलं'वाली कविता मला प्रचंड आवडल्या.

प्रकाशली 'प्रिया' :

एका अतिशय आटोपशीर व मनोरंजक कार्यक्रमानंतर सोहळ्याच्या पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली. रमेश ठोंबरे ह्यांच्या 'प्रियेचे अभंग' ह्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीधर जहागिरदार, ज्यांच्या शुभहस्ते प्रकाशन होणार होतं त्या क्रांति ताई आणि विशेष अतिथी म्हणून सारंगदा कवी रमेश ठोंबरे ह्यांच्यासह विराजमान झाले. सूत्र संचालनाची जबाबदारी अस्मादिकांना देण्यात आली होती. सुरुवातीलाच रमेशने, ह्या पुस्तकात समाविष्ट असलेले काही 'प्रियेचे श्लोक' सादर केले. त्या खुसखुशीत श्लोकांनी प्रेक्षकांत पुन्हा पुन्हा हशा पिकवला ! पुस्तकाच्या प्रतींचे अनावरण करून क्रांति ताईंनी अधिकृतरित्या प्रकाशन केले आणि त्यानंतर सारंगदाने 'कवी रमेश ठोंबरे' काय चीज आहे, ह्याची थोडक्यात ओळख करून दिली. त्याकरिता त्याने रमेशच्या ब्लॉगवरील इतर कविता आणि त्याचा आगामी कविता संग्रह 'महात्म्याच्या देशात' मधील कविता तुकड्यांत सादर केल्या. क्रांति ताईंनी 'प्रियेचे अभंग' वर अत्यंत मार्मिक विचार मांडले. संपूर्ण पुस्तकात राखलेला एक विशिष्ट दर्जा त्यांना खूप भावल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. स्वत:च्या मनोगतात रमेशने त्याला कशा कविता आवडतात, हे सांगताना अनेक उपस्थितांच्या मनातली गोष्ट मांडली. - 'एकदा वाचून जी कविता अजिबात समजत नाही, तिला मी पुन्हा पुन्हा वाचत नाही.'
ह्या सोहळ्यादरम्यान क्रांति ताई व श्री. काकांनी, 'समूहाच्या मेळाव्यांत समूह सदस्यांसाठी पुस्तक प्रकाशनाकरिता व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल', असे जाहीर करून मराठी कवी व कविता ह्यांच्या विकासासाठी व अधिकाधिक लोकाभिमुखतेसाठी संचालक मंडळ कटिबद्ध असल्याचे दाखवून दिले.

इंदौर का जोर :

आत्तापर्यंत इंदूरहून आलेले वरिष्ठ कविमित्र पुढील कार्यक्रमासाठी सज्ज झाले होते. व्यासपीठावर सुधीर बापट, अलकनंदा साने, अर्चना शेवडे, सुषमा अवधूत स्थानापन्न झाले. अलकनंदा साने ह्यांनी सूत्रसंचालन केले. प्रस्तावनेत त्यांनी 'बृहन्महाराष्ट्रीय' असे म्हणवले जात असल्याची व्यथा मांडली. खूप भिडलं त्यांचं बोलणं. पण मनात आलं, मराठी माणसाने भौगोलिक एकात्मतेलाही छेदून कोकणी, पश्चिम महाराष्ट्रीय, खान्देशी, वैदर्भीय असे आपणच आपले तुकडे पाडले आहेत. काय करणार ! असो. सादरीकरणास सुरुवात झाली आणि इंदूरकरांनी जादू करण्यास चालू केले ! एकेका कवितेनिशी उपस्थित असे काही रंगत होते जणु ते स्वत:सुद्धा व्यासपीठावर असावेत. (माझा तरी असाच अनुभव होता !) सर्वांच्याच कविता खास होत्या. अर्चना शेवडे ह्यांच्या सुरेल काव्यगायनाने मैफलीत सुंदर रंग भरला. अलकनंदा साने ह्यांची द्विपदी संरचनेतील गझलेप्रमाणे कवाफी पाळलेली एक रचना (सॉरी.... मी लिहून घेतले नव्हते आणि आता काही केल्या ती कविता आठवत नाही. आठवलं की लिहीनच.) आणि सुधीर बापट ह्यांच्या चारोळ्या अप्रतिमच होत्या. बऱ्याच दिवसांनी 'चारोळी' हा प्रकार मला आवडला. नाही तर आजकाल 'चारोळी' ह्या नावाखाली चार-चार ओळींच्या ज्या जुड्या बांधल्या जातात, त्या वाचणे तर मी बंद केलेच आहे, पण त्यामुळे बासुंदीतली चारोळीही नकोशी झालीय !! अर्चना शेवडे आणि सुषमा अवधूत ह्यांच्या कवितांशी माझी नवीन ओळख झाली. त्यांच्या कविताही खूप ताकदीच्या होत्या. अलकनंदा साने आणि सुषमा अवधूत ह्यांची पुस्तकंही मला मिळाली आहेत त्यामुळे त्यांच्या रचनांचा अधिक आस्वाद मी घेईनच.

पोटोबा !! - 

This much was more than enough for starters ! त्यामुळे आता सर्वांना जेवणाची आठवण झाली होती. घड्याळही तेच खुणावत होते. पण अजून 'मांडणी' होत होती. त्यामुळे पुढील सत्राची सुरुवात करून घ्यावी असा विचार केला गेला आणि आता कवितांचं 'जॅमिंग सेशन' रंगणार होतं. विनायकने सर्वांना गोलाकार खुर्च्या मांडून बसण्यास सांगितले. पण लोक इतके होते की त्या गोलाचा व्यास हॉलमध्ये मावेना ! शेवटी गोलाच्या आत अजून एक अर्धगोल करून सगळे स्थिरस्थावर झाले. सत्राची सुरुवात अशोक काकांनी केली. त्यांनी त्यांचे एक रेकॉर्डेड गीत, जे त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'तुझी आठवण' ह्या संग्रहातदेखील समाविष्ट आहे, मोबाईलवरून सर्वांना ऐकवले. त्यानंतर निशिकांत देशपांडे काकांनी एक सुंदर गझल सादर केली.
जेवणाची तयारी झाली होती त्यामुळे इथे एक 'ब्रेक' घेण्यात आला. मंडळींनी स्वादिष्ट पुणेकरी जेवणावर यथेच्छ ताव मारला. 'लंच ब्रेक' हा गप्पांसाठी एक सुवर्णसंधी असतो. त्यामुळे मघाशी महत्प्रयासाने मांडलेली आसनव्यवस्था नकळतच बदलली गेली आणि आता लोक छोटे छोटे ग्रुप करून बसले होते. कुणी प्रत्येक ग्रुपपाशी जाऊन ओळखपाळख करून घेत होते, इंदूर व मुंबई संघांच्या सादरकर्त्यांचे अभिनंदन करत होते, तर कुणी 'कुठली कविता सादर करायची' हे आधी ठरवून घेत होते.  


'जॅमिंग सेशन' - 

भरल्या पोटी कविजनांना अधिकच जोर चढला आणि 'जॅमिंग सेशन' पुढे सुरु झाले. ज्यांचे स्वतंत्र कार्यक्रम होते, त्यांच्याव्यतिरिक्त सर्वांनी 'जॅमिंग सेशन'मध्ये कविता सादर केल्या. म्हणजे साधारण २५-३० जण तरी असतील. मला आठवतात ती नावं मी इथे देतो.

१. प्रसन्ना जोशी
२. अनिल आठलेकर
३. गोविंद नाईक
४. उमेश मुरुमकर
५. सचिन कुलकर्णी
६. अजित परळकर
७. अमेय पंडित
८. श्वेता रानडे
९. वर्षा बेन्डीगेरी कुलकर्णी
१०. मीना त्रिवेदी
११. मयुरेश साने
१२. स्वाती शेंबेकर
१३. अलका गांधी आसेरकर
१४. सुनीती साने कोपरकर
१५. चंद्र बंडमंत्री
१६. विशाल कुलकर्णी
१७. डॉ. कैलास गायकवाड
१८. आनंद पेंढारकर
१९. शिरीन अर्श
२०. उमेश कोठीकर
२१. उमेश मुरुमकरची मैत्रीण
२२. माधुरी  गयावळ

काही नावं सुटली असल्याचा मला दाट संशय आहे, तसे झाल्यास क्षमा करावी.
एकानंतर एक सुंदर सुंदर कविता आणि सादर करणारे बहुतेक जण पहिल्यांदाच भेटत असल्याने कुणी काय सादर केलं, हे टिपून घ्यायचं भान खरं तर कुणालाच राहिलं नाही. त्यामुळे मी विनंती करतो की, प्रत्येकाने स्वत:च इथे, प्रतिसादात आपण सादर केलेली कविता डकवावी.
ह्या सत्रात सचिन कुलकर्णी अर्थात कवी श्रीकुल आणि मयुरेश साने ह्यांचे सादरीकरण अफलातून होते. कवी श्रीकुल ह्यांच्या पावसावरील कवितेमुळे तर उपस्थित प्रत्येक जण अक्षरश: हेलावला. कविता सादर करताना स्वत: कवी 'काव्य' कसा होतो, हे त्यांना पाहून समजलं. मयुरेशने आधी ज्येष्ठ कवी श्री. वा. न. सरदेसाई ह्यांच्या एका पावसावरील कवितेला सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले आणि मग रसिकांच्या आग्रहास्तव स्वत:चीही पावसावरील एक ताजी ताजी कविता केली. मयुरेशचे सादरीकरण म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव होता. दोन्ही कविता त्याने अश्या काही सादर केल्या की जणू त्या मूर्त स्वरूपात स्वत:च समोर उभ्या होत्या!
वेळेअभावी उपस्थित संचालक - विनायक, क्रांति ताई, सोनम, रमेश आणि श्री. काकांनी ह्या 'जॅमिंग सेशन' मधून स्वत:ला वगळले. अन्यथा हा हे सत्र झाल्यावर लगेच कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला असता कारण कवितांची जादू वेळेवर होत असली तरी घड्याळावर होत नव्हती !!

पुणे, नसे उणे -

दुसऱ्या सत्राचा आणि अर्थातच मेळाव्याचाही समारोपाचा कार्यक्रम पुणे चमूने करायचा होता. प्राजक्ता पटवर्धन, मनीषा नाईक, नचिकेत जोशी, भूषण कटककर अर्थात 'बेफिकीर', सुप्रिया जाधव आणि वैभव कुलकर्णी ह्यांचा गझल मुशायरा सुरू झाला. आत्तापर्यंत अत्यंत उच्च पातळी राखलेला हा कार्यक्रम त्याच पातळीवर किंवा त्याहूनही वर नेऊन समाप्त करायचे आव्हान त्यांच्यासमोर होते आणि ते त्यांनी अप्रतिमरित्या पेलले. एकेक गझल रसिकांकडून खुली दाद मिळवत होती आणि ही मैफल शेवटाकडे अधिकाधिक रंगत चालली होती. वैभव कुलकर्णीने 'माझे हे पहिलेच सादरीकरण आहे' ह्याची सुरुवातीसच कबुली दिली आणि लोक काहीही म्हणोत, किमान पहिल्या गझलेच्या वेळी तरी ते स्पष्टपणे जाणवले. ती गझल त्यामुळे रसिकांपर्यंत कमी पोहोचली पण दुसऱ्या गझलेच्या सादरीकरणात वैभवने उपस्थितांना असं काही खूश केले की प्रत्येक शेर त्याला 'वन्स मोअर' मुळे दोनदोन वेळा सादर करावा लागला. नचिकेत जोशी ह्यांनी सूत्र संचालन केले, पण त्यांनी तो भाग अगदी औपचारिकच ठेवला होता. त्यांच्या स्वत:च्या आणि सुप्रिया जाधव ह्यांच्या गझला रसिकांनी खूप उचलून धरल्या. प्राजक्ता पटवर्धन आणि मनीषा नाईक ह्यांनीही मैफलीचा रंग कुठेही ओसरू न देता आपापल्या गझला ताकदीनिशी सादर केल्या. पाच जणांच्या प्रत्येकी दोन गझला सादर झाल्यावर मुशायऱ्याचा समारोप करण्यासाठी नचिकेत जोशी ह्यांनी 'बेफिकीर' ह्यांच्याकडे सूत्रं सोपवली. हातात माईक आल्याबरोबर बेफ़ीजींनी उशीरा आल्याबद्दल माफी मागून उपस्थितांचे मन जिंकले. (मी तर मनातल्या मनात व्यासपीठावरील सर्वांनाच उशीरा आल्याबद्दल माफ करून टाकले ! - अपवाद वैवकु. तो एकटाच पहिल्यापासून आला होता.) बेफीजींनी आजचे अनेक नवोदित गझलकार त्यांना का मानतात, ह्याचे प्रात्यक्षिक एकेका शेरातून देण्यास सुरुवात केली. आत्तापर्यंतचा मुशायरा एकीकडे होता आणि हे सादरीकरण एकीकडे होतं !! प्रत्येक शेर काळजात घुसत होता, उपस्थितांना छलनी-छलनी करत होता. दोन गझला सादर झाल्या, पण कुणाचेच समाधान झाले नाही आणि लोकांच्या आग्रही विनंतीस मान देऊन त्यांनी आणखी दोन गझला सादर केल्या. त्यांच्या गझला मोठ्या बहराच्या होत्या आणि धारदार टोकांच्या होत्या ! माहोल गझलमय झाला आणि अखेरीस घड्याळाचा काटा ठरलेल्या वेळेच्याही पुढे सरकल्याने नाईलाजास्तव थांबावे लागले.

आठवणींची साठवण - 
 
विशाल सह्याद्री दुमदुमले होते, दरवळले होते, गुणगुणले होते, बागडले होते आणि मुसमुसलेही होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेकविध रंगांची मनसोक्त उधळण झाली होती. बाहेर पडणारा प्रत्येक जण काव्यसरींत चिंब झाला होताच, पण काही थेंब मनात, ओठांवर, डोळ्यांत, ओंजळीत ठेवून घेऊन बाहेर येत होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कृतकृत्य झाल्याचा भाव होता. एक मंतरलेला दिवस सरला होता आणि मागे उरल्या होत्या अनेक पाऊलखुणा, त्या लोकांच्या ज्यांच्या फक्त शब्दखुणा आजवर अनुभवल्या होत्या.
'पुन्हा भेटूच' असा दिलासा नव्हे तर आश्वासन प्रत्येक जण स्वत:लाच देत होता आणि आनंदी मन व जड पावलांनी परतत होता................
 
खास ह्या मेळाव्यासाठी अमेय पंडित दिल्लीहून तर प्रसन्न जोशी बंगलोरहून आले होते. इंदूरहूनही मंडळी आली होती. माझ्या मते ही ह्या मेळाव्याची खरी कमाई होती. एका अनौपचारिक व हौशी कार्यक्रमासाठी लोक आवर्जून इतक्या लांबवरून येतात, ह्यातून त्यांच्या Passion चं दर्शन होतं. ह्या सर्व मंडळींचे आभार मानावेत, कौतुक करावे की कृतज्ञतेने त्यांना वंदन करावे की सगळंच ?  


....रसप....

Tuesday, June 11, 2013

बाहुला झपाटलेला, प्रेक्षक झोपाळलेला ! (Zapatlela 2 - Marathi Movie Review)

लोक उगाच म्हणतात की चित्रपटातून आपण नको ते उचलतो. खरं तर चित्रपट आपल्यातून हवं ते उचलतात. 'घरी कुणी तरी जेवायला येणार' म्हटल्यावर आजकाल काही लोक बाजारात 'रेडीमेड' काय मिळतं ते आधी पाहातात. अर्ध्या तासात घरपोच पिझ्झा मिळायचा हा जमाना आहे. त्याव्यतिरिक्त इडलीपासून बटर चिकनपर्यंत आणि पॉपकॉर्नपासून चिकन लॉलीपॉपपर्यंत स ग ळं 'फक्त पाण्यात मिसळलं/ उकळलं/ भाजलं/ तळलं की तयार' असं उपलब्ध आहे आणि जे पदार्थ असे सहज शक्य नाहीत, ते हळूहळू 'गायब' होत आहेत. तसंच बाजारात उपलब्ध असलेल्या एखाद्या स्वयंसिद्ध फॉर्म्युलाला पुन्हा पुन्हा सादर करणं किंवा जुन्याच एखाद्या चित्रपटाचा पुढचा भाग बनवणं, हा चित्रपटाने निवडलेला 'शॉर्ट कट' आहे, आपल्याकडूनच शिकलेला ! एका दिवसात पटकथा आणि संवाद तयार, दोन दिवसात कास्टिंग फायनल, आठवड्याभरात लोकेशन्स, सेट्स तयार आणि २ महिन्यात चित्रपट तयार आणि एक राहिलंच अर्ध्या तासात संगीतही तयार - असे चित्रपट बनत असावेत असं काहीसं काही चित्रपट पाहिल्यावर वाटतं. पण असे चित्रपट तिकीटबारीवर चांगला गल्ला जमवतानाही दिसतात, त्यामुळे हा 'दोष ना कुणाचा '! आपण तसे, म्हणून आपले चित्रपटही तसेच असा विचार करायचा !
महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डेच्या सुप्परहिट्ट जोडीचा नव्वदच्या दशकातील सुप्परहिट्ट 'झपाटलेला'चा दुसरा भाग असाच कामचुकार गृहिणीच्या स्वयंपाकाप्रमाणे आहे.    

मागील भागात दोन भुवयांच्या बरोब्बर मध्ये साध्या रिव्हॉल्वरने अचूक नेम साधून इन्स्पेक्टर महेश जाधवने भारताच्या अनेक नेमबाजपटूंना लाजवलं होतं (त्यानंतरच भारताला नेमबाजीत पदकं मिळायला लागली का ?) आणि 'तात्या विंचू'चा खातमा केला होता हे तुम्हाला लक्षात असेलच. आता हा इन्स्पेक्टर जाधव कमिशनर झाला आहे. पण अजूनही हातावर मूठ आपटून 'डॅम ईट' चालू आहे and why not ? तात्या परतला आहे ! का ? कशासाठी ? ते असो. मनुष्यदेह प्राप्त करण्यासाठी त्याला पुन्हा 'लक्ष्या'चा शोध आहे. पण लक्ष्या आता जिवंत नाही. मग ? कायद्यातील पळवाटेप्रमाणे मृत्युंजय मंत्रातही एक पळवाट आहे. 'बाप नाही, तर पोराला धर.' म्हणून हा तात्या, लक्ष्याचा पोरगा आदित्य (आदिनाथ कोठारे) च्या मागावर आहे.
पुढे काय होतं, होणार आहे ते सांगून काहीही उपयोग नाही. कारण ते इतकं बुळबुळीत आहे की सांगता सांगताही घसरायला होईल.


एकंदरीत पटकथा तर इतकी लंगडी आहे की फक्त तात्या आणि आदित्य ही दोनच पात्रंही चालली असती चित्रपटात. पण मरतुकड्या कथे-पटकथेला वजन येण्यासाठी मकरंद अनासपुरे (बोलक्या बाहुल्यांचे खेळ करणारा कलाकार म्हणून), सई ताम्हणकर (टिव्ही रिपोर्टर), सोनाली कुलकर्णी ज्यु. (तमाश्यात नाचणार्‍या बाईची सुशिक्षित नाचरी पोर) अश्या काही काही वजनदार नावांची स्टारकास्ट आहे. मधु कांबीकर आदित्यच्या आजीची (आधीच्या भागात लक्ष्याची आई) भूमिका करतात आणि आधी म्हटल्याप्रमाणे महेश कोठारे 'डॅम ईट' करतात. ह्या सर्वांचं अवतारकार्य ह्या दोन ओळींत जितकं लिहिलं तितकंच आहे.

ओव्हर अ‍ॅक्टिंगसाठी जर एखादा पुरस्कार असेल, तर सो. कु. ज्यु. पेक्षा आदिनाथ कोठारे आणि मधु कांबीकर त्यासाठी जास्त लायक आहेत. आदिनाथ कोठारे वडिलांकडूनही जरासा अभिनय शिकू शकतो, असं म्हणावंसं वाटतं, इतका 'होपलेस' आहे. काही फ्रेम्समधला मक्या वगळला, तर पडद्यावर अभिनय म्हणून बाकी जे काही दाखवलं आहे ते निव्वळ 'बं ड ल' आहे. कुठल्याच प्रसंगात प्रेक्षक पडद्यावरील पात्राशी नातं जोडूच शकत नाही.

अवधूत गुप्ते ह्यांचं संगीत इतरांच्या फुसक्या कामाला साजेसं आहे. शीर्षक गीताची लावणी कैच्याकै गंडली आहे. ऑक्टेव्ह्जशी खेळ करावा तर तो बाळासाहेबांनीच, हे त्या गाण्यामुळे पटतं. 'मदनिके' गाणं बरं आहे. बाकी यथा तथाच.

सपक संवाद आणि केविलवाणी विनोदनिर्मिती चित्रपटाला हास्यास्पद करतात.
अख्खा चित्रपटभर दिलीप प्रभावळकर (तात्या विंचूचा आवाज) वगळता प्रत्येक जण 'जत्रा' मधील 'ज' 'जहाजा'चा उच्चारतो. पण आजकाल ह्यावर बोलणं म्हणजे मूर्खपणा असतो. कारण 'भावना पोहोचल्या ना? मग !' असा उलट प्रश्न होतो. आणि असंही अख्खा चित्रपट पांचटपणा आणि मूर्खपणाचा बाजार असल्यावर ह्या चुका तर अगदीच किरकोळ म्हणायला हव्या.

ह्या चित्रपटाची प्रसिद्धी 'पहिला मराठी थ्रीडी चित्रपट' म्हणून करण्यात आली, ते अगदी योग्य आहे. कारण चित्रपटाचा हा एकमेव 'यू. एस. पी.' आहे. हॅरी पॉटरचा शेवटचा भाग मी थ्रीडीत पाहिला होता. पण थ्रीडीची मजा मला तरी 'झपाटलेला - २' मध्ये जास्त आली. किमान ६-७ वेळा मी व आजूबाजूचे लोक व्यवस्थित दचकलो. अनेक कॅमेरा अँगल्स 'थ्रीडी'चा विचार करून प्रयत्नपूर्वक साधले असल्याचे जाणवते. ह्या एका गोष्टीसाठी चित्रपटकर्त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.

थोडक्यात, हा 'झपाटलेला - २' पाहाताना प्रेक्षकाचा 'झोपाळलेला' होतो पण तितक्यात थ्रीडीमध्ये काही तरी अंगावर येऊन तो दचकून जागा होतो आणि इच्छा नसताना अख्खा चित्रपट पाहावा लागतो.

रेटिंग - * (केवळ थ्रीडी साठी.)   

Monday, June 10, 2013

लडाख

पर्वतरांगा
तुझ्याच सार्‍या
तुझी पठारे
तुझ्याच सरिता
वाळवंटही

तूच पसरल्या
शिखरांपासुन
पायथ्यांपुढे
शुभ्र हिमाच्या
अनंत शाली

धरणी भिडते
आकाशाला
असा अनोखा
संगमसुद्धा
तूच घडवला

वैविध्याचे
आश्चर्यांचे
अथांगतेचे
अनंततेचे
असे प्रदर्शन
कधी न दिसले

परंतु येथे
विशालतेच्या
परिसीमेला
मानवतेची
चाहुल नाही

असे भयंकर
रूप तुझे तर
कसे असावे
दानवतेचे
भीषण दर्शन ?

जेव्हा येतो
तुझ्या रुपाने
समोर मृत्यू
तुझ्याच निश्चल
शांतपणाने,
कशी तुझी ही
भीती झटकुन
पुन्हा एकदा
मनात माझ्या
विशुद्ध श्रद्धा
भरून यावी
आणि जुळावे
कर हे दोन्ही
निव्वळ, अस्सल
प्रेमापोटी ?

माझ्यामधल्या
तुझ्याच एका
ह्या अंशाला
सांग तुझ्या ह्या
विशालतेतुन
शोधुन काढुन
तूच स्वत:ला..!

....रसप....
८ जून २०१३

Tuesday, June 04, 2013

साडे अठरा हजार फूटांवरचं एक फूट....... !! (Unforgettable Ladakh)

'सुमूर' गावातली मॉनेस्ट्री पाहून आमची क्वालीस डिस्किट नदीच्या आजूबाजूच्या रेताड वाळवंटातून काढलेल्या डांबरी रस्त्याने कॅम्पकडे निघाली. आमचा रस्ता पर्वतातून उतरला होता आणि पर्वताकडेच चालला होता. ह्या मधल्या काही किलोमीटरच्या पट्ट्यात डिस्किट नदी आणि तिचं वाळवंट.

दुरून, ह्या रस्त्यावर उतरण्याआधी आम्हाला वाटत होतं की हवा ढगाळ आहे. समोरच्या पर्वतावर ढग उतरले आहेत आणि म्हणून तो अतिप्रचंड पर्वत लपला आहे. पण रस्त्यावर येताच जाणवलं की इथे वादळसदृश हवा वाहत आहे. हवेत रेती इतकी उंच उडत आहे की तिने पर्वताला स्वत:ची चादर पांघरली आहे. गाडी दमदार होती, ड्रायव्हर 'दोर्जे' तरबेज होता आणि रस्ता फार लांबचा नव्हता, त्यामुळे आम्ही कुठलाही त्रास न होता समोरच्या पर्वतावर पोहोचलो आणि उंचीवरून त्या घो-घो हवेला न्याहाळू लागलो. गंमत वाटत होती. एकीकडे उंचच उंच पर्वतरांगा. त्यांच्या डोक्यावर बर्फ आणि त्यांच्या पुढ्यात रेती ! पण लडाख असंच आहे.


संध्याकाळी ४:३० - ५:०० च्या आसपास आम्ही 'नुब्रा' व्हॅलीतल्या 'हंडर' गावातल्या आमच्या कॅम्पमध्ये पोहोचलो. आमचा कॅम्प एका डोंगराच्या पायथ्याशी होता. फार उंच डोंगर नव्हता. हजार एक फुटांचा सलग दगडच म्हणा हवा तर. पण त्याच्या बाजूला आणि मागे काही अंतर सोडून मोठे मोठे पर्वत होते. लडाखमध्ये पर्वतांच्या रांगांमागे रांगा असतात. नजर थिजते पण रांगा संपत नाहीत. कॅम्पच्या मधून एक चार-पाच फूट रुंदीचा झुळझुळ ओहोळ वाहात होता. त्या, मागल्या बाजूला असलेल्या उंच पर्वताच्या शिखरावर पोह्यांवर खोबरं भुरभुरावं तसं बर्फ होतं. हे पाणी त्या पर्वतातूनच वाहात येत ह्या कॅम्पचे दोन भाग करत होतं. पाण्याच्या दोन्ही बाजूंना, एका रांगेत वॉटरप्रुफ तंबू होते.


रात्री साधारण ८:०० वाजल्यापासून नुब्रामध्ये पावसाने हजेरी लावली. रिमझिम रिमझिम, टिपटिप टिपटिप रात्रभर सुरूच होतं. संध्याकाळच्या वादळानंतर हवा पूर्णपणे बदलली होती. पावसामुळे थंडी अधिकच बोचरी झाली होती. ४-५ अंशाच्या आसपास तापमान असावं. दात वाजवणारी थंडी होती, तरी त्या तंबूंत पांघरुणाची व्यवस्था अतिशय उबदार होती. जाडजूड पश्मीना दुलयांच्या आत शिरल्यावर बाहेर निघावंसंच वाटत नव्हतं. पण रात्रभर तंबूवर पडणाऱ्या थेंबांनी शांतता लाभू दिली नाही आणि झोपही लागू दिली नाही.

सकाळी ७:०० वाजताच आम्ही सगळे उठून निघायची तयारी करायला लागलो. लेहकडे परतण्याच्या रस्त्याचा खर्दुंग घाटातला ३० एक कि.मी. रस्ता खूपच खराब होता. म्हणून लौकर निघावं असा आम्ही विचार केला होता. पण दोर्जे म्हणाला, 'ओ नॉर्थ पुल्लू चेक पोस्ट से आर्मी आगे जाने देगा नई. पहले ओ साईड का गाडी इधर आयेगा, एक बजे तक. फिर इधर का गाडी छोडताय ओ. हम ९:०० बजे को निकलेंगे ?' (हे शेवटचं प्रश्नचिन्ह उत्तरातदेखील असतंच. ते खरं तर विधान असतं, पण चौकशी केल्यासारखं केलं जातं. सगळे लडाखी असंच प्रश्नार्थक हिंदी बोलतात.)

कॅम्पच्या नयनमनोहर परिसरात फोटोग्राफीची हौस भागवून, बोअरिंग नाश्ता करून आम्ही बरोब्बर ९:०० वाजता 'गणपती बाप्पा........ मोरया !!' केलं आणि रस्त्याला लागलो. आदल्या दिवशीच्या कार्यक्रमातील 'डिस्किट मॉनेस्ट्री' पाहायची बाकी होती, पण रोज एक मॉनेस्ट्री पाहाण्याचा आणि सोबत गाईड नसल्याने त्यातलं काहीच न कळण्याचा कंटाळा आला होता, त्यामुळे आम्ही दोर्जेला थेट लेहकडेच चलायला सांगितलं.

समुद्रसपाटीपासून साधारण ३००० फूट उंचीकडून आम्ही ४५०० फूट उंचीकडे चाललो होतो, पण मधला रस्ता आम्हाला गाडीसह गाठता येऊ शकणार्‍या जगातल्या सर्वाधिक उंचीवर नेणार होता. 'खर्दुंग ला' - उंची १८५०० फूट आमची वाट पाहात होता.

काल दुपारी ह्या भागातून येत असताना आजूबाजूच्या बोडख्या डोंगरांतून विविध रंगी दगड लक्ष वेधून घेत होते. हिरवे, लाल, काळे, पिवळे रंगाचे दगड.... अख्खे डोंगरच्या डोंगर भरून ! पण आता मात्र सगळ्या डोंगर-पर्वतांनी बर्फाची पांढरी शुभ्र, चमचमती पश्मीना शाल पांघरली होती. काल संध्याकाळी उशीरापासून बदललेल्या हवामानामुळे इथे भरपूर बर्फवृष्टी झाली होती. प्रत्येक पर्वतात वेगवगळे आकार, चेहरे दिसत होते. कुठे पांढऱ्या पानांचा विशाल वृक्ष असल्याचा भास होत होता, तर कुठे अर्घ्य देणारी ओंजळ दिसत होती. कुठे चित्रविचित्र वाढलेल्या पांढऱ्या दाढीचा खडूस म्हातारा बारीक डोळे करून पाहात होता, तर कुठे मान खाली घालून घळाघळा अश्रू वाहाणारी दु:खी प्रेयसी लक्ष वेधून घेत होती.


प्रत्येक वळणासरशी आमची गाडी अधिकाधिक उंची गाठत होती.
'खर्दुंग ला' - जगातला सर्वाधिक उंचीचा, गाडी जाऊ शकणारा रस्ता आम्हाला पार करायचा होता.
खोऱ्यात पाऊस पडला म्हणजे शिखरावर बर्फवृष्टी झाली असणार, असं कॅम्पातून निघतानाच तिथल्या लोकांनी सांगितलं होतं. 'खर्दुंग ला' साधारण १८५०० फुटांपर्यंत नेतो. घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वळणावर रस्त्याच्या खाली मोकळ्या मैदानात भरपूर बर्फ होता. तिथून एक नदीही वाहत असावी, जी आता गोठली होती. आमच्या आधीच ४-५ गाड्या तिथे पोहोचल्या होत्या आणि सगळे लोक त्या शुभ्र बर्फात खेळत होते. दोर्जेला तिथेच गाडी बाजूला घ्यायला सांगून आम्ही जाकिटं, ग्लोव्ह्ज, मफलर, टोप्या ई. आयुधं चढवून गाडीतून उड्या मारल्या आणि इतर लोक खेळत होते, त्या जागेपासून थोडं अजून पुढे, अजून जास्त बर्फात जाऊन दंगा सुरु केला. आयुष्यात पहिल्यांदाच बर्फ पाहात होतो. तोही असा ताजा-ताजा, काही तासांपूर्वीच भुरभुरवलेला ! अर्धा तास मनसोक्त खेळल्यावर तिथून निघालो.


पुढे आमच्यासाठी काय वाढून ठेवलं होतं, ह्याची कल्पना नव्हती; त्यामुळे आमचा आनंद अजूनही आमच्या चेहऱ्यांवरून ओसंडत होता. तासाभरात आम्ही नॉर्थ पुल्लू (उंची १६००० फूट) आर्मी चेक पोस्टला पोहोचलो आणि लगेच आनंद आटला. ५० च्या आसपास गाड्या तिथे आधीच उभ्या होत्या. 'खर्दुंग ला' ला प्रचंड बर्फवृष्टी झाली होती व त्यामुळे जागोजाग दरडी कोसळल्या होत्या. रस्ता सकाळपासून बंदच होता. लोक तिथे ५-६ तासांपासून अडकले होते. दु. १२ चा सुमार होता. दोर्जे माहिती काढून आला.
'अभी इधरी रुकनेकाय. ओ छोड नई रहे. रस्ता बंद हैं. आराम करो !'

बर्फवृष्टी सुरूच होती. आजूबाजूच्या हिमाच्छादित पर्वतांची शिखरं मधूनच थोड्या वेळासाठी दर्शन द्यायची. आम्हाला वाटायचं, आता हवा सुधारली. पण काही मिनिटातच ती पुन्हा धुक्यात आणि ढगांत लपायची. इथेच थांबायला लागणार की काय ? ही भीती मन पोखरत होती. 'मेकमायट्रीप'च्या माणसांना पुढे काय करायचे आहे, हे माहितही नव्हतं आणि त्याची त्यांना पर्वा असल्याचंही दिसत नव्हतं आणि हे पाहून आमची बेचैनी वाढतच जात होती.  


बाजूलाच एक टपरी वजा हॉटेल होतं, वेळ आहे तर काही तरी खाऊन घेणं महत्वाचं होतं. गरमगरम 'मॅगी'शिवाय तिथे काहीच खाणेबल नव्हतं, त्यामुळे आम्ही त्यावरच भागवलं आणि आर्मीकडून पुढील 'ऑर्डर्स'ची वाट पाहात बसलो.
पुढचे साडे तीन तास आम्ही तिथेच थांबून होतो. दमट थंड हवा छातीत बाष्प जमवत आहे की काय असं वाटत होतं. ऑक्सिजन विरळ होणे, म्हणजे नेमकं काय, हेही जाणवायला लागलं होतं. ८-१० वाक्यं बोलण्यानेही दम लागत होता.
अखेरीस साधारण सव्वा तीनच्या सुमारास तिथून गाड्यांना पुढे जाण्यासाठी हिरवा सिग्नल मिळाला. सैनिकांनी चढाई करावी, तश्या सगळ्या गाड्या त्वेषाने समोरच्या महाकाय पर्वताकडे धावत सुटल्या. दोन वळणं घेतल्यावरच सगळ्या एका रांगेत शांतपणे जायल्या लागल्या.

जिथवर नजर जाईल तिथवर बर्फ दिसत होता. पर्वतांची पांढरी शुभ्र शिखरं कुठे संपत आहेत आणि आभाळ कुठे सुरु होत आहे हे कळत नव्हतं !



ठिकठिकाणी मातीचे ढिगारे, दगड-धोंडे आणि बर्फ होते. काल इथून येताना आम्ही पाहिलं होतं की हा रस्ता इतका लहान होता की जेमतेम गाडीला गाडी पास होई. त्यात ह्या मलिद्यामुळे तो आणखीच लहान झाला होता. 'खर्दुंग ला'चा हा सगळा भाग 'रस्ता' म्हणत असले तरी 'रस्ताहिन' होता. जिथे-तिथे फूट-फूटभराचे खड्डे होते. 'इथे कोणे एके काळी रस्ता असावा' असे म्हणता येईल इतपत डांबराचे अवशेष उरलेले होते. (पण इतक्या उंचीवर, कसा का होईना रस्ता आहे, हेही नसे थोडके ! अर्थात, आर्मी असल्यामुळेच इतपत तरी शक्य झालं असावं. अन्यथा सरकार हे काम करूच शकत नाही !) अश्यात झालेल्या बर्फवृष्टीमुळे हा रस्ता निसरडा झाला होता. सतत एका बाजूला पर्वत आणि दुसऱ्या बाजूला काही हजार फूट खोल दरी, निसरडा खड्डेमय रस्ता ह्यातून दोर्जे अत्यंत शांतपणे व हळूहळू गाडी पुढे नेत होता. दर १००-२०० मी.नंतर काही मिनिटं थांबावं लागत होतं. पुढचा अंदाज घेऊन, तिथे असलेल्या हेल्परकडून सिग्नल मिळाल्यावर पुढे जाणं सुरु होतं.

आतापर्यंत आम्हाला ह्या बर्फाच्या भीषणतेची जाणीव झाली होती. बाहेरचं तापमान शून्याच्या खाली होतं. गाडीच्या चाकांपुरता रस्ता वगळता आजूबाजूला अर्धा ते एक फूट बर्फ होता. बाहेर इतकी थंड हवा वाहात होती की गाडीच्या काचा उतरवणं अशक्य होतं. दर अर्ध्या तासाने लघवीला लागत होती. त्यामुळे सोबतच्या बायकांची अवस्था अजूनच बिकट होती. दार उघडून बाहेर पडलं किंवा थोड्या वेळासाठीही काच उतरवली की त्या बोचऱ्या थंडीने डोकं भणभणायला लागे. अगदी किरकोळ सूर्यप्रकाश होता तरी चमकदार बर्फावरून तो इतका परावर्तीत व्हायचा की प्रचंड त्रास होई. जसजसं आम्ही उंच जात होतो, ऑक्सिजन अधिकाधिक विरळच होत होता. त्यामुळे दर दोन तीन श्वासानंतर तोंड उघडुन एक मोठा श्वास घ्यायला लागत होता. सगळ्यांना भुका लागल्या होत्या, पण काही खाण्याची इच्छाही होत नव्हती. कमी ऑक्सिजनचा हळूहळू आमच्यावर परिणाम होत होता. पहिलं लक्षण - जांभया येणं - सुरु झालं होतं.
पण अश्याही परिस्थितीत दोर्जे एक साधंसं जाकिट घालून, कानालाही काही न बांधता प्रत्येक वेळी गाडी थांबवायला लागल्यावर लगबगीने खाली उतरत होता. कधी रस्त्यात आलेल्या लहान मोठ्या दगडांना इतर ड्रायव्हरांच्या मदतीने बाजूला करत होता, तर कधी पुढच्या गाड्यांना धक्का देऊन पुढे जाण्यास मदत करत होता.                  


तीन-चार तासांनंतर आम्ही 'खर्दुंग ला' च्या सर्वोच्च पातळीच्या जवळ पोहोचलो. आणखी तीन वळणं पार केली की घाट उतरायला सुरु ! गाडीच्या बंद काचांच्या आत गुदमरून कासावीस झालेल्या आम्हाला दोर्जेने 'ला' च्या सर्वोच्च जागेवरचा टॉवर दुरून दाखवून 'ओ आ गया.... बस उसके बाद नीचे उतरना शुरु करेंगे. उसको जादा टाईम नहीं लगेगा' म्हटलं, तेव्हा एक वेगळीच उभारी मिळाली. पण हे पुढचं वळण आत्तापर्यंतच्या असंख्य वळणांपैकी सगळ्यात धोक्याचं होतं. ह्या वळणावर बर्फ असा काही घट्ट जमला होता की तो काढण्यासाठी खड्डाच करावा लागला असता ! त्यामुळे दोन हेल्पर ह्या वळणावरच उभे होते.
इथून गाडी पुढे नेणं म्हणजे एक जीवघेणी कसरतच होती. गाडीचे चाक बर्फावर आल्याने ते जागच्या जागीच फिरायचं आणि समोर थोडासा चढ असल्याने गाडी जागेवरच वळायची ! मग रिव्हर्स घेऊन पुन्हा, मोशन न तोडता गाडी तिथून काढता येते का पाहायचं ! एखादा गाडीवाला पहिल्याच झटक्यात निघूनही जाई. पण जवळजवळ प्रत्येक गाडी दोन-तीन प्रयत्नांनंतरच तिथून निघू शकत होती.
एका बाजूला कडा आणि दुसऱ्या बाजूला साधारण ८००० फूट खोल दरी, अश्या त्या वळणावर आमची गाडी आली. जोरात 'घ्रुम्म्म्....' असा आवाज झाला, चाकं जागेवरच फिरली आणि गाडी जराशी वळली. पहिला प्रयत्न फसला होता. आता गाडी रिव्हर्स घ्यायची ! आमच्या छातीत धडधड वाढली होती. दोर्जेने सफाईने रिव्हर्स गियर टाकून गाडी मागे घेण्यास सुरु केली. दरीच्या कडेपासून जेमतेम एक फूट अंतर ठेवून तो गाडी उलटी मागे घेत होता.....! हे आधी आम्हाला माहित नव्हतं. पण खिडकीतून बाहेर जेव्हा ती हजारो फूट दरी आ वासल्यासारखी दिसली, तेव्हा मात्र पोटात गोळा आला.. गाडीतील बायकांनी डोळे मिटून जोरात आरडाओरडा केला. आमचीही टंपरली होती, पण आम्ही आमचा आरडाओरडा मनातल्या मनात केला.
दोर्जे आणि बाहेरचे दोघे हेल्पर शांत होते.
'कुछ नई.. कुछ नई.. सब ठीक हैं. डरो मत !!'
सगळेच इतके घाबरलो होतो की 'ठीक हैं' म्हणण्याइतपतही जीवात जीव नव्हता. वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खाली ! मनातल्या मनात कुणी राम-राम करत होतं, कुणी भीमरूपी म्हणत होतं.
दुसरा प्रयत्न.. दोर्जेची क्वालीस पुन्हा गोळाफेकपटू धावत येऊन गोळा फेकतो, तशी रन-अप घेतल्यासारखी त्या वळणाकडे धावत गेली आणि पुन्हा चाकं जागेवर फिरली, गाडी जराशी वळली; पण बाहेरच्या दोघा हेल्पर्सनी धक्का दिला आणि ह्यावेळी गाडी तिथून निघाली.
मृत्यूचं वळण मागे पडलं होतं.. पुढचा तासभर कुणीही कुणाशी काहीच बोलायच्याही मनस्थितीत नव्हतं. पाचावर धारण बसली होती! मृत्यू काळोखा असतो, हा गैरसमजही दूर झाला होता. कारण आम्ही पांढरा शुभ्र मृत्यू पाहिला होता, अगदी जवळून.......... एका फूटावरून !!    

लेहच्या हॉटेलमध्ये पोहोचायला रात्री ९:०० वाजले होते. पाय इतके गारठले होते की बधीर झाले होते. डोक्यात घण वाजत होते. डोळे अतिशय थकले होते. कढत पाण्याने सगळं अंग शेकून काढून, बेचव जेवणाचे दोन घास कसेबसे गिळून आम्ही आपापल्या ब्लँकेटांत व दुलयांत अंगाची मुटकुळी करून शिरलो.

डोळ्यासमोरून ती जीवघेणी दरी काही केल्या जातच नव्हती. मनात विचारांचे आवर्त उठत होते. वाटत होतं,  तेव्हढा एक फुटाचा भाग फक्त बर्फच असला असता तर..........??


....रसप....
३ जून २०१३  

Sunday, June 02, 2013

एक 'न्यूट्रल' दिवानेपण (Yeh Jawani Hai Deewani - Movie Review)

'प्यार दिवाना होता हैं..' हे शब्द दस्तुरखुद्द आनंद बक्षी साहेबांनीही जितक्या गांभीर्याने लिहिले नसतील, तितक्या गांभीर्याने हिंदी चित्रपटकर्ते वर्षानुवर्षं घेत आले आहेत. किंबहुना, हे शब्द लिहिले जाण्याआधीपासूनच ही भावना त्यांच्या मनात खोलवर रुजलेली आहे. सुरुवातीला हे फक्त 'दिवाना' असावं आणि नंतर नकळतच त्यापुढे 'च' लागला आणि 'प्यार दिवाना'च' होता हैं..' असं समस्त वुड बी गुल-बुलबुलांचं मत झालं असावं. अनेक दशकांच्या इतिहासातील कुठलाही हिंदी चित्रपट काढावा, त्यातील प्रेमाने 'दिवाने'पणाची झलक दाखवलीच असते किंवा बऱ्याचदा त्याची मर्यादाही ओलांडलेली असते.
हे इतकं बिंबवलं गेलं आहे की पडद्याबाहेर खरंखुरं आयुष्य जगणाऱ्या तुमच्या-आमच्यासारख्यांनाही 'दिवानेपण' ही प्रेमाची मूलभूत आवश्यकता असते, असंच वाटत असतं. कुठे तरी ह्याच 'दिवाने'पणातून विजोड जोड्या जोडल्या जात असाव्यात.
पण मित्रांनो, बहुतेक चित्रपट अर्धवट शिक्षण देतात. ते फक्त लग्न ठरेपर्यंत किंवा फार तर होईपर्यंतची कहाणी सांगतात. क्वचित प्रसंगी लग्नानंतरचं एखाद-दुसरं भांडण दाखवतात. बंद दरवाज्याच्या आड घडणाऱ्या शाब्दिक, वैचारिक व मानसिक कुस्त्यांचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा 'दिवाने'पण करावं लागतं. घर पाहावं बांधून आणि लग्न पाहावं करून !

असो. तर असंच अर्धवट शिक्षण देतो 'यह जवानी हैं दिवानी'.

नयना (दीपिका पदुकोन) एक हुश्शार मुलगी. मेडिकलच्या अभ्यासात नाकावरच्या चश्म्यापर्यंत बुडालेली आणि गुदमरणारी. आदिती (कल्की कोच्लीन) एक टिपिकल 'टॉम बॉय', कबीर उर्फ बनी (रणबीर कपूर) एक टिपिकल बॅकबेंच टॅलेण्ट आणि अवि (आदित्य रॉय कपूर) त्याची टिपिकल 'सप्लिमेण्ट'; ह्या त्रिकुटासोबत एका ट्रेकिंग कॅम्पसाठी नयना मनालीला जाते. कॅम्पदरम्यान मनमौजी बनीची तिला जबरदस्त भुरळ पडते आणि एक मेडिकलची विद्यार्थिनी एका सडाफटिंगच्या प्रेमात पडते. ती पडणार आहे, हे आपल्याला आधीच माहित असतं पण पडेपर्यंतचा प्रवास खूप मजेशीर केला आहे. काही प्रसिद्ध वक्तव्यांची हिंदी भाषांतरं, ठसकेबाज गाणी आणि चौघांचाही सहज वावर गुंतवून ठेवतो.
पण मध्यंतराच्या जरासं आधी महत्वाकांक्षी 'बनी'तला जबाबदार 'कबीर' जागा होतो आणि कुठल्याश्या पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी तो अमेरिकेला जाणार असल्याचं कळतं. तो मध्यमवर्गीय घरातला असल्याने त्याच्या परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची आवश्यकता असणार, हे चाणाक्ष कथालेखकाने ताडलं होतं म्हणून तीदेखील त्याला मिळालेली असते. त्याच्यासारख्या कॉपी करून पास होणाऱ्या डफ्फळशंखाला शिष्यवृत्ती कशी काय मिळते, ह्याचा विचार चाणाक्षमती करत नाही.
बनी, त्याला आयुष्याकडून हव्या असलेल्या 'रफ्तार'साठी निघून जातो, नयना अव्यक्त राहते आणि आदिती-अवि मागे पडतात. इथे मध्यंतर होतं आणि मध्यंतरानंतरचा बहुतेक भाग आपल्याला एक लग्नाची सीडी दाखवली जाते. आदितीचं लग्न. 'तरण'शी (कुणाल रॉय कपूर). एका मोठ्या च्यानलचा एक महत्वाचा कॅमेरामन बनलेला बनी, जगाच्या कुठल्याश्या कोपऱ्यातून जिवलग मैत्रिणीच्या लग्नाला येतो आणि पुन्हा नयनाला भेटतो. 'सोये अरमान' जागे होतात आणि व्हायचं ते होतं. ते होणार असतं हे आपल्याला माहित असतं पण होईपर्यंतचा प्रवास उगाच वेळकाढूपणा करत राहातो.
अखेरीस पाच जणांत दोन जोड्या बनतात आणि एक बेवडा उरतो. पण सगळे खुश होतात. लग्न लागल्या लागल्या उपस्थितांना जेवणाची ओढ लागते आणि सगळे पंगतीकडे पळतात तसं चित्रपट संपून श्रेयनामावली सुरु होईपर्यंत अर्धं थेटर रिकामं झालेलं असतं.



श्रवणीय संगीत कुणाचं आहे, ही उत्सुकता शमविण्यासाठी आपण श्रेयनामावली पाहातो आणि तिथे 'प्रीतम' वाचल्यावर भ्रमाचा भोपळा फुटतो.
आटोपशीर 'वेक अप सिड' च्या तुलनेत 'यजहैंदि' त अयान मुखर्जी जरा अघळपघळच झाला आहे.
'कल्की' हळूहळू रमायला आणि रमवायला लागली आहे. तिच्यातला अतिसाधारणपणा आपलासा वाटतो.
दोघे 'रॉय कपूर' एकदम फिट्ट !
'दीपिका' इतकी गोड दिसते की बनी तिच्या प्रेमात पडला नसता तर काही तरी गडबड वाटली असती. अजूनही तिची ती भुवया आवळून बोलण्याची सवय काही जात नाही. पण तिचं गोंडस हसू आवळलेल्या भुवयांकडे लक्ष जाऊ देत नाही.
चित्रपट रणबीरचा आहे. बाकी सगळे सपोर्ट कास्ट असावेत. कुठेही तो त्याच्यावरील जबाबदारीसाठी कमी पडत नाही. 'बदतमीज दिल' मधला त्याचा नाच असला दिलखेचक वाटला की कधी तरी त्याला आणि हृतिकला एकत्र नाचताना पाहायला मिळेल का? असं काही तरी मनात आलं.
बनी-आदिती-अवि मधल्या मैत्रीची काही दृष्यं खूप भावतात. त्यांच्यातली घट्ट वीण अदृश्य असली तरी जाणवत राहाते.
माधुरीची 'मोहिनी' अजून कायम आहे. पन्नाशीच्या कंबरेत आजही जबरी दम आहे. तिचं गाणं अगदी म्हणजे अगदी उपरं असलं तरी ती असल्यामुळे मजा येते, हे विशेष !

पाण्यात बुडवल्यावर लिटमस कागद रंग न बदलता उदासीन राहातो, तसा हा चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षक जसा आत जातो, तसाच बाहेर येतो. हा चित्रपट काळजात घुसत नाही पण डोक्यातही जात नाही. तो जादू करत नाही पण अत्याचारही करत नाही.
अडीच तास निरागस चेहऱ्याच्या रणबीरला आणि गोंडस चेहऱ्याच्या दीपिकाला पाहून वेळ नक्कीच वाया जात नाही !

रेटिंग - * * १/२   
Related Posts Plugin for WordPress, Blogger...