Tuesday, December 29, 2015

ये हौसला कैसे झुके..

आजच्या चित्रपटांबाबत दुर्दैवाने हे खरं आहे की बराच काळ लक्षात राहतील अशी फारच मोजकी गाणी आजकाल बनत असतात. तीन चार अपवाद वगळले, तर 'संगीतकार' ही जमात आजच्या घडीला सैन्यासोबतच्या बाजारबोणग्यांसारखी बिनमहत्वाची झाली आहे. अपवादात्मक लोकांपैकीसुद्धा 'सलीम-सुलेमान' हे नाव जरा इतर नावांपेक्षा कमी गाजलंय, पण त्यांची काही गाणी खरंच लक्षात राहण्याजोगी आहेत.
तर दुसरीकडे 'हळुवारपणे उलगडत जाणारे चित्रपट' ही संकल्पनाही हळूहळू बाद होत चालली आहे. दिग्दर्शकाचा ठसा उमटेल असे वेगळे सादरीकरण असणे म्हणजे अंगावर येणारा भडकपणा किंवा बुचकळ्यात टाकणारी गुंतागुंत असा काहीसा 'ट्रेण्ड'ही अावा. पण त्यातही नागेश कुकुनूर सारखे काही दिग्दर्शक आहेत, ज्यांचे सिनेमे सगळ्या भडकपणा आणि वास्तवाच्या रंजक चित्रणाच्या भडिमारातही वेगळे दिसून येतात.

तर नागेश कुकुनूरचा एक असाच हळुवार उलगडच चित्रपट म्हणजे 'डोर'. त्याला संगीत 'सलीम-सुलेमान'चं.
त्यातलं हे गाणं जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मी काही कामानिमित्त बाहेरगावी एकटा राहत होतो. तेव्हा रात्री एफएमवरचा 'लव्ह गुरु' हा कार्यक्रम (आर जे अनमोल) मी रोज पूर्ण रेकॉर्ड करत असे. ह्या रेकॉर्डिंग उद्योगाचा नाद जडलेला असताना एके रात्री हे गाणं लागलं.

ये हौसला कैसे झुके
ये आरज़ू कैसे रुके
मंज़िल मुश्किल तो क्या
धुँधला साहिल तो क्या
तनहा ये दिल तो क्या

राह पे काँटे बिखरे अगर
उसपे तो फिर भी चलना ही है
शाम छुपा ले सूरज मगर
रात को इक दिन ढलना ही है
रुत ये टल जाएगी
हिम्मत रंग लाएगी
सुबह फिर आएगी..............

होगी हमें जो रहमत अता
धूप कटेगी साए तले
अपनी ख़ुदा से है ये दुआ
मंज़िल लगा ले हमको गले
जुर्रत सौ बार रहे
ऊँचा इक़रार रहे
ज़िंदा हर प्यार रहे...........

खरं तर काही ओळीच देणार होतो. पण थोडं थोडं करत सगळंच दिलं गेलं इथे. ह्यातल्या एकेक शब्दाने मला त्या नैराश्याने वेढलेल्या काळात हुरूप दिला होता. मला हे शब्द माझ्यासाठीच लिहिले आहेत असं वाटायचं. आजही जेव्हा अचानक कधी हे गाणं माझ्या मोबाईलवरच्या शेकडो गाण्यांच्या गर्दीतून वाजतं, तेव्हा मी काही काळासाठी तरी सुन्न होतो. गाणं ऐकलं आणि अक्षरश: भारावून गेलो. नंतर काही दिवसांनी व्हिडीओ पार्लरमधून 'डोर'ची सीडी आणली आणि तो चित्रपट पूर्ण पाहिला.

आखातातील एका देशात एक पाकिस्तानी युवक आणि एक भारतीय युवक एकत्र राहत असतात. एके रात्री दोघा मित्रांमध्ये किरकोळ वाद होतो आणि चुकून पाकिस्तानी युवकाचा धक्का लागून भारतीय युवक काही मजल्यांच्या उंचीवरून खाली पडून मृत्यू पावतो. पाकिस्तानी युवकाला देहदंडाची शिक्षा होते आणि जर मृत व्यक्तीच्या पत्नीने दयेचा अर्ज केला, तरच त्याची ती शिक्षा कमी होऊ शकणार असते. हे समजल्यावर पाकिस्तानी युवकाची पत्नी 'गुल पनाग' थेट भारतात तो अर्ज घेऊन येते. मृत भारतीय युवक राजस्थानातला आहे, इतकंच तिला माहित असतं. तिला त्या अर्जावर त्याच्या विधवा पत्नीची - जी भूमिका आयेशा टाकियाने केली आहे - स्वाक्षरी हवी असते. ती तिला कशी शोधते आणि अखेरीस काय होतं अशी सगळी ही कहाणी. श्रेयस तळपदे सहाय्यक भूमिकेत. बाकी संपूर्ण चित्रपट गुल पनाग आणि आयेशा टाकियाचाच. दोघी जितक्या सुंदर दिसल्या आहेत, त्याहूनही अधिक सुंदर त्यांचं काम आहे. आयेशाने साकारलेली अल्लड अवखळ 'मीरा' आणि गुल पनागची परिपक्व, समंजस 'झीनत' ह्या दोघींपैकी कोण जास्त आवडली, हे ठरवणं केवळ अशक्य !

जास्त सविस्तर 'डोर'विषयी सांगता येत नाहीय कारण नंतर पुन्हा तो चित्रपट पाहता आला नाही. पण हे गाणं कायमस्वरूपी मनात घर करून आहे. शब्द 'मीर अली हुसेन' ह्यांचे आणि आवाज 'शफक़त अमानत अली' चा. दोघी मुख्य व्यक्तिरेखा आपापल्या आयुष्यात प्रचंड संघर्ष, हतबलता आणि निराशेला सामोऱ्या जात आहेत. त्या दोघींचा दृढनिश्चय दाखवणारं हे गीत.

संगीत, काव्य हे आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहेत. कठीण परिस्थितीतून बाहेर निघण्याचा रस्ता ते दाखवतील, चमत्कार घडवतील वगैरे असं काही नाही. मात्र अनेकदा त्यातून जेव्हा आपलीच मनस्थिती मांडली जाते, तेव्हा दु:ख, वेदना, यातना वाटल्या जाऊन एक उभारी मिळते. (हीसुद्धा एक प्रकारची जादू, एक प्रकारचा चमत्कारच का ?) हे गाणं म्हणूनच माझ्यासाठी खूप 'स्पेशल' आहे कारण माझी मनस्थिती मला त्यात अनेकदा दिसते. त्यातल्या रूपक तालाचा (7 beats) उसळून उसळून येणारा स्वभाव मनोधैर्य वाढवणारा वाटतो आणि उच्च स्वरांत रमलेली चाल आत्मविश्वासाला एका उंचीवर घेऊन जाते. तिथे, त्या उंचीवर 'धूप कटेगी सायें तले', 'रात को इक दिन ढलना ही है', 'हिम्मत रंग लाएगी', 'सुबह फिर आएगी', 'ऊँचा इक़रार रहे', 'ज़िंदा हर प्यार रहे', अश्या सगळ्या ओळी आशावाद आणि सकारात्मकता देतात. ही ऊर्जा मला प्रत्येक वेळी ह्या गाण्याने दिली आहे. प्रत्येक वेळी. एकदा तर मला आठवतंय की अर्धा-पाउण तास हे एकच गाणं ऐकत मी ऑफिसहून घरी आलो होतो.

हे असं काही मला मिळालं की पुन्हा पुन्हा मला वाटतं की देव आहे की नाही, ह्यावर वादविवाद होऊ शकतात. मात्र काही निर्मिती दैवी असतात, ह्यावर तरी वाद नसावाच. देव प्रत्येकातच असावा. जेव्हा जी व्यक्ती काही काळासाठी का होईना, त्याच्या/ तिच्या सर्वोच्च सृजनात्मक उंचीवर असते. तेव्हा ती व्यक्ती देवाचं रुप असते. देव म्हणजे काय ? विश्वासच ना ? माझा तरी विश्वास आहे की काही कामं काही वेळा काही लोकांकडून करवून घेतली जातात. ह्या गाण्याशी संबंधित सगळेच काही काळासाठी देवरूप झाले होते आणि त्यांनी ही निर्मिती केली खरी, पण कदाचित ही त्यांच्याकडून करवून घेतली गेली.
कारण कुठल्या तरी एका दिवशी त्या सगळ्यांपैकी कुणीच ह्या जगात नसेल, मीही नसेन. पण हे गाणं असेल. नक्कीच असेल.

- रणजित पराडकर

Sunday, December 27, 2015

सांगीतिक गरिबीतलं श्रीमंत वर्ष ! (२०१५ सालातल्या चित्रपटांची उजळणी)

-: २०१५ सालात प्रदर्शित झालेल्या विविध सिनेमांची एक प्रकाराची उजळणी करण्याचा माझा प्रयत्न :-

~ ~ सांगीतिक गरिबीतलं श्रीमंत वर्ष ! ~ ~  

वक़्त रहता नहीं कहीं टिककर
इसकी आदत भी आदमी सी हैं

गुलज़ार साहेबांच्या ह्या ओळी आपण साक्षात अनुभवतो प्रत्येक वर्षाच्या अखेरीस. कारण वर्ष कितीही आनंदी गेलेलं असो वा दु:खी, खडतर वा सहज, जेव्हा डिसेंबरचे शेवटचे काही दिवस शिल्लक राहतात, तेव्हा आपल्याला असंच वाटत राहतं की, 'कधी अख्खं वर्ष सरून गेलं, कळलंच नाही !' काय आलं, काय गेलं ह्याचा आपला हिशोब कधीच जुळत नसतो. मात्र चित्रपटांचं वेगळं असतं जरासं. इथले हिशोब नेहमीच जुळतात. इथे सरलेल्या वर्षातल्या प्रत्येक दिवसाने आपलं योगदान देऊन ठेवलेलं असतं आणि ते नोंदलंही जातं. सरलेल्या वर्षात आपण जे गमावलं असतं, ते कुणी न कुणी कमावलंही असतं आणि जे आपण कमावलं असतं, ते कुणी ना कुणी गमावलं असतं. मात्र पडद्याच्या पलीकडील आपल्या विरुद्ध दिशेला असेलेली व्यक्ती आपल्याला बहुतांशदा अज्ञातच असते.
बॉक्स ऑफिसवर मात्र जेव्हा एक सिनेमा काही कमावतो, तेव्हा ते ज्या दुसऱ्या कुणी गमावलेलं असतं, तोही समोर असतोच असतो. जसं, नुकतेच 'दिलवाले' आणि बाजीराव मस्तानी' एकाच दिवशी प्रदर्शित झाले. दोन्ही सिनेमांना वादाचं वलय लाभलं (की त्यांनीच ते मिळवलेलं?) होतं. शाहरुखचा चित्रपट म्हणजे दणकेबाज ओपनिंग मिळवणारच. अपेक्षेनुसार ह्या पहिल्या लढाईत 'दिलवाले' जिंकलाच. मात्र लौकरच प्रेक्षकांनी 'दिलवाले'ऐवजी 'बाजीराव'ला पसंती देण्यास सुरु केली आणि पहिल्या ३-४ दिवसांनंतर 'दिलवाले' मागे पडून 'बाजीराव'चं कलेक्शन वाढायला लागलं. ही दोन टुकारक्यांमधली भाग्यवान तुलना होती की अजून काही, हा भाग जाऊ देऊ. मात्र कुणाचा फायदा आणि कुणाचं नुकसान हे स्पष्ट समजून येतच आहे. मग भले, रोहित शेट्टीने ते कितीही नाकारलं तरी !

वर्षाखेरीस तीन खानांपैकी किमान एकाचा चित्रपट येणे, ह्यात नवीन काहीच नाही आणि एका वर्षांत अक्षय कुमारचे ३-४ सिनेमे येऊन त्या सर्वांनी बऱ्यापैकी गल्ला जमवणे, ह्यातही नवीन काहीच नसावं. २०१५ मध्येही अक्षयचे ४ सिनेमे आले आणि सर्वांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरीही केली. वर्षाची सुरुवातच अक्षयने दमदार 'बेबी'ने करून दिली. दिग्दर्शक नीरज पांडेंसोबत 'स्पेशल २६' नंतर अक्षय पुन्हा एकदा दिसला आणि पुन्हा एकदा एक वेगवान थरारपट बनला. पुढे आलेले 'सिंग इज ब्लिंग', 'ब्रदर्स' आणि 'गब्बर इज बॅक' सुद्धा बरे चालले, मात्र 'बेबी' च्या पातळीला ते पोहोचू शकणार नव्हतेच. त्यांचं यश तिकीटबारीपुरतंच मर्यादित राहिलं.

महानायक अमिताभ आणि दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषला दिग्दर्शक आर. बाल्कीनी एकत्र आणलं आणि 'शमिताभ' बनवला. पण ह्या जैन पावभाजीला क्लासेस आणि मासेस दोघांनीही नापसंतीच दर्शवली. धनुषला अमिताभचा आवाज देणे, ही कल्पना सर्वांनाच अजीर्ण झाली आणि 'शमिताभ' एक फरगेटेबल अनुभव ठरला.
असाच फरगेटेबल अनुभव 'रॉय' आणि 'अब तक छप्पन - २' नीही दिला. लोक 'रणबीर कपूर'साठी 'रॉय' पाहायला गेले आणि त्यांना चित्रपटभर अर्जुन रामपालच मिळाला. चिकन बिर्याणीऐवजी फडफडीत मसाले भात वाढला आणि तो कितीही चविष्ट असला तरी विरस होणारच. 'रॉय' ने तेच केलं. तर, 'अब तक छप्पन - १' च्या प्रभावाला अजूनही न विसरलेले लोक जेव्हा त्याचा दुसरा भाग पाहायला गेले, तेव्हा त्यांना साचेबद्ध कहाणीच्या ठोकळेबाज सादरीकरणाला पाहावं लागलं. 'नाना होता म्हणून पूर्ण पाहिला तरी' अशी एका ओळीची प्रतिक्रिया लोकांनी दिली.

सर्व थरांतले प्रेक्षक पुन्हा एकदा प्रभावित झाले ते फेब्रुवारीत आलेल्या 'बदलापूर'ने. दिग्दर्शक श्रीराम राघवन ह्यांचा 'एजंट विनोद' सपशेल फसला होता. मात्र त्यांचा पहिला चित्रपट 'एक हसीना थी' आणि नंतर आलेल्या 'जॉनी गद्दार' मधून त्यांनी जी पकड दाखवली होती, ती त्यांनी पुन्हा एकदा 'बदलापूर' मध्ये दाखवली. वरुण धवनसुद्धा अभिनय करू शकतो, हेही ह्या सिनेमाने दाखवून दिले. (अर्थात, वर्षाखेरीस 'दिलवाले' मधून वरुण धवनने लोकांचा हा गैरसमज दूर केलाच !) इथला नकारात्मक भूमिकेतला नवाझुद्दिन सिद्दिकी केवळ अप्रतिम होता.

नवाझुद्दिन ह्या वर्षी नंतर अजून दोन सिनेमांत झळकला. 'दशरथ मांझी'च्या जीवनकथेवर आधारलेल्या केतन मेहता दिग्दर्शित 'मांझी - द माउन्टेन मॅन' मधला त्याचा 'मांझी' अविस्मरणीयच ! ह्या गुणी अभिनेत्याच्या कुवतीचं चीज करणारी ही भूमिका होती. चित्रपट गाजला खरा, मात्र सुपरहिट होण्याचा फॉर्म्युला त्यात नव्हताच. किंबहुना, व्यावसायिक यश डोळ्यांसमोर ठेवून तो बनवला नव्हताच. मात्र त्याच्या थोडा आधी आलेला 'बजरंगी भाईजान' मात्र भरपूर चालला. ह्या सलमानपटातला नवाझुद्दिनचा पाकिस्तानी रिपोर्टर लोकांना 'बदलापूर'मधल्या 'लायक'इतकाच आवडला. 'बजरंगी भाईजान' सुपर हिट होणार होताच आणि झालाच. मात्र तो ह्या वर्षातला पहिला सुपर हिट नव्हता.
वर्षातला पहिला 'सुपर हिट' मात्र मे महिन्यात मिळाला. कंगना राणावतच्या 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' ने खऱ्या अर्थाने बॉक्स ऑफिसला खडबडून जाग आणली. चित्रपट प्रेक्षकांना आवडला आणि रसिकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली. मात्र कंगनाच्या कामाची मात्र भरपूर प्रशंसा झाली. माधवनने स्वत:चा वेगळा चाहतावर्ग नेहमीच जपला आहे. तोही अजिबात निराश झाला नाही. सप्टेंबरमध्ये झळकलेल्या 'कट्टी बट्टी' मधून मात्र कंगनाला ही जादू पुन्हा साधता आली नाही. तीच ती कंगना पाहून लोकांना जरा कंटाळाही आला असावा आणि इम्रान खानने त्या कंटाळ्यात भर घालायचं काम चोख निभावल्याने 'कट्टी बट्टी'शी लोकांनी कट्टीच घेतली.

'दम लगा के हैश्या', 'एनएच 10' आणि 'हंटर' ह्या तीन पूर्णपणे भिन्न सिनेमांनीही उत्तम कामगिरी केली. आपापला 'टारगेट ऑडीयन्स' तर त्यांनी सिनेमागृहाकडे ओढलाच, पण समीक्षकांच्याही पसंतीची पावती मिळवली. 'दम लगा के हैश्या' ह्या एका वेगळ्याच धाटणीच्या प्रेमकहाणीने 'नव्वदचं दशक' हाही एक 'विशिष्ट चित्रपटकाल' होता, हे जाणवून दिलं. क्वचितच मिळणारं सुश्राव्य संगीत ह्या सिनेमाने दिलं. 'एनएच 10' हा बेचैन करणारा सिनेमा होता. वास्तवदर्शन करवताना अतिरंजन टाळूनही आवश्यक परिणामकारकता साधणारा पुरेसा थेटपणा - ज्याला भडकपणाही म्हणता येऊ शकेल - असा एक अत्यंत कठीण समतोल त्याने साधला. अनुष्का शर्माचं ह्या निमित्ताने निर्मिती क्षेत्रात पहिलं पाउल पडलं. एक निर्माती आणि अभिनेत्री अश्या दोन्ही आघाड्यांवर तिच्यासाठी हा चित्रपट यशस्वीच होता. 'हंटर' ही एक प्रकारची 'अ‍ॅडल्ट कॉमेडी' होती. हा प्रकार भारतीय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल इतपत सौम्यपणा त्यात चतुराईने जपला होता आणि कदाचित त्याने अपेक्षेपेक्षाही चांगली कामगिरी केली !

'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी', 'बॉम्बे वेलवेट' आणि 'मै और चार्ल्स' हे तीन सिनेमे वेगळ्या हाताळणीचे होते. पैकी 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी'ने समाधानकारक कमाई केली कारण ती व्यक्तिरेखा छोट्या पडद्यावर प्रचंड गाजलेली असल्याने लोकांना आकर्षित करणारीच होती. इथला सुशांतसिंग राजपूत लक्षवेधी ठरला. मात्र रणबीरचा 'बॉम्बे वेलवेट' आणि रणदीपचा 'मै और चार्ल्स' मात्र लोकांना काही झेपले नाहीतच. अनुराग कश्यपचा 'बॉम्बे वेलवेट' त्यातल्या वाया गेलेल्या बहुतांशामुळे लोकांनी नाकारला. हा वाया गेलेला बहुतांश म्हणजे करण जोहर (अभिनेता म्हणून), चित्रपटात रणबीर आणि अनुष्काच्या व्यक्तिरेखांच्या 'Rags to Riches' जाणाऱ्या जीवनप्रवासाचा प्रभाव, के के मेनन, संगीत वगैरे बाबी. ह्या सगळ्या बाबी चित्रपटाची बलस्थानं ठरायला हव्या होत्या. मात्र त्या निष्प्रभ ठरल्याने चित्रपटाचा एकत्रित परिणामही फारसा जमून आला नाही. 'मै और चार्ल्स' चा अपूर्णपणा त्याच्या गुंतागुंतीला अंधाऱ्या गूढतेकडून अनाकलनीयतेकडे घेऊन गेला. रणदीप हुडाने अप्रतिम साकारलेला 'चार्ल्स सोभराज' चित्रपटाच्या व्यावसायिक अपयशामुळे दुर्लक्षिला गेला.

'पिकू' आणि 'दिल धडकने दो' ने हलक्या फुलक्या मनोरंजनाची मागणी व्यवस्थित पूर्ण केली. निखळ विनोद जो 'पिकू'ने दिला, तो सध्याच्या चित्रपटविश्वात अभावानेच मिळतो. आचरटपणा आणि चावटपणाला माथी मारून विनोद केल्याचा आविर्भाव आणणे, हे सध्याचं यशस्वी समीकरण आहे. दिग्दर्शक शुजीत सरकारनी 'पिकू'द्वारे असला कोणताही थिल्लरपणा न करता निर्भेळ विनोद सादर केला आणि लोकांनीही त्याला पूर्ण पसंती दिली. 'शमिताभ' मध्ये नाकारलेला अमिताभ लोकांनी इथे उचलून धरला. तर 'दिल धडकने दो' मधून झोया अख्तरने 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' चा 'Live your life, your way' चा संदेश अजून एकदा दिला. अनिल कपूर, शेफाली शाह, प्रियांका चोप्रा, रणवीर सिंग, अनुष्का शर्मा आणि फरहान अख्तर अश्या सर्वांचा दमदार अभिनय, नेत्रसुखद चित्रीकरण आणि त्रास न देणारं संगीत ह्यांच्या जोरावर 'दिल धडकने दो' ने यश संपादन केले. स्वशोधाचा प्रवास दाखवणारा अजून एक चित्रपट 'मसान' सुद्धा होता. मात्र ह्या दोन्हींतला शोध वेगवेगळ्या प्रतलांवर होता. 'मसान' समांतर सिनेमाशी नातं सांगणारा होता. दिग्दर्शक नीरज घायवानचा हा पहिलाच सिनेमा. आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी कमालच केली. मसानला तिकीटबारीवर यश मर्यादितच लाभलं, मात्र रसिक व समीक्षकांनी दिलखुलास दाद दिली.

वेलकम टू कराची, मिस तणकपूर हाजीर हो आणि बँगिस्तान हे तीन 'लो प्रोफाईल' विनोदी चित्रपट फ्लॉप ठरले. खरं तर हे तिन्ही 'फ्लॉप'च्या पातळीचे निश्चितच नव्हते. 'वेलकम टू कराची' आणि बँगिस्तान' हे साधारण एकाच पठडीचे. 'सिली कॉमेडी.' आणि दोघांनाही दहशतवादाच्या विषयाची जोड होती. तर 'मिस तणकपूर हाजीर हो' मधला उपरोध अनेकांना समजलाच नाही. मात्र विनोदाच्या नावाखाली काही तरी अचाट आणि अतर्क्य कथानक आणि भरमसाट पांचटपणा करूनही नाना पाटेकर, अनिल कपूरचा 'वेलकम बॅक' मात्र बऱ्यापैकी गल्ला जमवून गेला.

इतर महत्वाच्या सिनेमांत 'तमाशा' आणि 'तलवार' चा उल्लेख आवश्यक आहे. नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'तमाशा'मधून रणबीर आणि दीपिका पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसले. त्यांची केमिस्ट्री जरी लोकांना आवडली तरी, दिग्दर्शक इम्तियाझ अलीने केलेली 'जब वी मेट' आणि 'रॉक स्टार' ची पुनरावृत्ती लोकांना फारशी पसंतीस पडली नसावी. रहमानचं संगीतही काही जादू करू शकलं नाही आणि 'तमाशा'ची कमाई 'फ्लॉप झाला नाही' एव्हढ्यावरच मर्यादित राहिली.
नॉयडामध्ये २००८ साली झालेल्या आरुषी तलवार खून प्रकरणावर आधारित मेघना गुलजार दिग्दर्शित 'तलवार' मध्ये इरफान खान, कोंकणा सेन, नीरज कबी असं गुणी व दमदार स्टार कास्ट होतं. ह्या सिनेमाने मात्र व्यावसायिक आणि कलात्मक असं दोन्ही यश मिळवलं. इरफान खानचा 'अश्विन कुमार' जबरदस्त जमून आला होता. पाठोपाठ प्रदर्शित झालेल्या 'जजबा' मध्येही इरफान खानची भूमिका तपास अधिकाऱ्याचीच होती. मात्र ऐश्वर्या रायचा पुनरागमनाचा सिनेमा असूनही 'जजबा' खूप काही करामत करू शकला नाही. 'आउटडेटेड थरार' दिल्याबद्दल संजय गुप्तांचा हा सिनेमा प्रेक्षकांनी नाकारला.

निशिकांत कामतनी दक्षिणेच्या 'दृश्यम'चा हिंदीत केलेला त्याच नावाचा रिमेकसुद्धा एक उल्लेखनीय चित्रपट होता. अजय देवगणचा विजय साळगावकर आणि त्याचा प्लान लोकांच्या इतका पसंतीस पडला की त्यावर आधारित जोक्स Whatsapp वर फिरायला लागले !

ह्या सर्वांच्या जोडीने 'मिस्टर एक्स', 'हमारी अधुरी कहानी', 'एबीसीडी-२', 'फॅण्टम', 'हीरो', 'कॅलेंडर गर्ल्स', 'शानदार', 'हेट स्टोरी-३' सारखे सपशेल फरगेटेबल सिनेमेही अधूनमधून आले आणि गेले. विशेष काही सांगावं असे काहीच नसलेलेही कित्येक येऊन गेले.
मात्र २०१५ साल लक्षात राहील ते 'बाहुबली - द बिगिनिंग' मुळे. आजपर्यंतचा सगळ्यात खर्चिक सिनेमा आणि आजपर्यंतच्या सगळ्यात यशस्वी सिनेमांपैकी एक 'बाहुबली' ही भारतीय चित्रपटाची एक मोठी उडी होती. 'बाहुबली'ने तांत्रिक सफाईचं एक उदाहरणच इतर सिनेमांसमोर ठेवलं. ह्या कहाणीचा उत्तरार्ध 'बाहुबली - द कन्क्ल्युजन' २०१६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. कुठल्याही सिनेमाची केली गेली नसेल, अशी प्रतीक्षा त्याची होत आहे, ह्यातच सर्व काही आलं !

ह्या सर्व चित्रभडिमारात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे उत्तम सिनेसंगीताचा अभाव. मराठीत तरी 'कट्यार काळजात घुसली' ने ही तहान भागवली. मात्र हिंदीत सिनेसंगीताचा दर्जा इतका खालावला आहे की संपूर्ण वर्षभरातला एकही सिनेमा 'म्युझीकली' उत्तम म्हणवण्याच्या लायकीचा नाही. अगदी गाण्यांची भरमार असलेला 'प्रेम रतन धन पायो'सुद्धा अतिसुमारपट असूनही केवळ सलमानच्या स्टार पॉवरवरच चालला. 'राजश्री'च्या सिनेमांतलं संगीत एकेक पायरी उतरत 'प्रेम्रतन धन्पायो' (असाच उच्चार आहे गाण्यात!) पर्यंत गेलं आहे, ह्यात बडजात्यांना शरम वाटणार नाहीच, कारण त्यांनी त्यातूनही कोट्यवधी कमावले आहेत !

सध्या खोऱ्याने पैसा ओढत असलेल्या 'बाजीराव-मस्तानी' आणि 'दिलवाले' ना शुभेच्छा आणि येणारं वर्ष उत्तम चित्रपट, सुश्राव्य संगीत आणि दर्जेदार मनोरंजनाने सजलेलं, गच्च भरलेलं असावं हीच सदिच्छा !

- रणजित पराडकर

हा लेख दै. मी मराठी लाईव्हमध्ये आज दि. २७ डिसेंबर २०१५  रोजी प्रकाशित झाला आहे -




Saturday, December 26, 2015

मी आदिशक्ती

भविष्यात कुठल्याही परिस्थितीत परत न करण्याच्या अटीवर एका कवी महोदयांना एक मानाचा पुरस्कार प्रदान केला गेला ! माझा त्यांच्याशी थोडासा परिचय असल्याने मला त्यांना पुरस्कार मिळणार असल्याचं आधीपासून माहीतच होतं. (हो. पुरस्कार मिळणार आहे, हे पुरस्कार जाहीर होण्याआधी माहित असतंच बहुतेकदा !) अभिनंदन करणं औपचारिक आणि आवश्यक होतं. त्यामुळे मी त्यांच्या घरी जाऊन त्यांचं अभिनंदन केलं. पुरस्कार मिळालेला कविता संग्रह मुख्यत्वेकरून स्त्रीवादी कवितांचा होता. कवी महोदय अल्पावधीतच एक आश्वासक स्त्रीवादी कवी म्हणून नावारूपास आलेले होते. औपचारिक अभिनंदन केल्यावर दिवाणखान्यातल्या सोफ्यावर मी विसावलो, गप्पा सुरु झाल्या आणि कवी महोदयांनी फर्मान सोडलं. 'चहा आण गं !' काही मिनिटांनी त्यांच्या पत्नी दोन कप चहा, बिस्किटं वगैरे घेऊन आल्या. तो चहा आम्ही प्यायलो. माझा कप मी ट्रेमध्ये ठेवला. कवी महोदयांनी त्यांचा कप त्यांच्या बाजूच्या छोट्या कॉर्नर टेबलवर ठेवला. त्यांच्या पत्नी आल्या आणि तो कप उचलून ट्रेमध्ये ठेवून घेऊन गेल्या. जाता जाता त्यांना 'अमुक अमुक पुस्तक आण' म्हणून सांगितलं गेलं, त्यांनी ते आणून दिलं आणि कवी महोदयांनी त्यांच्या दुसऱ्या एका पुस्तकाची प्रत मला स्वाक्षरीसह दिली.
स्त्रीवादी कवी. त्यांच्या वास्तववादी कविता समाजात स्त्रीला मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीबद्दल ताशेरे ओढणाऱ्या, डोळ्यांत जळजळीत अंजन टाकणाऱ्या, कधी हळहळणाऱ्या, कधी निराश होणाऱ्या होत्या. ज्या वाचून महनीय समीक्षक वाहवा करत होते. आणि स्वत:च्या घरात मात्र, जिला 'लक्ष्मी' म्हटलं जात होतं, ती समोर चहाचा ट्रे आणत होती. आज्ञा स्वीकारत होती.

ह्या विरोधाभासाने मी मनाशीच खजील झालो.
घरी परत निघालो. माझ्या डोळ्यांसमोर माझ्या माहितीतल्या शेकडो स्त्रिया भन्साळीच्या सिनेमात दाखवतात तसं काही एक संबंध नसतानाही एकत्र येऊन हसत, रडत, नाचत, बोलत होत्या. त्या सगळ्यांच्या प्रत्येक कृतीतून मला त्या डिवचत असल्याचा भास होत होता. त्यात अशिक्षित, सुशिक्षित, गृहिणी, नोकरदार, विवाहित, अविवाहित, यशस्वी, अयशस्वी, प्रसिद्ध, अप्रसिद्ध, परिचित, अपरिचित अश्या सगळ्या होत्या. 'घराकडे लक्ष देणे, मुलांना सांभाळणे, वडिलधाऱ्यांची सेवा करणे, स्वयंपाक अश्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या सगळ्या पेलत होत्या. भारतीय स्त्री घराला जे हवं ते करत असते. राहुल द्रविड कसा संघाला हवं तर विकेटकीपिंग, नेतृत्व, सलामीचा फलंदाज, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज, शॉर्ट लेगचा फिल्डर, स्लीपमधला फिल्डर अश्या सगळ्या भूमिका निभवायचा, तश्याच ह्या स्त्रिया. ह्या स्त्रिया व्यावसायिक आयुष्यात अत्युच्च शिखर गाठतात, तरी त्यांच्या मुलाखतीत त्यांना एक प्रश्न हमखास विचारला जातो, 'घराची जबाबदारी कशी निभावली ?'

मला आठवलं. कसं आजही किती तरी लोकांना 'मुलगी' नकोच असते. 'मुलगी शिकली, प्रगती झाली' वगैरे गोंडस घोषणा आठवल्या. त्या किती पोकळ आहेत, हे जाणवलं. माझं लग्न ठरलं, तेव्हा एका ड्रायव्हरने बाबांना विचारलं होतं, 'किती हुंडा ठरला ?' बाबांनी 'हुंडा वगैरे काही नाही' म्हटल्यावर त्याला विश्वास बसेना ! त्याला एक मुलगा आणि एक मुलगी. जर मुलासाठी हुंडा घेतला नाही, तर मुलीसाठी हुंडा कसा देणार ? अशी त्याची भाबडी समस्या होती. हुंडा देणे आणि घेणे, हा आजही लोकांना अधिकार वाटत असताना नुसत्या घोषणा करून काय उपयोग होणार आहे ?

ह्या सगळ्या विचारात घरी आलो. समोर टेबलवर वर्तमानपत्र होतं. त्यात बातमी दिसत होती. त्यात लिहिलं होतं की, 'UN'च्या एका सर्वेक्षणात असं आढळून आलंय की स्त्री-पुरुष असमानतेत भारत पाकिस्तान आणि बांगलादेशच्याही पुढे आहे ! त्या बातमीत दिलेली आकडेवारी एक भारतीय म्हणून शरमेने मान खाली घालायला लावणारी होती. अर्थात, अशी सर्वेक्षणं कितपत विश्वासार्ह असतात, ह्यावरही वाद होऊ शकतो. मात्र महासत्ता होण्याचं, औद्योगिक केंद्र बनण्याचं स्वप्न पाहणारा भारत आजही स्वत:ची तुलना पाकिस्तानशी करण्यातच धन्यता मानतो आहे आणि त्यांच्यापेक्षा आपण सरस आहोत, ह्याचाच आनंद मानतोय हे विदारक आहे. पाकिस्तानचं जाऊ देऊ, पण जे पुढारलेले देश आहेत त्यांच्या तुलनेत आपण कुठे आहोत ? ह्या आकडेवारीचा तर उल्लेखही कुठेच नव्हता. म्हणजे ती तुलनासुद्धा होऊ शकत नव्हती.

बरोबर आहे. कशी होईल तुलना ? आजही, एका स्त्रीने देवाचं दर्शन घेतलं म्हणून आपण देवाचं शुद्धीकरण करतोय. देवाचं ? तेही मनुष्याने शुद्धीकरण करणं, ही कल्पनाच मुळात नारळाच्या झाडाला सादाफुलीने सावली देण्याचा प्रयत्न करण्यासारखी निरर्थक आहे. पण असो. मला सांगा, त्या शुद्धीकरणासाठी आणलेलं दूध बैलाचं होतं का ? की प्राण्यांमधली स्त्री वंदनीय आणि माणसातली मात्र अस्पृश्य ? पुरोगामी महाराष्ट्राची जर ही अवस्था असेल, तर उर्वरित भारताची आणि त्यातही ग्रामीण भागातल्या परिस्थितीची कल्पनाच न केलेली बरी !

मुळात 'समानता' म्हणजे काय, हेही समजून घ्यायला हवं. 'मी इतरांना समान वागणूक देतो', असं म्हणणंही चूक आहे. कारण तुम्ही समानता देत आहात, अशी जाणीवही व्हायला नको. ती अंगभूतच असायला हवी. हवं तर उलट म्हणा की, 'मी स्वत:ला इतरांसमान वागणूक देतो' !
'मी माझ्या बायको/ मुली/ बहिणीला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे!' असं लोक मोठ्या अभिमानाने सांगतात.
पण 'अरे तू कोण देणारा ? कुणालाही स्वातंत्र्य देण्याचा अधिकार मिळाला कुठून तुला ? त्यांचं स्वातंत्र्य जन्मसिद्धच होतं की !' असा विचार त्यांच्या मनाला स्पर्शही करत नाही.

माझ्या एका मित्राचं काही वर्षांपूर्वी लग्न झालं. मी लग्नाला जाऊ शकलो नव्हतो. पण नंतर त्याच्या घरी गेलो. त्याची बायको त्याला 'अहो-जाहो' करताना पाहून मला फार गंमत वाटली ! मी त्याला म्हटलं, 'अहो' काय अरे ! किती विचित्र वाटतं !'
त्यावर त्याने शांतपणे हसून उत्तर दिलं, 'अरे कुणी मान देत असेल, तर देऊ द्यावा की ! काय फरक पडतो !'
आपण भारतीय इतके चाकरीलोलुप आहोत, की जर कुणी आपल्याला त्याची जाणीव करून दिली तर ते आपल्याला पटतही नाही.

डोकं बधीर झालं. पेपर खाली ठेवला आणि कवी महोदयांचं पुस्तक उघडलं. पहिलीच कविता होती.. 'मी आदिशक्ती !'
कुत्सित हसलो आणि पुढची कविता मी वाचलीच नाही. मनातल्या मनात पुढच्या ओळींची मीच कल्पना केली -

'मी आदिशक्ती
माझ्या ह्यांच्या घरात धुणी-भांडी करते
चहा-पाणी बघते
स्वयंपाक करते
आणि माझ्यावरच्या कवितांमुळे
पुरस्कारही मिळवून देते'

- रणजित पराडकर

शुक्रवार, दि. २५ डिसेंबर २०१५ रोजी 'दै. दिव्य मराठी'च्या 'मधुरिमा' पुरवणीत प्रकाशित लेख -


Friday, December 18, 2015

भेलवाले (Movie Review - Dilwale)

'When you can't grow a beard, dont grow a beard.'
साधासाच फंडा आहे, पण काही गोष्टी इंग्रजीत सांगितल्याने भारी वाटतात ! मात्र हा साधासा फंडा शाहरुखला काही केल्या लक्षात येत नाही. एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही, हे एखाद्या सुपरस्टारने स्वीकारणे कठीणच म्हणा ! 'चक दे इंडिया' मधला 'कबीर खान' लोकांना आवडला होता ते त्याच्या दिसण्यामुळे नाही, हे त्याला कुणी तरी समजवायला हवे. त्याचा 'जब तक है जान' मधला दाढीचे खुंट वाढलेला बोगस फिल्मी मेजर लोकांनी सहन केला आणि आता परत एकदा तेच वाईट्ट खुंट घेऊन तो 'दिलवाले' बनलाय.
दाढीचं लक्षात येत नसेल, पण एक मात्र शाहरुखला नक्कीच लक्षात आलेलं आहे. 'आपण सेन्सिबल चित्रपट करू शकत नाही'. त्यामुळे 'चक दे इंडिया', 'स्वदेस' आणि बऱ्याचश्या प्रमाणात 'डॉन' वगळता सगळेच शाहरुखपट आणि सेन्सिबिलीटीचं नातं म्हणजे ३६ च्या आकड्यासारखंच असावं. ह्या बाबतीत दिग्दर्शकांमधला शाहरुख खान म्हणजे 'रोहित शेट्टी'. दोघे एकत्र पहिल्यांदा 'चेन्नई एक्स्प्रेस' मध्ये बसले. तो प्रवास जितका मनोरंजक (सेन्सिबल नाही, लक्षात घ्यावे!) तितकाच 'दिलवाले' रटाळ.
इथल्या शाहरुखच्या दाढीचे खुंट अधिकच अणकुचीदार आहेत. इतके की काही फ्रेम्समध्ये त्याला पाहताना नकळत आपण आपलाच गळा खाजवायला लागावं. त्याला असा गबाळा लुक का द्यावा, ह्यावर विचार करायची संधी वरुण धवन देत नाही. वरुण धवन हा वरून, खालून, आतून, बाहेरून, डावीकडून, उजवीकडून, समोरून, मागून सगळीकडून पक्का 'धवन' आहे. त्याचे तीर्थरूप आणि सेन्सिबिलीटी ह्यांचं नातं तर विळ्या-भोपळ्याचं ! त्यामुळे 'बदलापूर' पाहून जर वरुणकडून आपल्या काही अपेक्षा वाढल्या असतील, तर त्या अपेक्षांच्या फुग्याला निर्दयीपणे तो स्वत:च 'दिलवाले'ची टाचणी लावतो. ह्या लक्षणामुळेच 'कृती सॅनोन' नामक मूर्तिमंत मेक अप कीट वरुणसाठी अगदी 'परफेक्ट मॅच' ठरतो आणि दोघे मिळून पूर्णवेळ टाचण्या टोचून हैराण करून सोडतात ! सुरुवातीच्या काही दृश्यांत साक्षात खप्पड दिसणारी काजोल नंतरच्या दृश्यांत हळूहळू सुंदर दिसायला लागते आणि अखेरपर्यंत आपल्याला जाणवतं की तीच एक सहनीय व बघणीय भाग होती ह्या चित्रपटाचा.

खूप मोठी उंची गाठायला फार मेहनत लागते आणि तिथून खाली यायला काहीही लागत नाही. हे सोपं काम रोहित शेट्टीने शाहरुख-काजोलच्या जोडीबाबत व्यवस्थित केलं आहे. त्यांची सुप्रसिद्ध केमिस्ट्रीसुद्धा काही जादू करत नाही. कारण गाण्यांच्या चाली, त्यांची चित्रीकरणं, संवाद, प्रसंग हा सगळाच मालमसाला पद्धतशीर 'कॉपी+पेस्ट' केलेला आहे. 'गेरुआ' चं चित्रीकरण अत्यंत नेत्रसुखद असलं तरी त्यावरची 'सूरज हुआ मध्यम..', 'सुनता है मेरा खुदा..' वगैरे गाण्यांच्या चित्रिकरणाची छाप काही लपत नाहीच. 'जनम जनम जनम..' गाण्याच्या चित्रीकरणावर 'हम तुम' चा प्रभाव ठळकपणे जाणवतो. संवाद तर इतके बुळबुळीत आहेत की ते लिहिण्यासाठी पेनात शाईऐवजी साबण घातला असावा.



तर इथून तिथून जे काही हाताला येईल ते उचलून सगळं एकत्र टाकून केलेली ही जी 'दिलवाले' नामक भेळ आहे, तिला चवीसाठी कमी पडणाऱ्या मिठाइतकी कहाणीही आहे.
कोणे एके काळचा माफिया 'काली' (शाहरुख) आपलं जुनं आयुष्य बल्गेरियात सोडून गोव्यात आपल्या लहान भावासह येतो. जुनं आयुष्य सोडताना त्यात गुन्हेगारी जगत जसं आलं, तसंच आपलं प्रेमही येणारच. हे सुज्ञास सांगणे न लागे. त्याचं हे प्रेम म्हणजे मीरा (काजोल) त्याच्या प्रतिस्पर्धी डॉनची मुलगी असते. आता ते आयुष्य सोडून येण्याचं कारणही कळलं असेलच. तरी सांगतो. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या ईर्ष्येने आंधळे झालेले हे लोक आपापल्या जवळच्यांना गमवून बसतात आणि त्यासाठी एकमेकांना जबाबदार धरून वेगळे होतात. सॉरी ! इथे हीरोला 'क्लीन' ठेवणं गरजेचं असल्याने फक्त मीराच असा गैरसमज करून घेते. काली तर शाहरुख असल्याने तो असं काही करूच शकत नाही. मग काली शाहरुख आपलं आवडतं नाम धारण करतो. 'राहुल' नाही. 'राज'. (आता दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' ची केमिस्ट्री आणायची आहे म्हटल्यावर हे आवश्यकच नाही का ?) मात्र भूतकाळ असा पिच्छा सोडत नसतोच. कालीचा लहान भाऊ वीर (वरुण धवन) आणि मीराची लहान बहिण इशिता (कृती सॅनोन) प्रेमात पडतात आणि द रेस्ट इज नो मिस्ट्री.

अभिनय, कहाणी, संवाद, दिग्दर्शन हे सगळं सुमार असलं तरी ह्या सगळ्यांवर कडी करणारी एक गोष्ट अजून आहे. 'कर्कश्य पार्श्वसंगीत.' अमर मोहिले, तुम्हीसुद्धा ? प्रत्येक दृश्याला मागे ढणढणाट चालूच ! ती 'जनम जनम जनम..' ची धून तर वाजून वाजून वात आणते. दर वेळी शाहरुख-काजोलची नजरानजर झाली रे झाली की वाजवा रे 'जनम जनम जनम...' असं चित्रपटभर चालतं. जोडीला ढिश्युम-ढिश्युम, उडणाऱ्या गाड्या, आपटणाऱ्या गाड्या, धावणाऱ्या, गोल फिरणाऱ्या, करकच्चून ब्रेक मारणाऱ्या गाड्या, स्फोट, वगैरे शेट्टी-मसालासुद्धा ह्या कर्कश्यतेच्या अमानुषतेत भर घालतोच.

बोमन इराणीला वाया घालवल्याबद्दल जास्त कीव करावी की संजय मिश्राला वाया घालवल्याबद्दल हे सांगणं अवघड आहे. हे दोघे आणि जॉनी लिव्हर हेच त्यातल्या त्यात थोडीफार मजा करवतात.
छायाचित्रण नयनरम्य आहे. पण सौंदर्य आणि नीटनेटकेपणाचा अतिरेक जाणवतो. प्रत्येक फ्रेम श्रीमंत, सुंदर, डोळ्यांचं पारणं फेडणारी असायलाच हवी हा अट्टाहास चमचाभर कमी करून तो चमचा इतर घटकांत वाढवला असता, तर अडीच तासांचा चित्रानुभव अत्याचार न होता, किमान मनोरंजक तरी झाला असता. रोहित शेट्टीचा सिनेमा पाहताना मनोरंजन वगळता दुसरी कुठलीच अपेक्षा ठेवून प्रेक्षक येत नसतोच आणि बाजारात मनोरंजनाचा व्यापार इतका भरपूर आहे की जर तोही तुम्हाला मांडता येत नसेल, तर काय म्हणणार ! खरं तर काही म्हणून उपयोग नाहीच कारण कितीही सुमार असला तरी शाहरुखच्या नावावर तो शेकडो कोटी कमवून देईलच. भाड मे जाये सेन्सिबिलीटी, कलात्मकता वगैरे, माल तो अंदर आने दो !
बरोबर ना शेट्टी साहेब ?

रेटिंग - *

Sunday, December 06, 2015

बथ्थड चेहऱ्यांची रद्दड स्टोरी (Movie Review - Hate Story - 3)

शाळेत प्रत्येक वर्गात काही वात्रट, द्वाड पोरं असतात. त्यांना सगळे शिक्षक 'वाया गेलेले' म्हणत असतात. इतर 'सभ्य' मुलांपैकी कुणी मेहनती मुलगा जर त्या द्वाड मुलांच्यात रमताना आढळला, तर त्याची एक प्रेमळ कानउघाडणी होत असे. 'तू हुशार आहेस, मेहनती आहेस. अभ्यासाकडे लक्ष दे. त्या पराडकरच्या नादाला लागू नकोस.' असे डोस दिले जात असत. शर्मन जोशीचीही अशी प्रेमळ कानउघाडणी कुणी तरी करायला हवी. 'तू चांगला अभिनेता आहेस. मेहनती आहेस. विचारपूर्वक सिनेमे कर. त्या विक्रम वगैरेच्या नादी लागू नकोस. ते लोक तुला कधी 'ओम् भट् स्वा:' करतील, ह्याचा काही नेम नाही !

खरंच. का केला असेल शर्मन जोशीने हा 'हेट स्टोरी - ३' कळत नाही ! कुठे ते फेरारी की सवारी, रंग दे बसंती, थ्री इडियट्स वगैरे आणि कुठे हे 'सॉफ्ट पॉर्न' ! बरं असंही नाही की त्याच्या भूमिकेत काही विशेष आव्हानात्मक असावं. मग तिथे हा आपला वेळ का वाया घालवतोय ? बाकीच्या लोकांचं ठीक आहे. Beggars are no choosers. (भिखारी को भीख, जितनी मिलें ठीक !) झरीन खान, करण सिंग ग्रोवर, डेजी शाह वगैरेंना असंही कुणी चांगला दिग्दर्शक एखादी चांगली भूमिका देऊन एखाद्या चांगल्या चित्रपटाचं मातेरं कधीच करणार नाही. त्यामुळे हे ठोकळे जर एखाद्या बंडल चित्रपटात तितक्याच बंडल भूमिका मनापासून बंडल अभिनय करून सादर करत असतील, तर करोत बापडे ! तो एक क्रिकेटर मध्यंतरी झळकला होता. 'जोगिंदर शर्मा.' ट्वेंटी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मिसबाह उल हकने एक सपशेल मूर्खपणा केला आणि फालतू शॉट मारून आपली विकेट जोगिंदर शर्माला आणि विश्वचषक भारताला बहाल केला. जोगिंदरला क्षणभर वाटलं असावं की तो 'सुपर स्टार' झाला. पण आज त्याला पाणी नेऊन देण्याच्या कामापुरतासुद्धा संघात घेत नाहीत. हे झरीन, करण, डेजी इत्यादी लोक्स म्हणजे चित्रपटातले 'जोगिंदर शर्मा' आहेत. शर्मन जोशीसारख्याने ह्यांच्यात किती रमावं, हे त्याला समजून आलं असावंच. नसलंच तर मात्र 'अल्लाह मालिक !'

चित्रपटाची बकवास कहाणी थोडक्यात अशी -

आदित्य दीवान (शर्मन जोशी) हा एक तरुण व प्रचंड यशस्वी उद्योजक आहे. विविध क्षेत्रांत त्याच्या 'दीवान ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज' ची जोरदार घोडदौड सुरु आहे. त्याची सुविद्य व बलदंड पत्नी सिया (झरीन खान) त्याच्या ह्या प्रवासात त्याच्या सोबतीने नेहमीच एका आदर्श सहचारिणीसारखी उभी राहत आली आहे. (हे तिचं उभं राहणं सहचारिणीपेक्षा अंगरक्षकासारखं वाटतं मात्र.) आदित्यसोबत काम करणारी काया (डेजी शाह) ही एक मेहनती व हुशार व्यवस्थापक आहे. 'दीवान ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज' च्या यशात तिचाही हातभार खूप मोलाचा आहे. अचानक एक दिवस एक अनोळखी व्यक्ती आदित्यकडे मैत्रीचा हात पुढे करते. ही व्यक्ती म्हणजे सौरव सिंघानिया (करण सिंग ग्रोवर). सौरव 'दीवान ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज' मध्ये आदित्य म्हणेल तितके पैसे विना व्याज, विना तारण गुंतवायला तयार असतो. मात्र त्याची एक अशी विचित्र मागणी असते, जी एक आदर्श पती कधीच पूर्ण करू शकणार नसतो. सौरवच्या येण्याने 'दीवान ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज', आदित्य, सिया आणि कायाचा पुढील प्रवास कोणकोणती वळणं घेतो आणि कुठे जाऊन संपतो ही झाली 'हेट स्टोरी ३'.

गळक्या छत्रीतून पाणी हळूहळू ओघळत आत येतं. पण ह्या कथानकाच्या छत्रीला तर भोकंच भोकं आहेत. ही भोकं लगेचच अजून वाढत जातात, कथानक नावाचं कापड फाटून उडून जातं. आणि मग दिग्दर्शकाच्या हातात फक्त मूठ आणि छत्रीचा दांडा राहतो. चिंब होऊन कुडकुडणाऱ्या मनोरंजनात जरा 'ऊब' आणण्यासाठी मग तो भरपूर गरमागरम दृश्यं पेरतो.
पण 'हेट स्टोरी' ला 'हॉट स्टोरी' करायचा त्याचा हा प्रयत्न केविलवाणाच ठरतो.
कारण मुख्य स्त्री भूमिकेतली झरीन खान म्हणजे सतत एक मैद्याचं पोतं वाटत राहते. तिला सुंदर बनवण्याच्या प्रयत्नात वापरलेला सगळा मेक अप तिला सुंदर न बनवता भयावह बनवतो. तर डेजी शाहला पाहूनही आनंद होण्यासारखं काही वाटत नाही ! चारही मुख्य पात्र पुरुषीच वाटतात. त्यांतल्या दोघांनी पुरुषाची आणि दोघांनी स्त्रीची वेशभूषा केली आहे, असंच वाटतं.

ह्या बंडल चित्रपटाचं श्रेय सुमार पटकथेसाठी विक्रम भट्टना द्यावं की झोपाळू दिग्दर्शनासाठी विशाल पंड्याना हे सांगता येणं कठीण आहे. त्यामुळे आपण हे श्रेय दोघांना विभागून देऊ !
'संगीत म्हणजे ढणढणाट' हे सूत्र पाळणारे अनेक फुटकळ संगीतकार अचानकच भूछत्रांसारखे गेल्या काही वर्षांत उगवले आहेत. कधी कधी वाटतं की ह्यांच्या कामाला अनुल्लेखानेच मारावं. आपलं काम पाहून 'हे कुणी केलं आहे' अशी उत्सुकताही कुणाला वाटू नये, ही एखाद्या कलाकारासाठी एक अतिशय शरमेची बाब आहे. आताशा बहुतांश हिंदी चित्रपटांचे संगीत ऐकताना खरोखर 'संगीतकार कोण?' ही उत्सुकताच वाटत नाही. (आणि जर वाटलीच तर 'शिव्या नेमक्या कुणाला घालायच्या' ह्यासाठीच वाटत असावी !)

'हेट स्टोरी - ३' मधून टवाळांच्या हाती काही लागणार नाही आहे आणि रसिक तर अश्या चित्रपटांकडे ढुंकूनसुद्धा पाहत नाहीतच. ह्या चित्रपटाला जर श्रेय द्यायचंच झालं तर एकच देता येईल. ते म्हणजे, 'शर्मन जोशीने काय करू नये', हे ह्या चित्रपटाने प्रत्यक्ष दाखवून दिलं आहे.

रेटिंग - *

हे परीक्षण दै. मी मराठी लाईव्ह मध्ये आज ०६ डिसेंबर २०१५ रोजी प्रकाशित झालं आहे - 


Tuesday, December 01, 2015

कट्यार काळजात घुसली - Another Take

चित्रपट 'कट्यार काळजात घुसली' बराच गाजतो आहे. तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटगृहं चांगलीच गर्दी खेचत आहेत. अपेक्षेविपरित ह्या यशाकडे भेदभावाच्या एका विकृत नजरेतूनही पाहिलं जातंय. मी त्या विषयी बोलणार नाही. मात्र मला तो इतका का आवडला, ह्यावर जरासा विचार केला. इतरांना का आवडला नसेल, ह्याचाही अंदाज घेतला. तेच मांडतोय.

मूळ 'संगीत कट्यार काळजात घुसली' हे ज्यांनी पाहिलं असेल, त्यांना चित्रपट ककाघु कदाचित आवडणार नाही. ह्याची काही कारणं आहेत -
१. पंडितजी व खांसाहेब ह्यांच्या घराण्यांतला संघर्ष चित्रपटात नीट आलेला नाही. पूर्वी घराण्यां-घराण्यांत चढाओढ असायची आणि दुसऱ्या घराण्याच्या कलाकारांना कुणी शिकवत नसत. प्रत्येकाला आपापल्या घराण्याचा पराकोटीचा अभिमान असायचा. ह्या संदर्भातले मोठमोठ्या कलाकारांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. ह्या पातळीचे मतभेद चित्रपटात न येता ते एक सूडनाट्य होण्याकडे त्याचा कल अधिक वाटतो. थोडक्यात त्याला 'फिल्मी' केलंच आहे.
२. खांसाहेब ही व्यक्तिरेखा चित्रपटात खूपच खलप्रवृत्तीची झाली आहे. मूळ नाटकांत खांसाहेबला असलेली कलेविषयीची ओढ आणि सदाशिवच्या गाण्याबद्दल असलेला आदर चित्रपटात क्वचित दिसतो.
३. उमा-सदाशिवचं प्रेमप्रकरण, सदाशिवचं अचानक कुठून तरी उगवणं, त्याचा आगा-पिच्छा कथानकात कुठेच पुरेसा न उलगडणं अश्या सगळ्या तर साफ गंडलेल्या गोष्टीही चित्रपटात आहेत.
४. ह्याव्यतिरिक्त अजूनही काही लहान-सहान उचक्या घेतल्या आहेत अध्ये-मध्ये.

हा सगळा एक भाग झाला. पण दुसरं असंही आहे -
'ककाघु' चित्रपट बनवताना जर मूळ नाटकात काहीही बदल न करता, जशीच्या तशी संहिता घेतली असती, गाणीही तीच घेतली असती, तर लोकांनी म्हटलं असतं की, 'स्वत:चं contribution काय ? ही तर माशी-टू-माशी नक्कल आहे !'
मूळ संहितेपासून थोडी फारकत घेतली, काही गाणी नवीन टाकली, काही बदलली तर लोकांना त्यातही गैर वाटतंय.
थोडक्यात काहीही केलं तरी तुलना अटळ आणि जिथे ही तुलना होणार तिथे 'जुनं ते सोनं' आणि मी माझ्या परीक्षणात म्हटल्याप्रमाणे 'महान कलाकृती एकदाच बनतात, नंतर त्यांच्या प्रतिकृती बनू शकतात' ह्यानुसार 'चित्रपट ककाघु' वर टीका होणारच, हे चित्रपट करण्यापूर्वी करणाऱ्यांना माहित नसेल का ? १००% माहित असणार. तरी त्यांनी ही हिंमत केली. स्वत:चं डोकं लावलं, बदल केले. ते आवडले किंवा नावडले, हा वेगळा विषय. पण ते चित्रपटकर्त्यांनी केले, हे त्यांचं औद्धत्य नसून, त्यांची हिंमत आहे आणि तिला दाद द्यायलाच हवी.

हो. स्वतंत्रपणे एक चित्रपट म्हणूनच विचार केला तर चित्रपटात उणीवा आहेत. पण त्या उणीवांवर मात करणाऱ्या दोन गोष्टी चित्रपटात आहेत.
१. सर्वच्या सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय.
२. दमदार संगीत. (जुनं + नवं)

आता परत हे दोन्ही मुद्दे सापेक्ष असू शकतात. सचिनचा 'खांसाहेब' म्हणून अभिनय अनेकांना 'अति-अभिनय' (Over acting) ही वाटला आहे. पण मला तरी तो तसा वाटला नाही. मुळात तो एक चांगला अभिनेता आहेच, बाकी ते महागुरू वगैरे काहीही असो. त्याला संगीताची उत्तम जाणही आहेच. त्याने केलेला गाण्याचा अभिनय मला तरी कन्व्हीन्सिंग वाटला.

संगीत जर कुणाला आवडलं, नसेल तर असो. माझ्या संगीताच्या समजेबद्दल मला कुठलेही न्यूनगंडदूषित गैरसमज नाहीत. त्यामुळे मला 'तमाशा'चं संगीत भिकार आहे आणि 'कट्यार..' अप्रतिम आहे, असं म्हणायला हिंमतही करावी लागत नाही आणि इतर कुणाच्या मतांमुळे माझं मतही बदलत नाही ! देस रागावर आधारलेलं 'मनमंदिरा तेजाने उजळून घेई..' असो की अगदी मुरलेल्या गायकाने बांधलेल्या बंदिशीच्या तोडीचं 'दिल की तपिश..' असो, मी तिथे केवळ गुंग आणि नतमस्तक होतो. 'आफताब' वाली सम तर अशी आहे की अक्षरश: जान निछावर करावी !

आधीच म्हटल्याप्रमाणे 'नाटक' आणि 'चित्रपट' ह्यांतली तुलना अटळच आहे. मात्र म्हणून बळंच 'नाटकाची सर नाहीच', 'नाटक पाहिलं नाही, त्याचं जीवन व्यर्थ' वगैरे म्हणत नाकं मुरडणं म्हणजे शुद्ध बाष्कळपणा वाटतो. मुळात दोन माध्यमांत असलेला प्रचंड फरकच इथे लक्षात घेतला जात नाहीये. काही उणीवा नाटकातही आहेत आणि काही चित्रपटातही. किंबहुना, उणीवा ह्या सहसा असतातच असतात. अगदी १००% दोषरहित निर्मिती क्वचितातल्याही क्वचित होत असते. त्या उणीवांना झाकता येईल अशी इतर बलस्थानं असणं महत्वाचं आहे. एक व्यक्ती म्हणून आपल्या सगळ्यांतच दुर्गुण असतात. ते दुर्गुण दुय्यम ठरावेत असे काही सद्गुण अंगी बाणवणं, हा झाला व्यक्तिमत्व विकास. तेच इथे लागू व्हायला हवं.

चित्रपट त्यातील उणीवांसकट अभूतपूर्व आहे, ह्याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही. मी माझं मत कुणावर लादणार नाही. ज्याला जे मत बनवायचं ते बनवण्यासाठी तो/ ती मोकळे आहेत. मी काल जेव्हा तिसऱ्यांदा 'ककाघु' पाहिला तेव्हा तो पुन्हा तितकाच आवडला. 'सूर निरागस हो..' ने तल्लीन केलं. 'दिल की तपिश..' ने शहारे आणले. 'मनमंदिरा' ने भारुन टाकलं. 'यार इलाही..' ने जादू केली. ही सगळी नवी गाणी मला 'तेजोनिधी..', 'घेई छंद..', 'सुरत पिया की..' च्याच तोडीची वाटली.

तीन वेळा थेटरात पाहिला. आता टीव्हीवर आला की परत पाहीन.
असा चित्रपट, असं संगीत पुन्हा होणे नाही.

- रणजित पराडकर

Sunday, November 29, 2015

'भागते रहो' ते 'जागते रहो' ! (Movie Review - Tamasha)

इतर कुणी असतं, तर, ‘हे म्हणजे ‘तारे जमीं पर’, ‘रॉकस्टार’, यह जवानी है दीवानी’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ व अजून काही सिनेमांचं मिश्रण केलंय’, असं म्हणता आलं असतं. पण ‘इम्तियाझ अली’ आणि ‘इतर कुणी’ ह्यांच्यात हाच फरक आहे. उत्तम दिग्दर्शक आणि इतर दिग्दर्शक ह्यांच्यात फरक असतोच. कारण ‘कथाकथन’ (Story Telling) हीसुद्धा एक कला आहे. ती अंगभूत असायला लागते. (आठवा, ‘कट्यार काळजात घुसली’ मधले कविराजाचे ‘कला’ आणि ‘विद्या’ ह्यांच्यातला फरक सांगणारे शब्द !) उत्तम कथानक वाया घालवलेली अनेक उदाहरणं देता येतील. पण ज्याप्रमाणे आपल्या मित्रवर्गातील एखादी व्यक्ती एखादा साधासा विनोदही अश्या काही परिणामकारकतेने रंगवून सांगते की हास्याचा खळखळाट होतो, त्याचप्रमाणे इम्तियाझ अली पुन्हा एकदा एक प्रेमकहाणी सांगतो. प्रेमकहाणीचं नातं आयुष्याशी जोडतो आणि चित्रपटाकडे केवळ एक ‘मनोरंजन’ म्हणून न पाहता एक ‘कला’ म्हणूनही पाहणारे रसिक दिलखुलास दाद देतात.
का ?
कारण ह्या कहाणीतला वेद मलिक (रणबीर कपूर) प्रत्येकाने जगलेला, पाहिलेला आहे. हा ‘वेद’ दुसरा तिसरा कुणी नसून डोळ्यांना झापडं लावून धावत सुटणाऱ्या घोड्यासारखा ‘कहाँ से चलें, कहाँ के लिए’ हे खबर नसणारा नोकरदार आहे. तोच तो मर्ढेकरांच्या ‘पिपात मेले ओल्या उंदीर’ वाला सामान्य माणूस. जो कधीच, कुठेच जिंकत नसतो कारण त्याला जिंकायचं नसतंच बहुतेक. बस्स, धावायचं असतं. कारण त्याला भीती असते की जर तो थांबला, तर त्याच्या मागून बेभानपणे धावत येणारे इतर लोक त्याला पाहणारही नाहीत आणि त्याला तुडवत तुडवत पुढे निघून जातील. त्याने माधव ज्युलियनांच्या -
कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला
थांबला तो संपला
धावत्याला शक्ति येई आणि रस्ता सापडे
ह्या ओळींचा सोयीस्कर अर्थ लावलेला आहे. त्याला बहुतेक असं वाटत असतं की तो ‘यदायदाहि धर्मस्य..’ वाला ह्याच्याही मदतीला येणार आहे म्हणून तो जबरदस्तीनेच ‘ग्लानिर्भवती’ पाळत असतो. येतो. त्याच्याही मदतीला येतो. पण त्याचं रुप ओळखता आलं पाहिजे. तेच बहुतांशांना जमत नाही. मात्र वेदला जमतं. त्याचं ‘प्रेम’ त्याला रस्ता दाखवतं. हा नेहमीचाच मसाला आहे की, ‘प्रेमाने आयुष्य बदलून टाकणं’ वगैरे. पण वेदला ते कसं आणि कितपत जमतं, त्याला होणारा साक्षात्कार नेमका काय असतो, त्यासाठी काय किंमत मोजायला लागते आणि तो कुठून, कसा व काय बनतो, हे सांगण्यासाठी एखादा ‘इम्तियाझ अली’च असावा लागतो ! नाही तर, ‘ही तर ४-५ सिनेमांची मिसळ आहे’, हा शेरा नक्की असतो !

ज्या संवेदनशीलतेने इम्तियाझ अली, एका लहानपणापासून सतत मर्जीविरुद्ध झिजत राहिलेल्या व्यक्तीची मानसिकता मांडतात, ते एखादा मनोवैज्ञानिकच जाणो ! मग ते सतत आरश्याशी बोलत राहणारं एकटेपण असो की झटक्यासरशी ‘मूड स्विंग्स’ करणारं मानसिक अस्थैर्य असो की टेबलावर डोकं ठेवून एका बाजूला तोंड करून शून्यात पाहणारी असुरक्षितता असो, वेदच्या व्यक्तिरेखेला इम्तियाझ अली एकेक पैलू विचार व काळजीपूर्वक पाडतात.


रणबीरमधला सक्षम अभिनेताही हा एकेक पैलू आपलासा करतो. तो त्याच्या वेडेपणाने जितका हसवतो, तितकाच त्या वेडेपणामागच्या कारुण्याच्या छटेने व्यथितही करतो. एरव्ही माथेफिरू वाटू शकणारी एक व्यक्तिरेखा तो प्रेक्षकाच्या मनात उतरवतो आणि त्याला ती बेमालूमपणे विकतोही !
जोडीला ‘दीपिका पदुकोण’सुद्धा तितकाच सशक्त अभिनय करते. जिथे रणबीरसोबत त्याच्याइतकीच उर्जा दाखवायची आवश्यकता असते तिथे ती कमी पडत नाही आणि जिथे त्याच्या उसळून येणाऱ्या भावनांना झेलायचं असतं, तिथेही ती तितकीच कधी प्रवाही, तर कधी निश्चल राहते. ‘कॉकटेल’ आणि ‘यह जवानी है दिवानी’ मधल्या तिच्या दोन व्यक्तिरेखांचं हे एक मिश्रण होतं. जे साहजिकच आव्हानात्मक होतं. ती ते आव्हान पेलते.

संगीत ए. आर. रहमानचं आहे म्हणून ‘मस्त आहे’ असं म्हणायला हवं. काही कलाकृती आपल्या कुवतीच्या बाहेर असतातच. ‘तमाशा’मधला रहमान माझ्या कुवतीबाहेरचा असावा. मात्र हेच संगीत इतर कुणाचं असतं तर त्याला काय म्हटलं असतं, हा विचार केल्यावर वाटतं की, जर काही कमी पडलं असेल, तर संगीताची बाजूच. गाण्यांचं अप्रतिम चित्रीकरण हेसुद्धा एक इम्तियाझ अलींचं बलस्थान आहे. त्यांच्या सिनेमात गाणी कधीच घुसडलेली वाटत नाहीत आणि काही गाणी तर कथेला खूप जलदपणे पुढे नेण्यात महत्वाची भूमिका निभावतात. (उदा. ‘जब वी मेट’ मधलं ‘आओगे जब तुम ओ साजना..’ आठवा.) इथेही प्रत्येक गाणं अप्रतिम चित्रित केलं असल्याने त्या संगीताचा मला त्रास झाला नाही, इतकंच.
मात्र ‘इर्शाद कमिल’ चे शब्द मात्र सर्व गाण्यांना अर्थपूर्णही करतात, हेही खरं !

फ्रान्स, टोकियो, दिल्ली अत्यंत सुंदरपणे टिपल्याबद्दल छायाचित्रक 'एस रवी वर्मन' ह्यांचाही उल्लेख आवश्यक आहे. प्रत्येक फ्रेम कहाणीशी सुसंगतपणे कधी फ्रेश, तर कधी झाकोळलेली दिसली आहे.

सिनेमा एका वैचारिक उंचीवर आहे. त्याची मांडणी वेगळ्या धाटणीची आहे. ती कदाचित सर्वांच्या गळी उतरणार नाही. पण ज्यांना ती पटेल, त्यांना ती खूप आवडेल हे निश्चित. पण जी उंची व संवेदनशीलता एकूण हाताळणीत जाणवते ती नेमकी सिनेमाच्या शीर्षकात जाणवत नाही. ‘तमाशा’ ही शीर्षक अतिरंजित, भडक वगैरे काहीसं वाटतं. ते ह्या कहाणीशी न्याय करत नाही. सिनेमा जितका हळवा आहे, तितकंच हे शीर्षक मात्र भडक आहे.
असो.
‘तमाशा’ ही माझी कहाणी आहे. कदाचित तुमची आहे आणि तुमच्या ओळखीच्या अनेकांचीही असू शकते. मला ‘तमाशा'ने 'अंतर्मुख' केलंय की 'प्रभावित' केलंय, हे येणारा काळ सांगेल. तुम्हालाही किमान प्रभावित व्हायचं असेल, तर अवश्य पाहा. नाही पाहिलात, तरी चालतंय. शर्यत सुरू राहीलच.
'रॅट रेस' !
भागते रहो !

रेटिंग - * * * *

- रणजित पराडकर
हे परीक्षण दै. मी मराठी लाईव्ह मध्ये आज २९ नोव्हेंबर २०१५ प्रकाशित झालं आहे - 


Monday, November 16, 2015

दिल बहल जाएगा आखिर को तो सौदाई हैं !


तलत आणि किशोर मला प्रचंड जवळचे वाटतात. रफी, मन्नाही खूप आवडतात, पण अगदी स्पष्ट शब्दांत सांगायचं तर जेव्हा मी स्वत:ला पडद्यावर इमॅजिन करतो तेव्हा मला तलत किंवा किशोर हेच माझे आवाज वाटतात. हे बोलणं आगाऊ आहे, पण खरं तेच. 
किशोरशी माझी ओळख खूपच पूर्वीपासूनची. 'ओडलाई युडलाई' करत तो मला भेटला. नंतर त्याच्या गायकीतला ठहराव मला अनेकदा स्तिमित करत राहिला आणि आजही तो अधूनमधून नव्याने भेटत राहतो 'चेएची जा रे आमी..' सारख्या गाण्यांतून. तर तलतशी ओळख मात्र गेल्या काही वर्षांतलीच. तलतचं पहिलं ऐकलेलं गाणं होतं 'जिंदगी देनेवाले सुन..' आणि मग इतरही काही. पण ज्या गाण्याने अगदी आतपासून हलवलं ते 'फिर वोही शाम..' कॉलेजच्या दिवसांत पुरेसे पैसे साठले की एचएमव्हीच्या रिवायवल सिरिजमधल्या कॅसेट्स मी जेव्हा चर्चगेटच्या 'ग्रूव्ह'मध्ये जाऊन रँडम सिलेक्शन करुन घेऊन यायचो, तेव्हा एका कॅसेटमध्ये हे गाणं होतं. तो हळवा कापरा आवाज व्याकुळ करुन गेला. पहिल्यांदा ऐकताना हे तालाशी खेळणारं गाणं मला गायला जमणं तर सोडाच, गुणगुणायलाही जमेल असं अजिबात वाटलं नव्हतं. पोर्शेच्या शोरुममधली चकाचक लाल रंगाची जबरांडुस कार आपण रस्त्यावरुनच डोळे भरुन पाहून घ्यावी, तसं मी हे गाणं निरपेक्ष हव्यासाने ऐकत असे. (निरपेक्ष हव्यास - ही कन्सेप्ट मी एक्स्प्लेन करु शकणार नाही.) मला हे गाणं ऐकताना एका पलंगावर पाय खाली सोडून शांत बसलेला मीच दिसत असे आणि मी ते संपूर्ण गाणं त्याच पोझिशनमध्ये, मानही न हलवता गातोय असं वाटे. (शेकडो वेळा ऐकल्यावर आता कुठे गुणगुणण्याचा कॉन्फिडन्स आलाय.)
तलत ह्या गाण्यातून मला कडकडून भेटला, भेटायला लागला. मग त्याची सगळीच गाणी अशीच अतिशय संयतपणे आपली आर्तता मांडणारी वाटायला लागली. नव्हे. ती आहेतच तशी. कुठलाही आक्रोश, आक्रस्ताळेपणा, चडफडाट करणं त्या आवाजाच्या स्वभावातच नव्हतं. त्यात होती ती फक्त एक प्रकारची स्थितप्रज्ञता. त्या व्याकूळतेतही एक आत्मभान होतं. त्या उत्कटतेतही एक संयम होता. 

एकीकडे हे सगळं घडत असताना दुसरीकडे साहिर आणि राजेन्द्र क्रिशन अनेक गाण्यांद्वारे मला झपाटत होते. हे गाणं राजेन्द्र क्रिशनचं.

जाने अब तुझसे मुलाक़ात कभी हो के न हो
जो अधूरी रही वो बात कभी हो के न हो
मेरी मंज़िल तेरी मंज़िल से बिछड़ आयी हैं

हे असं कुणी लिहावं आजच्या जगात? कुणातच ही सफाई आणि साधेपणा राहिलेला नाही. जो उठतो तो गुलज़ार बनायला पाहतोय आणि बस्स मोकाट सुटतोय. पण असे शब्द उतरायला प्रतिभेवरही एक संस्कार असायला हवा तो क्वचितच जाणवतो. साधेपणा आणि शिस्तीचा संस्कार. स्वत:च स्वत:वर केलेला. ह्या शिस्तबद्ध साधेपणामुळेच लिहिलं जातं की -

फिर वोही शाम, वोही ग़म, वोही तनहाई हैं 
दिल को समझाने तेरी याद चली आयी हैं

इथल्या 'फिर' ला किती महत्व आहे, हे त्या शब्दावर रेंगाळल्यावर समजेल. 
ही कहाणी आजची नाही. रोजची आहे, कित्येक दिवसांपासूनची आहे. रोज असंच सगळं अंगावर येतं आणि रोज तुझी आठवण दिलासा द्यायला येते ! इथे तलतच्या 'फिर वोही' म्हणण्यामध्ये एक हळवी तक्रार आहे. तो हे 'फिर वोही' एक प्रकारच्या उद्गारवाचक सुरात म्हणतो. दोन शब्दांत हे तक्रारयुक्त आर्जव तलत करतोय. हे दोन शब्द जर जसेच्या तसे जमले नाहीत, तर बाकीचं गाणं गाऊच नये. कारण सगळी 'जान' इथे आहे.

फिर तसव्वुर तेरे पहलू में बिठा जाएगा
फिर गया वक़्त घड़ीभर को पलट आएगा
दिल बहल जाएगा आखिर को तो सौदाई हैं 

आता परत एकदा माझं भावविश्व तुझ्या जवळ येऊन बसेल अन् जुन्या दिवसांना उजाळा मिळेल आणि ह्या सगळ्या स्वप्नरंजनातच भोळसट मन खूष होईल ! 
- हे सगळं फक्त कथन आहे. पण त्यातलं जे चित्रण आहे ते पुन्हा एकदा एक तटस्थ, आर्जवी तक्रार करतंय. ही व्यथा जितक्या साधेपणाने एक कवी मांडतोय, तितक्याच साधेपणाने एक गायक गातोय आणि दोघांमधला पूल आहे अजून एक अफलातून माणूस. 'मदन मोहन'. हा तर सगळ्यांचा बाप होता, बाप. 

मदन मोहनला 'गझल किंग' म्हटलं जातं. हे गाणं 'गझल' नाही. मात्र त्याचा बाज तसाच आहे. स्वत: मदन मोहन किती आर्त आवाजाचा धनी होता, हे जाणण्यासाठी यूट्यूबवर त्याच्या आवाजातलं 'नैना बरसे रिमझिम रिमझिम..' ऐका किंवा 'दस्तक' चित्रपटातलं 'माई री, मैं कासे कहूँ..' ऐका. 
मदन मोहनची गाणी ऐकताना मी त्या त्या गाण्याच्या फ्लॅशबॅकमध्ये जातो. हार्मोनियम घेऊन बसलेला मदन मोहन, अधूनमधून सिगरेटचे झुरके मारत लता बाई, तलत, रफी ह्यांना गाण्याची चाल सांगतोय. मग त्यावर बहुतेक काम ते लोक स्वत:चं स्वत: करत असतील. ते लोक गात असताना मध्येच एखादी जागा 'अंहं.. यह सुनो..' म्हणून तो स्वत: गाऊन दाखवत असेल. मग एक 'वाहवा' ची देवाणघेवाण ! सोबत राजेंद्र क्रिशनसुद्धा असेल. तो सांगत असेल, 'अमुक शब्दाचा, अक्षराचा उच्चार असा असा हवा'. हे गाणंही मदन मोहनने आधी स्वत: गायलं असेल.. 'फिर वोही शाम..' हात वरुन खाली गोलाकार आणत. सगळंच अफाट. इथे माझा 'तसव्वुर' त्यांच्या 'पहलू'त जाऊन बसतो आणि 'दिल बहल जाता हैं आखिर को तो सौदाई हैं' !

यथावकाश जसजसं हे गाणं खूप भिनलं तसतसा मी ते गुणगुणायला लागलो आणि एक दिवस एका लाईव्ह कार्यक्रमात एका गायकाने हे गाणं सादर करताना सांगितलं की, 'हे तलतचं शेवटचं गाणं होतं. 'जहाँ आरा' नंतर, 'फिर वोही शाम..' नंतर तलत कुठल्याच सिनेमासाठी गायलाच नाही !' 
शिखरावर पोहोचून निवृत्ती घेणं, आजपर्यंत सचिनपासून लता बाईंपर्यंत कुणाला जमलेलं नाही. प्रत्येकाने घसरगुंडी झाल्यावरच विश्राम घेतलाय. एक तलतच जो जितक्या शांतपणे काळीज चिरणारी व्यथा गायचा, तितक्याच शांतपणे 'आपलं काम संपलं आहे' हे मान्य करणारा ! खरा स्थितप्रज्ञ !

जाता जाता, ह्या गाण्याचं तिसरं कडवं. जे सहसा ऐकायला मिळत नाही -

फिर तेरे ज़ुल्फ़ की, रुखसार की बातें होंगी
हिज्र की रात हैं मगर प्यार की बातें होंगी
फिर मुहब्बत में तड़पने की क़सम खायी हैं !

__/\__


- रणजित 

Sunday, November 15, 2015

अपरिपूर्ण तरी अद्वितीय ! (Movie Review - Katyar Kaljat Ghusli)

असं म्हणतात की ताजमहाल बनल्यानंतर शाहजहानने ती कलाकृती साकारणाऱ्या कारागिरांचे हात छाटून टाकले होते, जेणेकरून अशी दुसरी कलाकृती बनवली जाऊच नये. ह्या सृष्टीचा कर्ता-करविताही काही निर्मिती केल्यानंतर ते साचेच नष्ट करत असावा. काही व्यक्ती, वास्तू, जागा म्हणूनच एकमेवाद्वितिय ठरत असाव्यात आणि म्हणूनच महान कलाकृतीही एकदाच बनत असतात.
पण, अस्सल सोनं असलं, तरी त्यावर धुळीची पुटं जमली की त्याची लकाकी झाकली जातेच. त्यामुळे ही पुटं झटकणे हेही एक महत्वाचं कार्य आहे. एका पिढीने जर अस्सल सोनं जतन केलं असेल, तर त्यावर काळाच्या धुळीची पुटं जमू न देणे हे पुढच्या पिढ्यांनी आपलं कर्तव्यच मानायला हवं.
महान कलाकृतीला पुनर्निमित केलं जाऊ शकत नाही. पण तिच्या प्रतिकृती बनू शकतात. ह्या प्रतिकृतीच्या निमित्ताने विस्मृतीची पुटं झटकून सोनेरी स्मृतींना झळाळी दिली जाऊ शकते. गाण्यांची रिमिक्स आणि चित्रपटांचे रिमेक्स करताना हाच एक प्रामाणिक उद्देश असेल, तर होणारी पुनर्निमिती त्या पूर्वसूरींच्या आशीर्वादाने उत्तमच होईल. 'कट्यार काळजात घुसली' ला मोठ्या पडद्यावर आणताना संपूर्ण टीम आपल्या ह्या उद्देशाशी पूर्ण प्रामाणिक राहिली आहे, हे सतत जाणवतं आणि म्हणूनच भव्य पडद्यावर जेव्हा ह्या महान कलाकृतीची प्रतिकृती साकारली जाते, तेव्हा ती प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते, टाळ्या मिळवते आणि मुक्त कंठाने दादही मिळवते.



'कट्यार' हे एका पिढीने मनाच्या एका कोपऱ्यात श्रद्धेने जपलेलं सांगीतिक शिल्प. आजच्या पिढीतल्याही अनेकांनी त्या शिल्पाला मानाचं स्थान दिलं आहे. त्याचं सुबोध भावे, राहुल देशपांडे आदींनी नुकतंच नव्याने सादरीकरणही केलं होतं. पण तरी आजच्या पिढीतला एक भलामोठा वर्ग असा आहे, ज्याला हे नाट्य केवळ ऐकूनच माहित आहे. हा चित्रपट त्याही वर्गापर्यंत पोहोचणार आहे. नव्हे, पोहोचलाच आहे आणि पोहोचतोच आहे ! ह्या पिढीसाठी अमुक गाणं मूळ नाटकात होतं का की नवीन आहे ? हा प्रश्न वारंवार पडू शकेल. असा प्रश्न पडणे, ह्याचा अर्थ काय होतो ? ह्याचा हाच अर्थ होतो की मूळ संगीत व चित्रपटासाठी केलेलं नवनिर्मित संगीत हे परस्परांत बेमालूमपणे मिसळलं गेलं आहे. 'कट्यार' चा अश्या प्रकारे चित्रपट बनवत असताना 'संगीत' हेच सगळ्यात मोठं आव्हान होतं. ह्या आव्हानाला पेलायला चित्रपटकर्त्यांनी उत्तमांतल्या उत्तमांना निवडलं आणि त्यांनी आपली निवड सार्थही केली. 'शंकर-एहसान-लॉय' ह्यांनी आठ नवीन गाणी दिली आहेत आणि एकेक गाणं त्यांच्या प्रामाणिक मेहनतीचं प्रतिक आहे. कुणास ठाऊक किती वर्षांनंतर एक सांगीतिक चित्रपट - भले 'रिमेक' का असेना - आला आहे ! ह्या नव्या कट्यारीचे नवे सूरही तितकेच धारदार आहेत आणि ते काळजात न घुसल्यास काळीज दगडी आहे, हे निश्चित ! सूर निरागस हो, दिल की तपिश, यार इलाही, मनमंदिरा ही गाणी तर केवळ अप्रतिम जमून आलेली आहेत. समीर सामंत आणि मंदार चोळकर ह्यांचे आशयसंपन्न शब्द, अवीट गोडी असलेलं संगीत आणि अरिजित सिंग, शंकर महादेवन, राहुल देशपांडे ह्यांचे जवारीदार आवाज असं हे एक जीवघेणं मिश्रण आहे. कविराजांसाठी (बहुतेक समीर सामंतनेच) लिहिलेला छंदही सुंदर आहे.
अभिषेकी बुवांचे जुन्या कट्यारीचे संगीतसुद्धा नवनिर्मित करताना त्यावर चढवलेले साज त्याच्या सौंदर्यात भरच घालतात. मात्र मूळ नाटकात असलेली काही स्त्री गायिकांची पदं इथे वगळली आहेत. काही गाणी स्त्री आवाजात असणे आवश्यक होते, त्यामुळे एक प्रकारचा - कितीही नाही म्हटलं तरी - जो 'तोच-तो' पणा आला आहे, तो टाळता आला असता. कहाणीत अश्या नव्या पेरणीसाठीही जागा होत्या, त्या दिसल्याच नाहीत की जाणीवपूर्वक दुर्लक्षिल्या गेल्या, हे माहित नाही. मात्र त्यांवर जाणीवपूर्वक काम करता आले असते, जे केलेले नाही, हेही खरंच. तसेच एका प्रसंगी 'खां साहेबां'च्या संवादांतून आता इथे 'ह्या भवनातील गीत पुराणे..' सुरु होईल असं ठामपणे वाटतं, प्रत्यक्षात ते तिथेच काय, कुठेच येत नाही !

ही सगळी गाणी व कहाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पडद्यावर दिसणारे झाडून सगळे लोक टाळ्यांच्या कडकडाटाचे सन्माननीय धनी आहेत. सुबोध भावे तर एक जबरदस्त ताकदीचा अभिनेता आहेच. तसं त्याने लोकमान्य व छोट्या पडद्यावरील काही कामांतूनही वारंवार सिद्ध केलं आहे. इथे त्याने साकारलेला 'सदाशिव'सुद्धा अविस्मरणीयच !
बालगंधर्व,
विशेष कौतुक करायला हवं ते शंकर महादेवन ह्यांचं. पंडितजींच्या भूमिकेतला शंकर महादेवन, मला वाटतं

प्रथमच अभिनय करताना दिसला आहे. स्वत: एक महान गायक असलेल्या शंकर महादेवनना पंडितजींना गाताना साकार करणं तसं सोपं गेलं असू शकेल, मात्र जिथे फक्त आणि फक्त अभिनय हवा होता, तिथेही हा माणूस कमालच करतो ! उच्चार, संवादफेक कुठेही नवखेपण किंवा अमराठीपण औषधापुरतंही जाणवू देत नाही !
चित्रपटाचा 'मालक' मात्र ठरतो तो सचिन पिळगांवकर. छोट्या पडद्यावर व इतर काही जाहीर प्रगटनांतून गेल्या काही वर्षांत 'महागुरू' म्हणून काहीश्या हेटाळणीयुक्त विनोदाचा विषय ठरलेल्या सचिनने साकारलेल्या 'खां साहेब' ला लवून मुजरा करायला हवा. त्याने टाकलेले शेकडो कटाक्ष पडद्याला छिद्रं पाडतात, इतके धारदार आहेत. सचिनची 'महागुरू' म्हणून ओळख विसरून जाऊन त्याला इथून पुढे 'खां साहेब' म्हणूनच ओळखायला हवं. 'खां साहेब' ची आपल्या कलेवरची निस्सीम श्रद्धा, परिस्थितीमुळे आलेली हताशा, पराभवाच्या मालिकेमुळे आलेली नकारात्मकता, त्या नकारात्मकतेतून जन्मलेली खलप्रवृत्ती आणि विजयाचा उन्माद व नंतर शब्दा-शब्दातून जाणवणारा प्रचंड अहंकार हे सगळं एकाच ताकदीने व सफाईने सचिन साकार करतो.

सुबोध भावे, शंकर महादेवन आणि सचिन, ह्या तिघांसाठी आपापल्या व्यक्तिरेखा साकार करताना गाणं समजून घेणे अत्यावश्यक होतं. तिघांपैकी कुणीही त्यात तसूभरही कमी पडलेलं नाही. कुठलीही तान, हरकत आणि साधीशी मुरकीसुद्धा त्यांनी सपाट जाऊ दिलेली नाही. त्यांच्या नजरा व हातांना कुंचल्याचं रुप दिलं असतं, तर प्रत्येक गाण्याचं एक त्या गाण्याइतकंच सुंदर चित्र त्यांनी रेखाटलं असतं. देहबोलीत कुठलीही कृत्रिमता किंवा सांगितल्या बरहुकूम केल्याचं जाणवतही नाही. जे काही केलं आहे, ते त्यांनी स्वत:, उत्स्फूर्तपणे केलं आहे, हे निश्चित.

'उमा'च्या भूमिकेत मृण्मयी देशपांडे खूप गोड दिसते ! निश्चयी, खंबीर व गुणी उमा म्हणून ती शोभतेच. तर 'झरीना'च्या भूमिकेत अमृता खानविलकर समंजस अभिनयाने चकितच करते ! आधी म्हटल्याप्रमाणे उमा, झरीना, मृण्मयी आणि अमृता ह्या चौघींनाही एकेक गाणं द्यायला हवं होतं, तो त्यांचा अधिकारच होता बहुतेक !
लहानातल्या लहान भूमिकेतल्या अभिनेत्यां/ अभिनेत्रींनी त्या त्या व्यक्तिरेखेला जगलं आहे. खरं तर मराठी चित्रपट हा अभिनयाच्या बाबतीत इतर बहुतेकांपेक्षा बऱ्याच इयत्ता पुढे आहेच, त्यामुळे तसं पाहता 'मराठी चित्रपट' आणि 'अप्रतिम अभिनय' हे सूत्र कायमस्वरूपी गृहीतच धरायला हवे आणि म्हणूनच कथानकाला सादर करण्याची दिग्दर्शकाची जबाबदारी जरा वेगळ्या पातळीवरचीही मानायला हवी. सुबोध भावेंचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. तरी काही सुटे किंवा ढिले धागे खटकतातच. सदाशिव आणि उमाची प्रेमकहाणी अगदी स्पष्ट शब्दांत सांगायचं तर टिपिकल मसाला चित्रपटातला जिन्नस वाटते. मनमोहन देसाई किंवा बडजात्या टाईप. बालपणीचं प्रेम आणि मग अनेक वर्षांनी एकमेकांना भेटल्यावर ते लहानपणीचं गाणं गाऊन आपली ओळख पटवून देणे हा सगळा मसाला आता शिळा झाला आहे. तो वापरायला नकोच होता. असंही त्यामुळे कथानकाला कुठलाही महत्वपूर्ण हातभार लागत नव्हताच आणि ज्या पातळीला (कलावंताचा अहंकारेत्यादी) बाकी कथानक चाललं आहे, त्यासमोर हे सगळं प्रकरण बालिश वाटतं. चौदा वर्षांनंतर आलेल्या सदाशिवचा आगा-पिच्छाही कथानकात मांडला जात नाही. ज्यांनी मूळ नाटक पाहिलेलं आहे किंवा मूळ कथानक माहित आहे, त्यांनाच ते समजू शकतं. इतरांना 'हा कोण आहे ? ह्याच्याशी मिरजेत नेमकी ओळख कशी झालेली असेल ?' इथपासून 'चौदा वर्षं होता कुठे?' इथपर्यंत प्रश्न पडतात, ज्यांची उत्तरं मिळत नाहीत. एका इंग्रज अधिकाऱ्याचं पात्रही असंच अधांतरी आहे. त्याचीही चित्रपटात अजिबातच गरज नव्हती. 'झरीना'ला नाचताना दाखवणे, हा त्या काळाच्या मुस्लीम संस्कृतीचा विचार करता न पटणारा भाग होता, तोसुद्धा टाळता आला असता. तसेच मूळ संहितेत महत्वाचं पात्र असलेल्या काविराजाच्या भूमिकेला इथे बरीच कात्री लावली गेली आहे. इतर अनावश्यक भरणा न करता, ही भूमिका जतन केली गेली असती, तर ? असाही एक प्रश्न पडला.

असे सगळे असले तरी, 'कट्यार' हा असा चित्रपट आहे की जो पाहणे प्रत्येक चित्रपटरसिकाचं कर्तव्यच आहे. (ह्यात सर्व भाषिक आले.) कारण 'म्युझिकल'साठी संगीत देण्याची पात्रता एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच लोकांची असल्याने 'म्युझिकल्स' चा जमाना आता गेला आहे, हे कटू सत्य आहे. त्यामुळे, असा दुसरा चित्रपट होणे अवघडच आहे.
ह्या सुमधुर संगीतमय कट्यारीच्या घावाची सुगंधी जखम येणाऱ्या पिढ्यांना अभिमानाने दाखवण्याची एक सुवर्णसंधी सर्व रसिकांना दिल्याबद्दल संपूर्ण 'कट्यार' टीमचे मन:पूर्वक अभिनंदन आणि मानाचा मुजरा !

रेटिंग - * * * *

- रणजित पराडकर
हे परीक्षण दै. मी मराठी लाईव्हमध्ये १५ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे.

Saturday, November 07, 2015

ओघळछंद

ओंजळभर भरून येते
पापणभर वाहुन जाते
नजरेस किनारा मिळतो
अन् नजर प्रवाही होते

अस्पष्ट बोलकी नक्षी
क्षणभंगुर अस्तित्वाची
स्मरणांतुन वाहत जाते
शृंखलाच ओलाव्याची

हे झरझर सरते चित्र
अर्थाचे तुषार देते
थेंबांना जुळता जुळता
गहिवरून भरते येते

थेंबाचा व्हावा शब्द
शब्दाला ओघळछंद
थेंबांची कुजबुज व्हावी
शब्दांनी अक्षरबद्ध

शांततेत नि:शब्दावे
नि:शब्दी कल्लोळावे
थेंबांनी थेंबांसाठी
केवळ इतकेच करावे


....रसप....
(१६ जुलै २०१५ ते ०८ सप्टेंबर २०१५)

Thursday, November 05, 2015

प्रेम - तुमचं, आमचं आणि त्यांचं



सदर लेख 'श्री. व सौ.' च्या दिवाळी अंक २०१५ साठी लिहिला आहे.
हा लेख लिहिण्यासाठी माझा मित्र अमोल उदगीरकरशी झालेली चर्चा लाख मोलाची होती. 
संपादक श्री. संदीप खाडिलकर ह्यांचे आभार ! त्यांनी तर लिहूनच घेतलं आहे माझ्याकडून !

काही दिवसांपूर्वी 'कट्टी-बट्टी' पाहिला. त्यातली ती बेदरकार कंगना राणावत आणि तिला तशीच स्वीकारणारा इम्रान खान पाहून बाहेर पडलो. चित्रपट तसा टुकारच होता. बहुतेक जण विचार करत होते की, 'चित्रपट जास्त बंडल होता की इम्रान खान?', पण माझ्या मनात मात्र  वेगळाच झगडा चालू होता. ह्या दोन व्यक्तिरेखांना
मान्य करतानाच माझी ओढाताण होत होती. म्हणजे एखाद्या मुलाने 'प्रपोज' केल्यावर स्वत:च 'अभी सिरियस का मूड नहीं हैं. टाईमपास चलेगा, तो बोल !' असं उत्तर देणारी कंगना आणि अश्या पूर्णपणे बेभरवश्याच्या मुलीसोबत 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहून त्या नात्याबाबत गंभीरही असणारा इम्रान काही केल्या माझ्या जराश्या प्रतिगामी बुद्धीला पचतच नव्हते. विक्रमादित्याच्या पाठुंगळीवरचा वेताळ बडबड करून, प्रश्न विचारून त्याला भंडावून सोडत असे. माझं आणि माझ्या मनाचंही असंच काहीसं सुरु झालं होतं. काही वेळाने मनातल्या मनात एका चित्रपटापुरताच चाललेला हा संवाद द्वितीयपुरुषी झाला. माझं मन माझ्याच समोर आलं आणि म्हणालं -

"मित्रा,

तू आणि मी बऱ्याच पूर्वी 'मागल्या पिढीचे' झालो आहोत, हे मला तरी आत्ता आत्ता समजायला लागलंय. आता 'मागल्या पिढीचे' म्हणून लगेच स्वत:ला म्हातारा समजू नकोस ! तरुणाईतसुद्धा 'नवतरुण' आणि 'फक्त तरुण' असे दोन प्रकार असावेत. तू आणि मी 'फक्त तरुण' आहोत. नवतरुणाईशी बऱ्याच बाबतींत आपली आवड-निवड जुळत नाही किंवा जुळवून घेताना त्रासच होतो. राजकारण, क्रीडा, विज्ञान, धर्म, कला आणि एकंदरीतच आयुष्याकडे पाहण्याचा 'आजचा' दृष्टीकोन आणि 'आपला' दृष्टीकोन एकच आहे का रे ? पहा जरासा विचार करून.
मला तर असंही वाटतं की पिढ्यांतसुद्धा उप-पिढ्या पडायला लागल्या आहेत, आपल्या बहुपदरी जातिव्यवस्थेप्रमाणे ! तुझी आणि माझी अशीच एक उपपिढी. आजचीच, तरी वेगळी.  म्हणजे आपण स्वत:ला आजच्या पिढीचे समजावं, तर तिथे नाळ जुळत नाही आणि मागच्या पिढीचे समजावं, तर तेव्हढं वय झालेलं नाही ! काळ बदलतोय, मित्रा, Time is changing. आणि महत्वाचं म्हणजे, ही जी बदलाची गती आहे, तीसुद्धा सतत बदलते आहे, वाढते आहे. आज सर्वमान्य, सर्वप्रिय असलेली कोणती संकल्पना उद्या मोडीत निघेल सांगता येत नाही ! ही गती इतकी प्रचंड आहे की आनंद बक्षी साहेबांच्या शब्दांत सांगायचं तर -

आदमी ठीक से देख पाता नहीं
और परदे से मंज़र बदल जाता हैं !

ह्या ओळींवरून आठवलं. हे गाणं तू कॅन्टीनच्या टेबलावर ठेका धरून गायचास कॉलेजात असताना. आज कुणी गात असेल का रे ? कुमार सानू, उदित नारायण वगैरेंच्या काळातही तू तरी किशोर, रफीमध्येच रमला होतास. 'ओ हंसिनी, मेरी हंसिनी, कहाँ उड़ चली..' हे गाणं तू २ वर्षं कॅन्टीनमध्ये 'तिच्या'साठी गात होतास. शेवटपर्यंत मनातली गोष्ट सांगू शकला नाहीसच आणि 'ती' हंसिनी खरंच 'कहाँ उड़ चली' गयी ते तुझं तुलाच कळलं नाही. अशी प्रेमं तरी होत असतील का रे आजकाल ? कुणास ठाऊक !
माझा एक ठाम विश्वास आहे. चित्रपट आणि आजचा समाज ह्यांचं एक घनिष्ट नातं असतं. आता चित्रपटामुळे समाजात बदल होतात, समाजानुसार चित्रपट बदलतो की दोन्ही थोड्याफार प्रमाणात होतच असतं, हा विषय वेगळ्या मंथनाचा आहे. पण ते परस्परपूरक तर नक्कीच आहेत. मी काही फार पूर्वीचं बोलत नाही. २०-२२ वर्षांपूर्वीचे, १०-१२ वर्षांपूर्वीचे आणि आजचे चित्रपट पाहा. प्रेमाकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा बदलत गेला, बदलला आणि बदलतोही आहे.

'क़यामत से क़यामत तक़', 'मैने प्यार किया' वगैरेचा जमाना आठव. अरे प्रत्येक चित्रपटात 'प्रेम, प्रेम आणि प्रेम'च असायचं ! म्हणजे नाही म्हटलं तरी ९९% चित्रपट हे 'प्रेम' ह्या विषयावरच आधारित असत आणि उर्वरित १% चित्रपटांत 'प्रेम' हे उप-कथानक असे. आमटीत कढीपत्ता टाकतात. तो खालला जात नाही. पण त्याचा स्वाद असतोच. तसंच, प्रत्येक चित्रपटाच्या कहाणीतली कढीपत्त्याची पानं म्हणजे 'प्रेम' असे. पुढे हे प्रमाण जरा बदललं. १% चं ६-७% वगैरे झालं असावं आणि आज तर अस्सल प्रेमकहाणी १% चित्रपटांत असेल. ९९% चित्रपटांत 'प्रेम' हे उपकथानक झालंय ! बरं, फक्त 'वेटेज' बदललंय असंही नाही. सादरीकरणही बदललंय.

प्रेमकहाणीतला खलनायक ही संज्ञा कालबाह्य होत चालली आहे बहुतेक. पूर्वी प्रेमातले अडथळे असायचे धर्म,
गरिबी-श्रीमंती, खानदानी दुष्मनी वगैरे. त्यामुळे ओघानेच खलव्यक्ती यायच्याच. आताच्या प्रेमातले अडथळे वेगळ्या प्रकारचे आहेत. हे अडथळे नायक-नायिकेच्या मनातच असतात. त्यांना 'खल' ठरवता येत नाही. आजचे प्रेमी करियरकडेही लक्ष देतात. आर्थिक बदलांनंतर उघडलेल्या अनेक दरवाज्यांमुळे विविध स्वप्नं आजकाल खुणावतात. आयुष्य बदललं, तसं 'प्रेम'ही आणि त्यावर आधारित चित्रपटही.
'कभी हां कभी ना' मधला कुचकामी शाहरुख खान, त्याचं प्रेम असलेल्या 'सुचित्रा कृष्णमुर्ती'चं लग्न 'दीपक तिजोरी'शी होत असतानाही आनंदाने त्यात सहभागी असतो. त्याच्या पराभवात आपल्याला त्याचा विजय वाटला होता. पण त्या काळातल्या चित्रपटांच्या प्रकृतीचा विचार करता, तो शेवट 'अहेड ऑफ द टाईम' म्हणता येऊ शकेल. असा शेवट आजचे चित्रपट करतात, कारण असा विचारही आजची पिढी करते.
घरचं सारं काही सोडून देऊन स्वत:च्या प्रेमाखातर कुठल्याश्या दूरच्या गावी येऊन एखाद्या खाणीत अंगमेहनतीचं काम करणारा 'मैने प्यार किया' मधला सलमान आता दिसणार नाही. आता दिसेल, 'मला माझं स्वप्न साकार करायचं आहे', असं ठामपणे सांगून स्वत:चं प्रेमही मागे सोडून जाणारा 'यह जवानी है दीवानी' मधला रणबीर कपूर आणि त्याच्या त्या निर्णयाला 'त्याचा निर्णय' म्हणून स्वीकारणारी व स्वत:च्या आयुष्याकडे समंजसपणे पाहून पुढे जाणारी दीपिका पदुकोण. 'खानदान की दुष्मनी' मुळे घरून पळून जाणारे 'क़यामत से क़यामत तक' वाले आमीर खान आणि जुही चावला आता दिसणार नाहीत. आता मुलाने लग्नाला आयत्या वेळी नकार दिल्याने हट्टाने एकटीच हनिमूनला जाणारी 'क्वीन' कंगना राणावत दिसते आणि तिच्यात इतकी धमकही असते की नंतर परत आलेल्या त्या मुलाला ती झिडकारूनही लावेल !
फार पूर्वी, म्हणजे कृष्ण-धवल काळात, नायकाने नायिकेचा हात हातात घेणं म्हणजे 'अंगावर शहारा' असायचा. नंतर गळ्यात गळे पडू लागले आणि आता लग्नपूर्व संबंध किंवा किमान चुंबनदृश्यंही अगदी किरकोळीत चालतात ! 'कॉकटेल' सारख्या चित्रपटात बिनधास्त आयुष्य जगणारे सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण
दिसतात. दीपिकाची 'व्हेरॉनीका' तर 'ओपन सेक्स' चा खुलेआम पुरस्कार करते. तिथेच तिच्यासमोर असते 'डायना पेंटी'ने सादर केलेली एक व्यक्तिरेखा जी तिच्या पळून आलेल्या नवऱ्याला शोधण्यासाठी सैफ-दीपिकाच्या दुनियेत आलेली असते. संपूर्ण चित्रपटभर डायना पेंटीची 'मीरा' आपल्याला पटत नाही आणि उच्छ्रुंखल 'व्हेरॉनीका' मात्र चालून जाते. त्यांच्या कात्रीत अडकलेल्या सैफच्या 'गौतम'शी आपण नातं सांगतो. मात्र खऱ्या आयुष्यात हे संबंध आपण स्वीकारू शकणार नाहीच. कारण तू आणि मी वेगळ्या उप-पिढीचे आहोत ना रे !

गरीब-श्रीमंत ही तफावत दाखवण्यात तर आजकाल कुणी वेळ घालवतच नाही ! 'जब वी मेट' आणि 'वेक अप सिड' मधल्या नायक-नायिकांमधली आर्थिक परिस्थितीची तफावत सुस्पष्ट असली, तरी चित्रपट त्यावर भाष्य करत बसत नाही. कारण व्यक्तिरेखांना इतर अधिक महत्वाच्या समस्या आहेत. त्यांचा स्वत:शीच झगडा सुरु
आहे. आजच्या चित्रपटातील तरुण नायक-नायिका आपल्याच मनातला गोंधळ स्वीकारतायत आणि आपल्यालाच पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतायत. भटिंड्याहून मुंबईला शिकण्यासाठी आलेली खमकी करीना कपूर, अपयशी प्रेम व निराशाजनक आयुष्याला कंटाळून जीव देण्याच्या विचारापर्यंत पोहोचलेल्या अतिश्रीमंत शाहीद कपूरला फक्त एक मित्र म्हणून स्वीकारते, तेव्हा त्या नात्याबाबत तिच्या मनात कुठलेच संभ्रम नसतात. त्यामुळेच पुढे जेव्हा ती स्वत: प्रेमातल्या धक्कादायक अपयशाला सामोरी जाते, तेव्हा ती एकटीच उभी राहण्याची धडपड करत राहते. 'वेक अप सिड' मधला अमीरजादा बेजबाबदार रणबीर कपूर परिपक्व विचारांच्या, वयाने थोडी मोठी असलेल्या आणि दिसायलाही साधीच असणाऱ्या कोंकणा सेन शर्मावर प्रेम करायला लागतो. तो आयुष्यात इतका भरकटलेला व गोंधळलेला असतो की त्याचं प्रेमही त्याला स्वत:ला समजत नाही. ह्या व अश्या चित्रपटांत नायक व नायिकेत गरिबी व श्रीमंतीची एक मोठी दरी असतानाही, प्रेमकहाणीचा सगळा 'फोकस' व्यक्तिरेखांच्या वैयक्तिक समस्यांवरच ठेवलेला आहे.

'ठरलेलं लग्न करावं की नाही ?' ह्या द्विधेत असलेल्या अभय देओलला, लग्नाच्या पत्रिकाही वाटून झालेल्या असतानाही, त्याचा मित्र हृतिक रोशन 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मध्ये म्हणतो, 'Dude, its YOUR life !' तिथेच फरहान अख्तरचा एका स्पॅनिश मुलीसोबतचा 'वन नाईट स्टॅण्ड' दाखवताना त्या नात्याला 'व्यभिचार' म्हणून दाखवलं जात नाही.
इतर कुणाहीपेक्षा माझ्या आयुष्यावर माझा हक्क सगळ्यात जास्त आहे, हा विचार आताशा मनांत रुजायला लागला आहे. स्वबळावर नितांत विश्वास असणाऱ्या ह्या मनाला आता देव, धर्म, आई-वडिलांचा आधार वगैरे अनन्यसाधारण वाटत नाहीत. ह्याच मनाला 'प्रेम' ही गोष्टही दुय्यम किंवा तिय्यम झाली आहे. 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' मधला प्रियकर, आपल्या त्या प्रेमाखातर ज्याच्या परस्परमान्यतेची खातरजमाही
निश्चित झालेली नसते, लंडनहून थेट भारतात येतो, पंजाबमधील आपल्या प्रेयसीच्या गावीही पोहोचतो आणि अखेरीस तो दिलवाला शाहरुख आपल्या दुल्हनिया काजोलला प्राप्तही करतो. आजचा 'कभी अलविदा ना कहना' मधला शाहरुख प्राप्त केलेल्या प्रेमाशी लग्नोत्तर मतभेद झाल्यावर नव्याने प्रेमात पडतो आणि त्या प्रेमामुळे संसार संपवतो.
'कभी अलविदा ना कहना' वरून आठवलं. नातीही ठिसूळ झाली आहेत रे मित्रा आजकाल. माझ्या परिचयातल्या कित्येक जणांनी परस्पर सामंजस्याने कायदेशीर घटस्फोट घेतले आहेत आणि कित्येक जण त्याचा विचारही करत आहेत. तडजोड करणे, हेसुद्धा आताशा कालबाह्य होत चाललं आहे. कारण ? 'माझ्या आयुष्यावर माझा हक्क सगळ्यात जास्त आहे'. म्हणूनच व्यावसायिक चित्रपटकर्तेही 'कभी अलविदा ना कहना', 'चलते चलते', 'साथिया' सारखे चित्रपट बनवतात. ते तिकीट खिडकीवरसुद्धा चांगले आकडे दाखवतात.
एकूणच चित्रपटकर्त्यांची 'प्रेम' ह्या विषयाकडे पाहण्याची दृष्टी अधिक व्यापक झाली आहे. नव्हे चित्रपटाकडेच पाहण्याची दृष्टी व्यापक झाली आहे. 'प्रेम' हा विषय टाळून, गाळून कहाणी सादर होते. चित्रपटातील पात्रं प्रेमाच्या पुढचा विचार करणारी दाखवली जात आहेत. 'मैं हूँ ना', 'रंग दे बसंती', 'अब तक छप्पन्न', 'चक दे इंडिया', 'थ्री इडियट्स', 'तारे जमीं पर', 'पा', 'बजरंगी भाईजान' सारखे अनेक चित्रपट जे लोकांनी खूप डोक्यावर घेतले, ते काही प्रेमकहाणी सांगणारे नव्हतेच. करायचंच असतं तर ह्या व अश्या इतर सगळ्या चित्रपटांत प्रेमकहाणीला घुसडता आलंच असतं. पण ते केलं गेलं नाही. चरित्रपटांची जी एक लाट सध्या आली आहे तीसुद्धा म्हणूनच. चित्रपटात प्रेमकहाणी नसली, तरीही तो व्यावसायिक यश मिळवू शकतो, हा विश्वास आल्यामुळेच उत्तमोत्तम तसेच नवोदित दिग्दर्शकही चरित्रपट बनवत आहेत आणि ते यशस्वीही ठरत आहेत. नाही म्हणता, मध्येच एखादा 'रांझणा' येतो, जो एक अस्सल प्रेमकहाणीच असतो. पण तो अपवादच. किंवा एखादा 'लंच बॉक्स' येतो. पण तोही वेगळेपणामुळेच लक्षात राहतो.
हे सगळं कशाचं द्योतक आहे ?
ह्याचंच की, 'प्रेम' ही गोष्ट आताशा Just another thing झालेली आहे. आजच्या पिढीसाठीही. किंवा असं म्हणू की आजच्या त्या उप-पिढीसाठी, जिचा तू आणि मी कदाचित भाग नाही आहोत ! दिसतील. आजही कुणाच्या प्रेमासाठी वेड्यासारखे वागणारे प्रेमवीर दिसतील. ही जमात नामशेष होणार नाहीच. पण तिची संख्या कमी झाली आहे.

मला असं वाटतं, साधारणत: 'दिल चाहता है' ह्या २००१ सालच्या चित्रपटानंतर चित्रपटांत बराच बदल घडला आहे. ती कहाणी तीन मित्रांची होती. आमीर खान एक फ्लर्ट, जो दर वीकेंडला गर्लफ्रेंड बदलत असावा. सैफ अली खान एक गोंधळलेला नवतरुण, जो दर काही महिन्यांनी कुणा न कुणाच्या प्रेमात मनापासून पडत असावा. आणि अक्षय खन्ना, कलाकार असलेला, हळव्या मनाचा, सभोवतालच्या प्रत्येक चीजवस्तूकडे, व्यक्तीकडे संवेदनशीलपणे पाहणारा. अक्षय खन्नाचं त्याच्या जवळजवळ दुप्पट वयाच्या डिम्पल कपाडियाच्या प्रेमात पडणं, जे ह्या चित्रपटात दाखवलं आहे, तो हिंदी चित्रपटासाठी एक 'कल्चरल शॉक'च होता. पण ज्या विश्वासाने आपल्या पहिल्याच चित्रपटात दिग्दर्शक फरहान अख्तरने ही कहाणी सादर केली, त्यामुळे ती लोकांपर्यंत तर पोहोचलीच; पण इतर चित्रपटकर्त्यांनाही एक दृष्टी मिळाली की असा वेगळा विचार करूनही व्यावसायिक चित्रपट बनू शकतो. त्यानंतर पुढे 'प्रेम' ह्या संकल्पनेला सर्वांनीच एक तर उंच आकाशात बिनधास्त विहार करणाऱ्या पतंगाप्रमाणे मोकळं सोडलं किंवा चित्रपटाच्या दुचाकीच्या 'बॅक सीट'वर बसवलं. रायडींग सीटवर इतर राजकीय, सामाजिक, आर्थिक, मानसिक, वैयक्तिक समस्या आल्या, त्यांच्या कहाण्या आल्या. 'रायडर'चं लक्ष रस्त्यावर राहिलं आणि 'बॅक सीट'वर बसलेलं प्रेम एक तर पूर्णपणे शांत राहिलं किंवा परत खुल्या हवेचा आनंद बिनधास्तपणे घेऊ लागलं. पूर्वी शहरातल्या मुलीही स्वत:च्या अफेअर्सची खुलेआम चर्चा करत नसत. सामान्य मुलींचं सोड रे. सिनेतारकाच पहा की ! ऐश्वर्या आणि सलमानचं नातं जगजाहीर असतानाही कधी ऐश्वर्याने त्याची बिनधास्त कबुली दिली ? ते नातं दोघांकडून होतं की नाही, हे माहित नाही. पण नक्कीच काही तरी शिजतच होतं, ह्याची खात्री झाली जेव्हा सलमानने दारुच्या नशेत धिंगाणा केला. इंटरनेटवर जरासा शोध घेतला तर जुन्या जुन्या तारे-तारकांच्या प्रेमसंबंधांच्या अनेक कहाण्या वाचायला मिळतील. पण हे सगळं नेहमीच गुलदस्त्यात ठेवण्यात येत असे. मात्र आजची दीपिका पदुकोण 'My choice' चा नारा लावून स्वत:चे आयुष्य स्वत:च्या मर्जीने जगते. ती रणबीरशी अफेअर असताना शरीरावर त्याचं नाव गोंदवून घेते. ते नातं संपवल्यानंतर रणवीर सिंगसोबत जोडलेल्या नव्या नात्यालाही लपवून ठेवत नाही. कतरिना कैफ आणि रणबीर कपूर तर एकत्र राहतात. अनुष्का शर्माही विराट कोहलीसोबतचे आपले संबंध सर्वांसमोर येऊ देते.
'हे काय वय आहे का लग्नाचा निर्णय घेण्याचं ?' असं आजची मुलं स्वत:च म्हणतात. पूर्वी हा डायलॉग आई-बाप मारायचे. ही मुलं प्रेम करतात पण पुढचा निर्णय मात्र विचारपूर्वक घेतात. हाच बदल चित्रपटांत परिवर्तीत होतो आहे. पुन्हा एकदा सांगतो, कुणामध्ये कुणामुळे बदल झाला हे विचारमंथन स्वतंत्र करू. पण दोघांतही बदल झाला आहे, हे नक्कीच !

लगेच इतका चिंताक्रांत होऊ नकोस, मित्रा. पण बदलत्या काळासोबत बदलायला हवं. कारण कालबदल हा उतारावरून गडगडत येणारा एक मोठा धोंडा आहे. तू आणि मी फक्त त्याच्या रस्त्यातून बाजूला होऊ शकतो.
'प्रेम' ही काही नामशेष होणारी बाब नाही. ते शाश्वत आहे. इतर बाबी येतील आणि जातील, पण जोपर्यंत माणसाच्या भावना शाबूत आहेत, जोपर्यंत त्याचा 'रोबो' होत नाही तोपर्यंत तो प्रेम करतच राहील. त्याचं महत्व कमी होईल इतकंच. स्त्री आणि पुरुष दोघांना एकमेकांची मानसिक व शारीरिक गरज असणे, हा निसर्गनियम आहे. तो पिढ्यांच्या उप-पिढ्या पडल्याने बदलणार नाही. तो नियम पाळायचा की नाही, हा व्यक्तिगत निर्णय असला, तरी समुदायाचा कल हा नियम पाळण्याकडेच असणार आहे. त्याच्या तऱ्हा, वेळा बदलतील. प्रेम प्रत्यक्ष आयुष्यातही केलं जाईल आणि चित्रपटांतही दाखवलं जाईल. फक्त ते तू केलंस, त्यापेक्षा जरा वेगळं असेल. आजची 'नवतरुणाई' करतेय, त्यापेक्षा उद्याची वेगळ्या प्रकारे करेल. कारण आज सर्वमान्य, सर्वप्रिय असलेली कोणती संकल्पना उद्या मोडीत निघेल सांगता येत नाही ! ही गती इतकी प्रचंड आहे की आनंद बक्षी साहेबांच्या शब्दांत सांगायचं तर -

आदमी ठीक से देख पाता नहीं
और परदे से मंज़र बदल जाता हैं !"

घरी पोहोचलो. मन-मित्राचा घसा अखंड बडबडीने कोरडा पडला असावा. आता ताबा डोक्याने घेतला. 'हम दिल दे चुके सनम' पासून ते अगदी काल-परवा आलेल्या 'तनू वेड्स मनू - रिटर्न्स' पर्यंतचे चित्रपट आठवले, त्यातली पात्रं आठवली. खोलवर समुद्रात उठलेल्या उंच लाटेने किनाऱ्यावर येईपर्यंत रेतीत मिसळून जावं, तसं काहीसं वाटलं. डोळ्यांसमोरून झरझर करत अनेक चित्रपट सरकले. 'सोचा ना था', 'लाईफ इन अ मेट्रो', 'रॉक स्टार', 'दम लगा के हैश्या' अश्या काही वेगळ्या धाटणीच्या प्रेमकहाण्या आठवल्या. ह्या सगळ्या पात्रांचे प्रॉब्लेम्स वेगळे होते. पण होत्या प्रेमकहाण्याच. हाताळणी वेगळी होती. पण होतं सगळं 'सच्चं'च.
माझ्या जन्माच्याही आधी एक चित्रपट आला होता. 'एक दुजे के लिये'. त्यातले कमल हसन आणि रती अग्निहोत्री अखेरीस आत्महत्या करतात. मला इतकंच माहित आहे की त्या नंतर लोकांमध्ये अश्याप्रकारे एकत्र आत्महत्या करण्याचंही वेड पसरलं होतं. ते त्या वेळीही वेडच मानलं गेलं असेल आणि आजही तसंच मानलं जाईल. पण आज कुणी असला फिल्मी बाष्कळपणा करेल असं वाटत नाही. एरव्ही आयपीएल क्रिकेटपासून यो यो हनी सिंगपर्यंत सामान्य व अतिसामान्य दर्ज्याच्या कलागुणांत रमणारी आजची पिढी ही मागल्या कैक पिढ्यांपेक्षा स्वत:च्या आयुष्याबाबत, भविष्याबाबत खूप जागरूक आहे. ती 'तेरे नाम' मधल्या सलमानमुळे प्रभावित होईल, त्याची नक्कल म्हणून 'पोमेरीयन'सारखी हेअर स्टाईल करतील, पण अपयशी प्रेमाच्या दु:खात जीव देणार नाहीत.

तसं पाहिलं, तर आजही जेव्हा एखादा स्टारपुत्र किंवा एखादी स्टारकन्या पदार्पण करते किंवा त्याचं वा तिचं पदार्पण करवलं जातं तेव्हा 'लव्ह स्टोरी' च निवडली जाते. कारण आजही 'लव्ह स्टोरी' हा बॉक्स ऑफिसवर 'सेफ गेम'च आहे. पण ती करताना वाहवत गेलेला दिग्दर्शक 'लाफिंग स्टॉक' होण्याचीच शक्यता जास्त. कुतूहलापोटी त्या नव्या चेहऱ्यांना लोक पहिल्यांदा पाहतीलही, पण जर त्यांनी अजून एखादा चित्रपटही हाच बाष्कळपणा केला, तर हृतिकच्या 'कहो ना प्यार है' नंतर त्याच 'हृतिक-अमिषा'च्या 'आप मुझे अच्छे लगने लगे' चं जे झालं, तेच होईल. कारण जमाना 'गर्ल नेक्स्ट डोअर'चा असला तरी, 'चॉकलेट बॉय' इमेजचा राहिलेला नाही.
'रोमिओ-ज्युलियेट' सारखं प्रेम दाखवणारा संजय लीला भन्साळीचा 'राम-लीला' मी जेव्हा पाहिला होता, तेव्हा हादरलोच होतो. हा कसला थिल्लरपणा आहे, हे माझं तेव्हाचं मत आजही कायम आहे. ते प्रेम मला प्रेम न वाटता वासनाच वाटली होती. पहिल्याच भेटीत, ओळख-पाळख तर सोडाच, नावही माहित नसताना शारीरिक जवळीक, नंतरचे सगळे संवादही अश्लीलतेकडे झुकणारे, हे सगळं मला भन्साळीकडून, ज्याने 'हम दिल दे चुके सनम' सारखी 'शालीन' प्रेमकहाणी दाखवली होती, अपेक्षित नव्हतं. पण कदाचित भन्साळीची दृष्टी बरोबरच असेल. कारण आजचा लोकप्रिय प्रियकर आहे 'इम्रान हाशमी'. त्याचं प्रेम जितकं 'उत्कट' आहे, तितकंच सापेक्षही. त्यात शारीर संबंधांना आडकाठी नाही. 'प्रेमात वासनेलाही जागा असते' असा विचार करणारा, प्रत्येकाने मनात स्वत:च्याच नकळत जपलेला प्रियकर आजकाल पडद्यावर येऊ लागला आहे कारण तो मनातून बाहेर प्रत्यक्ष आयुष्यातही येऊ लागला आहे. 'प्रेमानंतरची पुढची अपरिहार्य पायरी 'लग्न' असते', ही समजूत आता उरलेलीच नाही. 'रील' आणि 'रियल' दोन्ही 'लाईव्स'मध्ये !

आता मला चित्रपट आणि समाजात एक वेगळंच नातं जाणवायला लागलं. 'गुन्हेगार' आणि 'कायदा' हे ते नातं. गुन्हा करायच्या पद्धती जसजश्या प्रगत होत गेल्या, तसतसा कायदाही शहाणा होत गेला आहे. विशिष्ट प्रकारच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी खास कायदे जन्माला येतात किंवा अस्तित्वात असलेल्या कायद्यात बदल केले जातात. कधी हे बदल, गुन्ह्याच्या एक पाउल पुढचे असतात तर कधी त्याच्या मागोमाग, त्याच्या जोडीने असतात. 'चित्रपट' हा तो 'कायदा' आहे, जो 'समाज' कुठे चालला आहे, हे पाहून आपलं पाउल टाकतो. कधी समाजाच्या एका पाउलासोबत चित्रपट दोन पाउलं टाकतो, कधी त्याच्या जोडीने एकच. कायद्यातील पळवाटा शोधून नवनवे गुन्हे करण्याच्या क्लृप्त्या काढल्या जातात, तद्वतच चित्रपटातून 'योग्य' तो बोध घेऊन समाज आपली दिशाही ठरवत असतो.
'समाज' आणि 'चित्रपट' = 'गुन्हेगार' आणि 'कायदा'
ह्या जोड्या परस्परांकडून खूप काही शिकतात. चित्रपटाने समाजाला आणि समाजाने चित्रपटाला 'प्रेम' शिकवलं आहे. एकमेकांनी, एकमेकांची घेतलेली ही शिकवणी नेहमीच चालू राहणार आहे.
मित्र बरोबर बोलत होता. 'बदल' झाला आहे, 'अस्त' किंवा 'अंत' नाही. कारण आजचा तरुण जेव्हा जावेद अख्तर साहेबांच्या शब्दात बोलतो तेव्हा तो बोलतो -

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम
नजर में ख्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम


आजही इथे 'दिलो में' आहे, 'दिमागों में' नाही. म्हणजे आजही 'दिल'ला महत्व आहेच. पूर्वीपेक्षा कमी असलं तरी काय झालं ?

- रणजित पराडकर

Tuesday, November 03, 2015

मराठवाडा

काळी माती
ठाक कोरडी
सफेद झाली
धूळ उडवतो
तापट वारा
धुळीत आहे
आज माखला
उद्या हरवला
धुळीत आहे
लडबडलेला
मराठवाडा

अवर्षणाची
टोपी घालुन
दुष्काळाचा
पंचा नेसुन
तांबुस डोळे,
रंध्रे जाळुन
डांबरवितळ्या
रस्त्यावरती
चप्पल भाजत
गळपटलेला
मराठवाडा

'हक्क कोणता?'
ठाउक नाही
'मदत मिळाली?'
माहित नाही
वोट बँकच्या
धरणांमध्ये
पाणी नसता
पश्चिमाभिमुख
विकास पाहत
हपापलेला
मराठवाडा

बहुधा हा तर
उगाच आहे
इतिहासाच्या
पानांपुरता
आणि नकाशा
भरण्यापुरता
राग न वाटे
प्रेम न वाटे
रुक्ष कोरडा
विस्कटलेला
मराठवाडा

संतजनांनी
गौरवलेला
नेतृत्वांनी
गाजवलेला
तरी सदोदित
स्वत:च अपुल्या
औलादींना
आसुसलेला
विस्कटलेला
हपापलेला
गळपटलेला
मराठवाडा

....रसप....
०३ नोव्हेंबर २०१५
(संपादित - १६ मे २०१७)

Monday, November 02, 2015

अंधारात हरवलेला चार्ल्स (Movie Review - Main Aur Charles)

चार्ल्स शोभराज.
जगभरातल्या सगळ्यात सुप्रसिद्ध गुन्हेगारांपैकी एक आणि भारतातला तर बहुतेक सर्वाधिक सुप्रसिद्ध गुन्हेगार. सहसा गुन्हेगार कुप्रसिद्ध असतात, पण चार्ल्स सुप्रसिद्धच होता. ऐंशीच्या दशकात जेव्हा त्याच्या बातम्या वृत्तपत्रांचे मथळे बनत होत्या, तेव्हा त्या प्रत्येक बातमीगणिक तो लोकांच्या आकर्षणाचं केंद्र बनत होता. त्या काळातल्या अपरिपक्व लहान व तरुण मुलांना तर 'चार्ल्स शोभराज' ह्या नावाभोवतीचं वलय वेगळंच वाटत होतं. मला आठवतंय, जेव्हा मी हे नाव पहिल्यांदा ऐकलं होतं, तेव्हा किती तरी दिवस मला ही व्यक्ती कुणी तरी गुप्तहेर किंवा राजकुमार वगैरे आहे असं वाटत होतं ! सामान्य लोकांत बनलेल्या त्याच्या ह्या प्रतिमेसाठी पूर्णपणे 'श्रेय' माध्यमांना देण्यापेक्षा मी असं म्हणीन की चार्ल्सने माध्यमांचा उत्तमप्रकारे, चाणाक्षपणे वापर करून घेतला होता. 'मैं और चार्ल्स' मध्ये जेव्हा एक वरिष्ठ माध्यम प्रतिनिधी चार्ल्सविषयी बोलताना म्हणतो, 'चार्ल्स वोह कहानियाँ लिखता हैं जिन्हें वोह बेच सके' तेव्हा त्यातून हेच समजून येतं की हा गुन्हेगार इतर गुन्हेगारांपेक्षा खूप वेगळा होता. तो अभ्यासू, अतिशय चतुर, निडर, प्रचंड आत्मविश्वास असलेला आणि खूप संयमही असलेला - त्या 'वरिष्ठ माध्यम प्रतिनिधी' च्याच शब्दांत - एक असा लेखक होता, जो लिहिण्यासाठी पेन व कागद वापरत नव्हता, तर स्वत:चं आयुष्यच वापरत होता !

चार्ल्स शोभराजच्या करामतींवरून प्रेरणा घेऊन अनेकांनी आपापला कार्यभाग उरकला. अनेक चित्रपटांतही त्याच्या क्लृप्त्या बेमालूमपणे वापरल्या गेल्या आणि काही व्यक्तिरेखाही ढोबळपणे त्याच्यावर आधारून उभ्या केल्या गेल्या. मात्र थेट चार्ल्सवरच चित्रपट बनवणे आजपर्यंत शक्य झालं नव्हतं कारण चाणाक्ष चार्ल्सने आपल्या जीवनकहाणीचे हक्क विकत घेण्यासाठी लावलेली बोलीच तोंडचं पाणी पळवणारी होती. मात्र 'मैं और चार्ल्स' बनवताना हे हक्क घेण्यात आले तत्कालीन दिल्ली पोलीस कमिशनर 'आमोद कांत' ह्यांच्याकडून. पण चित्रपट काही श्री. कांत ह्यांच्या दृष्टीकोनातून कहाणी सांगत नाही. तो पूर्णपणे चार्ल्सचाच चित्रपट आहे. तो 'मैं और चार्ल्स' नसून ' मैं और कांत' आहे.

'प्रवाल रामन' हे रामगोपाल वर्माच्या 'फॅक्टरी'चं एक उत्कृष्ट प्रोडक्ट आहे. 'डरना मना है', 'डरना जरुरी है' आणि '404' हे त्यांचे चित्रपट पाहण्यासारखे आहेत. पण 'चार्ल्स'ची कहाणी सांगताना त्यांनी वेगळीच धाटणी निवडली आहे. हे जे कथन आहे ते काही महिन्यांपूर्वी येऊन गेलेल्या दिबाकर बॅनर्जींच्या 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी' च्या सादरीकरणाशी थोड्याफार प्रमाणात साधर्म्य सांगतं. हा चित्रपट पहिल्यांदा बघतानाच दुसऱ्यांदा पाहिला पाहिजे. नाही तर दुसऱ्यांदा बघूनही पहिल्यांदा पाहिल्यासारखा वाटेल. म्हणजे, तो बघण्यापूर्वी चार्ल्सविषयीची माहिती असणं आवश्यक आहे आणि तिला एक उजळणी देणंही. ही एक परीक्षा आहे. ह्या पेपरला बसण्यापूर्वी अभ्यास करणे गरजेचं आहे. (आणि ते केलं नसेल, तर कॉपी करण्यासाठी सोबत कुणी तरी असणं तरी आवश्यक !)
किंचित कर्कश्य पार्श्वसंगीत, हळू आवाजातले संवाद, संवादात इंग्रजीचा भरपूर वापर आणि संपूर्ण चित्रपटात सतत असलेला अंधार ह्यामुळे आधीच अंमळ क्लिष्ट सादरीकरण आणखी क्लिष्ट वाटायला लागतं. चित्रपट उरकतो, आपल्याला काही तरी वेगळं, नवीन पाहिल्यासारखं वाटतं, पण त्याने समाधान झालेलं नसतं. म्हणूनच 'मैं और चार्ल्स' सर्वांच्या पसंतीला उतरेल, ह्याची शक्यता कमी आहे.

चार्ल्सचा गुन्हेगारी जगतातला प्रवास हा भारतासह जवळजवळ १०-१२ देशांतला आहे. मात्र चित्रपट भारत व थायलंडव्यतिरिक्त इतर देशांना स्पर्श करत नाही. तो त्याच्या आयुष्यातल्या त्याच टप्प्याबद्दल सांगतो ज्या टप्प्यात श्री. आमोद कांत त्याच्याशी संबंधित होते. मात्र ह्यामुळे चार्ल्स पूर्णपणे उभा राहत नाही आणि मुख्य व्यक्तिरेखेचाच आगा-पिच्छा समजून घ्यावा लागत असल्याने चित्रपटच अपूर्ण ठरतो.

ही मुख्य व्यक्तिरेखा कितीही अपूर्ण असली, तरी रणदीप हुडा कमाल करतो. त्याचा चेहरा चार्ल्स शोभराजशी किती मिळता जुळता आहे, हे चित्रपट पाहताना जाणवतं. अर्थात, त्याचा मेक अप व गेट अप त्याला हुबेहूब 'चार्ल्स' बनवतो, पण मूळ चेहराही बऱ्यापैकी साम्य सांगणारा आहे. त्यामुळे ह्या भूमिकेसाठी इतर कुणीही अभिनेता  इतका फिट्ट ठरला असता का, ह्याचा संशय वाटतो. बोलण्याची अ-भारतीय ढब (बहुतेक फ्रेंच) त्याने अप्रतिम निभावली आहे. शोभराजच्या ज्या 'चार्म' बद्दल सगळे बोलतात, तो 'चार्म'सुद्धा त्याने दाखवला आहे. त्याचं व्यक्तिमत्व कुणालाही भुरळ पाडेल असं खरोखर वाटतं, त्यामुळे त्याच्यावर पूर्णपणे भाळलेल्या 'मीरा शर्मा'ची आपल्याला दयाच येते.



'मीरा'ला साकारणारी रिचा चढ्ढासुद्धा लक्षात राहते. तिचं 'मसान'मधलं काम मला तरी पूर्ण मनासारखं वाटलं नव्हतं, पण इथे मात्र ती 'मीरा' म्हणून कम्फर्टेबल वाटते.

आमोद कांत ह्यांच्या भूमिकेत अजून एक गुणी अभिनेता 'आदिल हुसेन' दिसून येतो. कर्तव्यदक्ष आणि चार्ल्सला अचूक ओळखणारा त्याच्याच इतका चलाख व अभ्यासू पोलीस ऑफिसर आदिल हुसेननी उत्तम वठवला आहे. चित्रपटाच्या कहाणीचं वलय चार्ल्सभोवती आणि पर्यायाने रणदीप हुडाभोवती असल्याने आमोद कांत व पर्यायाने आदिल हुसेन सहाय्यक किंवा दुय्यम ठरतात, हे दुर्दैवच.

टिस्का चोप्रा कांतच्या पत्नीची तिय्यम भूमिकेत मर्यादित दिसते आणि त्यामुळे विस्मृतीत जागा मिळवते.

इन्स्पेक्टर सुधाकर झेंडे, ज्यांनी प्रत्यक्षात चार्ल्सला गोव्यात जाऊन पकडून मुंबईला आणलं होतं, 'नंदू माधव' ह्यांनी साकारला आहे. अजून एक कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर, ज्याला कुठे तरी बहुतेक ह्याची जाणीव असते की त्याने चार्ल्सला पकडलेलं नसून, चार्ल्सने स्वत:च स्वत:ला पकडवलं आहे, त्यांनी सफाईने साकारला आहे. 'चार्ल्स'सोबतच्या त्यांच्या अनेक नजरानजर त्यांनी आपलं अभिनय कौशल्य सिद्ध करण्याच्या संधी समजून अक्षरश: जिंकल्या आहेत.

आजकालच्या बहुतांश चित्रपटांप्रमाणे, संगीत कुठलेही मूल्यवर्धन करत नाही. उलटपक्षी पार्श्वसंगीत अधूनमधून त्रासच देतं.

कथा-पटकथालेखन (प्रवाल रामन) बहुतेक जिकिरीचं होतं. कारण २ तासांत चार्ल्सची पूर्ण कहाणी सांगणं अशक्यच असावं. त्याचं आयुष्य खरोखर इतक्या नाट्यमयतेने भरलेलं आहे, म्हणूनच तर त्याने त्याचे हक्क विकण्यासाठी भरमसाठ बोली लावली आहे ! कदाचित हा विषय दोन-तीन भागांत सांगण्याचा असावा. तरी थोडा सुटसुटीतपणा असता, तर आणखी मजा आली असती, हे मात्र नक्कीच.
काही संवाद चुरचुरीत आहेत आणि एकंदरीतच जितके ऐकू येतात तितके सगळेच लक्षवेधक आहेतच ! ह्यासाठी रामन ह्यांचं अभिनंदन !



एकंदरीत, 'मैं और चार्ल्स' हा काही एन्टरटेनर नाही. हा चित्रपट प्रायोगिकतेच्या सीमारेषेवर 'मुख्य धारा' व 'डॉक्युमेंटरी' ह्यांच्यात 'सी-सॉ' खेळतो. ही खेळ जे एन्जॉय करू शकतात, त्यांना चित्रपट पाहवतो. बाकी लोक मात्र, दुर्दैवाने 'The End' ची वाट पाहत बसतात. कारण ह्या चित्रपटाच्या अंधारात कहाणीचा गुंता सोडवणं कठीणच आहे !

रेटिंग - * *

हे परीक्षण दै. मी मराठी लाईव्हमध्ये ०१ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...