Tuesday, July 31, 2012

प्रेमाची किंमत


रिमझिम रिमझिम पाउसधारा मनात माझ्या रुजती
खळखळते ओहोळ पाहुनी तरंग नकळत उठती
तुझी नि माझी बालपणीची कागदहोडी ओली
तसाच पाउस, तसेच पाणी, पण मी तीरावरती

कळले नाही मलाच माझे कधी जाणता झालो
वर्तमान जगण्याचे सोडुन 'उद्या' पाहता झालो
प्रश्न तुझ्या डोळ्यांना पडता नव्हते उत्तर काही
व्यवहाराच्या दुनियेमध्ये प्रेम शोधता झालो

क्षणाक्षणाला सुखास वेचुन बरेच संचित केले
वणवण माझी वाऱ्यावरची उडून सारे गेले
आज पुन्हा ना हाती काही, पुन्हा पाउले थकली
प्रश्नाचे उत्तर पाण्याने सोबत वाहून नेले

मनात होते काय तुला मी आज खरे सांगतो..
फूल हासरे, झुळझुळ पाणी, तिथे तुला पाहतो
जीवनभर तू हसत रहावे म्हणून वणवणलो मी
सुगंध, सौंदर्यापाशी मी रमणेही टाळतो

जे जे माझे होते ते ते हरून गेलो सारे
आता घेतो उधार काही चंद्राकडून तारे
सांग तुझ्या प्रेमाची किंमत कुणी मोजली इतकी ?
गुलाब दरवळणारे आणिक तारे लुकलुकणारे....

....रसप....
३१ जुलै २०१२

Thursday, July 26, 2012

किती जरी वाटलं तरी..


किती जरी वाटलं तरी,
चंद्र कधी ओघळत नसतो
तो फक्त मनाचा खेळ असतो
आपणच आवडून घेतलेला...

उगाच वाटतं की -
आत्ताच ओघळलेला एक थेंब..
त्या डावीकडच्या तारकेने झेलला
आणि धरतीच्या संतप्त उरात
पावसाचा पहिला थेंब झिरपल्यावर
तिने एक आश्वस्त उसासा द्यावा,
तशी ती तारका क्षणभर लकाकली...
पण असं काही नसतं...
ती फक्त मनाची कल्पना असते
आपणच आवडून घेतलेली..

उगाच वाटतं की -
बेधुंद चंद्राची शुद्ध हरपली आहे
भोवतालच्या सात-आठ चिमुकल्या तारका
त्याला आधार देत आहेत
आणि तो,
खवळलेल्या सागराने पुन्हा पुन्हा धावून येत
किनाऱ्याला धडकावं... तसा
पुन्हा पुन्हा उफाळून येऊन
सगळ्यांना उधळायला बघतो आहे..
पण असं काही नसतं...
ते फक्त मनाचं प्रतिबिंब असतं
आपणच आवडून घेतलेलं..

कधी हाच चंद्र दिसतो पिवळा...
कधी सोनेरी
कधी ढगाळ आभाळातून रोखून बघणारा...
वाटतो अघोरी..

छ्या: !
ह्याला काहीच अर्थ नाही..
रोज काही तरी नवीन दिसतं मला..
ह्या खिडकीतून...
जे कधीच माझ्याशी मेळ खात नाही
म्हणून आताशा मी त्या खिडकीतच जात नाही
अख्खी रात्र सताड डोळ्यांनी
घरात भरून आलेलं आभाळ बघत बसतो...
डोळ्यांत चंद्र घेऊन..
थेंब-थेंब ओघळत राहतो
आणि उशीवरच्या चांदण्या टिपत राहतात..
आताशा मी अधून मधून खवळतोही
धडका द्यायला किनारा शोधतो...
एक पिवळा चंद्र मनाशी जपतो......


....रसप....
२५ जुलै २०१२

Wednesday, July 25, 2012

मीच आहे माझं पहिलं प्रेम...


आज मी खूप आत्मकेंद्रित बोलणार आहे..
पण इलाज नाही,
खरं तेच सांगणार आहे

माझ्या आयुष्यात पहिलं स्थान
नेहमी माझंच राहिलं आहे
आणि माझ्याव्यतिरिक्त सगळ्याचं
दुसरंच राहिलं आहे

कधी कुणाच्या मनामध्ये मी घर केलं होतं
कधी कुणाचं स्वप्नशिखर सर केलं होतं
ते घर, ती उंची मला आवडली
कारण तिथे मला मीच नेलं होतं

तू म्हणतेस,
स्वत:पेक्षा जास्त प्रेम केलंस.. माझ्यावर
पण मी तुझ्यापेक्षा जास्त प्रेम केलंय.. स्वत:वर !
अगदी पहिल्यापासून...
सारं काही ह्या 'मी'पासूनच सुरू झालंय
आणि तिथेच संपलंय
आईच्या पोटातून बाहेर आलो
आणि पहिला 'ट्यँहँ' केला
तो नव्हता कुणाला सुखावण्यासाठी
तो होता 'मला त्रास होतोय' हेच सांगण्यासाठी !

तुला वाईट वाटेल..
म्हणशील, "मी कोत्या मनोवृत्तीचा आहे"
पण इलाज नाही..
आज मी खरं तेच बोललो आहे..
मीच आहे माझं पहिलं प्रेम...
आणि तू.. दुसरं.......

माफ कर किंवा नको करूस....
हेच खरं आहे..
आज मी खरं तेच बोललो आहे...

....रसप....
२४ जुलै २०१२

Tuesday, July 24, 2012

.. नाही जमले तुला..!


टपटपत्या पानांना पाहुन ताल मोजला कधी
दरवळत्या झुळुकीला ओढुन श्वास भारला कधी
कधी कधी मेघांना फुटले पंखच दिसले तुला
तुझ्या मनाला समजुन घेणे नाही जमले तुला

सागरतीरी वाळूवरती नाव कोरले कधी
लाटांनी पुसले जाता नि:श्वास सोडले कधी
पुन्हा नव्याश्या व्याकुळतेने कधी व्यापले तुला
जुने नको ते विसरुन जाणे नाही जमले तुला

दिलास खांदा रडण्याला दु:खी मित्राला कधी
टिपले डोळ्यातील कुणाच्या तू मोत्याला कधी
किंचितसेही खरचटल्यावर किती डाचले तुला
पिऊन अश्रू जखम फुलवणे नाही जमले तुला

पुढे निघाले येउन कोणी पाठीमागुन कधी
तुला पाहुनी शिकले अन गेले ओलांडुन कधी
तू दैवाला दोष दिला अन दैवच नडले तुला
उत्साहाने उभे राहणे नाही जमले तुला

जे होते ते प्रेमापायी गमवुन झाले कधी
'नको प्रेम ते' दुसऱ्यालाही शिकवुन झाले कधी
खरे प्रेम जाणुन घ्यावे ना कधी वाटले तुला
चौकट आखुन मुक्त विहरणे नाही जमले तुला

....रसप....
२३ जुलै २०१२

Sunday, July 22, 2012

ऋणानुबंधाची हळवीशी सवे आठवण नेऊ..


काय खरे अन काय असावे खोटे कळतच नाही
दिसते सारे डोळ्यांनी पण काही पटतच नाही
सुखात मी अन सुखात तूही तरी पुरे ना वाटे
कधी कधी ह्या हसण्यामागे 'हसणे' असतच नाही

मनास माझ्या समजावुन मी नवीन स्वप्ने देतो
एक उराशी, एक उशाशी, एक कुशीला घेतो
तरी पुन्हा का निवांत वेळी भरून काही येते ?
स्वप्नपाखरांच्या सोबत मी तुझ्याच गावी येतो..

पुरे जाहले नवीन स्वप्ने रोज पाहणे आता
पुरे जाहले वैशाखाच्या झळा सोसणे आता
पुन्हा एकदा श्रावण होउन रिमझिम तू बरसावे
पुरे जाहले स्वत: स्वत:ला व्यर्थ भिजवणे आता

जरी वाटले बंधनांस मी साऱ्या उधळुन द्यावे..
तरी शक्य नाही आता हे तुला तुझेही ठावे
सांग कशाला कुढत बसावे जीवन सुंदर आहे
मृगजळ पाहुन, सारे सोडुन, कशास धावुन जावे ?

थेंब दवाचा गालावरती हलके टिपून घे ना
तुझ्याचसाठी मी लिहिलेली कविता लिहून घे ना
भास जरासा माझा होता दे तू मंद उसासा
रडून झाले बरेच आता किंचित हसून घे ना !

हव्याहव्याश्या पळवाटांनी वळणे टाळुन जाऊ
आडोश्याच्या मुक्कामावर सोबत आपण येऊ
कधी न जुळणाऱ्या वाटांवर सखे चालणे अपुले
ऋणानुबंधाची हळवीशी सवे आठवण नेऊ

....रसप....
२१ जुलै २०१२

Thursday, July 19, 2012

बावऱ्या राधेचा सावळा कान्हा..


बावऱ्या राधेचा सावळा कान्हा
मोहवी सुरांनी सांज जाताना
झाकोळदिशांनी ओघळे नभ
तहान वेगळी आज ओठांना

सांडला सुगंध बासरीतून
लाजला मोगरा फिका होऊन
पावले ओढते नादमाधुरी
तहान शमेना होतां तल्लीन

राधेची यमुना विसावा घेई
गहिऱ्या गहिऱ्या तळाशी नेई
कान्हाच जाहली एकटी राधा
तहान प्रेमाची यमुना होई

राधेला एव्हढी आस लागली
कान्हाची बनावे सदा सावली
तहान रहावी नेहमी मनी
सावळ्या रंगात राधा रंगली

कधीच राधेने नाही जाणले
कान्हाने विश्वाला साऱ्या व्यापले
राधेच्या प्रेमाला दुसरे स्थान
पहिले स्थान ना कोणा लाभले

....रसप....
१८ जुलै २०१२
(अक्षरछंद. असा कुठला छंद आहे की नाही, माहित नाही पण प्रत्येक ओळीत ११ अक्षरं आहेत.)

Wednesday, July 18, 2012

'हाहाहाहा' हसू नका ही दु:खाची स्टोरी !


उगाच पळणे प्रेमापासुन सहजच मिळताना
मनातले समजून टाळणे सगळे दिसताना
मग नकळत फुलते कळी कोवळी हसते बावरते
हे असे नेहमी होते माझे मनास हरताना

मनात गाणे गुणगुणतो पण ओठांवर बंदी
मोजत बसतो उगाच पडल्या खड्ड्यांची रुंदी
मी कितीकितीदा पाउल माझे जपून चालवले
पण वळणावरती मलाच चढते गाण्याची धुंदी

धडपडणे ही सवयच माझी, अंगी बाणवली
सपाट रस्त्यानेही मजला घसरण दाखवली
पाहून घसरलो डोळे केवळ, हसू कधी हळवे
अन कधी पाहुनी छबीस दिवसा स्वप्ने रंगवली

मनात माझ्या कधी कुणाचा दरवळला चाफा
आठवणींच्या कल्लोळाचा भवताली ताफा
मज कधी वाटले जखडुन घ्यावे मिठीत कोणाला
पण लिहून कविता फक्त उठवल्या शब्दांच्या वाफा

'हाहाहाहा' हसू नका ही दु:खाची स्टोरी !
मनास जपतो किती तरीही होते हे चोरी
मी बांध घालतो रोज नव्याने कितीकदा ह्याला
पण देउन जाती सुंदर ललना कविता ही कोरी..!

....रसप....
१५ जुलै २०१२
पहिल्या दोन ओळीत २६ (१६,१०) मात्रा आणि शेवटच्या दोन ओळींत २८ (१८, १०) मात्रा.

Saturday, July 14, 2012

नव्या ग्लासातली जुनी 'कॉकटेल' (Cocktail - Movie Review)


वर्षानुवर्षं सकाळी उठून चहा/ कॉफी घेण्याची जवळजवळ प्रत्येकाला सवय असते. तीच चव.. साधारण तीच वेळ.. आणि बहुतेकदा जागाही तीच, फक्त काही ठराविक काळानंतर 'कप' बदलतो. तसंच अगदी तसंच.. वर्षानुवर्षं रोज सकाळी जाग आल्यावर प्रेमत्रिकोणाची कॉकटेल घ्यायची बॉलीवूडकरांचीही जुनी सवय आहे. फक्त ठराविक काळानंतर इथेही पिण्याचा 'ग्लास' बदलत जातो..

'होमी अदाजानिया' दिग्दर्शित नवीन ग्लासातल्या जुन्या "कॉकटेल" मधली मिश्रणं आहेत -
गौतम (सैफ अली खान) - एक महाफ्लर्ट पंजाबी लौंढा
वेरॉनिका (दीपिका पडुकोण) - एक टिपिकल बिघडलेली श्रीमंत बापाची व्यसनाधीन मुलगी
मीरा (डायना पेंटी) - एक टिपिकल 'शादी मटेरीअल' मुलगी

तिघेही मूळचे दिल्लीकर, लंडनमध्ये एकमेकांना भेटतात. सॉफ्टवेअर इंजिनिअर गौतम नोकरीनिमित्त लंडनमध्ये असतो, तर फोटोग्राफर वेरॉनिका (बहुतेक तरी) फक्त अय्याशी करण्यासाठी. मीरा, तिला सोडून लंडनला आलेल्या तिच्या नवऱ्याला (रणदीप हूडा) शोधण्यासाठी तिथे येते, पण तिचा नवरा तिला अपमानित वगैरे करून हाकलून वगैरे देतो. अपमानित, असहाय्य आणि हताश मीराला वेरॉनिका आधार देते. स्वत:च्या घरी घेऊन येते. एअरपोर्टवरच तिला ‘भिडलेल्या’ गौतमबाबत मीरा जेव्हा वेरॉनिकाला सांगते, तेव्हा वेरॉनिका जाऊन गौतमला ‘भिडते’. पुढे गौतम आणि वेरॉनिका आपापल्या चारित्र्या(?)शी प्रामाणिक राहून एकमेकांसोबत ‘झोपतात’. (सिनेमात असंच वारंवार म्हटलं आहे, मी ऐकताना लाजलो नाही… लिहिताना का लाजू?)
गौतम, वेरॉनिका आणि मीरा एकत्र राहू लागतात आणि अश्यातच गौतमची आई (डिंपल कपाडिया) लंडनला अवतरते. तिच्या समाधानासाठी मीराला गौतमच्या होणाऱ्या बायकोचं सोंग वठवावं लागतं. हे सोंग करता करता गौतम आणि मीरा खरोखरच प्रेमात पडतात, तर दुसरीकडे वेरॉनिकाही गौतमवर प्रेम करू लागते.
बस्स फिर वोही घीसी-पिटी कहानी.... मीरा-गौतम-वेरॉनिका की जुबानी....!

बहुतांश सिनेमा वास्तवाचं भान ठेवून पुढे सरकत जातो. अनेक ठिकाणी पडद्यावरील व्यक्तिरेखा आपल्याला कधी तरी पाहिलेल्या, अनुभवलेल्या किंवा जगलेल्याही वाटतात, ही 'हाताळणी'ची जमेची बाजू. पण अनेक अनावश्यक फाटे उगाचच सिनेमा रेंगाळवतात. त्यात ती हार्मोनियमच्या शेवटच्या सप्तकात सुरू होऊन तिथेच कुठे तरी गोल-गोल फिरून मग संपणारी कर्णकर्कश्य गाणी तुम्हाला सिनेमात भावनिक ओढाताणीमुळे डिस्टर्ब झालेल्या पात्रांपेक्षा जास्त डिस्टर्ब करतात. (अपवाद – तुम ही दिन ढले…)
गौतमच्या भूमिकेत सैफ अली खानचा वावर खूप नैसर्गिक वाटतो, पण नवाब साहेबांचं वय लपत नाही.
डायना पेंटीला मीराच्या भूमिकेत चांगलं काम करायला खूप वाव होता, पण 'मीरा वाया गेली.'
दीपिका पडुकोण 'वेरॉनिका' जगते आणि जगवते. तसं पाहाता, ही परीक्षा देण्यासाठी तिला हवं तेव्हढं 'स्टडी मटेरीअल' बाजारात उपलब्ध झालं असेल; पण शेवटी अभ्यासही करावाच लागतो आणि तो तिने केलेला दिसला. एरव्ही मला तिचं ते भुवया आकुंचित करून बोलणं अजिबात आवडत नाही, पण इथे ते फारसं जाणवलं नाही. आत्तापर्यंतच्या छोट्याश्या कारकीर्दीत दीपिकाने केलेलं 'वेरॉनिका' हे सर्वोत्कृष्ट काम असावं.
सिनेमा लंडनमध्ये का घडतो? - उगाच..
शेवट दिल्लीत का होतो ? - उगाच..
बोमन इराणी आणि डिंपल सारखे दिग्गज सिनेमात का आहेत ? - उगाच..
अश्या अजून काही 'उगाच' गोष्टी असल्या तरी तीच व्होडका आणि तीच व्हिस्की ओतून बनवलेलं तेच 'कॉकटेल' एकदा घेऊन बघण्यास हरकत नसावी. (कारण सिनेमापूर्वी आणि मध्यंतरानंतर 'कॉकटेल' ड्रिंकिंग इज इन्ज्युरिअस टू हेल्थ अशी सूचना केली जात नाही!!)


Thursday, July 12, 2012

उत्साहामागचा पश्चात्ताप..



खूप बोलायच्या नादात खूप बोलून गेलो
अभिप्रेत केलेल्या भावनांनाही शब्दात तोलून गेलो
आता वाटतंय की..
जरा अजून धीर धरला असता
तुझ्या मनाचा अंदाज घेतला असता
तुझ्याशी बोलायच्या आधी
स्वत:शीच बोललो असतो
मनाच्या कप्प्यांमध्ये
जरासा चाचपडलो असतो

पण नाही...

आई नेहमी म्हणायची,
किती उतावळेपणा करतोस..?
तोच स्वभाव नडला..

मी कोसळत राहिलो
बेबंद धबधब्यासारखा
आणि तुझ्या कातळात एक थेंबही जिरला नाही
मी वाहून गेलो, अजूनही वाहतोय
पण ह्या उत्साहामागचा पश्चात्ताप
कुणालाच कळला नाही...

....रसप....
१२ जुलै २०१२

Tuesday, July 10, 2012

सांग कधी तू अश्या पावसाला अनुभवले का?



मनात मी कुठलेसे गाणे सहजच गुणगुणतो
माझ्या येथे अंगणात मग पाउस रुणझुणतो
लाघववेळी मोहक वेडा सुगंध दरवळता
पारिजात जो विझून गेला हसून मिणमिणतो

पुन्हा जुनीशी बेचैनी मग नवीन अंकुरते
अशीच अर्धी राहुन गेली कविता मोहरते
झुळुकीसोबत पाठवलेले शब्द तुझे मिळता
हवीहवीशी गोड वेदना स्वत:स रंगवते

डोळ्यामधल्या पाण्यासोबत अशीच तू ये ना
कितीक मोती ओवुन झाले माळुन तू घे ना
सप्तरंग प्रेमाचे माझे नभपटली सजता
हळवी फुंकर देऊन थोडे उडवुन तू ने ना

नकळत निसटुन गेलेला क्षण अवचित सापडतो
रंग गुलाबी दरवळणारा उधळुन मोहवतो
फूलपाखरू नाजुकसे ते तळहाती बसता
जणु ओठांचा अमृतप्याला गाली ओघळतो

सांग कधी तू अश्या पावसाला अनुभवले का?
केवळ माझ्या अंगणात हे गंध पसरले का?
पुन्हा पुन्हा माझ्या दु:खाने उदास मी हसता
गार हवेचा स्पर्श बदलता तुला समजले का ?

....रसप....
१० जुलै २०१२

Sunday, July 08, 2012

बनूनी तुझा मी हरी सावळा


तुझ्या चाहुली जाणवाव्या कितीदा
मनाला फुटावी नवी पालवी
किती तारकांनी नभाशी सजावे
तुझा चंद्र स्वप्नामधे मालवी

कळे ना मला मी कुठे लुप्त होतो
निवारा तुझ्या सावलीचा मला
जणू सांजवेळी कुणी सप्तरंगी
मुखावर पदर रेशमी ओढला

विचारांस माझ्या नसे आज थारा
पतंगाप्रमाणे इथे वा तिथे
हवेच्या दिशेशी जुळे खास नाते
तुझा गंध मोहून नेतो जिथे

पुन्हा एकदा दाटुनी रात येते
पुन्हा मी नभाशी असा भांडतो
जरी दूर असला तरी चंद्र माझा
मला शुभ्र अन् आपला वाटतो

कशी रोज माझी सरे रात्र येथे
तुला आकळावे कसे? दूर तू
मनाच्या सतारीतुनी छेडलेला
सुन्या जोगियाचा सुना सूर तू

सरी पावसाच्या सवे आणती हा
तुझ्या पैंजणांचा जुळा सोहळा
भिजावे सये नाद वेचून सारा
बनूनी तुझा मी हरी सावळा
.................... बनूनी तुझा मी हरी सावळा
.................... बनूनी तुझा मी हरी सावळा

....रसप....
८ जुलै २०१२

Saturday, July 07, 2012

घोळ बच्चन (Bol Bachchan - Review)


सिनेमाचं शीर्षक गीत.. 'बोल बच्चन'..
ह्या गीतामध्ये एके ठिकाणी 'पेंड्यूलम' ह्या शब्दावर मस्त हरकत आहे. हे गीत त्या जागेवर खूपच आवडतं. मग आपण सिनेमा पाहातो आणि जाणवतं की सिनेमाही 'पेंड्यूलम'च आहे. धमाल, छान, बरा, वाईट, बंडल.. अश्या वेगवेगळ्या दर्ज्यांवर सिनेमा वारंवार हिंदोळे घेत राहतो.

तीन वेळा फक्त शीर्षकाची नक्कल करून झाल्यावर अखेरीस 'रोहित शेट्टी'ने 'बोल बच्चन' द्वारे हृषीदांच्या खुद्द 'गोलमाल'चीसुद्धा नक्कल केली. आता चित्रपट सही-सही 'गोलमाल'वर बेतलेला असल्याने तुलना होणे अनिवार्य आहे आणि इथेच 'बोल बच्चन' अक्षरश उघडा (नव्हे नागडाच!) पडतो. काही किरकोळ तुलना -
१. गोलमाल मधला 'नोकरी देणारा मालक' एक प्रतिष्ठित, सुसंस्कृत, सुशिक्षित व्यावसायिक असतो. 'बो.ब.' मधला 'मालक' एक अडाणी, अर्धशिक्षित, 'सभ्य' गुंड.
२. 'गो.मा.' मधला नोकरदार माणूस एक चार्टर्ड अकाउन्टन्ट, तर 'बो.ब.' मधला नोकरदार माणूससुद्धा एक एक अडाणी, अर्धशिक्षित, 'सभ्य' गुंड.
३. 'गो.मा.' मधली बहिण 'एम.ए. (हिंदी)' तर 'बो.ब.' मधली बहिण एका डब्बा नाटक कंपनीतली 'नेपथ्यकार/ अभिनेत्री'.
४. 'गो.मा.' मधली नकली आई, एक हौशी प्रतिष्ठित अभिनेत्री तर 'बो.ब.' मधली नकली आई एक कोठेवाली!
५. 'गो.मा.' मधला नकली जुळा भाऊ एक गायक (आनेवाला पल....... आहाहाहा!!) तर 'बो.ब.' मधला नकली जुळा भाऊ एक बायल्या नाच्या ! (काय ते कथ्थकच्या नावाखाली केलेले हिडीस अंगविक्षेप ! ईईईईई !!)

असो.. ह्या झाल्या वर वर तुलना. अधिक खोलात न जाता सिनेमाबद्दल थोडंसं बोलतो.
'अब्बास अली' (अभिषेक बच्चन) आणि 'सानिया अली' (असीन) दिल्लीला राहणारे बहिण-भाऊ. वडिलार्जित घरावर चुलत्यांनी कायदेशीर ताबा मिळवल्याने बेघर होतात. त्यांच्या वडिलांचा जवळचा मित्र 'शास्त्री' (असरानी) 'रणकपूर'मधील सगळ्यात मोठं प्रस्थ असलेल्या 'पृथ्वीराज सूर्यवंशी' (अजय देवगण) कडे कामाला असतो. (कसलं काम? माहित नाही.) तिथेच अब्बासलाही काम मिळवून द्यायच्या विचाराने तो अब्बास-सानियाला दिल्लीहून 'रणकपूर' ह्या त्याच्या गावी घेऊन येतो. पृथ्वी आणि जवळच्याच 'खेरवाडा' गावात राहणारा त्याचा चुलत भाऊ विक्रांत ह्यांच्यात 'खानदानी दुष्मनी' असते. ह्या वैमनस्यामुळे दोन गावांच्या सीमारेषेवरील पुरातन मंदिर बंद पडलेले असते. एका लहान मुलाचा प्राण वाचवायच्या हेतूने अब्बास हे मंदिर उघडतो आणि 'एका मुस्लिमाने मंदिर उघडलं' ह्यावरून गदारोळ होऊ शकतो; असा विचार करून 'शास्त्री'चा नौटंकीबाज मुलगा 'रवी' (कृष्णा) गडबडीत अब्बासचं नाव बदलून 'अभिषेक बच्चन' सांगतो. इथून सुरू होतो खोट्यावर खोटं... खोट्यावर खोटं.. बोलत जाण्याचा नेहमीचा खेळ. पृथ्वीला एकाच गोष्टीचा प्रचंड तिटकारा असतो, 'खोटं बोलणे'! बाकीचा सिनेमा ज्याने 'गोलमाल' पाहिला असेल; त्यासाठी डोळे मिटून पाहाण्यासारखा आहे.

अधिक -
१. अजय देवगण. अगदी सहज वावर आणि उत्कृष्ट अभिनय!
२. अजय देवगण. तोडकं-मोडकं इंग्रजी बोलण्याचा अट्टाहास काही ठिकाणी छानच विनोदनिर्मिती करतो.
३. अजय देवगण. कुठल्याच दृश्यात एक क्षणसुद्धा, किंचितही चंचल होत नाही. अख्खा सिनेमा एकटाच पेलतो!
४. अनेक ठिकाणी सिनेमा पोट धरून हसवतो. अनेक ठिकाणी खसखस पिकवतो.
५. अखेरीस 'तुमचं भांडं फुटलं आहे' हे ज्या प्रकारे अजय देवगण व साथीदार व्यक्त करतात, ते आवडलं.

उणे -
१. अभिषेक बच्चन. ह्याने आयुष्यात कॉमेडी सोडून काहीही करावं, असा वावर.
२. अभिषेक बच्चन. काही दृश्यांत चेहऱ्यावरची माशी उडत नाही!
३. अभिषेक बच्चन. अनेक ठिकाणी ओव्हर ॲक्ट करतो. अख्खा सिनेमा एकट्यानेच उचलून आपटतो.
४. अभिषेक बच्चन. 'कथ्थक' नावाखाली केलेलं हिडीस नृत्य म्हणजे आजपर्यंत पाहिलेला  विनोदनिर्मितीचा सगळ्यात विकृत प्रयत्न असावा.
५. अभिषेक बच्चन. वारंवार रडकं तोंड करून विनोदाचा अत्यंत केविलवाणा प्रयत्न सिनेमाभर करत राहातो आणि एकदाही जमत नाही.
६. अजय-अतुल ने लौकरच सावरावं.
७. काही ॲक्शन दृश्यं बरी विनोदनिर्मिती करतात! पण रोहित शेट्टीने अशी विनोदनिर्मिती आधीच्या सिनेमांतही केली आहेच !
८. पृथ्वी-विक्रांत च्या कौटुंबिक वैमनस्याचा भाग पूर्णपणे अनावश्यक. त्याने मूळ कहाणीस काहीही हातभार लागत नाही. केवळ काही अचाट मारामाऱ्या दाखवून पिटातल्या पब्लिकला खूष करायचा हेतू असावा बहुतेक.


एकंदरीत, एकदा(च) पाहावा असा, पण नाही जरी पाहिला तरी काहीही दु:ख होऊ नये असा हा "बोल बच्चन" माझ्या मते तरी एका ऑल टाईम ग्रेट निखळ विनोदी सिनेमाची अगदीच भ्रष्ट नक्कल आहे. Watch at your own risk. मी जुन्या 'गोलमाल'चा 'फॅन' असल्याने मला तरी हा प्रयत्न अगदीच पिचकवणी वाटला, पण थेटरातील बहुतेक पब्लिक मात्र बरंच 'खूष' वाटलं!!


Thursday, July 05, 2012

तुला कधीच जाणवलं नसेल ना..?


तुला कधीच जाणवलं नसेल ना
तुझं 'कविता' असणं..?
कसं जाणवणार!
शब्दाला स्वत:चं यमक कळत नसतं ,
मग कवितेला तिच्या असण्याचं गमक कसं कळणार?
म्हणून हा माझा वेडा अट्टाहास असतो..
तुझ्याशी कविता बनूनच बोलायचा
कधी तू 'वाह' म्हणतेस
कधी तू 'आह' म्हणतेस..
पण तल्लीन होऊन जेव्हा डोळे मिटतेस ना...
तेव्हा माझ्या कवितेचा परीघ बनतेस..

मी मोठा आव आणतो..
छंदमुक्त असल्याचा..
पण परिघाबाहेर पडून भरारी भरण्याचं
आजपर्यंत तरी जमलंच नाही!
तूच माझी कविता आहेस..
तुला वगळून कधी लिहिलंच नाही!

....रसप....
४ जुलै २०१२

Wednesday, July 04, 2012

भरकटलेल्या मनाचा शोध सुरू आहे..........


'तुझ्या कुशीतून समुद्र बघायला फार आवडतं'
असं म्हणायची ती
'माझ्या डोळ्यांतला समुद्र झाकता येत नाही आताशा'
म्हणून रडायची ती..

मी समजवायचो तिला
त्याच बुरसटलेल्या कवीकल्पनांनी..
की, तू आणि मी म्हणजे समुद्र आणि किनारा
नेहमीच वेगळे आणि तरी
एकमेकांना एकमेकांचाच सहारा!
तू आणि मी म्हणजे जमीन आणि आकाश
क्षितिजापाशी एकत्र आल्याचा
नुसताच एक आभास..
ती लगेच हसायची
अन समजून घ्यायची
त्या बुरसटलेल्या कवीकल्पनांच्या मागचा
माझा नाईलाज..
आणि मनात घोंघावणाऱ्या वादळाचा
शीळ घातल्यासारखा आवाज...

हे असं नेहमीचंच..
तिने रडायचं
मी समजवायचं
तिने हसायचं
आणि मीही स्वत:ला फसवून
खूष व्हायचं
की अजून एक वादळ शमवलं....

पण, कालच्या पावसात क्षितिज काळेकुट्ट झाले
किनारा ओलांडून पाणी घरापर्यंत आले

आज कहाणी जराशी बदलली आहे
कूस तिची आहे
नजर माझी आहे..
नाते तेच आहे...
किनारा बदलला आहे..
आभाळ तेच आहे..
क्षितीज हरवलं आहे..

भरकटलेल्या मनाचा शोध सुरू आहे..........

....रसप....
३ जुलै २०१२

Monday, July 02, 2012

कसे शक्य नाही नभाला झुकवणे ?

कसे शक्य नाही नभाला झुकवणे ?
जरासा तुझा हात उंचाव रे !
क्षितीजापुढेही तुझी वाट जाते
पुन्हा वेग घेऊन तू धाव रे !

तुझ्या मनगटी कृष्णगोविंद आहे
उचल तू कधी पूर्ण गोवर्धना
तुझ्या अंतरंगात आहे नृसिंह
कधी तू उफाळून कर गर्जना !

तुझ्या हस्तरेषा कुणी आखणे अन
कुणी प्राक्तनाला लिहावे तुझ्या ?
तुझा तूच आहेस कर्ता विधाता
कुणी धाडसाला पहावे तुझ्या ?    

नको आज पाहूस मागे फिरूनी
कुणी साथ सोडून रेंगाळता..
तुझ्या इप्सिताचे तुझ्या संचिताशी
नको बंध जोडूस तू जाणता

तुझ्या हिंमतीची तुला जाण व्हावी
पुरे एव्हढे विश्व जिंकावया !
नको साथ-संगत, न सौभाग्य लाभो
तुला जीत खेचून आणावया !

....रसप....
२ जुलै २०१२



Sunday, July 01, 2012

एक उनाड दिवस तू कधी तरी जगशील..


एक उनाड दिवस तू कधी तरी जगशील
पुन्हा पुन्हा मिटल्या डोळ्यांनी
फक्त मलाच बघशील
स्वत:शीच हसशील
गुपचूप लाजशील
पुन्हा पुन्हा मोबाईल काढून
जुना मेसेज वाचशील
रुळणाऱ्या चुकार बटेचा
गालाला होणारा हळूवार स्पर्श
खट्याळ वारा सारखा देत राहील
आणि तुला वाटेल -
माझी नजर थांबली आहे तुझ्या चेहऱ्यावर

- असं मला नेहमी वाटायचं
असं मला नेहमी दिसायचं
पण आत्ताच कळलं की,
नाही. तू कधीच बांधली गेली आहेस
तुझ्या आवडीच्या बंधनात
त्याची पोच म्हणून ही 'गोड' बातमी!
हरकत नाही!
मी तरी कुठे तुझ्याशिवाय झुरतोय?
मी तर जुन्या आठवणींवर मनापासून हसतोय !

पण एकच काळजी वाटते
तुझ्या लहानगीने मला 'मामा' म्हणू नये !
जखमेवरच्या खपलीला हसता हसता उघडू नये !!

....रसप....
१ जुलै २०१२
Related Posts Plugin for WordPress, Blogger...