Tuesday, April 28, 2015

ह्या लेखाला शीर्षक नाही

बराच विचार करून व जबाबदारीने काही लिहितो आहे. ह्यात कुणाला दुखावण्याचा हेतू नाही. काही चुकल्यास सांगावे. कमी-जास्त झाल्यास समजुन घ्यावे आणि हे काही न करता जर डोक्यात राख घालूनच घ्यायची असेल तर तसंही करावे. कारण मी माझं मत मांडणारच !

गेल्या काही महिन्यांत असं दिसून आलं आहे की खूप मोठ्या प्रमाणात 'गझल' हा काव्यप्रकार हाताळला जातो आहे. ही तसं पाहिलं तर चांगली गोष्ट आहे. कारण ultimately एका अत्यंत सुंदर काव्यप्रकाराचा प्रसार होतो आहे. तो सर्वदूर पोहोचतो आहे. त्याची वाढ होते आहे.
पण ही खरोखर 'वाढ' आहे की 'सूज' आहे, ह्याचा विचार करायला हवा, असं मला वाटतं.

माझ्या लक्षात आलेल्या किंवा असं म्हणू की मला संशय येतो आहे, अश्या काही गोष्टी मी इथे लिहितो :-

१. सोय - शेर लिहिणे, गझल लिहिणे हे अभिव्यक्तीची गरज म्हणून नाही तर शुद्ध 'सोय' म्हणून लिहिले जाणे. दोन ओळींत एखादा विचार मांडून झटक्यात मोकळं होता येतं. तीच जमीन पाळून पुढील दोन ओळींत दुसराच कुठला विचारही मांडला जाऊ शकतो. त्यामुळे माथापच्ची करत बसावी लागत नाही. एक कवी म्हणून स्वत:च्या मनाची झीज करावी लागत नाही किंवा कमी झिजावं लागतं. ह्यामध्ये प्रामाणिक नाईलाजही असतो काहींचा. धावपळीचं जग आहे. लोकांना घड्याळ्याच्या काट्यावर पळावं लागतं. ह्या ओढाताणीत, वाहतं पाणी ज्याप्रमाणे आपला उतार आपणच शोधून घेतं, तसंच त्यांची अभिव्यक्ती दोन ओळींची ही सोय हुडकून काढत असावी. इथवर ठीक आहे. पण असं सगळ्यांच्याच बाबतीत निश्चितच नाही. स्पष्टपणे सांगायचं झाल्यास, एरव्ही हा आळसाचा भाग झाला असावा. म्हणूनच मुसलसल गझला फारच कमी लिहिल्या जात आहेत.

२. लोकप्रियता - गझल हा अनेकविध कार्यक्रमांतून व जनमानसात त्याविषयी असलेल्या एक प्रकारच्या उदात्त व उच्च प्रतिमेमुळे लोकप्रिय काव्यप्रकार आहे. परखडपणे सांगायचं झाल्यास 'टाळ्या कमावणारी अभिव्यक्ती' आहे. शेराला मिळणारी दाद व कवितेला मिळणारी दाद ह्यांतला फरक सांगायची आवश्यकता नाही. ही दाद कवींना भुरळ पाडते आहे. त्यामुळे 'गझल' समजुनही न घेता गझल लिहिणारे लोक झालेले आहेत. अर्थात बहुतेकांची सुरुवात साधारण लिखाणापासूनच होते. आज जे कुणी श्रेष्ठ व अनुकरणीय गझलकार आहेत, त्यांनीही सुरुवातीला लिहिलेल्या गझला सामान्य असू शकतील किंवा आजही त्यांच्याकडून होणारं सगळंच लिखाण अत्युच्च प्रतीचंच असेल असंही नाही. पण झालं असं आहे की सामान्य लिहूनही, केवळ त्या संरचनेच्या आकर्षकतेमुळे त्या सामान्यत्वावर पांघरूण ओढलं जात आहे. काही लोक तर असल्या तोडक्या मोडक्या गझला घेउन मंचावर विराजमान होत आहेत आणि त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवलेलंही दिसतंय. उदा. - काही दिवसांपूर्वी मी एका व्यक्तीचा कुठल्याश्या राज्यस्तरीय मुशायऱ्यात सहभागी होऊन सन्मानचिन्ह घेतानाचा फोटो पाहिला. ही व्यक्ती अगदी काल-परवापर्यंत अत्यंत सदोष भाषेत सुमार कविता व चारोळ्या लिहित असे. मला आश्चर्यमिश्रित आनंद झाला म्हणून मी त्या व्यक्तीच्या गझला वाचण्यासाठी शोध घेतला. जे काही मला मिळालं, ते पाहून मला केवळ कीव आली.

३. गुरु-शिष्य - स्वयंघोषित गुरू (उस्ताद) ही कमी नाहीत ! काही वर्षांपूर्वी एका काव्यमेळाव्यात एका 'नामवंत' गझलकार व्यक्तीने, एका गुरुतुल्य व्यक्तीला 'माझा इस्लाह घ्या' अशी अप्रत्यक्ष सुचवणी माझ्यासमोर केली होती. त्यावेळी ती गुरुतुल्य व्यक्ती, मी व इतर काही स्नेही ह्या संभ्रमात पडलो की हसावं की चिडावं ! परंतु, आज असं दिसतंय की अनेक गुरुकुलं चाललेली आहेत. जरा कुणी 'गझल म्हणजे काय' असा विचार करणाराही दिसला की त्याला पंखाखाली घेण्यासाठी लोक तयार आहेत. हे उतावीळ उस्ताद त्या धडपडणाऱ्या कवी/ कवयित्रीला घाई-घाईने गझलेच्या डोहात उतरवत आहेत, ढकलत आहेत. आणि तो निरागस भाबडा जीवही जीवावर उदार होऊन गटांगळ्या खातो आहे. लोकांना इस्लाह देण्याची व घेण्याचीही खूप घाई झालेली आहे.

४. श्रेष्ठत्व - कुठे तरी अशी एक भावना आहे की 'गझल लिहिणे हे कविता लिहिण्यापेक्षा श्रेष्ठ आहे.' गझल लिहिणारा आणि ती वाचणारा दोघेही ही भावना मनात घेउन असतात. अनेक (जवळजवळ सगळ्याच) कवी/ कवयित्रींचा प्रवास 'कविता ते गझल' असाच सुरु आहे किंवा झालेला दिसतो. बहुसंख्य लोक एकदा गझल लिहायला लागले की कविता लिहित नाहीत. ह्या श्रेष्ठत्वाच्या आभासामुळेही अनेक जण गझलेकडे ओढले जात आहेत. तंत्रात बसवलेल्या १० ओळी लिहिल्या की त्यांना आपण खूप भारी काही केलं आहे, असं वाटायला लागतं. बढती मिळाल्याचा आनंद होतो. Ideally कविता व गझल हे दोन्ही समांतरपणे विकसित होणं, हे एका कवीमनासाठी आवश्यक आहे. दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही.

५. अनभिज्ञता - 'वृत्तात लिहिणं म्हणजे गझल लिहिणं', असा एक समज पसरला आहे किंवा असा एक संस्कार नकळतच अनेकांच्या मनावर झालेला आहे किंवा इथे पुन्हा आधी लिहिलेला 'सोय' हा मुद्दा आहेच. 'दोन ओळी वृत्तात लिहिणे आणि त्यांवर आशय-विषयाचे बंधन नसणे', ही चौकट खूपच सोयीची आहे. ह्या अनभिज्ञतेमुळे किंवा सोयीमुळे लोक कविता लिखाणाला सुरुवात केल्यावर काही काळानंतर गझलकडे वळतात. कविताही वृत्तात लिहिलेली असू शकते किंवा वृत्तात कविताही लिहिली जाते, हे त्यांना कदाचित लक्षातच येत नसते किंवा ते कालबाह्य आहे, असा समज असतो किंवा असं काही समोर सहसा येतच नसल्यामुळे 'हेही करता येईल का' असा विचार मनात येत नसावा किंवा सोय पाहिली जात आहे.
(काही गझलकार जेव्हा क्वचित कधी तरी कविता लिहितात तेव्हा ते मुक्त लिहितात ही कदाचित अभिव्यक्तीला पडलेली खीळ असावी कारण 'तिसरी ओळ' सुचतच नाही.)

६. कुरूप कविता - हे एक कडवट सत्य आहे की कविता कुरूप, अनाकर्षक झाली आहे. विषय व आशयाची विशिष्ट बंधनं कवितेवर लादली गेली आहेत. कविता सामाजिकतेच्या भल्यामोठ्या आभाळाचा एक छोटासा तुकडा तोडून, त्याला अंथरून तेच आपलं विश्व समजते आहे. ह्याच्या बाहेर विचार करणारे लोक साहजिकच स्वत:ला परग्रहवासी समजत आहेत आणि दुसरीकडे वळत आहेत. 'कविता' त्यांना रमवू शकत नाही आहे. प्रयोगशीलतेचा दुराग्रह नसावाच, पण प्रयोग करूच नये असाही दुराग्रह कसा बरोबर ? जाणून बुजून चौकटी झुगारल्या जात आहेत. ओठांवर रुळणारी, हृदयात घर करणारी कविता फार क्वचित लिहिली जाते. त्यामुळे तिचा चाहतावर्ग कमी झाला आहे.

------------
हे व असे अजूनही काही विचार आहेत. आत्ता इतकेच सुचले. ह्याव्यतिरिक्त काही विचार तुमच्याकडेही असतील. पण ह्या सगळ्यातून काही काळजीचे मुद्दे मला वाटतात :-

१. अति तेथे माती - ह्या घडीला माझ्या फेसबुक न्यूज फीडची स्थिती अशी आहे की जर माझ्यासमोर (चारोळ्या लिहिणाऱ्या बहुतेकांना मी अनफॉलो केलेलं असतं) १० वेगवेगळ्या कवी/ कवयित्री मित्रमंडळींच्या १० पोस्ट्स असतील तर त्यातील ४-५ तरी शेर किंवा गझला असतात. हे प्रमाण खूप जास्त आहे. स्पष्टपणे हेच दिसून येतंय की कवितेचे इतरही काही प्रकार असतात ते कुणाला माहितही नाहीत किंवा ते हाताळायचेच नसावेत. ज्या प्रमाणे अति संख्येने लोक कविता लिहायला लागल्याने सुमार कवितांचं पीक आलं आहे, त्याच प्रमाणे खूप जास्त प्रमाणात गझलही लिहिली जाऊ लागल्याने दर्जा साहजिकच खालावला आहे.

२. नीर-क्षीर विवेक - कवी/ कवयित्री त्यांच्या परीने त्यांचे विचार गझलेतून, शेरातून मांडतात. त्यात गझलेचा उद्गार कधी असतो, कधी नसतो. कधी तर त्यात तांत्रिक चुकाही असतात. पण मायेने पंखाखाली घेणारे उस्ताद लोक जबाबदारीने चुका दाखवत नाहीत की काय ? जिथे गुरुच्या अधिकाराने खडसावायची आवश्यकता असते, तिथे ते कुणी करत नसावेत की काय ? काही जाणकार व अधिकारी लोकांना वाईटपणा घ्यायचा नसतो. त्यामुळे चुकीचे, वाईट असे काही असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याकडे कल असतो. परिणामत: चुकीचं किंवा वाईट लिहिणारी व्यक्ती पुन्हा पुन्हा तेच लिहित राहते. कालांतराने तिच्यात सुधारणा होतही असेल, पण ती वेळीच होत नाही आणि ती होईपर्यंत अश्या लिखाणाची लागण इतरही काहींना होते.

३. चौफेर वाढ खुंटली - बहुतांश लोक 'कविता ते गझल' असाच प्रवास करत आहेत. ह्यांतले ९९% लोक तरी असे असावेत ज्यांनी फक्त मुक्त छंद कविता व गझल हेच दोन काव्यप्रकार हाताळलेले असतील. ("हाताळणे" म्हणजे ८-१० वेळा प्रयत्न केले, असं नसतं हे मी मानतो.) कवितेतील अनेकविध प्रकार त्यांना आकर्षित करत नाहीत. गझल लिहिणारे बहुतेक जण कविता लिहित नाहीत. स्पष्ट चित्र असं आहे की, 'कविता लिहिणे म्हणजे मुक्त लिहिणे किंवा फार तर अक्षरछंदात लिहिणे आणि वृत्तात लिहिणे म्हणजे गझल लिहिणे.' कवी एक तर कवितेत अडकला आहे किंवा गझलेत गुरफटला आहे. सर्व काव्यप्रकार हाताळणारे, आवड असणारे एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच लोक असतील. ह्यामध्ये असं दिसतंय की प्रचंड प्रतिभा असूनही काही जण एकाच कुठल्या तरी चौकटीत स्वत:च स्वत:ला बांधून/ कोंडून घेत आहेत.

४. दर्जा घसरणे - ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून असेल, पण कविता व गझल ह्या दोन्हीचा दर्जा इतका खालावला आहे की काही वाचावंसंही वाटत नाही आणि वाचावंसं वाटत नसतानाही वाचलं जातच असल्याने लिहावंसंही वाटत नाही ! वृत्तपूर्तीसाठी काहीही कवाफी जुळवले जाताना दिसतात, कुठल्याही रदीफांच्या शेपट्या लावलेल्या आढळतात आणि कसलीही जमीन कसली जाताना पाहण्यात येते.

-----------

माझ्या ह्या वाक्यावर सर्वांनी नीट विचार करावा अशी माझी विनंती आहे.
"गझल चारोळीच्या वाटेने चालली आहे."

चारोळीमुळे कवितेची अपरिमित हानी कशी झाली आहे, हे सगळ्यांच्या डोळ्यांसमोर आहे. गझलेमुळेही असंच काहीसं होणार आहे किंवा कदाचित होतही आहे. कारण 'गझल'च्या नावाखाली अकाव्यात्मक लिहिले जाण्याचे असंख्य नमुने सर्रास दिसत असतात. वाचल्यावर किळस वाटावी असं लिखाण 'गझल' ह्या गोंडस नावाने लिहिलेलं मी सहन केलं आहे. एक काव्यरसिक म्हणून मला हे चित्र खूप विदारक वाटत आहे. कविता विद्रूप झालीच आहे. गझलही विवस्त्र होते आहे. 'सत्य नग्न असतं' हे मला मान्य आहे. पण म्हणून नग्नतेचा आग्रह धरणं मात्र पटत नाही.

कविता म्हणजे 'पसरट लिखाण' आणि 'साचेबद्ध मिसरे' अश्या दोन बाजू असलेलं एक खोटं नाणं बनत चाललं आहे किंवा कदाचित बनलंच आहे. माझ्यासाठी कविता एक दोन बाजू असलेलं एखादं खरं/ खोटं नाणं नसून एक हीरा आहे. त्याला अगणित पैलू पडायला व पाडायला हवे.

------------

माझ्या ह्या विचारांशी सगळेच सहमत नसतील. काहींना ह्यात आक्षेपार्ह वाटेल. काहींना अपमानास्पद वाटेल. कुणी दुखावले गेल्यास मी क्षमा मागतो. मात्र जे लिहिलं आहे ते मनातलं लिहिलं आहे. हे माझं अवलोकन आहे. माझ्या जागेवरून जे दृश्य दिसत आहे त्याचंच हे वर्णन आहे.

असंही होईल की काही लोकांना माझं बोलणं पटेलही. त्यांनी ह्याला असंतोषाची ठिणगी समजुन रान पेटवू नये. बोंब मारत सुटू नये. विचार करावा. हातभार लावावा. परिस्थिती कशी सुधरेल हे पाहावं. प्रत्येकाने आपापलं योगदान दिलं, आत्मभान बाळगलं तरी ते खूप मोठं असेल.
कवितेच्या पालखीला सर्वांनी वाहायचं आहे, हे नक्कीच.

धन्यवाद !
- ....रसप....
- रणजित पराडकर

Monday, April 27, 2015

स्वच्छंदी

तू शब्दफुलांचे हार मला घालावे
मी धन्य मनाशी होते
तू मुकुट देखणे मज डोई ठेवावे
मी मलाच सुंदर दिसते

वेदना तुझी गाताना मीही बनते
कारुण्यसिंधुची गाज
फेसाळ वाहवा तीरावरती पसरे
तो खळखळ हसरा भास

प्रेमाचा वाहे तुझ्यात निर्मळ निर्झर
पान्हाच जणू आईचा
माझ्यासोबत मी नाव तुझे दावावे
हा हक्क जणू जनकाचा

पण तुझी भावना, अभिव्यक्ती, मी कविता
खेळू दे मज स्वच्छंदी
तू बांध पूल उड्डाणे घेण्यासाठी
ही मला नको तटबंदी

मज चिंब भिजू दे कधी तरी झाडांसम
छातीत भरू दे वारा
मज उन्हे वेचण्या अंगणात जाऊ दे
निजताना दे मज तारा

तू अज्ञाताच्या मागावर ने मजला
धुंडाळ दिशांना दाही
धावू दे मागे फूलपाखरांच्याही
मज मृगजळ समजत नाही

तू मला मिरव अन् ऊर फुलव अभिमानी
पण हट्ट पुरव माझेही
म्हणशील तू जसे तसे वागते बाबा
दे मला पाहिजे तेही

....रसप....
२३ एप्रिल २०१५ 

Sunday, April 26, 2015

नकली फुलं, असली फूल्स (Movie Review - Kaagaz Ke Fools)

मला खूप आवडणाऱ्या ह्या 'निदा फाजलीं'च्या ओळी आहेत -

अपनी मर्ज़ी से कहाँ अपने सफ़र के हम हैं
रुख हवाओं का जिधर का है उधर के हम हैं

कमी-अधिक प्रमाणात असंच आपलं आयुष्य असतं. बहुतेक गोष्टी ओघानेच घडत असतात आणि आपण त्यासोबत घडत-बिघडत जातो. स्वबळावर आपली दिशा निवडणारे लोकही अनेकदा ह्या ओघासोबत वाटचाल करतातच. आपला असूनही आपला नसलेल्या किंवा नसूनही असेलल्या ह्या प्रवासात काही जाणीवा आपसूक होत जातात. कुणी त्याला ठाव लागणे म्हणतं तर कुणी शोध घेणे. फरक काही नसतो, काही तरी नवीन उमगलेलं असतं, फारसा प्रयत्न न करता किंवा प्रयत्न काही वेगळ्याच इप्सितासाठी असतो आणि हाताला काही वेगळंच लागतं. गुंतागुंतीचं आहे, पण बहुतेक वेळा सत्य गुंतागुंतीचंच असतं. ह्याच्या बरोबरच अजून एक 'जोड-सत्य' असंही असतं की, प्रयत्नपूर्वक किंवा ओघानेच किंवा दोन्हीच्या एकत्रित परिणामाने जे काही आपल्याला मिळतं, त्याने आपले आयुष्य कितीही सुखकर केलं, तरी 'समाधानी' होईलच असे नाही. कारण सामान्यत: मनुष्याचा स्वभाव असा आहे की त्याला नेहमीच दुसऱ्याच्या अंगणातली हिरवळ जास्त मोहक वाटत असते. (Grass is always greener on the neighbor's side!). हातचं सोडून पळत्याच्या मागे धावणं, हा मनुष्यस्वभावाला मिळालेला एक शापच !
असेच पळत्याच्या मागे धावणारे पती-पत्नी म्हणजे 'पुरुषोत्तम' आणि 'निक्की'.
'पुरुषोत्तम त्रिपाठी' (विनय पाठक) हा आयुष्याच्या ह्या प्रवाहासोबत वाहणाऱ्या प्रवासाला आपलं मानून मार्गक्रमण करणारा एक उदयोन्मुख लेखक असतो आणि मिळालेल्या सुखात समाधानी नसलेली त्याची पत्नी असते 'निक्की' (मुग्धा गोडसे). एका जाहिरात एजन्सीत कॉपीरायटरची नोकरी करणाऱ्या पुरुषोत्तमची गेल्या वर्षभरापासून स्वत:ची एक कादंबरी लिहून तयार असते, मात्र प्रकाशक मिळत नसतो आणि दुसरीकडे त्याचाच एक मित्र, स्वत:चा कापडाचा व्यवसाय सांभाळत थिल्लर पुस्तकांचा रतीब टाकून भरपूर प्रसिद्धी व पैसाही कमवत असतो. खरं तर हा एकच मित्र नव्हे तर त्याचे सगळेच मित्र स्वत:च्या आयुष्यात मस्तपैकी चैन करत असतात. हे सगळं निक्कीला साहजिकच सहन होत नसतंच आणि वरचेवर दोघांमध्ये ह्या विषयावरून वाद-विवाद होत असतात. 'पैसा कमवावा, नाव कमवावं, अधिक आनंदाचं, सुखाचं आयुष्य जगावं अशी काही महत्वाकांक्षाच पुरुषोत्तमकडे नाही. तो नुसता आपल्या नाकासमोर चालत राहणारा आहे. त्याचं आयुष्यात काहीही होऊ शकत नाही, जोपर्यंत तो स्वत:ला बदलत नाही', अशी निक्कीची पुरुषोत्तमविषयी समजूत असते. एक दिवस हा वाद इतका विकोपाला जातो की रागाच्या भरात पुरुषोत्तम घर सोडून निघून जातो. तो कुठे गेला आहे, हे न त्याच्या मित्रांना माहित असतं, न इतर कुणाला.
नेहमीच्या आयुष्याशी जवळजवळ पूर्णपणे संपर्क तोडून पुरुषोत्तम एक वेगळी दुनिया पाहतो, नव्हे त्याला ती दुनिया 'दिसते'. वाहता प्रवाह त्याला त्या दुनियेपर्यंत थोडासा वाहवत नेतो. काही नवीन जाणीवा होतात आणि काही जुन्या जाणीवांवरील धूळ झटकली जाते. एक उदयोन्मुख लेखक व एक सामान्य माणूस अश्या दोन पातळीवर झगडणारा पुरुषोत्तम ह्या काही दिवसांत कोणकोणत्या परिस्थितींतून जातो व अखेरीस काय साध्य करतो, ह्याचा प्रवास म्हणजे 'कागज़ के फूल्स'. ह्यातल्या 'कागज़' चे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे पैसा (नोटा) आणि दुसरा म्हणजे शब्द सजवणारा साधारण कागद. पुरुषोत्तम ह्या दुसऱ्या 'साधारण कागज़'च्या मागे आहे तर 'निक्की'ला पहिल्या 'कागज़' मध्ये जास्त रस आहे.

असं एकायला, वाचायला ही कहाणी खूप दमदार वाटेल. विनय पाठक, सौरभ शुक्ला, मुग्धा गोडसे, रायमा सेन ही नावंही दमदार आहेत. मात्र तरीही चित्रपटाचा 'कागज़' कोराच राहतो. चित्रपट म्हणावं अशी पकड घेतच नाही. प्रकाशकाने पुस्तक छापण्यासाठी पैसे मागितल्यावर त्याला पन्नास रुपये देऊन 'यह चाय का पैसा' म्हणून पुरुषोत्तम निघून जातो, अशी काही १-२ दृश्यं वगळता बाकी भाग काहीच छाप सोडत नाही. दारू पिऊन तर्र झालेल्या पुरुषोत्तमचा चेहरा मात्र अगदी टवटवीत दिसत असतो, एक केससुद्धा विस्कटलेला नसतो, अश्या छोट्या-छोट्या उणीवांमुळे पडद्यावर जे काही चालू आहे, त्यात 'जान' येत नाही. त्याचा खोटेपणा लपतच नाही.
'विनय पाठक' हा आजच्या चित्रपटाने 'अमोल पालेकरां'साठी दिलेला पर्याय आहे, असं मला त्याच्या 'भेजा फ्राय', 'चलो दिल्ली' वगैरे चित्रपटांमुळे वाटतं. नुकत्याच आलेल्या 'बदलापूर'मध्ये त्याची भूमिका एरव्हीपेक्षा वेगळी होती पण तरी त्याच्याकडे ह्या कहाणीला हवा असलेला सामान्य माणसाचा चेहरा, देहयष्टी व देहबोली निश्चितच आहे. मात्र ह्या सगळ्याचा सुयोग्य वापर दिग्दर्शक 'अनिल कुमार चौधरी' करू शकलेले नाहीत. 'निक्की'च्या अत्युत्साही मोठ्या भावाच्या भूमिकेत 'सौरभ शुक्ला' आहे. हा एक अश्या ताकदीचा अभिनेता आहे की त्याला बहुतेक दिग्दर्शकाची गरजच नाही, त्यामुळे त्याच्याविषयी काही बोलायला जागाच नाही. मुग्धा गोडसे दिसते छान, पण ती पडद्यावर असताना 'मुग्धा गोडसे' आणि 'निक्की' वेगवेगळ्या दिसत राहतात. 'रायमा सेन'ला एका वेश्येची भूमिका आहे. तिच्या भूमिकेलाच एक वलय आहे, त्यामुळे ती बऱ्यापैकी लक्षात राहते.
३-४ गाणी मध्ये मध्ये वाजतात, पण आजकाल बहुतेक चित्रपटांत होतं तसं, छळवाद करत नाहीत. तरी, लक्षातही राहत नाहीत.

एक चांगला'प्लॉट', ज्यावर बऱ्याच दिवसांनी एक हलका फुलका खुसखुशीत चित्रपट बनू शकला असता. मात्र बनला नाही, ह्याची हळहळ वाटल्याशिवाय राहवत नाही. कुठे तरी चित्रपटकर्ता स्वत:सुद्धा 'रुख हवाओं का जिधर का है..' उधरच्या दिशेने भरकटला आहे आणि परिणाम स्वरूप एका कोरड्या, गंधहीन नकली कागदी फुलासारखा चित्रपट बनला आणि 'विनय पाठक, सौरभ शुक्ला' अशी नावं पाहुन चित्रपट पाहायला गेलेले अनेक जण असली 'फूल्स' बनले !

रेटिंग - * *

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (२६ एप्रिल २०१५ रोजी) प्रकाशित झाले आहे :-

Thursday, April 23, 2015

शून्याचं महत्व - 'कोर्ट' (Court - Marathi Movie)

सेकंद काटा १२ वर आला. घड्याळात ८ वाजून २५ मिनिटं झाली. सेकंद काटा १० वर आला. मी माझी नजर माझ्यासमोर असलेल्या ताटलीतील इडलीच्या शेवटच्या चतकोर तुकड्याकडे वळवली. त्यात काटा खुपसला. सांबारात बुचकळला. दुसऱ्या हातातील चमच्याने छोट्या वाटीतील चटणी घेतली. आधी ओली इडली आणि मग चटणी असं दोन्ही स्वत:च्या तोंडात भरवलं. लहान असताना आईने शिकवलं होतं. प्रत्येक घास ३२ वेळा चावायचा. ३२ मोजले. गिळलं. पाणी प्यायलो. आता घड्याळ्यात ८ वाजून पावणे सव्वीस मिनिटं झाली. मी उठलो. घराबाहेर येऊन माझ्या जुन्याश्या मोटरसायकलला कीका मारल्या. पाच कीका मारल्या. मग चोक दिला. त्यानंतर तिसऱ्या कीकला माझी फटफटी सुरु झाली. हेल्मेटच्या आत नकारात्मक हललेलं माझं डोकं, हेल्मेटसुद्धा हलल्यामुळे समोरच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या बाल्कनीत उभं राहून ब्रश करणाऱ्या माणसाने पाहिलं आणि तो हिरवट दाढी वाढलेल्या गालांतल्या गालांत छद्मी हसला.
मग माझी मोटरसायकल ऑफिसच्या दिशेने.. काटा ४५ वर स्थिर...

अरे ऐका ना.. I mean वाचा ना..! माझं रोजचं आयुष्य आहे हे ! ह्यातल्या प्रत्येक डीटेलिंगला महत्व आहे.इडलीचा शेवटा चतकोर तुकडा माझ्या एकटेपणाचं प्रतीक आहे. त्यात घुसणारा काटा, सांबारातली डुबकी आणि चटणीसोबतचं चर्वण हे परिस्थितीच्या अत्याचाराचं प्रतीक आहे. मोटरसायकल चटदिशी चालू होत नाही, चोक दिल्यावरच चालू होते, त्यावर मी डोकं हलवतो, ह्याचा अर्थ मला कुठलीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही. समोरच्या इमारतीतील मनुष्य माझ्यावर हसतो, तो हरामखोर, विघ्नसंतोषी दुनियेचा चेहरा आहे. हिरवट दाढी वाढलेला ओंगळवाणा. - इत्यादी.
पण तुम्ही हे वाचणार नाही. वाचलंत तरी तुम्हाला हे पटणार नाही. का? कारण हे वाचायला मिळावं ह्यासाठी मी तुमच्याकडून पैसे घेतलेले नाहीत. फुकट आहे ना हे. मग निरर्थकच असणार.

बरं. अर्थपूर्ण बघायचंय? मग जवळच्या चित्रपटगृहात जा. 'कोर्ट'चं तिकीट काढा. त्यातली पात्रं वेगळी आहेत, कथानक(?) सुद्धा वेगळं आहे. पण अभिव्यक्ती वरील परिच्छेदांतलीच. एकदम भारी! आता तुम्ही बरोबरच्या व्यक्तीशी चर्चा कराल - "किती रियालिस्टिक दाखवलंय ना सगळं? ते कोर्टातलं कामकाज तर अगदी जसंच्या तसंच. त्या वकिलांच्या लाईफ स्टाईल्समधला फरक पण छान दाखवलाय. म्हणजे तो पुरुष वकील एकटा राहत असतो. घरात मस्तपैकी दारू पिऊन टुन्न होतो. कधी मित्रांसोबत जाझ बारमध्ये जातो. आणि ती महिला वकील मात्र घरी आल्यावर नवरा-मुलांना स्वयंपाक करून जेवायला वाढते आहे. कधी बाहेर गेलेच तर 'सत्कार' खानावळीत.. वगैरे. सुंदर डीटेलिंग."

असो.
'कोर्ट' ही कहाणी लोकशाहीर नारायण कांबळे ह्या व्यक्तिरेखेची कहाणी नाही. चित्रपटाच्या नावावरूनच ती कशाची कहाणी आहे, हे समजुन यावं. ह्यातलं कोर्ट हे आपण वर्षानुवर्षे, दशकानुदशके, सिनेमानुसिनेमे जसं पडद्यावर पाहत आलो आहोत, तसं अजिबात नाही. खऱ्या कोर्टाची पायरी ज्यांनी चढलेली आहे, त्यांना हे व्यवस्थित माहित आहे की प्रत्यक्षातलं कोर्ट तसं नसतंच, जसं आपण सिनेमा व सिरियलींमधून पाहत असतो. प्रत्यक्षातलं कोर्ट जे मी पाहिलं आहे, ते हुबेहूब दिसलं आहे ते 'कोर्ट' मध्ये. ह्या चित्रपटाशिवाय इतर कुठेही मी कोर्टाचं इतकं अस्सल चित्रण दुसरं पाहिलेलं नाही. इथले वकील न्यायाधीशांच्या उरावर चढून डायलॉग पे डायलॉग, डायलॉग पे डायलॉग मारत नाहीत की इथले न्यायाधीश चित्रगुप्ताच्या पवित्र्यात बसून चेहरा ओढून लांब करून बोजड उर्दूमिश्रित हिंदीत फैसला सुनावत नाहीत. हे सगळं वास्तववादी चित्रण उत्तम जमलं आहे, ह्याबद्दल वादच नाही.

मात्र कोर्ट व नारायण कांबळेंचा विषय बाजूला राहून चित्रपट दोन्ही वकिलांच्या व न्यायाधीशांच्या खाजगी आयुष्याचंही वास्तववादी चित्रण दाखवतो, तेव्हा गोंधळ उडतो. जर कीसच पाडायचा असेल, तर ह्यात बघणाऱ्यानेही कीस पाडायला हवा. स्त्री वकील ट्रेनमधून घरी जाताना सोबतच्या बाईशी साडीबद्दल गप्पा मारते. ते सगळं गॉसिप साहजिकच घरच्यांवर पोहोचतं. तेव्हा वकीलीणबाई नवऱ्याला मधुमेह असल्यामुळे गोड, तेलकट जवळजवळ बंदच केलं आहे घरात आणि नंतर लगेच कोशिंबीरीत वाटीवर फोडणी ओततात ! हा विरोधाभास मुद्दाम दाखवला असेल, जेणेकरून त्या वकीलीणबाईंचा खोटारडेपणा समोर यावा, तर मात्र मानलं ह्या दृष्टीला !

दुसरं म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस किंवा गेंडा वगैरे कसे ढिम्म पडून/ बसून राहतात, तसा कॅमेरा प्रत्येक वेळी एका जागी बद्दकन् पडलेला राहतो. ज्या जागी पडद्यावरील पात्राला पोहोचायचं असतं, त्या जागेच्या बाजूलाच तो कॅमेरा असणार असतो, हे आपल्याला ते पात्र गल्ली/ बोळाच्या अगदी पार दुसऱ्या टोकापासून जेव्हा आत येतं तेव्हाच कळतं.

उन्हाळ्याच्या सुट्टीपूर्वीचा कोर्टाचा अखेरचा दिवस संपून न्यायाधीश उठून जातात. त्यानंतर एक-एक व्यक्ती न्यायालयातून बाहेर पडत जाते. आपल्याला तेव्हाच कळतं की सगळे बाहेर गेल्यावर एक जण सगळे दिवे एकेक करून बंद करेल, त्या खोलीचं दार लावेल, मग कॅमेरा हलेल. तसंच होतं. फक्त एकच अंदाज चुकतो. दार लावल्यावरही तो कॅमेरा जवळजवळ १०-१२ सेकंद अंधार चिवडत बसतो.

असे १०-१०, १२-१२, २०-२०, ३०-३० सेकंदांचे चिवडे गोळा केले तर सगळा निचरा करून चित्रपट, चित्रपट न राहता टीव्ही मालिकेचा एक भाग झाला असता. ह्यात कांबळेंचा वकील गाडी चालवताना स्टियरिंग व्हील व त्याच्या चेहऱ्यावर रोखलेल्या कॅमेऱ्याचे प्रत्येकी १०-१२ सेकंदांचे दोन शॉट्स, त्याची सुपर मार्केटमधली random खरेदी, तो पोलीस स्टेशनमध्ये जातो तेव्हाचा लांबलचक वॉक, कांबळेंना पोलिसांच्या गाडीतून कोर्टात नेल्यानंतर आवारात कामाची भिक मागणाऱ्या वकिलांचा वावर दाखवणारा शॉट, सगळ्यात शेवटी 'अर्नाळा बीच रिसॉर्ट'मध्ये शिरल्यावर न्यायाधीश महोदयांची दाखवलेली अनेक मिनिटांची अतिकंटाळवाणी सहल इ. अनेक दृश्यं समाविष्ट होऊ शकतात.

'कोर्ट'मधली सर्वोत्तम गोष्ट कुठली असेल तर दोन्ही पोवाडे आणि त्यांचं सादरीकरण. ढवळून काढणारे, चेव चढवणारे शब्द आणि ठसकेबाज सादरीकरण केवळ अप्रतिम आहे. पहिला पोवाडा खूप सुरुवातीला आहे. पण दुसरा बराच नंतर असल्याने तोपर्यंत मरगळ आलेली असते. तो पोवाडा गदागदा हलवून जागं करतो.


अगदी थोडक्यात सांगायचं झालं, तर 'कोर्ट' पाहिल्यावर मला शाळेतल्या परीक्षा आठवल्या. प्रश्न असायचा 'सविस्तर उत्तर द्या.' 'सविस्तर' म्हणजे किमान पानभर तरी झालंच पाहिजे, असं असायचं. मला येणारं उत्तर ३-४ ओळींत संपणारं असायचं. मग मी दोन शब्दांत जागा सोडायचो. एका ओळीत ४-५ च शब्द राहतील, असं पाहायचो. अक्षरसुद्धा जरा मोठं काढायचो आणि अनावश्यक वाक्यं कोंबून लांबी, रुंदी वाढवत न्यायचो. बऱ्याचदा भरायचं अख्खं पान, कधी कधी तर पुढच्या पानावरसुद्धा पोहोचायचो. कधी कधी मात्र इतकं सगळं करूनही पान भरायचं नाही. In any case, चार ओळींच्या उत्तराला मिळाणाऱ्या गुणांपेक्षा अर्धा-एक गुण तर जास्तीचा माझ्या वाट्याला येत असे.
ह्या चित्रपटाला मी रेटिंग वगैरे देणार नाही कारण त्याला आधीच सर्वोच्च रेटिंग मिळालेलं आहे. पण म्हणणं इतकंच आहे की शून्य संकलन, शून्य छायाचित्रण, शून्य पटकथा, शून्य अभिनय अश्या सगळ्या शून्यांच्या आधी फक्त संवेदनशील विषयाचा स्पर्श असलेला '१' आकडा लावला की चढणारं प्रत्येक शून्य हजार/ लाख/ करोडों मोलाचं होतं. शून्याचं महत्व 'कोर्ट'मुळे कळलंय.

- रणजित पराडकर

टीप :- प्रस्तुत लेखातील मतं माझी वैयक्तिक मतं आहेत. ती कुणाला पटावीत, अशी माझी अपेक्षा नाही, आग्रह तर नाहीच नाही. म्हणूनच त्यावर मी प्रतिवाद करीनच असेही नाही.
ह्या लेखावर, ह्यातील मतांवर टीका करावी. त्यांना विरोध करावा. स्वत:चे वेगळे मत अधिक ठामपणे मांडावे. ह्या सगळ्याने मला आनंद होईल. मात्र उपदेशकाचा वेश चढवू नये. मी कुणावर माझी मतं लादत नसल्याने, माझ्यावर काही लादायचा प्रयत्नही करू नये.

- रणजित पराडकर

Wednesday, April 22, 2015

मावळलेला दिवस रात्रभर जागवतो

आयुष्याला नवी कहाणी सांग 'जितू'
रोज तेच ते जगून कंटाळा येतो

-------------------------------------

मावळलेला दिवस रात्रभर जागवतो
आणि नव्याने अंधारच मग उजाडतो

माझ्यासोबत कधीच नसतो आनंदी
तुझ्या संगतीने मी इतके विस्मरतो

येणारा क्षण म्हणतो 'क्षणभर जगून घे'
मी गेलेल्याच्या वाटेवर घुटमळतो

अर्धा पेला नेहमीच बाकी माझा
पापणीत अव्यक्तपणे मी साठवतो

देवासाठी जिथे तिथे मंदिर बांधा
आई-बापासाठी वृद्धाश्रम असतो

तुला यायचे असेल तेव्हा ये कविते
तोपर्यंत मी गझलेवरती भागवतो

....रसप....
०९ एप्रिल २०१५ 

Sunday, April 19, 2015

बाष्कळ एक्साएक्सी (Movie Review - Mr. X)

चित्रपटाचं पहिलंच दृश्य - एका लक्झरी बसमधील प्रवाश्यांना ओलीस धरून एक दहशतवादी 'माझ्या मागण्या पूर्ण करा, नाही तर एकेकाला ठार मारतो' असं म्हणतो आहे. त्याच्या एका सहकाऱ्याला आधीच ठार केले गेले आहे. त्याच्याशी बोलणी करण्याचा प्रयत्न पोलिस व 'अँटी टेररिस्ट डिपार्टमेन्ट' च्या अधिकाऱ्यांकडून केला जातो आहे. मात्र अखेरीस त्याच्या डोक्यात गोळी घालून एका झटक्यात सगळ्यांना सोडवलं जातं. दहशतवादी मरण्याच्या आधी एक बॉम्ब सुरु करून जातो. तो जर मरणारच असतो, तर बॉम्ब सुरु करताना तब्बल ३ मिनिटांचा टायमर का लावतो ? झटक्यात उडवूनच का टाकत नाही ? त्याच्या डोक्यात गोळी घालूनच प्रॉब्लेम सोडवायचा होता, तर आधीच का नाही घातली ? असले आगाऊ प्रश्न आपल्या मनात डोकं वर काढतच असतात आणि इतक्यात चित्रपटाचा हीरो हीरोगिरी दाखवण्यासाठी बॉम्बस्फोटासाठी ४५ सेकंद उरलेले असताना बसमध्ये अडकलेल्या एका जखमी व्यक्तीला आणण्यासाठी आत जातो. जाता जाता त्याच्या सहकारी महिला ऑफिसरला 'बॉम्ब डिफ्युज कर' असं सरळ न सांगता, 'माझ्यावर प्रेम करतेस ना ? मग तो बॉम्ब डिफ्युज कर !' असं सांगतो. हे ऐकल्यावर आपण समजून चुकतो की पुढचे सव्वा दोन तास काय बाष्कळपणा चालणार आहे आणि डोकं वर काढणारे सगळे आगाऊ प्रश्न दाबून टाकतो. 'यू कॅन कॉल मी एक्स' ह्या शीर्षक गीतापासून 'मिस्टर एक्स' ची सुरुवात होते आणि केवळ पाच मिनिटांतच आपण 'अजिबात हाक मारणार नाही तुला' असं उत्तरही देऊन टाकतो.

रघुराम राठोड (इम्रान हाश्मी) आणि सिया वर्मा (अमायरा दस्तूर) हे दोघे 'अँटी टेररिस्ट डिपार्टमेन्ट' (ATD) चे धडाडीचे ऑफिसर्स असतात. भारद्वाज (अरुणोदय सिंग) हा त्या डिपार्टमेन्टचा प्रमुख असतो. भ्रष्ट अधिकारी व गलिच्छ राजकारणाच्या अत्याचाराखाली रघुराम भरडला जातो. रघु आणि सिया लग्न करणार असतानाच परिस्थिती असं एक वळण घेते की सगळं दृश्यच बदलून जातं. 'रघु'चा अदृश्य 'मिस्टर एक्स' होतो आणि त्याच्यावर झालेल्या अन्याय व त्याच्या विश्वासघाताचा तो बदला घ्यायला सुरु करतो. ह्या व्यतिरिक्त चित्रपटाच्या कहाणीत सांगण्यासारखं काही एक नाही.

मात्र, ह्या कहाणीच्या सादरीकरणाबाबत बरंच काही सांगता येऊ शकेल. कारण सूडाची कथा इतकी रटाळ करण्यासाठी अनेकांनी विशेष मेहनत घेतलेली आहे.
ह्या मेहनतीचं सार्थक झाल्याबद्दल सगळ्यात जास्त अभिनंदन विक्रम भट ह्यांचं करायला हवं. विक्रम भट आणि भारताचा तेज गोलंदाज इशांत शर्मा मला खूप सारखे वाटतात. ह्याची दोन कारणं आहेत.
१. दोघांचे केस फार वेगळे आहेत.
२. दोघांकडे भरपूर अनुभव असूनही उपयोग शून्य आहे.
चित्रपट बनेपर्यंत संपूर्ण वेळ स्वत: दिग्दर्शक विक्रम भटसुद्धा 'मिस्टर एक्स' झालेले असावेत, असा संशय घेण्यास जागा आहे. कारण दिग्दर्शकाचं अस्तित्व असून नसल्यासारखंच आहे. एक लेखक म्हणून तर इतक्या ठिकाणी 'रिकाम्या जागा भरा' आहे की हा चित्रपट आहे की घटक चाचणीचा पेपर असं वाटावं. रघुला जर मारायचं असतं, तर गोळी घालून संपवत का नाहीत ? त्यासाठी एक अख्खा कारखाना का उडवतात ? भाजलेल्या रघुला किरकोळ ढिगाऱ्याखालून शोधलं कसं जात नाही ? आणि सगळ्यात कहर म्हणजे 'रेडियेशनवरील उपचार म्हणून दिलेल्या औषधामुळे तो गायब होतो, म्हणजे नेमकं काय होतं' हे जर नीट सांगायचंच नव्हतं, तर सरळ चमत्कार होतो किंवा भूत बनून परत येतो वगैरे दाखवून मोकळं व्हायचं की ! असंही हा 'भूत' विषय विक्रम भट दर वर्षी एकदा तरी मांडतातच ! मला कळत नाही लोकांनी आपलं डोकं वापरूच नये असं जर वाटत असेल, तर चित्रपटाच्या सुरुवातीला ज्या विविध सूचना दाखवतात, त्यातच एक ओळ हीसुद्धा टाकावी ना की, 'कृपया आपले डोके बरोबर आणले असल्यास बाजूला काढून ठेवावे.'

भटांच्या भट्टीतल्या नट्या मात्र अगदी टिपिकल असतात. ह्या नट्यांचा मुख्य कार्यक्रम एककलमी असतो तो म्हणजे 'अंगप्रदर्शन'. त्यानंतर बिनडोक असणे व दिसणे आणि अभिनयाच्या नावाने बोंब असणे ह्या दोन गोष्टी. अमायरा 'दस्तूर' ह्या तिन्ही जबाबदाऱ्या इमाने इतबारे निभावते. तिच्या हातात बंदूक पाहताना 'हे वजन उचलल्यामुळे तिचा खांदा दुखावला गेला असेल का?' असं दर वेळेस आपल्याला माणुसकीच्या नात्याने वाटतं; इतकी ती एक 'स्पेशल एजंट' म्हणून शोभत नाही.

'इम्रान हाश्मी' स्वत:च्या ख्यातीला जागतो आणि गायब होऊनसुद्धा मुके घेण्याचं सोडत नाही. इम्रानचं तोंड न शिवशिवलेला चित्रपट ह्या जन्मी बघण्यास मिळेल, अशी आशा आता वाटत नाही आणि हीच खात्री त्याच्या चाहत्यांना असते व तो त्यांना निराश करत नाही. एरव्ही दिग्दर्शकाने केलेली किरकोळ अभिनयाची साधीशी अपेक्षा तो पूर्णही करतो.

भटभट्टीचं अजून एक लक्षण म्हणजे एकसुरी संगीत. त्याचा पुरवठा राजू सिंग व जीत गांगुलीकडून मुबलक प्रमाणात होतो. प्रत्येक गाणं एक तर दुसऱ्या कुठल्या तरी एकसुरी गाण्याची आठवण करून देतं किंवा कंटाळा आणतं. सगळीच्या सगळी गाणी ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देऊन विसरून जाण्याच्या योग्यतेचीच आहेत. विसरून जाण्यावरून आठवलं, 'संवाद लेखन' हे एक कल्पक काम आहे, हे लेखक शगुफ्ता रफ़ीक़ विसरल्या असाव्यात.

कहाणीला एक दैवी, चमत्कृतीपूर्ण, अमानवी, अकल्पित वगैरे कोन असणं, हे चित्रपटाचं मनोरंजन मूल्य वाढवतं, असा जर कुणाचा गैरसमज असेल तर त्यांनी अवश्य 'मिस्टर एक्स' पाहावा. तो नक्की दूर होईल. ह्या एकाच लक्षणासाठी ह्या चित्रपटाला एखादा स्टार देता येईल. कारण सव्वा दोन तासांनंतर काहीही हाती लागू नये किंवा लक्षातही राहू नये इतकी ही 'एक्साएक्सी' निरर्थक व बाष्कळ आहे.

रेटिंग - *

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (१९ एप्रिल २०१५ रोजी) प्रकाशित झाले आहे :-



Tuesday, April 14, 2015

याद नहीं क्या क्या देखा था....

खूब गयें परदेस के अपने दीवार-ओ-दर भूल गयें
शीशमहल ने ऐसा घेरा मिट्टी के घर भूल गयें

एक आर्त आवाज मला माझ्याच आतून, दरवाज्यातून कुणा अनोळखी व्यक्तीला बाहेर लोटावं, तसा बाहेर लोटत होता. मी झगडत होतो, परत स्वत:त शिरण्यासाठी आणि तो आवाज मला माझ्या ताकदीच्या दुप्पट, चौप्पट ताकदीने पुन्हा पुन्हा लोटत होता. अखेरीस मी उंबऱ्याबाहेर पडलो. जमिनीवर आपटलो. पण दार बंद होण्याआत मी सर्व ताकदीनिशी पुन्हा उठलो आणि भिडलो. तरी दार बंद झालंच. विचित्र घुसमट जाणवत होती. मी... माझ्याबाहेर !मला आत जायचंय. पण हा कोण आवाज आहे, जो मला माझ्याचपासून वेगळा करतोय ? कुणाला सांगू ? कुणाशी भांडू ?
गच्च डोळे मिटावे म्हटलं, तर डोळे मिटलेलेच होते ! उघडले.. क्षणभर अंदाज घेतला. मला दिसलं, मी माझ्या खोलीत होतो. बाजूला मोबाईल होता. त्यात पाहिलं, रात्रीचा एक वाजला होता.
आज पुन्हा एकदा जगजीतच्या त्या गझलेने पछाडलं होतं.

याद नहीं क्या क्या देखा था सारे मंज़र भूल गयें
उसकी गलियों से जो लौटे अपना ही घर भूल गयें

आजसुद्धा रात्री निजण्यापूर्वी मी सिंगापूरच्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग ऐकलं होतं. व्हायोलीनवर साथ करायला दीपक पंडित. व्हायोलीनच्या 'बो'प्रमाणेच मागे पुढे करत हिंदोळे देणारी हळुवार चाल, नज़ीर बाक्रीचे तरल शब्द आणि जगजीतचा मलमली आवाज. असा माहोल की मंचावर बसलेले ७-८ जण मंचावर नसून हृदयाच्या आत बसले असावेत. सुरांची अशी बरसात जी अंतर्बाह्य चिंब करत असावी. पहिल्या पावसात चिंब होणारी मृदा आणि तिचा तो जगावेगळी नशा देणारा गंध.
मी त्या गाण्यात होतो की ते गाणं माझ्यात होतं ?
मी त्या मंचावर होतो की तो मंच माझ्यात ? एकरूप होणं, म्हणजे हेच असावं.

मग विचार केला की, ह्या चालीत विशेष असं काय आहे ? ह्यापेक्षा सुंदर गाणी नाहीत का ? खरं तर ह्याच चालीच्या जवळ जाणाऱ्या जगजीतच्याच किती तरी गझला, गाणी आहेत ! तरी तिच्यात का गुरफटतो आहे ?

तुमको भी जब अपनी कसमें, अपने वादें याद नहीं
हम भी अपने ख़्वाब तेरी आँखों में रखकर भूल गयें

ह्या साध्या सरळ शब्दांत 'आग का दरिया और डूब के जाना' सारखा वजनदार आशयसुद्धा नाही. तरी मी त्यांत का भोवऱ्यात अडकल्यासारखा का ओढला जातो आहे ?
काही प्रश्नांना उत्तरं नसतात किंवा उत्तरं असली तरी ती शब्दांत नसतात.
काही गाणीही अशीच निरुत्तर करत असावीत, काही शब्दही असेच निश्चल करत असावेत. एका अस्पर्श्य जागेत लोटतात अशी गाणी, असे शब्द. ती जागा आपल्यातली नसते. आपल्याबाहेरची असते. ही गाणी आपल्याला आपल्यापासून वेगळं करतात. बस्स्, एक कुठलासा आवाज येत असतो. तो कधी जगजीत असतो, कधी तलत, कधी रफी, कधी किशोर, कधी आशा तर कधी इतर कुणी. पण ते बाहेर लोटणं त्याच क्रूर थंडपणे.

असो.
माझ्यातून वेगळा झालो तरी प्रत्येक येणाऱ्या 'उद्या'ला ऑफिसला जायचंच असतं. 'रोजमर्रा'चा गाडा कितीही कुरकुरला तरी ओढायचा असतोच. खरी गोष्ट ही आहे की त्यासाठी लागणारी उर्जासुद्धा आपल्यातून बाहेर पडल्यावरच मिळते. ती मला मिळावी म्हणूनच एक जगजीत जन्मला म्हणूनच हा थंड क्रूरपणा वारंवार हवाहवासा वाटला. जीव जातो आणि आपल्यालाच माहित असतं की कुणी जीव घेतलाय. फक्त आपल्यालाच. ते कुणाला सांगायचं असतंही आणि नसतंही.
सगळंच गुंतागुंतीचं, पण हवंहवंसं.

मुझको जिन्होंने क़त्ल किया हैं कोई उन्हें बतलाये 'नज़ीर'
मेरी लाश के पहलू में वो अपना खंजर भूल गयें

उसकी गलियों से जो लौटे अपना ही घर.........................

- रणजित पराडकर

Sunday, April 05, 2015

'विस्मयकारक सत्यशोधाचा रहस्यमय प्रवास' (Movie Review - Detective Byomkesh Bakshy!))

सत्य.
जगातली सगळ्यात विस्मयकारक गोष्ट. कारण 'सत्य' कधीच पूर्ण होत नसतं, त्याला कुठलाच अंत नसतो. त्याची सुरुवात आणि शेवट कुणालाच ठाऊक होत नसतो. सत्यशोध हे एक असं व्यसन आहे, ज्यावर कुठलाही इलाज नाही. एकदा हे व्यसन जडलं की दिवस-रात्र, तहान-भूक, शक्य-अशक्य कशाचंही भान राहत नाही. सत्यशोधनाच्या मार्गावर विश्रांतीचे थांबे नसतात, विसाव्याच्या सावल्या नसतात. हा मार्ग एकदा अवलंबला की आपल्यापुरतं सत्य गवसेपर्यंत नि:श्वासही घेता येत नाही कारण त्या क्षणैक विलंबामुळेही दृष्टीपथात आलेलं साध्य दृष्टीआड होऊ शकत असतं. अश्याच अविरत सत्यशोधनाचं व्यसन जडलेला 'डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी'. 

१९४२ साली, दुसऱ्या महायुद्धाच्या झळा सोसत हिंसाचार आणि अस्थैर्य ह्या दोन रुळांवर संथ गतीच्या ट्रामसारखं चालणाऱ्या, अंधाऱ्या, कळकट, बकाल कलकत्त्यात घडणारं हे कथानक आहे. 'भुवन बॅनर्जी' ही व्यक्ती गेले दोन महिने गायब आहे. त्याचा मुलगा अजित (आनंद तिवारी) वडिलांचा शोध लावण्यासाठी व्योमकेश बक्षीला गळ घालतो. व्योमकेश आधी 'हे प्रकरण निरर्थक आहे' असा पवित्रा घेतो. नंतर त्यावर काम सुरु करतो आणि त्याला लगेच समजतं की खून झालेला आहे. पण का ? कुणी केला ? कधी ? कुठे ? ह्या प्रकरणाचं एकेक तो पान उलटत जातो. रक्ताच्या डागांनी रंगलेली ही पानं ड्रग्स, युद्ध, राजकारण, आंतरराष्ट्रीय माफिया इ.शी संबंधित बऱ्याच धक्कादायक गोष्टी उजेडात आणतात. 'भुवन बॅनर्जी'चा खून ही एक अत्यंत किरकोळ घटना असून, प्रत्यक्षात बरंच मोठं कारस्थान शिजत आहे, हे कळल्यावर व्योमकेश अजितच्या मदतीने सगळा छडा लावायचं ठरवतो. वळणावळणावर जीवाचा धोका असताना हा प्रवास व्योमकेश केवळ स्वत:च्या अक्कलहुशारीवर कसा पार करतो, नेमका शोध कशाचा आणि कुणाचा आहे, हेच समजत नसतानाही तो त्याचा सत्यशोध कसा पूर्ण करतो, ह्या प्रवासात त्याच्या सान्निध्यात येणारे अनेक लोक नेमके कोण आहेत, त्यांच्यापैकी किती जणांच्या चेहऱ्यावर मुखवटे ओढलेले आहेत, हे मुखवटे बाजूला करून खरे चेहरे जगासमोर आणण्यासाठी कशाची किंमत मोजायला लागते, अश्या सगळ्या उत्कंठांची शृंखला जेव्हा तिच्या अखेरच्या कडीपर्यंत पोहोचते, तेव्हा आपल्याला अगदी १००% पटतं की 'सत्य हीच जगातली सगळ्यात विस्मयकारक गोष्ट आहे.

सुशांत सिंग राजपूतने साकारलेला व्योमकेश बक्षी, दूरदर्शनवर रजत कपूरने साकार केलेल्या व्योमकेश बक्षीची आठवण करून देत नाही. दोन्ही व्योमकेश बक्षी आपापल्या जागी श्रेष्ठ ठरले आहेत, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. फार काही भावनिक चढ-उतार किंवा उद्रेक नसलेली एका जासूसाची भूमिका अभिनयकौशल्याला विशेष आव्हान देणारी नसणारच. ही हेरगिरीची कथा, किंबहुना एकंदरीतच व्योमकेश बक्षीच्या कथा, ह्या काही मसालेदार, प्रचंड गतिमान, धावपळ, पाठलागाच्या नाहीत. पण म्हणूनच एक अभिनेता म्हणून संयमाची परीक्षा पाहणारी ही व्यक्तिरेखा असावी. प्रथमच एखाद्या इतक्या मोठ्या - High profile - प्रकरणाचा माग काढणाऱ्या, उत्साहाने सळसळणाऱ्या तरुण व्योमकेश बक्षीला सुशांत सिंग राजपूतने ताकदीने जिवंत केलं आहे. अननुभवी पण तरी अत्यंत तल्लख असा व्योमकेश म्हणून तो अगदी शोभून दिसतो.

मूळ कथाशृंखलेत नंतर व्योमकेशचा भागीदार बनणाऱ्या 'अजित'ची भूमिका आनंद तिवारीनेही उत्तम वठवली आहे. दूरदर्शन मालिकेत ही व्यक्तिरेखा के के रैनाने साकार केली होती. इथेही दोन्ही अजित आपापल्या जागी परिपूर्ण वाटतात. ह्याआधी 'गो गोवा गॉन' सारख्या अति-सुमार चित्रपटांत वाया गेलेला हा एक गुणी अभिनेता आहे, ह्याची खात्री 'अजित' पटवून देतो.

मेयांग चँग, स्वस्तिका मुखर्जी, दिव्या मेनन सहाय्यक भूमिका चोख बजावतात. 
पण सगळ्यांना पुरून, उरून लक्षात राहतो 'डॉ. अनुकूल गुहा'च्या भूमिकेतील 'नीरज कबी'. अनुकूल गुहाचं गूढ, चाणाक्ष व्यक्तिमत्व 'कबी'ने जबरदस्त उभं केलं आहे. केवळ नजरेतून तो अनेक अव्यक्त संवाद साधत असतो. व्योमकेशला एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे मदत करणं किंवा गुरूप्रमाणे सावध करणं, हे सगळं अतिशय सूचकपणे करणारा डॉ. गुहा लक्षात राहणारा आहे. 

दूरदर्शनवर झळकलेल्या आजपर्यंतच्या सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एका मालिकेतून शरदिंदु बंडोपाध्यायांच्या व्योमकेश बक्षीला बासूदा आणि रजत कपूरने घराघरात पोहोचवलं होतं. हिंदी चित्रपटात हा व्योमकेश प्रथमच दिसला आहे आणि तो तितक्याच उत्तम रीतीने दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी पोहोचवतात. 'खोसला का घोसला' पासून आपला वेगळा ठसा उमटवणारा हा दिग्दर्शक त्यानंतरच्या प्रत्येक चित्रपटातून काही तरी वेगळं दाखवत आला आहे. 'रहस्यकथा' मांडताना बहुतेक वेळा हिंदी चित्रपट भरकटला, रेंगाळला, लंगडला आहे. पण व्योमकेश बक्षी मात्र सफाईदार आहे. अगदी लहान-सहान गोष्टींमधून काही न काही सांगितलं गेलं आहे, पण तरी अनावश्यक स्पष्टीकरणं दिलेली नाहीत. किरकोळ कृतींमधून समजलेलं सत्य नंतर केवळ एखाद्या वाक्यातून उलगडतं. 

पन्नासच्या दशकाच्या सुरुवातीचं कलकत्ता चतुराईने दाखवलं आहे. बहुतेक दृश्यं रात्रीच्या वेळेची आहेत आणि जी दिवसा उजेडी आहेत, त्या दृश्यांत जुन्या काळातलं कलकत्ता दाखवण्याचं काम जुन्या गाड्या व पात्रांची वेशभूषा, केशभूषा करतात ! 
तरी 'कहानी'मध्ये दाखवलेलं 'कोलकाता' आपण आठवून त्याची 'डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी' मध्ये दाखवलेल्या 'कलकत्ता'शी अपरिहार्यपणे तुलना करतोच. दोन्हींत असलेला कालखंडाचा फरक लगेच लक्षात येतो.

संगीत अगदी क्षुल्लक गोष्ट आहे. त्यात न काही लक्षात राहण्यासारखं आहे, न ठेवण्यासारखं. १-२ गाणी पार्श्वभूमीला वाजतात, पण त्यावेळीही आपलं संपूर्ण लक्ष कथानकाकडेच असतं. ते विचलित करण्याची ताकद त्या संगीतात नाही. 

'NH10' नंतर 'डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी' येणं, ही हिंदी रहस्यपटांच्या दृष्टीने खूप आश्वासक गोष्ट आहे. अर्थात, मांडलेल्या विषयामुळे 'NH10' प्रचंड अंगावर येतो. तसं 'व्योमकेश'चं नाहीच. मात्र हा रहस्यभेदाचा प्रवास नुसताच उत्कंठावर्धक नाही, तर नव्या उत्कंठेची आशा जागवणाराही आहे. कारण चित्रपटाच्या अखेरीस व्योमकेशच्या पुढील भेटीची केलेली तजवीज, चित्रपटगृहातून बाहेर जाणाऱ्या प्रत्येकाकडून पुढील भागाचे चित्रीकरणपूर्व अ‍ॅडव्हान्स बुकिंग करून घेते !

रेटिंग - * * * *  

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (०५ एप्रिल २०१५ रोजी) प्रकाशित झाले आहे :-


Related Posts Plugin for WordPress, Blogger...