Saturday, December 03, 2016

एका ब्रॅण्डची हानी - कहानी २ (Movie Review - Kahaani 2)

सुजॉय घोषचा 'कहानी' आजपर्यंतच्या सर्वोत्कृष्ट थरारक भारतीय सिनेमांपैकी एक असावा. त्याच्या नुसत्या आठवणींनीही रोमांच उठतात. त्यात विद्याने साकारलेली विद्या बागची असो की नवाझुद्दिन सिद्दीकीचा सीबीआय अधिकारी खान असो की परमब्रत चटर्जीचा 'सात्योकी', चार वर्षांनंतरसुद्धा अगदी आत्ताच पाहिल्यासारखे वाटावेत इतके प्रभावी होते. 'कहानी'त दाखवलेलं कोलकाता शहरही अगदी जसंच्या तसं आत्ताही डोळ्यांसमोर उभं राहतं. त्या सिनेमातली प्रत्येक गोष्ट अगदी हवी तशी जुळून आलेली होती.
ह्या सगळ्यामुळे 'कहानी' हा एक ब्रॅण्ड बनला, एक 'बेंचमार्क' ठरला आहे. हे 'ब्रॅण्ड नेम' वापरून काही नवीन बनवायचं तर रिस्क ही आहे की तो 'बेंचमार्क'ही विसरला जाणार नाहीय. सुजॉय घोषसारखी व्यक्ती हा विचार करणार नाही, असं वाटत नाही. But, you never know ! सोन्याचं अंड देणारी कोंबडी सुज्ञ मनुष्याला सारासार विचार करण्यापासून परावृत्त करते, ही गोष्ट सर्वश्रुत आहेच. 'कहानी २' चा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम हा की त्याचा 'कहानी १' शी काही एक संबंध नाही ! एक स्वतंत्र सिनेमा म्हणूनही हा बनवता आला असता. पण तरीही घोष साहेबांनी सोन्याची अंडी देणारी कोंबडी असलेल्या मनुष्याचाच कित्ता गिरवला आणि कोंबडीचा हकनाक बळी गेला !
वाईट वाटलं ?
मला तरी वाटलं. कारण मनाच्या अगदी जवळ असलेल्या काही सिनेमांपैकी एक 'कहानी' आहे. ह्या तथाकथित 'सीक्वल'ची मी आतुरपणे वाट पाहिली होती. पण महागड्या हॉटेलच्या मेन्यू कार्डवर एखाद्या डिशचं अलंकृत शब्दांनी अत्यंत रोचक वर्णन असावं आणि म्हणून ती मागवावी तर ते पिठलं असावं आणि तेही बिना-मिरचीचं, असं काहीसं झालं.

डायरी वाचून उलगडणाऱ्या सिनेमाची ह्यापूर्वीची आठवण भयानक होती, मात्र इथे 'सुजॉय घोष' आणि 'कहानी' ब्रॅण्ड असल्याने ट्रेलरमध्ये डायरी असूनही मला तिकीट काढताना कुठलाही किंतु-परंतु वाटला नाही. सिनेमा सुरु होतो पश्चिम बंगालमधील चंदननगर ह्या छोट्या शहरात. विद्या सिन्हा (विद्या बालन) आणि तिची अपंग मुलगी मिनी (तुनिशा शर्मा) एक मध्यमवर्गीय आयुष्य जगत आहेत. मिनीच्या वैद्यकीय उपचाराकरिता अमेरिकेस जाण्यासाठी विद्या तयारी करते आहे. मात्र अश्यातच राहत्या घरातून मिनीचं अपहरण होतं आणि तिच्या सुटका करवण्यासाठी जाताना विद्याचा अपघात होतो. एक नेहमीची 'हिट अ‍ॅण्ड रन केस' समजून इंदरजित सिंग (अर्जुन रामपाल) औपचारिकता पूर्ण करत असताना वेगळीच कहाणी उलगडते आणि विद्या, मिनी व इंदरजितचा भूतकाळ समोर येतो.
इथे सगळ्यात मोठा अपेक्षाभंग होतो तो हा की आपण एखादा सस्पेन्स ड्रामा अपेक्षित करून पाहायला आलो असतो आणि तसं काहीही न होता केवळ एका पेचातून सुटका कशी होईल, हाच एक सस्पेन्स विरहित ड्रामा घडतो. पात्रांचं सुरेख डिटेलिंग, एखाद्या प्रमुख वाटणाऱ्या पात्राची धक्कादायक एक्झिट (सास्वत चटर्जीने साकारलेला कॉण्ट्रॅक्ट किलर बॉब बिस्वास), अकल्पित क्ल्यू (हॉटेलातल्या लहान मुलाच्या शाळेच्या युनिफॉर्मवरील नाव) असं बरंच काही 'कहानी'त होतं. किंबहुना, थरारपटात हे असलंच पाहिजे. ह्यातलं काहीही नसून अनावश्यक जुळवाजुळव, ठिगळं जोडल्यासारखे योगायोग आणि उपरी पात्रं मिळमिळीतपणा आणतात. इंदरजित सिंग आणि विद्या सिन्हाची पूर्वीची काही ओळख, नातं वगैरे असण्याची काही एक आवश्यकता नसताना कथानकात ते बळंच घुसडलं आहे. ह्याचा परिणाम असा झाला आहे की पुढे काय घडणार आहे, खरं काय घडलेलं असणार आहे, अश्या सगळ्याचाच अंदाज आधीपासूनच येतो आणि 'सरप्राईज एलिमेंट' नामक फुग्याला बेमालूमपणे टाचणी लागते.

विद्या बालन आवडली नाही, असं आजपर्यंत तरी झालेलं नाही. अगदी टुकार 'हमारी अधुरी कहानी'मध्येही तिचं पात्र कितीही बंडल असलं तरी तिने काम चांगलंच केलं होतं. ती मुळातच एक 'नो नॉनसेन्स प्रोडक्ट' आहे. त्यामुळे तिला पाहत असताना कितीही ठिसूळ असलं, तरी 'विद्या सिन्हा'चं पात्रही पटत राहतं. विद्या सिन्हाचं एकटेपण, मुलीसाठीची तिची ममता, परिस्थितीपुढे असलेली असहाय्यता ती खूप सहजपणे साकार करते.
अर्जुन रामपालने एक इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर म्हणून फक्त फिट्ट दिसण्याव्यतिरिक्त बाकी काही विशेष केलेलं नाही. त्याला स्कोप अगदीच नव्हता, असं काही नाही. बऱ्यापैकी होता, पण 'एफर्ट' जाणवला नाही.
नकारात्मक भूमिकेत जुगल हंसराज शोभला आहे. पण त्याला तर खूपच कमी काम आहे. त्याच्या भूमिकेची लांबी जराशी अजून असायला हवी होती, असंही वाटलं. त्याचे लुक्स नाकारात्मक भूमिकांसाठीच सुयोग्य आहेत, ही बाब इतरांना खूप आधीच कळली होती. त्याने हे स्वीकारायला खूप उशीर लावला. वेळीच स्वीकारलं असतं, तर कदाचित काही महत्वाच्या भूमिका त्याने स्वत:च्या नावावर करून घेतल्या असत्या. असो. देर आये, दुरुस्त आये !
सहाय्यक भूमिकांत विशेष उल्लेखनीय मानिनी चढ्ढा आहे. इंदरजितच्या बायकोची महत्वशून्य भूमिका साकारताना थोड्या वेळातही तिने बऱ्यापैकी कंटाळा आणला आहे. तिची बोलण्याची ढब विचित्र आहे, इतकी विचित्र की दुर्लक्ष करता येत नाही.
संवाद, छायाचित्रण, संगीत. तिन्हीतही प्रकर्षाने खटकावं असंही काही नाही आणि लक्षात ठेवावं असंही काही नाही.
समजले ना ती कधी येऊन गेली
पाहण्यातच वाट इतका दंगलो मी
अश्या बेमालूमपणे सगळं घडून जातं आणि सिनेमा संपल्यावर लक्षात येतं की काहीच लक्षात राहिलेलं नाहीय !


कदाचित 'कहानी' ह्या 'ब्रॅण्ड' अंतर्गत काही स्त्री-प्रधान सिनेमे करायचा घोष आणि कंपनीचा विचार असावा म्हणून ते वापरलं असावं. अन्यथा लेखामध्ये आधीच म्हटल्याप्रमाणे एक स्वतंत्र सिनेमा म्हणूनही हा बनवता आला असता आणि खरं तर, तसंच असायला हवं होतं. ह्या सिनेमापासून 'कहानी' आणि 'सुजॉय घोष' ही दोन नावं जर वेगळी केली, तर तो नक्कीच सामान्य आणि असामान्य ह्या दोन्हींच्या मधला म्हणता आला असता. एकदाही असं अजिबात वाटत नाही की, 'आवरा आता !' मात्र जी काही रहस्यमयता आहे ती बाळबोध वाटते, धक्कातंत्र फसलेलं असल्यामुळे थरारातली हवाही निघून जाते.

जर सिनेमा वाईट नाही तर मग इतकी नाराजी का बरं ?
अरे ! तुम्ही जर मटन बिर्यानी सांगून कौआ बिर्यानी (कुछ याद आया ?) खायला देणार असाल, तर आम्हीसुद्धा ढेकर न देता काव-कावच करणार ना ?

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...