Wednesday, July 02, 2014

कोणता आरोप बाकी राहिला माझ्यावरी ?

कोणता आरोप बाकी राहिला माझ्यावरी ?
कोर तोही भोग माझ्या रंगल्या भाळावरी

जेव्हढी झाली उधारी फिटव आता पावसा
कर तुझ्या शेतीस माझ्या आज तू नावावरी

कोरडी तर कोरडी पण भाकरी तर दे मला
पोट भरल्यावर सुचू दे ओळ दुष्काळावरी

भोवताली फक्त विक्रय चालतो बहुधा इथे
फूल कोमेजून जावे उमलल्या देठावरी

वेळ कातर, हृदय हळवे, जीवघेणी शांतता
सांजवेळी बांध फुटतो 'खुट्ट'ही झाल्यावरी

चांदणे ओतून सगळे फिकटलेला चंद्र मी
भाळली ना शर्वरी ना लाभली आसावरी

संपले आयुष्य पण ना समजले माझे मला
धावलो होतो कुणाच्या जन्मभर मागावरी ?

लपवताना आसवे आईस होते पाहिले
पाहिली नाही कधी मग वाहती गोदावरी

वाटले आयुष्य होते रुंद रस्त्यासारखे
आज कळले चालणे आहे जणू धाग्यावरी 

....रसप....
२ जुलै २०१४

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...