Tuesday, September 30, 2014

प्रिय ऑर्कुट..

प्रिय ऑर्कुट,

आज हा आपला अखेरचा संवाद.
मला आठवतंय, माझी तुझी ओळख ताईमुळे झाली आणि तुझ्यामुळे मला एक नवीन ओळख मिळाली. नवी कसली, जी काही आहे ती ओळख तुझ्यामुळेच मिळाली.
कुठे मालवाहतुकीचा नीरस, रुक्ष आणि खोटा किरकोळ धंदा करणारा मी एक व्यावसायिक, जो ड्रायव्हर, क्लीनर, हमाल, भंगारवाले वगैरे अभिरुचीहीन लोकांच्यात स्वत:चे परग्रहवासीपण समजुनही मन रमवायचा आटोकाट प्रयत्न करत होता आणि कुठे तुझ्यामुळे मला लाभलेल्या असंख्य कविमित्र-मैत्रिणींच्या सहवासात स्वत:च स्वत:ला नकळत गवसलेला आजचा मी !

मित्रा,

काळासोबत मी बदलत गेलो. आज जेव्हा मागे वळून पाहतो, तेव्हा माझ्यातला बदल मलाच अवाक करतो. मात्र तू बदलला नाहीस. किंवा असं म्हणू योग्य वेळी योग्य तितका बदलला नाहीस. मी लोंढ्यासोबत वाहत फेसबुकवर आलो. तुझ्यापासून दूर आलो ही तुला माझी कृतघ्नता वाटली का रे ? असेल तर त्यात काही गैरही नाही म्हणा. मी खूप प्रयत्न केला होता तुझी साथ न सोडण्याचा. पण शेवटी तुझ्यापुढेच मला हार मानायला लागली. तुझा रागही आला. जाम अडेलतट्टूपणा केलास, नाहीच बदलायचं म्हणालास. मी खूप सांगितलं तुला की वाहत्या प्रवाहासोबत कधी कधी वाहायलाच लागतं. एका जागी रुतून बसलं, तर झीज होऊन अस्तित्वाच्या खुणाही पुसल्या जातात. पण तुला वाटत होतं की तू बांध आहेस आणि ह्या प्रवाहाला थोपवणार आहेस. अखेरीस मला तुझा हात आणि तुझी साथ सोडावीच लागली.

असो.
मला कारणं द्यायची नाहीत आणि हा आता वाद करणेही निरर्थकच आहे. पण काय करणार ! आपलं नातंच तसं होतं. आजकाल मला असं वाटायला लागलंय की प्रत्येक नातं हे शेवटी एका जखमेतच रुपांतरीत होऊन संपत असतं बहुतेक. फरक इतकाच की काही जखमा हव्याहव्याश्या असतात तर काही बोचऱ्या. तुझी जखम आज बोचते आहे म्हणून बोलतो आहे. नसीर काजमी म्हणतात -

कुछ तो नाज़ुक मिज़ाज हैं हम भी
और ये चोट भी नई है अभी

पण मग जरा अजून विचार केल्यावर असंही जाणवतंय की तू चालला आहेस खरा, पण जाताना भरभरून देऊन जातो आहेस. किंबहुना, आधीच दिलेलं आहेस. त्यामुळे अशीसुद्धा खात्री वाटतेय की ह्या संपलेल्या नात्याची जखम हवीहवीशी असणार आहे. तुझी आठवण सुखदच असणार आहे. त्या जखमेच्या ठसठसण्यातही एक नशा असणार आहे.

तुझी आठवण येईल तेव्हा मला आठवेल -
माझी पहिली कविता..
माझी पहिली गझल..
माझं पाहिलं रसग्रहण..
माझी पहिली शिकवण..
माझे अनेक प्रयोग..
एकूणच तू म्हणजे माझ्या लेखनप्रवासाचा हमरस्ताच. आता रस्ता बदलला आहे, पण सुरुवात तूच करवली होतीस. कुठल्याही प्रवासाची दिशा, लक्ष्य, समाप्ती बदलू शकेल पण सुरुवात बदलणार नाहीच ना ? कारण शेवटी तो भूतकाळाचा भाग.

ऑर्कुट,
मी तर इथेच आहे. पण तू नसणार आहेस. मनात गैरसमज ठेवून गेलास तर बदलणार कसं ?
तुला एक सांगू का ? पटलं तर बघ. आयुष्य हे एक वर्तुळ आहे. ते पूर्ण होतंच. जिथून निघालो होतो, तिथेच परत पोहोचणार असतोच. माझी सुरुवात तुझ्यापासून झाली आणि कुणास ठाऊक शेवटही तुझ्यापाशीच होणार असेल. मी अखेरचा थांबीन, ती ओसरी तुझीच असेल कदाचित. एक नवा चेहरा घेउन येशील आणि आज मी जसा तुला निरोप देतो आहे, तसा तू तेव्हा मला देशील !

Lets see. Till then goodbye, mate !

चलते रहते हैं कि चलना है मुसाफिर का नसीब,
सोचते रहते हैं किस राह गुज़र के हम हैं;
अपनी मर्जी से कहाँ अपनी सफर के हम हैं
रुख हवाओं का जिधर का है उधर के हम हैं
(निदा फाजली)

Thanks a lot for everything you gave me.

तुझाच,

....रसप....





No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...