Showing posts with label विनोदी. Show all posts
Showing posts with label विनोदी. Show all posts

Wednesday, June 18, 2014

माझे विस्मृतीत गेलेले निकाल

परीक्षा म्हणजे माझ्यासाठी नेहमीच एक सोहळाच असायचा. माझी प्रत्येक परीक्षा अत्युत्कृष्ट व आनंददायीच गेली. गडबड फक्त निकालात व्हायची. पण अतीव क्लेश दिलेल्या घटना लक्षात न ठेवता पुढे जात राहावे, ह्या विचारावर माझा दृढ विश्वास असल्याने आता मला माझ्या कुठल्याही परीक्षेतले गुण आठवत नाहीत. एव्हढे नक्की की, प्रत्येक वेळी ते नेत्रदीपकच होते.

घटना लक्षात नसल्या तरी काही क्षण मात्र आपल्या नकळतच आपल्या मन:पटलावर कोरले जातात. दहावीच्या निकालाचा क्षणही असाच काहीसा होता.
परीक्षा संपल्यापासून मला एकच आनंद होता की, 'परीक्षा संपली !'
दहावीची परीक्षा होऊन, निकाल लागून, मिळेल त्या मार्कांसह, मिळेल त्या कॉलेजात प्रवेश घेणेच मला जास्त महत्वाचे वाटत होते. कारण वर्गातल्या प्रत्येक मुलीकडून जबरदस्तीने राखी बांधून घ्यायला लागणाऱ्या काळात माझे शालेय शिक्षण झाले. माझ्या मनात मी एक वैश्विक भाऊ त्याच्या मर्जीविरुद्ध मारून मुटकून कोंबला होता. निकालपत्र हाती पडताच त्यातील आकड्यांपेक्षा Passed ह्या शेऱ्याचे मला कौतुक होते. आता घुसमट होणार नाही, हाच एक मोठा आनंद माझ्या मनातून वाकड्या झालेल्या टिफिनमधून बाहेर येणाऱ्या भाजीच्या रश्श्याप्रमाणे हळूहळू ओघळत होता. मिळालेल्या गुणांचं मला सुतक वगैरे अजिबात नव्हतं.

माझे गुण मला नेमके आठवत नसले तरी त्यांचं एक चांगलं होतं. ते अश्या टप्प्यातले होते की माझ्यासमोर शाखा व कॉलेज ह्यांचे फार मोजकेच पर्याय होते. इतर अनेक मुलांना विशिष्ट शाखा व विशिष्ट कॉलेज निवडण्यासाठी करावा लागलेला संघर्ष मला अजिबात करावा लागला नव्हता. मी जी शाखा व जे कॉलेज निवडले, तिथे माझा नंबर शेवटच्या यादीत अगदी सहज लागला. 'कॉलेजला जाणार' ह्याच आनंदात हुरळून गेलेल्या आपल्या निरतिशय निरागस मुलाच्या चेहऱ्यावरचे निष्पाप हसू माझ्या आई, वडील व ताईला मी सदासुखी होणार असल्याची ग्वाही देत होते.

हिरवट मिसरूड फुटलेला पंधरा-सोळा वर्षांचा मी पहिल्या दिवशी कॉलेजला मोठ्या टेचात गेलो होतो. नवा कोरा शर्ट आणि जीन्स, हँगरला लटकवलेल्या कपड्यांसारखे दिसत असले तरी माझा तोरा मात्र मी स्कीनफिट्ट टी-शर्ट घातल्यासारखाच होता. तेल थापून चापून बसवलेले आणि कोंबडा काढलेले केस मला जॉय मुखर्जीसारखा लुक देत असले तरी माझ्या नजरेत मात्र मी तुरा काढलेला आमीर खानच होतो.
लौकरच मी माझ्या भोवतालच्या माधुरी दीक्षित्स, काजल्स, राणी मुखर्जीज चाणाक्ष नजरेने हेरल्या. पण मी जिथे जिथे नेम लावायचो, ते ते लक्ष्य माझा बाण सुटायच्या आतच दुसऱ्याच एखाद्या बाणाने उडवले जात असे. मग हळूहळू मी नेम धरणंच सोडून दिलं. तरी अंदाधुंद तिरंदाजी चालूच ठेवली.
स्वभावत:च खोलाकडे वाहत जाणाऱ्या पाण्याप्रमाणे मीही दुसऱ्या मजल्यावरील अकरावीच्या वर्गाकडून कॉलेजबाहेरच्या रस्त्याकडेच्या कट्ट्यावर लौकरच वाहत पोहोचलो. देशासमोर असलेल्या खेळ, राजकारण, सुरक्षा, सामाजिक व्यवस्था, आर्थिक परिस्थिती ई. आणि इतर मुलांसमोर असलेल्या प्रेम, शिक्षण, तात्विक मतभेद, घरच्यांचा त्रास, आर्थिक चणचण ई. गहन प्रश्नांवर मी रोज, माझ्यासारख्याच इतर काही हौशी स्वयंसेवकांसह चर्चा, मार्गदर्शन करत असे. आमच्या चर्चांतून मौलिक ते शिकून बरेच जण पुढे गेले पण आम्हाला कधी त्याचायत्किंचितही मत्सर वगैरे वाटला नाही. परंतु, ह्या सगळ्या व्यापात माझी कनिष्ठ महाविद्यालयातली दोन वर्षं विदर्भ, मराठवाड्याच्या आकाशातल्या ढगांप्रमाणे चुटकीसरशी निघून गेली आणि समोर बारावीची परीक्षा रुक्ष दुष्काळासारखी 'आ' वासून उभी राहिली. वर्षातले बहुतेक दिवस कॉलेजबाहेरील कट्ट्यावर मीच इतरांचा क्लास घेत असल्याने मला स्वत:ला अभ्यासासाठी वेळ मिळणं कठीण होतं. पण माझी ही प्रामाणिक अडचण बोर्ड समजून घेणार नव्हतंच आणि ज्याप्रकारे मला पाचवीत असताना नृत्यकौशल्याच्या नावाने बोंब असतानाही केवळ उंची कमी असल्याने पुढच्या ओळीत राहून ग्रुप डान्स करावा लागला होता, त्याच प्रकारे ह्या परीक्षेलाही बसावंच लागलं.
अखेरच्या षटकात ४० धावा हव्या असताना, अखेरचा खेळाडू प्रत्येक चेंडूला ज्या तावातावाने टोलवत अशक्यप्राय आव्हानाचाही पाठलाग करतो, त्याच लढाऊ बाण्याने मी प्रत्येक पेपर टोलवला होता, इतकंच मला लक्षात आहे. आधीच म्हटल्याप्रमाणे प्रत्यक्ष निकाल मी कधीच विसरून गेलो आहे.

आजकालच्या मुलांना, एक डोळा बंद करून पेपर लिहिला तरी नव्वद-बिव्वद टक्के मिळतात. मला त्यांची एकच काळजी वाटते की इतके मार्क्स मिळाल्यावर पुढे नक्की काय करायचं ह्या विचाराने ते किती गोंधळत असतील. Thank god, मला असा प्रश्न कधी पडलाच नाही. कारण हा प्रश्न माझ्यासाठी माझ्या निकालानेच निकालात काढलेला असायचा.

जाता जाता एक विचार मनात आला. गुण लक्षात न राहण्यामागे अजून एक कारण असावं. गेल्या कित्येक वर्षांत मला कुणीही त्यांबद्दल विचारलंच नाहीये ! असं का बरं ?

....रसप....
१८ जून २०१४

Monday, May 19, 2014

उगवल्याबरोबर मावळलेला एक चित्रसूर्य

मला चित्रकलेतलं खूप ज्ञान आहे. शाळेत एक तास चित्रकलेचा असे. तेव्हा मी जिथे जिथे संधी मिळेल, तिथे तिथे माझ्या अगाध ज्ञानाची चुणूक आमच्या बाईंना दाखवत असे. प्रत्येक वेळेस बाई स्तिमित होत आणि कित्येकदा तर त्यांनी मला पाठीत शाबासकीही दिली. स्वत:ला माझ्याहून चांगले चित्रकार समजणारे काही मूर्ख मित्र त्या शाबासकीला धपाटा समजत आणि खोट्या आनंदात सुख मानत.

शाहजहानने ताज महाल बनवला आणि अशी दुसरी वास्तू निर्मिली जाऊच नये म्हणून सर्व कारागिरांचे हात छाटले, असं म्हणतात. आमच्या बाईंनाही असे अनेकदा माझी अप्रतिम सुंदर चित्रं पाहून वाटले असावे.

माझी काही चित्रं तर इतकी पुरोगामी व प्रसंगी बंडखोरीची प्रक्षोभकतेपर्यंतची पातळी गाठणारी असत की बाई ती चित्रं माझ्या चित्रकलेच्या वहीतून फाडून घेत. नंतर नंतर मला त्यांच्या ह्या सवयीची बरीच लागण झाली आणि मग मीच माझ्या वहीतली काही चित्रं फाडून ठेवायला लागलो. १०० पानांच्या आडव्या, लांबोडक्या चित्रकलेच्या वहीची काही दिवसांतच १५-२० पानंच उरलेली असायची. तुंबळ युद्ध करून पराभवाच्या जबड्यातून विजयश्री खेचून आणताना बहुतांश साथीदारांना गमावलेल्या सैनिकांप्रमाणे ती उरलेली शूरवीर पानं माझी लुळी वही मिरवत असे.

माझी चित्रं इतकी अभिनव असत की बरेचदा मला मीच काढलेलं चित्र काही दिवसांनी नेमकं कशाचं आहे, ह्यावर जरासा विचार करावा लागत असे. माझी जुनी चित्रं पुन्हा पाहताना मला नेहमीच नव्याने भेटत असत. पण ती कधीही निरर्थक नव्हती. त्यांचा अर्थ फक्त बदलत असे.

चित्रांत रंग भरण्याचीही माझी एक स्वत:ची शैली होती. माझे रंग अनेकदा पानाच्या मागल्या बाजूला किंवा मागच्या व पुढच्या पानावरही असत. रंगांना चित्र सोडून भरलेलं पाहून आमच्या बाईंना त्यांच्या घराच्या मोरीतल्या चिरक्या नळाची बादली सोडून धार मारण्याची सवय आठवत असे आणि त्यामुळे माझी चित्रं त्यांना नेहमीच वास्तवाचे भेदक व विदारक दर्शन करणारी वाटत असत.

शाबासक्या देऊन देऊन थकल्यानंतरच्या काळात माझी चित्रं पाहून त्यांना त्यांच्या भावनिक आवेगास महत्प्रयासाने रोखावे लागे. त्या चित्रांचे खोलवर आघात त्यांच्या मनावर होत असत व चित्रकलेच्या प्रत्येक तासानंतर स्टाफ रूममध्ये त्या काही काळ मख्ख चेहऱ्याने बसून राहत, हे मी स्वत: अनुभवलेलं आहे. कारण अश्या अत्यंत हेलावलेल्या मनस्थितीत त्यांनी मला अनेकदा स्टाफ रूममध्ये बोलावून प्रेमळ विनंत्या केल्या होत्या की अशी चित्रं नको काढत जाऊस. पण माझ्यातला तडफदार कलाकार माझ्या स्वत:च्याही रोखण्याने थांबणारा नव्हताच. बाईंनी कुठलेही चित्र काढायला सांगितले असले तरीही मी माझ्याच मनाचे प्रतिबिंब कागदावर उमटवत असे व प्रत्येक वेळी बाईंना भावनिक आवेगाचा धक्का सहन करावा लागत असे.

अश्यातच, चित्रकलेच्या एका राज्यस्तरीय शिष्यवृत्ती स्पर्धेत भाग घेण्याचा मी चंग बांधला आणि तसे बाईंना सांगितले. डोळे व मनाच्या पटलाला भेदून जाणाऱ्या माझ्या चित्रांमुळे होणारा सततचा भावनिक ताण सहन न झाल्याने व माझ्यातला लाव्ह्याप्रमाणे उसळून बाहेर येणारा बंडखोर चित्रकार बंदिस्त करणे केवळ अशक्यप्राय असल्याचे लक्षात आल्याने अखेरीस बाईंनी मुख्याध्यापकांना ह्याची कल्पना दिली. मुख्याध्यापकांनी माणुसकीच्या नात्याने अत्यंत समतोल भूमिका घेऊन, माझ्या आई-वडिलांना भेटण्यास बोलावून परिस्थितीची माहिती दिली व त्या स्पर्धेत भाग घेण्यापासून मला परावृत्त करण्यात आले.

माझी ही कुचंबणा मला अजिबात मान्य नव्हती. त्या निरागस वयात माझ्यावर घातलेलं ते जाचक बंधन मला झुगारायचं होतं, पण कोवळ्या वयातल्या नाजूक हातांत ते साखळदंड झुगारण्याची ताकद साहजिकच नव्हती. कालांतराने मी चित्रकलेपासून खूप दुरावलो. माझ्यातल्या त्या तडफदार कलाकाराचा माझ्या आतच मूक अंत झाला.

आज मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे की, जर त्या काळात मला असं जखडलं गेलं नसतं, तर अत्यंत लहान वयात क्रिकेटला नवा आयाम देणाऱ्या तेंडूलकरप्रमाणे, अत्यंत लहान वयात चित्रकलेला नवा आयाम देणाऱ्या पराडकरचं नावही मोठ्या सन्मानाने घेतलं गेलं असतं.

असो. एकेकाचं नशीब असतं.
Somebody's loss is somebody's gain, हेच खरं. आज मी ह्या क्षेत्रात नसल्याने इतर अनेकांना पुढे येण्याची संधी मिळत आहे, हीसुद्धा एक समाधानाचीच बाब आहे.

- रणजित पराडकर (रसप)
(एका पानावर उगवून दुसऱ्या पानावर मावळलेला एक प्रखर तेजस्वी चित्रसूर्य)

Related Posts Plugin for WordPress, Blogger...