Thursday, May 17, 2012

पुन्हा भरारी भरण्यासाठी..


हातावरची रेघ सांगते खडतर जीवन मी जगलो
कितीक आले वादळवारे भिडून त्यांना मी उरलो
मला कधी ना जाणवले की क्षणाक्षणाला मी लढलो
मला लाभले जे जे येथे ते ते वेचुन मी रमलो

आस कधी ना प्रारब्धाच्या औदार्याची बाळगली
तमातुनी मी मुक्तीसाठी मनात ज्योती जागवली
यशस्वितेची वाटचाल ही मर्जीने मी थांबवली
खऱ्याखुऱ्या आनंदासाठी नवी दिशा मी चेतवली

दक्षिणेकडे प्रवास माझा मी संध्येचा वाटसरू
नकोस माझी संगत मागू अपुली-अपुली वाट धरू
अज्ञाताची ओढ मला मी कशास संचय वृथा करू
त्यागुन संचित भणंग झालो नको मला तू बद्ध करू

विषण्णतेच्या विशाल क्षितिजावरती माझी नजर थिजे
अंथरून झिजलेली चादर उदास माझी रात निजे
गडगडणारे अंबर मजला सदा वाटले जरा खुजे
पुन्हा भरारी भरण्यासाठी मनात आशाबीज रुजे..

....रसप....
१७ मे २०१२

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...