Saturday, May 05, 2012

काकस्पर्श


नशीबाने वारंवार पेकाटात लाथ घातली
तरी लाळघोट्या कुत्र्यासारखं पुन्हा पुन्हा
शेपूट कधी पायात घालून
तर कधी हलवत हलवत
त्याच्याच मागे मागे फिरणं..
संपलं एकदाचं ते मरत मरत जगणं !

तसा मी प्रयत्न बऱ्याचदा केला होता
काळाचं लक्ष वेधून घेण्याचा
त्याला जवळ बोलावण्याचा
पण त्यालाही कधी वाटलं नाही
मान वर करून पाहावंसं
मला मुक्त करावंसं..
आणि मी फक्त लाथाच खाल्ल्या...
कधी शेपूट पायात घालून
कधी हलवून... हलवून...

आज मात्र त्याचं कसं कोण जाणे, लक्ष गेलं
(म्हणाला असावा - "अरे! हे कुत्रं अजून कसं नाही मेलं?)
आणि शेवटची लाथ त्यानेच घातली
मला तर आनंदच होता मरण्याचा
सोसच नव्हता मुळी असल्या जगण्याचा

मग उगाचच जमा झाली आप्तेष्टांची टाळकी
प्रथेप्रमाणे "चांगला होता हो!" म्हणायला
आणि कोरडेच डोळे मुद्दामहून पुसायला
कवटी फुटली, तसे सगळे घरी गेले
केव्हाचे उपाशी होते, भरपेट जेवले!

वेळ आली पिंड ठेवायची
कावळ्याला बोलवायची..
पण येईल कसा?
मी तिथे असताना?
बसा ओरडत... "कां...!! कां...!! कां...!! "
मीसुद्धा आयुष्यभर हेच विचारात होतो...
"का? का?.... का?"

हजारो इच्छा माझ्या अपुऱ्या राहिल्या आहेत..
किती जणांना बोलवाल?
माफी मागायला...
वचने द्यायला..
कबुल करायला...
खरं बोलायला.....

जाऊ द्या...
दर्भाचा कावळा करा
अन समाधान करून घ्या स्वत:चं...!
मी बघून घेईन माझ्या मुक्तीचं...........

....रसप....
५ मे २०१२

3 comments:

  1. Unbelievable.!!!!!!!!!!!!! Evadh kaalij chirat jaanaar tula suchat kas.????? ha mala baryaach divasaan paasun padlela prashn aahe.... kharokhar Apratim...

    - Tanmay Phatak

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...