Thursday, May 10, 2012

एक होता कवी गचाळ !


एक होता कवी गचाळ
कविता त्याची नुसतीच वाचाळ
ओळीओळीतून करत असे
हीन पातळीची शिवीगाळ

ह्याची कविता कधीच हसली नाही
ह्याची कविता कधीच नाचली नाही
कधी निसर्गचक्रात रमली नाही
कधी कुणाच्या प्रेमात पडली नाही

समांतरपणाच्या नावाखाली
त्याने आखली एकच रेष
आपल्याभोवती गोल गोल
आणि बनवलं एक स्वत:पुरतं परीघ
ना कुठला कोन..
ना सुरुवात..
ना अंत..
ना तोंड..
ना शेपूट..

त्याच परीघात राहिला जन्मभर
लिहित राहिला पान-पानभर

आज तो संपला..
लोक म्हणाले -
"एक तरी कविता सरणावर ठेवू त्याच्यासमवेत"
पण कविता मिळालीच नाही
सगळ्या कधीच विरल्या होत्या बदललेल्या हवेत..!!


....रसप....
९ मे २०१२

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...