Wednesday, February 29, 2012

तांबूस संध्याकाळच्या निवांत वेळी.. (उधारीचं हसू आणून....)


१६.

तांबूस संध्याकाळच्या निवांत वेळी
ओलसर वाळूत
तू माझं नाव लिहिलं होतंस
"सागरासारखाच मोठ्ठ्या मनाचा आहेस"
असंही म्हटलं होतंस
ते नाव तर लगेच पुसलं गेलं
पण -
खवळलेल्या सागरलाटांसारखं
पुन्हा पुन्हा काही तरी उचंबळून येतं
निश्चल किनाऱ्यासारखं माझं मन
भिजून भिजून वाळतं...
कधी ठिक्कर काळ्या मध्यरात्री
पापण्या पेटून तांबूस प्रकाश होतो
आणि कधी फटफटीत उजाडलं तरी
दिवस उंबऱ्याबाहेरच थांबतो

बहुधा माझ्यासाठी ही दिनचक्रं आणि ऋतूचक्रं
एका वेगळ्याच परीघाची झाली आहेत
उज्ज्वल भविष्याच्या ओढीने
कधीकाळी मनात किलबिलणारी निरागस पाखरं
कधीच उडून गेली आहेत
पण मी त्या सागरकिनाऱ्यासारखाच शांत आहे

वठलेल्या झाडालाही पालवी फुटेल
हीच आशा मनात जपून
रोज खारं पाणी देतोय
उधारीचं हसू आणून....

....रसप....
२९ फेब्रुवारी २०१२

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...