Sunday, January 15, 2017

'गझलांमधील वाढ केवळ संख्यात्मक' - श्री. अक्षयकुमार काळे

'गझलांमधील वाढ केवळ संख्यात्मक'

सध्याच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. अक्षयकुमार काळे ह्यांचे हे वक्तव्य. ह्यावरुन सोशल नेटवर्कवर खूप गदारोळ चालू आहे. ह्या गदारोळात हा थोडासा आवाज माझाही !! :D

माझ्या मते, संख्यात्मक वाढ गझलेपेक्षा खूप जास्त पसरट कवितांत झालेली असून त्यांत दर्जाही वाढलेला नाहीच. कवितेतला जो 'तेच-ते'पणा आहे, त्यामुळे झालं असं आहे की वेगवेगळ्या गावांतले आघाडीचे सगळे कवी एकसारखेच लिहितात. त्यांचे विषय व व्यक्त होण्याची पद्धत इतकी तीच ती असते की एका रचनेतल्या दोन-चार ओळी दुसऱ्या रचनेत टाकल्या किंवा अगदी गाळूनही टाकल्या तरी चालून जावं !

अक्षयकुमार काळे साहेबांचं उपरोक्त विधान कदाचित अगदीच गैरलागू नसेलही. गझल क्षेत्रात दर्जात्मक वाढीपेक्षा जास्त वाढ संख्यात्मक होते असेलही. पण हे निरीक्षण तर कुठल्याही क्षेत्रात असंच असेल ना ?
आणि जर मराठी साहित्याबाबत बोलायचं झालं तर हे गझलेपेक्षा कवितेबाबत जास्त लागू नाही का ? नक्कीच आहे. पण ते छातीठोकपणे बोलायचा दम कुणाच्याही फेफड्यांत नाही !

बोला की कुणी तरी की, 'उथळ विद्रोहाचा भडकपणा आणि अट्टाहासी मुक्ततेचा भोंगळेपणा ह्यामुळे अधिकाधिक विद्रूप होत जात असलेल्या मराठी कवितेची फक्त संख्यात्मक वाढ होते आहे!'
हे कुणी बोलणार नाही. कारण त्यामुळे बहुसंख्यांचा रोष ओढवला जाईल ना !
कुणाच्या तरी छाताडात दम आहे का बोलायचा की, जोपर्यंत कविता ओढून ताणून आंबेडकरांपर्यंत आणली जात नाही, तोपर्यंत कवी 'पुरोगामी' आणि म्हणूनच पुरस्कारयोग्य मानला जात नाही?
कुणाला तरी हे खटकतंय का की, 'वृत्तात लिहिणं' ही गोष्ट सपशेल त्याज्य मानली गेली असून आजच्या काळात अक्षरश: हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके (तथाकथित 'मुख्य धारेतले') लोकही वृत्तात लिहित नाहीत?

पूर्वी एखाद्या सामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या घरातही कवितांची पुस्तकं असत. त्याच्या तोंडी कवितेच्या ओळी असत. आज 'कविता' हा शब्द जरी उच्चारला तरी दूर पळतात लोक ! आजच्या पिढीचे कवी कोण आहेत, कुणाला माहितही नसतं आणि त्यांच्या तथाकथित कविता तर त्यांच्या व त्यांच्या काही चेल्या-चपाट्यांशिवाय कुणाला ठाऊकही नसतात. एक काळ असा होता की इंजिनिअरिंग, मेडिकल, अकौंटन्सी वगैरे साहित्याशी संबंध नसलेली क्षेत्रं निवडणाऱ्या लोकांनाही कित्येक कविता मुखोद्गत असत. कवितेवर त्यांचं मनापासून प्रेम असे. आज असे किती लोक आहेत ?

अनियतकालिक व नियतकालिक आणि दिवाळी अंकांतून छापून येणाऱ्या कविता तर कुणी वाचतही नाही, ही शोकांतिका माहित आहे का ? एक तर त्या कविता आहेत, हेच अर्ध्याहून जास्त लोकांना पटत नसतं. त्यात त्यांच्यातला दुर्बोधपणा व पसरटपणा अजून दूर लोटतो.
सामान्य माणसाला 'कविता' श्या शब्दाची अक्षरश: एलर्जी व्हायला लागली आहे.

Why is this apathy ? ह्यामागची कारणमीमांसा कोण करणार आणि कधी ?
कविता सामान्य लोकांना इतकी नकोशी का झाली आहे ? का ती सामान्य लोकांच्या ओठांवर जराही रुळत नाही ? का त्यांच्या मनात अजिबात वसत नाही ?
ह्या मागचं कारण तिच्यातला रसाळपणा हरवला असण्यात नाहीय का ? कवितेची जी काही वाढ झाली व होते आहे, ती संख्यात्मक नाहीय का ?

ह्या उलट, जे काही 'काव्य' सामान्य माणसाला आकर्षित करून घेत आहे, ते सामावलं आहे 'गझल' ह्या प्रकारात. लोक गझलेचे शेर आपलेसे मानतात, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. आवडलेले शेर नोंद करून ठेवतात. सामान्य माणूस आणि कविता (गझल हीसुद्धा एक कविताच) ह्यांना जोडणारा जो एक अगदी शेवटचा धागा सद्यस्थितीत आपले अस्तित्व टिकवून आहे, तो म्हणजे 'गझल'.

साहित्य संमेलनात जो 'कवी कट्टा' म्हणून बैलबाजार भरतो, त्यांत मीही एकदा मिरवून आलो आहे. त्या शेकडो लोकांच्या गर्दीत श्रोता एकही नव्हता. सगळे आपापली बाडं घेऊन आलेले कवीच होते. ह्यांच्या कविता कुणीही ऐकत नाही.

एक असं करून पाहावं.
एखाद्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दोन सभागृहांत एकाच वेळी दोन कार्यक्रम ठेवावे. एकीकडे, आजच्या मान्यवर, प्रथितयश कवी/ कवयित्रींचे 'कवी संमेलन' आणि दुसऱ्या सभागृहात एक 'केवळ संख्यात्मक वाढ झालेल्या लोकांचा' 'गझल मुशायरा'. मी ग्यारंटीने सांगतो, सेलेब्रेटेड कवींकडे न जाता तमाम आम जनता, ह्या अ-प्रसिद्ध गझलकारांना ऐकायला जाईल.
ही परिस्थिती आहे सध्याच्या कवितेची. तिला नागवलं आहे तिच्या ठेकेदारांनी आणि समीक्षकांनी. तिला इतकं भ्रष्ट केलं आहे की ती त्यांच्याशिवाय कुणालाही हवीहवीशी वाटत नाही.

हे सगळं चित्र विदारक वाटत नसेल आणि गझलेतर काव्यक्षेत्राची वाढ अगदी योग्य प्रकारे चालली आहे, असं जर वाटत असेल, तर मग बोलायलाच नको !

साहित्य संमेलनवाल्यांनी गझल व गझलकारांना नेहमीच दूर ठेवलं आहे, हा तर उघड इतिहास व वास्तव आहे. मराठी गझलेचे सम्राट सुरेश भटांना ह्यांनी कधी अध्यक्षपद दिलं नाही आणि आता गझलेच्या उत्कर्ष व वाढीबद्दल टिपं गाळायला पाहतायत !
वाह रे वाह !

तुम्ही गझल नाकारणार, वृत्तबद्धता नाकारणार, आंतरजालीय साहित्य नाकारणार आणि संख्यात्मक वाढ प्रत्यक्षात तुमच्याच कंपूत होत असताना दुसरीकडे बोट दाखवून दिशाभूल करायला पाहणार?

साहित्य संमेलनाध्यक्ष असलेल्या व्यक्तीने केलेलं विधान अभ्यासपूर्ण तर असायला हवंच. पण ते नाही तर नाही, पण किमान जबाबदार तरी असावं !
मी फेसबुकवर ज्या अनेक गझलकार मंडळींशी कनेक्टेड आहे, ज्यांना मी वाचत असतो, त्यांच्यापर्यंत काळे साहेब बहुतेक पोहोचलेले नसावेतच. कारण त्यांतल्या ९९% लोकांनी आपली गझल पुस्तकरूपी प्रकाशित केलेली नाहीय. ते लोक ब्लॉगवर, फेसबुकवर लिहितात, मुशायऱ्यात सादर करतात आणि त्यांना स्वत:ला जितकी अपेक्षा आहे, त्यापेक्षा खूप जास्त लोकांपर्यंत लीलया पोहोचतात. पुस्तक छपाईच्या बाजारात उतरण्याची त्यांच्या गझलेला गरज नाही आणि म्हणून ते उतरतही नाहीत. मागच्या पिढीतल्या आउटडेटेड अभ्यासूंनी स्वत:ला उशिरा का होईना, अपग्रेड करायची गरज आहे. मुख्य धारेत जी काही साहित्य निर्मिती होते आहे, त्याच्या कैक पटींनी चांगल्या दर्ज्याचं लिखाण आंतरजालावर (इंटरनेटवर) होत आहे, हे कडवट सत्य स्वीकारण्याची गरज आहे. आजच्या काळाचा उद्गार 'इंटरनेट' आहे. तुम्ही जर त्याला ऐकत नसाल, तर ती तुमची चूक आहे आणि त्यामुळे तुमची माहिती (ज्याला काही लोक 'ज्ञान' म्हणतात) अपूर्णही आहे. ह्या लोकांनी आंतरजाल सरसकट टाकाऊ मानला असल्याने तिथे पूर्णपणे दुर्लक्ष करून एका प्रचंड मोठ्या संकलानाकडे सपशेल कानाडोळा केला आहे आणि आपल्या अर्धवट माहितीआधारे आपली काहीच्या काही मतं बनवलेली आहेत.

अक्षयकुमार काळे साहेबांचं वक्तव्य हे आंतरजालिय साहित्याबद्दल असलेल्या उदासिनतेचं एक उदाहरण तर आहेच पण कवितेच्या विद्रुपीकरणाकडे सोयीस्कर (कातडी बचाव) दुर्लक्ष करण्याचा प्रयत्नही आहे.

- रणजित पराडकर

1 comment:

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...