Monday, February 15, 2016

बल्लीमाराँसे दरिबेतलक

दिल्ली

चोरों की दिल्ली, हीरों की दिल्ली
बाजारों की दिल्ली, दीवारों की दिल्ली
बेचनेवाली दिल्ली, खरीदनेवाली दिल्ली
छोले कुलचों की दिल्ली, चीला पराठों की दिल्ली
बड़ी बड़ी सडकों की दिल्ली, भरी भरी गलियों की दिल्ली
सरकारों की दिल्ली, बेकारों की दिल्ली
खानेवालों की दिल्ली, पीनेवालों की दिल्ली
दिलवालों की दिल्ली, बवालों की दिल्ली
बेगानों की दिल्ली, दीवानों की दिल्ली
बल्लीमारान की दिल्ली, झंडे वालान की दिल्ली
ग़ालिब की गज़लों की दिल्ली, साहिर की नज्मों की दिल्ली
ज़फर की दिल्ली, जवाहर की दिल्ली
झांसीवालीयों की दिल्ली, निर्भयाओं की दिल्ली
साइकल रिक्शों की दिल्ली, रोल्स रॉईसों की दिल्ली
इतिहास की दिल्ली, आज की दिल्ली
खूबसूरत दिल्ली, बदसूरत दिल्ली
इस की दिल्ली, उस की दिल्ली
तब की दिल्ली, सब की दिल्ली
अब की दिल्ली, कब की दिल्ली
दिल्ली

- अशी सगळी दिल्ली तर मी अजून पाहिलेली नाही. पण दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईला एका माळेत का गुंफतात हे मला समजलंय. ह्यांच्याबद्दल तुम्ही उदासीन (Neutral) असू शकत नाही. ही शहरं तुमच्या अंगावर येतात, डोळ्यांत भरतात, उर दडपवतात, तुम्हाला हादरवतात, मोहवतात, बरंच काही करतात. त्यांचा प्रभाव तुम्ही टाळू शकत नाही. ही शहरं भाग पाडतात तुम्हाला, त्यांच्याबद्दल एक मत बनवण्यासाठी. कोणतंही. प्रिय किंवा अप्रिय. पण तुम्ही उदासीन राहू शकत नाही.

दिल्लीची तुलना मुंबईशी करणं, माझ्यासाठी अपरिहार्य आहे. ही तुलना करताना मला जाणवतं की दोन्ही शहरं काही बाबतींत एकमेकांपेक्षा सरस आहेत. दिल्लीची हवा 'थंड व कोरडी' ते 'उष्ण व कोरडी'पर्यंत बदलते. तर मुंबईची हवा 'उष्ण व दमट'पासून 'उष्ण व दमट'पर्यंत(च) बदलते, हा सगळ्यात महत्वाचा व झटक्यात जाणवणारा फरक ! रस्त्यांचं म्हणायचं तर दिल्लीचे रस्ते म्हणजे डेल स्टेनचा रन अप आणि मुंबईचे रस्ते म्हणजे आशिष नेहराचा, इतका फरक आहे. दिल्लीकडे भरपूर जमीन आहे, मुंबईकडे असलेली जमीनही समुद्र बुजवून बनवलेली आहे. कदाचित मोठमोठे रस्ते असणं म्हणूनच दिल्लीला परवडणारं आहे आणि टोलेजंग इमारती असणं हे मुंबईसाठी आवश्यक.

अर्थात ही सगळी तुलना नव्या दिल्लीशी. पुरानी दिल्ली हे सगळं प्रकरणच वेगळं असावं. मी फक्त चांदनी चौक, क़ुतुब मिनार वगैरे भाग पाहिला. त्यावरून तरी असंच वाटतं. मी मुंबईतल्या बैठ्या चाळी, झोपडपट्ट्यांतून, बाजारांतून खूप फिरलोय. पण लाल किल्ला ते चांदनी चौक आणि मग तिथून दरीबा कलान, बल्लीमारान, जामा मशीद वगैरे भाग फिरताना जे जाणवलं ते फार वेगळंच काही तरी होतं. हा सगळा भाग मुस्लीम बहुल. इथल्या छोट्या छोट्या गल्ल्यांत शहरांतल्या जुन्या बाजारांत असते तशीच प्रचंड गर्दी, कचरा, दाटीवाटी आणि गोंधळ ! गच्च भरलेली कपडे, दागिने व हर तऱ्हेच्या चीजवस्तूंची दुकानं. त्यांच्या मधल्या चिंचोळ्या बोळांतून तोबा गर्दी आणि अशक्य वाटत असतानाही प्रत्येक ठिकाणाहून पुढे शिरणाऱ्या सायकल रिक्शा ! आम्हीही एका सायकल रिक्शातच होतो. त्यामुळे 'खरेदी' नामक बायकांच्या अत्यंत कंटाळवाण्या व खर्चिक टाईमपासपासून माझी सुटका झाली. आम्ही दोघंही, खरं तर आम्ही अडीच, कारण सव्वा वर्षांचा मुलगाही होता, तर आम्ही अडीचही जण डोळे फाडून चोहो बाजूंना न्याहाळत होतो. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या एकमेकांना गर्दीत माणसांचे माणसांना धक्के लागावेत, तश्या निर्विकारपणे एकमेकांना खेटत, घासत होत्या. डोक्यावर वायरींचे इतके दाट जाळं होतं, की त्यांतून एखादी माशीसुद्धा पार होऊ शकणार नाही. प्रत्येक साईजच्या वायरी इथून तिथे आणि तिथून इथे झुलत होत्या. माझा एक हात कॅमेरा पकडून होता, दुसरा हात मुलाला आणि बारीक लक्ष सगळीकडे होतं. हे वेगळ्या प्रकारचं लक्ष होतं. कोण कुठून कसा येईल आणि आमच्या पाकीट, पर्स, कॅमेरा, गळ्यातल्यावर हात टाकेल किंवा आमच्याच नकळत लंपास करेल, ह्याचा नेम नव्हता. खासकरून 'गली परांठेवाली' नामक अत्यंत ओव्हररेटेड खाऊगल्लीत पायी फिरत असताना तर मी खूपच लक्ष ठेवून होतो. 'गली परांठेवाली'मध्ये आम्ही दोन ठीकठाक पराठे खाल्ले आणि एक अक्षरश: थुकरट लस्सी प्यायलो. ह्यापेक्षा उत्तम पराठा आणि लस्सी करोल बागेत मिळते आणि ती शांतपणे खाता/पिताही येते, असं आपलं माझं वैयक्तिक मत.

एकंदरीतच हा सगळा भाग निश्चिंतपणे फिरावं असा वाटलाच नाही. डोक्यावर लटकणाऱ्या वायरींच्या धोक्याप्रमाणे सतत एक अनिश्चितता तुमच्या मागावर आहे असंच वाटत राहतं. बल्ली मारान भागातच गालिबची हवेली आहे. ती बाहेरून किंवा दुरून का होईना पाहावी अशी इच्छा होती. पण त्या चिंचोळ्या गल्ल्यांतून नेमका त्याच दिवशी कसलासा मोर्चा होता त्यामुळे ना गालिबच्या हवेलीकडे जाता आलं ना जामा मशीदीपर्यंत. (त्या मोर्च्याचीसुद्धा एक वेगळीच गंमत होती. मोर्च्याचा बॅनर घेऊन आघाडीला दोघे जण चालत होते. तो रस्ता (गल्ली) इतका लहान होता की तो बॅनर त्यांना सरळ उघडणेही शक्य नव्हते. त्यामुळे ते दोघे एकामागे एक 'Sideways' चालत होते. म्हणजे मोर्च्याला समांतर त्यांचा बॅनर होता !) एका अर्थी बरंही झालं की आम्ही अजून फिरलो नाही. कारण परत लाल किल्ल्याकडे आणून सोडल्यावर रिक्शावाल्याने पैश्यांसाठी हुज्जत घालायला सुरुवात केली. Lesson learnt. एक तर सायकल रिक्शा करूच नका किंवा केलीच तर कुठे कुठे जायचंय ते आधीच सांगून 'वेळेची बोली नाही' हे स्पष्ट करून घेऊन भाडं ठरवा. Well.. तरीही हे चोट्टे काही न काही करून गंडवतीलच ! नकोच. सायकल रिक्शा करूच नका ! पायी फिरा. कुणी तरी ओळखीचा लोकल माहितगार माणूस शोधा आणि त्याला बरोबर घ्या, तेच बेस्ट !

पुरानी दिल्ली हा गजबजाट आवडण्यासारखा नाहीच. गुलजार म्हणतो 'तुझसे मिलना पुरानी दिल्ली में..' पण परिस्थिती अशी आहे की इथे 'किसी से मिलना..' म्हणजे फक्त 'देखना'च शक्य आहे ! 'बल्लीमाराँसे दरिबेतलक' इथे आहे फक्त गजबजलेली अनिश्चितता, तीही मुबलक कचऱ्यासह. 'स्वच्छ भारत अभियान' मुळे असेल, पण हा कचरा दर काही अंतरावर गोळा करून एक ढिगारा केलेला असतो, इतकीच काय ती सोय !

माझ्यासाठी धारावी, क्रॉफर्ड मार्केट, रानडे रोड, फॅशन स्ट्रीटच बरी ! तिथल्या कचऱ्यासह !

- रणजित पराडकर

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...