Sunday, June 26, 2011

शेवटची कविता

कधी लिहिलं गंमत म्हणून
कधी लिहिलं सवय म्हणून
कधी लिहिलं गरज म्हणून
उद्या लिहिन ओळख म्हणून

कधी कधी वाटतं..
काय मागे राहतं?
चेहरा, आवाज की नाव?
माझ्या मागे राहतील
फक्त माझे शब्द
असेच.. उगाच.. सहज सुचलेले
वेळ होता म्हणून लिहिलेले
लिहिता लिहिता अजून सुचलेले
वेळ नव्हता, पण तरीही लिहिलेले

नसानसांत भिनली कविता
क्षणाक्षणात दिसते कविता
चार श्वास कमी दे मला
त्याच्या बदल्यात दे एक कविता

सूर्यप्रकाशाची शेवटची तिरीप
जेव्हा डोळे टिपतील
ओघळत्या चांदण्याचा शेवटचा थेंब
जेव्हा पापण्या तोलतील
तेव्हा थरथरत्या श्वासांनी मी
त्या सर्वव्यापी अंधारावर
दोन शब्द लिहून जाईन
आणि अनंताच्या वाटेवर
माझी दोन पावलं उमटतील

तीच असेल शेवटची कविता
खरीखुरी.. सर्वस्व वाहिलेली
वेळ नसेल, तरीसुद्धा लिहिलेली.....


....रसप....
२५ जून २०११

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...