Friday, November 11, 2011

.... असले काही उरले नाही.

तळमळ वाटुन जळजळ व्हावी असले काही उरले नाही
सुकी पापणी भिजून जावी असले काही उरले नाही

कधीकाळचा वैभवशाली देश भासतो अता भिकारी
गौरवगीते स्फुरून गावी असले काही उरले नाही

खड्ड्यांमधुनी रस्ता शोधू, नळास पाणी कुठून आणू?
उजेड पडुनी वाट दिसावी, असले काही उरले नाही

नाही ज्याला लाज मनाची, करेल सेवा काय जनाची?
भल्या-बुऱ्याची समज असावी, असले काही उरले नाही  

करांस साऱ्या मीच भरावे, सवलत घेउन कुणी खुलावे
श्रमांस माझ्या किंमत यावी, असले काही उरले नाही

"माझे-माझे" करता करता, मस्त तुंबड्या भरता भरता
गरिबाचीही व्यथा कळावी, असले काही उरले नाही

शिवबा व्हावा पुढच्या दारी, अम्हां मिळावा फक्त पुढारी
उत्क्रांतीची कास धरावी, असले काही उरले नाही   

डौल तिरंग्याला ना दिसतो, रंग-रंग का भिन्न वाटतो?
एकजूट ती पुन्हा बनावी, असले काही उरले नाही   

....रसप....
२० नोव्हेंबर २०११

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...