Sunday, August 30, 2015

फेसबुक फॅण्टसी (Movie Review - Phantom)

सध्या विचारवंत व विविध जाणकारांचं एक भलं मोठं पीक सोशल नेटवर्किंगवर आलेलं दिसतं. आणि ह्यांचं सगळ्यात आवडतं 'विचारकुरण' आहे 'भारत-पाकिस्तान संबंध व सीमाप्रश्न' ! पाकिस्तानकडून सीमेवर काही हालचाल जरी झाली तरी हजारो मैलांवरील सुरक्षित एअरकन्डीशंड खोल्यांत बसून काही फेसबुकवीर आर्मीला ऑर्डर्स देतात की, 'घुसा पाकिस्तानात आणि मारा एकेकाला!' कुठे दहशतवादी हल्ला झाला की लगेच फतवे निघतात की, 'आपणही त्यांच्या शहरांवर असेच हल्ले करायला हवे !' कुणी म्हणतं, 'अमेरिकेने कसं ओसामा बिन लादेनला आत घुसून मारलं, तसंच आपणही दाऊदला मारायला हवं, हाफिज सईदला टिपायला हवं, वगैरे'.
सर्वसामान्य माणसांनी भावनेच्या भरात असं काही लिहिणं, बोलणं हे अगदी स्वाभाविक आहे. ह्या सगळ्या 'फेसबुक फॅण्टसीज'ना जास्तच मनावर घेऊन साजिद नाडियादवाला नामक नियमितपणे सामान्य चित्रपट बनवणाऱ्या निर्मात्याने काही कोटी रुपये ओतून एक चित्रपट बनवावा, हेही एक वेळ समजून घेता येईल. पण सिद्धार्थ रॉय कपूरसारखा सहसा बाष्कळपणा न करणारा निर्माताही त्या चित्रपटाची सह-निर्मिती करतो आणि 'काबुल एक्स्प्रेस', 'एक था टायगर', 'बजरंगी भाईजान' सारखे अचूक नस पकडणारे चित्रपट बनवणारा दिग्दर्शक कबीर खानही ह्यावर वेळ वाया घालवतो तेव्हा मात्र आश्चर्य वाटतं.

पूर्वी हजारो, लाखो लोक केवळ सचिनसाठी क्रिकेट पाहायचे. तो नक्कीच चांगला खेळेल, अशी प्रत्येक वेळेस त्या भाबड्या रसिकांना खात्रीच असायची आणि जेव्हा सचिन विशेष काही न करता माघारी येई, तेव्हा स्टेडियममधून प्रेक्षक बाहेर पडत आणि घरा-घरातले टीव्ही बंद होऊन लोक काम-धंद्याला लागत. 'फॅण्टम'च्या सुरुवातीला २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर कसाब व साथीदारांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्याची पार्श्वभूमी सांगितली जाते. ओम पुरींचा धीरगंभीर आवाज काळजाला डागण्या देणाऱ्या अप्रिय स्मृती जागृत करतो. पुढच्या ५-१० मिनिटांत अपेक्षा थोड्या अजून वाढतात. आणि मग परदेशात राहत असताना शिस्तीचे धडे गिरवलेला भारतीय परत आपल्या देशात आल्यावर ज्याप्रकारे सर्रास सिग्नल तोडणे, कचरा करणे, वगैरे सुरु करतो, त्याचप्रकारे कबीर खान सारासारविचारशक्तीची विकेट भावनावेगाला अलगदपणे बहाल करून टाकतात आणि मध्यंतरापर्यंत आपल्यालाही सचिन बाद झाल्यावर निराश होणाऱ्या प्रेक्षकांप्रमाणे बाहेर पडायची इच्छा होते. पण आपण थांबतो. कारण कधी तरी आपणही काही 'वैचारिक तारे' तोडलेले असतात ! आपली लुकलुक कुठे तरी झगमगाटात बदलेल अशी एक वेडी आशा बाळगून आपण हा सगळा पोरखेळ शेवटपर्यंत सहन करतो. अखेरीस आपल्या हाती ना दोन घटिका मनोरंजन येतं, ना कुठला थरारक अनुभव.

आर्मीतून हकालपट्टी झालेल्या 'दानियाल खान' (सैफ अली खान) ला भारतीय गुप्तचर विभाग एका अनधिकृत मोहिमेसाठी पाठवतो. २६/११ च्या हल्ल्याच्या सूत्रधारांना अमेरिका, लंडन व पाकिस्तानात शिरून अश्या प्रकारे मारायचं की दिसायला तो अपघात दिसला पाहिजे आणि समजायला समजूनही आलं पाहिजे की त्यांना मारण्यात आलं आहे ! ह्या कामात त्याला एक एजंट नवाझ मिस्त्री (कतरिना कैफ) मदत करते आणि हा सगळा प्लान गुप्तचर विभागातला एक कनिष्ठ अधिकारी 'समित मिश्रा' (मोहम्मद झीशान अय्युब) च्या सुपीक डोक्यात पिकला असतो.
पुढे काय होतं, कसं होतं हे सांगायची आवश्यकता नसावी आणि ते न सांगितल्याने काही फरक पडेल असंही वाटत नाही. त्यामुळे इतकंच !


कतरिना कैफला इंडस्ट्रीत १२ वर्षं झालीत. तिला हिंदी येण्यासाठीचं इंडस्ट्रीचं हे तप वाया गेलं आहे. आजही तिचे वाईट उच्चार चालवून घेण्यासाठी तिची व्यक्तिरेखा युरोप/ अमेरिकेत वगैरे वाढलेली दाखवायला लागते. हे कशासाठी ? तर फक्त ती सुंदर दिसते म्हणून ! कारण कतरिना कैफ आणि अभिनय ह्यांच्यात एक तर काही नातंच नाही आहे किंवा असलं तरी खूप दूरचं असावं. फार क्वचित ते दोघे एकत्र दिसतात आणि कसलासा तीव्र मतभेद असल्याप्रमाणे एकत्र दिसले तरी विसंवाद पाळतात.

दुसरीकडे नवाब सैफ अली खान आणि अभिनय म्हणजे श्रावणातला उन्हं-पावसाचा खेळ असावा. त्याचा मध्येच एखादा 'कॉकटेल'सारखा चित्रपट येतो आणि आपल्या अपेक्षा वाढल्या की तो 'हमशकल्स' मध्ये झळकतो. 'फॅण्टम' सैफ गेल्या काही काळातल्या सततच्या अपयशाची मालिका तोडत नाही. त्याच्या गालांवरची दाढी आणि नाकावरची माशी काही केल्या जात नाही. कतरिनाची अभिनयमर्यादा उघडी पडू नये, ह्याची खबरदारी त्याने स्वत:ला त्या मर्यादेपलीकडे न जाऊ देता घेतली आहे.

मोहम्मद झीशान अय्युब, हा एक गुणी अभिनेता. त्याने 'रांझणा', 'तनु वेड्स मनू - रिटर्न्स' मध्ये अक्षरश: धमाल केली होती. त्याचा अत्युत्साही गुप्तचर विभाग अधिकारी अत्यंत उथळ वाटतो. पण त्यात त्याची काही चूक नसावी. ती व्यक्तिरेखाच अतिशय ढिलाईने रेखाटलेली आहे. तो एक ज्युनियर आहे, ज्याचं डोकं इतर सर्व सिनियर्सपेक्षा वेगळं आणि चांगलं चालतं, हे आपल्याला स्वीकारता येण्यासाठी काहीही घडत नाही. केवळ इतर लोक म्हणत आहेत, म्हणून आपण हे मान्य करायचं आहे.

'फॅण्टम'मध्ये खऱ्या अर्थाने कथालेखक आणि दिग्दर्शक 'फॅण्टम' आहेत. त्यामुळे एक 'अतिरंजित बाष्कळ मेलोड्रामा' ह्यापुढे ही कहाणी जात नाही. कुठेही ती प्रेक्षकाची पकड घेतच नाही. चित्रपटगृहातून बाहेर पडताना आपल्या मनात चित्रपटातलं कुठलंही दृश्य, कुठलाही डायलॉग राहत नाही. ना कुणी व्यक्तिरेखा लक्षात राहते, ना अभिनेता. सुमार व्हीएफएक्ससुद्धा आपण विसरुन जातो. मात्र मनात एक दु:ख राहते. एक चांगला 'प्लॉट' वाया गेला ह्याचं नव्हे, तर पण दु;ख अजून एका गोष्टीचं होतं -
'फॅण्टम' ची 'टॅगलाईन' आहे "A Story You Wish Were True!" ह्या ओळीतच हे अध्याहृत आहे की, 'हे असं काही घडू शकणार नाही!' पण आपली लाचारी इतकी आहे की आपण चित्रपटातसुद्धा 'हाफिज सईद' हे नाव घेऊ शकत नाही. ते आपल्याला 'हारीस सईद' असं करायला लागतं. 'झकीउर रहमान लखवी' हे नाव आपण घेऊ शकत नाही. त्याऐवजी आपल्याला 'सबाउद्दीन उमवी' घ्यायला लागतं. आणि असे सगळे बदल करूनही चित्रपटावर पाकिस्तानात बंदी असतेच. कारण आपण काही करू शकत नाही, हे कडवट सत्य जसं आपल्याला पचत नाही, तसंच 'आपण बरंच काही केलंय' हे कडवट सत्य त्यांनाही पचत नसावं !
असो.

To cut the long story short, काही वर्षांपूर्वी 'धमाल' हा 'एसएमएस जोक्स' चा मिळून एक चित्रपट इंदरकुमारनी बनवला होता. तसंच  'फॅण्टम' ही एक 'फेसबुक फॅण्टसी' आहे. पण 'धमाल'मधले विनोद थरारक होते. 'फॅण्टम'चा थरार हास्यास्पद आहे, हाच काय तो फरक. 'धमाल'मध्ये सगळ्यांनीच अभिनयही कमाल केला होता आणि 'फॅण्टम'मध्ये तीच सगळ्यात मोठी बोंब आहे !

रेटिंग - *  

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये ३० ऑगस्ट २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-


No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...