Sunday, May 31, 2015

जॅकीचा हँडब्रेक, अर्शदचा अ‍ॅक्सिलरेटर' (Movie Review - Welcome 2 Karachi)

आजकाल चित्रपटाच्या नावासोबत एक ब्रीदवाक्य जोडलेलं असतं. उदा. NH10 साठी 'The journey begins', 'पिकू'साठी 'मोशन से ही इमोशन', 'रावडी राठोड' चं 'Don't angry me!' वगैरे. पण काही वेळी ही ब्रीदवाक्यं प्रेक्षकासाठी एक पूर्वासूचनेचं कामही करतात हे 'वेलकम टू कराची' पाहिल्यावर जाणवलं.  त्याचं ब्रीदवाक्य आहे - 'To survive they must stay foolish'. ही प्रेक्षकांसाठीची पूर्वसूचना आहे. 'Survive' होण्यासाठी प्रेक्षकांनीही काही काळासाठी 'Foolish' बनणं, आवश्यक आहे.

गुजरातमधील 'जामनगर'. इथे दोन मित्र असतात. शम्मी ठाकूर (अर्शद वारसी) आणि केदार पटेल (जॅकी भगनानी). शम्मी नेव्हीतून हकालपट्टी झालेला कप्तान आणि केदार वडिलांच्या धंद्यावर स्वत:ला पोसणारा एक अर्धवटराव. दोघे जण केदारच्या वडिलांच्या बोटीवर असताना, जामनगरजवळच्या समुद्रात ती बोट वादळात सापडते आणि बुडते. समुद्र त्याच्यात येणारा सगळा कचरा किनाऱ्यावर ओकत असतो. तो शम्मी आणि केदारलाही किनाऱ्यावर ओकतो. पण कुठल्या ? थेट कराचीच्या ! (इथे आपण लगेच 'गुगल मॅप्स' पाहतो. जामनगरजवळ बुडलेली व्यक्ती कराचीला पोहोचण्यासाठी गुजरातच्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्याला वळसा घालून किमान ४००-५०० किमीचा फेरफटका होईल, असं काहीसं अनुमान आपण काढतो. समुद्रसुद्धा वेडा आहे. फेकायचंच असेल तर मुंद्रा, कांडला, द्वारका वगैरे जवळ होतं की अगदी रस्त्यातच, म्हणजे पाण्यातच. पण थेट कराची ? बरं असेल, आता पुढे बघू.) विना-पासपोर्ट पाकिस्तानात पोहोचलेले हे दोघे अर्धवट भारतात परतण्यासाठी जंग जंग पछाडतात. आयएसआय, तालिबान, अमेरिकन सैन्य ह्या सर्वांच्या हाताला लागतात. हिरो, व्हिलन, सैनिक, दहशतवादी, डॉक्टर, प्रेतं, पाकिस्तानी, भारतीय, (अजून) मूर्ख, (अति) शहाणे असं बरंच काही बनतात. पाकिस्तानच्या दक्षिणेला असलेल्या कराचीहून उत्तरेकडे असलेल्या तालिबान व जिहादींचा कथित बालेकिल्ला वझिरीस्तानापर्यंत पोहोचतात. चोऱ्या, गोळीबार, बॉम्बस्फोट, इतकंच काय प्रसूतीसुद्धा करवतात !

कसलं अ‍ॅक्शन पॅक्ड स्क्रिप्ट आहे ना ? पण असं असूनही प्रेक्षकाला संपूर्ण वेळ खिळवून ठेवू शकत नाही. सतत जैन पद्धतीने बनवलेली मिसळ खाल्ल्याचं किंवा पूर्ण दुधाचा चहा प्यायल्याचं फीलिंग येत राहतं. प्रेक्षकाला ही जगावेगळी अनुभूती देण्यासाठी स्पेशल इफेक्ट्स, संगीत, संकलन वगैरे करणाऱ्या अनेकांनी हातभार लावला आहे, पण सगळ्यात जास्त आहे जॅकी भगनानीचा. 'केदार पटेल' ही एक सपशेल बिनडोक व्यक्तिरेखा आहे. 'सपशेल बिनडोक' म्हणजे हर तऱ्हेचा मूर्खपणा, बावळटपणा करायचं लायसन्सच आणि त्यायोगे हुकुमी हशे पिकवण्याची नामी संधी. अश्या सुवर्णसंधीची माती करण्यासाठी तुमच्याकडे काही तर खास गुणवत्ता असली पाहिजे. ती जॅकीकडे आहे.
जॅकी हे अभिनयाचं एक भग्नशिल्प आहे. त्याला खरं तर 'भगनानी' नव्हे 'भग्नानी' म्हणायला हवं. कुठल्याश्या मुलाखतीत त्याने असं म्हटलं होतं की 'बोलण्याची गुजराती ढब आत्मसात करण्यासाठी त्याला एक दिवस दिला गेला होता.' फक्त एक दिवस ? वार रे वाह ! त्यांनी दिला आणि ह्याने घेतला ! 'मेरी कोम' साठी प्रियांका चोप्रा म्हणे खास मणिपूरला जाऊन आली होती. अर्थात तो चरित्रपट होता, त्यासाठी तेव्हढी मेहनत अपेक्षित आहेच. दुसरा विचार असा की जर एका दिवसात एका 'भगनानी'ला बोलण्याची 'गुजराती' ढब जर आत्मसात करता येत नसेल, तर त्याला 'भगनानी' म्हणून नव्याने जन्म घ्यायला हवा. कारण नक्कीच अगदी सुरुवातीपासूनच काही तरी जबरदस्त लोचा असणार.
वीरेंद्र सेहवाग आणि आकाश चोप्रा जेव्हा भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करायचे, तेव्हा असं म्हटलं जायचं की एक जण फुल्ल अ‍ॅक्सिलरेटर देतोय आणि दुसरा हँडब्रेक लावुन बसलाय. इथेही असंच काहीसं झालं आहे. अर्शद वारसी फुल्ल अ‍ॅक्सिलरेटर देत असताना जॅकी हँडब्रेक लावून बसतो आणि वेलकम टू कराचीची गाडी रडतखडत स्पीड पकडते.

अर्शद वारसी, त्याच्या 'कॉमेडी' नावाच्या होम पीचवर आहे. आजच्या घडीला त्याच्यासारखं टायमिंग फार कमी जणांचं असावं. तो 'शम्मी'च्या भूमिकेत काय धम्माल उडवून देत असेल, ते कथानकाच्या ओळखीतूनच समजुन यावं. चित्रपटात शम्मी केदारच्या मोठ्या भावाप्रमाणे त्याला सांभाळून घेत असतो आणि पडद्यावर अर्शद वारसी जॅकी 'भग्नानी'ला.
खरं तर पडद्यावर येणारा प्रत्येक जण केवळ धम्माल करतो. अगदी अमेरिकनांच्या भूमिकेतील, १-२ दृश्यांसाठी असलेले फिरंगीसुद्धा !

अनेक जागा खरोखर 'हसणेबल' झालेल्या आहेत. कराचीच्या रस्त्यावर एक 'मिनी वर्ल्ड वॉर' होण्याचा प्रसंग तर मस्तच आणि पठाण लोकांसोबत भारत-पाक क्रिकेट सामना पाहतानाचंही दृश्य भारी जमून आलं आहे. ह्याशिवाय अनेक लहान-मोठ्या जागा आहेत, जिथे हशा पिकतो. तो पिकवण्यात मुख्य करून अर्शद वारसीचा हात असतो किंवा परिस्थितीचा. मात्र, प्रत्येक वेळी जॅकी भग्नानीने आपल्या असह्य वावराने त्यावर बोळा फिरवण्याचा प्रयत्न अगदी मनस्वीपणे केलेला असतो. पैकी काही जागांवर तो यशस्वीही होतो, काही ठिकाणी मात्र नशीब प्रेक्षकांची साथ देतं.

चित्रपट सुरु होतेवेळची शीर्षकं एखाद्या मॅनेजमेन्ट, कॉर्पोरेट सेमिनार, कॉन्फरन्समधल्या पॉवरपॉईण्ट प्रेझेन्टेशनमध्ये दाखवल्या जाणाऱ्या 'इफेक्ट्स'पेक्षा फार कल्पक, सफाईदार किंवा चांगली नाहीत. पुढे, बोट समुद्रात बुडण्याच्या प्रसंगात तर स्पेशल इफेक्ट्सलाही व्यवस्थित जलसमाधी मिळाली आहे. त्यानंतरचं समुद्रकिनाऱ्यावरील बॉम्बस्फोटाचं दृश्य तर चित्रिकरणाच्या दयनीयतेची परिसीमा ठरावी. चित्रीकरण व स्पेशल इफेक्ट्समध्ये इतका प्रामाणिक सुमारपणा बऱ्याच दिवसांनी पाहायला मिळाला आहे. त्यासाठी विशेष अभिनंदन !

रोहित शेट्टीचा दिग्दर्शन सहाय्यक म्हणून काही 'गोलमालां'मध्ये दिग्दर्शक आशिष मोहननी काम केलं होतं. 'खिलाडी ७८६' हा त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता. त्याच्या ट्रेलरमध्ये दिसलेले आचरट स्टंट्स आणि एक अभिनेता म्हणून 'हिमेश रेशमिया' पाहून, चित्रपट बघायची हिंमत मी तरी केली नव्हती. 'वेलकम टू कराची' हे त्यांचं निश्चितच त्यापेक्षा चांगलं काम असावं. चित्रपटगृहात येणारा प्रेक्षक जर ह्याआधी आलेल्या अनेक चित्रपटांच्या आवश्यकतेप्रमाणे 'लॉजिक मोड ऑफ' करून किंवा ब्रीदवाक्याप्रमाणे 'Foolish' बनून आला आणि एकदा 'जॅकी भग्नानी' नामक निरागस निर्मातापुत्राला त्याने इन अ‍ॅडव्हान्स क्षमा केलं, तर 'वे-टू-क' दोन-अडीच तासांसाठी कंटाळा नक्कीच आणत नाही.

बाय द वे, स्मार्टफोनचा एक अतिशय उपयुक्त वापर मला ह्या चित्रपटादरम्यान समजला. पडद्यावर गाणी लागली की माझं मी मन फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये गुंतवलं. गुंतलेल्या डोळ्यांमुळे कुंथलेल्या कानांना कमी त्रास झाला असावा.

रेटिंग - * * १/२


हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (३१ मे २०१५ रोजी) प्रकाशित झाले आहे :-

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...