Wednesday, March 11, 2015

क्लिनिकल ! (India vs Ireland - World Cup 2015)

सदतिसाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर कोहलीने केव्हिन ओ'ब्रायनचा चेंडू सीमापार टोलवला आणि आयर्लंडविरुद्धचा सामना भारताने जिंकला. हा जो विजयी फटका होता, तो फटका संपूर्ण सामन्याचं सार सांगत होता. त्या षटकातील सगळे चेंडू ओ'ब्रायन ऑफ स्टंपबाहेर टाकले. फक्त सहा धावा विजयासाठी हव्या होत्या, पण ह्या सहा धावा सहजासहजी द्यायच्या नव्हत्या म्हणून. पण कोहलीने काय केलं ? त्याने गोलंदाजाचा प्लान ओळखला आणि आधीच पुढे येण्याच्या पवित्रा घेऊन योग्य वेळी ऑफ स्टंपच्या बाहेर आला आणि त्या बाहेरील चेंडूपर्यंत पोहोचून त्याच्या कानाखाली एक असा आवाज काढला की लहान मुलाने भोकाड पसरावं तसा तो चेंडू थयथयाट करत सीमापार पळून गेला ! ओ'ब्रायनच नव्हे तर एकूणच आयरिश गोलंदाजी मर्यादित क्षमतेचीच आहे. त्यांनी २६० धावांच्या किरकोळ लक्ष्याला त्यांच्या मानाने कठीण करायचा प्रयत्न केला, पण भारतीय फलंदाज हर तऱ्हेने त्यांना वरचढच होते.

खरं तर जेव्हा २५९ धावांवर आयर्लंडचा डाव संपुष्टात आला, तेव्हाच सामना भारताच्या खिश्यात जमा झाला होता. कारण हॅमिल्टनच्या मैदानाच्या सीमारेषा इतक्या लहान आहेत की अटलबिहारी वाजपेयींच्या दोन शब्दांमधील विरामाच्या वेळेत ख्रिस गेलसुद्धा मैदानाची एक फेरी धावून येऊ शकेल. ह्या मैदानात चेंडू दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये टायमिंगने मारला की मग फक्त सीमारेषेपर्यंत जाऊन तो परत घेऊन येण्याचं औपचारिक कामच क्षेत्ररक्षकाकडे राहातं.

ह्या नाकपुडीएव्हढ्या सीमारेषांचा फायदा घेत पोर्टरफिल्ड आणि स्टर्लिंगने आयर्लंडला दमदार सुरुवात करून दिली. पण इथेच धोनीतला धूर्त कर्णधार दिसला. त्याने पाहिलं की मध्यमगती, जलदगतीला ही खेळपट्टी साथ देत नसून उलट चेंडूच्या गतीचा फायदा फलंदाजालाच होणार आहे. त्या खेळपट्टीत खरं तर कुठल्याच गोलंदाजासाठी काहीच नव्हतं. लहान मैदानात, साथ न देणाऱ्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजाला चांगलाच मार बसू शकतो. मात्र डॉक्टरकडे काम करणारा कंपाउंडर किंवा नर्ससुद्धा कसे 'तयार' होतात, तसे इंग्लंडच्या शेजारी राहून तेज गोलंदाजी खेळण्यासाठी तयार झालेले आयरिश फलंदाज चांगल्या फिरकी गोलंदाजीशी तितकेच परिचित होते जितके धवन-जडेजा चांगल्या जलदगती गोलंदाजीशी असतील.
गेल्या काही सामान्यांपासून अश्विनला एक अत्यंत महत्वाची उपरती झालेली जाणवते आहे. चेंडूची गती कमी ठेवण्याची. कमी गतीमुळे चेंडूला उंचीही (फ्लाईट) दिली जात आहे आणि म्हणून त्याला खेळताना फलंदाजांना त्रास होतो आहे. ह्या फिरकीच्या जाळ्यात स्टर्लिंग काजूचं पिकलेलं फळ जसं आपोआप जमिनीवर पडतं तसा पडला आणि अडकला.
ह्या नंतर रैना, अश्विनने आयर्लंडच्या गाडीच्या चाकांमधली हवाच काढून घेतली आणि मग ही गाडी पळाली नाहीच, तर आयरिशांना तिला धक्का देऊन २५९ मैलांच्या दगडाजवळ ४९ व्या षटकाच्या वळणावर उभी करावी लागली.
तरीही मला नाईल ओ'ब्रायनबद्दल फार आदर वाटला. अश्विन-रैनाने त्याला सुरुवातीला असा काही बांधून ठेवला होता की एखाद्याने बेचैन होऊन उतावीळ फटका मारला असता. पण पठ्ठा पहिल्या वीसेक चेंडूंत १-२ धावांवर अडकलेला असतानाही पिचला नाही. तो बाद झाला तेव्हा त्याच्या खात्यावर जमा होत्या चेंडूला धाव ह्या गतीने ७५ धावा. ह्याला म्हणतात 'पेसिंग द इनिंग्स' ! एका नवख्या संघाच्या खेळाडूकडून अशी परिपक्वता दिसते आणि दुसरीकडे इंग्लंडसारखे पुरातन कालापासून खेळणारे लोक वारंवार कच खातात हे पाहून आश्चर्य वाटलं.
फिरकीकडून काही काळ विकेट मिळत नसताना धोनीने मोहित शर्माकडे चेंडू सोपवला. ही त्याची खेळी तर माझ्या मते 'मास्टरस्ट्रोक' होता. मोहितकडे अतिशय सुंदर असा स्लोअर वन आहे. जो इतर कुणाकडेच नाही. तो खूप चतुरपणे चेंडूची गती कमी-जास्त करत असतो. फिरकीसमोर गुदमरलेल्या आयरिश फलंदाजांना समोर मध्यमगती गोलंदाज दिसल्यावर ते स्वाभाविकपणे प्रफुल्लीत होऊन हल्ला चढवणार आणि म्हणूनच इथे मोहितचं गती-परिवर्तन कामाला येईल, हे धोनीने जाणलं. सेट झालेला पोर्टरफिल्ड फसला आणि डाव सावरता सावरता गडगडला.

२६० धावांचं लक्ष्य, सामान्य गोलंदाजी, छोटं मैदान, विमानाच्या रनवेसारखी खेळपट्टी. धवन-रोहितला डोळ्यांसमोर शतकं दिसत असावीत. धवनने ते गाठलं, तर रोहितने शेखचिल्लीपणा करून स्वत:ची फांदी स्वत:च तोडली. श्रीखंडाचं पातेलं चाटून पुसून स्वच्छ करावं, तसं कोहली-रहाणेने उर्वरित सोपस्कार मोठ्या आनंदाने पूर्ण केले आणि सरतेशेवटी कोहलीने तो फटका मारला ज्यात संपूर्ण सामन्याचं सार होतं.


एखाद्या अत्यंत अनुभवी शल्यविशारदाने ज्या कुशलतेने छोटीशी शस्त्रक्रिया करावी त्या सहजपणे भारताने हा सामना जिंकला. आयर्लंड हा एक धोकादायक संघ आहे. वेस्ट इंडीज आणि इंग्लंडला ह्याची पुरेपूर प्रचीती आलेली आहे. परंतु, भारताने कुठल्याही क्षणी संतुलन ढळू दिलं नाही आणि नियोजनबद्ध खेळ केला.
खटकली ती एकच गोष्ट. भुवनेश्वर कुमारला बाहेर बसवून उमेश यादवला खेळवावं, असं का वाटावं ? चार सामन्यांपैकी अमिरातीविरुद्धचा सामना वगळल्यास यादवने इतर सामन्यांत असामान्य अशी काही गोलंदाजी केली आहे, असं मला वाटत नाही. ४९ षटकांपैकी फक्त ४ च षटकं जर तो टाकणार असेल, तर त्याचा गोलंदाज म्हणून उपयोग काय आणि जर त्याला ४ पेक्षा जास्त षटकं देण्याइतका विश्वास कर्णधाराला वाटत नसेल, तर तो संघात का आहे ? पुढील सामन्यातच नव्हे तर त्यापुढेही मला त्याच्या जागी भुवनेश्वरला पाहायला आवडेल. निश्चितच तो त्याची दहा षटकं तरी पूर्ण टाकेलच.

- रणजित पराडकर

ह्या शृंखलेतील इतर लेख :- 'World Cup 2015

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...