Friday, June 29, 2012

एक ठिणगी वेचली मी जाळताना हृदय माझे



बोललो जे जे कधी मी बोललो नाही खरोखर
पण तरीही वाद झाला चूक होते की बरोबर !

तोडले नात्यास ह्याचे फारसे ना दु:ख झाले
का न सांगितले कधी तू सत्य लोकांच्या अगोदर ?

भिजवल्या मी पापण्या अन भास झाला पावसाचा
स्वच्छ डोळ्यांनी कधी नव्हते बघितलेले मनोहर

मी तुझ्या डोळ्यांत गंगा पाहिली अन धन्य झालो
लपवतो डोळ्यांमधे लोणारचे खारे सरोवर

दाखवा माणूस जो म्हणतो "सुखी आहे इथे मी"
चेहरा हसरा खरा मी शोधण्या फिरलो घरोघर

एक ठिणगी वेचली मी जाळताना हृदय माझे
तीच ठिणगी आणि ही कविता असे बहुधा सहोदर

सांगती सारेच, "जीतू, जा तिला विसरून आता"
काय सांगा लागते देण्यास हे सल्ले अगोचर ?

....रसप....
२७ जून २०१२

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...