Saturday, February 11, 2017

पुनर्प्रक्षेपित मनोरंजन - जॉली एलएलबी - २ (Movie Review - Jolly LLB - 2)

'जॉली एलएलबी - २' चा फर्स्ट हाफ जबरदस्त आहे. अगदी जबरदस्त !
नंतर मात्र सिनेमा जरासा ढेपाळतो.

इथला 'जॉली' म्हणजे पुन्हा एकदा एक धडपड्या वकील आहे. फरक इतकाच की मागच्या भागात तो अर्शद वारसी होता, इथे अक्षय कुमार आहे आणि कहाणी दिल्लीऐवजी लखनऊत घडते.

अ‍ॅडव्होकेट रिझवी (राम गोपाल बजाज) हे 'लखनऊ'च्या न्यायव्यवस्थेच्या क्षेत्रातलं एक खूप मोठं प्रस्थ. ह्याच क्षेत्रातलं नव्हे तर एकंदरीतच समाजातलं एक खूप इज्जतदार नाव. त्यांच्या 'लॉ फर्म'मध्ये कारकुनी काम करणारा जगदीश्वर मिश्रा उर्फ जॉली (अक्षय कुमार) स्वत:चीही एक 'लॉ फर्म' असावी, असं स्वप्न बाळगणारा धडपड्या वकील असतो. ह्या महत्वाकांक्षेपोटी माणुसकी, तत्वमूल्ये वगैरे किरकोळ गोष्टी सोयीस्करपणे पाळणारा जॉली, एकदाच जरा जास्तच भ्रष्ट वागतो आणि त्याची चांगलीच किंमत मोजतो. पुढे होणारी न्यायालयीन लढाई एका अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठीची कमी आणि त्याच्या अपराधगंडावरचा एकमेव इलाज म्हणून जास्त असते.


पहिल्या भागामुळे सौरभ शुक्लाची व्यक्तिरेखा आधीच establish झालेली असल्याने, पुढे काय होणार आहे आणि कसं होणार आहे, हे आधीच माहित असतं. बरेचसे पंचेससुद्धा त्यामुळे अपेक्षितच ठरल्याने कमजोर पडतात. स्टोरीलाईन दमदार होती, पण जॉलीचा सत्यशोधाचा प्रवास योग्य दिशेने झाल्यासारखं वाटलंच नाही. पहिल्या भागात ज्याप्रमाणे, एक महत्वपूर्ण व्यक्ती कोर्टात पेश करून केस निर्णायक केली जाते, तोच प्रकार इथेही आहे. पण त्या व्यक्तीपर्यंत लीड करणारे अनेक महत्वाचे क्ल्यूज् परिस्थितीत असतानाही त्यांवर जॉली लक्ष देत नाही, किंबहुना लेखकाने लक्ष दिलेलं नाही आणि योगायोगाची ठिगळं जोडावी लागली आहेत. माझ्या मते, हा एक जर बदल घडला असता तर कदाचित दुसरा भागही अजून जास्त उत्कंठावर्धक झाला असता.

अक्षय कुमार अत्यंत आवडता आहे. महान अभिनेता म्हणून कधी त्याचं नाव घेतलं जाणार नाही, पण एक अतिशय समंजस अभिनेता म्हणून त्याला नक्कीच पाहिलं जाऊ शकतं. त्याला पडद्यावर वास्तववादी दिसण्यासाठी आमुलाग्र मेकओव्हर करायची कधीही आवश्यकता वाटत नाही. जी व्यक्तिरेखा असेल, ती तो त्याच्याकडे असलेल्या कुवतीचा पुरेपूर वापर करून खरीखुरी उतरवतोच.

अन्नू कपूर हा एक तगडा अभिनेता आहे, असं माझं मत. बऱ्याच दिवसांनी त्याला एक चांगल्यापैकी लांबी व महत्व असलेली भूमिका मिळालेली आहे. पण त्याने तिचं पूर्ण चीज केलं, असं वाटत नाही. ही माझ्यासाठी खूप मोठी निराशेची बाब होती. कारण मला त्याच्या कामाबाबत प्रचंड उत्सुकता होती. पहिल्या भागात बोमन इराणीने साकार केलेला हाय प्रोफाईल वकील खूपच उच्च दर्ज्याचा ठरावा. कदाचित पुन्हा एकदा, predictability मुळे काही ठिकाणी फुसकेपणा आलेला असू शकतो. मात्र तरीही रुबाब आणि माज ह्यांचं जे मिश्रण अपेक्षित होतं, ते अन्नू कपूरला करता आलेलं नाही. उलटपक्षी, काही वेळेस तर त्याचा अति-अभिनय इरीटेटही करतो !

कुमुद मिश्रा आणि सयानी गुप्ता ह्या दोघांना अगदी कमी लांबीच्या भूमिका आहेत. तरीही दोघांचा उल्लेख करणं खूप आवश्यक आहे कारण दोघांनीही अगदी अफलातून परफॉर्मन्स दिला आहे.
ही कहाणी इन्स्पेक्टर सूर्यवीर सिंग (कुमुद मिश्रा) ह्या सुपर कॉपच्या एका फेक एन्काऊन्टरसंबंधीच्या केसची आहे. सूर्यवीर सिंगला जेव्हा सीबीआयचे अधिकारी काही प्रश्न करतात, त्यानंतर ते अधिकारी गेल्यानंतर कमिशनरच्या केबिनमधून बाहेर पडणाऱ्या सूर्यावीरला कमिशनर एकच प्रश्न विचारतो आणि त्याचं तो उत्तर देतो. साधारण मिनिटभराचा प्रसंग. त्यातही कुमुद मिश्राचं उत्तर काही सेकंदांचंच. त्या काही सेकंदांत त्याची नजर जे काही बोलते, ते केवळ लाजवाब आहे.
'सयानी गुप्ता' ही अभिनेत्री ह्या आधी काही सिनेमांत किरकोळ भूमिकांत दिसली आहे. त्या भूमिकांत लक्षात राहावं असं काही नव्हतंच. पण तरी हा चेहरा ओळखीचा वाटत होता म्हणून जरा शोध घेतल्यावर ओळख पटली. हिला मी 'बार बार देखो' आणि 'फॅन' मध्ये पाहिलं आहे. इथे तिला मोजून ३-४ प्रसंग आहेत. प्रत्येक वेळी तिने कमालीचा सहजाभिनय केला आहे.

'सौरभ शुक्ला' ची व्यक्तिरेखा 'जॉली एलएलबी-१' मधून पुढे आली आहे. (आधीच्या भागात दिसलेले इतर सहाय्यक अभिनेते इथेही सहाय्यक म्हणून दिसतात, पण त्यांच्या व्यक्तिरेखा बदलल्या आहेत.) शुक्लांचा जज त्रिपाठी काही जागांवर अति वाटतो. पण चालसे. ओव्हरऑल, पुन्हा एकदा मजा आणली आहे त्यांनी.

हुमा कुरेशीसुद्धा आहे. ती नेहमीसारखीच भक्कम दिसते. ह्याउप्पर तिच्याविषयी काही लिहावं, असं काहीही नाही.

एक होळीचं गाणं म्हणून काही तरी आहे, त्याला गाणं का म्हणावं हा प्रश्न पडतो. आजकाल कोणत्या निकषांवर गाण्यांची निवड केली जाते, हा एक प्रश्न मला काही वेळी भयानक सतावतो. 'ओ रे रंगरेजा..' ही कव्वाली आणि 'बावरा मन' हे रोमॅण्टिक गाणं, अशी दोन गाणी मात्र खूपच सुंदर जमली आहेत.

विनोदातला खुसखुशीतपणा लोप पावत जात असतानाच्या काळात काही मोजकेच लोक अस्तित्व टिकवू शकत आहेत. 'जॉली एलएलबी' हा ब्रॅण्ड जर एस्टॅब्लिश झाला, तर त्यांपैकी एक असणार आहे. कदाचित पहिल्या भागइतका दुसरा भाग आवडणार नाही, पण तरीही एक स्वतंत्र सिनेमा म्हणून विचार करता निखळ मनोरंजनाची खात्री निश्चितच आहे. मुलांना कॉपीसाठी मदत करणे, गुरुजी (संजय मिश्रा) चं बनारसमध्ये क्रिकेटच्या 'कल्पक' मॅचेस घेणे अश्या काही वेगळ्याच गंमतीजंमती इथे आहेत. जोडीला मुख्य अभिनेत्यांचे चांगले परफॉर्मन्सेस आहेत. वेगवान कथानकही आहे आणि दमदार संवादही.

एकच गोष्ट जी खूपच खटकली ती म्हणजे अर्शद वारसीच्या जागी अक्षय कुमार. अक्षयने चांगलंच काम केलं आहे आणि तो कुठेही अर्शदपेक्षा कमीही पडलेला नाही, हे खरं पण अश्या रिप्लेसमेन्ट्स इंडस्ट्रीची स्टारशरणता दाखवतात. समजा उद्या तिसरा भागही आला आणि त्यात पुन्हा वेगळा अभिनेता 'जॉली'च्या भूमिकेत असला, तर वेगळी गोष्ट. पण आजचा विचार करता, जी कमाल अर्शदने पहिल्या भागात केली होती, ते आठवता दुसऱ्या भागात त्याचा नंबर लागायला हवा होता.

असो.
सेन्सॉर बोर्डाच्या बिनडोक कारभारामुळे दोन ठिकाणी लावलेल्या कात्र्या समजून येतात. सेन्सॉर बोर्ड आपलं उपद्रवमूल्य जेव्हा शून्य करेल, तो 'सोनियाचा दिनू' असेल.

एनीवे, फायनल प्रोडक्ट काही वाईट झालेलं नाही. काही डिफेक्ट्स आहेतही, पण त्यांसकटही, जॉली आवडून घेतला जाऊ शकेल. आपण 'लाईव्ह' पाहिलेल्या एखाद्या क्रिकेट सामन्याचं पुनर्प्रक्षेपण जितकं मनोरंजन करेल, तितकं (इफ नॉट मोअर) 'जॉली एलएलबी - २' देतो.

वन्स नक्कीच वॉचेबल !

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...