Sunday, February 26, 2017

चारी मुंड्या चीत !



'घरच्या मैदानावर साधारण अडीच दिवसांत ३३३ धावांनी पराभव'.

ह्या वरच्या ओळीत खरं तर 'दारुण' शब्दही टाकायला हवा. पण तो फारच नकारात्मक आहे. म्हणून टाळतो. पण हा एक 'वेक अप कॉल' आहे. जो आपल्याला अधूनमधून लागतच असतो. थोडंसं यश मिळालं की आपण हुरळून जाण्यासाठी मशहूर आहोतच ! आपला कप्तान, आपले फलंदाज, गोलंदाज सगळेच स्वप्नील दुनियेत रममाण होऊन जात असतातच. डाराडूर झोपलेल्याच्या कानाशी भोंगा वाजावा किंवा डोक्यावर थंडगार पाणी ओतावं किंवा खाडकन् कानशिलात द्यावी, तशी जाग ह्या ३३३ धावांच्या फरकाने येईल का ?

I hope, Yes. येईल.

कप्तानाने आपल्या माजातून बाहेर येऊन स्मिथच्या डावपेचांचा अभ्यास करायला हवा. तेज गोलंदाजांना तो ३-३, ४-४ ओव्हर्सचेच स्पेल्स देत होता. ओ'कीफचा एंड बदलल्यावर त्याने ६ विकेट्स काढल्या. हे का ? कसं ?
फलंदाजांनी लक्ष्मणच्या वॉर्न आणि इतर उत्तम स्पिनर्सविरुद्धच्या अनेक वर्षांच्या बॅटिंगचा अभ्यास करायला हवा. काही नाही तर, ह्याच पीचवर स्मिथने कशी बॅटिंग केली आणि आपण कशी केली हे पाहायला हवं. कसं फूटवर्क होतं. माझ्या मते स्पिन होणाऱ्या खेळपट्टीवर थोडंसं across the line खेळणं बरं. स्वीप वगैरे सढळ वापरायला हवे. सरळ बॅटनेच खेळत राहिलं तर एखादा उसळणार, सरळ जाणार, हातभर वळणार, खाली बसणार असतोच. मग आयतंच गिऱ्हाईक बनायचा धोका ! माझं चूकही असेल. पण ह्यांचं तरी कुठे बरोबर ठरलंय ?

स्पिनर्सनी पाहायला हवं की त्या ओ'कीफने अशी काय जादू केली, जी आपल्याला जमली नाही ? त्याच्या चेंडूची गती, लेंग्थ व लाईन, बघा की जरा. तुमच्याकडे अनुभव आहे, कौशल्य आहे, घरचं मैदान आहे, अजून काय हवं ?



ऑस्ट्रेलियासारखा चिवट प्रतिस्पर्धी संघ मिळालेली आघाडी सहजासहजी हातातून जाऊ देणार नाहीय. ते काही आपल्यासारखी नांगी टाकणारे नाहीत. तुम्ही जसे कॅचेस टाकले, मूर्खासारखे शॉट खेळले, बिनडोकासारखे रिव्ह्यू वापरले तसे काही ते करणार नाहीत. त्यामुळे सिरीजवर पकड मिळवायची असेल, तर चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत हे नक्की करायलाच हवं.
नुसतेच खेळपट्टीचे सापळे लावून उपयोग नाही.
सापळा लावून उंदीर पकडता येतो, कांगारू नाही. आपण त्या सापळ्यात अडकलो कारण उंदरासारखे भ्यालो.

Having said this, पुढच्या सामन्यासाठी लगेच खेळपट्टीचं स्वरुप बदलू देऊ नये. भारतात खेळताय तर वळू द्या चेंडूला चांगला हात-हातभर. आपण जेव्हा बाहेर जातो, तेव्हा आपल्यालाही ते हिरव्या खेळपट्ट्या देतातच की ! हे टेस्ट क्रिकेट आहे. इथे असंच पाहिजे. इथेसुद्धा फलंदाजांसाठी काही आव्हान नसेल, तर सरळ बोलिंग मशीन्सकडूनच बोलिंग करवा की !
चूक पूर्णपणे आपल्या इम्प्लीमेंटेशनचीच होती, हे समजायला हवं. १०५ मध्ये ऑल आऊट आणि ११ रन्समध्ये ७ विकेट्स, असली हाराकिरी, असले घपले ऑस्ट्रेलियासमोर खपून जाणार नसतातच. त्यामुळे हा निकाल अगदी अटळच होता.
आपल्याला अति-आत्मविश्वास नडला आहे, बाकी काही नाही.

पण.... हरलेल्या प्रत्येक मॅचमध्ये मन जिंकायची एक संधी दडलेली असते. एकाही भारतीयाला ती साधता आली नाही, ह्याचं दु:ख जास्त आहे.
हार-जीत तो होती रहती हैं. पण हरणंसुद्धा असं असायला हवं की जिंकलेल्यालाही काही तरी कमावल्यासारखं वाटावं. हरण्याआधीच हरलं, तर काय लढलो ? आपल्याच घरात, आपल्या मनासारख्या पीचवर, दुनियेतला नं.१ चा बोलर आणि नं. १ चा बॅट्समन घेऊन आपण खेळतोय आणि तोंड लपवायलाही जागा उरु नये?
करीयरची पाचवी मॅच खेळणारा कुणी तरी एक परदेशी खेळाडू आपल्या नाकावर टिच्चून २० पैकी १२ विकेट्स घेतो आणि आपल्या नं. १ बोलरला इनिंगमध्ये पाचसुद्धा जमू नयेत? तेही पूर्णपणे फेवरेबल कन्डिशन्स असताना ! आजची रात्र झोप हराम झाली पाहिजे ह्यामुळे !

There is something miserably wrong with the attitude, nothing else.

थंड डोक्याच्या धोनीचा परिपक्व शांतपणा अश्या वेळी खूप किंमतीचा वाटतो. विजय असो की पराजय, तो पचवायला लागतो. सलग १९ सामन्यांतले विजय जर पचवलेले असते, तर ह्या २० व्या सामन्यात पित्त बाहेर आलं नसतं.
धोनीच्या कसोटीतून निवृत्त होण्याच्या निर्णयाचं मला इतकं दु:ख नव्हतं झालं जितकं जास्त दु:ख विराट कोहलीसारखा उथळ कर्णधार असणार आहे, ह्याचं झालं होतं. धोनी टेस्ट क्रिकेटमध्ये फार काही चांगला नव्हताच. पण सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटला जी आक्रमकता शिकवली, ती कायम ठेवत धोनीने त्याच्या कुवतीनुसार व मिळालेल्या थर्डक्लास खेळाडूंकडून होणार होतं तितकं करून घेऊन चांगले काम केले. धोनी मैदानावर कधीच कुठल्याच वादात, शाब्दिक चकमकींत आला नाही. प्रतिस्पर्धी खेळाडूही त्याच्या वाटेला कधी जात नसत. पण विराट तसा वाटत नसे. तो वादप्रिय वाटायचा. असं वाटायचं की त्याला आवड आहे, भांडणं करायची, प्रतिस्पर्धांना चिथवायची. एका कर्णधारासाठी हे कितपत चांगलं आहे माहित नाही. कारण असाच रिकी पॉन्टिंगसुद्धा होता, पण तो यशस्वी ठरला कारण त्याच्या ताफ्यात तसे खेळाडूसुद्धा होते. आपल्याकडे आनंदीआनंद आहे. त्यामुळे त्याचा कित्ता कोहलीने गिरवू नये, असं वाटायचं.
पण thankfully नंतर कोहली बराच 'टोन डाऊन' झाला.
तरी अजूनही हवी तितकी परिपक्वता त्याच्याकडून दिसत नाहीच. कारण there is a thin line between AGGRESSION and ARROGANCE, जी बहुतेक तरी तो अजून शोधतोच आहे. त्याला ती समजलेली असती, तर आपण ऑस्ट्रेलियाला इतकं किरकोळ लेखलं नसतं.

असो.
Not the end of the world. As I already said, खूप मेहनतीने आणि जिगर दाखवून ह्यापुढे खेळावं लागेल, जर सिरीज परत ओढायची असेल तर. त्यासाठी हवा असलेला शांतपणा कोहलीने कुंबळेकडून उधार घ्यावा किंवा धूर्तपणा धोनीकडून घ्यावा. पण घ्यावा.
फलंदाजीत करायचा बदल लक्ष्मणकडून शिकावा किंवा स्मिथकडून चोरावा, पण बदल करावा.

४-० वगैरे अंदाज हास्यास्पदच होते. इथून पुढे २-१ किंवा २-२ तरी जमतंय का पाहावं. ३-१ करता येऊ शकेल, पण त्यासाठी Controlled aggression नावाचा धूर्तपणा तरी असायला हवा किंवा नशिबाची जोरदार साथ तरी. अल्लाह मेहरबान, तो गधा पहलवान !
But then, in sport the always say.. Fortune favors the brave.

बघू, कोण शौर्य दाखवतंय इथून पुढे..!!

एक मात्र निश्चित. हा नुसता पराभव नाही. '२० सामन्यांत पहिलाच तर हरलेयत' इतकं साधं सरळ नाही. ८५ वर्षांत न उडालेली धूळधाण आहे ही. स्वत:च्याच घरात यजमानाचा झालेला अपमान आहे हा. स्वाभिमान डिवचला जावा, जिव्हारी लागावा असा मानहानीकारक पराजय आहे हा.
चारी मुंड्या चीत करणारा.

- रणजित पराडकर


No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...