Monday, June 02, 2014

हाथ आया, पर मूंह न लगा !

परविंदर अवानाने अजून एक मरतुकडा आखूड चेंडू टाकला आणि मनीष पांडेने तो सीमापार टोलवला. माझा संयम सुटला आणि मी हातातला रिमोट जोरात स्वत:च्याच मांडीवर हाणला आणि मग स्वत:च कळवळलो. मांडीवर वळ उठला. पंजाबच्या मनावरही असाच एक वळ उठला असणार कालची फायनल हरल्यानंतर. स्वत:च स्वत:ला मारून घेतल्याची खूण म्हणून.

वृद्धिमान साहाने त्याची आजवरची सर्वोत्कृष्ट ट्वेंटी२० खेळी करून, ह्या अत्यंत महत्वाच्या सामन्यात पंजाबला २०० पर्यंत नेलं होतं. खरं तर पहिल्या दहा षटकांनंतर केवळ ५८ धावा फलकावर असताना अंतिम धावसंख्या २०० पर्यंत जाईल अशी अपेक्षा धरणं म्हणजे लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने विजयाची आस ठेवण्याइतकं अशक्य वाटत होतं. पण मैदानात राहुल गांधी नव्हता, साहा होता आणि जोडीला अजून गुणवान खेळाडू मनन वोहरा. अशक्यप्राय वाटणारी धावसंख्या उभारून देऊन ह्या दोघांनी आपल्या संघाची बाजू मजबूत केली.
अंतिम सामन्यात २०० धावा पोतडीत असणं म्हणजे महिन्याच्या शेवटच्या तारखेस बँकेत अख्खा पगार तसाच असणे. पण गोलंदाजांनी पहिल्या षटकापासूनच उधळपट्टी सुरु केली आणि एका दिवसात अख्खा पगार खर्च केला.

आपल्या मर्यादा ओळखून गोलंदाजी करणे, हे ह्या आजच्या क्रिकेटमध्ये अत्यंत महत्वाचे झाले आहे.
फलंदाजांनी नवनवे फटके शोधून त्यावर हुकुमत मिळवली आहे. चेंडू टोलवत असताना मनात किंतु-परंतु नसतो. खेळपट्ट्या कतरिना कैफच्या गालांसारख्या चिकन्या असतात. सीमारेषा पूर्वी 'कानून के हाथ'सारख्या लांब असायच्या, आता घराच्या अंगणापेक्षाही लहान वाटतात. क्षेत्ररक्षणाच्या मर्यादा बैलाला मोकळं रान मिळावं, तसं फलंदाजांना मोकाट सोडतात. थोडक्यात गोलंदाजाची एकही चूक पोटात घालायचा मोठेपणा आता ह्या खेळात राहिलेला नाही. असे असतानाही अवानासारख्या गोलंदाजाने आखूड मारा करणे म्हणजे 'बजाज सनी'वर ट्रिपल सीट घेऊन घाट चढायचा प्रयत्न केल्यासारखंच !

दोन संघांतला महत्वाचा फरक त्यांच्या कर्णधारांत होता, असंही मला वाटलं. फिरकी गोलंदाजांना हाताळण्यासाठी कर्णधाराकडे सिंहाची हिंमत हवी आणि हत्तीचं काळीज. जॉर्ज बेली हा एक गुणी खेळाडू आहे, चांगला कर्णधारही आहे. पण एक कर्णधार म्हणून त्याचे शौर्य चित्त्यासारखं आहे. चित्त्याने शिकार केली, तरी ती त्याच्याकडून इतर शिकारी प्राणी हिसकावून घेतात आणि तेव्हा चित्ता लगेच माघारही घेतो.
लेगस्पिनर करणवीर सिंगला युसुफ पठाणने एक षटकार ठोकला. पुढच्याच चेंडूवर अजून एक षटकार ठोकण्याच्या नादात तो जवळजवळ बादही झाला होता, पण नशीब बलवत्तर म्हणून तो फटकाही थोडक्यात सीमारेषेवरून गेला. विकेट मिळवण्याची संधी निर्माण करत असूनही बेलीने सिंगला पुढचे षटक दिले नाही.
सर्व गोलंदाज मार खात असताना, कोलकाताच्या फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीने मदत केल्याचे पाहिलेले असताना, स्वत:चेही दोन्ही फिरकी गोलंदाज चांगले चालत असताना बेलीने १-२ षटकं मॅक्सवेलकडून करून बघायला हवी होती. २० षटकी क्रिकेटमध्ये धोका पत्करायची हिंमत असलेला कर्णधार जास्त यशस्वी ठरतो, असं मला वाटतं. काय झालं असतं ? मॅक्सवेलच्या लॉलीपॉप ऑफस्पिनवर पांडे, पठाण तुटून पडले असते ? ते तर सगळ्यांवरच तुटून पडत होते ना ! आणि ह्याच नादात एखादी महत्वाची विकेट हाती लागली असती तर ? आणि समजा मॅक्सवेलचे चेंडू वळले असते तर ? जर-तरचा हिशेब न संपणारा असतो. पण तो आजमावून पाहाणं जास्त आवश्यक असतं. इथेच धोनी सर्वश्रेष्ठ कर्णधार ठरतो. जुगार खेळायला तो नेहमीच उत्सुक असतो. इतक्या विश्वासाने तो 'ब्लाईन्ड' खेळतो की समोरच्याकडे तीन एक्के असले तरी तो क्षणभर बुचकळ्यात पडतो. गंभीरने संपूर्ण स्पर्धेत सुनील नारायणला अखेरच्या षटकांत गोलंदाजी दिली आहे. फिरकीपटूला, मग तो गूढ, अगम्य नारायण असला तरी मला नाही वाटत बेली किंवा इतर कुणाही परदेशी कर्णधाराने हाणामारीच्या षटकांत चेंडू सोपवला असता. पण हा धोका पत्करणे, ही गंभीरची सगळ्यात महत्वाची व यशस्वी खेळी ठरली. अनेक सामने कोलकाताने ह्या अखेरच्या षटकात नारायणने फलंदाजांची जी घुसमट केली, त्यामुळे जिंकले. तीन फिरकीपटू घेऊन जेव्हा एखादा कर्णधार उतरतो, तेव्हा त्याची आक्रमकताच अर्धी लढाई जिंकून जाते. जिगर लागते तीन फिरकीपटू खेळवायला.
And T20 is all about जिगर.

वाईट वाटलं पंजाबसाठी. अगदी मनापासून वाईट वाटलं. जीव तोडून खेळले होते. पण अखेरच्या टप्प्यात कमी पडले. आता पुन्हा पुढच्या वर्षी शून्यापासून सुरुवात करावी लागेल. तेव्हा तरी ह्यावेळी केलेल्या चुका परत होऊ नयेत. कारण एकही चूक पोटात घालण्याचं मोठेपण आता ह्या खेळात राहिलेलं नाही ! 

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...