Sunday, May 22, 2016

सरबजीत - एक जखम (Movie Review - Sarbjit)


पाकिस्तानच्या जेलमध्ये शब्दश: सडत पडलेल्या सरबजीतच्या हातावरून एक मुंगळा फिरतो आहे. तो त्याला नुसता पाहतो आहे. इतक्यात कोठडीचा बाहेरचा दरवाजा करकरतो. कुणी तरी आत येणार असतं. सरबजीत लगबगीने पाणी प्यायचा भांड्याखाली त्या मुंगळ्याला झाकून ठेवतो. 'शोले'तला गब्बर हातावर फिरणाऱ्या माशीला मारतो, तसा सरबजीत त्या मुंगळ्याला मारणार नसतोच. कारण तो स्वत:सुद्धा एका परमुलुखात चुकून घुसलेला असतो किंवा कदाचित हवा आणि उजेडही जिथे चोरट्या पावलांनी येतात अश्या त्या कोठडीत त्याला सोबत म्हणूनही तो मुंगळा काही काळ पुरणार असेल. कुणास ठाऊक नक्की काय ! दिग्दर्शक ते उलगडत बसत नाही. तो विचार आपल्याला करायचा आहे.

'सरबजीत' एकदा पाहाण्यासारखा नक्कीच आहे. दिग्दर्शक ओमंग कुमारचा पहिला सिनेमा 'मेरी कोम' ठीकच वाटला होता. प्रियांकाने तो चांगलाच उचलून धरला होता. पण इथे मात्र मुख्य भूमिकेतल्या ऐश्वर्या राय-बच्चनला दिग्दर्शकाने उचलून धरलंय. सुरुवातीला ऐश्वर्याचा अत्याभिनय (Over acting) डोक्यात गेला. नंतर नंतर ती जरा सुसह्य होत गेली. पण तरी ते चिरक्या आवाजात बोलणं काही जमलं नाहीच आणि वयस्कर स्त्री म्हणूनही तिला काही सहजपणे वावरता आलं नाही असं वाटलं. दुसऱ्या इनिंगची सुरुवात आत्तापर्यंत तरी ऐश्वर्यासाठी सामान्यच ठरली आहे.

सरबजीत सिंग चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात गेला होता. दारूच्या नशेत त्याच्याकडून ही चूक घडली. ह्या एका चुकीमुळे त्याचं अख्खं आयुष्य बरबाद झालं. ही आपल्याला ज्ञात असलेली त्याची कहाणी. जे दिसतं तेच सत्य असतं आणि जे सत्य असतं ते कधी न कधी दिसतंच, ह्यावर माझा तरी फारसा विश्वास नसल्याने, खरं खोटं देव जाणे. पण ह्या सरबजीतला पाकिस्तानात बॉम्बस्फोट केल्याच्या आरोपावरून डांबून ठेवले गेले. त्याच्यावर अनन्वित अत्याचार तर झालेच, पण त्याचा शेवटही भयंकर होता. इथे आपण अजमल कसाब आणि अफजल गुरू ह्या दहशतवाद्यांना फाशी दिले आणि तिथे त्यांनी सरबजीतला जेलमध्येच हल्ला करून ठार मारलं. त्याचा उघडपणे खून करून बदलाच घेतला एक प्रकारे. त्याच्यावर ठेवलेले बॉम्बस्फोटाचे आरोप खोटे ठरले असतानाही, त्याला सुटका मिळाली नाही. लपलेलं सत्य जरी काही वेगळं असलं, तरी दिसणारी अमानुषता खूपच संतापजनक आहे.

सरबजीतच्या हालअपेष्टा रणदीप हुडाने फार अप्रतिम सादर केल्या आहेत. भूमिकांच्या लांबीचा विचार केला, तर सिनेमा ऐश्वर्यावर - सरबजीतच्या मोठ्या बहिणीवर - बेतला आहे. मात्र रणदीप हा एक हीरा आहे. तो लपत नाहीच. सिनेमा येण्याच्या खूपच आधी, त्याचा एक फोटो आला होता. 'सरबजीत'च्या गेटअप मधला. रस्त्यावरच्या रोगट भिकाऱ्यासारखा दिसणारा तो माणूस रणदीप हुडा आहे, हे समजायलासुद्धा वेळ लागत होता. ह्या गेट अपसाठी त्याने खूप वजनही कमी केलं. त्याची घाणीने पूर्ण भरलेली नखं, पिंजारलेले केस, किडलेले दात, अंगावर पिकलेल्या जखमा, खरुजं, गालिच्छ पारोसा अवतार, कळकट फाटके कपडे वगैरे असं आहे की जे आपल्याकडे ह्यापूर्वी कधीच कुठल्या सिनेमात दाखवलं नाही. सिनेमात दाखवलेल्या अमानवी अत्याचारांचा विचार करता, त्याचं तसं दिसणं किती आवश्यक आहे हे समजून येतं. ते सगळं पडद्यावर पाहणं भयंकर आहे.


अनेक वर्षांनंतर सरबजीतला भेटायला त्याची बहिण, बायको व दोन मुली पाकिस्तानात जेलमध्ये येणार असतात. त्याला फाशीची शिक्षा सुनावलेली असते. पंधरा दिवसांवर फाशी आलेली असताना, तो आपल्या कुटुंबाला भेटणार असतो. 'आपल्या घरचे येत आहेत' हे समजल्यावर आनंदाला पारावर न उरलेला सरबजीत आपली छोटीशी कोठडी स्वच्छ करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो. घाणीचं भलंमोठं भांडं कांबळं टाकून झाकतो. थोडंसं पाणी असतं, अंगातले कपडे त्यात भिजवून ती घाणेरडी कोठडी पुसून काढतो. उरलेल्या पाण्यात कशी तरी अंघोळ वगैरेही करतो. चहा बनवतो ! त्याची ती सगळी धडपड व्याकुळ करणारी आहे. प्रत्यक्ष भेटीचा प्रसंग तर हृदयाला घरं पाडणारा आहे.
नंतर त्याची फाशी स्थगित होते आणि पुन्हा कोर्टात केस उभी राहते. मग पुन्हा एकदा त्याला भेटायला त्याची बहिण येते. तेव्हा ती त्याला धीर देण्यासाठी 'तू इतकी वर्षं इथे सलामत आहेस' म्हणते. तिच्या ह्या वाक्यावरचा सरबजीतचा आउटबर्स्ट जबरदस्त आहे ! 'कोणती सलामती ? ह्या काळ्या कोठडीत मला डांबून ठेवलंय. मी इथेच हागतो, इथेच मुततो, इथेच बाजूला बसून असतो, जेवतो, झोपतो.. एक जमाना झाला मला कुणी मिठी मारलेली नाही. कुणी बोलायला येत नाही' वगैरे त्याचं बोलणं अक्षरश: ऐकवत नाही ! अंगावरच येतं !
एकूणच रणदीपचं काम जीव पिळवटणारं आहे. एखाद्या व्यक्तिरेखेत शिरून तिला सादर करू शकण्याची अभिनय क्षमता आणि त्याच्या जोडीनेच उत्तम शरीरयष्टी, असा वेगळाच कॉम्बो त्याच्याकडे आहे. जो इतर कुणाकडेही नाही. 'मै और चार्ल्स' मध्ये त्याने चार्ल्स शोभराज ज्या बेमालूमपणे उभा केला होता, त्याच बारकाईने तो सरबजीत साकार करतो. त्याची हताशा, वेडगळपणा, वेदना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कळकटपणा त्याने आपलासा केला आहे. सरबजीतला न्याय मिळाला नाहीच, पण रणदीपने भूमिकेला मात्र न्याय दिलाच आहे, ह्याबाबत वादच नाही.

रिचा चड्डानेही तिला जितका वाव मिळाला आहे, तेव्हढ्यात उत्तम काम केलं आहे. 'मसान'मध्ये एकसुरी वाटलेली रिचा चड्डा इथे विविध प्रसंगात वेगवेगळ्या छटा दाखवते. पण मुळात तिची भूमिका ऐश्वर्याच्या स्टारडमपुढे गुदमरली असल्याने ती झाकोळली जातेच.

दर्शन कुमार चा रोल छोटा, पण महत्वाचा आहे. पाकिस्तानी वकिलाच्या भूमिकेत तो मस्त काम करतो. NH10 आणि मेरी कोममध्येही त्याला कमी लांबीचीच कामं मिळाली होती आणि तिथेही त्याने चांगलंच काम केलं होतं. त्या मानाने इथे त्याला काही ठिकाणी थोडी संधी मिळाली आहे आणि ती त्याने वाया जाऊ दिलेली नाही. सरबजीतच्या खऱ्या वकीलाला आपल्या कुटुंबासह पाकिस्तान सोडून परदेशात आश्रय घ्यावा लागला होता. तिथल्या कट्टरवाद्यांनी त्याला दिलेला त्रास, 'सरबजीत'मध्ये थोडासाच दिसतो. पण त्यावरून साधारण कल्पना येते.

ऐश्वर्याचे काही टाळीबाज संवादांचे सुमार प्रसंग वगळले, तर संवादलेखनही (उत्कर्षिनी वशिष्ठ) मला अत्यंत आवडलंय. अतिशय अर्थपूर्ण व नेमके संवाद आहेत.
आजकाल एकाच सिनेमाला सहा सात जण संगीत देत असल्याने चांगलं काम कुणाचं आणि वाईट कुणाचं समजत नाही ! ओव्हरऑल संगीतसुद्धा चांगलं वाटलं. मुख्य म्हणजे अनावश्यक वाटलं नाही.

ओमंग कुमार ह्यांनी हा विषय निवडल्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन करायला हवं. सरबजीत प्रत्यक्षात कोण होता ? सामान्य माणूस की हेर किंवा अजून कुणी, हा विषय वेगळा. पण त्याने एक भारतीय असल्याची भारी किंमत मोजलीच आहे. त्याच्या यातनांना ओमंग कुमारने लोकांपर्यंत पोहोचवलं आहे. ऐश्वर्याच्या जागी एखादी सकस अभिनय क्षमता असलेली ताकदीची अभिनेत्री असती, तर कदाचित खूप फरक पडला असता.


सरबजीत तर आता राहिला नाही. फक्त त्या नावाची एक जखम राहिलेली आहे. खपलीखाली अजून ओलावा आहे. 'ह्या निमित्ताने लोकांना बाजीराव पेशवा समजला' सारखे युक्तिवाद करणारे लोक ह्या निमित्ताने ही जखमही समजून घेतील. कदाचित असे किती तरी सरबजीत आजही खितपत पडले असतील किंवा संपूनही गेलेले असतील. त्या सगळ्यांना नाही, तर त्यांतल्या काहींना तरी जाणून घेण्याचा प्रयत्न होईल.
हेही नसे थोडके !

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर 

Sunday, May 15, 2016

सिनेमा

सिनेमा.

मी सिनेमा का बघतो ? किंबहुना 'आम्ही सिनेमा का बघतो ? तो बघितला काय आणि नाही बघितला काय, आमच्या आयुष्याचा रहाटगाडा आम्ही असाच ओढत राहणार असतो. मग काही शे रुपये खर्चून, तीन साडे तीन तास देऊन आम्हाला हशील काय होत असतं ?
हे प्रश्न सिनेमा न पाहाणाऱ्यांना पडत असतील. आम्हालाही क्वचित कधी तरी पडतात. रिकाम्या वेळेचा चाळा म्हणून आम्ही अश्या विषयांवर तथाकथित विचारमंथन करत असतो. ह्यातूनही हशील काहीच होत नाही, पण रिकाम्या वेळचा एकटेपणा जरा लौकर निघून जातो.

बाकी काही नाही.
एव्हढ्यासाठीच आम्ही विचार करतो.

माझ्यासारख्या अगणित सामान्य माणसांसाठी 'सिनेमा' ही एक देणगी आहे.
तिथं दिसणारं बरचसं आम्हाला नेहमीच हवं असतं, पण मिळणं दुरापास्त असतं. आम्हाला दहावीनंतर हव्या त्या कॉलेजात प्रवेश मिळण्याचंही भाग्य नसतं, पण सिनेमातला तो किंवा ती मात्र हवा तो कोर्स, हवी ती डिग्री उत्तमोत्तम गुणांनी अगदी सहजपणे मिळवतात. त्याला त्याच्यावर प्रेम करणारी हमखास मिळते आणि ती नाकी डोळी इतकी नीटस असते की अशी जी मुलगी आमच्या कॉलेजात असे, तिच्यापासून आम्हीच 'हे आपल्या लेव्हलचं नाही' हे उमजून सुरक्षित अंतर ठेवत असू. त्याची पिळदार देहयष्टी आणि आमची नुसतीच पिळलेली यष्टी. त्याचा दाढी वाढलेली असतानाही स्वच्छ दिसणारा चेहरा आणि आमचं अंघोळ करून बाहेर आल्या क्षणापासून चिकट, तेलकट वाटणारं थोबाड. त्याला जमीन, हवा व पाण्यातल्या सर्व प्रकारच्या गाड्या व्यवस्थित चालवता येत असणं आणि आम्ही बुलेटवर मागे बसतानाही सावरुन/ बावरुन बसणं.
- अश्या लहान-सहान अनेक गोष्टी ज्या पडद्यावर त्याला किंवा तिला मिळतात/ जमतात त्यांत आम्ही आपलाच पूर्ततेचा आनंद मानत असतो.
तिथले 'घर' नावाचे मोठमोठे महाल, गडगंज श्रीमंत कुटुंबं, जीवाला जीव देणारे मित्र सगळं सगळं आम्हाला आपलंच वाटतं.

काही सिनेमे जरा रिअलिस्टिक असतात. पण त्यातही आम्हाला अप्रूप असतं कारण पडद्यावर घडणारी कहाणी आमच्या सपक आयुष्यापेक्षा खूपच मसालेदार असते. आमची ष्टोरी आम्हाला स्वत:लाही ऐकावीशी कधी वाटत नाही. ती इतकी कंटाळवाणी असते की रात्री बिछान्यावर पहुडलं असताना, जर झोप येत नसेल तर आम्ही 'आज काय घडलं' ह्याची उजळणी करायचा प्रयत्न करतो. अर्धा दिवसही आठवून होत नाही आणि झोप लागते.
पडद्यावरच्या व्यक्तिरेखांच्या यातनासुद्धा आम्हाला खरं सांगायचं तर हव्याहव्याश्या वाटतात. त्यांच्या असामान्य दु:खाच्या बिलोरी आरश्यात आम्हाला आमच्या नीरस आयुष्याचं प्रतिबिंब क्षणभर उजळवून पाहावंसं वाटतं. कहाणी शोकांतिका असेल, तर 'हे असं घडू शकतं' म्हणून आम्ही चक्क देवाचं अस्तित्वही नाकारतो. मग थोड्या वेळाने जाणीव होते की 'आपलं असं घडणार नाहीय' आणि पुन्हा देवाच्या अस्तित्वावर विश्वास दृढ होतो.

कधी आम्हाला तिथे असं काही दिसतं, जे आम्ही आमच्याच मनापासून लपवून ठेवलेलं असतं. ते असं एखादं सत्य असतं, ज्याच्या नजरेत नजर टाकून पाहायला आम्हीच कचरत असतो. मनाच्या डायरीत नकळतपणे आम्ही एखादी नोंद करून ठेवलेली असते. ते पान फाडायचंही नसतं आणि उलटून पाहायचंही नसतं. एखाद्या अन्प्लेएबल चेंडूवर जेव्हा एखादा फलंदाज सपशेल फसून आउट होतो, तेव्हा त्याला जे वाटत असतं, तेच आम्हाला हे सिनेमे जाणवून देतात. आमची विकेट उडालेली असते. आमचा तथाकथित अभेद्य बचाव भेदला गेलेला असतो. पण तोंडावर आपटणारं अपयश झटकून पुन्हा पुढच्या इनिंगला जसा तोच फलंदाज गार्ड घेऊन स्टान्स घेतो, तसेच आम्हीही पुन्हा पुढच्या सिनेमासाठी तयार असतोच.

सिनेमा आम्हाला सफरी घडवतो. त्या विविध स्थळांच्याच नसतात, तर विविध काळांच्या, संस्कृतींच्या असतात. विविध व्यक्तिरेखांच्या जागी सिनेमा आम्हाला उभा करतो आणि त्यांच्या भावविश्वाच्या सफरी घडवतो. आयुष्याच्या नऊ रसांच्या सफरी सिनेमा आम्हाला घडवतो. पडद्यावर उधळल्या जाणाऱ्या त्या नवरसांपैकी सर्वच रसांचा आस्वाद आम्ही त्या पडद्यामुळेच घेत असतो, एरव्ही ह्यातले काही रस आम्ही ऑप्शनला टाकलेले असतात किंवा त्यांची चव आम्हाला आम्हीच सभोवताली व स्वत:च्या आतही निर्माण केलेल्या कल्लोळात, गडबडीत, धावपळीत, काल्यात समजूनच आलेली नसते किंवा येणार नसते.

डोळे भरभरून आम्ही तंत्रज्ञानाच्या करामती पाहतो. आम्हाला स्वत:ला एक पॉवर पॉइन्ट प्रेझेन्टेशनसुद्धा नीटनेटकं जमत नसलं, तरी स्पेशल इफेक्ट्सचे बारकावे मात्र आम्ही हेरून काढत असतो. कधी त्याला दाद देत असतो तर कधी हाणतही असतो. असंच पडद्यावरच्या कलाकारांबाबतही. शाळेच्या गॅदरिंगमधल्या किरकोळ नाटिकेत 'कोपऱ्यात उभं असलेलं झाड' वगैरेचे रोल केल्याचा अनुभव गाठीशी असलेले आम्ही सिनेमातल्या प्रोटोगॉनिस्टच्या अभिनयाचा खरपूस समाचारही घेत असतो. बाथरुमबाहेर कधी आम्ही गुणगुणत नसतो किंवा पुलंनी सांगितल्याप्रमाणे 'उगीच का' मधला 'उ' कुठे वाजतो, हेही आमच्या गावी नसतं, पण सिनेमाच्या संगीतावर विशेष टिप्पणी मात्र हक्काने करतो. हे सगळं वृथा आहे, आमच्या मताला काही एक किंमत नाहीय, हेही आम्हाला माहित असतं. पण आमच्या मताला किंमत नसल्याची सवय आम्हाला आमच्या रोजच्या आयुष्याने आधीच लावलेली असते. त्यामुळे आमचे शब्द नुसतेच हवेत उडाले, तरी त्याचं वैषम्य आम्हाला तरी वाटत नाही.

सिनेमा खोटा असतो. अगदी १००% खोटाच असतो. भले तो कितीही वास्तववादी असला, तरी खोटाच असतो. हे आम्हाला तो पाहण्याआधी आणि पाहिल्यानंतरही माहित असतं. पण तो पाहत असताना मात्र आमच्यासाठी खराच असतो. ते २-३ तास आम्ही आमच्या रोजच्या आयुष्यापेक्षा वेगळे असतो. कधी दु:खी असतो, कधी आनंदी. पण जे काही असतो, ते एरव्ही नसतोच. आम्ही आमच्या आयुष्याचे हिरो/ हिरोईन नेहमीच असतो. पण आम्ही हे २-३ तास अजून एका आयुष्याचेही हिरो/ हिरोईन होण्याचा प्रयत्न करत असतो. जो कधी जमतो, कधी नाही जमत. तरी सिनेमाने त्याचं काम केलेलं असतं. आम्हा सामान्य माणसांच्या सामान्य आयुष्याला आमच्याचपासून काही काळासाठी का होईना बाजूला ठेवलेलं असतं. विश्रांती म्हणून एखाद्याने डोक्यावरचं ओझं खाली ठेवून काही मोकळे श्वास घ्यावे आणि पाण्याचे चार-दोन घोट घ्यावेत अन् मग पुन्हा एकदा ते ओझं तसंच डोक्यावर घेऊन पायपीट सुरु करावी, तसे आम्ही सिनेमाला पाहतो आणि पुन्हा हमाली सुरु करतो.

बाकी काही नाही.
एव्हढ्यासाठीच आम्हाला सिनेमा आवडतो.

- रणजित पराडकर

Saturday, April 30, 2016

नागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)

'फॅण्ड्री' च्या शेवटी जब्या आणि त्याचं पूर्ण कुटुंब डुक्कराच्या मागे लागलेले दाखवले आहेत. त्यांची आणि डुक्कराची ती धडपड, पळापळ बराच वेळ चालते. पळून पळून जब्याचा बाप इतका दमतो की त्याच्या अक्षरश: छातीचा भाता होतो. ही सगळी पळापळ हळूहळू करत जब्याच्या शाळेभोवतीच्या परिसरात येते. मग जब्या त्याचे सवंगडी आणि 'ती'च्यापासून स्वत:चं तोंड लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहतो. त्या प्रयत्नात १-२ वेळा पकडता येऊ शकणारं डुक्कर निसटतं. बाप खूप शिव्या घालतो. अखेरीस जब्या परिस्थितीला शरण जातो आणि आपलं हे अस्तित्व स्वीकारतो. त्याची लव्ह स्टोरी त्याच्या कधीही न वाचल्या जाऊ शकणाऱ्या एका कागदोपत्री फुटकळ इतिहासात जमा होते आणि त्या लव्ह स्टोरीचा पूर्णविराम म्हणून तो एक दगड थेट आपल्याकडे - कॅमेऱ्याच्या दिशेने - फेकतो. कहाणी संपते. बराच वेळ चाललेला डुक्कर पकडण्याचा प्रसंग ठळकपणे लक्षात राहतो. लक्षात राहते जब्याची केविलवाणी धडपड आणि त्याच्याहीपेक्षा केविलवाणा त्याचा बाप. 'फॅण्ड्री' मधला हा शेवटचा प्रसंग चालतो बराच वेळ, पण तरी तो लांबलेला वाटत नाही. किंबहुना 'फॅण्ड्री' एकूणच ची लांबी हे त्याचं एक बलस्थानच होतं. जेमतेम शंभर मिनिटं - साधारण पावणे दोन तास फक्त - चालते ती कहाणी.
'फॅण्ड्री' चं अजून एक बलस्थान होतं 'नाविन्य'. ती एक अशी कहाणी होती, जी कुणी कधी ह्यापूर्वी सांगितली नव्हती. कुणाला ते कदाचित पेलणारंच नव्हतं. 'हे दाखवून काय मिळणार आहे', असाच विचार त्यामागे असावा, कारण ती कहाणी कुणाला माहित नव्हती किंवा कुणी पाहिलेली नव्हती, असं तर नक्कीच नव्हतं. नागराज मंजुळेंनी ते आव्हान पेललं. मी असं म्हणणार नाही की, 'त्यांनी तो धोका पत्करला.' त्यांना त्यात धोका वगैरे वाटायचा प्रश्नच नव्हता. कारण काही कमवण्यासाठी ती कलाकृती नव्हतीच, त्यामुळे काही गमवण्याचा किंवा न कमवण्याचा धोकाच उद्भवत नाही.
'फॅण्ड्री'मध्ये मला काय आवडलं असं मला कुणी विचारलं, तर उत्तर सोपं आहे. 'उत्कटता.' आणि ही जी उत्कटता 'फॅण्ड्री'त आहे, ती माझ्या मते तरी वरील दोन कारणांमुळे आहे.


'सैराट' ह्याच दोन बाबतींत 'फॅण्ड्री'समोर खूपच कमी पडतो.
तब्बल तीन तासांची लांबी, 'सैराट'ला खऱ्या अर्थाने पसरट करते. सुरुवातीच्या कमीत कमी एक तासाच्या चित्रपटाला जर पूर्णपणे कापून टाकलं असतं, तर काय झालं असतं, असा एक विचार मनात येतो. हा एक तास - सव्वा तासाचा सिनेमा चक्क रवी जाधवांनी केलेला वाटतो. ह्या तास - सव्वा तासात मिसरूड फुटलेली पोरं टवाळक्या करतात. समवयस्क मुलींवर लाईन मारतात. ह्या तास - सव्वा तासात किती तरी वेळा नायक-नायिका एकमेकांशी फुल्ल फिल्मी नजरानजर करतात. म्हणजे बाजूनी जाता जाता नजरा भिडवणे वगैरे..! लव्ह लेटर्स दिली जातात आणि टाका भिडतो.
मग अजय-अतुलच्या ट्रेडमार्क स्टाईलच्या बुंगाट गाण्यावर पब्लिक झिंगाट नाचतं आणि त्यानंतर खरा सिनेमा सुरु होतो.

इथून पुढचा सिनेमा क़यामत से क़यामत तक़, इशक़जादे, साथिया अश्या काही सिनेमांचं 'सुधारित मिश्रण' आहे. QSQT मध्ये खानदानी दुष्मनी असते, इथे जातीय भेद. QSQT मध्ये नायिकेकडच्या एका कौटुंबिक सोहळ्याच्या वेळी प्रेम प्रकरण उघडकीला येतं, इथेही तसंच. QSQT मध्ये दोघे जण पळून जातात आणि एका तात्पुरत्या घरात आश्रय घेतात, तेव्हा समजतं, नायिकेला तर चहासुद्धा करता येत नाही, इथेही तसंच. मग जसं 'साथिया'मध्ये नायक-नायिकेत अहंकार आड येऊन दुरावा निर्माण होतो, तसा इथेही काही मिनिटांसाठी होतं. कहाणी अपेक्षित वळणांनी अपेक्षित शेवटापर्यंत जाते. ह्या सगळ्या प्रवासात छोटे-छोटे फिल्मी योगायोगही बरेच जुळून आलेले आहेत. पळून जाण्यासाठी किनाऱ्यावर एक unattended मोटारबोट तयारच असणं, (पहिल्या वेळेस) भरपूर चोप मिळालेला असतानाही कुठे जखमा नसणं, (दुसऱ्या वेळेस) गुरासारखा मार खाऊनही किरकोळ जखमांसह पळ काढू शकणं, ज्या रस्त्याने गाडी जाणार आहे, त्याच्या बाजूलाच पोरांना बदडणं की अगदी लगेच दिसून यावं, वगैरे.

'सैराट'च्या संगीताचीही एक हवा आहे. 'अजय-अतुल' ने धूम मचवली असली, तरी सगळ्याच गाण्यांवर त्यांच्याच कुठल्या न कुठल्या गाण्याची (नेहमीप्रमाणे) छाप दिसतेच. 'झिंगाट' गाण्यावर बेभान होऊन नाचणारं अख्खं सिनेमागृह मी पाहून आलो आहे. अनेक दिवसांनंतर अशी जादू कुणी केली आहे. ह्या 'X-factor' बद्दल तर वादच नाही. गाण्यांचं संयोजनही केवळ अफलातून झालं आहे. 'हॉलीवूड'मध्ये संगीत संयोजन केलं गेलेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे. भरमसाट वाद्यांचा मेळ कसा असतो, हे समजून घेण्यासाठी भन्साळीने इकडे शिकवणी लावावी म्हणतो ! कुठेही कर्णकर्कश्य न होताही सांगीतिक भव्यता कशी असते, हे 'सैराट'ची गाणी दाखवतात. खास करून 'सैराट झालं' आणि 'याड लागलं' मधला वाद्यमेळ तर ऐकावाच.

'ऑनर किलिंग' ही उत्तर भारताच्या बऱ्याच भागांतली एक भीषण समस्या आहे. गुन्हेगारी जगतातल्या सत्यघटनांवर आधारित एका कार्यक्रमात अशीच एक कहाणी मागे पाहिली होती. 'सैराट'चं कथानक त्या सत्यघटनेवर बेतलेलं आहे. कहाणीतली सगळी वळणं आधीच कळून येतात. शेवटही माहितच असतो, पण अचूक नेम साधून शेवटाचा दगड थेट भिरकावण्याचं नागराज मंजुळेंचं कौशल्य व्यावसायिकतेचा कीडा चावल्यावरही अबाधित आहे. हा शेवट पायाखालची जमीन, डोक्यावरचं छप्पर, बुडाखालची खुर्ची सगळं बाजूला करतो. पोटातली आतडी पिळवटतो आणि डोक्यातला मेंदू बधीर करतो. डोळे थिजतात, हात-पाय गारठतात आणि ओठांना कंप सुटतो. केवळ ह्या शेवटासाठी दिग्दर्शक मंजुळे हवे होते, बाकीच्या पसाऱ्यासाठी कुणीही, अगदी कुणीही चाललं असतं.
समजा, हा चित्रपट 'फॅण्ड्री' वाल्याचा नसता, दुसऱ्या कुणाचा असता तर ?
तर हा एक महान चित्रपट असता. कितीही काहीही म्हणा, कुणी केलंय ह्यावर त्याचं मूल्यमापन ठरतंच ठरतं. जो मुलगा अभ्यासूच आहे, तो जर पहिल्या ऐवजी दुसऱ्या क्रमांकावर आला तर ते जास्त धक्कादायक असतं आणि काठावर पास होणारं एखादं दिवटं टपकलं, तरी विशेष काही घडलेलं नसतंच ! मंजुळेंचा दुसरा क्रमांक आला आहे, हे धक्कादायक आहे.
तीन तासांपैकी फक्त पाच मिनिटं मंजुळे दिसतात, एरव्ही दिसत नाहीत ही चित्रपटाची दुसरी शोकांतिका आहे. 'नागराज कमर्शियल मंजुळे' मला तरी पाहायचा नव्हता, इथून पुढेही पाहायचा नाहीय. त्यासाठी त्यांना किशोरवयीन प्रेम ह्या आजच्या मराठी चित्रपटाच्या जिव्हाळ्याच्या विषयापासून जरा वेगळं व्हावं लागेल. कारण आत्तापर्यंतच्या त्यांच्या दोन्ही चित्रपटांत हा समान धागा आहे.

नवीन चेहरे आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू आश्वासक आहेत. नायिकेच्या भूमिकेसाठी एखादा चिकना चेहरा न निवडता रफ अ‍ॅण्ड टफ रिंकू निवडणं हा मास्टरस्ट्रोक होता. आकाश ठोसरसुद्धा एकदम मातीतला वाटतो. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची निरागसता आहे. दोघेही फ्रेश असल्यामुळे कुठेही ते व्यक्तिरेखेच्या पुढ्यात येत नाहीत. नायकाच्या मित्रांच्या भूमिकेतल्या दोघांची नावं नीट कळू शकली नाहीत. (क्षमस्व) सुरेश विश्वकर्मा, सुरज पवार आणि तानाजी गालगुंडे ह्यांपैकी दोघे असावेत आणि उरलेला नायिकेचा भाऊ ! दोघा मित्रांची कामंही जबरदस्त झाली आहेत. खासकरून लंगड्या प्रदीपचं काम खूपच मस्त !

'सैराट' एकदा पाहण्यासारखा आहे. पण नागराज मंजुळेंचा चित्रपट म्हणून पाहिल्यास अपेक्षाभंग हमखास आहे. काही वेळेस संवेदनशील मनाला व्यावसायिकतेचीही एक दुसरी बाजू असते, हे एक नव्याने शिकता येऊ शकेल.

रेटिंग - * * १/२

- रणजित पराडकर

Tuesday, April 26, 2016

पाजीराव भन्साळी (Bajirao Mastani Movie - Not a Review !)

बहुचर्चित, बहुपुरस्कृत 'बाजीराव मस्तानी' परवा कुठल्याश्या वाहिनीवर लागला होता.
'बाजीराव मस्तानी' आणि 'दिलवाले' एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. त्यामुळे दोनपैकी एकच पाहायला जमणार होतं. प्रदर्शनाच्या एक आठवडाआधीच मी त्यावेळी 'दै. मी मराठी लाईव्ह'साठी लिहित असलेलं काम स्थगित करायचा निर्णय घेतला होता आणि तसं संबंधितांना कळवलंही होतं. पण मग त्यांनी मला एक शेवटचा चित्रपट 'कव्हर' करायला सांगितलं. मी 'दिलवाले' निवडला. कारण त्या काळात जितका रणवीर डोक्यात जात होता तितका शाहरुख जात नव्हता ! Eventually, 'मी मराठी लाईव्ह'ने मला 'राहू द्या' सांगितल्याने, 'दिलवाले'सुद्धा उगाच पाहिला गेला.

तर सांगायचा उद्देश हा की 'बाजीराव मस्तानी' तेव्हा टाळला नव्हता, त्यामुळे आत्ता जर फुकट पाहायला मिळणार होता तर का न पाहावा ? वेळ होता, पाहिला.
'दिलवाले' हा एक गरीब चित्रपट असेल, तर 'बाजीराव मस्तानी' दळभद्री म्हणावा, ह्या मताला मी आलो आणि शेवटचा अर्धा तास उरलेला असताना माझा संयम संपला. मी टीव्ही बंद केला.


'बाजीराव मस्तानी'ची अनेक परीक्षणं येऊन गेली आहेत. आता इतक्या दिवसांनंतर मी परीक्षण लिहिणं तसं निरर्थकच. त्यामुळे काही टिपिकल लिहित नाही. थोडेसे, जसे आठवताहेत तसे मुद्दे मांडतो. हे लहान-मोठे किस्से समजा. जे मला जाणवलं ते सांगतो.

१. भन्साळीचा चित्रपट म्हणजे भव्यतेची साक्षात व्याख्या असते. हम दिल दे चुके सनम, देवदास आणि अगदी गुजारीशमध्येही त्याने दाखवलेली भव्यता लक्षात राहणारी होती. त्यातून 'बा.म.' ऐतिहासिक चित्रपट. मग तर मोठमोठे सेट्स, भव्यता, श्रीमंती वगैरे दाखवायला आयतंच निमित्त होतं. पण सावरिया आणि राम-लीला मधले पूर्णपणे खोटे समजून येणारे सुमार सेट्स आठवले. सेट्समधली कृत्रिमता, खोटेपणा ठळकपणे जाणवत होता. गड, किल्ले, महाल, खोल्या, झाडं, पाणी, नदी, पाऊस काही म्हणता काहीही थोडंसुद्धा खरं वाटत नाही, इतकं गंडलं आहे. अत्यंत वाईट प्रकारे केलेली प्रकाशयोजना ह्यासाठी जबाबदार आहे की अजून काही, मला माहित नाही. पण जो काही End result आहे, तो शुद्ध बकवास आहे.

२. ऐतिहासिक चित्रपट म्हणजे वजनदार संवाद आले पाहिजेत. त्यांची तितकीच जबरदस्त फेकही आली पाहिजे. कसलं काय ! इथे तर सगळंच 'फेक' (Fake) ! 'बाजीराव ने मस्तानी से प्यार किया है, अय्याशी नही' हा सुमार डायलॉग संवादलेखनाची सर्वोच्च पातळी आहे. अत्यंत बाष्कळ, पोकळ, निरर्थक, सपक संवादांची तितकीच अभिनिवेशशून्य फेक 'अथ'पासून 'इति'पर्यंत ('इति' मी पाहिला नाही, पण बहुतांश पाहिला) आहे. 'पेशवीण पद म्हणजे आमराई' असे अनेक अत्यंत हास्यास्पद डायलॉग्स आपल्यावर आदळत राहतात. एका प्रसंगात काशीबाई उखाणा घेतात. त्यात 'कोहिनूर - हैं नूर' अशी यमकायमकी आहे. ह्यातला तांत्रिक दोष आज कुणालाही कळणार नाही आणि कळला तरी तो किरकोळच वाटेल. पण त्या काळात लोकांची काव्याची जाण इतकी भिकारडी नव्हती. असं सगळं ऐकता, पाहताना हसताही येत नाही. कीव येते लिहिणाऱ्याची.

३. त्याहून जास्त कीव येते गाणी लिहिणाऱ्याची. 'कडक तडक भडक झाली, चटक मटक वटक झाली, दुश्मन की देखो जो वाट लावली' (इथे 'झाली' आहे की 'साली'?) हे बाजीरावाचं शौर्यगान आहे. ह्यात वीररस असणं अपेक्षित होतं. ह्या निरर्थक आणि मवाली छाप शब्दांत कोणता रस आहे, माहित नाही. पण वीररसपूर्ण लिखाणाची ही जर सीमा असेल, तर त्या सीमेवरून गीतकाराने परत फिरूच नये. तसंच पुढे जात राहावं आणि आयुष्यात इतर सर्वांना क्षमा करावं.

४. बाजीराव, काशीबाई आणि मस्तानी. ह्या तिन्ही मुख्य व्यक्तिरेखा समस्त चित्रपट युनिटमधील कुणाला तरी समजल्या असाव्यात का, अशी शंका येते.

  • बाजीराव हा एक हाडाचा योद्धा होता. महावीर होता तो. भारताच्याच काय, जगाच्या इतिहासातील सर्वोत्तम योद्ध्यांपैकी एक बाजीराव होता. त्याचं मस्तानीसोबतचं प्रकरण हा एक वेगळा भाग आहे. पण त्यापायी तो वेडगळ झालेला दाखवायचं ? एक कर्तव्यदक्ष राजा (प्रधान) असलेला तो शेवटी शेवटी अगदी बिथरलेला दाखवला आहे. त्याची ती मनस्थिती सादर करतानाचा रणवीर सिंगचा अभिनय तर हास्यास्पदच वाटला. तो सतत दारूच्या नशेत बरळल्यासारखा बोलताना दिसतो. (की तसंच दाखवलंय, कळलं नाही.) 
  • काशीबाई एक घरंदाज स्त्री होती की पोरगेलेशी, हाही मुद्दा बाजूला ठेवू. पण बाजीरावाच्या निजामाशी वाटाघाटी सफल ठरल्या, ही बातमी जेव्हा चिमाजी घेऊन येतो, तेव्हा ती ऐकून अत्यानंदाने ती टुण्णकन् उडी मारुन सासूबाईंच्या मांडीत जाऊन बसते, हे दृश्य पाहून तर माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले. तसंच बाजीरावाचा शिरटोप वगैरे घालून 'हर हर महादेव' ओरडून त्याच्याभोवती नाचणं बागडणं म्हणजे थिल्लरपणा होता. 
  • दुसरीकडे मस्तानी. दीपिकाच्या चेहऱ्यावर मस्तानी सादर करताना कायमस्वरूपी बारा वाजलेले आहेत. ती गोरी वगैरे न दिसता चक्क 'पांढरी' दिसते. रोगट वाटते. मस्तानी जर अशी हाडाडलेली, कुपोषित, निस्तेज होती तर आम्ही इतकी वर्षं तिचं भलतंच काही तरी वर्णन वाचत आलो आहोत. 'बाजीराव म्हणून रणवीर' आणि 'काशीबाई म्हणून प्रियांका' ह्यापेक्षा 'मस्तानी म्हणून दीपिका' हे कास्टिंग सपशेल फसलेलं आहे. दीपिका सुंदर आहे. पण तिच्या सौंदर्यात दैवीपणाची झाक नाही. मस्तानीसाठी तीच अत्यावश्यक होती. 

५. भन्साळीचा अभ्यास (केला असल्यास) अगदीच अपुरा पडला आहे. ना त्याला पेशवे, मराठाकालीन, महाराष्ट्रीयन, मराठी संस्कृती समजली आहे ना व्यक्तिरेखा. महालांचे सेट्स मुघलांचेच वाटतात. कुठे तरी एक गणेश वंदना असणं अत्यंत गरजेचं होतं, इतकी साधी बाब लक्षात आलेली नाही. 'कट्यार' मध्ये 'सूर निरागस हो'नेच एक माहोल बनवला जातो. तो 'बा.म.' मध्ये बनतच नाही.
'बा.म.' ही कुठली शौर्यगाथा किंवा कुणा व्यक्तीवर आधारित चित्रपट (Not exactly Biopic) नाही. ही प्रेमकहाणी आहे आणि आपल्या कुवतीवर अचूक विश्वास ठेवत भन्साळीने ही कहाणी 'प्रेम कहाणी'च्या पुढे जाऊ दिलेली नाही. त्यामुळे अत्यंत फालतू युद्धदृश्यं माफ करून टाकावीत म्हणतो. मात्र प्रेमकहाणी तरी कुठे व्यवस्थित मांडली आहे ? कुठल्याही क्षणी बाजीराव आणि मस्तानी, राम आणि लीला बनून 'लहू मूंह लग गया..' करत तोंडात तोंडं घालतायत की काय अशी एक विचित्र अनामिक भीती सतत वाटत राहते, इतकं सगळं वरवरचं झालं आहे.

६. सरसकट सगळे लोक, अगदी मराठी नट-नट्याही 'राऊ' न म्हणता 'राव' म्हणतात ! निवेदक इरफान खान 'बाजीराव बल्लाड' असा अगदी सुस्पष्ट उच्चार करतो. तेव्हा मात्र 'च' आणि 'भ' चे पाढे मनातल्या मनात सुरु झाले. इतकं सगळं उथळ करायचं होतं, तर काही शतकं मागे जायची गरज काय होती ? आजच्याच काळातली एखादी कहाणी गुंफायची होती ना ! अभ्यास करायचाच नव्हता, मेहनत घ्यायचीच नव्हती तर एक प्लॉट ज्याचं इतर कुणी तरी कदाचित सोनं केलं असतं, तो वाया का घालवला ? असा एक वैफल्यग्रस्त प्रश्न मला पडला.

७. हिमेश रेशमियाची अभिनयाची हौस आणि भन्साळीची संगीत देण्याची हौस एकसारखीच वाटते आहे. सगळ्या गाण्यांच्या चाली एक तर एकसारख्याच किंवा इतर कुठल्या तरी गाण्यासारख्या किंवा थेट इस्माईल दरबारची नक्कल करणाऱ्या आहेत. 'अलबेला सजन आयो..' ची चाल मस्तच आहे. पण आयो' मधल्या 'आ' वरच्या जबरदस्त समेची अक्षरश: माती झाली आहे. वाद्यांचा इतका गोंगाट आहे की ती समेची जागा खरंच वाया जाते. इथे पुन्हा एकदा 'कट्यार'चा संदर्भ देतो. 'दिल की तपिश आज हैं आफताब..' मधल्या 'ता' (आफ'ता'ब) वर येणारी समेची जागाही अशीच दिलखेच आहे. पण सुरेख व अचूक प्रमाणातला वाद्यमेळ ही सम व्यवस्थित ठळक करतो. भन्साळी भसाभस वाद्यांचे आवाज ओततो आणि फक्त गोंगाट करतो.

एकंदरीत, अत्यंत रटाळ आणि सपशेल फसलेला चित्रपट म्हणूनच 'बाजीराव मस्तानी' ओळखला जाईल. मी 'दिलवाले' पाहिला ह्याचा तुलनात्मक का होईना मला आनंद होईल, असं मला कधीही वाटलं नव्हतं. आता वाटतंय.

- रणजित पराडकर
Related Posts Plugin for WordPress, Blogger...