Saturday, April 29, 2017

अ‍ॅक्शनपॅक्ड थरारनाट्याचा ४४० व्होल्ट्सचा झटका - बाहुबली - द कन्क्ल्युजन (Movie Review - Bahubali - The Conclusion)

'बाहुबली-२'चं कथानक मी सांगणार नाही. ते जाणून घ्यायचीच उत्सुकता असेल, तर हा लेख वाचू नये !

बाहुबली-१, मोहेंजोदडो आणि आता बाहुबली-२ अश्या सिनेमांमुळे भारतीय सिनेमा परदेशी (हॉलीवूड) सिनेमापेक्षा किती पिछाडलेला आहे, अश्या तुलनांना ऊत आला.

मुळात बॉलीवूड आणि हॉलीवूड ही तुलनाच अगदी अप्रस्तुत आहे. हॉलीवूड सिनेमांना किती स्क्रीन्सचं ओपनिंग मिळतं आणि आपल्याकडे जास्तीत जास्त जरी कुणाला मिळालं तरी ते किती स्क्रीन्सचं असतं, दोन्हीचं मार्केट किती आहे, अश्या बाबींचा विचार केल्यास दोन्हीच्या बजेटमध्ये तफावत न आली तरच नवल. अन्यथा, तांत्रिक सफाईदार सिनेमा आपण बनवू शकत नाही असं अजिबात नाही. हॉलीवूडचे व्हीएफएक्ससुद्धा प्रामुख्याने भारतात किंवा भारतीय तंत्रज्ञांनीच केलेले असतात.
हे झालं स्पेशल इफेक्ट्स व इतर तांत्रिक सफाईबाबत. आता दुसरा मुद्दा.
'बॉलीवूड म्हणजे मुख्यत्वेकरून मसालापट. इथे १०० सिनेमांच्या मागे एखादा 'मसान' बनतो' असं काहीसं बऱ्याच जणांचं मत असतं. मी म्हणतो, तुम्ही शंभरपैकी पन्नास तर बघा. मग तुमचं तुम्हालाच समजेल की हे प्रमाण 'शंभरपैकी एक'पेक्षा खूपच जास्त आहे !
सिनेमा, नाटक किंवा कुठलीही कला ही त्या त्या समाजाचं रिप्रेझेंटेशन असते. सिनेमा तर खूपच स्पष्ट रिफ्लेक्शन असतं समाजाचं. समाज कसा विचार करतो, ह्यावर सिनेमा बदलतो, असं मला वाटतं. इथला समाज अजून हुंडा, ऑनर किलिंग, जातीद्वेष वगैरेंत गुंतलाय, पिछाडलाय. सिनेमा बनवणारेसुद्धा ह्याच समाजाचे प्रोडक्ट्स आहेत. शहरात राहून, एका अतिशय सुरक्षित वातावरणात वाढून एका अपरिपक्व समाजाचं प्रतिनिधित्व फुटकळ ठरवणं, हे चूक आहे. आपला चित्रपट त्याच त्या विषयांत गुरफटला आहे कारण आपला समाज त्याच त्या समजांत अडकलाय. आपला चित्रपट ढिसाळ आहे कारण आपला समाज विस्कळीत आहे. आपला चित्रपट उथळ आहे कारण आपला समाज अपरिपक्व आहे. ह्या समाजाला त्याच्या आवडीनुसार चित्रपट देणं, हा धंदा आहे. इथे भावनाप्रधानता प्रायोरिटीला आहे आणि तीच असावी. आपले विचार, अापले प्रश्न आणि प्रायोरिटीज ज्या आहेत, तसा आपला सिनेमा आहे. समाज ओव्हरनाईट बदलणार नाही, चित्रपटही ओव्हरनाईट बदलत नाही. पण हळूहळू खूप सकारात्मक बदल होत आहेत. समाजातही आणि चित्रपटातही.
सिमिलरली, हॉलिवूडचा सिनेमा तसा आहे, जसा त्यांचा टार्गेट समाज आहे. दोघांची आपसांत तुलना करुन सरसकट दोन्हीपैकी कुणा तरी एकाला फुटकळ मानणं, हे फक्त आंधळेपणाचं लक्षण आहे. आणि आंधळेपणा फक्त अंधारामुळेच येतो असं नाही, खूप जास्त एक्स्पोजरमुळेही येतो.
मसान, दम लगा के हैशा, दंगल, तारे जमीं पर, पा, बुद्ध इन ट्रॅफिक जॅम वगैरे सिनेमे आपल्याकडेच बनतील. मान्य आहे की जास्त सिनेमे वाईट असतात, पण जे चांगले असतात त्यांचं कौतुक नाही तर किंमत तरी करायला हवी. आणि मी हे फक्त पटकन जे आठवले आणि तेही नव्यातले सिनेमे सांगितले. विचार केला तर अजूनही आठवतील.
असो. नमनाला घडाभर तेल झालंय !

'बाहुबली' म्हणजे भव्यता, स्पेशल इफेक्ट्स, थरारक युद्धदृश्यं, नाट्य आणि टिपिकल दाक्षिणात्य शैलीची थोडीशी हवीहवीशीच ओव्हरअ‍ॅक्टिंग अशी माझी अपेक्षा होती, जी पूर्ण झाली ! भव्यतेमध्ये सिनेमा कुठेच कमी पडत नाही. मोठमोठे सेट्स, दाही दिशांनी फिरणारा कॅमेरा, अप्रतिम रंगसंगती हे सगळं स्तिमित करणारं आहे. स्पेशल इफेक्ट्स - पहिल्या भागाप्रमाणेच - काही ठिकाणी बऱ्यापैकी फसलेले आहेत, पण बहुतांश ठिकाणी केवळ कमाल केली आहे ! युद्धदृश्यंसुद्धा पहिल्या भागाप्रमाणेच फसली/ जमली आहेत, पण त्यांचाही एकंदर परिणाम चित्तथरारकच आहे. नाट्याच्या बाबतीत मात्र हा दुसरा भाग पहिल्या भागाच्या काही पाउलं पुढेच गेला आहे. पहिल्या भागाचं कथानक अंमळ बाळबोध वाटलं होतं, इथे त्याचा वेग, वळणं वेगळी आहेत आणि सरसही. 'कटप्पाने बाहुबलीला का मारलं', ह्याचं उत्तर अपेक्षाभंग करणारं नाहीय, हे विशेष. कारण ह्या एका उत्तरासाठीची उत्सुकता इतकी शिगेला पोहोचली होती, की जर ते उत्तर तर्कशून्य असतं, तर अख्खा सिनेमाच कोलमडून पडला असता ! 'दाक्षिणात्य शैलीची थोडीशी हवीहवीशी ओव्हरअ‍ॅक्टिंग' मात्र इथे औषधापुरतीच आहे. सुरुवातीचा काही भाग जराशी बाष्कळ विनोदनिर्मिती करण्यात गेला आहे, पण तो भागही तरीही बऱ्यापैकी मनोरंजक आहे. संगीत मात्र कमजोर बाजू ठरलेलं आहे. जी काही ३-४ गाणी आहेत, ती अजिबात लक्षात राहण्यासारखी तर नाहीतच, पण 'कधी एकदा संपतायत' असं वाटावं, इतकी नीरस आहेत.
तमन्नाच्या पंख्यांसाठी अपेक्षाभंग आहे कारण ती केवळ २-३ प्रसंगांत दिसते. पण अनुष्का शेट्टीच्या पंख्यांसाठी मात्र पर्वणी आहे ! ती फक्त 'दिसत'च नाही, तर मोहवते ! तिच्या अप्रतिम सौंदर्याला तितक्याच दमदार अभिनयाचीही जोड आहे, हे विशेष. युद्धदृष्यांतलाही तिचा वावर खूप सहज वाटतो. प्रभास, राणा दग्गुबाती, राम्या, सत्य राज, नासर ह्या सगळ्यांचीच कामं उत्तम झालेली आहेत. नासर आणि सत्य राज तर व्हेटरनच आहेत. तर 'प्रभास' सिनेमाचं केंद्रस्थान. पण 'राणा दग्गुबाती' हे एक सुखद आश्चर्य आहे ! धिप्पाड शरीरयष्टीवाल्या नटांची टिपिकल 'ठोकळा' इमेज तोडणारा हा नट आहे. महान अभिनय वगैरे तो करत नाही, पण लक्षवेधी नक्कीच ठरतो आणि त्याच्या जबाबदारीत कुठेही कमी पडत नाही. 'द गाझी अटॅक' मधलंही त्याचं काम मला आवडलं होतं आणि इथलंही आवडलंय.
'मनोज मुन्तशीर' ह्यांनी लिहिलेली गाणी सपशेल उथळ वाटली, तरी त्यांनी लिहिलेले संवाद मात्र मस्त जमून आलेले आहेत. ३-४ जागांवरच्या पंचलाईन्स तर कमालीच्याच आहेत ! ह्या एका बाबतीतही दुसरा भाग पहिल्यापेक्षा सरस आहे.

गेल्या साठ-सत्तर वर्षांचा विचार केला तर भारतीय सिनेमाचा प्रवास डोळे दिपवून टाकणारा आहे. I know there is still a long way to go, पण गेल्या वीस वर्षांत भारतीय सिनेमाने अक्षरश: कात टाकलेली आहे. मला कुणाचीही स्पेसिफिक नावं घ्यायची नाहीयत. पण किमान १५-२० दिग्दर्शक असे आहेत, जे काळानुरूप किंवा काळाच्या पुढचा विचार करतात. 'एस. राजामौली' हे त्यांच्यापैकी एक नक्कीच आहेत. आजच्या काळात, जेव्हा सिनेमा इंडस्ट्री प्रचंड आर्थिक विवंचनेत आहे, एक इतक्या मोठ्या बजेटचा सिनेमा करणं, तोही स्थानिक भाषेत आणि त्याला ह्या खंडप्राय देशात लोकप्रिय करून सगळे रेकॉर्ड्स मोडणं, ही किमया फक्त मार्केटिंगची असू शकत नाही. प्रोडक्टही तितकं सशक्त आहे, म्हणूनच हे शक्य झालं आहे. 'बाहुबली' हे फक्त दिग्दर्शक राजामौली ह्यांचं ड्रीम प्रोजेक्ट नाही, हे माझ्यासारख्या लाखो-करोडो चित्रपटरसिकांचंही ड्रीम प्रोजेक्ट आहे ! हे स्वप्न स्वत: राजामौली गेली काही वर्षं जगतच असावेत, तीन तासांच्या खेळात आपणही ते नक्कीच जगतो. पण जर भारतीय चित्रपट प्रेक्षक हा मठ्ठच आहे आणि त्याला हातोहात बनवून सिनेमातून करोडो रुपये सहज मिळवले जाऊ शकतात, असा बाळबोध समज अगदी ठामच असेल तर तो ज्याचा त्याला लखलाभ ! माझ्या दृष्टीने तरी राजामौली अभिनंदनास पूर्णपणे पात्र आहेत !

To conclude the conclusion, तुलनात्मक दृष्ट्या विचार केल्यास, दुसऱ्या भागाने पहिल्या भागावर बहुतांश बाबतींत मात केलेली आहे. बाहुबलीचं हे कन्क्ल्युजन अ‍ॅक्शनपॅक्ड थरारनाट्याचा एक ४४० व्होल्ट्सचा झटका आहे. हा भारतीय मसालापटाने घेतलेला एक वेगवान टेक ऑफ आहे. अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे, पण हा टेक ऑफ पाहता, कुठलाही पल्ला आवाक्याबाहेर नक्कीच नाही, हा विश्वास वाटतो आहे !

रेटिंग - * * * *

- रणजित पराडकर


No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...