Monday, June 22, 2015

वृत्तवैभव काव्यस्पर्धा

वृत्तात लिहिणे ही एक कला आहे. एक साधना आहे. ती श्रद्धेने करत राहावी लागते. काही दिवस, काही महिने किंवा काही वर्षं. मग कधी तरी एक वेळ अशी येते की वृत्त वृत्तीत उतरतं. पावसाचं पाणी जमिनीत झिरपून खोलवर कुठे तरी त्याचा अज्ञात, अथांग साठा बनतो, तसं काही तरी होतं. खोलवर मनात ती शिस्त झिरपते. भावनेच्या आंदोलनांना एक लय मिळते. पण ह्यासाठी वेळ द्यावा लागतो.
वृत्तात लिहिणारे दोन प्रकारांत मोडतात. एक ज्यांची साधना चालू आहे आणि दुसरे ज्यांच्या अंतरंगात वृत्त झिरपलं आहे.
छंद, वृत्ताला नाकं मुरडणारे लोक एक तर ह्या पहिल्या प्रकारात असतात किंवा त्यातही नसतात.
वृत्तात लिहिणं आत्मसात करायची गोष्ट आहे. मेहनतीची गोष्ट आहे. त्यासाठी श्रद्धा हवी, संयम हवा. हे क्वचितच कुणात असतं. त्यामुळे सोपा रस्ता निवडला जातो. वृत्तबद्धतेला कृत्रिम, नकली वगैरे मानायचं.
पण मित्रांनो,
नियम नाकारण्याचा, तोडण्याचा अधिकार मिळवण्यासाठी आधी नियम पाळायची कुवत आत्मसात करायला हवी. केवळ बहुसंख्य लोकांच्या आळसामुळे कविता आपल्या सौंदर्यस्थळांना मुकणार असेल तर ते आपण तरी होऊ देणार नाही.
ह्याच भावनेतून एक वेगळी काव्यस्पर्धा आयोजित केली गेली आहे -

~ ~ 'वृत्तवैभव काव्यस्पर्धा' ~ ~

ही स्पर्धा केवळ वृत्तबद्ध कवितांची स्पर्धा आहे.

स्पर्धेचे नियम :-

१. एका कवी/ कवयित्रीने एकच स्वलिखित कविता पाठवावी.
२. कविता अप्रकाशित असावी.
३. कविता mkspardha@gmail.com ह्या मेल आयडीवर पाठवावी. इतर कुणालाही मेल करून किंवा मेसेज करून किंवा प्रिंट अथवा हस्तलिखित देऊन चालणार नाही. तसेच मेल पाठवताना विषय (subject) म्हणून 'मकस आयोजित वृत्तबद्ध काव्यस्पर्धा - १ - सहभाग' हा असावा.
४. कविता 'टेक्स्ट' रुपात आणि देवनागरी लिपीत टंकलेखन करून व 'युनिकोड' फॉण्टमध्ये पाठवावी. फोटो, पीडीएफ इ. स्वरूपातील सहभाग ग्राह्य धरला जाणार नाही.
५. वृत्तबद्ध कवितांची स्पर्धा असल्याने, वृत्तभंग असलेली कविता प्राथमिक चाचपणीतच बाद केली जाईल. ऱ्हस्व-दीर्घ व शुद्धलेखनाच्या इतर चुकांना समजून घेतले जाईलच असे नाही. टंकलेखनातील उणीवा दूर करून पूर्णपणे शुद्ध कविताच मेल करावी.
६. मुसलसल गझल चालू शकेल. गैर-मुसलसल गझल पाठवू नये.
७. मात्रा वृत्त किंवा अक्षरगणवृत्तातली रचनाच पाठवावी.
८. कवितेसोबत वृत्ताचे नाव आणि गण व मात्रा द्यावेत.
९. अनुवादित कविता चालणार नाही.
१०. कवितेसह कवी/ कवयित्रीने स्वत:चे पूर्ण नाव व संपर्क क्रमांक देणे बंधनकारक राहील.
११. परीक्षक व आयोजकांचा निर्णय अंतिम राहील. कुठल्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यास कुणीही बांधील नसेल.
१२. कविता पाठवण्याची मुदत दिनांक ९ जुलै २०१५ पर्यंत राहील.
१३. स्पर्धेचा निकाल 'मराठी कविता समूहा'च्या २ ऑगस्ट २०१५ रोजीच्या पुणे इथल्या मेळाव्यात आणि नंतर फेसबुकवर Marathi Kavita - मराठी कविता समूह ह्या समूहाच्या पानावर व Marathi Kavita ह्या प्रोफाईलच्या भिंतीवर जाहीर केला जाईल.
१४. यशस्वी कवितांना मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येईल.
१५. ह्या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क नाही.
१६. स्पर्धेच्या नियमांत व आयोजनात काही बदल झाल्यास ते कळवले जाईल आणि असा कुठलाही बदल करण्याचा हक्क आयोजकांना राहील.
सर्वांनी सहभाग घ्यावा, तसेच ही पोस्टसुद्धा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी.

धन्यवाद !

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...