Sunday, August 25, 2013

पुन्यांदा 'पोपट' ! (Popat - Marathi Movie Review)

माणसाचे आयुष्य त्याने केलेली धडपड आणि त्याच्या चुका ह्यातून आकारास येते. काय वाटतं ?
जुलुमाचा राम-राम म्हणून केलेली मेहनतसुद्धा 'धडपड'च आणि नकळत घडलेलीही 'चूक'च किंवा काहीच न करता - असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी - असे म्हणून आळसात वेळ घालवणे हीसुद्धा 'चूक'च. धडपड जास्त की चुका जास्त ह्यावरून आयुष्याचा रस्ता उजवं वळण घ्यायचं की डावं हे ठरवत असावा, बहुतेक.
'पोपट'सुद्धा कुणाची धडपड आणि कुणाच्या चुका दाखवतो. कुठलाही संदेश द्यावा/ पोहोचवावा इतका काही हा चित्रपट खास नाही, हे  आधीच सांगतो. पण अधिक विचार केल्यावर हेच वाटतं की चित्रपट बनविणाऱ्याच्या चुका त्याच्या धडपडीहून जास्त झाल्या असाव्यात.

तर, कोल्हापुरच्या जवळपास 'कुळपे' गाव असतं. 'ग्रामपंचायत' शासित एक खेडंच. ह्या गावातले तिघे मित्र. बकुळ/ बाळ्या (सिद्धार्थ मेनन), रघ्या/ रघु/ रघुनाथ (अमेय वाघ) आणि मुक्या/ मुकुंद (केतन पवार). बाळ्या पक्का 'झोलर'. इकडम तिकडम करून, काही बाही उलट सुलट करून खर्चापुरता जुगाड करणारा, रघुनाथ एक मोठा अभिनेता बनण्याचे स्वप्न पाहात कोल्हापुराच्या 'लोकल' चित्रपटसृष्टीत चिल्लर कामं करणारा आणि मुकुंद आषाढी-कार्तिकी केल्याप्रमाणे ऑक्टोबर-मार्च करत बारावीत खितपत पडलेला एक बाप्या. तिघांचं स्वप्न एकच. रघु मोठ्ठा 'ष्टार' झाला पाहिजे ! पण कसलं काय ! त्याच्या हातात असलेलं चिल्लर कामही जातं आणि त्याला हाकलून देण्यात येतं. बास्स ! तीन सुपीक डोकी ठरवतात की आपणच बनवायचा पिच्चर ! नेमकं ह्याच वेळेस गावात 'एड्स जागृती अभियान' सुरु होतं. कण्डोम्स वाटप, पथनाट्यं, पुस्तकविक्री सुरु होते आणि हे त्रिकुट ठरवतं की आपण 'एड्स'वरच पिच्चर काढायचा.
आता पिच्चर काढायचा म्हणजे कॅमेरा ? बाळ्याचा एक मित्र असतो शेजारच्या गावातला फोटोग्राफर 'जन्या/ जनार्दन' (अतुल कुलकर्णी). जन्याला भरीस पाडलं जातं.    

पुढे, चित्रपटाचे चित्रिकरण आणि खरेखुरे आयुष्य ह्यांचा गुंता होत जातो अन् कहाणी विचित्र वळण घेते.
ती काय वळण घेते आणि कुठे पोहोचते, हे जाणून घ्यायचे असेल तर पिच्चर पाहा. 'पोपट' झाल्यास मी जबाबदार नाही !!



खूप वेगळा विषय आहे. असे वेगळेपण दाखवायचे धाडस करण्यासाठी नक्कीच चित्रपटकर्ते अभिनंदनास पात्र आहेत. बट देन, वेगळेपण, प्रयोगशीलता मराठी चित्रपट नेहमीच दाखवत असतो! प्रॉब्लेम 'सफाईदारपणा'त असतो. गुलजार साहेब सांगतात, 'हर मिसरा अच्छी तरह से साफ करके पेश करना चाहिये.' कुठे तरी अश्या प्रकारच्या सफाईत जशी आजची कविता आळशी झालीय, तसेच आजचे प्रयोगशील लेखक-दिग्दर्शकही झाले असावेत का ?

अनेक दृश्यं कंटाळा येईपर्यंत अकारण लांबवली आहेत, तर काही दृश्यं कशासाठी होती? असाही प्रश्न अखेरीस पडतो. नक्कीच अश्या काही ठिकाणी साफसफाई करता आली असती, असं वाटतं.
रघ्या आणि बाळ्याला गावची भाषा विशेष जमली नाही, असं जाणवतं. दोघांचं बोलणं नक्लीच वाटत राहतं. मुक्या मात्र परफेक्ट !

अतुल कुलकर्णीचा 'जन्या' अप्रतिम ! २-३ दृश्यांत अ. कु. पडदा खाऊन टाकतो. पण मग वाटतं की, वाया घालवलाय यार ! ह्याच्या सोबतीला कुणी तरी 'खमक्या' असता तर मजा आली असती. 'प्रेमाची गोष्ट' नंतर 'पोपट'सुद्धा केवळ अतुल कुलकर्णी असल्यामुळे बघितला जातो.
'अविनाश-विश्वजित' जोडीचं संगीत चांगलं आहे. का श्वास हा.., दाबा की बटन मोबाईलचं..  ही गाणी चांगली जमून आली आहेत.

'दुनियादारी' टीमने जी हुशारी, जे धाडस दाखवले नाही, ते 'पोपट' टीमने केलं. नवीन चेहरे आणले. जरी हा प्रयोग पूर्ण यशस्वी झाला नसला, तरी जर रघ्या-बाळ्या-मुक्या च्या जागी तेच थोराड, खप्पड, जुनाट चेहरे असते, तर चित्रपट मध्यंतरापर्यंतसुद्धा पाहवला नसता, हेही तितकेच खरे आहे. वेगळा विषय व वेगळे चेहरे पडद्यावर आणण्यासाठी सतीश भाऊ राजवाडेंचे पुनरेकवार अभिनंदन. पण पुढील खेपेस कात्रीचा वापर अधिक व्हावा ही अपेक्षा !

एकंदरीत, 'पोपट' केला गेला नसला तरी 'पोपट' होतोच.

रेटिंग - * * 

1 comment:

  1. खर सांगायचं झाल तर मी तुमच्या reviw शी सहमत नाही, मला इथला review चांगला वाटला - http://marathistars.com/reviews/popat-2013-marathi-movie-review/
    माफी असावी…

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...