Saturday, June 29, 2013

'घनचक्कर' - A perfect Stress buster (Ghanchakkar - Movie Review)

सोमवार ते शुक्रवार (शनिवार), सकाळ ते संध्याकाळ (रात्र) तेच ते रूटीन असतं. अमुक वाजता उठा, तमुक वाजता ऑफिससाठी निघा, पोहोचा, मग पुन्हा अमुक वाजता निघा, तमुक वाजता घरी या आणि सकाळी पुन्हा अमुक वाजता उठायचं असतं म्हणून ढमुक वाजता डोळ्यांवर झोप ओढून घ्या. काही जण, किंबहुना बहुतेक जण ह्या त्याच त्या दिनक्रमाला जरा कंटाळतात आणि मग त्यातील काही चित्रपटप्रेमी सुटीच्या दिवशी मित्र-मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबासोबत किंवा एकट्यानेही 'स्ट्रेसबस्टर' साठी एखादा चित्रपट पाहातात. ह्या 'स्ट्रेसबस्टर'ची प्रत्येकाची व्याख्या निराळी. कुणाला 'डोक्याला शॉट' नको असतो, कुणाला काही तरी लॉजिकल हवं असतं, कुणाला 'आंबट' हवं असतं, कुणाला सेन्सिबल.. कुणाला गाणी, तर कुणाला कहाणी हवी असते.. कुणाला विशिष्ट नट/ नटी, तर कुणाला चांगला दिग्दर्शक, पटकथाकार..... वगैरे वगैरे. समजा असं सगळं सगळं एकाच चित्रपटात असेल तर ? Here is a flick, which has got the trick ! 'घनचक्कर; इज अ परफेक्ट 'स्ट्रेसबस्टर' !

थोडक्यात ष्टोरी अशी -
संजू (इम्रान हाश्मी) एक प्रतिष्ठित चोर असतो. प्रतिष्ठित म्हणजे किरकोळ हात न मारणारा. पुरेसा 'माल' कमवून झाल्यानंतर संजू आणि त्याची पत्नी नीतू (विद्या बालन) ठरवतात की, 'आता बस्स ! नो मोअर चोरी-चमारी, नो मोअर छक्के-पंजे.' But destiny has a different plan. पंडित (राजेश शर्मा - 'इश्क़िया' मधला 'कुक्कू') आणि इद्रिस (नमित दास - 'वेक अप सिड' मधला 'ऋषी') कडे एक प्लान असतो. बँक लुटायचा. त्यात त्यांना संजूची मदत हवी असते. हिस्सा असतो १० कोटी रु.!! '१० कोटी' ऐकल्यावर बायको म्हणते नवऱ्याला, 'मार एक आखिरी हाथ' आणि नवरा म्हणतो बायकोला, 'यह हुई ना दिल की बात !' संजू 'आखिरी हाथ' मारतो. प्लान यशस्वी होतो. भरपूर पैसा मिळतो. पण पैश्याची वाटणी, वातावरण थंडावल्यानंतर, म्हणजे साधारण ३ महिन्यांनतर करण्याचं ठरतं. पैसे सुरक्षित जागी लपवण्यासाठी संजूकडे दिले जातात. तो सुरक्षित, गुप्त जागी पैसे लपवतो. 
तीन महिन्यांनी पंडित आणि इद्रिस परततात, तोपर्यंत 'झोल' होतो. ('विजय' वाला नाही, 'गडबड'वाला.) एका अपघातात संजूला स्मृतिभ्रंश होतो. हा स्मृतिभ्रंश गजनीसारखा नसतो. जास्त विश्वसनीय असतो. त्याला काही गोष्टी आठवत असतात आणि काही नसतात. लक्षात असलेल्या गोष्टीही तो अधून-मधून, हळूहळू विसरत चालला असतो. आणि त्याने अंगावर गोंदवूनही ठेवलेलं नसतं. कारण आधी गोंदवायचं लक्षात राहिलं पाहिजे, मग गोंदवेपर्यंत लक्षात राहिलं पाहिजे आणि मग गोंदवलेलं पाहण्याचं लक्षात राहिलं पाहिजे ! 

पुढे काय होतं ?
पंडित-इद्रिस काय करतात ?
पैश्याचा छडा लागतो का ?
खरोखर 'झोल' झालेला असतो की ह्यातही काही 'गेम' असतो ? 
इत्यादीसाठी चित्रपट पाहा ! मी पैसे खर्च केले, तुम्हीही करा. इतकी ग्यारंटी देतो की पैसे वाया नक्कीच जाणार नाहीत. 



'आमिर', 'नो वन किल्ड जेसिका' मुळे राजकुमार गुप्ताकडून अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. 'घनचक्कर'मध्ये तो अपेक्षापूर्ती करतो. कहाणीवरील पकड कुठेच ढिली पडत नाही. संजूचा अपघात कसा झाला, त्याला कसं हॉस्पिटलमध्ये नेलं, डॉक्टरने ओढलेला चेहरा करून 'डोक्यावर आपटलाय' हे कसं सांगितलं, वगैरे अनावश्यक गोष्टी दाखवण्यात वेळ घालवला नाहीये. बिनकामाची गाणी घुसडलेली नाहीत. पात्रांचा फापटपसारा करून ठेवलेला नाही. बांडगुळासारखी उपकथानकं तर नाहीतच. मुद्द्याची गोष्ट, तीसुद्धा मस्त ! एकूणच कहाणीला त्याने हलकी फुलकी ट्रिटमेण्ट दिली आहे. प्रासंगिक आणि संवादातील अनेक विनोद थेटरात हशा पिकवतात. संजूचं हळूहळू अधिकाधिक विसरभोळं होत जाणं अतिशय सहज दाखवलं आहे. 

राजेश शर्मा हा एक ओम पुरी टाईप वाईट चेहऱ्याचा उत्कृष्ट अभिनेता आहे. त्याच्याकडे जबरदस्त टायमिंग आणि संवादफेक आहे, हे तो पुन्हा पुन्हा दाखवत राहातो. 

नमित दास सुरुवातीला 'टपोरी' म्हणून पटत नाही. कारण त्याच्या डोळ्यांत एक निरागसपणा जाणवतो, पण कहाणीच्या विनोदी हाताळणीमुळे तो हळूहळू 'इद्रिस' म्हणून फिट्ट होतो. तरी काही ठिकाणी त्याचं टायमिंग जरासं हुकतंच. ट्रेनमधील मिटींग्सच्या वेळी नेहमी भेटणाऱ्या एका माणसाच्या सोबतच्या त्याच्या ३-४ छोट्याश्या प्रसंगात विनोदनिर्मिती तशी फसलीच आहे.            

पंजाबी उच्चार आणि भक्कम अंगकाठीतून विद्या बालनने पंजाबी नीतू जबरदस्त उभी केली आहे. तिचं 'अतरंगी' फॅशन करणं लै भारी आहे ! खूप जाडी दिसत असली, तरी खूप सुंदरही दिसते आणि भूमिकेत घुसते. 

इम्रान हाश्मी 'डायन'नंतर पुन्हा एकदा अभिनय दाखवतो. त्याला फक्त तोंडच नसून, चेहराही आहे आणि त्यावर 'इतर'ही अनेक भाव तो सहजी उमटवू शकतो, हे त्याने स्वत:लाच अधूनमधून आठवून देत राहायला हवं. संजूची हताशा, निराशा तो ज्या सहजपणे रंगवतो, तितक्याच सहजतेने त्याच हताशे-निराशेतून विनोदनिर्मितीही करतो !

अमित त्रिवेदीचं संगीत श्रवणीय आहे. लेझी लॅड, घनचक्कर बाबू आणि अल्लाह मेहरबान ही तिन्ही गाणी ठेका धरायला लावतात आणि दिलखेचक आहेत. 

अनेक चक्करा मारून, वळणं घेणारा हा घनचक्कर वेगळ्याच शेवटामुळे मनाला अधिक पटतो. ३५ कोटींइतकी मोठी रक्कम पंडित-इद्रिस संजूकडे कसे काय देतात ? त्याचा अपघात झालेला त्यांना कळत कसं नाही ? ते त्याच्यावर नजर ठेवून नसतात की काय ? असे काही प्रश्न चित्रपट पाहाताना पडतात पण शेवटी सुटतात. 

बऱ्याच दिवसांनी एक उत्कंठावर्धक विनोदी चित्रपट आला का ? कुणास ठाऊक ! आपल्याला तर स्ट्रेसबस्टर हवा होता.... मिळाला !! 

रेटिंग - * * *१/२ 

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...