Tuesday, March 31, 2015

शून्याचा पांगुळगाडा

शून्यास पाहतो आहे
शून्याला दिसतो आहे
पसरले दूरवर शून्य
ते शून्यच बनतो आहे

मी कण-कण जगतो आहे
ही श्वासोत्सुकता नाही
अंतोत्सुक आयुष्याची
मृत्यूला चिंता नाही

ओलांडू बघतो रस्ता
पाऊलच उचलत नाही
साखळी तुटावी इतकी
वेदनाच वाढत नाही

बेसावध होतो तेव्हा
ठरलो माझा अपराधी
माझ्याच शरीराला ही
जडली 'मी' नामक व्याधी

मन माझे भणाणलेले
जणु जुनाट पडका वाडा
हे शरीर म्हणजे माझ्या
शून्याचा पांगुळगाडा

....रसप....
३१ मार्च २०१५

Monday, March 30, 2015

~ ~ स्वप्नभंगाची हॅटट्रीक (Australia vs New Zealand - Cricket World Cup 2015 - Final) ~ ~

प्रत्येक विश्वचषक सुरु होण्याआधी काही संघ 'प्रबळ दावेदार' मानले जातात. 'फेवरेट्स'.
एखाद-दुसरा संघ 'लक्षवेधी' असतो. 'डार्क हॉर्स'.
जवळजवळ प्रत्येक विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ 'प्रबळ दावेदार' मानला गेला आहे. तर न्यू झीलंड नेहमीच 'लक्षवेधी'. १९९२ ला दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकात सहभाग घेतला, तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक विश्वचषकासाठी तेसुद्धा 'प्रबळ दावेदार' राहिले आहेत आणि सौरव गांगुलीने खडबडून जागं केलेल्या भारतीय संघाने जेव्हा २००३ साली अंतिम सामन्यापर्यंत मुसंडी मारली होती, तेव्हापासून भारतसुद्धा. त्या त्या देशातील लोकांना तो तो देश जिंकावा, असं वाटणं स्वाभाविक आहे. (ब्रिटीश लोकांचाही इंग्लंड संघाला पाठींबा असणारच.) त्यामुळे बाद फेरीत जेव्हा आठ संघ दाखल झाले तेव्हा ते सगळेच संघ, त्या त्या देशांतील लोकांसाठी 'प्रबळ दावेदार' झालेले होते आणि त्यातून जेव्हा चार संघ उपांत्य फेरीत पोहोचले, तेव्हा तर भावनांना ऊतच आला होता. दक्षिण आफ्रिका, न्यू झीलंड आणि भारत ह्यांना प्रचंड प्रमाणात 'दिल से' पाठींबा होता पण 'दिमाग से' बहुतेक जण ऑस्ट्रेलियासोबत होते. ह्या तिन्ही संघांचे पाठीराखे आपापल्या संघाच्या विजेतेपदाचं स्वप्न रंगवत होते आणि मग एकामागोमाग एक तिन्ही स्वप्न भंग झाली. स्वप्नभंगाची हॅटट्रीक झाली. उरलं ते एक असं वास्तव, जे बदलण्याचा अजून एक प्रयत्न अयशस्वी ठरला होता. 'ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेतेपदा'चं वास्तव.

हा भावनिक कडेलोट फक्त पाठीराख्यांतच होता, असं नाही. जेव्हा स्टेनसारखा सर्वोत्कृष्ट गोलंदाज जीव तोडून गोलंदाजी करत असतानाही टप्पा चुकत होता, जेव्हा सेट झालेल्या शिखर धवनने उतावीळपणे आपली विकेट फेकली, जेव्हा ब्रेंडन मॅक्युलमने नेहमीप्रमाणे पहिल्या चेंडूपासूनच चेंडूला सीमा दाखवण्याच्या प्रयत्नात ऑफ स्टंप गमावला, तेव्हा त्यांचा आपापल्या भावनांवरचा ताबा सुटलेला होता. तर दुसरीकडे पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात जेव्हा वहाब रियाझ तोफगोळे फेकावेत तसे चेंडू टाकत होता, तेव्हा त्याच्यासमोर स्टीव्हन स्मिथ शांतपणे उभा राहिला होता, त्याने कुठलाही आत्मघात केला नाही, भारताविरुद्ध उपांत्य सामन्यांत आपल्या बॅटमधून धावा निघत नाही आहेत, हे दिसत असतानाही आरोन फिंचने संयम सोडून उतावीळपणा केला नाही आणि पॉवरप्लेच्या षटकांत हल्ला होणार आहे, ह्याचा आधीच अंदाज घेऊन जेम्स फॉकनरने सुरुवातच धीम्या गतीच्या चेंडूने करून न्यू झीलंडच्या फलंदाजीला अंतिम सामन्यात घसरगुंडीवर लोटलं; हे व असं बरंच काही ऑस्ट्रेलियन खेळाडू करू शकले कारण इतरांप्रमाणे त्यांच्या मेंदूचा ताबा मनाने घेतलेला नव्हता. ह्या म्हणतात अस्सल व्यावसायिकपणा. आपल्याला काय करायचं आहे, आपली भूमिका काय आहे, लक्ष्य काय आहे ह्यावरच त्यांचं लक्ष पूर्णपणे केंद्रित असणं. दबावाखाली खेळताना हीच बाब सगळ्यात महत्वाची ठरते. Clarity of thoughts.

ह्यामुळेच अंतिम सामन्यात नाणेफेक गमवूनही ऑस्ट्रेलियाच्या खेळावर परिणाम झाला नाही आणि न्यू झीलंडने नाणेफेक जिंकली तरी त्याचा त्यांना फायदा उठवता आला नाही. ३५ व्या षटकांत १५० वर ३ बाद ही एक समाधानकारक धावसंख्या होती. तिथपर्यंत पोहोचवणारे इलियट व टेलर जितका काळ एकत्र होते, तितका काळ वगळता दोन्ही डावांत पूर्णपणे ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवलं. सर्व बाद १८३ ही धावसंख्या १९८३ साली भारताने अंतिम सामन्यात केली होती आणि सामना जिंकला होता. पण तेव्हाचं आणि आजचं एकदिवसीय क्रिकेट ह्यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. आता इतक्या धावा तर एकटा खेळाडूही बरेचदा करत असतो. ह्या विश्वचषकात तब्बल ३८ शतकं ठोकली गेलीत आणि त्यांपैकी दोन तर द्विशतकं. आजच्या घडीस प्रथम फलंदाजी करताना १८३ धावांत गळपटणं, म्हणजे जवळजवळ आत्महत्याच. त्यात मेलबर्नची खेळपट्टी जराशी मनधरणी केल्यावर ३०० धावा करू देईल इतकी दयाळू होती. तिथे १८४ धावा, त्याही ऑस्ट्रेलियासाठी आणि त्याही चौथा व पाचवा गोलंदाज कमकुवत असलेल्या न्यू झीलंडसमोर किरकोळ होत्या, किरकोळच ठरल्या. ३४ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर स्टीव्हन स्मिथने विजयाचा चौकार मारला, पण त्या अखेरच्या क्षणासाठी खेळाडूंसकट, प्रेक्षकही खूप आधीपासूनच तयार होते. स्टेडियममध्ये जमलेल्या ९१००० लोकांना आपण विश्वचषकाचा अंतिम सामना पाहतो आहे, असं वाटलंच नसावं कारण व्यावसायिकतेपुढे भावनिकता पूर्णपणे हताश झालेली होती.

संपूर्ण स्पर्धेत, न्यू झीलंडने घराबाहेर खेळलेला हा पहिला सामना होता. ही गोष्ट त्यांच्यावर उलटली. साखळीतील ऑस्ट्रेलियासोबतचा सामनाही त्यांनी घरीच खेळला. ऑस्ट्रेलियाने तो सामना गमावला, पण त्यामुळे जर उपांत्यपूर्व वा उपांत्य मध्ये एखाद-दुसरा सामना त्यांना घराबाहेर खेळायला लागला असता तर ते त्यासाठी थोडे फार तरी तयार असते.

न्यू झीलंडसाठी सहा उपांत्य सामने हरल्यावर मिळालेली अंतिम सामना खेळण्याची पहिली संधी होती. ती त्यांनी गमावली. विश्वविजेतेपद मिळवण्याच्या वाटेवर नेहमीच ऑस्ट्रेलियाचं आव्हान असतं. ते ज्याला पेलवतं, तोच यशस्वी ठरतो. पण खरं सांगायचं तर ह्या आव्हानासाठी न्यू झीलंड तयार असल्यासारखे वाटलेच नाहीत. स्टार्क, जॉन्सनच्या भन्नाट वेगाला उत्तर देण्यासाठी किंवा स्मिथ, क्लार्कला भेदण्यासाठी त्यांच्याकडे कुठलीही विशिष्ट नीती दिसली नाही. 'बस्स, जाऊन आपापला नैसर्गिक खेळ खेळा' हे ऑस्ट्रेलियासारख्या कडव्या प्रतिस्पर्ध्यासमोर पुरेसं नसतंच. त्याची किंमत आधी पाकिस्तान, नंतर भारत व सगळ्यात शेवटी न्यू झीलंडने मोजली.

मला स्वत:ला अंतिम सामन्याच्या ह्या निकालाबद्दल आश्चर्य वाटत नसलं तरी आनंदही वाटत नाही.
क्रिकेट हा माझ्यासाठी खिलाडूवृत्तीचं प्रदर्शन करणारा सर्वोत्कृष्ट सांघिक खेळ आहे. आणि ऑस्ट्रेलिया व खिलाडूवृत्ती हे दोन परस्परविरोधी शब्द आहेत. हा असा संघ आहे की ज्याच्याकडून खिलाडूवृत्तीची अपेक्षा करणंही चूक आहे आणि असा संघ पुन्हा एकदा विश्वविजेता ठरला आहे. त्यांनी उत्तम खेळ केला आहे, मात्र त्या उत्तम खेळाने मिळवलेल्या यशाने त्यांच्यात आलेला उन्मत्तपणा योग्य ठरत नाही.

असो. एक मात्र नक्की की पराभवाच्या दरीत कोसळल्यावर उद्दामपणाच्या उड्या मारणं सुचत नसतं. त्या वेळी आत्मपरीक्षण करून, नियोजनबद्ध आखणी करून आधी दरीतून बाहेर यावं लागतं. तूर्तास न्यू झीलंड, भारत व दक्षिण आफ्रिकेसाठी हेच करणं आवश्यक आहे. तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने सेंड ऑफ द्यावेत आणि त्यांनी ते स्वीकारावेत. फक्त उद्या त्यांची परतफेड तशीच करू नये कारण मग त्यांच्यात आणि ऑस्ट्रेलियात फरक राहणार नाही आणि माझ्यासारख्या प्रामाणिक क्रिकेटप्रेमींना ते पाहवणार नाही. विश्वचषक चार वर्षांनी पुन्हा येईल. तो दर चार वर्षांनी येतच राहील. दर चार वर्षांनी विश्वविजेता बदलू शकेल. पण खेळ ह्या सगळ्याच्या वर आहे. तो बदलू नये. क्रिकेटचं फुटबॉल, रग्बी, रेसलिंग होणार असेल तर आम्ही क्रिकेट कुठे शोधायचं ?

ऑस्ट्रेलियाचे मन:पूर्वक अभिनंदन !
न्यू झीलंडला मन भरून शुभेच्छा !

- रणजित पराडकर


ह्या शृंखलेतील इतर लेख :- 'World Cup 2015

Sunday, March 29, 2015

बरखा सुमार आयी (Movie Review – Barkhaa)

वर्षानुवर्षं सकाळी उठून चहा किंवा कॉफी घेण्याची जवळजवळ प्रत्येकाला सवय असते. तीच चव, साधारण तीच वेळ आणि बहुतेकदा जागाही तीच. फक्त काही ठराविक काळानंतर 'कप' बदलतो. अगदी तसंच, वर्षानुवर्षं रोज सकाळी जाग आल्यावर प्रेमत्रिकोणाची किंवा 'पहिल्या नजरेत होणारं प्रेम आणि नंतर नावावर शेम' ह्या चहा किंवा कॉफीची हिंदी चित्रपटकर्त्यांचीही जुनी सवय आहे. फक्त ठराविक काळानंतर इथेही 'कप' बदलत गेला आहे. पहिली नजर जुळण्याच्या निवडक जागा कायम ठेवत नजरांची उगम स्थानं व मिलन स्थानं बदलत गेली आहे. ह्या 'प्रेम ते शेम ते परत प्रेम' प्रवासाची हाताळणी थोडी बदलत गेली आहे. ती अगदी जराशी वास्तववादी झाली आहे. अश्या कहाण्या दाखवताना पडद्यावर मात्र आजही ठोकळेच का असतात, हे मात्र मला समजत नाही.

'प्रेम-शेम-प्रेम'वाल्या 'बरखा' मधले ठोकळे आहेत 'ताहा शाह' आणि 'सारा लोरेन'. (पैकी हीरोचं नाव पहिलं आहे.)
एका नावाजलेल्या वकिलाचा मुलगा असलेला जतीन सबरवाल (ताहा) हिमाचल प्रदेशात मित्रासोबत गेला असताना बरखा (सारा)ला पाहतो आणि पहिल्या नजरेत वेड लागावं, असं तिच्यात काहीही नसतानाही तिच्यासाठी वेडा होतो. मग ती पांढरी पाल त्याला मुंबईत परतल्यावर पुन्हा भेटते. कालांतराने ती एक बार डान्सर असल्याचा एक भावनिक, सांस्कृतिक, सामाजिक, कौटुंबिक धक्का बसतो. भूकंपाप्रमाणे एका धक्क्यासोबत अजून एक धक्का बसतो, जो मी सांगणार नाही पण पण ह्या सगळ्यातून तो सावरणार आहे, हे आपल्याला माहित असतंच, सावर्तोच. अत्यंत बाष्कळपणे ही कहाणी, लिहिण्याआधीच सुचलेल्या शेवटापर्यंत पोहोचते. असा एकंदरीत कहाणीचा प्रवास.

ह्या दरम्यानच्या काळात असह्य प्रवासाचा आनंद काय असतो, ह्याचा पुरेपूर प्रत्यय येतो. पडद्यावर दिसणाऱ्यांपैकी १-२ सह-अभिनेत्यांचा अपवाद वगळता सर्व जण 'सुमार अभिनय स्पर्धे'त हिरीरीने सहभाग नोंदवल्यासारखे वावरतात.
'ताहा शाह' ही स्पर्धा अगदी सहजपणे जिंकतो. तो अनेक वर्षांतून एकदा येणाऱ्या विशिष्ट आकड्यांच्या तारखेप्रमाणे विशेष उल्लेखनीय आयटम आहे. त्याच्या चेहऱ्यावर हवा तो भाव दिसावा म्हणून मेक अपवाला, साउंड रेकॉर्डिस्ट, कॅमेरामन इ. सर्वांनी जीवाचं रान केलंय, मात्र तो क्षणभरही विचलित होत नाही. तो विनोद करताना हास्यास्पद आणि भावनिक होताना विनोदी वाटतो.
'सारा लोरेन'ला दुसरा क्रमांक मिळाल्याने ती जराशी खट्टू होईल. पण त्यात तिची खरोखर काहीच चूक नाही. तिची भूमिकाच अशी होती की तिने कितीही प्रयत्न केला, तरी अभिनयाचा थोडासा भास निर्माण होणं स्वाभाविकच होतं. मख्ख चेहऱ्याने लख्ख अंगप्रदर्शन करणाऱ्या जॅकलिन फर्नांडीस, लिसा रे, सेलिना जेटली, इ. पांढऱ्या बाहुल्यांच्या क्लबमध्ये 'सारा'ला आजीवन सदस्यत्व मिळू शकेल, नव्हे द्यायलाच हवं.
हिमांशू चटर्जी, पुनीत इस्सार व इतर सर्व कलाकारांना उत्तेजनार्थ बक्षीस विभागून देता येऊ शकेल. पण बारवाल्या 'अन्ना'च्या भूमिकेतील आशिष रॉयला 'सुमार अभिनय स्पर्धे'साठी अपात्र ठरवावं लागेल.
सगळ्यांकडून इतकं अप्रतिम प्रदर्शन करवून घेतल्याबद्दल दिग्दर्शकाच्या रिकाम्या खुर्चीला मात्र एक विशेष पारितोषिक दिलं गेलं पाहिजे. कारण चित्रपट हे दिग्दर्शकाचंच माध्यम असतं. पडद्यावर दिसणारे चेहरे निमित्तमात्र असतात.
ह्या सगळ्यात एक-दोन गाणी मात्र उगाच बरी जमून गेली आहेत. ती गाणी आपल्याला आवडल्याने थोडासा रसभंग होतो. खासकरून साबरी ब्रदर्सची कव्वाली 'मन कांटो मौला' चांगलीच लक्षात राहते आणि काही काळासाठी कलाकारांच्या नेत्रदीपक योगदानाला विसरायला भाग पाडते.
हिमाचलसारख्या निसर्गसुंदर भागात केलेलं चित्रणही इतकी इतकं सफाईदारपणे वाईट केलं आहे की कुठल्याही फ्रेममध्ये सौंदर्याचा लवलेश दिसू नये. मुंबई आणि हिमाचल हे दोन्ही भाग न पाहिलेल्यांना ह्या दोन्हींमध्ये फक्त बर्फाचा फरक आहे, असंही वाटू शकेल इतकं हे चित्रण सफाईदार आहे.

समजा दोन-अडीच तास कुठे तरी वेळ घालवायचाच असेल, तर उन्हाळ्याचे दिवस आहेत; उगाच इथे तिथे उंडारण्यापेक्षा एखाद्या स्वस्तातल्या, स्वच्छ व वातानुकुलीत चित्रपटगृहात जाऊन 'बरखा'चं तिकीट काढावे. अगदी कोपऱ्यातली जागा निवडावी आणि खुर्ची पुश बॅक करून ताणून द्यावी. उत्तम झोप होईल.

रेटिंग - १/२* (अर्धा तारा)

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (२९ मार्च २०१५ रोजी) प्रकाशित झाले आहे :-

Friday, March 27, 2015

स्वप्नापासून वास्तवापर्यंत ! (India vs Australia - Cricket World Cup 2015 - Semi Final)

गेले चार महिने ऑस्ट्रेलियन संघासमोर जे भारताला जमलं नव्हतं, ते शेवटपर्यंत जमलंच नाही. सगळं स्टेडीयम निळ्या रंगात न्हाऊन निघालं, पण तरी विजयाचा रंग बदलला नाही. स्टेडीयमचा, लोकांचा रंग मैदानावर ओघळला नाही तरी अखेरीस सिडनी सिडनीच राहिलं, अहमदाबाद झालं नाही. भारतासाठी एक स्वप्नवत स्पर्धा, एका बोचऱ्या वास्तवाची जाणीव करून देऊन संपली.
भारत उपांत्य सामना हरला ह्याचं दु:ख राहिल, ऑस्ट्रेलियाशी हरला ह्याचंही दु:ख राहिल, पण ह्याहून जास्त दु:ख ह्याचं राहिल की न झुंजता हरला.
दु:ख राहिल, वाईट वाटेल तरी लाज वाटणार नाही. लाजिरवाणं तर ते होतं जे ह्या विश्वचषकात श्रीलंकेचं दक्षिण आफ्रिकेसमोर झालं, इंग्लंडचं न्यू झीलंडसमोर झालं, पाकिस्तानचं वेस्ट इंडीजसमोर झालं किंवा भारताचं बांगलादेशसमोर २००७ च्या विश्वचषकात झालं, ऑस्ट्रेलियासमोर २००३ च्या विश्वचषकात साखळी फेरीत झालं. सध्याच्या भारतीय संघाने सलग सात सामने जिंकत, प्रत्येक सामन्यात १० बळी मिळवत, दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश करणं हेच खरं तर अविश्वसनीय यश आहे.
भारताच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीचा विचार करता, ह्या सात सामन्यांत ज्या संघांशी सामना झाला, त्यांपैकी ४ कच्चे लिंबू (बांगलादेश, आयर्लंड, झिंबाब्वे, संयुक्त अरब अमिराती) होते. २ लंगडे घोडे (पाकिस्तान, वेस्ट इंडीज) होते आणि एकच दक्षिण आफ्रिकेचा संघ होता जो बलशाली होता. तोच एक खरा विजय. गोलंदाजी, फलंदाजी व क्षेत्ररक्षण ह्या तिन्हीत ऑस्ट्रेलियासुद्धा भारतापेक्षा सरस आहे, हे मान्य करावंच लागेल. त्यामुळे जे घडलं ते अनपेक्षित होतं असं नाही तर माझ्यासकट अनेक क्रिकेटरसिक ज्याची आस लावून होते, तेच खरं तर अवास्तव होतं. तरी, 'आजही जर अमुक झालं असतं तर निकाल बदलला असता; तमुक घडलं असतं तर जिंकलो असतो' वगैरे म्हणणं मात्र 'मेल्या म्हशीला दूध फार' असा प्रकार होईल. तेव्हा हे स्पष्टपणे स्वीकारायला हवं की भारताने खरं तर ह्या विश्वचषकात आत्तापर्यंत स्वत:च्या कुवतीपेक्षा चांगला खेळ केला आणि ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी जास्त योग्य होता.

महत्वाच्या सामन्यांत नाणेफेकीचा कौल धोनीच्या बाजूने लागला नाही आणि मायकेल क्लार्कने फलंदाजी स्वीकारली. डेव्हिड वॉर्नरने हाणामारीसाठी बाहू सरसावलेच होते, पण उमेश यादवच्या गतीने त्याला चकित केलं आणि भारताला महत्वाचा बळी लौकर मिळाला. चांगली सुरुवात होती, मात्र त्याचा फायदा पुढे घेता आला नाही. किंबहुना, मी असं म्हणीन की स्टीव्हन स्मिथने घेऊ दिला नाही. चाचपडत खेळणाऱ्या आरोन फिंचला सोबत घेऊन त्याने जी शतकी भागीदारी केली, त्यात खरं तर दोघांच्या धावा त्याच्याच समजायला हव्या. त्याने इतक्या सहजतेने धावा वाढवत ठेवल्या की फिंचला धावा काढणं जमत नसतानाही उतावळेपणा करायची गरजच भासली नाही. एक फलंदाज शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे धडपडत होता आणि दुसरा केवळ स्वत:च्या कुवतीच्या जोरावर त्याच गोलंदाजीवर मात करत होता; असंच हे चित्र होतं. स्मिथचं शतक आणि नंतर मॅक्सवेल, फॉकनर आणि जॉन्सनने मिळून केलेल्या अवघ्या ३५ चेंडूंतील ७१ धावा ह्यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ३२८ पर्यंत मजल मारली.
ऑस्ट्रेलियाच्या जलदगती माऱ्यापुढे ३२९ धावांचं लक्ष्य भारतासाठी महाकठीण ठरणार होतंच, ठरलंच. धवन-रोहितने प्रत्येकी एका जीवदानाच्या जोरावर ७१ धावांची चांगली सलामी दिली, मात्र धवन बाद झाल्यानंतर भारत हळूहळू सामन्यातून बाहेर फेकला गेला. ठराविक अंतराने गडी बाद होत राहिले आणि सावरता आलंच नाही.

सामने जिंकत असताना काही गोष्टींबाबत फार तर हलकीशी कुरबुर केली जाते. मात्र जेव्हा सामना हरला जातो, तेव्हा त्याच गोष्टींवर बोट ठेवून त्या ठळक केल्या जातात. अश्या अनेक गोष्टी आता ठळक होतील.
उमेश यादवने आज ४ बळी घेतले, पण त्यासाठी प्रति षटक तब्बल ८ धावा दिल्या. हाणामारीच्या षटकांत होणाऱ्या हल्ल्यामुळे हे आकडे बिघडले का ? नाही. त्याने नियमितपणे धावांचा पुरवठा केला. ह्याचं कारण काय ? त्याचा सगळ्यात जलद चेंडू १४९ च्या गतीने होता आणि सगळ्यात धीमा चेंडू १४० ने. हे गतीपरिवर्तन अगदीच क्षुल्लक आहे. आजच्या क्रिकेटमध्ये फलंदाज सतत धाव घेण्याच्याच विचारात असतो. 'पुढील येणारा चेंडू कोणत्या गतीने येईल' ह्यावर त्याला विचार करायला भाग पाडणं म्हणूनच अत्यावश्यक ठरतं. हे आकडे खरं तर १४९ व १२५ असे काहीसे हवे होते. यादवला जर अधिक काळ यशस्वी राहायचं असेल, तर त्याला गोलंदाजीत काही चतुर बदल करावेच लागतील. ९ षटकांत ७२ धावा देऊन ४ बळी घेणं, हे संघाला विजयपथावर नेऊ शकत नाही. ह्यापेक्षा ९ षटकांत ३६ धावा देऊन एकही बळी नाही मिळाला, तरी उत्तम.
रवींद्र जडेजाच्या बाबतीत नीट विचार करणे खूप आवश्यक आहे. जडेजा संघात जर एक अष्टपैलू म्हणून खेळत असेल, तर त्याचं अष्टपैलुत्व त्याने आयपीएलमध्ये सिद्ध करून उपयोगाचं नाही. सनथ जयसूर्यासुद्धा जडेजासारखाच एक सामान्य डावखुरा फिरकी गोलंदाज होता. श्रीलंकेने त्याच्यावर वेगळा विचार करून त्याला असा काही 'तयार' केला की त्याने संघाचं नशीब तर बदललंच, खेळाचं गणितही कायमस्वरूपी बदलून टाकलं. ही तुलना जयसूर्या आणि जडेजाची नसून भारत व श्रीलंकेच्या विचारप्रक्रियेची आहे. जडेजाच्या तंत्रात एक फलंदाज म्हणून अनेक उणीवा आहेत. पण आजच्या क्रिकेटमध्ये अनेक यशस्वी फलंदाज अत्यंत सदोष तंत्राने खेळताना दिसतील. त्यांतले किती तरी जण तर सलामीला असतील ! एक गोलंदाज म्हणून तो १००% विश्वासाने प्रत्येक सामन्यात १० षटकं टाकू शकत नाही. एक फलंदाज म्हणून तो १५ चेंडूत २५ धावांशिवाय जास्त योगदान देऊ शकत नाही. म्हणजेच पाचवा गोलंदाज आणि सातवा फलंदाज म्हणून दिलेली जबाबदारी तो नक्कीच अपेक्षेइतकी चांगल्या प्रकारे पार पाडू शकत नाही आहे. अश्या वेळी दोन उपाय उरतात, ती जबाबदारी दुसऱ्या कुणाला देणं किंवा त्याला दुसरीच जबाबदारी देणं.
विश्वचषकातील आठ सामन्यांपैकी सात सामन्यांत भारताने एकच संघ खेळवला. एकाच सामन्यात शमीऐवजी भुवनेश्वर कुमार खेळला कारण शमी दुखापतग्रस्त होता. जे सामने अक्षरश: केवळ औपचारिक होते, त्या सामन्यांतही भारताने संघात बदल केले नाहीत. भुवनेश्वर कुमारसारख्या विश्वसनीय स्विंग गोलंदाजाला आपण संघाबाहेर ठेवावं, इतकी श्रीमंती आपल्या गोलंदाजीत नक्कीच नाही. केवळ 'विनिंग कॉम्बीनेशन' बदलायचं नाही, म्हणून अपेक्षेनुरूप कामगिरी करूच न शकणाऱ्या खेळाडूंना खेळवत राहणं अंगलट येऊ शकतं, आलंही असावं.

असो !
स्पर्धा संपली. चषक गेला. आता २०१९ पर्यंत प्रतीक्षा करणं, हेच केवळ हाती आहे. तेव्हा कदाचित महेंद्रसिंग धोनी नसेल. संघाला त्याची उणीव भासेल, असं मी म्हणणार नाही. कारण संघाला आज सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली ह्यांचीही उणीव जाणवत नाही आहे. प्रत्येकाची जागा, कुणी ना कुणी घेत असतोच आणि घ्यायलाही हवीच. धोनीचं एक कर्णधार व एक फलंदाज म्हणून मोठेपण, गोलंदाजीतील बदलापासून संघनिवडीपर्यंत कुठलाही निर्णय ठामपणे घेणे आणि त्याच्या बऱ्या-वाईट परिणामांना सामोरं जाण्याची हिंमत दाखवणे ह्यात आणि कालच्या सामन्यांत ५ गडी बाद होऊन आवश्यक धावगती १५ पर्यंत गेली असतानाही 'जोपर्यंत धोनी आहे, तोपर्यंत आपण जिंकले नाही' ही जाणीव प्रतिस्पर्ध्यांना असणं, ह्यात आहे.

धोनी हरला. भारत हरला. मात्र सपशेल अपयशी ठरलेल्या संपूर्ण ऑस्ट्रेलियन दौऱ्याच्या अखेरीस विश्वचषकाच्या सर्वोच्च मंचावर मात्र ह्या संघाने हाराकिरी केली नाही. ह्या पराभवाची चुटपूट लागेल, पण लाज वाटणार नाही; इतकी तरी कमाई त्याने व ह्या संघाने केली आहे निश्चितच ! आशा करू या की वास्तवाला झाकणारा जो स्वप्नवत आभास गेल्या महिन्याभरात निर्माण झाला होता, ते स्वप्न पुढील चार वर्षांत वास्तवरूपात उतरेल. धोनी नावाचा सिंह असेल किंवा नसेल, पण गड पुन्हा मिळवला जाईल. त्यासाठी भारतीय संघाला मनापासून शुभेच्छा !

- रणजित पराडकर




ह्या शृंखलेतील इतर लेख :- 'World Cup 2015
Related Posts Plugin for WordPress, Blogger...